मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.’ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.‘ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

 

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं.

कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते. जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले. किंचाळत, डान्स करत, रडत, हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही. ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत. पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न, साधं व्यक्तिमत्त्व. डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो.

नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. तीन लाख वीस हजार जिंकून, बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला.

ब्रेकनंतर अमिताभ बोलू लागले… चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न… ए रहा प्रश्न… इतक्यात नीरजजी म्हणाले… सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे, तीन लाईफ लाईन जीवित असताना. करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का? विचारलं… आज तक ऐसा कभी हुआ नहीं..

नीरजजी शांतपणे म्हणाले… माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत. मला वाटतं जो प्राप्त है पर्याप्त है. अधिक की आशा नहीं है.

अमिताभ बच्चन अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली. एक सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अमिताभ म्हणाले… खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.

खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. मनातून मी त्यांना नमस्कार केला.

आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही. कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, ननाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.

त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली… तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो…

मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे. खून खराबा होताना आपण पाहतो. स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र. परंतु हे उदाहरण अपवाद आहे.

देव माणसात असतो. ते नीरजजी सारख्या दु ऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात. मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे.

गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी. स्वार्थाचा त्याग करावा. सर्व सुखी होतील. हा धडा शिकायला मिळाला. मला नेहमीच अशा. व्यक्तींविषयी आदर वाटतो व लिहावं वाटतं.

लेखिका : सौ. रेखा जेगरकल

दापोली.

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल‌ काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून “ट्रिक ऑर ट्रीट” असं म्हणत कँडीज मागायला आली‌ होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, “अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!” असे‌ फोटो टाकले.

आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल‌ आहेत.

असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!

“हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे…

हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!!  🤦‍♀️

हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि 

दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची.. ??

आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन 

“अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा

चिंता, क्लेश, दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी”

अशी प्रार्थना म्हणायची नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??

मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात.. ही कसली विकृती साजरी करत आहोत??

आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..

परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची लिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे” 🤣

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिवाळीचा सांगावा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दिवाळीचा सांगावा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा,

हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे.

त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे.

विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना – – – 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे.

शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत.

गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे.

 

अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे.

विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत,

पण त्यांना ध्येय गाठता आले नाही.

कारण अविवेक आजही प्रभावीच आहे.

 परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय 

… मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

त्याला बघा एकदा मोकळे करून…

… विवेकाचा दीप पेटवून तर बघा, हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

… मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते…!

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

ll वसुधैव कुटुंबकमं ll

… कुटुंब हा शब्दच एक व्यापक अर्थ घेऊन येतो. कोणत्याही देशाची प्रगती ही कुटुंबाच्या प्रगतीवरच अवलंबून आहे. अनेक कुटुंबाची गल्ली, अनेक गल्यांचं गाव किंवा शहर. अनेक शहरांचे राज्य आणि अनेक राज्यांचा देश.

मुळात मी वैयक्तिक कुटुंबाचा विचार न करता, मला वसुधा म्हणेज सृष्टी कुटुंबाचा विचार करावा वाटतोय! 

श्री समर्थानी लहानपणी म्हटले होते, , , ” चिंता करतो विश्वाची !” आणि ते खरेही आहेच. भारतीय संस्कृतीत 

सर्व संतांनी विश्वाची गणना कुटुंब म्हणूनच केली ! 

वैयक्तिक कुटुंबाबद्दल न बोलणे हेच श्रेयस्कर वाटते. कुटुंब व्यवस्थेचा ढसाळता पाया बघून, काळजी दसपट वाढली आहे. ह्या व्यवस्थेला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले आहे. त्याचा उहापोह नकोच. जीवन हेच यांत्रिकी झालं आहे. इलेक्ट्रॉनिक युगात सोशल मीडियाने पूर्ण कुटुंब व्यवस्थेला ग्रहण लागले आहे. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाच नामशेष झाली आहे.

माणूस हाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे ! गरज ही शोधाची जननी, असं जरी असलं तरी, कुटुंबाच व देशाचं पर्यावरण ढासळले आहे. माणसाचा वाढलेला, शहराकडील ओढा … त्यामुळे अनेक शहर नुसती फुगत चालली आहेत. जीवन हे आता संघर्षमय झाले आहे. जो तो स्वार्थी झाला आहे. आपुलकी, सहानभूती हे शब्द फक्त पुस्तकात दिसून येतात ! 

प्रत्येक देशात चढओढ लागली आहे. ग्रोथ रेट हे करन्सीमध्ये मोजलं जात आहे! कुटुंबाचा व त्याच्या आपुलकीचा प्रश्न मोडीत निघाला आहे. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सिग्नल हे परवलीचे शब्द झालेत! माणूस पुढे गेला म्हणून त्याची प्रगती होते का ? त्याच्या भावभावनेच काय! 

हल्ली सगळीच नोकरीं करतात, त्यामुळे दुपारचं जेवण ऑफिस मध्ये. तर रात्रीच जेवण हे टी व्ही किंवा मोबाईलसह! लहान मुलांना पाळणाघर तर वृद्धाना वृद्धाश्रमात! मुलांच्यावर संस्कार करणारे वाड वडील आजी आजोबा घरात नसतील तर, त्यांच्यावर संस्कार कसे होणार! रविवारी घरातील कामे. लहान मुलावर कसे संस्कार होणार. सतत अठरा तांस घराबाहेर, झोपायला भाड्याच्या घरात! 

गेली दोन वर्षे बघतोय युक्रेन व रशिया युद्ध कांही थांबेल असं वाटतं नाही. मध्य पूर्व एशियात हुती हिजबुल्ला हमास इराण एकीकडे आणि इस्त्राईल एकीकडे. जो तो आपल्या शस्त्र अस्त्र बाहेर काढून आपण किती श्रेष्ठ आहोत याची चढा ओढ पाहायला मिळते. तुमचं सगळं काही कबूल. पण अगणित कुटुंबाची वाताहत ही उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते त्याच काय!!

मानवताच नसेल तर, तो देश त्या देशातील कुटुंब संस्था प्रगतीचे बळी ठरत आहेत, असं नाही काय तुम्हाला वाटतं?? अगणित कुटुंब बेचिराख झाले. लांब नको आपल्या जवळच असलेल्या बांगलादेशच काय चाललंय हे आपण बघत आहोतच. आपले शेजारीच जर आजारी असतील तर आपले कुटुंब सुरक्षित राहील काय ? असं असंख्य प्रश्न, मंजूषेतून निघतात.

… सुसंस्कारच जर कुटुंबात नसेल तर तो देश टिकेल का? 

 सुखी कुटुंब सुखी देश, कुटुंबच हा जीवनातील व जगण्यातील खरा पाया आहे, असं नाही का तुम्हाला वाटतं. तसे अनेक मुद्दे उहापोह करण्यासारखे आहेत. पण विस्तार भयास्तव मी इथेच थांबतो व आपली रजा घेतो.

llसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ll 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘औषध नलगे मजला !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

नमस्कार प्रिय मैत्रांनो ! 

दिवाळीच्या ‘उपहाराचा’ मनमुराद आनंद आपणास घेता यावा म्हणून हा ताजा लेखन प्रपंच! आपल्या आवडीनुसार याला तिखट अथवा गोड (किंवा दोहोंचे कॉम्बो) म्हणून स्वीकारावे.

‘ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले |

औषध नलगे मजला, औषध नल गे मजला | 

परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले ||

… नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधोपचार देण्यासाठी वैद्य आले असता, तिने “औषध नलगे मजला” असे उत्तर दिले त्यावरून इतरेजनांनी “तिला औषध नको (नलगे)” असा अर्थ काढला. मात्र तिच्या मनांतील खरी भावना “मला नल हेच औषध (नल गे)” हीच होती. पण संकोचाने ती तसे व्यक्त करू शकत नव्हती. हा सदाबहार श्लेष काव्यालंकार रचणारे पंडित मोरोपंत (कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मयूर पंडित १७२९-१७९४) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. हे पुराण-काव्य अंमळ जुने झाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या मधुमती या गाजलेल्या चित्रपटातील वैजयंतीमालाच्या गावरान नृत्यकलेने सजलेल्या ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्यात नायिका म्हणते- ‘मंतर झूठा, बैद भी झूठा, पिया घर आ रे ! सरतेशेवटी ‘सैंया को देख के जाने किधर गयो बिछुआ ‘ असे सर्व श्रेय प्रियकराला देऊन मोकळी होते.

मंडळी, आजारामुळे घरात बसायचा जाच सहन करीत लहान मुले रडत-रडत नेमके हेच सांगतात, ‘मला औषध नको ग आई!’ पण त्याचे नाक वगैरे दाबून मधाळ औषधीयुक्त सिरप त्याच्या घशाखाली उतरवल्याशिवाय आईचे इतिकर्तव्य समाधानपूर्वक पूर्णत्वाला जात नाही. आमच्या लहानपणी कोजागिरीच्या पर्वाला लागून महिनाभर ‘भुलाबाईच्या गाण्यांना’ ऊत यायचा. त्यात पुन्हा खाद्य-संस्कृतीला जागत प्रत्येक घरी गाणी म्हटल्यानंतर स्वादिष्ट फराळाचा रतीब असायचा. त्याची सुंदर सांगता कोजागिरीला केशर-मेव्याने युक्त आटीव दुग्धपानाने व्हायची. त्यातले एक गाणे आठवणीत राहिले. आधी तर दोडक्या सासरच्या वैद्याचे वर्णन येते, ‘आला ग सासरचा वैद्य’, अपेक्षेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व ‘फाटके तुटकेच’ असते. मग येणार लाडक्या माहेरचा वैद्य, त्याचे व्यक्तिमत्व साहजिकच राजेशाही असणार… या गाण्यांमधून सासरच्या मंडळींनी वर्षभर केलेल्या छळावर उतारा म्हणून ही गोड गाणी असायची. मात्र या गाण्यातील संदेश असेच सांगतो की – ‘ वैद्य असो वा डॉक्टर, त्याची पर्सनॅलिटी पेशंटसाठी कायमच कौतुकाचा विषय असते. ’ 

मैत्रांनो, आपले सणवार जेवून-खाऊन समाधानाने साजरे करायची आपली अक्षय परंपरा आहे. इतकंच काय, नावालाच निराहारी अशी एकादशीची परंपरा आपण निर्जळा एकादशी म्हणून सुरु ठेवतो. (कोणी तरी म्हटलंय, ‘निर्जळा एकादशीला इतका वैविध्यपूर्ण फराळ करावा की जळाला सुद्धा पोटात जागा असू नये!’) आम्हां भारतीयांचे सेलेब्रेशन खाण्यापिण्याभोवती रिंगण घालत असते. कोणी रुजू होऊ दे नाही तर निवृत्त, पार्टीला पर्याय नाहीच. गेलाबाजार असा कुठलाच प्रसंग मला आठवत नाही जेव्हा खाण्यापिण्यापासून वेगळे होत आपण कांही साजरे करीत असू.

मैत्रांनो, असे कधी होईल कां की आपण मळलेल्या वाटा सोडून अनवट रानवाटा धुंडाळीत एखादे समाजाभिमुख कार्य करू? खात्यापित्या घरच्या लाडक्या आप्तांची अन मैत्रमंडळींची पोटे आधीच तुडुंब भरलेली आहेत. त्यांना पार्टी देण्याऐवजी ज्यांची पोटे खपाटीला गेली आहेत अशा भुकेल्या व्यक्तींना दोन घास खाऊ घालता येतील कां, यावर आपण विचार करायला हवा. त्यांची दारिद्र्याच्या तमाने झाकोळलेली उदासीन दिवाळी उजळायला आपल्या दानाचे दीपदान त्यांचे आयुष्य नक्कीच सुसह्य करील.

तुम्हाला काय वाटतं?

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परतली… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? मनमंजुषेतून ?

☆ ती परतली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

… जिच्या येण्याअगोदरच आनंद येतो.

… जिच्या स्वागतासाठी अनंत तारे आकाशमार्ग सोडून भूतलावर अवतरतात.

… जिच्यामुळे सारा आसमंत उजळून जातो, गंधाळलेले वारे वाहू लागतात, सारी सृष्टी आनंदाने बेभान होते.

… जिच्या येण्याने नात्यातले अवघडलेपण संपते.

… जिच्या गोजिरवाण्या स्पर्शाने सारी नाती जवळ येतात.

… जिच्यामुळे हळवे प्रेम आणखी गहिरे होते.

… जिच्यामुळे ओंजळभर सुख पासरीभर होते.

… जिच्याकडे कोणताही थिल्लरपणा नाही, फक्त नात्याचंच कोडकौतुक नाही तर मातृत्वाची पूजा आहे, श्रमाची पूजा आहे, व्यापारातील सचोटीची पूजा आहे.

… जिच्यामुळे नात्यांना दीर्घायुष्य लाभते.

… जिच्यामुळे बाजाराला नवचैतन्य लाभते.

… जी, असेल एखादी रुसणारी बहीण, पत्नी पण रुसवा काढण्यातला गोडवा सांगते.

… पर्यावरण प्रेमी बेचैन होतात, पण बाळ गोपाळांचे फुलबाजी पेटवल्यानंतर चमकणारे डोळे, भुईचक्र फिरायला लागले की डोळ्यातून ओसंडून वाहणारे कुतूहल हे तर शब्दातीत आहे. जगात शत्रुत्व वाढवणारे इतके बॉम्ब फुटताहेत, एक बॉम्ब इथेही फुटतो, पण जीविताला संजीवनी देणारा, वित्ताला उभारी देणारा, मित्रत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारा !

भावनांचा ओलावा पापणीतून पाझरताच ती परतली—-

— पुढच्या वर्षी याहून जास्त आनंद घेऊन येण्याचं वचन देऊन !

… थोडी हुरहूर, थोडी कुरबुर, थोडी हुडहुड मागे ठेऊन !

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री जमशेटजी टाटा

? इंद्रधनुष्य ?

 टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्रांनो, आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!

नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.

१९०२ च्या नोव्हेंबरमधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबईची विजेची वाढती मागणी, गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.

१९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके, गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.

टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.

देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आताही असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे. देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!

हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या या पितामहांना…

कोटी कोटी प्रणाम

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैशाचं डाएट… लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पैशाचं डाएट… लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

” रिया, लक्षात आहे ना ? उद्या लक्ष्मीपूजन आहे तर पैसे खर्च करायचे नाहीत. तुला काही हवं असेल तर आजच आणून ठेव ” आईने दम दिला.

” हो गं बाई, किती वेळा सांगशील ? मला तर हा फंडा कळला नाही, काय म्हणे पैसे खर्च करायचे नाही. ठीक आहे, जाऊ दे, एक दिवसाने फरक नाही पडत. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला हेच असतं ” रिया चिडून म्हणाली.

 दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान झालं आणि रियाच्या लक्षात आलं, शीट, यार moisturizer संपलय, काल आणता आणता विसरलो आपण. आता पैसे मागितले तर ही आई कटकट करेल म्हणून ती गप्प बसली. थंडी सुरू झालीये नेमकी, आज मेकप करायचा, बरं आईचा ब्रँड मला सूट होत नाही. पण नकोच, आई खवळेल चांगलीच! एक दिवस ऍडजस्ट करावंच लागेल.

” रिया, ए रिया, हे फराळाचं देऊन ये गं आत्याकडे. पटकन जा आणि पटकन ये, कुठे पैसे खर्च करू नको बरं ” आईने तिला पिटाळलं.

खाली येऊन रियाने चावीने तिची टू व्हिलर सुरू केली आणि बघते तर काय, पेट्रोलचा काटा आज माझी दिवाळीची सुट्टी आहे म्हणत शून्यवरून पुढेच सरकेना. रियाला समजलं, पेट्रोल भरलं नाही, उद्या भरू म्हणत तीन दिवस झाले आपण गाडी तशीच दामटतोय, आली का पंचाईत ? आईने काही पैसे दिले नाहीयेत, गुगल पे करून पैसे भरायचे म्हणजे हिला मेसेज जाणार म्हणजे परत आरडाओरडा ! जाऊ दे, पायी जाते आत्याकडे, तरी बरं जरा जवळ रहाते ती. छ्या, ही मात्र माझीच चूक हं अशी मनातल्या मनात रियाने कबुली दिली.

आत्याकडे डबा देऊन, दमून आलेल्या रियाला तिच्या मैत्रिणी खालीच भेटल्या. एका ऑनलाइन शॉपिंग ऍपवर सेल होता. कुर्ती, जीन्स, टॉप एकदम स्वस्त होते एक दिवसासाठी. खरं दिवाळीत आताच सगळ्याची खरेदी झाली होती पण सगळ्यांना खरेदी करताना पाहून रियाला मोह आवरेना. तिने न राहवून आईला फोन केला, ” आई, दोनच टॉप घेते, प्लिज, करू ऑर्डर ? ” आई पलीकडून उत्तरली, ” आज नाही, आज खर्च करायचा नाही ! ” 

रिया जाम वैतागली. तणतणत घरी परतली. दिवसभर धुसफुसणाऱ्या रियाला कधी नेलपेंट आणायचं राहिलं आठवत होतं तर कधी अर्धवट राहिलेल्या डेकोरेशनसाठी आरसे आणायचं विसरल्याचं आठवत होतं. चिडल्यावर कॅडबरी खाऊन राग शांत करणाऱ्या रियाला आज ते ही करता येत नव्हतं.

संध्याकाळी मनासारखी नाहीच झाली तिची तयारी पण तरी चांगले कपडे घालून ती पूजेसाठी तयार झाली. पूजा सुरू असतानाच कामवाली सरुमावशी रडत रडत आली. ” ताई, पोरीला आठवा कालच लागलाय. पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेली तर डॉक्टर म्हणाले, पिशवीचं तोंड उघडलंय, डिलिव्हरी होईल. बाळाला काचपेटी लागेल म्हणे, दिस भरले नाहीत म्हणून. कसं करावं? थोडा ऍडव्हान्स द्याल का, लई उपकार होतील. दिवाळी दिली हाये तुम्ही पर आता हे अचानक आलंय. बघा ओ ताई, जमलं तर द्या ना ” सरुमावशीने हात जोडले.

आई उठली, कपाटातून तीन हजार आणून तिच्या हातावर टेकवले, तिला हळदीकुंकू लावलं, ओटी भरली आणि शिवाय “अजुन लागले तर सांग गं “म्हणत आश्वस्त केलं.

रिया, हे सगळं बघून चिडलीच. ” आता, आता, गेली ना लक्ष्मी घराबाहेर ? नियम फक्त आम्हालाच का ? आम्ही लहान आहोत म्हणून ? ” तिने मनातली आग ओकली.

आईने रियाला जवळ बसवलं. ” रिया, तुम्ही कसं वजन कमी करावं, हलकं वाटावं म्हणून डाएट करता तसं हे आज पैशाचं डाएट असतं. ह्यामागे दोन उद्देश, एक तर प्लँनिंग शिकणे. आपल्याला काय काय लागणार हा विचार, हे नियोजन आधीच केलं ना तर ऐनवेळी धावपळ होत नाही. गाडीत पेट्रोल नसल्यामुळे तू पायी गेलीस हे मी बघितलं गॅलरीतून. वेळेवर गोष्टी न केल्याने त्या इमर्जन्सी होतात आणि मग आपल्यालाच त्रास होतो, हो की नाही ? दुसरा उद्देश म्हणजे सय्यम ! कधी कधी काही वस्तू आपण उगाचंच घेतो, गरज नसतानाही! हेच बघ ना, एवढी खरेदी झाली तरी सेल लागला म्हणून आणखी खरेदी करायची का ? अगं मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते ती, आपण नाही बळी पडायचं. आता बघ, शांतपणे, वेळ घेऊन विचार केला तर तुला उद्या वाटेल की गरजच नाहीये त्या extra टॉप्स ची, हो की नाही ? ” 

रियाने होकारदर्शक मान हलवली तरी चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह आईने ओळखलं होतं. आई पुढे म्हणाली, ” रिया, देव ही भक्ती असावी, भीती नाही. कोणी पाहिलंय गं देवाला? काही चांगल्या सवयी अंगीभूत व्हाव्या म्हणून बऱ्याच गोष्टींना देवाचं नाव देण्यात आलं पण म्हणून ती अंधश्रद्धा होऊ नये ही काळजी आपणच घ्यायची. आज सरूच्या पोरीतला, माणसातला देव जर मी नाही ओळखू शकले आणि तिला तिचं बाळ वाचवण्यासाठी नाही मदत करू शकले तर खरा देव अस्तित्वात असेल जरी तरी तो मला माफ करेल का ? तीच आज लक्ष्मी बनून पूजेच्या वेळी आली आणि तिची तृप्तता झाली म्हणून जाताना तोंडभर आशीर्वाद देऊन गेली. अगं स्वतःला शिस्त लावत, माणसातला देव शोधायचा आणि तो सापडला की ती ज्योत पुढे पुढे न्यायची, हीच तर दीपावली ! आता नाही ना रुसलीस आईवर ? ” आईने विचारलं.

‘आली दिवाळी आणि कळली दिवाळी ‘ म्हणत रियाने आईला मिठी मारली आणि पूजेतली लक्ष्मीची प्रतिमा समाधानाने हसली.

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ लक्ष्मी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कळायला लागल्यापासून मनुष्याला ज्याची गोडी आपसूक लागते किंवा प्रयत्नपूर्वक लावली जाते ती गोष्ट आहे संपत्ती. ( खरं सांगायचं तर पैसा..!). लौकिक व्यवहार  पैशाविना होऊच शकत नाहीत. आज जरी विनारोकड (कॅशलेस) व्यवहार होत असले तरी विनापैसा नक्कीच होत नाहीत.

भगवान विष्णूचे एक सुप्रसिद्ध चित्र आहे. त्यात भगवंत शेषशायी आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चुरत आहेत. पंचमुखी शेष आणि त्याच्यावर मंद स्मित करीत पहुडलेले भगवंत आणि सेवेस साक्षात लक्ष्मी !!! लौकिक अर्थाने या चित्रात बराच विरोधाभास आहे. ज्याची दासी लक्ष्मी आहे तो महालात निजेल, रत्नजडित मंचकावर शयन करेल किंवा आणिक विलास उपभोगेल. दुसरे म्हणजे जी साक्षात लक्ष्मी तिला कोणाचे पाय चेपायची काय गरज आहे ? कोणाची दासी होण्याची काय गरज आहे ? ती अनेक दासींना तिथे नेमू शकते. पण तसे इथे दिसत नाही. लक्ष्मी माता शेषशायी विष्णूचे पाय चुरत असण्या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण पुढील प्रमाणे असू शकेलं. भगवान पंचमुखी शेषावर शयन करीत आहेत. ही पाच मुखे म्हणजे पंचेंद्रिये आहेत. ह्या सर्व इंद्रियांवर मालकी गाजविणाराच लक्ष्मीचा खरा धनी होऊ शकतो. सामान्य मनुष्याचे तसे होत नाही. इंद्रियांची मालकी सोडून देऊ, त्याला इंद्रियांचे साधे नियमन करणे सुद्धा जमत नाही. इंद्रियांवर मालकी गाजवायचे बाजूलाच राहाते, ही सर्व इंद्रियेच ह्याला आयुष्यभर गुलाम बनवितात आणि त्याच्या छाताडावर नाचत राहतात आणि पुढे यातच त्याचा अंत होतो. लक्ष्मीने पाय चेपणे तर दूर, लक्ष्मी याच्या वाऱ्यालाही उभी राहात नाही. मनुष्य जे काही चार पैसे जमवितो त्यालाच हा लक्ष्मी मानू लागतो. पण ही काही संपत्ती नव्हे, लक्ष्मी तर बिलकुल नव्हे. हे पैसे म्हणजे  दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त नाममात्र चलन आहे. ह्या कागदाला किंवा नाण्यांना फक्त त्यावरील सहीने मूल्य प्राप्त झालेले असते. वेळ आली तर एका क्षणात त्या चलनी नोटांचे ‘कागद ‘  होतात हे नोटाबंदीच्या वेळी सिद्ध झाले आहे.

लक्ष्मीची बरीच रूपे आहेत. श्रीलक्ष्मीमहात्म्यात याचे यथार्थ वर्णन आले आहे. मनुष्याने ती संपत्ती (लक्ष्मी ) प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी भारतात लोकं व्यापार सुद्धा पैशात करीत नव्हते. अपवाद सोडला तर लोकं सेवा देऊन सेवा घेत असत. आपल्याकडे असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याकडील वस्तू आपण घेत असत. आजच्या भाषेत आपण त्यास commodity tranjaction म्हणू शकतो. 

लक्ष्मी चंचल असते किंवा आहे हे अर्धसत्य आहे. आपल्याला जिथे रहायला आवडते तिथेच आपण रहातो. जिथे आपले मन रमत नाही तिथे आपण पळभर देखील रहात नाही. नाईलाजाने थांबावे लागले तर आपली अस्वस्थता आपल्या चेहऱ्यावर सहज दिसते. ‘पिंडी ते ब्रम्हांडी ‘ हा नियम सर्वांना लागू आहे. त्यामुळे तो लक्ष्मी मातेलाही लागू आहे.

आपण नेहमीच पाहतो की मनुष्याला थोडी सुस्थिती लाभली की त्याची भाषा, राहणीमान लगेच बदलते. मनुष्याची नम्रता अभिमानात परावर्तित होते आणि जसा पैसा वाढत जाईल तसतसा ह्याचा अभिमान चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो. याने पैशाला राबवून घ्यावे असे अपेक्षित असताना पैसाच ह्याला राबवून घेऊ लागतो. पारंपरिक नीतिनियम ह्याच्या दृष्टीने गौण ठरतात आणि तथाकथित स्टेटस सांभाळणारे नीतिनियम त्याला आवडू लागतात. आणि मग एखाद्या उधळलेल्या घोडयासारखा हा धावू लागतो आणि आपला लगाम तो पैशाच्या हातात देतो.

लक्ष्मी चंचल असते हे अर्धसत्य आहे ते यासाठीच. नीतीने, पुढील दाराने घरात येते ती लक्ष्मी आणि अनितीने येते ती अलक्ष्मी. ती मागील दाराने घरात येते. या दोघी जेव्हा घरात येतात तेव्हा सहकुटुंब सहपरिवार येतात. जिथे अलक्ष्मी आहे तिथे लक्ष्मी राहू शकत नाही. लक्ष्मी स्वतः चंचल नाहीए मात्र मनुष्य स्वतःच्या हव्यासापोटी चंचल, अभिलाषी होतो आणि लक्ष्मी चंचल आहे असे जगाला सांगत सुटतो. 

नीती, न्याय, शांती, भक्ती, विवेक, उदारता, मनाची विशालता, परोपकार ज्या ठिकाणी आढळतात तिथे लक्ष्मी पाणी भरते. सर्व संतमंडळी, तसेच मला ज्ञात असलेली श्री गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवले, श्री गजानन महाराज संस्थान शेगांव अशी काही मोजकी उदाहरणे सांगता येतील. 

सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व गुण आत्मसात करुन, वृद्धिंगत करता आले तर माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहील आणि  ती स्वतःच सिद्ध करुन दाखविल की ती चंचल नाही, फक्त त्यासाठी काही मूलभूत पथ्ये पाळली पाहिजेत असे वाटते. शेषशायी होण्याची पाळी आली तरी आपल्या चेहऱ्यावरील स्मित स्वाभाविकपणे टिकले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपले समाधान भंगू नये, नीतिनियम कसोशीने पाळले जावेत. भगवान विष्णू अखिल ब्रम्हांडाचे पालन तटस्थपणे करीत आहेत. असे निःस्वार्थपणे कार्य जो करतो त्याच्यामागे लक्ष्मी स्वतःहून उभी राहते. आज समाजात निःस्वार्थपणे काम करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. जो मनुष्य भगवान विष्णूप्रमाणे आपले आयुष्य स्थितप्रज्ञ वृत्तीने जगेल त्याला लक्ष्मी मातेचा अखंडीत सहवास खात्रीने लाभेल यात बिलकुल संदेह नसावा.

आज लक्ष्मीपूजन आहे. आज सर्वजण माता लक्ष्मीचे पूजन करतील. लक्ष्मीपूजन करताना सर्वप्रथम विष्णूचे स्मरण अवश्य करावे. पतीला मान दिला, पतीचे कौतुक केलं की पत्नीला स्वाभाविकपणे आनंद होत असतो….

श्री योगेश्वर भगवान विष्णूच्या चरणी वंदन करतो. श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी वंदन करतो. तसेच. आपल्यावर भगवंत आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम रहावा यासाठी प्रार्थना करतो.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! दिवाळी–नव्या जाणिवांची !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! दिवाळी–नव्या जाणिवांची !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

दिवाळी आली. चैतन्याची आनंदाची उधळण झाली. सर्वांनी मनापासून दीपोत्सव साजरा केला. आनंद घेतला. आनंद वाटला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे. त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची. निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची. विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो. काही गोष्टी परंपरा म्हणून, रूढी म्हणून करतो. पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे. याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे. म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते. पुन्हा जुन्यांना नवा उजाळा देता येतो. पुन्हा नाती बहरतात.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात. शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही. त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही. स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. वायू, ध्वनी, जलप्रदूषण करायचे नाही. उत्साहाच्या भरात मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत याचे भान ठेवायचे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे. पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा, वेगवेगळे दिवे आपण लावतो. तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे. दिवा हा चैतन्याची, मांगल्याची उधळण करतो. तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा एक दिवा असंख्य दिवे पेटवू शकतो. लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जगताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते. या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा.  ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ‘ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘ दृष्टीदाना ‘चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल चांगली रुजायला लागलेली आहे. आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत. त्यांची जाणीवजागृती करायची.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे, नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते. 

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांचे चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडूनही मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे. तेव्हा चांगले विचार, कृती, उपक्रम राबवू या. सर्वांना त्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares