मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

ती सारंकाही  मनोमन ओळखून होती पण कुणाला थेट झिडकारता, तोडता येत नाही गरिबाला. अशावेळी त्या माणसांना न बोलून किंवा गोड बोलून दूर कसं ठेवायचं याचं बाळकडू तिला आईकडून मिळालेलं होतं.. तरीही लांडग्यांच्या जंगलात राहून त्यांच्या कळपापासून आपण किती काळ स्वतःला वाचवू शकू ? ह्या प्रश्नानं तिच्या काळजाचा थरकाप होत असे. भीतीने तिची झोप उडाली होती. मामा-मामींना सांगावा धाडावा, त्यांना सारं सांगावं आणि सोबतीला बोलवावं असे कितीतरी वेळा तिच्या मनात येऊन गेले होतं..पण त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या जीवांना उगाच कशाला ताप ? आणि हे सारे नित्याचेच झाले होते, ते तरी किती काळ आयुष्याला पुरणार ? असा विचार करून ती गप्प राहिली होती.

मामा-मामी सारखेच तिचे आई-वडीलही वयस्करच. तिने त्यांना कधीच, काहीच सांगितले नव्हतं. त्यांना जरा जरी कळलं असते तरी काळजी वाटून ते बिचारे सगळं सोडून धावत आले असते आणि तिला माहेरी घेऊन गेले असते. तिला त्यांना कुणालाच तापही द्यायचा नव्हता आणि स्वतःचं घर सोडून दुसरीकडं कुठं जायचंही नव्हतं. आपण गेलो आणि इकडे नवरा आला तर.. ? असाही विचार तिच्या मनात येत होता. ती नवऱ्याची वाट पहात, सारं काही देवाच्या हवाली सोडून देऊनही, मनातून घाबरत घाबरतच दिवस कंठत होती.

भांगलणीची पात  उरकून घरी परतायला रोजच्यासारखाच उशीर झाल्याने ती झपाझप चालत घरी येत होती. चांगलंच अंधारुन आलं होतं पण वाट पायाखालची होती त्यामुळे अदमास घेत चालायची गरज भासत नव्हती. चालता चालता, अचानक कुणीतरी वाटेत आडवे आल्याचं तिला जाणवल्यानं ती दचकली… थबकली… दोन पावलं मागे सरकली. ती मागे सरकताच आडवी येणारी व्यक्ती एक पाऊल पुढे आली… मग मात्र ती गडबडली, घाबरली.

“ कोन हाय ? वाटत कशापाय हूबाय ? सरा बाजूला..”

मनात दाटून आलेली भीति स्वरात डोकावू नये म्हणून तिने थोडे दरडावणीच्या सूरात म्हणाली.

समोरच्या व्यक्तीने तिच्या दरडावणीला भीक न घालता, काहीही न बोलता तिचा हात धरला . हात धरल्याने ती जास्तच घाबरली.

‘हात सोडा आदी..’ म्हणत ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तशी हातावरची पकड आणखी घट्ट होऊ लागली.

 “ कोन हायसा ती सांगाय काय हुतंय ?”

हात सोडवण्याची धडपड थांबवत ती म्हणाली. तिने सुटण्याची धडपड थांबवल्याने, ती तिची शरणागतता वाटून तिच्या हातावरची पकड सैलावली आणि याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखी, सारे बळ एकवटून  हाताला हिसडा देवून स्वतःचा हात सोडवून घेत ती जी पळत सुटली ते घरात आल्यावरच तिने सुटकेचा श्वास सोडला आणि पटकन घराचं दार लावले. अगदी आतून कडी लावून दार घट्ट लावले.  लावलेल्या दाराला पाठमोरे टेकत पायातले त्राण गेल्यासारखी ती खाली बसली आणि तिला रड़ू कोसळले. ती दैवाला आणि देवाला कोसत होती. तिला नवऱ्याचा आणि स्वत:चाही राग आला होता. ती तशीच बसून राहिली. ना तिला जेवावे वाटले ना तिला झोप आली.

रात्रीच्या प्रकारापासून ती मनोमन खूप घाबरली होती. आपण आपल्या गावातच नव्हे तर घरातही सुरक्षित नाही याची खात्रीच तिला वाटू लागली होती. नवऱ्याची आठवणही आली आणि असं एकटं टाकून गेल्याबद्दल प्रचंड रागही आला होता. तिला एकटे, एकाकी, हताश वाटू लागलं होतं. तिला सारं सोडून देऊन आईकडे जावं असं वाटू लागलं होते. आईच्या कुशीत शिरून रडावं असे वाटत होते.

तिला आईची, माहेरची आठवण आली तशी तिला गोदामावशी आठवली. गोदामावशींच्या अंगात शिवकळा म्हणजे देवीचं वारे यायचे. अंगात शिवकळा आल्यावर गोदामावशीला लोक  त्यांच्या अडचणी, समस्या सांगत, काही हरवले, पडले तर त्याबद्दल विचारत असत. गोदामावशीच्या तोंडून देवीच कारण, उपाय सांगत असते असा लोकांचा विश्वास होता.  लोक श्रद्धा ठेवून ते उपाय करत असत. देवीस्वरूप मानून तिच्या पाया पडत. गोदामावशी त्यांची देवी बनली होती, त्यांचं श्रद्धास्थान झाली होती हें तिने पाहिलं होतं, तिला ते चांगलंच ठाऊक होतं आणि चांगलं आठवतही होतं.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

मामा- मामी त्यांच्या गावी गेले आणि तिला घर सूनं सूनं वाटायला लागलं.. आई-वडिलांची आठवण येऊ लागली. माहेरी तरी घरात खूप माणसं कुठं होती ? आई-बाबा, धाकटा भाऊ आणि ती अशा  चौघेजणांचं चौकोनी कुटुंबच होते…पण तिला ते माहेरचं घर, घरात दुसरं कुणी नसतानाही कधी सूनं सूनं वाटले नव्हते. त्या घरात तिला कधी एकटेपणा जाणवला नव्हता.

लग्नानंतर काही दिवसातच ती सासरच्या घरात रुळूून गेली. त्या घराबद्दल मनात आपलेपणा निर्माण झाला. घराच्या कणाकणाशी एक नाते निर्माण झालं… माहेरच्या, आई-वडिलांच्या घरासारखीच त्या घराशीही तिची नाळ जुळली. घर झोपड़ी का असेना, तिच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत तिचा स्वतःचा असा निवारा होता आणि त्यात ती खूप खुश होती.

नवरीचा नवेपणा नऊ दिवसही नव्हता .  लगेचंच नवऱ्याबरोबर कामाला जायला सुरवात झाली. दोघांच्या राबत्या हातांनी काडी काडी जमवत ती आपले घरटे आकाराला आणत होती. साध्याशा झोपडीतही सुखाचं, स्वप्नांचं चांदणे पसरत होती, बरसत होती. लहानपणापासून कष्टणाऱ्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागले होते. स्वतःच्या घरट्यात स्वर्ग निर्माण करण्याचे डोहाळे.

गावच्या शिवारात मिळेल ते काम नवऱ्यासोबत जावून ती करत होतीच पण तिथे काम नसले तर शिवधडीच्या गावांच्या शिवारात काम करायला जाण्यासाठी नवऱ्याला विनवायची, तयार करायची. तो सुरुवातीला कुरकुरायचा पण ती त्याची समजूत घालायची. त्याला तितकासा कामाचा उरक नसला तरी तिला कामाचा उरक असल्यानं आणि तिचं कामही खूपच चांगले, नीटनेटकं असल्याने लोक त्यांना आवर्जून बोलवायला लागले. तिला त्याचा खूप आनंदही व्हायचा.

हळूहळू कधी सहज म्हणून तर कधी रानात भांगलणीला बोलावण्याच्या निमित्ताने तर कधी उसाचं पाचट काढ़ायच्या कामाला बोलवण्यासाठी कुणाकुणाचं घरी येेणं -जाणं वाढलं, तेही नेमकं नवरा घरात नसताना. कधी नवरा येईपर्यंत थांबून राहणं. काहीतरी विषय काढून बोलत राहणं.. ती घरातलें काम करत असताना न्याहाळत राहणं..  हे सुरुच असायचं. तिला हे सारे जाणवत होते, उमगत होते पण तिला काहीच बोलता यायचं नाही. ती मुकाट सारे सोसत राहायची . गरीबाची गरीबी हीच किंमत असते, तीच त्याची ओळख असते. कितीही अन्याय होत असला तरी त्याविरुद्ध बोलायला त्याला तोंड नसते हे तिला लहानपणापासून, अगदी कळायला लागल्यापासूनच ठाऊक होतं.

रानात कामाला गेले, भांगलणीला गेले की भांगलण करताना पातीमागे उभं राहून तर कधी पुढे उभं राहून पातीत तण राहिलंय काय हे पाहण्याचं निमित्त करून तिला न्याहाळत बसणारे, निरखणारे डोळे, कोणतंही काम करतेवेळी आणि एरवीही रोख़ून पाहणाऱ्या, अंगावरुन रेंगाळत फिरणाऱ्या, थबकणाऱ्या भुभुक्षित, लोचट नजरा कुठंही गेलं तरी असायच्याच. कधी काम करत असताना तर कधी काहीही कारण नसताना, काहीतरी कारण काढून सलगी करणारे, उगाचच जाता-येता स्पर्श करायला हपापलेले हातही होतेच.. तिला हे जाणवत होते.. राग ही येत होता पण गरीबाला ना रागावता येते ना चिडता येतं. ती सर्वांशी सारखेच अंतर राखून स्वत:ला सुरक्षित ठेवत होती. ती सारेच मुकाट सोसत होती. नाही म्हणलं तरी नवऱ्याच्या अस्तित्वाचं असणारं कवच अशा लोकांना काहीसा पायबंद घालून तिला काहीसं सुरक्षित ठेवत होतंच.

अक्षरशः डोळ्यांत प्राण आणून ती नवऱ्याची वाट पहात होती पण जावून खूप दिवस लोटले तरीही, न सांगता- सवरता गेलेला नवरा परतला नाही .दिसागणिक तिची अस्वस्थता वाढतच होती. तिला काय करावे काही सुचत नव्हते. जरासं  कुठं खुट्ट झालं की साऱ्या गावाला कळत असते.  कुणी काही तिच्यासमोर बोलत नसले, तिला विचारत नसले तरी तो घरात नाही आणि ती एकटीच आहे हे कळायला कितीसा वेळ लागणार ?  साऱ्या गावाला ते ठाऊक झालं होते.

तिला कामाला बोलावण्याच्या निमित्ताने घरी येणे,  ठाऊक नसल्यासारखं त्याची चौकशी करणं, तिच्या कामाची स्तुती करणं.. कधी आडून आडून तर कधी थेट तिची, तिच्या रूपाची स्तुती करणं असे प्रकार व्हायचे.. ‘अडनड असल्यावनं हाळी मार.. अनमान करू नगं.. आपुन काय परकं न्हाय..’ असे बोलून जवळीक दाखवायचा , तिच्याबद्दलची काळजी, आपलेपणा दाखवायचा प्रयत्न व्हायचा.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

ती लग्न होऊन या घरात येऊन तीन-चार महिनेच झाले होते आणि एके दिवशी रानात कामाला गेलेला तो रात्री घरी परत आलाच नाही. खूपच उशीर झाला तसं ती अस्वस्थ झाली. मनात नाना विचार येऊ लागले. तिला रडू येऊ लागलं. घरात ती एकटीच आणि गावातही तशी ती नवीनच होती. ‘काय करावं ?…’ तिला तर काहीच सुचेना. शेवटी न राहवून ती शेजारच्यांकडे गेली.

शेजारच्या म्हातारीने मायेनं तिला जवळ बसवून घेतलं. धीर देत राहिली. म्हातारीने घरातल्या बापयगड्याना त्याची चौकशी करायला, त्याला शोधायला गावात धाडलं. गावात कुठं त्याचा पत्ता लागला नाही. शेजार- पाजाऱ्यांना तरी तसं त्याच्याबद्दल फारसं काय माहीत असणार? लहानपणापासून तो मामाकडे असल्याने त्यांनाही तसा नवखाच होता आणि तसंही जाणाऱ्याची एक वाट असते आणि शोधणाऱ्याच्या दहा वाटा असतात. ते तरी त्याला कुठे कुठे शोधणार? तरीही त्यांनी शेजारधर्म पाळला होता. दोन दिवस त्याला शक्य तिथे, सगळीकडे शोधत होते.

पहिल्या दिवशी रात्रभर ती नुसती रडत होती. तिला समजवायला, सावरायला, सोबतीला शेजारची म्हातारी आली होती..पण कितीही झालं तरी शेजाऱ्यांनाही काही मर्यादा असतात. कुणीतरी त्याला शोधायला, चौकशी करायला म्हणून त्याच्या मामांकडे गेले होतं.  तो गायब झालाय हे कळताच मामा-मामी लगेच आले होते. ते आल्यावर तिला काहीसं हायसं वाटलं होतं, तरीही मनात शंका-कुशंकांच वावटळ भिरभिरत होतंच. अचानक मनात  संशयाच्या भुतानेही जन्म घेतला होता. त्याचं बाहेर कुठं काही असेल काय? ही शंका लाकडातल्या किड्यासारखी तिचं मन पोखरू लागली होती.  ती आपले मन कुणाजवळ मोकळं करणार ? मनातली शंका कुणाला विचारणार? कुणाशी बोलणार ? नाना विचार मनात येऊन ती अस्वस्थ होत होती. आतल्या आत सोसत होती, जळत होती.

दोन दिवसांनी रात्री उशीरा, तो जसा गेला होता तसाच परत आला होता. ‘ कुठं गेलावता?’ म्हणून विचारलं तर त्यानं ‘असंच फिरत फिरत गेलोतो..’ असे सांगितले होते. मामांना त्याचे असे वागणे माहीत होते. त्यांनी पुढं फारसा विषय वाढवला नाही. मामा- मामीं दोघांनीही त्याला खूप समजावून सांगितले. तिलाही काळजी घ्यायला सांगितली. दोन दिवस राहून ते निघून गेले .

काही काळाने पुन्हा तो तसाच गेला तेव्हा मात्र तिने फारसे कुणाला सांगितलेच नाही. ‘ मामा-मामींना तरी या वयात कशाला उगाच त्रास द्यायचा ? ’ असा विचार करून त्यांनाही कळवले नाही. अस्वस्थतेत दिवस आणि रात्री काढल्या. स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत- खडत त्याच्या येण्याची वाट पाहिली. चार दिवसांनी त्याचा तो आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला होता. ती त्याला खूप बोलली, त्याच्याशी भांडलीही होती. त्याच्यावाचून तिची होणारी अवस्था तिने त्याला सांगितलीही होती पण आपलं सारं बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी आहे हे तिलाही जाणवलं होते, ठाऊक झाले होते.

आता तो पुन्हा कुठंतरी गेला होता. तिला त्याचं असे वागणे, अचानक जाणे ठाऊक झालं होतं तरीही तिने त्याची वाट पाहिली. महिना होत आला तरी तो परतला नाही तशी ती जास्तच अस्वस्थ झाली. मनात एकटेपणाच्या भीतीनं घर केलेलं होतंच. तिला खूप असुरक्षितही वाटू लागलं होतं. आधीचं बाईपण, त्यात तारूण्य आणि देवाने दिलेले सौंदर्य. जाता येता खाऊ की गिळू करणाऱ्या लोचट नजरांनी जीव नकोसा व्हायचा पण मोलमजुरी केल्याशिवाय दोन वेळची भाकर मिळणार नाही अशी श्रीमंती. रोज कुणा ना कुणाचं वावर पूजायला जायला लागायचंच..

गरीबाला सौंदर्य हा शापच असतो..  कळत्या वयापासूनच तिला हा शाप भोगावा लागत होता. आईबापाची पांघर होती पण तिला गरीबीची ठिगळं होती. तरीही ती पांघर खुपच बरी असं वाटण्यासारखी सासरची अवस्था होती. लग्न होऊन ती नांदायला आली ते गवताने शाकारलेल्या, पांढऱ्या मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या झोपड़ीवजा घरात.. सासरी घरात ना कोणी मोठं होते ना धाकटं. आई-बापामागे मामानं सांभाळ करून मोठा केलेला नवरा आणि ती.. झाले कुटुंब. लहानपणापासून सांभाळलेल्या आपल्या भाच्याचं लग्न करून देवून त्याच्या गावी त्याचा संसार थाटून दिला आणि लगेचच मामा-मामी स्वतःच्या गावाला गेले.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी 

नेहमीप्रमाणे कोंबड्याच्या पहिल्या आरवण्याला तिला जाग आली. नवरा ढाराढूर घोरत पडला होता. तिने काही त्याला उठवलं नाही. पटापट स्वतःचं सारं आवरलं आणि चुलीवर चहा ठेवून भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि त्याला हाक मारली. दोन तीन हाका मारल्या तेव्हा तो उठला. दारातल्या रांजणातून डिचकीभर पाणी घेऊन तोंड धुतलं आणि चुलीपाशी येवून बसला.तिने वैलावरचा चहा उतरून पुढयातली कपबशी भरली आणि त्याच्यापुढे ठेवत त्याला म्हणाली,

“ येरवाळीच पाळकातल्या सदानानाकडं कोळपाय जायाचं हाय… ध्येनात हाय न्हवं ?”

“ व्हय. हाय की ध्येनात. “

“ आवरा बिगीबिगी. तंवर भाकरी बांदून द्येत्ये.” तो आवरुन भाकरी घेऊन सदानानाकडे कोळपायला निघुन गेला. तिने स्वतःचे सारं आवरलं. आपली भाकरी बांधून घेतली आणि घराचे दार लावलं. बाहेरच्या बाजूला दिवळीत ठेवलेले खुरपं घेवून, भांगलायला उशीर होऊ नये म्हणून ती लगबगीनं निघून गेली.

घरी येईपर्यन्त दिवेलागण झाली होती. तो परत आल्याचं काहीच चिन्ह दिसेना. तिला आश्चर्य वाटलं. ‘ कोणीतरी भेटलं असेल, बसलं असतील बाण्या हाणत ..’ असा विचार करून तिने हातपाय धुवून चूल पेटवली. चहाचं भुगूनं चुलीवर ठेवलं आणि ती घरातली इकडची-तिकडची आवराआवर करायला लागली. चहाला चांगली उकळी आल्यावर चुलीजवळ बसून चांगला कपभर चहा प्याल्यावर तिला जरा बरं वाटलं. चांगली तरतरी आल्यासारखी वाटली. ‘आता ईतीलच ही..कुटंसं ऱ्हायल्यात कुणास ठावं ? आतापातूर याला पायजेल हुतं .’ असे मनोमन म्हणत ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

भाकरी झाल्या, कालवण झालं तरी त्याचा पत्ताच नव्हता. तो अजून आला कसा नाही ? या विचाराने ती मनोमन अस्वस्थ झाली. काय करावं ते तिला सुचेना. एकदा वाटलं सदानानाकडं जावून चौकशी करून यावं… पण एवढ्या रात्रीचं एवढ्या लांब पाळकात जाणे शक्य नव्हते. ती त्याची वाट पहात बसून राहिली.

मनात नाना विचार येत होते. काळजी वाटत होती. दिवसभरच्या कामानं अंग आंबून गेलेलं होते. दोन घास खाऊन केव्हा एकदा पाठ भुईला टेकतोय असे तिला झालेलं होते पण तिला काही खावंसं वाटेना. सारा स्वयंपाक तसाच होता. ती दाराकडे नजर लावून विचार करत, काळजी करत भिंतीला टेकून बसून राहिली होती.

तिला बसल्या जागीच बऱ्याच वेळाने कधीतरी डोळा लागला होता. जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटलं होते. तो परत आलेलाच नव्हता. ‘ मागल्यावानी कूटंतरी ग्येलं नसतीली न्हवं ? ‘ तिच्या मनात आलं आणि तिला रडूच आलं .

मनाला कसंबसं सावरत तिने पटकन स्वतःचं आवरलं. कुणाकडे जावून अशी चौकशी करणे तिला बरे वाटत नव्हतं पण दूसरा पर्याय नव्हता. ती झपाझप चालत पाळकात सदानानाकडं गेली. सदानानांनी जे सांगितले ते ऐकून तिने डोक्यावर हातंच मारून घेतला. तिचा नवरा सदानानांनी बोलावूनही आणि तिने सांगूनही सदानानाकडं कोळपायला गेलाच नव्हता.

तिच्या मनातली भीती खरी ठरली होती. तिचा नवरा पुन्हा एकदा तिला एकटीला सोडून कुठेतरी गेला होता, परागंदा झाला होता. तिला ते जाणवले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या कुवतीनुसार शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे तिलाही चांगलंच ठावूक होते.

पहिल्यापासून तसा तो चंचलच होता. एके ठिकाणी फार काळ रमायचाच नाही. आपण कुठं जातोय? कशासाठी जातोय? हे घरात कुणालातरी सांगावं, आपल्यामागे कुणीतरी आपली काळजी करत बसतील हे कधीच त्याच्या गावीही नव्हतं. कापलेल्या पतंगासारखा तो कुठंतरी भरकटायचा. निदान लग्न झाल्यावर तरी त्याच्या वागण्यात सुधारणा व्हायला हवी होती, जबाबदारीची जाणिव यायला हवी होती पण तसं काहीच घडलं नव्हतं.

तो कितीतरी वेळा असाच अचानक, न सांगता-सवरता कुठंतरी गेला होता आणि कधी दोन-चार दिवसांनी, कधी आठ-दहा दिवसांनी आला होता. एकदा तर चक्क महिन्याभराने आपला आपण परत आला होता. तिने प्रत्येकवेळी त्याला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला होता. तो ही समजून घ्यायचा, ‘चूक झाली..’ असे म्हणायचा. ‘ पुन्हा कधी असे जाणार नाही..’ असे आश्वासन द्यायचा.. पण ते तेवढ्यापुरतंच असायचं.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

(आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.) इथून पुढे —- 

सीमा बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला गेली आहे हे बघून सुषमानं विचारलं,

” काकू, तुम्ही सीमाचं लग्न करणार नाही वाटतं?”

या अनपेक्षीत प्रश्नानं  आई  गोंधळून गेली. 

“का ग, तुझं ठरलंय वाटतं.” 

“हो तर. . . 

मग ती किल्ली दिल्यासारखी बोलायला लागली. . . .  स्वतः चं लग्न ठरलं हे सांगण्याची ही कुठली अनोखी पद्धत!! कदाचित संकोच वाटला असेल. . . . पण हे काहीतरी भलतंच. . . आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीला तिनं ही गोड बातमी सांगू नये याचं आईला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक विषाद दोघींच्या मनात भरून राहिला.

दिवस थांबत नाहीत. सीमाचं ही लग्न झालं. पाठची  भावंडं, आई-वडील, मध्यम वर्गीय परिस्थिती हा सगळा विचार करून सीमा नोकरी, मुलं, सासू सासरे, यात  गुरफटत गेली. नोकरीत वरिष्ठ पदावर गेली. लाघवी स्वभावामुळं माईंची; सासुबाईंची, मदत मिळवली. सासऱ्यांची कौतुकाची थाप होतीच. सुधीरचं प्रेम साथीला होतंच. पण . . एक सल रुतत होता, सतत टोचत होता.अशातच एक दिवस आईचा फोन आला. तिला रमाकाकूंकडून समजलं होतं. सुषमा कोल्हापुरात परत आली होती. विजयची सरकारी नोकरी. तो चांगला एवन ऑफिसर होता. त्याची तीन चार वर्षांनी बदली होत असे. सुषमाला वाटे एकाच गावात राहिलो तर आपली चांगली करिअर होईल. तिनं विजय बरोबर बदलीच्या गावी जाण्यास नकार दिला. पियूला, लेकीला घेऊन ती परत आली. एका खाजगी शाळेत काम करु लागली.

सीमा धावतच गेली सुषमाला भेटायला. रमाकाकू काळजीत होत्या.

 “सीमा, बाई, तू समजाव ग तिला. बघ तुझं तरी ऐकते का. सोन्यासारखा संसार करायचा सोडून कसलं हे करिअरचं खुळ डोक्यात धरलंय.”

 छे ! ऐकेल तर सुषमा कसली ! तिच्या उत्तरानं उलट सीमा मोडून गेली. 

“तुला मुळी महत्त्वाकांक्षाच नाही.” या वाक्यानं आपली मैत्रीण हरवल्याची खंत घेऊन सीमा तिथून बाहेर पडली होती. पुढं सीमा कधीच विजय सोबत राहिली नाही. तोच बिचारा अधेमधे येत असे रजा काढून. दोन दिवस राहून पियूला भेटून जात असे. नंतर नंतर पियू आजीकडं म्हणजे रमाकाकूंकडंच राहू लागली. आपल्या मामीत आईला शोधू लागली. सुषमाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र पियूनं पूर्ण केलं. चांगले मार्क्स मिळवून तिनं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

रमाकाकूंच्या घरी पोहचेपर्यंत सीमाच्या डोळ्यासमोरून हा सगळा जीवनपट तरंगत गेला. 

काकू तिची वाटच बघत असाव्यात. सीमाला बघताच त्यांनी डोळ्याला पदर लावला.

“काय झालं काकू? असा त्रास कशाला करुन घेताय?”

“मग काय करु? तूच सांग. ही मूर्ख मुलगी, स्वतः च्या हातानंच धोंडा पाडून घेतला बघ या बयेनं.”

“काकू, सुषा कुठंय?”

“जाऊ दे, जाऊ दे तिला कुठंतरी.” 

“मला समजलं नाही काकू. असं झालंय तरी काय?”

“अगं विजयराव येऊन गेले परवा. राहिले होते आठवडाभर. हिला म्हणत होते, चल आता, सगळे मिळून राहू. काही दिवसांनी पियूचं लग्न होईल. चल ग माझ्याबरोबर.”

“मग? काय म्हणाली सुषमा?”, उत्तर माहिती असूनही सीमानं विचारलं.

“कुठलं काय. ही काही ऐकत नाही जावईबापूंचं.”

“पियूनं नाही का समजावलं?”

“नाही कसं. तिलाही वाटतच ना गं ,आपण आपल्या आईबाबांबरोबर आपल्या घरात राहावं.”

“पियूसाठीसुध्दा तयार नाही झाली ती?”

“कसलं काय. शेवटी कडाक्याचं भांडण झालं दोघांत.”

“भांडण? बापरे!”

पियूनं तर निक्षून सांगितलं तिला, ‘आई तू नाही आलीस तरी मी आपल्या घरीच जाणार.’

” आता तरी ऐकेल म्हणावं तर ते ही नाही.”

पियूच्या अल्टिमेटमला बधली नाही ही. सीमा विचार करत होती.

” काकू आहे कुठय ती? बाहेर गेलीय का?”

“कायमची बाहेर गेली म्हण.”

“काय?”

“अग मी मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी सुध्दा भांडली बघ. मला म्हणाली,

‘एवढी जड झाले असेन तुम्हाला तर वेगळं घर करून राहीन मी एकटीच.’

मी गप्पच बसले मग.

दोन दिवसांनी खरंच सगळं सामान घेऊन गेली. कुठंतरी गगनगंगा अपार्टमेंट आहे बाराव्या गल्लीत, तिथं फ्लॅट घेतलाय म्हणे. . . ”  थोडं थांबून त्या म्हणाल्या, ” पियू गळ्यात पडून रड रड रडली आणि गेली तिच्या बाबांच्या बरोबर.”

सुन्न होऊन सीमा काकूंकडं बघत बसली. 

‘ तुला मुळी कसली महत्त्वाकांक्षाच नाही ‘,असं म्हणणारी सुषमा ! हुषारी, जिद्द याबरोबरच थोडासा विवेक किती गरजेचा आहे. स्वातंत्र्य मिळवून सुखी झाली– की आनंद गमावून दु:खी झाली? आपल्याला सापडलेलं समाधान तिच्यावर एवढं का बरं रुसलं?–

फुलेवाडीच्या बसमध्ये बसून घरी परतताना सीमा अस्वस्थ होती—– 

समाप्त.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सीमा लगबगीनं बसस्टॉपवर आली. आज नेहमीची  फुलेवाडीची बस सोडून ती  शिवाजी विद्यापीठाच्या बसमध्ये चढली. सीमाला आज रमाकाकूंना भेटायला जायचं होतं. गेले काही दिवस त्या फोन करून तिला ‘येऊन जा ग’, म्हणून बोलवत होत्या. आज शनिवार असल्यानं तिला हाफ डे होता. सकाळी घरातून निघतानाच तिनं सुधीरला आणि माईंना तसं सांगितलं होतं. घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालणार होता आज. चिनू , तिची मुलगी, माईंना दत्ताच्या देवळात सोडेल संध्याकाळी आणि ती जीमला जाईल. सुधीर ऑफीस झाल्यावर घरी जाता जाता त्यांना पिकअप करेल, असं सगळं ठरवूनच सीमा सकाळी  घरातून बाहेर पडली होती. अर्थातच ती रमाकाकूंना निवांत वेळ देऊ शकणार होती. आजची संध्याकाळ रमाकाकूंसाठी !! 

रमाकाकूंच्या सोबत राहण्याची सीमाची ही काही पहिलीच वेळ नव्हती. रमाकाकूंचं काय काम असावं बरं? खिडकीतून बाहेर बघत ती विचार करत होती. रमाकाकूंची सुषमा तिची शाळेपासूनची मैत्रीण. रमाकाकू आणि सीमाची आई दोघीही पद्माराजे हायस्कूलला शिक्षिका. सुषमा आणि ती त्याच शाळेत,  एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत. त्यांच्या मैत्रीचं सगळ्यांना खूप नवल वाटे. अभ्यासाची आवड सोडली तर बाकी काहीच साम्य नव्हतं दोघीत. सीमा उंच, काळी सावळी, सुषमा गिड्डी, गोरीगोबरी. सुषमाचा बॉयकट,सीमा जाडजूड केसांच्या दोन लांब शेपट्या घाले. सुषमा वक्तृत्व, निबंध स्पर्धेत माहीर, तर सीमा चित्रकला, पेंटिंग, क्राफ्ट यात रमणारी. पण मैत्रीला कुठले नियम नसतात. त्या दोघींचे मेतकूट चांगलेच जमत असे. अगदी सुट्टीच्या दिवशीही त्या एकत्र असत. दहावी नंतर दोघींनी सायन्स साईड घेतली. न्यू कॉलेजचे ते अभ्यासाचे दिवस सीमाच्या डोळ्यासमोर आले. खूप अभ्यास करूनही मेडिकलला ऍडमिशन मिळण्यासारखे मार्क दोघींनाही मिळाले नव्हते. 

सीमानं आपली सीमा ओळखून न्यू कॉलेज मध्येच एफ्.वाय.बी.एस्सीला ऍडमिशन घेतली. सुषमा शेवटपर्यंत कोणत्यातरी मेडिकल कॉलेजमध्ये मिळेल प्रवेश, निदान बी. ए. एम्. एस.तरी,  अशा आशेत वाट बघत राहिली. तेव्हाही रमाकाकू सीमाला सुषमाची समजूत काढायला सांगत. ती मात्र ऐकत नसे कोणाचंच. नाईलाजानं सुषमानं ऑगस्ट एन्ड ला एफ्. वाय. जॉईन केलं. जून ते ऑगस्ट, तीन महिन्यांत झालेला सगळा अभ्यास सीमानं आनंदानं समजावून सांगितला. गेले तीन महिने सुषमाशिवाय वर्गात बसणं तिला फारच कंटाळवाणं वाटत होतं. आता पुन्हा एकदा मैत्रीचं फुलपाखरू हसू लागलं होतं. अभ्यास, स्पर्धा, प्रॅक्टिकल्स, स्टडीटूर्स यात पाच वर्षे हातात हात घालून पळाली. एम्. एस्सीच्या कॉन्व्होकेशन नंतर दोघींच्या घरच्यांनी त्यांची डिग्री आणि मैत्री दोन्ही सेलिब्रेट केलं. किती आनंदात होती सीमा ! पण हा आनंद काही काळच टिकला.

सीमाला गावातील एका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नोकरी मिळाली. तशी ती बॅंकेच्या परीक्षा देत होती. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षाही द्यायच्या होत्या. तोपर्यंत रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून ही नोकरी धरली तिनं. मनातील ही दोलायमान स्थिती सुषमाला सांगायची होती. कॉलेज नसल्याने दोघींची भेट होत नव्हती. सुषमा मोबाईल ही उचलत नव्हती. बरेच दिवस तिचा पत्ताच नव्हता. तो मैत्री संपवणारा दिवस सीमा कधीच विसरू शकत नाही. आजच्या  सारखीच  शनिवारची संध्याकाळ होती. सीमा तिच्या आईबरोबर गप्पा मारत बसली होती. अचानक सुषमा आली. सीमाची कळी खुलली. 

“सीमा, चल ना गं,  रंकाळ्यावर  जाऊ. किती दिवस झाले भेळ खाल्ली नाही आपण.”

सीमानं आईकडं पाहिलं. ” या गं जाऊन. मनसोक्त भेळ खा. गप्पाही मारा पोटभर.” आई म्हणाली.

सीमा पटकन आवरायला पळाली. घरी परत यायला थोडा उशीर झाला. पण आज छान वाटत होतं. सुषमा भेटली एवढ्यावरच ती खूष होती.

रात्री झोपताना आईनं तिला विचारलं,” काय गं? सुषमाचा नवरा काय करतो? तारीख ठरली का लग्नाची?”

“लग्न? आणि सुषमाचं? नाही. मला काही बोलली नाही ती? तुला फोन आला होता का तिच्या आईचा?”

“नाही गं. फोन कुठं? सुषमाच म्हणाली तू आवरायला गेली होतीस तेव्हा.”

आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला. 

क्रमशः….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडेही भुईसपाट झाली. आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्या सारखी उदास होऊन गेलेली लेकुरवाळी केळ..! तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!)

हे जे काही घडलं त्यात बेकायदेशीर काहीच नव्हतं.तरीही स्वतःचं हक्काचं काहीतरी कुणी  हिसकावून घ्यावं तसं माझं मन उदास,अधू होऊन गेलं. त्या अधू मनाचा ‘कार्पेट एरिया’ या उदास मनस्थितीत थोडा आक्रसत चाललाय हे जाणवत होतं!

अर्थात याला इलाज नव्हता.काळ हेच याच्यावरचं औषध होतं..!

त्या औषधानेच आक्रसून गेलेलं मन पुन्हा प्रसरण पावलं. आपली स्वतःची सदनिकासुद्धा अशाच भुईसपाट केलेल्या फळा- फुलांच्या झाडांवरच उभी आहे याची जाणीव होताच ते प्रसरण पावलेलं मन उदासवाणं का होईना थोडसं हसलंसुद्धा..!

त्या परसदारी मग सिमेंटची झाडं रोवली गेली. कामं आपापल्या वेगाने सुरू झाली आणि आपला वेग वाढवत राहिली. निसर्गाशी नातं तोडणाऱ्या भिंती उंची वाढवत उभ्या राहू लागल्या.अगदी डेरेदार वृक्षांपेक्षाही उंच वाढू लागल्या.

एक दिवस देवाची पूजा झाल्यानंतर जाणवलं की एरवी पूर्वेकडच्या खिडकीतून आत येऊन थेट माझ्या देवघरातल्या देवांचे पाय धुणारा कोवळा सूर्यकिरण आज आलाच नव्हता.पलिकडे उभ्या राहिलेल्या भिंतीवर धडकून तो जायबंदी होऊन तिथेच पडलेला होता !

त्यादिवशी साग्रसंगीत पूजा होऊनही मनातले देव मात्र असे पारोसेच राहिले होते. अस्वस्थ मनातली ही मरगळ मग स्वतःच कंटाळून कधीतरी खालमानेने निघून गेली..!

माझ्या सदनिकेतला अवकाश अंधारला तरी मन कुठेतरी उजेड,हुरुप,उत्साह शोधत राहिलं.जमेल तसं हळूहळू फुलत राहिलं. मागचं सगळं विसरून गेलं.

पण ते हिरमुसणं जसं तात्कालिक होतं तसं ते विसरूणंही क्षणभंगुरच ठरलं. गंमत म्हणजे ते विसरणं क्षणभंगुर ठरवायला निमित्त झालं एका माकडाचंच..!

त्या सकाळी आमच्या पूर्वेकडच्या कंपाऊंडच्या रुंद भिंतीवर ते माकड बसलेलं होतं. सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात होतं.वाट चुकल्यासारखं केविलवाणं दिसत होतं. त्याच्या अस्वस्थ येरझारा माझ्यावर गारूड करीत होत्या. ट्रॅक्टरखाली पिल्लू चिरडून मेल्याने वेडीपिशी झालेली माकडीण आणि नुकताच सर्वांचे चावे घेऊन हैदोस घालत अखेर जेरबंद झालेलं ते माकड या सर्वांच्यातलाच एक समान धागा माझ्या नजरेसमोर अधिक ठळक केला तो लहानपणी बिरबलाच्या गोष्टीत भेटलेल्या, आपल्या पिलाला पाण्याने भरलेल्या पिंपात पायाखाली घेऊन ठार मारून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या माकडीणीने ! तिच्या त्या कृतीतून हुशार बिरबलाने भला स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून त्यातच धन्यता मानली असेल, पण क्रूर आप्पलपोट्या माणसांच्या जंगलात एकट्या पिल्लाला मागे ठेवण्यापेक्षा काळजावर दगड ठेवून त्याचाच बळी घेणार्‍या त्या माकडीणीचं अपत्यप्रेम निश्चितच निर्विवाद होतं हे या माकडाच्या अस्वस्थ येरझारा मला आग्रहाने सांगत होत्या.

मला त्या माकडाची मनापासून कींव वाटली. पण त्याच्यात गुंतून पडायला मला वेळ नव्हता. ब्रश करून मी आत आलो. तोंड धुवून चहा घेतला. पेपर वाचला. आंघोळीला जाण्यापूर्वी पूजेला कुंड्यातल्या झाडांची फुलं आणायला मी टेरेसवर गेलो. फुलं काढली.परत फिरताना सहज माझी नजर खाली गेली. वाट चुकलेलं ते माकड अद्यापही खाली तिथेच  होतं. रस्त्यापलीकडे एकटक रोखून पहात केविलवाण्या नजरेने ते काहीतरी सांगू पहात होतं. रस्त्यालगतच्या घराच्या उंच छपरावर माकडांचा एक कळप बसलेला होता. कळपातल्या सर्व माकडांच्या आशाळभूत नजरा या माकडावरच खिळलेल्या होत्या!

कित्येक दिवसांपूर्वी मनात ठाण मांडून धुमाकूळ घालणाऱ्या माकडामुळे आधीच हळवं झालेलं माझं मन अंतर्बाह्य शहारलं..!

माकडांच्या नि:शब्द अशा त्या हालचालींमध्ये एक आर्त दडून बसलेलं माझ्या लक्षात आलं..!

आंब्याचा मोहोर यायच्या या दिवसात माकडांचा एक कळप दरवर्षी परसातल्या त्या आम्रवृक्षावर मुक्कामाला यायचा. आंब्याचा मोहोर खुडून मेजवानी झोडायचा. तृप्त होऊन त्या आम्रवृक्षाचा कृतज्ञतेने निरोप घेऊन जायचा.

आज.. तोच कळप नेहमीच्याच वाटेने इथवर आला होता. त्याच कळपातलं ते माकड वाट शोधत नेमकं इथं आलं होतं. म्हणजे त्यांची वाट चुकलेलीच नव्हती. सुगंधी मोहराने फुललेलं ते शोधत होते ते आंब्याचं झाड मात्र माझ्या सोनचाफ्याच्या झाडासारखंच हरवलेलं होतं !

ही माकडं वाट चुकलेली नव्हती तर स्वतःच्या तथाकथित सुखासाठी सगळ्यांच्याच सुखाचा आंबेमोहोर आतयायीपणाने ओरबाडून घेणारा आणि निसर्गाने मोठ्या विश्वासाने दिलेलं तेजोमय बुद्धिमत्तेचं कोलीत हातात येताच  उन्मत्तपणाने थैमान घालंत सारा निसर्गच जाळत सुटलेला माणूसच  खरंतर वाट चुकला होता..!

माणसाच्या रूपातलं हे ‘वाट चुकलेलं माकड’ अंशरूपाने कां होईना माझ्यातही अस्तित्वात आहे याची जाणीव मला सैरभैर करतेय. स्वतःच्या उत्कर्षाच्या सगळ्याच वाटांना पारखा होत चाललेला प्रत्येक माणूसही आज त्यामुळेच  अस्वस्थ आहे !

माणसाच्या रूपातल्या या वाट चुकलेल्या माकडाला जेरबंद कसं करायचं या विवंचनेत माझ्या मनातला निसर्ग मात्र दिवसेंदिवस सुकत चालला आहे..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता. कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!)

ते एक स्वप्नच होतं. त्याला तसा नेमका अर्थ कुठून असायला? मनी वसत होतं तेच अशी सलग साखळी बनून स्वप्नी दिसलं होतं एवढंच. पण हे एवढंच होतं तर मग पहाट झाली, पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला नेहमीसारखी जाग आली तेव्हा पक्ष्यांचा तो किलबिलाट मला पूर्ण जाग येण्यापूर्वीच्या क्षणभर स्वप्नातल्या त्या चित्कारासारखा कां वाटला होता ते मला तेव्हा तरी नीट उमगलं नव्हतं. पण काहीही असो पूर्ण जागा झाल्यावर याच किलबिलाटाने मी माणसात आलो. अर्धवट,अस्वस्थ झोपेमुळे आलेला थकवा पक्ष्यांचा तो आवाज ऐकून कुठल्याकुठे विरून गेला. एखाद्या गोड आवाजातल्या आर्जवी भूपाळीच्या शांत सुरांसारखी ती किलबिल माझ्या मनाला हळूवार पणानं कुरवाळत होती.

खूsप बरं वाटलं.

मनातलं माकड (बहुधा) निघून गेलं. दुसऱ्या रात्री त्यामुळेच मला शांत झोप लागली. मग रोज रात्री लागू लागली. ठरल्यासारखी पक्ष्यांची किलबिल ऐकून त्या झोपेतून पहाटेची जागसुद्धा तशीच नेमानं येत राहिली.

पण खूप दिवस उलटले आणि हा नित्यनेम चुकला. पुन्हा एक ओरखडा उठला.

विस्मरणात गेलेलं ते ‘पक्ष्यांचं’ झाड अचानक स्वप्नात जसंच्या तसं पुन्हा जसं लख्ख दिसलं होतं तसंच मनातून निघून गेलंय असं वाटणारं ते वाट चुकलेलं माकड पुन्हा आपलं डोकं वर काढणार याची मात्र तेव्हा मला कल्पना आलेली नव्हती.

आमच्या अपार्टमेंटच्या पूर्वेकडील कंपाऊंडच्या पलीकडे एका जुन्या वाड्याचं प्रशस्त परसदार होतं. त्या परसातल्या हिरव्या सोयऱ्यांबरोबर गुजगोष्टी करणाऱ्या पक्ष्यांची किलबिल आम्हाला रोज पहाटे हळुवार आग्रहानं जागवत होती..! पहाटे उठून स्वयंपाकघरातली पूर्वेकडची खिडकी उघडली की अलगद आत येणार्‍या वार्‍याच्या झुळूका त्याच परसातल्या सोनचाफ्याच्या सुगंधाने माखलेल्या असायच्या.ते साधं खिडकी उघडणंही इतकं सुगंधी आणि सुखकारक असायचं की कांही क्षणानंतर तो सुगंध विरून गेला तरीही ताज्या टवटवीत झालेल्या आमच्या मनात तो सोनचाफ्याच्या अत्तराचा फाया दिवसभर खोचलेला असायचा.

श्वासांइतकीच त्या सुखाचीही गरज निर्माण झालेल्या आम्हाला एका सकाळी खूप उशिरा जाग आली. अगदी उन्हं वर आल्यानंतर.पक्ष्यांची किलबिल ऐकूच न येण्याइतकी गाढ झोप लागलीच कशी याचं आश्‍चर्य करीत अंथरूण सोडलं. सवयीप्रमाणे स्वयंपाकघराची खिडकी उघडली आणि कांहीतरी चुकल्यासारखं मन सैरभैर झालं. काय चुकलं ते समजलंच नाही क्षणभर. मग लक्षात आलं, खिडकीतून आत येणारी गार वाऱ्याची झुळुक आज रोजच्यासारखी नाचत बागडत आलेली नव्हती. सोनचाफ्याचा सुगंध नसल्याने ती हिरमुसली होती !

झरकन् वळून दार उघडून पाहिलं तर परस ओकंबोकं दिसत होतं. परसातली सदाफुली, मोगरा, शेवंती, अबोली, कोरांटी, पारिजातक, लिंब सगळेच सगळेच निघून गेलेले. दुर्वांचा तजेलदार हिरवाकंच कोपराही हरवला होता.जाईजुईचे वेल निराधार अवस्थेत अदृश्य झाले होते. तिथं ही अशी बारीकसारीक झाडंझुडपं तर नव्हतीच पण आमचा सहृदय होऊन राहिलेला सोनचाफाही कुठे दिसत नव्हता.

नाही म्हणायला तोडायला अवघड असलेली दोन ताडमाड वाढलेली नारळाची झाडं, आंब्याचा एक डेरेदार वृक्ष आणि घरच्या कुणी म्हाताऱ्या बाईने हट्टच केल्यामुळे अद्याप जमीन घट्ट धरून थरथरणारी नुकतीच व्यालेली लेकुरवाळी केळ एवढं मात्र अजून सुरक्षित होतं.

मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडंही भुईसपाट झाली.

आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्यासारखी उदास होऊन गेलेली ती लेकुरवाळी केळ. तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

गेल्या कांही दिवसांपासून अनेकांचे चावे घेऊन शहरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ माकडाला जेरबंद करण्यात आज प्रशासनाला अखेर यश आलं. आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाट चुकलेल्या या माकडाने गेले आठ दिवस अक्षरशः हैदोस घातलेला होता. झाडांशी फटकून वागत ते माणसांत घुसलं होतं.

प्रथम मुलींच्या शाळेच्या एका खिडकीत बसून ते बिचारं कुतूहलाने आत बघत होतं. आतल्या पोरीबाळीना वाटलं ते आपलेच चेहरे टुकूटुकू निरखतंय. मुली किंचाळू लागल्या तसं ते बिथरलं. काय करावं ते न सुचून त्याने खिडकीतून वर्गाच्या आत उडी मारली. धावपळ पळापळ सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला.इथे तिथे पळत शेवटी शाळेच्या गेटवरून त्याने बाहेर उडी मारली, ती नेमकी पाच-सहा पोरांच्या एका घोळक्यावर पडली. मुलींची शाळा सुटायची वाट पहात कोपर्‍यावर उभ्या असलेल्या, टिंगल-टवाळी करणाऱ्या टोळभैरवांचा तो घोळका होता.त्या पोरांइतकंच ते माकडही भांबावलं. त्यातल्या दोघा-तिघांचे चावे घेऊन ते जीव वाचवायला समोरच्या धान्य-आळीत  घुसलं. तिथे अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या एका गलेलठ्ठ व्यापाऱ्याला चावलं. मग वाट फुटेल तिकडं बिचारं धावत सुटलं. समोरच्या रस्त्यावरचं पोलीस मुख्यालय, मध्यवर्ती चौकातल्या सरकारी कचेऱ्या सारं पालथं घालून, प्रत्येक ठिकाणी वाटेत येईल त्याचे जावे घेत अखेर त्याने आपला मोर्चा जवळच असलेल्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे वळवला तेव्हा मात्र ‘प्रशासन’ खडबडून जागं झालं.

त्या माकडाने जर युद्ध पातळीवरचे प्रशासनाचे प्रयत्न हाणून पाडले असते तर मात्र त्याची खैर नव्हती.

ते मेलेच असते.

गेल्याच वर्षी एका माकडीणीने असाच सर्वांचा थरकाप उडवलेला होता.ती रस्त्याकडेच्या झाडावर एरवी शांत बसून असायची. पण ट्रक-ट्रॅक्टर सारखी अवजड वाहनं त्या रस्त्यावरून निघाली की झाडावरून ती झेप घ्यायची ते थेट त्या वाहनाच्या चालकावरच. त्याचं नरडं आवळत ती त्याचे चावे घेत सुटायची. वाहनावरचा आपला ताबा सावरत स्वतःची कशीबशी सुटका करून घेईपर्यंत असे कित्येक वाहनचालक घायाळ झालेले होते.या सगळ्या घटनाक्रमाची मालिका ज्यात ओवली गेलेली होती तो धागा अतिशय नाजूक,हळवा होता..! त्या माकडीणीचं पिल्लू रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरखाली चिरडून मेलेलं होतं. अवजड वाहन खडखडाट करीत झाडाखालून निघालं की आपल्या पिल्लाचा चित्कार आणि छिन्नविछिन्न देह आठवून ती माकडीण पिसाळत होती..!

तिच्यासाठी पिंजरा लावून त्यात मुकाट्याने जाऊन बसण्याचं माणसाचं प्रेमळ आवाहन तिने बाणेदारपणाने साफ नाकारलं तेव्हा तिला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं.

या माकडानेही जर जेरबंद व्हायचं नाकारलं असतं तर मात्र त्या माकडीणीसारखं हे सुद्धा हकनाक मेलंच असतं.’त्या’ माकडीणीचे न् यांचे कांही लागेबांधे असतील कदाचित. निदान ओळख तरी. त्यामुळेच वेळीच समजला असेल त्याला मानवशरण न होण्यातला धोका किंवा समजली असेल बाणेदार अट्टाहासाची परिणती..!

हे सार समजण्याइतकं ते नक्कीच शहाणं होतं.किंबहुना आपला हा शहाणपण त्याने आपल्या कृतीने सिद्धच केलेला होतं.म्हणूनच मी न पाहिलेलं ते

वाट चुकलेलं माकड माझ्या मनात ठाण मांडूनच बसलं होतं. त्याची कृती नक्कीच माणसाच्या बुद्धिमत्तेचीही कींव करावी एवढी शहाणपणाची होती नक्कीच. कारण सहज जाता जाता वाटेत येणाऱ्या असंख्य माणसांपैकी जावे कुणाचे घ्यायचे हे आधी न ठरवताही त्याने ती निवड किती अचूक केलेली होती..!

मुलींच्या शाळेबाहेर घिरट्या गाळणारे रिकामटेकडे टोळभैरव, धान्य-बाजारातला भेसळसम्राट व्यापारी, एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन कॉन्स्टेबल्स, एक नगरसेवक आणि काही सरकारी कर्मचारी इत्यादी..!

त्यामुळेच पिंजऱ्यात जेरबंद झालेलं ते माकड त्याच्या पिंजऱ्यासकट माझ्या मनात ठाण मांडून बसलेलं होतं. त्या रात्री पिंजरा सोडून ते थेट माझ्या स्वप्नात आलं. चीं चीं करीत कांहीबाही सांगू लागलं. मला नीटसं काही समजेना तसं दात विचकून वेडावत राहिलं.

पूर्वी कधीतरी रात्रीच्या एका प्रवासात मी पाहिलेलं, कालांतराने विस्मरणात गेलेलं एक पक्षांचं झाडही त्या स्वप्नात मला पुन्हा दिसलं..! त्या रात्री पाहिलं होतं तेव्हा स्वच्छ चांदण्यारात्रीच्या नीरव शांततेत ते झाड अगदी शांतपणे निश्चल उभं होतं. त्याच्या पारंब्या पाहिल्या तेव्हा ते वडाचे झाड म्हणून ओळखता तरी आलं.कारण पानं पाहून ओळखायला ती रात्र असल्यामुळे त्यांची पानं स्पष्ट दिसतच नव्हती.त्या प्रत्येक पानाला एक एक पक्षी चिकटून बसलेला होता. झाडाचे पान न् पान असं पक्षांनी लगडलंय असं वाटत होतं..! अतिशय सुंदर दृश्य होतं ते..! वाऱ्याचा मागमूसही नव्हता.पानं हलली तर त्या पक्षांची झोप मोडेल म्हणून वारासुद्धा श्वास रोखून गप्प होता..!

स्वप्नात ते माकड आलं.चीं चीं करून आकांत करीत कांहीबाही सांगू लागलं. ते सांगणं माझ्यापर्यंत पोचेना तसं चिडलं. संतापलं.दात विचकून निघून गेलं. गेलं ते नेमकं त्याच झाडावर.

पानांवर विसावलेले,शांत झोपी गेलेले ते पक्षी झापड बसावी तसे धडपडत जागे झाले. डोळे चोळल्यासारखे पंख फडफडवू लागले… पंखांच्या फडफडीत त्यांचा कलकलाट मि.सळून गेला.. झाडालाही तो साहवेना..फांद्या

हलवून ते त्यांना समजावू लागलं.. या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता..!! कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!!

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मज आवडते…. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ मज आवडते…⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

धुक्याची दाट दुलई सावरत फिकुटल्या चांदण्याचा पदर आवरत …..भालावरील चांदव्याची टिकली एकसारखी करत…. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाला साद देत …. मंदिरातील घंटा मंजुळ वाजवत ऊबदार पहाट व्हायला आवडेल मला! सकाळच्या त्या तेजपुंज अरुणोदयाचे मंगल दर्शन घेऊन मग हळूहळू उतरत .. त्या डोंगरमाथ्यावरून खाली …खाली खोल दरीत विसावताना लाडीक झटका देईन ओलेत्या काळ्याभोर केशसंभाराला अन…पाणीदार मोत्यांच्या लडी विस्कटेन झुलत्या तृणाग्रावर …पर्ण संभारावर …फुलांच्या स्मित गालावर.

कधी मंद मंद वाऱ्याची झुळूक बनून झोके घेत उडवत राहीन गन्ध ताज्या फुलांचा…अन मस्त शीळ घुमवेन वेळूच्या बेटी ….उडवेन कुणा अल्लड तरुणीच्या अवखळ बटाना ..भुरुभुरू ..हाय !….. बघत राहीन तिची  खट्याळ लगबग!

काळाकुट्ट मेघ होऊन बरसावे मनसोक्त …निथळत रहावे प्रेयसीच्या बटामधून ..मोती होऊन …शुष्क धरणीला तृप्त करत …निथळत राहावे तिच्या सर्वांगावरून नद्या ,झरे होऊन .द्यावी नवी नव्हाळी अन न्याहाळत राहावे अनिमिष नेत्रांनी …तिचे नवे कोवळे हिरव्या पाचूच्या शालूतील हिरवकंच सौंदर्य! जावे .-कुण्या तृषार्त चातकाच्या चोचीत सामावून.

डोलत रहावे अवखळ वाऱ्यासोबत शेतात भरलेले कणीस होऊन ….भागवावी भूक कुण्या भुकेल्या पाखराची अन कुणा लेकराची !

गात राहावे …भटकत रहावे मनमौजी छोटेसे पाखरू बनून …रानमेवा खात ….आपल्याच मस्तीत गुंग …या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेत …इवल्या पानाआड लपाछपी खेळत !

प्यावे ते पौर्णिमेचं चांदणं ..व्याकूळ चकोर होऊन …काजव्याचे  बांधून पैंजण धरावा ताल …करावे बेभान नृत्य ….

चांदणं भरल्या नभातील व्हावे एक प्रकाशतारा …दाखवावी वाट प्रकाशाची कुणा वाट चुकलेल्या पांथस्थास .

होऊन शूर सैनिक करावे भारत भूचे रक्षण… उसळून रुधिराचे तुषार करावे सिंचन त्या पवित्र मातीवर !

व्हावे आई त्या सर्व अनाथांची अन पांघरावी त्यांच्यावर मायेची ऊबदार सावली !…हसवावे ..रिझवावे बालमन गाऊन अंगाई…हरवून जावे बोबड्या बोलात …

नाहीच जमले तर व्हावे तो पायरीचा एक दगड त्या ज्ञानमंदिराचा …ज्या पायरीवर उभा राहील उद्याचा तरुण, उज्वल भारत !!

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares