मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोनं -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

 (आपण गरीब आहोत, म्हणून समजूतदार कनक खर्चाच्या बाबी टाळायची……)

नववीत असताना मॅडमनी तिला ट्रीपला यायचा आग्रहच केला, “हे बघ, कनक. आतापर्यंत तू कधीच आली नाहीस ट्रीपला. हे शेवटचं वर्ष आहे ट्रीपचं. आईला सांग तुला पाठवायला.”

मग घरी जाऊन तिने आईची खूप मनधरणी केली. पण सुमा हट्टालाच पिटली होती.कनकही फुरंगटून बसली.

दुसऱ्या दिवशी शाळा थोडी लवकर सुटली. घरी येताना कनकला सुमा सोनाराच्या दुकानातून बाहेर पडताना दिसली. सुमाने डोक्यावरून, दोन्ही खांद्यावरून पदर घेतला होता. पण कनकने तिला ओळखलंच. दुकानातून बाहेर पडल्यावर सुमाने इकडेतिकडे पाहिलं आणि ती भराभर पावलं टाकत घराकडे वळली.

कनक घाबरली,’बापरे! आपल्या ट्रीपच्या पैशांसाठी आईने मंगळसूत्र तर गहाण ठेवलं नाही ना? उगीच हट्ट केला आपण. आता घरी जाऊन सांगूया तिला,’मी ट्रीपला जाणार नाही’ म्हणून.’

घरी आल्यावर तिने सांगून टाकलं, “आई, मी नाही जात ट्रीपला.” सुमाला एवढा आनंद झाला, की ती कारण विचारायलाही विसरली.

नववीनंतरच्या सुटीत मॅडमनी सगळ्या विद्यार्थ्यांना क्लासला जायला सांगितलं. आधी दहावीचा अभ्यासक्रम पुरा करणार. नंतर टेस्ट सिरीज.

पण सुमाने नकार दिला, “शाळेत शिकवणार नाहीयेत का? मग वेगळे पैसे भरून क्लास कशाला?”

कनक हटूनच बसली,”वाटल्यास मी एक वेळ जेवीन ;पण मला टेस्ट सिरीज करायच्याच आहेत. “

“काय करायचंय जास्त मार्क मिळवून? तुझी मावशी, आमची ताई एसएससीला पहिली आली होती शाळेतून. आता घरात बसून ‘रांधा, वाढा….’च करतेय ना?”

शेवटी शरद मध्ये पडला, “अगं, ती स्कॉलरशिप मिळवतेय ना!ते पैसे दे की तिला.तेही ओरबाडून घेतेस तू.”

“पण तिच्याचसाठी वापरते ना?”

“ते काही नाही. घालूया तिला क्लासला.”

मग नाइलाजाने सुमाने कनकला क्लासला घातलं. पण त्यामुळे किती ग्रॅम सोनं कमी झालं, या विचाराने ती वर्षभर कासावीस झाली होती.

एसएससीला कनक जिल्ह्यातून पहिली आली. स्कॉलरशिप, बक्षिसं सगळ्यांमधून कॉलेजच्या फीचे पैसे जमा झाले.

पुढे तिने उत्तम मार्कांनी पदवी मिळवली. एमबीए केलं. चांगली नोकरीही मिळाली.

पहिल्या पगारात तिने छान, आपल्या मापाचे, मनासारखे ड्रेस घेतले.

या खर्चामुळे सुमा थोडी नाराज झाली ; पण

जन्मभर वाढत्या अंगाचे कपडे घातलेली आपली लेक योग्य मापाच्या कपड्यांत किती सुंदर दिसते, हेही तिला जाणवलं.

कनकने खोटेच, पण कपड्यांना मॅचिंग कानातले, गळ्यातले व बांगड्या वगैरेही घेतल्या होत्या.

तिला सोन्याचे दागिने घालायला देऊया, असा विचार सुमाच्या मनात आला. पण लग्नात कोरेकरकरीत दागिनेच चांगले दिसतील आणि आता थोडेच तर दिवस राहिलेयत, म्हणून मग तिने तो विचार मनाआड केला. मावशी आता हयात असत्या तर त्यांनीही हेच सांगितलं असतं, या विचाराने तिला शांत वाटलं.

क्रमशः….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोनं -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(सुमाने विचारल्यावर, मावशीनी तिला, आपण मुलींसाठी सोनं कसं जमा केलं, ते सांगितलं ….)

“पण काका तुमच्याकडे अख्खा पगार द्यायचे ना? हे तर मला थोडेच पैसे देतात.”

“हरकत नाही. थोडे जास्त मागून घे. आणि खर्च कुठे कमी करता येईल, पैसे कुठे वाचवता येतील, ते बघ. वाटल्यास त्याला सोन्याचं सांगू नकोस. नाहीतर तो तुला नेमकेच पैसे द्यायला लागेल.”

सुमाने पैसे जमवायला सुरुवात केली. मग मावशीच तिला सोनाराकडे घेऊन गेल्या. सुमाने थोडं सोनं विकत घेतलं.

हळूहळू सोनं साठत गेलं, तसतसा  सुमाने एकेक दागिना बनवायला सुरुवात केली.

कनक हळूहळू मोठी होत होती. कपड्यांवरचा खर्च कमी करावा,म्हणून सुमा तिला मोठ्ठा फ्रॉक शिवायची. सुरुवातीला तो ढगळ वाटायचा. पण सात -आठ महिन्यांत बरोबर मापाचा व्हायचा. आणखी आठ-दहा महिन्यांनी तोकडा व्हायला लागला, तरी फॅशन म्हणून सुमा चालवून घ्यायची. एका वेळी फारफार तर तीन फ्रॉक असायचे कनकचे. मग वाढदिवसाला, दिवाळीला नवीन फ्रॉक न घेता, वाचलेल्या पैशाचं ती सोनं घ्यायची.

कनकला आंबे खूप आवडायचे. पण त्यात पैसे घालून ते तात्पुरतं सुख मिळवण्यापेक्षा आंब्याच्या रंगाचे दागिने घेतले, तर ते कायमचे आपल्याकडे राहतात, असा विचार करून सुमा आठवड्याला एक आंबा आणायची. त्यातल्या दोन लहान फोडी शरदला देऊन उरलेला आंबा कनकला द्यायची. स्वतः आंबा उष्टवायचीही नाही. या स्वार्थत्यागाची नशा आंबा खाल्ल्याच्या समाधानापेक्षा कितीतरी जास्त होती.

आपण कनकला मनसोक्त आंबे खायला देत नाही, म्हणून मध्येमध्ये सुमाला अपराधी वाटायचं. पण मग ती मनातल्या मनात म्हणायची,’हे बघ, बाबी.आता तुला कळत नाही. पण मोठी झाल्यावर तूच म्हणशील – आई, तू बरोबर केलंस. तुझ्यामुळेच मला सासरी प्रतिष्ठा मिळतेय.’

पुढे कनक शाळेत जायला लागली.

एकदा शेजारच्या घरातला वाढदिवस बघून तिलाही मोह झाला.

“आई, माझाही वाढदिवस करूया ना. माझ्या मैत्रिणींना बोलवूया.”

“नको गं बाई. उगीच नसता खर्च.”

मग कनक गप्पच बसली.

पोर तशी समंजस होती. आपल्या आईकडे जास्त पैसे नसतात, म्हणून ती फारशा मैत्रिणीही जोडायची नाही. उगीच कोणी वाढदिवसाला बोलवणार, त्यांना भेटवस्तू द्यावी लागणार वगैरे.

आपला अभ्यास ती मन लावून करायची. पहिला नंबर असायचा नेहमी. त्यामुळे स्कॉलरशिप मिळायची. पण त्याचंही रूपांतर सोन्यातच व्हायचं.

क्रमशः….

 पोर तशी समंजस होती. आपल्या आईकडे जास्त पैसे नसतात, म्हणून ती फारशा मैत्रिणीही जोडायची नाही

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत – भाग-पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नोकरी नसणारी मी कशातून निवृत्ती घेणार आहे असा प्रश्न पडला नं ! पण तुम्हीच विचार करा, नोकरी व्यतिरिक्तही आपण नात्यातील, समाजातील कितीतरी जणांची वैचारिक ताबेदारी करत असतो. 

‘My Life, My Rules’ हा फंडा उशिरा कळला. आणि साठी पूर्ण होतेय, तेंव्हा निवृत्तीचे विचार घोळायला लागले. कशा कशातून निवृत्ती बरं?—-

सगळ्यात पहिली निवृत्ती वैचारिक ताबेदारीतून. विचार मांडणारा कितीही महान असला तरीही त्याचा विचार मनाला रुचला, प्रकृतीला पचला, प्रवृत्तीला झेपला तर आणि तरच स्वीकारायचा. अन्यथा ‘Sorry Boss’ 

आपल्या आजूबाजूचे लोक, मीडिया ‘ह्या वयात अमुक खा, त्या वयात तमुक होतं’, असं सांगायला लागले, की मी माझ्या मनाला ‘Cancel, Cancel, Cancel’– ‘इदम् न मम’- ‘हे माझं नाही, माझ्यासाठी नाही’ असा संदेश ठळकपणे पाठवत रहाते. कितीतरी ८०-९० वर्षाची माणसं fit n fine असतातच की. मी त्यांच्याकडे बघते. 

बरेच जण आपला हेतू साध्य करण्यासाठी खोटी कारणं दाखवून emotional blackmail करतात. आता अशी माणसं ओळखू येऊ लागली आहेत. त्यांच्यापासून जरा लांब. दुसऱ्यासाठी निर्णय घेऊन स्वतःवर कलंक घेणं बंद. 

आपल्या कपड्यांवरून, sophisticated वागणुकीवरून कोणी जज करू लागलं तर समजावण्यात वेळ घालवत बसायचं नाही आणि आपले कपडे, वागणंही बदलायचंं नाही. ठसठशीत कुंकू आणि ५-१० तोळ्याचं मंगळसूत्र घालणारी बाई पतिव्रता असतेच असं नाही, हे कळण्याएवढा अनुभव आता नक्कीच गाठीशी आहे. 

पुर्वी कोणी नमस्कार केला तर सांगत असे, ‘ निव्वळ वयानी मोठी आहे म्हणुन वाकू नकोस, ज्या दिवशी ‘ नमस्कारासाठी मी योग्य आहे ‘ असं मनापासून पटेल त्या दिवशीच वाक ‘. कारण त्यातला फोलपणा आणि कधी कधी असलेला दांभिकपणा समजायला लागला होता. पण आता कोणी कशाही भावनेनी वाकलं तरी मनापासून शुभाशीर्वाद देते. वाकणाऱ्याची भावना काही का असेना, माझा ताबा माझ्या भावनेवर. ती स्वच्छ असली म्हणजे झालं.

लोकं नाही नाही ते आरोप करतात, मागे बोलतात, समोर येऊन विचारत नाहीत. अशावेळी पूर्वी स्वतः जाऊन स्पष्टीकरण देत असे. पण ‘ तुमचा खरेपणा अगर चांगुलपणा सिद्ध होण्यापेक्षाही लोकांचं स्वतःच्या मतावर जास्त प्रेम असतं. ते चुकीचं ठरणं त्यांना परवडणारं नसतं ‘, हे कळल्यावर, ‘ Don’t give explanation. Your friends don’t need it and others don’t believe it ‘ हे स्वानुभवाने तंतोतंत पटलं. 

मला गॉसिप कधीच करता आलं नाही. मागे जर काही बोललेच तर ते त्या त्या माणसाच्या समोर बोलू शकेन असंच असतं. त्यामुळे कोणी मला निरस समजतात, ‘ गॉसिप नाही तर काही मजा नाही. तू रिस्क घेत नाहीस ‘, असं म्हणतात. पूर्वी असं ऐकलं की चिडचिड व्हायची, वाईट वाटायचं. पण लवकरच त्यातली मजा कळायला लागली. कोणी चुकून जरी माझ्या नावावर काही बिलं फाडायचा प्रयत्न केला तरी त्याचा तोच तोंडघशी पडतो. 

पूर्वी गैरसमज पोसत बसलेल्या माणसाशी वाद घालायची, कधी त्या माणसाकडेच पाठ फिरवत असे, ग्रुपमधे असले तर ग्रुप सोडून देत असे. नंतर आपला राग थोडा शांत झाल्यावर सारासार विचार करून त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असे. आता माझं मत मांडते आणि बाजूला होते. कोणी समजून घ्यायला, चर्चा करायला आलं तर बोलते. मात्र कोणी गैरसमज करून घेतले, ओढवून घेतलं, तर चक्क ‘Carry on’ चा green signal देते. 

‘ मला एक से एक शिव्या येतात ‘ हे गर्वानी बोलणारे पुरुषच नव्हे तर स्त्रियाही बघितल्या, तेव्हा 

‘ तू पुस्तकी बोलतेस ‘ ह्या हिणवणाऱ्या वाक्याचं वैषम्य वाटणं बंद झालं. आता ठासून सांगते,

 ‘ तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या    कुबड्या घ्याव्या लागतात ‘. 

क्रमशः,,,,

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोनं -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(मुलगी झाली तर घरात घेणार नाही – सासूच्या या धमकीने हताश झालेली सुमा परसात बसून रडत असे ……)

अशीच एक दिवस रडत बसली असताना तिला शोधत शोधत शरद परसात आला.

“आलात तुम्ही? थांबा. चहा करते.”

“थांब, थांब. तुला एक चांगली बातमी सांगायची आहे.”

‘आपल्या आयुष्यात… आणि चांगली बातमी येणार!’ सुमाच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही.

“अगं, माझी बदली झालीय. थोडा पगारही वाढेल.”

“म्हणजे? तुम्ही मला सोडून जाणार? मी एकटीच राहू इकडे?”

“वेडी की काय तू! तुला घेऊनच जाणार मी.मावशीच्या शहरातच आहे माझं ऑफिस. मी तिला फोन करून कळवलं. ती म्हणाली, ‘सुरुवातीला माझ्याकडे उतरा. मी घर शोधून ठेवते. तुमचा संसार मांडून देते. मग तिथे राहायला जा.’ चालेल ना?”

सुमा काय बोलणार!मावशी म्हणजे तीन मुलींना सोन्याने मढवून त्यांची पाठवणी करणारी. म्हणजे आपण आगीतून उठून फोफाट्यात पडणार.

घरात कोणाला वाईट वाटण्याचा प्रश्नच नव्हता. ही चाललीयत, म्हटल्यावर सासूने थोडी भांडीकुंडी, धान्यं -कडधान्यं वगैरे दिली.

मावशींनी आनंदाने, मायेने त्यांचं स्वागत केलं. सुमाला अगदी भरून आलं. तिचे भरलेले डोळे बघून मावशींनी तिला जवळ घेतलं, “माहेरची आठवण झाली? अशा दिवसांत मन हळवं होतं, बाळा. तुला काही खावंसं वाटलं, तर सांग मला. मी करून देईन तुला.”

आणि नेमकी सुमाला मुलगीच झाली. हा सोन्याचा विषय तिच्या डोक्यात एवढा मुरला होता, की मुलीचं नाव तिने ‘कनक’ ठेवलं.

महिनाभर माहेरी राहून ती मुलीला घेऊन आपल्या घरी परतली.सासरचं कोणी ना बाळाला बघायला आलं, ना त्यांनी काही भेट पाठवली.

‘जाऊदे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे आपलं हक्काचं घर तर आहे आता. पण आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या लेकीवर यायला नको.’

मग एक दिवस धीर करून सुमाने मावशींकडे विषय काढला, “तुम्ही तीन मुलींना सोन्याने कसं काय मढवलं? तेही काकांच्या एकट्यांच्याच पगारात?”

“अगं, काही नाही. मोठी नंदा झाल्यापासून मी दर महिन्याला थोडंथोडं सोनं घ्यायला सुरुवात केली. हे अख्खा पगार माझ्या हातात ठेवायचे. मग मी शक्य तिथे काटकसर करायचे. वाचलेल्या पैशांचं सोनं घ्यायचे. मग मंदा झाली. पुढे चंदा. पण माझा नेम चालूच होता. कपड्याबिपड्यांवर पैसे उधळायचे नाही मी. पाठोपाठच्या मुली असल्यामुळे मोठीचे कपडे धाकटीला व्हायचे. असं करतकरत तिघींसाठीही भरपूर सोनं जमलं. मग लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमवायला सुरुवात केली.”

क्रमशः….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोनं -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सासरी झालेल्या थंड्या स्वागताचं कारण लग्नानंतर पाच-सहा दिवसांनी सुमाच्या लक्षात आलं. सासू आणि मोठ्या जावा घरातही दागदागिने घालून वावरत होत्या. गळ्यात जाडजूड मंगळसूत्राच्या जोडीला आणखी दोन-तीन सोन्याच्या माळा, हातात काचेच्या बांगड्यांबरोबर सोन्याच्या बांगडया, पाटल्या, दोन्ही हातांच्या बोटांत मिळून चार -पाच अंगठ्या, अंतराअंतरावर कान टोचून त्यात घातलेली सोने, मोती, हिऱ्याची कर्णफुलं…….

“माझ्या ताईला तीन- तीन मुली असूनही एकट्या भावोजींच्या पगारात तिने तिघींचीही सोन्याने मढवून पाठवणी केली. नाहीतर तू. लंकेची पार्वती….”सासू बोलतच राहिली.

सुमाचं माहेरही तसं खाऊनपिऊन  सुखी होतं. तीन भाऊ, त्यांच्या बायका, सगळ्यांची मिळून दहा मुलं. त्यातल्या पाच मुली. सगळे व्यवहार एकत्र. सख्खं-चुलत काही नाही. सगळ्या मुलींना पंधरा-पंधरा तोळे सोनं आणि लग्नाचा सारखाच खर्च.

“पंधरा तोळ्यात काय होतंय? माझ्या मोठ्या सुना बघ, किती सोनं घेऊन आल्यात, ते…..”सासू संधी मिळाली की सुरुवात करायची.

नवऱ्याला सांगितलं तर म्हणायचा,”जाऊदे गं. आईचा स्वभावच तसा आहे. तू लक्ष नको देऊस.”

सुमा अजूनच खट्टू व्हायची. ‘लग्न ठरवताना हे माहीत होतं ना.मग तेव्हा का होकार दिला? बघायची होती ना दुसरी मुलगी -सोन्याने मढवलेली.’

मग नंतर कधीतरी याचं उत्तर मिळालं. शरदचं शिक्षण कमी, म्हणून नोकरी साधी, पगारही कमी. त्यामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं.

घरात एखादा समारंभ असला, की सुमावर चहा – खाणं सोपवून तिला स्वयंपाकघरात डांबून ठेवलं जायचं.’हो. उगाच लोकांपुढे शोभा नको.’

यथावकाश सुमाला दिवस राहिले. मग सासूला आणखी एक मुद्दा मिळाला -“तुझ्या मोठ्या जावांना मुलगेच आहेत. तुझ्याकडूनही मला नातूच पाहिजे. मुलगी झाली, तर या घरात प्रवेश नाही.”

घरातली खालच्या दर्जाची कामं सुमाकडे होती. ते सगळं आवरून कधी वेळ मिळालाच, तर ती मागच्या परसातल्या टाकीवर बसून रडत राही.

‘आधीच सोनं आणलं नाही, म्हणून उद्धार चाललेला असतो. त्यात आणखी मुलगी झाली, तर बघायलाच नको. सासूबाई म्हणताहेत तसं खरंच घरात थारा  मिळणार नाही. आणि ‘परत आलेल्या’ मुलीला माहेरच्या घरातही प्रवेश नाही. देवा, काय करू मी? तूच मार्ग दाखव, रे बाबा. “

क्रमशः….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ५ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ५ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं– एवढ्यात नारायणीकडे लक्ष वेधत नहुषा म्हणाली, `काका अजूनही आपण आपल्या नारायणभाऊंना ओळखलं नाहीत?’ आता इथून पुढे)

नारायणीनं घुंघट काढून पदर खांद्यावर घेतला आणि माझ्या पायावर डोकं  ठेवून मला नमस्कार केला. मी तिचे हात धरून तिला उठवलं आणि दिवाणावर बसवलं. तिच्या डोळ्यातून जसा  अश्रूंचा महापूर उसळला. मी तिच्या या वागण्यामुळे चकितच झालो. माझ्या चेहर्‍यावरील हैराणी पाहून नारायणी सांगू लागली,

`काका, जन्म झाला स्त्रीच्या रुपात,  पण जगावं लागलं,  पुरुषाच्या रुपात. तीन धाकट्या बहिणी आणि मी मोठी. आई-वडलांच्या मृत्यूनंतर मी मुलगी म्हणून जगायचा प्रयत्न केला,  पण प्रत्येक वेळी वाटत गेलं, की कुत्र्यांच्या झुंडीत सापडलेलं मी एक हाडूक आहे. प्रत्येकाला ते हवय. जे काम मिळेल,  ते करणं गरजेचं होतं. मग दिवस असो, की रात्र. या दरम्यान एका दुर्घटनेची शिकार झाले. दुकानात काम करताना, रात्रीच्या वेळी एका लालची कुत्र्याने माझ्यावर झडप घातली. ते चौघे सेल्समन होते. त्यांना मी माझे भाऊ समजत होते. त्यानंतर सात दिवस मी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. वाटलं, आपण जहर खावं. बहिणींनाही द्यावं. पण तिघी बहिणींनी जागता पहारा ठेवला होता माझ्यावर. त्यानंतर आम्ही अहमदाबाद सोडून पुण्याला आलो. इथे आल्यावर मी पहिल्या दिवसापासूनच नारायणीचा नारायण बनलो आणि या तिघींचा नारायणभाऊ. काया आणि कंठ नशिबाने पुरुषी दिलाच होता. धीर आणि धीटपणा परिस्थितीने दिला. बहिणींनीही मला साथ दिली. त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्याच बरोबर त्या छोटी छोटी कामेही करू लागल्या. पुण्यात एका फॅशन डिझाईनरजवळ हेल्पर म्हणून मी काम सुरू केलं. पुढे मी नाईट कॉलेजमध्येही जाऊ लागले. माझ्या कामात नलिनी आणि नमिता आधीपासूनच होत्या. पुढे नहुषादेखील मदतीला आली.

पुढे तिघी बहिणींची लग्नं झाली. माझ्याबाबतीत मी आधीपासूनच ठरवलं होतं, की मी लग्नं करणार नाही. जगाच्या दृष्टीने तर मी पुरुषच होते. नलिनी आणि नमिता मला सतत विवाहाचा आग्रह करत,  पण माझा दृढ निश्चय पाहून त्यांनी मला विचारायचं सोडून दिलं. पण नहुषाने हार मानली नाही. तिने जिद्द धरली. तशीही आम्हा सगळ्या बहिणीत ती सगळ्यात जास्त जिद्दी आहे.  नलिनी आणि नमिताने तिला आतून सपोर्ट दिला. त्यामुळे मला माझा निश्चय बदलावा लागला. पुढचं सगळं आपल्याला माहीतच आहे. ‘

माझा अजूनही विश्वास बसत नव्हता, की नलिनी, नमिता आणि नहुषासाठी योग्य वराच्या शोधात माझ्या कार्यालयात वेळी-अवेळी फोन करणारे,  माझ्या वधु-वर संशोधनाच्या कार्यालयात येऊन अधिकारपूर्वक, रजिस्टरमधून नावं आणि पत्ते शोधणारे नारायणभाऊ आणि ही समोर उभी असलेली नारायणी या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. मी अतिशय प्रभावित झालो.

`काका, अगदी पहिल्यांदा मी आपल्याला नलिनीच्या संदर्भात भेटले होते, तेव्हा का कुणास ठाऊक, मला वाटलं, आपल्या रुपात मला माझे बाबाच भेटताहेत. आमचे बाबा दिसायलाही खूपसे आपल्यासारखेच होते. उंच, गोरे-गोरे, अगदी मिशासुद्धा आपल्यासारख्याच होत्या. माझ्या तिघी बहिणींच्या लग्नाच्या बाबतीत आपण जे सहकार्य दिलंत आणि मार्गदर्शन केलंत,  ते घरातील कुणी वडीलधारी व्यक्तीच करू शकते. या जगात सैतान खूप आहेत, पण माणसाचीही कमतरता नाही,  हे आपली भेट झाल्यानंतरच मला कळलं. पुढल्या महिन्याच्या बारा तारखेला विवाहाचा मुहूर्त काढलेला आहे. आर्यसमाजी पद्धतीने विवाह होईल. यावेळी मात्र आपल्याला उशीर करून चालणार नाही. कन्यादान आपल्यालाच करायचय. काकींना पण घेऊन या. तसंही नहुषा आपल्याकडे निमंत्रण पत्र घेऊन येईलच.’  इतकं बोलून हात जोडून नारायणी उठून उभी राहिली. नमिता आणि नहुषानेही तिचं अनुकरण केलं.

आम्ही नक्कीच येऊ बेटा,  तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलीचं कन्यादान करताना कुठल्या आई-बापाला अभिमान वाटणार नाही?’  मी बस, इतकंच बोलू शकलो. आणखीही खूप काही बोलावसं वाटत होतं,  पण घशात आवंढा दाटून आला. नारायणीला कसं कळणार,  की ज्यांना स्वत:चं काही आपत्य नाही, जो नि:संतान आहे,  मंगल प्रसंगी ज्याची उपस्थिती अवांछित मानली जाते,  त्या दंपतीसाठी कन्यादानाची संधी मिळणं, ही त्याच्यासाठी केवढी मोठी भेट आहे. नजराणाच जणू. विचार केला होता,  की इथून परतल्यावर पुन्हा आपल्या मॅरेज-ब्युरोच्या कार्यालयात जाऊन उशिरापर्यंर बसावं. पण पावलं भराभरा घराच्या दिशेने वळली. जितक्या लवकर जमेल,  तितक्या लवकर कौसल्येला हे कळवायला हवं, की आपल्याला एकाच वेळी चार-चार मुली मिळाल्या आहेत.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं – खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता. आता इथून पुढे )

`हो बेटा, नक्कीच येईन. वेळ तेवढी कळव.’

`अकरा वाजताचा मुहूर्त आहे, पण आपण साडे दहापूर्वी हजर राहायला हव!’ नहुषाचा आत्मीयतापूर्ण आग्रह बघून मी समारंभाला जायचं ठरवलं. गेलोही. पण खूप उशीर झाला होता. मी कार्यालयाच्या बाहेर पडणार,  एवढ्यात बाहेर गावचा एक परिवार कार्यालयात येऊन दाखल झाला. त्यांच्या दोन मुली होत्या. पोस्ट गरॅज्युएट. दिसायला सुंदर पण दोघी अपंग. जन्मापासून. कुणी तरी कार्यालयाचा पत्ता दिला आणि ते इथे पोचले होते. मुलीही बरोबर होत्या. मी टाळू शकलो नाही.

मी हॉलवर पोचलो, तेव्हा साखरपुड्याचा विधी संपून गेला होता. मला ओळखणारं तिथे कुणीच दिसलं नाही. एकदा वाटलं, आपण परत फिरावं. एवढ्यात नहुषानं मला बघितलं. पाहुण्यांमधून वाट काढत ती माझ्यपर्यंत पोचली.  चेहर्‍यावरून नाराजी स्पष्ट झळकत होती.

`मला माफ कर पोरी! इच्छा असूनही मी वेळेवर येऊ शकलो नाही! असं झालं की…’

`काही हरकत नाही काका. जे झालं ते झालं! या. मी पाहुण्यांशी आपली ओळख करून देते.

माझे डोळे आतुरतेने नारायणभाऊंचा शोध घेत होते. मी नहुषाला विचारलंसुद्धा, `नारायणभाऊ कुठे दिसत नाहीत?’

`हो. त्यांची पण भेट घालून देते, पण आधी पाहुण्यांना तर भेटा.’  एवढ्यात नलिनी आली. मी तिला खूप दिवसांनी बघत होतो. ती आल्याबरोबर नहुषाने `नलिनीआक्का ‘ म्हणून तिला हाक मारली नसती,  तर मी कदाचित् तिला ओळखलंही नसतं. मला पाहताच ती म्हणाली, `आजच्या समारंभात आमच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती होतात, पण तुम्हीच उशीर केलात. ठीक आहे. आलात ना! या. मी आपली पाहुण्यांशी ओळख करून देते.` आता नहुषाचा चार्ज नलिनीने आपल्याकडे घेतला. बहिणींमध्ये सगळ्यात मोठी असल्याने तिने उचललेली ही जबाबदारी माझ्या मनाला कुठे तरी स्पर्श करून गेली.

एकेक करत आठ-दहा पाहुण्यांशी तिने माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना `आमचे काका म्हणजे आमचे लोकल गार्डियनच, अशा स्वरुपात ओळख करून दिली जात होती. माझ्यासाठी `काका’ हे संबोधन ठीक होतं,  पण लोकल गार्डियन’ ऐकताना काहीसं असहज वाटत होतं. पण त्यावेळी गप्प राहण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. वास्तविक नारायणभाऊ असताना या बहिणींनी मला लोकल गार्डियन बनवण्याची काहीच गरज नव्हती. माझे डोळे सतत नारायणभाऊंचा शोध घेत होते. परिचयानंतर सगळ्यांसाठी फराळाचे पदार्थ आले. ही जबाबदारी नमिता आणि नहुषा मोठ्या कौशल्याने पार पाडत होत्या. थोड्या वेळात निरोप घेऊन गाड्यांमध्ये बसून पाहुणे निघून जाऊ लागले. त्यावेळीही नारायणभाऊ न दिसल्याने माझ्या मनात अनेक शंका घर करू लागल्या. मला वाटलं, की हा विवाह नारायणभाऊंना मान्य नसणार किंवा मग काही तरी कौटुंबिक कारण असणार, की ज्यामुळे ते या समारंभाला हजर राहू शकले नसणार. त्याचबरोबर असंही वाटून गेलं,  की या सगळ्या बायकांमध्ये परिवाराच्या वतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी ना कुणी पुरुष हवा,  म्हणून मला पुढे केले असणार.  मी तिथून निघण्याचा विचार करतच होतो,  एवढ्यात घुंघट घेतलेल्या एका मुलीला घेऊन तिघी बहिणी माझ्यापुढे हजर झाल्या. माझ्या लक्षात आलं, घुंघट काढलेली ती मुलगी नारायणीच असणार. तिने मला चरणस्पर्श केला. मी `शुभं भवतु’ म्हणत शंभर रुपयाची एक नोट तिच्या हातात दिली. नमिता आणि नहुषाबरोबर नारायणी परत गेली. नलिनी मागे माझ्याजवळ थांबली. आता नारायणभाऊचा विषय काढणं योग्य झालं नसतं. मी नलिनीचा निरोप घेतला, तेव्हा दबक्या आवाजात म्हणाली,

`काका, नारायणभाऊंना नाही भेटणार?’

मी चकित होऊन नलिनीकडे बघू लागलो.  दोन-तीन पाहुणे परत जाण्याच्या तयारीत, शेजारीच  उभे होते. नलिनीने डोळ्यांच्या इशार्‍यानेच मला `या’ म्हंटलं आणि रस्ता काढत ती पुढे निघाली. एका खोलीत प्रवेश करत ती म्हणाली, `काका, हे बघा नारायणभाऊ. आपण भेटा त्यांना.’ एवढं बोलून ती पुन्हा बाहेर उभ्या असलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी मागे वळली. मी खोलीत बघितलं. दोन खुच्र्यांवर नमिता आणि नहुषा बसल्या होत्या. दिवाणावर नारायणी बसली होती. तिला मी आत्ता आत्ताच बाहेर भेटलो होतो. एक खुर्ची रिकामी होती. तिच्यावर बसत मी विचार केला,  बहिणी बहिणींनी माझी थट्टा करण्याचं ठरवलेलं दिसतय.  मी खिन्न झालो. काय बोलावं, मला कळेचना. एवढ्यात नारायणीकडे लक्ष वेधत नहुषा म्हणाली, `काका अजूनही आपण आपल्या नारायणभाऊंना ओळखलं नाहीत?’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं– साड्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्‍या दिवशी पुन्हा गिर्‍हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्‍याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत आता इथून पुढे)

एका रात्री नारायणभाऊला तिथे काही विचित्र अनुभव आला. मग त्याने तिथली नोकरी सोडून दिली. त्यानंतरचे काही दिवस खूप वाईट गेले. घर चालवण्यासाठी नारायणभाऊने किती किती, काय काय केलं! आता हळू हळू आम्ही तिघी बहिणीदेखील छोटी छोटी काम करू लागलो होतो. नारायणभाऊने आम्हा बहिणींना आई-वडलांची कमतरता कधीच भासू दिली नाही. पण हे करताना त्याने स्वत:वर खूपच अन्याय केला. विवाहाची वेळ निघून गेली, की खूप कठीण होऊन जातं. आता नाही, तरी थोडं आणखी वय झालं,  की सगळं आयुष्य एकट्याने काढायचं म्हणजे घनदाट जंगलात एकट्याने रात्र काढण्यासारखं होऊन जातं.’

`एकट्याने का?  आपण तिघी तिघी बहिणी आहात की!’

`आम्ही आहोत खर्‍या, पण लग्नानंतर कोणतीही बहीण भावासाठी काय करू शकणार? त्यावर आणि पुन्हा आम्ही तिघी बिना आई-बापाच्या. मी निदान छोटीशी का होईना, नोकरी करते. नमिता आणि नलिनी तर पूर्णपणे हाउसवाईफ आहेत. दोघींची जॉर्इंट फॅमिली. बारा-चौदा लोकांचं कुटुंब. दोघींच्या घरात भांडी घासायलासुद्धा बाई नाही. सर्व कामं दोघींच्याच शिरावर. दिवसभर खपत असतात,  तरी घरातले लोक पैज लावून जसे त्यांना टोचायला तयार असतात. कारण का,  तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हुंडा मिळाला नाही. तरीही आम्ही लग्न ठरताना सुरुवातीलाच आमच्या आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना त्यांना दिली होती. नारायणभाऊच्या पासबुकात जे जमा असायचं, ते सगळं आम्हा बहिणींच्या राखी-दिवाळीत खर्च होऊन जायचं. किती तरी वर्षं असंच चाललय. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:बद्दल विचार करायलाच वेळ मिळाला नाही. आम्हा बहिणींच्या सासरी तो जेव्हा येतो,  तेव्हा काही ना काही घेऊन येतो आणि परत जाताना,  टोमण्यांमुळे चाळणी झालेलं मन,  अश्रूंनी भिजलेले डोळे आणि दु:खाच्या ढगांनी जड झालेलं काळीज घेऊन परत जातो.’

`आपल्या चुलत बहिणीच्या विवाहाला नारायणभाऊ येणार नाहीत?’ मी जसा काही लांबच लांब चाललेल्या ट्रॅजिडी सीनला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो.

`येणार का नाहीत? काही दिवसांसाठीच तो कलकत्त्याला गेलाय. फॅशन डिझाईनिंगचं ट्रेनिंग तिथे आहे. पण या विवाहात तो जास्त इन्व्हॉल्व होणार नाही…. आता आपल्यापासून काय लपवायचं काका! या विवाहाची सगळी जबाबादारी आम्ही तिघी बहिणींनी उचलायची ठरवलीय. नारायणभाऊ केवळ उपस्थित राहील. करणार काहीच नाही. पैशानेही नाही आणि कष्टानेही नाही. पैसे तर आम्ही आपल्यालाही खर्च करायला लावणार नाही, पण बाकी सगळ्याबाबतीत आपण असं समजा,  की आपल्या मुलीचंच लग्न आहे आणि तिच्या साखरपुड्यात आपण यायलाच हवं. येणार नं काका?’  खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं – `तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे, की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’ आता इथून पुढे )

खरं सांगायचं,  तर मला काही तरी वेगळंच सांगायचं होतं, पण सांगू शकलो नाही. मी आणि माझी पत्नी कौसल्या, आम्हा दोघांना असे काही अनुभव आले आहेत, की लग्न-बिग्न अशा समारंभाला जाणं आम्ही टाळू लागलोय.

`या वेळी मात्र असं चालणार नाही. आम्हा भावंडांच्यातलं हे शेवटंचं कार्य. आपल्याला केवळ साखरपुड्यालाच नाही, तर लग्नालासुद्धा यायचय आणि गरज पडली,  तर कन्यादानसुद्धा करायचय. आमचे पालक आता नाहीत. या परमुलखात आपल्याइतकं  जवळंचं आम्हाला दुसरं कुणीच नाही. नात्यामध्येसुद्धा आमची ही चुलत बहीण नारायणी आम्हा बहिणींच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे.’

`नारायणभाऊ तर आहेत ना! आपल्या तिघा बहिणींचं कन्यादान तर त्यांनीच केलय ना!’

`आपण तर लग्नाला आला नव्हतात, मग आपल्याला कसं कळलं?’

`अग मुली, डोळे-कान उघडे असले, की जगात काय चाललय, हे घरबसल्यासुद्धा कळू शकतं. मी भले आलो नाही, पण अनुमान तर बांधू शकतो नं? नारायणभाऊंनी तुम्हा तिघी बहिणींसाठी जे काही केलं, तसं आज-काल क्वचितच बघायला मिळतं.’

`होय काका,  नारायणभाऊ आमच्यासाठी भाऊच नाहीत,  आमच्या वडलांसारखेच आहेत ते आम्हाला. आमच्या घरी दरोडा पडला,  तेव्हा आम्ही अहमदाबादला राहत होतो. आमच्या आईला दरोडेखोरांनी सुरा भोसकून मारलं. बाबांचं डोकं कुर्‍हाडीच्या वाराने फुटलं होतं. दरोडेखोरांना विरोध करताना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. हॉस्पीटलमध्ये अनेक दिवस मरणाशी झुंज घेत शेवटी ते मरण पावले. दरोडेखोरांनी आम्हा चौघा भावंडांना एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. नंतर आम्हाला बाहेर काढलं गेलं,  तेव्हा आमचे आई-वडील काही आम्हाला दिसले नाहीत. सगळं घर रक्तरंजित झालं होतं,  जशी काही रक्तानेच होळी खेळलीय. मी आणि नमिताताई ते दृश्य बघून बेशुद्धच पडलो. नारायणभाऊ तेव्हा सहावीत शिकत होता. बाबांना खूप वाटायचं की शिकून-सवरून नारायणभाऊ मोठा माणूस बनेल. तो खूप हुशारही होता. पण सगळं राहून गेलं.

घरमालकांची बेकरी होती. त्यांनी नारायणभाऊला ब्रेड विकण्याचं काम दिलं. काही दिवसानंतर तो दुधाच्या पिशव्या टाकू लागला. नंतर वर्तमानपत्रही. सकाळची ही काम उरकल्यानंतर नारायणभाऊ दिवसभरात आणखीही काही काही कामं करू लागले. तथापि त्यांनी ब्रेड विकणं मात्र सोडलं नाही,  कारण बेकरीतून आम्हाला शिळा ब्रेड फुकट आणि भरपूर मिळत असे. काही दिवसानंतर त्याला एका लेडीज गारमेंट शॉपमध्ये सेल्समनची चांगली नोकरी मिळाली. पगारही चांगला मिळू लागला. आम्हा बहिणींचं शाळेत जाणं पुन्हा सुरू झालं. कधी कधी त्याला रात्रीही दुकानात थांबावं लागत असे. त्यांचा तयार कपड्यांबरोबरच साड्यांचाही मोठा विभाग होता. शहरातलं बहुतेक सगळ्यात मोठं दुकान त्यांचं होतं. दिवसभर गिर्‍हाहाईकांना उघडून दाखवलेल्या साड्यांचा ढीग लागलेला असायचा. त्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्‍या दिवशी पुन्हा गिर्‍हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्‍याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत.

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नारायणी नमोsस्तुते – भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

‘काही नवीन पत्ते आलेत?’

`होय बेटा, म्हणून तर तुला फोन केला.’

`मला मेसेज मिळाला, पण मी काल येऊ शकले नाही. माझी सासू आणि नणंद घरी आल्या आहेत. कोण आहेत हे…’

`बाकी सगळं तुम्हाला हवं तसंच आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, की ज्याबद्दल आपल्याला विचार करायला हवा. ‘

`त्यांचा पहिला विवाह झाला होता. म्हणाले, `डिलिव्हरीच्या वेळी बायको गेली. सहा वर्षाची मुलगी आहे.

`वय किती?’

`अठ्ठेचाळीस लिहीलं आहे.’

`स्वत: येऊन माहिती देऊन गेले, की दुसर्‍या कुणी तरी फॉर्म भरलाय?

‘`स्वत: आले होते.’

`कसे वाटले?’

`सावळे… थोडे मोठे. ‘

`मला स्वभावाबद्दल विचारायचं होतं. ‘

`पाच मिनिटाच्या बोलण्यावरून, कुणाबद्दल काय सांगणार? ‘

`नोकरी कुठे?’

एम.आय.डी.सी. मध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना आहे, तिथे सुपरवाईझर आहे.’

`फोन नं. दिलाय?’

`हो. हा घ्या.’

`ठीक आहे. मग सगळे डिटेल्स लिहून घेते.’  नहुषाने रजिस्टरमधून सगळे डिटेल्स लिहून घेतले. पुन्हा एकदा ती ते वाचू लागली. `अंकल,  डोडा आडनाव कुणाच्यात असतं?’

`मला तरी असं वाटतं, की ते तुम्हा लोकांच्यातच असतं.’

`कुणास ठाऊक, आज-काल आडनावावरून काही कळत नाही. फोटो दिलाय?’

`नाही. फोटो आणला नव्हता.’

`काही हरकत नाही. मी आपल्याला कळवीन. निघते… आज शाळेतून निघायलाही जरा उशीर झालाय. रस्त्यात काही खरेदी करायची होती. त्यातही थोडा वेळ गेला. सासू आता काय म्हणेल कुणास ठाऊक?’

नहुषा तिघी बहिणींमधली सगळ्यात धाकटी. लग्नाला दोन वर्षं झाली. गेल्या वर्षापासून आपल्या चुलत बहिणीला योग्य स्थळ मिळावं,  म्हणून इथे येते आहे. अनेकदा रजिस्टर बघितलय. साधारण नोकरी असलेलाही चालेल,  कारण बहीण फॅशन डिझाइनिंगमध्ये चांगले पैसे मिळवते. अडचण एकच आहे,  मुलीला अडतीसावं उलटून गेलय. एवढ्या वयाच्या मुलीला मुलगी म्हणणं म्हणजे `मुलगी’ या शब्दाची अप्रतिष्ठा करण्यासारखं आहे.

नहुषापेक्षा मोठी नमिता. दोघींमध्ये दोन वर्षांचं अंतर आहे, पण विवाहात मात्र सहा महिन्याचं. दोघींचे विवाह एकदम होऊ शकले असते, पण नहुषाचा विवाह जिथे ठरला, त्या लोकांची इच्छा होती, की विवाह चांगला थाटा-माटात व्हावा. त्यामुळे नमिताचा विवाह आधी घाईने केला गेला. नारायणभाऊ म्हणाले होते,  की नमिताचा विवाह निश्चित करण्यात नलिनीची हुशारी आणि भूमिका दोन्ही महत्वाचे होते. नलिनी तिघी बहिणींच्यात सगळ्यात मोठी. जेव्हा नारायणभाऊ नलिनीसाठी योग्य वर शोधायला माझ्या मॅरेज ब्युरोत आले,  तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय झाला. नलिनी तेव्हा अठ्ठावीस वर्षाची होती. नारायण भाऊंची काळजी मी समजू शकत होतो. त्यांना वाटत होतं,  कशाही प्रकारे का होईना,  नलिनीचा विवाह व्हावा. त्यामुळे बाकीच्या दोघींची लाईन क्लिअर होईल. त्यावेळी फारसा काही परिचय झाला नव्हता,  पण एवढंच कळलं होतं, नारायणभाऊंचाही अद्याप विवाह झालेला नाही.

दोन आठवड्यानंतर मला नहुषाच्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याचं निमंत्रण मिळालं. नहुषा स्वत:च निमंत्रण द्यायला आली होती. मी लगेचच `होय’ म्हणून टाकलं,  तेव्हा म्हणाली,  `काका आपल्याला नमिताताईच्या वेळी पण बोलावलं होतं आणि नलिनीआक्काच्या वेळेलाही. पण आपण एकदासुद्धा आला नाहीत. आपल्याला हे जाणून घ्यावसं नाही का वाटत,  की आपल्या मुलींचं घर वसवण्यासाठी आपल्या मॅरेज ब्युरोद्वारा आपण महत्वाची भूमिका बजावलीय,  त्या मुली आज कोणत्या परिस्थितीत आहेत?’

`तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे,  की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares