मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ९) – राग~ रागसारंग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 ☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ९) – राग~ रागसारंग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

मागील आठवड्यांत सूर्योदय कालीन राग ललत संबंधी विचार मांडल्यानंतर आज मध्यान्ह काळचा अतिशय लोकप्रिय राग सारंग विषयी या लेखांत विवरण करावे असा विचार मनांत आला.

काफी थाटांतील हा राग! गंधार व धैवत वर्ज्य, म्हणजेच याची जाति ओडव. शुद्ध व कोमल असे दोन्ही निषाद यांत वावरत असतात, आरोही रचनेत शुद्ध आणि अवरोही रचनेत कोमल याप्रकारे दोन निषादांचा उपयोग. नि सा  रे म  प नि सां/सां (नि)प म रे सा असे याचे आरोह/ अवरोह. निसारे, मरे, पमरेसा या सुरावटीने सारंगचे स्वरूप स्पष्ट होते.वादी/संवादी अर्थातच अनुक्रमे रिषभ व पंचम.

स्वरांमध्ये थोडा फेरफार करून आणि रागाची वैषिठ्ये कायम ठेवून गानपंडितांनी सारंगचे विविध प्रकार निर्मिले आहेत.

उपरिनार्दिष्ट माहीती प्रचलित ब्रिन्दावनी सारंगची आहे.हिराबाई बडोदेकर यांची “मधुमदन मदन करो”ही ब्रिन्दावनी सारंगमधील खूप गाजलेली बंदीश. तसेच “बन बन ढूंढन जाओ”ही पारंपारीक बंदीश प्रसिद्ध आहे.”भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी”,”बाळा जोजो रे”,”साद देती हिमशिखरे” हे नाट्यपद,”संथ वाहते कृृष्णामाई” ही सर्व  गाणी म्हणजे ब्रिन्दावनी सारंगचे सूर.

शुद्ध सारंगः हा राग ओडव/षाडव जातीचा कारण ह्यात  शुद्ध धैवत घेतला जातो.दोन्ही मध्यम घेणे हे शुद्ध सारंगचे स्वतंत्र अस्तित्व. तीव्र मध्यमामुळे हा सारंग थोडा केदार गटांतील रागांजवळचा वाटतो. अवरोहांत तीव्र मध्यम घेऊन लगेच शुद्ध मध्यम घेतला जातो. जसे~ सां (नि )ध प (म)प रे म रे, निसा~~ अशी स्वर रचना फार कर्णमधूर भासते.सुरांच्या ह्या प्रयोगामुळे त्यांत एकप्रकारचा भारदस्तपणा जाणवतो.

“निर्गुणाचे भेटी आलो सगूणासंगे” हा रामदास कामतांनी प्रसिद्ध केलेला अभंग, “शूरा मी वंदिले” हे मानापमानांतील नाट्यगीत, “दिले नादा तुझे हुआ क्या है” ही मेहेंदी हसनची सुप्रसिद्ध गझल ही शुद्ध सारंगची उदाहरणे देता येतील.

मधमाद सारंगः  सारंगचेच सर्व स्वर ठेवून मध्यमाला महत्व दिले की झाला मधमाद सारंग. “आ लौटके आजा मेरे मीत हे रानी रूपमतीतील गीत हे या रागाचे उदाहरण.

सामंत सारंगः हा राग म्हणजे सारंग आणि मल्हार यांचे मिश्रण. सारंगप्रमाणे यांत धैवत वर्ज्य नसतो.सारंगचाच प्रकार असल्यामुळे मरे, रेप ही स्वर संगति दाखवून रिषभावर न्यास करून म रे म नि सा हे सारंगचे अंग दाखविणे अनिवार्य आहे. पूर्वार्धात प्रामुख्याने सारंग अंग व ऊत्तरार्धांत (नि )ध नी सा (नी) प असे मल्हार अंग म्हणजे  सामंत सारंग.

बडहंस सारंगः ब्रिन्दावनी सारंगमधेच शुद्ध गंधार वापरून बडहंस तयार होतो.

लंकादहन सारंगः कोमल गंधार घेऊन ब्रिंदावनी गायला की झाला लंकादहन.

गौड सारंगः सारंगच्या प्रकारातील हा अतिशय प्रचलित राग.जरी सारंग असला तरी ह्याची जवळीक अधिक केदार कामोदशी आहे. कारण शुद्ध व तीव्र दोन्ही मध्यमांची यांत प्रधानता आहे.पध(म)प किंवा ध (म)प हे स्वर समूह वारंवार या रागाचे स्वरूप दाखवितात.केदार प्रमाणेच प प सां  असा अंतर्‍याचा उठाव असतो. प्रामुख्याने स्वरांची वक्रता हा या रागाचा गुणधर्म!सारंग जरी काफी थाटोत्पन्न असला तरी हा गौडसारंग कल्याण थाटांतील मानला जातो.

“काल पाहीले मी स्वप्न गडे” हे गीत श्रीनिवास खळ्यांनी गौड सारंगमध्ये बांधले आहे. या रागाचे उत्तम उदाहरण म्हणजे हम दोनो या चित्रतपटांतील “अल्ला तेरो नाम”  हे भजन.

भर दुपारी गायला/वाजविला जाणारा सारंग हा शास्त्रीय राग! सूर्य डोइवर आला आहे,रणरणती दुपार,कुठेतरी एखाद्या पक्षाचे झाडावर गूंजन चालू आहे,कष्टकरी वर्गांतील काही मंडळी झाडाच्या पारावर बसून शीतल छायेत भोजनाचा आस्वाद घेत आहेत, अशावेळी हवेची एखादी झुळूक येऊन वातावरणांत गारवा निर्माण व्हावा तसा हा शीतल सारंग म्हणता येईल.या रागांचे स्वर कानावर पडतांच सगळ्या चिंता, काळज्या दूर होवून मन प्रसन्नतेने व्यापून राहिल्याचा प्रत्यय येतो.ह्या रागासंबंधी असे म्हटले जाते की हा राग ऐकत ऐकत भोजन केले तर ते अधिक रुचकर लागते. स्वर्गीय आनंद देणार्‍या या रागाने दुपारच्या भगभगीत समयाचे सोने केले आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 84 – इलाहींच्या आठवणी…. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 84 ☆

☆ इलाहींच्या आठवणी…. ☆

एकतीस जानेवारीला सुप्रसिद्ध गजलकार इलाही जमादार आपल्यातून निघून गेले. आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या…… तेवीस जानेवारीला मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांच्या वहिनी ने फोन घेतला, मी म्हटलं, मी प्रभा सोनवणे, मला इलाहींशी बोलायचं आहे….त्यांनी इलाहींकडे फोन दिला, तेव्हा ते अडखळत म्हणाले, “आता निघायची वेळ झाली ……पुढे बोललेली दोन वाक्ये मला समजली नाहीत….मग त्यांच्या वहिनी ने फोन घेतला, त्या म्हणाल्या “आता त्यांना उठवून खुर्चीत बसवलं आहे, तब्बेत बरी आहे आता.”…..त्या नंतर सात दिवसांनी ते गेले!

मला इलाहींची पहिली भेट आठवते, १९९३ साली बालगंधर्व च्या कॅम्पस मधून चालले असताना अनिल तरळे या अभिनेत्याने माझी इलाहींशी ओळख करून दिली, मी इलाहीं च्या गजल वाचल्या होत्या, इलाही जमादार हे गजल क्षेत्रातील मोठं नाव होतं, मी त्यांच्यावरचा एक लेख ही त्या काळात वाचला होता, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली.. आता कशास त्याची पारायणे “इलाही’ माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली हा त्या लेखात उद्धृत केलेला शेर मला खुप आवडला होता, मी तसं त्यांना त्या भेटीत सांगितलं….कॅफेटेरियात आम्ही चहा घेतला, आणि इलाहींनी त्यांच्या अनेक गज़ला ऐकवल्या, मी खुपच भारावून गेले होते. त्यांनी मलाही कविता ऐकवायला सांगितलं तेव्हा मी पाठ असलेल्या दोन छोट्या कविता ऐकवल्या, त्यांनी छान दाद दिली.

एक छान ओळख करून दिल्याबद्दल अनिल तरळे चे आभार मानले, आणि म्हणाले, निघते आता, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे तर ते म्हणाले “तुम्ही स्वयंपाक करत असाल असं वाटत नाही”, त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं मला समजलं नाही…..

इलाहींच्या अप्रतिम गज़ला ऐकून मला कविता करणं सोडून द्यावंसं वाटलं होतं त्या काळात!

त्यानंतर काही दिवसांनी मी अभिमानश्री हा श्रावण विशेषांक काढला, त्याच्या प्रकाशन समारंभात आयोजित केलेल्या कविसंमेलनात त्यांना आमंत्रित केलं होतं त्या संमेलनात त्यांनी त्यांची गजल सादर केली होती. एवढा मोठा गजलकार पण अत्यंत साधा माणूस!

मी त्या काळात काव्यशिल्प या संस्थेची सभासद होते.

इलाहींच्या प्रभावाने आम्ही काव्यशिल्प च्या काही कवींनी एक गजलप्रेमी संस्था सुरू केली. काही मुशायरे घेतले, इलाही अनेकदा माझ्या घरी आले आहेत.ते स्वतःच्या गज़ला ऐकवत आणि माझ्या कविता ऐकवायला सांगत, दाद देत.

गजल च्या बाबतीत ते मला म्हणाले होते, तुम्ही “आपकी नजरोने समझा…..” ही गज़ल गुणगुणत रहा त्या लयीत तुम्हाला गज़ल सुचेल! पण तसं झालं नाही!

क्षितीज च्या मैफिलीत सादर करण्यासाठी मी पहिली गज़ल लिहिली ती अगदी ढोबळमानाने, मी इलाहींकडून गज़ल शिकले नाही. पण त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संस्थेमुळे गजलच्या वातावरणात राहिले, इलाहींच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या गजलसागर च्या अ.भा.म.गजलसंमेलनात माझ्या गजलला व्यासपीठ मिळालं त्यानंतर च्या अनेक गज़लसंमेलनात माझा सहभाग होता. “गजलसागर” चे गज़लनवाज भीमराव पांचाळे यांचा परिचय पुण्यात अल्पबचत भवन मध्ये त्यांच्या एका गजलमैफिलीच्या वेळी झाला होता, त्या मैफीलीचे सूत्रसंचालन अभिनेते प्रमोद पवार करत होते.

या अफाट गज़लक्षेत्रात माझी खसखशी एवढी नोंद घेतली गेली याला कुठेतरी कारणीभूत इलाही आहेत. निगर्वी, हसतमुख, मिश्किल नवोदितांना नेहमी प्रोत्साहन देणारे आणि नेहमी सहज छानशी टिप्पणी देणारे इलाहीजमादार आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या खुप स्वच्छ आणि सुंदर आठवणी आहेत.

लिहिल्या कविता, लिहिल्या गज़ला, गीते लिहिली
सरस्वती चा दास म्हणालो चुकले का हो?

?? असं म्हणणा-या या प्रतिभावंत गजलकाराला भावपूर्ण श्रद्धांजली, अभिवादन! ??

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

दरवर्षी हा थंडीचा सिझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात  आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.

सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिश कालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता  येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले.बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता. दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती.  त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरती ला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.

एक दीड वर्षाचा कालावधी पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारी ची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे, इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत, बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!

रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडू च्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू  होती.  ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे.केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.

माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी  लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या  आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई  भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक  शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे, असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं!

त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई.उकाडा खूप! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती, ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादर चे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या, उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक  खाऊ घालत!

सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.

तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्या झाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी  मला आणून दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले!

खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपिक होता. शिरपूर जवळ’ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम  आहे.’प्रती काशी’

म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला!

गव्हाची  शेती खुपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा  होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती, दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच! माझी कामवाली सखी-लता, प्रत्येक पिक्चर बघून यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची! तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूर चे तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूर ची खास तूरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड, सांडग्यांचे कालवण, डाल बाटी, तर्हेतर्हेची लोणची, खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते!तिथले तीनही ऋतू अनुभवले!उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो, पण अजूनही शिरपूर चा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोक गीतातून  दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि  तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्य रूप होऊन डोळ्यासमोर आले! इतक्या वर्षांनंतरही शिरपूर चे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

पुण्यापासून जवळच केडगाव आहे. तिथली नारायण महाराजांची सोन्याची दत्तमूर्ती Bank of Maharashtra मधे असते आणि वर्षातून एकदा दर्शनासाठी बाहेर काढली जाते. महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं. संन्यस्त असून हे ऐश्र्वर्य असल्याने नारायण महाराज उगाचच गैरसमजाच्या धुक्यात होते. पण त्यांच्या कार्यामागचा अर्थ वडिलांनी समजाऊन सांगितलेला… सहज शेअर करावासा वाटतो.

तसे घरातून माझ्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झालेले. म्हणजे घरी पारंपरिक सणवार, पूजाअर्चा, स्तोत्रपठण आणि गीतापाठांतर असेच वातावरण असले तरी मशीद आणि चर्चची ओळख आवर्जून करून दिली होती वडिलांनी. सगळ्याच लोकांना आणि चक्क मार्क्सवादी लोकांनाही आमचं घर “आपलं” वाटायचं कारण साऱ्या विचारांचा स्वीकार व्हायचा.

तरीही धर्म हा विषय समाजजीवनावर परिणाम करतोच. केडगावात तेच होत होतं. मिशनरी लोक गरीब लोकांना फक्त खायला द्यायचे आणि धर्मांतर करायचे. पंडिता रमाबाईंचं मिशनही कडेगावातच आहे. अर्थात तिथे आश्रयाला येणाऱ्या स्त्रियांवर धर्मांतराची सक्ती नसे… पण स्वतः रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

पुन्हा दयानंदांच्या वेळचाच मुद्दा इथेही लक्षात घ्यायला पाहिजे. एक विचार केवळ धाकानं किंवा पैशानं का नष्ट करायचा? शिवाय राजकीय विषयही होताच हा. ब्रिटिशांचा धर्म स्वीकारला की त्यांची गुलामी बोचणारच नाही. मग देशाचं आर्थिक शोषण, आत्मविश्वास संपणं सगळं आलंच….यासाठी भुकेमुळं होणारं धर्मपरिवर्तन थांबवणं गरजेचं होतं. हिंदुस्थानच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करणार नाही अशी राणीची पॉलिसी होती. म्हणून नारायण महाराजांनी एकशेआठ सत्यनारायण रोज करण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी खास रेल्वेच्या वॅगन मधून तुळशी यायच्या. प्रसाद म्हणून मोठे वाडगे भरून प्रसाद सगळ्यांना द्यायचे. गोरगरीबांना साजूक तुपाचा उत्तम शिरा पोट भरून दिला जायचा. एकच माणूस पुन्हा आला तरी त्याला पुन्हा दिला जायचा. या एका गोष्टीमुळे भुकेपोटी होणारं धर्मपरिवर्तन थांबलं. आपलं कार्य संपल्यावर सगळं ऐश्र्वर्य सोडून एका वस्त्रानिशी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नारायण महाराज केडगावहून निघून गेले आणि बंगलोर इथे राहून शेवटी त्यांनी देह ठेवला.

“नामस्मरण करून आनंदात राहावे” हा त्यांचा एकमेव उपदेश आहे.

नामस्मरण करावं हे ठीक आहे.. पण आनंदात राहावे हे तितकेच महत्त्वाचे आहे ना.. आनंदी राहण्यासाठी मनाला केवढी शिस्त हवी! एवढ्यातेवढ्याने रागवायचे नाही, कुणाचा हेवा करायचा नाही, कशाचा लोभ धरायचा नाही, निंदेला घाबरायचं नाही, समाधानी राहायचं तर आनंदात राहता येईल. थोडक्यात इतका स्वत:चा विकास विवेकानं करता आला तरच आनंद मिळणार. हा एवढा अर्थ भरला आहे या छोट्या वाक्यात.

श्रावणात घरोघरी सत्यनारायण पूजा सुरू झाल्या की मला केडगावच्या नारायण महाराजांची आठवण येते.

 

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

नाशिक येथे भरणार्‍या ९४व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची निवड झाली त्या निमीत्ताने…. अर्थात् माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या व्यक्तीने एका प्रचंड बुद्धीमान व्यक्तीविषयी काही भाष्य करणे हे निव्वळ धाडसाचे…. नारळीकर हे मूळचे पारगावचे. तेथे ऐकलेल्या गोष्टीनुसार असे की, नारळीकरांच्या परसांत आंब्याची झाडे होती. आणि या आंब्याच्या झाडांना नारळा एवढे आंबे लागायचे, म्हणून त्यांचे नाव “नारळीकर” असे पडले.

डाॅ.जयंत नारळीकर यांची आत्मकथा “चार नगरातले माझे विश्व”

बनारस, केंब्रीज, मुंबई आणि पुणे….प्रत्येक संक्रमणाच्यावेळी, त्यांना आपण एक धाडस करतो असे वाटायचे. बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात पदार्पण करताना आपण आपल्या माणसांपासून दूर एकटे आहोत ही जाणीव त्यांना व्यथित करायची… केंब्रीज सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हां, “कशाला हे धाडस करता?”

हे विचारणारे अनेकजण भेटले. पण तेव्हांसुद्धा, देशबांधवांकरिता काहीतरी सकारात्मक आपल्या हातून घडावे हा विचार प्रेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुसर्‍या नगरात, शून्यातून, आयुका ही नवीन संस्था निर्माण करण्याचे आवाहन स्वीकारणे हेही धाडसाचेच होते… बी.एस.सी. पदवी प्राप्तीनंतर, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेऊन त्यांनी केंब्रीज विद्यापीठात पदार्पण केले.

रँग्लर किताब, टायसन स्मिथ्स, अॅडम्स आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत खगोलशास्रातील सापेक्षतावाद, पूंजवाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र यामधे विलक्षण संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजेच त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधील वास्तव्य.. एका परिषदेत इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले, “भारताचे विभाजन झाले, तेव्हां ज्या हिंदु मुस्लीम कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबविता आल्या नाहीत?”

नारळीकर ताबडतोब ऊत्तरले!  “विभाजन ब्रिटीशांनी घडवले! ते अस्तित्वात येत असताना,कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.”

पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही या भाष्याला अनुमोदनच दिले. ते “ब्रिटीश” प्राध्यापक, गप्प, झाले. दोघांत भांडण लावून गंमत पाहण्याचे त्यांचे खोडसाळ धोरण त्यांच्यावरच ऊलटले.

स्वत:ला जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकांमधे आणि विज्ञानविश्वात सिद्ध केल्यानंतर स्वदेशी परतण्याच्या भूमिके बद्दल ते सांगतात, “माझ्या मनात परदेश वास्तव्याबद्दल एक ऊपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विवीध गोष्टींसाठी करावी लागणारी धावपळ, कमी पगार, लालफीत, अधिकारशाही.. हे विचारात घेऊनसुद्धा मी आपल्या देशात, आपल्या माणसात आहे, ही भावना सगळ्यांवर मात करत होती…”

जीवनाबद्दलची कमीटमेंट त्यांना महत्वाची वाटते. ज्या देशाने त्यांना शिष्यवृत्ती देऊन यशाची वाट दाखवली, त्या देशाचं देणं द्यायला पाहिजे, हे महत्वाचं वाटतं.

स्वाक्षरी मागण्यार्‍या विद्यार्थ्यांना ते सांगतात, “इथे मी तुला स्वाक्षरी देणार नाही, पण तू मला एक पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा प्रश्न विचार. मी त्याला स्वाक्षरीसकट ऊत्तर पाठवेन.”

नंतर या प्रश्नोत्तरातूनच, “सायन्स थ्रु पोस्टकार्डस्.” असे लहानसे पुस्तक प्रकाशित झाले.

एक प्रश्न त्यांना विचारला जातो, “तुमचा देवावर विश्वास आहे का?”

प्रश्न विचारण्याला ‘हो’ किंवा ‘नाही’ असे एकशब्दी ऊत्तर अपेक्षित असते. पण तसे ऊत्तर ते देत नाहीत. कारण त्यांच्या मते देव आणि विश्वास या संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहेत. सोपे ऊत्तर एवढेच, की एका परम शक्तीने विश्व निर्माण केले व त्याचे नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक नियम ठेवले. त्या ‘परम शक्तीला देव म्हणता येईल.

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? याबद्दलही ते सांगतात, “कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने, पुष्टी देऊन मिळाल्याशिवाय, बरोबर मानायचा नाही आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, त्याच्याकडुन वेळोवेळी नवी भाकिते यावीत, ज्यांची तपासणी करुन, मूळ तर्काचे खरेखोटेपण, ठरवता येते. तर्कशुद्धी विचारसरणी यालाच म्हणतात…

मा. जयंत नारळीकर यांचे व्यक्तीमत्व अनेक पैलु असलेले बहु आयामी आहे…ते वैज्ञानिक, तत्वचिंतक आणि साहित्यिकही आहेत. तसेच कला क्रीडा संगीत जाणणारे रसिक आहेत. एक जबाबदार सुपुत्र,चांगला पती आणि आदर्श पालकही आहेत. ज्यांच्या नावातच श्रीफळ आहे, त्याने विज्ञानाच्या या कल्पवृक्षाची जोपासना केली.. नुसतेच आकाश बघणार्‍या तुम्हांआम्हाला आकाशाच्या अंतरंगात बघण्याची गोडी लावली…

भारतरत्नाच्या दिव्यत्वाच्या या प्रचीतीला माझे हात सदैव जुळतील….

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-3 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांचा पेशा वैद्यकीय, आयुर्वेदिक वैद्य.(BAMS) पुढे integrated courses करून शल्य चिकित्सक व भूलतज्ञ (anesthetist) ही झाले.

त्यांची बोटे हार्मोनियमवर जितक्या सहजतेने व चपळाईने फिरत तितक्याच किंबहुना जास्तच अचूकतेने आणि सावधपणे शस्त्रक्रिया करत असत. हार्मोनियम मधून मधुर स्वर निर्मिती होत असे तर शस्त्रक्रियेतून शरीराची व पंचप्राणांची दुरुस्ती होत असे.

एक 10-11 वर्षाची मुलगी चालत्या स्कूटरवरून पडली आणि कानापासून हनुवटीपर्यंतचा गाल चक्क कागद फाटावा तसा फाटला. तशीच तिला रक्तबंबाळ अवस्थेत CPR kolhapur ला आणले. बाबा होतेच तिथे. लगेचंच तिला OT मध्ये घेण्यात आलं. जवळ जवळ दोन तास ऑपरेशन चालू होतं. हळूहळू बरी झाली,   तर एका महिन्यानं तिचे आईवडील तिला घेऊन हाॅस्पिटल मध्ये छान बरी झाली म्हणून भेटायला गेले.बाकीचे सगळे डाॅक्टर्स ही होतेच तिथे. तिचा फाटलेला गाल पूर्णपणे बरा झाला होता. गोरीपान मुलगी, गालावरची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभर तोंडावर टाके, आणि शस्त्रक्रियेची खूण कायमच रहाणार. कदाचित थोडी विद्रूपता येण्याचीही शक्यता. असाच ठाम समज झाला होता. पण तिच्या बाबतीत प्रत्यक्षात वेगळंच झालं होतं. बाबांनी इतर डाॅक्टर्सना  सांगितली तिची case. पण तिला बघितल्यावर डाॅक्टर्स सगळे चकित झाले. OTच्या नर्सेस नी जेव्हा सांगितलं की तिचा पूर्ण गाल फाटला होता, पण सरांनी (बाबांनी) तो इतका नाजुकपणे आणि कम्मालीच्या सफाईने शिवला की, डाग किंवा विद्रूपता सोडाच, गालावरून एक लांब बारीक केस यावा असा भास होत होता. गोरा पान चेहरा, गुलाबी ओठ, एका गालावर खळी, आणि दुस-या  गालावरचा हा केस सौंदर्यात आणखीच भर घालत होता.

सगळ्या डाॅक्टर्सनी अक्षरशः बाबांना दंडवत घातलं.

हाॅस्पिटल मध्ये शिस्त, स्वच्छता याबाबतीत बाबांची करडी नजर असे. दराराच होता म्हणा ना! पण प्रेम ही तितकेच होते. बाबांना बाकीचे डाॅक्टर्स डॅडी म्हणायचे.

बाबांना  शस्त्रक्रियेतल्या कौशल्यासाठी नावाजले जात होते.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

 

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?

धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

 

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी

जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

 

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?

आठवणींना, श्वास म्हणालो, चुकले का हो?

 

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे

मी त्याना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?

 

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

 

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली

सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

 

चौदा वर्षे, पतीविना, राहिली उर्मिला

हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

 

घात आप्त, आघात सगे, अपघात सोयरे

ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

 

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!

याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

 

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?

कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

 

 – इलाही जमादार

एक ऊत्तुंग मराठी गझलकार आज आपल्यांत नाही हे स्वीकारणं खूप कठीण आहे!

एक मार्च १९४६ साली दूधगाव सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर गझलकार म्हणून इलाही जमादार यांचेच नांव घेतले जाते.

पुण्यात एका लहानशा आऊट हाऊसमधे रहात.. पुस्तके आणि मांजरांच्या पसार्‍यात हा अवलिया गढलेला असायचा. खोली लहान असली तरी कवी मन फार मोठे.. प्रत्येक मित्रासाठी हे मनाचे दार ऊघडे असायचे..

गझल क्लिनीकच्या माध्यमातून ते नवोदित कवींसाठी कार्यशाळा घेत…

काठावरी ऊतरली। स्वप्ने तहानलेली।

डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा।

किंवा,

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला।

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा।

अशा त्यांच्या काळीज भेदणार्‍या रचना मनात साठलेल्या आहेत….

आज ते नसले तरी हा शब्दगंध वातावरणात दरवळतच राहणार….!!

एक कलाकार, एक गझलकार म्हणून इलाही जमादार सदैव स्मरणात राहणार…

त्यांच्या स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली….????

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

खरच किती प्रश्न डोकावतात नाही का मनात?

नक्की आयुष्य आहे तरी काय?अनेक प्रश्नांनी भरलेल, अनेक सुखाने, दुःखाने भरलेले नाना छटांनी नटलेले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक माणसाचे प्रश्न वेगळे आणि उत्तर पण वेगळी.  प्रत्येक  माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा.

कोणासाठी ते सप्तरंगी आहे तर कोणासाठी रंगहीन, नीरस. कोणासाठी ते समुद्राच्या लाटा आहेत खळखळणाऱ्या,सळसळणाऱ्या, तर कोणासाठी एखादी शांत वाहणारी नदी किंवा सुरेख संगम दोन नद्यांचा. कोणाला ते शीतल शांत चंद्राप्रमाणे भासतं , तर कोणाला सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्या प्रमाणे.

मला विचाराल तर, आयुष्य हे एक प्रश्न चिन्ह आहे ज्याचे उत्तर कधीच मिळत नाही, एक कोड आहे जणू, जर सुटल तर मोकळी वाट नाहीतर आपल्या वाट्याला घाटच घाट.

कधी वाटते की आयुष्य एक सोंगट्यांचा खेळ आहे. आपण फक्त आपली खेळी खेळायची, त्याच फळ काय द्यायचे ते मात्र देवानी त्याच्या हातात ठेवले आहे,थोडक्यात आपण प्यादी आहोत पटावरची, फासे तर तो टाकतो, तो सूत्रधार आहे ह्या आयुष्य रुपी नाटकाचा. आपण फक्त आपला अभिनय नीट पार पडायचा.

मला काही वेळा मात्र आयुष्य सप्तरंगी वाटतं छान सुंदर, इंद्रधनुष्याला जसे सात रंग असतात अगदी तस. मग त्यात प्रेमाचा रंग आला, आपुलकीचा आला, स्पर्धेचा, द्वेषाचा, मद, मत्सर अगदी सगळे रंग आले. हां आता ह्यातला आयुष्यरुपी कॅनव्हास वर कोणता रंग जास्त भरायचा हे मात्र आपल्या हातात आहे.

अचानक मला असे वाटले की जितकं आपलं वय,आपला अनुभव तसे भासत असेल काहो हे आयुष्य सगळ्यांना?

छोट्या मुलांना आयुष्य फुग्याप्रमाणे, किंवा फुलपाखरा प्रमाणे भासत असेल का छान हलकं हलकं आकाशात स्वच्छंद बागडणार आपल्याला हवे तसे  रंग स्वतः भरणार  ना कोणते नियम ना बंधन. स्वच्छंद बागडायचे फक्त. कोणतेच प्रश्न नाहीत , त्यामुळे तक्रार पण नाही.

थोडं मोठं झाल्यावर त्यांना ते स्वप्नं रुपी वाटत असेल का? जिथे अनेक स्वप्नं पहायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झगडायचे. अनेक चॅलेंज घ्यायचे आणि ते पूर्ण ही करायची.

थोडक्यात नियम आणि कायदे आपलेच.

आंब्यांच्या झाडाला मोहर यावा, किंवा छान हिरवी गार पालवी यावी तस किंवा एखाद्या पाण्याचा धबधब्या सारखे स्वच्छंद सतत वाहणारं.

अजून मोठ झाल्यावर म्हणजे कदाचित तिशी ओलांडल्यावर, जेव्हा अनेक जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात  तेव्हा आयुष्य पझल गेम सारखं वाटत असेल का, किंवा डोके चालवा, सुडोकू सारखा जिथे प्रत्येक कोड सुटतच अस नाही पण तरीही आपण प्रयत्न करतोच ना. आणि बरेचदा मार्ग ही मिळतो.

आयुष्यभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसल्यानंतर म्हणजेच सगळया जबाबदार्‍या संपल्या की हेच आयुष्य आपल्याला रात्रीच्या चांदण्यांसारखं शीतल शांत वाटत असेल का. ह्या  टप्प्यावर आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असं नाही,पण आता ती मिळावीत म्हणून धडपड ही नसेल. ना काही मिळवण्याची धडपड असेल ना काही गमावण्याच दुःख.

थोडक्यात काय तर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.

सहज मनाच्या कोपर्‍यातुन ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ एक सीट गेली…. ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

ते दिवस मार्गशीर्षातील होते. नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. माझे यजमान आणि त्यांचे व्यावसायिक मित्र, महत्वाच्या कामानिमित्य पुण्याला निघाले होते. सकाळीच लवकर ते गाडीने निघाले. जाताना रात्रीपर्यंत परत येईन, असे सांगून गेले.

घरात, मी, मुले, व सासूबाई होतो. त्या दिवसभराची दैनंदिनी हळूहळू पुढे सरकत होती. संध्याकाळ झाली. पुरुषमाणसे जेवायला नसली की स्वयंपाक आवरता करता येतो. त्याप्रमाणे आमची जेवणे चट्कन आवरली. हळूहळू रात्रीने आपले पाय गडदपणाकडे पसरायला सुरवात केली. आणि डोळे त्यांच्या वाटेकडे वळू लागले. १९८९-९० साली भ्रमणध्वनीचा संचार झाला नव्हता. घरोघरी फक्त दूरध्वनी असत. त्यामुळे निरोप मिळणे दुरापास्तच होते.

वाट पाहतापाहता आम्ही निद्राधीन झालो.

सकाळी चहापाणी आवरून, मी परदेशस्थ नणंदेला पत्र लिहायला बसले होते. घड्याळात सकाळचे सात वाजायला आले होते. तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. मला वाटले यजमानच आले असतील, मुलाने दर उघडले, तर आमचे कार्यालयातील दोन माणसे, कसनुसे चेहरे घेऊन उभी होती. मी विचारले, ”सकाळी,  सकाळी,  काय काम आहे?”ते जरा घाबरलेलेच वाटत होते. त्यामुळे काहीतरी विपरीत तर घडले नाहीना, अशी शंका मनाला चाटून गेली. मग मी त्यांचेशी खोलात जाऊन बोलू लागल्यावर, त्यांनी माझे यजमान रात्री अपघातात सापडल्याचे सांगितले. पुन्हा पुन्हा, यजमान सुरक्षित असल्याची व किरकोळच  लागल्याची ते ग्वाही देत होते. कऱ्हाडला कृष्णा हॉस्पिटलला त्यांना एडमिटकेल्याचे सांगितले. मला न्यायला गाडी येईल, व कार्यालयाच्या शेजारी राहत असलेल्या मावशी माझ्याबरोबर सोबत येणार असल्याचे सांगितले. मी जायची जुजबी तयारी केली. मनात काळजी, आणि असंख्य प्रश्न उभे राहत होते. नुकताच कऱ्हाडला त्याच रस्त्यावर, अशाच खाजगी गाडीच्या अपघातात शहरातला एक व्यावसायिक दगावला होता.

ते सर्व मनात आले. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. सर्व आवरून जायला निघालो.

ती रात्रीची वेळ होती.  त्या काळात चौपदरी मार्ग झालेला न्हवता.  कऱ्हाड-पेठ रस्ता दोह्नी बाजूंनी गर्द वृक्षांनी वेढलेला होता.  दुपदरी रस्त्यावर,  एखाद्या पुढच्या वाहनाला,  मागे टाकून जाताना प्रचंड त्रास होत असे.  चालवणार्याचे कसबच पणाला लागत असे.  त्यात साखर कारखान्याला उस पुरवणार्या ट्रॅक्टर ट्राॅलीची वाहतूक ही चालू असण्याचा तो हंगाम होता काही वेळेस बंद पडलेला ट्रॅक्टर,  ट्राॅली मागे सोडून निघूनही जाई.  त्या ट्राॅलीला मागे कोणतीही लाल खुण,  किंवा दिवा नसे.  येणार्या वाहनाला अचानक जवळ गेल्यावरच हि ट्राॅली दिसू शके.

त्या दिवशी माझे यजमान व त्यांचे मित्र पुण्याहून उशिरा निघाल्यावर,  साताऱ्यात ते जेवायला थांबले जेवण झाल्यावर ते मार्गस्थ होण्यासाठी निघाले.  पुण्यातून येताना मागच्या आसनावर बसलेल्या माझ्या यजमानांना,  त्यांचे मित्र म्हणाले ‘भोगले साहेब,  तुम्ही पुढच्या आसनावर बसा.  मी मागे एकटाच बसतो,  म्हणजे आरामात झोपून जाईन.  त्या प्रमाणे दोघांनी,  आसनांची आदलाबदल केली.  गाडीचे सारथ्य तिसरे मित्र होते ते करू लागले.  कऱ्हाड सोडल्यावरही प्रवास सुरक्षित चालला होता.  थोडेसे अंतर कापल्यावर,  एका पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे गेल्यावर,  एकदम वर वर्णन केले आहे तशी उसाची ट्राॅली दृष्टीपथात आली.

त्या बरोबर सारथ्य करणाऱ्या राय सोहनींनी त्यांच्या गाडीचा वेग कमी करत गाडी शून्य वेगावर आणत ट्राॅली मागे उभी करण्याचा विचार केला.  पण हाय !! विपरीत घडणारं टळणारं न्हवतं.  मागून एक ट्रक वेगाने येत असलेला त्यांच्या गाडीवर मागच्या बाजूने जोरात आदळला.  क्षणात गाडीचा मागचा भाग चेपाटला जाऊन पुढच्या आसनांना टेकला.  सारथ्य करणारे राय सोहनी व माझ्या यजमानांना जोरात दणका बसून ते पुढच्या गाडीच्या भागावर आदळले.

थोडा वेळ गेल्यावर माझ्या यजमानांना गुदरलेल्या प्रसंगाची जाणीव होऊ लागली.  येणारया जाणार्या गाड्यांना त्या गाडीची अवस्था बघून,  त्यात कोणी जिवंत असेल असे वाटतच न्हवते माझ्या यजमानांनी धक्यातून थोडसं सावरल्यावर आपले पाय शाबूत असल्याची खात्री केली.  इकडे तिकडे पाहत त्यांच्या हाताला एक तुटलेला लोखंडी लांब तुकडा लागला.  तो घेऊन त्यांनी वरच्या तुटलेल्या टपावर जोरजोरात आपटायला सुरुवात केली आणि मग तो आवाज ऐकून येणारया जाणार्या वाहनांना आत कोणीतरी जिवंत असल्याची जाणीव झाली मग वाहने थांबवून लोक मदतीला धावले वाहतूक पोलिसांना पाचारण केल्यावर ते हजर झाले.  जिवंत असलेल्या त्या दोघांना बाहेर काढून कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माझ्या यजमान ज्या कामासाठी गेले होते,  त्या साठी त्यांचे मित्र बाफना यांच्या बॅगेत बरीच रक्कम असल्याचे ठाऊक होते.  त्यांनी मोठ्या समय सूचकतेने ती पिशवी आपल्या पोटाजवळ ठेऊन दिली.  न जाणो ती रक्कम सरकार जमा झाली असती तर परत मिळवणे दुरापास्त होऊ नये.  नंतर रुग्णालयात बाफनांचे भाऊबंद पोहोचल्यावर त्यांना ती पिशवी सुपूर्द केली.

आम्ही घरातून निघाल्यावर दोन तासांत रुग्णालयात पोहोचलो बाहेर काही व्यक्ती माझ्या येण्याची वाट पहात उभ्या होत्या.  त्यात कर्हाडच्या किर्लोस्कर कंपनीतील,  श्री. महाबळ साहेब व श्री. चिपळूणकर साहेब तेथे आलेले होते.  मी उतरल्यावर त्यांनी माझ्या यजमानांची तब्येत चांगली असल्याचे सांगून मला धीर दिला.  पण त्या पुढे म्हणाले,  ‘एक सीट गेली. ’ ती एक सीट म्हणजे यांचे व्यावसायिक मित्र बाफना यांची होती.  ज्यांनी साताऱ्याला माझ्या यजमानांना पुढे बसण्यास सांगितले होते (केवढा हा दैवदुर्विलास) पण पुढची माझ्या यजमानांची सीट शाबूत राहिली.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 14 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

इतक्या वर्षाच्या घोर तपश्चर्ये नंतर आणि अथक प्रयत्ना नंतर मी ज्या सोनेरी क्षणांची वाट पहात होते, तो क्षण समोर येऊन ठेपला. मी भरत नाट्य म् या अवघड नृत्य प्रकारामध्ये एम ए. ही पदवी मिळवून मास्टरी केली. तो क्षण मी, आई-बाबा, घरातील सर्व, ताई, गोखले काकू, श्रद्धा, माझ्या मैत्रिणी सगळ्या साठीच अविस्मरणीय होता.

एम ए. पदवी प्राप्त केल्यामुळे माझी आणि माझ्या व्यक्तिमत्वाची ओळखच पूर्णपणे बदलून गेली. कदाचित या परिस्थिती मध्ये मी घरातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून राहिले असते. आई-बाबां साठी कायमची चिंता बनून राहिली असते. पण त्यावर मात करून मी हे मोठे यश प्राप्त केले होते.

अनेक शाळांमधून, महिला मंडळांमधून, रोटरॅक्ट क्लब, लायन्स क्लब मधून मला नृत्याचे कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली समाजामध्ये माझी ओळख अंध शिल्पा अशी न रहाता, नृत्यांगना शिल्पा म्हणून झाली. एक चांगला कलाकार म्हणून मला ओळखले जाऊ लागले. मीही माझे भाग्य समजते की माझ्या वाट्याला कलाकाराचे आयुष्य आले.

सतत कार्यक्रम, त्यासाठी ड्रेसअप होणे, मेकअप करणे, हेअर स्टाईल करणे, दागदागिने घालणे, पायात घुंगरू, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे यामध्ये माझा वेळ आनंदात जात होता. घुंगरां च्या छुन छुन गोड गोड नादाने माझ्या जीवनात अनोखे संगीत निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यांचे अभिप्राय, रंगमंचावरून खाली उतरताना पासून त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, त्यांनी हसत मुखाने केलेले हस्तांदोलन या मुळे मी हर्षून जात होते. माझ्या जीवनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. माझे हे कौतुक बघून आई बाबांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान मला जाणवत होते.

भरत नाट्यम् मध्ये एम.ए होणं हे ताई आणि माझ्यासाठी तपश्चर्येचा प्रदीर्घ काल होता. प्रवास होता. त्याचा परिपाक म्हणून त्याला पदवीच्या रुपात एक छान, गोंडस फळ आलं होतं. त्या आनंदा प्रित्यर्थ्य आईबाबांनी एक कौटुंबिक समारंभ करायचं ठरवलं. तो दिवस माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा होता. या कार्यक्रमामध्ये आपटे कुटुंबीय, आमचे सर्व कुटुंबीय, सुपरिचित या सर्वांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समोर मी माझी कलाही सादर केली. सगळे जणं नृत्यामध्ये रमून गेले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print