☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
“रे बाबल्या खयं असा तू?… रे मेल्या घरात असा कि खयं बाहेरच खपलसं!… आणि मंदा वहिनी घरात असात का रे. ?.. “
” व्हयं ता आम्ही दोघेवं बी या टायमाक घरात असा नाय तर काय शांता दुर्गेच्या राउळात झांज वाजवूक बसतत!… काय तरी इचारतस!… ता जाऊ दे.. तू फोन कित्येक केलसं ता सांग आधी?… एकाच वाडीतले शेजारी असां तरी तुका घराक येऊन बोलू झाला असताना… घराक आग लागल्याची वार्ता अर्जंट देयाला फोन केलसं काय मरे!… वश्या !काय झाला ता आधी इस्कटून सांग?… शिरा पडली तुझ्या तोंडावर ती!… “
” रे बाबल्या आग माझ्या घराक नाय तर तुझ्या घराक लवकरच लागतली समजला!… मी तुका आधीच सावध करान राहिलो… तू येळेलाच शाना झालसं तर तुझो घरदार आबाद रव्हता… मंगे तू आनी तुझा नशीब!… “
“वश्या! आज जरा जादाच घेतलसं काय?… अजून बी तू कोड्यात बोलून रव्हलसं!… रे मी मंत्रालयातला पट्टेवालो असा तुझ्या सारखो पिऊन नाही.. तेवा माझ्या खोबडीला समजेल असा बोल ना रे… काय तुका बोनस मिळालो!, का महागाईभत्याचा डिफरन्स गावलो!.. का तुका चायपानीची लाटरी लागली!… काय असेल ते सांगून टाक ना लवकर…”
“रे बाबल्या!… काय सांगू तुका? अरे तू म्हणतसं ता सगळा माका कालच हाती मिळाला… अरे ता हिन्दी पिक्चर मधे नाय का बोलत भगवान जब भी देता है तो छप्पर फाडके देता है… साला माझा नशिब बघ तसाच फळफळला… घरी बाईल एव्हढी खूश झाली म्हनुन सांगू… तिने माका तसाच बाजारात घेवोन गेला… आनि बाबल्या तुका सांगतय तिने डझनावारी साड्या, ड्रेसेस, बेडशीटा, चादरी.. काय नि काय इतकी खरेदी केलीन कि सगळो भरलेलो खिसो सुफडा साफ झाल्यावरच घराकडे परत इली… एक तांबडो पैसौ देखील त्यातला तिने शिल्लक तर ठेवलो नाय.. ना माका एक चड्डी बनियन घेतल्यान… वर माका नाकाचा मुरका मारून बोलला लगीन झाल्या पासून आज माझी होसमौज काय ता पुरी झाली… जल्माचा दळिंदर ता गेला… आता ह्या घेतलेल्या सगळ्या साड्या, ड्रेसेस, समंधा आधी त्या मंदेक दाऊन आल्याशिवाय माझो जीव शांत व्हायचो नाय… नाकझाडी मेली.. दर महिन्याला साडी ड्रेस आणल्यावर मला दाखवायला घेऊन येऊन मला जळवायची… आमच्या ह्यांका पट्टेवाले असले तरी रोजचो खुर्द्याने खिसो भरान घरी येततं… भावजी पिऊन असतले तरी त्यांका एक दमडीची चायपानी कसा मिळना नाय… असा महणून माका चिडवून जाता काय… आता तिका इतकी गाडाभर खरेदी घरी जाऊन दावतयं नि तिची अशी जिरवतयं कि त्येचा नावं ते… पुन्हा म्हणून या विमलाच्या नादी लागू नको असा तिका धडा शिकवूनच येतेयं… बघाच तुम्ही… असा माका टेचात बोलून सगळी खरेदी कमरेला धरून तुझ्या घरा कडे निघाली असा… माका इचारशील तर तू आनि मंदा वहिनी जसे असाल तसे घराबाहेर पडान खरा खराच शांता दुर्गाच्या राउळात जा… तुम्ही घरी नाय बघून विमला घरी रागे रागे परत येतली.. नि मगे तिचो राग शांत झाल्यावर मीच तुमका घरी बोलवेन… तसा तुका जमना नसेल तर माका माफ कर… नि घे मंगे घराक आग लावून… एक इमानदार दोस्ताचो सल्लो असा… बघ तुका किती पटता ता…
“सुईच्या अग्रावर राहील इतकीसुद्धा जमीन मिळणार नाही तुम्हांला !”
बघा, म्हणजे जमिनीच्या मालकीवरून आजच्या कलियुगीच वाद होतात असं नाही, तर महाभारत काळापासून हा रोग तमाम मानवजातीला जडला आहे असं म्हटलं तर यात वाद व्हायचं कारणच नाही. पण सुईच्या अग्रापेक्षासुद्धा या पृथ्वीतलावर आणखी कमी क्षेत्रफळाची जागा असते, हे तेव्हाच्या लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे तेंव्हाच विज्ञान आजच्या इतकं खाचितच प्रगत नव्हतं हेच यातून सिद्ध होतं. मंडळी थांबा थांबा, हे काही माझं मत नाही बरं, नाहीतर तुम्ही माझ्याशी या विषयावर उगाचच वाद घालायला लागाल, काय सांगावं ! तर ते एखाद्या जन्माने मुळच्या “पेठेत” राहणाऱ्या पण सध्या सिलिकॉन व्हॅलीमधे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीयाच मत असू शकतं, हे मात्र माझं मत.
महाभारतकाळी इतक्या कौरवांचे आणि पांडवांचे जन्म झाले त्यावरून चांगल्या “सुईणी” तेंव्हा होत्या का नव्हत्या हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही मंडळी, पण महाभारतकाळात “सुई” अस्तित्वात होती का नव्हती, असा वादाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर ? त्यामुळे तिच्या अग्रावर राहील इतकी जमीन हे परिमाण, महाभारताचे नाटकीकरण करतांना त्या पात्राच्या तोंडी घालण्याची त्याच्या लेखकांने त्याकाळी घेतलेली ती रायटर्स लिबर्टी म्हणायची का ? आणि ती तशी घेतली असेल तर त्याला तो अधिकार कोणी, कधी दिला ? लेखी दिला का तोंडी दिला ? आणि जे असे परिमाण अस्तित्वातच नाही त्याला जन्माला घालून लेखकांने काय साधले ? दुसरं असं की त्यामुळे रायटर्स लिबर्टीचा जन्म महाभारत कालीन मानायचा का ? असे नानाविध वादाचे मुद्दे या अनुषंगाने उभे राहतात. त्याची उत्तरे कोण देणार आणि तशी उत्तरे देण्याइतका त्याचा किंवा तिचा या बाबतीत अधिकार आहे का ? आणि तो तसा असेल, तर तो त्याला किंवा तिला कोणी बहाल केला ? असे अनेक वादाचे पोट-मुद्दे सुद्धा सुज्ञ वाचकांच्या पोटात खड्डा पाडू शकतात मंडळी !
तर थोडक्यात काय, तर कुठल्याही गोष्टीतून कोणाला वादच उकरून काढायचा असेल, तर तो त्याला कसाही उकरून काढता येतो, इतकंच मला वाचकांच्या मनावर ठसवायचं होतं ! आता ते तसं ठसवण्यात मी यशस्वी झालोय का नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा ! पण बहुतेक सु्बुद्ध वाचकांना माझं म्हणणं पटावं आणि ज्यांना ते पटणार नाही त्यांनी नवीन मुद्दे मांडून नवीन वाद, मी सोडून, कुणाशीही घालायला माझी काहीच हरकत नाही, या बद्दल मात्र नक्की वादच नाही !
वाद ! ह्याच खतपाणी मुलांच्या मनांत बहुतेक त्यांच्या वयात यायच्या वयात, म्हणजे साधारण आठवी नववीमधे शाळेतूनच घातलं जात. मी असं म्हणतोय म्हणून तुम्ही या विषयावर माझ्याशी वाद घालायच्या आधीच, मी असं का म्हणतोय ते सांगतो. आठवा ती शाळेत होणारी “वाद विवाद स्पर्धा. ” ज्यात भाग घेण्यासाठी (भांडखोर ?) शिक्षक आपापल्या वर्गातून मुलं तयार करायचे. नंतर नंतर तर “आंतर शालेय वाद विवाद स्पर्धेत” एखाद्या शाळेला ढाल मिळाल्यावर, (तेंव्हा चषकाची आयडिया रूढ व्हायची होती) तर काय विचारूच नका. ज्या मुलांनी शाळेला “ढाल” मिळवून दिली त्यांचा सत्कार शाळेतर्फे केला जायचा ! वाचकांपैकी माझ्या पिढीतील काही लोकांनी अशी “ढाल” आपल्या शाळेला मिळवून देण्यात, स्वतःच्या “जिभेची तलवार” तेंव्हा चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी. मी मुळातच मवाळ स्वभावाचा असल्यामुळे अशा स्पर्धेपासून कायम चार हात दूरच रहायचो. त्यामुळे मला काही मुलं तेंव्हा, माझ्या अपरोक्ष मुखदुर्बळ म्हणायचे, असं मला नंतर समजलं. पण अशा वाद विवादस्पर्धा फक्त ऐकून त्यातून आपल्या ज्ञानात काही भर पडत्ये का बघावं ह्या एकाच विचाराने मी अशा स्पर्धेत भाग घेण्यापासून दूर राहिलो ते आज पर्यंत ! असो !
पुढे कॉलेजमधेसुद्धा “आंतर महाविद्यालयीन वाद विवाद” स्पर्धेतून, आता चारबुक जास्त शिकलेल्या आणि मिसरूड फुटलेल्या तरुणांना, तेंव्हा नाकातोंडातून निकोटीनचा धूर काढायचं प्रमाण फारस वाढलं नव्हतं म्हणून असेल, पण आपल्या डोक्यातली गरम विचारांची वाफ, अशा स्पर्धेतून आपल्या तोंडातून काढायची संधी मिळत असे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग काही तरुण त्याकाळी करत असतं. त्यातील काही जणांचा यामागे आपल्या आवडत्या कॉलेज क्वीनवर इंप्रेशन मारायचा छुपा अजेंडा असायचा. अशापैकी काही तरुण आपल्या छुप्या अजेंड्यात नंतर यशस्वी होऊन आपल्या क्वीनबरोबर यथावकाश लग्न करून मोकळे सुद्धा झाले ! पण आपल्या क्वीन बरोबरच्या लग्नानंतर आता झालेल्या बायकोबरोबर अगदी कुठल्याही क्षुल्लक विषयावरचा झडलेला वाद सुद्धा, त्यांना आजतागायत कधीच जिंकता आलेला नाही, हे मला नंतर कळलं ! आता त्या दोघांच्या वाद विवादात जास्त खोलात न शिरता पुढे सरकतो, नाहीतर असा एखादा स्वतःच्या बायकोबरोबर घरच्या वादात कायम हरलेला नवरा, त्या रागापोटी माझ्याशी उगाचच नवीन वाद उकरून काढायचा !
“वादे वादे जायते तत्वबोध:” हे आपल्या देशात अर्वाचिन काळापासून चालत आलेले तत्व होते. पण आजकाल कुठल्याही वादाचे स्वरूप निकोप न राहिल्यामुळे त्याचे वितंड वादात रूपांतर व्हायला लागले आहे. जगात असा कुठलाही वाद नाही की ज्याचे उत्तर सुसंवादातून मिळणार नाही. पण मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरून कोणी वाद विवाद करत असेल तर त्यातून कुठलाही वाद हा विकोपालाच जाणार आणि त्याच पर्यवसान कधी कधी दोघांच्याही अंताला सुद्धा कारणीभूत ठरू शकत. याची काही उदाहरणं आपण इतिहासात वाचली असतीलच. पण त्यातून धडा घेण्याऐवजी लोकं आपला हेका न सोडता वाद विकोपाला जाईपर्यंत ताणतात हे ही तितकंच खरं.
शेवटी इतकंच म्हणावंस वाटत की, कुठल्याही वादावर पडदा पाडायची “दवा” “वाद” हा शब्द आपण उलटा वाचलात तर त्या उलट्या शब्दातच आहे, हे आपल्या लक्षात येईल ! पण त्यासाठी वाद विवाद करणाऱ्या लोकांनी आपापलं डोकं शांत ठेवून, समोपचाराने कुठलाही वाद, प्रसंगी दोघांनी दोन दोन पावलं मागे जाऊन, तो वाद सोडवायचा प्रयत्न मनापासून करणं गरजेचे आहे, हे लक्षात ठेवायला हवे !
आपल्या सर्वांचा माझ्या सकट दुसऱ्याशी, कायम सुसंवादच घडो हीच सदिच्छा !
(आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य, समाजातल्या रूढी – परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !) इथून पुढे —–
दिवाळी आली, पणत्या विकायला द्या…
दसरा आला, झेंडूची फुल विकायला द्या…
गुढीपाडवा आला, साखरेच्या गाठी विकायला द्या…
संक्रांत आली, तिळगुळ विकायला द्या…
रंगपंचमी आली, रंग किंवा पिचकारी विकायला द्या…
आता नवीन वर्ष येईल, कॅलेंडर आणि छोट्या डायऱ्या विकायला द्या…
– – – असे काहीतरी मार्ग शोधतो आहे; अर्थात तुम्हा सर्वांच्या साथीने…. !!!
असो…
तर असं काम दिलेल्या या मुलाचा मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला… तो म्हणाला, ‘सर तुम्ही उद्या कुठे आहात ?’
‘मी उद्या अमुक अमुक ठिकाणी आहे… का रे… ?’
‘सर माझी जी पहिली कमाई झाली; त्यातून मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे… ‘
मला थोडा राग आला…
“ दोन पैसे मिळाले, त्यात लगेच गिफ्ट वाटायला लागलास…? मूर्खा, तुला काय सांगितलं होतं ? दिवसभरात जे पैसे मिळतील त्यातले 40 टक्के खर्च करायचे; पण 60 टक्के वाचवायचे… काय सांगितलं होतं तुला ? 40:60 गणित लगेच विसरलास का… ? एक तर आपले खायचे वांदे… त्यातून, जरा पैसे मिळाले की लगेच कुणालातरी गिफ्ट द्यायचं… ! मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे… पैसे वाचवायची अक्कल येत नाही, तोपर्यंत मला भेटू नकोस “… मी तूसड्यागत बोललो…
“ ऐका ना सर…” तो बोलतच होता
“ तू जरा बावळट आहेस का रे… ? ठेव फोन आणि काम कर…. मला उद्या भेटायची काही गरज नाही… !”
मी रागाने बोलून गेलो…
एकदा व्यवसाय टाकून दिला की, माझे याचक लोक पैसे कसेही वापर करतात, उडवून टाकतात… बचत करा म्हणून सांगूनही बचत करत नाहीत आणि या गोष्टीचा मला राग आहे, आणि म्हणून बापाच्या भूमिकेतून मी त्याला रागावलो… !
मी फोन ठेवणार एवढ्यात तो म्हणाला, “ उगीच कोणालातरी नाही गिफ्ट देत सर, मला वडील नाहीत… वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला म्हणायचे; तू जेव्हा कमावशील तेव्हा मला काहीतरी छोटसं गिफ्ट दे….. आज ते नाहीत, म्हणून वडील समजून तुम्हालाच देतो आहे सर, प्लीज घ्या ना…. ! “
आता या वाक्यावर कोणीही विरघळून जाईल…
पण तरीही कोरडेपणाने मी त्याला म्हणालो, “ ठीक आहे, ये उद्या…” कारण कष्टाने मिळालेले पैसे फालतू गिफ्टवर खर्च करणे मला मान्य नव्हते… !
तो दुसऱ्या दिवशी दबकत दबकत आला… ! खिशातून एक पुरचुंडी काढून मला म्हणाला, “ सर हेच माझं गिफ्ट आहे… “
मी खोलून पाहिलं…. ती शेंगदाण्याची पुडी होती… आत खारे शेंगदाणे होते… मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं… “ काय आहे हे ? “
“सर माझ्या वडिलांना भाजलेले, खारे शेंगदाणे खूप आवडायचे… मी असा वाया गेलेला… बाबांच्या कोणत्याही अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही… बाबा म्हणायचे, ‘ तुझ्याकडून फार काही अपेक्षाच नाहीत रे नालायका…. स्वतःच्या कमाईतून चार शेंगदाणे जरी मला तू खाऊ घातलेस, तरी मी शांततेत मरेन… !
एके दिवशी बाबा गेले… ! बाबांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही सर.. मी मागे नालायक उरलो सर…
जातांना ते चार शेंगदाणे माझ्यावर उधार ठेवून गेले… !.. स्वतःच्या कमाईतून, आज तेच शेंगदाणे घेऊन आलो आहे… सर तुम्ही खा ना… “ तो काकुळतीने बोलला…
काय बोलू मी यावर ? मला सुचेना…. ! पुडी उघडून मी हे शेंगदाणे तोंडात टाकले…
तो गळ्यात पडून हमसून हमसून रडला…
आज “पिंडाला कावळा” शिवला होता… !!! जिवंत असतानाही आज मी त्याचा मेलेला बाप झालो… !!!
सांगण्यासारखं आणखी खूप आहे….
पण लांबलेला लेख आणखी लांबेल, या भीतीने मी बऱ्याच गोष्टी लिहीत नाही…
माहेरी आलेल्या लेकीला; आई बापाला काय सांगू आणि काय नको असं होतं… तसंच माझं सुद्धा होतं… म्हणून लेख लांबतो…. आईबाप आहातच… आता लेक समजून पदरात घ्या.. !
80 वर्षाची एक आजी…. तिचा मुलगा आणि सून काम मिळत नाही म्हणून घरात आहेत…. दिवसभरात आजीला जी भिक मिळते त्यात घर चालतं…. मी या सून आणि मुलाला भेटलो…
सुनेला शिवणकाम येतं.. सुनेला म्हटलं, “ तुला जर शिलाई मशीन दिलं तर काम करशील का ? आणि काम केलं तर म्हातारीला घरात आणशील का ? “
… आजीला भीक मागू द्यायची नाही, या अटीवर सुनेला शिलाई मशीन दिलं आहे…
आज सून काम करत आहे आणि आजी घरात आहे…. ! येत्या काही दिवसात तिच्या मुलाला सुद्धा काम देणार आहोत…. !
अजुनही खूप काही सांगायचं आहे… मी तरी किती लिहू आणि तुम्ही तरी किती वाचणार ?
थोडक्यात सांगायचं, तर नवीन वर्ष आता येईल, याचक मंडळींना आता कॅलेंडर विकायला देणार आहे…
आज्या आणि मावश्या यांची खराटा पलटण नावाची टीम तयार करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेऊन त्यांना गरम कपडे, स्वेटर, सत्कारात मला मिळालेल्या शाली, ब्लॅंकेट दिल्या आहेत… स्वच्छता झाल्यानंतर पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे…
अन्नपूर्णा या प्रकल्पाच्या माध्यमातून, भीक मागणाऱ्या कुटुंबांकडूनच जेवण तयार करून घेऊन ते आम्ही विकत घेत आहोत आणि रस्त्यावर किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना जेवणाचे डबे देत आहोत.
रस्त्यावर असहायपणे पडलेल्या लोकांवर रस्त्यावरच उपचार करत आहोत… काहींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहोत… जगण्या आणि जगवण्याचा खेळ मांडत आहोत…
जे दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाहीत अशांना काठ्या कुबड्या Walker देऊन त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहोत…
अनेक लोक अनवाणी आहेत, त्यांना या महिन्यापासून चप्पल देणार आहोत…
सध्याच्या थंडीच्या काळात उघड्या नागड्या पोरांच्या अंगावर चादर चढवत आहोत… आणि म्हणून दर्गाहवर चादर चढवायला आमच्याकडे चादर उरतच नाही…
आम्ही अशिक्षित आहोत, परंतु सुशिक्षित लोकांना या महिन्यात मतदान करा म्हणून आम्ही सांगितलं…
मंदिरातून बाहेर येऊन, रस्त्यावर देवी आमची परीक्षा घेते… आपण केलेल्या मदतीमधून आम्ही रस्त्यावरच्या माऊलींना साड्या अर्पण करत आहोत…
…… खुद्द देवीच रस्त्यावर दर्शन देऊन आशीर्वाद देते आणि म्हणून मग कोणत्याही मंदिरात जायची गरज उरत नाही… !!!
या महिन्यात अजून सुद्धा खूप काही झालं आहे…. सांगेन पुढे कधीतरी…
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बोळातला लपंडाव–
‘बाळ’ प्रकरण झालं आता आल ‘बोळ’ प्रकरण ‘ डोंगरे बालामृत ‘ घेऊन त्या काळातली पुण्यातली बाळं बाssळसेदार झाली होती. त्या बाळांची कहाणी झाली, आता आले पुणेरी बोळ, ते बोळ बाळसेदार नव्हते. तर अगदीच रोडावलेले, अरुंद होते. हे बोळांच ‘जाळ’ सर्व दूर पसरलेल होत. बुधवार चौकात माझी प्रिय मैत्रीण उषा भिडे राहयची. तिच्या घरावरून त्या चौकातून निवडुंग्या विठोबा वरून, सरळ जाऊन डावीकडे फडके हौदाकडे, रस्ता जातो ना, तिथे आतल्या बोळात भारत हायस्कूलला लागून एकांत एक असे पांच बोळ होते. ते बोळ थेट एकनाथ मंगल कार्यालयापाशी पोहोचायचे. रविवार पेठेत माझी बाल मैत्रीण कुंदा राहत होती, तिथून निघाल्यावर, खरं म्हणजे जोगेश्वरी कडे जायला एकनाथ कार्यालयावरून, तपकीर गल्लीतून वसंत टॉकीज पाशी पोहोचलेला, अहो! अगदी नाका समोरून जाणारा, चांगला सरळ रस्ता सोडून आम्ही एकदा वाकडी वाट करायची ठरवून, शिरलो कीं हो पहिल्या बोळात. एकच माणूस मावेल इतका तो बोळ अरुंद होता. कम्मालीची सामसूम होती तिथे. ब्रम्हांडच आठवल होत आम्हाला. बरं! कुणी पाहयल म्हणण्यापेक्षा कुणी धरलं तर– या विचारांनी, गर्भगळीत होऊन थरथरणारी आमची पावलं जागच्या जागीच थबकली, कसंबसं अवसान आणून पळायची ॲक्शन घेऊन उसन चंद्रबळ आणल तर, ढोपरचं ( त्या काळचा पेटंट शब्द) खरचटली. धड मागे जाता येईना की पुढे सरकता येईना. मोठ्यांदी ओरडाव तर ऐकायला भिंतीशिवाय तिथ होतच कोण! ‘ राम राम ‘ म्हणत “तु चाल पुढं मी आहे मागं” असं बडबडत पाचावर धारण बसलेल्या आम्ही, त्या पंचबोळातून पंचप्राण मुठीत घेऊन एकदाचे, ‘भारत माता की जय ‘ म्हणत भारत हायस्कूल पाशी पोहोचलो. कसंबस घरी आलो. प्रकरण सांगावं तर चोरीचा मामला, तंगडं मोडून हातात दील असत घरच्यांनी आमच्या. तरीपण खरचटलेली, ढोपरं बोलायचे ते बोललीच. पण बरं का! मंडळी सगळेच बोळ काही, असे घाबरवणारे नव्हते. पण त्यांची नाव मात्र मजेशीर होती हं! हल्लीच्या शगुन चौकातून (म्हणजे पूर्वीचा उंबऱ्या गणपती चौक) पुढे गेल की यायचा, मुंजाबाचा बोळ, त्याच्या समोरचा म्हणजे, तिथे भट कुटुंब राहयचे म्हणून तो भटांचा बोळ, शनिवारात सरदार नातूंच्या वाड्यांचा हा पसारा म्हणून तो नातूंचा, तर ओंकारेश्वर रस्त्यावर लागायचा तो तांबे बोळ, तुळशीबागेच्या दरवाजा समोरचा तो म्हणजे भाऊ महाराज बोळ, आमच्या जोगेश्वरी जवळचा पॅरेमाउंट टॉकीजच्या पुढचा म्हणजे तसल्या वस्तीतला बोळ. “तिथे गेलात तर तंगड मोडून हातात देईन” असा घरच्यांकडून सणसणीत दम भरलेला होता, शालूकरांचा वेश्या वस्तीतला बोळ. हं! तो मात्र ‘असं का बरं’? हा मनांत येणारा प्रश्न विचारण्याची प्राज्ञा नसलेला रहस्यमयीबोळ म्हणून लक्षात राहयला होता. जssरासं मोठ झाल्यावर कुणीतरी दिवे पाजळले, अगं शालूची दुकानं तिथे खूप होती म्हणे, शालू खरेदीला म्हणून त्या ‘तसल्या बायका’ तिथे आल्या असतील आणि शालू बघून तिथेच राहयल्या असतील. ” बायका शालू साठी वेड्या होतात हे ऐकलं होतं म्हणून, आम्ही पण नंदीबैला सारखी “हो रे असंच असेल रे” असं म्हणून मान डोलावली होती. एकंदरीत त्या बायका तिथे कशा?आणि कधी? आल्या असतील? हे तो शालूकर बोळच सांगू शकेल हो ना? जबडे वाड्यांचा जबडे बोळ पण होता. कंटाळलात नां बोळ प्रकरण वाचून! पण खरं सांगू या बोळीतून सुळकांडी मारायला आम्हाला फार आवडायच. आत्ता इथं तर लगेच तिथं, असा शॉर्टकट मारायला मज्जा यायची. “चल ग लवकर पोहोचू आपण” असं म्हणून सगळे पुण्याचे गल्ली बोळ आम्ही पालथे घातले होते. आता मात्र सिमेंटच्या जंगलांनी जबडा पसरून ह्या छोट्या बोळांना गिळंकृत केलय. सुसाट वाहणाऱ्या वाहनांची, माणसांची गर्दी, प्रदूषण मुक्त नव्हे प्रदूषण युक्त लहान मोठ्या रोड वरून जाताना तो रोड आता अंगावर आल्या सारखा वाटतोय, आणि जीव गुदमरतोय. पटकन एखाद्या बोळात आता शिरावस वाटत. पण पुढे रस्ता बंद ही पाटी वाचून आमचा ‘स्टॅच्यू’ होतो. पावसात दुकानांच्या गर्दीमुळे आडोसाच काय उन्हाचा कवडसा पण अंगावर घेता येत नाही. ते अंगण गेलं, ओसरी गेली, वाडे गेले, तो शांततेचा काळ गेला. रस्ता वाहतोच आहे वाहतोच आहे. पुला खालून बरंचस पाणी गेल आहे. जुनं कसबे पुणं आता नवं झाल, कुठेतरी जुन्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. त्या बघितल्या की मन मागे मागे भूतकाळात शिरत, आणि त्या आठवणीत रमत. आणि मग पुण्यनगरीला म्हणावसं वाटतं ‘कालाय तस्मै नमः’
☆ नायक… – लेखक : श्री राजेश्वर पारखे☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
भल्या पहाटे माझ्या मुलीला, डॉ. प्राप्तीला व माझ्या आईला शिर्डीला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगावला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूरला निघालो.
पहाटेची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते. आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटरच्या आसपास एस. टी. प्रवास झालेला होता. प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता.
आपली २००६ सालची मारुती व्हॅन घेऊन राहताच्या चौफुलीवर गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका १९ ते २० वर्षाच्या तरुणाने मला थांबण्यासाठी हात केला. त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला.
रस्ता पूर्णपणे मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता. उंचापुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवरसॅक पाठीमागे लटकावलेली, कानात अगदी साध्या पद्धतीच्या हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली.
त्याने एक स्मित हास्य दिले. माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले. विनम्रपणे तो ‘थँक्यू’ म्हणायला विसरला नाही…
श्रीरामपूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळच्या मस्त वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्याकडे बघितले. तसा तो हळुवार हसला. मी त्याला विचारले “कुठे जायचे आहे?”
तो म्हणाला “बाभळेश्वर. “
मी म्हटलं, “तिथेच की अजून कुठे, “
तो म्हणाला “मला ममदापूरला जायचे आहे. “
मी म्हटलं, “अरे वा! रस्त्यातच आहे. सोडतो मी तुला. ” पुढे अजून विचारले, “तिथं कुठं राहतो?”
तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला. “
मी म्हटलं “कुठून… ” उत्तर आले “वाकडी तुन”
मी त्याला म्हटलं “मग आपण अस्तगाव मधून जाऊ. तिथे वाकडी चौफुलीलाच तुला सोडतो. ” त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
गाडीने मस्त वेग घेतला होता, मी मध्येच विचारले, “आता कुठून आलास?”
तो म्हणाला “लातूर हून… ” असे म्हणताच “लातूर हून का बरं?”
तो म्हणाला, “माझा सत्कार होता लातूरला. मोटेगावकर सरांनी सत्कार केला. “
माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या आणि पुन्हा उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले, “कसला सत्कार?”
तो म्हणाला “ते नीट परीक्षेत मला ५९२ मार्क्स पडले म्हणून!”
मला तर आश्चर्याचा धक्काच बसला… भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या ‘नीट’ च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन् या बहाद्दराने तर कमालच केली होती. मी अक्षरशः वेग कमी करून गाडी साईडला थांबवली आणि पुन्हा त्याला विचारले, “किती मार्क्स?”
तो उत्तरला “५९२ मार्क्स. “
मी आश्चर्याचा सुखद धक्का पोहचल्यागतच त्याच्याशी मनोभावे हस्तांदोलन केले व त्याचे अभिनंदन केलें. मनात म्हटलं ‘अरे! हा तर टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टर डिग्री घेणारा भावी विद्यार्थी आहे… माझ्या व्हॅन मध्ये पहिल्यांदाच ‘नीट’ मध्ये इतके मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता.
आता मी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने त्याचे नाव विनायक विठ्ठलराव एलम असे सांगितले. वडील विहीर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे तो म्हणाला. त्याची मोठी बहीण, तिलाही दहावीला ९७. ७०% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीने ही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण इंजिनिअरिंग करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले.
तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो… एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते… मी विचारले “तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती ?”
तो म्हणाला “पाचवी. आई दुसरी झालेली. हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन आम्हाला शिकवले” असे तो भावुक होऊन सांगू लागला… हे सांगताना त्याचे डोळे पाणावलेले मला जाणवले.
मी म्हटले “तुमच्या वडिलांचीही आता माझी भेट होईल. खूप समाधान व आनंद वाटेल मला !
तो गालात हसला, म्हणाला, “माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर वर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघाही भावंडाना शिकविले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. ” तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली. मी गाडी थांबवली. त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होतीच.
मी व भावी डॉक्टर खाली उतरलो. तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले. उंचेपुरे, रापलेला चेहरा, अंगावर कामावरचे अक्षरशः मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो.
मी अदबीने हस्तांदोलनासाठी हाथ पुढे केला… त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला. एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो… त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले.
मी म्हणालो, “विठ्ठलराव, मानलं राव तुम्हांला. पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं. “
त्यांचं उत्तर आलं, “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा.. ” हे वाक्य म्हणतांना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते… “मी तुम्हाला पण ओळखतो. मी अन् सचिन एलम लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्याकडे घेऊन आलो होतो… “
बराच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले. यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…
मी म्हणालो, “आता जग तुम्हांला ओळखील… “
मनाला खूप समाधान वाटले, “एक फोटो होऊन जाऊ द्या डॉक्टर” असे त्या मुलाला म्हणताच तो लाजला. आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने आवर्जून सांगितली.
या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा ‘विनायक’ आता आमच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यामधील शिक्षणातला ‘ नायक झाला होता*…
मोटारसायकल लिलया वळवत विठ्ठलराव यांनी विनायकला पाठीमागे बसवून मला टाटा करीत आपल्या घराकडे निघाले. काळ्या मातीत राब राब राबून एक ‘नायक’ या बापाने या समाजाला दिला होता, कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टी निर्मात्याला ती मान्य होती… ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…
अनुभवातील शब्द….
लेखक : राजेश्वर पारखे, श्रीरामपूर
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “बोलताना थोडं सांभाळून बोला…” – लेखिका: श्रीमती संध्या घोलप ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
१) “हॅलो, अगं निशू, काय मेलीस की काय? मी एवढी आजारी होते तर साधा फोनही नाही केलास? “
“हॅलो काकू, मी जाई बोलतेय. निशा ताईंची सून. आई थोड्या आजारी होत्या. पण अचानक गेल्या हो. तीन आठवडे झाले. “
“काय?”
“हो, मला म्हणाल्या की नलूचा फोन येईल आणि ती विचारेल नेहमीप्रमाणे ‘मेलीस का?’ तर सांग तिला की खरंच मेली!”
२) अजयला promotion मिळाल्याचं समजलं आणि ऑफिस मध्ये सगळे पार्टी मागायला लागले.
“Done. येत्या रविवारी सगळे घरी या जेवायला. “
“अरे अजय, जरा वहिनींना विचार ना आधी. एवढ्या सगळ्यांना एकदम जेवायला बोलावतो आहेस!”
“त्यात काय विचारायचं? लग्नाची बायको आहे माझी! आमच्याकडे पद्धत नाहीये बायकांना विचारायची. ‘नाही ‘ म्हणायची हिंमत नाही तिची. “
“Very good, Mr Ajay. बरं झालं. मला तुमचा खरा चेहरा आज कळला. मी तुमचं promotion cancel करतोय. तुम्ही घरी जसं वागता, तसंच ऑफिस मधल्या महिलांशी वागलात, तर चालणारच नाही आम्हाला. “
३) ” मूर्ख, बावळट, बेअक्कल!” तात्या ओरडले.
” बाबा, तुम्हाला आमची खरी नावं आठवतात तरी का हो? आम्ही लहान असल्यापासून तुम्ही मला, ताईला आणि अगदी आईलाही हेच बोलायचात. कधी प्रेमाने काही हाक मारल्याचं आठवतंय? आई तर बिचारी एका शब्दाने तुम्हाला उलट बोलली नाही. ताई लग्न करून गेली आणि सुटली. माझी पन्नाशी उलटली तरी मी तेच ऐकतोय. आणि आता तुम्ही माझ्या बायको मुलांनाही असच बोलताय? ” सुजय शांत स्वरात बोलला.
तात्या विचारात पडले.
खरंच, बोलताना जपून बोलणं आवश्यक आहे!
लेखिका: श्रीमती संध्या घोलप
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- किर्लोस्करवाडी येथील आमच्या आठ वर्षांच्या वास्तव्यात आम्हा कुटुंबियांशी मनाने जोडले गेलेले हे पाटील कुटुंब. १९६७ मधे आम्ही कि. वाडी सोडल्यानंतर त्या कुणाशीच भेटी सोडाच आमचा संपर्कही रहाणे शक्य नव्हतेच. पण याला लिलाताई मात्र अपवाद ठरली होती!)
लिलाताईचं हे असं अपवाद ठरणं खूप वर्षांनंतर पुढं कधीतरी माझ्या संसारात घडणार असलेल्या दु:खद घटनेतून मला सावरुन जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संकल्पनांमधे लपलेलं गूढ ओझरतं तरी मला जाणवून देण्यास ती निमित्त ठरावी अशी ‘त्या’चीच योजना होती! ‘त्या’च्या या नियोजनाचे धागेदोरे लिलाताईशी आधीपासूनच असे जोडले गेलेले होते हे त्या आश्चर्यकारक घटनाक्रमानंतर मला मनोमन जाणवलंही होतं! आज या लेखनाच्या निमित्तानं हे सगळं पुन्हा जगताना दत्त महाराजांच्या माझ्यावरील कृपालोभाचं मला खरंच खूप अप्रूप वाटतंय!
या सगळ्यातली लिलाताईची भूमिका समजून घेण्यासाठी भूतकाळातल्या पाटील कुटुंबियांच्या आणि विशेषत: लिलाताईसंबंधीच्या आठवणींचा मागोवा घेणं आवश्यक आहे.
हे पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरापेक्षाही खालच्या स्तरातलं. तरीही कष्ट करीत मानानं जगणारं. लिलाताईच्या आईबाबांचा त्यांच्या लहानपणी सर्रास रुढ असलेल्या बालविवाहाच्या प्रथेनुसार नकळत्या वयातच लग्न झालेलं होतं. लिलाताई मोठ्या भावाच्या पाठीवरची आणि बहिणींमधे मोठी. एकूण पाच बहिणी आणि सहा भाऊ असं ते तेरा जणांचं कुटुंब. वडील किर्लोस्कर कारखान्यात कामगार. जेमतेम पगार. आर्थिक ओढाताण कधीच न संपणारी. सततच्या बाळंतपणांमुळे आई नेहमी आजारी. त्यामुळे घरची सगळी कामं लिलाताई आणि तिच्या पाठची बेबीताई दोघी शाळकरी वयाच्या असल्यापासूनच त्यांच्यावर येऊन पडली होती. हे सगळं सांभाळून अभ्यासही करणं झेपेना म्हणून बेबीताईने सातवी नापास झाल्यावर शाळा सोडलेली. लिलाताई मात्र अभ्यासात अतिशय हुशार. वर्गात नेहमीच पहिला नंबर. फक्त अभ्यासच नाही तर गाणं, वक्तृत्त्व, चित्रकला सगळ्याच स्पर्धांमधे तिचा पहिला नंबर ठरलेला. अतिशय शांत, सोशिक, हसतमुख, सात्विक वृत्तीची आणि स्वाभिमानी. मराठा कुटुंबात लहानाची मोठी होऊनही पूर्ण शाकाहारी. इंग्रजी, गणित, मराठी सगळ्याच विषयांवर तिचं प्रभुत्त्व! त्यामुळे शाळेतले मुख्याध्यापक आणि शिक्षक सर्वांचीच ती आवडती होती!
पण म्हणून अभ्यासाचं निमित्त करून तिने घरची कामं कधीही टाळली नाहीत. पाठच्या बहिणीच्या बरोबरीने पुढाकार घेऊन सगळ्या भावंडांची आणि घरकामाची जबाबदारी ती समर्थपणे आणि तेही हसतमुखाने पार पाडत राहिली. ती नववी पास होऊन दहावीत गेली तेव्हा दहावीत नापास झालेला तिचा मोठा भाऊ तिच्याच वर्गात आलेला. पुढे अकरावीत गेल्यावर (त्या वेळची मॅट्रिक) स्वतःबरोबरच त्यालाही अभ्यासात मदत करीत ती ते वर्ष पूर्णतः अभ्यासात व्यस्त राहिली. खूप शिकून मोठ्ठं व्हायचं आणि आपल्या घराला गरिबीच्या खाईतून बाहेर काढायचं हे तिचं एकमेव स्वप्न होतं! पण तसं व्हायचं नव्हतं. उलट त्या गरिबीच्याच एका अनपेक्षित फटक्याने तिचं स्वप्न चुरगाळून टाकलं. याला त्याच्याही नकळत निमित्त झाला होता तो तिच्याच वर्गात शिकणारा हाच तिचा मोठा भाऊ आणि रूढी-परंपरा न् सामाजिक रितीरिवाजांचा पगडा असणारे, सरळरेषेत विचार करीत आयुष्य ओढणारे तिचे कष्टकरी वडील! कारण मॅट्रिकच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस जवळ येत चालला तरीही दोघांच्या फाॅर्म फीच्या पैशांची सोय झालेली नव्हती. खरंतर वडील त्याच चिंतेत आतल्या आत कुढत बसलेले. अखेर फॉर्म भरायचा शेवटचा दिवस उजाडला तेव्हा सकाळी सात वाजता कारखान्यांत कामाला निघालेल्या वडिलांना लीलाताईने आज फॉर्म भरायची शेवटची तारीख असल्याची आठवण करुन दिली. “दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत मी कांहीतरी व्यवस्था करतो” असं सांगून त्याच विवंचनेत असलेले वडील खाल मानेने निघून गेले.
पण पैशाची कशीबशी सोय झाली ती फक्त एका फाॅर्मपुरतीच. मुलीपेक्षा मुलाचं शिक्षण महत्त्वाचं म्हणून वडिलांनी तिच्या मोठ्या भावाचा फॉर्म भरायला प्राधान्य दिलं. ‘ तू हवं तर पुढच्या वर्षी परीक्षेला बस’ असं हिला सांगितलं.
ती आतल्या आत कुढत राहिली. अभ्यास, परीक्षा या सगळ्यावरचं तिचं मनच उडालं.
मुख्याध्यापकांना सगळं समजलं तोवर खूप उशीर झाला होता. ते
तिच्यावर चिडलेच. ‘तू लगेच माझ्याकडे कां नाही आलीस? मला कां नाही सांगितलंस? मी फाॅर्मचे पैसे भरले असते’ म्हणाले. पण तोवर वेळ निघून गेलेली होती. नशिबाला दोष देत तिने तेही दुःख गिळलं. आपले वडील वाईट नाहीयेत, दुष्ट नाहीयेत हे स्वतःच्याच मनाला परोपरीने समजावून सांगितलं. नंतरच्या वर्षी मॅट्रीकची परीक्षा पास झाली पण परिस्थितीचा विचार करून नाईलाजाने तिने तिथेच आपलं शिक्षण थांबवलं!
शिक्षण थांबलं तरी स्वत: पूर्णवेळ गरजवंत घरासाठीच नाही फक्त तर स्वत:चा आनंद शोधत ती स्वत:साठीही जगत राहिली. भल्या पहाटे उठून घरासमोरच्या अंगणात सडा रांगोळी घालणं हे तिचं ठरलेलं काम. अंगणात रोज रेखाटलेल्या नवनव्या रांगोळ्या हे संपूर्ण कि. वाडीत वाखाणलं जाणारं तिचं खास वैशिष्ट्य होतं. तिच्या चिमटीतून अलगदपणे झरझर झिरपणाऱ्या रांगोळीच्या रेखीव अशा वळणदार रेखाकृतींमधले आकर्षक आकृतीबंध दृष्ट लागण्याइतके सुंदर असत. काॅलनीतले सगळेच ओळखीचे. त्यामुळे रस्त्यावरुन येणाजाणाऱ्या सर्वांच्याच नजरा आणि पाऊले पाटलांच्या अंगणाकडे हमखास वळायचीच!शिवणकला तर तिने निदान प्राथमिक तंत्र शिकून घेण्याची संधी मिळालेली नसतानाही सरावाने शिकून घेत त्याला कल्पकतेची जोड देऊन त्यात प्राविण्य मिळवलं होतं. त्याकाळी ‘फॅशन डिझाईन’ या संकल्पनेचा जन्मही झालेला नव्हता तेव्हाची ही गोष्ट. तिच्या कल्पनेतून साकारलेल्या विविध आकर्षक फॅशन डिझाईन्सवर तिच्या रांगोळ्यांतल्या आकृतीबंधांवर असायचा तसाच खास तिचा असा ठळक ठसा उमटलेला असे!
गणित हा विषयतर तिच्या आवडीचाच. त्याकाळी शिकवण्यांचं प्रस्थ रुढ नव्हतं झालेलं. तरीही अगदीच कुणी गळ घातली तर ‘मी माझं काम करता करता शिकवणार’ या अटीवर ती दरवर्षी अकरावीतल्या एक-दोन मुलांसाठी गणिताची स्पेशल ट्युशन घ्यायची. याखेरीज आपल्या सर्व भावंडांचा ती स्वत: अभ्यास घ्यायची तो वेगळाच. यातून महिन्याभरांत होणारी तिची कमाई वडिलांच्या तुटपुंज्या पगाराच्या जवळपास असायची जी घरासाठीच खर्चही व्हायची.
लिलाताईचीही दत्तावर अतिशय श्रध्दा होतीच. तिच्या रोजच्या कामांच्या धबगडयांत नित्यनेमांना कुठून वेळ असायला? मात्र आमच्या अंगणात दत्तपादुकांची
प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अंत:प्रेरणेनेच असेल पण कांही विशिष्ट संकल्प न सोडताही अगदी साधेपणाने लीलाताईचा नित्यनेम सुरु झाला होता. रोजचं सडासंमर्जन होताच ती आधी स्नान आवरुन पादुकांची पूजा संपण्यापूर्वीच बाहेर येऊन उभी रहायची आणि माझ्या बाबांनी तिला तीर्थप्रसाद देताच प्रदक्षिणा घालून एकाग्रतेने हात जोडून नमस्कार करायची. तिचा हा नित्यनेम पुढे अनेक दिवस न चुकता निर्विघ्नपणे सुरूही होता. पण एक दिवस अचानक याच पाटील कुटुंबाचं स्वास्थ्य नाहीसं करणारी ‘ती’ विचित्र घटना घडली.. ! म्हटलं तर एरवी तशी साधीच पण लिलाताईचं आत्मभान जागं करीत त्या घरालाच हादरा देऊन गेलेली!!
तो प्रसंग तिच्या दत्तगुरुंवरील श्रद्धेची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!
तो दिवस न् ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!
संपुर्ण 12 महिन्यात एव्हढा एकच महिना आहे जो “No” ने सुरू होतो… !
पण हा, “No” दरवेळी नकारात्मकता घेऊन येतो असं नाही…. !
“No” चा बोर्ड, जरासा फिरवला तर तो “On” होतो…
No म्हणजे… No worries..
No म्हणजे… No Guilt
No म्हणजे… No Hate
No म्हणजे… No Expectations
No म्हणजे… No Selfishness
No म्हणजे… No hard feelings !
असो ….
परवा एका जुन्या मित्राचा फोन येऊन गेला सहज बोलताना तो म्हणाला की नुकताच त्याचा वाढदिवस झाला… सगळे विचारतात तोच कॉमन प्रश्न मी त्याला विचारला आता तुझं वय किती झालं ?
त्याने वय सांगितलं… !
मनात आलं, आपण जन्माला आल्यानंतर आजपर्यंत जे काही जगलो, त्याला वय म्हणून आपण गृहीत धरतो; परंतु त्या अगोदरचे आईच्या सहवासातले नऊ महिने कोणीच का गृहीत धरत नाहीत ?
आकड्यात सांगायचं झालं, तर जन्मानंतर आपण आजपर्यंत जे जगलो, ते अधिक नऊ महिने हे आपलं आकड्यातलं वय… !
खरंतर वय वाढल्याने माणूस मोठा होतच नाही, तो मोठा होतो मॅच्युरिटी वाढल्याने… !!!
– – दुसऱ्याची प्रगती पाहतानाही आनंद होणं म्हणजे मॅच्युरिटी…
– –ज्याचा काल संध्याकाळी अस्त झाला आहे, त्याचा आज सकाळी उदय पाहणे यात आनंद वाटणे म्हणजे मॅच्युरिटी… !
– – स्वतःला वेदना झाल्यानंतर तर सगळेच रडतात; परंतु दुसऱ्याची वेदना पाहून आपल्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे संवेदना… वेदना आणि संवेदने मधला फरक कळणं म्हणजे मॅच्युरिटी…
जन्माला येताना निसर्गतः शरीरात 270 हाडं असतात… माणसाचं वय वाढलं की हीच हाडं आतल्या आत जुळून 206 होतात…
– – अगदी याचप्रमाणे वाढत्या वयाबरोबर अपेक्षांची संख्या सुद्धा आपण हळूहळू कमी करायला हवी… थोडं आपणही, हाडांप्रमाणेच जुळवुन घ्यायला शिकायला हवं… हेच तर निसर्गाला सांगायचं नसेल यातून ?
.. आपण जिवंत असताना सोबत घेऊन चालतो ते आपलं आस्तित्व… !
.. आयुष्य जगत असताना; दुसऱ्याला आपण किती दिलं आणि दुसऱ्याकडून किती घेतलं याच्या बेरीज आणि वजाबाकी करून; मृत्यूनंतर जे शिल्लक राहतं, ते आपलं व्यक्तिमत्व… !!
…. फरक फक्त दृष्टिकोनाचा !
शाळेच्या चार भिंतीत काटकोन, त्रिकोण, लघुकोन आणि चौकोन सर्व कोन शिकवतात…
पण दृष्टिकोन शिकण्यासाठी आयुष्यातल्या बिन भिंतीच्या शाळेत अनुभवच घ्यावे लागतात… !
शेवटी अनुभव म्हणजे तरी काय ?
बरोबर येण्यासाठी, आपण सतत केलेल्या चुकांना दिलेलं गोंडस नाव, म्हणजे अनुभव… !!!
असो.. या महिन्यातल्या चुका – अनुभव, कोन – दृष्टिकोन, वेदना – संवेदना, अस्तित्व – व्यक्तिमत्व या सर्व शब्दांचा अनुभव पुन्हा एकदा या महिन्यात आपल्यामुळे घेता आला.
वेदना – संवेदना
रस्त्यावर लहान मुलीसोबत राहणारी एक ताई. कधी फुगे विकून कधी भीक मागून गुजराण करायची.
एका गुरुवारी शंकर महाराज मठाकडे गेलो, तेव्हा कळलं, मुलीच्या आईला एका चार चाकी गाडीने उडवलं आणि तिचा जागीच अंत झाला. खूप हळहळ वाटली आणि बारा तेरा वर्षाच्या या मुलीचं आता कसं होणार ? अशी चिंता वाटली.
तिथं मागायला बसणाऱ्या आज्या आणि मावश्यांकडे मी ही चिंता व्यक्त केली. त्यातली एक प्रौढ मावशी पुढे आली आणि म्हणाली, ‘ काई काळजी करू नगा डाक्टर, या पोरीला समजायला लागल्यापासनं ती मला मावशी म्हंती… आता हीजी आई मेली, मावशी म्हणून काय हीला उगड्यावर ठीवू का ? मी जिवंत हाय तवर हीचां सांबाळ मीच करणार… ! ‘
या प्रौढ मावशीला आपण फुलं विकण्याचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. हिलासुद्धा कोणीही नाही. खूप वर्षांपूर्वी नवऱ्याचा अंत झाला… एक मूल होतं, ते कसल्याशा आजाराने लहानपणीच गेलं…
– –मी तिला म्हणालो, “ अग पण फुलांच्या व्यवसायात थोडेफार पैसे मिळतात… त्यात अजून एका व्यक्तीचा भार तुला झेपेल का ? “
“ काय डाक्टर… आईला लेकरांचा भार वाटला आस्ता तर, कोंच्याच आईनं लेकराला नऊ म्हैने पोटात घिवून मिरवलं नसतं… एकांदा घास मी कमी खाईन, त्यात काय ? आनी कमी जास्तीला तुम्ही हाईतच की… माझ्या पाठीत धपाटा घालत ती हसत बोलली… ! “
“ तसं नाही गं, कुठल्यातरी संस्थेत मी मुलीची व्यवस्था केली असती…”
“ डाक्टर आविष्यात एकदा आई झाले, तवा पोरगं देवानं न्हेलं… आता पुन्ना आई व्हायची येळ आली, तवा पोरगी तुम्ही न्हेनार… मंजी मी फकस्त “बाई” म्हनून जगायचं… मला बी मी मरायच्या आदी एकदा तरी “आई” हुंद्या की…! “
… माझ्या डोळ्यात खरोखर पाणी तरळलं…!
आपण खड्ड्यातून बाहेर आल्यावर दुसऱ्याला सुद्धा बाहेर येण्यासाठी हात द्यायचा… हे सतत मी माझ्या लोकांवर बिंबवत असतो… आज या माऊलीने हा विचार खरोखर अंमलात आणला.
आईच्या पदराला खिसा नसतो, पण आई द्यायची कधीच थांबत नाही…. ती कधीच कुठेही दूर जात नाही…
मनातल्या तळ कप्प्यात… ती कुठेतरी, “आभाळ” म्हणून भरून राहत असते.. हो आभाळच… !!!
कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात, ‘ ज्या ढगांमध्ये पाणी भरलेलं असतं ते “आभाळ”… आणि ज्यात पाणी नसतं… कोरडं असतं ते “आकाश”… ! ‘
आभाळ आणि आकाश यामध्ये फरक असतो… !!!
विज्ञान सांगतं, माणूस जगतो श्वासावर… रक्तावर…. पाण्यावर… लेकरांचे श्वास, रक्त आणि पाणी, स्वतःच्या नसानसात भरून आई “आभाळ” होते, कायम लेकरांसाठी “धड-पड” करत असते…
छातीच्या डाव्या बाजूला नेहमी “धड – धड” होत असते… विज्ञान त्याला हृदय म्हणतं… !
डॉक्टर असूनही, छाती ठोकून सांगतो माऊली, ही “धड – धड”… त्या हृदयाची नसतेच… ही “धड – पड” असते, त्या आभाळाची… “आई” नावाच्या हृदयाची… !!!
“ काका, मावशीनं मला चिमटा काडला, तीला सांगा ना …” पोरीनं खांद्याला हलवून मला भानावर आणलं… !
…. आता ती मुलगी; त्या मावशीसह थट्टा मस्करी करण्यात मश्गुल होती… !
मुलीला कसं सांगू ? तुला पदरात घेऊन…. तुझी आई होऊन… स्वतःला ती आयुष्यभर चिमटा काढत राहणार आहे… !
” एका प्रौढ महिलेने, दिला बारा वर्षाच्या मुलीला जन्म… !!! ” ही “डिलिव्हरी” नॉर्मल नव्हती… सिझेरियन सुद्धा नव्हतं… हा होता फक्त मातृत्वाचा सोहळा !!!
लोक तिला याचक म्हणतात….. आज बघता बघता ती आई म्हणून “आभाळच” होऊन गेली…
घेता हात, आज देता झाला… तिचे हेच हात, मी माझ्या कपाळाला लावले आणि त्यानंतर माझं कपाळ तिच्या पायावर टेकवलं… नतमस्तक झालो…
…. माझ्यासारखा एक कफल्लक, आईला दुसरं देऊच काय शकतो… ???
(त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण घेत आहोत)
प्रसंग दोन :
याच महिन्यात एका भीक मागणाऱ्या मुलाला छोटासा व्यवसाय टाकून दिला….
व्यवसाय म्हणजे काय तर, ज्या मंदिराच्या बाहेर तो भीक मागतो, त्याच मंदिराच्या बाहेर भक्तांच्या कपाळावर त्याने आखीव रेखीव असा मस्त उभा – आडवा गंध / ओम / त्रिशूळ काढायचा… त्यांना आरसा दाखवायचा… भक्त मग खुश होऊन 2 /5 /10 /20 /50 रूपये त्यांना जसे जमेल तसे पैसे देतील…!
हा खूप साधा सोपा व्यवसाय मी माझ्या अनेक याचकांना टाकून दिला आहे…
यात माझी इन्वेस्टमेंट किती ? फार तर 200 ते 300 रुपयांची…. अष्टगंध आणि काळा बुक्का विकत घेणे…
तो ठेवण्यासाठी एक चांगला कप्पा असलेला स्टीलचा डब्बा देणे…
यात पैशाची इन्व्हेस्टमेंट जास्त नसते.. !.. पण ‘ भीक मागू नका रे… हे साधं सोपं काम करा रे आणि सन्मानाने जगा रे ‘.. हे सांगायला मला साधारण माझ्या आयुष्यातले बारा ते पंधरा महिने द्यावे लागतात…
ही मात्र माझी इन्वेस्टमेंट… !
मी काही कुठला जहागीरदार नाही, संस्थानाचा संस्थानिक नाही, कारखानदार नाही, कंपनीचा मालक नाही, हातात कसलीही सत्ता नाही… मी तरी नोकऱ्या कुठून निर्माण करू ?
– – आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य, समाजातल्या रूढी – परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !
मनुष्याच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. यातील अनेक गोष्टींचा प्रभाव मनुष्याच्या मनावर दीर्घकाळ राहू शकतो, त्याला प्रभावित करू शकतो, नव्हे करतोच करतो…..
प्रत्येक मनुष्याचे आयुष्य, जीवन म्हणजे कंगोऱ्यांची वाटी म्हणता येईल. कंगोऱ्याची आत गेलेली बाजू जर दुःख मानली तर बाहेर आलेली बाजू सुख मानावी लागेल. प्रत्येकाच्या वाटीला असे कंगोरे कमीअधिक प्रमाणात असतात.
मनुष्याला प्रभावित करणारे अनेक पैलू आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यातील एक महत्वाचा मानला जातो.
एक मनुष्य होता. त्याला दोन मुले होती. दोघेही दहावीला होते. एक मुलगा नापास झाला तर दुसरा शाळेत पहिला आला. पत्रकारांनी त्या दोघांची मुलाखत घेतली तेव्हा दोघांनी एकच उत्तर दिले की माझे बाबा वारले म्हणून माझा शाळेत पहिला क्रमांक आला आणि माझे बाबा वारले म्हणून मी नापास झालो. घटना एकच आहे पण दोघांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याच्या त्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव दर्शवित असतो….
एकाने असे ठरवले असेल की आता माझे बाबा नाहीत, मी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दाखवले तर माझ्या बाबांना आनंद होऊ शकेल, त्याने तसा प्रयत्न केला आणि भगवंताने त्याला त्यात यश दिले…
आणि दुसऱ्याने…?
दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. दृष्टी तर प्रत्येकाला असते पण जो मनुष्य विवेकाने आपला दृष्टिकोन बदलतो, तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते….. !
जगात अनेक घटना घडत असतात, कधी त्यातील एक घटना आपल्या आयुष्यात घडते, ती आपली परीक्षा असते…. ! परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा की घाबरून परीक्षा न देण्याचा निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ?
☆ काय असते गिरनार वारी…? लेखक : श्रीकांत कापसे पाटील ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
नेहमी गिरनारला जायचे म्हटले की काही जण म्हणतात, ” काय वेड लागले की काय? दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस!”
हो. आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कशाला? बरोबर ना? (कारण… वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात.)
काय मिळतं तिथे सारखं जाऊन?
काम धंदे सोडून पळतात तिकडे ते…?
असं काय आहे गिरनार?
अहो, काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो, दर्शनासाठी… जिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली, वाईट केलेली कर्मं आठवतात ना ते आहे गिरनार…
तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते, ते आहे गिरनार…
जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली, बाहेरची कटकट विसरून पाच दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख, समाधान मिळतं ना, ते आहे गिरनार…
भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना, ते आहे गिरनार…
श्रीमंत, गरीब जिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार…
सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करूनसुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं, ते आहे गिरनार….
आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर, ते म्हणजे गिरनार….
ढोपरं दुखतात, दम लागतो, तरीसुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार…
जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते, अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते, ते गिरनार…
असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार… आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन? गिरनार…
माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघताना पाय निघत नाही, तसंच आमचं हे गिरनार…
हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना, ते हे गिरनार…
तर असंआहे गिरनार…
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
लेखक: श्री. श्रीकांत कापसे पाटील
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈