मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून, जुनी चप्पल पायात असायची. शाळेत जाईपर्यंत तिचा पन्ना चार वेळा निघायचा. तो बसवत बसवत शाळा गाठायची. नंतर दिवस बदलले.. संघर्ष बदलला. मग पुण्यात भाजीपाला भरलेली हातगाडी घेऊन ओरडत पुणे तुडवले.. नंतर वाचमन झालो… पुण्यात विमान दिसायचं म्हणून पुणे आवडू लागलेलं… काही काळ हाऊस किपिंगचे काम…. एखाद्या सिनेमातच दुसरा देश बघायला मिळायचा. लै वाटायचं आपण कधी इमानात बसणार.. कधी हा देश बघणार… मनातल्या मनात हे चालायचं..

कवितेने पोट भरत नाही हा टोमणा ऐकतच मी कवितेला जवळ धरलेलं… मी आज हक्काने सांगू शकतो, कवितेने पोट भरते, आणि कविता भरभरून खूप काही देते… फक्त कविता मिरवण्यासाठी नाही तर गिरवण्यासाठी लिहायची असते… तुम्हाला एक खरं सांगू का? आपल्या कवितेचा दराराच इतका वाढवला मी की जाती- धर्माच्या भिंती फोडून मी सीमा ओलांडून अलगद बाहेर पडलो…. आता फक्त राज्यातच नाही तर पूर्ण जगात फिरतोय.. फक्त सगळ्या अपडेट मी सोशल मीडियावर देत नाही किंवा त्याबद्दल व्यक्त होत नाही..

दर महिन्याला किमान एका तरी देशात कवितेचा कार्यक्रम होत आहे.. हे सगळं मी पुस्तकात लिहिणार आहे आणि ते पुस्तकच तुमच्या स्वाधीन करणार आहे..

आणखी एक.. अगदी खेड्यातल्या एखाद्या चौकात छोट्याश्या स्टेजवरसुद्धा मी कविता घेऊन उभा असतो. तिथं मानधन ही लै त लै तीन हजार असतं.. पण कधीच कुणाला नकार देत नाही.. मानधनाच्या रक्कमेवरून मी कुणाला नकार दिलाय असा संयोजक शोधूनही सापडणार नाही. कधी कधी तर संयोजकाची परिस्थिती फार बेताची आहे आणि त्याच्या खिशातून खर्च करून आपल्याला आणलं आहे हे जाणवू लागलं की, लगेच मिळालेलं मानधन परत द्यायला माझे हात कायम खुले होतात.. असं जेव्हा करतो तेव्हा संयोजक असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात खळकन् पाणी आलेलं मी बऱ्याचवेळा अनुभवलेले आहे..

बाकी अती प्रसिध्दी नसावी, आपले फॉलोवर कमी असावेत पण रॉयल असावेत.. कमी प्रसिध्दी असली की रानटीपणाने हिंडता येतं जगता येतं… कधी कधी गर्दीत कुणी ओळखले आणि जवळ आले की छातीत धडक भरते.. नको वाटतं.. स्टेजवर असतो तेव्हाच काय तो नितीन चंदनशिवे.. इतर वेळी मला माझं मैदान हवं असतं.

बाकी काचेचा मॉल असो किंवा गावातला चौक, विमान असो किंवा एस टी, आपण कायम असाच हाताच्या बाह्या वर सरकवून रेडा फिरल्यासारख हिंडत राहायचं…  शेवटी आयुष्य हे आपलं आहे.. अंगाला माती लावून जगत असताना आकाश मोजता मोजता ओंजळीत भरभरून जगणं साठवत राहायचं… बास इतकंच…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

परिचय

शिक्षण : DME, AMIE, Diploma in Design.

जन्मतारीख: ७/८/७२

साहित्य:- कथा, कविता, ललित लेख, स्तंभ लेखन महाराष्ट्रातील नावाजलेल्या दैनिक, दिवाळी अंक आदीमधून.. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, दैनिक सकाळ, लोकमत, तरूण भारत, मटा,जनवाद, लोकसत्ता, लोकशाही वार्ता, नावाजलेल्या विविध दिवाळी अंकासाठी लिखाण…

साहित्य पुरस्कार:-  शब्दवर्षा, तेल्हारा, अकोला, कालिदास पुरस्कार, वर्धा, काव्य साधना , भुसावळ, उ.रा.गिरी. अमरावती असे लिखाणासाठी पुरस्कार

संपादन:- (१) इंद्रायणी काठी… कवितेसाठी.. त्रैमासिक (२) आशा दिवाळी अंक (३) अभियान वार्षिकांक

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर 

३० x ९ x६ =१६२० दिवस! निकेतनात घालविलेले हे दिवस.. तब्बल एक हजार सहाशे वीस जवळपास.. ह्यातल्या एका एका दिवसाविषयी लिहायचं म्हटलं तर एकूण एक दिवसच खूप खूप लिहीण्याजोगा.. प्रत्येक दिवस कधी मित्रांचा.. कधी शिक्षकांचा. कधी कर्मचाऱ्यांचा.. तर कधी एकूणच सर्वांचा. असा असायचा.

निकेतनात व्यक्तिशः असा अनुभव फार कमी यायचा.. त्यात ग्रुप सामील असायचाच.. निदान दोघे तिघे तरी असायचेच.. एकाटं दुकाटं उनाड पोर इथे मिळणं कठीणच..! जोडी जोडीने बऱ्याचश्या जोड्या होत्या. आठवण परस बागेतली असो.. हॉलमधली असो.. एनसीसी मधली असो… स्काऊट मधली असो किंवा वर्गामधली.. नाहीतर मेस मधली. असे एक ना अनेक दिवस आणि आठवणींनी निकेतन अंगात संचारतं त्यातलेच हे तीन दिवस…

बहुदा माझ्या सातवीतला तो दसरा असावा. विद्यानिकेतनात सर्व मुलांची दसरा मैदानावर कार्यक्रम बघायला जाण्याची गडबड चालली होती. मी मात्र कुठल्याशा आजाराने फणफणलो होतो. डोळ्यावर गुंगी होती. रूम बाहेर चाललेली मुलांची लगबग मला कळायची.. पण उठवेना आणि काही त्राणच माझ्या अंगात नव्हते. हळूहळू सर्व कोलाहल शांत झाला( की मला झोप लागली होती!) नक्की सांगता येत नाही! रात्री सात आठ वाजता चांगला दरदरून घाम फुटला.. जाग आली.. तेव्हा सर्व हॉस्टेल सामसूम झालं होतं. कर्मचारीही लवकर जेवण आटोपून बाहेर गेले असावे कारण दसरा असल्याने आपापल्या घरी नातेवाईकांसह सण साजरा करीत होते बहुदा..

मला खूप एकटं-एकटं वाटत होतं. घरची खूप आठवण येत होती. आपण आता घरी असायला पाहिजे होतं. ह्या विचारानं स्पुंदून स्पुंदून मी रडत होतो. ऐकायला कोणीच नव्हतं. किती वेळ रडलो माहिती नाही.. मग खूप खूप गाढ झोपलो. तर सकाळ झाली होती.. तेव्हा माझ्या अंथरुणावर चांगली अर्धा टोपली भरेल एवढी सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं होती.. रात्री बहुदा एकटा एकटा असलेल्या मला माझे एवढे सवंगडी, एवढे नातेवाईक कधी भेटून गेले कळलंच नाही!! रात्री दसरा मैदानाहून परतल्यावर मित्रांनी, शिक्षकांनी, आठवणीने मी झोपलो असतानाच दिलेल्या शुभेच्छा.. नंतरच्या कितीतरी दसऱ्यांमध्ये मला मिळाल्या नाहीत. ती रात्र.. ती सोन्याची पानं.. अजूनही दर दसऱ्याला मला, बायकोला, मुलाला माझ्या होस्टेलची आठवण करून देतात..

असाच एक दिवस सकाळी सकाळी पिटी आटपून आलो.. तर नेहमीप्रमाणे नंदकिशोर आणि विकास मधल्या चौकात बॅडमिंटन खेळत होते. कां कुणास ठाऊक या खेळाचे एक अनामिक आकर्षण मला पूर्वीपासूनच आहे.

मला हे ठाऊक नव्हतं की ह्या दोघांनी आपापल्या पैशाने ती रॅकेट अन फुल( शटल कॉक) आणलेलं म्हणून! मला वाटायचं की स्पेशल ह्यांनाच कसं खेळायला देतात.. ?? वगैरे.

खूप दिवसाचा तो खेळ खेळायचा म्हणून मी चंग बांधला होता. पण दुसरा पार्टनर हवा ना! कारण आम्हांला दोघांचीही रॅकेट हिसकावून गेम खेळायचा होता. एकाची हिसकावून चालणार नाही कारण दुसरा मग खेळणारच नाही. आता काय करायचं? दुसरा एवढा  ‘प्याशीनेट’ गडी शोधायचा कुठे? म्हटलं अजून नको वेळ घालवायला.. मधल्या चौकात जाऊन सरळ सरळ नंदकिशोर जवळून जवळपास मी रॅकेट हिसकावली.. तो लहान जीव.. लागला त्याच्या परीने विरोध करायला.. !! मी इकडे विकासला ” अरे, चल टाक सर्विस.. ” म्हणून एकदम रंगात आलो होतो.. शटल कॉक मागे नंदकिशोर इकडून तिकडे धावत होता.. मला गंमत वाटायची.. पण ही सगळी गंमत आमचे सर कुठून तरी बघत होते.. मला कळलं नाही ! मी आपला गुंग होतो. इतर सीनियर मुलही सरांच्या मागे मागे हळूहळू पुढे होणाऱ्या मनोरंजनाची वाट बघत होते.

सर दबक्या पावलांनी आले. त्यांनी माझी मानगुट पकडली आणि सपकन ‘व्हीसल कॉड ‘माझ्या पोट-यांवर उमटविला.!! आकाशात उडालेलं फुल आता ताऱ्यांमध्ये रूपांतरित झालं होतं! दुसरा ‘व्हीसल कॉड ‘ बसेस्तोवर.. प्रकरण काय आहे.. ते माझ्या ध्यानात आलं होतं. म्हटलं “नाही सर, नाही.. आता नाही करणार. “

“लहान मुलांना त्रास देतोस त्यांची वस्तू आणि त्यांनाच मारतोस.. ” वगैरे.. वगैरे.. पुढचं काही आठवत नाही.

पण बॅडमिंटनचे फुल आजही सकाळी बायकोसह बॅडमिंटन खेळताना निकेतनाची आठवण करून देत आणि सांगतं आपल्याच वस्तूवर हक्क सांगा.. दुसऱ्यांच्या नाही.. हवी असल्यास ती कष्टाने मिळवा.. ओरबाडू नका..

मोझरी… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाव… ह्या गावापासून साधारण तीन-चार किलोमीटर अंतरावर  “दास टेकडी” आहे. त्या दासटेकडीच्या पायथ्याला दरवर्षी अमरावती जिल्हा स्काऊट गाईड आणि एनसीसीचे कॅम्प त्याकाळी भरायचे..

सन १९८६ ची घटना असावी.. आम्ही सर्व ‘ शिवाजी पथक ‘ नावाने स्काऊट गाईड कॅम्पला सरांच्या मार्गदर्शनाखाली मोझरीला गेलो होतो.. तिथे दास टेकडीच्या पायथ्याला आम्हांला दिलेल्या जागेवर एक चौकोनी आकाराची जागा स्वच्छ करून आम्ही आमचा तंबू उभारला होता.. तंबूभोवती कुठल्याही प्रकारचा सरपटणारा प्राणी येऊ नये, म्हणून खोल खड्डा करून घेतला होता..

दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ग्रुप मधील आठपैकी सहा जणांसह सर कुठल्यातरी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायला गेले होते. मी आणि सोहेल या दोघांकडे त्यादिवशी स्वयंपाकाची जबाबदारी होती. आम्ही दोघेही स्वयंपाकात तसे हुशारच(!).. मग करायचं काय? तर खिचडी करायचं ठरलं… तर पाणी एवढं टाकलं गेलं की खिचडी काही केल्या घट्ट होईना.. पाणी काही आटता आटेना!

आम्हांला ते जास्त पाणी बाहेर काढून टाकावं एवढं साधं ज्ञानही त्यावेळी नव्हतं! आता काय करायचं ? तोवर खिचडीचा चांगलाच ” घाटा ” तयार झाला होता.

थोड्यावेळाने इतर मित्र परतले.. भुकेलेले होते पटकन जेवायला द्या.. म्हणू लागले.. आमचे चेहरे पाहून सरांनी ओळखलं होतं “कुछ तो गडबड है ” त्यांनी चुलीवरचं भांड बघितलं.. त्यात भरपूर पाणी असलेला ” भात कम खिचडी कम घाटा ” त्यांना दिसला. त्यांचं डोकं चांगलं सटकलं.. सटकणारच.. कारण भुकाचं तेवढ्या लागल्या होत्या.. पण ते मारू शकत नव्हते.. कारण ” स्काऊट गाईड “होता ना! एनसीसी नव्हे!

पण शिक्षा तर द्यायलाच हवी. मग आम्हां दोघांनाच तो घाटा.. ती खिचडी.. दोन दिवस खाऊन संपवावी लागली.. तेव्हापासून मी स्वयंपाकात परिपक्व झालो.. स्पेशली “फोडणीचा भात ” मी अप्रतिम बनवितो! आणि खिचडीही तेव्हापासून माझी आवडती झाली ती आजतागायत.. !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

ढाल म्हणजे ढाल आणि गज म्हणजे हत्ती अशी या शब्दाची फोड.

युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्याला सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती हा ढालगज असे.

या हत्तीवर राजचिन्हे, वस्त्रे सजवलेली असत आणि ध्वज घेऊन एक दोन सैनिकांना बसवले जायचे. त्यांचे काम ध्वज फडकवत ठेवणे आणि पुढे पुढे चाल करत राहणे हे असे. , ढालगजावरून ध्वज खाली उतरला कि मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळे.

या ढालगजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थळावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले, राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नयेत म्हणून मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असत. असे द्वार कपाळाला ढाल बांधलेला ढालगज हत्ती धडका देऊन तोडून टाके आणि किल्ल्याचा विजय सुकर करे. म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असे.

जशी युद्धासाठी घोड्यांचे परीक्षण केले जायचे त्याच प्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तींचेही परीक्षण होत असे. पहिल्या फळीतला ढालगज होणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. हा हत्ती चपळ, निडर आणि हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचे.

पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्धे जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत तसेच या ढालगजांचे देखील आहेत.

मग ढालगज भवानी कोण?

भवानी ही पेशव्यांची ढालगज होती. आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचे नाव आपल्या बोली भाषेत ‘ भांडणाची खुमखुमी असलेल्या ‘ बायकांसाठी फेमस झाले. इतिहासात नोंद आहे कि भवानी हत्तीणीने पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्षे ढालगजाचे काम केले आणि तिचा दबदबा खूप होता.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पितृपक्ष — नवा विचार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ पितृपक्ष — नवा विचार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो.

भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात.

आत्मा अमर आहे हे आपण मानतो. तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध, मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही. आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो. कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात. याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो. त्याच्याशी आपण जोडले जातो.

आपले पूर्वज हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन). शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स, क्रोमोझोम्स, पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित असतात. आणि याचबरोबर आपल्यातले गुण, स्वभाव, आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व, आपल्या जगण्याच्या, विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांशी निश्चितपणे निगडित असतात. ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो.

आपले सण, आपले उत्सव हे ऋतुचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत. आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते. पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की, तो पाळण्यामागे आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे. पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.

आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू, सॉरी म्हणतच असतो ना? मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत, त्या सर्व पितरांसाठी अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे. त्यांच्या अवमान केलेला आहे. त्यांची आबाळही आपल्या हातून झालेली आहे, म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा. त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी. आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.

दर्भाहुती, तर्पण, अग्नि कुंडातला घास यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना हाच उद्देश जाणावा.

भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो. (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून निसर्गवर्धनाची भूमिका जाणून घ्यावी.

ही अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे. आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते.

या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तिगत असावं.

आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले. मग आपली ही पितृपक्ष परंपरा, मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा यात न पटण्यासारखे काय आहे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बहिणाई…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “बहिणाई…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

जो असतो परंतु दिसत नाही तो देव..

आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”

ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवयित्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते. पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता. त्यांचा देव निसर्गात.. शेतामध्ये.. पिकांमध्ये होता. शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनी

…. जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर.. जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.

आला पाऊस पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परीमय 

माझं मन गेलं भरी

 

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

घरी दारी.. कामात.. विश्रांतीत.. सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.

कवियत्री इंदिरा संत म्हणतात..

… बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.

आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती, दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.

… आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.

बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच.. पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.

… आसु नाही ती सासु कशाची?

आसरा नाही तो सासरा कशाचा?

आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले… त्या लिहितात…….

पिलोक पिलोक, आल्या पिलोकाच्या गाठी

उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी

पिलोक पिलोक, आली नशिबात ताटी

उचललं रोगी

त्यानं गाठली करंटी

करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).

ध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.

माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे.. त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसऱ्या आवृत्तीची एक. त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.

…. यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहिलेले दोन दीर्घ लेख आहेत

…. कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.

…. थोर विदुषी प्रा. मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.

बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.

आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा. भ. बोरकर.

त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..

देव तुझ्या ओटीपोटी

देव तुझ्या कंठी ओटी!

 

दशांगुळे उरलेला

देव तुझ्या दाही बोटी!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

“ ए ये गं, शुक्रवारची सवाष्ण म्हणून जेवायला… किती दिवस झाले आपण रोजच बाहेर भेटतो… घरी कधीतरी तुला घरी बोलवायचे… हे ठरवलंच होतं…. या निमित्ताने येशील तरी…! “ तिचा आर्जवी सूर मोबाईल मधून उमटला.

माॅर्निग वाॅक ला न चुकता भेटणारी ती…! उन असो, थंडी पाऊस असो… तिची वेळ कधीच चुकत नाही… एका ठराविक ठिकाणी तिचे भेटणे ठरलेलेच असते. सडसडीत बांधा आखूड केसांचा वर बांधलेला पोनी… ट्रॅक सूट… निळसर बूट घालून, झपझप तिचं बाजूने पास होणे… ठरलेले असायचे.

एक नेटकं आणि स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असणार ही म्हणजे… तिची अशीच इमेज माझ्या मनात दृढ होत गेली…. आम्ही एकमेकींना फक्त अंतरावरुन बघत होतो… रोजच्या भेटण्यातून कधीतरी एक स्मितहास्याची रेष दोघींच्याही चेहऱ्यावर… अशीच कधीतरी विसावून गेली. माझ्यासारखीच मध्यमवयीन… त्यामुळे अर्थातच… स्थिरावलेल्या संसारातील… थोडी निवांत गडबड… जशी मला असते… तशीच तिलाही असणारच…!

थांबून खास गप्पा मारण्याइतका परिचय नसला तरी.. अंतरीक आपलेपण दोघींनाही सारखंच जाणवत असणार… कधी चुकामुक झाली किंवा… कधी फिरण्याची दांडी पडली तर… आज तिची भेट झाली नाही… याची हुरहुर क्षणभर जाणवून जाई… तिलाही आणि मलाही.

मग आपोआप समोर येताच ‘कुठे दोन दिवस ? ‘चे प्रश्नचिन्ह एकमेकींचे डोळे वाचून जात… आणि न विचारताच कारणांचा पाढा वाचला जाई.

परवा मात्र मला थांबवून तिने मोबाईल नंबर घेतला… आणि मी तिचे जेवणाचे आमंत्रण ही सहजच स्विकारले.

आटोपशीर पण निवडक गोष्टींनी सजवलेला तिचा टू बीएचके… इरकलीचे पंचकोनी तोरण सागवानी दारावर उठून दिसत होते…. उंबऱ्याच्या दोन्ही बाजुला छोटीशी रेखीव शुभ्र रांगोळी… फक्त लालचुटुक कुंकवाच्या शिंपणाने पवित्र वाटून गेली. मोकळा… जुजबी फर्निचर मांडलेला हाॅल… समोरच्या काचेच्या काॅर्नर स्टॅण्डमध्ये… ठेवलेल्या ट्राॅफीज… तिच्या लवचिक… देह मनाची साक्ष देणाऱ्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा छंदांची जणू पावतीच देत होत्या. ती बॅंकेत सर्व्हिस ला आहे ही जुजबी माहिती तिच्या बोलण्यातून मला समजली होती.

तिच्या दोन मुली आणि सासूबाई… हसत बाहेर येत, वातावरणात मोकळेपणा पसरवून गेल्या. पहिल्यांदाच तिच्याकडे गेल्यावर… तिच्याशिवाय कोणी ओळखीचे नाही… ही माझी थोडी uneasy भावना, त्या आजी नातींनीं सपशेल मोडीत काढली.

थोड्या गप्पा होईपर्यंत… तिने भाजी आमटी गरम करायला ठेवले. ती खासच सुगरण असणार… गरम होत असणारी भाजी आमटी जठराग्नी चेतवून गेली. नैवेद्याच्या ताटासाठी भाताची मूद करण्यासाठी कुकर उघडताच… आंबेमोहोर तांदळाचा वास दरवळून गेला… चांदीच्या ताटवाटीतला तो भरगच्च नैवेद्य तुळशीपत्राने परिपूर्ण होऊन गेला.

सवाष्णीसाठी चे ताट, वाटी तांब्या भांडे, पानं फुलांच्या सुबक रांगोळीत, टेबलावर सजलेले‌ होते. मी मलाच शाबासकी दिली… आपण मनात तिची नेटकी जपलेली इमेज बरोबर आहे.

गरम पोळी करुन वाढण्यासाठी… तांदळाच्या पिठी पासुन… भिजलेली कणिक, पुरणाचे उंडे… तिची किचन ओट्यावरची आटोपशीर तयारी तिच्यातल्या गृहकर्तव्यदक्षतेची साक्ष होती जणू.. !

ती एक उत्तम सून.. उत्तम आई.. उत्तम पत्नी.. उत्तम मुलगी… असणार, हे तिच्या एकंदर वावरातून लक्षात येऊनच गेले होते.

तिची मुलींना सासूबाईंना सोबत घेऊन जिवतीची आरती औक्षण करण्याची लगबग… सारे घर भारल्यासारखे झाले. औक्षणाचे तबक खाली ठेवताना… माझे लक्ष देवघराजवळच लावलेल्या उमद्या चेहऱ्याच्या दोन तसबिरी कडे गेले. तसबिरीस लावलेले गंधटिळे खुप काही बोलून गेले… !

माझी तसबिरीत अडकलेली नजर तिच्या‌ चाणाक्ष नजरेने लगेचच पकडली. माझे धाकटे दिर आणि माझे मिस्टर… तिची फोटोतल्या कुटुंब प्रमुखांची ही अनपेक्षित ओळख… मी क्षणभर सुन्नच होऊन गेले… !

आठ एक वर्षांपूर्वी एका अपघातात दोघेही on the spot गेले, ही माझ्या धाकट्या दिराची मुलगी… आणि ही माझी… !

अवयव दानाचा फाॅर्म केवळ आठ दिवस आधीच दोघा भावांनी भरला होता. तो सर्वांगाने नाही पण काही अंगांनी… अन् कित्येक अर्थाने माझ्यासाठी अजुनही इथे अस्तित्वात आहे… !

या समाजात, कुणाचे डोळे… कुणाची किडनी, कुणाची स्किन होऊन वावरत आहे.

तिच्या कपाळावरची लालचुटुक टिकली आणि गळ्यात पदराआड विसावलेले छोटेसे मंगळसूत्र… क्षणमात्र लखलखीत झाल्याचा भास मला होऊन गेला.

चार वर्षापूर्वी धाकट्या जावेला नव्याने तिचा पार्टनर मिळून गेला. हिला मात्र मी माझ्या जवळच ठेवून घेतले… माझी दुसरी मुलगीच ही पण… तिने तिच्या पुतणीला जवळ ओढले.

तिचे डोळे क्षणभर गढुळल्यासारखे झाले… आणि पुन्हा घरातल्या पवित्र वातावरणात मिसळून नितळ झाले…. !

चला आता जेवायला बसा… मी गरम गरम पोळी करते… तुमचा वरणभात संपेपर्यंत… !

तिच्यातल्या गृहिणींची लगबग सुरु झाली.

… ती ओटी भरताना… तिचे दोन्ही हात माझ्या ओंजळीत भरून घेत मी तिला जवळ ओढलं… हां तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैने सोचता था… !

प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस… पण एक माणुस म्हणुन… तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज  माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने… तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं.. तुझ्याकडून शिकावं, सलामच तुला!

ती प्रसन्न हसली… सकाळच्या माॅर्निग वाॅक मध्ये हसते तशी… एकदम ओळखीची… जवळची!

मुठीतून निसटलेल्या वाळूची खंत करत बसण्यापेक्षा मुठीत शिल्लक उरलेल्या वाळुस कसा न्याय द्यायचा… हे ज्यास समजते… तिथे शांती आणि समाधान हात जोडून उभे राहते… इतकंच खरं!!!

लेखिका : सौ. विदुला जोगळेकर

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

पंचमहाभूतांपैकी पाणी आणि त्यातून सागराचे पाणी हे प्रचंड शक्तिशाली असते. सागराची भव्यता, त्यात उठणारी वादळे, महाकाय लाटा यांच्याशी मानवाला सामना करता येणे अतिशय कठीण. पण आपल्या सीमांचे रक्षण कायचे असेल तर जमीन, आकाश आणि जल आणि हल्ली अवकाश या चारही ठिकाणी सैनिकांना सज्ज ठेवावे लागते. आपल्याकडे युद्धनौका तर आहेतच पण आपल्या पाणबुड्या आणि त्यातील सैनिक हे जगातल्या नौसैनिकांतले उत्तम नौसैनिक म्हणून गणले जातात. पण पायदळ आणि वायुदल यांमधील सैनिकांच्या शौर्यकथा सामान्य जनतेला ब-यापैकी ठाऊक असतात, पण पाण्यात राहून शत्रूची वैर करणा-या आणि त्या शत्रूंना रोखून धारणा-या नौसैनिक, नाविक अधिकारी यांच्या पराक्रमाची महती काहीशी कमी असते. आज अशाच एका नौदल अधिका-याच्या असीम पराक्रमाची गाथा सादर करतो आहे.

समुद्रात पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत जिकीरीचे, हिमतीचे आणि धैर्याचे काम. या कामांत शत्रूकडून आणि प्रत्यक्ष समुद्राकडून सैनिकांच्या जीवाला सतत धोका असतोच असतो. १५ ऑक्टोबर, १९७४ रोजी अहमदाबादेत दराबाशा आणि आरमीन मोगल यांच्या पोटी जन्मलेले फिरदौस हे देशसेवेसाठी १९९२ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. ) मध्ये प्रशिक्षणार्थी सैन्याधिकारी म्हणून दाखल झाले. मूळचे अतिशय धाडसी, बुद्धीमान असलेल्या फिरदौस यांनी पाणबुडी युद्धनौकेवर सेवा करण्याचा मार्ग निवडला. १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी नौदलात प्रवेश केला.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले फिरदौस यांनी प्रथमपासूनच कामात चमक दाखवली. पाणबुडीत काम करण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केला. आय. एन. एस. (इंडियन नेवल शिप) शाल्की वर त्यांनी पाणबुडी विरोधी युद्ध अधिकारी पद मिळवले. आय. एन. एस. विशाखापट्टनम, आय. एन. एस. सातवाहन यावर त्यांनी सेवा बजावली. आय. एन. एस. शंकुश ते मुख्य अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वरिष्ठ अधिका-यांना मोठे कौतुक असे.

२९ मे, २०१० रोजी लेफ्टनंट कमांडर फिरदौस साहेबांनी आय. एन. एस. शंकुश वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. आय. एन. एस. शंकुश ऑगस्ट महिन्यात फ्रेंच नौदल आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धसराव सत्रात सहभागी होती. २९ ऑगस्ट रोजी या पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने दुरुस्ती करणे भाग होते. यासाठी ही पाणबुडी मुंबईच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागावर आणली गेली. ३० ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तीन नौसैनिक आणि एक इंजिनियरिंग अधिकारी असे चार जण या अवघड कामगिरीवर नेमले गेले. पाणबुडीच्या बाह्याभागावर असलेल्या केसिंग वर हे चौघे उतरलेले असतानाच अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली आणि दोन नौसैनिक आणि इंजिनियरिंग अधिकारी पाण्यात फेकले गेले. तिसरा नौसैनिक पाणबुडीच्या केसिंगवर लटकत राहिलेला होता.. आणि तो कधीही पाण्यात पडू शकत होता. फिरदौस क्षणाचाही विलंब न लावता स्वत: उफाणत्या दर्यात उडी घेतली. लटकत राहिलेल्या नौसैनिकाचा पाय जायबंदी झालेला होता. साहेब केसिंगवर चढले आणि स्वत;च्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला खालून ढकलून आपल्या खांद्यावर घेतले आणि शिडीवरून चढून जात त्याला पाणबुडीच्या ब्रिज वर चढवले. ही शिडीही पाण्यात निम्मी बुडालेली होती. लाटांचा मारा सुरु होता. समुद्र आणि साहेब यांच्यात वीस मिनिटांचा संघर्ष सुरु होता. यासाठी खूप शारीरिक शक्ती आणि मोठी हिम्मत लागते. पाण्यात पडलेले इतर सैनिक साहेबांकडे आशेने पाहू लागले होते… फिरदौस साहेब पुन्हा पाण्यात झेप घेते झाले. तोपर्यंत नेव्ही डायवर्स (पाणबुडे) समुद्रात उतरले होते. साहेबांनी या डायवर्सना मदत करायला आरंभ केला. सर्वांनी मिळून पाण्यात पडलेल्या सैनिकांना एकत्रितपणे पाणबुडीजवळ ढकलण्यात यश मिळवले. या सर्वांचा एक गट एकत्रितपणे पाणबुडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला… तुफानी लाटा होत्याच.. त्यांना समुद्रात ओढणा-या. सर्वजण पाणबुडीवर चढण्याच्या अगदी बेतात असताना एक अजस्र लाट आली आणि साहेब आणि इतर सर्व पुन्हा पाण्यात खेचले गेले. साहेबांनी पुन्हा जोर लावला…. पाणबुडीजवळ पोहोचले… आपल्या खांद्यावर एकेकाला घेतले आणि वर ढकलत राहिले… समुद्र आता पुरता खवळला होता… साहेब म्हणाले… तुम्ही सर्व वर पोहोचल्याशिवाय मी वर येणार नाही…. तसेच झाले… इतर सर्व सुरक्षितरित्या पाणबुडीवर पोहोचले… पण साहेब खालीच राहिले… आणखी एका मोठ्या लाटेने साहेब पाणबुडीवर आदळले.. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला… तरीही साहेब तरंगत राहिले… पोहत राहिले. तोपर्यंत Helicopter ची मदत बोलावण्यात आली होती. नौसेनेच्या helicopter ने साहेबांना पाण्यातून उचलून घेतले आणि तातडीने आय. एन. एस. अश्विनी जहाजावर वैद्यकीय उपचारास नेले.. पण तो पर्यंत समुद्राने आपला डाव साधला होता…. त्याच्या लाटांशी प्राणपणाने झुंज देणारा हा वीर त्याने पराभूत केला होता… आणि नंतर त्याची त्यालाच शरम वाटली असावी… कारण काहीच वेळात समुद्र गप्प गप्प झाला… जणू काही झालेच नव्हते! सहा सैनिकांचे प्राण वाचवून लेफ्टनंट कमांडर फिरदौस दराबशाह मोगल साहेब स्वर्गात पोहोचले… फिरदौस म्हणजे स्वर्ग! एक स्वर्ग दुस-या स्वर्गात गेला…. सैनिक जिंकले तर भूमीचा भोग घेतात आणि धारातीर्थी पडले तर स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना! 

हे असामान्य कामगिरी होती. एकवेळ जमीन, आकाश येथे माणसाचा निभाव लागू शकेल.. पण पाण्यात? अतिशय अवघड काम असते. तेच काम साहेबांनी करून दाखवले… आणि हुतात्मा झाले. वादळ प्रभावित जनतेला साहाय्य करण्यात साहेब सतत पुढे असत. माणसातील हिरा असे त्यांचे वर्णन त्यांचे सहकारी करीत.

In grey cold waves, when he went too far…. Strength of his spirit was the weapon of his war! अर्थात त्यांच्या आत्म्याची शक्ती हेच त्यांचे युद्धातील आयुध होते… जे त्यांनी प्राणपणाने चालवले आणि अमर झाले! मरणोत्तर शौर्य चक्राने देशाने साहेबांना सन्मानित केले… आंपण एक रत्न गमावले! ही कथा खरं तर सर्वांना माहीत असायला हवी होती… आता तरी इतरांना सांगा. हे आपले नायक… हे आपले भाग्यविधाते… हे आपले संरक्षक. यांच्या पराक्रमाच्या गाथा सतत गायल्या गेल्या पाहिजेत… जय हिंद. 🇮🇳

अहमदाबाद मधील एक रस्त्याला साहेबांचे नाव दिले गेले आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोजच असावा ‘मातृदिन’…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ रोजच असावा ‘मातृदिन’☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जागतिक मातृदिन दरवर्षी सर्वत्र साजरा होत असतो.. आपण भारतीय उत्सवप्रेमी आहोतच. आपला पारंपरिक मातृदिन म्हणजे बैलपोळ्याचा दिवस अर्थात श्रावण अमावस्या.

आईला कधी वंदन करावे ? आईची आठवण कधी यावी ? याला काही बंधन नाही. प्रत्येक लेकराच्या मनात एक खास कप्पा कायमचा असतो. तो कधीही दुसऱ्या गोष्टींनी भरला जात नाही. जायलाही नको…. !

माझ्या मनात जरा वेगळा विचार आहे. आज समाजात ‘मातां’ची संख्या आणि गुणवत्ता कमी नाही. पण दुर्दैवाने समाजातील मातृत्वभाव मात्र कमी होत चालला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

समाजातील ‘मातृत्व’भाव वृद्धिंगत झाला तर समाजातील एकूण समस्यांपैकी अर्ध्या समस्या तरी लोप पावल्याशिवाय राहणार नाहीत. विश्वाच्या माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वरांना संत या नात्याने आदराने पाहिले जातेच, परंतु यापेक्षा त्यांचा मोठा आदर आणि सन्मान हा त्यांच्या ‘माऊली’पणात आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

दरवर्षी जागतिक मातृदिन साजरा करत असतांना त्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्यामधील मातृत्वभाव वाढण्यासाठी कटिबद्ध व्हावे अशी मी आपणांस नम्र विनंती करीत आहे.

आईचे शब्दरूप स्मरण…

१. जी रिती होऊनही भरून पावते ती ‘आई’.

२. चार मातीच्या भिंती।

 त्यात माझी राहे ‘आई’।।

 एवढे पुरेसे होई।

 घरासाठी।।

३. काहीही दुखलं, खुपलं तर तोंडात येणारा पहिला शब्द ‘आई’.

४. आपल्या अश्रूंचे मूल्य जाणणारी, मूल्य जपणारी आणि मूल्य वाढवणारी एकच व्यक्ती ती म्हणजे ‘आई’

५. गोष्ट आनंदाची असो वा दुःखाची, सर्वप्रथम आठवते ती ‘आई’.

६. दाही दिशा अंधारून आल्यावर पाठीवरून हात फिरवून ‘बाळ, मी आहे ना’! असे म्हणून धीर देणारी फक्त ‘आई’.

 ७. अध्यात्माची सर्वात सोपी व्याख्या. ‘आई’

 (एकतर समोरच्याची आई व्हा किंवा समोरच्याला आई माना.)

८. वीट नाही कंटाळा नाही 

 आळस नाही त्रास नाही

 इतुकी माया कोठेचि नाही

 मातेवेगळी।।

(दासबोध १७. २. २७)

आईच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर रवींद्रनाथांनी ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नावाचे एक नाटक लिहिले. या वेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. रवींद्रनाथांना नाट्य, संगीत आणि काव्यलेखनाचे बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळाले होते. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटके लिहीत आणि बसवत असत. गुणिंद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलतभावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिले. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली होती.

‘वाल्मिकी प्रतिभा’ हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ‘ रामायणाची ‘ रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।

कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.

त्यांच्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.

ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ‘ तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. ‘ 

या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ‘ सरस्वती ‘ आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतीकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.

या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपले पुढील साहित्य कसे असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.

या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिने केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नसत. असे करणे म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखे होते. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबीयांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांना देखील कला, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात मुक्त आकाश मिळाले पाहिजे असेच त्यांना वाटत होते. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणाने सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झाले ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंको वाडी इथेच ! कला, साहित्य इ प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती, त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारे नाटक म्हणजे ‘ वाल्मिकी प्रतिभा ! ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धत्व… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

वृद्धत्व… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘जगाच्या पाठीवर’ सिनेमातील ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… ‘ गाणं ऐकलं की मनुष्याच्या तीन अंकी जीवन नाटयाचा पडदा अलगद डोळ्या समोर उलगडत जातो. बालपणातील निरागसता, तारुण्यात आल्यावर रंगीबेरंगी आयुष्याचा उपभोग घेते आणि तीच वृद्धत्वाकडे झुकू लागली की, आपल्या जीवनाची गत साले उलगडू लागते. मागे वळून पाहताना….. या सदरात पन्नाशी पासूनचा माणूस सतत डोकावू लागतो भूतकाळात!

बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व या माणसाच्या जीवनातील तीन अवस्था गदिमांनी त्यांच्या काव्यात किती सहजतेने दाखवून दिल्या आहेत ! गदिमांचे अर्थपूर्ण काव्य मनाला भावते.. आज सत्तरीला आलेला मनुष्य ही बरेच सुखाचे आयुष्य उपभोगतोय, पण काही दशकांपूर्वी हे वृद्धत्व इतके सुखाचे नव्हते. मोठा कुटुंबकबिला, आर्थिक अडचणी, आजारांवर फारसे उपचार नाहीत अशा काळात हे वृद्धत्व अतिशय त्रासदायक होत असेल बहुतेक! सध्या माझ्या डोळ्यासमोर माझी आई 92 वर्षाची आहे तिचा जीवनपट येतो, कारण त्यांच्या पिढीने देशाचे पारतंत्र्य, स्वातंत्र्य अनुभवले तसेच कुटुंबासाठी खूप खस्ता खाऊन आता चांगले आयुष्यही उपभोगले, मुले नातवंडे च काय पण पंतवडे बघण्याचे भाग्य ही तिला मिळाले. खरोखरच पिकल्या पानासारखे आयुष्य आहे तिचे आता, पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर तोच जगण्याचा उत्साह बघते तेव्हा खूप आश्चर्य वाटते ही जगण्याची उमेदच त्यांचे आयुष्य वाढवत असेल! आताच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळणारी मने आणि आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या की वाटते किती कमकुवत झाली आहेत माणसं!

निसर्गाचे एक संकट आलं की आपण कोसळून जातो. मग ते वादळ असो की पूर असो की करोना असो. प्रत्येक संकटाचा मनाला बाऊ वाटतो. त्यातून वर्तमानपत्र, टीव्ही यामुळे तर आपण जगालाच घरात निमंत्रित करून घेतले आहे की ज्यामुळे आपण आपली मनःशांती च घालवतो. काहीवेळा वाटतं अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं ! पूर्वी पंचक्रोशीतील एखादी चांगली वाईट गोष्ट कळायला सुद्धा तीन-चार तास लागत असत आणि आता आपण लांब अंतरावर चा प्रत्येक क्षण सुद्धा त्या क्षणी पाहू शकतो, चांगला किंवा वाईट !राम मंदिराच्या पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदीजीं चा हस्ते कसा घडत होता ते दृश्य आपण टीव्हीसमोर बसून पाहू शकलो आणि काही काळ आपण आपले काम बाजूला ठेवून राम राज्याची स्वप्ने पाहिली. हे राम मंदिर आपण लवकरच पाहू असा विश्वास वाटला.

वृद्धत्व काहीवेळा मनाचेच जास्त असते. काही अवयव नसलेली माणसे आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी रहाताना पाहिली की वाटते आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिले असतानाही आपण मनानेच वृद्ध होतं जातो त्याउलट हात-पाय नसणारी तर कुणी मुकी बहिरी माणसे परमेश्वराला आव्हान देतात आणि स्वतःला काम करायला उद्युक्त करतात. 97 वर्षाचे बाबासाहेब पुरंदरे नव्वद वर्षाच्या लतादीदींना म्हणतात की तुमची शंभरी पहायला, तो सोहळा अनुभवायला मी असेन तेव्हा खरोखरच त्यांच्या जिद्दीला आणि आशावादाला सलाम करावा वाटतो!या वयात गड चढणारे मनाने तरुण बाबासाहेब त्यांना वृद्धत्वाचा स्पर्शच झालेला नसतो. !

नकारात्मक किँवा काही प्रमाणात पॅसिव्ह वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वृद्धत्व लवकर जाणवायला लागते असे मला वाटते. Positive विचाराचा माणूस जीवनाकडे नेहमी आशावादी वृत्तीने बघतो म्हणूनच तो अधिक उत्साहाने आयुष्य उपभोगतो हेच खरे ! निसर्गाचा आपण एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग क्रमानुसार उत्पत्ती स्थिती लय हे आपल्या साठी आहे च! त्याची जाणीव असावी पण सतत आपण काय जाणारच आहोत या भावनेचे वृद्धत्व मनात ठेवू नये. निसर्गात बी रुजते, रोप येते, त्याचेच पुढे झाड बनते. फुले फळे येतात. हळूहळू पाने पिवळी पडू लागतात आणि गळतात कालांतराने ज्याचे जेवढे आयुष्य त्याप्रमाणे झाडाचे आयुष्य संपते आणि मातीत विलीन होते. तसेच आहे आपलं आयुष्य! वृद्धावस्था ही बिकट असली तरी मनाने तिचा स्वीकार करून आहे ते आयुष्य आनंदात घालवण्याची किमया ज्याला जमली तो वृद्धत्व चांगल्या तर्हेने घालवू शकेल! मागच्या पिढीतील बऱ्याच वृद्धांकडे पहाताना मी अधिक डोळसपणे विचार करते आणि यापुढील आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी मनाला तयार करते! आई कडील आठ-पंधरा दिवसाच्या या वास्तव्यात त्या लहान झालेल्या देहाच्या कुडीतील ही ऊर्जा पाहून माझ्या मनात वृद्ध त्वाचे असंख्य विचार उमटले त्यातून लिहिलेले हे विचार स्पंदन !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares