मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

एकीकडे त्याला मामाचं म्हणणं पटतही होतं.. बाबांना आताशा निभत नव्हतं हेही खरंच होते..दुसरीकडे किमान डी.एड. होणं हे त्याचं स्वप्न होते.. मार्क चांगले असल्यानं प्रवेशही सहज मिळत होता. तरीही तो फारसं काहीच न बोलता, थोडंसं नाराजीनंच मामाबरोबर गेला आणि त्याला मनातून आत्ता नोकरी करायला, लागायला नको असे वाटत असतानाही कापड गिरणीत नोकरी लागली.

ऑईल स्टेन रिमूव्हर म्हणून त्याला नोकरीवर हजर करून घेतलं होतं. तयार झालेल्या कापडावर पडलेले तेलाचे डाग काढायचं काम त्याला करायला लागायचं.. पगार होता साडेतीनशे रुपये.. तसा नाराजीनेच तो कामावर रुजू झाला होता पण पगाराचा आकडा ऐकून त्याची नाराजी थोडीशी कमी झाली होती. साडेतीनशे तेही एकरकमी. त्याच्यासाठी ती रक्कम तशी खूपच मोठी होती.

कापडवरचे तेलाचे डाग झटक्यात पुसून काढण्यासाठी जसे स्टेन रिमूव्हर असते  तसे परिस्थितीवरचे गरिबीचे, दारिद्र्याचे डाग पुसून काढण्यासाठी एखादं स्टेन रिमूव्हर असतं तर आपल्याला मनाजोगतं शिकता आलं असतं. असा विचार कधीतरी त्याच्या मनात तो एकटा असताना हमखास यायचा आणि तो विचार आला की तो उदास व्हायचा..

काळ हेच साऱ्यावरचं रामबाण औषध असते.. कालौघात कसलेही घाव, मनातली ठसठस कमी होत, भरले जातात.. काही दिवस गेले आणि तो आपल्या कामात रुळून गेला. कामातली सचोटी आणि प्राविण्य आणि कामाचा उरक पाहून काही महिन्यातच साहेबांनी त्याला बढती देऊन मोल्डर ची पोस्ट दिली.. कापड तपासणं, स्वीकारणं आणि दर्जा नसेल तर ते कापड नाकारणं..रिजेक्ट करणं हे काम त्याच्यावर सोपवलं. पगार ही वाढवला. तो खुश होता. नोकरीत रमला होता. मॅनेजर साहेब ही त्याच्या कामावर खुश होते पण असिस्टंट मॅनेजर वाडेकर मात्र त्याच्या कामावरून म्हणा किंवा उगाचच काही कारण नसताना त्याच्यावर खट्टू होते.. ते काही ना काही कारण काढून त्याला बोलायचेच.

काही दिवसांपूर्वी त्याच्या लक्षात आले होते की मिल मधून बाहेर पडताना गेटवरचे वॉचमन कामगारांना बाहेर सोडताना प्रत्येकाचे जेवणाचे डबे, पिशव्या तपासून पहायचे पण काही ठराविक कामगारांना नुसते तपासणी केल्याचं नाटक करुन बाहेर सोडत होते. त्याने काही दिवस जाणीवपूर्वक लक्ष ठेवले तेव्हा त्याला आपली शंका खरी असल्याचं जाणवलं आणि तो मनोमन अस्वस्थ झाला. काय करावं ? कुणाला सांगावं ? त्याला काहीच सुचेना आणि त्याला चैन ही पडेना. कुणाला बोललो आणि त्यात काही वावगं आढळलं नाही तर मोठी पंचाईत व्हायची आणि आपण नाहक अडचणीत सापडायचो हे ही त्याच्या ध्यानात आलं होतं.

एकेदिवशी काहीतरी निमत्तानं त्याला त्यातल्या एका कामगारांची डब्याची पिशवी पहायची संधी मिळाली. त्याने डबा उघडला आणि तो चक्क उडालाच. त्यात मिलच्या चांगल्या प्रतीच्या कापडाचे दोन दोन मीटरचे पाच सहा पीस लपवून ठेवले होते. त्याने ती गोष्ट वाडेकर साहेबांच्या कानावर घातली.

वाडेकर साहेबांनी त्या कामगार आणि वॉचमनवर काही कारवाई करायची सोडून त्यालाच समजावले होते. ‘ती लोकं खतरनाक आहेत उगाच त्यांच्या भानगडीत पडू नकोस नाहीतर ते तुलाच सापळ्यात अडकवतील ‘ असे समजवणीच्या सुरात सांगून अप्रत्यक्षरित्या त्याला धमकावले होते, घाबरवले होते. त्याला वाडेकर साहेबांच्या या बोलण्याचं, वागण्याचं आश्चर्य वाटले होते. वर ते त्याला म्हणाले होते.. ‘ तुला हवं तर तू घेऊन जा एखादा पीस तुझ्यासाठी.. पण मला बोललास तसे दुसऱ्या कुणाजवळ बोलू नकोस. काय माहीत, ज्या कुणाला बोलशील तो कदाचित त्यांना सामील असायचा आणि मग तूच अडचणीत यायचास.. गरीब आहेस, प्रामाणिक आहेस, आपण बरं की आपलं काम बरं..असाच रहा तरच इथं टिकशील.’

का कुणास ठाऊक पण वाडेकर साहेबांचं हे बोलणं त्याला खटकलं होतं. त्यांनी त्या लोकांना शिक्षा करायला हवी होती असे त्याला राहून राहून वाटत होते.. एक मात्र त्यानं केलं होतं तो ती गोष्ट दुसऱ्या कुणाजवळच बोलला नाही.

काही दिवसताच त्याला समजले होते की ती सगळी वाडेकर साहेबांचीच खास माणसं होती. त्यांना न तपासण्याबद्दल वॉचमनला पैसे मिळत होते तर तो माल बाहेर ठराविक ठिकाणी पोहोचवल्यावर त्या कामगारांनाही ठराविक पैसे मिळत होते. महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा महिन्यात मिळणारी ती रक्कम जास्त होती. ते सारं समजताच त्याला तर धक्काच बसला होता.

वाडेकर साहेबांना बोलल्यापासून तो कुणालाही काही बोलला नसला तरी वाडेकर साहेबांचं मात्र त्याच्यावर लक्ष होतं. शेपटीवर पाय दिलेल्या सापासारखा त्यांनी त्याच्यावर डूख धरला होता. त्याला ते जाणवतही होतं पण तो बिचारा काय करणार?  अस्वस्थ मनानं पण आपण बरं आणि आपलं काम बरं असा तो वागत होता, तरीही त्याला सगळे माहीत झालंय असे वाटल्याने वाडेकर साहेबांना तो धोकादायक वाटू लागला होता आणि म्हणूनच तो कुठं चुकतोय काय, कुठं सापडतोय काय हे पहात त्याला पकडण्यासाठी वाडेकर साहेब सापळा लावून बसले होते. वाडेकर साहेबांच्या वागण्यातील बदल जाणवत असूनही तो मात्र या साऱ्यां बाबतीत अनभिज्ञ होता.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 2 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 2 ☆ श्री आनंदहरी

तानाजी म्याट्रिक पास झाल्याचा सगळ्यांना आनंद झाला होता.. मार्कशीट देतांना सर म्हणाले होते,

“तानाजी, एवढे चांगले मार्क्स पडलेत आता सायन्सला प्रवेश घे. हुशार आहेस, मेहनती आहेस.. चांगला शिक. मोठा हो.”

सरांचं ते वाक्य त्याच्या मनात घोळत होतं. त्यालाही आपण खूप शिकावं असे वाटत होतं.. पण घरची परिस्थिती त्याला ठाऊक होती. सायन्स साईड, कॉलेज ही सारी स्वप्नंचं ठरणार हे तो जाणून होता पण तरीही काहीतरी करून पुढं शिकावं.. किमान डी. एड. व्हावं असं त्याला खूप वाटत होतं. ‘ बाबांशी बोलायला हवं.. पण आपण बोलण्यापेक्षा कुणीतरी जाणकार मोठ्या व्यक्तीनं बोललेलं बरं.. निदान बाबा पहिल्या झटक्यात नकार न देता ऐकून तरी घेतील.. कदाचित होकारही देतील ‘ त्याच्या मनात विचार चक्र चालू झालं होतं.

“शेटजीचा माल आणायचा हाय इस्लामपूरास्नं..”

बाबा खुंटीवरची पैरण आणि चाबूक घेत म्हणाले आणि बाहेर पडले. त्यांनी बैलगाडी जुपली. चाबूक नुसता खांद्यावर टाकला आणि ते गाडीत चढले.

बैलगाडीतून सामानाची ने-आण करुन त्यांनी आजवर प्रपंचाचा गाडा ओढला होता. शेती होती पण चुलत्यांत वाटण्या झाल्यावर पोटापूरतीसुदधा उरली नव्हती. शेती कमी असली तरी बैलं म्हणजे बाबाचे जीवलगच होते त्यामुळे त्यांनी गोठयातली बैलजोडीची जागा कधीच रिकामी ठेवली नव्हती.. दावणीला जो बैल यायचा तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दावणीला असायचा.

त्याचे बाबा बैलांची जोपासनाही खूप चांगली करायचे, त्यांची निगा राखायचे, घरात झालेली पहिली भाकरी आधी बैलांच्या मुखात घातल्याशिवाय बाबा कधी भाकरीचा तुकडा मोडायचे नाहीत. बाबांच्या खांद्यावर चाबूक असायचा पण त्या चाबकाची वादी कधी बैलांच्या पाठीवर पडली नव्हती. बाबा चाबकाचा हवेतच असा बार काढायचे की त्याचा आवाज भवतालात घुमायचा. बैलांना बाबांच्या, चाबकाच्या आवाजाचा इशारा पुरेसा असायचा.. आणि त्यांना तो कळायचादेखील.

सचोटीने काम करणाऱ्याला कामाची कमतरता कधीच नसते. त्याच्या बाबाचंही तसंच होतं. घरी वाटण्या झाल्यावर शेतातल्या उत्पन्नावर भागणार नाही हे जाणवल्यावर त्यांनी बैलगाडीने मालवाहतूक करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांचा चांगला जम बसला होता. पंचक्रोशीतील व्यापारी तालुक्याहून माल आणायचा असला की हमखास त्यांनाच सांगायचे. आठवडी बाजारादिवशी तर जाता-येता भाडं मिळायचं. मशागतीच्या दिवसात मशागतीची कामे मिळायची तर सुगीच्या दिवसात सुगीतली, सुगीच्या माल वाहतुकीची कामे मिळायची. बाबांना कामाची इतकी सवय जडली होती की काम नसेल तर ते बेचैन व्हायचे.. बैलगाडीने माल वाहतूक करताना माल भरण्या-उतरण्याचं कामही ते स्वतःच करायचे त्यामुळे चार पैसे जास्त मिळायचे. कदाचित त्यामुळेच असेल पण अलिकडे त्यांना पाठदुखीचा भयंकर त्रास होऊ लागला होता. डॉक्टरनी विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा सल्ला दिला होता.. पण विश्रांतीच्या मंद ज्योतीवर गरिबांची भाकरी पचत नाही तिला कष्टाची ज्वाळाच लागते.. बाबा तशाही स्थितीत माल वाहतुकीची भाडी करतच होते..

‘पुढं काय ? ‘ हा प्रश्न गरिबाला तर श्वासागणिक पडत असतो.. एस.एस.सी. झाल्याचा आनंद हा त्याच्यासाठी आळवावरचं पाणीच ठरला. त्यापाठोपाठ ‘ पुढं काय ?’ हा प्रश्न एकाद्या वावटळासारखा त्याच्या मनात आणि घरात भिरभिरु लागला आणि त्यात ‘म्याट्रिक’ झाल्याचा आनंद पालापाचोळ्यासारखा उडून गेला. त्याला किमान डी.एड. तरी करायचं होतं..मग कुठंतरी शिक्षकाची नोकरी लागली असती. शिकणं-शिकवणं आपल्याला आवडतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला खूप शिकायचं होतं पण परिस्थितीचं भान त्याला असल्यामुळे सध्यातरी शिकता येणार नाही हे ही तो जाणत होता..निदान डी.एड.होता आले तर नोकरी करत पुढे शिकता येईल असे त्याला वाटायचं..

त्याचा निकाल कळला तसं  दुसऱ्याच दिवशी तो भाच्याचं यश साजरे करायला पेढे घेऊनच आला. मामा आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. मामाजवळ डी. एड चा विषय काढून ‘पुढे काय ?’ ते निश्चित करता येईल असे त्याला वाटत होतं. दुपारची जेवणं झाली. सगळे सोप्यात निवांत बसले होते. तो डी. एड. चा विषय मामा आणि बाबांसमोर काढणार तेवढयात मामाच बाबांना म्हणाला,

“दाजी, माझा एक दोस्त हाय कापड गिरणीत कामाला.. त्येला तानाच्या नोकरीचं बोलून ठेवल्यालं हाय.. त्येनं म्याट्रिक झाल्याव  याला सांगितलं हूतं.. तवा उद्याच्याला जाऊन येतो आमी. जाऊ न्हवं ? “

“आरं, आमी आडानी.. आमास्नी काय कळतंय त्येच्यातलं.. तूच बग काय ती…”

“दाजी, तुमी काय बी  काळजी करू नगासा… काम हुईल असं दोस्त म्हणलाय.. येकडाव का नोकरी लागली का तुमी भाड्याचं काम वाईच कमी करा आन ईसावा घ्या. त्याबिगर दुकनं काय कमी हूयाचं न्हाय..”

“त्ये बगू म्होरचं म्होरं.. आदी नोकरी तरी मिळूनदेल..”

 “पण मामा, मला शिकायचंय अजून.. डी.एड. तरी करतो.”

 “आरं.. नोकऱ्या काय वाटंवं पडल्याती व्हय रं? मिळत्यालीला नगं म्हणू नी..आन दाजीस्नी निभंना झालंय.. त्येंनी तरी किस्तं वडायचं ?. नोकरी करीत करीत शिक की म्होरं,काय शिकायचं हाय ती.. नगं कोण म्हंतया तुला ? “

मामानं एका झटक्यात विषयाचा कंडकाच पाडला होता.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 1 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 1 ☆ श्री आनंदहरी

त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.. ही बातमी साऱ्या मिलमध्ये वाऱ्यासारखी पसरली.. ‘ त्यानं कोणता गुन्हा केला ? पोलिसांनी कशासाठी ताब्यात घेतलंय ? याची कुणालाच काही माहिती नव्हती..

“तरी मी म्हणतच होतो.. तो काही वाटतो तितका सरळ नाही.. खाल मुंडी आणि पाताळ धुंडी आहे?”

“आस्सं ss ?  कवा म्हणलावता तुमी आसं ? अवो, जवा बगंल तवा त्येच्या मागं-म्होरं असायचासा की..आरतीची थाळी घिऊन..”

“अरे, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या मागं- पुढं राहावं लागतं.. जाऊ दे तुला नाही कळायचं ते..”

“व्हय, आमास्नी काय कळतंया.. पर येक सांगा.. त्यो आला असता मुंबैस्नं तरीबी तुमी आसंच म्हणला आस्तासा का ?”

“मग भितो का काय कुणाला ? तोंडावर म्हणायला कमी नाही करणार.. खरं ते खरंच.”

“काय पण म्हणा राव.. पोरगं हुशार आणि कामसू.. असं काय करंल आसं वाटलं न्हवतं..”

“अहो, चेहऱ्यावर का लिहिलेलं असतं असे करील आणि असे नाही म्हणून ? अहो, ‘ हर चेहरे पे नकाब हैं !’ म्हणतात ते काही खोटं नाही बघा.”

“पण नेमकं झालंय तरी काय ? एवढं पोलिसांनी पकडण्यासारखं ?”

“…आणि ते ही मुंबईत ? पण पोलिसांना मात्र मानलं पाहिजे.. गुन्हेगार अगदी पाताळात लपून राहिला तरी सोडत नाहीत त्याला.’

“अवो, पर त्यो लपलावता कवा ? त्यो तर मिलचं काम घिऊन गेलाय न्हवं ? “

“व्हय.. काम घिऊन गेलाया.. ततं गेल्याव भुलला आसंल मुंबैला.. गेला आसंल जीवाची मुंबै कराय.. आन घावला आसंल पोलिसांस्नी..”

“आरं पर त्ये पोरगं तसलं न्हाय वाटत.. उगा काय बी बोलू नगासा..”

अशा नाना प्रकारच्या चर्चा, कुजबुज. कुठं दबक्या आवाजात तर कुठं खुलेपणाने. मिलमधील साऱ्या कामगारांच्यात चालली होती. नेमकं काय झालंय आणि काय नाही हे खरंतर कुणालाच माहीत नव्हतं … पोलिसांनी त्याला पकडलंय एवढीच बातमी कर्णोपकर्णी होऊन जवळजवळ प्रत्येकापर्यंत पोहोचली होती.. आणि ती पोहोचताना प्रत्येकाने नेहमीच्या सवयीने आपापल्या अंदाजाची, आखाड्याची भर त्यात घातली होतीच.. पण नेमकं काय घडलंय ते मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं.

पोलिसांनी त्याला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नुसतंच बसवून ठेवलं होतं.. ते तिघंही काहीसे घाबरलेले होते.. आपण काय केलंय ? का म्हणून आपल्याला असे इथं आणून बसवून ठेवलंय ? हे त्यांना काही कळत नव्हतं. ’ एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही..’ असे पोलिसाने दरडवल्याने  ते तिघंही मुक्या, हलत्या बाहुल्यांसारखे एकमेकांशी काहीही न बोलता खाली मान घालून बसले होते. सकाळपासून त्यांच्या पोटात चहाचा  घोटसुद्धा गेला नव्हता पण मनावरच्या प्रचंड ताणामुळे आणि भीतीमुळे त्यांना अजूनतरी त्याची जाणीव झाली नव्हती. त्याचे दोन्ही सहकारी घाबरून रडवेल्या चेहऱ्याने बसले होते पण तो मात्र खाली मान घालून कसल्यातरी विचारात गढून गेला होता.

खरंतर, त्याला पुढं खूप शिकायचं होतं. एस.एस.सी.ला म्हणजे त्यावेळच्या अकरावीला त्याला चांगले साठ टक्के मार्क पडले होते.. आताच्या काळात साठ टक्के मार्क्स म्हणजे काहीच वाटत नसले तरी त्याकाळी साठ टक्के मिळवणारे दोन-चार विद्यार्थीच असायचे शाळेत.. आणि केंद्रात तर ती संख्या दोन आकड्यातली असायची. तो त्यात होता. त्याकाळी साठ टक्के मार्क मिळणे हे अभिमानास्पद असायचे. ‘ मुलगा खूप हुशार आहे.. फर्स्ट क्लासचा आहे ‘ असे मानलं आणि म्हणलं जायचं.

एस.एस.सी.ला चांगले मार्क्स पडले याचा त्याला खूप आनंद झाला होता. तो आनंदानं घरी आला. वडील गोठयात बैलांना पाणी दाखवत होते.. आई घरात चुलीवर चहाचं आदण ठेवत होती.. ‘ पोरगं शाळेत गेलंय, आज त्याचं पास-नापास आहे ’ हे त्या दोघांनाही माहीत होतं. पोरगं हायस्कुलात शिकतंय याचा त्याच्या आई-बापाला कोण अभिमान. तसं म्हणलं तर त्या दोघांनीही शाळेचं तोंडसुदधा बघितलेलं नव्हतं पण पोरगं शिकतंय आणि दरसाल पास होतंय म्हणल्यावर त्यांनी त्याला फारसं काम न लावता शिकू दिलेलं होतं.

पोराला ‘पास- नापास’ घेऊन घरात आलेलं पाहिलं तसं दोन्ही बैलांना पाणी दावून बाबा लगोलग घरात आले होते तर आईनं पोरगं उन्हातनं आलंय म्हणल्यावर चुलीपुढनं उठून पाण्याचा तांब्या दिला होता.

हातपाय धुवून आत आल्यावर त्यानं दिवळीत ठेवलेलं निकालपत्र बाबांच्या हातात दिलं.बाबांनी ते उलटं पालटं करून पाहिलं आणि त्याला विचाऱलं,

“पास झालास न्हवं ?”

“हो.”

“लई ब्येस झालं..  बरं का गं, रातच्याला  कायतरी ग्वाडध्वाड कर.. आपला तान्या म्याट्रिक पास झालाया.”

त्याच्या वडिलांनी तिथूनच आईला जेवणात काहीतरी गोडधोड करायला सांगितलं.  आई आतून चहा घेऊन बाहेर आली. तिनं त्याला आणि बाबांना चहा दिला..

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चिटींग ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

 ? जीवनरंग ?

☆ चिटींग  ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

टेरेसमध्ये उभा होता तो उदासवाणा.

खाली बागेत रंगात आलेल्या मुलांच्या खेळाकडे पहात.

“Fire in the mountain” एकाचे सांगणे. “Run, run , म्हणत बाकीच्यांचे गोलगोल फिरणे,.

“Two” पहिल्याने सांगीतले. जोडी जमवण्यासाठी इतरांचे कोणालातरी ओढणे, कोणालातरी जाऊन भिडणे.

आपणही, तिला असच ओढुन जोडी जमली होती.त्याच्या चेहर्‍यावर मंद हसु.

“Fire in the mountain”.

“Run, run, run”

आता आवाज आला, “Four”

लवकरच, २, गोड, गोंडस, गोजिरवाण्या चिमण्या येऊन बिलगल्या होत्या आपल्या दोघांना. त्याचे जरा सुखावून, खुलेपणाने हसणे.

परत, “Fire in the mountain”

“Run, run, run,”

पहिल्याची सुचना, “Again Two”.

दोघादोघांची जोडी जमवण्यासाठी परत इतरांची धावपळ, जरा दमछाक.

आपल्याही दोन्ही चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, बघता, बघता मोठ्या होऊन, उडून गेल्या. अगदी दूर, दूर–परदेशी. परत आपली दोघांची जोडी,. त्याच्या चेहर्‍यावर–कृतार्थतेचे स्मित.

फिरुन सुरु केले, “Fire in the mountain”.

“Run, run, run”.

आदेश आला- “One”

सवयीप्रमाणे कोणालातरी धरायला लागली,.गोंधळली. आणि, “One” चा अर्थ पटकन आपल्या लक्षात आला नाही ,म्हणुन आरडाओरड सुरु केली,  “Cheating, Cheating, it’s Cheating”.

अन्, त्याच्या मनात आले, आपणही एकटेच. अजुन पटत नाही.

कोरोना दोघांनाही झाला होता, आणि, अचानकच ती गेली.

दैवाने,आपल्या बरोबर केलेले हे-चिटींग च ना?

Yes, it’s Cheating.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातृदिन …. ☆ परवीन कौसर

?जीवनरंग ?

☆ मातृदिन …. ☆ परवीन कौसर

सकाळी उठल्यावर अचानकच तिला आपल्या प्रकृतीत काही तरी बिघाड होत आहे असे जाणवू लागले. काहीशी कमजोरी आणि डोळ्यासमोर अंधारी आली.लगेचच तिला तिच्या नवऱ्याने दवाखान्यात नेले. तिथे तिच्या तपासण्या करण्यात आल्या.आणि तातडीने उपचार सुरू झाले. काही तपासण्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते. तोपर्यंत आलेल्या रिपोर्ट प्रमाणे उपचार डॉक्टरांनी सुरू केले होते. सलाईन, इंजेक्शन दिले होते. औषधांमुळे तिला झोप लागली.

“आई …ये आई उठ न. हे बघं मी तुला  जेवण करून आणले आहे.” तिच्या अंगावर लहान लहान हाताने कोणीतरी स्पर्श करून हलवत उठविण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे ती एकदम खडबडून जागी झाली. बघते तर समोर लहान म्हणजे अगदी १० वय वर्षाचा मुलगा आपल्या एका हातात डबा घेऊन उभा होता. त्याला बघून तिने आपले डोळे पुन्हा बंद केले.  पुन्हा त्या मुलाने ” ये आई उठ न. बघं किती वेळ झाला. तुला भूक लागली असेल‌. ही तुझी रोजची जेवणाची वेळ आहे. डॉक्टरांनी पण जेवण द्या लवकर म्हणून सांगितले आहे.आणि ही बघ राणी पण भुकेली झाली आहे.तिला पण चारायचे आहे मला. आता तू नाही चारू शकणार तिला.”

हे ऐकताच  तिने तिचे भरलेले डोळे हळूहळू उघडले आणि त्या मुलांचा हात हातात घेऊन रडू लागली. आणि म्हणाली “बाळा माफ कर मला. मी खरंच खुप वाईट आहे. मी तुला कधीच प्रेम केले नाही. सवतीचा मुलगा म्हणून फक्त आणि फक्त घृणा केली. तुला कधी वेळेवर जेवण दिले नाही. ताजे तर अन्न तुला मिळालेच नाही. याउलट राणीचे उष्टे अन्न दिले मी. आणि तुझ्या बाबांना पण तुझ्या विरूद्ध काही तरी खोटे सांगून कित्येक रात्री उपाशी झोपवले. आणि एकदा तर तू भुकेने व्याकूळ होऊन खाण्यासाठी बिस्कीट डब्यातून काढून घेतला तर त्या हातावर मी चटका दिला. आणि आज त्याच हाताने तू जेवण बनवून आणलास माझ्या साठी. मला माफ कर बाळा.मी तुझी गुन्हेगार आहे. याचीच शिक्षा म्हणून मी इथे आहे बघं आज. ” म्हणत ती रडू लागली.

हे ऐकून त्या मुलाने तिचे डोळे पुसले आणि डब्यातील दुधभात तिला चारु लागला. आज हे त्याच्या आईने त्याला गर्भात असताना केलेले संस्कार आणि तिची ममता त्याच्या मनात भरलेली होती.

आज तिला तो दुधभात पंचपक्वांन भासू लागला होता.आईचे जेवण झाल्यावर त्याने आपल्या छोट्या बहीणीला भात चारला. हे दृश्य पाहून आई वडील दोघेही आपल्या अश्रूंना थांबवू शकले नाही.

त्या दोघांना त्या बाळाच्या चेहऱ्यावर एका निरागस ममता माई आईचे तेज ओसंडून वाहत आहे हे दिसू लागले.

खऱ्या अर्थाने हाच मातृदिन साजरा झाला.

©® परवीन कौसर 

बेंगलोर

९७४०१९७६५७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार

? मनमंजुषेतून ?

☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार☆ 

मी लग्न होऊन ओरीसात गेले, ओरीसा म्हणजे बरंचसं आपल्या कोकणासारखं वाटलं….सुंदर निसर्ग….आणि आमच्या गावात तर समुद्र. कॉलनीच्या मागे ‘महानदी’ होती. मी इतकी हरखून गेले होते, कॉलनी पाहून…एकूणच तो नविन प्रदेश पाहून….पण आता जितके फायदे तितकेच तोटे पण असणारच.

ओरीसा म्हणजे दरवर्षी cyclone ठरलेलं….छोटं, मोठं….पण वर्षातून एकदा दोनदा तरी वॉर्निंग यायचीच….मग cyclone नाही आलं तर मोकळा श्वास सोडायचा….आलं तर परत पुढचं येईस्तोवर राज्य पडत झडत उभं राहायचं.

माझं लग्न झालं त्याआधी १९९९ ला ओरीसानी super cyclone बघितलं होतं…..त्यामुळे प्रचंड दहशत होती लोकांच्या मनात….नंतर २००२ मधे cyclone ची वॉर्निंग आली. माझ्या साठी हा पहिलाच अनुभव होता…..प्रदिप नी, माझ्या मिस्टरांनी मात्र १९९९ चं cyclone बघितलं होतं.

मला प्रदिप नी सांगितलं, तू जरा सामान भरुन ठेवशिल का? कारण cyclone येईल मग पंचाईत होईल…..म्हटलं चालेल. तर म्हणाले….क्षिप्रा भाभी बरोबर जा दुकानात…तर म्हटलं का…मी जाईन….तर म्हणाले नको तिला बरोबर ने….म्हटलं ठिक.

क्षिप्रा अगदी माझ्या बाजुच्या फ्लॅट मधे रहायची,बंगाली होती….मी आल्यापासून सगळ्यात खूप मदत केली तिने….( ती बंगाली असल्यामुळे आम्ही हिंदीत बोलायचो….पण आता मी सगळं मराठीत लिहितेय) प्रदिप गेल्यावर मी तिला विचारलं की जाऊया का….तर म्हणाली हो चालेल, तासाभरानी जाऊया…..पण एक काम कर, दोन्ही वेळचा स्वैपाक आटपून घे मग जाऊया. मग आम्ही दोघी गेलो दुकानात….मी दुकानदाराला म्हटलं, ही लिस्ट….भाभी म्हणाली मला दाखव लिस्ट….त्यात तांदुळ, डाळ, आटा, तेल असं काय काय होतं….तिनी माझ्या कडे बघितलं म्हणाली ही लिस्ट परत पर्स मधे टाक….मला कळेना असं का म्हणतेय ती.

मग दुकानदाराला तिनी माझ्यासाठी सामान सांगितलं, १५ अंडी, २ ब्रेड चे मोठे पुडे, १०/१२ चिप्सची पाकीटं, २/४ हल्दीराम सारखे काही चिवडा, मिक्चर वगैरे, जॅम, ८/१० बिस्किटाचे पुडे….आणि तो डिप डिप वाला चहा….पहिल्यांदा घेतला मी आयुष्यात….आणि ४ लिटर दुध. मी तिला म्हटलं माझा दुधवाला येवून गेलाय, तर म्हणाली पुढचे २/४ दिवस कदाचित नाही येणार.

मग तिनी पण असंच सामान तिच्यासाठी घेतलं….आणि आम्ही निघालो, परत येतांना मी तिला म्हटलं हे सगळं मला महिनाभर पुरेल….तर म्हणाली ते तेव्हा,जेव्हा तुम्ही बाकी काही जेवता तेव्हा….एकदा वारं सुरु झालं ना की गॅस पेटणार नाहीये….हे जे घेतलंय हेच लंच, डिनर, ब्रेकफास्ट असणार आहे. आता घरी जाऊन, दुध तापवून,  अंडी उकडून फ्रिज मधे ठेव….आपल्याला जी electric शेगडी दिली आहे ना घरात ती अश्या वेळी वापरायची….अर्थात जोपर्यंत वीज आहे तोपर्यत…..आम्ही तिथे रोजचं पाणी उकळून प्यायचो…..तेव्हा तिनी पाणी पण ८/१० लिटर उकळून ठेवायला सांगितलं….कारण वीज गेली, की नंतर पाणी पण जाणार.

ती मला म्हणाली स्वैपाक झालाय ना आजचा….आता घरी जाऊन तुला ही सगळी तयारी करायची आहे…..वापरायचं पाणी भरुन ठेव.

मला खूप टेंशन आलं होतं…मी म्हटलं इतकं काही होईल? तर म्हणाली नाही झालं तर बेस्ट पण तयारी हवी…..आम्ही बिल्डिंग शी आलो तर बरेच लोक तळमजल्यावरच्या फ्लॅट्स मधे दिसत होते….मी म्हटलं हे काय झालंय….तर म्हणाली चल दाखवते….मग खाली एक मैत्रिण रहायची तिच्या घरात गेलो…..तर टिव्ही बांधून ठेवला होता….दोरीनी….आत मधे फ्रिज साठी एक तात्पुरता लाकडाचा उंच पाट करुन त्यावर चढवला होता…..त्याला बांधण्याचं काम सुरु होतं…..कंपनीची लोकं येवून हे करुन देत होते…..कारण वारं सुटलं…वादळ आलं की ‘महानदी’ कॉलनीत येणार….आणि जे हवं ते बरोबर घेवून जाणार….म्हणून शक्य तितकी काळजी घेणं सुरु होतं.

आम्ही दोघी दुसऱ्या मजल्यावर रहायचो….पाण्याची भिती आम्हाला नव्हती….आम्हाला वाऱ्याची भिती होती.

मग क्षिप्रा नी सांगितलं…..आता खाण्यापिण्याचं झालं की घर जे सजवलं आहेस ते काढून बॅग भरुन ठेवून द्यायची…..कपडे सगळे आवरुन ठेव….जितकं कमी सामान बाहेर राहील तितकं चांगलं…..त्याप्रमाणे मी सगळं घर आवरलं.

संध्याकाळ पर्यंत वातावरण कुंद झालं होतं….वारं पण फार नव्हतं…..पण नेहमीपेक्षा जास्त होतं. रात्री प्रदिप ला सगळं सांगितलं सकाळी काय झालं….तो म्हणाला म्हणूनच म्हटलं होतं की भाभी बरोबर जा.

दुसरा दिवस उजाडला, ते एकदम विचित्र वातावरण घेऊनच….वारं पूर्ण पडलं होतं, पाऊस अगदी बारीक होता…..मला वाटलं झालं वाटतं सगळं शांत….प्रदिप तयारी करत होता ऑफिसची….मी म्हटलं सगळं शांत झालं ना….तर फक्त हम्म म्हणाला….पण निघतांना म्हणाला, be brave…काही वाटलं तर क्षिप्रा भाभीला फोन कर….अर्थात फोन सुरु असले तर (हे पण जोडलं त्यानी पुढे) मला फोन केलास तर चालेल पण मी येवू शकेन की नाही सांगता येत नाही, भाभी च मदत करेल.

प्रदिप गेल्यावर भाभी आलीच बघायला,सगळं नीट आहे ना….मी म्हटलं ये चहा पिऊ तर म्हणाली मी घर बघू का तुझं सगळं….म्हटलं बघ की.

तिला मी म्हटलं शांत झालंय ना सगळं….गेलं का वादळ? तर म्हणाली तू वादळापुर्वीची शांतता असा शब्द ऐकला आहेस? हे ते आहे….संध्याकाळी वारं सुरु होईल.

मग मी चहा करेस्तोवर तिनी घर बघितलं….एक दोन वस्तू तिला हव्या तश्या हलवल्या. मग मला तिनी बेडरुम मधे बोलावलं….आमच्या बेडरुम मधे भितींत एका खाली एक असे मोठे कोनाडे केलेले होते…..उघडेच होते, दारं नव्हती त्याला….ते इतके मोठे होते की सगळ्यात खालच्या खणात मी सुटकेस ठेवायची….ती तिथेच उघडायची सुध्दा….तेव्हा तिथे सगळी पेपर ची रद्दी होती माझी ठेवलेली…..भाभी म्हणाली ती काढून घे आणि वर ठेव….म्हटलं ओके….पुढे म्हणाली वारं वाढलं दार, खिडक्या तुटायला लागल्या तर या खणात येवून लपून बसायचं….ही जागा सगळ्यात सेफ आहे. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला.

संध्याकाळी खरंच सोसाट्याचं वारं सुरु झालं, खिडकी दारं वाजायला लागले…..पाऊस सुरु झाला….निसर्गाचं रौद्र रुप त्या रात्री अनुभवलं….प्रदिप ऑफिस मधेच होता….भाभी शी मी फोनवरच बोलत होते….मग लाईट गेलीच….महानदी आलीच कॉलनीत…..मग खालच्या मजल्यावरचे लोकं वरती आमच्याकडे आले……तेवढंच दुःखात सुख की मी आता घरात एकटी नव्हते…१/२ दोघी मैत्रिणी होत्या. कारण बहूतेक सगळे पुरुष प्लांट मधेच होते…..पूर्ण रात्र जागून काढली….प्रयत्न करुनही झोप लागणं शक्यच नव्हतं…..१९९९ च्या वादळानंतर जास्त पक्की दारं, खिडक्या बसवल्या होत्या त्यामुळे दारं तुटली नाहीत….खिडक्यांच्या काचा मात्र फुटल्या….त्यातून प्रचंड पाऊस आत येत होता….पण आमचा हॉल सेफ होता….सगळ्या खोल्यांची दारं बंद करुन आम्ही रात्र हॉल मधे काढली……मध्यरात्री landfall झाला…..आणि दुसरा दिवस उजाडला…..पुढे अजून एक दोन दिवस वारं, पाऊस होताच. नंतर झालेली हानी बघवत नव्हती….तळमजल्यावर सुध्दा लोकांच्या घरात गेलेलं पाणी काढणं, सामान आवरणं कठिण झालं होतं.

निसर्गापुढे आपण किती थिटे पडतो याचा अनुभव त्यावर्षी घेतला. मग पुढच्या ३ वर्षात असे बरेच छोटे मोठे cyclone ओरीसात अनुभवले पण हा पहिला अनुभव मात्र काळजावर कोरल्या गेलाय.

© सुश्री मंजिरी दातार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पान (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ पान (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शहरापासून दोन किलो मीटर दूरवर पानाचे दुकान आहे. तिथे दिवस रात्र गर्दी असते. तसा पान सगळ्या शहरात कुठे मिळत नाही. पान बनवणार्‍याच्या हातात न जाणे कोणते कसाब आहे, की दूर दूरवरून लोक तिथे फक्त पान खाण्यासाठी येतात. अनेक पानप्रेमी रात्रीचे नऊ – दहा वाजले तरी लोक तिथे पोचतात.

चोपडा कुठला तरी समारंभ संपवून आपल्या पत्नीबरोबर परतत होते. अचानक त्यांना पण खाण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यांनी पानाच्या दिशेने गाडी वळवली. पत्नीने हैराण होऊन विचारले, इकडे कुठे निघालोय?

पान खायला. ‘आज तुला असं पान खिलावतो, तसं पान तू आत्तापर्यंत आयुष्यात कधी खाल्लं नसशील.’ पत्नी गप्प बसली.

पानाच्या दुकानासमोर चोपडांनी गाडी थांबवली. ते पण ज्ञायला गेले. पत्नी गाडीतच बसून राहिली. एवढ्यात दोन छोटी मुले हातात मोगर्‍याच्या फुलांचे गजरे घेऊन आली. ‘ काकी, घ्या ना ! अवघ्या दहा रुपयात दोन गजरे…’ त्यांच्या डोळ्यातील याचना आणि चेहर्‍यावरचे करूण भाव पाहून पटीने दोन गजरे घेतले आणि तिथेच सीटवर ठेवले.

चोपडांनी पत्नीच्या हातात पान घेतलेला कागद ठेवला आणि ते सीटवर बसले, तशी त्यांचे नजर सीटवर ठेवलेल्या गजर्‍यांवर गेली. हे काय आहे? केवढ्याचे आहेत? का घेतलेस?’ तशी ती म्हणाली, गरीब मुले होती. पुन्हा पुन्हा आग्रह करत होती. त्यावर ते म्हणाले, ‘तू काय दान करण्याचा ठेका घेतला आहेस का? पैसे कामवायला किती परिश्रम करावे लागतात, तुला कल्पना आहे का? असल्या रद्दी फुलांवर दहा रुपये खर्च केलेस!’

पत्नी गप्प बसली. दहा रुपयाचं एक एक पण, दोन-तीन किलो मीटरची उलटी चक्कर घेऊन पानाच्या दुकानाशी येणं, रस्त्यात दोन दोन संध्याकाळची वृत्तपत्रे घेणं, गुटखा, सिगरेट… या सगळ्याच्या तूलनेत दोन गजरे विकत घेणं काय जादा खर्च आहे? पान खाण्याचा तिचा सगळा उत्साह संपून गेला.

 

मूळ हिन्दी कथा – पान  

मूळ लेखिका  –  सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दिवा अन उदबत्ती …. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?जीवनरंग ?

☆ दिवा अन उदबत्ती …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वादळात अडकलेल्या एका पांथस्थाने एका भग्न मंदिराचा आसरा घेतला.काळ्याकुट्ट ढगांनी सर्व परिसर झाकोळून गेलेला होता, कोणत्याही क्षणी आभाळ भुईवर उतरणार होतं अन कडाडणाऱ्या विजा प्रकाशाची वाट दाखवत त्याला  सोबत करणार होत्या. कुट्ट त्या अंधारल्या  मंदिरात पांथस्थास काहीच दिसेना.अडखळत चाचपडत तो कसाबसा गाभाऱ्याशी पोहचला. खिशातली काडीपेटी काढून काडी तो ओढायचा प्रयत्न करू लागला पण सर्द पडलेला तो गुल पेटण्याचं नावच घेत नव्हता.अथक प्रयत्नाने एका काडीने शेवटी पेट घेतला. पांथस्थाला हायसे वाटले, त्याने इकडे तिकडे शोध घेतला. एका कोनाड्यात त्याला तेलाने भरलेला दिवा दिसला. हातातील आगीने त्याने दिवा पेटवला अन मूर्तीच्या पायाशी ठेवला. काळ्याकुट्ट  पाषाणातील ती मूर्ती दिव्याच्या प्रकाशात उगीचच हसल्याचा त्याला भास झाला. त्याची नजर आता उदबत्तीस शोधू लागली “दिवा आहे तर उदबत्तीही असणारच!” तो स्वतःशी पुटपुटला इतक्यात मूर्तीच्या मागे त्याला उदबत्ती सापडली. दिव्यावर उदबत्ती पेटवून त्याने शेजारीच असलेल्या कपारीत खोचून दिली. देवाला हात जोडून तो गाभाऱ्याबाहेर आला.

गाभारा प्रकाश अन सुगंधाने भरुन गेला.त्या भयाण रात्रीत त्याला देवाचा सहारा मिळाला.थकलेला तो निद्राधीन झाला.

सोसाट्याचा वारा, कोसळता पाऊस अन विजांचे कल्लोळ चालूच होते, मध्यरात्र उलटली दिव्याचे लक्ष सहजच स्वतःकडे गेले.रत्नजडित खड्यांनी मढलेले त्याचे रूप खासच सुंदर होते त्याहून खूप सुंदर नाजूक नक्षी, उठावदार रंग, सुबक आकार त्याला खूपच आवडला, स्वतःच्या रूपाचा त्याला आनंद झाला आणि सौंदर्याचा अभिमानही!

शेजारी उदबत्ती जळत होती तिचं अस्तित्व काही क्षणांचे होतं, दिव्याला उदबदत्तीची कीव आली “काय ही उदबत्ती! ना प्रकाश ना रूप! काळा देह हिला मुळी देखणेपण नाहीच! “त्याने उदबत्तीला न राहून विचारलेच, काय गं उदबत्ती तुला माझ्या देखणेपणाचा जरासुद्धा मोह होत नाही का?”  तिने हसून उत्तर दिले,” बिलकुल नाही, ईश्वराने जे काही मला दिलेय त्यात मी समाधानी आहे, प्रत्येकाला इथं नेमून दिलेले काम आहे अन आपण ते करायचे आहे, एवढेच मला माहित आहे, त्या पलीकडे मी जास्त विचार नाही करत.” दिव्याला तिचं म्हणणे तितकेसे पटले नाही तो काही न काही म्हणत राहिला अन उदबत्ती मौन बाळगून ऐकत होती इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आता मात्र दिव्याला आपला तोल सांभाळता येईना,उदबत्ती स्थिरपणे मंद मंद सुगंध दरवळत होती ; अन…वाऱ्याचा प्रचंड झोत गाभाऱ्यात शिरला! फडफडणारा दिवा क्षणात विझला.उदबत्ती शेवट पर्यंत जळत राहिली.

उत्तररात्री वादळ शांत झाले, पहाट होताच पक्षांनी पंख झटकले, आभाळ निवळून निरभ्र शांत झाले,पांथस्थ उठला त्याला आता पुढं जायचं होतं. रात्रभर जीविताच संरक्षण केल्याचे उपकार मानायला तो गाभाऱ्यात गेला दोन्ही हात जोडून नतमस्तक होत उदबत्तीची राख त्याने भाळावर लेपली, बाजूच्या दिव्यावर काजळी साचली होती, त्याने दिवा उचलला पुन्हा कोनाड्यात ठेऊन दिला.

रात्रभर प्रभू चरणाची सेवा करून कुणा सज्जनाच्या भाळावर मिरवत उदबत्ती दिमाखात पाऊले चालत राहिली अन दिवा अंधारल्या कोनाड्यात कुणा अवचित पांथ स्ताची अभावीत पणे वाट पहात एकटाच…त्या अंधाऱ्या कोनाड्यात…

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव,सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – अंतरात्म्याचा आवाज… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अनुवादित लघुकथा – अंतरात्म्याचा आवाज… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

 

आय. सी. यू. विभागाचे प्रमुख डॉ. गुप्ता, त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीत मान मागे टेकवून बसले होते. खूप अस्वस्थ दिसत होते. कसला तरी गंभीर विचार करत असावेत, हे सहजपणे कळत होतं. पंधरा मिनिटांनी त्यांना सकाळच्या राऊंडसाठी जायचं होतं. त्यांना नक्की माहिती होतं की, तिथल्या तेरा नंबरच्या बेडवर, गेल्या पंचवीस दिवसांपासून पडून असलेल्या पेशंटचे – गीताचे वडील, पापणीही न हलवता त्यांच्या येण्याची वाट पहात बसलेले असणार होते. ते तिथे पोहोचताच , नेहेमीच अगदी कमीत कमी प्रश्न विचारणाऱ्या त्या गरीब  पित्याच्या डोळ्यात मात्र रोज त्यांना हजारो प्रश्न दिसायचे. टेबलावरच्या ग्लासमधले पाणी घटाघटा पिऊन डॉ. गुप्ता राऊंडसाठी निघाले.

रोजच्यासारखेच आजही गीताचे वडील लिफ्टसमोर उभे होते — अगदी केविलवाणेपणाने.

” डॉक्टरसाहेब — माझी मुलगी –” कसंतरी  इतकंच बोलू शकले ते.

” हे पहा , आज त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा आहे. काल बाहेरचे स्पेशालिस्ट डॉक्टरही येऊन पाहून गेलेत तिला. हवा भरलेल्या गादीसाठीही मी सांगितलं आहे. कदाचित पुन्हा एम. आर. आय. टेस्ट करावी लागेल. आणि मेंदूत जर पाणी साठलेलं असेल तर ताबडतोब एक ऑपरेशनही करावं लागेल.”

” डॉक्टर आत्तापर्यंत पाच लाख रुपये खर्च झालेत. कालच मी चाळीस हजार जमा केले होते. आज त्यांनी आणखी साठ हजार भरायला सांगितलेत. इतके पैसे मी —-” त्यांचे पुढचे शब्द गळ्यातच अडकले होते.

” हे पहा, तुम्हाला पैशांची व्यवस्था तर करावीच लागेल—” असं म्हणत डॉक्टर वॉर्डमध्ये निघून गेले.

अस्वस्थ मनानेच पेशंटना तपासता तपासता त्यांनी नर्सला विचारलं–

” तेरा नंबर पेशंटला इंजेक्शन दिलं का ? ”

” हो दिलंय. आता एकदम संध्याकाळीच त्या शुद्धीवर येतील. ”

डॉ. गुप्ता हातून काहीतरी अपराध झाल्यासारखे तिथून बाहेर पडले, आणि लिफ्टकडे जाण्याऐवजी जिना उतरून त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले. खूप अस्वस्थ झाले होते ते. हॉस्पिटलच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी त्यांना अगदी बजावल्यासारखी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवली— त्यातला एकेक शब्द मनात जणू घुमू लागला —-” हे बघा डॉ. गुप्ता , वैद्यकीय क्षेत्रात तुमचं विशेष नाव आहे हे मान्य. पण या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो. कितीतरी रुग्ण फक्त तुमचं नाव ऐकून इथे येताहेत. इथे तुम्हाला पगाराचे जे पॅकेज मिळते, ते तुमच्या आधीच्या पॅकेजच्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे अर्थातच काही गोष्टी तुम्हीही लक्षात घ्यायला हव्यात. डॉ. मणी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतील….. इथे भरती करून घेणं , वेगवेगळ्या टेस्टस, ऑपरेशन, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या व्हिझीट्स, आय. सी. यू.त ठेवणं, व्हेंटिलेटर, काही विशेष उपकरणांची सोय , आणि अशाच इतर गोष्टी — मग रुग्णाला या गोष्टींची गरज असो किंवा नसो — लक्षात येतंय ना तुमच्या ? पुढच्या सहाच महिन्यात तुमच्यामुळे हॉस्पिटलचा लौकिक आणि उत्पन्न, दोन्हीही चांगलंच वाढायला पाहिजे — आणि त्यामुळे तुम्हीही कुठून कुठे जाल — नाहीतर — नाहीतर दुसरीकडे कुठे जाण्याबद्दल तुम्हालाच गंभीरपणे विचार करावा लागेल —“.

नकळत डॉ. गुप्ता यांच्या डोळ्यातून उष्ण अश्रू  टपकले—- ते संतापाचे होते, तिरस्काराने भरलेले होते की खेदाने — कोण जाणे. त्यांनी लॅपटॉप उघडला, आणि घाईघाईने काहीतरी टाईप करायला लागले — शेवटची ओळ टाईप करून झाली तेव्हाच त्यांची बोटं थांबली —–

“म्हणून मी माझ्या नोकरीचा राजीनामा देत आहे ” ——–

आता प्रिंटरमध्ये कागद घालतांना त्यांचा चेहरा अगदी शांत दिसत होता.

 

 

मूळ हिंदी कथा : श्री. सदानंद कवीश्वर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका हाकेचे अंतर….भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ एका हाकेचे अंतर….भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – विचार करून रोहनचं डोकं सुन्न व्हायचं. उलट-सुलट विचार त्याच्या मनात भिरभिरत रहायचे. ‘आता दादा झालायस ना तू? थोडं दादासारखा वाग’  हे वाक्य सर्वांच्या तोंडून येता-जाता ऐकून तो खरच ‘दादा’ झाला दादागिरी करायला लागला.)

…………….

त्याचे वाढते हट्ट, चिडचिड, संतापणं हा एक व्यापच होऊन बसला. आईला बाळाकडे दुर्लक्ष करता येईना आणि रोहनची काळजी तिची पाठ सोडेना. त्यात त्याची वार्षिक परीक्षा जवळ आलेली. आई बिचारी  तिच्यापरीने त्याचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करायची. चार दिवस बरे जायचे की पुन्हा काहीतरी खुट्ट झाल्याचं निमित्त व्हायचं न् रोहन बिथरायचा.

अशातच त्याची परीक्षा संपली. निकाल लागला. रोहनच्या मार्कातली अधोगती पाहून सगळेच धास्तावले. हा मुलगा आता खरोखरच हाताबाहेर गेलाय यावर शिक्कामोर्तब झालं. यावर उघडपणे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आई डोळे टिपत राहिली आणि तिने  दिवसभर रोहनशी अबोला धरला. रात्री उशिरा आतून कुठेतरी हललेला रोहन हळूच तिच्याजवळ  सरकला आणि तिच्या कुशीत शिरला तेव्हा तिने नि:शब्दपणे त्याचा हात अलगद बाजूला करीत त्याला दूर सारलं.

सर्वांच्या आपापसातल्या ओझरत्या कानावर आलेल्या बोलण्यातून आपल्याला आजोळी शिकायला पाठवायचा घाट घातला जातोय या समजुतीने तर रोहन अधिकच उध्वस्त झाला. या सगळ्या चर्चा कुठलाच निर्णय न होता केव्हाच संपल्या कारण आई-बाबा दोघांनाही रोहनला दूर ठेवणे नको होते, पण हे सगळं रोहनपर्यंत कधी पोचलंच नाही.

सुट्टीत थोडा बदल म्हणून आई बाळाला न् रोहनला घेऊन माहेरी जायची तयारी करु लागली आणि रोहनने रडून रडून  आकाश-पाताळ एक केलं. आईने त्याला परोपरीनं समजावलं पण त्याची समजूतच पटेना. रात्री बाबा घरी आले तेव्हा रोहन मोठ्या आशेने त्यांच्याकडे धावला. त्यांच्या पायांना त्याने घट्ट मिठी मारली. “रोहन, तुला थोडेच दिवस सुट्टीपुरतंच तिकडं जायचंय. आईबरोबर तू परत इकडेच यायचंयस” असं त्यांनी त्याला समजावलं खरं पण ते समजावणं रोहनला वरवरचंच वाटत राहिलं…,  रडून-रडून रोहन मलूल होऊन गेला…!

या पार्श्वभूमीवरचं त्याचं आई आणि लहान बाळाबरोबर आजोळी येणं, साध्या तापाचं निमित्त होऊन त्याला आजोबांनी डॉक्टरांकडे आणणं आणि तिथे त्यांनी केलेली आदळआपट, त्रागा, आक्रस्ताळेपणा.. आणि अखेर नर्सच्या सूचनेनुसार ‘ तो घरी आईकडूनच औषध घेईल ‘ या विचाराने आजोबानी त्याला रिक्षातून  घराकडे नेणं.

रिक्षातही आजोबा खरंतर मनातून थोडे अस्वस्थच होते. रिक्षा घराजवळ येऊन थांबताच आजोबांनी रिक्षावाल्याचे पैसे देऊन रोहनला उचलून कडेवर घ्यावं म्हणून त्याला हात लावला न् त्यांच्या हाताला एकदम चटकाच बसला. त्याला उचलून घेऊन कसेबसे आपल्या मुलीला आवाज देत आजोबा घराकडे धावले… .एव्हाना छोटं तान्हुलं बाळ शांत झोपलं होतं, म्हणून रोहनची आईच पुढे आली आणि तिने दार उघडलं. रोहनची न् तिची नजरानजर झाली. त्याचा तापानं फुललेला लालसर चेहरा पाहून ती गलबलली. तिचे डोळे भरूनच आले एकदम. रोहनला जवळ घ्यायला तिने आपले दोन्ही हात पुढे केले आणि त्या ओल्या नजरेनेच ती त्याला.. ‘ये बाळा’ .. म्हणाली.रोहन आपली मलूल नजर तिच्यावर रोखून तिला आजमावत राहिला. होय.. ही.. ही हरवलेली आईच आहे आपली… मनोमन खात्री पटताच त्याने क्षणार्धात ‘आईss ‘अशी केविलवाणी आर्त हाक मारली आणि तो तिच्याकडे झेपावला. तिच्या कमरेला त्याने घट्ट मिठी मारली. आजोबा लगबगीने आत निघाले. ‘ चल, रोहनला घेऊन आत ये बरं आणि हे औषध दे त्याला ..’ असं म्हणून आजोबा पाणी आणायला गेले. आईने रोहनला हलक्या हाताने थोपटलं आणि ती त्याची मिठी सोडवू लागली पण….? ..त्याने तिला मारलेली ‘आईss’  ही आर्त हांक हेच त्याचे अखेरचे शब्द होते आणि अखेरचा श्वासही…!!

घडले ते असे सगळे अनपेक्षित आणि धक्कादायकच होते पण म्हणूनच ते एवढ्यावरच  संपणारही नव्हते…!

दुःख रोहन अचानक गेल्याचं तर होतंच पण तो गेल्याच्या दुःखाइतकाच त्या धक्क्यातून आता त्याच्या आईला कसं सावरायचं हाही प्रश्‍न ऐरणीवर येऊन बसलाय. कारण त्या क्षणापासून ती दगड होऊन गेलीय. निश्चल बसून राहिलीय. रडणार्‍या आपल्या तान्ह्याकडे दिवसभरात तिने ढुंकूनही पाहिलेले नाहीय. सतत हाकेच्या अंतरावर वावरत असणाऱ्या रोहनच्या भावना घरी कोणाच्याही मनापर्यंत पोहोचण्याइतकं त्यांच्यातलं अंतर कोसो दूर झाल्याची ही परिणती..!

यात नेमकं चुकलं कोण या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नेमकेपणानं सापडलेलं नाहीय. पण परस्परांमधील एका हाकेचे अंतर जाणीवपूर्वक जपण्याची निकड मात्र मला नव्याने जाणवू लागलीय एवढं खरं..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares