☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ४ ☆ सुश्री सुमती जोशी ☆
पाखीचा कार्यक्रम दुसरा होता. या कार्यक्रमाचं निवेदन झाल्यावर संपूर्ण हॉलभर आनंदाची लाट उसळली. ‘फूल, फूल, ढले ढले’ रवींद्र संगीताच्या स्वर्गीय सुरांनी सगळा हॉल भरून गेला होता. पडदा उघडला. रंगमंचाच्या दोन्ही बाजूनी पांढराशुभ्र पोशाख घातलेल्या, गुलाबी हेअर बँड लावलेल्या, दागदागिन्यांनी नटलेल्या पऱ्यांच्या वेषातल्या मुली प्रवेश करू लागल्या. सगळ्याजणी एकसारख्या दिसत होत्या. रिद्धी. शिंजीनी, रूपसा कोणती हे वेगळेपणानं ओळखता येत नव्हतं. शुकतारा आणि नंदिता दोघीही उत्तेजित झाल्या होत्या. “पाखी कुठंय? पाखी?”
पहिल्या रांगेतल्या मुलींकडे बोट दाखवत नंदिता म्हणाली, “रांगेतली चौथी मुलगी म्हणजे आपली पाखी.”
नीट निरखून पहात उद्वेगानं शुकतारा म्हणाली, “नाही आई. ती मुलगी पाखीसारखी दिसतेय, पण ती पाखी नाही. आपली पाखी आणखी बारीक आहे.”
“ती मागच्या रांगेत असेल.” व्याकूळ होत नंदिता नातीला शोधू लागली.
किंचित स्मित करून चंद्रोदय उठला. “थांब पुढे जाऊन फोटो काढतो. कॅमेऱ्याची लेन्स नक्कीच पाखीला शोधून काढेल.”
शुकतारा अस्वस्थ झाली. सगळ्या रवींद्र संगीताच्या तालावर विलोभनीय नाच करत असल्या तरी त्यांचं मन पाखीला शोधण्यात गुंतलं होतं. रंगमंचावर पंचवीस मुली आहेत याचं चंद्रोदयला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्या मुलीला शोधलं ते पालक खूश दिसत होते. गाण्याचे मंजुळ सूर आणि नृत्याचा ताल याकडे दुर्लक्ष करत ते आनंदातिशयानं म्हणत, “ती बघ श्रेया, ती बघ तितली, ती बघ मामणी, ती बघ…” चंद्रोदयनं अनेक फोटो काढले पण कॅमेऱ्याच्या लेन्सला पाखीला शोधता आलं नाही. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तालावर नाचता नाचता शेवटच्या रांगेतल्या मुली पुढे आल्या, तरीही त्यात पाखी कुठेच दिसेना. तो अस्वस्थ झाला.
नाच संपल्यावर फुलपाखराप्रमाणे उडत उडत मुली विंगेत गोळा झाल्या. शुकतारा वेडीपिशी झाली होती. चंद्रोदयपाशी जात म्हणाली, “तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर ग्रीन रूममध्ये चला. मला काही हे बरोबर वाटत नाहीय.” चंद्रोदयला काही बोलायचा अवकाश न देता शुकतारा जवळ जवळ ओढतच त्याला घेऊन विंगेत गेली. पडदा पडला होता. पुढच्या कार्यक्रमाच्या निवेदनाचा आवाज हॉलमध्ये ऐकू येऊ लागला. ग्रीनरूमच्या दरवाजात आता अपाला उभी नव्हती. आतमध्ये मुलींचा चिवचिवाट चालू होता. शुकतारा आणि चंदोदय आत आले तेव्हा अपाला मुलींना खाऊची पाकिटं वाटण्याच्या तयारीत होती. “अगं अपाला, रिद्धी कुठंय? रिद्धी तर नाचलीच नाही.”
गोंधळलेल्या अपालानं मागे वळून पाहिलं. भुवया उंचावत ती उद्गारली, “असं कसं झालं?”
अपाला शोधू लागली. पालकांच्या शेकडो चौकशांना तोंड देणं आता तिला शक्य नव्हतं. अपाला हाका मारू लागली, “रिद्धी, कुठे आहेस तू? सगळ्या मुलींपाशी ये.” काय झालंय ते पंचवीस मुलींना समजेना. त्या अवाक होऊन अपालाकडे पाहू लागल्या. कोणीच पुढे आलं नाही. आता मात्र अपालाचं धाबं दणाणलं. शुकतारा तिच्यावर तुटून पडण्याआधीच चंद्रोदयनं शांतपणे विचारलं, “स्टेजवर किती मुली होत्या?”
“सत्तावीस मुली होत्या.” अपालानं एका दमात उत्तर दिलं.
“मोजून बघा. इथे पंचवीस जणीच आहेत.”
अपाला मोजू लागली. “एक, दोन, तीन, चार….तेवीस, चोवीस, पंचवीस! असं कसं झालं? उरलेल्या दोन मुली कुठंयत?” क्षणभर अपालाच्या तोंडून शब्द फुटेना. ती ग्रीनरूमच्या बाहेर आली आणि व्हरांडयाच्या डाव्या बाजूला असलेल्या एका खोलीत शिरली. पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी ही खोली वापरत असत. ती खोली व्यवस्थापकांनी आज त्यांना वापरायला दिली होती. खोलीत शिरल्यावर अपालाचे डोळे फिरले. मोठया सोफ्यावर बसून निशिगंधाच्या माळा आणि अनेक छोटया छोटया वस्तू गोळा करून रिद्धी आणि सोमदत्ता स्वत:च्या खेळात रंगून गेल्या होत्या. साजशृंगार झाल्यावर या दोघी सगळ्यांच्या नजरा चुकवून इथे कधी आणि कशा आल्या त्याचा अपालाला पत्ताच लागला नाही. मेकअप बिघडू नये, आपापसात भांडू नये म्हणून आटापिटा करता करता कोण आहे आणि कोण पळालंय ते अपालाला समजलं नाही. कुठेही रिद्धी आणि सोमदत्ताचा आवाज येत नव्हता. कुठला रंगमंच, कुठला कार्यक्रम आणि कुठला नाच….’खेळायच्या खोली’त खेळतांना त्या देहभान विसरल्या होत्या.
समाप्त
श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ शारदीय आनंद बाजार २०११ या बंगाली कथेचा भावानुवाद
” चि.नथू , वाढदिवसाच्या —अरे मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा काय देते ? कसला वाढदिवस? आज तर तुझी जयंती तू आम्हाला सोडून गेलास हे मन मानतच नाही.”
नथू, हे व्यक्तिमत्व असचं होतं ना त्याचं माझं काही नातं ना गोतं. माझ्या बॅकेत एक साधा शिपाई .पण तो माणूस म्हणून फार चांगला. त्याचं आणि माझं नातच वेगळंच.त्या नात्याला काही लेबल नव्हते.
सतत हसतमुख ,कामसू कोणतेही काम करण्याची तयारी .कोणत्याही कामाबद्ल कमीपणा नाही.सगळ्यांशी आपुलकीने बोलणं मग तो स्टाफ असो की कस्टमर . कोणाशी कधी भांडणं साधा वाद पण घातलेला आठवत नाही.
फार कष्टाळू एका लहानशा खेड्यातून आलेला.नौशीर सारख्या देवमाणसाची गाठ पडली.आणि आयुष्यच बदलून गेले.
नौशीरची ,त्याच्या पत्नीची खूप सेवा केली .बँकेची इमाने इतबारे वयाच्या 60 वर्षापर्यंत सेवा केली.लायकी,क्षमता असूनही का कोणास ठाऊक पण प्रमोशन घेतलं नाही.काय वाघासारखं काम करायचा?मोदीजीच्या नोटा प्रकरणाच्या काळात एखाद्या हेडकॅशियरला लाजवेल असं काम त्यानी केलं.कुठे त्याचा गवगवा नाही की कौतुकाची अपेक्षा नाही.
मधल्या काळात मला रिक्शाचा अपघात झाला.माझ्या घराकडून बॅकेत जायला एकच सोयीचे वाहन रिक्शा.पण अपघातामुळे मला रिक्शाचा धस्का, मनांत भिती बसली होती. तेव्हा हे महाशय मला स्कूटर वरुन घरी सोडायचे.”तू अजिबात घाबरू नकोस मी स्लो चालवतो जेव्हा तुला भिती वाटेल .तेव्हा सांग मी पाय टेकवून स्कूटर थांबवीन. इतकं माझ्यासाठी करुन त्याबद्दल कशाची ,साध्या कौतुकाची आशा ,अपेक्षा पण नाही.26जुलै2005 च्या त्या भयानक पावसांत पण त्यानी आम्हाला तीन लेडीज स्टाफला हळूहळू चालत घरी सोडले.???
फार मेहनती. त्याला अर्धागिनीची कविताची साथ पण तशीच मिळाली. ती पण कायम हसतमुख प्रेमळ आतिथ्यशील. हौशी जोडपं दरवर्षी गणपती आणायचे. मोठी मूर्ती. भव्य आरास. गौरीच्या दिवशी जेवणं पंगती.आमच्या कुटुंबाला आग्रहाचे कवितांचे आमंत्रण. मला non veg आणि माझे मिस्टर गणपतीच्या दिवसात veg खातात म्हणून त्याना veg.माझा मुलगा नाही गेला तर कविता त्याच्या साठी डब्बा भरुन द्यायची. काय संबंध ? नाही नातंगोतं, नाही जातीचे पातीचे. पण संबंध जिव्हाळ्याचे आपुलकीचे.
कधी रविवारी सकाळी वरसोव्यावरुन फिश आणं .कधी d mart चं सामान. करोनाच्या काळात गेल्या वर्षी आंबे आणून आम्ही वाटून घ्यायचो.
सकाळी बॅकेतले काम करून दुपारी कवितांना केलेले टेलरिंगचं काम मोठ्या थैल्या भरुन टेलरला नेऊन देणं .परत दुस-या दिवशी साठीं त्याच्याकडून काम आणणं. सुपारीच्या खांडाच सुध्दा व्यसन नाही.म्हणून तर एक शिपाई असून गावाला घर बांधलं.मुलाला MBA केलं.मुलाला two bhk घ्यायला आर्थिक मदत केली.मुलगा पण हुशार,सुस्वभावी बापासारखाच गुणी.सून सुध्दा छान हुशार MBA आतिथ्यशील .एक गोड नातू.आणखी एक लहान मुलगा .सुंदर दृष्ट लागण्यासारखं. हो दृष्टीच लागली. आणि करोनाच्या भयानक एका सकाळी पुजाचा,सूनेचा मला फोन आला.
“मावशी, पप्पा इज नो मोर” मी अर्धवट झोपेत. मी फोन ठेवला. माझ्या डोक्यापर्यंत पोहोचलचं नाही. परत मी तिला फोन लावला. तर परत तीच न्यूज .
करोनाने त्याचा आठ दिवसाच्याच कालावधीत घास घेतला. मुलांनी सुनेने खूप धावपळ केली. पण शेवटी आलं देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना.
एक निर्व्यसनी,ना बी.पी., ना डायाबिटीस. धट्टाकट्टा माणूस. नुकताच रिटायर्ड झालेला,आता शांतपणे जगण्याची बायकोला घेऊन भारतभर फिरण्याची स्वप्न बघणारा .स्वतः एकटाच स्वर्गात फेरफटका मारायला गेला. गेला नाही नेला देवाने.
☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ३ ☆ सुश्री सुमती जोशी ☆
“काय गं तू मला हाका मारत होतीस का?” नंदिता हळूच बेडरूममध्ये डोकावली. तिला पाहून शुकताराचं अवसान गळालं. रडत रडत ती म्हणाली, “कंबरेच्या दुखण्यामुळे मी आज आडवी झालेय. मला हलताही येत नाहीय आई.”
“आज पाखीला रंगीत तालमीला कोण घेऊन जाणार?” हुंदके देत शुकतारा विचारू लागली, “तुला ते जमणार नाही. तिला घेऊन जाणारं मला कोणी भेटलं नाही.”
नंदितानं क्षणभर विचार केला. भीत भीत म्हणाली, “पाखीच्या याच नाचावरून तुझा जावयाशी खटका उडाला होता, हे मला माहितेय. ऑफिसमधून ताबडतोब निघून पाखीला पोचवून येऊ दे त्याला! चंद समंजस आहे. मी सांगते त्याला.”
शुकताराला थोडा धीर आला. चंद्रोदयला फोन करून तिनं आपली असहाय्यता सांगितली आणि विचारलं, “काय हो, तुम्ही येऊ शकाल का?”
“येऊ शकेन. आलोच.” चंद्रोदयनं शांतपणे उत्तर दिलं.
“प्लीज आणखी उशीर करू नका. ताबडतोब बाहेर पडा.”
शुकतारा रडू लागली. नंदितानं पाहिलं, एवढया गोंधळातही नात गाढ झोपली होती.
——————————————————————————–
शाश्वतीदी ग्रीनरूममध्ये कोणालाच येऊ देत नव्हत्या. लहान, मोठया, मध्यम वयाच्या मिळून पन्नासएक मुली ग्रीनरूममध्ये होत्या. त्यात भर म्हणून पालकांनी आत जायचा प्रयत्न केला तेव्हा गोंधळ उडाला. शाश्वतीदींनी योग्य निर्णय घेतलाय असं शुकताराला वाटलं. अपाला नावाच्या एका विद्यार्थिनीवर त्यांनी या चिल्ल्यापिल्ल्यांची जबाबदारी सोपवली होती. बहुतेक जणांच्या हातात कॅमेरा किंवा हँडीकॅम होता. चंद्रोदयला कसलाच ताण वाटत नव्हता. नवीन कपडे घालून नटलेल्या लहानग्या पाखीला बघायला तोही डिजिटल कॅमेरा घेऊन सज्ज होता.
अस्वस्थ पालकांच्या गर्दीतून वाट काढत रेणू बाहेर आली. तिच्याबरोबर तिचे पती होते.
शुकताराने चंद्रोदयची ओळख करून दिली. नाचाच्या कालासमध्ये कधी न गेल्यामुळे त्याला कोणीच ओळखत नव्हतं. आज चंद्रोदय आला होता. शुकतारासाठी हा भाग्ययोग होता. गेल्या आठवडयात पाखीला याच मंचावर पोचवायचं आणि रंगीत तालीम झाल्यावर घरी आणण्याचं काम चंद्रोदयने मोठया निष्ठेनं केलं होतं. पाखीला घरी घेऊन येण्याआधी तो शाश्वतीदींना भेटला. शुकताराच्या पाठदुखीविषयी त्यांना सांगितलं. मग म्हणाला, “या लहान मुलींचा इतके वेळा सराव करून घेता, शिवाय रंगीत तालीम ठेवता हे त्रासदायक आहे. त्यात हा उकाडा! पोरी आजारी पडल्या नाहीत म्हणजे मिळवलं.” त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत शाश्वतीदी म्हणाल्या, “मुली आजारी पडणार नाहीत. उलट रिद्धीच्या आईप्रमाणे त्यांचे आई-बाबाच आजारी पडतील. मुलांकडून काही करून घ्यायचं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या मुलीनं स्टेजवर यावं असा पालकांचा हट्ट असतो आणि तो आम्हाला पूर्ण करावा लागतो. तसं बघायला गेलं तर आमची आणि मुलींची अवस्थाच दयनीय असते.”
शाश्वतीदींपाशी जात चंद्रोदय म्हणाला, “आपण ही चर्चा आता थांबवू या आणि आत जाऊ या.”
ते सर्वजण आत गेले, पण एकत्र बसले नाहीत. शुकतारानं नंदिताला मधल्या रांगेत बसवलं होतं. सगळ्यांच्या ओरडया आरडयामुळे हॉलमध्ये गोंधळ उडाला होता. शुकतारा पॅसेजजवळच्या सीटवर बसल्यावर कृष्णा धावत तिच्यापाशी आली आणि विचारू लागली, “मुलींच्या नाचात कितीजणी आहेत, माहितेय का तुला?”
“छे! मला काहीच माहीत नाही.”
“मी ऐकलंय की तीस मुलींना घेतलंय. फार गडबड झालेली दिसतेय. तुला काय वाटतंय?”
गालातल्या गालात हसत शुकतारा म्हणाली, “ते सगळं जाऊ दे. तुझ्या माझ्या मुलीला एक चांगली संधी मिळालीय हे महत्वाचं. दुसरा काही विचार आता करू नकोस.”
कृष्णाचं समाधान झालं. ती आपल्या जागेवर परत गेली. दोन मिनिटात ‘नुपूर निक्कण’ या नाचाच्या क्लासचा वार्षिकोत्सव सुरू झाला. चंद्रोदयनं घडयाळात पाहिलं. कार्यक्रम सुरू करताना नानाविध कारणांनी उशीर होतो पण आज फक्त चार मिनिटांचा उशीर झाला होता. कार्यक्रमाची सुरुवात वेळेवर करून शाश्वतीदींनी पालकांना चकित केलं होतं.
गुरुवंदनेनं सुरुवात झाली. रंगमंच व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, संगीत सगळं ठाकठीक होतं. निष्ठापूर्वक आणि योजनाबद्ध व्यवस्था केल्याचा ठसा सगळीकडे उमटला होता. चंद्रोदयला समाधान वाटलं.
श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद
☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग २ ☆ सुश्री सुमती जोशी ☆
धुसफुसत शुकतारा उठली. “मला फक्त एवढंच म्हणायचंय की ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. उद्या जर असंच उकडत असलं तर तुम्ही…”
विषयांतर करण्यासाठी चंद्रोदयनं विचारलं, “पाखी कुठंय?”
“बबनूच्या घरी गेलीय. सारा वेळ फक्त खेळ आणि खेळ! म्हटलं टेप चालू करून देते, नाचाची प्रॅक्टीस कर. पोरीचं उत्तर – नाही. चित्र काढ – नाही. टॉम अँड जेरी बघ – नाही. सगळ्याला नाही म्हणण्यात पोर पटाईत. अगदी तुमच्यासारखी!”
शेवटच्या वाक्यातला खोचक भाव चंद्रोदयने सहन केला. स्वाभाविक होत चंद्रोदय म्हणाला, “पाखीला एकदा हाका मारून बघ ना. आली तर तिच्याशी थोडा वेळ गप्पागोष्टी करीन.”
अचानक भुवया उंचावून ठेच लागलेल्या माणसाप्रमाणे शुकतारा त्याच्याकडे पाहू लागली. शंकाकुल होत म्हणाली, “मी तिला घेऊन येते पण कृपा करून पोरीला बिघडवू नका.”
शुकतारानं हळूच डोळ्यातलं पाणी पुसलं. आज संध्याकाळी पाखीच्या नाचाची रंगीत तालीम. रंगीत तालमीसाठी प्रिटोरिया हॉलमध्ये पाखीला घेऊन जाणं तिच्या आजीला जमलं नसतं. कंबर धरल्यामुळे शुकताराला त्या दिवशी सरळ उभंही राहता येत नव्हतं. शुकताराच्या शरीरानं आज संप पुकारला होता. आजच्या महत्वाच्या दिवशी या दुखण्यानं डोकं वर काढलं नसतं तर चाललं नसतं का? आता पाखीला कोण घेऊन जाईल?
इतके दिवस घेतलेली मेहनत फुकट जाणार की काय, अशी भीती वाटली तिला! तसं झालं असतं तर चंद्रोदयला तोंड दाखवायची तिला लाज वाटली असती. तिला हार मानावी लागली असती. त्याच्यापाशी दूरदृष्टी होती. त्याचे विचारही पारदर्शी असत. एवढं समजत असलं तरी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही बाबतीत पाखीने प्राविण्य मिळवावं असं काही त्याला वाटत नसे. स्वत: काही करत नाही, पण देहबोलीतून शुकताराच्या मार्गात अडथळे आणतो.
ए.सी. सहन होत नाही म्हणून नंदिता दुसऱ्या खोलीत झोपली होती. ताबडतोब आईशी बोलायला हवं. संध्याकाळ होण्याआधीच पर्यायी व्यवस्था करायला हवी. तितक्यात शुकताराला दिपांजनाच्या आईची-रेणूची आठवण झाली. ‘रंगीत तालमीसाठी पाखीलाही घेऊन जा’ अशी तिला गळ घालता आली असती. तिने रेणूला फोन लावला. सगळी हकीकत ऐकल्यावर रेणू म्हणाली, “आज मी गडियात माझ्या माहेरी आलेय. आई-बाबांच्या लग्नाचा आज तिसावा वाढदिवस आहे. अनेक नातेवाईक येणार आहेत. ते सर्व सोडून बाहेर पडणं मला जमणार नाही.”रेणूने फोन ठेवला. शुकतारा आणखीच अस्वस्थ झाली.
श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद
☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग १ ☆ सुश्री सुमती जोशी ☆
काल दिवसभर उन्हाच्या तापाने कोलकाता शहर जळत होतं. चंद्रोदय सकाळी बाजारात जाऊन आला तेव्हा सकाळचे नऊ–साडेनऊ वाजले होते. या कडक उन्हामुळे शरीराची कातडी जळून जाईल, असं त्याला वाटू लागलं. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी चंद्रोदय सबंध आठवडयाचा बाजारहाट करत असे. उरलेल्या शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे त्याची बायको शुकतारा बाजारात जात असे. दोघं नोकरी करत. त्यांना एकच मुलगी – ‘रिद्धी’. तिचं डाकनाम ‘पाखी’. वय वर्षे पाच. ती आहे के.जी.च्या दुसऱ्या वर्षात. कधीकधी चंद्रोदय पण बहुतेक वेळा शुकतारा तिला सकाळी शाळेत सोडून येत असे. त्यानंतर तिला शाळेतून आणणं, आंघोळ घालणं, दुपारी जेवू घालणं, झोपवणं, संध्याकाळी बागेत घेऊन जाणं अशी सगळी कामं शुकताराची आई नंदिता करत असे. वडील वारल्यावर शुकतारा रिद्धीच्या या लाडक्या आजीला आपल्या घरी घेऊन आली. पाखीला स्वत:च्या आईपाशी सोपवून शुकतारा निर्धास्तपणे साडेचौदा हजार मिळवून देणाऱ्या नोकरीवर जाऊ शकत असे. धुणंभांडयांची बाई सोडली तर बाकी दिवसभर कोणी नोकर ठेवायची तिला गरज वाटत नसे. नंदिता तिच्या मुलीपेक्षा बावीस वर्षांनी मोठी होती. निसर्गदत्त सौंदर्याचा नजराणा तिच्यापाशी होता. प्रकृती स्वास्थ्याचंही तिला वरदान होतं.
बाजारहाट करून झाल्यावर चंद्रोदय ए.सी.लावून बेडरूममध्ये आडवारला. आला तेव्हा तो घामाने निथळत होता. बाजारातल्या धुळीने पाय माखले होते. लेंग्याच्या काठाला चिकटलेला भोपळ्याचा मऊ भाग आता वाळला होता. पाच मिनिटांनी शुकतारा खोलीत डोकावली आणि खोलीतलं दृश्य पाहून जवळ जवळ ओरडली, “काय हो, किती वेळा बजावलं तरी हातपाय न धुता, घामट कपडे न बदलता कॉटवर झोपलात ना?”
चंदोदय डोळे न उघडता नाखुशीने म्हणाला, “मी आणखी काही करू शकत नाही. हुश्श! किती उकडतंय! एकदा बाहेर जाऊन बघ म्हणजे समजेल काय भयंकर अवस्था आहे ते!”
त्याचं बोलणं फारसं मनावर न घेता शुकतारा म्हणाली, “तुम्ही अतिशयोक्ती करताय. रोजच उकडत असतं. याच उकाडयात रोज आपण ऑफिसला जायला बाहेर पडतो.”
रिमोटच्या मदतीने साऱ्या घराचं तापमान वीस अंश सेंटीग्रेड करून चंद्रोदयनं विचारलं, “आज मुलींच्या नाचाची रंगीत तालीम आहे का?”
“आज नाही. उद्या आहे.” यजमानांकडे तिरकस कटाक्ष टाकत शुकतारानं विचारलं, “का बरं एवढी चौकशी करताय?”
एका सेकंदाचा अवधी जाऊ न देता आवाज चढवत चंद्रोदय उत्तरला, “उद्या जर असाच उकाडा असला तर मी पाखीला बाहेर पडू देणार नाही. पोरीला काय कळतंय?”
“सगळं तुमच्या आदेशानुसार होणार नाही मिस्टर भट्टाचार्य.” शिरा ताणत शुकातारानं बजावलं, “उद्या त्यांची रंगीत तालीम आहे. उद्या जायलाच हवं. शाश्वतीदींनी पुन:पुन्हा बजावलंय. सुरुवातीपासूनच…”
त्याचा एक मुद्दा बरोबर होता, स्टेजवरच्या इतक्या लहानशा कार्यक्रमासाठी पाखीने एवढी मेहनत घ्यावी असं चंद्रोदयला वाटत नव्हतं. दर शनिवारी आणि रविवारी भर दुपारी साडेतीन वाजता शुकतारा बळजबरी करत लेकीला घेऊन जाई, हे योग्य नाही असं चंद्रोदयचं मत होतं.
गेल्या वर्षी सुकिया रोडवरच्या एका नाचाच्या क्लासमध्ये पाखीचं नाव घातलं होतं. शाश्वतीदी त्या क्लासच्या सर्वेसर्वा. शुकतारा लहानपणी नाच शिकली होती. त्या शिक्षणाचा जीवनात काहीही उपयोग झाला नाही, हे समजत असूनही तिनं लेकीला नाचाच्या क्लासमध्ये घातलं होतं. मुलांना नाच, गाणं, पोहणं, विविध खेळ या सगळ्यात प्राविण्य मिळवून ऑल राउंड करायचं असतं. अशा आया सगळीकडे प्रवेश घेत पळापळ करत असतात. शुकतारा अशांपैकीच एक, याविषयी चंद्रोदयच्या मनात संदेह नव्हता. सुरुवातीपासून चंद्रोदय तिला रोखायचा प्रयत्न करत होता. पाखी मुळातच अशक्त होती. अधूनमधून दुखणी चालूच असायची. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाखीला काय किंमत मोजावी लागणार होती कोणास ठाऊक! आपलं स्वप्न साकारण्यासाठी आईवडील मुलांचं बालपण लुटून नेतात. तो शुकताराला वाईट म्हणत नव्हता, पण तिला जागं करायचा प्रयत्न करत होता. अर्थात या कामात तो रेषभरही पुढे सरकला नव्हता. तरीही त्यानं प्रयत्न सोडले नाहीत.
श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद
सगुणाने खुट्याला ओढ घेणाऱ्या शेळीला आवाज दिला.आज सगुणाला मजुरीचं काम नव्हतं. शेंगाच्या मोकळ्या वावरात चार शेंगा चाळून मिळत्यात का? बघायला तिला जायचं होतं म्हणून लगबगीनं तिचं आवरण सुरु होतं.लुडबुड करणाऱ्या आपल्या तीन वर्षांच्या पोराला बाजूला सारत तिची कामाची लगबग सुरु होती. कधी शेळीशी तर कधी बाळाशी बोलत तीनं लोखंडी बारडी उचलली त्यावर धुण्याचं बोचकं ठेवलं.एक बाजू आत एक बाजू बाहेर अश्या दोन दरवजाना खुडुक दिशी ओढून नीट बसवलं, कडी लावून गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला अडकवलेल्या किलीने कुलूप लावलं ;टॉवेलची चुंबळ करून डोक्यावर ठेवली,चुंबळीवर बारडी नीट बसली ना? चाचपून पाहिले मग शेळीचं दावं सोडून हातात धरलं.एका काखेत मुलाला घेऊन ती शेताच्या वाटेला लागली.
आज ऐतवार, तिच्या कुलस्वामीचा उपवास ! घरात धान्याचा कण नव्हता.हातावरचं पोट तीचं ! रोजगार केला तरच पोट भरुन खायला मिळे.गेल्याच वर्षी शेतात काम करताना तिच्या नवऱ्याला पान लागलं अन मिळवता हात कमी झाला.या अगोदर पण ती रोजगार करतच होती पण एखाद दिवशी नाही मिळाला तर उपवास नव्हता घडत ! रोजगार मिळाला की ती,शेळी अन तिचं तीन वर्षांचं तान्हुलं एकदम खुशीत असायचे ! शेळीला पोट फुगेपर्यंत चारा मिळायचा.तिचं पोट भरलं तर ती भरपूर दूध द्यायची अन मग मुलाचं पोट भरायचं.रोजगार मिळेना म्हणजे शेळी ल्याप व्हायची मग धार काढायची तिची इच्छाच व्हायची नाही. तिला वाटायचं,’ का उगाच तिची आतडी पिळावीत? ‘ आताही दोन दिवस तिला काही काम नव्हतं कसं असेल काम? ऊन पेटलं होतं,जिकडे तिकडे उन्हाच्या झळा सैरावैरा धावत होत्या.चहुबाजूनी माळरान आग ओकत होतं.झाडाचा पाला सुकला होता,रस्त्यावरचा फुपुटा उन्हात तापला होता, विहिरी खरडल्या होत्या,प्यायला कसं बस पाणी मिळत होतं तेच भाग्य होतं ! बसून थोडेच पोट भरणार? तिला एक कल्पना सुचली,’पाऊस पडायच्या आत शेंगा चाळाव्यात !’ आणि तिनं गणपा आप्पाला विचारलं,’ आप्पा शेंगा चाळून दिऊ का? ‘
आप्पा दिलदार माणूस ! ” मला काय नको दिऊ पोरी,तूच काय चार निघत्याल त्या घिऊन जा.”आप्पानी रात्रीच सांगितलं होतं अन सगुणा तिकडेच हरकून निघाली होती.
डोक्यावर बादली, काखेत मूल अन एका हातात शेळी ! आज शेळी जास्त ओढत नव्हती कारण इकडं तिकडं एक पण हिरवा अंकुर तिला मोहात टाकत नव्हता.एखाद दुसरी बाभळीची रस्त्यावर पडलेली शेंग टिपत टिपत ती गळ्यातल्या घुंगराच्या तालावर झपझप चालत होती. इतक्यात रस्त्यावर पडलेल्या एका ज्वारीच्या कणसाला तिनं गट्टम केलं.चार पावलं चालली असेल तोपर्यन्त दुसरं कणीस !पांढऱ्या शुभ्र मोत्यांसारख्या दाण्यांनी गच्च भरलेलं कणीस पाहून तिनं हातातलं दाव सोडलं अन चपळतेनं ते कणीस ओच्यात टाकलं.
शेळी आता मुक्त झाली.ती इकडं तिकडं तुरुतुरु पळू लागली तोपर्यन्त सगुणाला अजून एक कणीस सापडलं.तिनं तेही कणीस ओच्यात ठेवलं.तिची नजर सहजच पुढं गेली. ठराविक -ठराविक अंतरावर तिला कणसं दिसली,”अरारा ! कुणाची तर साटी गळत्या जणू !” ती स्वतःशीच पुटपुटली. शेळीचं दावं तिनं कमरेला बांधल अन एक एक कणीस वेचित ती पुढं निघाली.
शेतात पोहचताच तिनं मुलाला खाली उतरलं ;ओच्यातली कणसं भुईवर ओतली.कम्बरेचं दावं सोडून शेळी शेवरीच्या खोडाला बांधली. शेवरीची फांदी मोडून पाला शेळीपुढं टाकला,चार शेवरीची झुडपं एकत्र करून त्याला साडीचा धडपा बांधून त्या सावलीत तिनं मुलाला बसवले.” कुटं जायाचं न्हाई,हितच बसायचं… आपल्याला शेंगा पायजेत ना? मग आपल्या शेळीवर ध्यान ठेव बरं का?” तीनं तान्हुल्याला तिनं प्रेमळ ताकीद दिली.तोही समंजस बाप्यासारखा थोडा वेळ सावलीत बसला अन थोड्या वेळाने दगड धोंडे गोळा करत आईच्या मागोमाग खेळू लागला.
बादलीतलं छोटंसं हात खोरं घेऊन ती भुईमुगाच्या सरी धरून डबरी पाडत शेंगा चाळू लागली.एक….दोन…तीन…सगळी डबरी रिकामीच ! एकपण शेंग दिसेना ! खोलवर काढलं तर एखाद दुसरी शेंगेची आरी दिसायची.आरी ओढली की एखाद दुसरं फोलपटच हाती लागायचं ! तिची घोर निराशा झाली,’चार शेंगा मिळत्याल तर उपासाला हुत्याल ‘म्हणून ती आशेनं डबरी पाडत निघाली,पण अख्खी सरी सम्पली तरी एकपण शेंग हाती लागली नाही. उन्हाचा ताव चांगलाच वाढला होता. तान्हुल्याचं पाय भाजू लागलं म्हणून तिनं त्याला मघाच्या सावलीत बसवले.सोबत आणलेल्या किटलीतलं पाणी तिनं घटाघटा ओंजळीत धरून प्यायली.बाळाला एक ओंजळ पाजली,अन हातात दोन बिस्कीट देऊन ती पुन्हा दुसऱ्या सरीत डबरी पाडू लागली. आता मात्र दोन..चार..दोन चार शेंगा सापडू लागल्या.तिनं हाताचा वेग वाढवला मिळतील तेवढ्या शेंगा ती ओच्यात साठवू लागली मधूनच बाळाकडे एकदा,शेळीकडं एकदा नजर देऊ लागली.उन्हाने जमीन वाळली होती. तिचं हातखोरं खर- खर वाजू लागलं,हात भरुन येऊ लागलं,पोटात भूक नाचू लागली.शेळी झुडुपाच्या सावलीत निवांत बसली होती,बाळ पण खेळत -खेळत बसल्या जागेवर निजले. एक पातळसा धडपा तिनं त्याच्या अंगावर -तोंडावर हलकेच पांघरला,जराशी चुळबुळ करून तो शांत झोपी गेला. तिनं चार शेंगा फोडून तोंडात टाकल्या,किटलीतल्या पाण्यापुढं पुन्हा एकदा ओंजळ धरली,उन्हानं तापलेलं पाणी तहान शमवत नव्हतं पण तिनं ती शमवून घेतली.
आता एक -दोन तास तरी तिला बाळाची काळजी नव्हती,ती वेगानं डबरी पाडू लागली.आता मात्र जास्त खोलवर जायची गरज नव्हती वरच्यावरच दोन तीन खोरी मारली की चार -दोन,चार दोन शेंगा सापडू लागल्या,ती हरकून गेली.बऱ्याच शेंगा तिच्या पदरात पडल्या.
ऊन्ह चांगलंच तापलं, तिला सोसेना,तीनं खोरं पाटी ठेऊन दिली.शेळीला परत चार फांद्या मोडून टाकल्या. पाटात राहिलेल्या चूळ भर पाण्यात तिनं शेळीची तहान भागवली,अन हौदाच्या तळात उतरून मिळालेल्या बादलीभर पाण्यात चार कपडे धुऊन टाकली ; बाळाजवळ कलंडत उरल्या सुरल्या पान्ह्याच्या दोन धारानी त्याला तृप्त करू लागली.
ऊन्ह आता कलतिला लागली होती, तिनं चाळलेल्या शेंगा एका धडप्यात ओतल्या.सकाळी सापडलेली ज्वारीची कणसे त्यावर ठेऊन धडपा नीट बांधला. सुकलेली कपडे नीट घडी घालून बादलीत ठेवली. बादलीवर पुन्हा ते शेंगाचं बोचकं,काखेत मूल अन हातात शेळीचं दावं धरून घराच्या दिशेने चालू लागली.
अंगणात तिची चाहूल लागताच क्वार ss-क्वारss करत चार कोंबड्या तिच्या भवताली नाचू लागल्या. डोक्यावरचं बोचकं खाली ठेवताच टोच मारत त्यानी साडीच्या धडप्यातन एक एक ज्वारीचा दाणा टिपायला सुरुवात केली.
छपराच्या मेडक्याला तिनं शेळीचं दावं बांधलं,कडेवरून उतरताच तान्हुले कोंबड्यामागे पळू लागले.शेळीला पाणी पाजून जरास भुस्कट तिच्यापुढं ठेवलं.धडप्यातली कणसं बाजूला करून शेंगाचं बोचकं नीट ठेऊन दिलं.सारवलेल्या अंगणात कोंबड्या हुसकत बडावण्यानं सगळी कणसं बडवून टाकली. पिश्या बाजूला टाकताच भुर्रकन येऊन चिमण्या उरलं सुरलं दाणे टिपू लागल्या,काही पिश्या कोंबड्यानी पळवल्या.बडवलेले दाणे तिनं वाऱ्यावर उफणून घेतले.पांढरेशुभ्र टपोरे दाणे टपटप डालग्यात पडू लागले,सगुणाची भूक हरपली. तिने मापट्याने दाणे मोजले तीन मापटी भरले.
जात्यावरच्या साळूत्याने तिने जाते साफ केले,हलक्या मुठीने दाणे जात्यात टाकत तिनं दळायला सुरुवात केली.
“दळण दळण्यासाठी
मदतीला धावे हरी
जाते टाकुनी पदरात
जनाई चाले पंढरी…”
ओवीचा आवाज ऐकताच बाळ धावतच येऊन मांडीवर बसला. पांढऱ्या शुभ्र पिठाचा ढीग जात्याभोवती जमा झाला. सगळं पीठ साळूत्याने एकत्र करून तिनं पाटीत भरलं.भुईवरच्या पिठात बाळ खुशाल खेळू लागला.
अंगणातल्या साऱ्या पिश्या एकत्र करून तिनं चूल पेटवली,पत्र्याच्या डब्यात हात घालून मूठभर तांदूळ भगुण्यात घेतलं स्वच्छ खळबाळून चुलीवर ठेवलं.वैलावर डीचकीत पाणी तापायला ठेऊन बारीक बारीक काटक्या,चिपाडं अलगद त्यावर ठेवली,चूल चांगलीच ढणाणली.मग एक चम्बू घेऊन तिनं शेळीची धार काढली फेसाळत्या दुधाचा चम्बू तिनं तसाच वैलावर ठेवला,वैलावरच्या कढत पाण्याने तिनं बाळाचे हात पाय धुतले,तोंडावर पाण्याचा सपकारा मारून स्वच्छ कपड्यांनं पुसले.चुलीच्या उजेडात तिनं चिमणी पेटवून चुलीवरच्या उंचवट्यावर ठेवली.तिन्ही सांज झाली,अंधुक होऊ लागलं.मेडक्याला धडपडणाऱ्या शेळीला तिनं अजून थोडं पाणी – भुस्कट ठेवलं. भातातलं पाणी आटत आलं होतं. तिनं वैलावर भात ठेवला,चुलीत अजून चार काटक्या,चार चिपाडं घालून तवा ठेवला.काटवटीत पीठ घेऊन एक भाकरी थापली अन तव्यावर टाकली.खरपूस भाकरीचा दरवळ तिच्या छपरात पसरला.चुलीपुढच्या आरावर भाकरी कशी फुलावानी टम्म फुगली ;एक छोटा तुकडा अन पाण्याचे चार थेंब टाकून तिनं अग्नी शांत केला.एका पसरट दगडावर बत्याने दोन लसूण पाकळ्या,दोन मिरच्या ठेचून तव्यातल्या टाकभर गरम तेलात टाकल्या.चर्र ss खमंग वास छपरात पसरला, चवीपुरते मीठ -चटणी टाकून त्यात मूठभर शेंगदाणे तिने चेचून टाकले पाण्याचा शिंतोडा देऊन आच कमी केली. वैलावरचा भात तिनं ताटलीत उपसला,चिमटभर साखर अन दूध घालून तिनं बाळाला भरवला.दुसऱ्या एका ताटलीत भाकरी अन शेंगदाण्याची चटणी घेऊन त्याभोवती पाणी शिंपडून एक घास बाजूला ठेवला,भुकेने कासावीस झालेल्या जीवास एक घास मुखात जाताच गोड गोड लागला .
जेवणाची ताटली खंगाळून ते पाणी तिनं अंगणात टाकले,दारातली शेळी छपरात एका कोपऱ्यात बांधली. एक तरट पसरून त्यावर मऊ दुपटे टाकून तिनं बाळाला त्यावर झोपवले हलकेसे पांघरून त्याच्या अंगावर टाकून मायेने थोपटले.दिवसभराच्या थकव्याने बाळ पेंगुळले. हलकेच उठून तिनं दरवजा बंद केला,’खुडुक’ आवाजाने पुन्हा एकदा दोन्ही दारे गच्च बसली.दाराला पाटा लावून तिनं तरटावर अंग टाकलं.बाळाला कुशीत घेऊन ती शांत समाधानाने झोपी गेली.
तिच्या घराबाहेरचे जग अजून जागे होते,व्यवहार चालू होते पण सगुणा तिच्या छोट्याश्या विश्वात शांतपणे झोपली होती…
आत शिरताच डाव्या बाजूला बाकड्यावर बसलेल्या त्याला आणि त्याच्यासोबतच्या दोघांना पाहून वाडेकर कुणालाही दिसू नयेसं गालातल्या गालात हसले आणि त्यांच्या जवळ जात कृतक कोपाने म्हणाले,
“लाज नाही वाटत… ज्यांनी अन्नाला लावलं त्यांच्याशी बेईमानी करायला ? अरे, किती विश्वासाने तुमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तुम्हीच चोरी केलीत“
ते बोलत बोलत त्याच्यासमोर आले आणि त्याला म्हणाले,
“तुला तर आम्ही सज्जन, प्रामाणिक समजत होतो.. आणि तूच..?“
तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी वाडेकरांना हाक मारली तसे ते तिकडे गेले.
“इन्स्पेक्टर साहेब, आमचे हे तिन्ही कामगार प्रामाणिक आहेत. त्यांना सोडून द्या.”
“पण साहेब, त्यांनी तर चोरी केलीय..”
“नाही वाडेकर, त्यांनी चोरीही केलेली नाही आणि ते चोराला सामीलही नाहीत.. आणि खऱ्या चोराचा शोध घेऊन इन्स्पेक्टरसाहेब त्याला पकडतीलच.. काय इन्स्पेक्टरसाहेब ?“
“शोधायला कशाला हवा.. मुद्देमाल सापडलाय आणि चोर ही इथंच आहे..”
“क्कायs ? मुद्देमाल सापडला ? आणि चोर इथंच आहे ? साहेब मी म्हणलं नाही का तुम्हांला.. ते तिघंच असणार… मग इन्स्पेक्टरसाहेब मोकळं कशाला ठेवलंय त्यांना.. ठोका बेड्या.. नाहीतर जातील पळून..”
वाडेकर असे म्हणताच इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले,
“अरे खरंच की.. पळून जातील हे माझ्या ध्यानातच आलं नाही, हवालदार, बेड्या ठोका या वाडेकरला लगेच.. आणि टाका आत.”
इन्स्पेक्टर साहेबांचं हे वाक्य ऐकून वाडेकरांनी काही क्षण आकांडतांडव करत, नंतर आर्जवं करत ‘मी त्यातला नाही..’ असे सांगायचा, भासवायचा प्रयत्न केलाही पण नंतर मात्र सारा खेळ संपल्याची जाणीव त्यांना झाली तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला.. आपला खेळ संपलाय याची जाणीव होऊन ते मटकन खालीच बसले. त्याच्या बरोबरच्या दोघा सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
“धन्यवाद इन्स्पेक्टरसाहेब, तुमच्या मुळे आमचा माल चोरी होण्यापासून वाचला आणि खूप मोठं नुकसान टळलं.“
“अहो, आभार तर तुमचे मानायला हवेत, तुमच्यामुळे खरा चोर स्वतःच्या पावलांनी चालत आला पोलीस स्टेशनमध्ये. फरार झाला असता तर खूप त्रास झाला असता शोधायला.. माल ही चटकन सापडला. काही तासांचा जरी अवधी गेला असता तरी माल गुजरातमध्ये गेला असता आणि मग तिथून कुठं गेला असता हे सांगणेही आणि शोधणंही कठीण झालं असतं. “
“इन्स्पेक्टर साहेब, ते सारे क्रेडिट मात्र त्याचं आहे.. त्याने रात्री फोन करून त्याला आलेला संशय माझ्याजवळ व्यक्त केला नसता तर यातलं काहीच हाती लागलं नसतं. “
मॅनेजर साहेब त्याच्याकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले.
“अरे हो, हवालदार, चहा बिस्किटं सांगा.. सकाळपासून त्यांनी साधा चहा सुदधा घेतलेला नाही.“
इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला म्हणाले. चहा बिस्कीट मिळणार यापेक्षा आपली सुटका झाली या जाणिवेनं सकाळपासून सुकलेले त्यांचे चेहरे खुलले.
पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मॅनेजरसाहेबांनी त्याच्या दोन्ही जोडीदारांना पैसे दिले आणि जेऊनखावून नंतर बसने परत यायला सांगितलं. मॅनेजर साहेब आणि मालकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देत गाडीत पुढं बसायला सांगितलं.
दुसऱ्याच दिवशी मिलमध्ये मालकांनी त्याचा खूप मोठा सत्कार करून त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीसही दिले. तेंव्हा त्याच्याबद्दल तर्क-वितर्क करून चर्चा करणाऱ्यांची बोटं तोंडात गेली होती.
तो खुश झाला असला तरी मनात अस्वस्थही होता. आपल्याला संशय आला म्हणून आणि मॅनेजर साहेबांनी विश्वास ठेवला म्हणून…नाहीतर आज आपण तुरुंगात असतो… आणि चुकून मॅनेजर साहेबही त्यात सामील असते तर ?.. प्रत्येकवेळी नशीब, चांगुलपणा साथ देईल असे नाही त्यापेक्षा नकोच हे.. घरी जाऊ, रानात राबू..सुखाची, सन्मानाची मीठ-भाकरी खाऊ…
त्याने मनाशी निर्णय घेतला.. मॅनेजरसाहेबांना सांगितला. त्यांनी खूप सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा निर्णय झाला होता.
एसटी मधून फाट्यावर उतरुन,पेटी डोक्यावर घेऊन तो गावाच्या, घराच्या दिशेनं निघाला असताना त्यांच्या मनात आलं..’ वाडेकरांना आपण खुपतोय हे आपल्या आधीपासूनच लक्षात आलं होतं.. त्यात त्यांनी माल घेऊन जायला त्यांच्या नेहमीच्या माणसांना सोडून आपल्याला पाठवलं तेव्हापासूनच त्यात त्यांचा काहीतरी डाव असणार असे वाटत होतंच आपल्याला.. वाडेकरांनी स्वतः चोरी करून त्यात आपल्याला अडकवायचा आणि आपला पत्ता कायमचा कट करायचा डाव केला होता पण आपल्याला आधीच आलेला संशय आपण मॅनेजर साहेबांना आणि नंतर इन्स्पेक्टर साहेबांना सांगितला होता म्हणून बरं.. नाहीतर आपण खडी फोडत राहिलो असतो..’
वाडेकरांनी त्याला अडकवण्यासाठी सापळा लावून ठेवला होता पण त्या सापळ्यात ते स्वतःच ट्रॅप झाले होते, अडकले होते… कदाचित हातात बेड्या पडल्यावर वाडेकरांना ते सारे आठवलं असेल.. कदाचित त्यांनी आपल्यासाठी लावलेल्या सापळ्यात आपण त्यांनाच ट्रॅप केलंय हे ही कदाचित त्यांच्या ध्यानात आलं असेल.. पण हे सारं घडलं कसं ? याचं कोडं अजूनही त्यांना उलगडलं नसणार…ज्यावेळी त्यांच्या हातात बेड्या पडल्या त्यावेळचा त्यांचा चेहरा त्याला आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हसतच तो झपाझप पावलं टाकत घराकडे निघाला.
मिलला रशियाची अठ्ठेचाळीस लाख मीटर कापडाची ऑर्डर मिळाल्याने कंपनीत आनंदाचे वातावरण होते.. ऑर्डर वेळेत पूर्ण करायची असल्याने कामाचा झपाटा वाढविला होता.. कामगारही खुशीने ज्यादा काम करत होते..
अठठाविस लाख मीटर कापडाचा पहिला लॉट पोहोचवायचा होता. असिस्टंट मॅनेजरनी त्याला बोलावले आणि मालाच्या ट्रकसोबत जाऊन मुंबईच्या बंदरात माल जहाजावर चढवण्यासाठी पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. सोबत दोन सहाय्यकही दिले. वरिष्ठांनी विश्वासाने जबाबदारीचे काम सोपवल्यामुळे तो मनोमम खुश झाला होता.
माल बंदरात पोहोचेपर्यंत वाटेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने खूपच उशीर झाला होता. पोहोचायला उशीर झाल्यानं तिथली कार्यालयीन वेळ संपली होती. माल दुसऱ्यादिवशी जहाजावर चढवण्यात येणार होता त्यामुळे थांबणे भागच होते. तिथे पोहोचल्यावर तिथल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आपला माल येणार आहे हे माहिती असावं आणि तो त्यांची वाटच पाहत असावा असे का कुणास ठाऊक पण राहून राहून त्याला वाटू लागलं होतं आणि त्यामुळे तो आश्चर्यचकीत झाला होता. तो त्याबद्दल अगदी आपल्या सहकाऱ्यांना काहीच बोलला नसला तरी मनात मात्र काहीसा चिंताक्रांत झाला होता.
एखादा जुना, जवळचा आप्त किंवा मित्र भेटावा आणि त्याने आपुलकीने स्वागत करावं, चौकशी करावी, पाहुणचार करावा तसा तिथला कर्मचारी त्यांच्याशी वागत होता.. बोलता बोलता त्याने सहजतेनं बोलण्याच्या ओघात असिस्टंट मॅनेजर साहेबांचं नावही घेतलं होतं. आपल्या साहेबांनी त्याला आपली व्यवस्था करायला सांगितली असावी असं त्याला आधी वाटलं पण नंतर मात्र त्याला वाटू लागलं की साहेबांनी आपली व्यवस्था केली असती तर तसे साहेबांनी आपल्याला निघतावेळी स्वतःहून सांगितलं असते. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली होती.
“आता उद्याशिवाय माल काही जहाजावर चढत नाही.. मुंबईला आलाय तर या जावा जीवाची मुंबई करून… मराठा मंदिरला एखादा पिक्चर टाकून, मस्तपैकी चिकन-बिकन खाऊन.. झोपायला इकडंच या बरं का… ऑफिसात रेस्टरूम आहे तिथं केलीय तुमची झोपायची सोय..”
त्या कर्मचाऱ्याने ‘जीवाची मुंबई ‘चं वर्णन आणि आग्रह असा काही केला की त्याचे जोडीदार एका पायावर जायला तयार झाले होते.. त्याला जावं असं वाटत नव्हतं पण तो नाईलाजाने गेला.
रात्री उशिरा परत आले तेंव्हा त्यांच्या डोळ्यांत झोप मावत नव्हती. रेस्टरुम मध्ये जाऊन गुडूप झोपले. त्यांना सकाळी जाग आली ती पोलिसांनी जागं केल्यावरंच. डोळे चोळत ते उठले. समोर पोलीस पाहून त्यांना काहीच समजेना. ते मनातून खूप घाबरले होते. पोलिसांनी त्यांना गाडीत टाकलं आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते.
पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरवात केली तेंव्हा त्यांना कळलं होते की रशियाला पाठवण्यासाठी त्यांनी आणलेलं अठठावीस लाख मीटर कापड जहाजावर चढवायच्या आधीच लंपास झालं होतं, चोरीला गेलं होतं. ते ऐकूनच त्याला आणि त्याच्या सोबत्यांना प्रचंड धक्काच बसला होता. थोडावेळ प्रश्न विचारून त्यांना बाकड्यावर बसवले होते. ते तिघंही स्वतःच्याच विचारात गर्क होते. ते रात्री पिक्चर बघायला गेले होते तेव्हा तर कापड ट्रकमध्येच होते.. ’ सकाळी माल जहाजावर चढवण्यात आल्यावर पोहोच मिळेल ‘ असेही त्याला सांगण्यात आलं होतं. ‘ ते कापड म्हणजे कुणाला दिसू न देता लपवून लंपास करायची, खिशातून न्यायची छोटीशी वस्तू किंवा गोष्ट नव्हे, मग ते गेलं कसे ? आणि नेलं कुणी ? ‘ त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ घोंघावू लागलं होतं.
तो विचारात गर्क असतानाच पोलीस स्टेशन मध्ये कापडमिलचे मालक, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर आले. खरंतर तातडीने मुंबईला जायचं आहे असे मॅनेजरसाहेबांनी म्हणल्यावरच असिस्टंट मॅनेजर वाडेकरांना काहीसा धक्काच बसला होता.. पण चेहऱ्यावर काहीच दिसू न देता ते शांत बसले होते. गाडीत मॅनेजरसाहेब मागे मालकांशेजारी बसले होते त्यामुळे काहीही न बोलता, न विचारता असिस्टंट मॅनेजर गप्प बसले होते. .मुंबईत आल्यानंतर गाडी थांबली ती थेट पोलीस स्टेशनच्या आवारात. पोलीस स्टेशन समोर उतरताना त्यांच्या मनात खळबळ माजली होती पण त्यांनी प्रयत्नपूर्वक चेहरा नेहमीसारखा ठेवत विचारलं,
“साहेब, इथं ?”
“हो, काल रात्री रशियाला पाठवायचा सगळा माल चोरीला गेलाय..”
“क्काsय ?”
स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत धक्का बसल्यासारखे असिस्टंट मॅनेजर वाडेकर म्हणाले आणि मालकांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढू लागले.
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है मानवीय संवेदनाओं पर आधारित एक विचारणीय लघुकथा आग। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस संवेदनशील लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 66 ☆
☆ आग ☆
तपती धूप में वह नंगे पैर कॉलेज आता था । एक नोटबुक हाथ में लिए चुपचाप आकर क्लास में पीछे बैठ जाता। क्लास खत्म होते ही सबसे पहले बाहर निकल जाता। मेरी नजर उसके नंगे पैरों पर थी। पैसेवाले घरों की लडकियां गर्मी में सिर पर छाता लेकर चल रही हैं और इसके पैरों में चप्पल भी नहीं। एक दिन वह सामने पडा तो मैंने बिना उससे कुछ पूछे चप्पल खरीदने के लिए पैसे दिए। उसने चुपचाप जेब में रख लिए।
दूसरे दिन वह फिर बिना चप्पल के दिखाई दिया। अरे! पैर नहीं जलते क्या तुम्हारे ? चप्पल क्यों नहीं खरीदी ? मैंने पूछा। बहुत धीरे से उसने कहा – पेट की आग ज्यादा जला रही थी मैडम।