☆ तिकीट…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. इच्छुक माणूस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नरत आहे. काहींनी तर देव पाण्यात घालून ठेवले असतील…… असो, समजा एखाद्या मनुष्याला एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली आणि तो निवडून आला. तर तो पक्षांतर करणार नाही असे आपण सांगू शकत नाही….. तसेच त्याने दिलेली आश्वासने पूर्ण करेलच असे नाही…….
तिकीट….
अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय….
एक महामंडळ आहे, ज्याने अनेकांचे जीवन घडवले, ते सुध्दा आपल्या ग्राहकांना तिकीट देते आणि मुख्य म्हणजे ते तिकीट अहस्तांतरणीय असते…..
आपल्या लक्षात आलेच असेल….. आपल्या सर्वांच्या जिवाभावाची एस. टी.
एस. टी. ने अनेकांची आयुष्ये उजळली. पूर्वी ग्रामीण भागात एस. टी. शिवाय पर्याय नव्हता…. आणि एस. टी. शिवाय अन्य पर्याय नव्हता आणि एस. टी. लाही पर्याय नव्हता…..
विद्यार्थी, चाकरमानी (नोकरदार), रुग्ण, अन्य प्रवासी यांना वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन असे घोष वाक्य न लावता, लोकं लाल रंगाची पिवळा पट्टा असलेल्या एस. टी. ची चातका सारखी वाट पाहत असतं…
अनेक गावात अमुक वेळेची बस आली की लोकं त्यावर आपली घड्याळे लावत असतं…..
कमीतकमी पैशात योग्य स्थानावर सुरक्षित प्रवास घडवणारे प्रवासाचे एकेमव माध्यम एस टी हेच होते……
महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणता येईल अशी एस. टी.
एस. टी. गावात आली नाही तर त्यादिवशी गावांसाठी ती बातमी असे…..
ज्यांनी एस. टी. ला विश्वासाहर्यता मिळवून तमाम कर्मचारी बंधू भगिनींना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच पडतील……
तर….. अशी तिकीट देऊन तिकीट घेणाऱ्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे हीत जपणारी आपली सर्वांची जिवाभावाची #एश्टी#…… !!
आज ‘ नरक चतुर्दशी ‘. आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.
स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.
आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले. त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.
मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.
स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे. यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल. मुली स्वयंपूर्ण बनतील. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.
प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे, नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत, सामाजिक भान राखत श्रध्देने, आनंदाने हा सण साजरा करू या.
(पूर्वसूत्र- आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच ‘लिटिल् फ्लावर’ मधे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी स्वतःच बँकेत घेऊन येऊ लागलो. कांही दिवस हे असं सुरू राहिलं पण अचानक एक दिवस या क्रमाला अतिशय अनपेक्षितपणे वेगळंच वळण लागलं आणि या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला! मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी मला पूर्णत: हतबल करून गेली होती!
मला पुढे येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच तर पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवातसुद्धा.. !) इथून पुढे —-
तो शुक्रवार होता. आमच्या रिजनल ऑफिसकडून आलेल्या फोनवर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजता अचानक ठरलेल्या ब्रॅंच मॅनेजर मिटिंगसाठी मला कोल्हापूरला येण्याचा निरोप मिळाला. योगायोग असा की मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा होती आणि मीटिंग संपताच सांगलीला घरी मुक्कामाला जाऊन तिथून रविवारी माझ्या नेमानुसार पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणंही सुलभ होणार होतं.
पण हा निरोप मिळताच मीटिंगची आवश्यक ती माहिती गोळा करून फाईल तयार करायलाच खूप रात्र झाली. म्हणून मग रात्री उशिरा न निघता शनिवारी पहाटेच्या बसने निघायचं ठरवलं. रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शनिवारी सकाळी ‘लिटिल् फ्लॉवर’ मधे जाऊन आपल्याला कॅश कलेक्ट करायचीय याची आठवण झाली. रिजनल ऑफिसच्या फोननंतर सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात शनिवारी कॅश कलेक्शनसाठी मला येता येणार नाहीय असा मिस् डिसोझांना निरोप देणं राहूनच गेलं होतं त्यामुळे कॅश कलेक्ट करणं क्रमप्राप्तच होतं.
शेवटी पहाटे उठून प्रवासाची तयारी करून मी बॅग घेऊन बाहेर पडलो ते नेहमीप्रमाणे आठ वाजताच. ‘लिटिल् फ्लाॅवर’ मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले. बँकेत जाऊन पैसे व स्लीप सुजाताच्या ताब्यात दिली.
“कॅश नीट मोजून घे. मगच मी निघतो. ” मी गंमतीनं म्हटलं. ती हसली. समोर इतर कस्टमर्स थांबलेले होते म्हणून मग तिने मी दिलेली ती कॅश आणि स्लीप समोर बाजूला सरकवून ठेवली आणि…. “सर, असू दे. तुम्ही स्वत: कॅश मोजून आणलीय म्हणजे ती बरोबरच असणाराय. मी नंतर मोजते. तुम्हाला उशीर होईल. तुम्ही तेवढ्यांसाठी नका थांबू. ” ती मनापासून म्हणाली. ते खरंही होतंच. मला तातडीने स्टॅण्ड गाठणं आवश्यक होतंच. सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो.
पुढचं सगळंच सुरळीत झालं. मीटिंग चांगली झाली. मला घरी रहाताही आलं. सर्वांना भेटता आलं. गप्पा झाल्या. आराम करता आला. रविवारी नृसिंहवाडीचं दत्तदर्शनही निर्विघ्नपणे पार पडलं. आणि मग नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूर बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी पोचलो. थोडा आराम करायलासुध्दा वेळ नव्हताच. सगळं आवरून साडेआठला ब्रॅंच गाठली. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित
ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं!मी केबिनमधे जाऊन बसलोही नव्हतो तेवढ्यांत माझीच वाट पहात असल्यासारखे हेडकॅशिअर सुहास गर्दे माझ्या पाठोपाठ केबिनमधे आले.
“गुड मॉर्निंग सर”
“गुड मॉर्निंग. बसा. कांही विशेष?”
“विशेष असं नाही… पण एकदा तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. तुम्ही परवा शनिवारी इथून गेल्यानंतर थोडा घोळच झाला होता… ” ते म्हणाले.
“घोळ ? म्हणजे.. ?”
“म्हणजे.. ‘लिटिल् फ्लॉवर’ च्या कॅशमधे साडेआठशे रुपये कमी होते सर… “
“काय? अहो, भलतंच काय? कसं शक्य आहे हे?.. “
“हो सर. पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या… “
एव्हाना प्रचंड दडपणाखाली असलेली सुजाता बोबडे केबिनबाहेर घुटमळत उभी होती, ती आत येऊन माझ्यासमोर खाली मान घालून उभी राहिली.
“सुजाताs. काय म्हणतायत हे?”
” ह.. हो सर. आठशे पन्नास रुपये.. शॉर्ट होते.. “
तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरु लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. टोकाच्या संतापाने माझं मन भरुन आलेलं असतानाही कांही न बोलता मी डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने सुजाताकडे पाहून तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिनबाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून हिच्याकडे दिलेले असताना आठशे पन्नास रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्यच नव्हतं आणि पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी?शक्यच नाही. माझ्या मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करत राहिला. तिचे कौटुंबिक प्रश्न, थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.
“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “
” सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “
“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.
माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.
माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.
काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो… !
☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
(माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.) – इथून पुढे
स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला. आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला. आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढेलेली होती. दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती. आणि कानावर आवाज आला. “आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे, ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे. “टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.
टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला. आणि दिपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली, “चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर, “ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, “दिपाली पहिला नंबर आलाय. ” मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी. पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ‘ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. “आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकीट फोडलं. दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या. दहा नोटा होत्या. आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, “दिपाली, पाच हजार रुपये आहेत. “हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर दिपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला. आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही. पण, आयुष्यातला तो पंचवीस सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला. आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही. आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.
घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात. म्हणून गरमागरम समोसे ही घेतले. तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं. आणि म्हणाली, “कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. ” हुंदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा, पाच हजार मिळाल्याचा, आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो. आणि ती म्हणाली, “चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं. कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. “
सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं. आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली. आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.
आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली. ती अशी….
“माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,
माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात
किराणा मालाची यादी लिहिते,
ती यादीच
माझ्यासाठी जगातली
सर्वात सुंदर कविता असते…
आणि यादीची समिक्षा
फक्त आणि फक्त
तो दुकानदारच करत असतो
तो एक एक शब्द खोडत जातो
पुढे आकडा वाढत जातो
आणि कविता
तुकड्या तुकड्याने
पिशवीत भरत जातो
आयुष्यभर माहीत नाही
पण, कविता आम्हाला
महिनाभर पुरून उरते
कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”
मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की, संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण, आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.
चामी मुर्मू यांना पद्मश्री मिळताच झारखंड राज्य आनंदलं होतं. त्यांना पर्यावरणविद म्हणून पद्मश्री देण्यात आली होती.
खरंच, जर चामी मुर्मू यांचा जीवनप्रवास बघितला तर त्यांच्या अचाट अफाट कामांनी माणूस थक्कच होईल. …. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर एक महिला काहीही करू शकते हे वाक्य चामी मुर्मू यांच्याकडे बघितल्यावर कळते. वृक्षारोपण, त्यांचं संवर्धन. जलसंरक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी खूप कामगिरी केली आहे.
झारखंड येथील सरायकेला खरसांवाच्या बाघरासाई येथील चामी यांचं कुटुंब. आई, वडील, भाऊ, बहीण आणि आजोबा या सगळ्यांसोबत त्यांचा बाल्यकाल गेला. सगळे शेतभात बघणारे. अनेकदा दुसरीकडे मजूरीसाठी त्यांना जावं लागायचं पण तिथे पैसे मिळत नसून धान( सालासकट तांदूळ ) मिळत असायचं त्यामुळे परिस्थिती हलाखीची असायची.
चामी आपल्या आजोबांसोबत गावात होणाऱ्या बैठकीत जायच्या तिथे झाडा झुडपांची माहिती त्यांना मिळत असायची. कोणती झाडं चांगली असतात हे ही त्यांना कळायचे आणि तेव्हापासूनच त्यांना झाडं आणि पर्यावरण या विषयात आवड निर्माण झाली.
१९८८ मध्ये त्यांनी आपल्यासोबत अकरा महिलांना घेऊन बगराईसाई गावात बंजर जमीनीवर झाडं लावण्याचे काम सुरू केलं. त्यांनी झाडं लावलीच नाही, तर ती जगवली ही. त्यानंतर मात्र त्यांचा हा प्रवास उत्कृष्टरित्या सुरूच राहिला. … चामींनी आत्ता पर्यंत ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली आहेत.
आता प्रश्न हा उद्भवतो की त्यांना इतकी जागा मिळाली कुठून? कशी? तर त्या बाबतीत त्या सांगतात.
“आम्ही गावोगावी बैठकी घेतो. त्यात कोणाच्या जमीनीवर झाडं लावायची हे ठरतं. नंतर कोणती झाडं लावायची हे ठरवलं जातं. सगळ्यांच्या सहमतीने निर्णय घेऊन झाडं लावतो. तीन वर्षं आम्ही त्यांची निगा राखतो, नंतर ग्राम समीती बनवून ती झाडं त्यांच्या सुपुर्द करतो. अधूनमधून आम्ही ही लक्ष देतोच. ”
…. अशा प्रकारे ५०० गावांमध्ये ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली गेली.
हे काम करताना चामी यांना बऱ्याच अडचणी आल्या. एकदा १९९५/९६;साली त्यांच्या नर्सरीत लावलेली एक लाख रोपं एका रात्रीत जमीनदोस्त केली गेली. त्यांनी गावात सभा भरवली पण “ हे काम कोणी केलं” याचं उत्तर मिळालं नाही. त्यावर त्यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आणि गुन्हेगार धरले गेले. झाडं तोडून नेणाऱ्यांबद्दल ही त्यांनी पोलिसांना सांगून ते काम रोखलं होतं. लाकुड चोरणाऱ्या माफियांसोबत ही यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांना सतत धमक्या मिळत असायच्या पण त्यातून निष्कर्ष हा निघाला की आज सगळे माफिया, चामींना भिऊन असतात. नक्सल्यांशी ही दोन दोन हात करायला त्या घाबरल्या नाह तर त्यांच्या धमक्या ही बऱ्याच मिळाल्या पण हार मानली तर त्या चामी काय? या थाटात कामं करतच राहिल्या, आणि परिणामी “ लेडी टार्जन” या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं.
झाडं लावण्याची कामगिरी करत असतानाच, जलवायु परिवर्तनच्या समस्येकडेही चामींचं लक्ष वेधलं गेलं. त्यासाठी त्यांनी तलाव, छोटे तलाव, पावसाळ्यात वहाणाऱ्या नाल्या यांत पाणी साठवण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी या सगळ्यांच्या मदतीने जिथे पाणी कमी मिळते त्या भागात पहाडी नाल्यां ठीक करत असतात, कधी कधी, कुठे कच्ची लहानगी धरणं बांधतात. पहाडांवरून पावसाचं पाणी खूप तीव्रतेने खाली येत असतं. पहाडांच्या बाजू बाजूने खड्डे पाडून त्या पाण्याची गती कमी करून हळूहळू खाली तलावात साठवलं जातं. अशातच ७१ गावात २१७ तलाव तयार केले गेले. चार अमृतसरोवर ही बांधले गेले. चामी सांगतात,
“ तलाव साधारणपणे १००× १००× १०चे असतात. जिथे पाणी पोहोचू शकते तिथेच आम्ही तलाव बांधतो. ”
आता त्या तलावात मत्स्य पालनाचे काम ही होऊ लागलंय.
चामींना सिंचनाचा विचार कसा काय आला असेल? तर त्यावर त्यांनी सांगितलं की ‘ आमच्या झारखंडमध्ये फक्त एकच पीक येत होतं. जर पाणी असेल तर दोनदा पीक येऊ शकतं ‘.. या विचाराने त्यांनी हे काम हातात घेतलं. त्याकाळात एक उद्घोष होता
“ हर हाथ को काम, हर खेत को पानी”
मग कामाबरोबरच पाण्याचं महत्त्व त्यांना समजलं. पाणी आलं असता या क्षेत्रातील पलायन थांबणं शक्य होतं.
१९९६, ते २०१८ या दरम्यान आलेल्या अहवालानुसार सरायकेला खरसावां या भागातील भूजल स्तर खूपच खाली गेला होता. त्याच अहवालात भूजलस्तर सुधारण्यासाठी तलाव वगैरे बांधण्याचे पारंपरिक सल्ले दिले गेले होते. तेच काम चामी मुर्मू यांनी हाती घेतलं आणि पूर्णत्वाला नेलं.
ही कामं करत असता चामींनी आणखी एक मोठी कामगिरी केली होती. ती म्हणजे “सहयोग महिला” म्हणून एन. जी. ओ. ची स्थापना. सुरुवात चार सहा महिलांपासून झाली. बायका सकाळ, संध्याकाळ स्वयंपाक करताना, एका मुठीत मावेल इतकी धान बाजूला काढून ठेवायच्या. आठवड्याच्या शेवटी त्यांचे तांदूळ करून ते बाजारात विकून पैसे मिळवायच्या. हळूहळू हा समूह एक स्वयं सहायता समूह झाला आणि मग “सहयोग महिला”. नंतर हा समूह बैंकैशी जोडला गेला.
दलमाच्या घाटीत दूर रहाणाऱ्या आदिम पहाडी जनजातीच्या मुलींच्या शिक्षणासाठीही चामींनी धडपड केली. गावाच्या ऑफिसमध्ये मुलींना पाचवीपर्यंत शिक्षण दिल्यानंतर त्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे एडमिशन मिळवून दिलं जातं. ही संघटना सुरक्षित प्रसव, एनिमिया या समस्यांकडे ही लक्ष देऊन महिलांचे जीवन सुखद करते. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असताना बैंकेकडून अनेक योजनांसाठी मिळणाऱ्या कर्जाने त्यांनी हजारो हातांना कामं दिली.
मदर टेरेसाला रोल मॉडेल मानणाऱ्या चामींनी २६३ गावात २८७३ सहायता समूह स्थापित केले ज्यात ३३, ००० सभासद आहेत.
ही सगळी कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मूंना सोशल मीडिया ट्विटर वर “ आदिवासी योद्धा ” ही पदवी दिली गेली. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मू नक्कीच पद्मश्री मिळवण्याच्या योग्यच आहेत.
पर्यावरण आमची जवाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने त्याविषयी विचार करायलाच हवा आणि त्याचं जतन ही करायला हवं. त्यांचं एक म्हणणं आपण लक्षात ठेवून थोडा हातभार लावून महिला शक्तीला सादर नमन करूया.
लेखिका : सुश्री राधा गर्दे, कोल्हापूर
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “धुक्यात हरवलेली ही पहाट…” – लेखक : श्री विलास कुमार ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
धुक्यात हरवलेली ही पहाट…
अज्ञाताकडे घेऊन जाणारी ती वाट…
अशी धुक्याच्या दुलईमध्ये लपेटलेली पहाट ही पाहण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. परतीचा पाऊस येऊन गेलेला असतो… थंडीची चाहूल लागण्यापूर्वीचा हा काळ… हवेत एक प्रकारचा उबदार गारवा असतो. आपल्या समोरचा काही भाग फक्त दृश्यमान असतो. जणू काही
नूतन जोडप्यामधील एकमेकांबद्दल समज! अजून एकमेकांच्या स्वभावाची पुरेशी ओळख झालेली नसते. नुसते काही ठोकताळे बांधलेले असतात. ते समज गैरसमज हळूहळू कळत जातात. खरे झाल्यावर कधी आनंद होतो, तर चुकल्यावर कधी किंचित निराशाही येते…. एकमेकांना समजून घेत संसाराच्या वाटेवर प्रवास सुरूच असतो.
कधी कधी वाट चुकू शकते…. धुक्यामध्ये हरवल्यासारखे अर्ध्या वाटेवर जोडीदाराला टाकून पुढे जावे लागते… नियतीच्या चकव्यापुढे कधी कधी शरण जावे लागते.
एकमेकांबद्दलचे गैरसमज नंतर हळूहळू वितळून जातात…. जणू काही धुके सरून लख्ख ऊन पडतं. भविष्यातील मार्ग स्वच्छ दिसायला लागतो. संसाररूपी उन्हाचा कडाका सहन करत जीवन प्रवास चालू होतो…. सहजीवनाच्या पहाटेस अनुभवलेल्या या धुक्याला मात्र कुणी विसरू शकत नाही…
पहाटेच्या ह्या स्वप्नाची कुपी जोडीदाराची ताटातूट झाल्यावरही मनपटलावर कायमची दिसत राहते…
धुक्या सारखीच…
अंधुक…
विरळ….
लेखक : श्री. विलास कुमार
प्स्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वसुबारस ला दिवाळीची सुरुवात तर झालीच, पण आजचा धनत्रयोदशीचा दिवस हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे! या दिवसाच्या नावातच धनाचे महत्त्व कळते! पौराणिक द्रुष्ट्या या दिवसाच्या वेगवेगळ्या कथा तर आहेतच, पण वैद्य किंवा डॉक्टर म्हणून या दिवसाचे महत्त्व मला लग्नानंतर अधिक जाणवले. ह्यांचा वैद्यकीय पेशा असल्यामुळे या दिवशी संध्याकाळी आम्ही धन्वंतरीची पूजा करत असू. धन्वंतरीच्या फोटो समोर ह्यांची रोजच्या वापरातील शस्त्रे म्हणजे स्टेथोस्कोप, सीझर वगैरे ठेवून पूजा केली जाई. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करत असू. आपल्या हातून रोग्यांची चांगली सेवा व्हावी यासाठी प्रार्थना करत असू.
वैद्यकीय काम हे व्यवसाय नसून सेवा आहे ही भावना कायम मनात ठेवलेली होती. पैसा ही गोष्ट त्याकाळी थोडी दुय्यम होती.
यावरून एक दोन आठवणीत राहिलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक वर्षी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी एका च दिवशी होती बहुतेक! आम्ही सकाळी फराळाला बसलो असताना धावत पळत एक जण आले, त्यांच्या मुलाने फटाके उडवताना हात भाजून घेतला होता. फराळाच्या ताटावरून उठून डॉक्टर तसेच पेशंट बघायला आधी गेले. सण-वार काहीही असले तरी आपला वैद्यकीय पेशा महत्त्वाचा समजून नेहमी पेशंट्सना प्राधान्य दिले जाई. कधीकधी अगदी चिडचिड होत असे, की काय हा डॉक्टरचा व्यवसाय! पण स्वेच्छेने पत्करलेला असल्यामुळे तो राग तात्पुरता च असे. दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणार्या छोट्या छोट्या अपघातांना बरेच वेळा तोंड द्यावे लागत असे. पण
धन्वंतरी च्या कृपेने यांच्या व्यवसायात नेहमी यश मिळत गेले हे मात्र खरे!
अशीच एक आठवण ! सिविल हॉस्पिटल मध्ये R. M. O. म्हणून काम करत असताना ह्यांची दिवाळी बरीचशी दवाखान्यातच साजरी होत असे! एके वर्षी सासूबाई आजारी असताना दिवाळीपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या, तेव्हा त्यांच्याजवळ मी थांबत असे. हॉस्पिटल मधील धनत्रयोदशी अनुभवायला मिळाली. तेथील सर्व स्टाफ रात्रीच्या ड्युटीवर असताना आकाश कंदील लावणे, पताका लावणे, मेणबत्त्या, पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे हे सर्व घरी जसे उत्साहाने साजरे करतो तसेच तिथे साजरे करत होते. आजारी माणसांना आनंद मिळावा म्हणून हे सर्व लोक झटत होते. ते पाहून खरोखरच मन भारावून गेले. संध्याकाळी तिथे धन्वंतरी ची प्रतिमा उभी करून पूजा करण्यात आली. बऱ्याच जणांनी पेशंट साठी फराळाचे वाटप केले होते. एकंदरच आपल्या हिंदू समाजामध्ये कोणत्याही सणाचा, उत्सवाचा आनंद सर्वांसोबत घेतला जातो, ही गोष्ट खूपच छान वाटली!
आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपले आरोग्य जपण्याबरोबरच धनाची पूजा करून परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण
आनंदाने साजरा करू या!
….. दिवाळी सारख्या मोठ्या सणाचे स्वागत करून अमंगल ते सर्व जाऊ दे अशी धन्वंतरीची प्रार्थना करू या!
मनाने एक हळुवार गिरकी घेतली. ‘ दिवाळी ‘वर्षाचा मोठा, रंगांचा, प्रकाशाचा सण! अनेकविध रंगांचे आकाराचे आकाशदीप नक्षीदार सुंदर रांगोळ्या, अभ्यंगस्नान, नवी कोरी विविध रंगांची सुंदर वस्त्र प्रावरण, झगमगत्या रंगीत दिव्यांच्या माळा, घरात दारात, अंगणात प्रकाशणारे दीप- पणत्या अन् तिखट गोड पदार्थांनी सजलेली तबकं, फुलबाज्या, चक्र, फटाके, सू़ं सूं आवाज करीत आकाशांत झेपणारे बाण, अशी कितीतरी आतिषबाजी, पाहुण्यांची- मित्रमंडळींची वर्दळ, पहाटेच सर्व आवरून, पूजाअर्चा करून देवळात देवाला जायची लगबग.. मग फराळ, पक्वांनाच जेवणं, सगळंच कसं आनंदमय वातावरण अगदी हवंहवंस. !
पूर्वीची दिवाळी अन् -आजची दिवाळी यात फरक आहे तो दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीचा. तरीही, आनंद तोच उत्साह तोच असतो…. दिवाळीला आपल्याकडे एक धार्मिक अधिष्ठान आहे ते पूर्वी इतकंच आजही पाळलं जातं प्रत्येक दिवसाचं धार्मिक महत्त्व असलं तरी सर्वांनी म्हणजे आप्त-स्वकीयांनी एकत्र यावं भेटी घ्याव्या असा हा आनंदाचा सण! वेगवान जीवन चक्रात सगळंच बदलत गेलं. चाळ, वाडे संस्कृती इतिहास जमा होत गेली. सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरा करायला जमत नाही. जागा लहान, वेळ कमी यातच सगळं आलं. त्यामुळे मी आणि फक्त माझंच असा विचार घेऊन प्रत्येकाचं किंवा आपल्या छोट्या कुटुंबाचं वेगळं छोटसं वर्तुळ तयार झालं. फ्लॅट संस्कृती आली. आता मनासारखंच घरालाही मोठं प्रशस्त अंगण फारसं दिसत नाही. तरीही आप्तस्वकीय मित्रपरिवार सर्वांना यानिमित्ताने भेटणारे आणि आवर्जून बोलावणारे ही आहेत. घरोघरी घरकुल, किल्ले जरी होत नसले तरी सोसायटीच्या प्रांगणात लहान मोठी मुले -मुली मिळून त्याचा आनंद घेतात अगदी चढाओढीने किल्ले घरकुल बनवतात… आज राजाच्या घरी रोजच दिवाळी असते म्हणतात. तसे आज सगळेच राजे आहेत मनात आलं की तयार पिठापासून तयार पदार्थांपर्यंत अगदी गोड तिखट हवं तसं आणि हवं तेव्हा मिळतं पण, त्यात गृहिणीच्या म्हणजे घरच्या अन्नपूर्णेच्या हाताची चव असते का?.. आमच्या वेळी.. वगैरे असं काहीच म्हणायचं नाही मला कारण काळाप्रमाणे बदल होतच असतात. प्रत्येकाने बदलायलाच हवं. आताच्या गृहिणीला वेळ नसतो पण हौस तर असते तेव्हा, हे आपण समजून घ्यायला हवं… लक्ष्मीपूजन, पाडवा, आजही दणक्यातच साजरे होतात. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीतला महत्त्वाचा दिवस. भावाने बहिणीकडे यावं बहिणीने त्याला फराळ अन् सुग्रास भोजन द्यावे. आपल्या भावाला उदंड आयुष्य मिळावं सुख समृद्धी मिळावी. ही देवाला प्रार्थना करीत त्याला ओवाळावं. बालपण आठवावे. मन- मोकळ्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात… पण आज ‘ओवाळणं ‘हा एक सोपस्कार झालाय का असंही वाटतं. दोघा बहिण भावांना आपल्या वर्तुळातून वेळ काढणं अवघड होऊ लागलंय. असं का झालं? कधी झालं ? हे प्रश्न तसे अवघडच. हा काळाचा महिमा की, संवादाचा, पैशाचा हे कळेनासं झालंय.
लहानपणी भाऊबीजेला मिळालेली रिबन, नक्षीदार पिना, बांगड्या, यात समाधान असायचं. वडिलांकडून पाडव्याला मिळालेल्या ‘बंद्या’ रुपयांचं भारी अप्रूप वाटायचं. आज ज्येष्ठत्व आलं – वयही उताराला लागलं.. त्यामुळे पूर्वीची दिवाळी व आजची दिवाळी मनात रुंजी घालतेच. तरीही, आज’ ‘प्रकाश- ज्योती’ उजळतांना वाटतं..
खरंच, आजची दिवाळी बदलली आहे का? पण नाही.. सगळं तर तसंच आहे. एवढंच की त्यावेळी एवढा लखलखाट, झगमगाट, डामडौल नव्हता. आज नव्या युगाची ‘नवी दिवाळी ‘तेव्हा सारखी मर्यादित नाही. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम, खास अशी नाटक, सिनेमा असतात. दिवाळी अंकांनी, पुस्तकांचे स्टॉल सजतात. रसिक आवर्जून याचा आनंद घेतात. आमच्यासारख्या ज्येष्ठांना ती पर्वणीच वाटते. तरुण पिढीला नव्या पिढीला सहली सहभोजन असा सुट्टीचा आनंद कुटुंबाबरोबर घेता येतो एरवीच्या धावपळीत ते शक्य होत नाही म्हणून वाटतं सगळंच हरवलं नाही पण जे कुठे उणं वाटतं, बिनसलंय, यासाठी आपल्या मुलांना नातवंडांना नात्यांतील आपलेपणा, पावित्र्य, प्रेम संबंध, टिकवून ठेवण्याची गरज – या गोष्टी आपणच समजावून सांगायला हव्यात. कुटुंब वर्तुळाचा परीघ वाढविल्यानंतरचे फायदे त्यातील आनंद सांगायला हवेत. त्यांना पटले तर आनंदाचं आहे. तसेच समाजाचे ऋण मानून आपल्याबरोबर दुसऱ्याच्या अंगणातही ‘प्रकाशाचा दिवा’ लावणारेही आहेत. संस्था आहेत. त्यांच्याबरोबर सहकार्यासाठी, आपण असायला हवं. ही काळाची चांगली पाऊले आपणही टाकायला हवीत ! यासाठी दिवाळीच योग्य ! अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. दिव्याने दिवा लावून आपल्याही ज्ञानज्योती’ उजळूयात -. ! याच “दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.. !”
☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो. आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता. तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती. आणि माझ्यासोबत लढत होती. परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण, त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, “मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला. आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.
तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो. “मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही. हे कळलं.
आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो. ती स्वताला सावरत हळूहळू उठली. आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.
मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो. आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला. “मी म्हणलं ‘काय दिपाली”? तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना”? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं “हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी” तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं. आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !!अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. खाली पत्ता होता चिंचवड, पुणे. आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता. मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली. आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते आज, जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. “तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.
ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या
हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.
मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती. ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही. कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती. आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.
स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या. कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती. आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.
माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा, मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो. माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.
आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्तीमध्येच रावण निर्माण झालेला आहे. पूर्वी असं म्हणत की प्रत्येकामध्ये राम असतो. पण आता प्रत्येक जण दहा डोक्यांचा झालेला आहे. त्यातलं पहिलं डोकं तो त्याचं स्वतःचं घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे ते स्व-बुद्धीचे डोकं त्याचं स्वतःचं असतं. त्यानंतर एकेक डोकी त्याला चिकटत जातात आणि तो दहा डोक्यांचा होतो.
या नऊ डोक्यांबरोबर स्वतःचे मूळ डोकं स्वबुद्धी हे दहावं डोकं संभ्रमित होत असतं. किंबहुना या दहाव्या डोक्याला संभ्रमित करण्यासाठीच इतर नऊ डोकी त्याला चिटकवली जातात. मग प्रत्येकाचाच रावण बनतो.
अर्थात रावण हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि उत्तम राज्यकर्ता होता असे प्रत्यक्ष श्रीरामांनीच म्हटले आहे. फक्त त्याचे स्वतःचे डोके ज्या ठिकाणी वरचढ ठरते तेव्हाच फक्त तो चांगला ठरतो. इतर नऊ डोकी जेव्हा त्याच्या स्वतःच्या मूळ डोक्यावर मात करतात म्हणजेच स्वबुद्धीवर मात करतात तेव्हा हातून पापकृत्य घडते….. म्हणूनच आज आपल्या प्रत्येकामध्ये एक रावण दडलेला आहे. आपलं मूळ डोकं वापरण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण जीवनात सत्कृत्य करू शकतो.
इतर डोक्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. आपल्याला रावणच बनायचे आहे. दुसरा पर्यायच नाही. परंतु सत्कृत्य करणारा रावण की दुष्कृत्य करणारा रावण एवढेच आपण ठरवू शकतो. आपल्याला राम बनता येणे शक्य नाही. कारण या इतर डोक्यांना आपल्याला दूर ठेवता येणे शक्य नाही. म्हणून किमान आपली स्वबुद्धी वापरायला शिकणं एवढंच आपल्या हातात आहे.
रावणाचा विनाश होत नसतो. आज दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याचा उत्सव आपण करतो असे म्हणतो पण रावणाची मूर्ती जाळणारे अनेक रावणच असतात. त्यात राम कुठेही नसतो. त्यामुळे हजारो वर्षे रावणाचे दहन करून सुद्धा रावण आहेतच. राम कुठे दिसतो का ते जळणारा रावण पहात असतो. कारण त्याला रामाच्या हातून मृत्यू हवा असतो. तेवढे सद्भाग्य सुद्धा आज रावणाला मिळत नाही. अनेक जिवंत रावण मिळून एका रावणाच्या प्रतिकृतीला जाळत असतात.
… जेंव्हा रामाच्या हातून सद्गती मिळेल तेव्हाच रावण संपतील. राम केव्हा कसे आणि कधी निर्माण होतील हेच रावणांनी पाहणं त्यांच्या नशिबात आहे का ? तोपर्यंत मात्र…