मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर

गौरी, महालक्ष्मी तीन दिवस येतात आणि चैतन्य निर्माण करून जातात. 

गणपती बाप्पा त्यांना माहेरी घेऊन येतात. माहेर हे तीन दिवसाचं असतं हेच सुचवलं आहे गौराईने त्यांची आरास पूजा नैवेद्य रमुन जातो चार पाच दिवस तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत असतो सुवासिनी येतात हळदीकुंकू समारंभ होतो भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते नवीन कल्पना सुचतात आणि दरवर्षी नवीन करण्याची प्रेरणा मिळते.

गावं बदलले कि प्रथा बदलतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात कुलाचार वेगळे असतात. स्वयंपाक, नैवेद्य वेगळे असतात गौराई सगळीकडे जाऊन तृप्त होते आणि आशीर्वाद देऊन जाते.

एकदा सुरु केलेला उत्सव बंद करता येत नाही. काही अडचण आली तर दुसऱ्याकडून करून घेता येत. वृद्धी असेलतरीही दुसऱ्याकडून करून घेता येत वृद्धी म्हणजे गोड विटाळ मानला जातो. सुतक असेलतर मात्र काहीच करता येत नाही. मग काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात आत्ता नाही तर नवरात्रात गौरी बसवता येतात हे कुठल्या आधारावर सांगितलं जातं काही कळत नाही.

पंचांग मध्ये ही अफवा आहे असं सांगितलं आहे मग कोण जोतिषकार आहे जे वेदांच्या पलीकडे सांगतात.

गौरी अहवान वर्षातून एकदाचं होते त्याच वेळी पूजा होते. तशी लक्ष्मी रोजच घरात असते ना ती आहे म्हणून आपण आहोत पण तिला मान तीन दिवसाचा आहे. रोज ती आई म्हणून पाठीशी असते.

नवरात्री हा सोहळा त्या तिघींचा आहे ” महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ” महिषसुराचा वध करण्यासाठी देव देवीला शक्ती प्रदान करण्यासाठी घटी बसतात सात दिवस युद्ध सुरु असतं आठव्या दिवशी देवी होमातून निघून नव्यादिवशी वध करते. नवरात्रीत नऊ दिवसाचा उपवास असतो मग गौरीची पूजा नवरात्रात केल्यावर तिला नैवेद्य कशाचा दाखवणार ती युद्ध सोडून एक दिवस तुमच्याकडे कशी येणार महत्वाचं म्हणजे देव घटी बसले असताना देवी जेवण तरी कसं करणार एकादशी असली तरी अन्नदान किंवा गाईला घास देता येत नाही तिथे नवरात्रीत महालक्ष्मी कशी उभी करणार हा एक प्रश्नच आहे आणि याचे उत्तर ही अफ़वा पसरणाऱ्याकडेच असेल असं वाटतं.

देव म्हणजे श्रद्धा, भक्त, उपासना, देव म्हणजे प्रेम दया होय.

जे काही आहे ते त्याचाच आहे आपण त्याला देणारे कोण, तो करून घेत असतो त्याला हवं त्याच्याकडूनच दोन हात जोडतो ते सुद्धा त्यानेच दिलेले आहेत फुल, उदाबत्ती, नारळ जे काय आहे ते त्याचाच त्याला अर्पण करतो देवाला पोहचतो तो फक्त भक्ती भाव म्हणून परंपरा, कुळधर्म, कुलाचार हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवेत, , , , ,

पाडव्याची गुढी दीपावली ला उभारली आणि लक्ष्मी पूजन पाडव्याला केलं तर चालेल का तसंच गौरी अहवान एकदाचं होत हेच खरं आहे.

श्री स्वामी समर्थ 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ह्याला आयुष्य म्हणावे काय ? – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ह्याला आयुष्य म्हणावे काय ? – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

 पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिध्दी

 लोळण घेतात पायात

 बिल गेटची पत्नी तरीही

 का घटस्फोट घेते ह्या वयात ?

*

शिक्षणाने माणूस समृद्ध होतो

आम्ही आहोत अजूनही भ्रमात

उच्चविद्याविभूषकांचे मायबाप

मग का असतात वृध्दाश्रमात ?

*

 हा डिप्रेशनचा शिकार

 तो आत्महत्या करतो

 ज्याला समजावं सेलिब्रिटी 

 तो एकाकीपणात मरतो

*

ज्यांनी कमावलं नाव

त्याला आनंद का मिळत नाही ?

काय चाटायचं ह्या मोठेपणाला

नातं आपुलकीचं जुळत नाही

*

 जळजळीत वास्तव सांगतो

 तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही

 गरीब, अडाणी, प्रामाणिक मजुरांचे

 मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

*

असं नाही त्यांचे घरात

नाहीत वादविवाद

पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम

बोटावर मोजण्या एवढे अपवाद

*

 आजारी मायबापांचा इलाज 

 करतात किडूक मिडूक विकून 

 पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी

 नाळ ठेवली आहे टिकवून 

*

व्यसनी, रागीट, नवरा

त्याला गरीबीची जोड

तरीही त्याची पत्नी बिच्चारी

करतेच ना तडजोड ?

*

 दु:ख हलकं करतात

 एकमेकांना भेटून

 एका शिळ्या भाकरीचा तुकडा

 खातात सारेजण वाटून

*

जेवढी लावतात माया

तेवढंच बोलतात फाडफाड

कितीदा तरी भांडतात

पण कुठे येतो ईगो आड ?

*

 उशाशी दगड घेऊन

 भर उन्हातही झोपी जातो

 काळ्या मातीत घाम गाळणारा

 बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

*

ना तोल ढळतो ना संयम

दु:खातही सावरण्याची आस

कारण अजूनही ह्या माणसांचा

आहे माणुसकीवर विश्वास

*

 पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे

 आले हे दळभद्री दिवस

 देव सुध्दा लगेच बदलतात

 जर पावला नाही नवस

*

एकत्र कुटूंब हल्ली

सांगा कुणाला हवं ?

कामा शिवाय वाटतं का

आपण कुणाच्या घरी जावं ?

*

 एकदा तरी बघा जरा

 आपल्या आयुष्याचा रोड मॅप

 कुणाचं कुणाशी पटत नाही

 काय तर म्हणे जनरेशन गॅप

*

सांगा बरं कुणावर ह्या

विकृत विचारांचा पगडा नाही

घर, बंगला, फ्लॅट असु द्या

दरवाजा कुणाचाही उघडा नाही

*

 बहुत अच्छे, बहुत खूब !

 क्या बात है ? बहुत बढीया !

 एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 

 जागृत चोवीस तास सोशल मीडिया

*

आभासी दुनियेची चाले

कोरडी कोरडी ख्याली खुशाली

मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा

मोबाईलवरच श्रध्दांजली

*

 काय बरोबर ? काय चूक ?

 मत मांडण्याचीही सत्ता नाही

 तो बंद घरात मरून पडला

 वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

*

मुलं पाठवले परदेशात

आई संगे म्हातारा बाप कण्हतो

अंत्यविधी उरकून घ्या

पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

*

 लेकराला पाॅकेटमनी, बाईक 

 अन् भलेही दिली जरी कार

 किती छान झालं असतं

 जर दिले असते संस्कार ?

*

होस्टेल, बोर्डींगात बालपणीच पाठवलं 

तो तुम्हाला का वागवणार ?

जमीन असो की जीवन

येथे जे पेरलं तेच उगवणार

*

 जीवशास्त्र शिकवलं

 जीवनशास्त्र शिकवा

 चुलीत गेली चित्रकला

 सांगा चारित्र्याला टिकवा

*

त्रिकोण, चौकोन, षट्कोन

ह्याला सांगा विचारेल कोण ?

ज्याचे जवळ नसेल

आयुष्याचा दृष्टीकोन

*

 विपरीत परिस्थितीतही 

 जपणूक केली पाहीजे तत्वाची

 व्याकरणापेक्षाही अंत:करणाची

 भाषा असते महत्वाची

*

चुकू द्या चुकलं तर

अंकगणित अन् बीजगणित 

माणसांची बेरीज करा

गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

*

 प्राणपणाने जतन करावे

 नाते शहर, खेडे, गावाचे

 मेल्यावरती खांदा द्यायला

 असावे चारचौघे जिवाभावाचे

*

मेल्यावर दोन अश्रू 

हीच आयुष्याची कमाई

ज्याने हे कमावलं नसेल

तो आयुष्य जगलाच नाही

*

 मिळून मिसळून वागावं

 आनंदानं छान जगावं

 तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं

 म्या पामरानं काय सांगाव……

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट करेपर्यंतचा साधारण एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. माझ्यापेक्षाही जास्त माझ्या बायकोसाठी. रोजचं कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास या सगळ्याचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि शिवाय लहान मुलाची जबाबदारी! आमच्या मुलाचा, सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने तिची राष्ट्रीयकृत बँकेतली नोकरी सोडली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे तिने ठरवले होते. त्यानुसार यावर्षी तिला सरकारी बीएड कॉलेजमधे ऍडमिशनही मिळाली होती. आणि या पार्श्वभूमीवरची माझी महाबळेश्वरला झालेली बदली! 

या सगळ्याचा आत्ता पुन्हा संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे)

त्याकाळी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन एम. ए. बी एड् झाल्यानंतर कोल्हापूरमधे शाळाच नव्हे तर कॉलेजमधेही सहज जॉब उपलब्ध होऊ शके. पण तिने पुढे काय करायचे याचा विचार त्या क्षणी तरी आमच्या मनात नव्हताच. त्यातच माझी महाबळेश्वरला बदली झाल्यामुळे एप्रिलमध्ये तिची परीक्षा संपताच कोल्हापूर सोडायचे हे गृहितच होते. कौटुंबिक स्वास्थ्य आणि मुलाचे संगोपन यालाच सुदैवाने तिचेही प्राधान्य होतेच. तरीही जिद्दीने एवढे शिकून आणि इच्छा असूनही तिला आवडीचे कांही करता आले नाही तर तिच्याइतकीच माझ्याही मनात रुखरुख रहाणार होतीच. पण ते स्विकारुन पुढे जायचे याशिवाय दुसरा पर्याय होताच कुठे? 

या पार्श्वभूमीवर भोवतालचा मिट्ट काळोख अचानक आलेल्या लख्ख प्रकाशझोताने उजळून निघावा अशी एक अनपेक्षित घटना घडली आणि आरतीच्या करिअरला आणि अर्थातच आमच्या संसाराला ध्यानीमनी नसताना अचानक प्रकाशवाटेकडे नेणारी दिशा मिळाली! हे सगळंच अनपेक्षित नव्हे तर अकल्पितच होतं. त्या क्षणापुरता कां होईना चमत्कार वाटावा असंच!

कोल्हापूर सोडून आम्ही सर्व घरसामान महाबळेश्वरला हलवलं. बी. एड्. चा रिझल्ट लागायला अजून कांही दिवस असूनही महाबळेश्वरला आरतीला हवी तशी एखादी चांगली नोकरी मिळण्याच्या कणभर शक्यतेचा विचार मनात आणणंही एरवी हास्यास्पदच ठरलं असतं, अशा परिस्थितीत महाबळेश्वरच्या घरी आल्यानंतरच्या चारपाच दिवसात लगेचच इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून महाबळेश्वरच्या सरकारमान्य माध्यमिक शाळेत आरती कायमस्वरुपी रुजूही झाली!!

हा आमच्यासाठी अनपेक्षित असा सुखद धक्काच होता! यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला तर ही घटनाच नव्हे तर त्या घटीतामागचं परमेश्वरी नियोजन त्याक्षणापुरतं तरी चमत्कारच वाटत राहिलं. ‘देता घेशील किती दोन कराने’ या शब्दांमधे लपलेल्या चमत्कृतीची ती प्रचिती खरंच थक्क व्हावं अशीच होती!

महाबळेश्वरस्थित ‘गिरिस्थान हायस्कूल’ आणि ‘माखरिया हायस्कूल’ या दोन्ही माध्यमिक शाळांकडून आरतीसाठी इंग्रजी शिक्षक म्हणून नवीन नोकरीच्या संधीची दारं अनपेक्षितपणे उघडली जाणं हेच मला अविश्वसनीय वाटलं होतं. बी एड् चा निकालही लागलेला नसताना, आरतीने अर्ज करणं सोडाच तिथे अशी एखादी व्हेकन्सी असल्याची पुसटशीही कल्पना नसतानाही या शाळांकडून परस्पर असाकांही प्रस्ताव येणं हे एरवीही कल्पनेच्या पलीकडचंच होतं.

या दोन्ही शाळांची मुख्य खाती स्टेट बँकेत असल्याने माझा बँक-मॅनेजर म्हणूनही त्या शाळांशी त्या अल्पकाळात ओझरताही संपर्क आलेला नव्हता. दोन्ही शाळांमधे बी. ए बी. एड् इंग्रजी शिक्षकाची एकेक जागा व्हेकेट होती आणि त्यासाठी दिलेल्या जाहिरातींना नवीन शालेय वर्ष सुरू व्हायची वेळ येऊनही कांहीच प्रतिसाद आलेला नव्हता. गिरिस्थान हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन आमच्याशी संपर्क साधला आणि नोकरीसाठी लगेच अर्ज करायला सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी ‘व्हेकन्सी बी. ए बी. एड्’ ची असल्याने त्या एम. ए. बी एड असल्या तरी स्केल मात्र मी बी. ए. बी. एड्चंच मिळेल याची पूर्वकल्पनाही दिली. अर्थात आमच्या दृष्टीने त्याक्षणी तरी तो महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. आश्चर्य म्हणजे तिथे अर्ज करण्यापूर्वीच ‘माखरिया हायस्कूल’चे मुख्याध्यापक श्री. तोडकरसर यांनी आमच्याशी त्वरीत संपर्क साधून ‘एम. ए बी. एड्’ चं स्केल द्यायची तयारी दाखवली व तसा अर्जही घेतला आणि दुसऱ्या दिवसापासूनच नोकरीवर हजर व्हायची विनंती केली. अर्थात बी. एड्चा रिझल्ट लागेपर्यंत मस्टरवर सही न करता मुलांना त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मोफत शिकवण्याची त्यांची विनंती होती!

त्यांचं एकंदर मोकळं, प्रामाणिक, स्पष्ट न् आत्मविश्वासपूर्ण बोलणं आणि स्थानिक जनमानसात त्यांना असलेला आदर याचा विचार करून आम्ही त्यांचा प्रस्ताव मनापासून स्वीकारला आणि महाबळेश्वरला आल्यानंतर लगेचच आरतीचं माझ्याइतकंच बिझी शेड्यूल सुरुही झालं!

या सगळ्याच घडामोडींना स्वतः साक्षी असूनही मला हे सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! 

पुढे पंधरा दिवसांनी जेव्हा बी. एड्चा रिझल्ट आला तेव्हा फर्स्ट-क्लास मिळाल्याच्या आनंदापेक्षाही इतक्या अकल्पितपणे शैक्षणिक क्षेत्रात कायमस्वरुपी कार्यरत रहायला मिळणार असल्याचा आनंद आरतीसाठी खूप मोठ्ठा होता!!

महाबळेश्वरला बदली झाल्याची आॅर्डर माझ्या हातात आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात! त्या त्या वेळचे कसोटी पहाणारे क्षण, वेळोवेळी तात्पुरता फायदा पाहून किंवा नाईलाजाने नव्हे तर अंत:प्रेरणेने आम्ही घेतलेले निर्णय, क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता,.. आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं याक्षणी मनात जिवंत झालं पुन्हा. या सगळ्याच घटीतांच्या रुपात प्रत्येकवेळी ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

श्रावण महिना आला की आपोआपच श्रावणी सोमवार आठवू लागतात. लहानपणी रत्नागिरीला आम्ही विश्वेश्वराच्या देवळात सोमवारी जात असू. ते देऊळ कॉलेजच्या मागच्या बाजूच्या उतारा खाली होते …. त्यामुळे कॉलेज अर्ध सोडून बरीच मंडळी देवदर्शनासाठी जात असत… श्रावणी सोमवार हा खूप आनंददायी वाटत असे, कारण शाळेला अर्धी सुट्टी! आणि दर सोमवारी उपास सोडायला आई नवनवीन गोड पदार्थ करत असे. अर्धी शाळा सुटली की आम्ही घरी येत असू, तेव्हा स्वयंपाक घरातून छान छान गोड वास येत असे. मग कधी सांजा तर, कधी खीर, कधी रव्याची खांडवी, घावन असे पदार्थ आई उपास सोडायला करत असे.

पुढे मोठं झाल्यावर शिक्षणासाठी सांगलीला राहिले, तेव्हा हरिपूरची श्रावणातली जत्रा हे आनंददायी ठिकाण होते. हॉस्टेलवर राहत असल्यामुळे आमच्याकडे अशा गर्दीच्या ठिकाणी जायला आम्हाला रेक्टर बाई परवानगी देत नसत, पण तरीही कधी गोड बोलून तर कधी बाईंना चुकवून आम्ही हरिपूरच्या जत्रेला जात असू! हरीपुर ला कृष्णा वारणेच्या संगमावर संगमेश्वराचे शंकराचे देऊळ आहे. अतिशय रम्य आणि पवित्र ठिकाण! समोर वाहती नदी, सगळीकडे पसरलेला प्रसन्न हिरवागार परिसर आणि त्यातच हौशे, नवशे आणि गवसे अशा सर्व प्रकारच्या लोकांची गर्दी! म्हणजे देवाला येणारे लोक! तसेच जत्रेला म्हणून येणारे आणि काही असेच छोटी मोठी चोरी मारी करायला येणारे गवसे लोक ही असायचे!

पिपाण्या, शिट्ट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आसमंतात घुमत असत. फुगेवाले, छोट्या मोठ्या वस्तू विकणारे फेरीवाले तिथे फिरत असत. रस्ता अगदी अरुंद होता, दुतर्फा चिंचेचे झाडं होती, वाहनांची, माणसांची खूप गर्दी असे, पण सर्व वातावरण उत्साहाने आनंदाने भरलेले असायचे.. हरीपुरची श्रावण सोमवारची जत्रा अजूनही आठवणींच्या कलशात एक खडा टाकून बसलेली आहे..

पुढे लग्न झाल्यावर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी शंकराला जात असू.. प्रत्येक वेळी माझ्या मनात विचार येई की, हा भोळा शंकर कुठेतरी रानावनात गावापासून दूर असाच राहिलेला असतो ! त्याच्या प्राप्ती साठी पार्वती ने किती व्रतं केली.. कष्ट घेतले. बऱ्याच वेळा शंकराचे ठिकाण नदीच्या काठी किंवा रानावनात च असते…..

नंतर काही वर्षे मुलांच्या संगोपनात गेली आणि या शंकराची दर्शनं थोडी दुर्मिळ झाली! पण अशीच एक खास लक्षात राहिलेली ट्रीप म्हणजे भीमाशंकरची!

पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण पाहायचं राहिलं होतं! भीमाशंकर डोंगराळ भागात असलेलं, फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे जाणं तितकसं सोयीचं नव्हतं, पण एक वर्ष योग जुळून आला. श्रावणामध्ये मी माहेरी आले होते, त्यामुळे दोन्ही भाऊ आणि वहिनी असे आम्ही सर्वजण भीमाशंकर ला जायचे ठरवले. तसं पुण्यापासून हे ठिकाण लांब आहे. इथली आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि तेव्हा स्पेशल गाडी वगैरे प्रकार नव्हता. सरळ एसटीच्या बससाठी स्टैंड वर आलो. भली मोठी लाईन लागलेली होती, तरीही आज नक्की जायचं असं ठरवून आम्ही रांगेत उभे राहिलो. एकदाची आम्हाला बस मिळाली. भीमाशंकरला उतरलो तेही भर पावसात! बरोबर एखादी छत्री होती आणि पुण्याहून येताना इकडे इतका मोठा पाऊस असेल याची कल्पना नव्हती. स्टँडवर उतरल्यावर प्लास्टिकची इरली विकणारी मुले 

आमच्या भोवती जमा झाली. आम्ही लगेच दोन-तीन इरली विकत घेतली आणि ती डोक्यावर घेऊन रांगेमध्ये बारीक बारीक पडणाऱ्या पावसात उभे राहिलो. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आसपास बघितलं तर कुठेही हॉटेल वगैरे दिसत नव्हतं! तिथे काही तरी सोय असेल म्हणून आम्ही खाण्यासाठी डबे नेले नव्हते. त्यामुळे देवदर्शन झाल्यानंतर जेवण खाण्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न वाटत होता!

पण तो विचार मागे टाकून आम्ही प्रथम देवदर्शनासाठी गेलो. वातावरण अर्थातच खूप प्रसन्न होतं! भीमा नदीच्या उगमाचे हे ठिकाण आणि तिथे असणारे शंकराचे वास्तव्य, देवळाच्या मागून भीमेचा उगम बघायला जाणाऱ्यांची गर्दी दिसली. आम्ही सुद्धा त्याच वाटेने वर वर चढत गेलो, पण येणारा पाऊस आणि अंतर या दोन्हीचा विचार करता कधी एकदा उगम पाहतोय आणि खाली येतो असं आम्हाला झालं होतं!

तासभर इकडे तिकडे फिरून झाल्यावर आम्ही परत मंदिरापाशी येऊन बसलो. तितक्यात माझ्या वहिनीच्या ओळखीचे एक जण तिला दिसले आणि शंकराची कृपा इतकी की आम्हाला त्यांनी जेवणासाठी त्यांच्या घरी नेले! तिथे गरम गरम आमटी- भात खाताना खरोखरच मन भरून आलं! जिथे कोणी नाही तिथे परमेश्वर आपला साथीदार असतो याची जाणीव झाली. आपली श्रद्धा पाहिजे एवढे मात्र खरे!

या गोष्टीला सहज 40 वर्ष झाली असतील.. त्यानंतरच्या काळात आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी जवळपास 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते. राहिला तो केदारनाथ! तो योग मात्र आला नाही, पण कसं कोण जाणे, पाटणला असताना तिथे असलेल्या शंकराच्या मंदिराला ‘केदारनाथाचे मंदिर’ म्हणत आणि त्याच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. त्याचेही नाव केदार ठेवले आणि नकळतच त्या केदारनाथाचे दर्शन मला झालं असं मला वाटतं.

दर श्रावणातील सोमवारी नकळतच ही शिवदर्शनाची आठवण होते … आणि या श्रावणातही आणखी एक आठवणींचा खडा माझ्या लेखन कलशात टाकला गेला !

जय भोलेनाथ !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

“आज श्रावणी सोमवार आहे मी शंकराच्या मोठ्या देवळात आत्ता जाणार… “

तिनी सुनेला सांगितले.

“अहो आई आत्ता खूप गर्दी असेल.. असं करूया… सोनल शाळेतून आली की आपण दुपारी तीन वाजता जाऊ या तेव्हा गर्दी कमी असेल”

“मला फराळ करायच्या आधी दर्शन घ्यायचे आहे…. “गर्दी असली तरी असू दे… मी जाणार… “

बजावलंच तिनी सुनेला..

 

“जाऊदे सुनबाई ती नाही ऐकणार”

“हो…. नाहीच ऐकणार.. “

….. असं नवऱ्याला सांगत ती निघालीच… ती शेजारच्या मैत्रिणीकडे गेली 

” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “

“अगं कस ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “

” दे दे आयुष्यभर तू न येण्याची कारणंच दे “

 

आज ती जरा रागावलीच मैत्रिणीवर… आज एवढा श्रावणी सोमवार आहे हिला काही नाही त्याचं…..

 

निघायला साडेनऊ झाले. रिक्षानी निघाली. रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,

“अरे रिक्षा इकडे कुठे?”

” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूपच गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “

” हो का? बरं.. “

 

तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे.. ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती. पाऊण तास झाला होता. देऊळ अजून दूरच होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं… मनातल्या मनात शिवमहिम्न म्हणायचं होत….. जय शिव ओंकारा आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… इतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..

दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळच दिसत होतं.

 

आता रेटारेटी सुरू झाली. ताट हातात धरून हात भरून आला होता. लांबूनच दर्शन घेतलं.

 समोरची शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. नारळ तिथल्या गुरूजींनी बाजूला असलेल्या नारळाच्या ढिगात टाकला. हार देवाला स्पर्श करून तो पण बाजुला ठेवला….. जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं… 

 

चार माणसं गर्दी हटवायला होते

” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…

आज देवं नीट दिसलेच नाहीत…. केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…

 लांबूनच कसंतरी दर्शन झालं.. खरंतर दर्शन झालं असं उगीचच म्हणायचं…. रुखरुखच लागली तिला….

 

रिक्षा करून ती घरी आली. दमली होती. दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला समाधान वाटत नव्हते.

 

मैत्रिणीचे दार उघडे होते. समोरच ती खुर्चीवर बसली होती. मैत्रिणीची नात नाचत समोर आली

म्हणाली.. ” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये…. “

 

घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता. त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.

मैत्रीण म्हणाली.. ” ये ग… बैस थोडा वेळ. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “

असं म्हणून मैत्रीण आत गेली.

 

ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार सुरू झाले… सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली…. इतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…

…. तिला आज ते मनोमन जाणवले.. त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतलाच नाही.

 

तिला आठवली शुक्रवारची कहाणी…

… सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तिचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती एक एक पदार्थावर एकेक दागिना ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………

 

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,….. प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले…. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.

 

अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….

“ देवा चुकले रे मी.. मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती. मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज कळले रे… या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे जाणवले…” 

 

आज आपल्याला बऱ्यापैकी भान आलेलं आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…

उतायचं नाही मातायचं नाही आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही … अस मनोमन तिने ठरवलं.

तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल……. हे तिच्या लक्षात आले.

 

मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला. आणि नातीला म्हणाली,

“आजीला, तु पाठ केलेलं म्हणून दाखव”.. नात फोटोसमोर ऊभ राहून म्हणायला लागली..

 ” कैलास राणा शिवचंद्रमौळी “…

 

नातीने प्रसाद हातात दिला. तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले….

‘आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे…. ’..

तिने कबुली दिली….. कहाणी संपली…..

तिचे डोळे भरून आले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

‘सगळ्या जगापेक्षा तब्बल नऊ महिने आधी त्याची आणि माझी ओळख झाली पण भेट मात्र नऊ महिन्यांनीच झाली. त्याआधी त्याचा आणि माझा संवाद व्ह यचा तो आंतरिक स्पर्शामधून. तो पोटात असताना मला झोके घ्यायला आवडू लागलं होतं. घराचे नको नको म्हणताना मी एखादा तरी झोका घ्यायचीच आणि मग यांनी घरातच छानसा झोपाळा आणून बांधला… बसा माय लेक झुलत. आणि एकेदिवशी म्हणजे १४ मे १९९५ रोजी तो आला! गोंडस.. गोड आणि लाघवी रुपडं घेऊन. सर्वांनीच म्हटलं… मुस्तफा नाव ठेवा. मुस्तफा म्हणजे खास… विशेष… अगणित लोकांमधून निवडला गेलेला! आणि होताही तसाच मुस्तफा. अभ्यासात हुशार आणि खेळांत चपळ. खेळण्यांमध्ये हेलिकॉप्टर जास्त आवडीचं होतं मुस्ताफाचं. आमच्या घरावरून लढाऊ विमानं वेगाने निघून जायची… पण हेलिकॉप्टर आलं की मुस्तफा चपलाईने घराच्या छपरावर जायचा आणि ते नजरेआड होईतोवर त्याकडे पहात राहायचा. त्याचे अब्बू गल्फमध्ये नोकरीला गेले तर याने सुट्टीवर येताना हेलिकॉप्टरच आणा असा हट्ट धरला होता! काय होतं पोराच्या मनात तेव्हा समजलं नाही. तसं आमच्यातलं तोवर कुणीही फौजेत गेलेलं मला तरी माहीत नव्हतं. आणि तो असं काही करेल असं स्वप्नातही आलं नव्हतं कधी आम्हा नवरा बायकोच्या. त्याचे बाबा झकिउद्दीन दूर आखातात नोकरी करायचे आणि मुस्तफा बहुदा तिकडेच गेला असता नोकरी किंवा व्यवसायासाठी. पण वृत्तीने अतिशय धार्मिक होता. त्यामुळे तिकडेही वळायची शक्यता होतीच. मला काहीही चालणार होतं. त्याच्यानंतर झालेली आलेफिया.. तिचं लग्न करून दिलं की मुस्ताफाच्या डोक्यावर सेहरा बांधला की आम्ही दोघं म्हातारा-म्हातारी मोकळे होणार होतो! 

राजस्थानातील उदयपूर जवळचं खेरोडा हे अगदी लहान गाव. पण मुस्ताफाची हुशारी पाहून आम्ही उदयपूर मध्ये राहयाला गेलो. मुस्तफा तिथल्या सेंट पॉल कॉलेजात जायला लागला. कधी त्याने एन. डी. ए. ची प्रवेश परीक्षा दिली, कधी पास झाला ते समजेपर्यंत बेटा खडकवासल्याला निघूनही गेला होता. तिथं आपल्यातलं कुणी नसेल ना रे? मी काळजीने म्हणाले होते.. त्यावर म्हणाला…. अम्मी… याह इंडियन आर्मी है… यहां सिर्फ एक धरम… देश और एक जात… फौजी! तुम देखना इतनी इज्जत कमाउंगा की जितनी कोई दुसरी नौकरी नहीं दे सकती! त्याची पत्रं यायची आणि कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं. म्हणायचा…. जीवनात एक ध्येय सापडल्या सारखं वाटतं आहे… अम्मी! 

पासिंग आऊट परेडला आम्ही तिघेही गेलो होतो… मी, हे आणि धाकटी आलेफिया. तो पूर्ण गणवेशात समोर आला तेंव्हा झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला त्यांच्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं तेंव्हा तर भारी वाटलं होतं. मुस्तफा एअर विंग निवडणार हे तर स्वच्छ होतं… त्याला आकाशात भरारी घ्यायला आवडू लागलं होतं… आंता त्याच्या हाती ख-याखु-या हेलिकॉप्टरची कमान असणार होती आणि तेही साधंसुधं प्रवासी हेलिकॉप्टर नव्हे… चक्क लढाऊ हेलिकॉप्टर! 

दोनच वर्षात तो फायटर पायलट म्हणून तरबेज झाला. त्याचे त्या युनिफॉर्ममधले फोटो पाहून डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही… एवढंसं होतं पोरगं… त्याचे हात चक्क आभाळाला टेकू लागलेत की! एखाद्या मिशनवर निघाला की फक्त त्याच्या अब्बुला कळवायचा… मला नाही! मी खूप जास्त काळजी करते अशी त्याची तक्रार असायची. दिवस निघून चालले… आता सूनबाई आणावी हे बरे. ठरवून टाकलं लग्न…. दोन तीन महिन्यांत बार उडवून द्यायचा होता.

दोन दिवस झाले… भूक लागत नव्हती… आणि डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले आपोआप. का अस्म व्हावं? तसं काही कारणही नव्हतं. ना कुठली लढाई चालू होती ना मुस्तफा कुठे मोहिमेवर निघाला होता. चीनच्या सीमेवर तैनात होता हे माहीत होतं… पण तिथं तर त्याचं काम सैनिकांना मदत करणं होतं… त्यासाठी कितीही उड्डाणे करायला तो सदैव असायचा… वजनाला हलके पण अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर त्याच्या हातातलं जणू आवडीचं खेळणं बनलं होतं. नंतर समजलं… त्याने त्यादिवशी मोहिमेवर जाण्याआधी त्याच्या अब्बुला फोनवरून कल्पना दिली होती. फक्त मोहीम काय आहे… हे नव्हतं सांगितलं.. नियमानुसार. फक्त म्हणाला जवळचा मित्र आहे सोबत…. मेजर विकास भांबु नावाचा. कामगिरी फत्ते करून हे दोघे आणि आणखी तीन सहकारी माघारी निघाले होते. अरुणाचल प्रदेशातील अपर सियांग येथील मिमिंग गावावर ते उडत होते… आणि अचानक त्याच्या हेलिकॉप्टरला मागील बाजूस आग लागली… ते वेगाने जमिनीकडे झेपावू लागले. खाली मोकळे मैदान दिसत होते… तिथे उतरणे सोपे होते… पण खाली आजूबाजूला लोकवस्ती होती आणि मुख्य म्हणजे तिथेच लष्कराचा दारूगोळा साठवण्याची जागा होती. हेलिकॉप्टर नियंत्रणात नव्हतं फारसं… काहीच सेकंद होते निर्णय घ्यायला… मेजर भांबु आणि मेजर मुस्तफा यांनी निर्णय घेतला… गावापासून दूर जायचं हे जळतं कफन घेऊन.. भले आपण जाळून जाऊ पण गाव आणि दारूगोळा वाचला पाहिजे. बलिदानाला काही प्रत्येक वेळी युद्धच असावं असं कुठं काय असतं? सैनिक म्हणजे प्रत्येक क्षण युद्धाचा प्रसंग. त्यांनी जवळच्या जंगलाच्या दिशेने आपले हेलिकॉप्टर वळवले… आणि व्हायचे तेच झाले… काही क्षणांमध्ये दाट झाडीत ते कोसळले…. सर्वजण मृत्यूच्या खाईत कोसळले…. मुस्तफाही त्यात होता! दैवाने या बलिदानासाठी त्याचीच निवड केली होती… नावासारखाच मुस्तफा… खास निवडला गेलेला… the chosen one! 

दोन दिवसांपूर्वी डोळ्यांतून विनाकारण वाहू लागलेल्या आसवांचा अर्थ त्यादिवशी ध्यानात आला! मुस्तफा कदाचित आणखी एका मोहिमेवर निघून गेला असावा… अशी मनाची समजूत काढत दिवस ढकलते आहे. पोरं आईपासून कधीच दूर जात नाहीत…. नदी सागराला जाउन मिळाली तरी उगमापासून तिचे पाणी तुटत नाही. हुतात्मे अमर असतात.. असे ऐकले होते… मुस्तफाही असाच अमर आहे… तो जवळ असल्याचा भास होतो… भास नव्हे… तो जवळच असतो नेहमी! 

तो दिवाळीचा दिवस होता. पण त्या रात्री एक दिवा नाही लावला गेला की एक फटाका नाही वाजला. चुली बंद होत्या… सा-या शहराने, गावाने मुस्तफाच्या देहावर एक एक मूठ माती घातली…. या मातीचे ऋण फेडून तो कायमचा मातीत मिसळायला निघाला होता! आता मी आणि माझे पती एका सामान्य मुलाचे नव्हे तर एका हुतात्मा सैनिकाचे आईबाबा झालो होतो… राष्ट्रपती महोदया सुद्धा आम्हांला सन्मानित करताना गहिवरल्या होत्या… मुस्तफाच्या नावाचे मरणोत्तर शौर्य चक्र स्वीकारताना दोन भावना होत्या…. गमावल्याची आणि कमावल्याची! मुलगा गमावला आणि अभिमान कमावला! आणि हा अभिमान उरी बाळगून उरलेलं आयुष्य काढायचं आहे! मुस्तफा.. अलविदा… बेटा ! ‘ 

(२१ ऑक्टोबर, २०२२ रोजी मेजर मुस्तफा बोहरा, मेजर विकास भांबु क्रू मेंबर्स हवालदार बिरेश सिन्हा, नाईक रोहिताश्व कुमार आणि क्राफ्टसमन के. व्ही. अश्विन यांनी एका हवाई मोहिमेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मेजर मुस्तफा बोहरा साहेबांच्या मातोश्री श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या धैर्याने या दु:खाला तोंड दिले. १५ ऑगस्ट, २०२३ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांनी दिवंगत मेजर मुस्तफा बोहरा यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या सोबत असलेले मेजर विकास भांबु यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले. मेजर भांबु हे सुद्धा राजस्थानचे सुपुत्र होते आणि याआधीही सेना मेडलने त्यांना गौरवण्यात आलेले होते. दिनांक ८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा शौर्य चक्र प्रदान करणयाचा कार्यक्रम झाला. यानंतर झालेल्या मुलाखती मध्ये श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या शौर्याने आपल्या लेकाच्या आठवणी सांगितल्या… त्या आणि तशा अनेक मुलाखती, बातम्या, विडीओस वर आधारीत हा लेख आहे… फातिमा यांच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला.. जय हिंद… जय हिंद की सेना !🇮🇳)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – कुठे चाललोय आपण?– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – कुठे चाललोय आपण? – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

कुठे चाललोय आपण? काय साध्य करायचंय? विनाशाची सुरुवात तर नसेल ना ही? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच का? गेल्या आठवड्या भरापासून ज्या बातम्या येतायत त्या वाचून ऐकून मन सुन्न होऊन गेलंय.. रात्रीची झोप उडालीय… घरात लाडो ला वावरताना बघून अजून काळजी वाढतीय… प्रेगन्सी मध्ये अगदी नवस केल्यासारखं मुलगी मागितली होती आज मात्र भीती वाटतीय.. ज्या समाजात स्त्रियांना देवी समजून पूजा केली जाते तिथेच स्त्रियांची होणारी अमानुष, पाशवी, वासनांध विकृतीने किळसवाणी हत्या पाहुन अंगावर शहारा येतोय.. गेल्या आठवड्यात कोलकत्यात घडलेली घटना अजून जिवंत असताना कालच्या बदलापूर येथील घटनेने बधीर व्हायला झालंय… एका मुलीची आई होण किती कठीण आहे ह्याची जाणीव व्हायला लागलीय.. काल बदलापूर घटनेने आतून हादरून गेलीय.. साडेतीन वर्षांची ती बाळी, ती लाडो न पाहता सुद्धा डोळ्यासमोर येतेय.. एक ओळखीचा चेहरा घेऊन…कोणती विकृती आहे ही? वासनांध विकृती पाहून मनाचा थरकाप होतोय… प्रत्येक वेळी मुलींना संस्काराचे धडे देणारा समाज मुलगा वंशाचा दिवा काजळत चालला आहे ह्याकडे लक्ष देत नाहीय का? मुलीनी अमुक कपडे घातले, उत्तान, सेक्सी वाटणारे कपडे घातले, लली लिपस्टिक लावली मग अस होणारच ना ही असली मल्लिनाथी करणारी मंडळी आता कुठल्या बिळात जाऊन बसलीयेत.. शाळेत जाणारी ती चिमुकली युनिफॉर्म मध्ये होती ओ… ना प्रक्षोभक कपडे होते ना सेक्सि हिंट देत होती.. तरीही तिच्यावर अत्याचार झाले एक कळी फुलण्या आधीच कुस्करली गेली पुन्हा एकदा राक्षसी वासनांध मनोवृत्तीची शिकार झाली.. आता ह्यात दोष कोणाचा? दोष फक्त इतकाच तिच्या स्त्री असण्याचा.. तीस बत्तीस तासाची ड्युटी करून थकलेल्या डॉक्टर मुलीवर तिच्याच सोबत काम करणाऱ्या नराधमाने अमानुष बलात्कार केला ज्यातक तिच्या शरीरावर ११४ चावे होते, तिच्या डोळ्यात काचा खुपसल्या गेल्या आणि अजून जे किळसावाणे प्रकार झाले ते तर लिहण्याची ही हिम्मत होत नाहीय माझी.. आणि हे सगळं होत असताना ह्यात स्त्रियांचा ही समावेश होता हे वाचून तर तळ पायाची आग मस्तकात गेलीय… 

कानावर येणाऱ्या हया अशा अनेक घटना पाहून आणि आपल्या ही घरी एक लाडो वाढते आहे हे पाहून मन सुन्न होतंय.. मुलींना फक्त गुड टच बॅड टच समजावून तिच्यावर संस्काराचे ओझे लादून हा प्रश्न सुटेल अस मुळीच वाटतं नाहीय.. साडेतीन वर्षाचे ते लेकरू काय प्रतिकार करणार ओ.. वासनांध झालेल्या राक्षसापुढे तिचा काय निभाव लागणार ओ.. नुसत्या कल्पनेने ही अंगावर शहारा येतोय.. आता काही दिवस हया सगळ्याची खूप चर्चा होईल, मोर्चे निघतील, निषेध होतील, कँडल मार्च निघेल आणि पुन्हा काही दिवसांनी अशाच बातम्या कानावर येतच राहतील.. जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार… कोर्टात केसेस वाढत राहणार एकेक अपराधी जेल मध्ये मजेत तीनवेळा मिळणारं फुकटच अन्न खात मजेत जगणारं आणि इकडे जिच्यावर अत्याचार झाला ती झोपेत ही दचकून उठणार तिच्या मनावर आयुष्यभरासाठी असंख्य ओरखडे उठणारं.. आपली न्याय व्यवस्था अशीच हतबल होत राहणार.. आणि तुम्ही आम्ही हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार..

ही सगळी परिस्थिती पाहून मन खचून जातंय.. स्त्रिया कुठेच सुरक्षित नाहीत हे सतत त्रासदायक होतेय.. घरट्यात असूदे, शाळेत असुदे, ट्रेन, बस, रस्ता, ऑफिस कुठे ही जा ही वखवखलेली नजर स्त्रियांचा पाठलाग करतच राहणार.. हया परिस्थितीवर आपण फक्त आणि फक्त उद्विग्न होऊन निषेध करत राहणार का? आपल्या लाडोला कसे वाढवणार आपण.. तीन चार वर्षाच्या मुलीना पेपर स्प्रे आणि कराटे क्लासेस वाचवू शकतात का? ही सगळी परिस्थिती पाहून अस्वथपणा वाढत जातोय मन सुन्न होतेय हे कसे बदलणार की आपण फक्त मुलीनी घातलेल्या कपड्यावर चर्चा करत राहणार.. छे हया अनेक प्रश्नांची उत्तर माझ्याकडे तर नाहीत तुम्हाला सुचत असतील तर सांगा मला ही कारण मी ही एक स्त्री आहे आणि एका लाडोची आई ही… 😭

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

“हॅलो, मंगेश का” तासाभरात काकूंचा आलेला तिसरा फोन.

“हो, काकू. बोला”

“अरे, एक सांगायचं राहिलं म्हणून परत फोन केला. तीन-चार रविवार ‘संडे डिश’ आल्या नाहीत. ”

“मी तर पाठवल्यात”

“मला नाही मिळाल्या. बहुतेक व्हाटसपचा प्रॉब्लेम झालाय. आता काय करू”

“घरातल्या दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा. त्यावर पाठवतो. ”

“नको रे बाबा”

“का”

“लेकाला कळलं तर चिडेल आणि तुला फोन केलेला त्याला आवडणार नाही. ”

“मी अवीशी बोलतो”

“नाही. नको, फोनच्या प्रॉब्लेमविषयी रोज सांगतेय पण माझ्यासाठी कोणाला वेळच नाहीये. सगळे बिझी फक्त मीच रिकामटेकडी आहे आणि त्यात तू जर अवीला काही बोललास तर आमच्या घरात महाभारत होईल. ”

“तसं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. ”

“अवीला सांगण्यापेक्षा तूच फोन दुरुस्त करून दे ना. प्लीज. विनंती समज”

“असं परक्यासारखं का बोलतायं. ”

“म्हातारपण वाईट रे!! माझ्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. वयामुळे विसरायला होतं. थोडावेळा पूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही. पुन्हा पुन्हा तेच बोललं जातं”

“आत्ता घरात कोणी आहे का”मी विषय बदलला.

“सगळे बाहेर गेलेत म्हणूनच फोन केला. अवी परत यायच्या आत म्हटलं बोलून घ्यावं. आजकाल फार चिडचीड करतो. मला तर सारखं धारेवर धरलेलं असतं. हे कर, ते कर, असं करू नको, तसं करू नको. हेच चाललेलं असतं. तो घरात असला की फार टेंशन येतं. भीती वाटते. कसं वागावं हेच कळत नाही. ”काकू भावुक झाल्या. मलाही काय बोलावं हे सुचेना म्हणून विषय बदलण्यासाठी म्हणालो “एक उपाय आहे. ”

“अरे वा!! कोणता?”काकूंनी उत्साहानं विचारलं.

“व्हॉटसप डिलिट करून नवीन डाउनलोड करायचं. ”

“असं करता येतं. ”काकू 

“हो, एकदम सोपयं”

“मग तूच दे ना करून”

“त्यासाठी तुमचा फोन लागेल”

“अरे देवा!! मग रे”

“अवीला सांगतो”

“नको, तो चिडेल”

“मग सूनबाई”

“तिच्याविषयी न बोललेलं बरं”

“मग एखादी मैत्रीण, शेजारी, नातेवाईक वगैरे”

“ढीगभर आहेत पण अवीला कळलं तर तो चिडेल. ”

“मग काय करायचं तुम्हीच सांगा. ”

“सॉरी हं!!तुला खूप त्रास देतेय पण काय करू. हा फोन चांगला टाईमपास होता पण आता तो सुद्धा रागावला”

“अवीसारखा!!”माझ्या बोलण्यावर काकू दिलखुलास हसल्या.

“बरं ठेवते. दाराची बेल वाजतेय म्हणजे अवी आला. फोनवर बोलताना पाहिलं तर परत पन्नास प्रश्न विचारेल. ” काकूंनी घाईघाईत फोन कट केला.

 शालिनीकाकू, माझ्या मित्राची आई, वय सत्तरीच्या आसपास. तब्येतीमुळे घराबाहेर पडणं अवघड झालेलं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टीव्ही हाच मोठा आधार. त्यात मोबाईल नीट काम करत नसल्यानं काकू अस्वस्थ.

स्पष्ट बोलल्या नसल्या तरी काकूंच्या वेदनेचा ठणका जाणवला. खूप बेचैन झालो. डोक्यात विचारांचा भुंगा सुरु झाला. कितीतरी वेळ फोनकडचं पाहत नुसताचं बसून होतो.

“काय झालं. असा का बसलायेस. ”बायकोच्या आवजानं भानावर आलो. काकूंविषयी सांगितल्यावर तीसुद्धा अस्वस्थ झाली. “हे नवीनच ऐकायला मिळालं.

“वयस्कर आईला धाकात ठेवायला काहीच कसं वाटत नाही. ”

“त्यांच्याही काही अडचणी असतील आणि फक्त एका बाजूनं विचार करू नकोस. ”

“तुला नक्की काय म्हणायचंयं”

“काकूंचं ऐकून लगेच मित्राला दोष देऊन मोकळा झालास. ”

“वस्तुस्थिती तीच आहे ना. काकू कशाला खोटं सांगतील. ”

“आणि अवीभाऊजी सुद्धा मुद्दाम असं वागत असतील हे वाटत नाही”

“तुला काय माहीत”

“नसेल माहिती पण भाऊजीची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना. ”

“क्षणभर तू म्हणतेस ते मान्य केलं. काकूंच्या वागण्याचा त्रास होत असेल तरी त्यांच्या वयाचा विचार करता घरातल्यांनी समजून घ्यायला काय हरकत आहे. थोडी अडजेस्टमेंट करावी. ”

“शंभर टक्के मान्य पण एक सांग आजकाल आपण सगळेच एकाच वेळी अनेक फ्रंटवर लढतो. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देताना वारंवार तडजोडी कराव्या लागतात. इच्छा नसताना मन मारावं लागल्यामुळे चिडचिड होते. ऑफिसमध्ये बोलता येत नाही. मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं” 

“म्हणजे”

“घरातली लहान मुलं आणि म्हातारी माणसं म्हणजे सॉफ्ट टार्गेट.. म्हणून त्यांच्यावर राग निघतो. त्यातल्या त्यात म्हाताऱ्यांवर जरा जास्तच…”

“खरंय तुझं. यात अवीची सुद्धा काही बाजू असेल याचा विचारच हा केला नव्हता. बरं झालं तुझ्याशी बोललो. कधीही एका बाजूनं विचार करू नये. हा चांगला धडा मिळाला. ”

‘तेच तर सांगायचं होतं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा देखील विचार करावा. ”

“मग आता??”

“अवीभाऊजीना फोन कर”

“त्याच्याशी डायरेक्ट बोललो तर काकूंना त्रास होईल. ” 

“त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐक. तुझ्या पद्धतीनं समजावून सांग आणि तसंही भाऊजी काकूंवर चिडतातच फार तर अजून जास्त चिडचिड करतील. ”एवढं बोलून बायको किचनमध्ये गेली आणि मी अवीचा नंबर डायल केला रिंग वाजत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)

शिरसाष्टांग प्रणिपात,

उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.

आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..

आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

आपला,

दासचैतन्य.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

५ सप्टेंबर — शिक्षक दिन ! 

.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..

मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर 

वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!

त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.

माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!

माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.

त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,

 कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते ! 

त्या वडिलांच्या स्मृतीला मी आज वंदन करते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares