मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

माझ्या मैत्रिणीला तिच्या वैभवसंपन्न,विद्याविभूषित,अशा माहेरच्या आठवणींचे पुस्तक करायचे होते त्याचे पुनर्लेखन करताना, त्यात १९६२ च्या चीन युद्धात वीरगती मिळालेल्या तिच्या भावाची हकीकत आहे.

पुण्याला लष्कर भागात, दक्षिण कमांडच्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचा स्मृतीस्तंभ उभारला आहे. एका संध्याकाळी मी व माझी मुलगी हा स्तंभ बघायला गेलो. थोडासा अंधारच झाला होता, परावर्तीत प्रकाश दिवे तो परिसर उजळून टाकत होते. विस्तीर्ण आवारचे सुशोभित फाटक बंद होते. बाहेर सुगंधित बुचाच्या फुलांचा सडा पडलेला होता तेवढ्यात एका लष्करी जवानाने फाटक उघडले. आम्ही स्तंभाच्या दिशेने मार्गक्रमित झालो तेथील शांततेमुळे वातावरण उगाचच गंभीर वाटत होते. स्तम्भाशी जाऊन आम्ही मनोमन नमस्कार केला. स्तंभाच्या मागील बाजूस संगमरवरी फरश्यांवर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे दिमाखाने झळकत होती. आम्ही डाव्या बाजुने उतरलो व नावे वाचण्यास सुरुवात केली. मनात विलक्षण भावना गोळा झाल्या होत्या. एवढ्या नावात अपेक्षित नाव कस मिळणार ? भ्रमणध्वनीचा प्रकाश बघता बघता एका नावावर स्थिरावला, ‘व्ही. एन. आठल्ये’. दूरभाष संचावर टंकलिखित केले, “IC  12635 21 LtAthaley VN.” !

विष्णू भावाच्या नावामागील क्रमांक लष्कराच्या रेकॉर्ड मधील होता. स्तंभाला प्रदक्षिणा घालून शेजारच्या पांढऱ्या शुभ्र फ्लोरीबंडा जातीच्या गुलाबपुष्पातील एक सुंदर पुष्प तोडून घेतले सद्गदित अंत:करणाने ती पुष्पमय श्रद्धांजली आपल्या विष्णूभाऊबरोबर इतर वीरजवानांना अर्पण केली. नकळत डोळ्यात अश्रू आले.

इतक्या फरश्यावर असलेल्या अनेक नावात नकळत अपेक्षित नावाच्या फरशीसमोर पोहोचले हा एक ‘विलक्षण योगायोगच नव्हे का’ !

त्या घरातील व्यक्तींशी नकळत माझा पूर्वीचा ‘ऋणानुबंध’ असावा असं मला जाणवलं.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक उनाड दिवस ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ एक उनाड दिवस ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

एका रम्य पहाटे जाग आली, हो पहाट रम्यच होती पण मन मात्र अस्वस्थ होते, बेचैन होते, उठून काही करावे असे मुळीच वाटत नव्हते.

बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकु येत होता . झाडावर बसुन ते ऐटीत झोके घेत होते. आपल्याच विश्वात मग्न होते जस काही एक उनाड दिवस साजरा करत आहेत. अगदी हेवाच वाटला मला त्यांचा, अस वाटले आपल्यालाही त्यांच्यात सामील होता आले असते तर?

इकडे माझ्या मनात सुरू होते आता उठून न्याहरी ला काय करायचे ह्याचे कॅलक्युलेशन. पुढे काय उठले तशीच मनात नसतानाही. खर तर अजून थोडं पडून रहायचे होते मला, शांत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत.

पण उठले फ्रीझ उघडला तर काय त्यातुन पडवळ, कारली डोकावत होती जणू विचारत होती जेवायला काय करणार आहे. तेव्हा परत चरफड झाली मनाची आणि आता मात्र पक्क ठरवले खूप झाले आता आज मनाचेच ऐकायचे. आज साजरा करायचाच एक उनाड दिवस.

छान गरम शॉवर घेतला, खूप दिवसानी चक्क जिन्स चढवली आणि स्वतः च्याच धुंदीत गाणी गुणगुणत गाडी बाहेर काढली.

बाहेर पडले ते थेट रम्य उद्यान गाठले. रम्य सूर्यकिरण किरण अंगावर घेतले, फुलांवरुन प्रेमाने हात फिरवला, फुलपाखरू धरायचा प्रयत्न केला. चक्क झोक्यावर बसुन उंच झोके घेतले. छान गप्पा मारल्या पक्ष्यांशी, गुणगुणली काही गाणी आणि तेवढ्यात आठवण झाली भुकेची. मग छान गाडी वळवली माझ्या आवडत्या रेस्टॉरंट कडे. ऐटीत ऑर्डर केली मसाला डोसा आणि दही वड्याची. वरती मस्त कोल्डकॉफी घेतली आणि मन प्रसन्न करून पुढच्या प्रवासाला निघाले. घड्याळात पाहिले दहा वाजले होते म्हणले चला आता विंडो शॉपिंग करावे. माझ्या आवडत्या मल्टिप्लेक्स मधे गेले छान विंडो शॉपिंग केले. आणि चक्क एक उनाड दिवस हा पिक्चर पाहिला. छान पॉप कॉर्न खाल्ले, पिझा ही घेतला होता. पुढे काय करायचे ते पिक्चर पाहतानाच ठरवले होते, तिथून बाहेर पडले ते थेट पोहोचले माझ्या बालसखी कडे. खूप दिवस नाही वर्षे झाली होती तिला भेटून. तिच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा आज पूर्ण होणार होती. छान टवटवीत फुलांचा गुच्छ घेतला होता तिच्या साठी आणि पोचले की तिच्या दारात. मला पाहून दोघींचेही नेत्र वाहू लागले आनंदानी. घट्ट मिठी मारली चक्क दारातच आणि मन तृप्त होईपर्यंत गप्पा मारल्या.

गप्पांच्या ओघात कधी संध्याकाळ झाली हेच कळले नाही. तिथून फुलपाखराच्या मनानी बाहेर पडले ते थेट एका रम्य टेकडीवर जाऊन पोहोचले. रम्य, शांत, सुंदर निसर्गाने भरलेल्या अश्या ठिकाणी. शांत बसुन राहिले तिथे बराच वेळ मनाला शांती लाभे पर्यंत.

मैत्रिणीशी मारलेल्या गप्पांमुळे आणि ह्या रम्य निसर्गामुळे मन तृप्त झाले होते.

ह्याच प्रसन्न मनाने गाणी गुणगुणत गाडी घराच्या दिशेला वळवतच होती की तेवढ्यात हाक ऐकु आली अग उठते आहेस ना, जायचे आहे ना आज ऑफिसला !!! ब्रेक फास्ट नाही का बनवायचा ? आणि दचकून जागी झाले की हो म्हणजे हे सगळे स्वप्नच होते तर…

पण आज ह्या क्षणी एक निश्चयच करून उठले की हे पडलेले स्वप्न सत्यात आणायचेच तेही लवकरच

काय हे सारे तुम्हाला पण वाटत असेल नाही का?

तर मग होऊन जाऊदे,

असाच एक उनाड दिवस

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आमची सामूहिक कविता ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ क्षण सृजनाचा ☆ आमची सामूहिक कविता ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

माझ्या भाच्याला शाळेत सैनिकांना पत्र लिहून पाठवायचे होते. त्या पत्रातून त्यांना उत्तेजन देण्यासाठी कविता लिहून हवी होती. माझ्या बहीणीचा तसा आम्हाला फोनवर मेसेज आला. आम्ही सर्वांनी तो वाचला.आणि आमच्या डोक्यात विचार सुरु झाला. कशी कविता लिहावी ते नीट सुचत नव्हते. आमच्या ग्रुपमध्ये मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही नेहमीच आमच्या कविता लिहून पाठवत असू.पण त्या दिवशी आम्हाला काही करून कविता सुचत नव्हती. तेव्हा वाट पाहून शेवटी माझ्या दुसऱ्या बहीणीने कविता लिहून पाठवली आणि मग ती वाचल्यावर सर्वांना सुच लागली. आम्ही त्या माझ्या बहीणीने लिहलेल्या पहिल्या तीन कडव्याना धरूनच पुढील कडवी लिहीली. आणि आमची सामुहिक कविता तयार झाली.  कशी ते पहा.

भारत भू च्या सीमेवरती

सदैव रक्षणा तत्पर असती

नाही विसावा ना विश्रांती

सलाम माझा त्या वीराप्रती।।१।।

आले ते घरदार सोडुनी

मायेचे ते पाश तोडूनी

देशसेवेचे व्रत घेऊनी

सलाम माझा त्या वीराप्रती।।२।।

आम्ही इथे सुखाने राहतो

मौजमजा अन् सणात रमतो

आम्हासाठी प्राण आर्पिती

सलाम माझा त्या वीराप्रती।।३।।

धन्य त्यांची देशभक्ती

स्वार्थापलीकडे जनहित साधती

तिरंग्यात ऐसे लपेटून जाती

सलाम माझा त्या वीराप्रती।।४।।

अलौकीक शौर्य छाती निधडी

देहाची करुनी कुरवंडी

राष्ट्रवेदीवर अर्पुनी जाती

सलाम माझा त्या वीराप्रती।।५।।

धेय्य एकच डोळ्यापुढती

शस्त्र सदा घेऊन हाती

अखंड ठेवू मात्रूभू जगती

सलाम माझा त्या वीराप्रती।।६।।

या कवितेत पहिली तीन कडवी सौ. स्मिता ठाकुरदेसाई,चौथ कडव तिची मुलगी कु. सायली, पाचव कडव माझा चुलतभाऊ श्री. अतुल नवरे,आणि सहाव कडव मी म्हणजे अनिता खाडीलकर. अशी सहा कडव्यांची कविता आम्ही चौघांनी लिहीली.

याशिवाय माझ्या चुलतबहीणीने

‘नाही स्वतःची चिंता

उभे सैनिक सीमेवर

देशाचे रक्षण करत

झेलीत गोळ्या छातीवर।।१।।

आहात तुम्ही म्हणून

जगतो आम्ही आरामात

न गुरफटता नात्यात

चिंता करता देशाची।।२।।

नाही जुमानत कधी

उन पाऊस वारा

तुमच्यामुळेच आहे आज

सुरक्षित भारत सारा।।३।।’

 सौ.अनुश्री जाहगीरदार. हिने लिहिली.

तर  माझ्या भाच्चीनं

‘देशरक्षणापुढे इतर सर्व गौण

ठेवूनिया त्यांच्या त्यागाची जाण

घेऊनीया भूमातेची आण

प्रयत्ने चुकवू त्यांचे ऋण…

ही चारोळी कु.सायली ठाकुरदेसाई. हिने लिहिली.

अशा प्रकारे कधीच कविता न लिहणाऱ्या माणसांनी कविता लिहल्या. आणि पत्र पुर्ण करून पाठवले.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग

☆ मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग ☆

पंडित संजीव अभ्यंकर

वाढदिवस / जन्म : ५ ऑक्टोबर १९६९

त्यांना घरातच गुरु हजर होता. त्यांची आई शोभा अभ्यंकर यांनी त्यांना प्राथमिक  सांगीतिक  धडे दिले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांनी  संजीव अभ्यंकर याना  मार्गदर्शन केले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची दिनचर्या पूर्णत: बदलली.

गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरातील वेगळा दिनक्रम सुरु झाला. आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी गुरुजींची   शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.

गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू असताना,पं. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती झाली . अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणार्‍या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.

देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सव आणि परदेशातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या भागांतही  पं.संजीव अभ्यंकरांची गायकी  पोचली आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पार्श्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतांतही त्यांनी स्वतःची छाप  उमटवली. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या माध्यमातून  देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्र शासनाने समर्थ रामदास स्वामी लिखित “दासबोध “पं.संजीव अभ्यंकरांच्या कडून गाऊन घेतला आहे व तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व तो विनाशुल्क डाउन लोड करता येतो.

‘माचिस’, ‘निदान’, ‘दिल पे मत ले यार’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘गॉडमदर’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्‍न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.ऑल इंडिया रेडिओ ने १९९० साली त्यांना उत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार दिला होता.

थोड्या  दिवसांपूर्वी आयॊध्येला राममंदिराच्या उभारणीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि जगभरातली सर्वाना ध्यान लागलें रामाचें त्या प्रित्यर्थ पंडित संजीवजीं नी गायलेला अभंग

ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें

राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी

रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी

तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले

कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी

रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं

यूट्यूब लिंक >>>  ध्यान लागलें रामाचें

पंडित संजीव अभ्यंकरांना  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

 

© श्री प्रसाद जोग

सांगली.

९४२२०४११५०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रांगोळी ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ रांगोळी ☆ सौ.दीपा पुजारी 

आजकाल सकाळी लवकर ऊठून सडासंमार्जन करणं कालबाह्य झालय. माझ्या मनात मात्र माझी लहानपणीची सकाळ अजूनही रोज भूपाळी गाते. सकाळी जाग यायची तिच मुळी आकाशवाणीच्या संगीतानं. दात घासण्यासाठी मागच्या बाजूला असलेल्या फरशी कडं जावं लागे. तिथं भला मोठा तांब्याचा बंब पेटवलेला असे. तो एक छानशी ऊब देई. मला घाई असे ती घराच्या पुढील दारात जाण्याची. आई किंवा काकू दारात रांगोळी काढत असत. मी गडबडीनं पाटी-पेन्सिल घेऊन धावे. रांगोळी चे ठिपके पाटीवर काढून ते जोडण्या चा प्रयत्न करे.

भल्या सकाळी रांगोळीच्या निमित्तानं घरच्या बायकांना मोकळेपणा मिळे.अंगण स्वच्छ करताना व्यायाम होई तो वेगळाच. घराचा एंट्रन्स स्वच्छ सुंदर प्रसन्न साजिरा दिसे. आणि आपला कलाविष्कार दाखवायला गृहिणीला, मुलींना संधी मिळे.

सडारांगोळी आज कालबाह्य झाली आहे. तरीही काही विशिष्ट प्रसंगी ती काढली जाते. पारंपरिक रांगोळी कमी प्रमाणात दिसून येत असली तरी अजूनही तीची नजाकत सांभाळून ठेवलेली दिसते. रांगोळी मोठी, डौलदार, रंगीबेरंगी  झाली. फक्त घराच्या दारासमोर, देवघरापुरती ती मर्यादीत राहिली नाही. ही कला स्त्री पुरूष सगळ्यांनीच आत्मसात केलेली दिसते. तिची शान वाढलेली दिसते. तरीही अंगणात सडासंमार्जन करुन दारासमोर सुबक साधी अनेक ठिपके जोडून काढलेली रांगोळी जास्त भावते. मला तरी ते गृहिणीचं घरातल्या सर्व लहानमोठ्या माणसांना जोडण्याचं कसबच सांगतेय असं वाटतं. घरातील वेगवेगळया विचारांच्या,स्वभावाच्या आणि वयाच्या घटकांना एकत्र सांधून ठेवण्याची तारेवरची कसरत तिलाच करावी लागते.या सगळ्या घटकांना घट्ट बांधायला जाडजूड दोर वापरुन नाही हो चालत. नाजूक, मनभावन भावबंधांची गुंफण विणून अतिशय कौशल्यानं ही वीण वीणावी लागते. अगदी रांगोळीच्या बारीक रेघे सारखीच असते ही भावबंधांची गुंफण! ठिपके जोडण्यात एव्हढीशी चूक  रांगोळीचा तोल ढळू द्यायला पुरेशी असे. नाती टिकवणं, त्यात मोकळेपणा निर्माण करणं आणि ती बळकट करणं हे सगळं लिलया करण्यासाठी रांगोळीतील सौंदर्य समजलं पाहिजे. ठिपके फार जवळ जवळ काढून ही नाही चालणार. आणि लांबलांब ही मांडून नाही चालणार. रेघांच्या जाडी इतकच ठिपक्यांचे अंतरही महत्त्वाचं. ठिपके खूप जवळ आले तर अपघात होण्याची भिती. फारच लांब गेले तर दोर तुटण्याची भिती!! म्हणूनच रांगोळी मला Hygiene, Space, Relationship, Creativity अशा अनेक ठिपक्यांना सांधणारी संस्कृतीचा वारसा वाटते.केवळ भारतातच दिसणार्‍या या परंपरेचा मला अभिमान वाटतो.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्नायूबळ ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ स्नायूबळ ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरं तर शरीरसौष्ठव आणि माझा कधीकाळी संबंध येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्य कारण म्हणजे आळस! 🙂 सौष्ठव मिळवण्यासाठी जी काही मेहनत करावी लागली असती त्यास मी कधीच तत्वत: तयार झालो नसतो. दुसर्‍या कुठल्यातरी ठिकाणी आपण गाडीने जाऊन मौल्यवान वेळ घालवायचा, वजने उचलायची, घाम गाळायचा आणि वर त्यासाठी पैसेही मोजायचे!? कुणी सांगितलाय नसता उद्योग? त्यापेक्षा मी घरी व्यायाम करेन, बागेत खुरपणीचे काम करेन, शेतातही कुदळ-फावडे घेऊन कष्टायला जाईन, अगदीच लागले तर घरातही कष्टाची कामे करेन, केरवारा काढणे, भांडी घासणे, कपडे धुवेन, इस्त्री करेन इ.इ. म्हणजे असे नाना पर्याय माझ्यासमोर असतील, एवढेच मला म्हणायचे होते. 🙂 पण ह्याचा अर्थ मी व्यायामशाळेत आत्तापर्यंत कधीच गेलेलो नाही असा मात्र नव्हे. महाराष्ट्र मंडळाच्या व्यायामशाळेत कॉलेजला असताना जात असे. पण तेही कॉलेजच्या मैदानावर सकाळीसकाळी उठून NCC ला जाणे टाळता यावे ह्यासाठी. 🙂

शरीरसौष्ठव हा खेळ म्हणून असतो हे प्रेमचंद डोग्रा, अर्नॉल्ड श्वार्झेनेगर वगैरें बलिष्ठांचे फोटो आणि पेपरातील बातम्या पाहून माहीत होते. पण हा खेळला जातो कसा हे मला माहीत नव्हते. कुस्ती मध्ये कसे दुसर्‍याला पाडून, उरावर बसून चीतपट करायचे असते. वजन उचलण्याच्या स्पर्धेत प्रत्यक्ष वजन उचलावी लागतात. तसे शरीरसौष्ठव स्पर्धेत नक्की प्रावीण्य मिळवतात तरी कसे? स्पर्धा कशी होते? आणि स्पर्धकांना गुण कुठल्या निकषावर दिले जातात? असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत होते. ह्यातील काही उत्तरे मिळायची संधी परवा मात्र अगदी घरपोच मिळाली. निमित्त होते ते जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ज्या १२ फ़ेब्रुवारीस लोकमान्यनगर जॉगिंग पार्कवर भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ’मिस्टर एशिया’ असलेला, महेंद्र चव्हाण! ह्या गुणी खेळाडूविषयी मी पुढे सांगेन. स्पर्धेचा मोठा जाहिरात फ़लक माझ्या घरासमोरील चौकातच लक्षवेधी ठिकाणी लावलेला असल्याने चुकवणे म्हटले तरी शक्य नव्हते. काहीही झाले तरी स्पर्धा बघायचीच, असे मनाशी ठरवून टाकले.

त्या दिवशी ऑफ़िसमधून निघून घरी पोहोचायला उशीर झाला आणि रात्रीचे ९:३० वाजले. तरी पण लॅपटॉपचे दप्तर घरी टाकून लगेच पार्क मध्ये पोहोचलो. मैदानातील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. एक किंवा दोनच महिला उत्सुकतेपोटी म्हणून थांबल्या होत्या. सर्व तरणीबांड पोरे (माझ्यासारखी 🙂 ) गर्दी करून आली होती. टाळ्या आणि शिट्यांनी मैदान दणाणून उठले होते. मला कळेना की स्पर्धा चालू आहे का लावणी नृत्य का मिसेस पुणेची स्पर्धा? तसंही एका परीने ही पुरुषांची सौन्दर्यस्पर्धाच होती म्हणा.

८० किलो वजनगटाचे ५-६ स्पर्धक एका रांगेत येऊन उभे होते. परीक्षकाने पुकारा केला की सर्वजण ती पोज देत होते. अशा एकापाठोपाथ सहा पोजेस द्यायच्या असतात. सरते शेवटी एक मिनिटाची संगीत फेरी असते. ह्यामध्ये जोषपूर्ण संगीताच्या तालावर प्रत्येकाने आपापल्या लाडक्या पोजेस द्यायच्या, असे साधारण स्पर्धेचे स्वरूप होते. समोर जजेस बसले होते व गुण लिहीत होते. नुसते शरीर पिळदार असून उपयोग नसतो तर आत्मविश्वासाने स्नायूंचे दर्शन घडवणे ह्याला जास्त गुण मिळत होते. शिवाय तुमच्या चेहर्‍यावरील हावभाव सुध्दा महत्वाचे असतात. स्नायु उठावदार दिसावेत ह्यासाठी संपूर्ण अंगाला एक विशिष्ट प्रकारचे तेल चोपडण्यात येते. पुण्या आणि पुण्याच्या बाहेरील विविध व्यायामशाळेतून स्पर्धक आले होते. एक जण तर व्यवसायाने डॉक्टर होता!

स्पर्धेसाठी सर्व राजकीय पक्षांचे आजीमाजी नेतेही निमंत्रित होते.विविध वयोगटातील स्पर्धकांना करंडक, प्रशस्तीपत्रके, रोख बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होता तो म्हणजे मिस्टर आशिया असलेला महेंद्र चव्हाण. मजबूत गर्दन, गोलाकार खांदे, बायसेप्स, ट्रायसेप्स, एखाद्या नारळाप्रमाणे फुगलेली दंडाची बेटकुळी, व्ही आकाराची भरदार छाती, सहा पॅक मोजून घ्यावेत असे पोटाचे स्नायू, लोखंडी मांडया, फुगीर पोटर्‍या, सह्याद्रीच्या डोंगररांगांप्रमाणे पसरलेले पाठीचे घट्ट स्नायू म्हणजे एखाद्या शिल्पकृतीप्रमाणे शरीरयष्टी कमावलेला हा योध्दा इतक्य़ा सहजपणे पोजेस देत होता की प्रेक्षक बेभानपणे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले. शरीरावर इंचच काय एक सेंटिमीटरही दिसत नव्हता जो स्नायू आणि शिरांनी तटतटलेला नव्हता. बाहुबलीच नव्हे तर हा जिवंत ’स्नायुबली’च आमच्या डोळ्यांसमोर उभा होता. सगळ्यात शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राज्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापटांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. भाषणात गिरीशभाऊंनी महेंद्र चव्हाणचे तोंडभरून कौतुक तर केलेच वर कौतुक म्हणून त्याला रोख पारितोषिकही जाहीर केले. त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगितली ज्यामुळे सर्व उपस्थितांचे डोळे खाडकन उघडले. माझ्या दृष्टीने तर तो समारंभाचा सर्वात महत्वाचा भाग ठरला. “महेंद्रची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो लहानपणी फुटपाथवर झोपत होता. वडापावची गाडी चालवत त्याने दिवस काढले आहेत. अशाही विपरीत परिस्थितीत त्याने व्यायाम आणि शरीरसौष्ठवाचा ध्यास सोडला नाही आणि आज तो ’झिरो’चा ’हिरो’ म्हणून तुमच्या समोर उभा आहे”, हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले.

महेंद्रनेही छोटे भाषण केले आणि सांगितले की “साहेब मला नेहमीच सपोर्ट करीत आले आहेत. त्यांनी सागितल्याप्रमाणे मी पर्वती पायथ्याशी असलेल्या जनता वसाहतीत वाढलो आणि मला त्यावेळेपासून ओळखणारे काही लोक आज प्रेक्षकांत बसलेले दिसत आहेत. आजही ते मला बघायला आलेले पाहून आनंद होत आहे.” त्याच्या ह्या विनम्र स्वभावावर सर्वांनी टाळ्यांचा जोरदार कडकडात केला. “मी आत्तापर्यंत २०३ स्पर्धा मारल्या आहेत. थंड देशात तुम्हाला आजारी पडण्याचा सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे खूप सावध रहावे लागते. ४० देशांचे स्पर्धक आलेले असतानाही मी सुवर्णपदक जिंकले आणि त्यावेळेस भारताचे राष्ट्रगीत ऐकताना मला माझे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.” असे ऐकल्यावर पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट आणि “भारतमाता की जय!”, “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष झाला.

“कमळ हे देखील शेवटी चिखलातच उगवते, हे खरे!” ह्या विचारातच जो तो आपापल्या घरी गेला.

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रसन्नतेची प्रचिती ☆ श्रीशैल चौगुले

☆ मनमंजुषेतून ?प्रसन्नतेची प्रचिती? श्रीशैल चौगुले☆

आपण जीवन जगत असताना आपल्या देहाशी निगडीत आप तेज, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वाचा आत्मप्राणाशी सबंध येत असतो हे आपणा सर्वांना माहित आहे.

पण मन म्हणून जी एक आंतरीक भावनेशी क्रीयाशील अदृश्य ज्ञानस्पर्शाची शक्ती असते. हे मन चैतन्य प्रवृत्ती व विवेकजागृतीस चालना देत असते. म्हणून अध्यात्म गीताग्रंथातही भगवंताने मनाचे सामर्थ्य आपला शिष्य अर्जुनास सुंदर पध्दतीने वर्णन करुन सांगितले आहे.

‘मन करा रे प्रसन्न!’ अशा ओळी जेंव्हा मनालाच भावतात तेंव्हा सत्यप्रचिती येत असते. त्यास प्रसन्न अशी व्याख्या देता येईल.

एखाद्या सजीव-निर्जीव वस्तुवरील भावरुपी श्रध्दा-निष्ठा असलेस ती प्रत्यक्ष अपेक्षापूर्तीत ऊतरते तेंव्हा मनास आत्मप्रचिती भावते.

जसे संतांना पांडुरंग प्रसन्न, मिरेस श्रीकृष्ण, तुलसीदास, नरहरीस भगवान प्रसन्न तसे.

पण विस्मयचकीत होणेचे नाही. कारण इथे अनुभव माझ्या सामान्य निष्ठेचा एका महान व्यक्ती प्रसन्न होणेसी आहे.  ना मी पामर, ना ते भगवंत.

तसा माझा बाहेरचा प्रवास अत्यंत कमी. त्यात मला अधिक समरसतेची ऊत्सुकताही नसते. पण ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील वातावारणाशी जुळवून घेणेची निश्चीतच प्रवृत्ती स्वभाव माझेजवळ आहे.

सासरेंनी मुंबईप्रयाणाची एका शब्दाने विचारणा करावी.आणि एका आपल्या घरच्या व्यक्तीसमवेतची ही संधी यावी याव्यतीरिक्त दुसरे भाग्य कोणते नसावे.झाले,सर्व माझ्या तयारीने सासरेसमवेत रात्री८-००च्या रेल्वेने मुंबई प्रवासास रवाना झालो.रात्रभर आमचे समोरच्या बैठकीवर असलेले दोन वकीलमित्रांशी वैचारीक गप्पा मारणेत कशी पहाट झाली हे कळले नाही.मात्र वाद-विवादात नक्कीच मला शिकायला काही मिळाले. ते ही नवोदीत प्रँक्टीस वकील मुंबई हाय कोर्टात निघालेले बहाद्दर आणि मला विचारवादाशी छेडछाड करणेची खोड सवय अर्थातच काही नव्याने ज्ञान प्राप्त करणेचा हेतू.

असो.अगदी साडे-पाचचे सुमारास व्हि. टी. स ऊतरुन साखर संघाचे निवास स्थानी स्नान वगैरे आटोपते झालो.सासरेंचै सर्व राजकीय नेत्याशी जवळीक असले तरी. मा. कै. विलासराव देशमुखजी त्यांचे खास मित्र व तेच संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या फोनमुळे पंधरा मिनीटे प्रतिक्क्षेत गेलेनंतर मुख्य मुंबईत म्हणजे मुंबई पोलीस मुख्यालय,नरिमन पॉंईंट, मरीन लाईन्स, तिथूनच दिसणारे, हॉटेल अँम्बँसिडर, समुद्राच्या बीचवरील मलबार हिल  सारे पाहून बरोबर सकाळी साडे नऊचे सुमारास चहा घेणेकरीता स्टेटस् हॉटेलवर चहा नाष्टा सेंटरवर पोहोचते झालो. हॉटेल दहा चे सुमारास चालू झाले. तोपर्यंत मी वृत्तपत्राची पाने चाळीत तेथील वृक्षविसावा पार्यावर बैठक मारुन थांबलो. तोपर्यंत सासरे,मेहुणेसोबत नाष्टा सेवन करीतच चाळत असलेले वृत्तपत्राचे शेवटचे पानांवरील क्रीकेटचे विशेष वृत्त पहात पहात महान खेळाडू सचिन तेंडूलकर यांचे दहा हजार पूर्ण झालेचे विक्रमी वृत्त वाचत राहिलो. ईतक्यात सासरेंनी ‘आणखी हवे का?’अशी विचारणा करता  वर मान करुन पाहिलो तर समोर हॉटेलमधे स्पोर्ट किटमधे दोघे चौघे नास्टा करीत होते. त्यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखे वारंवार जाणवत राहिले. पण मनाने नेमकेपणा साधला नाही. सासरे-मेहुणे यांचेकडे काही मतीची गती थांबवणेचे शास्त्र असो वा नजरबंदीसारखे गारुड माकडनिती त्या क्षणी माझी वेळ दुर्भाग्यातच होती हे नक्की.कारण समोर चक्क तेंडूलकर, झहिर, कांबळी….असे मातब्बर कि जेआपल्याष देशाचे नाव ऊंचावण्याचे महान सत्कार्य आपल्या खेळकौशल्याने धन्य करतात.आणि मी मात्र वेड्यासारखा त्यांचेच वृत्तसमाचार पुढच्या ओळी वाचत रहातो.समोरुन लहान मुले छोट्या बँटवरती त्यांची सही आठवाण म्हणून घेत आहेत. मेहुणेही मला ‘तुम्ही सही घेणार का ? ‘ म्हणून विचारतात. पण मला पंढरीत जाऊन संतांसोबत पांडुरंग समोर प्रसन्न होऊनही न कळावा’ तसे हे जीवनातले दुर्भाग्य.

पुन्हा तेच तेंडूलकरच्या विक्रमी खेळाचे वृत्त पुढे वाचत रहातो वृत्तही संपते, नाष्टा संपवून बाहेर येतो. तिथून समुद्राकिनाराही जवळ असावा. हे सर्व खेळाडूही चक्क माझ्या काही अंतरावर डोळ्यासमोर टू-व्हिलरवरती बसतात. व मी माझे सासरे-मेहुणेसमवेत फोर्ट, गेटवे ऑफ़ इंडिया, लोखंडवाला, झवेरी बझारच्या प्रवासासाठी निघून जातो.

आता यामधे मीशकाही मुंबईशी परिचीत नसलेचा दोष वा वानखेड स्टेडियम तिथून जवळ असलेने ते खेळाडू सरावानंतर नियमीत या हॉटेलमधे नाष्टा करुन जात असलेचा माहितीचा अभाव.

पण काहीही म्हणा,या प्रंसंगात आत्मप्रचिती प्रसन्नतेची कृपा असलेली जाणीव आहे. जी अदृश्य स्वरुपात कृपाशील असावी. देशासाठी त्या-त्या सत्शीला सद्भावनेने देशभक्ती सेवा  देणारेही परमरुप म्हणजे देवच. कारण त्यांचे कार्याशी भक्ती-निष्ठा हे भाव आपणास भक्त बनवून जातात. समोर श्रीदत्त ऊभे आणि मी मंदिरात त्याचे ध्यानात दंग,अशी स्थिती निर्माण झाली.

वरील प्रसंगाचा ‘मन करा रे प्रसन्न //सर्व सिध्दीचे कारण//’

याचा प्रत्यक्ष साक्षात्कार.कृष्ण लिलेसारखा लिलया फसवा.

ज्या खेळाडूचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चेंडू फलंदाजीच्या ऊत्सुकतेत समालोचन ऐकणेसाठी आतुर होऊन आकाशवाणीवर कर्ण एकरुप होतात व जागतीक दर्जाचा महान फिरकी गोलांदाजावर षटकार ठोकून लिलया आपल्या भारतदेशाचे फलंदाजीचे नेतृत्व सिध्द करताना आनंदाने त्या महान खेळाडूचे कौतुक करित रहातो .ते महान दैवत समोर प्रसन्न असूनही मी त्याच दुर्भाग्य क्षणात मनातून सलत रहातो.

हा प्रसन्नतेचा साक्षात्कार प्रत्येकाच्या जीवनात येत रहातो. फक्त सत्य स्विकारुन मन त्याच ध्यासात असावे लागते.सतत पाठांतर केलेला प्रश्नच परिक्षेत पडावा व नेमके त्याचवेळी ऊत्तरच आठवू नये अशी स्थिती या माझीया मनाची.

मा,खा.सचिन तेंडूलकर व त्यांचे सहाकारी खेळाडूंच्या या प्रसन्न दर्शनापुढे अस्वस्थपणे मन नतही होते.

(मुंबई प्रवासः २००४ प्रत्यक्ष अनुभवातून.)

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळ आला होता पण ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ काळ आला होता पण … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

 स्टेट बँकऑफ हेद्राबादच्या शहागड शाखेतून माझी बदली हिंगोली शाखेला झाल्यामुळे मला एक आठवड्याचा ‘जॉईनिंग पिरियड’ (नवीन शाखेत रुजू होण्यासाठीचा अवकाश ) मिळाला म्हणून मी आणि माझी पत्नी सौ. निर्मला एक आठवड्यासाठी औरंगाबादला घरी थांबलेलो होतो. त्या दरम्यान नऊ ऑक्टोबर २००४ रोजी ही घटना घडली.

माझा मोठा मुलगा मनोज आणि सुनबाई सौ. अर्चना इथेच राहात होते.  मध्यंतरी माझा छोटा अपघात झाल्यामुळे मला भेटण्यासाठी म्हणून छोटा मुलगा रवींद्रही मुंबईहून आदल्या दिवशीच आला होता.

नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे सौ. फिरण्यासाठी बाहेर गेली आणि मी, घरात येऊन पडलेले ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचू लागलो. मुले साखरझोपेमध्ये होती. साधारणपणे साडेसातच्या दरम्यान सौ. ‘मॉर्निंग वॉक’ हून परत येईल आणि नंतर चहा करील असा अंदाज बांधून मी ब्रश करण्यासाठी बेसिनजवळ गेलो. एका हातात टूथपेस्ट घेतली अन् दुसऱ्या हातात ब्रश घेतला. पण दोन्ही हात जणू गळून गेल्यासारखे झाले. त्यामुळे पेस्ट आणि ब्रश एकत्र येईचना. मी ब्रशवर पेस्ट लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच छातीत जोरात कळ आली. मी हातातील ब्रश आणि पेस्ट खाली सोडून दिली अन् पटकन जमिनीवर पाठ टेकली. दोन्ही पाय सरळ केले. तितक्यात माझ्या छातीवर जणू हत्तीने पाय दिल्यासारखे आणि कुणीतरी माझी छाती आवळल्यासारखे वाटले अन् पूर्ण अंग घामाने ओलेचिंब झाले. लगेच माझ्या मनात विचार चमकून गेलाकी, “हीच माझी शेवटची घटका आहे. मी आता मरणार आहे.” त्या क्षणी मी अक्षरश: मृत्यूच्या दारात उभा आहे असे मला वाटले.

मी तशाही स्थितीमध्ये मुलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी अद्याप फिरून आली नव्हती. मुलांनी आवाज ऐकला आणि दोन्ही मुले वरच्या बेडरूममधून पटकन खाली आली. काय झाले असेल ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला ताबडतोब कारमध्ये बसवून हेडगेवार रुग्णालयामध्ये हलविण्याची तयारी केली. इतक्यात पत्नीही आली. तिला काहीच कळेना. तिला मुलांनी काहीही न सांगता फक्त गाडीत बसण्यास सांगितले. ती वेळ घरातील सर्वांसाठीच कसोटीची होती. हेडगेवार रुग्णालयामध्ये तिथल्या डॉक्टरांनी मला क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब दाखल करून घेतले आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली धरायला लावली. हळूहळू छातीमधल्या वेदना कमी झाल्या आणि मला बरे वाटू लागले.

“इस्केमिक हार्ट डिसीज” असे माझ्या हृद्यरोगाचे डॉक्टरांनी निदान केले. पुढे जवळजवळ आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये राहून नंतर घरी आलो. मुलांनी तातडीने मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले म्हणून मी मृत्यूच्या दारातून परत आलो. त्या दिवशी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरे.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार ??

सध्या कुठला महिना चालू आहे असे कुणी विचारले  तर आपण अगदी पटकन सांगू सप्टेंबर. मराठी महिना कोणता चालू आहे हे ही काहीजण सांगतील. ही जी कालगणना इंग्रजी, मराठी महिन्यांची जी अनेक कालखंडापासून अगदी सुयोग्य पद्धतीने चालू आहे,त्याला गुंफणारा एक दुवा जो साधारण तीन एक वर्षानी येतो तो म्हणजे ‘अधिक मास’/अधिक महिना/ जो आत्ता सध्या चालू आहे. अधिक अश्विन. यासंबंधी अनेक शास्त्रीय/धार्मिक माहिती आत्तापर्यंत तुम्ही वाचली असेल. तर या सदरात थोडं अधिक या अधिक  (+) शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पहायचं?

लहानपणी गणित शिकताना अधिक  (+)  हा शब्द  पहिल्यादा आपण शिकतो. माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज (अधिक+) असलेली गणिते माझी वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितांपेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी  इतर विषयाच्या पेपरात  ‘ अधिक + पुरवण्या ‘ लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही .

अधिक/जास्त/अजून  या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार  अगदी नैसर्गीक  आहे कारण जन्माला आल्यापासून आपले ‘शारीरिक वय’ हे  वाढतच असते (अधिक+), उणे कधीच होत नाही. ‘मार्केटींग स्कीम’ मध्ये या  ‘अधिक +’ गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो.  २ गोष्टीवर एक गोष्ट  फ्री (अधिक), अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल, एखादी  पॉलिसी/ट्रॅव्हल प्लॅन/एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही (अधिक+) बक्षसे मिळवा इ इ इ

दिवाळी/ होळी साठी  कोकणात सोडण्यात येणार-या जादा (अधिक) रेल्वे, पंढरपूर यात्रेसाठीचा अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना  मिळणारा बोनस (अधिक)  एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ‘वन्स मोर’ (अधिक+), शनिवार/रविवार काही  मालिकांचा सादर होणारा एक तासांचा  विशेष (अधिक +) भाग, कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला (अधिक +) कॉम्बो पॅक, मराठीतील काही म्हणी जशा ‘ आधीच  उल्हास त्यात फाल्गुनमास ‘ किंवा दुष्काळात तेरावा महिना  यासगळ्या गोष्टीचा  कुठे ना कुठेतरी  ‘अधिक +’  शी संबध येतो असे वाटते. अगदी आजारीपडलो, अपघात  झाला  तर आयुष्यमान  वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही ‘+’ हेच असते.  आणि शेवटी ते म्हणतात ना ‘नॉट बट लिस्ट’ का काय ते  राजकारण ?  होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ‘बेरजेचे राजकारण’ ऐकतो/पहातो की तर असा हा अधिक + महिमा. आपणास आवडला असेल.

तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला होता. सर्व जावयांसाठी ‘ अधिक मास ‘ ही पर्वणीच असते असे म्हणतात कारण

अधिक मास, त्यात, कुठलीही तिथी

ताटलीयुक्त ताजे ताजे अनरसे किती?

दोन प्रहरी सासूरवाडीत सोहळा रंगला

तोची आनंदला ग सखे, जावई  भला

. पण कधी कधी वाटत  ही अजून अजून/अधिक अधिक ची हाव ही मर्यादित हवी. एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको. किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे . लेखनाचा शेवट सगळ्यांसाठीच ‘धीर’ धरी  असा मोलाचा सल्ला देऊन

होसी का भयकंपित शरसी का शंका

गाजतसे वाजतसे तयाचाच  डंका

जय गोविद जय मुकूंद  जय सुखकारी

धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print