मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

कुसुमताई आता म्हातार्या- होत चालल्या होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. आता त्यांना आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुलाकडे राहणे गरजेचे होते, पण त्यांना ठेवून घ्यायला कुणीच तयार नव्हते. प्रत्येकाची स्वत:ची काही कारणे-बहाणे होते. आपल्याला स्वत:च्या घरी ठेवून घ्यावं, म्हणून ती मुलांपुढे सतत गयावया करायची. पण कुणाच्याच मनाला पाझर फुटत नव्हता. शेवटी आपल्या जावयाने तरी मुलांची समजूत घालावी, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आणि जावायला बोलावून घेतले. मुलगी आली, ती रडत रडतच. जावई या सगळ्याचे मूक दर्शक होते. ते गप्प बसलेले पाहून कुसुमताई म्हणाल्या, ‘जावईबापू तुम्ही तरी यांना समजावा ना! आता या वयात मी कुठे जाऊ?’

यावर जावईबापू म्हणाले, ‘आई, आपल्याला कुठेही जायची जरूर नाही. आपण माझ्याबरोबर चला. तीन वर्षापूर्वी माझे वडील गेले पण माझी आई तर मी जन्मल्यावर लगेच गेली. मी तिचा चेहराही पाहिलेला नाही. तुमच्या मुलीशी लग्न झाल्यापासून मी तुमच्या चेहर्यावतच माझ्या आईचा चेहरा पहातोय. चला माझ्या घरी. मी समजेन, माझी आईच पुन्हा मला मिळाली.’

कुसुमताईंना कळेना, या प्रस्तावावर काय बोलावं? हे ऐकल्याबरोबर मुलीचं रडणं थांबलं होतं आणि मुले गदगद झाली होती, जशी काही कुठल्या तरी प्रचंड संकटातून त्यांची सुटका झालीय.

मूळ हिंदी  कथा – संकट  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

★★★ पेडोंगी (१९६२ – ९८) ★★★

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंधही नसेलच. पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं. सद्यस्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत. भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटापर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचं संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही.  जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते, तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात.  ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्कप्रणाली आणि प्रगत वाहनं  नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रकोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यानी पकडलं आणि आपल्या पोस्टवर बंदी बनवून, तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचं अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटांवर — पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं, ते ही शत्रूच्या प्रदेशात– काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून तिने भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली.

तिचे आपल्या देशाप्रत असलेले प्रामाणिक  प्रेम बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालीयन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती.  पण त्या वयातही आपल्या पाठीवरचं सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. ह्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी, कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता.  पण पेडोंगी ही पहिली खेचर होती, जिला हा सन्मान देण्यात आला.

 ह्यानंतरचा काळ पेडोंगीने बरेलीतच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ने घेताना “ जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर “ असं तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कायमच नोंदवलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पण पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटांवर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून ती परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत पकडलेली इतर खेचरं  आली नाहीत.  पण ती जिवावर उदार होऊन परत आली. पेडोंगीला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला.  पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती, आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. 

देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला माझा कडक सॅल्यूट, आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अचानक एक दिवस…भाग –2… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अचानक एक दिवस…भाग –2 … श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अचानक एक दिवस (अनुवादित कथा)

(आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?” ) इथून पुढे —–

त्या धुक्याच्या आणखी थोडं पलीकडे सुमी हसत उभी आहे. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते आहे. “ ये–ये की – पकड मला “ फुलपाखराच्या मागे धावता धावता पुलक खिदळून हसतोय.— पण हे धुकं वितळत का नाहीये ? —

“ सुमी , मला असं सोडून जाऊ नकोस गं — माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर–” 

—-मधेच नकळत त्याला डुलकी लागली आहे.—– वडील हातात डिक्शनरी देऊन त्याला इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग पाठ करायला लावताहेत— B A T bat ! bat म्हणजे वटवाघूळ–हा सस्तन प्राणी आहे. N I G H T M A R E- म्हणजे नको वाटणारी वाईट स्वप्नं —

आजोबा, आजी, आई, बाबा—- त्याला आवडणारी सगळी माणसं त्याला सोडून गेली आहेत–खूप खूप लांब. तो रडायला लागला आहे. पण डोळ्यात दाटलेला अश्रूंचा सागर कधीचाच पार सुकून गेलाय. एक रितेपण, एक पोकळी आतल्या आत धुमसते आहे—–

—–सगळा दोष त्याचाच आहे असं आता त्याला जाणवतं आहे. सुमीला तो कधीच पुरेसा वेळ देऊ शकलेला नव्हता. अगदी लहानसहान गोष्टींवरूनही खूप नावं ठेवायचा तो तिला, जिव्हारी लागेल असं बोलायचा. त्याच्या संतापाच्या लाव्हारसाने जणू तिला गिळून टाकलं होतं—-

“ सुमी–परत ये सुमी. आजपासून, आत्तापासून मी तुला सन्मानाने वागवेन –खूप जपेन तुला. पुलक–ये ना बाळा. तुम्हा दोघांशिवाय मी अधुरा आहे रे.”– पश्चातापाने होरपळल्यासारखा झाला आहे आता तो. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय . आठवणींचे मोठमोठे शिलाखंड आता काळाच्या पोटात हळूहळू गडप व्हायला लागले आहेत—

त्याच्या अंगात खूप ताप भरलाय. सुमी त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवते आहे. अर्धवट झोपेत असल्यासारखा तो काहीतरी पुटपुटतो आहे. पुलक घाबरून जाऊन रडायला लागला आहे. कुणीतरी त्या दोघांना ओढत ओढत त्याच्यापासून लांब घेऊन चाललंय. तो त्या माणसाला अडवायचा प्रयत्न करतोय. पण त्याचे हात लुळे पडले आहेत. मोठ्याने ओरडून त्यांना हाका माराव्याशा वाटताहेत त्याला– पण त्याचा आवाज पूर्ण बंद झालाय. आता अंगातला ताप खूपच वाढलाय. तो थंडीने कुडकुडायला लागलाय. सुमी त्याच्या अंगावर जाड ब्लॅंकेट टाकते आहे. डोक्यात इतक्या प्रचंड वेदना होताहेत की डोकं फुटेल असं वाटतंय. सुमी त्याचं डोकं दाबत बसली आहे. “ पप्पा, उठा ना आता, “ त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवत पुलक त्याला म्हणतोय. 

अजून सूर्य अस्ताला गेला नाहीये. पण त्याआधीच रात्र झाली आहे. अंधारातच त्या भकास, भीतीदायक रस्त्यांवरून तो एकटाच चालला आहे. त्याच्या घरापर्यंत कोणतीच बस जात नाही. थोडं पुढे एक निःशब्द, भयाण जंगल आहे. स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून त्याला भीती वाटते आहे, आणि आता त्याने धावायला सुरुवात केली आहे, आणि आता धापाही टाकायला लागला आहे. कुजलेल्या पालापाचोळ्याची दुर्गंधी हवेत भरून राहिली आहे. थोड्या अंतरावर विखरून पडलेल्या कशाच्या तरी अवशेषांच्या फटींमधून पिवळट प्रकाश डोकावताना दिसतोय. खूप पूर्वीच विस्मरणात गेलेलं एक गाणं कुणीतरी स्त्री गाते आहे, आणि तो आवाज त्याला ओळखीचा वाटतो आहे— सुमी–? सुमीsss.– आणि ही गूढ आकृती कुणाची आहे ? तो त्या दिशेने जायला लागलाय – आणि–आणि त्याच क्षणी तो प्रकाश एकदम अदृश्य झालाय. गाणं थांबलंय. एखादा पोहणारा माणूस थकून गेल्याने पाण्यात बुडायला लागावा, तसा तो त्या गडद अंधाराच्या समुद्रात जणू खोल खोल बुडत चाललाय. ‘ सुमी ssss– सुमी sssss— ‘ अतिशय भरून आलेल्या आवाजातल्या त्याच्या हाका त्या मिट्ट काळोखात घुमत राहिल्यात. 

——- दारावरची बेल न थांबता कितीतरी वेळ वाजत राहिली आहे. तो खडबडून उठतो, आणि हेलपाटतच दाराजवळ जाऊन थरथरत्या हातांनी दार उघडतो. मोहोरलेल्या झाडांचा आल्हाददायक सुगंध सोबत घेऊन आलेली प्रसन्न हवा त्या दारातून आत येते. —

“ सुमी– तू !!! “ त्याचे शब्द घशातच अडकतात. तिचा हात धरून पुलक तिच्या शेजारी उभा आहे. सुमीच्या दुसऱ्या हातात सामानाची पिशवी आहे. 

नाही नाही— म्हणजे अजून रात्र झाली नाहीये. बाहेर अजूनही लख्ख सूर्यप्रकाश आहे. 

सुमीने घरात पाऊल टाकल्या टाकल्या तो तिला गच्च मिठी मारतो— “ कुठे गेली होतीस तू ?” 

“ अरे राजा, आज एक एप्रिल आहे ना–” सुमीला हसू आवरत नाहीये. पण आत्ता, या क्षणी त्याला काहीही ऐकू येत नाहीये. त्या दोघांना घट्ट मिठी मारून, न थांबता अतिशय आवेशाने त्यांचे मुके घेत रहाणं, एवढंच फक्त करू शकतोय तो. 

— बाहेरच्या झाडावर बसलेला बुलबुल गातोय–जणू त्याला सांगतोय– ‘ यावेळी वाचला आहेस तू. पण लक्षात ठेव– प्रत्येक दिवस काही ‘ एप्रिल फूल ‘ करण्याचा दिवस नसतो. जर तू कोणावर खरंच प्रेम करत असशील, तर त्याची– त्याच्या मनाचीही काळजी घेतलीस तरच बरं ‘ — त्याच्याही नकळत तो मान डोलावतो. 

समाप्त

मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’ 

लेखक : श्री. सुशांत सुप्रिय 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अचानक एक दिवस…भाग –1… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अचानक एक दिवस…भाग –1… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अचानक एक दिवस (अनुवादित कथा) 

संध्याकाळी नेहेमीसारखाच तो अतिशय दमूनभागून कामावरून घरी आलाय. घराला लावलेलं मोठं कुलूप एखाद्या पाहुण्याकडे बघावं तसं त्याच्याकडे बघत राहिलंय.  “ सुमी कुठे गेली ? आणि अशी मला न सांगता ? आणि माझा छोटासा लाडका पुलक ? “ तो जणू स्वतःशीच बोलतोय — स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे — 

तो  खिशातून त्याच्याकडे असलेला किल्ल्यांचा जुडगा काढतो —’ किल्ल्या आहेत, की दगड ?’— चडफडतच दार उघडून तो आत जातो. घर तर तेच आहे. त्याला वाटतं —— आता किचनमधल्या सिंकच्या नळाची टपटप ऐकू येईल. भांड्यांचे आवाज ऐकू येतील. सुमी हात पुसत आतून येईल आणि म्हणेल–” आज खूप दमलेला दिसतो आहेस. “ आणि तो लगेच सांगेल की “ हो, आज खूप मीटिंग्स होत्या. “  मग ती म्हणेल, “ तू जाऊन फ्रेश होऊन ये. मी गरमागरम चहा करून आणते. “ पुलक बेडरूममध्ये कागदावर रेघोट्या मारत बसलेला असेल. तो पटकन त्याला उचलून घेऊन त्याचे मुके घेईल– आणि तोही “ पप्पा–” म्हणत त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारेल.——

पण आज सगळं घरच जणू गाढ झोपलंय–खूप रात्र झाल्यासारखं. कुठूनही कसलाही आवाज येत नाहीये. नळाचा आवाज बंद आहे. भांडी अगदी गपगार पडलेली आहेत. बेडरुमही एकाकी पडल्यासारखी वाटते आहे—–

तो फ्रिजमधली गार पाण्याची बाटली काढून पाणी पितो. उगीचच हातपाय ताणून शीण घालवायचा प्रयत्न करत असतांनाच, त्याला डायनिंग टेबलवर ठेवलेला एक कागद दिसतो. झडप घालतच तो कागद उचलून बघतो– “ सुमीचं अक्षर ? पण मला आज ते नीट वाचता का येत नाहीये ? शब्द असे पुसट का दिसताहेत ?” —-त्याच्या डोळयातून पाणी व्हायला लागतं- त्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं—

“ मी पुलकला घेऊन घर सोडून चालले आहे —आणि तुझ्या आयुष्यातूनही खूप लांब निघून जाते आहे — कायमची “—

त्याचे पाय लटपटायला लागतात, आणि तो जवळच्या खुर्चीवर अक्षरशः कोसळतो. घड्याळाची बारीकशी टिकटिकही डोक्यात घणाचे घाव घालत असल्यासारखी  वाटायला लागते त्याला.  

‘ का? का पण ? कशासाठी ? ’–त्याचं मन व्याकूळ होऊन आक्रोश करायला लागतं —-दूरवर असलेल्या टॉवरवरचं घड्याळ आपल्या डोक्यात टिकटिक करतंय असं त्याला वाटायला लागतं. 

‘ अचानक एवढी रात्र कशी झालीये ? आणि चंद्र का दिसत नाहीये ? एकही चांदणी पण नाही ?–

नाही नाही– अजून रात्र झालेली नाहीये– हा अंधार तर माझ्या डोळ्यापुढे पसरलाय ‘— तो कसातरी धडपडत त्याच्या टेबलापाशी जातो आणि ड्रॉवरमधून बी.पी.च्या गोळ्या काढतो. त्याचे हात खूप थरथरत असतात– हातातली गोळी जमिनीवर पडते. पण काही केल्या त्याला ती सापडत नाही. तो दुसरी गोळी काढतो आणि पाण्याशिवायच गिळून टाकतो. त्याला काहीच सुचत नसतं. मग डोकं हाताने गच्च दाबून धरत तो बेडवर वेडावाकडा कोसळतो—–

रात्र खूपच धूसर वाटायला लागते त्याला — खूप धुकं पडल्यावर वाटते तशी– झोपेतच तो चालायला लागलेला असतो.— दूरवरून त्याला आगगाडीची  शिट्टी ऐकू आल्यासारखं वाटतं, आणि अचानक खाडदिशी त्याचे डोळे उघडतात— तो बेडवर नसतोच —’ कुठे गेली असेल सुमी ? आणि पुलक ? तो कुठे आहे ?’ — तो फोन उचलतो तर तो डेड झालेला असतो.—- ‘ का केलंस सुमी तू असं ? लहानमोठी भांडणं तर प्रत्येक घरातच होत असतात ना ? मग आत्ताच असं काय झालंय ? ‘ –त्याला खूप टेन्शन आलंय आता–आणि त्या टेन्शनचा हात पकडून आलेल्या असंख्य आठवणी त्याच्या मनात गर्दी करायला लागलेल्या आहेत. ‘आता काय करायचं ?’— 

शेपटी तुटलेली एक पाल भिंतीवरून सरपटतांना त्याच्याचकडे टक लावून बघतेय, असं वाटतंय  त्याला– ‘ आता काय करू मी ?’ — त्याला काहीच सुचत नाहीये. 

तो खिडकीतून नुसताच लांबवर बघत राहिलाय  —– आणि—- आणि अचानक त्या धुक्याच्याही पलीकडे त्याला त्याचं खेडेगाव दिसतय — त्या गावातलं त्याचं कौलारू घर दिसतंय– पुढच्या दाराच्या डावी-उजवीकडे असलेली केळीची झाडं घराची शोभा आणखीच वाढवत उभी आहेत. शेजारीच वाळलेल्या गवताच्या पेंढ्यांचा मोठा ढीग आहे., आणि त्यावर एक लहान मुलगा खेळत बसला आहे. —–

“ आजोबा, उठा ना–काय झालंय तुम्हाला “ 

आजोबांना अंगणात झोपवलं आहे. घरातल्या सगळ्या बायका खूप रडताहेत. 

“ आजोबा, उठा ना हो पट्कन –”  तोही आता खूप रडवेला झालाय. 

त्यांना ज्यावर झोपवलं आहे, ती तिरडी आता अंत्यसंस्कार करण्यासाठी नेली जाते आहे —

“ आजोबा मला असं एकट्याला सोडून नका ना जाऊ– मग मला पाढे कोण शिकवणार ? मला रोज तुम्ही हिंदी आणि इंग्लिशचं एक एक पान शुद्धलेखन करायला लावायचात ना– मग आता कोण करून घेईल तसं माझ्याकडून ? आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?”— 

क्रमशः …. 

 

मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’ 

लेखक : श्री. सुशांत सुप्रिय 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घास ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

?  जीवनरंग ?

☆ घास ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

खूप बेचैनीत रात्र संपली. मुश्किलीने सकाळी एक चपाती खाऊन, घरुन आपल्या शोरूमला निघालो. आज कुणाच्या तरी पोटावर पहिल्यांदाच लाथ मारायला निघालोय, हा विचार आतल्या आत टोचत होता.

जीवनात माझी वर्तणूक राहिली आहे, की आपल्या आसपास कुणाला भाकरीसाठी तरसावे लागू नये. पण या वाईट काळात आपल्याच पोटावर मार पडत आहे.   

दोन वर्षांपूर्वीच आपली सर्व जमा बचत गुंतवून मी कपड्यांचं शोरुम उघडलं होतं, पण सध्या दुकानातील सामानाची विक्री निम्म्यावर आली आहे. मी आपल्या कपड्यांच्या शोरूममध्ये दोन मुलं आणि दोन मुली कामाला ठेवल्या आहेत, ग्राहकांना कपडे दाखविण्यासाठी. 

लेडीज डिपार्टमेंटच्या दोन्ही मुलींना तर काढू नाही शकत. एकतर कपड्यांची विक्री त्यांच्यामुळेच जास्त होते आहे, दुसरं म्हणजे त्या दोघींचीही परिस्थिती खूपच गरीब आहे. 

दोन्ही मुलांपैकी एक जुना आहे, आणि तो घरात एकुलता एक कमावता आहे. 

जो नवा मुलगा दीपक आहे, मी त्याचाच विचार केला आहे. बहुतेक त्याचा एक भाऊही आहे, जो चांगल्या ठिकाणी नौकरी करत आहे. आणि तो स्वतः हुशार, मनमिळाऊ आणि हसतमुखही आहे. त्याला अजून दुसरीकडे कुठेही काम मिळू शकेल. 

या पाच महिन्यात, मी बिलकुल उध्वस्त झालोय. परिस्थिति बघता एक कामगार कमी करण  ही माझी मजबूरी आहे, हाच सगळा विचार करत मी दुकानात पोहोचलो. 

चारही जण येऊन पोहोचले होते. मी चौघांना बोलावलं व खूप दुःखी होत म्हणालो….

“बघा, दुकानाची आताची परिस्थिति तुम्हा सर्वांना माहीतच आहे, मी तुम्हा सर्वांना कामावर ठेऊ नाही शकत.”

त्या चौघांच्या कपाळावर चिंता स्पष्ट झळकू लागली. मी बाटलीतील पाण्याचा घोट घेत घसा ओला केला. “कुण्या एकाचा… आज हिशोब.. करुन देतो. दीपक, तुला कुठे दूसरीकडे काम शोधावे लागेल.”

“हो काका”.   त्याला पहिल्यांदाच इतकं उदास झालेलं बघितलं. बाकीच्यांच्या चेहेऱ्यावरही काही खास प्रसन्नता दिसत नव्हती. एक मुलगी, जी बहुतेक दीपकच्याच घराजवळ रहाते, काही बोलता बोलता थांबली.  

“काय आहे, बाळ ? तुला काही म्हणायचं आहे का ?”

“काका, याच्या भावाचं पण काम काही महिन्यांपूर्वीच सुटलं आहे, याची आईही आजारी असते.”

माझी नजर दीपकच्या चेहऱ्यावर गेली. त्याच्या डोळ्यात जबाबदारीचे आँसू होते, जे तो आपल्या हसतमुख चेहऱ्याने लपवत होता. 

मी काही बोलणार इतक्यात दुसरी मुलगी बोलली, “काका ! वाईट वाटणार नसेल तर एक बोलू ?”

“हो… हो,  बोल ना !” 

“कुणाला काढण्यापेक्षा, आमचा पगार कमी करून द्या… बारा हजारांच्या जागी नऊ हजार करून द्या.” 

मी बाकीच्यांकडे बघितलं, 

“हो साहेब ! आम्ही एवढ्या पगारावरच काम चालवून घेऊ.” मुलांनी माझी अडचण, आपसात वाटून घेण्याच्या विचाराने, माझ्या मनावरील दडपण जरूर कमी केले‌.

“पण तुम्हा लोकांना हे कमी तर नाही ना पड़णार ?”

“नाही काका ! कोणी साथीदार भूका रहावा… यापेक्षा हे कधीही चांगले की, आम्ही सर्व दोन घास कमी खाऊ.”

माझे डोळे ओले करून, ही मुलं आपापल्या कामास लागली— माझ्या नजरेत, माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होऊन…!

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सिंधू … अज्ञात ☆ प्रस्तुति – सुश्री मीनल केळकर

?  जीवनरंग ?

☆ सिंधू … अज्ञात ☆ प्रस्तुति – सुश्री मीनल केळकर ☆ 

सिंधू…

माझी पत्नी आतून ओरडली, ” आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात…? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा…! “

मामला गंभीर वळण घेणार असं दिसलं..!

मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो…

सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. –तिच्या पुढे एक दही -भाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू, तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार, गोड आणि हुशार मुलगी होती.

मी बाऊल उचलला आणि म्हणालो, ” बाळ, तू चार घास खाशील का..? तुझ्या बाबासाठी…? ” सिंधू, माझी बाळी; थोड़ी नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली, ” चार घासच नाही, मी सगळ संपवीन—” थोडी घुटमळली आणि म्हणाली,

” बाबा, मी हे सगळं संपवलं  तर… तुम्ही मला मी मागीन ते द्याल..? “

” नक्की…!”

तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले.

पण आता मी थोडा गंभीर झालो. ” बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील, तर आत्ता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा…! “

” नाही बाबा..! मला तसं काही नको आहे…! ” तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला…

मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतात…? ते पण तिला न आवडणारं…. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू माझ्यापाशी आली…डोळे अपेक्षेने मोठे करून–  

आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. ” बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार…! ” तिची ही मागणी होती…

” हा काय मूर्खपणा चाललाय…? काय वेड बीड लागलंय काय…? मुलीचे मुंडण…? अशक्य…! “

सौ. चा आवाज वाढत चालला होता…!

 ” आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कुणी केलं  नाही…! ” आईने खडसावले.

“ती सारखी टिव्ही पहात असते… ! त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत…! “

” बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस…? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी होऊ…! आम्हाला तुझ्याकडे तसं बघवेल का सांग…? सिंधू, बेटा आमचाही विचार कर…! ” मी विनवणीच्या स्वरात म्हटले…

” बाबा, तुम्ही पाहिलंत ना, मला तो दहीभात संपवणं  किती जड जात होतं ते…! ” आता ती रडायच्या बेतात होती– ” आणि तुम्ही मला त्या बदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केलं होतं… आता तुम्ही मागे हटता आहात… मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणा-या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना…आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत…! “

मला आता ठामपणा दाखवणे भाग होते…

” काय डोके- बिके फिरलेय काय..? ” आई आणि सौ. एकसुरात…

आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही, तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही—-

मी ठरविले, तिची मागणी पूरी केली जाईल…

—गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते…

सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होते . ती मागे वळली आणि टाटा केला.  मीही हसून टाटा केला…

तितक्यात  एक मुलगा कारमधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली, ” सिंधू माझ्यासाठी थांब.” गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केलेले होते.

‘ अच्छा, हे असं आहे तर ‘, मी मनात म्हणालो…

त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या..!  ” तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीष. त्याला ल्यूकेमिया (Blood cancer) झालाय.  येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, ” गेला पूर्ण महिना तो शाळेत आला नाही. केमोथेरपि चालू होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता. कारण मुद्दाम नाही, तरी सहाजिकच मुले चिडवणार… सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणा-यांचे मी पाहून घेइन.  पण तू शाळा नको बुडवूस —-मी कल्पनाही केली नव्हती की, ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल…तुम्ही तिचे आईवडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे…”

ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी मनाशी म्हणत होतो…’ माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे– खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते…’

—–या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत, जे स्वत:ची मनमानी करतात.  सुखी तेच की जे दुस-यावर जिवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात. ….

आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधूसारखं बदलता यायला पाहिजे. …….जमेल का ? 

लेखक: अज्ञात…

संग्राहक :- मीनल केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले

? जीवनरंग ❤️

☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले ☆

तर मंडळी, मौजेची घटना अशी घडली की ‘त्रिवेणी’ आश्रमाच्या कार्यालयापाशी पोहोचताच लक्षात आले की माझ्या उजव्या बुटाचा सोल (sole) पुढून निघून लोंबायला लागलाय. सकाळपासून आळंदी मंदिर, ‘ज्ञानेश्वरी’ मिसळ मध्ये ब्रेकफास्ट घेईपर्यंत व्यवस्थित वागणार्‍या सोलने ऐनवेळी समारंभाच्या सुरुवाती- सुरुवातीलाच मान टाकलेली पाहून माझ्या soul मध्ये धस्स! झाले.

पुढील दोन तास तरी सोलने तग धरावे, अशी मनोमन प्रार्थना करीत मी पुढे निघालो. आणखी दहा पावले पुढे  जातो न जातो तोच “घडू नये तेच घडले” आणि सोल बुटापासून तुटून चक्क बाजूला पडला. मी तळपाय तिरपा करून पाहिला असता माझा साॅक थेट दृष्टीस पडल्यावर तर मला ब्रह्मांडच आठवले. आली का आता पंचाईत!

मग अजयचा मित्रत्वाचा सल्ला मानून तो सोल तिथेच बाजूच्या एका वाफ्यामध्ये ठेवून दिला,  परत येताना घेऊयात ह्या विचाराने. तिथली एक सफाई कामगार स्त्री काम थांबवून माझ्या सर्व हालचाली टिपत उभी होती. माझी अवस्था पाहून तिने पदर डोळ्यांना लावण्याऐवजी नाकाला लावलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा!

तिच्याकडे पाठ करून मी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या निर्धाराने, जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात चालत पुढे निघालो. माझ्या आजूबाजूने नवनवीन चपला आणि बूट घातलेली लोक घाईघाईने लग्नमंडपाकडे निघाली होती. मी मात्र साॅकला बोचणारे दगड, फरश्यांमधील फटींचा स्पर्श आदींचा ‘उजव्या’ पदोपदी अनुभव घेत हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी  चप्पल स्टँडवर बूट-चपला काढायच्या होत्या ते पाहून मात्र माझ्या बुटात नव्हे पण जिवात soul आला!

पुढे सर्वत्र मी ‘पांढर्‍या पायाने’ नव्हे पण ‘सावळ्या पायाने’ तसाच अनवाणी फिरत राहिलो…डायनिंग हाॅलच्या बाहेरील लाॅन, रेलिंग, पायर्‍या, पुन्हा लग्नाचा हाॅल असा सगळीकडेच. तशीही बूट घालायची सवय गेली दोन वर्षे मोडली होतीच. त्यामुळे बुटाचे लोढणे न घेता फिरणेच मला छान हलकेहलके, मौजेचे वाटू लागले होते.

‘त्रिवेणी’ आश्रमात अनवाणी फिरणार्‍या ह्या भक्ताला पाहून इतर भक्त मंडळींचा माझ्याबद्दल आदर वाढतोय, असे मला उगीचच भासू लागले. पण तसा काही चमित्कार घडला नाही. माझ्या पायाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमात बुटाच्या sole ला नव्हे तर “जय गुरुदेव!” ह्या विश्वव्यापी soul च्या पूजनालाच महत्व होते, हे अधोरेखित झाले.

बूटात पाय अडकवून कारपर्यंत ‘वाकडी’ पावले टाकत आलो. तत्पूर्वी परतीच्या मार्गावर मालकाची वाट पाहत पडलेल्या माझ्या उजव्या सोलला वाफ्यामधून उचलून कारमध्ये आणून टाकले. पुढे एखाद्या चांभाराचे दुकान दिसले तर “बुटाला सोल शिवून घेऊयात” असा एक पोक्त पण कळकळीचा सल्ला ड्रायव्हर सतीशने दिला.

आश्रमातून बाहेर पडून आळंदीजवळील एका छोट्या चपलांच्या दुकानात कामचलाऊ पण बरोबर मापाच्या सँडल्सचे शाॅपिंग झाले. तळपायांना sole आणि solace मिळाला आणि त्यासरशी तिथेच माझ्या ‘बाटा’ना करायचे ठरवले कायमचा टाटा! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध :कार्तिकचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे केतकीला जाणवलं .  आता पुढे….)

आणि आपण तरी कार्तिकशिवाय राहू शकतो का? नेहमी भांडत असलो, तरी प्रत्येक क्षणी कार्तिक मनात असतोच. त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपण कसलाच विचार करू शकत नाही. अगदी डिव्होर्सची वेळ आली तरीही.

ही डिव्होर्सची वेळ तरी कशी आली? त्याची कुठे भानगड, व्यसन…..? काहीच नाही. मग कशावरून आपलं एवढं भांडण झालं? कशावरून बरं? कारण तर आठवतच नाहीय. म्हणजे तेवढं महत्त्वाचं नसणारच. पण उगीचच ताणलं गेलं आणि इगोच्या लढाया सुरू झाल्या. तसा कार्तिक टिपिकल पुरुषासारखा इगो वगैरे कुरवाळणारा नाहीय. आपणच……

कार्तिक म्हणतोय, ते खरं आहे. एकुलतं एकपण ही आपण नेहमीच स्ट्रेन्थ समजत आलो. आपल्या तोंडातून जे बाहेर पडायचं, ते लगेच आपल्यासमोर हजर व्हायचं. आईबाबा नेहमीच आपले लाड करायचे. त्यामुळे आपण तोच आपला हक्क समजत आलो.

कार्तिककडूनही तीच अपेक्षा केली. सुरुवातीला तोही आपल्या मनाप्रमाणे वागायचा.पण नंतरनंतर त्याने स्वतःच्या मनाला मुरड घालणं बंद केलं.

चुकलंच आपलं. खूप खूप चुकलं.

“कार्तिक, गाडी थांबव.मला बोलायचंय तुझ्याशी.”

“इथे मध्येच थांबवता येणार नाही. पुढे थांबवतो.”

गाडी थांबल्यावर केतकीने सगळं सगळं कन्फेशन दिलं. बोलता बोलता ती रडत होती. रडता रडता बोलत होती.

कार्तिकला ती पूर्वीसारखीच बालिश, निरागस वाटली. त्याच्या मनात तिच्याविषयीचं प्रेम उफाळून आलं. तिला मिठीत घेऊन ओठाने तिचे अश्रू पुसण्याचा मोह त्याला झाला. पण   खुंटा अजून घट्ट करणं आवश्यक आहे, असं त्याला वाटलं.

“तुला काय म्हणायचंय, ते कळलं मला. पण मी प्रयत्नपूर्वक तुला माझ्या मनातून, आयुष्यातून बाहेर काढलंय.”

“पण… आपला… डिव्होर्स…तर… झाला… नाहीय… ना… अजून…!” तिच्या वाक्यात शब्दांपेक्षा हुंदकेच जास्त होते.

“लिगली नाही. पण मनाने आपण एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत.”

“मलाही तसंच वाटायचं. पण आता विचार करताना वाटतं, की आपण अजूनही एकमेकांचे आहोत. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कार्तिक.”

“पण मला नाही ना वाटत तसं,” चेहऱ्यावर अतोनात गांभीर्य, आवाजात कठोरपणा आणत कार्तिक बोलला.

केतकीला धक्का बसला. आपल्याला वाटतं, त्यापेक्षा वेगळा विचार स्वीकारायची ही तिची पहिलीच वेळ होती. फुटू पाहणारे हुंदके प्रयासपूर्वक दाबत तिने तोंड घट्ट मिटून घेतलं.

कार्तिकला तिची दया आली.

“मी विचार करतो तुझ्या म्हणण्याचा. मला वेळ दे थोडा.”

केतकीने सुटकेचा निश्वास सोडला.”घरी पोहोचेपर्यंत सांगितलंस तरी चालेल.”

“दोन-तीन दिवस तरी लागतील मला.”

‘बापरे!’ केतकीच्या मनात आलं. पण तोंडाने मात्र तिने “बरं,”म्हटलं.

रात्री जेवणातही केतकीचं लक्ष नव्हतं.

“काय गं? जेवत का नाहीयेस?”आईने दोन-तीनदा विचारलं.

कार्तिक भराभरा जेवून उठला.

“बरं वाटत नाहीय का? तू झोप जा. आज मी आवरते मागचं,” असं आईने म्हणताच नेहमीप्रमाणे, “मी करते गं,”वगैरे न म्हणता केतकी सरळ बेडरूममध्ये गेली.

पाठोपाठ कार्तिक आलाच.

“हे बघ, हनी….” पुढे न बोलताच केतकीला सगळं कळलं.

किचनमधलं आवरून, बाबांना हवं -नको बघून आई झोपायला आली, तेव्हा दोघांना बघून ती म्हणाली, “आज मी झोपते हॉलमध्ये.”

गंमत म्हणजे आज या दोघांपैकी कोणीही तिला ‘नको’ म्हटलं नाही.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : कार्तिकने केतकीला दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं . आता पुढे…..)

” मला पुन्हा त्या लग्नाच्या सापळ्यात अडकायचं नाहीय.”

“एकटीच राहणार?”

“आई -बाबा आहेत की सोबतीला.”

“आई-बाबा आहेतच म्हणा. पण मला वाटतं, आता त्यांचं वय झालंय. त्यात पुन्हा आपल्या डिव्होर्सचं ऐकल्यावर ते खचूनच जातील. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला, तर तू एकटी कितपत पुरी पडशील?”

“पुष्करदादा, शीलूताई वगैरे आहेत की मदतीला.”

“त्यांनाही त्यांचे संसार आहेत ना. पुष्करदादांवर त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. शीलूताईंच्या घरी त्यांचे सासू-सासरे आहेत. कल्पना कर, तुझ्या गरजेच्या वेळी त्यांच्या घरच्या सिनियर सिटीझन्सचीही तब्येत ढासळली, तर इच्छा असूनही ते तुझ्या मदतीला येऊ शकणार नाहीत.”

केतकी विचारात पडली – बाबांना ऍडमिट करायचं कळल्यावर सगळीजणं धावत आली होती. पण आता डिस्चार्जनंतर ते तीन-चार दिवसांआड येऊन भेटून जायचे. म्हणजे त्या अर्थाने सगळी जबाबदारी आपल्यावरच होती.

“एक लक्षात घे, केतकी. एकुलतं एकपण ही आतापर्यन्त तुझी स्ट्रेन्थ होती. आताच्या परिस्थितीत तो विकनेस झालाय.”

‘खरंय, कार्तिक म्हणतोय ते. आपण या दृष्टीने विचारच नव्हता केला.’ केतकीला कार्तिकचं म्हणणं पटलं.

“म्हणूनच मला वाटतं, तू एकटी ही जबाबदारी निभावू शकणार नाहीस. तेव्हा या सगळ्यांत तुला साथ देणारा एखादा जोडीदार शोध.”

थोडा वेळ दोघंही खाण्यात गर्क झाले.

“तुला मी मागेच सांगितलं होतं -जोपर्यंत आपण वेगळं राहत नाही, तोपर्यंत डिव्होर्सच्या कारवाईला सुरुवात होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता माटुंग्याच्या घरी राहायला गेलं पाहिजे. तुम्हाला जाणं शक्य असेल, तर जा. मी तुम्हाला शिफ्टिंगसाठी मदत करीन. त्यानंतर मात्र मी तुमच्याशी कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. अजून थोडे दिवस आपल्या घरी राहणं, बाबांसाठी आवश्यक असेल, तर मी दादरच्या घरी राहायला जाईन.पण मी तिकडे फार दिवस नाही राहू शकणार. म्हणजे आई, बाबा, दादा समजून घेतील. पण वहिनीचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर माटुंग्याला शिफ्ट व्हायचं बघ.”

कार्तिकचं बोलून झाल्यावर तो उठला आणि चालायला लागला.

परिस्थितीचं गांभीर्य आता कुठे केतकीच्या लक्षात यायला लागलं.आतापर्यंत केतकी आईबाबांना, त्यांच्या घराला, एवढंच नव्हे, तर कार्तिकलाही गृहीतच धरून चालली होती. डिव्होर्सची व्याप्ती एवढी मोठी असेल, असं आतापर्यन्त तिच्या लक्षातही आलं नव्हतं.

परतीच्या प्रवासात कार्तिक एकही शब्द बोलला नाही.

केतकीही विचार करत होती, ‘आईला डिव्होर्सचं कळलं तर ती आणखीच खचून जाईल. बाबांच्या जोडीने तीही अंथरुण धरेल. मग पुढचं सगळं जमेल आपल्याला?

पुष्करदादा, शीलूताई येऊ शकतीलच, असं नाही. शिवाय कार्तिकविषयी सर्वांनाच आदर वाटतो. आपल्या वागण्याने नाराज झाले, तर ते फिरकायचेसुद्धा नाहीत.

म्हणजे कार्तिक म्हणतो, तसं जोडीदार हवाच.

कार्तिक नेहमी कौतुकाने म्हणायचा -आपण अजूनही सुंदर दिसतो, व्यवस्थित मेंटेन करून आहोत. वय म्हटलं, तर -हल्लीच्या काळात या वयात कितीतरी जणींची लग्नं व्हायची असतात. त्यामुळे आपल्याशी लग्न करायला कोणीही एका पायावर…….

पण आजारी आईबाबांची जबाबदारी स्वीकारायला कितीजण तयार होतील? आणि समजा, सुरुवातीला तयारी दाखवलीच, तरी पुढेपर्यंत ती निभावतीलच, याची काय गॅरंटी? कार्तिकसारखं मायेने, जिव्हाळ्याने तर कोणीच नाही करणार.

त्या दिवशी सकाळी रात्रीचा निळू गेला आणि ट्रेनच्या गोंधळामुळे काशिनाथला यायला उशीर झाला. बाबांना पॉटची अर्जन्सी होती, तेव्हा कार्तिकच पुढे आला.

“असू दे. मी देते, कार्तिक. तुला कंटाळा येईल.”

“हे बघ, केतकी. तू पॉट दिलंस, तर त्यांना ऑकवर्ड होईल. ही वेळ आपल्याला काय वाटतं, यापेक्षा त्यांना काय वाटतं, याचा विचार करायची आहे.”

आताही तो स्वतःपेक्षा आईबाबांच्या सोयीचाच जास्त विचार करतोय.

त्याचं आपल्यावरही किती प्रेम आहे! मागे ऍबॉर्शनच्या वेळी तो पहिल्यापासून आपल्याबरोबर होता. आपला हात हातात धरून आपल्याला धीर देत होता. नंतर आपण शुद्धीवर आलो, तेव्हा आईशी बोलताना किती रडला तो! अगदी आईच्या बरोबरीने. “बाळाला जावं लागलं, तरी दुसऱ्या रूपाने तो आमच्याकडे नक्की येईल. पण केतकीला काही झालं असतं तर?” त्या दोघांची समजूत घालता घालता बाबांच्या नाकी नऊ आले.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

पूर्वार्ध :हॉस्पिटलमधून बाबांना केतकीच्या घरी न्यायचं ठरलं. आता पुढे…..)

कार्तिक -केतकी कामापुरतंच बोलत होती. पण या आजारपणाच्या व्यापामुळे कोणाच्या ते लक्षातही आलं नाही.

गेस्टरूममध्ये बाबा आणि त्यांचा रात्रीचा अटेंडंट निळू झोपत असल्यामुळे आई केतकीबरोबर बेडरूममध्ये झोपत होती आणि कार्तिक हॉलमध्ये सोफा-कम-बेडवर.

आई मधूनमधून म्हणायची, “मी हॉलमध्ये झोपते ” म्हणून.पण कार्तिक -केतकी दोघंही घायकुतीला आल्यासारखे एकसुरात “नको, नको “म्हणून ओरडायचे.

वीकएंडला बराच वेळ तो घराबाहेरच असायचा. घरात असला, तर लॅपटॉप उघडून बसायचा.

आईचं चाललेलं असायचं,”अगं,जरा त्याच्याकडे बघ.थोडा वेळ त्याच्याबरोबर घालव.”

एकदा तर चक्क त्याच्यासमोरच म्हणाली, ” बाबा बरे आहेत. काशिनाथ आहे सोबतीला. तुम्ही दोघं बाहेर जा कुठेतरी. फिरायला, सिनेमाला.” केतकीला ‘नाही’ म्हणायला संधीच नाही मिळाली.

घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत दोघात चकार शब्दाची देवघेव झाली नाही.

केतकीला आठवलं, लग्नापूर्वी आणि नंतरही सुरुवातीच्या काळात केतकीची अखंड बडबड चालायची. कार्तिक कौतुकाने ऐकत असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलायचा तो तेव्हा.

मग शनिवारी-रविवारी दोघांनी बाहेर पडायचं, हा नियमच करून टाकला आईने.

यावेळी लॉन्ग ड्राइव्हला मुंबईबाहेर पडायचं, ठरवलं कार्तिकने. तसा ट्रॅफिक खूप होता, पण फारसं कुठे अडकायला झालं नाही.

एका छानशा रिझॉर्टच्या रेस्टॉरंटसमोर त्याने गाडी थांबवली.

‘अरेच्चा!बॅग गाडीत ठेवायची राहिली. आता वॉशरूममध्ये हूक असला म्हणजे मिळवली,’ केतकीच्या मनात आलं. पण कार्तिकने हात पुढे केला. तिने गुपचूप बॅग त्याच्याकडे दिली.

कोपऱ्यातल्या टेबलवर कार्तिक बसला होता. ती येताच तो उठून फ्रेश व्हायला गेला.

वेटर डिशेस घेऊन आला. तिच्या आवडीचा मेन्यू होता.

ही त्याची चाल नाहीय ना? ‘सावध, केतकी, सावध,’ तिने स्वतःला रेड ऍलर्ट दिला.

खायला सुरुवात केल्यावर तिच्या लक्षात आलं, की तिला खरोखरच खूप भूक लागली होती.

थोडंसं खाऊन झाल्यावर कार्तिकने अचानकच विचारलं,  “भेटला कोणी? “

“म्हणजे?” त्याला काय विचारायचंय, हेच तिला कळलं नाही.

“म्हणजे आपला डिव्होर्स झाल्यानंतर ज्याच्याशी तू लग्न करशील, असा कोणी भेटला का?”

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares