मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

डॉ. इरावती कर्वे

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी – – 

थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका डाॕ. इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डाॕ. इरावतीबाई कर्वे याही एक आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य डाॕ. दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.

बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते. वडील म्यानमारमधील एका कंपनीत नोकरी करीत होते. मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे. त्यांना पाच भाऊ होते. म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले. कुटुंबात त्यांना माई म्हणत. विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती. ठसठशीत कुंकू. घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते. पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन काॕलेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कुतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले. आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या. १९२२ साली त्या मॕट्रिक झाल्या. १९२६ साली फर्ग्युसन काॕलेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी. ए. झाल्या. आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन काॕलजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९२८ साली त्या एम. ए. झाल्या. त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी. एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या. १९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी. एचडी मिळाली. तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते. बाई तर परदेशात जाऊन पी. एचडी. होऊन आल्या होत्या. पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती. काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले. व नंतर त्यांनी डेक्कन काॕलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. त्यामध्ये त्या रमून गेल्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य रँग्लर र. पु. परांजपे यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या घरीच त्या राहत होत्या. या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले. संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.

संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता. संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या. जगभर प्रवास केला. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. अखंड वाचन केले. शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. जगभर व्याख्याने दिली. त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे. चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे. हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आॕरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द कीर्ती मिळवून दिली. नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रुढअर्थाने त्या स्त्रीवादी नाहीत. परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रीवादी विचार प्रसवले आहेत. हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल. स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात. इरावतीबाईंनी स्त्रियांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले. त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले. परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे. महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे. त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे. “युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे. महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो. भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे. परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.

एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली. समारंभ संपला. बाई घरी चालल्या. परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते. त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. याच विचारात त्या घरी चालल्या होत्या. वाटेत मुलांचा खेळ चालला होता. बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे!शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? त्या बाई जात आहेत ना, त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”. एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या. त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले. आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते. मनाची परिपूर्ती झाली होती. समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती. ” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच. “कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती. स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते. हे त्यांना सांगायचे होते. परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे. मनाचा तळ ढवळून काढणारे आहे. वैचारिक घुसळण करणारे आहे. एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे. अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुद्धीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाई वारीत सामील व्हायच्या. भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम ! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.

बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले. ११ आॕगस्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली. खूप व्याख्याने दिली. परदेशात लौकीक मिळविला. शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या. सनातनी पुण्यातल्या भर रस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन काॕलेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी … या महाराष्ट्राच्या विद्वान सुपुत्रीला त्यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्य साष्टांग दंडवत.

लेखक : श्री. बी. एस. जाधव

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ’हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु. पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वरमहाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल.

 पण या शंकेचे निरसन झाले, ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यांनी या शब्दांचा अर्थ असा सांगितला … कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा. हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल.

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळा फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा ॥१॥

 … ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

 कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेवूनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥

… प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु) आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी, माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भूमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंथी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे.

 शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥

 … प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

 पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

 …. या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे. पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

 क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनी स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव राहो॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल.. त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये। तव भीतरी पालटु झाली॥६॥ 

… हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असे कळले म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारख्याला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आले तर पाउले लपवतोस, समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. … कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि अनाकलनीय (कानडा) आहेस.

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

लेखक : सचिन कुलकर्णी 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ श्री सुलभा तेरणीकर

शाळा सुटली तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा निरोप घेताना कविताशाखेची एक मुळी बरोबर घेतली होती. पुढे महाविद्यालयाच्या प्रांगणात ती चांगलीच बहरली. साहित्याची विद्यार्थिनी नसूनदेखील कवितेचे प्रेम अखंड राहिले. इंदिरा संत, महानोर, ग्रेस, आरती प्रभू, पाडगावकर यांच्या कवितांनी दिवस नुसते घमघमत होते. 

ग्रंथालयाच्या प्रतीक्षायादीसाठी किती अधीर असायचे मन ! संग्रह पटकन हाती पडायचे नाहीत. मग उधार-उसनवारी, मिनतवारी करावी लागे. कविता क्वचित कानी पडत आणि पुन्हा वाट पाहणे संपत नसे. 

‘गडद नीलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी’… इंदिरा संतांच्या कवितेतल्या इंद्रधनूवर रेलणारी सुरंगा आपणच आहोत, असा भास होई, ‘तो चहा गुलाबी, ती चर्या खळाळणारी…’ असे काही वाचताना धूसर स्वप्नांची वाट आता दूर नाही, असे वाटे. आरती प्रभूंच्या ‘माझी वस्त्रं तुझी झाली’ या ओळींवर पतंग होऊन मन झेपावत असे. पाडगावकरांची ‘जांभळी नीज ये’ रेंगाळत राही. बोरकरांची ‘पाठमोरी पौर्णिमा’ शोधून वाचली जाई. 

‘पाठमोरी तू बीजेची रात्र, लावण्ये रमा हासुनी पाही वळोनी,

होऊ दे ना पौर्णिमा…’

दुर्बोधतेच्या घनवनाची तमा न बाळगता ग्रेसच्या कविता शोधायची अनिवार हौस फिटतच नसे. 

‘शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ  दिव्यांची नगरी 

वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी … ‘

…. या ओळींवर फिरफिरून नजर जात असे. महानोरांच्या रानाने तर साद घातलेली होती. राजबन्सी पाखराने खुणावले होते. हिंदी-मराठी चित्रपटगीतांतून, भावगीतांतून कविता भोवती रोषणाई करीत असे. गदिमांच्या गाण्यातले कडवे मनात अधोरेखित करीत असे. 

‘प्रिय नयनातील भाव वाचता 

चुकून दिसावा मोर नाचता 

दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे… ‘

… त्यातले छंद-प्रास आवडत, की शब्दांतून साकारणाऱ्या दृश्यांचा मोह अनावर होई, की नाद ओढ लावीत;ते कळायचे नाही. आपल्या कोवळ्या तारुण्याची जादू असावी, की काय, असेही वाटे. मग आपणही कविता कराव्यात, असे वाटे. जमिनीवर पाय काही ठरायचे नाहीत. 

त्यातच पुढे साहिरचे ‘तल्खियॉं’ हाती आले. त्यातल्या दाहकतेने चटका लावला. 

‘तेरे पैराहने रंगोंकी जुनूखेज़ महक 

ख्वाब बन बनके मेरे ज़हन में लहराती है ,

रात की सर्द  खामोशी में हर इक झोंके से 

तेरे अनफ़ास, तेरे जिस्म की ऑंच आती है

‘तुझ्या रंगीत वसनांचा उन्मादक गंध एखाद्या स्वप्नासारखा तरळतो. रात्रीच्या नि:शब्दतेत थंड झुळकीबरोबर तुझ्या श्वासांची, शरीराची दाहकता जाणवतीय.’ 

असे काही वाचल्यावर माझ्या सुसंस्कृत मनाच्या भिंती थरथरल्या. इंदिरा संतांच्या कवितेतल्या मणिबंधावर उतरणाऱ्या खुळ्या  पाखरासारखी मी धडधडत राहिले. 

आता पुढची कथा सांगायला हवी. मोठ्या वादळात कवितांची घरटी पार उध्वस्त झाली. छंद हरवले. शब्द निमाले. आवडीच्या कवितांचा संग्रह जवळ असावा, हे विलासी स्वप्न दूर-दूर जात राहिले. आकडेमोड, खर्चाची तोंडमिळवणी, देणी-घेणी, दुखणीबाणी यात किती चंद्र-सूर्याचे उदयास्त होऊन गेले, ते कळले नाही. बधिरपणातून सावरेपर्यंत बरीच चढण चढले. एखाद्या शांत पांथस्थाने झाडाखाली क्षणभर बसावे, तशी थोडी थांबले आणि कवितेची सृष्टी पुन्हा एकदा जवळ केली. जमेल तसे एकेक कवितासंग्रह घरी आणत गेले. रात्री उशागती दिव्याच्या सोबतीने कवितांची उजळणी करू लागले. सरत्या चैत्राच्या उत्तररात्री असते, तशी नक्षत्रांची आरास कुठली असायला? मंद दिव्याची सोबत पुरत असे. कळ्या-फुलांचे बहर नव्हते. वाळलेल्या काटक्यांच्या समिधा मात्र होत्या. 

स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीतली असल्याने कुसुमाग्रजांच्या क्रांतिघोषाच्या जयजयकारापासून, धगधगत्या यज्ञज्वाळेपासून दूर चालत आले होते खरी; पण आता त्यांची कविता माझ्यापाशी होती. 

‘नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली… आणि अखेर देहाला बिलगलेलं झिरमिर आवरणही तिनं दूर फेकून दिलं…

निरभ्र सोलीव रूपाकडे पहात कवीनं विचारलं-

‘तू कोण?’

ती हसून उद्गारली – ‘मीच ती तुझी कविता !’

अखंड पाषाणातल्या सावळ्या मूर्तीसारखी कवीची कविता माझी झाली. वृत्तछंदाचे अलंकरण आता उरले नव्हते. प्रासाची पैंजणे नव्हती … ‘निशिगंध’ वाचत गेले. 

‘आणि अंतराळातील कृष्णविवरासारख्या असीम शून्यावस्थेत 

माझ्या असलेपणाची आरास..’

 …. असलेपणाची आरास? अवघ्या विश्वातले आपले चिमुकले अस्तित्व हाच उत्सव, तर मग जीवन हा तर नित्य आनंद सोहळा… माझ्या प्रौढपणीच्या पाठयपुस्तकातले पान  मोहरून उठले. व्यक्तिगत सुखदु:खाच्या संदर्भातले कवितेचे भान वैश्विक स्तरावर उंचावले गेले. त्याच्या पाऊलखुणा शोधत राहिले… 

‘विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातील काटे 

ही गुहा भयावह आता स्वप्नांसम  सुंदर वाटे

रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे’

…. गदिमांच्या सहज सुचलेल्या मंजुळ गाण्याने काहीतरी सांगितले. बोरकरांची ही कवितादेखील काही कुजबुजून गेली….  

‘येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी,

मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालवी…’

… दिवा मंद तेवताना ही रोषणाई कसली अन भोवती हा कोलाहल कसला? तो तुमच्या-आमच्या ‘असण्याचा’ सोहळा आहे. कवितेच्या अलौकिकतेच्या पालखीबरोबर दोन पावले चालायचे आहे ना… सर्वांच्यासह…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ कृष्णा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(दहीकाल्याच्या निमित्ताने…)

कृष्णा, बंदी वासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदीवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्याबरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले, आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास! इतर गोकुळ वासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करता तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दृष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध, दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडलीस, सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं! थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुरेचे राज्य मिळवलेस!

तारुण्य सुलभ भावने ने स्वयंवरासाठी गेलास, तुला द्रौपदीची आस होती का ?की पुढे काय घडणार याचे दृश्य रूप  तुला दिसले होते ?त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा “सखा” बनलास! दुर्गा भागवत म्हणतात की, मित्र या नात्याला “सखा” हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव- पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास, योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून!एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून नाकारले,! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले, पण शेवटी युद्धात तू सारथी  बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगात रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ, मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून तुला ‘रणछोडदास’ नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्यांशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्ला च्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा,

तुझे नाव घेतले की आपोआपच गुणदोषातून मुक्ती मिळते असं वाटतं! कारण आपण काहीही घडलं तरी “कृष्णार्पण” असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात!

तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो. कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळकाला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात! पावसाच्या सरींबरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊ दे हीच इच्छा आपण प्रकट करतो . चार वर्षांपूर्वी आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण किंवा परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे “कोरोना” पुढे शरणागत झाले होते .तेव्हा माणसाच्या लक्षात आले की विज्ञानाने  कितीही मात केली तरी एक “हातचा “तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र आपण मान्य केले पाहिजे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

“कर्मा रिटर्न्स” हे विसरू नका !

एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 

अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला “आधी आत तर जाऊया” असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, “गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर” असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 

नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 

*

हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, “मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे”

तो म्हणतो, “हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ”

त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 

त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 

हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. “मी बघतेच त्यांच्याकडे” असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, “तू आत जा. बाकी सोड माझ्यावर”

असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 

*

असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 

अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 

नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 

शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, “आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?”

तर तो तरुण म्हणाला, 

ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.

तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 

उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स”

असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 

*

डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 

“अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले”

असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 

कर्म हे असे एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.

तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते.

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो. 

“दाग तेरे दामन के धुले न धुले 

नेकी तेरी कही तुले न तुले 

मांग ले गलतियो की माफी 

कभी तो खुद से ही  

क्या पता ये आँखे 

कल खुले न खुले !

 

लेखक : श्री धनंजय देशपांडे

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा ऐकतच आम्ही लहानपणी रमलो. रामायणातला राम आणि महाभारतातला कृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा तेव्हापासूनच मनावर ठसलेल्या पण या दोन्ही व्यक्तींचा प्रभाव मात्र भिन्न होता— भिन्न आहे. राम म्हणजे एकनिष्ठ, एकपत्नीव्रती, प्रजाहितदक्ष, एकवचनी, पितृवचनी, माता बंधुप्रेमी असा आदर्शवादी म्हणून मनात रुजला. कृष्णामध्ये मात्र निराळीच भावनिक गुंतवणूक झाली. रामात आणि आपल्यात एक पारलौकिक अंतर जाणवलं. कृष्ण मात्र अगदी जवळचा सवंगडी, सखा, जिवलग झाला म्हणूनच बालपणीचा कृष्ण आणि त्याच्या खोड्या, मिस्कीलपणा सांगणाऱ्या कथेत मनापासून रमलो. आजही मनाला भावतो तो नटखट कन्हैया. यशोदेचा कान्हा. यमुनेच्या प्रवाहात कालियाच्या मस्तकावर नाचणारा कृष्ण, गवळणींची मटकी फोडणारा मिस्कील नंदलाल, टांगलेल्या हंडीतलं लोणी मित्रांसोबत चोरून खाणारा तो लबाड माखनचोर, रंग उडवणारा, रास खेळणारा, गोपींची वस्त्रे लपवणारा खोडकर पण तरीही प्रिय असा हा गोकुळवासी गोपीनंदन. कुंजवनात कदंब वृक्षातली, पाय दुमडून मंजुळ बासरी वाजवणारा, शामल वर्णी, शिरी मोरपीसधारी, राधेच्या सहवासातला दंग मुरारी. गाई राखणारा, आणि गोरक्षणार्थ पर्वत उचलणारा गोवर्धनधारी, वसुदेवसुत, देवकीनंदन, यशोदेचा कान्हा मनात कायमचं वास्तव्य करून राहिला.

बोबडा पेंद्या आणि कृष्णाची मैत्री तर फारच रंजक. अविस्मरणीय.

पेंद्या रुसलाय. दुखावलाय. म्हणतो कसा,

“कुत्ना थमाल ले थमाल आपल्या गाई आम्ही आपल्या घलाशी जातो भाई ।

कृष्ण मित्र म्हणून भोळा पेंद्या त्याच्याजवळ तक्रार करतो,

काल बलाचि ले बलाचि खलवस केला 

तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला

मी गलीब म्हणुनी थोलका दिला

तू म्हणशील ले याला कलतीच नाही ।

कृष्ण हा आपला सखा आहे आणि तो आपलं गार्‍हाणं, आपलं रागावणं, आपलं दुःख जाणून घेईलच याची पेंद्याला किती खात्री! म्हणूनच खऱ्या मित्राची खरी प्रतिमा कृष्णाच्या रूपातच मनावर ठसते.

जसा पेंद्या तसाच सुदामा. राजमहालातल्या पंचपक्वांनाना डावलून, फडक्यात बांधून आणलेल्या सुदामाच्या मूठभर पोह्यांचा तो मनापासून चट्टामट्टा करतो. या साऱ्याच कथांमधला कृष्णस्पर्श मनात अमरत्वाच्या भावनेनं बिलगलेला आहे…

देवाचा देव बाई ठकडा

एका पायाने लंगडा 

करी दही दुधाचा रबडा… असा हा मनात बसलेला लडीवाळ कान्हा, अचल असला तरी जसं वय वाढत गेलं, तसं महाभारतातला, अर्जुनाला गीतामृत पाजणारा, पार्थसारर्थी, हाती शस्त्र न धरता चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा राजनीतीज्ञ, धर्मपरायण, धूर्त, धोरणी, युगंधर हळूहळू उलगडायला लागला. गोकुळातून, मथुरा, द्वारका आणि हस्तीनापुरातला कौरव पांडव यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी प्रयत्नशील पण त्यानंतर केवळ सत्य धर्माची बाजू सांभाळणारा, रथारुढ भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मप्रतिज्ञेला आव्हान देत पितामह भीष्मांशी संवाद साधणाऱ्या कृष्णाची अध्यात्मिक प्रतिमा मनात साकारू लागली. त्या प्रतिमेपर्यंत पोहचणं ही एक तपस्या आहे हेही जाणवू लागलं.

बालपणीचा राधेत रमणारा, गोपींची वस्त्र पळवणारा कृष्ण एका निराळ्याच तत्त्वात दिसू लागला. रूपकात्मक भासू लागला. अंगावरची वस्त्रे ऐहिकतेच्या रूपकात पाहता आली. ती कृष्णभक्तीने पळवली गेली म्हणजेच देह परमात्मा स्वरूप झाला. हा भक्तीयोग असा कळू लागला. राधाकृष्ण प्रेमाचं स्वरूप भक्ती आणि प्रीतीच्या उदात्त अद्वैतात जाणवलं. ते अशरीरी, अंत:प्रवाहातलं प्रीतीचं अमर स्वरूप होतं. हा कृष्ण खूप वेगळा होता. तो सगुण होता, आकृतीबंधातला होता पण तरीही आकलनाच्या पलीकडला होता.

कुब्जेच्या कुबडाला त्याचा दिव्य स्पर्श होतो, एका चिंधीच्या बदल्यात बंधू, सख्याच्या नात्याने भर दरबारात लज्जित झालेल्या द्रौपदीला सहस्त्र वस्त्रे पुरवून तिची लाज राखतो, सत्यभामेच्या हट्टासाठी इंद्रदेवाशी युद्ध करून स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणतो पण त्याचवेळी रुक्मिणीच्या “मला ती सुगंधी प्राजक्त फुले आणून द्या” या लडिवाळ हट्टाचाही मान राखून “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” अशी कमाल त्या दोघींच्या जीवनात घडवून आणतो, सोळा सहस्त्र स्त्रियांचा पती म्हणून मिरवतो असा हा स्त्रियांचा कैवारी माझ्या स्त्री मनावर एक रक्षक म्हणून भक्तिभावाने राज्य करतो.

रणभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. कर्ण चाक काढण्यासाठी रथाखाली उतरला. धनुष्यबाण ठेवल्यामुळे तो नि:शस्त्र होता. कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला असताना कर्ण म्हणतो अर्जुनाला, ” हे धर्मयुद्ध आहे. हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालणे हा अधर्म आहे. ”

तेव्हा कृष्ण उत्तरतो,

“हे राधासुता! तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म ज्यावेळी द्रौपदीच्या पदराला भर सभेत हात घातला जात होता, एकट्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कौरवांनी घेरले?”

एकाच वेळी धर्मपरायण आणि जशास तसे कृतीतून उत्तर देणारा कृष्ण, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक पापभीरू मानवासाठी आधारभूत ठरतो. कणखरपणे प्रत्युत्तर देणारा हा महाभारतातला कृष्ण, मनातल्या देव्हाऱ्यात भगवंत म्हणून स्थित होतो आणि नकळत बालपणीचा खोडकर कन्हैया याच तत्वाशी अलगद जोडला जातो.

अशा या मनातल्या गाभार्‍यात जपलेल्या कृष्णाला मात्र सभोवतालच्या नकारात्मक आणि अनीतीत बुडालेल्या, धर्मसंज्ञेचा धिक्कार झालेल्या, विकृत समाजात भयग्रस्त होऊन जगताना एक प्रश्न विचारावासा वाटतो,

“संभवामी युगे युगे” म्हणून आश्वासन देणारा तू कुठे आहेस? तू कसा लोपलास? का दिसत नाहीस? का जाणवत नाहीस? जर तू विश्वाच्या अंशा अंशात सामावलेला आहेस मग तू प्रकट का होत नाहीस? विठ्ठलाच्या रूपात तू जनीची लुगडी धुतलीस, दळण दळलेस, गोऱ्या कुंभाराची मडकी भाजलीस मग आत्ताच कुठे दडी मारून बसला आहेस? असं तर नाही ना की आम्हीच करंटे तुला पाहू शकत नाही. कृष्णस्वरूपांशी आमचीच समर्पण भावना कमी पडत आहे का?माझ्यात मीरा नाही. माझ्यात राधा नाही. मग हे मीराके प्रभु! सांग मला माझे भरकटलेले तारू तुझ्याविना किनारी कसं लागेल?”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

“ प्रिय कृष्णा, आज जन्मदिन ना तुझा? खूप आनंदी असशील ना मग? “

“ नाही…. “

“.. का रे? तुझ्या सगळ्या भक्तांनी status ला फोटो टाकला नाही का तुझा? “

“ हो ठेवलं होत ना status त्यांनी. ”

“ मग? दहीहंडी फोडली नाही का त्यांनी? “

“ हो, ते ही केलं… “

“ अरे मग? अच्छा, लवकर आटपला का त्यांनी कार्यक्रम? खूप वेळ नाचले नाही का ते तुझ्यासाठी trending गाण्यांवर? “

“ हो. झालं ते ही करून झालं की …”

“मग? तरी तू का खूष नाहीस? नैवेद्य ( भोग ) आवडला नाही का? तरीही मी आईला सांगत होते की जरा बाहेरून मागव काहीतरी स्पेशल. कृष्ण पण तेच तेच खाऊन कंटाळत असेलच की, पण नाही. ऐकेल ती आई कुठली ? एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल ऑर्डर करते. ” 

“अगं कशाला ? नको ग.. एवढं सगळं तरी कशाला करायचं आता तुम्ही माझ्यासाठी…. जो काही माझ्या जन्मदिनाचा इव्हेंट करून ठेवला आहात ना तुम्ही, त्यानेच पोट भरलं माझं….. दमला असाल ना तुम्ही माझ्या नावाचं निमित्त करून हा “ इव्हेंट “ एंजॉय करता करता…. मग आता तुमच्यासाठीच ऑर्डर करा…. स्पेशल काहीतरी… खरंतर तेही एव्हाना झालंच असेल म्हणा… असो.. सुखी रहा.. “ 

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळ्यासंबंधी बरंच काही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ डोळ्यासंबंधी बरंच काही ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

(25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान आपल्या देशामध्ये नेत्रदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्ताने नेत्रदान व डोळ्याचे आरोग्य याविषयी हा लेख अवश्य वाचा)

नेत्र, ज्याला आपण मराठीमध्ये डोळे म्हणतो हिंदीमध्ये आँख म्हणतो इंग्लिश मध्ये EYE म्हणतो संस्कृतमध्ये नेत्र किंवा चक्षू म्हणतो तेच ते डोळे.

शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण डोळ्यांशिवाय माणूस नुसता अपूर्णच नाही तर शून्यवत होऊन जातो. डोळ्यां विना अस्तित्व या गोष्टीची कल्पना सुद्धा ज्यांना डोळे आहेत त्यांना करता येत नाही.

 

डोळ्याच्या बाहेरील भागात एक पारदर्शक पडदा असतो. त्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात. या पडद्याला नेत्रपटल किंवा पारपटल तर इंग्लिश मध्ये व तांत्रिक भाषेत ‘कॉर्निया’ ( CORNEA ) असं म्हणतात. आपण सोयीसाठी कॉर्निया हाच शब्द वापरू. काही कारणामुळे जेव्हा कॉर्नियाचा पारदर्शकपणा नाहीसा होऊन तो पांढरट होतो, धुरकट होतो त्यावेळी डोळ्यातून प्रकाश किरण आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माणूस दृष्टिहीन बनतो. आंधळा म्हणण्यापेक्षा दृष्टिहीन म्हणणं हे जास्त योग्य. कारण कॉर्निया बदलल्या नंतर तो परत डोळस होऊ शकतो. पण हा कॉर्निया बदलायचा कसा ?

इसवी सन १९०५ पर्यंत याबाबतीत कुणी कल्पनाही करू शकलं नव्हतं.

सन १९०५ मध्ये झेक रिपब्लिक या देशात एडवर्ड जर्म व रॅमन कॅस्ट्रोविजो या दोघांनी जगातली पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने पार पाडली. त्यानंतर अंधांना दृष्टी देण्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. परंतु दुर्दैवाने याबाबतची जनजागृती आज शंभर पेक्षाही जास्त वर्षे झाली तरी अपेक्षित प्रकारे झाली नाही. जनप्रबोधन ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने जाणारी आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये याला चांगली गती प्राप्त झाली आहे. सध्या अनेक मध्यम शहरांमध्ये सुद्धा नेत्रपेढ्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचे नेत्रदान करणे सध्या सहज शक्य आहे. बहुतेक कोणत्याही गावापासून काही तासांच्या अंतरावर नेत्रपेढीची उपलब्धता असल्यामुळे तीन चार तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात नेत्रपेढी ची टीम मृतदेहापर्यंत पोहोचू शकते आणि यशस्वीपणे कॉर्निया काढून घेता येतात. मृत्यूनंतर साधारणपणे सहा तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात व त्याचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे शक्य होते.

ज्यांना आपल्या घरी मृत झालेल्या नातेवाईकाच्या नेत्रांचे दान करायचे असेल त्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ज्याचा मृत्यू झाला आहे आणि नेत्र काढून घ्यायचे आहेत अशा व्यक्तीचे स्थानिक डॉक्टर ने दिलेले मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्वरित मिळवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण व वेळ नमूद केलेली असली पाहिजे. त्यानंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढी ला फोन करावा, म्हणजे नेत्रपेढी ची टीम योग्य त्या वेळेत मृतदेहा पर्यंत पोहोचू शकेल. देह जमिनीवर झोपलेल्या स्थितीत असावा, पापण्या उघड्या असतील तर त्या बंद कराव्यात. डोक्याखाली उशी द्यावी ज्यायोगे डोके शरीरापासून साधारण सहा इंच वरच्या स्तरावर राहील. त्यानंतर डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल तर तो बंद करावा. वातानुकूलन (A. C. ) चालू असेल तर मात्र ते चालूच ठेवावे. नेत्रपेढी ची टीम येईपर्यंत वरचेवर पाण्याच्या पट्ट्या बदलाव्यात. कॉर्निया सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नेत्र प्रत्यारोपण करीत असताना जमलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगावे. ज्यांना ते पाहता येणे असह्य होणार नाही अशा एखाद दुसऱ्या व्यक्तीला तेथे राहण्यास हरकत नाही. ही प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासात पार पडते. ही टीम आल्यानंतर त्यांच्यासाठी कोमट पाणी आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एकदे डस्टबिन जवळ असू द्यावे.

फक्त बुडून मृत्यू झाला असेल तर त्या मृतदेहाचे डोळे उपयोगी पडत नाहीत.

कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे रक्तगट जुळण्याचा प्रश्न नसतो.. कोणाचाही कॉर्निया कोणालाही बसवता येतो. परंतु काही विशिष्ट संसर्गजन्य रोगग्रस्तांचे कॉर्निया बसवता येत नाही. उदाहरणार्थ कावीळ, एड्स, कॅन्सर आणि शरीरभर पसरलेले सेप्टिक अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती बाधित असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून ज्याला डोळे बसविले जातील त्याला त्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्र काढून घेतल्यानंतर मृतदेहातून थोडासा रक्ताचा नमुना काढून घेण्याची पद्धत असते, ज्यायोगे मृत शरीरामध्ये यापैकी कोणती लक्षणे नाहीत ना याची चाचणी करता येते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु कधीकधी अति वयस्कर व्यक्तींचे नेत्र रोपणाच्या उपयोगाचे नसू शकतात. अशा वेळेला अशा नेत्रांचा उपयोग मात्र संशोधनासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी योग्य नसतील तर नेत्रदान करू नये अशा पद्धतीचा विचार मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात. हे ही योग्य नाही. कारण संशोधन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. संशोधनामुळे काय फायदा होतो याचं एक उदाहरण देता येईल. नेत्रा वरील संशोधनामध्ये अलीकडे असे आढळून आले आहे की कॉर्निया मध्ये दोन थर असतात. त्यामुळे एका कॉर्नियाचे दोन कॉर्नियामध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे पूर्वी दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकत होती पण आता चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. याचा अर्थ नेत्रदानाची गरज निम्म्यावर आली आहे. त्यापुढेही या विषयावर संशोधन झाले आहे आणि आता अजून क्रांतिकारी संशोधन येण्याची शक्यता आहे. हा संशोधनाचा किती मोठा फायदा आहे ? त्यामुळे जरी प्रत्यारोपणासाठी नेत्र उपयुक्त नसतील तरी नातेवाइकांनी संशोधनासाठी असे नेत्र वापरण्याचा आग्रह धरून नेत्रदान नक्की करावे. डोळ्याची संरचना ही सगळ्यात गुंतागुंतीची आहे. मेंदूच्या रचने नंतर दुसरा नंबर डोळ्याच्या रचनेचा लागतो. डोळ्यावर खूप मोठे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल सुद्धा काढून घेऊन जाता येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण डोळा काढून घेण्याची परवानगी दिल्यास संशोधनासाठी आणि नेत्र प्रत्यारोपण प्रशिक्षणासाठी सुद्धा संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल याची आवश्यकता असते. अजूनही रेटिना च्या अंधत्वावर उपाय सापडलेला नाही. ज्यावेळेस संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल काढून घेतला जातो त्यावेळेस त्या खोबणी मध्ये दुसरा कृत्रिम आयबॉल बसवला जातो, आणी पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतीही भेसूरता किंवा विद्रूपपणा येत नाही. म्हणूनच संशोधनाच्या उपयुक्तते साठी संपूर्ण डोळा सुद्धा द्यावा अशी शिफारस करण्यास हरकत नाही. जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी 25% अंध व्यक्ती भारतामध्ये आहेत. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ५२ लाख अंध व्यक्ती होत्या. (आणि दरवर्षी त्यात सूमारे ३५ हजार नवीन अंधांची भर पडतेच आहे. ) त्यातील ४६ लाख अंध व्यक्ती कॉर्निया मुळे अंध झालेल्या आढळल्या. त्यांचे अंधत्व नेत्रदानाने नक्कीच दूर होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे १० ते १५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते.

नेत्र रोपण शस्त्रक्रिया ही अनेक वर्षांच्या यशस्वीतेने आणि अनुभवाने सिद्ध झालेली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियांचा यशस्वीतेचा दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेत्रदाने, यशस्वीरित्या इतरांना दृष्टी देण्यासाठी रोपण करता येतात.

नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे नेत्रदानाच्या संकल्पपत्रावर सही करणे एवढाच अर्थ घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया अपुरी आहे. नेत्रदान यशस्वी व्हायचे असेल तर संकल्प पत्रावर सही केल्यानंतर किंवा संकल्प पत्र न भरता सुद्धा आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या वारसदारांना या गोष्टीबाबत पूर्णपणाने सजग करणे आवश्यक आहे. त्यांना नेत्रदानाची संपूर्ण माहिती देणे ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान झाले पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आहे याची त्यांना जाणीव करून दिल्यानंतरच, नेत्रदान यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे संकल्पपत्र भरण्या बरोबरच आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देणे आणि त्यांना त्यासाठी तयार करणे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

आपल्या देशात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एक टक्के व्यक्तींचेच प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचाच अर्थ संकल्पपत्र भरणे या कृती पेक्षा प्रत्यक्ष नेत्रदान घडवून आणण्यासाठी कुटुंबातल्या लोकांना जागृत करणे हीच सगळ्यात महत्वाची व आवश्यक गोष्ट आहे.

कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदू वा काचबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल किंवा मधुमेह आणि रक्तदाब असेल अशी कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान नक्कीच करू शकते. अपघातात व्यक्ती मृत झाली असेल तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कायदेशीरपणे नेत्रदान होऊ शकते, ते पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी करता येते. ज्यांचे कॉर्निया चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे ज्यांना अंधत्व आले आहे अशा अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात. जवळच्या नेत्रपेढीचे क्रमांक आपल्या घरात कॅलेंडरवर किंवा कुठेतरी लिहून ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस वगैरे ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूस जवळच्या नेत्र बँकेचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नेत्रपेढीचा क्रमांक शोधण्यासाठी कोणाला ऐनवेळी धावपळ करायला लागणार नाही.

तसेच राष्ट्रीय क्रमांक १९१९ हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर फोन केल्यास आणि आपले ठिकाण सांगितल्यास त्यांचेकडून आपल्या जवळच्या नेत्र बँकेचा क्रमांक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ऐन वेळेस नेत्र बँकेचा नंबर शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ते डोळे कुणाला बसले आहेत हे कधीही सांगितले जात नाही परंतु त्या डोळ्यांचा उपयोग रोपणासाठी झाला आहे किंवा नाही एवढीच माहिती मिळू शकते.

प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी आपल्या डोळ्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ज्यायोगे मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या नेत्रहीनाला उपयोगी पडतील.

डोळ्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे बाहेरील भागात पारपटल म्हणजेच कॉर्निया (पारपटल) त्यानंतर नेत्रमणी म्हणजेच लेन्स, त्यानंतर महत्त्वाचा भाग हा नेत्रपटल म्हणजेच रेटिना. नेत्रमणी व नेत्रपटल याच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब योग्य तऱ्हेने नियंत्रित केला गेलेला असतो. परंतु काही कारणामुळे तो दाब जर वाढला तर डोळ्याचे विकार होतात. त्यामुळे मुख्यत्वे काचबिंदू हा विकार उद्भवू शकतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी तरुणांनी वर्षदोनवर्षातून एकदा आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य वेळेस जर एखाद्या व्याधीचे निदान झाले तर त्यावर उपचार करून त्या व्याधींपासून मुक्तता मिळू शकते. प्रत्येक जिवंत व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांची योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे.

नेत्रदानच नव्हे तर एकूणच अवयवदाना याविषयी विविध धर्मांचा विरोध नसल्याबद्दलचा उहापोह अवयवदान आणि धर्म याविषयीच्या लेखामध्ये मी केला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा विरोध नेत्रदानाला नाहीच हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नेत्रदान हे एक पवित्र आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान हे एक मानवतेचे कार्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे.

© श्री सुनील देशपांडे

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत… 

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये! 

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये !

 लेखिका : सुश्री दुर्गा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मनाच्या लहरी‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ मनाच्या लहरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मनाच्या लहरी की लहरी मन !!!

अर्थात वरील विषय वाचल्या वाचल्या आपल्या मनात देखील असाच विचार आला असेल. हो न ? अहो, साहजिकच आहे. कळायला लागल्यापासूनची मनुष्याला असलेली मनाची सोबत मनुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम असते.

मन कसं असतं ? याची विविध उत्तरे देता येतील. आणि ही सर्व उत्तरे जरी खरी असली तरी मोठी गमतीशीर आहेत. कोणी त्याला चंचल म्हणेल, कोणी अचपल म्हणेल. कोणी अधीर म्हणेल तर कोणी बधिर म्हणेल. कोणी मनाला धीट म्हणेल तर कोणी सैराट म्हणेल. इतकं सार वर्णन केलं तरी कोणीही मनाचे इत्यंभूत वर्णन केले आहे असे छातीठोक पणे सांगू शकत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपले मन कसे आहे ? तर

“अचपळ मन माझे नावरे आवरीता’

आपले मन हे समुद्रासारखे विशाल असते, अथांग असते. कधी कधी तर स्वतःला देखील आपल्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. एकाच वेळेला मन हे खंबीरही असते आणि तितकेच नाजूकही असते. ज्या प्रमाणे समुद्राच्या लाटांमध्ये फेस असतो, वाळू असते आणि लाटांबरोबर वाहून येणारे ओंडके सुद्धा असतात. अर्थात या ओंडक्याचा समुद्राच्या स्वाभाविक गती-प्रगती मध्ये फारसा फरक पडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत बरेच वेळा उलट घडते. कारण मनुष्याला आपले मन सागरा इतके विशाल करणे जमतेच असे नाही. ज्याप्रमाणे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी किंवा योग्य त्या प्रमाणात ताणण्यासाठी व्यायामाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे व्यायाम करणारा मनुष्य आपले मन योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात ताणू शकतो, विशाल करू शकतो. अर्थात हा सरावाचा भाग आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही.

गुंतणं हा आणिक एक मनाचा रंग आहे किंवा स्वभाव आहे. मनाच्या ह्या स्वभावाचा गैरफटका बरेच वेळा मन धारण करणाऱ्या देहाला सोसावा लागतो, मग त्याची इच्छा असो व नसो.

मन हे एक न दिसणारं तरीही असणार मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. आजपर्यंत भलेभले थकले, पण मनाचा अंत खऱ्या अर्थाने लागला असे म्हणणारे अतिदुर्मिळ!! मला मन कळलं, मी कोणाच्याही मनातलं जाणू शकतो असे म्हणणे म्हणजे मोठी गंमत. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचे मन जाणू शकत नाही तिथे दुसत्याचे मन काय जाणणार ? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की मन म्हणजेच ‘मी’ आहे. त्यामुळे भगवंताचा शोध आणि ‘मी’ चा शोध यामध्ये मूलभूत फरक काहीच नाही. पण व्यक्तिसापेक्ष त्यात फरक मानला जातो. म्हणून काही लोकं बाहेर देव शोधतात, तर काही आपल्या अंतरात देवाचा शोध घेतात.

सर्व संतांनी मनाचे वर्णन केले आहे.

“अचपळ मन माझे नावरे आवरीता”

 – समर्थ रामदास

मन वढाय वढाय 

उभया पिकाताल ढोर

किती हाकल हाकलं

फ़िरि येत पिकावर

 – संत कवयित्री बहिणाबाई

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण”,

–  संत तुकाराम महाराज

“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी”, अशी काहीशी अवस्था प्रत्येक मनुष्याची असते. मनाचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल. मनाच्या लहरी किती आणि कशा कार्यरत असतात याचे नेमके असे कोष्टक नाही. मन स्थिर करणे म्हणजे एका अर्थाने त्या लहरींवर स्वार होणे. दैनंदिन जीवनात सामान्यपणे मनाच्या लहरी मनुष्यावर स्वार होतात आणि मनुष्याची अक्षरशः फरफट होते. खरंतर मनुष्याने या चंचल लहरींच्या छाताडावर स्वार होऊन जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. थोड्याश्या प्रयत्नाने हे सहज साध्य होऊ शकते, फक्त तशी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी.

“मनातल्या मनात डोकावता यावे।

मनातल्या शक्तीला जागवता यावे।

लहरी मनाच्या जाणता यावे, आणि।

जाणलेल्या लहरींवर स्वार व्हावे।।”

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares