संस्थेत कामाला जाण्यासाठी मी घरातून निघाले साधारणपणे साडेबारा एक ची वेळ होती मी गेटच्या बाहेर आले तर आमचे सर भेटले.मी म्हणाले सर कुणीकडे चालला आहात?… ते म्हणाले, शनी देवळाकडे… मी म्हटलं चला मी सोडते तुम्हाला… आणि मग रिक्षा केली माझ्या शेजारी बसलेले माझे शिक्षक हे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक ज्यांच्या नावाने मी तो ट्रस्ट चालवते ते श्री तडवळकर सर होते. मग रिक्षात बसून मी संस्थेत झालेल्या ऍडमिशन्स ..असलेले शिक्षक.. इंग्रजी माध्यमाचे प्रवेश बंद झालेले तुडुंब भरलेले वर्ग… याबद्दल मी सर्वांना माहिती देत होते मी विस्तृत पणे काय योजना केली आहे ते विचारत होते हे …सर्व बोलणे समोरचा रिक्षावाला मुलगा छान पद्धतीने ऐकत होता. सरांना मी दत्त चौकात सोडलं आणि मी संस्थेत येण्यासाठी निघाले.
त्यावेळेला रिक्षावाल्या पोराने विचारलं ,बाई तुम्ही शाळेत शिकवता का?.. मी म्हणाले हो. मी शिक्षिका आहे…. मी त्याला विचारलं तू किती शिकला आहेस? . तो म्हणाला मी बारावी पास आहे. तो मुस्लिम समाजाचा होता तो म्हणाला आमच्याकडे जास्त शिकत नाहीत लगेच कामधंद्याला लावतात त्यामुळे पुढे इच्छा असून मी शिकू शकलो नाही. कारण घरात माणसं खूप आहेत प्रत्येकाला कमवावाच लागतं. मग मी नापास मुलांवर करीत असलेल्या कामाची त्याला माहिती दिली त्याला त्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे असे मला लक्षात आले संस्थेजवळ रिक्षा आल्यावर त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हटलं तुला शाळा पाहावयाची आहे का? .. तो म्हणाला हो मला खूप आवडेल…. मग मी त्याला संस्थेत घेऊन आले प्रत्येक वर्गात त्याला फिरवलं त्याची थोडी माहिती मुलांना दिली आणि मुलांना म्हणाले बघा त्याची इच्छा असून त्याला शिकता येत नाही तुम्ही नापास झाला तरी तुम्हाला पालकाने पुन्हा शिकण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा मग तोही मुलांना म्हणाला… अरे खूप चांगले चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत आणि आई बाबा सुद्धा छान आहेत.. शिकल्यावर तुम्हाला चांगले काम मिळेल आणि तुमचे आयुष्य सुधारेल
….त्याच्या परी तो दोन वाक्य बोलून गेला चारही वर्गातून आल्यानंतर मी त्याला दारापर्यंत सोडायला गेले काही झालं तरी तो तरुण पोरगा होता त्याच्या मनामध्ये अशा अस्था निर्माण झाल्याच पाहिजेत त्याने मला मध्येच प्रश्नही विचारला तुम्ही याचा पगार घेता का? मी म्हणाले नाही एक रुपया सुद्धा घेत नाही त्याला त्याचे खूप आश्चर्य वाटले होते दारापर्यंत आल्यावर तो मुलगा मागे वळला आणि झटकन माझे दोन्ही हात हातात घेतले थोडासा झुकला आणि म्हणाला “आप महान पुरुष हो “…हे कुठेतरी बहुदा त्याने वाचलेले किंवा ऐकलेल वाक्य असावं मला खूप हसायला आलं तो प्रचंड भारावलेला होता मी म्हणलं नाही नाही महान स्त्री हू असं म्हण पाहिजे तर पुरुष नको रे त्यावर तो हसला …वही वही… आम्हाला कुठल्या एवढ्या चांगलं बोलता येते मॅडम तुम्ही मला एवढ्या प्रेमाने शाळा दाखवली लय छान वाटलं लई मोठं काम करता हो तुम्ही खरच मॅडम तुम्ही महान आहात!… मी म्हणलं नाही अरे प्रत्येकाने समाजासाठी असं थोडं काम करायलाच पाहिजे अगदी तू तुझ्या रिक्षात सुद्धा एखादा गरजू आजारी म्हातारा माणूस फुकट नेऊन सोडलास किंवा अडवाडवी न करता सोडलास तरीसुद्धा ते एक मोठं काम आहे हे लक्षात ठेव….! त्याने पुन्हा एकदा माझ्यासमोर कमरेपासून मान झुकवली आणि हसत हसत तो रिक्षा घेऊन निघून गेला……..!
मला वाटतं आपल्या तरुण मुलांना अशा कामाची ओळख करून देणे गरजेचे आहे तर त्यांच्यामध्ये आपण असं काम करावं अशी भावना निर्माण होईल त्यांच्यासमोर जो आदर्श असेल तो त्यांना नक्की भारावून टाकतो शाहरुख खान सलमान खान हे आज त्यांचे आदर्श झालेत तेही कदाचित खूप चांगलं काम करत असतील पण त्यापेक्षा ते जे पात्र साकारतात त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्या पात्राच्या आदर्श भूमिकेवर नसते आता तरुण मुलांचे हिरो बदलण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना चांगले काही दाखवणे आणि ऐकवणे गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला ही असेच वाटते ना?…. मग आपण एक छोटासा आदर्श त्यांच्यासमोर उभा करायला काय हरकत आहे….!
☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
स्व.अर्देशिर गोदरेज
गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी इंग्रजांशी पंगा घेतला. गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-
१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी गोदरेज समूह बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला.
सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने.
दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे.
पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.
मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’
जिद्द आणि आत्मविश्वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.
अशा तर्हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.
आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.
नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे.
संकलन – मिलिंद पंडित
कल्याण
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सोडायला शिका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एकदा मी देवपूजा करत होतो. पूजा करताना मी समईची ज्योत पेटविली.त्या ज्योतीला लावून अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातून निसटली. गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला.समई खाली कलंडताना तेलासकट देव्हाऱ्यातील हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावरायला जवळपास अर्धा तास गेला.
खाली पडणारी अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले.अगरबत्ती खाली पडली असती, तर विशेष असा काय फरक पडला असता!अगरबत्ती काही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती. आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ,तेल, हळदी,कुंकू, तांदूळ,तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती.
आपण आयुष्यातसुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो.क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात. त्यामुळे क्षुल्लक गोष्टी सोडून देणेच हितकारक.
मला रामराम केला नाही,
मला निमंत्रणच दिलं नाही,
स्टेजवर माझं नावच घेतलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत,
माझा फोन घेतला नाही,
मला बसायला खुर्चीच दिली नाही,
मला उधारी मागितली,
मला कोणी मदतच केली नाही, माझ्या पोस्टला लाईक केले नाही,
साडीच हलकी दिली..इ. इ.
किरकोळ बाबी,अहंकार सोडा आणि मग पहा….
निसटून चाललेल्या नात्यांमधे पुन्हा आपलेपणा येईल.
अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो.अहंकार लगेच सोडता येणार नाही, पण कठीणही नाही.आजच प्रयत्न सुरू करा.
किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा.
मतभेद पराकोटीचे,गंभीर स्वरुपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने, शांतपणाने मिटवा.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ नाती आणि विश्वास… भाग-२ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.) – इथून पुढे —-
अमक्यानं दारूच्या नादापायी बायकोला जन्म भर छळलं… बाहेरख्याली पणा केला.. तोच वारसा त्याचा मुलगा चालवत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. त्याची पुढची पिढी देखील हाच वारसा गिरवून आपले माणूसपण धोक्यात आणू शकतो.
समाजात वावरताना आपले कुटुंब, कुटुंबीय आपल्या पासून दूर नसावे.. काही कारणांमुळे कुटुंबापासून दूर जाऊन रहावे लागले तर नात्यांतील विश्वास अतिशय दृढ असावा.विश्वासाचे नाजूक बंध हे कौटुंबिक सौख्य जिवापाड जपतात.
नाती दिखावा निर्माण करणारी नसावीत. इतरांच्या मनाचा विचार करून जोपासलेली नाती तुमचे अस्तित्व जास्त प्रगल्भ ठरवतात.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी ,त्यांचे विचार , नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो ” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
जमाना बदललाय भाऊ असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या आपले रहाणीमान बदलले. चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.
सासुबाई नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये आल्या. मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता अशा पेहरावात आले. नातवंडे मुलांच्या इच्छेने वाढू लागली. वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे आणि वेळप्रसंगी आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.
मौज मजा, ऐषोराम, एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी उपयोगात आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली. गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली. शेतातल घर अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले. आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले. शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस आलेले उत्पन्न वाटून घेताना उगाचच कुरकुरली.
समाज पारावर देखील अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे. आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा आणि नात्यांमधील विश्वास.
बदलत्या जमान्यात माणूस ओळखायला शिकले पाहिजे हेच वारंवार कानी पडते. हा माणूस ओळखायच्या स्पर्धेत आपण मात्र कंपूगिरी करत आहोत. आपल्या उपयोगी पडणारा तो आपला. गरज सरो नी वैद्य मरो या उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे. बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत असले तरी आर्थिक विषमता हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.
भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीणी, पती, पत्नी,आई, वडील, गुरू जन, आप्तेष्ट या नात्यापेक्षा पैसा मोठा नाही याची जाणीव माणसाचं माणूस पण शाबूत ठेवते. आपण घेतलेले निर्णय,जपलेली नाती, कमावलेला विश्वास यांवर आपली यशस्वीथा अवलंबून आहे. दृष्टीआड सृष्टी अशी वागणूक नसावी.आपल्या माणसाचं आपली सृष्टी विश्वासानं बहरावी हा जीवन प्रवासाचा खरा हेतू आहे.
आपण सर्व जण ज्या मार्गाने जात आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले अवाजवी महत्त्व माणसाला एखाद्या वळणावर तो एकटा असल्याची जाणीव करून देत आहे.
माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा आग्रह करणारे आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात एकमेकांना धरून रहाते.
मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत सर्व जीवन प्रवास चालू आहे. संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी सद्य परिस्थिती आहे. नवीन पिढीला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर असणाऱ्या छप्पराचे , त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.
नव्या वाटेने चालताना जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा आपली माणसे आपल्या सोबत असावीत. नव्या जमान्यात वावरताना आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा इतके जरी आपण ठरवले तरी मला वाटत आपण माणसांना घेऊन, माणसासोबत अत्यंत विश्वासाने , कोणत्याही बाबतीत खोटेपणा न करता, आपल्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांची कदर करीत, आपण आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. आपण एखाद्या व्यक्तीशी नाते जोडताना कींवा जोडलेले नाते तोडताना आपण ते नाते विश्वासार्ह पद्धतीने निभावले आहे का याचा विचार केला आपला जीवन प्रवास नक्कीच यशस्वी ठरेल.
संशयास्पद वर्तन असणे यांत कोणताही पुरूषार्थ, मर्दुमकी, कींवा आत्मसन्मान नाही कींवा तेमाणूसकीच लक्षण देखील नाही. माणसाचं माणूस पण त्याच्या अस्तित्वात असावं आणि त्याचं अस्तित्व कुठल्याही असत्यावर आधारलेलं नसावं तरच नाती अबाधित रहातात आणि जीवन प्रवास सुखकर, समृद्ध आणि समाधानी होतो. माणूस श्रीमंत होतो आणि आमरण प्रवास करतो..होय.. या ह्रदयापासून ह्रदयापर्यत…!
क्लिनिकमध्ये एसी चालू होता तरी घाम फुटलेला कारण समोर डॉक्टर माझे टेस्ट रिपोर्ट तपासत होते.डॉक्टरांच्या म्हणजेच राजाकाकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत आणि गंभीर भाव.त्यामुळे धाकधूक वाढली.
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हेच खरं.आता काय ऐकायला लागणार?या विचारानं पोटात भीतीचा गोळा आला.
“तब्येतीकडे फार दुर्लक्ष केलंलं दिसतंय” राजाकाकांनी विचारलं.
“एनिथिंग सिरीयस”घाबरून विचारलं पण राजकाकांनी काहीच उत्तर दिलं नाही उलट चेहरा जास्तच गंभीर केला तेव्हा धाबं दणाणलं.माझा केविलवाणा चेहरा बघून राजाकाका हसायला लागले.
“अरे गंमत करतोय.उगीच टेन्शन घेऊ नकोस.रिपोर्ट नॉर्मल आहेत.बीपीचा त्रास सोडल्यास विशेष काही नाही. गोळी सुरु करावी लागेल.”
“तुमची रिअॅक्शन बघून हादरलो ना.”
“सॉरी!!”
“हुssssश!!सुटलो.सगळं व्यवस्थित आहे ऐकून जीव भांड्यात पडला.आता टेंशन नाही.या तब्येतीच्या नादात बरीच काम राहिलीत.थँक्यू सो मच!!”
“ओ मिस्टर,एकदम उड्या मारू नका.१०० % फिट नाहीयेस.कसाबसा काठावर वाचलायेस.आता लक्ष दिलं नाही तर नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
“म्हणजे”
“अजून चाळिशी गाठली नाहीस तरी ब्लडप्रेशरचा त्रास.हे चांगलं लक्षण नाही.पळापळ कमी कर.जरा जीवाला विश्रांती दे.लाईफ स्टाईल बदलावी लागेल.”
“मग ज्याच्या भरोशावर हे सगळे करतोस त्या शरीरासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलीय का?”
“समजलं नाही”
“बहुतेकजण स्वतःच्या तब्येतीसाठी काहीच करत नाही.स्वतःला गृहीत धरून मला काही होणार नाही.एकदम फिट आहे या भ्रमात राहतात आणि आजारी पडले की घाबरतात.एक गोष्ट कायम लक्षात ठेव अचानक कोणताही आजार होत नाही.आपलं शरीर वेळोवेळी सूचना देतं परंतु त्याकडं दुर्लक्ष केलं जातं.आवश्यक ती काळजी घेतली जात नाही आणि मग त्रास वाढल्यावर डॉक्टरांकडे जातो.तिथंही घाई असतेच.चटकन बरं व्हायचं असतं.”
“काका,मनातलं बोललात.मनकवडे आहात.”
“साधी गोष्ट आहे रे.तब्येत ठणठणीत तर सगळं चांगलं.नाहीतर काहीही उपयोग नाही.स्वतःच्या बाबतीत केला जाणारा बेफिकिरी हा फक्त तुझाच नाही तर अनेकांचा प्रॉब्लेम आहे.”
“खरंय,कामाच्या टेंशनमुळे खूप दिवस डिस्टर्ब आहे. शांत झोप नव्हती. जेवण जात नव्हतं.डोकं दुखायचं,अस्वस्थ होतो.
खाण्या- पिण्याचं काही ताळतंत्र नव्हतं.कामाच्या नादात त्रासाकडं लक्ष दिलं नाही.आता असह्य झालं तेव्हा तुमच्याकडे आलो.
“अजूनही वेळ गेलेली नाही.आजपासून आधी स्वतः मग फॅमिली आणि नंतर कंपनीचा विचार करायचा. दिवसातली ३० मिनिटं तरी व्यायाम करायचाच.खाण्यावर कंट्रोल ठेव.मी सांगतो तसं वागलास तर काहीही होणार नाही.”जिवलग मित्रासारखं राजकाकांनी समजावून सांगितलं.काकांशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटलं.
राजाकाका, वयाची सत्तरी पार केलेली तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, पूर्णपणे फिट, प्रसन्न आणि बिनधास्त डोळे झाकून विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व.आमचे फॅमिली डॉक्टर.आजोबा नंतर बाबा आता मी आमच्या तीन पिढ्या त्यांच्याकडून औषध घेतोय.राजाकाका म्हणजे कुटुंबाचाच भाग.आमच्याप्रमाणे अनेकांचे फॅमिली डॉक्टर होते.
आजच्या काळात अनेक डॉक्टर्स भरमसाठ फी घेतात,गरज नसताना वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात याची राजकाकांना प्रचंड चीड होती कारण काकांची डॉक्टरकी ही ओल्ड मेथड होती.पेशंटचं पूर्ण ऐकून त्याला हवा तेवढा वेळ देऊन त्रास समजून घ्यायचा.त्यावर आधी बिनखर्चाचे उपाय सुचवायचे आणि आवश्यकतेनुसार उपचार करायचे.नेमकी औषधं आणि काळजी घेतली तर पेशंट नक्की बरा होतो हा आजवरचा अनुभव.अगदीच आजार गंभीर असेल तरच आवश्यक तपासण्या करण्याचा सल्ला.पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर कोणतीही व्हिजिट फी न घेता स्वतःहून भेटायला जाणार.
त्याकाळच्या असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचं “राजाकाका” हे मूर्तिमंत प्रतीक.
सुमारे २५ वर्षापूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ सगळीकडे होते. त्यांच्याकडे जाताना अपॉटमेंट वैगरेची भानगड नव्हती. पैसे असले-नसले तरी उपचार व्हायचे. औषधं मिळायची. कधी गरज पडली तर एक्स्ट्रा चार्ज न घेता डॉक्टर घरीसुद्धा यायचे. कौटुंबिक समारंभात डॉक्टरांचा सहभाग हा ठरलेलाच. इतर अडी-अडचणींच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतं न राहता परस्परांशी प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं आणि माणुसकीचं नातं होतं.
—–
आजच्या स्पेशालीस्ट,सुपर स्पेशालीस्टच्या जमान्यात ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पना जवळपास संपली.हॉटेलसारख्या टापटीप,चकचकीत क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यात फक्त व्यवहार होतो.जेवढ्यास तेवढं बोलणं.आपुलकी वैगेरे काहीही राहिलं नाही.
“माणसापेक्षा पैसा मोठा झाला अन दवाखान्याचं दुकान झालं.” अशावेळी सगळ्यात मोठी उणीव भासतेय ती फॅमिली डॉक्टरांची.
☆ ‘एक मोठी रेष…‘ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री… सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले… अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?
मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल.
सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता… हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं.
त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं.
आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात.
सुनीताबाई तशा होत्या.
त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण ‘आहे मनोहर तरी’ प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं.
‘आहे मनोहर तरी’मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. ‘वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,’ या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा’च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर – कडवट नव्हे – भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या पुस्तकातली ‘आहे मनोहर तरी गमते उदास’मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती.
दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.
पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या – आणि खरं तर आजच्याही – स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं.
हे जगावेगळं होतं.
सुनीताबाईंनी आपल्या नवर्याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे – आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे – फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला.
पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी त्यांची संवेदनशक्ती… या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.
पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो.
न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार.
त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे!
बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.
लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे
संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘आयुष्यातील दु:खांना कोण जबाबदार आहे?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, “आता मी मंदिरात येणार नाही.”
यावर पुजाऱ्याने विचारले – “का?”
ती बाई म्हणाली, “मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते! काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि देखावा अधिक!”
यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, “ते बरोबर आहे! पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का?”
बाई म्हणाल्या, “ठीक आहे. तुम्ही मला सांगा, काय करावे?”
पुजारी म्हणाले, “एका ग्लासात काठोकाठ पाणी भरा. ते ग्लास हातात धरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये.”
बाई म्हणाल्या, “मी हे करू शकते!”
मग थोड्याच वेळात त्या बाईने तसे केले! त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने महिलेला 3 प्रश्न विचारले…
“१) तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?
२) तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?
३) तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?”
बाई म्हणाली, “नाही, मी काही पाहिले नाही!”
मग पुजारी म्हणाले, “जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये. म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.
आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.”
आपल्या आयुष्याचंही असंच आहे.
आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे? की तुम्ही स्वत:?
खरं तर देव नाही, गृह-नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाहीत, शेजारी नाहीत, सरकार नाही, तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात.
१) तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे.
२) तुमची पोटदुखी तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.
३) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.
४) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली चरबी आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.
५) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.
६) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.
वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत, ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता.
यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही.
जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी याला कारणीभूत आहे.
म्हणून योग्य निर्णय घ्यावा. योग्य गुरुच्या चरणात लीन व्हावे आणि त्यानुसार आपले आयुष्य निरोगी, सुखी समाधानी आणि समृद्ध बनवावे!
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आयुष्यात शिक्षण, संस्कार, प्राथमिक मुलभूत गरजा यांच्या सोबतीने आवश्यक असते ती म्हणजे आपण जोडलेली, निभावलेली नाती. ही नातीच आपला समाज असतो. या समाजाचं आपण काही ना काही देणं लागतो.
पैसा आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकीच नाती आणि जिवाभिवाची माणसं देखील महत्वाची आहेत. माणसाचं माणूस पण, माणुसकी जपणारी ही नातीच त्याचं समाजातील अस्तित्व ठरवतात.
अमली पदार्थ सेवन, व्याभिचार या वैयक्तिक बाबी आहेत. त्याचा अतिरेक किंवा लपवा छपवी नात्यात अत्यंत घातक असते. “जसा बाप तसा बेटा” ही म्हण कायमच चांगल्या अर्थाने वापरात यायला हवी.
आपल्या मुलानं तरी आपण केलेल्या चुका करून इतरांची मने दुखावू नयेत या करिता आपण आपली वागणूक, वर्तन, व्यवहार आदर्श वत असावा.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेनं या समाज व्यवस्थेला , कुटुंब व्यवस्थेला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
विश्वास हा दोघांचा दोघांवर, दोन्ही कडून तितकाच दृढ असायला हवा. नात्यात हा विश्वास पटवून देण्यासाठी कींवा संशयास्पद वातावरण निर्मिती साठी,नात्यात कटूता, संशय, सामंजस्य निर्माण होण्यासाठी,तिसऱ्या व्यक्तीची गरज लागावी यांसारखे दुर्दैव नाही. नात्यात पारदर्शकता असेल संशय, अविश्वास निर्माण होत नाही आणि जर झालाच तर तो वेळीच निराकरण होणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा नाते संपुष्टात येते. नात्यात बदली माणूस येऊ शकतो पण तो आपल्या माणसाची जागा घेईलच असं नाही. आपण आपल्या कुटुंबास जसे वागवतो तसेच आपली पुढची पिढी त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी वागणार आहे याचा विचार करून आपण आपले वागणे ठेवायला हवे.
“मी माझ्या माणसांचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी, आद्यकर्तव्य आहे…” हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं ..? घरातल्या स्री ला आधार द्यायचा की , आपल्या संशयास्पद वागणुकीचा भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं. ..!
पुरूषाला मैत्रीणी आणि स्त्रियांना विवाहोत्तर मित्र जरूर असावेत..पण त्यात दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असावी..! “मी सांगतो आहे तेच खरं आहे.. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव” असं सांगून जर आपण असत्याचा आधार घेतला तर आपण इतरांना नाही पण स्वतः ची मात्र अवश्य फसवणूक करतो.
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर खोटं बोलण्याची वेळ येते.. काही वेळा इतरांचे मन जपण्यासाठी ते आवश्यक देखील असते..पण या खोट्या ची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सवय होऊ नये हे पथ्य पाळायला हवे.
पती पत्नीच्या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेमापोटी नात्यातील एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व चुका माफ करत असेल,त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात होऊ नये याची काळजी दुसऱ्या व्यक्तीने घ्यायला हवी. आपले गृहस्थ जीवन जितके सुखी, आनंदी, समाधानी असेल,तितके आपण जीवनात यशस्वी होतो. आपल्या मनात येईल तसे वागणे, भरपूर पैसा कमावणे,आपली व्यसने जोपासणे, उच्च शिक्षण घेऊन विशिष्ट समाजात नाव लौकीक निर्माण करणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे.. “आपल्या मनातली माणूसकी इतरांच्या मनात अबाधित रहाणं” हे यशस्वी जगण्याचं खरं सूत्र आहे.
आई वडील जन्म भर पुरत नाहीत पण आईवडिलांनी केलेले संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला समर्पित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
आपल्या वडिलांच्या दुर्गुणांचा त्याग करून त्यांच्या मधील सद्गुणी वारसा उचलणे जास्त हितकारक असते.
“आपलं ठेवायचं झाकून.. अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून” ही मानसिकता बदलायला हवी. मैत्री च्या नात्यात तर (पारदर्शकता,) प्रेम आणि विश्वास हेच त्या नात्यांचे श्वाच्छोश्वास ठरतात. मैत्री त अशी काही गुपिते जिवापाड जपली जातात जी, जीव गेला तरी एकमेकांच्या ओठांवर येतं नाहीत.वेळप्रसंगी असे मित्र आपल्या कठीण काळात आपले आधार ठरतात. अशा मित्रांना कधीही विसरू नये. असा मित्र रागावला तरी तोच आपला खरा, सच्चा नातेवाईक असतो.कारण त्याचा राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतः ला करून घेतलेली शिक्षा असते. जिथे जिवापाड प्रेम असते.. नात्यात तिथेच राग ही असतोच.
मी मध्यंतरी वाचले होते,
“मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच*
परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर,कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून निव्वळ यासाठी तरी नाती जोडा नाती जपा….!!!”
माणसाच्या माघारी कोण त्यांच्या साठी किती रडला,कसा रडला यापेक्षा तो कसा जगला..कसा होता याच्या आठवणी माणसाला जास्त रडवतात.माणसाचं माणूसपण त्याच्या खरे पणाने सिद्ध होत.त्यानं नात्यात केलेल्या आर्थिक उलाढाली वर नाही. हिशोब कागदावर रहातो.पण नाती मनात कायम जिवंत रहातात.. अगदी कोणी कितीही दूर गेला तरी मनात जोडलेली नाती मनात कायम रहातात. कारण त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि निभावलेलं नातं यांवर त्याच, तिचं नातं अबाधित रहातं.
अतिशय सुंदर असा संदेश यातून दिला गेला. कुटुंबातील व्यक्ती हाच आपला एकमेव आधार आहे . “आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आपला वेळ द्यायला हवा” आपण हा सल्ला इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी विश्वास पात्र आहोत का..? “आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किती विश्वासात घेतो, किती वेळ देतो..?” तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.
☆ ‘नागपंचमी…‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेवाद्वितीय आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सर्व सण/उत्सव हे विज्ञानावर तरी आधारित आहे किंवा कर्तव्यावर. ‘कृतज्ञता’ हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. निव्वळ ‘सोहळा’ (इव्हेंट) साजरा करणे हा कोणत्याही सणांचा किंवा उत्सवाचा हेतू खचितच नाही. नागपंचमी सुद्धा त्यास अपवाद नाही. एकच चैतन्य सर्व प्राणीमात्रांत भरून राहिले आहे, यावर हिंदू धर्माचा नुसता विश्वास नाही तर तशी पक्की धारणा आहे. हिंदू धर्मियांनी ‘तसे’ आचरण करून दाखविले आहे, असे आपल्या लक्षात येईल. ही परंपरा खूप प्राचीन आहे. त्याकाळात दळणवळणाची, संपर्काची अल्पसाधने असतानाही तत्कालीन समाज व्यवस्थेने ही परंपरा रुजवली, सांभाळली आणि वृद्धिंगत केली. याबद्दल आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज मात्र ही हजारो / लाखो वर्षांची परंपरा कुठेतरी शीण होते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ब्रिटिशांना जे त्यांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते मात्र त्यांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीने सत्तर वर्षात करून दाखविले आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. एका अर्थाने आज हिंदू धर्म हा अप्रागतिक, बुरसटलेल्या विचारांचा आणि एकूणच मागासलेला आहे असा जो प्रचार सर्वच माध्यमांतून चालू आहे त्यास प्रत्युत्तर देणे हा या लेखनाचा हेतू निश्चित आहे, पण तो गौण आहे. या लेखाचा मूळ हेतू हा आहे की आपला हिंदू धर्म हा विश्वातील सर्व धर्मांमध्ये वैज्ञानिकता आणि कृतज्ञता याबाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि तसे आपण साभिमानाने जगास सांगितले पाहिजे. आज त्याची नितांत गरज आहे.
हिंदू धर्मात पशुपक्षांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. गायीवासरांसाठी ‘वसुबारस’, शेतीच्या कामास उपयुक्त ठरणाऱ्या बैलांसाठी ‘बैलपोळा’, मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कोकिळेसाठी ‘कोकिळाव्रत’ तर शेतीचे उंदरांपासून आणि इतर किटकांपासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी ‘नागपंचमी’, वनरक्षणासाठी ‘वटपौर्णिमा’, अशा प्रमुख सणांचा उल्लेख करता येईल. नागांचा इतिहास मनुष्याइतकाच पुरातन आहे असे म्हणता येईल. साक्षात देवाधिदेव महादेव यांनी नागाला आपल्या कंठी धारण केलेले आहे. कृष्णलीलांमध्ये कालिया मर्दन प्रसिद्ध आहे. त्यानंतर मंगलमूर्ती गणपतीच्या कमरेत नाग आहे, तर सर्व सृष्टीचे पालक भगवान विष्णू हे स्वतः शेषशायी निवास करतात. रामावतार आणि कृष्णवतारात स्वतः शेषनाग भगवंताचे एकदा ज्येष्ठ बंधू झाले तर एकदा कनिष्ठ बंधू झाले. नागास शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे राजे हे ‘नागराज’ असावेत. राजाचा मान केला की स्वाभाविकपणे तो आपसूकच प्रजाजनांचाही होतो. या दृष्टीने विचार करता नाग हा आपल्या संस्कृतीचा तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
नाग देवता आणि त्यांची प्रजा यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वडाच्या फांद्या तोडून पूजा करणे आणि नागोबाला पकडून त्याची पूजा करणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे आणि दोन्हीही त्याज्यच आहे. भले साप दूध पीत नसेल, नागाणे खात नसेल, पण त्यामागील मुख्य हेतू अथवा मर्म लक्षात न घेता मी त्यावर टीका करणार नाही, आपल्याच परंपरांची खिल्ली उडवणार नाही, असे आज प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. हा सण श्रावणात येतो. या महिन्यात हवा सारखी बदलत असते, पोटातील वैश्वानर थोडा मंद असतो, म्हणून भाजलेले कडधान्य, दूध, लाह्या इ. पदार्थ पचावयास हलके आणि पौष्टिक असतात. म्हणून ते नागाला वाहण्याची पद्धत असावी. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा नागास वाहिली जाते. त्यानिमित्ताने दुर्वा दारी राहतील असाही प्रयत्न असावा. कृषिप्रधान देशात कृषिला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व भूतमात्रांचे मनुष्याने ऋणी असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. पर्यावरण संतुलन करण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अर्थात नागदेवतेचा मोठा वाटा आहे. निसर्गात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. ही एक जीवनसाखळी आहे. यातील एक दुवा जरी निस्टला तरी पूर्ण साखळी तुटते. आज पर्यावरणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामागे या ‘साखळी’चा कमकुवतपणा कारणीभूत आहे. याबाबतीत आज ‘सर्पमित्र’ अतिशय जबाबदारीने कार्य करीत आहेत. आजच्या मंगलदिनी त्यांचेही कौतुक करायला हवे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करायला हवी. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर करण्यासाठी घरांमधून कापणे, चिरणे आदी आजच्या दिनी वर्ज्य केले जाते. शेतकरी आजच्या दिवशी जमीन नांगरत नाहीत, एकूणच शेतीच्या कामांना सुट्टी असते.
याबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात. विस्तार भयास्तव त्या इथे देत नाही. आपण सर्वांनी नागपंचमीचे महत्व समजून घेऊ आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सरपटणाऱ्या प्राण्यांची हत्या न करण्याचा संकल्प करू आणि खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करू.
ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते…
गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल
बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||
*
सावतामाळी तो मळ्यात राबता
मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||
*
नामदेव शिंपी शिवताना कपडे,
शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||
*
विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल
ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||
एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं. परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता!
त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच ‘अध्यात्म’!
मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले.
आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’
या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!
याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!