मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत – भारतीय संगीतातील रागांवर आधारित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 

 ☆ सूर संगत ☆ सूर संगत – भारतीय संगीतातील रागांवर आधारित ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

(आज दस-यापासून आम्ही सूर संगत हे संगीतातील माहितीवर आधारित नवीन लेखमाला सादर. दर रविवारी एका रागाविषयी सुरेल माहिती क्रमश: सुरू करत आहोत. लेखिका सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.)

श्री सरस्वत्यै नम:

शीर्षक लिहीत असताना मनात विचार आला कि सूरसंगत मधे ‘स’ला उकार ऱ्हस्व किंवा दीर्घ कसाही दिला तरी अर्थात काय फारसा फरक पडणार आहे!? सुर म्हणजे देव आणि सूर म्हणजे संगीतातला स्वर! खरं पाहू जाता संगीत हाच देवाशी जोडणारा शीघ्रगतीमार्ग मानलेला आहे. त्यामुळं भाषेतील व्याकरणदृष्ट्या दोन्हींत फरक असला तरी सुर आणि सूर एकच असं म्हटलं तरी हरकत नसावी!

आजचा योगायोग असा कि आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा, सरस्वतीपूजनाचा दिवस आहे. सरस्वती सर्व कलांची देवता मानली जाते आणि भारतीय शास्त्रीय संगीतात सरस्वती नावाचा रागही असल्याने वाटलं कि, ह्या मालिकेची सुरुवात ‘सरस्वती’ रागानेच करूया. म्हटलं तर फार प्रचलित नसणारा किंवा तसा आधुनिक म्हणता येईल असा हा राग. कर्नाटकी संगीतातून हा राग हिंदुस्थानी पद्धतीत आलीकडच्या काळात आला असंही म्हटलं जातं. मात्र पूर्वीच्या जातीगायन पद्धतीत सुरांच्या केल्या जाणाऱ्या ‘परम्युटेशन कॉम्बिनेशन्स’च्या आधारे हे ‘कॉम्बिनेशन’ हिंदुस्थानी पद्धतीतही असणार, फक्त ते फार प्रचलित झालं नसावं असं म्हणता येईल.

लिहिता लिहिता असंही मनात आलं, भले आवडीचा प्रकार कोणताही असो मात्र संगीतावर प्रेम तर प्रत्येकाचेच असते. संगीताची नावड असलेला फारच विरळा! मात्र रागसंगीताचे शिक्षण प्रत्येकाने घेतलेले असते असे नाही. तर ह्या निमित्ताने सोप्या पद्धतीने तीही थोडी माहिती वाचकवर्गास करून द्यावी! प्रत्यक्ष रागसंगीताचा विद्यार्थी नसलेल्यांना फार सखोल ज्ञान हवं असं निश्चितच नाही. मात्र ह्या शास्त्रातील किमान मूलभूत गोष्टींची माहिती करून घेणं हे रंजक असेल हा विश्वास वाटतो. ही मालिका लिहिताना ह्या मूलभूत गोष्टींचा उल्लेख टाळून मी काहीच लिहू शकणार नाही आणि ह्या गोष्टींचे अर्थ माहीत नसतील तर वाचकांना तितकी मजा येणार नाही, म्हणून तोही खटाटोप!

सगळ्यात पहिलं म्हणजे राग आणि एखादं गाणं ह्यात काय फरक आहे? खरंतर ह्या विषयावर एक पूर्ण लेख होऊ शकेल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राग कसा गायचा/वाजवायचा ह्याचे काही ठराविक नियम पाळावे लागतात आणि अशा नियमबद्धतेतही उत्तम संगीतसाधक तासनतास एखादा राग गाऊ शकतोच, शिवाय प्रत्येकवेळी त्याच रागात नवनवीन नक्षीकामही करू शकतो. एखादं गीत मात्र त्याची विशिष्ट स्वररचना निश्चित झाल्यावर प्रत्येकवेळी जसेच्यातसे गायले जाते.

एक ठराविक आरोह-अवरोह असताना राग बराच काळ गाणे कसे शक्य होते? थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकवेळी ‘कॅलिडोस्कोप’ फिरवला असता त्याच ठराविक काचेच्या तुकड्यांतूनच कशी नवनवीन डिझाईन्स तयार होतात, तसंच रागात जे काही स्वर असतील त्यांचा वापर करून कलाकार नवनवीन ‘स्वरांची डिझाईन्स’ शोधत राहातो. कलाकाराची कल्पनाशक्ती, सृजनशीलता आणि व्यासंग जितका उत्तम तितकी उत्तमोत्तम आणि जास्त संख्येनं डिझाईन्स रेखून तो रागाचं महावस्त्र देखणेपणी विणत राहातो.

मुळात आरोह-अवरोह म्हणजे काय? संगीतातील ‘सा रे ग म प ध नी’ हे सात सूर सर्वांनाच माहिती असतील. मात्र प्रत्येकच रागात सातही स्वर वापरले जातात असं नाही. कमीतकमी पाच सूर रागात असावे लागतात. त्यामुळं रागात कोणतेही पाच, सहा किंवा सात सूर असतात असं ढोबळमानानं म्हणता येईल. खालच्या ‘सा’पासून वरच्या ‘सा’पर्यंत रागात वापरल्या जाणाऱ्या स्वरांच्या चढत्या अनुक्रमास आरोह म्हणतात आणि वरच्या ‘सा’पासून खालच्या ‘सा’पर्यंत उतरत्या क्रमातील स्वरानुक्रमास अवरोह म्हणतात. एकाच रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या व स्वरही सारखेच असतील असेही नसते. मात्र रागाच्या आरोह-अवरोहात कलाकाराला काहीही बदल करता येत नाही किंवा त्यात नसलेला कोणताही दुसरा सूर रागात वापरता येत नाही.

सरस्वती रागाविषयी बोलायचे झाले तर पटकन आठवते ‘हे बंध रेशमाचे’ ह्या संगीत नाटकातील ‘विकल मन आज’ हे पद! हे संपूर्णच गीत पं. जितेंद्र अभिषेकींनी सरस्वती रागावर बेतलेलं आहे. दुसरं एक भावगीत आठवतं ते म्हणजे सुमन कल्याणपुरांच्या आवाजातलं ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात!’ ह्या गाण्यात मात्र ध्रुवपद सरस्वती रागाचा भास निर्माण करत असले तरी पुढे रागात नसलेल्या सुरांचाही वापर झाला आहे. अर्थातच एखादी सुरावट राग म्हणून सादर होत नसेल तर तिथे रागाचे नियमही लागू होत नाहीत. म्हणूनच सुगम व उपशास्त्रीय संगीतात रागाचे बंधन न पाळता संगीतकाराच्या कल्पकतेनुसार स्वररचना तयार होते. आपण फक्त एखाद्या गाण्याला विशिष्ट रागाधारित गीत म्हणतो कारण ती स्वररचना आपल्याला त्या रागाची आठवण करून देते. मात्र त्या रचनेसारखेच त्या विशिष्ट रागाचे स्वरूप आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.

सरस्वती रागाच्या आरोह व अवरोह दोन्हींतही सहा सूर आहेत.  ‘सा, रे, तीव्र म, प, ध, कोमल नि, सां’ असा रागाचा आरोह आणि ‘सां, कोमल नि, ध, प, तीव्र म, रे, सा’ असा अवरोह आहे. हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे. रागशास्त्रानुसार रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. वरील गीतांच्या गोड चाली आठवल्या तरी राग अत्यंत मधुर असल्याचे आपल्याला जाणवेल. शुद्ध ‘रे’ वरून ‘तीव्र म’वर जाणं हा प्रत्येकच वेळी मनाला सुखद झोका आहे आणि त्यापुढं येणारी पधनिधसां ही स्वरसंगती अत्यंत लडिवाळ भासते. परंतू हे शुद्ध, कोमल, तीव्र स्वर म्हणजे काय प्रकार आहे? याविषयी आपण पुढच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मी अत्यंत टाळंटाळ करत असतानाही नेटाने माझ्या मागे लागून मला ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल उज्वलाताईंना मन:पूर्वक धन्यवाद! जिज्ञासू वाचकांच्या सूचना, प्रतिक्रिया व प्रश्नांचे जरूर स्वागत आहे. ही लेखमाला वाचतावाचता वाचकांच्या मनात रागसंगीताविषयी आस्था निर्माण झाली तर त्याहून मोठा आनंद नाही.

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनाचा सोहळा ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सृजनाचा सोहळा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाहीलाही करत असतात. कधी एकदा पावसाळा सुरू होतो आहे म्हणून आपण वाट बघत असतो. आणि अशाच वेळी आकाशात मेघ दाटून येतात. झरझर धारा बरसू लागतात आणि ही जलधारा तृप्तीचे क्षण निर्माण करत सर्व सृष्टीला सृजनत्वाचे दान देत असते. पावसाळा म्हणे सृजनत्वाचा सोहळा! असे काहीसे अलवार- हळूवार विचार मनात घोळत असतानाच अचानक एका सृजनत्वाची प्रचिती आम्हाला आली. अर्थात् या सृजनत्वासाठी कोणत्याही ऋतूची गरज नसते बरं का! आता कसे ते सोदाहरणच बघा.

त्याचे झाले असे की परवाच आमच्या पुतणीचा फोन आला. “काकू, च्यवनप्राश कसा करतात ग? माझ्याकडे पाच- सहा किलो आवळे आहेत घरचे. सुपारी, लोणचे, मोरावळा सर्व करुन झाले. आता पाऊस पडल्यामुळे उरलेले आवळे उन्हात वाळवता येणार नाहीत. म्हणून च्यवनप्राश करायचे ठरवलंय.” अस्मादिक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे तिने आम्हाला फोन केला होता. बोलता बोलता ती पुढे म्हणाली, “यू नळीवर बऱ्याच रेसिपी आहेत ग, पण नक्की बरोबर कोणती ते लक्षात आले नाही म्हणून फोन केला.” तिने हे सांगितल्यावर आम्ही उत्सुकतेने यू- नळी उघडून बघितली तर भूछत्रासारख्या च्यवनप्राशच्या अनेक रेसिपी उगवलेल्या दिसल्या. सृजनत्वाचे विविध आविष्कार बघून आपण साडे- चार वर्षे हे  आयुर्वेदाचे ज्ञान घेण्यात फुकट घालवली आहेत याची उपरती झाली. औषधे तयार करताना त्यावर होणारे अग्नीचे संस्कार, औषधी द्रव्ये, काळ, त्याचा परिणाम या सर्व संकल्पना आमच्या गुरुनी आणि पर्यायाने आमच्या ग्रंथोक्त गुरुनी पण का बरे आपल्याला शिकवल्या असतील असा प्रश्न उगीचच मनात उद्भवू लागला. अर्थात ही आमच्या भाबड्या मनाची प्रतिक्रिया होती बरे. कोणाचा अवमान करण्याचा आम्हा पामराचा बिलकूल इरादा नाही हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. अन्यथा पु.ल. देशपांडे म्हणतात तसे “ राजहंसाचे चालणे जरी डौलदार असले तरी सामान्य लोकांनी चालूच नये की काय?” याच धर्तीवर आम्हाला प्रश्न विचारले जातील की “यांनी आयुर्वेदाचे ज्ञान घेतले म्हणजे सर्व हेच जाणतात आणि आम्ही सामान्य लोकांनी यात पडूच नये की काय?” असे काही ज्ञान पाजळण्याचा आमचा बिलकूल हेतू नाही बरं का! त्यामुळे अगदी “बाजार जैसा च्यवनप्राश” या रेसिपीमधून साध्य होत असेल ( सिद्ध होतो का ते आम्हाला माहीत नाही.) तर त्यांनी जरुर हा सोहळा आनंदाने साजरा करावा.

तर हे सृजनत्वाचे सोहळे यू- नळीवर हल्ली जागोजागी दिसतात. सुरुवातीला आम्हाला जणू काही अलिबाबाच्या गुहेतील खजिना सापडल्यासारखे वाटले. म्हणजे अमुक बिस्किटापासून केलेला तमुक तमुक केक, अमुक ऐवजी वापरून केलेले ढमुक, अमुक पासून केलेला तमुक खरवस, इन्स्टंट याव आणि इन्स्टंट त्याव! पहिल्यांदा आम्हीसुद्धा  हौसेने या सोहळ्यात हिरिरीने भाग घेतला. आता माझी मुले आणि नवरा किती खूष होतील या कल्पनेने आधीच आमच्या सर्जनशीलतेसाठी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. पण अमुक बिस्किटापासून तयार केलेले तमुक पुडिंग घरच्या तमाम मंडळीनी “बी- कॉम्प्लेक्सच्या औषधासारखे लागतेय” म्हणून रिजेक्ट केले. एवढेच कशाला? दारातल्या आमच्या मोत्याने तर एकदाच वास घेतला आणि   चार दिवस सरळ अन्नसत्याग्रह केला. मनीमाऊने तर दोन दिवस घरच सोडले. एकदा अमुक बिस्किटाचे आईसक्रीम डीट्टो अमूलसारखे लागते म्हणून केले तर एक – एक चमचा खाऊन मुलांनी ते आमच्या शीतकपाटदेवालाच नैवेद्य म्हणून ठेऊन दिले. शेवटी तो देवही कंटाळला आणि त्यानेही तोंड उघडून संपूर्ण कपाटभर दुर्गंधी सोडली  तेव्हा ते आमच्या रोजच्या कचराकलशात समर्पित करावे लागले. अशावेळी मला लहानपणी दारावर येणाऱ्या भरतकामाच्या सुया विकणाऱ्या विक्रेत्यांची आठवण येते. कापडावर ते इतक्या भराभर त्या विशिष्ट सुईने आणि रेशमाच्या दोऱ्याने सुंदर नक्षीकाम करायचे की आपल्यालाही ते सहज जमणार म्हणून आम्ही ती सुई विकत घ्यायचो. पण हाय रे दैवा! तो विक्रेता निघून गेल्यावर आमची ती सुई कापडातून सुद्धा आरपार जायची नाही तर नक्षीची गोष्टच दूर!

डाएटचे तर इतके सोहळे आहेत की नक्की कुठल्या सोहळ्याने आपले वजन कमी होईल ते समजतच नाही. एकजण सांगतो- भरपूर पाणी प्या, तर दुसरा सांगतो की शरीराला आवश्यक तेवढेच पाणी प्या- नाहीतर किडन्या खराब होतील. एकजण सांगतो सकाळी उठल्या उठल्या लिंबू- मध- पाणी प्या, तर दुसरा सांगतो की सकाळी उठल्यावर एक फळ खा. एक सांगतो भात अजिबात खाऊ नका तर दुसरा सांगतो की जिथे जे पीक उगवते तेच जास्त खाल्ले पाहिजे. म्हणून पंजाबातील माणसाने भरपूर गहू आणि कोकणातील माणसाने भरपूर भात खाल्ला पाहिजे. तर एक म्हणतो भरपूर सॅलड खा आणि दुसरा म्हणतो कच्च्या भाज्या अजिबात खाऊ नका. एक सांगतो मोड आलेली कडधान्य खा तर दुसरा म्हणतो बिलकुल खाऊ नका. एक सांगतो दर दोन तासांनी खा तर दुसरा म्हणतो की फक्त दोनदाच खा. आणि या सर्वांबरोबर त्यांनी सांगितलेले विश्लेषण सुद्धा आपल्याला पटत असते. मग यापैकी कुठला सृजनत्वाचा सोहळा आपल्याला लागू होतो हे ठरवण्यात आपले शरीर इतके सृजन(की सूजन)शील होते की ते सृजन उतरवण्यासाठी सुजनाचे दरवाजे टोकावे लागतात.

‘व्यासो$च्छिष्टं जगत् सर्वम् ‘ म्हणजे “व्यासमुनींनी  या जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे” असे कधीतरी आम्ही ऐकले होते. तसेच काहीसे या सृजनत्वाच्या सोहळ्याचा बाबतीत आमच्या लक्षात आले. पाककला, चित्रकला, संगीत, नाट्य अशा जवळजवळ चौसष्ठही कलांमध्ये हा सोहळा आपली सर्जनशीलता दाखवत यू- नळी, मुखपुस्तक, कायप्पा, अशा अनेक माध्यमातून संचार करत आम्हा रसिकांना अधिकाधिक सोहळ्याचा आनंद लुटण्यास प्रवृत्त करत असतो. म्हणूनच जसे आम्ही सुरुवातीला नमूद केले की ऋतू पावसाळा म्हणजे सृजनाचा सोहळा! तसाच हा अंतरजालाच्या मायाजालाचा पावसाळा…. ज्यात आम्ही अनुभवतो नवनवीन सृजनत्वाचे सोहळे!

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ घर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

परवा मी एका माझ्या मैत्रिणी च्या घरी गेले होते . घर कसले ते छोटा महालच म्हणा की. खूप प्रशस्त खोल्या होत्या. मोठा सुंदर दिवाण खाना,ज्यात सुबक नक्षी केलेल्या पेंटिंग, देखणे झुंबर, आरामदायी खुर्च्या अश्या विविध गोष्टी होत्या. तिथून आत मोठे स्वयंपाकघर होते. ते ही नाना गोष्टीने नटलेले. एकसारख्या सुरेख काचेच्या बरण्या, स्टील चे डबे, मायक्रो वेव्ह, तो भला मोठा कट्टा त्यावर फूड प्रोसेसर, एका बाजूला एक शोकेस ज्यात काचेची भांडी नीट मांडलेली. थोडक्यात काय सगळ्या वस्तू जिथल्या तिथे.

प्रशस्त बेड रूम, स्टडी रूम, दू मजली प्रशस्त मोठे घर आणि सुंदर मोठी गच्ची . घराला रंग ही सुंदर दिलेला होता. एकूण काय कुठेच कमतरता काढण्यासारखी नव्हती. मी सहज म्हणले मैत्रिणीला काय सुंदर घर आहे ग तुझं. त्यावर जे तिने मला उत्तर दिले त्यांनी मी अवाक झाले, पाहतच राहिले तिच्या कडे.

चार वीटांपासून, दगड आणि माती पासून बांधलेल्या सुबक खोल्या म्हणजे का घर ?चार माणसे एकत्र राहणे म्हणजे का घर ? नक्की घर तू कश्याला म्हणतेस, असा प्रति प्रश्न तिने मला केला. ती म्हणाली माझ्या मते घर म्हणजे उबदार खोल्या माणसाच्या सहवासातून तयार झालेल्या. एकमेकांसाठी आपण आहोत ही जाणीव होणे म्हणजे घर. हे घर नाही काही हे कोर्ट आहे. येथे केवळ ऑर्डर आणी ऑर्डर एवढच असते. या घरात माणस रहात नाहीत तर नियम राहतात. भावनांना काडीचीही किम्मत नाही इथे. जिवंत माणसांपेक्षा निर्जीव वस्तू जास्त जपल्या जातात इथे.मग हे घर कसे ?

घर म्हणजे नुसत्या चार भिंती नव्हेत,तर त्यात मायेची ऊब लागते. घर म्हणजे एकमेकांची मन समजून घेऊन राहणे. प्रत्येकाच्या भावनांचा आदर करणे.

मायेच्या प्रेमाचा हात जेव्हा निर्जीव भिंतींवरून फिरतो तेव्हा तीही सुखावते. त्यात ही जीव येतो.तेव्हा बनते घर.

चार आपुलकीचे शब्द जेव्हा घरभर घुमतात तेव्हा वास्तू देवताही प्रसन्न होते आणि घराला घरपण येते.

जेव्हा घरच्या स्त्रीला मान मिळतो तेव्हाच अन्नपूर्णा आनंदाने नांदते,तथास्तू म्हणते, तेव्हा बनते घर.

तिच्या मते घरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी नक्की असावी. पण म्हणून घर शो पीस नक्की नसावे. शिस्त नक्की असावी पण हुकुमशाही नसावी.

घरात गेल की भिरभिरणार्या नजरा नसाव्यात तर प्रसन्न भीती विरहित चेहेरे असावेत.

कधी कधी भिंतींवर रेखाटलेले एखादे चित्र ही घराला घरपण देऊन जाते हे तिचे सहज बोलणे मला फार भावले. हास्याने सुख नांदते, नाही तर घर म्हणजे पायात घातलेली बेडी वाटू लागते. तिच्या मते आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे ही जाणीव म्हणजे घर. एकमेकांच्या प्रेमाने घट्ट बांधलेली नात्यांची वीण म्हणजे घर. एकमेकांवरचा विश्वास, आधार म्हणजे घर.

रुसवे फुगवे पण ते न टिकणारे म्हणजे घर.अहंकार , मी म्हणीन तसेच, हुकुमशाही, दडपशाही नी घर नाही बनत . आपण जिथे मोकळा श्वास घेऊ शकतो, दिलखुलास हसू शकतो, आपली मत न घाबरता मांडू शकतो ते घर.ती त्या दिवशी खूप भरभरून, मनापासून आणि खर बोलत होती.

आणि तिचे ते बोल ऐकुन मला ही पटले उमगले माझ घर लहान असले तरी प्रेमाने, आपुलकीने भरलेले आहे. आमच्या मनाची वीण इतकी घट्ट आहे की आमच्या मुळे घर बनले आहे. त्याच्या मुळे आम्ही नाही. घर वाट पाहते आमच्या सहवासाची. कारण त्याला आमच्या मुळे घरपण मिळाले आहे.

घर प्रेमानी सजलेल असाव

आपुलकीने नटलेल असाव

मायेचा ओलावा असावा

विश्वासाचा एक सुंदर धागा असावा

जिथे हक्काची एक हाक असावी

मायेची एक थाप असावी

आधार असावा एकमेकांचा,

नुसती दिखाव्याची नाती नसावी

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

22.8.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ सकारात्मक विचार – यशस्वी करिअरसाठी कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक असणाऱ्यांनी पुढील कानमंत्र अवश्य आचरणात आणायला हवेत.

नावे लक्षात ठेवणे —

जर तुम्हाला असे वाटत असेल की, लोकांमध्ये तुम्ही प्रिय व्हायला हवेत, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे इतरांची नावे लक्षात ठेवणे. हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. जगातील कुठल्याही भाषिकाला आणि कोणत्याही देशातील रहिवाशाला जर सर्वात प्रिय काय असेल तर ते स्वत:चे नाव होय. स्वत:च्या नावाइतका महत्त्वाचा आणि गोड शब्द दुसरा असूच शकत नाही. खरे म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे लक्षात ठेवणे हे तुमच्या करिअरमधील महत्त्वाचे कौशल्य आहे आणि तुम्ही ते आत्मसात केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीची कितीही काळानंतर भेट झाली अन् तुम्ही त्या व्यक्तीला नावाने हाक मारलीत तर आपोआपच त्याच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी निर्माण होते.

नेपोलियन बोनापार्ट या महान योद्ध्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन, जो फ्रान्सचा सम्राट होता, अभिमानाने सांगत असे की, कामाच्या प्रचंड तणावातही तो इतरांची नावे लक्षात ठेवू शकत असे. याविषयी त्याचे तंत्र अगदी सोपे होते. जर एखाद्याचे नाव त्याला नीट ऐकू आले नाही, तर तो मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीला म्हणायचा, ” माफ करा मला तुमचे नाव स्पष्ट ऐकू आले नाही.” आणि त्यानंतर सांगितलेले नाव तो लक्षात ठेवायचा. संभाषणादरम्यान समोरच्या अनोळखी माणसाचे नाव वारंवार उच्चारून ते नाव लक्षात ठेवणे ही त्याची खुबी होती.

चांगले श्रोते बना ….

स्वत:बद्दल बोलायला सर्वांनाच आवडते. पण ते मन:पूर्वक ऐकणारा श्रोता त्यांना हवा असतो.

जर तुम्ही चांगले संभाषणकर्ते बनू इच्छित असाल तर आधी चांगले श्रोते बना. समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. अधूनमधून “हो का?”  “असं का?”  “त्या प्रसंगी तुम्ही कसे वागलात?” असे प्रश्न विचारा म्हणजे समोरचा माणूस आणखी उत्साहाने बोलू लागेल; आणि तुमच्या ध्यानीमनी नसतांना असे अनेक मित्र आपसूकच तुम्हाला मिळतील.

इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य दाखवा

सुप्रसिद्ध रोमन कवी पब्लीअस सायरस याने म्हटले आहे की, इतरांनी आपल्या गोष्टीमध्ये स्वारस्य दाखवावे असे वाटत असेल तर आधी आपण इतरांच्या गोष्टीत स्वारस्य दाखवायला हवे. एक चांगला श्रोता होणे हे तर पुष्कळ महत्त्वाचे आहेच. पण त्यानंतरची पायरी म्हणजे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांच्या सुखदु:खात आस्था दाखवून खऱ्या अर्थाने समरस होता आले पाहिजे. कुणाचे कौटुंबिक प्रश्न असतील तर कुणाचे नोकरीतील प्रश्न असतील. त्यासंबंधी आस्थेवाईकपणे चौकशी करून, त्याविषयी काळजी व्यक्त करून दिलासा द्यायला हवा. “कुणीतरी आपली काळजी करणारे आहे,” या विचाराने माणसाला दिलासा मिळतो, धीर येतो; आणि यातूनच कधीही न तुटणारी नाती आणि प्रेमाचे बंध निर्माण होतात. आपल्या करिअरच्या यशस्वीतेसाठी हीसुद्धा एक गुरुकिल्ली आहे.

टीका करू नका.

परिस्थिती कुठलीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या. पण कुणावरही, कधीही उघडउघड टीका करू नका. नापसंती दर्शवू नका किंवा सरळसरळ तक्रारीचा सूर काढू नका. त्याऐवजी अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीची चूक त्याच्या नजरेत आणून द्या. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रगती होत नसते. इतरांना त्यांच्या चुकांबद्दल संशयाचा फायदा द्या. दोषी व्यक्ती आपोआपच स्वत:चे तोंड लपवील.

माझ्या तरुण मित्रांनो,  वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणल्या तर तुमचे करिअर यशस्वी झालेच म्हणून समजा.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घट…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ घट….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

नवरात्रातील महत्वाची गोष्ट घटस्थापना ! घटस्थापना म्हणजे आपण मांडलेली पंचमहाभूतांची पूजा !मातीचा घट आणि घटाभोवती नवधान्य पेरण्यासाठी वापरलेली माती हे पृथ्वीच्या सृजनाचे प्रतिक,घटातील पाणी म्हणजेच आप,सतत तेवणारा दिवा तेजाचे प्रतिक,त्यातून निर्माण होतो चैतन्याचा वायु जो सारा आसमंत( अवकाश) उजळून टाकतो.घटस्थापनेच्यावेळी केलेल्या या पंचमहाभूतांच्या पूजेने देवीचे दिवसेदिवस देवीचे तेज वाढते तेअष्टमीला पूर्णत्वाला जाते.त्या पूर्णत्वात घागर( घट)फुंकून आपण देवीला अंतर्मन अर्पण करण्याचा प्रयत्न करतो.घटाच्या अंतरात, पोकळीत जाण्याचा प्रयत्न करतो.तो करतानाजे समाधान मिळते हे समाधान म्हणजेच नवरात्रीचा घटाशी असणारा अन्यसाधारण संबंध!अलिकडे घटस्थापनेसाठी ऐश्वर्याप्रमाणे वेगवेगळ्या धातूचे घट वापरले जातात पण मातीच्या घटाचे ऐश्वर्य कशालाच नाही हे तितकेच खरे!

घट हा शब्द फार पुरातन असून तो आजही आपले अस्तीत्व टिकवून आहे.

आदिमानवाने शेती सुरु केली आणि त्याला मदत करणारे बलुतेदार तयार झाले कुंभार हा त्यापैकीच एक! मातीचे घट बनविणारा कुंभार ! फिरत्या चाकावर कुंभार कौशल्याने वेगवेगळ्या आकाराचे घट बनवितो.अगदी लहानशा बोळक्यापासून मोठ्या रांजणापर्यंत असे हे घट असतात.आकारमान आणि उपयोगाप्रमाणे यांची नावेबदललेली दिसतात.लहान मुलींच्या चूल बोळक्यापासून रांजणापर्यंतचा घटाचा हा प्रवास फार पूर्वीपासून चालू आहे.सुरवातीच्या काळात हेच घट सर्व कामासाठी वापरले जात.

घट म्हणजेच घडा!

मानवाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युनंतरही ज्याची गरज लागते तो घट मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. चूल बोळक्याचा खेळ खेळणारी लग्नमंडपात उभी रहते ती बोळक्यासहीतच फक्त तेथे असतो घट! नवरीने पुजावयाचा गौरीहर !लग्नानंतर संक्रांतीला सुवासिनी सुगड पूजतात ते घटाचेच वेगळे रूप.त्या पूजेतलेच एक रथसप्तमीला सूर्यपूजेसाठी वापरले जाते.असा घट,घडा माणसाने पुण्याचा साठा भरण्याकरिता म्हणजे परोपकाराकरिता वापरला तर योग्य नाहीतर पाप मार्गाने वागणाऱ्या वाल्ह्या कोळ्याप्रमाणे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच!

पूर्वी ‘घट डोईवर, घट कमरेवर,’ म्हणत बायका नदीवरून पाणी आणत आता नळाचेपाणी घटात,माठात भरले जाते.अगदी घरात फ्रिज असला तरी माठातले पाणी पिणारे आजही आहेत.

पंचमहाभूतानी बनलेला आपला देहही एक घटच आहे.’ घटाघटाचे रूप आगळे,प्रत्येकाचे दैव निराळे’ असे कै.माडगूळकरांनी त्या अर्थाने म्हटले आहे.

आता लोकांना मातीच्या घटाचे पर्यावर्णीय महत्ल समजल्याने पुन्हा मातीचे घट स्वयंपाकघरात घरात अग्रस्थान मिळवू लागलेले दिसतात.कितीही निर्लेप आले तरी मातीच्या घटाचे स्थान शेवटपर्यंत अढळच रहाणार !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नवरात्रोत्सवात ऑफिसला सुट्टी म्हणून मानसी,चित्रा,रेवती, स्वाती या मैत्रिणीं महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या. यानिमित्ताने देवळातील पूजा-आरास पाहायला मिळे. निवांतपणे लोकांमध्ये मिसळून उत्सवाच्या वातावरणाची अनुभूती घेता येई.

देवळात खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठी रांग होती.प्रत्येकीच्या हातात पूजेची थाळी होती. रेवती,स्वातीने तेलाच्या पॅक पिशव्या आणलेल्या पाहून चित्रा म्हणाली,”स्वाती तेल पण आणलेस तू ?”

स्वाती– “होय बाई.अग नोकरीसाठी आपण घराबाहेर असतो.सतत तेलवात लावून ठेवणे शक्य होत नाही. मग म्हणलं, देवाच्या दारी तरी आपला दिवा जळू दे.”

“होय ग. आपण बाहेर असताना अखंड दिवा लावणे शक्य नसते आणि ते धोक्याचेही असते. म्हणून मग देवळातील दिव्यासाठी तेल आणले.”रेवतीने तिची ती ओढली.

“ते ठीक आहे,”मानसी म्हणाली,”खूपजण असाच विचार करतात आणि इथे नको इतके तेल जमा होते.तेलाची सांड-लवंड होते, काही तेल वाया जाते,घसरडे होते याचा कुणी गांभीर्याने विचारच करत नाही.”

“हो ना,मग काहीतरी दुर्घटना घडलीकी सगळे एकदम जागे होतात,” चित्रा म्हणाली.

“म्हणूनच आम्ही पॅक पिशवी आणली,”स्वाती.

“ते अगदी छान केलत तुम्ही. पण या गोष्टीचा काही वेगळा विचार नाही का करता येणार ? ज्यांना स्वयंपाकात तेलाचे दर्शन दुर्लभच असते त्यांच्या देवापुढे कधी तेलवात लागणार आहे का ?मग अशांना हे तेल आपण नाही का देऊ शकणार ,” मानसी.

“मानसी, अगदी खरं आहे तुझं. मी पण आता अशा गरजूंना देईन,” चित्रा.

“गेली चार-पाच वर्षे अशा लोकांना मी तेलाची पिशवी देते,” मानसी.

“छान छान” सगळ्या एकदम म्हणाल्या.

“आजकाल खूप गोष्टींचा नव्याने विचार करायला पाहिजे हे यावरून लक्षात आलं बरं का आमच्या,” रेवती.

दर्शनाची रांग पुढे सरकत होती.आत जाताना थोडी रेटारेटी झाली आणि हातातल्या ओटीच्या थाळ्या वेड्यावाकड्या झाल्या. कसल्यातरी आघाताने स्वातीच्या हातातील तेलाची पिशवी फुटून ते सांडू लागले.गडबडीत खूप तेल वाया गेले. स्वातीची साडी तर पुरती खराब झाली.पण इतरांच्या साड्यांना ही तेलाचा प्रसाद मिळाला.गडबड बघून पुढे आलेल्या देवस्थानातील कुणीतरी ते तेल पुसून घेतले.या मैत्रिणी कसेबसे दर्शन घेऊन बाहेर आल्या.आता अशा अवतारात बाहेर कुठे जाणे शक्यच नव्हते. सगळ्या घरी परतल्या.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तेल पिशवी वरून साग्रसंगीत चर्चा झाली.सणवार,परंपरा,दानमहात्म्य यावर गरमागरम चर्चा झाली.जुने रितीरिवाज जपायचे पण काळानुरूप त्यात बदल करणे खूप गरजेचे आहे.दान सत्पात्री असावे.गरजूंना मदत करावी.न सोसणारे उपवास न करता उपाशी लोकांना जेवू घालावे.यावर मात्र एकमत झाले.

परंपरेच्या मुशीत घडतो संस्कृतीचा दागिना

नवा उजाळा देण्या सोडा कालबाह्य कल्पना !!

हे अधोरेखित झाले.

या चर्चेच्या वेळी मानसी गप्पच होती.कुणीतरी तिला याबद्दल विचारले.ती म्हणाली,”मी माझे मत कालच सांगितले.पण यंदा मात्र माझा चांगलाच पोपट झालाय,”

“काय झालं मानसी ,”सार्वजनिक कुतूहल.

“यंदा मी माझ्या कामवालीला तेलाची पिशवी दिली.ती खूपच खुश झाली.म्हणाली,’ वहिनी तुम्ही माझं मोठं काम केलंसा. माझी खूप दिवसाची इच्छा होती का देवीला तेल द्यावं.आता हीच पिशवी मी उद्या देवीला देईन.’

“आता बोला”.

“काय ?” सर्वांनी एकच गजर केला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरे तर पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एकेकाळी विख्यात होते. रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला, गल्ल्यांमधून,वाडयांच्या बोळांमधून, इमारतीच्या पार्किंगमध्ये सायकलीच सायकली लावलेल्या असायच्या. शाळाकॉलेजांमधून, कार्यालयांमधून खास सायकलींचे स्टॅंड तैनात असायचे किंवा एकमेकांवर खेटून-रेलून लावलेल्या असायच्या. सायकलींचेच राज्य होते म्हणा ना! पण काळ काय बदलला आणि जीवनाच्या वाढत्या वेगाशी स्पर्धा न करता आल्याने ह्या दुचाकी वाहनप्रकाराची लोकप्रिय कमीकमी होत गेली.

सायकली गेल्या आणि मोटारसायकलींचा जमाना आला. कालांतराने “आजकाल की नाही सिटीत कुठेही जायचे म्हणजे कार ही इतकी नेसेसिटी झाली आहे ना!” अशी वाक्ये बोलून पुणेकर एकमेकांना कार घ्यायला भरीस पाडू लागले. मग त्यातून कार आणि मोटारसायकलींनी रस्ते तुडुंब भरून वहायला लागले आणि एका सीमेनंतर पावसाळ्याचे पाणी तुंबावे तसे तुंबून पडायला लागले. सिग्नलला उभे राहिले की वायुप्रदुषणाची भयानक जाणीव सर्वांना व्हायला लागली. मधल्यामधे सायकली मात्र पुण्याच्या रस्त्यांवरून पार पुसल्या गेल्या!

वरवर पाहिले तर सायकली गायब होण्यामागे पुणेकरच पूर्णपणे दोषी आहेत असे वाटेल. पण तसे नाहीये. शासनकर्त्यांकडून ’प्लास्टीक रीसायकलिंग’, ’कोरडा कचरा रीसायकलिंग’, ’ओला कचरा रीसायकलिंग’, ’पाणी रीसायकलिंग’ असा नानाविध गोष्टी रीसायकलिंग करण्याचा इतका भडिमार सर्वदिशांनी पुणेकरांच्या कानीकपाळी केला गेलाय की ह्या गदारोळात पुणेकर बिच्चारा ’सायकलिंग’ हा शब्दच विसरून गेला.

पण खर्‍या पुणेकराने घाबरून जायचे कारण नाही…परिस्थिती हळूहळू बदलत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमती बेफाट वाढल्या आहेत. “हिंजवडीला कारने जायचे म्हणजे च्यायला ब्रेक-क्लच, ब्रेक-क्लच दाबून गुढगे पार दुखायला लागतात बुवा! शिवाय ट्रॅफिक जाममध्ये अडकून रोजचे तीन तास प्रवासात जातात ते वेगळेच…!” अशी हताश वाक्ये कानी पडायला लागली असून आयटी कर्मचार्‍यांचा कार पूलिंग करण्याचा किंवा कंपन्यांच्या बसनेच कामाला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यास भरीला म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यातून आरोग्य समस्या उग्र रूप धारण करायला लागल्या आहेत. वजनवाढ, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी अशा आजारांनी लहान वयातच तरुण पिढीला ग्रासले आहे.

ह्यावर उत्तम उपाय म्हणजे, सायकल!  ह्या उपायाचे फायदे खालीलप्रमाणे –

  • सुलभ वापर – लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वजण सायकल चालवू शकतात. बरं पंक्चर झालीच तर हातात धरून ढकलत नेणे काही अवघड नाही. वजनाला एकदम हलकीफुलकी आणि पार्किंगसाठी सडपातळ. खूप लांब जायचे असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर बाइक-कार जरूर वापरा. पण शाळेला, बाजाराला, व्यायामशाळेत, ऑफ़िसला जायचे असेल तर वेगाची काय गरज? सरळ सायकल काढा आणि सुटा.
  • पैशांची बचत – सायकलीची किंमत माफ़क शिवाय दुरुस्तीचा खर्चही परवडण्यासारखा. सायकल चालविताना ना कुठल्या इंधनाचा खर्च, ना वंगणाचा खर्च. आपला देश ह्या दोन्ही गोष्टी आयात करीत असल्याने सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवू शकेल. शिवाय सायकली चालवता ना हेल्मेटची गरज, ना लायसन्स, ना इंशुरन्स, ना पीयुसी आवश्यक. कुठलाही सीट-बेल्ट बांधू नका वा हेल्मेटचा पट्टा ओढू नका. नुसती टांग टाका आणि चालू पडा.
  • शिक्षेची भीती नाही – सुधारीत मोटार वाहन कायद्यामध्ये वरील नियम न पाळल्यास कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तसेच सीसी टीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर सर्व दुचाकी-तिचाकी-चारचाकींवर असणार आहे. स्वयंचलित वाहनांना वेगाची मर्यादा पाळण्याची सक्ती असून ती तोडल्यास जबरी शिक्षेची तरतूद केली आहे. विशेषत: दारु पिऊन चालवणार्‍यांची तर काही खैरच नाही.

सायकलीला मात्र अलगदपणे सर्व नियमांच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. सायकलवाल्याने अगदी वाहतूक पोलिसाच्या अंगावरून सिग्नल तोडून जरी नेली तरी पोलिस त्या कृत्याकडे काणाडोळाच करेल. सायकलवाल्याला पकडणे त्याच्यादृष्टीने पूर्णपणे ’अर्थ’हीन असणार आहे. जास्तीतजास्त शिक्षा म्हणजे ’हवा सोडून देणे’ बस्स! J

  • उत्तम आरोग्यसायकल चालवणे हा फ़ुफ़्फ़ुसांची आणि ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. शिवाय घाम निघाल्याने शरीरातील जादा मेद वापरला जाऊन लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कमी होतो. शरीरातील मांसपेशींचीही वाढ होते, हातापायांचे स्नायु बळकट होतात आणि संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा वाढतो.
  • सुधारीत तंत्रद्न्यान – नवीन सायकलींना गिअर आणि शॉकअब्सॉर्बर आल्याने सायकलवरून भन्नाट वेगाने जाण्याचीही सोय झाली आहे. शर्यतींसाठी अत्यंत कमी वजनाच्या पण तितक्याच बळकट सायकली जगभर तयार आणि सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय सायकलींसाठी सोयीचे खास आकर्षक रंगांचे गणवेश तसेच हेल्मेट बाजारात आली आहेत. सायकलींना बॅग्ज, मोबाईल फोन तसेच पाण्याची बाटली अडकविण्य़ाचीही सोय पर्यटनाला जाणार्‍यांसाठी उपयुक्त ठरते.
  • सायकल म्हणजे कमीपणा नव्हे – युरोपियन देशांमध्ये विशेषत: नेदरलॅंडस वगैरे मध्ये सर्वचजण सायकलीवरून फिरतात आणि सायकलस्वारांना तिथे महत्व आणि प्रोत्साहनही दिले जाते. त्या देशांत जाऊन आलेल्या सर्वांनाच मग पुण्याच्या रस्त्यांवर सायकल चालविण्यात कमीपणा वाटायचे कारण उरत नाही.

अशा प्रकारे स्वयंचलित वाहनांचा वापर कमी होवो आणि सायकलींचा उदंड वाढो, हीच ह्या पुणेकराची इच्छा!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मोबाईल वरील मेसेजेस वाचत होते .पेडोंगी नावाचे खेचर आर्मीमधे रसद पुरवत होते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडून आपल्याकडे कामाला लावले. संधी मिळताच पाठीवरच्या मशीन गन आणि बॉम्ब गोळ्या सहित 25 किलोमीटर चालून भारतीय हद्दीत आल. त्याचा सत्कार झाला. आणि गिनीज बुक मध्ये नाव पोचल . खरंच देशभक्त.

हे वाचत असताना आमच्या येथे घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. अनेक गाढवांचा घोळका निघाला होता. एक गाढव मात्र अगदी हळूहळू असहाय्यपणे लंगडत  चाललं होतं. माझ्यासारख्या प्राणी प्रेमिला गप्प बसवेना.  स्वप्नीलला हाक मारली. गाढव कोणाच का असेना पण त्यावर उपचार करायला हवेत. स्वप्नील एकटा काही करणे शक्य नव्हते. राहत संस्थेच्या किरण नाईक आणि पीपल फॉर ऍनिमल संस्थेच्या अशोक लकडे ना बोलावून घेतले. दोघांनी पकडून त्याला गॅरेजमध्ये ठेवलं. संपूर्ण पाय  सडला होता. त्यातून पाणी वहात होतं. त्यात किडे झाले होते. मालकाने काम करून घेऊन सोडून दिले होते .फोन करून डॉक्टरना  बोलावून घेतले. त्यांनी गाढवांचा पाय पाहिला मात्र आणि काय! यातून हे वाचणं शक्य नाही. इंजेक्शन देऊन सोडवायला हव असा सल्ला दिला.

जीव घेण दोन मिनिटाच काम  पण जीव वाचवायला काही दिवस लागतात .प्रयत्न तरी करून बघू. शेवटी त्याचं प्रारब्ध असं म्हणून प्रयत्न सुरू केले. गाढवाला खाण्याची सुद्धा  ताकत नव्हती. औषध लावलं तर जखमेवर रहात नव्हतं. जवळ जाणं शक्य नाही, इतका घाण वास येत होता .दोन दिवस पिचकारीने पाण्याने जखम धुवून काढली. दोन दिवसांनी औषध व बॅंडेज बांधले. पण तेही पायावर रहात नव्हते. शेवटी जखम उघडी ठेवली. एका वेळेला एक संपूर्ण ट्यूब लावावी लागायची. आता ते रोज ड्रेसिंग व्यवस्थित करून घ्यायला लागलं. किरण व अशोक गवताच्या  पेंड्या ,भरडा आणत होते .त्यांच्या गाडीचा आवाज त्याला कळायला लागला. आवाज आला की ते ओरडायला लागायचं. हळूहळू जखम भरून यायला लागली. आता गाढवाची सगळ्यांशी मैत्री झाली होती. किरणना तर आपण यशस्वी झाल्यासारखे वाटायचे. ते आले की पहिल्यांदा गाढवाला मिठी मारायचे. त्याच्याशी बोलायचे. जाता-येता कोणी कोणी विचारायचे “काय हो गाढव  पाळलंय काय ?”हसायला यायचे.

तीन आठवड्यांनी गाढवाची जखम  बरी झाली. एक दिवस गाढवाचा मालक  तणतणत आला.” माझं गाढव तुम्ही इथं ठेवलंय होय कधीचा हुडकतोय”. सगळ्यांनी त्यालाच  फैलावर घेतल. गाढवाच्या सडलेल्या पायाचे आणि बऱ्या झालेल्या पायाचे फोटो दाखवले.’ पावलावर दवाखाना असून त्याला उपचार न करता राबवून घेतलंस ,म्हणून सगळ्यांनी तोंडसुख घेतलं .आता त्याला बोलायला जागा नव्हती. त्याला तंबी दिली. औषधाचा खर्च 2000 आला म्हणून सांगितलं. शेवटी कसेबसे त्याने पाचशे रुपये काढून दिलेन .  त्याच पाचशे रुपयांची पुढील उपचारासाठी औषधे घेऊन त्याला दिली. गाढवही त्याच्या ताब्यात दिलं

दोन दिवसानी गाढव त्याच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायला लागलं. जाताना पाच मिनिट गॅरेज जवळ थांबून सगळ्यांकडे पहायचं. जीवदान मिळाल्याबद्दल धन्यवाद देण्याचा अविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसायचा. गाढवाचे प्रारब्ध, सगळ्यांचे प्रयत्न आणि सर्वात मोठी परमेश्वराची कृपा या. त्रयीतून गाढवाचा जीव वाचला.

काय म्हणावं गाढवाचा शहाणपणा की मालकाचा गाढवपणा!. वेडेपणाला गाढवाची उपमा का देतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ चाहूल ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

पंचमहाभूतांनी भरलेल्या या निसर्गाचे काहीच सांगता येत नाही! पृथ्वी,आप, तेज,वायू, आकाश सारी तुझीच रूपे! कोणी त्याला निसर्ग म्हणोत तर कोणी परमेश्वर !पण या मानवप्राण्यासाठी  हे सारे महत्त्वाचे! त्यांचे अस्तित्व  रोजच्या जीवन व्यवहारात आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग कधी एकदम वादळे येतात, आकाश कोसळते , सूर्याचा प्रकोप होतो तर कधी ही जमीन हादरते!असं झालं की आपल्याला निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते आणि सत्य दिसायला लागते!

निसर्गाचा अभ्यास म्हणून हवामान खात्याची यंत्रणा निर्माण झाली. आता ती बरीच शास्त्रशुद्ध झाली आहे. काही वर्षापूर्वी हवामान खात्याचा अंदाज ही विनोद करण्याची गोष्ट वाटे. ‘हवामान खात्याने अंदाज दिला आहे ना पाऊस पडेल म्हणून,मग हमखास येणार नाही’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात पण आता मात्र हे शास्त्र खूपच प्रगत झालंय.त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा धुमाकूळ राहणारच आणि त्यासाठी जमेल तेवढी काळजी घेत आपण राहायचे!

वादळाचे भोवरे समुद्रात अखंड फिरत असतात, त्यांना आपण आवर घालू शकत नाही हे खरे! कधी कधी आपली नजर चुकून मुंबईला न जाता वारे कोकणाकडे वळतात किंवा आपल्या प्रभावाने एखादी किनारपट्टी नाश करतात .

एकमेकांवर अवलंबून असणारी ही पंचमहाभूते आर्यांच्या काळात देव म्हणून मानली गेली. निसर्ग पूजा महत्त्वाची  होती. निसर्गात असणाऱ्या प्रत्येक बदलाचा विचार करून माणसाने त्याचे महत्त्व मानले असेल!

यंदाचे २०२०  हे वर्ष काळाच्या कसोटीवर संकटाचे वर्ष म्हणून आले आहे. करोना महामारी च्या छायेत सारे जग सापडले आहे. पुन्हा एकदा निसर्ग आणि मानव या लढाईत आपले अस्तित्व टिकवायचे आहे. काही वर्षापूर्वी नाॅस्टरडॅम नावाच्या एका शास्त्रज्ञाने असे भाकीत केले होते की पृथ्वीवरील या जीवसृष्टीचे अस्तित्व २०२५ मध्ये संपेल!

तरी यापूर्वी 2005 मध्ये मुंबई बुडणार असेही भाकीत होते. तेव्हा मुंबई खरंच जलमय झाली. अगदी संपली नाही तरी मुंबईला निसर्गाचा खूप मोठा धक्का सहन करावा लागला.एका अरिष्टाची

चाहूल तेव्हापासून चालू झाली असेच वाटते. 2005 मध्ये पाण्याचा प्रवेश सांगली ,कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या शहरांमधून सुरू झाला. दरवर्षी खूप पाऊस आणि भरलेल्या धरणातून होणारा विसर्ग यामुळे या भागाला सतत पुराचा धोका निर्माण झाला. गेल्यावर्षी महाराष्ट्र ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात नद्यांचे पाणी वाढले आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची रेकॉर्डस् मोडली गेली.

शेतीची, वित्ताची हानी तर झालीच पण मनुष्य आणि जनावरे यांची ही हानी झाली.

यंदा जुलै,  ऑगस्ट मध्ये वादळाचा तडाखा श्रीवर्धन, अलिबाग या भागाला अधिक बसला आणि नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या .त्याच दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. सुदैवाने मृत्यू संख्या त्यामानाने कमी होती.

गेले दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा वाईटाची चाहूल देत आहे. आधीच कोरोनाने ग्रासलेल्या लोकांना वादळाचा क्षोभ सहन करावा लागत आहे. नकळत माणसाला आपण निसर्गासमोर किती लहान आहोत हे जाणवते आहे !

आज दोन दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली असे दिसते. नवरात्रीची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली असं समजायला हरकत नाही.  देवीच्या कृपेने यापुढे सर्व चांगले होईल अशी आशा वाटते आणि

चांगल्या दिवसाची चाहूल आजच्या घटस्थापनेपासून लागलेली आहे असे मनाला वाटते ! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

☆ मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

ऑस्ट्रेलियातील एका grandpa ची गोष्ट आहे. हे आजोबा रोज पहाटे समुद्र किनारी फिरायला जात. जाताना हातात एक टोपली असायची. किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले “Grandpa, हे काय करता?” आजोबा हसले आणि म्हणाले “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो,  अगं भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात पण त्यांची चाल मंद असल्याने बिचारे पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अश्याना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.” ही गोष्ट वाचल्यावर वाटले आपल्याही समाजात असे अनेक आजोबा, आजी  समाजातील मुलामुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडण्यास मदत करतात. त्यापैकीच ही एक देवी, ” मालती ताई निमोणकर”

नाव जरा अपरिचित  वाटले ना?  गुजरवाडीत एका उंच ठिकाणी एका आश्रमात राहायच्या. एकदा चैत्रात आम्हा मैत्रिणींना  बोलावून हळदी कुंकू केले होते. गुजरवाडीतील पण बायका आल्या होत्या. भजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच ह्या आजी. नागपूर जवळील मध्यप्रदेशातील एका छोट्याश्या गावात राहत होत्या. घरी अत्यंत कडक अश्या चालीरिती. पण सासू सासरे सुधारलेले होते. मॅट्रिक झालेल्या आजीने त्या काळी लग्न झाल्यावर BA केले. घरी खूप राबता होता. अश्या वातावरणात वाढलेल्या मालती ताई वरून पाहता खूप सुखी होत्या. दोन उच्चविद्याविभुषित मुली, उच्चविद्याविभुषित मुलगा,  सून,  सधन पती,  काय नव्हते?  परंतु मनातून मात्र  त्या समाधानी नव्हत्या.

सर्व जवाबदार्यांतून मुक्त झाल्यावर, लग्नाला ४० वर्षे झाल्यावर त्यांनी घरात एक निर्णय सांगितला. मी हे घर सोडून समाज कार्यासाठी बाहेर पडत आहे. थोडे समाजाचे देणे फेडून पहाते. घरातल्यांनी समजावले,  थोडे दटावले पण, म्हणाले, एकदा बाहेर पडलीस तर ह्या गृहस्थाश्रमात पुन्हा येणे नाही.. पण आजी ठाम राहिल्या आणि त्यांच्याच मुशीत घडलेल्या त्यांच्या लेकीने त्यांना पाठिंबा दिला.  एके दिवशी ह्या ध्येयाने पछाडून त्या आनंदवनात दाखल झाल्या. साधारण ५९-६० वर्षे वय. पहा, आपल्या घरातली वाटी, भांडी जरी हरवली तरी आपण कासावीस होतो. आजींनी क्षणात आपला भरलेला संसार सोडला. आनंदवनात बाबा व साधना ताईंनी त्यांना आपल्या बराकी जवळच खोली दिली. साधना ताईंचे आणि त्यांचे फार जुळले होते. पण अत्यंत कोमल हृदयाच्या मालतीताई कुष्ठरोग्यांची पीडा पाहून खिन्न होत. माणसाला पुस्तकाप्रमाणे वाचू शकणाऱ्या बाबांच्या डोळ्यांनी हे वाचले आणि त्यांनी डॉ. हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले ह्यांच्या बरोबर काम करण्यास सुचविले. आणि त्या तेथून पुण्यात दाखल झाल्या.

पुण्यात ओंकार ट्रस्ट व डॉ. हर्डीकर ह्या संयुक्त कामात त्या दाखल झाल्या.  गुजरवाडीत डॉ. शरयू घोले ह्यांच्या संस्कार वर्गाची धूरा त्या सांभाळू लागल्या. मुले आणि आजी खूपच रमून जात. आणि इथेच पुढे एक निवासी आश्रम सुरु झाला. ‘अनाथ आश्रम’ हा शब्द जरी उच्चारला तरी आजींना आणि त्यांच्या सहकारी  मानसी ताई ह्यांना राग येत असे. “अगं, आम्ही नाही का त्यांचे पालक?  सनाथच आहेत ही मुले. “शुभम,  मयूर अशी ५ व ३ वर्षाची मुले दाखल झाली आणि आजींचे विश्वाचं बदलले. आजींचे व शरयू ताईंचे कार्य वाढू लागले. हळू हळू मुलांची संख्या वाढली. तिथेच त्यांची शाळा सुरु झाली. आजी मुलांची खूप काळजी घेत. हे चालू असतानाच आजी वाडीतील स्रीयांना एकत्र करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवू लागल्या. अनेकांना त्यांचे निवास स्थान हे माहेरंच होते. मी पण त्याचा खूपदा अनुभव घेतला आहे. आजींच्या आश्रमात खूप प्रसन्न वातावरण होते. मुले तर आजींच्या भोवती सतत लुडबुडत असायची. मुलांसाठी आजींचा शब्द म्हणजे ‘वेद वाक्य’ होते. एक राम नावाचा छोटा तर म्हणायचा “मी मोठा होणार, खूप शिकणार आणि आजीला सोन्याची पैठणी आणणार.”

एक प्रसंग आठवतो! काही मुले अवती भोवती च्या परिसरात गवत काढायला गेली. रविवार होता, १-२ वाजे पर्यंत काम करून ती जेवायला आली. माझा ३ ला गणिताचा तास होता. मीही पोहोचले. तर काय! आजी सर्वांच्या हाताला तेल लावत होत्या. मी विचारले “काय झाले?” “अगं, गवत काढताना हाताला चरे पडलेत ना म्हणून मी तेल लावत आहे.” असे होते ते आजी-नातवांचे नाते. माझ्या तर डोळ्यात पाणीच आले. अनेक वर्ष ही माउली तिथे काम करत होती पण त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या दोन्ही लेकीने त्यांना नंतर घरी परत आणले. आज त्या ८५ वर्षाच्या आहेत आणि आपल्या लेकीकडे अमेरिकेत ध्यान साधना करत वानप्रस्थाश्रमात मग्न आहेत!

चला येणार का अमेरिकेत ह्या देवीचे दर्शन घ्यायला?

© सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares
image_print