मराठी साहित्य – विविधा ☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

(शिक्षक दिन विशेष) 

शिक्षक आणि समाज, गाव याचे खूपच निकटचे संबंध असतात. पुर्वी खेड्या-पाड्यातून गावातील शिक्षकांना लोक खुप मानत असत. गावात होणाऱ्या अनेक घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचा आवर्जून सहभाग होत असे. अनेक बर्‍या-वाईट प्रसंगात शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा. इतकेच काय फार पुर्वी गावात एखांद्याचे पत्र आले तरी लोक ते पत्र गावातील शिक्षकांकडून वाचून घेत असत. घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचे आदरातिथ्य पण मोठ्या कौतुकाने होत असे. इतके समाजात शिक्षकांचे महत्त्व होते.

आज बदलत्या काळानुसार लोक बदलले. आणि समाज बदलत चालला आहे. आज समाजात पुर्वी असणारे शिक्षकांचे स्थान कुठेतरी मावळताना दिसत आहे. तरी सुध्दा मला एका गावाची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगावी वाटते. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालूक्यात उत्तरेकडे पणुंब्रे-घागरेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव आहे. खरोखर या गावाला ‘ आदर्श शिक्षकांचा ‘ गाव असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही. तुम्ही या गावाला भेट द्याल तर प्रत्येक गल्लीत एक तरी आजी -माजी शिक्षक तुम्हास भेटतीलच. आणि या सर्वच शिक्षकांचे गावच्या शैक्षणिक विकासात खूपच मोलाचे सहकार्य आहे.

या गावात जुन्या काळातील शिक्षक बी. एम. पाटील गुरूजी, एम. जी. पाटील गुरूजी, तसेच पांडुरंग घागरे गुरूजी, रंगराव भोसले गुरुजी, तानाजी परीट गुरुजी, आणि आदर्शतेचा वारसा जपणारे, अत्यंत शिस्तप्रिय असे तुकाराम बळवंत पाटील (तात्या गुरुजी) आजही त्यांचा आदर्श आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसेच प्रसिद्ध कीर्तनकार मा. पी. सी. पाटील सर ( मराठीचे प्राध्यापक ), एम. टी. घागरे सर, कै शामराव पाटील गुरूजी, इत्यादी अनेक शिक्षकांचा वारसा या पणुब्रे-घागरेवाडी गावास लाभला. या सर्व गुरुजनांनी घडविलेले अनेक विद्यार्थी व याच गावचे सुपुत्र देशात व देशाबाहेर देखिल चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गावातील मुले-मुली आज संपुर्ण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, देशसेवेत, क्रिडा, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात या गावातील अनेक युवक-युवती कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. हे सर्व श्रेय या गावच्या शिक्षकांचे आहे या सर्व शिक्षकांनी फक्त चार भित्तीच्या आत शाळेतच विद्यार्थी घडविले नाहीत तर ते सदैव गावचा विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, पंचक्रोशीत गावाचे चांगले नाव असावे म्हणून ही सर्व शिक्षक मंडळी सदैव झटत राहिले. आज या सर्व माजी शिक्षकांचे कितीतरी विद्यार्थी सेवानिवृत्त आहेत. पण गावात वावरताना समोरून त्यांचे हे सर्व माजी शिक्षक भेटले तर त्यांच्याबद्दलाचा तोच आदर, आणि आपले गुरूजी म्हणून त्यांच्याबद्दल तोच सन्मान नजरेत असतो. हेच या गावातील सर्व माजी शिक्षकांच्या ज्ञानाचे फळ आहे. पणुंब्रे-घागरेवाडी येथील दोन्ही मराठी शाळांना ‘ स्वच्छ सुंदर शाळा ‘ आणि ‘आदर्श शाळा ‘ असे पुरस्कार प्राप्त आहेत.

आज याच माजी शिक्षकांच्या आदर्शतेचा वारसा पुढे नेणारे याच गावचे अनेक आजी शिक्षक आहेत. या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. बाजीराव पाटील सर, पणुंब्रे मराठी शाळेत असणारे शिराळा तालूक्यात आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे ते मा. विलास घागरे सर, तसेच अशोक तातोबा घागरे सर, गावातीलच मा. यटम सर, इ. कितीतरी माजी शिक्षकांचे विद्यार्थी असणारे हे सर्व आजी शिक्षक गावच्या शैक्षणिक, , सामाजिक, तसेच सांस्कृतिक विकासासाठी झटत आहेत. हे सर्व आजी शिक्षक या माजी शिक्षकांचेच विद्यार्थी आहेत.

तसेच पणुंब्रे गावच्या पहिल्या महिला शिक्षिका कै. सावित्री भोसले पाटील मॅडम (पाचुंब्री), घागरेवाडीच्या पहिल्या शिक्षिका सध्या शिराळ्यात कार्यरत असणार्‍या आदर्श शिक्षका सौ. अनुराधा पाटील -घागरे मॅडम(बिऊर), सौ. जयश्री पाटील मॅडम, मुंबई येथे प्रिन्सिपल असणाऱ्या सौ. कविता पवार – भोसले मॅडम(ऐतवडे), प्रा. सौ. गीतांजली पाटील मॅडम या सर्व शिक्षिका याच गावच्या माहेरवाशीण आहेत त्या सुध्दा आपल्या सासरी जाऊन आदर्श शिक्षकेचा वारसा जपत आहेत तो याच गावचा आदर्श ठेवून.

खरोखर या पणुंब्रे-घागरेवाडी गावचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात या सर्व आजी-माजी शिक्षकांचे ज्ञानदानाचे योगदान खुपच अमुल्य आहे. हे सर्वजण शिक्षक म्हणून गावाला लाभले हे या गावचे श्री भैरवनाथ कृपेने मोठे भाग्य आहे. म्हणून म्हणावे वाटते ” ज्या गावाला, समाजाला चांगले शिक्षक लाभले तो गाव विकासापासून कधीच दूर रहात नाही. “

मोठ्या अभिमानाने शेवटी लिहावे वाटते, असे शिक्षकांचे गाव मला माहेर म्हणून लाभले हे मी माझे थोर भाग्य मानते. येथील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचीच ही माझी शब्दपुष्पे शुभेच्छा म्हणून या सर्व शिक्षकांना देत आहे.

“शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा”

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी  ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

कृष्णा! तू अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितलीस आणि त्याचा मोह दूर केला व युद्धासाठी प्रवृत्त केलंस. कशाला रे! त्याने तर तुला म्हंटलं होतं नं? मला राज्यही नको व राज्याचा उपभोगही नको! मग तुला का सांगावसं वाटलं “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।” अन्याय सहन करण्याचा पायंडा पडायला नको. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, म्हणूनच नं!

आमची पुण्यभू ‘भारतमाता’ अजूनही आम्हाला प्रियच आहे. पण आमच्यात अजूनही हिंमत आलेली नाही की कुणी धर्माचं नाव सांगून आमच्यावर अत्याचार करत असेल तर आमच्याही धर्मातच कृष्णानी सांगून ठेवलंय की अन्याय झाला तर प्रतिकाराला सज्ज रहा म्हणून! तसेच कुठलाही दाखला, आवश्यक कागदपत्र मिळविण्यासारख्या छोट्या छोट्या हक्काच्या गोष्टींपासून लाच देत रहातो आम्ही, अन्याय सहन करत रहातो आम्ही. काही वाटेनासं झालंय आम्हाला त्याचं!

अर्जुनाच्या मिषाने आम्हाला पण सांगितलं आहेस तू; “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”  पण तुला दैवत मानतांनाही कानाडोळाच करतो आम्ही त्याच्याकडे! लोकांचं राज्य आहे म्हणतांनाही आम्हाला मनासारखं ‘खातं’ मिळालं नाही तरी सिंहासन गदागदा हलवतच रहातो आम्ही! आम्हाला पाहिजे ते खातं मिळवून, त्याचं फळ स्वतः खाऊन मुलाबाळांसाठीही राखून ठेवायचंय नं! माखनचोर कृष्णाची दहिहंडी पहा किती उत्साहात साजरी करतो आम्ही?पण अहमहमिका पहा कशाची सुरूं आहे!तू माखनचोरीचा पायंडा घातला कशासाठी?सगळ्या गोरगरीब मुलांना ते माखन मिळून राष्ट्रकार्यासाठी त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं व समान वाटप व्हावं म्हणून!आम्ही मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही सज्ज आहोत! कुणाकुणाला कौरवांसारखी शिक्षा होते, ते मात्र आम्हाला कधीच कळत नाही. आमचे आजचे गुरूकुलंही भ्रष्टाचारात मागे नाहीत बरं!

दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या द्रौपदीला वस्त्र पुरवायला तू तातडीने धावून गेलास. आज कितीतरी ‘द्रौपदी’ उद्ध्वस्त होतांना दिसताहेत. भर सभेत मान खाली घातलेले तिचे पती, तिचा मान राखायलाही पुढे सरसावले होते नंतर. तिचे पातिव्रत्य नाही नाकारले त्यांनी! आज मात्र अशा अन्याय झालेल्या ‘स्त्री’लाच खाली मान घालून जगावे लागते. नाहीतर ‘अरुणा शानबाग’सारखं उद्ध्वस्त होऊन जगावे लागते तिला.

अशा कितीतरी गोष्टी आहेत रे कृष्णा! पण तू म्हंटलं आहेस नं! 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।”

मग आम्ही सारे अर्जुन झालो आहोत आणि तुझा जन्मोत्सव साजरा करतोय दरवर्षी. तू जन्म घ्यायची वाट बघत बसलो आहोत. दंग मात्र उत्सव साजरा करण्यातच आहोत. अरे बाबा, तू कृष्ण भगवान म्हणून ज्याच्या पाठीशी उभा राहिलास, ज्याला लढायला प्रोत्साहित केलेस, त्या अर्जुनाच्या अंगात लढण्याची धमक होती. पण आज एखादा कृष्ण उभा राहिला तर त्याला चहूं बाजूंनी घेरून नामोहरम कसे करायचे याची अहमहमिका लागली असते आमच्यात! त्यासाठी आम्ही सारे अर्जुन एक होतो. कारण तुझ्या दहिहंडीतून बाहेर आलेलं दही दुसर्‍या कोणाला घेऊ द्यायचे नसते नं आम्हाला!

त्यापेक्षा आता तू असंच कर!आम्हाला सगळ्यांनाच ठणकावून सांग!”धर्माला ग्लानि यायला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावायचा. अन मी येऊन धर्माची संस्थापना केल्यानंतर तुम्ही परत गोंधळ घालायचा का? माझ्या एकट्यावर जबाबदारी का टाकता?घ्या सगळेच आपापल्या वाट्याचा जबाबदारीचा हिस्सा! सगळ्यांच्याच अंतःकरणात कृष्ण जन्म घेऊ द्या! मग कृष्ण जन्म घेण्याची तुम्हालाच ‘युगे युगे’ वाट बघावी लागणार नाही. “

कृष्णा तू खरंच असे ठणकावून सांग! आणि हो, या सगळ्यांमध्ये मी पण आहे बरं का? मी तरी कुठे काय करत असते?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी 

फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !

फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?

मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;

हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.

हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !

खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.

मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !

खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “जरासं बदलून बघा ना…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत. तीनी पितळेचा किंवा चांदीचा गणपती घेऊ म्हटलं तर ते म्हणाले,

” नाही…. मला चालणार नाही. यावर नोऑर्ग्युमेंट”

ती म्हणाली 

“लग्नाला 50 वर्षे झाली आहेत पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज्ज…. ते म्हणतील तेच फायनल…..

मी बोलू पण शकत नाही. ऊगीच वाद नको. म्हणून गप्प बसायच. “

हं………

 

मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे आहेत. ते म्हणाले 

“मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल?”

दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष 76

मीना म्हणाली 

” दादाला भीत भीतच यांच आयुष्य गेलं. पुढचंही जाणार… यांना निर्णय क्षमता कधी येणार कोण जाणे?

दरवेळेस दादा काय म्हणेल……. “

……..

नानांनी तर डिक्लेअरच केलं

” मी मेलो की काय करायचं ते करा… “

……….

बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं पण भितीच वाटते….

काही विपरीत झालं तर…

त्यापेक्षा नकोच ते…..

 

वसुधा म्हणाली” माझा मुलगा आणि सून किती वर्ष म्हणत होते. पण माझाच विरोध होता. खरंतर कारण असं काहीच नाही. पण होता..

पण आता एकदम कसा होकार द्यायचा ? “

 

लिली चा फोन आला

” मावशी यस यु आर राईट.. पण नंतर गर्दी होईल म्हणून मी आधीच ऑनलाईन गणपती बुक केला होता. त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आहे. आता नेक्स्ट टाईम मी पितळेचा घेईन…. “

 

जया म्हणाली 

“आमच्या पप्पांच मम्मींसमोर काही चालत नाही. त्यांना खरतर हे आवडलं असतं. मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलू नकोस…. “

 

चार वर्षांपूर्वीची गोष्ट आशाकडे चांदीचा गणपती होता. तिनी चौरंग आणला. त्यावर गणपती बसवला. हार घातला. समया, निरांजन, लावलं. लाईटची माळ लावली. छान डेकोरेशन करून सजवलं.

पण नणंद बाई रागवल्या,

“हे काय चाललय तुझं ?आपल्याकडे गणपती बसवत नाहीत तू हे काय नवीन सुरू केलेस? इत्यादी……. “

झालं….

तेव्हापासून बंद..

 

अमेरिकेत असलेल्या अमोलंनी आईला विचारलं ती म्हणाली

” गणपती बसव, गौरी कर, नवरात्र घाल, काय वाटेल ते कर तू थोडंच माझ ऐकणार आहेस ?… “

थोडक्यात काय तर……

 

दोन वर्षांपूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला.

तिची नात जाम खुश झाली.

बाप्पा बाप्पा म्हणत हातात घेऊन नाचली. मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली.

तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला. तिनी तो सजवला. बाप्पाला त्यात बसवल.. फोटो काढले…

नात खुष झाली….

 

बाप्पाला आपण म्हणतो 

“आम्हाला सुखात.. आनंदात ठेव…. ” खरंतर तसं राहणं बरंचस आपल्याच हातात आहे. सगळंच कशाला देवावर सोपवायचं?

थोडा प्रयत्न आपणही करू या की.

 

काय खरं की नाही?

मग म्हणा की

” गणपती बाप्पा मोरया…. “

आणि थोडं बदला की……

ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करा. घरीच विसर्जन करा. आता काही शाळेतही शिकवतात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.

 

श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं

” श्री गणेश पंचरत्न स्तोत्र “खूप छान आहे.

यावर्षी ते पाठ करा. मी म्हटलेलं तुम्हाला पाठवत आहे तुम्हाला युट्युब वर मिळेल.

बाप्पाला तुम्ही समोर बसून मनापासुन म्हटलेलं आवडेल.

 

बदल कशाचा, कधी, कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो.

बघा प्रयत्न करुन….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे… अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक… दिसायला सुंदर… !

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात.. ! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच… !

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा… आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा… !

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा, आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम.. तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षीस… अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.

मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर… थकवा गायब… नैराश्य गायब… उदासिनता, मरगळ पळून जाईल… !

आपण काय करतो, कसंतरी करतो. मग आतून काम कसंतरी झालंय, असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज वाढत जातं.

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो. मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे… ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे ‘कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय’ हे लक्षात येईल. थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

‘भरभर कर… काय खेळत बसलाय… चेंगटपणा नको’ असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहिजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पूर्ण… संपूर्ण… आणि सुंदर… आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !

लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 बाप्पा तुझा आमच्याकडे यायचा टाईम कि रे झाला…

दरवर्षाला सांगत असतो ना लवकर येशील पुढच्या टायेमाला..

अन तसा तू येत असतोच न विसरता दर वर्षाला… लालचावलास तू सारखा सारखा इथं यायला… भलामोठा मंडपात, सुशोभित मखरात, बसतोस ऐषआरामात… घरच्या, दारच्या यजमानांची उडते किती त्रेधातिरपिट… तूझ्या आगमनाच्या आधीपासून ते तुला निरोपाचा विडा देईपर्यंत.. असते का काही तुला त्याची कल्पना… फक्त भिरभिरते डोळे तुझे शोधती नैवेद्याचे मोदक ताट भरून आहेत ना.. सुपाएवढे कान तुझे आरत्या, पूजाअर्चा, तारस्वरातल्या ऐकून घेती… छचोर गाण्याचा शंख कर्णा त्या फुंकती.. नवल वाटे मजला अजूनही बहिरेपण तुजला कसे न आले… आल्यापासून जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवशी… साधुचे नि भोंदूचे भाव अंतरीचे जवळूनी पाहशी.. जसा ज्याचा भाव तसा त्याला पावशी… मिस्किल हसू आणून गोबरे गाल फुगवून बसशी… तथास्तू चा हात आशिर्वादाचा तव मात्र सगळ्यांच्या मस्तकी ठेवशी… ज्याची त्याची मनातली मागण्यांची माळेची मोजदाद तरी तु किती करशी… करोडोंची होतसे इथे उलाढाल ती दिखाऊ भक्तीचा भंडारा उधळून देण्यास.. देखल्या देवा दंडवताच्या उक्ती नि कृतीला तूही आजवरी ना विटलास… चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा तू अधिपती… कसा विसरलास भक्तांना अंतर्यामी खऱ्या भक्तीची, सश्रद्ध बुद्धी देण्यास ती… दहा दिवसाचा तो सोहळा रात्रंदिन आमचाच कोलाहलाचा गलका… कधीही चुकूनही नाही तू सोडले मौनाला शब्दाने एका.. जे चालले ते सगळेच चांगलेच होते भावले आहे का तुला?… निदान हे तरी सांगशील का मला!……

.. आणि आणि हो.. माझं ना तुझ्या जवळ एक मागणं आहे!.. या वर्षी तू इथं आलास कि तू मौन बाळगून बसू नकोस… जे जे तुला दिसतयं ते तुला आवडतयं, नावडतयं ते स्पष्ट सांगायचं!.. घडाघडा बोलायचं!… मनात काही ठेवायचं नाही.. नि पोटात तर काहीच लपवायचं देखिल नाही!… तुला काय हवयं ते तू मागायचं.. अगदी हट्ट धरून… आम्ही नाही का तुला नवस सायास करतो तुझ्या कडे हक्कानं!.. मग तु देखील आमच्याकडे मागणी करण्याचा हक्क आहेच कि… टेक ॲन्ड गिव्ह हि पाॅलिसी चालतेय ना श्रध्देच्या बाजारात… मगं कसं सगळा व्यवहार पारदर्शी होईल…. पण त्यासाठी तुला बोलावेच लागेल… मौन धरून गप्प बसण्यात काही मतलब नाही.. आणि आम्हालाही कळेल कि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत कि नाहीत… आणि समजा मागुनही मिळणार नसेल तर तर दोन हस्तक नि एक मस्तक तुझ्या पायी ठेवून.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. चित्ती असु द्यावे समाधान अशी मनाची समजूत घालून पुढे चालू लागू… तरी पण यावेळे पासून तू आमच्या बरोबर बोलणार, संवाद साधणार आहेस… अरे तु दिलेल्या चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा आम्ही मानवांनी काय आविष्कार केलाय हे तु पाहिलसं पण ते तुला जसं हवं होतं त्याच अपेक्षेप्रमाणे झालयं का कसं… का तुला काही वेगळचं अपेक्षित होतं.. हे तुला आता सांगावच लागेल… निदान उशीर होण्यापूर्वी चुक दुरुस्ती तर करता येईल…. नाहीतर नाहीतर आम्ही पण तुझ्याशी बोलणार नाही.. एकाही शब्दांनं… कट्टी कट्टी घेणार तुझ्याशी… आणि आणि आरतीच्या, पूजाअर्चाच्या वेळेला तुला दाखवलेला नैवेद्य, प्रसाद आम्ही सगळाच खाऊन टाकू… तुला बिल्कुल देणार नाही… हिच तुला आमच्याकडून पेनल्टी… कितीही गाल फुगवून रूसून बसलास तरी… मग मनात आणूही नकोस फिलिंग स्वत:ची गिल्टी वाटल्यावरी…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र- स्टॅंडच्या बाकावर बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान माझ्या थकल्या मनावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला आठवले…

‘निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात, तेच आपल्या कसोटीचे क्षण! जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात.. !’

त्या रात्री स्टॅंडवरच्या एकांतात बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!) इथून पुढे —- 

एरवी अविश्वसनीय आणि अतर्क्य वाटावीत अशी यासारखी अनेक घटीतं पुढे प्रत्येक वेळी मला मात्र ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातलं अंतर कमी होत चालल्याची आनंदादायी अनुभूती देत आलेली आहेत!

यावेळी पौर्णिमेची तारीख बघण्यात माझी नकळत झालेली चूक आणि त्यामुळे पौर्णिमेचं दर्शन अंतरण्याची निर्माण झालेली शक्यता हा बाबा नेहमी म्हणायचे तसा माझ्या कसोटीचाच क्षण असावा आणि केवळ अंत:प्रेरणेनेच मी सलग दोन रात्रींचं जागरण करून भुकेल्यापोटी आंतरीक ओढीने ‘त्या’च्याकडे धाव घेत कसोटीला खरा उतरलो असेन. कारण त्यानंतरच्या महाबळेश्वरमधील पुढच्या साधारण पावणेतीन वर्षांच्या कालावधीत अशी कसोटी पहाणारे क्षण कधी आलेच नाहीत. या प्रदीर्घकाळात ब्रॅंचमधील सगळी कामे, जबाबदाऱ्याच नव्हेत फक्त तर प्रत्येक पॅरामीटर्सवरील माझा परफॉर्मन्सही वरिष्ठांकडून मला शाबासकी मिळवून देणारा ठरत होताच, शिवाय दर पौर्णिमेलाही जाणिवपूर्वक नियोजन न करताच सगळं कांही निर्विघ्नपणे पार पडत होतं!आश्चर्य हे कीं या पौर्णिमेनंतरच्या पुढच्या अडीच-तीन वर्षातल्या कुठल्याच पौर्णिमेच्या प्रवासासाठी मला ना कधी रजा घ्यायला लागली ना कधी प्रवासासाठी कसला खर्चही करावा लागला. कारण नेमक्या त्यावेळी अचानक असं काही घडून जायचं की पौर्णिमेच्या जवळपास जसंकांही बँकेमार्फत दत्तमहाराजच मला बोलावून घ्यायचे!दरवेळी निमित्तं पूर्णत: वेगळी असत पण ती निर्माण होत ती मात्र पौर्णिमेच्या सलग आधी किंवा नंतर. आमचं रिजनल ऑफिस कोल्हापूरलाच होतं. तिथे कधी हिंदी वर्कशॉपसाठी ब्रॅंचतर्फे मला जावं लागे, कधी ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी, कधी कोर्टात सुरू असलेल्या वसुली केसेसमधे साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या कोर्टात उपस्थित रहावं लागे किंवा कधी छोटे-मोठे ट्रेनिंग प्रोग्रॅमस्… कांही ना कांही कारण निघायचं आणि त्या त्या वेळच्या रुटीनचाच एक भाग म्हणून रिजनल-ऑफिसकडून मला बोलावणं यायचं आणि त्या निमित्ताने माझं पौर्णिमेचं दत्तदर्शन तर व्हायचंच शिवाय सगळे प्रवास खर्च आणि टीए डीए बँकेकडून मिळायचे.

खरंतर सहज घडलेल्या एका साध्या प्रसंगाच्या निमित्ताने सलग बारा वर्षांचा दीर्घकाळ दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला नियमित दत्तदर्शनाला यायचा मी केलेला तो संकल्प! ‘आपल्याला या पौर्णिमेला जायला जमेल ना? काही अडचण येणार नाही ना?’अशी टोकाची साशंकता या बारा वर्षांच्या दीर्घकाळात मनात कधीच निर्माण झालेली नव्हती. या एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यात आणि ‘सर्विस लाइफ’ मधेही प्रचंड उलथापालथ आणि स्थित्यंतरं व्हायचे अनेक प्रसंग आले. पण त्यावेळीही मन कधीच साशंक झालेले नव्हते. या दरम्यानच्या काळात मला मिळत गेलेली सलग प्रमोशनस् मला प्रगतीपथावर नेत असायची. त्या प्रत्येकवेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांच्याच मनात सेंट्रल-आॅफीसची ‘प्रमोशन पोस्टिंग पॉलिसी’ काय ठरते याच्या उत्सुकतेइतकेच दडपणही असायचेच. या प्रत्येक प्रमोशनच्यावेळी असणारी अनिश्चितता काय किंवा एरवीही वेळोवेळी कधीही होऊ शकणाऱ्या माझ्या बदल्या काय, त्या प्रत्येकवेळी माझ्या संकल्पपूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकलेही असते, पण आश्चर्य म्हणजे तसं कधीही झालं नाही!आज मागे वळून बघताना मला तीव्रतेने जाणवते की त्या त्या प्रत्येकवेळी ‘त्या’नेच मला अलगदपणे अनपेक्षित आधार दिला होता, सांभाळलं होतं आणि त्यानेच एक अदृश्य, अभेद्य असं ‘संरक्षक कवच’च माझ्याभोवती तयार करून ठेवलं होतं जसंकांही!अशा अनुभवांपैकी एखाददुसरा प्रातिनिधिक प्रसंग लिहिण्याच्या ओघात पुढे कधीतरी येईलही. अशा प्रसंगी अगदी अचानकपणे मिळालेल्या अकल्पित कलाटणीने थक्क झालेल्या माझ्या मनाला ‘माझी संकल्पपूर्ती हा माझ्याइतकाच त्याचाही आनंद असणाराय’ असा भारावून टाकणारा विचार मनाला स्पर्श करुन जात असे. आज त्या कल्पनेनेसुध्दा मन भरून येते!

महाबळेश्वरनंतर माझ्या झालेल्या बदल्या आणि नंतरच्या प्रमोशन्सनंतर झालेली पोस्टिंग्ज् यावरून नजर फिरवली तरी माधवनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या ब्रॅंचेसमधला कार्यकाळ मला आपसूक आठवतो. प्रत्येकवेळी प्रमोशननंतरही मला एकाच रिजनमधे असा सलग बारा वर्षांचा काळ व्यतीत करायला मिळाला आणि तोही कुणाच्याही खास ओळखी आणि जवळीक न वाढवता हे आमच्या बँकेपुरता विचार केला तरी माझे एकमेव उदाहरण असावे.. !

पण या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी. महाबळेश्वपुरतं बोलायचं तर महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचा साधारण वर्षभराचा काळ हा अशा अनेकविध अनुभवांमुळे मला दिलासा देत आला होता. हा एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. इकडे माझ्या रुटीनमधे मला कराव्या लागणाऱ्या तडजोडींपेक्षाही काॅलेज, प्रॅक्टीकल्स, अभ्यास यांचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि जोडीला लहान मुलाची जबाबदारी यांचा विचार करता माझ्या बायकोने, आरतीने केलेल्या तडजोडी निश्चितच कणभर कां होईना अधिक कौतुकास्पद होत्या असंच मला वाटतं. कारण लग्नानंतर तिला सहज योगायोगाने मिळालेली राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने पूर्ण विचारांती सोडलेली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने काहीतरी करण्याचे तिने ठरवलेही होते. त्यानुसार योगायोगाने याच वर्षी तिला कोल्हापूरच्या सरकारी बी. एड् कॉलेजमधे ऍडमिशनही मिळालेली होती. माझी महाबळेश्वरला बदली झाली ती या पार्श्वभूमीवर! या सगळ्याचा लिहिण्याच्या ओघात आत्ता संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!) — इथून पुढे 

‘ए चेंगट बेण्या… माजा कप आक्का भर… बशीत च्या सांडला पायजे बग… ‘ 

तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात “वतला”.

समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.

यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली.

आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला.

हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.

म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो, ‘म्हातारे, मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता, तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास…. मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?’ 

यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली… ‘माज्या बाळा, आपून इतकं कमवायचं… इतकं कमवायचं… की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे… पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय… त्ये आस्तय प्राणी, पक्षी, गुरांचं… त्ये त्यांना वाहायचं… ‘ 

‘द्येव आपल्याला कप भरून देतो, पण म्हनुन आपुन अख्खा कप प्यायचा नसतो…. निम्मा कप समाजातल्या गोरगरिबांसाटी आसतो… निम्म्या कपाचं दान तिथं करायचं आस्तय बबड्या… ‘

… माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली.

“ कुठं गं शिकलीस ही जगण्या आणि जगवण्याची कला…. ??? “ माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले…

मला तिचे पाय धरायचे होते… पण मला हे नक्की माहीत होतं, की मी तीचे पाय धरताना; पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ‘ न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या, लय नाटकं नगों करुस… ‘ 

पाच लाख दरमहा कमावणारा मी….

तरीही आज “भजं खायाला” माझ्याकडे आठ आणे नाहीत… गरीब कोण… ? श्रीमंत कोण… ?

माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

एकदा ती मला म्हणाली होती, ‘मेल्यावर बिन बोलवता बी “खांदा” द्यायला समदं गाव जमतंय, पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि “कांदा” कुनी देत न्हाय… ‘ खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा… जित्या मानसाला “भाकर आनं कांदा” दीवून पुन्य मिळव 

आपल्याला दगडातला द्येव् व्हायचाच न्हायी… चालता बोलता मानुस व्हयाचं हाय… ! 

आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी… Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त पुरस्कार आहेत.

माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात…. आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात…. ! 

कसं कोण जाणे… पण तीचंच पारडं खाली जातं… ! तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं.

“ओझं” “भार” आणि “बोजा” हे; वरवर “वजन” या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत.

मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं…

नाईलाजाने वाहिला जातो तो भार…

इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा…

पण, मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन… ! 

माझी अशिक्षित म्हातारी, विचारांचं धन डोक्यावर घेऊन… खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते…

आणि, इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते…. आणि हातात काही नसून, माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते… !!! 

अशीच एकदा ती मला म्हणाली होती, ‘नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस… शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल, असं दोन फुटाचं बुटकं झाड हो… ‘ 

“दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या… ” 

….. तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते… ! 

डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत, उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत… मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो… पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो… आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा… !!! 

तिच्या फाटक्या पदराची हि पताका; हेच माझं भरजरी वस्त्र आहे… !!!

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती… ‘खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना… ?’ 

मी खाली मान घालून गप्प बसलो.

यावर तिने तिच्या भाषेत, फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा…

… प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं… एक पात्र असतं. हे पात्र कधी रिकामं असतं… तर कधी भरलेलं असतं. ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच… कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो… कधी आई होऊन… कधी बाप होऊन… आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं… ! आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो… तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं… पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं… आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं… घेण्यात आनंद आहे बाळा… पण देण्यात समाधान… ! आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा… ,… कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा “आनंद” आपण घ्यायचा… आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं “समाधान”, त्याच्या मुखात ठेवायचं…. ! 

‘हितं तुजं भांडं रिकामं दिसंल… पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या… !’ 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

खाटेवर पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले…

या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला… आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला…. “डॉक्टर फॉर बेगर्स… !!!”

माझी हि आजी… “लक्ष्मी” होऊन माझ्या पदरात आली… अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली… ! 

ती गेली तो दिवस होता “अक्षय तृतीया”…. हा योगायोग नक्कीच नव्हता… !!!

ती माझं पात्र… फुल्ल करून गेली… अक्षय्य करून गेली… ! 

आता चेंबलेलं का असेना… जुनं का असेना… फुटकळ का असेना… पण हेच “फुलपात्र”; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो…

परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता… परत परत Full करता…

आणि Full झालेलं हे “फुलपात्र”; मी जपून ठेवतो, दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी… !!! 

आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !

या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही… फक्त इतकंच सांगेन, या महिन्यात जे अंध, अपंग – विकलांग, भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी, वजन काटे, कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे… हाच मी वाहिलेला नैवेद्य… ! 

भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं, यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत. 15 जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर – रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला “विठ्ठल” शोधायला निघालेला वारकरी दिसला…

इथेच झाली माझी वारी,

आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही पंढरपुरी… !!

रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या, रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते… मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले… माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला… ! 

काय गंमत आहे पहा, “वि-ठ्ठ-ल” नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे… शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास “विठ्ठल क्रिया” असं म्हटलं जातं.

पंढरीच्या राजा, आम्ही इथेच बसून रोज “विठ्ठल क्रिया” केली… ! 

“हात हे उगारण्यासाठी नाही… उभारण्यासाठी असतात… ” हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं, मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो… ! 

त्यांच्या विचारांच्या उजेडात, माझी प्रत्येक अंधारी रात्र मग “पौर्णिमा” झाली… !

आज खूप वर्षांनी विचार करतो…. भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स… याचं बीज नेमकं आहे कशात… ? 

खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं… कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं… याला ना खत लागत ना मशागत… तरीही ते फोफावतं… सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही, पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं… !

*खडकाळ… भेगाळ का असेना…. पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली… आणि माझं बीज इथेच अंकुरलं…*

माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर; मला अफाट, पण खारट समुद्र व्हायचंच नाही… मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं… जिथं कोणाची तरी तहान भागेल… शेतकऱ्याचं बीज पिकेल… ! 

त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं…. बीज अंकुरे अंकुरे… !!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता. मराठी कादंबरीकार. १९७० ते १९९० हा त्याचा लेखनकाल. या काळात त्याने साधारण हजार कादंबऱ्या लिहिल्या. त्याचा खप अक्षरशः तडाखेबंद होता. ‘अश्लील कादंबरीकार ‘ म्हणुनच त्याची ओळख होती. पण त्याने कधी पर्वा केली नाही.

जन्म सांगलीचा. सुरुवातीच्या काळात त्याने काही मासिकं काढली. नट नट्यांची लफडी.. आणि त्याला साजेशी चित्रे असं त्यांचं स्वरुप असायचं. मासिकाची नावही तशीच.. राणी.. प्यारी.. मस्ती अशी.

ही माहिती तो कुठुन गोळा करायचा ते कधीच समजलं नाही. मासिकांवर त्याने टाकलेले पत्ते नेहमी खोटेच असायचे. तो नेमका कुठं रहातो.. अंक कुठून प्रकाशित करतो.. प्रिंट कुठून करतो हे कधीच समजायचं नाही.

पण त्यांची विक्री अफाट होती‌. महाराष्टातील सगळीच रेल्वे स्टेशन.. बस स्टॅण्ड.. आणि गावागावांत असलेले विक्रेते एजंट अंकाची आतुरतेने वाट पहात. आलेले अंक हातोहात खपत. कधी दुप्पट तिप्पट किमतीतही ती विकली जात.

काही काळ हा उद्योग चालला.. आणि मग बंदही पडला. मग त्यानं कादंबरी लेखन सुरू केलं. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे रहस्यकथा असत. त्या नावाखाली पानोपानी कामुक वर्णने.. जोडीला खुन. दरोडे.. बदले हा मसाला.

त्याच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. महीन्यात २०-२५ कादंबऱ्या सहजपणे तो लिहून काढायचा.

एक बाहेरगावचा प्रकाशक त्याच्याकडं आला होता…. कबुल करुनही अजुन का कादंबरी लिहीली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी.

त्याने मग स्वतःला खोलीत कोंडुन घेतलं. दुपारपासुन तर रात्रीपर्यंत अखंड लेखन करुन कादंबरी त्या प्रकाशकांच्या हातात ठेवली.

याच काळात आशु रावजी.. दिनु कानडे या नावांनी लिहिलेल्या अश्लील कादंबऱ्या पण वाचकांमध्ये गाजत होत्या. हे दोन लेखक कोण हे कधीच समजलं नाही. पण बऱ्याच जणांच्या मते ह्या कादंबऱ्या तोच टोपण नावाने लिहीत होता.

त्यानं लेखन सहायक म्हणुन सुंदर मुलींचा तांडाच ठेवला होता. पुण्यात आल्यावर त्याला भेटायला गर्दी लोटे.

सुहास शिरवळकर एकदा त्याला भेटायला गेले होते. तो पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याला भेटायला आलेल्या प्रकाशकांची गर्दी.. त्याच्या सेवेत असलेल्या सुंदर ललना.. आणि मद्याचा महापूर हे सगळं बघुन ते चकीतच झाले. ‘सु. शि. ‘सांगतात… या माणसाकडे पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. या माणसानं आयुष्य खुप ‘उपभोगुन’ घेतलं आहे.

या अश्या लिखाणामुळे त्याच्या मागे कोर्ट कचेरी खटले मागे लागले. एक वेळ तर अशी होती की ऐंशी खटले त्यांच्यावर दाखल झाले होते.. मग त्यानं एक कायमस्वरूपी वकील पगारावर ठेवला.

जितका पैसा त्यानं मिळवला.. तो सगळा दारु.. स्त्रिया.. कोर्ट.. आणि पोलिसांची सरबराई यात घालवला. ऐषोरामी जीवन. ‌विलासी जगणं यात आलेली कमाई उधळली.

सुभाष शहा हे या लेखकांचं नाव. त्यांची पुस्तक वाचणं.. अगदी उघडपणे बाळगणं हेही अप्रतिष्ठतेचं.. अभिरुचीहिनतेचं लक्षण मानलं जातं होतं. तरीदेखील लपुन छपुन सगळेचं जण सुभाष शहांच्या पुस्तकांकडे आकर्षित होत असत.

पण या सगळ्याला उतरती कळा लागणं नैसर्गिक होतं. काळ बदलला.. लोकांच्या आवडी बदलल्या.. करमणुकीची साधनं बदलली.. त्यांच्या पुस्तकांचा खप खाली आला. दारु.. व्यसनं करता करता पैसा संपत गेला. शरीर पोखरत गेलं. देवानं सुभाष शहांना अपार प्रतिभा बहाल केली होती. लेखन शैली असुनही त्यांनी ती चुकीच्या कामांसाठी वापरली. त्यांना कधी मानसन्मान मिळालेच नाही. स्वत:च्याच अश्या सवयींमुळे एक उमदा लेखक संपून गेला.

या पार्श्वभूमीवर आठवतात लेखक रवींद्र पिंगे.. आणि त्यांचे विचार. ते म्हणतात..

“पन्नास वर्षे मी जीव लावून गोमटं आणि घाटबध्द लेखन केलं. दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही. माझं मन नेहमीच वखवखशुन्य असतं. जे सुखदुःख मिळालं ते भोगलं.. तक्रार नाही. माझी ठाम श्रद्धा आहे की..

… माणसानं दिलेलं पुरत नाही..

आणि..

देवानं दिलेलं सरत नाही.

पोएट बोरकरांच्या भाषेतच सांगायचं तर..

.. वळुन पाहता मागे..

.. घडले तेच पसंत

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “निर्भयाचे नाव काय ?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ निर्भयाचे नाव काय ? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

उत्सुकता सर्वच जीवांचे वैशिष्ट्य आहे. नाक नावाचा अवयव हा श्वास घेण्यास दिला गेला असला तरी खुपसण्यास जास्त वापरला जातो. आपले झाकून ठेवताना दुसऱ्याचे वाकून पाहण्यासाठी डोळे आहेतच. तोंड तर free to air वृत्तवाहिनी! बघ्यांचे डोळे म्हणजे सीसीटिव्ही… खरं तर शी!शी! टीव्ही!

जंगलात झाडांच्या फांद्या उभ्या कापण्याचे काम करीत असलेल्या कारागिरांचे काम एक माकड पहात होते… आणि ते लोक नेमकं काय करत आहेत? याची त्याला उत्सुकता होतीच. पण एवढ्यावरच त्याने थांबले पाहिजे होते. करवतीने फांदीच्या मध्ये काप घेत असताना जर कापणे मध्येच थांबवले तर करवत लाकडाच्या दाबाखाली येऊन अडकून बसते आणि मग ती निरुपयोगी ठरते. म्हणून ती काढून घेण्याआधी कापलेल्या भागाच्या आत लाकडाचा एक उभट तुकडा ठेवला जातो.. त्याला पाचर म्हणतात! कारागीर जेवण करण्यास निघून जाताना त्यांनी ही पाचर नीट मारली होती… पण ती काढली तर काय होईल? हा प्रश्न माकडाला सतावत होता. त्याने ती पाचर काढण्याचा प्रयत्न केला.. ती निघालीही… पण त्याची शेपटी कापलेल्या झाडाच्या मध्ये अडकली… आणि मग कारागिरांनी माकडास बेदम झोडपून काढले! ही गोष्ट तशी लोकांच्या माहितीची आहे!

गोष्ट राहू द्या… कारण ते तर माकड होते! पण माणसांना कायदा ठावूक नसावा हे फार झाले! 

एकतर हल्ली फेसबुक हे बातमीपत्र बनले आहे. स्वयंघोषित बातमीदार बऱ्याच लोकांना आधीच माहीत झालेल्या सबसे तेज बातम्या सांगण्या, दाखवण्यात धन्यता मानतात!

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आलेला प्रसंग शत्रूवर ही येऊ नये. मुळात बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. यात पीडित व्यक्ती सर्वाधिक त्रास सहन करते. त्यामागे आपली सामाजिक मानसिकता मोठी भूमिका बजावते. गुन्हेगार उजळ तोंडाने आणि पीडित तोंड झाकून फिरतात.. असे दृश्य आहे. उपचार म्हणून पोलिस गुन्हेगारांची थोबाडं पिशव्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतात हे ही खरे. पण ते चेहरे लोकांनी आधीच पाहून ठेवलेले आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले असतात. पण हे चेहरे झाकण्यामागे न्यायालयीन प्रक्रियेतला एक महत्वाचा उद्देश दडलेला असतो.

बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या खटल्यातील सुनावण्या in camera अर्थात अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत घेतल्या जातात. पण हल्ली लोकांना सर्वच on camera पाहिजे असते! अपघात, हल्ले, आत्महत्या यांत dead झालेल्या लोकांची live चलतचित्रे जास्त पसंत केली जातात. यात खूप पैसे मिळत असल्याने हे प्रदर्शन विशेष लक्ष देऊन केले जाते!

एका तथाकथित शैक्षणिक चित्रपटात बलात्कार शब्दाच्या मदतीने विनोद निर्मितीचा चमत्कार खूप गाजला. पण तो चित्रपट गाजत असताना आणि आजवरही त्यातील बलात्कार – चमत्कार शब्दाच्या वापराबाबत, त्याच्या दुष्परिणामांबाबत कसे कुणाला काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते! लहान मुले या दृश्याचा आनंद घेत असताना पाहणं ही खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल!

खूप काम पडल्यावर एका सुमार अभिनेत्याने मला माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यासारखे वाटते! अशी प्रतिक्रिया देणे सुद्धा अनेकांच्या कानांतून सुटून गेले! अनेक चित्रपटात बलात्काराच्या प्रसंगात उत्तम अभिनय करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुद्धा ” मी आताच दोन बलात्कार करून आलो.. असे वाक्य फेकून मित्रमंडळींना हसवले होते, असे ऐकिवात आहे. यातून बलात्कार शब्दास एक सहजपणा प्राप्त होत जातो, हे समाजाच्या मानसास कधी समजेल? …. हाच समाज The Rape of the lock नावाच्या इंग्रजी नाटकाच्या मुखपृष्ठावरील rape हा शब्द वाचून तुमच्याकडे तुम्ही अश्लील वाचता आहात, अशा नजरेने पाहू शकतो! असो.

बलात्कार पीडितेचे नाव, छायाचित्र इत्यादी माहिती प्रसिद्ध करू नये, असा न्यायालयाचा आदेश असताना काही अज्ञानी लोक नेमके असेच का करत सुटलेत? हा कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, याचे अज्ञान हा बचाव ठरणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही सदर पीडित आपलीच कुणी सख्खी असती तर आपण अशी प्रसिद्धी दिली असती का? हाही विचार व्हावा! उलट कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून गुन्हेगारांच्या कृत्यांना, अर्थात त्यांची भलावण होणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं जमते का ते पाहावे! यात मग.. त्याचा गुन्हा कुठे सिद्ध झालाय अजून? असे cross जाण्याची गरज नाही!

जिचा काहीच गुन्हा नाही तिला जिवंतपणी आणि मरणानंतर शिक्षा का देता?

आणि माननीय न्यायालयाने याबाबतीत वेळोवेळी तसा आदेश दिलेला असतानाही लोकांनी असेच वागावे, याला काही अर्थ?

काही वर्षांपूर्वी एक मोठी अभिनेत्री इमारतीवरून पडून गतप्राण झाली होती.. त्यात तिचे शरीर अनावृत होते… ते ‘ पाहण्या ‘ साठी मुंबईमध्ये हजारो लोक जमले होते! 

काय झाकून ठेवायचे आणि काय वाकून बघायचे यातील विवेक कुणी कुणाला शिकवावा? हाच प्रश्न आहे!

बाकी एक महिला जिवानिशी गेली… तिच्या प्रकरणात कोलकात्यात जो हैदोस सुरू आहे.. ते पाहून डोळे, कान आणि मनाचे दरवाजे बंद करून बसावे, असे वाटते!

… ती मेली आणि तिला मारणारे अजून काही वर्षे जगणार आहेत, व्यवस्था त्यांना जगवणार आहे हे चित्र भयावह आहे.. की हेच आपले प्राक्तन आहे, न कळे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares