आमच्या काळात लहानपणापासून संयम या गुणाचा नकळत विकास झाला, बालपणापासूनच अनेक गोष्टीसाठी मन मारायला शिकलो आम्ही. वाट पहायला शिकलो आम्ही….. धीर धरणे हा शब्द प्रयोग अक्षरशः जगलो आम्ही.
उदा. सणवार आले की स्वयंपाक घर सुगंधाने दरवळत असे, सर्व पदार्थ देवाला नैवेद्य दाखवून खायचे, उष्टे करायचे नाहीत, नवीन कपडे देवाला दाखवून चांगला दिवस बघुन घालायचे, नवीन कपड्याची घडी मोडणे हा एक सोहळाच असे जणूकाही. यात एक विशेष बाब अशी की, आपले नविन कपडे कोणाला तरी घडी मोडायला देणे…. खूप मानाचे, आनंदाचे, प्रेमाचे समजले जाई… बहुतेक महिला आपली नवीन साडी घरातील किंवा बाहेरील मैत्रीण, बहीण वगैरे… नवीन साडीची घडी मोडायला देत असत.
एवढेच कशाला आपण एखादा पदार्थ कर असे आईला सांगितलं तर तो काही ताबडतोब होत नसे, वाट बघावी लागायची, जे ताटात असेल ते, मुकाट खावे लागे. भाजी आवडत नाही म्हणून तक्रार केली तर दुसरी भाजी तयार करून मिळणार नाही याची खात्री असे, मग काय… चटणी किंवा लोणच्या बरोबर गपचुप भाकरी खायची. कोणताही हट्ट फारसा पुरविला जात नसे. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नसे, पालक सरळ नाही म्हणत असत त्यामुळे नकार देखील पचवायला शिकलो आम्ही !
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत बाबीं मधे तडजोड करायला शिकलो.
आठवडी बाजारातून खाऊ आणल्यास, आईवडील त्या खाऊचे सर्व मुलांच्यात समान वाटप करत, कोणी एक मूल त्या खाऊला हात लावत नसे. सर्वजण सोबत तो खाऊ खात असत. एकट्याने खाण्याची प्रथा नव्हती, सवय नव्हती.
शेअरिंग…… आपोआप होत असे. शिकवण्याची गरज नव्हती.
वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सिल आणि दप्तर ही एकमेकांचे वापरत असत. तसेच मोठ्या भावा बहिणीचे कपडे घट्ट झाले की, धाकट्या नी घालायचे. अंथरूण पांघरूण ही एकत्रच असायचे.
Sharing is caring आज मुलांना शिकवावे लागते, ते आम्ही सहजपणे जगलो आहोत.
शाळेत जाताना पाण्याची बॉटल नेण्याची प्रथा नव्हती, किंबहुना घरात बॉटल च नसतं. शाळेत नळाचे पाणी सुट्टीमध्ये प्यायचो.
म्हणजे अधेमधे तहान लागली तर सुट्टी होण्याची वाट पाहायची, मन मारायची, संयम ठेवायची सवय लागली. आणि आज मुलं तास चालू असताना टीचर समोर सहजपणे बॉटल तोंडाला लावतात.
खरे तर याच संयमाचा आपल्याला जीवनात खूप खूप फायदा झाला आहे याची आता खूप जाणीव होतेय, मात्र हाच संयम आपण पुढच्या पिढीला नाही शिकवू शकलो ही खंत वाटते.
त्यांना ‘दोन मिनीट ‘ही सवय लागली… इन्स्टंट पदार्थ खायची सवय लागली, इन्स्टंट जीवन जगायची सवय लागली.
“इन्स्टंट जमान्यातील इन्स्टंट पिढी ” घडवली आपण…. ! आजची पिढी Use and throw हे तत्त्व सहजपणे शिकली. आम्ही मात्र Use and use पद्धतीने काटकसर, बचत करत, कंजूष झालो….
…. असे इतरांना वाटते !
कालाय तस्मै नमः.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची ! ”☆ श्री संभाजी बबन गायके☆
मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची !
”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा !”.. मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच ! आज मी मानसशास्त्रातील डीग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला.
मी म्हटलं, ”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे, मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात… एख्याद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून !”
बाबा म्हणाले, ”आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरुण आहे.. तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ”
.. हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका, पण एक अडचण आहे… त्याचं एक लग्न झालंय आधीच !”
माझ्या चेहऱ्यावरचं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, ”अगं आर्मी ऑफिसर आहे तो… तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच ”
माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो “.
त्यावर बाबा म्हणाले, ” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन. डी. ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहरादून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…’ स्वोर्ड ऑफ ऑनर ! ‘ हमने तुम्हारे लिए बात चलायी है…. ! “
… “ यानंतर बाबा माझ्याशी, आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझे कशातही लक्ष नव्हते…. मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं…. माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला.
मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रँक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या… बाबा म्हणालेच होते…’ बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे ! ‘
बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिनसाहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले.. वर्ष होते १९८५ ! साहेबांचे पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. ‘ वन्स अॅन आर्मीमॅन… ऑल्वेज अॅन आर्मीमॅन ‘च्या चालीवर मीही आर्मी वुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंबऱ्यापेक्षा त्यांचं मन ‘लाईन ऑफ अॅक्च्युल कंट्रोल’वरच्या उंबऱ्यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे “ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे संभालू? “ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे ‘ Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियनमध्ये पहिले पोस्टिंग झालेले ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C. D. S. अर्थात ‘चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर. त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर फुलांसारख्या दोन मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया, चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरुण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर? हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं लागतो… मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपिडीतांसाठी केलेल्या कामाचा अनुभव, या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते.. एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी… शोभली तर पाहिजेच ना? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते.. आणि ते स्वत: एक स्टार… मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार… दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलावारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिन साहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हँडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे… पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली… ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली… आणि मी ती आनंदाने साधतही होते…. शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association) ची प्रमुखही झाले होते… साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते… वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती… एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला मिळत असे… ८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते… आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे…. त्यांच्या हातात हात घालून !!! “
तो दुर्दैवी अपघात ८ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता.
… सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! जय हिंद ! जय हिंद की सेना !
(उपलब्ध माहितीवरून, संदर्भावरून, जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले हे स्वलेखन)
☆ व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
मला घरातील ज्येष्ठ मंडळी कायम स्मरणात असतात. त्यांची काही वाक्ये लहानपणी पासून ऐकतो. त्यावेळी फारसे कळायचे नाही. पण मोठ्यांना उलट प्रश्न विचारण्याचा तो काळ नव्हता. पण त्या मुळे मनावर चांगले संस्कार कोरले गेले. आणि त्यातील काही वाक्ये आत्ता लक्षात येतात आणि ती किती महत्वाची होती हे लक्षात येते. कोणत्याही पदार्थाला नकार दिला की एक वाक्य आजी कायम म्हणायची, कोणाचाही हात मोडू नये. हे ऐकून त्यावेळी आम्ही तोंडावर हात ठेवून हसत असू. मोठ्याने हसलो किंवा उलट बोलले तर मार मिळेल या भीतीने गुपचुप हसायचे. आणि हात कसा मोडतो? हा प्रश्न पडायचा. पण त्याचा अर्थ जसे वय वाढत गेले तसा लक्षात यायला लागला. आणि हे पूर्वीचे संस्कार फार महत्वाचे आहेत हेही जाणवते.
समोर आलेले अन्न आपण स्वीकारले नाही किंवा त्याला नकार दिला तर त्याचा आनादर होतो. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला दिलेले असते त्या व्यक्तीचाही अपमान होतो. त्यामुळे आपल्याला न आवडणारा पदार्थ समोर आला तर त्याला कधीही नकार देऊ नये. त्याचा आदर करण्यासाठी त्यातील एखादा अल्पसा घास तरी ग्रहण करावा. मी कित्येकदा असा अनुभव घेतला आहे, की एखादा पदार्थ नाकारला तर दिवसभर काहीच खायला मिळत नाही. अगदी जवळ पैसे, स्वतःचा जेवणाचा डबा असेल तरी जेवणासाठी वेळ मिळत नाही.
अजून एक विचार असा आहे, ज्या अन्ना मुळे आपले भरण पोषण होते त्याच अन्नाने आपला अनादर केला तर? आपल्या शरीरात अन्नद्वेष निर्माण झाला तर? आपले जगणे पण अशक्य होऊन जाईल. म्हणून कोणतेही अन्न मना पासून स्वीकारावे. तरच ते चांगले पोषण करते. आपण अन्नाला व पाण्याला भावना देऊ शकतो. त्या भावना अन्न ग्रहण करते. अन्नाला सकारात्मक व चांगल्या भावना देण्यासाठी आपल्या कडे स्वयंपाक करताना पाळायचे काही नियम असतात.
त्यामुळे हे अन्नाचा स्वीकार हे व्रत म्हणून सर्वांनीच आचरणात आणावे. तेच संस्कार आपल्या मुलांवर होणार आहेत. सोपे पण महत्वाचे व्रत आहे ना? माझ्या मताशी सहमत आहात का? नक्की कळवावे.
काल माझा सत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
हॉटेलात कशाला?? घरीच करु या की, असं वगैरे मी काही म्हणत नाही. किती बिल आलं? हे विचारण्याच्या भानगडीत मी पडत नाही.
आजकाल घरातील प्रत्येक event खूप मजेत पार पडतो. काही टेन्शन नसते. आता राज्य पुढच्या पिढीचे आहे.
आता फ्रंट सीट वर मुलगा, सून बसले आहेत. जनरेशन गॅप भरपूर, म्हणून सर्वच पद्धती बदलल्या आहेत. ते जे म्हणतात ते मी सहर्ष ऐकते.
मी एक गोष्ट नक्की ठरवली आहे •••
जमाने के साथ चलो. नेहमी टीमचा मेंबर रहायचं.
कोणाला जेवायला बोलावायचे आहे तर आपण यावेळेस डेक्कनवरील त्या नवीन हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या सुविधेनुसार ते जी वेळ, जागा ठरवितात आणि आम्ही दोघे तयार होतो.
आम्ही नवीन जगाशी adjust झालो आहोत….
आमच्या वेळेस ••• एवढा खर्च का? ••• घरात नाही करता येत का?? •••काय सारखं बाहेर जेवायचं?••• कामाचा कंटाळाच आहे. •••
या सर्व गोष्टी अजिबात बोलत नाही. रडगाणी गात नाही. काय गरज आहे? आजपर्यंत खूप कष्ट केले. खूप पैसे वाचविले. तो काळ वेगळा होता. पगार जेमतेम होते. येणारे जाणारे भरपूर असत. तेव्हा या आधुनिक पद्धतीचे प्रचलन नव्हते आणि परवडणारे पण नव्हते.
आता मजेत रहायला मिळतंय. घरात सर्व कामाला मावशी आहे. On line बरीच कामं होतात. मग बिघडलं कुठे ?
पन्नास वर्षांपूर्वी जीवनाची परिभाषा आजच्या तुलनेत वेगळी होती. एवढे आधुनिक विचार नव्हते. मनोरंजनाची परिभाषा वेगळी आणि सीमित होती. नातेवाईकांचे घरी येणे, भरपूर दिवस राहणे या सामान्य गोष्टी होत्या. कर्ज काढणे वगैरे गोष्टी नव्हत्या. अंथरूण पाहून पाय पसरावे ही गोष्ट मनावर एवढी बिंबवली होती, की ती लक्ष्मण रेषा ओलांडायला हिम्मत लागायची. हॉटेलिंगची गणना मौजमस्ती मध्ये होत असे. एवढी चमकधमक ही नव्हती. एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. झोमॅटो, स्वीगीचा जन्म झाला नव्हता.
अर्ध अधिक आयुष्य या परिस्थितीत गेलं. म्हणजे त्याचं मला अजिबात दुःख नाहीये. तेव्हा पण मी मजेतच होते. परिस्थिती प्रमाणेच वागले. आता जबाबदारी संपली आहे, असं जरी मी म्हणत असले तरी अजूनही मी मुलांकडे घराकडे लक्ष देतेच.
जुन्या गोष्टींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा, आताचे दिवस enjoy करायचे. तेव्हा आरशात स्वतःला बघायला वेळ मिळायचा नाही. आता माझा फोन नेहमी सेल्फी मोड मध्येच असतो. माझे माझे फोटो काढायचे आपल्याच नादात रहायचे.
स्वतः मध्ये रमता आलं, की स्वतःपेक्षा बेस्ट option दुसरा कोणीच वाटत नाही.
प्रेशर कुकर सारखं जगायचं. बाहेर किती ही आग लागू दे, आत किती ही प्रेशर असू दे, शिट्या वाजवत जगायचं मजेत.
…. हे सगळं समजेपर्यंत बराच काळ निघून गेला, इतका की आयुष्याची सत्तर वर्षे संपली त्यावेळी मोबाईल नव्हते. मोबाईल आल्यावरही माझ्या हातात येईपर्यंत वेळ गेलाच.
काळ बदलत गेला, तसे माझ्या आजूबाजूचे रिंगण वाढत गेलं. अनेक गोष्टी समजत गेल्या. स्वतःचा आनंद कशात आहे? हे आपल्यालाच शोधायचे असते, हे खूप उशीरा कळलं….
स्वतः कसं जगायचं? हे आपणच ठरवायचं असतं म्हणे. हे समजायला आणि पचायला बराच वेळ लागला. घरच्या आजूबाजूच्या आपल्याच माणसांमध्ये एवढी बिझी असायचे की मला मीच शोधता आले नाही. आपल्या स्वतःसाठी वेळ देणे हे चूक नाही, हा गुन्हा नाही. हे फार उशिरा कळलं.
मला चांगलं आठवतंय ••• अजयच लग्न झालं होतं तेव्हा त्याने अनिताला सांगितले होते, ‘ की माझ्या आई बाबांनी खूप कष्ट केले आहेत. लहानपणी मी पैशाची चणचण बघितली आहे. म्हणूनच महागड्या वस्तू स्वस्त वाटेपर्यंत कष्ट करायचे आणि तसे पैसे कमवायचे हे मी ठरवलं होतं. आई बाबांनी आणि मी स्वतः शिक्षणावर लक्ष दिलं, त्यामुळे आज मी चांगल्या नोकरीत आहे. माझे म्हणणे असेही नाही की तू घरची कामं कर. दोघीही मजेत रहा. ’
अजय अनिताने आमच्या दोघांचे दिवस पालटले.
लग्नानंतर अजयला नवीन कार घ्यायची होती तेव्हा आम्ही त्याला सिक्स सीटर कार घे, म्हणजे अनिताचे आई बाबा पण आपल्या बरोबर सहज बाहेर जाऊ शकतील, असा सल्ला दिला. आज बरेचदा आम्ही सर्व एकत्र बाहेर जातो.
दोन्ही आई बाबांना मुलं छान सांभाळतात.
आधी TV नंतर मोबाईलने आज जगण्याची दशा, दिशा, गती सर्वच बदललंय, विचारांमध्ये तर क्रांतीच आली आहे.
आज ज्येष्ठांसाठी आपले शौक, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ अनेक गोष्टी आहेत.
पुढच्या पानावर काही तरी भारी लिहिलं असेल या विचाराने मी रोज एक पाऊल पुढे टाकते.
खूप विचार करत बसत नाही. कोणी सोबत केली तर With you नाही तर Without you.
असा सरळ सोप्पा हिशोब ठेवते.
सध्या मी माझ्याच प्रेमात आहे. मस्त बिनधास्त जगतेय.
एक लक्षात आलंय •••
शेवटी रोजचे खात्यात जमा झालेले १४४० मिनिटे मी कसे घालवायचे? हे माझं मलाच ठरवायच आहे.
लेखिका : संध्या बेडेकर
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जीभ… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्वीकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत- बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ!
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ!
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ !
तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ!
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ!
भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे काम करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ !
दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ !
काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा कामानिराळा राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनीनिर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणू काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
उगाच नाही म्हटलंय__
जेणे जिंकीली रसना ।
तृप्त जयाची वासना ।
जयास नाही कामना ।
तो सत्वगुण ।।
– दासवाणी
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न येणे असा नसून अंतिम ध्येय गाठा असा आहे. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही तर ईच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे ते अयशस्वी होतात. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.
आपल्या दृष्टीकोनात बदल करून माणूस आपले आयुष्य बदलू शकतो. प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाच आहे. तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपोआपच तुम्हांला सद्बुद्धी लाभेल.
मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात तुमची मनःशांती ढळू देणार नाही. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. स्वयम् सुधारणेसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यावर टीका करायची वेळच उरणार नाही!
काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो.
प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील गती किंवा क्षमता ओळखून जीवन जगण्यासाठीची सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण!!
अर्धवट ज्ञान धोकादायक असते अज्ञान हे भीती हटवादीपणा, पूर्वग्रह अशा दोषांना जन्म देते. आपल्या बलस्थानांची जोपासना करणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे, अत्यंत गरजेचे आहे.
सकाळची सुरवात सकारात्मक वाचनाने केली पाहिजे. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून समर्थ होण्यासाठी धडपडू दिले नाही तर त्यांचेच नुकसान करतो आहोत. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही,शिड कसं लावायचं हे आपण ठरवू शकतो ! माणसाच्या मनामध्ये जे रुजतं किंवा माणूस मनात जे आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट तो माणूस साध्य करू शकतो.
जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशिबवान असाल. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. आणि मोजकीच माणसं शंभर टक्के काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.
कोणत्याही गोष्टीतील कौशल्य नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि सराव करावा लागतो. कठोर परिश्रम आणि अखंड सराव त्यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. एक म्हण आहे “हातोड्याच्या घावाने काचेचे तुकडे होतात परंतु पोलाद घडविल्या जाते”.
एखादी गोष्ट आपल्या मनात येईल तेव्हा व तशी करणे ह्यापेक्षा जशी आणि जेव्हा करणे गरजेचे आहे त्यासाठी मनाची शिस्त असावी लागते. भावनांवर आपण मात केली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास परत मिळविला पाहिजे. नकारात्मक विचाराचे लोक धोकादायक असतात. बहुसंख्य लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करण्यापेक्षा मौजमजेच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात अधिक वेळ घालवतात. सामान्य असणं जेवढं सोपं आहे त्यापेक्षा उत्तम असणं कितीतरी कठीण!!
माणसाचं व्यक्तिमत्त्व हे त्याचं चालणं, बोलणं, त्याच्या आवाजातील मार्दव, आणि आत्मविश्वास यामधून जाणवतं. माणसाचा दृष्टीकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव आपल्या कपड्या पेक्षा अधिक प्रभाव कारक असतो!
तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वत:शीही उत्तम वागत असता. चांगुलपणा नेहमी तुमच्याकडे परत येत असतो. हा जगाचा नियमच आहे. ‘जग आहे असं आपल्याला दिसत नाही तर आपण जसे आहो तसं ते दिसतं ‘. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. हे यशस्वी जगण्याचं तत्वज्ञान आहे. ‘स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाला!’ त्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हाल.
मित्रांनो, ह्या काही नोंदी किंवा ते टिपणं आहेत माझ्या डायरीतील, तुमच्याशी त्या शेअर कराव्या वाटल्या म्हणून हा प्रपंच!!
तबलानवाझ पद्मविभूषण झाकीर हुसेनजी यांच्या मृत्यूची बातमी वाचली… टीव्हीवर ऐकली …. खूप वाईट वाटलं. आणि मनातल्या त्यांच्या आठवणी उफाळून आल्या. त्यातल्या काही अनमोल आठवणी व्यक्त केल्याशिवाय आज खरंच रहावत नाहीये…
१९८३ साली सेवासदन संस्थेचा ६0 वा वर्धापनदिन होता… म्हणजे हिरक महोत्सव. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातला सर्वाधिक संस्मरणीय ठरलेला कार्यक्रम होता शास्त्रीय संगीताचा. या कार्यक्रमात फार मोठे कलाकार सहभागी झाले होते. हे कलाकार एवढे दिग्गज होते की, मुळात एवढे मोठे कलाकार सोलापुरात आणि सेवासदनच्या कार्यक्रमात यायला कबूल कसे झाले असा प्रश्न सर्वांना पडला. पण तो प्रायोजित कार्यक्रम होता. इंडियन टोबॅको कंपनीने हा तीन दिवसांचा कार्यक्रम प्रायोजित केला होता. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला आय. टी. सी. संगीत संमेलन असे नाव होते. त्यात सहभागी झालेले कलाकार जागतिक कीर्तीचे होते.
प्रतिमा बेदी यांचे नृत्य, झाकीर हुसेन यांची तबल्याची साथ आणि स्वतंत्र तबला वादन, व्ही जी जोग यांचे व्हायोलीन वादन, डॉ. किचलू यांचे गायन अशी कलाकारांची मांदियाळी सांगितली तरी या कार्यक्रमाची उंची लक्षात येईल. कार्यक्रमाची तयारीही तशीच केलेली होती. मंडप टाकला होता. तिकिटे लावली होती. सर्वात पुढचे तिकिट १00 रुपयांचे होते. आता १00 रुपयांचे काही वाटणार नाही पण मी १९८३ चे दर सांगत आहे. तेव्हा १00 रुपये ही मोठी रक्कम होती. मात्र कलाकार सर्व दर्जेदार असल्यामुळे तरीही तिकिट विक्री अल्पावधीतच पूर्ण झाली होती.
कार्यक्रम जानेवारी महिन्यात होता. या काळात पाऊस पडेल असे ध्यानी मनी स्वप्नीसुद्धा वाटले नव्हते. पण व्ही. जी. जोग यांचे व्हायोलीन वादन आणि झाकीर हुसेन यांचा तबला यांची जुगलबंदी होणार होती त्या दिवशी अचानकच पावसाला सुरुवात झाली. काय करावे असा प्रश्न पडला. मग ताबडतोब निर्णय घेतला आणि कार्यक्रमाचे स्थळ बदलून रंगभवन असे केले. तिकिट विक्री थांबवावी लागली कारण रंगभवन सभागृहाची क्षमता मंडपाएवढी नव्हती. कसे का असेना पण तिथे ही जुगलबंदी सुरू झाली.
या विलक्षण रंगलेल्या जुगलबंदीची आठवण अजूनही मला आहे. ती संपली तेव्हा पं. विष्णुपंत जोग यांनी शेवटी टिंग असा आवाज केला तर झाकीर हुसेन यांनी हातातला हातोडा तबल्यावर आपटून ठप्प असा आवाज केला. जुगलबंदीचा शेवट टाळ्या घेऊन गेला. ही जुगलबंदी संपून पुढचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण पंडितजी म्हणजे जोग यांनी आता विश्रांतीची गरज आहे असे म्हटल्यामुळे त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन सोडावे लागले.
सारे कलाकार राजधानी हॉटेलवर उतरले होते. मी आणि तडवळकर सर गाडी घेऊन त्यांना सोडायला निघालो. सभागृहाच्या दारात आलो पण पंडितजींच्या चपलाच सापडेनात. खूप शोधाशोध केली पण चपलेचा पत्ता लागला नाही. शेवटी पंडितजी म्हणाले, “चलो हमे आज यहाँसे नंगे पाव जाना पडेगा.” असे म्हणून आम्ही बाहेर पडलो. सभागृहाच्या बाहेर नंगे पाँव पंडितजी आणि आम्ही गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच झाकीर हुसेन तिथे धावत धावत आले.
….. ते ओरडले, “ पंडितजी रुकिये, आपकी चप्पल मिल गयी है. “ आणि असे ओरडतच ते ती चप्पल आपल्या छातीशी धरून घेऊन आले. चप्पल खाली टाकली आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांना ते चप्पल घालण्याची विनंती करायला लागले. पंडितजींच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा कोसळायला लागल्या. ते म्हणाले, “ आपने मेरी चप्पल सीनेसे लगायी है !” त्यावर झाकीर हुसेन म्हणाले, “ तो क्या हुआ ? मला तुमची चप्पल उराशी लावता आली हे माझे नशीब आहे. “
खरा कलाकार किती नम्र असतो याचे ते दर्शन घडून आम्हालाही गहिंवरून आले. आमच्या समोर एक अविस्मरणीय घटना घडत होती. तिचे साक्षी आम्हीच होतो. याचे वाईटही वाटले. कलाकाराच्या विनयशीलतेचा हा प्रसंग जगाला दिसायला हवा होता असे वाटले कारण झाकीर हुसेनच काय पण कोणा सामान्य माणसालाही अशी कोणा कलाकाराची चप्पल हृदयाशी धरण्यात कमीपणाच वाटला असता. ती सापडल्यावर कोणाकडून तरी ती पाठवून दिली असती.
हा प्रसंग घडताना स्वच्छ चांदणे पडले होते आणि साक्षात चंद्र या घटनेचा साक्षीदार होता. कोणीही व्यक्ती दिसते कशी आणि कपडे कशी घालते याचा तर प्रभाव पडतोच पण, तो चिरकाल टिकत नाही. मात्र कोणीही माणूस आपल्या वर्तनातून व्यक्त होतो तेव्हा त्याचा खरा आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत असतो.
तो क्षण मी आजही विसरू शकत नाही.
कमालीचा कलावंत … भारतीयांचा अभिमान … विलक्षण नम्र माणूस … असा माणूस आपल्यातून गेला आहे. असा तबलापटू होणे नाही .. त्यांच्या वागण्यातील सुसंस्कृतपणा, बोलण्यातील मार्दव भारावून टाकणारे होते. सेवासदनमधील आम्ही भाग्यवंत माणसं … आमचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला … बोलता आलं … पाहता आलं … ऐकता आलं…!
अशा ह्या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली !!!!!
बंडू आणि बेबीची वहिनी म्हणून गल्लीतले सारेच त्यांना वहिनीच म्हणायचे. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अनेक स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. नात्यातल्या, शेजारपाजारच्या, काही सहज ओळखीच्या झालेल्या, काही शिक्षिका, काही मैत्रिणी, लग्ना आधीच्या, लग्नानंतरच्या, एका संस्थेच्या माध्यमातून काम करण्याच्या निमित्ताने भेटलेल्या तळागाळातल्या स्त्रिया, घरातल्या मदतनीस, ठिकठिकाणच्या प्रवासात ओळख झालेल्या, निराळ्या धर्माच्या,संस्कृतीच्या, सहज भेटलेल्या अशा कितीतरी सबल, दुर्बल, नीटनेटक्या, गबाळ्या, हुशार, स्वावलंबी, अगतिक, असहाय्य, परावलंबी, जिद्दी, महत्त्वाकांक्षी तर कुठलंच ध्येय नसलेल्या वारा वाहेल तशा वाहत जाणाऱ्या स्त्रिया मला ठिकठिकाणी भेटल्या पण लहानपणीच्या वहिनींना मात्र माझ्या मनात आजही एक वेगळाच कोपरा मी सांभाळून ठेवलेला आहे. त्यावेळी वहिनींच्या व्यक्तिमत्त्वातलं जे जाणवलं नाही त्याचा विचार आता आयुष्य भरपूर अनुभवलेल्या माझ्या मनाला जाणवतं आणि नकळत त्या व्यक्तिमत्त्वासमोर माझे हात जुळतात.
विस्तृत कुटुंबाचा भार वहिनींनी पेलला होता. त्यांचं माहेर सातार्याचं. तसा माहेरचाही बहीण भावंडांचा गोतावळा काही कमी नव्हता पण सातारचे बापूसाहेब ही एक नावलौकिक कमावलेली असामी होती. साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी म्हणून सातारकरांना त्यांची ओळख होती आणि त्यांची ही लाडकी कन्या म्हणजे आम्ही हाक मारत असू त्या वहिनी. वहिनींनाही बापूसाहेबांचा फार अभिमान होता. पित्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाबाळांना घेऊन त्या माहेरपणाला सातारी जात आणि परत येत तेव्हा त्यांच्यासोबत धान्य, कपडे, फळे, भाज्या, मिठाया विशेषत: कंदी पेढे यांची बरीचशी गाठोडी असत. वहिनींचा चेहरा फुललेला असे आणि त्यांच्या मुलांकडून म्हणजेच आमच्या सवंगड्यांकडून आम्हाला साताऱ्याच्या खास गमतीजमती ऐकायलाही मजा यायची.
अशी ही लाडकी बापूसाहेब सातारकर यांची कन्या सासरी मात्र गणगोताच्या गराड्यात पार जुंपलेली असायची.
आमचं कुटुंब स्वतंत्र होतं. आई-वडील, आजी आणि आम्ही बहिणी. मुळातच वडील एकटेच असल्यामुळे आम्हाला फारशी नातीच नव्हती, विस्तारित नात्यांच्या एकत्र कुटुंबात राहण्याचा आम्हाला अनुभवच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या मुल्हेरकरांचे कुटुंब नक्कीच मोठं होतं. बाबासाहेब आणि वहिनी या कुटुंबाचे बळकट खांब होते. आर्थिक बाजू सांभाळण्याचं कर्तव्य बाबांचं आणि घर सांभाळण्याची जबाबदारी वहिनींची. घरात सासरे, नवऱ्याची म्हातारी आजारी आत्या, दीर, नणंद आणि त्यांची पाच मुलं. धोबी गल्लीतलं त्यांचं घर वडिलोपार्जित असावं. बाबासाहेबांनी त्यावर वरचा मजला बांधून घेतला होता. वहिनींच्या आयुष्यात स्वत:चं घर हा एकच हातचा मौलिक असावा.
त्यावेळी दोनशे रुपये महिन्याची कमाई म्हणजे खूप होती का? बाबासाहेब आरटीओत होते. त्यांचाही स्वभाव हसरा, खेळकर, विनोदी आणि परिस्थितीला टक्कर देणारा होता. बाबासाहेब आणि वहिनींच्यात त्याकाळी घरगुती कारणांमुळे धुसफुस होतही असेल पण तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याच सामर्थ्यावर वहिनी अनंत छिद्रे असलेला संसार नेटाने शिवत राहिल्या. काहीच नव्हतं त्यांच्या घरात. झोपायला गाद्या नव्हत्या, कपड्याचं कपाट नव्हतं, एका जुनाट पत्र्याच्या पेटीत सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. म्हातारी आजारी आत्या— जिला “बाई” म्हणायचे.. त्या दिवसभर खोकायच्या. सासरे नानाही तसे विचित्रच वागायचे पण बंडू बेबी आणि बाबासाहेबा या भावंडांचं मात्र एकमेकांवर खूप प्रेम होतं. बेबीला तर कितीतरी लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली असावी. ती शाळा, अभ्यास सांभाळून वहिनींना घर कामात अगदी तळमळीने मदत करायची. खरं म्हणजे तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतरही नव्हतं पण मला ज्या गोष्टी त्यावेळी येत नव्हत्या त्या ती अतिशय सफाईदारपणे तेव्हा करायची. त्यामुळे बेबी सुद्धा माझ्यासाठी एक कौतुकाची व्यक्ती होती. शिवाय त्यांच्या घरी सतत पाहुणेही असायचे. त्यांच्या नात्यातलीच माणसं असत. काहींची मुलं तर शिक्षणासाठी अथवा परीक्षेचं केंद्र आहे म्हणून त्यांच्या घरी मुक्कामी सुद्धा असायची. प्रत्येक सण त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने, साग्रसंगीत साजरा व्हायचा. दिवाळी आणि गणपती उत्सवाचंच तर फारच सुरेख साजरीकरण असायचं. खरं सांगू ? लहानपणी बाह्य गोष्टींचा पगडा मनावर नसतोच. भले चार बोडक्या भिंतीच असतील पण त्या भिंतीच्या मधलं जे वातावरण असायचं ना त्याचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी वहिनी होत्या.
किती सुंदर होत्या वहिनी! लहानसाच पण मोहक चेहरा, नाकीडोळी नीटस, डोळ्यात सदैव हसरे आणि प्रेमळ भाव, लांब सडक केस, ठेंगणा पण लवचिक बांधा, बोलणं तर इतकं मधुर असायचं …! संसाराची दिवस रात्रीची टोकं सांभाळताना दमछाक झाली होती त्या सौंदर्याची.
अचानक कुणी पाहुणा दारी आला की पटकन त्या लांब सडक केसांची कशीतरी गाठ बांधायच्या, घरातलंच गुंडाळलेलं लुगडं, सैल झंपर सावरत अनवाणीच लगबगीने वाण्याकडे जायच्या. उधार उसनवारी करून वाणसामान आणायच्या आणि आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवायला घालून त्याने दिलेल्या तृप्तीच्या ढेकरानेच त्या समाधानी व्हायच्या. वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. साधं “लिंबाचं सरबत सुद्धा” अमृतासारखं असायचं. त्यांच्या हातच्या फोडणीच्या भाताची चव तर मी आजही विसरलेली नाही. अनेक खाद्यपदार्थांच्या चवीत त्यांच्या हाताची चव मिसळलेली असायची. मला आजही आठवतं सकाळचे उरलेले जेवण लहान लहान भांड्यातून एका मोठ्या परातीत पाणी घालून त्यात ठेवलेलं असायचं, त्यावर झाकण म्हणून एखादा फडका असायचा. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मी कित्येकदा चित्रा, बेबी बरोबर त्या परातीतलं सकाळचं जेवण जेवलेली आहे. साधंच तर असायचं. पोळी, कधी आंबट वरण, उसळ, नाहीतर वालाचं बिरडं, किंवा माशाचं कालवण पण त्या स्वादिष्ट जेवणाने खरोखरच आत्म्याची तृप्ती व्हायची. त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं! लहानपणी कुठे कळत होतं कुणाची आर्थिक चणचण, संसारातली ओढाताण, काळज्या, चिंता. एका चपातीचीही वाटणी करणे किती मुश्कील असतं हा विचार बालमनाला कधीच शिवला नाही. घरात जशी आई असते ना तशीच या समोरच्या घरातली ही वहिनी होती. आम्हाला कधीच जाणवलं नाही की वहिनींच्या गोऱ्यापान, सुरेख, घाटदार मनगटावर गोठ पाटल्या नव्हत्या. होत्या त्या दोन काचेच्या बांगड्या. त्यांच्या गळ्यात काळ्या मण्याची सुतात ओवलेली पोतही आम्हाला सुंदर वाटायची. त्यांच्या पायात वाहणा होत्या की नव्हत्या हे आम्ही कधीच पाहिले नाही. आम्हाला आठवते ते सणासुदीच्या दिवशी खोलीभर पसरून ठेवलेला सुगंधित, खमंगपणा दरवळणारा केवढा तरी चुलीवर शिजवलेला स्वयंपाक आणि पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं ते घर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटणाऱ्या त्या पंगती आणि हसतमुखाने आग्रह कर करून वाढणाऱ्या वहिनी. हे सगळं त्यांना कसं जमत होतं हा विचार आता मनात येतो.
मला टायफॉईड झाला होता.तोंडाची चव पार गेली होती. वहिनी रोजच माझ्याजवळ येऊन बसायच्या. एकदिवस मी त्यांना म्हटलं, “शेवळाची कणी नाही का केली?” दुसर्या दिवशी त्या माझ्यासाठी वाटीभर “शेवळाची कणी” घेउन आल्या. अत्यंत किचकट पण स्वादीष्ट पदार्थ.पण वहिनी झटपट बनवायच्या.
काळ थांबत नाही. काळा बरोबर जीवन सरकतं नाना—बाई स्वर्गस्थ झाले. बाबासाहेबांनी यथाशक्ती बहीण भावाला त्यांना पायावर उभे राहण्यापुरतं शिक्षण दिलं. बेबी च्या लग्नात आईच्या मायेने वहिनींनी तिची पाठवणी केली. आयुष्याच्या वाटेवर नणंद भावजयीत वाद झाले असतील पण काळाच्या ओघात ते वाहून गेलं. एक अलौकिक मायलेकीचं घट्ट नातं त्यांच्यात टिकून राहिलं. माहेरचा उंबरठा ओलांडताना दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. विलक्षण वात्सल्याचं ते दृश्य होतं. बेबी आजही म्हणते!” मी माझी आई पाहिली नाही. मला माझी आई आठवत नाही पण वहिनीच माझी आई होती.”
धन, संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय असतं हो? शब्द, भावनांमधून जे आत्म्याला बिलगतं त्याहून मौल्यवान काहीच नसतं.
बाबा वहिनींची मुलंही मार्गी लागली, चतुर्भुज झाली. जुनं मागे टाकून वहिनींचा संसार असा नव्याने पुन्हा फुलून गेला. पण वहिनी त्याच होत्या. तेव्हाही आणि आताही.
बाबासाहेब निवृत्त झाले तेव्हा काही फंडांचे पैसे त्यांना मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा ते म्हणाले,” सहजीवनात मी तृप्त आहे. मला अशी सहचारिणी मिळाली की जिने माझ्या डगमगत्या जीवन नौकेतून हसतमुखाने सोबत केली. माझ्या नौकेची वल्ही तीच होती. मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. तिचं डोंगराएवढं ॠण मी काही फेडू शकणार नाही पण आज मी तिच्या भुंड्या मनगटावर स्वतःच्या हाताने हे सोन्याचे बिलवर घालणार आहे. “ .. त्यावेळचे वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव मी कोणत्या शब्दात टिपू? पण त्या क्षणी त्यांच्या परसदारीचा सोनचाफ्याचा वृक्ष अंगोपांगी फुलला होता आणि त्या कांचन वृक्षाचा दरवळ असमंतात पसरला होता. तो सुवर्ण वृक्ष म्हणजे वहिनींच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता आणि तोही जणू काही अंतर्यामी आनंदला होता.
अशोक (त्यांचा लेक) एअर इंडियात असताना त्याने वहिनी आणि बाबासाहेबांसाठी लंडनची सहल आयोजित केली. विमानाची तिकिटे तर विना शुल्क होती. बाकीचा खर्च त्यांनी केला असावा. वहिनींना मुळीच जायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर जाण्याचे मान्य केले. वहिनींच्या आयुष्यात असा क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण त्याचवेळी त्यांच्या प्रियजनांचा आनंदही खूप मोठा होता. त्या जेव्हा लंडनून परत आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. धोबी गल्ली ते लंडन— वहिनींच्या आयुष्यातला अकल्पित टप्पा होता तो! मी त्यांना विचारलं,” कसा वाटला राणीचा देश ?”
तेव्हा त्या हात झटकून म्हणाल्या,” काय की बाई, एक मिनिटंही मी बाबासाहेबांचा हात सोडला नाही. कधी घरी जाते असं झालं होतं मला! “
.. .. .. त्यावेळी मात्र वहिनींकडे पाहताना “इथेच माझे पंढरपुर” म्हणणारी ती वारकरीणच मला आठवली.
“ ते जाऊदे ग! हे बघ सकाळी थोडी तळलेली कलेजी केली होती. खातेस का?”
.. .. त्या क्षणी मला आठवलं ते मोठ्या परातीत पाणी घालून झाकून ठेवलेलं सकाळचं उरलेलं चविष्ट जेवण!
या क्षणी माझ्याजवळ होती ती तीच अन्नपूर्णा वहिनी. प्रेमाने खाऊ घालणारी माऊली…
आज वहिनी नाहीत पण जेव्हा जेव्हा मी काटेरी फांदीवर उमललेलं टवटवीत गुलाबाचे फुल पाहते तेव्हा मला वहिनींचीच आठवण येते..
शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)
फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.
कार्य व सन्मान:
संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
वसंत व्याख्यानमाला, पुणे
निमंत्रित विख्यात : इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी
पुरस्कार
वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट), वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट), श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)
प्रकाशित साहित्य
एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन
इंद्रधनुष्य
☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆
(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)
पुस्तक : त्या चं असं झालं
लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर
प्रकाशक : चतुरंग प्रकाशन
पृष्ठ : 264
किंमत : रु. 150
त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !
त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!
त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व !
त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!
त्याचं असं झालं, .. एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर !
त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग!
त्याचं असं झालं, .. एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती श्री आदित्य बिर्ला!
त्याचं असं झालं, .. सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती, श्री रतन टाटा!
त्याचं असं झालं, .. घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!
त्याचं असं झालं, .. माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे. ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर!
त्याचं असं झालं, .. घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’ गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!
त्याचं असं झालं, .. बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’