मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆  

? इंद्रधनुष्य ?

☆ सहस्रचंद्रदर्शन शांती — संकलन – श्री अशोककाका कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

 वयाच्या ५० व्या वर्षापासून प्राचीन काळी वेगवेगळ्या शांती सांगितल्या आहेत. त्या म्हणजे, ५० व्या वर्षी वैष्णव शांती, ५५ व्या वर्षी वारुणी शांती, ६० व्या वर्षी उग्ररथ शांती, ६५ व्या वर्षी मृत्युंजय महारथी शांती, ७० व्या वर्षी भौमरथी शांती, ७५ व्या वर्षी ऐन्द्री शांती, ८० व्या वर्षी सहस्त्र चंद्र दर्शन शांती, 85 व्या वर्षी रौद्री शांती, ९० व्या वर्षी कालस्वरूप शांती, ९५ व्या वर्षी त्र्यंबक मृत्युंजय शांती आणि १०० व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय शांती. 

सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात १००० वेळा पूर्ण चंद्र पहिला आहे किंवा त्याच्या आयुष्यात १००० वेळा पौर्णिमा येऊन गेल्या. इतके सार्थ आयुष्य खूप कमी लोक जगतात म्हणूनच हे विशेष आहे. आपली मराठी कालगणना चान्द्रवर्षीय आहे म्हणून १००० चंद्र पाहण्याचा सोहळा केला जातो. हे मोजायची पण पद्धत आहे. ती अशी –

८० वर्षात १२ x ८० म्हणजे ९६०, त्यात २७ अधिक महिने येतात म्हणजे ९६० + २७ = ९८७. म्हणजे ८० वर्षात १००० चंद्र पहिले जात नाही म्हणून ८१ वर्ष पूर्ण झाल्यावर येणाऱ्या १००० व्या पौर्णिमेला हा दिवस साजरा करतात. ह्या मध्ये काही ज्योतिष्यांच्या मते ३२ अधिक मास येतात म्हणून ८१ व्या वर्षातील ८ व्या महिन्यात सहस्त्र चंद्र पूर्ण होतात. पुन्हा ह्यामध्ये खग्रास चंद्र ग्रहण पण जमेस धरावे लागते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे “वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:” ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एव्हडे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते.

सामन्यात: एकसष्ठी, पंचाहत्तरी आणि ८१ वर्षानंतर अशा शान्त्या केल्या जातात. आता सहस्त्रचंद्र दर्शनच का सूर्य दर्शन का नाही? तर “चंद्रमा मनसो जात:” म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. मला वाटते साठी नंतरच वयस्क लोकांना आपण उपयोगाचे नाही, आपली सद्दी संपली, आपल्याला अडगळीत टाकतील, कोणी विचारणार नाही अशा अनेक शंका घेरून टाकतात. ऐंशी वर्षे म्हणजे फारच जास्त होतात, त्यांचीच मुले साठीला येतात. कधी-कधी जोडीदार पण साथ सोडून जातो. अशा वेळी घरातल्याच लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन ते अजून आम्हाला हवे आहेत असे एक सुंदरसा घरगुती का होईना कार्यक्रम करून त्यांना तसे वाटू दिले, त्यांना कपडे किंवा चष्मा, कवळी, चांगली पुस्तके, एखादा छोटासा टीव्ही अशी भेट देऊन, सहस्त्र दिव्यांनी ओवाळले तर त्यांना किती बरे वाटते. आपण अजून हवे आहोत ही भावनाच किती चांगली आहे. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शन विधी असावा. आता होम करायचा कारण उत्सव मूर्ती ऐंशी वर्षे तंदुरुस्त का राहिली म्हणून कोणी नजर पण लावेल, सगळ्यांच्या नजरा चांगल्या असतात असे नाही. म्हणून होम करून सगळी अरिष्टे दूर करायची.

संकलन : श्री अशोककाका कुलकर्णी

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘रामधान्य…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘रामधान्य…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आता रामाचे आवडते धान्य कुठले? याचं उत्तर दडलंय एका भांडणात.

चला तर मग बघूया काय आहे हे भांडण.

भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले.

राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, “या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे.”

हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली, “म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ आहे! आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते! मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ.”

हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. “मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते.”

शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडली. राम म्हणाले, “मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे.”

राम अयोध्येला निघून गेले आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात झाली . सहा महिन्यांनी जेव्हा राम परत आले,तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढलं. तांदूळ खराब झालेला होता.त्याला कीड लागलेली होती . नाचणी मात्र जशी गेली तशीच बाहेर आली .

हे बघून प्रभुराम म्हणाले, “तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली.” म्हणून त्यांनी आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकले .

या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे, ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं.

मित्रांनो, तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या ‘रामधान्यचरित्र’ या काव्यात सांगितलेली आहे.

माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंगरूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून त्याची पारख केली पाहिजे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढ, मेघदूत, यक्ष आणि यक्षिण ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

आषाढ, मेघदूत, यक्ष आणि यक्षिण ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आषाढ….घनांचा मास आषाढ….मेघांचा मास आषाढ…मेघांनी मल्हार  गावा,मयूराने पिसारा फुलवावा….मेघांनी आक्रमिलेल्या  नभातून  घन कोसळू लागावेत आणि फत्तरालाही पाझर फुटून निर्झर खळखळा वाहू लागावेत….तो आषाढ ! ज्येष्ठ पाठमोरा होऊन आषाढाचा पहिला दिवस उगवतो आणि मनात अगदी नकळत शब्द  ऐकू येऊ लागतात… *आषाढस्य प्रथम दिवसे*… हो, तोच आषाढ… मेघदूताचा आषाढ… कालिदासाचा आषाढ…..प्रत्येक वेळी नवी अनुभूती देणारा मेघदूताचा आषाढ !

महाकवी कालिदासाचे कल्पनारम्यतेने नटलेले महाकाव्य! मेघदूत या काव्याच्या नावातच त्याचं वेगळेपण जाणवतं.फार मोठं कथानक नसलेल पण तरीही अफाट लोकप्रियता मिळवणारं  हे काव्य जगातल्या काव्यरसिकांना वेड लावून गेलंय.पत्नीच्या विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवण्यासाठी त्या मेघालाच दूत होण्याची विनंती करतो.कोण हा यक्ष ?  यक्ष हे कुबेराचे सेवक.हिमालयाच्या रांगा हे त्यांचं निवासस्थान.सूर्योदयाचेवेळी देवपूजेसाठी लागणारी हजार कमळे आणून द्यायची जबाबदारी कुबेराने एका यक्षावर सोपवलेली असते.हा यक्ष नवविवाहित असतो.त्यामुळे भल्या पहाटे ,सूर्योदयापूर्वी उठून हे काम करायचं म्हणजे त्याला शिक्षाच वाटत असते.पत्नीचा तेवढा विरहही त्याला सहन होत नसतो.विचार करता,एक गोष्ट त्याच्या लक्षात येते.ती म्हणजे,आपण सूर्योदयापूर्वी फुले,कमळे काढतो.तेव्हा ती उमललेली नसतात.मग ती रात्रीच,कळ्या असताना काढून ठेवली तर कुबेराला कुठे कळणार आहे ? यक्ष आपल्या कल्पनेप्रमाणे रात्री कळ्या खुडून भल्या पहाटे कुबेराकडे  पोहचवतो.पण प्रेमाने अंध झालेल्या यक्षाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसते.पूजेच्या शेवटी,शेवटचे कमळ अर्पण करताना,कमळ उमलून त्यातून भुंगा बाहेर पडतो.आधीच्या संध्याकाळी कमळाची पाकळी  मिटताना भुंगा त्यात अडकला आहे व कमळ उमलण्यापूर्वीच म्हणजे रात्री खुडले गेले आहे हे कुबेराच्या लक्षात येते.या चुकीची शिक्षा म्हणून ,ज्या पत्नीच्या मोहामुळे ही चूक घडली,त्या प्रिय पत्नीचा एक वर्ष विरह सोसावा लागेल,असा शाप कुबेर त्या यक्षाला देतो.एव्हढेच  नव्हे तर या वर्षभरासाठी यक्षाच्या सर्व सिद्धीही काढून घेतल्या जातात.त्यामुळे यक्षाला विरह सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो .हा यक्ष मग अलकापुरी पासून खूप दूर असलेल्या रामगिरी पर्वतावर म्हणजे रामटेक येथे येऊन राहतो.या ठिकाणी आठ महिन्यांचा काळ व्यतीत केल्यावर,वर्षा ऋतुतील आषाढमासातील पहिल्या दिवशी,पर्वत शिखरांवर जमलेले,पाण्याने ओथंबलेले मेघ तो पाहतो.वर्षा ऋतुतील निसर्गरम्य वातावरणात त्याच्या मनातील हुरहूर वाढत जाते.एकीकडे पत्नीची आठवण व काळजी तर दुसरीकडे तिला आपली वाटणारी चिंता अशा अवस्थेत तो सापडतो.त्यामुळे आपले क्षेमकुशल पत्नीला कळवावे या हेतूने पर्वत शिखरावरील मेघालाच तो दूत म्हणून अलकापुरीला जाण्याची विनंती करतो.असा हा मेघ  दूत!

या विरही यक्षाच्या मनात कोणते भाव जागृत होत असतील, त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? ते भाव शब्दातून मांडण्याचा हा प्रयत्न:

यक्षगान

*

मनोमंडला मधे मेघ हे पहा स्मृतींचे तुझ्या दाटले

विरह वेदना साहू कशी मी असे कसे ग प्रेम आटले

 *

मृगलोचन ते नजर बोलकी सांग कशी मी विसरु

कस्तुरगंधीत सुवर्णक्षण ते सांग कितीदा स्मरू 

 *

सांगू तुजला कशी इथे ग वाळून जाई काया

अशी कशी ग  क्षणात सारी तुझी आटली माया

 *

जाणशील  का ह्रदयामधल्या कोमल या भावना

विरह गीत हे गात येथ मी,येईल का तव श्रवणा 

 *

भाग्यच माझे म्हणून होते स्वप्नी तव दर्शन 

धडपडते मन तशात द्याया,तुजला आलिंगन 

 *

उत्सुक तुजला भेटाया पण,यावे सांग कसे

विरहव्यथेचे होईल दर्शन, जगात आणि हसे

 *

क्षणाक्षणांची युगे जाहली सरतील कधी हे दिन

तडफडते मन येथ  जसे की जळावाचूनी मीन

 *

सुखदुःखाचा  खेळ असे हा कळते सारे जरी

विरह वेदना मनात सलते उरते जी अंतरी

 *

स्नेहबंध हे तव प्रेमाचे सुखविती माझ्या चित्ता

दुरावाच का आणिल अपुल्या  प्रीतिला गाढता.

हा विरही यक्ष रामगिरी पर्वतावर  काल व्यतीत करत असताना तिकडे अलकानगरीत यक्षिणीची  काय अवस्था झाली असेल ? विरहाच्या अग्नीमध्ये होरपळून निघालेल्या यक्षिणीच्या मनात आलेले भाव असेच असतील ना ? :

 यक्षिणीचा  मानसमेघ

 *

आठ महिने संपले पण  राहिले हे चार मास

आठवांच्या मोहजाली  का तुझे होतात भास

दूर देशी तू तिथे अन् मी इथे सदनी उदास

लोचने पाणावती  मंदावुनी जातात श्वास

 *

बंधनांची भिंत येथे,मी कुठे कशी शोधू तुला

कोणत्या अज्ञातदेशी जाऊनी  तू राहिला

ना सखा साथीस कोणी,संवाद  नाही राहिला

मूक झाले शब्द  आणि हुंदकाही मूक झाला

 नियतीचा खेळ सारा दोष मी देऊ कुणाला

 ना कुणाचा आसरा खंगलेल्या माझ्या मनाला

 मित्र म्हणवती एकही पण  संकटी  ना  धावला 

 वेदना संदेश माझा तुझ्या मनी  ना पोचला

 *

ना तुझा सहवास  येथे काय करू या वैभवा

यक्षभूमी ही नव्हे, की  येऊन पडले रौरवा

रोज मी साहू किती या  विरहाग्नीच्या तांडवा 

बरसू दे आता जरासा स्नेहभरला चांदवा  

प्रेम  देते प्रेम, म्हणती,का असे शासन मला

 घाव वर्मी या जिवाच्या कोणी असे हा घातला 

मी गवाक्षी वाट बघता खुणावती  मेघमाला

मेघ माझिया मानसीचा नित्य नयनी दाटला .

 *

यक्ष आणि यक्षिणीच्या मनाची अवस्था समजून घेऊन शब्दात  मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न  आषाढाच्या पहिल्या दिवशी असणाऱ्या …कालिदास दिनानिमित्त  !

आषाढाला शोभेल असा पाऊस  पडो आणि सर्वांचेच जीवन नवचैतन्याने उजळून जावो,ही सदिच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिखा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ शिखा ! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“शिखा” ह्या शब्दाचा अर्थ साधारण माझ्या पिढीतील, सत्तरी क्रॉस केलेल्या लोकांना माहित असण्याचा संभव जास्त.  हल्लीच्या तरुण पिढीला “शिखा” ऐवजी “शाखा” हा शब्द जास्त जवळचा व कानावरून जात असलेला.  मग ती “शाखा” सकाळी, सकाळी एखाद्या मैदानात, शाळेच्या पटांगणात भरणारी असो, अथवा एखाद्या राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या विभागातील ऑफिस. पण तेच जर का आपण “शिखा” ऐवजी “शेंडी” म्हटले, तर शंभरपैकी नव्याणव तरुण, तरुणींना ते लगेच कळेल आणि मग त्यांच्या तोंडातून आश्चर्याने “ओह आय सी, शिखा म्हणजे शेंडी काय!” असे शब्द बाहेर पडल्या शिवाय राहणार नाहीत ! 

आपल्या लहानपणी आपले आई बाबा, आजी-आजोबा आपण काही कारणाने जेवत नसलो तर, “माकडा माकडा हूप, तुझ्या शेंडीला (खरं तर शेपटीला) शेरभर तूप” असं काहीतरी बोलून आपल्याला भरवत असत.  तेंव्हा आपल्या बालबुद्धीला, माकडाला शेंडी कुठे असते, असं विचारणं कधी सुचलं नाही ! पण त्या ओळी गाऊन आपल्याला बळे बळे जेवायला लावणारे आपले आई – बाबा किंवा आजी-आजोबा यांनी आपल्याला तेंव्हा एक प्रकारे शेंडीच लावलेली असते, हे आपल्याला आपण मोठे झाल्यावरच कळते ! त्यामुळे मोठेपणी आपण सुद्धा दुसऱ्या कोणालातरी कधीतरी शेंडी लावण्याचे संस्कार आपल्याला त्यांच्याकडूनच मिळालेले असतात, असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर, मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याच काहीच कारण नाही ! असो !

आजही मुलाची मुंज करताना, साधारण एप्रिल-मे मधला मुहूर्त धरला जातो. कारण नंतर शाळेला सुट्टी असल्यामुळे त्या सुट्टीत बटूचे केस वाढून, त्याला शाळेत “ऑकवर्ड फिल” होऊ नये हा एक विचार त्याच्या मम्मी पप्पांच्या मनांत असतो.  शेंडी व्यतिरिक्त तिच्या भोवती थोडे बारीक केस ठेवण्याची पद्धत आहे, ज्याला घेरा असे म्हणतात.

शेंडी ठेवण्या मागे काही वैज्ञानिक कारणे पण आहेत, असं जर मी या ठिकाणी सांगितलं तर पुन्हा मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याचा संभव आहे, पण आपण गुगल करून (ज्याला बहुतेक शेंडी असावी) मी जे आता सांगणार आहे त्याच्या सत्य असत्याचा नक्कीच शोध घेऊ शकता. तर डोक्यावर ज्या ठिकाणी शेंडी असते तिथेच सार्‍या शरीराच्या नाड्या एकत्रित होतात असं आधुनिक विज्ञान सांगत. इतकंच कशाला, या ठिकाणाहूनच मनुष्याची ज्ञानशक्ती निर्माण होते.  तसेच शेंडी सार्‍या इंद्रियांना स्वस्थ ठेवते व कोणाही व्यक्तीचं क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विचार करण्याची त्याची क्षमतादेखील वाढते !

हिंदू धर्मात ऋषी मुनी डोक्यावर शेंडी ठेवायचे. गुरुगृही “अध्ययन” करतांना पूर्वी शिष्याच्या शेंडीला दोरी बांधून ती खुंटीला बांधत असत. जेणेकरून जर “अध्ययन” करतांना त्याला झोप लागली, तर शेंडीला हिसका बसून त्याला जाग यावी, हा हेतू ! याच अनुषंगाने इतिहासात होऊन गेलेले प्रकांड पंडित आर्य चाणक्य, यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या डोक्यावर असलेल्या घेरा व शेंडीचा सुद्धा काही संबंध असू शकतो का, असं मग कधी कधी मला वाटायला लागत. 

आपण साऱ्यांनी विदेशी लोकांचे अंधानुकरण करून, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचा त्याग केला, त्यातली एक गोष्ट म्हणजे शेंडी ! पण आता त्याच विदेशी लोकांना शेंडीचे वैज्ञानिक महत्व कळल्यामुळे “हरेराम हरेकृष्ण” हा पंथ आचरणारे सारे पुरुष अनुयायी लांब लचक शेंडी बाळगून असल्याचे पहायला मिळत ! 

आपल्याकडे पौरोहित्य करणारे काही ब्राम्हण अजूनही  शेंडी बाळगून आहेत, आता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असावी इतकेच ! पण दाक्षिणात्य पुरोहित, जे माझ्या पाहण्यात आलेत, ते सगळे डोक्यास घेरा व त्या मधे शेंडी बाळगून असतातच असतात !

तसेच अजूनही पानपट्टीचा ठेला चालवणारे काही पुरभय्ये लांब लचक शेंडी बाळगून वर त्याला छोटी गाठ बांधून, कपाळी लाल, पिवळे गंध लावून आपल्या पानाच्या ठेल्यावर बसल्याचे दिसतात ! असे पानाचे ठेले आणि ते पुरभय्ये काळाच्या ओघात आता नष्ट झाले आहेत, हे आपण सुद्धा मान्य कराल.

फार पूर्वी एखाद्या राजाने शिक्षा म्हणून शेंडी कापण्याची आज्ञा दिल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पण त्या काळी अशी शिक्षा, देह दंडाहून कठोर समजली जायची, असा तो काळ होता आणि तेवढंच आपापल्या शेंडीला लोक महत्व देत होते !

आपल्या मराठी भाषेत शेंडी शब्दाचा उपयोग अनेक म्हणी अथवा वाक्प्रचारात केलेला आढळतो. तुम्हांला कोणी फसवलं तर लगेच तुम्ही, “तो मला शेंडी लावून गेला” असं म्हणता ! एखादी गोष्ट आपण या पुढे कधीच करणार नाही, यासाठी आपण “आता शेंडीला गाठ” असं शेंडी नसली तरी,  बिनदिक्कत म्हणतोच ना ! तसंच वेळ पडल्यास आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर “शेंडी तुटो अथवा पारंबी” या म्हणीचा वापर शेंडी नसली तरी करण्यास आपण मागे पुढे पहात नाही !

शेवटी, शेंडी ठेवावी का ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शेंडी कोणी कोणालाच लावू नये यावर सगळ्यांचे मतैक्य होण्यास शेंडी नसली तरी काहीच अडचण नसावी !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ नाटकाची बीजे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

‘बाबा मला पण तुमच्याबरोबर यायचं’.. म्हणून तो मुलगा मागे लागला.त्याचे बाबा निघाले होते नाटकाच्या तालमीला.हौशीच कलाकार होते सगळे ते.कोणी नोकरी करणारे..कोणी दुकानदार.दिवसभर आपापले उद्योग करुन कधीमधी नाटकं करत‌.

तर सध्या ते अश्याच एका नाटकाची तालीम करत होते.कोणाच्या तरी घरी जमले होते.नाटकाचा जो दिग्दर्शक होता तो आपल्या या पाच सहा वर्षाच्या मुलाला पण घेऊन आला होता.. खुप मागे लागला म्हणून.

पेट्रोमॅक्सच्या.. कंदिलाच्या उजेडात तालीम सुरू झाली.कोणाच्या तरी हातात स्क्रिप्ट होतं..त्यांच्या सुचनेनुसार सगळं सुरू होतं.त्या लहान मुलाला हे सगळं नवीनच होतं.जमलेल्या मंडळीत कोणी अप्पासाहेब होते..कोणी दादा होते.. त्या त्या भुमिकेनुसार ते बोलु लागले.एकजण गडी झाला  होता.खोट्या खोट्या दिवाणखान्यातल्या खोट्या खोट्या खुर्च्यांवर तो फडके मारु लागला.

आणि हे सगळं त्यांच्या नेहमीच्याच कपड्यात.. नेहमीच्याच वेशभूषेत..पण त्यांच्या वागण्यातून.. बोलण्यातुन नवीन जग निर्माण होत होतं.कोणीतरी एकजण स्त्री भुमिका पण करत होता.तो स्त्री सारखं बोलु लागला..चालु लागला.

हे सगळं तो लहानगा बघत होता.त्याच्या वयाच्या द्रुष्टीने ही नाटकाची दुनिया वेगळीच  होती.तो या नाटकाच्या जगात पार हरवुन गेला.. अणि पहाता पहाता झोपी गेला.

काही दिवसांच्या तालमीनंतर आता प्रत्यक्ष प्रयोग.नेपथ्य..प्रॉपर्टी..वेशभुषा..रंगभुषा..मंडळी जरी हौशी होती..तरी जमेल तसं त्यांनी सगळं उभं केलं होतं.तालमीत पाहीलेलंच तो आता पुन्हा नव्याने पहात होता.तेच नट..तेच संवाद..पण आता त्यांनी मेकअप केलेला.. कोणी दाढी.. कोणी मिशी चिकटलेली.स्त्री पार्ट करणारा नट.. त्याच्या चेहऱ्यावरील भडक रंगरंगोटी..नेसलेली साडी.. आणि कंबर लचकत  चालणं..

एखादी जादू घडावी तसं सगळं बदललं होतं.सगळं तेच..पण सगळं नवीन.दु:खाच्या प्रसंगात प्रेक्षक दु:खी होत‌‌.. विनोदी प्रसंगात प्रेक्षकात हास्याचे फवारे उडत होते. प्रयोग रंगत गेला.

इतक्या दिवसांची मेहनत घेऊन केलेला प्रयोग संपतो.घरच्यांच बोट धरुन तो मुलगा रंगमंचामागे जातो.आता तर आणखीनच वेगळं जग.तो मघाचा मिशी लावलेला नट बिडी पेटवतो आहे.. स्त्री पार्ट करणारा नट एका कोपऱ्यात  जाऊन तंबाखू मळतो आहे.कोणी कपडे बदलतं आहे.

तालमीतलं जग.. प्रत्यक्ष रंगमंचावरचा प्रयोग.. आणि आता हे प्रयोगानंतरचं रंगमंचा मागचं जग..

‘नाटक’ या नावाच्या जादूचा.. आणि त्या मुलाचा तो पहिला संबंध.कुठेतरी नाटकाचं बीज मनात रोवली गेलं ते तिथुनच. नंतर थोडं मोठं झाल्यावर त्यानं शाळेत नाटकं पाहिली..वाचली..कांहीं केली..

आणि तेथुन त्याच्या नाटकाच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पुढे त्या मुलाला एक जगप्रसिद्ध नाटककार म्हणून जग ओळखू लागले.

तो मुलगा म्हणजेच.. विजय तेंडुलकर.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राग वगैरे…” – कवी : बा.भ. बोरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “राग वगैरे…” – कवी : बा.भ. बोरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

सहज एकदा फेरफटका मारताना

वाटेत  “राग” भेटला

मला पाहून म्हणाला…

काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

 

मी म्हणालो अरे नुकताच

 “संयम” पाळलाय घरात

आणि “माया” पण माहेरपणाला

आली आहे..

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!

 

पुढे बाजारात  “चिडचिड”

उभी दिसली गर्दीत,

खरं तर

ही माझी बालमैत्रीण

पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा

मित्र मिळाला आणि हिच्याशी

संपर्क तुटला..!

 

आज मला पाहून म्हणाली, अरे,

 “कटकट” आणि  “वैताग” ची काय खबरबात ?

 

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा.. 

हल्ली मी  “भक्ती” बरोबर

सख्य केलंय त्यामुळे

*”आनंदा”*त आहे अगदी..!

 

पुढे जवळच्याच बागेत

कंटाळा” झोपा काढताना दिसला

माझं अन त्याचं हाडवैर….

अगदी 36 चा आकडा म्हणाना….

त्यामुळे मला साधी ओळख

दाखवायचाही त्याने चक्क “आळस” केला..!

मीही मग मुद्दाम “गडबडी” कडे

लिफ्ट मागितली आणि

तिथून सटकलो..!

 

पुढे एका वळणावर  “दुःख”

भेटलं, मला पाहताच म्हणालं

अरे ये, तुझीच वाट पहात होतो”

 

मी म्हणालो, “अरे वाट पहात होतास की

वाट लावायच्या

तयारीत होतास? आणि माझ्या

बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस की रे माझी

तसं  “लाजून” ते म्हणालं,

अरे मी पाचवीलाच पडलो

(पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. 

कसे काय सर्व ? घरचे मजेत ना?” 

 

मी म्हणालो, “छान” चाललंय सगळं…* “श्रद्धा” आणि “विश्वास”

असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात

त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.

तू नको “काळजी” करूस.

हे ऐकल्यावर “ओशाळलं”

आणि निघून गेलं..!

 

थोडं पुढे गेलो तोच

सुख” लांब उभं दिसलं

तिथूनच मला खुणावत होतं,

धावत ये, नाहीतर मी चाललो

मला उशीर होतोय..

 

मी म्हणालो, अरे, कळायला

लागल्यापासून

तुझ्याच तर मागे धावतोय

ऊर फुटेपर्यंत,

आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय…

 एकदा दोनदा भेटलास

पण ‘दुःख’ आणि ‘तू’ साटंलोटं

करून मला एकटं पाडलंत..

दर वेळी.

आता तूच काय तुझी

अपेक्षा” पण नकोय मला.

मी शोधलीय माझी “शांती”

आणि घराचं  नावच

समाधान” ठेवलंय..!

कवी: बा. भ. बोरकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस काय काय करतो… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ पाऊस काय काय करतो… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

(रस्तोरस्तीच्या गोष्टी) 

थकलेल्या, मळलेल्या रस्त्यांना चकचकीतपणाचा मुलामा देतो. भरून टाकतो त्याच्यावरचे सगळे खाच-खळगे आपल्या ओल्या मायेनं. आणि रस्त्यांना दाखवतो अंतरबाह्य जगण्याची झलक. मग सरळसोटपणे वाहणारा रस्ताही मध्येच थबकतो, आपल्याच खळग्यात डोकावणाऱ्या आपल्या सोबत्यांसाठी! अन् मग एकमेकांची अंतरंग दिसू लागतात त्यांना. पुसू लागतात ते एकमेकांच्या व्यथा. कधी रस्त्यावरचा दिवा आपल्या प्रकाशाची उब त्याला देऊ पाहतो. कधी निरभ्र आकाश त्याला शांतता देतं. तर कधी डोकावणारं झाड आपल्या पानाफुलांच्या संसाराच्या गोष्टी त्याला सांगतं. 

पण याबरोबरच त्यांनाही जाणून घ्यायचं असतं सिमेंटच्या, डांबराच्या आड खोल खोल दबलेल्या खऱ्याखुऱ्या रस्त्याचं रूप आणि त्याची कथा, त्याची व्यथा. 

एक निराळंच विश्व असतं त्यांचं. प्रत्येकाची भाषा वेगळी पण तरीही एकमेकांना समजेल अशी… 

काय असेल बर त्या संवादात? त्या विश्वात?

वर्षानुवर्षं एकाच जागी स्थिर राहण्याचं दुःख, घरट्याची गरज संपताच सोडून जाणाऱ्या पक्ष्यांच्या आठवणी, आपल्याच अंगाखांद्यावर खेळणाऱ्या फुलापानांच्या अल्पायुष्याची खंत, का आपल्या एकटेपणाला या खळग्याची साथ मिळाली म्हणून झालेला आनंद? का यापेक्षाही वेगळं काही…

आता रस्त्यावरचा दिवा. जेव्हा डोकावत असेल त्या खळग्यात तेव्हा सगळ्यात पहिलं बघत असेल आपलं पारदर्शी रूप! आपल्या किरणांची तहान भागवत असेल का? सोडत असेल का आपल्या किरणांना त्या छोट्या डोहरुपी खळग्यात डुंबायला… का मदत करत असेल रस्त्याला, त्याच्या खोल अस्तित्वाचा शोध घेण्यात?

आकाशाचा दाटलेपण, खरंतर साचलेपणच रीतं होत असेल का त्या खळग्यात? काय वाटत असेल त्या आकाशाला, आपल्याच साचलेल्या भावनांकडे त्रयस्थपणे पाहताना? सगळा निचरा झाल्यावर येणारं निरभ्रपण म्हणूनच जपता येत असेल का त्याला? 

आणि या सगळ्यात अखंड चालत राहण्याचं कर्तव्य निभावणाऱ्या रस्त्याला काय वाटत असेल? सांगत असेल का तो त्या झाडाला रस्तोरस्तीच्या गोष्टी? सांगत असेल का आकाशाला त्याच्या अथांगपणाचं, स्वच्छंदपणाचं महत्त्व? दिव्याला सांगत असेल का रात्री त्याच्यासोबत असण्यानं, त्याला दिसणाऱ्या रस्त्यावरच्या वर्दळीचं खरं रूप? काय काय येत असेल ना या साऱ्यांच्या मनात? आपलं जगणंही कोणीतरी कौतुकाने पहावं असं वाटत असेल का त्यांना? माणसांबद्दल, वाहनांबद्दल काय बोलत असतील ते? कसलीही कुरकुर न करता आपल्या खाचखळग्यांसह अखंड सोबत करणारा हा रस्ता, पटकन थांबावस वाटलं तर आडोशासाठी हक्काचं ठिकाण असणार झाड आणि रात्रीच्या अंधारात स्वतःचीच दृष्टी आपल्याला देणारा अविचल दिवा यांच्याकडे कधीतरी कृतज्ञतेनं पाहिलंय का आपण? 

पण पाऊस या उपेक्षितांची कायमच दखल घेतो. आपल्या थेंबाने त्यांना गोंजारतो, त्यांच्या जगण्यावर चढलेली निराशेची, थकव्याची पुटं धुऊन काढतो, मोकळं करतो आणि त्यांना स्वच्छ, नितळ रूप देतो. पाऊस आपल्या ओल्या मायेने सगळ्यांना कवेत घेतो. 

पाऊस आपल्या कल्पनेपलिकडेही बरंच काय काय करत असतो.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

जयवंतीण”

काही शब्दांचा अर्थ बालवयात कळत नसेल पण असे काही संबोधनात्मक शब्द मनाच्या आत कुठेतरी नक्कीच गुदमरणारा तीव्र गोंधळ घालायचे. त्यापैकी दोन शब्द मला चांगलेच आठवतात. “वांझोटी आणि प्रौढ कुमारिका”

शब्दांसारखे शब्द पण ते उच्चारताच अर्थापेक्षा त्यामागचा उपहास, तुच्छता, भोचकपणा, भावनाहीन चेष्टा मात्र मला जाणवायची आणि मी विचारात पडायची. भाषेतला, उच्चारातला, भावनेतला गोडवा अजिबात न जपणारे हे शब्द आहेत आणि अशा शब्दांची वाणीतून, मनातून हकालपट्टी झाली पाहिजे असे मला माझ्या आतील प्रवाहातून त्यावेळी वाटायचे.

एखाद्या बाईला मूल नसणं अथवा तिची मुलं जन्मत:च मृत असणं याबाबत समाजाची होणारी प्रतिक्रिया किती ओंगळ असू शकते हे मी त्या न कळत्या वयात नकळत अनुभवलं.

आमच्या घरासमोर एक चाळवजा इमारत होती. ती इमारत कोणाच्या मालकीची होती ते मला आठवतं नाही. एक खणी लहानलहान घरं असलेली ती इमारत होती. तिथे जयवंत नावाचं एक दांपत्य रहात होतं. गल्लीतले सगळे त्यांना जयवंत आणि जयवंतीण असेच संबोधत. वास्तविक हे असं दांपत्य होतं की जे गल्लीत कोणात फारसं मिसळतच नसे. सगळ्यांपासून अलिप्तच होतं म्हणाना !

सकाळी ठराविक वेळेला जयवंत शर्टाच्या पाठीमागच्या कॉलरला, पावसाळा नसला तरीही लांबलचक छत्री अडकवून कामावर जायला निघायचे. ते कुठे आणि काय काम करत होते हे माहीत नव्हतं. अगदी संपूर्ण मळेपर्यंत एकच शर्ट आणि विजार त्यांच्या अंगावर आठवडाभर असायची. जयवंतीण दिसायला खरोखरच सुरेख होती. गोरीपान, नाकीडोळी नीटस पण अत्यंत गबाळी ! सदैव केस विस्कटलेले, साडी अंगावर कशीबशी गुंडाळलेली, चेहऱ्यावर उदास चैतन्यहीनता, बोलण्यात हसण्यात कशातच जीव नसल्यासारखा. सगळेजण तिला “मळकट पांढरी पाल” म्हणायचे. कोपऱ्यावरच्या घरातल्या मीना मथुरेची आई दिवसभर पायरीवर बसून कोण आलं, कोण गेलं यांच्या नोंदी ठेवायची. कुठे कशासाठी कोण चाललं आहे घराबाहेर याचीही ती अत्यंत कर्तव्य बुद्धीने चौकशी करायची पण जयवंतीण दिसली की पटकन घरात जायची आणि “वांझोटी” म्हणत जोरात दरवाजा लावून घ्यायची.

जयवंतीणबाईला मूल नव्हतं कारण तिचं जन्माला येणारं प्रत्येक मूल हे मृतावस्थेतच जन्म घ्यायचं. जयवंतीण बाईचं मातृत्व हे जन्म आणि मृत्यूच्या रेषेवर विद्रुपावस्थेत टांगलेलं राहिलं. मात्र एक होतं की तिच्या प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी गल्लीतला तिच्याविषयी असणारा एक उपहासात्मक प्रवाह मात्र काहीसा स्तब्ध असायचा. “या खेपेस तरी या बाईचं मूल जगू दे !” अशी भावना सगळ्यांच्या मनात असायची. प्रत्येक वेळी एक ताण, एक दडपण, एक अत्यंत अप्रसन्न शांतता गल्लीने जाणवलेली आहे. घरीच एक सुईण यायची. दार बंद असायचं आणि हे बंद दार जेव्हा उघडायचं तेव्हा जयवंतच्या हातात फडक्यात गुंडाळलेला एक ओला रक्तामासाचा बरबटलेला मृत गोळा असायचा आणि ते एकटेच त्या गोळ्याला मातीत पुरवून टाकायला निघालेले असत. ना कुणी नातेवाईक ना कोणी मित्र. माणूसकी म्हणून गल्लीतलेच न सांगता कुणी त्यांच्याबरोबर जात असत आणि घरात अत्यंत कळाहीन अवस्थेत जयवंतीण बाई चा आक्रोश चालायाचा. माझी आजी ब्रांडीची बाटली घेऊन तिच्या घरात जायची, तिच्या हातापायांना त्याही अवस्थेत चोळत राहायची तिच्या पांढऱ्या फट्टक चेहऱ्यावर मायेने गोंजारून तिचं डोंगराएवढं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायची. कुणाच्या दुःखाला कसं मायेनं गोंजारावं हा संस्कार आजीच्या या लहानशा कृतीतून नकळतच रुजला.

अशाच एका असफल बाळंतपणातच जयवंत बाईचा शेवट झाला आणि गल्लीतला दरवर्षी घडणारा दुःखद अध्याय कायमचा संपला. जयवंत नंतर कुठे गेले, त्यांचं काय झालं याची खबरबात गल्लीने कधीच घेतली नाही. एका अंधाऱ्या, चैतन्यहीन, बोडक्या, एक खणी घराला कायमचं एक कुलूप लागलं.

या घटनेच्या अशा धूसर रेषा माझ्या स्मरणात आजही आहेत. हे अत्यंत वेदनादायी दृश्य काळाबरोबर वाहून गेलंही असेल पण त्या दृश्याचे मनावर झालेले परिणाम कधीकधी वेगळ्या स्वरूपात आजही जाणवतात. जगताना माणसाच्या जाणिवा जेव्हा प्रगल्भ होतात ना तेव्हा मनावर उमटलेले हे पुसट ठसे पुन्हा पुन्हा दृश्यरूप होतात.

आता माझ्या मनात विचार येतो जयवंतीणबाई वांझोटी कशी ? ती जन्मदा तर होतीच ना ? दुर्दैवाने तिची कूस भरली नाही त्यात तिचा काय दोष ? त्यावेळी विज्ञान इतकं प्रगत नव्हतं का की समाजाचं प्रबोधन कमी पडलं? जयवंतीणबाई बरोबर जे घडत होतं त्याभोवती अंधश्रद्धेचे विचार प्रवाह ही वेढा घालून असावेत. विज्ञानाचे कुंपण तिथे नव्हतं. डीएनए, क्रोमोझोम्स, निगेटिव्ह रक्तगटांचे ज्ञान नव्हतं किंवा अशा प्रगत विचारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने पायऱ्याच बांधल्या नव्हत्या का ? अशावेळी जयवंतीणबाई माझ्या नजरेसमोर प्रातिनिधिक स्वरूपात उभी राहते. आज व्यंधत्वावर मात करणारी प्रचंड प्रगत वैज्ञानिक तंत्रे उपलब्ध आहेत. ज्ञान आणि जागरूकता यांची सांगड सकारात्मक दृष्टिकोनातून घातली जात आहे. थोडं विषयांतर करून मला इथे हेही नमूद करावसं वाटतं की माझ्या परिचयातल्या, नात्यातल्या, माझ्या काही मैत्रिणींनी मूल न झाल्याचं दुःख न बाळगता अनाथ मुलांचं मातृत्व आनंदाने स्वीकारलेलं आहे. आयुष्यातल्या उणिवा भरून काढताना एक उदार समाजदृष्टिकोनही त्यांनी जपला आहे. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो आणि आज अशा भावना निर्माण होण्यामागे किंवा अशी मानसिकता तयार होण्यामागे न कळत्या वयात न समजलेलं जयवंतीणबाईचं दुःख कुठेतरी अजूनही ओलं आहे असं वाटतं आणि पुन्हा यातना होतात जेव्हा आजही कधी “वांझोटी” हा शब्द कानावर पडला तर.

एकाच वेळी समाज सुधारलाय असे म्हणताना भाषेतून अशा गलिच्छ उपहासात्मक, दुसर्‍याच्या भावनांची बूज न राखणार्‍या शब्दांची कायम स्वरूपात हकालपट्टी का होत नाही याचाही खेद वाटतो. आणखी एक अपराधीपणाचा सल आहे.

का कोणीच जयवंतीणबाईच्या दुःखापर्यंत पोहोचू शकले नाही ? आम्ही गल्लीतली मुले तिला जयवंतीणबाई असेच म्हणायचो. आमच्यापैकी एकाने तरी तिला जयवंत आई किंवा जयवंताई म्हणून हाक मारली असती तर ..कदाचित त्या कोमेजल्या रोपाची पाण्यासाठीची तहान किंचित तरी भागली असती का ? आज तो सल आहे— आम्ही हे का केलं नाहीv?

क्रमशः भाग सहावा. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले, भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. 

गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. 

यावर भिकुशेट म्‍हणाले,”मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे.” लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.

भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून दोन वस्‍तू काढल्‍या..  ते कृत्रिम पाय होते.  ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.

भिकुशेट म्‍हणाले,” भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण या विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.”

तात्‍पर्य – मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

तमसो मा ज्योतिर्गमय — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आषाढी अमावस्या !! दीप पूजन…. काय बरं कारण असावं? ज्या दिव्यांनी पूजा करायची त्याच दिव्याची पूजा करायची?

विचार करताना वाटले आपण ज्याचे उपकार घेत असतो त्याला वर्षातून एकदा तरी कृतज्ञतेची पावती द्यावी हा संस्कार तर यातून देत असावेत. 

म्हणजे बघा ना, वर्षभर पूजेसाठी रोज आपण ज्या ज्या दिव्यांनी देवांना औक्षण करतो, ज्या दिव्यांनी वाढदिवस, स्वागत, सण समारंभ ई. महत्वाचे दिवस आनंदी, सकारात्मक करतो त्या दिव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दिव्यांचीच पूजा केली जात असावी.

श्रावण महिना तर सणांचा राजाच. दररोज म्हटले तरी पूजा अर्चा चालू असते. मग अशावेळी दिवे स्वच्छ केलेले असले तर कामं सोप्प ना? मग त्या निमित्ताने दीप पूजन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्या सारखेच ना?

पण मग आजीने सांगितले, समई ही घरातील कर्त्या बाईचे प्रतीक आहे. त्या मधे असलेली वात म्हणजे तिचा प्राण आणि त्यातून निर्माण झालेली ज्वाला म्हणजे दिवा. बघा सगळे त्या समईचेच कर्तृत्व… पण किती सहज ती हे कामं त्या दिव्याच्या नावाने करते? 

म्हणजे असते समई… ती 

तिच्यातली ज्योत….. ती 

तिच्यातली ज्वाला…. ती 

पण हे सगळे मिळून तो… दिवा.

समई, मशाल, निरंजनाची आरती, मेणबत्ती, मंदिरात असलेल्या हंड्या, दिवटी, कंदील हा शब्द वापरत असले तरी तो शब्द मराठी नाही, त्याला बत्तीच म्हणायचे, पणती,अजूनही दिव्यांची रूपे ही स्त्रीलिंगीच आहेत पण नाव मात्र दिव्याचे….

हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे प्रतीक… संसाराच्या मंदिरात ही समई तेवत रहाते पण ती त्याचाशी एकरूप होऊन त्याच्या नावाने सगळे आनंदाने करताना घरदार उजळवून टाकते म्हणूनच घराचे मंदीर होते.

मग अशा समईला जेव्हा खरंच खूप काम असणार आहे त्या आधी थोडा आराम दिला तर नव्या दमाने नव्या जोषाने ती काम करू शकेल या भावनेतून फक्त डाळफळाचा नैवेद्य ( साधा सोपा स्वयंपाक ) म्हणजे स्वयंपाकातही तिला दिलेली ही थोडी सूट… म्हणजे तिच्या प्रती दाखवलेली कृतज्ञता…. अशा समयांचे अर्थात दिव्यांचे पूजन म्हणजे नारी कार्याची ठेवलेली जाण…. म्हणूनच काही ठिकाणी मातृका पूजनही असते.

अजूनही म्हणजे जेव्हा तो नसतो सूर्य / चंद्र हे नैसर्गिक दिवे, तेव्हा तिची रूपे त्याचे कार्य करू शकतात…. पण ती नसेल तर? देवाची किंवा इतर पुण्यकर्मे अधूरी…. ज्योतीतून ज्योत निर्माण करणे तिलाच जमते…. मग असे तिचे… पर्यायाने नारीचे महत्व जाणून तिच्या कार्याची जाण ठेऊन तिला कृतज्ञता द्यायचा आजचा दिवस…. अंधःकारातून खऱ्या अर्थाने तेजाकडे घेऊन जाणाऱ्या तिने ज्याला सर्वस्व अर्पण केले त्या दिव्याचा दिवस….

चला ते तेज तिचं महत्व खऱ्या अर्थाने जाणून घेऊ या आणि प्रार्थना करू…

ॐ असतो मा सद्गमय।

तमसो मा ज्योतिर्गमय।

मृत्योर्मामृतं गमय ॥

ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥

– बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares