मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णसखा ☆ सुश्री मनिषा कुलकर्णी

☆ विविधा ☆ कृष्णसखा ☆ सुश्री मनिषा कुलकर्णी ☆ 

भगवंता, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझी पूजा करतो, भक्ती करतो. आमच्या मनासारखे झाले की आम्ही खूष. आयुष्यात सगळे मनासारखं व्हावं वाटते पण थोडे मनाविरुद्ध झाले की तुला दूषण देतो. खूप खूप राग येतो रे तुझा  अगदी तुझे नाव सुद्धा घायचे नाही असे ठरवितो पण आज शांत पणे विचार केला का रागावतो आपण त्याच्यावर, माणूस म्हणून जन्माला तर तुला कुठे सुख मिळाले, काय सहन केले नाहीस तू.

अगदी जन्म झाल्यावर मातृसुखाला पारखा झालास, आईचे दूध पण मिळाले नाही. काय झाले असेल त्या माऊलीचे व बाळाचे. नंद यशोदेने लाडाने वाढविले, कोडकौतुक केले पण एक दिवस ते सर्व सोडून निघून गेलास. बालपणीचे मित्रांना सोडलेस. पेंद्या, सुदामाला सोडताना तुलाही वेदना झाल्या असतील ना रे?

पण कुठे गाजावाजा नाही, सहज गेलास. तुलाही भावना अनावर झाल्या असतील ना रे?

राधेवर प्रेम केलेस, खरी सखी ती. तिला पण सोडलेस. बासरी  ही परत नाही वाजविलीस. गोपिकांबरोबर तिलाही सोडलेस. रुक्मिणीशी विवाह केलास. तुला राधेची आठवण येत असेल ना रे? सारे सारे मुकाट्यानं सहन केलेस.

अर्जुनाचा सारथी झालास. आम्हा माणसांना किती कमीपणा वाटला असताना असे काम करताना, आमचा अहं दुखावला असता पण तू सहज स्वीकारलेस. कसे केलेस रे हे तू पण माणूस होतास ना?

मग आम्हाला थोडे जरी दुःख झाले की आम्ही तुला दोष देतो जणू तुला दुःखच नाही झाले सारे आम्हीच भोगतोय. तरी तू आमच्यावर कधी ही रागावत नाही

द्रौपदीच्या बंधुप्रेमाला जगलास, मीरेच्या भक्तीला धावलास, गोपिकांना विवाह करून न्याय दिलास, सुदाम्याच्या मैत्रीला गळाभेट दिलीस. श्रीमंतीचा बडेजाव नाही, गरिबीचा तिरस्कार नाही नाहीतर आम्ही माणसे चार पैश्याच्या घमेंडीत सारे काही विसरतो, सत्तेमुळे झापड येते, मदमस्त होतो थोडया यशाने. यात मात्र थोडे कमी जास्त की तुला दोष.

आम्हाला तुझा जीवनपट आठवत नाही, तुला झालेल्या वेदनांचा आम्हाला विसर पडतो.

“सुख दुःखी सम सदैव राही तोल मनाचा ढळू न देई स्थितप्रज्ञ श्याम”

राम काय श्याम काय, माणूस म्हणून जन्माला आले, सामान्य माणसासारखे भोग भोगले ते ही काही तक्रार न करता.

कृष्णा, आम्हाला माफ कर, आम्ही तुला ओळखलेच नाही रे. अन आम्ही भक्त म्हणवितो तुझे तिथे ही आम्ही स्वार्थी. भक्ती ही निस्वार्थी करत नाही.

 

© सुश्री मनिषा कुलकर्णी

पुणे

भ्रमणध्वनी:-8999058771

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रीमंती….मनाची ☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ विविधा ☆ श्रीमंती….मनाची ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

काल मी व माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो . समोरच  बस उभी  होती. म्हंटल चला आज बसने जाऊ .बस मधे चढ़णे उतरणे  म्हणजे या वयात तसं सोपं नसतं. पण मधुन मधुन मला हे अस करायला आवडत .आपला confidence पण वाढतो.  व पैसेही वाचतात ना. आपली पीढी पैसे वाचवायचा  एकही   Chance  सोडत नाही. वीस मिनिटे चालून ,वीस रुपये वाचविणे, छान जमते आपल्याला .व काही तरी विशेष केल्याचे समाधान ही मिळते . नवीन पीढीला  हे  पटण्यासारखे  नाही. व आवडत तर त्याहूनही  नाही.  असो,  यालाच  जनरेशन गॅप म्हणतात .••••

मी व छाया बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .आमच्याच  बरोबर चढलेली  एक बाई  सहज तेथे बसू शकत होती .पण तिने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा तिने आपली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा  घडला. ही बाई अगदी सामान्य ,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावी ,असा अंदाज  एकंदर  तिला बघून  येत होता.•••

बस मधे चढताना ही बाई माझ्या बरोबर मागे होती . तिला बघून  मी आपली पर्स सांभाळतच  बस मधे चढले होते .आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्या बाईंशी  बोलले. त्यांना विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट  दुसऱ्या ला का देत होता ??  तेंव्हा तिने दिलेले उत्तर हे असे •••••

ती म्हणाली, काकू मी शिकलेली पढलेली नाही हो.  अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी काम करते .व माझ्या परिवाराला थोडा बहुत हातभार लावते. माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही, पैसा नाही. तेंव्हा मी हे अस रोजच करते. हेच मी सहज‌ करू शकते.  दिवसभर काम केल्यानंतर ‌ अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत. काकू तुमचे पाय दुखत असावेत. हे माझ्या लक्षात आले होते. म्हणून मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला  ना  त्यात मला खूप समाधान  मिळाले. मी कोणाच्या  तरी कामी  आले ना त्याचे .••••••••

असं मी रोज  करते ••••.माझा नियमच आहे तो .•••• आणि रोज मी आनंदाने घरी जाते.•••

तिचे उत्तर ऐकून मी थक्कच झाले. तिचे विचार. तिची समज  बघून या  बाईला  अशिक्षित  म्हणायचे का ?  काय समजायचे ??

कोणाकरिता काही तरी करायची तिची  इच्छा, ••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना .••• मी कशा रीतीने मदत  करू शकते??? त्यावर शोधलेला तिचा  उपाय बघून, मला  तिच्या पासून पर्स सांभाळायचा माझा प्रयत्न आठवला .व मला माझीच लाज वाटली .•••••

देव सुध्दा आपल्या या व निर्मीती वर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . असं दिमाखात सांगत असेल .••••••

आज या बाईने मला खूप गोष्टी शिकवल्या.  स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारी मी तिच्या समोर  खाली मान घालून  स्वतः चे   परिक्षण करू लागले.••••

किती सहज तिने तिच्या समाधानाची व्याख्या सांगितली.•• देव हिला नक्कीच पावला असणार..••मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .••••••••

सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षित   का ??? हीच माणसाची खरी ओळख का ?  मोठं घर, मोठी कार, म्हणजे मिळालेले समाधान का ??

कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व  तुमची धुंदी उतरवेलं  सांगता येत नाही .•••••

या बाईच्या  संगतीने माझे विचार स्वच्छ झाले.

म्हणतात ना •••••

“कर्म से  पहचान होती है इंसानों की । वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में “। •••••••

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुलपाखरु ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ फुलपाखरु ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

 

पंख चिमुकले। निळेजांभळे

हालवुनी झुलते । फुलपांखरुं

 

मी धरु जाता । येई न हाता

दूरच तें उडते । फुलपाखरुं

फुलपाखरु

आपल्याला सगळ्यांनाच आकर्षित करणारा निसर्गातील एक घटक. नाजूक, रंगदार तितकंच नक्षीदारही ! लयदार हालचालीनं, मोहक रंगानं लहानथोर सगळ्यांना खिळवून ठेवणारा हा एक किटक. एका क्षूद्र, कुरुप सुरवंटापासून तयार होतो. निसर्ग, पर्यावरण तसंच जीवसंतुलन राखण्याकरिता अविभाज्य घटक.

खरच, केव्हढा चमत्कार ! काळ्या, काटेरी सुरवंटापासून इतका सुंदर अविष्कार !!

पंख जितके नाजूक, सुंदर, रंगीबेरंगी तितकीच मोहक  हालचालही. त्याचं  आयुष्यही क्षणभंगुर आणि त्याचं आकाशही  इवलंसं. कोणत्याही रंगसंगतीत ते तितकंच आकर्षक. ऊण्यापुर्‍या चौदा दिवसांच्या त्याच्या छोटुल्या जीवनपटात उलथापालथ तरी किती? चौदा दिवस चार टप्प्यांमधे विभागलेलं. अंडी —->अळी(सुरवंट)—-> कोष—-> फुलपाखरु इवलुशा आयुष्यात कोषातील बंदीवासही ते भोगतं आणि  अळीचा  खादाडपणाही; हव्यासही.अती खादाडपणाची ती शिक्षा असावी का? नाही, नसावी. कदाचित नंतरच्या आयुष्यासाठी  ते शिदोरी गोळा करत असावं. नक्कीच ! कारण  निरागसपणान उडणारं फुलपाखरु, त्याचा ऊत्साह; त्याचं बागडणं; निसर्गाबरोबर एकरुप होणं; मकरंदपानाचा स्वार्थ साधताना देखील परागीभवनाचा आनंद फुलांना देणं हे सर्व बघीतलं की नक्कीच  वाटतं की कोषात काही काळ बंदिस्त होणं ही त्याची शिक्षा नसेल . तर ती त्याची ‘ब्युटी ट्रिटमेंट’ असेल. त्यामुळंच तर काटेरी, खाजर्‍या, काळ्या सुरवंटाचं रुपांतर सुंदर, मनमोहक, आकर्षक  फुलपाखरात होत असावं . स्वत:त आमूलाग्र  बदल घडवून आणायचा असेल तर कोषात काही  काळ बंदिस्त हो; अंतर्मुख हो असा  संदेश तर ते देत नसेल ?  म्हणूनच वरकरणी चंचल दिसणारं हे फुलपाखरु मला एखाद्या तपस्व्यासारखं वाटतं !!.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवितेचा जन्म ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ कवितेचा जन्म ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

“काय म्हणता, मी कविता लिहिली

नाही मला ती भेटली

अचानक ह्रुदयाला भिडली

मनाची पाने उलगडली

कायमची तीने माझी पाठ धरली

मीही तिला नाही सोडली

एक नवी दिशा मिळाली

मलाच माझी ओळख झाली

मला ती भावली अन्

कविता माझी झाली

मग कविता मला प्रसवली”

खरच कविता आपण कधीच लिहिली असे होत नाही. ती कधीतरी काही गोष्टी दिसल्यावर आपोआपच ती माझ्या लेखणीतून अवतरते.कारण ती कधी कोणत्या विषयावर लिहिली जाईल ते सांगता येत नाही.  आपण आपले विचार, भावना, इच्छा, एखादा  विशिष्ट विषय जेव्हा व्यक्त करतो तेव्हा त्या चित्र ,न्रुत्याविष्कार, काव्य, लेख याप्रकारातून व्यक्त करतो. काही वेळा माणूस अंतर्मुख होतो तेव्हा तो स्वतःशीच बोलू लागतो. अशावेळी त्या दोन मनांच्या संवादातुन जे बाहेर पडत ते साहित्य होय.त्याचे प्रकार अनेक आहेत. त्याप्रमाणे मला  काव्य स्फुरते.

एखादा फोटो चित्र पाहिल्यावर काही वेळा काही शब्द, ओळी माझ्या  मनाच्या पटलावर लपंडाव सुरु होतो. पाण्यावर येणाऱ्या लाटांसारखे भासतं.आणि मी ती गोष्ट, प्रसंग,अनुभव माझ्या ह्रुदयाला जाऊन भिडतो तेव्हा मला कवितेच्या ओळी स्फुरतात. त्याला कोणतच बंधन रहात नाही. आणि ती लिहील्याशिवाय मला चैन पडत नाही.त्याला मर्यादा नसते. या कवितेचेही  अनेक प्रकार आहेत. उदा. चारोळी, मुक्तछंद, काही वेळा ही कविता विशिष्ट प्रकारच्या शब्दांच्या बांधणीत लिहीली जाते. त्याला व्रुत्त म्हणतात. काही वेळा ती गेय स्वरूपात लिहिली जाते. त्यात कडवीही असतात. काही काही महाकाव्य तयार होतात. महाकाव्याला मर्यादा नसते. आणि विषय कोणता असेल हेही आपण सांगूच शकत नाही.जसा वाळवंटात निवडूंग फुलतो. तसच अवचित काही वेळा शब्दाची ओंजळ भरून वाहु लागते.त्या शब्दांची कविता होते.आपण ह्या कवितेच्या माध्यमातून कुठेही फेरफटका मारून येऊ शकतो. हे मात्र खरं!

आता हेच पहा ना.

निवडूंग हा शब्द वाचला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते काटेरी वाळवंटातील झाड.पण या निवडुंगाची फुलं कधी पाहीली आहेत का?हो.मी लहान पणी शाळेत असताना फक्त पांढऱ्या रंगाची फुले पाहिली होती. पण माझ्या भावाने मला निवडुंगाच्या वेगवेगळ्या फुलांची pdfपाठवली होती. त्यात निवडूंगाचे कितीतरी प्रकार आणि त्याची नाजुक, रंगबिरंगी फुलं यांचे फोटो आहेत. काही निळी, काही लाल, पांढरी, गुलाबी, लहान, मोठी आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. पण ही तर आहे निसर्गाची किमया! आणि अशा गोष्टी, वस्तू, फोटो, चित्र यावरील विचार कवितेच्या रूपाने लिहणे हा मानवी मनाचा चमत्कार.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी

☆ विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी ☆

आठवणीतला गाव…!

खेड्यातील भावबंधन…!

स्वच्छ, मोकळी हवा, चैतन्य अंगावर माखणारा परिसर, दूरवर पसरलेली हरितक्रांत शेते, पक्षांचा मुक्त संचार आणि आत्मियतेच्या प्रांगणात स्थिरावलेला विशाल डोंगरपायथा आणि या डोंगर पायथ्याशी वसलेलं कौलारू, धाब्याची घरं असलेलं एक टुमदार खेडं…!

सूर्याच्या साक्षीने मंगलमय दिवसाची सुरूवात होते. भल्या पहाटे कडाक्याची बोचरी थंडी घालविण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीची आल्हाददायक उष्मा देहावर मायेची ऊब पांघरत असते. माय-भगिनी दारापुढे सडा-रांगोळी घालण्यात मश्गुल झालेल्या असतात. गुरा-ढोरांचा हंबरडा वासरांच्या काळजात वात्सल्याचं उधाण आणीत असतो. पहाटेच्या भक्तीरसात डोंगरमाथ्यावरच्या मंदिराच्या घंटा ताल धरू लागतात आणि प्रत्येकाच्या मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. चुलीवर भाजलेल्या भाकरीच्या घासाने तृप्त होणार्या न्याहरीने दिवसभरातल्या कष्टाला सुरूवात होते आणि खेड्यातलं अनोखं भावबंधन मनामनात घर करू लागते…!

जीवाला जीव देणार्या, एकमेकांशी मायेची नाती जोडणार्या, शेजार्याचं सुख आणि दुःख आपलं मानणार्या माणसांनी हे खेडं एक कुटुंब बनलेलं असतं. व्यक्तिच्या वयाला मान देत दादा, मामा, अण्णा, बापू आणि अगदीच अनोळखी व्यक्तींसाठी ‘राम राम पाव्हणं’ अशी प्रेमळ हाक इथे ऐकू येते, तेव्हा आपणही या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनून जातो. डेरेदार वडाच्या झाडाखाली रंगणार्या पारावरच्या गप्पा भावनिक आणि सामाजिक आदानप्रदानास सहाय्यभूत ठरत असतात. या गप्पांतून प्रत्येकाची सुख-दुःखं वाटून घेतली जातात, तेव्हा सुखाची सावली गडद झाल्याची आणि दुःखाचं आभाळ स्वच्छ, निरभ्र झाल्याची अनुभूती होते. चांदण्यांच्या प्रकाशात बाजल्यावर बसून माय-लेकी, सासू-सुना ‘म्या दिलेली चटणी कशी व्हती?’ ‘कोरड्यास कसं व्हतं?’ अशी आपुलकीनं विचारपूस करतात, तेव्हा त्यांच्या सुगरणतेबरोबरच एकसंघतेचे अतूट बंध अजरामर होत राहतात.

दिवसभरात राबून, कष्ट करून थकलेल्या देहाला विसावा मिळतो तो मंदिराच्या पायरीशी! टाळ, मृदंग, तंबोर्याच्या सुमधुर स्वरांच्या साथीत वातावरण भक्तीमय करणारे अभंग कानावर पडतात, तेव्हा कष्टानं थकलेलं मन नवा जन्म घेत असल्याचा भास होतो.

सण, उत्सव, यात्रा असे कोणतेही लोकोत्सव साजरे करताना पारंपारिक संस्कृतीबरोबरच भावनिक आणि सामाजिक एकात्मतेचं दर्शन इथे घडते.

काळ्या धरणीमातेचं ॠण काळजावर कोरणारी, माणसा-माणसांत जिव्हाळ्याचे बंध पेरणारी, गुरा-ढोरांना जिवापाड प्रेम देणारी, कष्टाला दैवत मानून हात सतत कामात गुंतवणारी आणि लोकसंस्कृतीचा वारसा अखंड चालविणारी ही खेडी मनामनाला जोडणारे सेतू बनून उभी आहेत…!

 

© श्री महेशकुमार कोष्टी

मिरज

शिक्षक व साहित्यिक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दोन ज्योती” – – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन ज्योती  – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे नाव – दोन ज्योती  

लेखिका – श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशन -श्री नवदुर्गा प्रकाशन

 

दोन ज्योती (पुस्तक परिचय)

‘दोन ज्योती’ हा अनुराधा फाटक यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. त्यांचा हा 13 वा कथासंग्रह. राज्य पुरस्कारासकट ( भारतीय रेल्वेची कहाणी – भौगोलिक ) त्यांच्या विविध पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या दुहेरी विणीतून त्यांची कथा गतिमान होते. कल्पनारंजन असं की समाजात ज्या गोष्टी घडायला हव्यात, असं त्यांना वाटतं, त्या त्या गोष्टी त्यांच्या कथांमधून घडतात. ‘पालखीचे भोई’ मधील बाबा गावातील विविध धर्मियांची एकजूट करून माणुसकीची दिंडी काढतात. त्यांच्याकडे  भजनाला विविध जाती-धर्माचे लोक येतात. सकाळी तिरंग्याची पूजा करून व त्याला प्रणाम करून पालखी निघते. त्यात सर्व धर्माचे धर्मग्रंथ ठेवलेले असतात. आपआपल्या धर्माचा पोशाख केलेले वारकरी ‘पालखीचे भोई’ होतात.

श्रीमती अनुराधा फाटक

‘झेप’ मधील सायली हुशार पण घरची गरीबी म्हणून ती सायन्सला न जाता आर्टस्ला जाते. संस्कृत विषय घेते. दप्तरदार बंधूंकडे जुन्या औषधांची माहिती असलेली त्यांच्या आजोबांची दोन बाडं असतात. सायली त्यांचा मराठीत अनुवाद करून देते. पुस्तक छापलं जातं. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. वेगळ्या दिशेने झेप घेतलेल्या सायलीचं कौतुक होतं. कथेचा शेवट असा- भारतीय ज्ञान, बुद्धी, यांना साता समुद्रापार नेणारी ही झेप’ नव्या पिढीचा आदर्श ठरणार होती.

‘बळी’ ही ‘यल्ली ’ या जोगतीणीची व्यथा मांडणारी कथा. ती म्हणते, नशिबानं मलाच यल्लम्मा बनीवली आणि दारोदर फिरीवली. तिचा विचार करणारा, तिला चिखलातून बाहेर काढू इच्छिणारा, तसं केलं नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं म्हणणारा एक स्वप्नाळू तरुण तिच्याशी लग्न करतो. एकदा रस्त्यावरील  एका गाडीच्या अपघातात तो मरतो. शिक्षण नसलेल्या यल्लीला जगण्यासाठी पुन्हा जोगतीणच व्हावं लागत पण आपण मूल जन्माला घालायचा नाही , असं पक्कं ठरवते. कथेचा शेवट असा- ‘यल्लूचे डोळे गळत होते. त्या अश्रूतून मातृत्वाची बांधून ठेवलेली ओल वहात होती. कुणाचा बळी न देण्याचा निर्धारही. ती म्हणते, माझ्या आयुष्याचं बुकच वेगळं हाय. त्यात फाकस्त बकर्‍यावाणी बळीची गोष्ट.’ सजलेली –धजलेली यल्लम्मा  जग डोक्यावर घेऊन  निघाली. तिचाही बळी घेतला होता, समाजातील दुष्ट रुढींनी. खरं तर त्या अश्रूतून बांधून ……. न देण्याचा निर्धारही … इथेच कथा संपायला हवी होती. पण लेखिकेला स्वतंत्रपणे भाष्य करण्याचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या अनेक कथांमधून दिसते.

दोन ज्योती, घर, कलंक,पुरस्कार या कथा वृद्धाश्रमाच्या पार्श्वभूमीवरच्या. ‘दोन ज्योती’मधल्या सुमतीबाई, ‘घर’मधल्या कुसुमताई, कलंक’ मधल्या मीनाताई सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी आश्रमात आलेल्या. त्या तिथे केवळ रूळल्याच नाहीत, तर रमल्याही.त्यांचा आत्मसन्मान तिथे त्यांना मिळालेला. कुसुमताई सुनेच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या. त्या म्हणतात, ‘नवरा गेल्यापासून आजपर्यंत घरात आश्रमासारखी राहिले, आता या आश्रमात घरासारखी रहाणार आहे.’ मीनाताईंच्या मुलाने हाती लागलेल्या बनावटी पत्रांच्या आधारे, त्याची शहानिशा न करता आईवर लावलेल्या बाहेरख्यालीपणाच्या आरोपाने व्यथित होऊन त्या आश्रमात आल्या आहेत. शेवटी मुलाला आपली चूक कळते. तो त्यांना घरी न्यायला येतो, पण त्या ‘तुझ्या पश्चात्तापाने माझा कलंक पुसला, तरी मनाची जखम ओली आहे.’असा म्हणत पुन्हा घरी जायला नकार देतात. आत्मकेंद्रित, अहंमन्य, पैशाच्या मागे लागलेले, बायकोला गुलामासारखं वागावणारे वसंतराव. त्यांच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या सुमतीबाई नवरा न्यायला येणार, म्हंटल्यावर धास्तावतात. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका वसंतरावांनाच इथे ठेवून घेऊन हा पेच सोडवण्याचे ठरवतात. त्यावेळी पती-पत्नी यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलतात. भाषण दिल्यासारखं. वाटत रहातं, लेखिकाच त्यांच्या तोंडून बोलतेय. कथासंग्रहात असं वाटायला लावणार्‍या खूप जागा आहेत.  लेखिकेचा अध्यापणाचा पेशा असल्यामुळे कुठल्याही घटना-प्रसंगावर भाष्य करण्याचा लेखिकेला मोह होतो आणि अनेकदा संवाद भाषणात रूपांतरित होतात.

पुस्तकात पाहुणेर, गोफ, नवजीवन, मंगला, माणुसकी इ. आणखीही वाचनीय कथा आहेत. शब्दमर्यादेचा विचार करता, मासिका- साप्ताहिकातून चित्रपट परीक्षणे येतात, त्यात शेवटी म्हंटलेलं आसतं, ‘पुढे काय होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.’ तसंच म्हणावसं वाटत, ‘कथांचा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच आनंद घ्या.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

खूप वेळा मनात येत की काही काही आठवणींचे ऋतू असतात. त्या त्या ऋतूत, दिवसात काही आठवणी ताज्या होतात. याचा अर्थ इतर वेळी काही आठवे नसतात अस नव्हे… पण आठवांचे ऋतू काही औरच!

आत आत मनात घर करून बसलेली आठवे कधी कधी खूप उत्साही अन आनंदी करतात…. कधी हेच दिवस पुन्हा यावेत ही मागणीही करतात!

निसर्गाचे जरी तीनच ऋतू असले तरी माझ्या आठवांचे हजारो ऋतू असतात. ‘शब्दांनी’ बहरणारा नी धुंद करणारा माझ्या आठवणीचा…फक्त माझाच….हक्काचा वसंत ऋतू! अस मी म्हणेन…. मला जास्त भावतो. मग तो बाराही महिने असू शकतो. पण…. अस कस होणार!

कुठेतरी चढ उतार असतोच न….

नको असलेले मळभ झटकून टाकणारा, स्वच्छ धूणारा अन परत निरभ्र होणारा.… मनाचा वर्षा ऋतू !

होय! सगळं हलकं हलकं करणारा तन आणि मन चिंब करणारा …. आठवांचे तरंग .. नवतरंग होऊन मिरवणारा! असे अनेक उपऋतु माझ्या आठवणी जाग्या करतात.

कधी मनोमन लाजवतात! रोमांच अंगी उठवतात!

कधी थरारक आठवेही अंग थरथरून टाकतात… हे असे ऋतू मात्र नको वाटतात, पण त्यातून धडे मिळालेले असतात आणि जीवनाला नवी वाटाही … त्यामुळे नको वाटणारे ऋतू खर तर नकळतच एक नवे आव्हान ठरलेला असतो.

एक अवर्णनीय आनंद आणि समाधान देणारा….डोळे बंद केले तरी सगळं हिरवं हिरवं दाखवणारा..मखमल भासवणारा !शांत करणारा…

गुलाबी थंडीतही शब्दांची ऊब माझे ऋतू देतात , शब्दांची चादर अन गोधडी! एक नवं सृजनाचं, सर्जनशील ….सृजन नेहमीच प्रसवत! आणि मन नवे गाणे गाऊ लागत!… हिरव्या ऋतूच…आठवांच्या ऋतूच!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

24/8/2020

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा. … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,

भक्ती ते कठीण । सुळावरची पोळी   

निवडी तो बळी । विरळाशू

वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.

भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.

देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.

भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले.  असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.

भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.

व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.

‘भक्त’  या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय?  तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला,  तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय?  तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.

देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर?  ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच  निघाला. मग काय!  एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!

मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’.  आता साध्य आहे ‘व्यवहार’!  देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने  जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या  ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….

प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

 (सुश्री शिल्पा मैंदर्गी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू करत आहोत.  धन्यवाद – सम्पादक मंडळ (मराठी))

(हम आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी  के ह्रदय से आभारी हैं। उन्होंने हमारे आग्रह पर अपने जीवन की अब तक की लड़ाई पर विमर्श हम सबके साथ श्रृंखलाबद्ध साझा करना स्वीकार किया है।  आप हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। हम आदरणीया सौ अंजली गोखले जी के भी आभारी हैं। ई-अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग सम्पादक – हेमन्त बावनकर )

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

मी शिल्पा. शिल्पा मैंदर्गी. ई अभिव्यक्तिच्या साहित्यिकांमध्ये मला सामावून घेतल्या बद्दल सर्व प्रथम हेमंत बावनकर सर, सुहास पंडित सर आणि उज्वला तांईचे मनापासून आभार !

मी जन्मतः पूर्ण अंध नाही. साधारण तिसरी पर्यंत मला धूसर दिसत होते. अगदी लहान असताना आजीला शंका आली आणि माझ्या आईबाबांची डोळ्याच्या डॉक्टरांकडे धाव सुरू झाली. डॉक्टरांनी खूप तपासण्या केल्या. खूप स्पेशलिस्टना दाखवले. पण सर्वांचे म्हणणे एकच होते, ते म्हणजे हिची दृष्टी जाणार.

घरी मी दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर मोठी होत होते. बरोबरीने खेळत होते, दंगा करत होते. जेवढे दिसत होते, तेवढ्यावर माझे सगळे सुरु होते. मला गांभीर्य काही नव्हतेच कारण मला काही समजतच नव्हतेना! मला कमी दिसते, तेही मला कळत नव्हते. सगळ्यांचेच असे असते, असेच मला वाटे. आईच्या बोटाला धरुन शाळेत जायची, यायची त्यामुळे माझ्यात काही कमी आहे असे कधी जाणवले नाही.

तिसरीमध्ये गेल्यापासून माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली. आई बाबा खूप धिराने घेत होते. एकाही ऑपरेशनचा उपयोग झाला नाही. जवळ जवळ ८ – १० ऑपरेशन्स झाली पण काही फरक नाही. मात्र शाळा अभ्यास नियमित सुरु होते. माझे बाबा विद्यामंदिर शाळेमध्ये शिकवत होते. माझ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. ते मला खूप गोष्टी सांगत. पाचवी मध्ये गेल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.पहिल्या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी सादर केले आणि आश्चर्य म्हणजे मला पहिल्या नंबर चीढाल मिळाली.

अभ्यास, शाळा, वक्तृत्व स्पर्धा, घरी दंगा, डोळ्याचे इलाज सगळेच सुरु होते. दिसणे अंधूक अंधूक होत पूर्ण बंद झाले होते. पण डोळ्या मधून सतत पाणी येत होते. ते थांबवण्याचे ही ऑपरेशन झाले. ते झाले मद्रासला म्हणजे आत्ताच्या चेनईला. डॉक्टरांनी आई बाबा ना आता डोळ्याच्या बाबतीतले सर्व प्रयत्न थांबवायला सांगितले. नाहीतर विनाकारण मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता होती. आई बाबांनी ते मान्य केले आणि माझा अभ्यास, वक्तृत्व इकडे लक्ष द्यायचे ठरवले.

मला घरी अडगळीत टाकले नाही किंवा तेही हताश झाले नाहीत. मला सतत प्रोत्साहित करत राहिले. घरी मी खेळत होते, भांडत होते. दंगा ही करत होते. हिला दिसत नाही, म्हणून माझे फाजील लाडही केले नाहीत.

ऑपरेशन्स झाल्यामुळे माझे डोळे म्हणजे नुसत्या पांढऱ्या खोबण्या झाल्या होत्या. दुसऱ्यांना भयावह दिसू नये म्हणून ऑपरेशन करून बुब्बुळ बसवले. तेही एकाच डोळ्याला बसले. डॉक्टरांनीच मग अथक् प्रयत्नांनी मला कृत्रिम डोळा बनवून दिला. जो मी अजूनही वापरते, काढते, घालते. अर्थात मला त्याचा काहीच उपयोग नाही. माझे डोळे फवत समोरच्या साठी आहेत. त्यांना भिती वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून. थोडक्यात काय माझे डोळे अर्थात कृत्रिम तुमच्या साठी’, माझ्यासाठी नाहीत बरं !

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भुलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ भूलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

भूलाबाई हे पार्वतीचे भिल्ल म्हणजे आदिवासी स्त्री चे रुप.  आपण अनेक कथांमध्ये पार्वतीने शंकरासाठी केलेले तप ऐकले आहे पण इथे शंकराच्या रुपातले भूलोजी राणे पार्वतीचा अनुनय करताना दिसतात. त्यांची  पार्वती राणी रुसून बसते मग ते शंकर तिला स्वतः न्यायला जातात.  तिला झोपण्यासाठी सोन्याचा पलंग आणि मोत्याची मच्छरदाणी असते. तिच्या डोहाळ्यासाठी नाना रंगाच्या भरजरी चोळ्या शिवून त्यावर अत्तरे शिंपलेली असतात.  डोहाळे पुरवण्यासाठी सासू, सासरे, दिर जावा आणि नणंदा धावपळ करत असतात. एवढ्याने काय होणार म्हणून रुसलेल्या पार्वतीकडे शंकर महादेवाची रदबदली करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून दस्तुर खुद्द खंडोबा, भैरोबा, सूर्य, चंद्र, बृहस्पती असे देव येतात सर्वात शेवटी गणेश आणि कार्तिकेय ही बाळे आल्यावर ती आपला रुसवा एकदाचा सोडते.

हे सगळं त्या भूलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.  या काळात ती शंकरदेवांवर पण यथेच्छ तोंडसुख घेते.. त्याने घडवलेला दागिना कसा धड नाही,  त्याने आणलेले लुगडे कसे पोतेरे, फूले वेचून आणली तीही शिळी आणि बिनवासाची.. त्याला संसाराची कशी आच नाही… सतत डमरू वाजवणे किंवा गणांबरोबर नाचणे आणि तप करणे,  याशिवाय त्याला कसे काहीच येत नाही… अशा प्रकारची वैताग व्यक्त करणारीही काही गाणी आहेत.

शेवटी बिचारा शंकर विष्णू देवांकडून प्रपंचाची कौशल्ये शिकतो तेव्हा कुठे ही भूलाबाई त्याच्याबरोबर जायला तयार होते. भूलाबाई स्वयंप्रज्ञ आहे,  तिला काय हवे ते तिला स्पष्टपणे सांगता येते.  ती अन्याय सहन करत नाही. प्रसंगी वांड नव-याला धडा शिकविण्यासाठी माहेरी किंवा माहेरी भावजया बोलल्या तर सख्यांबरोबर किंवा थोडे दिवस एकटीने फिरून यायचीही तिची तयारी आहे.

मुलींना आत्मसन्मानाची कल्पना यावी आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी निर्भिडपणे वागावे यासाठीच कदाचित पहिली मुलगी असेल त्या घरी प्रामुख्याने भूलाबाई  बसवली जाते.  काही जणांकडे भूलाबाई घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त बसवतात. तर काही जणांकडे भाद्रपद ते शरद पौर्णिमा अशी महिनाभर भूलाबाई बसलेली असते. भूलाबाई म्हणजे खरे तर ‘शंकर पार्वतीची मूर्ती’ घराच्या दर्शनी भागातल्या कोनाड्यात बसवतात.  या काळात रोज तिला संध्याकाळी हळदी कुंकू आणि अक्षत लावून पूजा करतात.  त्यावेळी  बहुधा त्या दिवसात मिळणाऱ्या किंवा गुलबक्षी, चमेली किंवा जाईच्या फूलांचे बारीक मोरपंखीच्या पानांसकट बनवलेल्या माळा रोज पूजेच्या वेळी घालतात. या माळांमध्ये फूले,  पाने आणि बिया गुंफाव्याच लागतात. गोंड या आदिवासी जमातीत मात्र सगळ्या गावातल्या मुलींची एकच भूलाबाई बसवतात आणि रोज सगळ्याजणी  तिच्यासाठी रानफूलांच्या माळा घेऊन येतात.  त्यांची भूलाबाई म्हणजे मातीची पार्वतीची मूर्ती असते.

भुलाबाईच्या काळात मुली घरोघरी जाऊन टाळ्या वाजवून गाणी म्हणतात. खिरापतही चढती असते म्हणजे पहिल्या दिवशी एक,  दुसर्‍या दिवशी दोन अशा प्रकारच्या..आणि अर्थातच ओळखायच्याही असतात.

शेवटच्या म्हणजे बोळवणाच्या दिवशी मात्र तीस आणि तीन अशा खिरापती करायची पध्दत आहे.  एवढ्या खिरापती एकट्याने करण्याच्या ऐवजी सर्व मुली मिळूनही त्या भुलाबाईची सांगता करतात. जिच्या घरी भूलाबाई बसवतात तिला पांढरे किंवा निळे कपडे घेतात आणि मोत्याचा एखादा दागिनाही करतात.  खिरापतीमध्येही पांढ-या पदार्थांचे  प्राबल्य अधिक असते.

भूलाबाई देवी असली तरी तिला मानवी स्त्री च्या भावभावना आहेत. तिला नव-याचा राग येतो,  माहेरच्या अगदी शेणगोठ्यावरही तिचे प्रेम असते, तिच्या सख्या,  तिची मुले,  भाऊ बहिणी,  आई वडील…सासर माहेर हेच तिचे विश्व… पण त्यातही तिला तिचे स्वतःचे स्थान असले पाहिजे ही जाणीव आहे.. त्यामुळेच भूलाबाई  आपल्याला जवळची वाटते आणि खरं सांगायचं तर ईश्वराचे हे स्त्री- रूप फारच विलोभनीय आहे…

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print