मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

३. डाल्फिन-

स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डाल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.

अलास्कन कॅरिब्यू –

सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६०० कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.

नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर

बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग ते जवळच्या तळ्याकाठी,  पाण्याचा साठा असेल,  तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहेर येणार्‍या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात. पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.

मगर आणि सुसर

मगरी आणि सुसरी, त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्‍यावर येते. गवत रानटी झुडुपे वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.

 समुद्री कासव

हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८ चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे. पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी.चा प्रवास करून तिथे पोचतात.

मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्‍यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं .अर्थात अनेक जण अन्य भुकेल्यांचं भक्ष्य बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले,  म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतात आणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावर ती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंतसापडलेले नाही.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन ( भाग २ ) – ख्याल गायकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग २ )  – ख्याल  गायकी☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद~धमार गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली. जौनपूर भागातील नियामत खाॅं या महंदशा राजाच्या दरबारी असलेल्या बीनवादकाने ख्याल गायकी लोकप्रिय केली.

ख्याल या शब्दाचा अर्थ विचार किंवा कल्पना! म्हणजेच ख्याल गायनांत कलावंताला श्रोत्यांपुढे राग सादर करतांना रागाचे सर्व नियम पाळून, आपल्या कल्पनाविलासाने रसिकांना रंजवायचे असते. गाण्यासाठी जी शब्दरचना केली असते तिला रागदारी संगीतात बंदीश अशी संज्ञा आहे.

वर नामोनिर्देश केलेल्या नियामतखाॅंने सदारंग या नावाने अशा अनेक बंदीशी रचल्या आणि त्यांच्या अंतर्‍यांत स्वतःच्या व महंमदशाच्या नावाचा त्याने उल्लेख केलेला आढळतो. ह्या पारंपारिक बंदीशी आजही गायल्या जातात.

बंदीशींचे दोन भाग असतात. एक अस्ताइ व दुसरा अंतरा! अस्ताई मंद्र व मध्य सप्तकांत गायली जाते व अंतरा मध्य आणि तार सप्तकात गायचा असतो असा नियम आहे. ह्रया बंदीशींचे दोन प्रकार. १) बडा ख्याल २) छोटा ख्याल.

बडा ख्याल विलंबीत म्हणजे अतिशय संथ गतीने(शास्त्रीय संगीतात ज्याला लय म्हणतात) गायला जातो. बडा ख्यालाच्या बंदीशी प्रामुख्याने विलंबीत एकताल,तीनताल,तिलवाडा,झुमरा इत्यादी तालात निबद्ध असतात. छोटा ख्याल कधी मध्य लय झपताल,रूपक किंवा द्रुतलयीत गायला जातो. द्रुतलय बंदीशी बहुधा तीनताल आणि एकतालातच गायल्या जातात.

ख्याल गायन सुरू करतांना रसिकांना रागाचे स्वरूप दाखविण्यासाठी रागाच्या वादी संवादी स्वरांवर अधिक आघात देऊन आकारात आलाप घेण्याची पद्धत आहे. (अलिकडचे बरेच गायक रिदनतोम् अशाप्रकारे आलापी करतांना आढळतात.) उदा. बागेश्री राग घेतला तर त्याचे वादीसंवादी स्वर अनुक्रमे मध्यम व षडज आहेत. तेव्हा गायक म~ध~कोमल नी~(मंद्र)~सा~~ अशी सर्व साधारण सुरवात करील. ह्या सुरांवरून शांतपणे आलाप घेत घेत साधारणपणे आपला कलाविष्कार दाखवत मध्य सप्तकांतील मध्यमापर्यंत येऊन पोहोचल्यावर बंदीश गाण्यास सुरवात करील.बरोबर सम मात्रेवर(तालाची पहिली मात्रा) आल्यावर साथीला असलेल्या तबल्याची पहिली थाप पडेल. ह्या समेवर जेव्हा श्रोत्यांची पहिली दाद मिळेल तेव्हा कलावंताने श्रोत्यांवर ताबा मिळविला असे समजावे. प्रत्येकवेळी बंदीशीचा मुखडा घेऊन वेगवेगळ्या ढंगांनी स्वरांशी खेळत खेळत तालाचे एक आवर्तन पूर्ण करून कलाकार जेव्हा श्रोत्यांना सम दाखवितो त्यावेळी मैफीलीत कलावंत व रसिक यांच्यांत सुसंवाद साधून चांगलाच रंग भरतो. पूरिया,दरबारी कानडा, बागेश्री, मालकंस,शुद्धकल्याण वगैरे रागांचा आवाकाच इतका मोठा आहे की एका आवर्तनांतील आलाप गुंडाळल्यासारखे वाटतात.अशा वेळी दोन आवर्तनेही घेतली जातात. आलापांद्वारे हळूहळू राग स्वरविस्तार करत तार षडजापर्यंत पोहोचल्यानंतर अंतर्‍याचे शब्द गाण्याची पद्धत आहे. गायक आपल्या आवाजाच्या क्षमतेनुसार जितके अधिक तार सप्तकापर्यंत जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न करतो.हे आलाप घेत असतांना विविध प्रकारे स्वरयोजना करून रागसौंदर्य खुलविणे हे गायकाचे कौशल्य असते. बोल आलापांतील रसास्वाद घेत असतानांच छोटा ख्याल किंवा द्रुतलयीतील गायन सुरू होते.कधी कधी गायक विलंबीत लयीतून मध्यलयीतील छोटा ख्याल गातात आणि द्रुत लयीत तराणा गाऊन गायन संपवितात. द्रुत लयीत आलाप न घेता बोलताना,वक्रताना,खटक्याच्या ताना,अलंकारिक अश्या विविध प्रकारच्या ताना घेऊन आपले गानचातूर्य सिद्ध करतात.

प्राचीन काळी गुरूगही राहून शिष्याने गुरूची सेवा करत संगीत साधना करण्याची प्रथा होती.

गुरू आपली वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. काही प्रतिभावंत कलाकारांनी आपली स्वतंत्र गायनशैली तयार करून शिष्यांकरवी ती जतन केली त्यावरून भिन्न भिन्न शैलीची घराणी तयार झाली. एकूण एकोणीस घराणी आहेत अशी नोंद आहे, परंतु ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर,  मेवाती अशी काही घराणी आजही प्रसिद्ध आहेत.(घराण्यांची सविस्तर माहिती या लेखांत देत नाही,त्यावर एक स्वतंत्र लेखच होईल.)

आधुनिक काळांत गुरूकुल पद्धती राहिली नाही परंतु तयार शिष्याला रियाज करून आणि निरनिराळ्या पद्धतीने केलेले गायन ऐकून स्वतःची गायन शैली प्रस्थापित करण्यांत अधिक आनंद मिळतो. सहाजिकच कट्टर घराणेशाही आज अस्तंगत होत चालली आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 77 – आलेख – सहजीवन ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 77 ☆

☆ आलेख –  सहजीवन  ☆

आमचं लग्न झालं तेव्हा मी वीस वर्षांची आणि हे बावीस वर्षाचे होते. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय-म्हशींचे गोठे आणि गावाला शेती होती.ह्यांचा जन्म पुण्यातला,पदवीधर असूनही विचारसरणी सनातन- “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति” अशी मनुवादी!  खुप जुन्या वळणाचं सासर, एकत्र कुटुंब, सणवार, कुळधर्म, कुळाचार, रांधा,वाढा उष्टी काढा हेच आयुष्य असायला हवं होतं, पण मी त्यात रमले नाही.

बाहेर जायला विरोध होता, कविता करणं, ते सादर करायला बाहेर जाणं एकूणच उंबरठा ओलांडून बाहेर काही करणं निषिध्द !

प्रतिकुल परिस्थितीत बाहेर पडले,कुणीही प्रोत्साहन दिलं नाही तरी लग्नानंतर चौदा वर्षांनी एम.ए.ला अॅडमिशन घेतलं ….पुढे पीएचडी चं रजिस्ट्रेशन केलं…पूर्ण करू शकले नाही. स्वतःच्या अपयशाचं खापर मी इतर कोणावर फोडत नाही. नवरा डाॅमिनेटिंग नेचरचा आहे पण माझी जिद्द ही कमी पडली.

पण आज या वयात माझा नवरा आजारपणात माझी जी काळजी घेतो त्याला तोड नाही…..

चाकोरीबाहेरचे अनुभव घेतले, चारभिंती बाहेर पडले खुप प्रतिकुल परिस्थितीत थोडं मुक्त होता आलं याचं आज समाधान आहे.

आणि पतंगासारखं काही काळ आकाशात उंच उडता आलं हा आनंद, पतंगांचा मांजा कुणी पुरूष बाप, भाऊ, नवरा नसताना नियतीने ती दोर कवितेच्या रूपाने पाठवली. जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ।

ते पदवीधर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पण तो प्रश्न कधी आला नाही आमच्यात! प्रोत्साहन दिले नाही तरी शिक्षणाला विरोधही झाला नाही फारसा!

एका विशिष्ट वयानंतर “अभिमान” ची संकल्पना नाहीशी होते, कधीच पतंगाची दोर न बनलेल्या जोडीदाराविषयीही कृतज्ञताच वाटू लागते!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही अतिशय तरल,सुंदर अशी विराणी आहे. नाच-गाणे करणाऱ्या एका कोठीवालीच्या आयुष्यात घडणाऱ्या विफल प्रीतीची ही कहाणी आहे. बैठक संपली. रसिकांना विन्मुख होऊन ती दार बंद करून आली. आता पुन्हा ती अतिशय तन्मयतेने विडा लावते आहे. गाणे गुणगुणते आहे. मनासारखा विडा लावला आणि ती आर्त स्वरात गाऊ लागली. डोळे पाण्याने भरले आणि या स्वरओल्या जोगियाने वेड्या प्रीतीची कहाणी सांगितली.

“मी देह विकून त्याचे मोल घेणारी.  इथे सगळ्या भांगेच्याच बागा.  असाच एक दिवस एक सावळासा तरुण जणू वनमालीच आला आणि या भांगेत तुळस पेरून गेला. मी त्याला नावही विचारले नाही. हळूच दबकत इथल्या सगळ्या व्यवहाराच्या विपरीत असे नवखेपणाने बोलला, “राणी, माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.”

इथे सगळा नीतीचा उघड सौदा आणि हा खुळा इष्कालाच प्रीती समजतो. हसून त्याला म्हटले,’ थोडा दाम वाढवा ‘ आणि पान पुढे केले. तोवर तो निघून पण गेला. खरे प्रेम फक्त पैशातच नसते. पैशाने ते मोजताही येत नाही हे मला त्यावेळी कळले.

माझा हात तसाच थबकून राहिला. मी त्याची प्रीत जाणलीच नाही. आता माझे मन सतत त्याला हुडकते आहे. पण तो आता कशाला येईल इथे ?

तो हाच दिवस,हीच तिथी आणि अशीच ही रात्र होती. मी थकून बसले होते आणि एखादा तारा तुटावा तसा तो मागं वळूनही न पाहता अंधारात निघून गेला.

आजच्या दिवशी त्याच्यासाठी विडा लावून, त्याचे ध्यान करते. त्याच्यासाठी व्रतस्थ राहते. असा वर्षातून एकदा ‘जोगिया’ रंगतो. असा हा खुळ्या प्रीतीचा खुळा सन्मान. ”

ही कहाणी कविवर्य.  माडगूळकरांनी सरळ,ओघवत्या, तरल शब्दरचनेने मांडली आहे.   ‘जोगिया’ ही अत्यंत आर्त स्वरांची रागिणी. ऐकणाऱ्याच्या हृदयाची तार छेडते. हा राग आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची आर्तता व्यक्त करतो. या कोठीवालीला सच्ची प्रीत कधी ठाऊकच नसते. तिचा असतो सगळा देण्या-घेण्याचा रोकडा व्यवहार. भांगेतही तुळस उगवते हे तिच्या गावीही नसते. त्यामुळे त्या प्रीतवेड्या तरुणाची प्रीत जेव्हा तिला समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती अतिशय कासावीस होते.

आता तो येऊन गेलेल्या तिथीला त्याची आठवण म्हणून प्रीतीचा विडा तयार करून त्याच्यासाठी तयार होणे एवढेच तिच्या हाती उरते. जोगियाचे आर्त सूर त्याला साद घालतात. तीच आर्तता आता तिच्या जीवनात उरलेली असते. त्यांच्या असफल प्रेमाची ही आर्तता आपल्यालासुद्धा बेचैन करते. खऱ्या प्रीतीला नाव,गाव,जात-पात, पेशा, व्यवसाय यांच्याशी काही देणेघेणे नसते. ती असते दोन मनांना छेडणारी तार. कधी सुरेल बनते तर कधी आर्त बनून ‘जोगीया’ गाते.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

तारीख 29 ऑक्टोबर सकाळी काळूराम बोका घरात आला तो लंगडतच. मागच्या उजव्या पायाचा तळवा चांगलाच सुजला होता. पायाला कोणालाही हात लावू देत नव्हता. खाणंपिणं झालं आणि पुन्हा रात्री जो बाहेर गेला तो चार दिवसांनीच परत आला. चार दिवसात ती सूज आणखी वाढली होती. घरात तो उपचार करू देणे शक्य नव्हतं. जनावरांचा दवाखाना जवळच असल्याने बास्केट मधून त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी भराभर इंजेक्शन दिली. दुसरे दिवशी पुन्हा चार इंजेक्शन्स झाली. शूज थोडी कमी झाली पण पाय टेकता येत नव्हता. पंजा पूर्ण लाकडासारखा कडक आणि निर्जीव झाला होता. पाय सारखा झाडत होता. नंतर विजयनगरच्या डॉक्टर ढोके ना दाखवून आणलं. रक्त कुठं पर्यंत पोचतय हे पाहण्यासाठी छोट अपरेशन केलं. पायाला बांधलेलं बँडज रहात नव्हत. दोन दिवसांनी पुन्हा दाखवायला नेल. पायात किडे होऊन गॅंगरीन झालं होत. डॉक्टरांनी दोन पर्याय सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पाय मांडीपासून काढावा लागेल. 100% याला साप चावलेला आहे. त्याशिवाय अस होणार नाही. दुसरे दिवशी मोठं ऑपरेशन झालं. त्याची भूल उतरली आणि काही वेळातच खायला लागला. तीन पायावर घरात हिंडत काय पण चांगला पळत होता. आठ-दहा दिवस त्याला खूप जपायला हव  होतं. जखम चाटू द्यायची नव्हती. रोज रात्री घरातले सगळेजण आळीपाळीने जागत होतो. त्याचा तोकडा पाय बघवत नव्हता.

सगळं ठीक होत , तोपर्यंत जखमेवर घातलेले टाके त्याने काढून टाकले. पुन्हा दवाखाना पुन्हा टाके आता त्याचे हाल बघवत नव्हते. दुधातून गोळ्या अँटिबायोटिक औषधे देत होतो. खाण्यापिण्याचे तक्रार नव्हती. 21 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा घातलेले टाकेही पुन्हा निघाले. जखम पूर्ण उघडी झाली. औषधे तर चालूच आहेत. आता पक्क ठरवलं की तो खातोय पितोय घरात फिरतोय फक्त बाहेर हिंडायला जाता येत नाही. तेव्हा आता दवाखाना टाके इंजेक्शन काहीही विचार करायचा नाही. त्याचे हाल करायचे नाहीत. हळूहळू जखम भरून येईल. कितीही दिवस लागू देत ,पण आता काहीही नको. त्याची घरात सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याला सारखे बाहेर जायचे असते.पण बाहेर कसे सोडणार? काळूराम सावकाश का होईना बरा होऊन बाहेर जायला लागू दे. शेवटी तो निशाचर प्राणी आहे ना! लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना करुया.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 १. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात.  सीलची मादी जवळ जवळ ९६०० कि.मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला येतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्या बेटापासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि.मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळते. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९,२०० कि.मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिकमहासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला , दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍या पाण्याच्या सरोवरांकडे ती जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात. आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सन डिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचे स्थलांतर  – ईल आणि सालमन

गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील, सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लाव्र्हा असं म्हणतात. या छोट्या लाव्र्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशाकडे वाहू लागतात. या  माठ्या होत जाणार्‍याया ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना २/३ वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लाव्र्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात.  त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाने ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला,  त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात .त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो?  नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं,  त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

देणा-याचे हात हजारो

दुबळी माझी झोळी

” प्रपंच” 1961 सालचा हा चित्रपट. भारत सरकारने कुटुंब नियोजन मोहीम राबवणे सुरू केले होते. हम दो हमारे दो,

लाल त्रिकोण, अशा जाहिरातीनी सार्वजनिक वातावरण दणाणून गेले होते.ह्याचा प्रचार अधिकतर ग्रामीण भागात जास्त करणे आवश्यक होते.सावकारी, जप्ती, आर्थिक गरीबी, यात ग्रामीण जनता पिचून गेली होती.  पण अशाही परिस्थितीत घराघरातून दर वर्षी पाळणा हलतच असे. त्यातूनच अस्वच्छता, निकृष्ट  अन्न, व योग्य जोपासना न झाल्याने लहान मुले दगावत असत. पोलिओ, टी बी, सारखे विकार बळावले होते.

यावर कडक धोरण अवलंबून सरकारने ही मोहीम राबवली होती. जन जागृती सर्व थरांवर चालू होती.

त्यासाठीच ” प्रपंच ” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. शहरातून, खेडेगावातून, वस्त्यांवर, ग्राम पंचायतीच्या अंगणात अगदी उघड्यावर याचे प्रक्षेपण केले जात होते. मोफत असल्याने खुप गर्दी होत  असे.

या चित्रपटात काम करणारे कलाकार अस्सल काळ्या मातीतले होते. सुलोचनाताई, श्रीकांत मोघे, सीमा असे सर्वांचे आवडते कलाकार होते.

एकापेक्षा एक सुंदर गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.कारण गीतकार ग.दि.माडगूळकर, संगीतकार आणि गायक सुधीर फडके, अणि गायिका आशा भोसले.

“बैलं  तुजं हरना वानी, गाडीवान दादा ” म्हणत फेटा बांधून बैलगाडी हाकणारी आणि “आला वसंत देही मज ठाऊकेच नाही ” म्हणत मक्याच्या शेतातून उड्या  मारत धावणारी चंपा म्हणजेच सीमा,” साळु होता कष्टाळू बाळू आपला झोपाळू” म्हणत मुलांबरोबर खेळणारा शंकर म्हणजे श्रीकांत मोघे.

त्याचे दादा वहिनी गरीब कष्टाळू, देवभोळे साधे  कुंभार काम करणारे जोडपे. ” फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विट्ठला तू वेडा कुंभार” म्हणत विट्ठलावर संसाराचा भर सोपवुन जगणारे. त्या विट्ठलाचीच कृपा समजुन दर वर्षी पाळणा रिकामा राहू न देणारे ( त्या काळचे प्रातिनिधिक) जोडपे.

विट्ठला तू वेडा कुंभार हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं आणि ते चित्रपटातलं गाणं आहे की संतांचा अभंग? असं वाटावं..

त्यातील आणखी एक सुप्रसिद्ध गाणं, त्यावेळी फारसं न उमजलेलं, पण आयुष्यात नंतर वेळोवेळी नवीन प्रकारे अनुभवाला येणारं, आणि  1961 सालापासून आज 2020 च्या

“कोरोना” काळापर्यंतच्या परिस्थितीला धरुन असणारं, आजही देवाचा धावा करून त्याच्याकडे मागणं करणारं गाणं म्हणजे ” पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी” किती साधे सोपे शब्द…पण  गदिमांच्या लेखणीच्या परिस स्पर्शाने ते अजरामर झाले आहेत.

“देवा, माजं लई मागणं न्हाई, पोळी नगं….भुकेपुरता पसाभर घास मिळू दे. शेतातल्या पिकाला गरज असेल तेव्हा आणि गरज असेल तितकाच पाऊस पडू दे. जेवढी चोच तेवढाच दाणा ही काळी आई देवो. एकवेळच्या भुकेला अन्न लागतं तरी किती?….तळहाताच्या खाळी एवढं, ओंजळभर! तेवढंच मिळू दे. माथ्यावरती छाया देणारं छप्पर आणि अंग झाकण्या पुरती वस्त्रे मिळावीत, इतकच देवा मागणं!

देवा, सोसवेल आणि पेलवेल तितकच सुख आणि दु:ख दे.

माझा कसलाच हट्ट नाही, कारण “तो देणारा हजारो हातानि  भरभरुन देईल….पण  माझी झोळी दुबळी.

सर्व सामान्य माणूस, मग तो आर्थिक दृष्टया कमी असो, मध्यम असो वा श्रीमंत असो, आयुष्य भर काम,क्रोध,लोभ,मद, मत्सर माया  ह्या षड्रिपूंच्या संगतीत असतोच. त्याच बरोबर व्यायसायिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, न पेलवणारी स्वप्ने, अपेक्षा या सर्वांवर तारेवरचि कसरत करत वयाच्या 55 वर्षाला पोचला की थोडासा अंतर्मुख होतो. न कळत त्याचा कल अध्यात्माकड़े झुकतो अणि सत्य समोर येतं,

“देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ”

असं जीवनाची bottomline असलेलं गाणं आता फारसं ऐकायला मिळत नाही. पण  आठवण येते तेव्हा मन शब्दां भोवती आणि त्याच्या अर्था भोवती रेंगाळतंच. हे रेंगाळणं खुप सुखकारी असतं.

अगदी साधे गुंफलेले शब्द,

“किमान” किंवा “कमीत कमी” या शब्दान्चं किती सुंदर रूप……!

केवळ एक वेळच्या भुके इतकाच घास मिळावा, कारण देणा-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी… मातीतून जन्म घेतलेले, आकाशाला जाऊन भिडणारे आणि परत मातीत येउन मिळणारे, आणि “अपुरेपण ही न लगे, न लगे पस्तावाची पाळी”  असे सत्यं शिवम सुंदरं ची प्रचीती देणारे शब्द.

मराठी माणसांच्या ह्रदयात,  जेथे पवित्र आणि सुंदरतेचा वास असतो तेथे, गदिमांचे स्थान अढळ आहे.

“ज्ञानियाचा वा तुकयाचा

तोच माझा वंश आहे

माझिया रक्तात थोडा

ईश्वराचा अंश आहे”

असे म्हणणारे गदिमांची लेखणी खरोखरच दैवी होती. शेकडो गाणी त्यांनी रसिकांना दिली. तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या गळ्यात, माजघरात, देवघरात, शेतमळ्यात, विद्वानांच्या सभेत, सर्वत्र त्यांच्या गाण्यांचा संचार आहे. कविता जन्म घेते आणि  शब्द उतरू लागताच  स्वर त्या शब्दांना मिठीत घेतात, तेव्हा त्या कवितांचे एक सुंदर गीत होतं, अशी अगणित गाणी आज 43 वर्षांनंतर सुद्धा चुकून ऐकायला मिळाली कि, nostalgic व्हायला होतं.

त्यातलंच हे एक अजरामर गाणं “देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी”.

14 डिसेंबर हा दिवस गदिमा ह्या गीतरामायणकार महाकविच्या निर्वाणाचा.  त्यांच्या स्मृतीला अभिवादन. ??

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ विविधा ☆ त्रिकूट…भाग 1 ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मी एक प्राणी प्रेमी. त्यातही थोडी अधिकच मार्जार प्रेमी. घरात मांजर नाही असं कधीच झालं नाही. आता सध्या आमच्याकडे तीन मांजर (आमची मुलं) आहेत. सुंदरी आणि तिची मुलगी टिल्ली या दोन मुली आणि काळूराम हा बोका. मुलगी सुंदरी आता आजी पण झाली. दोघींचीही आता कुटुंब नियोजनाची ऑपरेशन झाली आहेत.

सुंदरी नावाप्रमाणे दिसायला खूपच सुंदर अगदी दृष्ट लागावी अशी. जणू रंभा उर्वशी अप्सरांच सौंदर्य. अंगाने गुबगुबीत, भरपूर सुळसुळीत केस, जाड आणि डौलदार शेपूट, पिवळा पांढरा सगळे रंग तिच्यामध्ये मिसळलेले अशी ती मोठी झालेली कुठून तरी आली. सगळ्यांनाच आवडली. लळा लावलान आणि  आमचीच झाली. स्वभावाने तर अतिशय गरीब. कधी कोणाला चावणार नाही, तर कधी रात्रभर बाहेर असलेलं दूध सांडणार नाही.ओरडण्याचा आवाज सुद्धा अगदी मृदू आणि हळुवार. एखाद्या सोज्वळ आणि शांत मुलीसारखा.खरी भूक लागली असेल तरच घातलेलं दूध पिणार.नाहीतर वास घेऊन निघून जाणार. कॅटफूड मात्र आवडीने खाणार. दुसऱ्याच्या  उष्ट्या ताटलीत घातलेलं आवडत नाही. वेगळ्या ताटलीत घालायला हव. तिघांच्या मिळून सात ताटल्या आहेत. तिला काहीही नको असलं तरी ह्यांच्या मागोमाग इतकी करत रहाते की जणू ह्यांची ती बॉडीगार्ड किंवा पाठराखीणच आहे की काय असं वाटावं कोणाच्याही मांडीवर बसायला तिला फार आवडतं.

तिची मुलगी टिल्ली. .दिसायला अगदी आईसारखे रंग. पण आई सुंदरी जास्तच रुपवान. टिल्लीला पहिल्यांदाच गोजिरवाणी तीन पिल्ल झाली. खूपच लहान वयात आई झाली. पण आईची जबाबदारी छान पार पाडलीन तिनं. पिल्ल चांगल्या घरी गेली.  टिल्ली म्हणजे जरा जास्तच  आढ्यतेची. तिला शिळं दूध आवडत नाही. ताज हवं. .त्यातही वारणा दूध असेल तर एकदम खुश. भूक नसताना गवळ्याच दूध दिल तर वास घेऊन मानेला हिसका देऊन नाक मुरडून निघून जाते. झोपायलाही छान माऊ गाडी लागते. दिवसातला बराच वेळ गच्चीमध्ये कुत्र्यांबरोबर निवांत असते. टेबल टेनिसच्या  बाल बरोबर आईशी खेळते. कधी आम्हीही तिच्याशी खेळत बसतो. तिला एकटीला खेळायला फारसे आवडत नाही. पण उचलून मांडीवर खांद्यावर घेतलेलेही तिला आवडत नाही.   एखादं घरातलं शेंडेफळ कसं लाडात लाडात असतं  ना, अगदी तशीच सगळ्यांशी लाडलाड करत असते. मी तर तिला नेहमी म्हणते, (किती नाटकं करतीस ग मागच्या जन्मी कुणी राणी कि  राजकन्या होतीस का ग?” मी तर हिरोईनच म्हणते तिला.

काळूराम बोका शुभ्र पांढरा आणि कुट्ट काळा असे दोनच रंग आहेत त्याच्यात.नाकावर डार्क काळ्या रंगाचा मोठा ठिपका असल्यामुळे तो अगदी विदूषक का सारखा दिसतो. बोका म्हणून अंगात रग जरा जास्तच.साडेचार वर्षाच वय,तारुण्यातली मस्ती अंगात मुसमुसलेली, एखाद्या उनाड मुलासारखा. बाहेर गेला की कधीकधी दोन-तीन दिवसांनी ही परत येतो. येतो तो मित्रमंडळान बरोबर मारामाऱ्या करुनच येतो. आणि मग कुठेतरी पायाला लागलेलं असतं. नाक सुजलेला असत.  मग आम्ही औषधोपचार करायचे. अस चालत हे सगळं.त्याची खाण्यापिण्याची आढ्यता, तक्रार नाही. फक्त जे खायचं ते भरपूर हव. दूध पोळी कॅटफूड व्हिसकस या सगळ्या बरोबर श्रीखंड तर त्याला फारच आवडतं बोका म्हणून उगीचच दोघींवर दादागिरी करत असतो. सुंदरीला कारण नसताना घराबाहेर हाकलत राहतो.थोड्या वेळानंतर लगेच परत येते बिचारी.तो मात्र आमच्याकडून रागावून घेतो.सकाळी सात साडेसात पर्यंत  एकानंतर एक असे तिघेही येतात. त्रिकूट तयार होत.सकाळी घरातले सगळेजण उठले की कोणाला दूध दिल, कोणाला खायला दिलं कोणाला  दिलं नाही अशी चर्चा सुरू होते.

या त्रिकुटा बरोबर रहाताना खरोखरच कुठलेही ताणतणाव,काळज्या,या सगळ्यांपासून आपण दूर जातो. म्हणतात ते खरंच आहे “घरात पाळीवप्राणी असले की रक्तदाबाचा बीपीचा त्रास होत नाही”. जे

सध्या काळूराम प्रकृती  अस्वास्थ्यामुळे बेचैन आहे ते पुढील लेखात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्थलांतर – भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतर – भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मुंग्यांची फौज भाग २

दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात.

जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं,  तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात.

ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते,  तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात्  त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या, इतक्या मुंग्या असतात की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते.

जर नदी रुंद असेल,  तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मध्ये राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्‍या तिराला पोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते.

त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात.

पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल,  तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते.

त्या सतत कूच का करतात?  त्या कुठे जातात?  आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.

सगळ्यात दूरवरचं स्थलांतर

अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट दिशेकडे तोंड करून स्थलांतर करतात. या सर्वांमध्ये आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी सगळ्यात दूरवरच पल्ला गाठतात. त्याबाबतीत त्यांना स्थलांतर बहाद्दर किंवा उड्डाण बहाद्दरच म्हंटलं पाहिजे.

आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी स्थलांतर करतात, कारण उन्हाळी ऊबदार वातावरण वर्षभर त्यांच्याभोवती असावं असं त्यांना वाटतं. त्यांना दिवसभर प्रकाश असावा,  असं वाटतं. दरवर्षी स्लेंडर, काळे-पांढरे पक्षी ३५२०० कि.मी.चा वर्तुळाकार प्रवास करतात. ही म्हणजे, जगाभोवती केलेली प्रदक्षिणाच असते.

उन्हाळ्याच्या दिवसात अगदी उत्तरेच्या प्रदेशात ते घरटी करतात. यावेळी उत्तर धृव सूर्याकडे कललेला असतो. सूर्य जवळजवळ पूर्ण वेळ डोक्यावर असतो. या प्रदीर्घ सूर्यप्रकाशाच्य काळात त्यांना व त्यांच्या छोट्या पिलांना समुद्रातील भरपूर मासे दिसतात आणि पकडता व खाता येतात.

उन्हाळा संपत येता येता दिवस लहान होऊ लागतो. थंडी वाढत जाते आणि आर्क्टिक टर्न आपला प्रवास सुरू करतात आणि अंटार्टिकाला जातात. अलास्कन टर्न उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक सागराच्या किनारपट्टीवरून जातात. इतर अनेक टर्न उत्तरेकडच्या इतर घरटी बांधण्याच्या क्षेत्राकडे उडतात आणि ब्रिटीश बेटांमध्ये भेटतात. तिथून ते दक्षिणेकडे आफ्रिकन किनारपट्टीकडे झडप घेतात.

प्रवासाला सुरुवात करायची वेळ झाली, हे आर्टिक टर्नना कसं कळतं?

तापमानातील बदल, सूर्यप्रकाशातील बदल यामुळे बहुदा त्यांना ते कळतं. पण हे प्रवासी पक्षी इतकी भली मोठी आश्चर्यकारक राउंड ट्रीप दरवर्षी का घेतात, ते कुणालाच कळले नाही.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर

टोपणनाव: गदिमा

रसग्रहण:

शाळेतील विज्ञानाचा किंवा भूगोलाचा तास आठवतो का? मग जलचक्रही आठवत असेल. पाण्याची वाफ होऊन पाऊस पडणे आणि हाच क्रम पुनः पुन्हा होत रहाणे म्हणजे जलचक्र. आठवतंय ना? पण हे असं रूक्ष भाषेत समजावून सांगण्यापेक्षा थोड्या अलंकारीक, काव्यात्मक भाषेत सांगितलं तर? विज्ञान आणि तेही काव्यातून ? कठीण वाटतं ना ? पण जो कल्पना विश्वावर राज्य करीत होता आणि शब्द ज्याला मुजरा करीत होते असा एक महाकवी या महाराष्ट्रात होऊन गेला.त्याचं नांव गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आपले गदिमा ! त्यांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. हा चमत्कार म्हणजेच आजची त्यांची ‘माहेर’ ही कविता अर्थात ‘नदी सागरा मिळता’.

नदी पर्वतातून उगम पाऊन वाहत येते व शेवटी सागराला जाऊन मिळते. त्यामुळे  पर्वत, डोंगर हे तिचे माहेर. ज्याला सर्वस्व अर्पण केले तो सागर तिचा पती. तेच तिचे सासर.ती काही तेथून परत येऊ शकत नाही. म्हणजे तिचे माहेर कायमचे तुटलेच असे म्हणावे लागते. पण हे झाले तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी.कवीची दृष्टी एवढी मर्यादीत असत नाही. शब्दांचे पंख लेऊन कल्पनेच्या विश्वात रसिकांना घेऊन जातो तोच खरा कवी. त्यामुळे नदीचे माहेर तुटले हेच कविला मान्य नाही. कवी काय म्हणतो पहा.

सागर नदीचे अवघे जीवन पोटात घेतो पण नदीला मात्र तिच्या पित्याची, डोंगराची आठवण येत असतेच. कसे भेटावे त्याला ? कसे जावे माहेराला ?

माहेरच्या  भेटीची ओढ पूर्ण करण्यासाठी मग ती वाफेचे रूप घेते. वार्याचे पंख लावते आणि मेघांच्या ओंजळीतून पावसाची सर बनून डोंगराच्या पोटी जन्म घेते. वाळे वाजवत वाजवत पुन्हा अवखळ पणे वाहू लागते.शेवटी परत सागराला येऊन मिळते आणि कवीचे जलचक्र पूर्ण होते.

नदी ,डोंगर,सागर……

स्त्री,  माहेर,सासर.

एक रूपकात्मक काव्य. स्त्री सासराशी एकरूप झाली  तरी माहेर कसं विसरेल ? माहेरी जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तिला माहेरी घेऊन जातेच. अगदी नदीप्रमाणे.आणि चार दिवस माहेरपण करून आल्यावर आपोआप सासरची वाट धरते. नदीप्रमाणेच. वर्षानुवर्षे हेच चालत आलय. जीवन चक्र आणि जलचक्रही. खरंच आहे. जीवन म्हणजेच जल ना ?

‘सारे जीवन  नदीचे घेतो पोटात सागर’

या ओळीत कविला जीवन म्हणजे आयुष्य आणि नदीचे पाणी अशा दोन्ही अर्थानी तर हा शब्द वापरायचा नसेल ना असे वाटते.

वार्याचे पंख लावून नदी तरंगत तरंगत डोंगराकडे जाते.अगदी तसच, माहेरच्या वाटेवर असतानाच स्त्री मनाला पंख लावून केव्हाच माहेरी पोहोचलेली असते.

कवी म्हणतो, नदी माहेरी जाते, म्हणून जग चालते. माहेरपणाच्या उर्जेवर स्त्री सासरी पुन्हा रमून जाते,असं कविला सुचवायच आहे,असं वाटतं.

असं हे जलचक्र!काव्यानंद देता देता विज्ञान सांगणारे ,गदिमां च्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवणारे .

खरंच, जेथे गदिमा तेथे प्रतिभा.!

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print