मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ माहेर… भाग-२ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्‍या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती. आता इथून पुढे)

दोघेही एका कपड्यांच्या हातगाडीपासून काही अंतरावर उभे होते. एक बाई तिथे आपल्या एका मुलाला घेऊन कपडे घ्यायला आली होती. तिने ठेलेवाल्याकडून मुलाच्या मापाची शर्ट-चड्डीची एक जोडी खरेदी केली आणि मुलाला घातली. त्याला ती अगदी बरोबर बसत होती. मुलगा नवीन कपडे पाहून खुश झाला. आता केवळ पैसे देणं बाकी होतं. ती भावाबद्दल विक्रेत्याशी घासाघीस करू लागली.

‘‘मेहुल, तुला आठवतं, अंशचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्यासाठी कपडे घ्यायला आपण याच बाजारात आलो होतो. ‘ स्वातीने प्रेमळ नजरेने त्या मुलाकडे बघत म्हंटले.

‘हो. त्यावेळी आपला नाईलाज होता. कमाई कमी होती नं!’

‘कमाई कमी होती, पण जीवन छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी झळकत होतं.

मी पण व्यापार्‍यांशी या बाईप्रमाणेच घासाघीस करायची आणि त्याने किंमत कमी केली, की खूप खुश व्हायची. ’

आज मात्र ती बाई आणि तो मुलगा यांच्या नशिबात खुशी नसावी. खूप घासाघीस केल्यानंतरही त्या व्यापार्‍याने जो भाव सांगितला, तेवढे पैसे बाईकडे नव्हते.

तिच्याकडे वीस रुपये कमी होते. वीस रुपये कमी घेऊन कपडे देण्यासाठी ती गयावयाकरत होती. पण व्यापार्‍याने त्यासाठी आपली असमर्थता दर्शवली. तो म्हणाला, ‘ताई, यापेक्षा एक रुपयादेखाल कमी होऊ शकत नाही. माझेदेखील घर आहे. परिवार आहे. तिकडेही मला लक्ष द्यायला हवं!’

त्या बाईकडे शेवटी एकच उपाय उरला. त्या मुलाच्या अंगावरचे कपडे काढून व्यापार्‍याला परत करणं. ती जेव्हा तसं करू लागली, तेव्हा तो मुलगा मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. बघता बघता त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो म्हणू लागला, ‘तू मला नवे कपडे घेऊन देण्यासाठी आणलस, तर का घेऊन देत नाहीयेस?’ तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, बेटा, हे कपडे चांगले नाहीयेत.

आपण तुला दुसरे चांगले कपडे आणू!’ पण मुलाला काही ते म्हणणं पटलं नाही. त्याचं झगडणं चालूच होतं. बालहट्टामुळे बाईपुढे धर्मसंकट उभे राहिले. ती जोर लावून त्याने घातलेले कपडे काढायचा प्रयत्न करत होती, तर मुलगा पूर्ण ताकदीनिशी कपडे घट्ट पकडून ठेवत होता.

आता मेहुलला रहावलं नाही. तो ठेलेवाल्याजवळ गेला आणि त्याने बाईला ऐकू जाणार नाही, इतक्या हळू आवाजात ठेलेवाल्याला विचारले, ‘किती कमी पडताहेत?’

साहेब, वीस रुपये. जितके कमी करणं शक्य असेल, तेवढे मी केले. आता याहून कमी करणं खरंच मला शक्य नाही. नाही तर मी मुलाला रडू दिलं नसतं. ‘

‘तू त्यांना कपडे दे. ते गेले, की मी तुला वीस रुपये देईन. त्यांना सांगू नकोस, की बाकीची रक्कम मी देतोय, नाही तर त्यांना वाईट वाटेल. ’ मेहुल हे हळू आवाजात बोलला आणि स्वातीपाशी येऊन उभा राहिला.

‘राहूदेत त्याने घातलेले कपडे’ ठेलेवाला म्हणाला. ‘दे पैसे. वीस रुपये कमी आहेत ना, चालेल. ’

बाईने तिच्याजवळ असलेली रक्कम व्यापार्‍याच्या हातावर ठेवली.

‘आता खुश ना?’ व्यापार्‍याने प्रेमाने मुलाला विचारले. बालकाने निर्मळ नजरेने आपली प्रसन्नता व्यक्त केली.

बाई व्यापार्‍याला आशीर्वाद देत-देत आणि मुलाच्या गालावरील अश्रू पुसत पुसत निघून गेली.

बाई आणि तिचा मुलगा थोडे दूर गेल्यावर मेहुलने त्या व्यापार्‍याचे पैसे देऊन टाकले.

‘आज मला माझा हरवलेला मेहुल परत मिळाला. ’ खुश होत स्वाती म्हणाली.

‘स्वाती, आज मी ऑफीसमध्ये हरवलेल्या मेहुलला शोधण्याखेरीज दुसरं काही कामच केलं नाही. चार वाजता मला तो मिळाला आणि मी तुला लगेचच फोन केला. ’

स्वातीने मेहुलचा हात धरला. ‘चल! आता मला काहीच नको. जे हवं होतं, ते मिळालं. ’

‘अरे ! इथपर्यंत आलोय, तर राजस्थानी कचोरी खाल्ल्याशिवाय कसं जायचं?

राजस्थानी कचोरी खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये आइसक्रीम खाल्लं. अंशूला पहिल्यांदा त्याच हॉटेलमध्ये त्यांनी आइसक्रीम खिलावलं होतं.

बाजारात चक्कर मारून ती दोघे बाईक ठेवलेल्या ठिकाणी परत आली.

मेहुलने स्वातीला मागे बसवले आणि बाईक पळवली. तो घराकडे जाणारा रास्ता नव्हता. स्वातीने विचारले, ‘इकडे कुठे? घेरी नाही जायचं?’

‘नाही. अजून एक ठिकाण बाकी आहे.’

‘कुठे?’

‘जवळच आहे.’

त्या जवळच्या जागेबद्दल स्वाती काही अंदाज बांधू लागली, पण तिचे सगळे अंदाज चुकीचे ठरले. त्या जागी मेहुलने बाईक उभी केली, तेव्हा ती चकित झाली.

‘इथे जायचे!’ बोटाने इशारा करत तो म्हणाला.

काव्य-रसिकांचं स्वागत करणारा तो टाउन-हॉल स्वातीला तिच्या माहेरासारखाच वाटला.

— समाप्त —

मूळ गुजराती कथा – पीयरियां 

मूळ गुजराती लेखक –  श्री यशवंत ठक्कर

मोबाईल: 9427539111

हिंदी अनुवाद – मायका 

हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम

अहमदाबाद 380059, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माहेर… भाग-१ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ माहेर… भाग-१ – मूळ गुजराती लेखक : यशवंत ठक्कर – हिन्दी अनुवाद : श्री राजेंद्र निगम  ☆  मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

‘मेहुल, आज ऑफीसमधून लवकर येऊ शकशील? स्वातीने विचारलं. |

‘का?’

‘आज रात्री आठ वाजता टाउन-हालमधे कवि संमेलन आहे. तिथे खूप चांगले चांगले कवी येणार आहेत. तू आलास तर जाता येईल. ’ 

जेव्हा जेव्हा, कविता, नाटक, साहित्य याविषयी चर्चा होत असे, तेव्हा तेव्हा मेहुलला हसू यायचं. हसत हसत तो म्हणाला, ‘हे कवी साले कल्पनेच्या जगातून कधी बाहेरच येत नाहीत. त्यांना दुसरा काही काम-धंदा आहे की नाही?’

‘मेहुल, जायचं नसेल, तर माझी काही हरकत नाही. पण, असं बोलून कुणाचा अपमान करणं योग्य नाही. ’

‘बघ. तू नाराज झालीस. जसा काही मी तुझ्या माहेरच्या लोकांचा अपमान करतोय. ’ 

नेहमीसाखी स्वाती गप्प बसली. पण, ती मनातल्या मनात मेहुलला प्रश्न केल्याशिवाय राहू शकली नाही. ‘मेहुल’ हा माझ्या माहेरच्यांचा अपमान करण्यासारखं नाही आहे? माहेर म्हणजे काय, केवळ आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी एवढंच? ज्या कवींच्या कवितांनी मला प्रेम करायला शिकवलं, एकटी असताना मला हसायला शिकवलं, एकटी एकटी असताना मला रडायला शिकवलं, ते कवी म्हणजे काय माझं माहेर नव्हे? आजा मी जी आहे, जशी आहे, त्यात माझे आई-वडील आणि माझे शिक्षक यांच्याबरोबरच या कवींचंही महत्वाचं योगदान आहे. हे मी तुला कसं समजाऊ? ते समजण्यासाठी तुझ्याजवळ हृदयच नसेल तर…. ’

स्वाती मेहुलसाठी टिफिन तयार करायच्या कामाला लागली. पण वातावरणात उदासीनता भरून राहिली.

ऑफिसला जायच्या वेळी, मेहुल वातावरण बदलण्याच्या दृष्टीने म्हणाला, ‘स्वाती, तुला माहीत आहे, मी पहिल्यापासूनच जरा प्रॅक्टिकल आहे. कल्पनेचे घोडे दौडविण्यात मला मुळीच रस नाही. मला कामही खूप असतं. जबाबदारीही खूप आहे. आपल्याला अंशचाही विचार करायचा आहे. त्याला चांगल्या हॉस्टेलमधे ठेवायचं आहे. उच्च शिक्षणानंतर त्याला परदेशात पाठवायचं आहे. अशात केवळ साहित्याचाच राग आळवून चालणार नाही. ’

स्वाती मूकच राहिली. मेहुलने वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ‘स्वाती, तुला कविता, कथा, नाटक यांचा शौक आहे, पण हे सगळं तू टी. व्हीवरून बघू शकतेस नं? आता तर नेटवरही या गोष्टी मिळतात. ’

‘मेहुल, नेट वर तर पोळी-भाजीही असते, पण त्याने पोट नाही भरत. टी. व्हीवर हिरवीगार झाडेही खूप असतात, पण त्यांची सावली नाही मिळत. टी. व्हीवरचा पाऊस आपल्याला भिजवत नाही. ठीक आहे. कवि-संमेलन ही काही फार मोठी गोष्ट नाही. गेलो नाही, तरी चालेल. आपल्या जबाबदार्‍या आधी. ’ स्वातीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचे रडवेले डोळे मेहुलच्या नजरेपासून लपू शकले नाहीत.

‘तुला खुश ठेवण्यासाठी मी किती जीव तोडून मेहेनत करत असतो. तरी तुझ्या डोळ्यात पाणी. तुला काय हवय, हे मला कळतच नाही. ’ मेहुलचा आवाज जरा तीक्ष्ण झाला.

‘मला माझा हरवलेला मेहुल हवाय, जो छोट्या छोट्या गोष्टींनी खूश व्हायचा. ’ स्वाती कसं तरी म्हणाली.

‘छोट्या छोट्या गोष्टी!’ मेहुल हसला आणि ऑफीसला जायला निघाला.

स्वाती एकटीच राहिली. तिने मनभर रडून घेतलं. ती विचार करू लागली, ‘असं जीवन जगणं अवघड आहे. वाटतय, रोजचा दिवस जसा कॉपी – पेस्ट होत चाललाय. यात नवीन काहीच होत नाहीये. जे व्हायचं होतं, ते झालं. जे रोज होत होतं, ते एकसारखंच. कविता, नाटक, संगीत, प्रवास या सगळ्याशिवाय जीवन थांबत नाही, पण या सगळ्यामुळे जीवनाला एक गती मिळते. हे सगळं समजून घेण्यासाठी मेहुलजवळ वेळच नाही. त्याचं जीवन वेगाने धावणार्‍या ट्रेनसारखं आहे आणि माझं जीवन यार्डात पडून राहिलेल्या एखाद्या डब्यासारखं.

सगळी कामं आवरून ती बिछान्यावर पडली. पडल्या पडल्या हाच विचार करू लागली. विचार करता करता तिचे डोळे जडावले.

 मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा तिने डोळे उघडले. फोन मेहुलचा होता. बोलणं सुरू करण्यापूर्वी तिने घड्याळाकडे पहिले. चार वाजायला आले होते.

‘हॅलो स्वाती, काय करते आहेस?’

‘बस! आत्ताच उठते आहे. ’ 

‘तू असं कर, रिक्शा करून सहा वाजता गावात ये. मी न्यायला आलो, तर उशीर होईल. आपण लक्ष्मी हॉलवर भेटू. ‘

‘पण का? काही खरेदी करायची आहे का? माझ्याकडे खूप कपडे आहेत. ’

‘मी एकत्र भेटण्याबद्दल बोलतोय. खरेदीबद्दल नाही. मी फोन ठेवतोय. कामात आहे. यायचं विसरू नकोस. ’

 स्वातीला वाटलं, मनवण्यासाठी एखादी साडी किंवा ड्रेस घेण्याच्या विचारात असेल, पण त्यात काय अर्थ आहे? अशा छोट्या गोष्टीत तिला आजिबात रस उरलेला नाहीये आता. आज नाकारच द्यायचा. मला कपडे आणि दागिने जमा करण्यात मुळीच रस नाही.

ती लक्ष्मी-हॉलशी पोचली. मेहुल अपली बाईक पार्क करून तिचीच वाट बघत होता.

‘मेहुल, काही खरेदी करायचीय?’ स्वाति साडीच्या दुकानाकडे नजर वळवत म्हणाली.

‘हो‘

‘काय घ्यायचय?

‘हे. ’ तिथे एक बाई डोक्यात घालण्यासाठे सुशोभित, कलाकुसरीची बोरं विकत होती. ( बोर म्हणजे भांगेत घालायचा दागिना. मारवाडी बायकांचा पदर त्या बोरापुढे कधी येत नाही. ) मेहुलने तिच्याकडे बोट दाखवत म्हंटलं.

 ‘ओह ! मला याची खरोखरच गरज आहे. ’ स्वाती पळतच तिकडे गेली आणि बोर पसंत करण्यात मश्गुल झाली. मेहुल स्वातीला जसा काही समजू लागलाय, अशा पद्धतीने तिच्याकडे पाहू लागला.

‘दहा रुपये द्या नं!’ मेहुलकडे बघत ती म्हणाली.

‘क्रेडिट कार्ड नाही चालणार?’ त्याने गमतीने विचारले. किती तरी दिवसांनंतर तो असं गमतीदार बोलला होता. स्वातीला छान वाटलं.

बोर खरेदीनंतर मेहुलने स्वातीला कपडे खरेदीविषयी विचारलं, पण ती नको म्हणाली.

 ‘ मग चल, बाजारात एक फेरफटका मारू! बाजारात बोरासारखीच आणखी एखादी गोष्ट वाट बघत असेल. ’ तो पुन्हा गमतीने म्हणाला.

स्वाती आठवू लागली. शेवटचं बाजारात ती कधी आली होती? नक्की दिवस आठवत नाही, पण पंध्रा वर्षे तरी झाली असतील. मेहुलचा धंद्यात थोडा थोडा जम बसू लागला होता. कमाई कमी होती, त्यामुळे खरेदीसाठी या बाजारातच यावं लागे.

बाजार आजही वेगवेगळ्या वस्तूंनी आणि लोकांनी भरलेला आहे. गरीब व मध्यम वर्गाचे लोक कपड़े, चप्पल, कटलरी, खेळणी यासारख्या वस्तू खरेदी करताहेत. व्यापारी आपआपल्या वस्तू विकण्यासाठी जाजम, सतरंजी घालून बसले आहेत. चार-सहा फुटांची जागाही कमाईसाठी पुरेशी होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यापाशी जे काही कौशल्य होते, ते, ते पणास लावत होते. ग्राहक, वस्तूंसाठी घासाघीस करत होते. व्यापार्‍यांचं ओरडणं, कलकलाट गाड्यांच्या हॉर्नचं संगीत, जोतजोरात वाजणारी गाणी, ‘जागा द्या… जागा द्या… ‘, ‘गाय आली.. गाय आली… ‘ सारख्या किंकाळ्या वातावरणाला चैतन्य प्राप्त करून देत होत्या.

स्वातीला किती तरी काळानंतर अशा जिवंत वातावरणाचा अनुभव येत होता. कुणी तरी अगदी जवळचं, आत्मीय भेटावं, तसा तिला आनंद झाला होता. वस्तू घेणार्‍या ग्राहकांच्या डोळ्यात दिसणारी आशा, उमंग, लाचारी यासारखे भाव तिला स्वत:चेच वाटले. किती तरी वर्षांपूर्वी ती हेच भाव घेऊन, या बाजारात नेहमीच येत होती.

— क्रमश: – भाग १

मूळ गुजराती कथा – पीयरियां 

मूळ गुजराती लेखक –  श्री यशवंत ठक्कर

मोबाईल: 9427539111

हिंदी अनुवाद – मायका 

हिंदी अनुवादक – राजेन्द्र निगम

अहमदाबाद 380059, मो. 9374978556

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोठा… भाग – २ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ मोठा… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.) – इथून पुढे 

पूर्वी आजोबा चालू शकायचे, तेव्हा ते रोज संध्याकाळी अखिलला बागेत घेऊन यायचे. तेव्हा अखिल स्वच्छंदपणे बागडत असे. आजोबा बाकावर बसून इतर आजोबांशी गप्पा मारायचे. अखिल इतर मुलांबरोबर पकडापकडी, लपाछपी, साखळी खेळायचा. शिवाय घसरगुंडी, चक्र, झोपाळे वगैरे होतेच. नंतर आजोबा आजारी पडले. त्यांना घरातल्या घरातपण एकट्याने चालता येत नाही आता. वॉकर घेऊन आजी त्यांना टॉयलेटला नेते. तेवढंच त्यांचं चालणं.

आज मात्र त्याची मनःस्थिती वेगळीच होती. ‘अधीरला कसं सांगायचं हे? त्याला कळेल; पण तो घाबरणार नाही, असं. ‘ 

दोन झोके घेतले मात्र, अधीरला आजीचं आठवलं. तो मग धावतच अखिलकडे गेला, ” दादा, दादा, सांग ना. आजी कुठे गेली?”

” आपण बसू या. मग सांगतो. “

बाक भरलेले होते. मग ते खाली हिरवळीवरच बसले.

“दादा, आता सांग ना. आजी…. “

“आपली आजी ना, अधीर, देवबाप्पाकडे गेली. “

“हो? मग परत कधी येणार?” 

” नाही. परत नाही येणार. ” 

” का पण?”

“देवबाप्पाकडे गेलेले परत येत नाहीत. तिथेच राहतात ते. “

“मग आपल्याला आजी कुठची?”

आता अधीरलाही रडायला येऊ लागलं. मग अखिलने त्याला जवळ घेतलं. थोडा वेळ रडल्यावर अखिलने स्वतःचे व अधीरचे डोळे पुसले.

“हे बघ, अधीर. बाबा ऑफिसात आणि आई शाळेत गेल्यावर आपल्यालाच आजोबांची काळजी घ्यावी लागणार. “

“पण आपल्याला तर चहा करायला येत नाही. “

“मी शिकेन चहा करायला. “

“मग मी तुला मदत करीन. आणि आजोबांना बाथरूममध्ये नेताना तू एका बाजूने धर, मी दुस-या बाजूने धरीन. ” 

दोघे घरी आले, तेव्हा आजी कुठेच दिसत नव्हती. आजोबा झोपले होते. कदाचित नुसतेच डोळे मिटून पडले असतील. घरात फक्त बायकाच होत्या. बाबा, काका, मामा…… कोणीच पुरुष घरात नव्हते. आत्याचे डोळे रडून रडून सुजले होते. काकी, मामी आणि इतर बायका गप्पच होत्या. कियानची आजी आणि शेजारच्या बिल्डिंगमधल्या एक बाई बोलत होत्या.

“आजी शेवटपर्यंत आजोबांचं व्यवस्थित करत होत्या. आता या नोकरीला जाणार, म्हटल्यावर पंचाईतच आहे. ते तसे बेडरिटन…. “

” रिटन नाय हो. रिडन. बेडरिडन. आता तसे वृद्धाश्रम झालेत, म्हणा. त्या पिंकीच्या आई सांगत होत्या. त्यांनी त्यांच्या सास-यांना ठेवलंय ना, त्या वृद्धाश्रमातला स्टाफ एकदम अ‍ॅरोगंट आहे. “

“मग घरी आणलं त्यांना? “

” छे हो. सहा महिन्यांचे पैसे आगाऊच भरले आहेत. ती मुदत संपल्यावर दुस-या वृद्धाश्रमात ठेवणार, म्हणाल्या. “

आंघोळ करून आलेल्या उमाच्या कानावर हे पडलं. न राहवून ती बोलली, ” हे बघा. वृद्धाश्रमाच्या गप्पा इथे नकोत. बाबांना आधीच धक्का बसलाय. त्यात हे कानावर पडलं, तर ते हाय खातील. आणि आम्ही आमच्या बाबांना घरीच ठेवणार. ” 

” नाही हो, अखिलची आई. मी आपलं सांगितलं. सोयी आहेत, म्हटल्यावर…. ” 

“हा विषय बंद. ” 

मघापासून काळजीत असलेल्या आत्याने सुटकेचा निश्वास सोडला.

काकी म्हणाली, ” अखिल, अधीर, तुम्ही आंघोळ करून घ्या. मी पाणी काढून देते आणि टॉवेल आणून देते. “

अखिलने अधीरला आंघोळ घातली. स्वतःही केली.

केस पुसताना अखिलला आठवलं, त्याने कितीही जोर लावून केस पुसले, तरी आजी केसांना हात लावून बघायची आणि कुठे ओलसर असतील, तर खसखसा पुसून द्यायची.

अधीर तर काय, आजी केस पुसायला लागली, की मोठमोठ्याने ओरडायला लागायचा. मग आजी शांतपणे त्याला समजवायची, ” डोक्यात पाणी मुरलं, तर सर्दी होते. केस पुसताना तुला दुखत असेल, तर आपण सरळ तुझं चकोट करून घेऊ या. वाटल्यास शेंडी ठेवू या. ” मग अधीर घाबरून गप्प बसायचा.

अखिलची मुंज झाली, तेव्हा आई, बाबा, आजोबा सगळे मागे लागले होते, “चकोट करू या. छान दिसेल मुंजा. ” पण अखिल अजिबात तयार नव्हता. मग आजीने फतवा काढला, ” मुंज अखिलची, केस अखिलचे, तर निर्णयही अखिलच घेणार. ” अखिल खूश झाला.

पण आजी एवढ्यावरच थांबली नाही. तिने बाबा, काका आणि इतरांचे मुंजीतले, काही छोट्या बाळांचे जावळाचे फोटो गोळा केले. एका मासिकातले मोठमोठ्या माणसांचेही फोटो दाखवले. “हल्ली, अरे, फॅशन आलीय चमनगोटा करायची. आणि समजा, तुझे केस कापलेच, तर महिन्या-दीड महिन्यात हा बगिचा पुन्हा वाढणार, ” त्याचे केस कुरवाळत आजी म्हणाली.

“नक्की?”

“नक्की. अगदी शंभर टक्के. “

“पण कापताना दुखणार?” 

“एवढं पण नाही. आता तुला मी त्या छोट्या बाळांचे फोटो दाखवले ना?जावळ काढतानाचे. “

“मुलं चिडवतील?”

“चिडवायला लागली, तर तूच उलट सांग त्यांना, ‘किती हलकं वाटतं!’ “

शेवटी अखिल हसतहसत तयार झाला होता.

शेजारच्या काकूंनी दारातूनच अखिलला हाक मारली आणि हातातला मोठा जेवणाचा डबा त्याच्याकडे दिला, ” स्वयंपाकघरात नेऊन ठेव. कोणाला जेवायची इच्छा नसणार. पण काहीतरी पोटात तर गेलं पाहिजे. आजोबांना औषधं घ्यायची असणार. तू आणि अधीर – तुमची आंघोळ झाली, तर आमच्याकडेच या जेवायला. आणि तिथेच अभ्यास वगैरे करत बसा. इथे कोणकोण येत राहणार…. ” 

आजी नेहमी सांगायची, काकू ओरडत असल्या, तरी स्वभावाने खूप चांगल्या आहेत. ते अखिलला आता पटलं.

अखिलला काकूंची खूप भीती वाटायची. खूप कडक होत्या त्या.

एकदा दुपारी अखिल आणि कियान जिन्यात कॅचकॅच खेळत होते. दोनदा बॉल काकूंच्या दारावर बसला. तेव्हा काकू बाहेर येऊन ओरडल्या, ” दुपारच्या वेळी घरात बसून बैठे खेळ खेळा. ” त्यामुळे तो काकूंच्या बाजूला फिरकत नसे. पण आज नाईलाज होता. म्हणून तो पटकन काकूंना बोलवायला गेला. त्याही चटकन आल्या. आणि केवढी मदत केली त्यांनी! 

त्याउलट कियानची आजी त्याला मस्त वाटायची. त्याच्याकडे कधी गेलं, की आजी तिच्या खोलीत टीव्ही बघत बसलेली असायची. भूक लागली, की कियान स्वतःच स्वयंपाकघरात जायचा आणि डबे उघडून यांच्यासाठी खायला आणायचा.

मग अखिलला डॉक्टरांची आठवण झाली. त्याला डॉक्टरांचा रागच आला होता. स्वतःहून सोडाच, पण आजोबांनी सांगितलं, तरी ते हॉस्पिटलला, अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करत नव्हते. नुसतेच गप्प बसून राहिले होते.

आता अखिलच्या लक्षात आलं, आजी गेल्याचं डॉक्टरांना कळलं, तरी आजोबांना धक्का बसेल, म्हणून ते तेव्हा काहीच न बोलता आई-बाबांची वाट बघत बसले होते. नंतरही त्यांनी आईकडे, आजोबांसाठी एक गोळी काढून दिली आणि सांगितलं, “यांना त्रास झाला, तर रात्री जेवल्यानंतर ही गोळी द्या. म्हणजे शांत झोप लागेल. “

अखिल तसा नेहमीच सगळ्यांशी बोलायचा. पण इतरांचं बोलणं, त्यामागचा अर्थ, बोलणा-याचा स्वभाव, प्रामाणिकपणा याची जाणीव आज झाली, तेवढी त्याला कधीच झाली नव्हती.

या पाच-सहा तासात आपण ख-या अर्थाने मोठे झालो आहोत, असं त्याला वाटलं.

– समाप्त –

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोठा… भाग – १ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ मोठा… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दुपारी आजीने अधीरला तयार केलं आणि त्याला बसपर्यंत सोडायला निघणार, तेवढ्यात अधीरने रडायला सुरुवात केली, “माझ्या पोटात दुखतंय. मी शाळेत जात नाय. ” 

“थांब. तुला औषध देते. पटकन बरं वाटेल. ” आजीने औषधाची बाटली आणली.

“नको. हे कडू आहे खूप. “

“पण लगेच बरं वाटेल तुला. “

“नाय. तेवढं दुखत नाय. कमी दुखतंय. ” 

“मग शाळेत जा तर. ” 

या सगळ्यात स्कूल बस निघून गेली.

‘अरे बाप रे !आता याला शाळेत पोचवायला जावं लागणार!’आजीला थोडा स्ट्रेस आला.

तेवढ्यात अखिल शाळेतून घरी आला.

“अखिल, याला शाळेत पोचवून येशील बाळा?माझ्याने जाववत नाही आहे. “

“का? आज बस नाही आली?” 

“ह्याच्या पोटात थोडंसं दुखतंय म्हणत होता. त्यामुळे बस चुकली. टीचरकडे नेऊन पोचव. आणि बसवाल्या काकांना सांग, संध्याकाळी बसमधून घेऊन यायला. ” 

“चल, ” अखिल अधीरला घेऊन शाळेकडे निघाला.

शाळेत गेला, तर बसमधली मुलं आधीच उतरली होती.

“मी तुला टीचरकडे सोडतो आणि परत जातो हं, ” अखिल म्हणाला. अधीर काही बोललाच नाही.

शाळेच्या गेटकडेच चार छोटी मुलं हातात हात धरून रस्ता अडवून उभी होती.

“दाsदाss”भेदरलेल्या अधीरने अखिलचा हात घट्ट पकडला.

“काय झालं?”

त्या मुलांनी अधीरच्या दादाला बघितलं मात्र, ती घाबरून पळत सुटली.

“तू मारामारी केलीस त्यांच्याशी?” अखिलने अधीरला विचारलं.

“नाय. मी फक्त मानसला धक्का मारला. तो विशेषच्या अंगावर पडला. विशेषचा धक्का लागून आरव पडला. आरव अन्मेषला धरायला गेला, तर अन्मेषपण खाली पडला. ”

“तू एवढ्या जोरात धक्का मारलास मानसला?” 

“नाही. मी हळूच ढकलला होता. ” 

तेवढ्यात शाळेची बेल झाली.

अखिलने घरी आल्यावर ही गोष्ट सांगितली, तशी आजी हसतहसत म्हणाली, ” मला वाटलंच होतं, ह्याने काहीतरी मस्ती केली असणार. म्हणून शाळेत जायला घाबरतोय आणि पोटात दुखायचं नाटक करतोय.

“किती वाजले?”आजोबांनी विचारलं, तेव्हा अखिलने गृहपाठ करताकरताच म्हटलं, “आजोबा, गेल्या पाच मिनिटात चौथ्यांदा विचारताय तुम्ही. “

आजी हसायला लागली, ” काही नाही, अरे. चहा हवा असणार त्यांना. करते, करते. जरा जेवण तरी खाली उतरू द्यायचं. बरं. करते चहा. चहा आणि बिस्किटं घ्या आता. नंतर थोड्या वेळाने तिखट सांजा करते. अधीर यायची वेळ झाली की. गरम असेल तर खातो नीट. नाहीतर चिवडत बसतो. “

“आजी, तू त्याचेच लाड कर, ” अखिल रुसल्या सुरात बोलला.

“अरे, तुझेपण लाड करतेच की मी. आज दुधीभोपळ्याची भाजी तू नीट खाणार नाहीस, म्हणून सांडगे-पापड तळले ना तुझ्यासाठी!”

“ते सगळे पोचले आपल्या गंतव्यस्थानी. आता चहाची हुक्की आलीय. “-आजोबा.

“करते हो, “आजी गुडघ्यावर हात ठेवून जरा पुढे वाकली आणि उठायला गेली. पण उठण्याऐवजी ती धप्पकन पुन्हा सोफाचेअरवर बसली आणि तिची मान लुढकली.

“अगं, काय झालं?” आजोबांनी काळजीने विचारलं. अखिलही धावला. पण आजी जराही हलली नाही.

“अरे, शुद्ध गेली वाटतं तिची. पाणी शिंपड तिच्या तोंडावर. ” 

अखिलने आजीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिच्या डोळ्यांना पाणी लावलं. पण आजी तशीच.

 मग मात्र आजोबा घाबरले. ” अरे, डॉक्टरांना फोन कर. आई-बाबांनाही फोन कर. शेजारच्या काकूंना बोलाव. “

“आजोबा, डॉक्टर म्हणताहेत- तासाभरात दवाखान्यात जायला निघणार. आधी तुमच्याकडे येतो. “

“दे माझ्याकडे फोन. मी बोलतो. ‘डॉक्टरसाहेब, हिची शुद्ध गेलीय. अटॅक आल्यासारखं वाटतंय. तुम्ही लगेचच या. ‘ “

“बरं, बरं. निघतो मी. “

मग आई-बाबांना फोन करून अखिल शेजारच्या काकूंना बोलवायला गेला.

डॉक्टरांनी आजीची नाडी तपासली. पापण्या वर करून डोळे तपासले. बीपी तपासलं.

“माझं सगळं वेळच्या वेळी करायच्या गडबडीत तिच्या स्वतःच्या गोळ्या बरेचदा घ्यायच्या राहून जातात. मलाच आठवण करून द्यावी लागते तिला, “आजोबा म्हणाले, “डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागेल का? तुम्ही हॉस्पिटल ऑथॉरिटीजशी बोलून घ्या. म्हणजे लगेचच अ‍ॅडमिट करतील ते. “

डॉक्टरांनी हातानेच त्यांना ‘थांबा’ अशी खूण केली. आणि काकूंच्या मदतीने आजीला बिछान्यावर आणून झोपवलं.

डॉक्टर आजीला सीपीआर द्यायला लागले. ते एवढा जोर लावत होते, की आजीला दुखणार, असं अखिलला वाटलं. पण आजीच्या चेह-यावर ना दुखण्याची खूण दिसत होती, ना तिच्या तोंडून ‘हायहुय’ फुटत होतं. थोडा वेळ प्रयत्न करून डॉक्टर थांबले. अखिलला म्हणाले, ” मला प्यायला पाणी आण थोडं. ” 

“काय…. काय झालंय तिला?” आजोबांनी काळजीने विचारलं.

पण डॉक्टर आजोबांकडे फक्त बघत राहिले.

“तुम्ही… हॉस्पिटलला… फोन… करा ना, डॉक्टर. अ‍ॅम्ब्युलन्सही बोलवा. माझी सून येईल तोपर्यंत. “

पण डॉक्टर काहीच बोलले नाहीत.

“चहा घेणार का?” काकूंनी विचारलं. पण डॉक्टरांनी हातानेच ‘नको’ अशी खूण केली.

तेवढ्यात उमा आली.

“काय झालं, डॉक्टर, आईंना?”

“शी इज नो मोअर. मॅसिव्ह अटॅक असणार. “

उमाचे डोळे पाण्याने डबडबले. अखिल जाऊन आईला बिलगला.

आता कुठे आजोबांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. काकूंनी त्यांना प्यायला पाणी दिलं.

तेवढ्यात महेशचा फोन आला. तो निघाला होता. उमाला त्याच्याशी बोलायला सुधरेना. मग डॉक्टरच बोलले त्याच्याशी.

काकूंनी उमाला विचारून एकेका नातेवाइकाला फोन लावायला सुरुवात केली.

आजीच्या फोनचा टायमर वाजला. अधीर शाळेतून यायची वेळ झाली होती.

उमाने अखिलला जवळ घेतलं आणि म्हटलं, ” आता हळूहळू सगळे जमायला लागतील….. पुढचे विधी बघून अधीर घाबरून जाईल. तू त्याला घेऊन बागेत जा. माझ्या पर्समधले पैसे घे. दोघंही काहीतरी खा पोटभर आणि मग खेळायला जा. ” 

आजी पुन्हा दिसणार नाही, या विचाराने अखिल सद्गदित झाला होता. त्याने जाऊन झोपलेल्या आजीला मिठी मारली, तिचा पापा घेतला आणि तो निघाला.

“हॉटेलात खायचं आपण? किती मज्जा ना! पण आजी ओरडणार नाय ना?” 

अखिलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

“तू रडतो कशाला, दादा?”

“नाही रे. रडत नाही मी. डोळ्यात काहीतरी गेलं. “

मोठ्या माणसांशिवाय असा अखिल पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आला होता. मग त्याने मेन्यूकार्ड बघितलं. त्या पदार्थांच्या किमतीही बघितल्या. आयुष्यात पहिल्यांदाच. मग आपल्याकडचे पैसे आणि बिल यांचाही त्याने हिशेब केला.

अधीर मिटक्या मारत खात होता. अखिलच्या घशाखाली काहीच उतरत नव्हतं. मघासच्या सगळ्या गोष्टी ‘अ‍ॅक्शन रिप्ले’प्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर येत होत्या.

बागेत जात असताना समोरच्या बिल्डिंगमधल्या मावशी भेटल्या, ” काय रे, काय झालं तुझ्या आजीला? ब-या होत्या ना त्या? पहिल्यांदा मला वाटलं, तुझे आजोबाच गेले की काय? मग कळलं, आजी गेल्या म्हणून. “

अखिलला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला. तो काहीच बोलला नाही.

त्या गेल्यावर अधीरने विचारलं, ” दादा, त्या मावशी काय म्हणत होत्या? आजी कुठे गेली?”

“बागेत गेल्यावर सांगतो. “

तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जयु… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ जयु… ☆ श्री सुनील शिरवाडकर

जयु खुप अस्वस्थ झाला होता.. आज सकाळपासून सगळंच मनाविरुद्ध घडत होतं.. नेहमीप्रमाणे तो उठला नऊ वाजता.. उठल्यावर सगळ्यात पहिले त्याला ऐकावं लागलं होतं बायकोचं बौध्दिक.. आज पियुचा वाढदिवस.. तिला शाळेत सोडवायला दोघांनी जायचं ठरलं होतं.. तरीही नऊपर्यंत झोपुन रहातो म्हणजे काय?सात पासुन उठवते.. पण उठायला तयारच नाही.

कंटाळा आला तिला.. शेवटी कंटाळून तिने पियुला व्हॅननेच शाळेत पाठवले.. नऊ वाजता जयु उठला.. सॉरी सॉरी करत त्याने आवरायला घेतलं.. नऊ पर्यंत झोपतो तो.. पण तेवढी झोप आवश्यक तर असते ना.. तो घरी यायचा मुळात बारा नंतर.. मग जेवण बिवण आटोपून झोपायला एक वाजायचा.. म्हणुन मग सकाळी उशीर.

चार वाजता कामावर जायला निघाला.. जयु झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय होता. संध्याकाळ पासुन त्याची ड्युटी सुरू व्हायची.. आज घरुन निघाला. ‌बाईकवर,. मागच्या सीटवर असलेल्या डिलीव्हरी बॅगवर फडकं मारलं.. किक मारली.. थोड्या पुढे गेलं तर हॅंडल डगमगायला लागलं.. पुढचं चाक पंक्चर..

नशीबाने पंक्चर काढणारा जवळच होता.. तिथपर्यंत गाडी ढकलत नेली.. टायरबियर खोललं.. चेक केलं..

“साहेब.. ट्युब बदलुन टाका आता.. लय पंक्चर झालेत. “

“तु आत्ता तर करुन दे. ‌बघु परत पंक्चर झाली की ट्यूब बदलुन टाकु. “

पंक्चर काढण्यात तास गेला.. उशीर झाला.. त्याबद्दल ऑनलाईन शिव्याही खाल्ल्या.. तोपर्यंत कॉल यायला सुरुवात झाली..

संध्याकाळी कसं.. बहुतेक डिलीव्हरी चाट वगैरेंच्या असतात.. वेगवेगळ्या ठिकाणांहून पार्सल उचलायचे, आणि लोकेशन्स वर पोचवायचे.. फारसा पगार मिळत नाही.. आणि शिक्षण सुध्दा नाही.. त्यामुळे यापेक्षा दुसरा जॉब सध्यातरी नव्हता.. पगारा व्यतिरिक्त थोडाफार इंटेन्सिव मिळायचा.. भागुन जायचं कसंतरी.

चार वर्षांपासून जयु हे काम करतोय. बारावी नंतर त्यानं कॉलेजला रामराम ठोकला.. दोन चार वर्षे अशीच गेली.. मग जॉब शोधण्यात वर्ष गेलं.. बारावी झालेल्या मुलाला काम तरी कुठलं मिळणार?मग हे झोमॅटोचं काम मिळालं.. हातात चार पैसे पडु लागले.. वर्षभरात लग्न पण झालं.. पियुचा जन्म झाला.. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.. सुरु आहे.

पण अलीकडे त्याचं मन या कामात लागत नाही.. सुरुवातीला.. म्हणजे लग्नापूर्वी पैसे पुरायचे. ‌पण आता चणचण भासू लागली.. पगारवाढ पण फारशी होत नाही.. पेट्रोल.. गाडीचा मेंटेनन्स यातही बरेच पैसे जातात..

खिशातला मोबाईल वाजला.. घरुन फोन होता.

“अहो.. आज लवकर येताय ना? बाकीचं सगळं मी आणलंय.. फक्त आईस्क्रीमचा पॅक तेवढा येताना घेऊन या. “

“हो.. पण मला यायला दहा तरी वाजतील.. तु फोन ठेव. “

“नका हो एवढा उशीर करू.. आजतरी या ना नऊ पर्यंत. “

हो हो करत जुने फोन ठेवला.. का काय माहित.. पण आज तो खुपच चिडचिड करत होता.. मनाशी सारखी तुलना.. आपलं आयुष्यच सालं वणवण करत जाणार.. कडाक्याची थंडी असो.. नाहीतर कोसळणारा पाऊस असो.. मोबाईल मध्ये बीपबीप झालं की वळवा गाडी..

फुड पार्सल घेऊन आपण इथे तिथे जातो.. काय घरं असतात लोकांचे.. काय जिणं असतं काहींचं.. त्यांचं खाणंपिणं.. हॉटेलींग.. अश्या सुस्थितीत असणाऱ्या वर्गाबद्दल त्याच्या मनात नकळतच एक द्वेषाची भावना निर्माण झाली होती.. मनात सारखे निगेटिव्ह विचार.. असं वाटायचं की..

तेवढ्यात मोबाईल मध्ये बीपबीप झालं.. गाडी बाजूला घेऊन त्यानं पाहिलं.. जवळच्या एका गाडीवरून पाच पार्सल उचलायचे होते.. डिलीव्हरी लोकेशन फार दुर नव्हतं.. लगेच त्यानं गाडी वळवली..

त्या पाणीपुरी स्टॉलवर फार गर्दी नव्हती.. अक्षरशः पाचच मिनिटांत त्याच्या हातात पार्सल मिळालं.. त्यानं मागच्या सीटवर असलेल्या बॅगमध्ये ते टाकलं.. ॲड्रेस पाहीला.. बापरे.. आठवा मजला होता तो सोसायटी मधला.. त्याला हे असं मोठ्या सोसायटीत जाणं नको वाटायचं.. एकतर गेट वरच अडवलं जायचं.. ज्याच्या कडे जायचं त्यांनी खाली येणं अपेक्षित असतं.. पण त्यांना अगदी दाराशी डिलीव्हरी हवी असायची.. काही बोलायला गेलं तर शिव्या.. आपल्याला अगदी विकतच घेतात हे लोक.. तसंच बोलणं असतं त्यांचं..

पार्सल घेऊन तो त्या पत्त्यावर पोचला.. फोनबीन केला.. लगेच एक लहान पोरगं खाली आलं.. त्याच्या हातात पार्सल दिलं.. तोवर दुसऱ्या डिलीव्हरीचा मेसेज आलाच होता..

जितक्या जास्त डिलीव्हरी.. तितकं इंटेन्सिव मिळायचं जयुला.. आज तो रात्री उशिरापर्यंत काम करणार नव्हता.. त्यामुळे साहजिकच त्याची कमाई कमी होणार होती.. चिडचिड व्हायला हेही एक कारण..

पण हळूहळू त्याचा मुड बदलत गेला.. माणसाचं कसं असतं ना.. एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जसा मुड जातो.. तसं एकदोन गोष्टी मनासारख्या झाल्या, तर मुड छानही होऊन जातो.. त्याला जवळचेच डिलीव्हरीचे कामं मिळत गेले.. पार्सल ही पटपट मिळत गेले.. ट्रॅफिक मधुन जाताना ग्रीन सिग्नल पण लगेच मिळत गेले.. कुठल्याही सोसायटीत एकही कुत्रं मागे लागलं नाही.. कुठल्याही सोसायटीत लिफ्ट बंद नव्हती.. कुठेच फारसे जिने चढावे लागले नाही.. का कोण जाणे.. पण मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होत गेली.. रात्री उशिरापर्यंत पर्यंत फिरुन जेवढी कमाई व्हायचीच.. तेवढी आत्ता दोन तासात झाली.

मस्तच गेली संध्याकाळ.. जयु स्वतःच्याच मनाशी बोलत होता.. उगाच आपण उदास होतो.. देवानी खुप जरी दिलं नाही.. तरी दिलं ते कमी सुध्दा नाही.. आपल्याला एक गोड पोरगी दिली ना पियु सारखी..

आता हे शेवटचं घर.. हे पार्सल दिलं की आपण आपल्या घरी..

शेवटच्या घरी तो पार्सल घेऊन गेला.. आजोबा आणि आजी असे दोघंच तिथे रहात होते.. तिथं रेडिओ वर गाणं लागलं होतं..

बाळाच्या चिमण्या ओठातुन 

हाक बोबडी येते 

वेलीवरती प्रेम प्रियेचे 

जन्म फुलांनी घेते 

जयुचं फारसं शिक्षण नव्हतं.. त्याला गीतामधला गर्भित अर्थ समजला नाही.. पण डोळ्यासमोर आली ती त्याची लहानगी पियु.. पप्पा पप्पा अशी चिमण्या ओठातुन.. बोबड्या बोलात हाक मारणारी आपली लाडकी पियु.. आज तिचा वाढदिवस.. खरंच.. आता लवकर घरी जायला हवं.. वाट पहात असेल ती आपली..

रेडिओ वर गाणं चालुच होतं..

या जन्मावर या जगण्यावर 

शतदा प्रेम करावे 

गाणं गुणगुणतच.. झकास मुड मध्ये जयु घराकडे निघाला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “प्रेमाची शिक्षा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “प्रेमाची शिक्षा” ☆ श्री मंगेश मधुकर

विकीनं तोंडावर दार बंद केल्यावर मायाच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा पुन्हा विनंती केली पण दार उघडलं नाही. गर्दी व्हायला लागल्यावर माया परत फिरली.

“विकी, हा काय प्रकार?,” राजा.

“मरु दे तिला, पार डोक्याची मंडई झालीय. जा दारू घेऊन ये. अजून प्यायचीय”

“आधी मला सांग. कोण होती ती?”

“गप बोललो ना. तो विषय नको. ”

“चांगल्या घरातली दिसत होती. एकदम श्रीमंत कॅटेगरी”

“पंधरा पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे”

“आणि तू तिला शिव्या घातल्या, हाकलून दिलं आणि तिनंही गप ऐकलं. नक्की भानगड काय?”

“ऐकून घेतलं म्हणजे उपकार नाही केले. तशी मातीच खाल्लीयं ना” बोलताना विकीच्या डोळ्यात विखार होता.

“म्हणजे” 

“हिच्यामुळेच बरबाद झालो ना”

“तुमचं लफडं होतं”

“नाही रे”

“मग”

“आमच्या गावातल्या सर्वात श्रीमंत माणसाची लेक, सगळा गाव त्यांच्याच तालावर नाचणारा. कुठंच बरोबरी नाही म्हणून आम्ही दहा हात लांब राहायचो. सावलीला सुद्धा फिरकायचो नाही.”

“मग ही बया कुठं भेटली”

“कॉलेजमध्ये भेटली अन माझी साडेसाती सुरू झाली. तेव्हा आतापेक्षा जास्त सुंदर दिसायची. कॉलेजची पोरं पार फिदा पण कोणी हिंमत करत नव्हते आणि प्रेम-बीम यासाठी लागणारा पैसा, वेळ आणि इच्छा या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. खूप शिकायचं अन मोठा अधिकारी व्हायचं एवढं एकाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होतो. पहिला नंबर कधीच सोडला नाही ना शाळेत ना कॉलेजमध्ये. दिसायला बरा त्यात व्यायामची आवड त्यामुळे तब्येत कमावली. अभ्यास सोडून दुसरं व्यसन नव्हतं. ” 

“आता तुझ्याकडं बघून, सांगतोयेस ते खरं वाटत नाही”

“माझी पर्सनॅलिटी आणि हुशारी बघून ही प्रेमात पडली. सगळा एकतर्फी मामला.”

“भारीच की.. एवढी चिxx पोरगी फिदा म्हणजे..”

“डोंबलाची चिxx! !तिच्यामुळेच वाट लागली. इतकी पागल झाली की थेट प्रपोज केलं पण मी नकार दिला. माझ्यासाठी करियर जास्त महत्वाचं आहे असं सांगितलं पण तिच्या डोक्यात शिरलं नाही.”

“एकदम पिक्चर सारखं वाटतयं”

“खरंय!! आयुष्याचा पार पिक्चरच झाला. स्पष्ट नकार दिल्यावर सगळं थांबेल असं वाटलं पण झालं भलतंच. आपल्यासारख्या सुंदर, श्रीमंत मुलीला एक पोरगा चक्क नकार देतोय यानं तिचा ईगो हर्ट झाला. ”

“मग रे!!”

“हट्टाला पेटली. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. दबाव टाकत होती. नापास करण्याची धमकी दिली. हरप्रकारे प्रयत्न केले पण मी नकारावर ठाम होतो. कॉलेजची परीक्षा संपण्याची वाट बघत होतो कारण त्यानंतर आमचे मार्ग वेगळे होणार होते मात्र शेवटचा पेपर संपल्यावर कँटिनमध्ये तिनं जबरदस्तीनं थांबवत पुन्हा विचारलं. मी काहीच बोललो नाही तेव्हा विणवण्या करायला लागली तेव्हा अजून प्रकरण वाढू नये म्हणून तिथून जाऊ लागलो तेव्हा राग अनावर होऊन तिनं खाडकन माझ्या कानफटात मारली. आवाज ऐकून आजूबाजूच्या सर्व नजरा वळल्यावर भावनेच्या भरात केलेली चूक तिच्या लक्षात आल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी एकदम वेगळा पवित्रा घेतला. जोरजोरात रडायला लागली आणि सगळ्यांना सांगितलं की मीच तिला त्रास देतोय. सारखं सारखं प्रपोज करतोय. तिचा अनपेक्षित “यू टर्न” माझ्यासाठी धक्कादायक होता. ”

“बाsबो, मग पुढं??”राजा 

“एका क्षणात व्हिलन झालो. कॉलेजच्या पोरांनी संधी साधली. कसाबसा जीव वाचला. संध्याकाळी तिचे वडील, भाऊ आणि नातेवाईक घरी. पुढचे पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि दोन महीने हात गळ्यात. ”

“तू खरं का सांगितलं नाहीस”

“हजारदा सांगितलं पण कोणीच विश्वास ठेवला नाही उलट परत असं काही बोललास तर घरादारा सकट जाळून टाकू अशी धमकी मिळाली. झकत गप्प बसलो. आईवडिलांनी तिच्या बापाचे पाय धरले. गयावया केल्या म्हणून जिवंत राहिलो पण गाव कायमचा सोडावा लागला.”

“डेंजर आहे रे बाई!!एवढं सगळं झालं तरी ती खरं बोल्ली की नाही. माफी बिफी…”

“अं हं!!कुठल्या तोंडानं बोलेल. करून सावरून नामानिराळी झाली. मी मात्र बदनाम झालो. स्वप्नाचा चक्काचूर झाला. दिशाहीन जगण्यामुळे हताश, निराश झालो. सैरभैर भटकताना बाटलीच्या नादी लागलो. ”

“पण तुझी काहीच चूक नव्हती. पोलिसांकडे का गेला नाहीस. ”

“झाला तेवढा तमाशा बास होता. प्रकरण वाढवून काहीच उपयोग होणार नव्हता. जिवावर आलेलं गाव सोडण्यावर निभावलं असं समजून नशीब नेईल तिकडं जात राहिलो. ”

“इतकं सारं सोसलसं. कधी बोलला नाहीस. ”

“बरबादीची कहाणी सांगून काय फायदा? आधी फक्त अभ्यासाचं व्यसन आणि आता!!” विकी भेसूर हसला. त्या हसण्यातली वेदना राजापर्यंत पोचली. विकीच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला“जे झालं ते झालं. सोडून दे. आयुष्यात ती पुढं गेली. लग्न करून मोकळी झाली अन तू अजूनही तिथंच आहेस. स्वतःला संपवतोयेस. ”

“मग काय करू. कशासाठी जगायचं. पोराच्या आयुष्याचे धिंडवडे पाहून आई-वडीलांनी हाय खाल्ली अन झुरून झुरून गेले. आता तर पार एकटा उरलोय. वाट बघतोय. “विकीच्या आयुष्याची परवड ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी आलं.

—-

*बेदम पिण्यानं विकीची तब्येत बिघडली. सरकारी दवाखान्यात भरती केलं. अवस्था पाहून डॉक्टरांनी ‘फक्त वाट बघा’ असं स्पष्ट सांगितलं.

*पश्चाताप आणि अपराधीपणाच्या भावनेनं मायाला नैराश्य आलं कायम शून्यात नजर, खाण्या-पिण्याकडं दुर्लक्ष, त्यामुळं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. परिस्थिती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. तेव्हा बायकोवर जीवापाड प्रेम करणारा कैलास मनानं खचला.

मायानं एकतर्फी, हट्टी प्रेम केलं. त्याचे परिणाम ती, विकी आणि कैलास तिघांनाही भोगावे लागले आणि काहीही चूक नसताना त्या प्रेमाची शिक्षा विकी, कैलासला मिळाली. एकाचं आयुष्य तर दुसऱ्याचा सुखी संसार भरडला गेला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

सुश्री साधना काळबांडे

अल्प परिचय
शिक्षिका
छंद… वाचन, लेखन
पुस्तके प्रकाशित... पाऊलखुणा (काव्यसंग्रह), कातोळा (काव्यसंग्रह), कोचम (कथासंग्रह)

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ “बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

(वऱ्हाडी भाषेतली कथा) 

जनार्दन बाप्पु शाळेत गुरुजी होते. गुरुजी म्हतले की लय धावपय करा लागे. शाळेत लेकराईले खीचळी शिजोया पासून त त्याईले लशीं द्या लोकू. शाळेत गेल्या गेल्या सरकारचा काय कागद इन काई सांगता येना. हे माईती द्या अन् ते माईती द्या. आज राती गुरुजीले काई झोप लागेना. या कळावून त्या कळावर होत. तशी जनी त्याईची बायको जनाबाई संतापली.

“आज जागरन करा लागते वाटते. झपा मुकाट्यानं”.

तशी सकावून झाली. हाती धोतराचा सोगा घेतला अन् निगाले. तसा त्याईच्या बायकोन आवाज देला…

“माय बाई सकावून सकावून कुठी चालले. च्या पानी घ्या लागत नाई काय आज?. तसेत च्या घेतल्या शिवाय कुठी जात ना… आज लय घाई झाली तुमाले. “

गुरुजीन ते आयकल. अन् जरासेक थांबले.

“बिचारे सकावून सकावून टोकू नको मले.. खिचळी शिजोयाले इधन आन्याले चाललो. लय घोर आय माल्या मांग.

गुरूजी बंडीत इधन घिऊन शाळेत गेले. चुल पेटून तांदुई टाके लोकु चुली जोळ बसले. भातान गदगद केल अन् गुरूजी आ पिसात गेले. पायतात त काय सरकारचा एक नवा कागद टेबलावर दिसला. त्याइन तो वाचला अन् डोकंक्ष्याले हात लावला.

“घेंव्व पंधरा दिवसात सरकारले कुटुंब नियोजनाची केस द्या लागते. आता एवळ्या लवकर कुठि भेटीन मले… सारी चिंता जीवाले “

गावात याले त्याले इचारल. जो तो म्हने… “गुरुजी मांगल्या वर्षीच केल राज्या”… अन् कोनी म्हने गुरुजी मले आठ दा दिवसात लेकरु होते पन म्या दुसऱ्याले हो म्हनेल आय… हजार रुपये पयलेच घेतले म्या. दुसरी बाई म्हने हजार रुपयाच्या खाली एक खळकु घेत नाई.

गुरूजी ईचारातच घरी गेले.

तसा त्याईच्या डोक्ष्यात लाईट लागला. त्याईन बायकोले अवाज देला.

“ओ ओम्याची माय इकळे ये व”.

तशी जनाबाई आली.

“तुह्या बयनीले किती लेकर आयत “.

“कोन कमलीले… तीले काय सात पोरी… अन् आठव आता पोटात आय… दा पंधरा दिवसात होईल आता बायतीन ते… आता बाया म्हनत आठवां किस्ना होते तिले पन तुमी काऊन इचारून रायले “.

“मले तिची लय आठोन आली “.

“माय बाई… माल्या बयनीची तूमाले आठोन येते लागे… काई काम अशीन तीच्या संग… “

गुरूजीन जनाबाई जोळ मनातली गोष्ट सांगतली….

“बिचारे सरकारच एक पत्र आलं… पंधरा दिवसात मले एक तरी अपरेशनची सरकारले केस द्या लागते. गावात ईचारल…. कोनी हो म्हनुन नाई रायल.. कमलीले इचार बर अप्रेशन करते काय आठव लेकरु झाल्यावर “.

तसी जनाबाईन बयनीले भेट्याले गेलीं.

“कमले बायतपन जोळ आल तुव…. मी कऱ्याले तयार आव… पन तुले अपरेशन करा लागीन अन् तुया बाप्पूले केस द्या लागीन… सारा खर्च करतात ते. तुले निवून दिऊन आनुन द्या लोकु. “

कमलीन ईचार करुन सांगतो म्हने अन् दोन दिवसात तीन हो म्हतल. गुरूजीले हरिक झाला. त्याईन कमलीच्या हरेक गोष्टीले हो म्हतल. कमली म्हने बाप्पु मले अँटो सईन होत नाई. जीप घिउन या. तसे गुरुजी जीप घीऊन साईले आन्याले गेले. सायीच्या सात पोरी संगच होत्या. त्यातल्या एका पोट्टीन मोठा कल्ला केला… तशी सायी बोलली.

“बाप्पु जीप उभी करा.. हे लायनी पोट्टी वकतो म्हंते. आता तीच पोट रिकाम होईन. हटेलीतून तीले काई खायाले घेजा. एखाद्या किलो चिवळा अन् जिल्ब्बी घिउन या. “

गुरुजीन जीप थांबोली. पोट्टी वकेलोकु हटेलीत गेले अन् खायाले आनल. तेवळ्यात एका पोट्टीन पाय घासन सूरू केल.

“आता ईले काय पायजे बापा कमले”

“बाप्पु तिले पेळे आवळतात.. जिल्ब्बी खात नाई ते. पावंक किलो पेळे आना अन् या शीलीले पापळी आवळते अन् या चौथ्या नंबरच्या पोट्टीले बुंदीचे लाळू आ वळतात. लय दिवस झाले तीन खाल्ले नाईत. “

गुरुजीन डोकश्याले हात मारला. मनात आल… आता पुळे काय काय मांगतात देव जाने. थांबत थांबत जीप घरालोकू पोहोचली. गुरूजी घरात गेले. तशी जनाबाई मांगच आली.

“लय उशीर लावला. पोट्ट्याइन तरास देला वाटते रस्त्यात.. तुमी त लयच सोकले. “

तशी कमली साऱ्या पोट्ट्या घिऊन दनदन घरात आली.

“बाई माल्या साऱ्या पोरीले खायाले दे. सारी भुक लागली. वकु वकू थकल्या माल्या पोरी. बाप्पु बिस्कीट मिस्किटचे पुळे आना डझनभर “.

गुरूजी दुकानात गेले अन् पोरीले खायाले आनल. आता सायीच पोट कदी दुखते याची रोज वाट पायत. पन सायीन त्याईले सांगातल..

“हे पा बाप्पु जर मले आठवी पोरगी झाली त मी अपरेशन करनार नाई. सांगून ठेवतो तुमाले. माल्या नवऱ्याचा निरोप म्या तुमाले सांगतला नाई अजून. ते म्हनत.. जर आपल्याले आता पोरगी झाली त दोन तीन पोरी तुह्या बाप्पुले वागोयाले लावजो. एवळ्या जनाचां खर्च आपल्याकुन होनार नाई. “

हे आयकुन गुरुजींच्या डोयाले डोया लागेना. अन् शाळेत मन लागेना. ते एकच देवाजोळ म्हनत… “देवा सायीले पोरग हु दे “.

दिवस उगयला. गुरूजी सायीले घिऊन दवाखान्यात गेले. तीले पोरग झालं. तिच्या पेक्षात गुरूजीले हरिक झाला. तीच कुटुंब नियोजनाच अपरेशन झालं अन् गुरूजीले केस भेटली. सरकार दरबारी केस सादर केली. त्याईच्या जीवात जीव आला. दवाखान्यातून सायीले घिऊन घरी गेले. पायतात त काय… घरासमोर दोन तीन मोठे अँटो उभे. घर पावन्याईन सट्ट भरेल. सायीच पोरग पाह्याले तिचा नवरा, सासु, जेठानी, जेठ आलत  चुलत सारे दा वीस जन हजर अन् जनाबाई त्याईचा सयपाक करुन राह्यली होती. गुरूजीन डोकशाले हात मारला. तेवळ्यात जनाबाई त्याईच्या जोळ आली.

“तुमाले तिकळे कोनाची अपरेशनची केस भेटली नाई… माल्या भवती पा आता कसा घोर झाला. माल्या अजुन तीन चार ब यनी याच्या राह्यल्या कमलीच पोरग पाह्याले. रोज चुमळीभर दयन लागते आता. “

गुरूजी जनाबाईले म्हनत.. “आता उखयात मुंडक घातल त रट्टे सईन करा लागतीन पावू काय होते पूळे “

सारे पावने दोन दिवसांत गेले पन कमलीचा नवरा काई गेला नाई. सट्ट खाये अन् मस्त पसरे. रोज कमलीचा पोरगा पायाले पावने येतं. दोन मयने झाले तरी कमली घरी जायाच नाव घेना. एकदिवस ते जनाबाई जोळ आली.

“मी काय म्हनतो तु माली मोठी बयीन आयस. तुये जवाई म्हंनतात की सातव्या पोरीवर आपल्याले पोरग झालं. तुह्या बाप्पुले पोराचं बारस कऱ्याले लाव. त्या शिवाय काई आमी अठून जात नाई. “.

गुरूजी शाळेतून आले अन् जनाबाइन त्याईले बयनीचा निरोप सांगतला. तसे गुरुजी मटकन खाली बसले.

“अव मले दुसऱ्या बाईची अपरेशची केस हजार रुपयात भेटत होती. म्या घेतली नाई. मले वाटल तुही बयीन फुकटात पळीन. माला मांगल्या मयन्याचा सारा पगार खलास झाला. उसने पासने घेतले. आता बारश्याले कुठून पैसा आनु. “

कमली घरी जायाच नाव घेना. म्हनुन गुरुजीन बारस कऱ्याच ठरोल. तसा जनाबाई दुसरा निरोप घिऊन आली.

“अव कमली काय म्हनते.. तिच्या पोराले सोन्याचा बायतीळा पायजे. गयात सोन्याचा ओम, हातात सोन्याचे मनी, आंगठी, कानात सोन्याचे डुल पायजात. अन् दोन तीन डीरेस पोराले अन् सातई पोरिले फराक पायजात. “

आता त गुरुजीले गस आली. सोनत लय महाग झाल. एवळा पैसा कुठून आनाव. साठ सत्तर हजाराचा गच्चू अन् खिशाले चाट बसते आता. तेवळ्यात जनाबाई आली.

“अजुन एक कमलीचा निरोप आय. ते म्हंते मले सादी साळी पायजे नाई. म्या बाप्पुच मोठ काम केलं. मले पैठनी पायजे अन् माल्या बॉले कपळे पायजात. बा रश्यात माल्या बॉच्या साऱ्या बयनी, जवाई, सगेसोयरे बलावा. नाईत राग भरतीन ते. माल्या सासूच्या इकळले सारे मायेरचे बलावा. ज्यादा नाई शंभरक होती न. पंगतीत साजर सूजर कऱ्याले लाव. शेव, बुंदीचे लाळु, वरन, भात, पातोळीची भाजी, तोंडी लाव्याले लुंजी ठेवा पंगतीत “.

सारं आयकुन गुरुजीले वाटे. हे धरनी फाटाव अन् त्यात आपून गायप व्हावं. पन इलाज न्होता. तशी सायी घरी तिच्या जात नाई म्हने. कमलींन साऱ्या पोरी गुरूजीच्या मागं कपळे घ्याले लावून देल्या. गुरुजीन साऱ्याइले कपळे लत्ते घेतले. सोन नान आ नल. लिस्ट तयार केली त दोनशे जन बारश्यासाठी झाले. दारात मंडप टाकला. वाजंत्र सांगतल. पंगत ठेवली. दोनशे म्हनता म्हन ता येटायातले सारे, ज्याईले बलावल नाई तेई आले. काई म्हनत गुरूजीले आठोन नशीन रायली बलाव्याची चाला जेव्याले नाईत राग इन.. सारं गावं जेव्याले उलटल. सारं सरत सरत आल. डबल सयपाक करा लागला. गुरुजी हन्याशी आले. पंगता उठता उठता संध्याकाय झाली. शेवटी गुरुजी अन् जनाबाई जेव्याले बसले. ताटात फक्त पोई अन् भाजीच उरली. दुसऱ्या दिवशी गुरुजीले वाटल सायी जाईन. त्याईन जनाबाईले बलावल.

“काव आता ई तूही बयीन जात नाई काय?”

“जातो म्हनते पन तीले पाच दा हजार संग पायजात अन् गवाच एखांद पोत, तुरीची, उळदाची, मुगाची दाय अन् स्पेशल जीप करून पायजे. “

आतात गुरुजींच्या डोयाले धारा लाग्याच्या रायल्या.

गुरुजीन सायीले जीप करुन देली. तिच्या सात पोरी, आठवा पोरगा नवरा तिचं सामान, दायदाना सारं देलं अन् मोठा स्वास बाईर टाकला. जीप दुर जाये लोकु गुरुजी पायत रायले. जनाबाई अन् गुरुजी घरात आले.

“ठेव बर जरासाक च्या. मंग मी हिसोब करतो”.

तसा जनाबाईन च्या ठेवला. दोघाईन च्या घेतला. गुरुजीन हिसोबाची वयी हातात घेतली अन् थंडेच पळले. कुटुंब नियोजनाच अपरेशन लाखाच्या घरात पळल होत. गुरुजीले घेरीच आली. याच्या पेक्षा दुसऱ्या बाईले अपरेशनसाठी हजार रुपये द्याले पुरत होते. सायीच अपरेशन फुकटात पळीन असं वाटल. झाल उलटच. तेवळ्यात शेजारच पोट्ट पयत आल.

“गुरूजी तुमचे पावने गेले ना ते जीप आमच्या वावरा जोळ बंद पळली. त्यातल्या पोरी लय लळुन रायल्या. तुमाले अँटो घीउन बलावल. “

गुरुजींच्या कानाचे जसे परदे फाटले. ते जागीच थंडे पळले. आंगात हिव धसल. खलखल हा लले अन. आंगावर वाकय घिऊन झपून रायले.

© सुश्री साधना काळबांडे

अकोट जि. अकोला पिन. 444101 मो. 9767993827

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

(स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.)

इथून पुढे – – 

मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हे पण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला “टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी / आवराआवर / मुलांचे डबे भरणे / मुलांची शाळेची तयारी / किराणा आणणे / भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळे जण, हे कुठे आहे / ते कुठे आहे / हे दे / ते दे, असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये.

मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिस ला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का ? 

मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयल मधे पण नाहीत 

मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमानी गजरा घेऊन जातात / बायको ऑफिस मधून आल्यावर तिच्या ऑफिस च्या कामाबद्दल चौकशी करतात / तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो / कुकर लावतो / वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोफ्यापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमानी खाली बसवतात ? आणि हातात चहाचा कप देतात ! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक – पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंड मुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले किती जण असं कौतूक करतात !.

मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात / चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.

मनवा : सुनेची विचारपूस करणे, हा बहुतेक घरात सासऱ्यांच्या प्रांतच नसतो. सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा ते त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात.

या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.

मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचे पण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे. आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे असेच जाणकार सांगतात.

मनवा : काका, आपने सही फर्मया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी हि करायलाच पाहिजे. आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.

मेघना : सकाळचा चहा / खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, कि घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.

मनवा : थोडक्यात काय ? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.

मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष हि नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्री च्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्री च्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत ? आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवर्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल.

मनवा : काका मावशीचं का बरं

मी : मावशी या नात्यात एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे – माय मरो पण मावशी जगो. म्हणून मावशी असं नामकरण करायचं.

मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही नक्कीच आमच्या ग्रुप वर टाकतो आणि घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.

बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.

मी : पुरुष आणि स्त्रिया यांना सर्वच बाबतीत अगदी तंतोतंत समान हक्क आणि आनंदाच्या समान उपलब्धी हव्या असतील, तर मात्र आपल्याला ब्रह्मदेवाकडे पण थोडे साकडे घालावे लागणार आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्री ही निर्मिती आखतांना, देवाचे पण थोडे चुकलेच आहे, असे मला वाटते. त्याने पुरुषाला थोडे झुकतेच माप दिले आहे. मासिक धर्म, बाळंतपण, मोनोपॉझ या गोष्टी त्यानी फक्त स्त्रियांच्या पदरी टाकल्यामुळे, या काळातली शारीरिक दुखणी आणि त्रास फक्त स्त्रियांना भोगावा लागतो. पुरुष नामोनिराळे असतात. संध्याचे कलियुग संपल्यानंतर पुढच्या अपग्रेडेड सृष्टीची निर्मिती करतांना, स्त्रियांचा हा शारीरिक त्रास दूर करावा किंवा समसमान करावा अशी आपण ब्रम्हदेवाकडे प्रार्थना करूया.

मनवा : काका, नक्कीच. देवांनी जर हे मान्य केलं तर सगळ्याच स्त्रिया खुश होतील आणि तुम्हाला दुवा देतील.

मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.

तेवढ्यात चहावाल्या दादांनी चहाचा दुसरा ग्लास आमच्या हातात दिला. चहा पिणारा बाजूचा ग्रुप दादांना उद्देशून : दादा इनका ये बिल हमारे बिल मे ऍड करना.

आम्ही सगळ्यांना बाय केले आणि आपापल्या मार्गाला लागलो.

– समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.

मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.

मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.

त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला? 

‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.

मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.

प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.

प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.

एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.

एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.

प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.

सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.

तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.

सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.

दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.

प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.

ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.

मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.

सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.

मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

मी नेहेमीच बायकोला खुश करण्याची संधी शोधत असतो. आणि मी तर म्हणीन कि सगळ्यांनीच अशा संधींच्या शोधात राहायला पाहिजे. बायको खुश असेल तर काय काय मज्जा येते – ये तो सभी जानते है. आज अनायसे अशी संधी चालत आली होती. सकाळी चहा घेतांना बायकोला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विचार केला, बायकोला घेऊन जरा बाहेर फिरून यावं. तेवढ्यात बायकोला मैत्रिणीचा फोन आला. बायकोनी मला खूण करून सांगितले – तुम्ही जाऊन या, मला वेळ लागेल. आज बऱ्याच गॅप नंतर सकाळी नेहेमीच्या रस्त्यानी फिरायला बाहेर पडलो होतो.

एकटाच असल्यामुळे इधर उधर बघत बघत फिरणे सुरु झाले. मनात सहज विचार आला – अरे, आज जागतिक महिला दिवस आहे, आणि आज नेहेमीच्या ठिकाणी मेघना आणि मनवा या मैत्रिणी भेटल्या तर काय मज्जा येईल, त्यांना शुभेच्छा देता येतील आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघता येईल. फिरण्याच्या रस्त्यावर डावीकडे एक मारुती मंदिर आहे. तिथे नेहेमी मी थांबतो, नमस्कार करतो, आणि पुढे जातो. तिथे बाहेर एक फळा आहे, त्यावर मराठी / इंग्रजी / हिंदी मधे सुविचार लिहिलेले असतात. आजचा सुविचार होता – Strong will will always result in reality. माझी आताची इच्छा आहे मेघना आणि मनवा भेटाव्या. मी नमस्कार केला, will थोडी अजून strong केली आणि पुढे निघालो.

मृत्युंजय मंदिराच्या जवळच्या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि ओळखीचा म्हणजे मेघना आणि मनवा यांचा आवाज आला – काका, आहात कुठे ? कित्येक महिन्यात भेट नाही. आमचं काही चुकलं कां ? वगैरे, अशी प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर सुरु झाली.

मी – सांगतो, सांगतो, असे म्हणेपर्यंत –

चहावाले दादा : काका, हमसे या हमारी चाय से कुछ नाराजी हो तो बतावो. आज शक्कर थोडी जाडा डालू क्या, या अद्रक जादा डालू.

मी : सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, पण आधी माझं ऐका 

मी : आज एक खास दिवस आहे – जागतिक महिला दिवस. मेघना आणि मनवा तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणींना पण शुभेच्छा द्या.

मेघना आणि मनवा : काका, धन्यवाद. आज पहिल्या शुभेच्छा तुमच्याकडूनच मिळाल्या, मजा आली.

चहावाल्या काकांना मी बाहेर बोलावलं. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या.

आणि गम्मत म्हणजे आजूबाजूला उभे असणाऱ्या चहा पिणाऱ्या सगळ्यांनीच मेघना आणि मनवा यांना शुभेच्छा दिल्या.

मेघना आणि मनवा एकदम खुश झाल्या. त्यांनी सगळ्यांना थँक्स दिल्या.

तेवढ्यात आमच्या हातात गरमागरम चहाचे ग्लास आले.

चहावाले दादा : आजकी चाय मेरी तरफसे. बहोत दिनोके बाद आप तीनोको साथ देखकर मजा आ गया. आम्ही दादांना थँक्स दिले आणि चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरु झाल्या.

मनवा : काका, आजच्या दिवसामागची हिस्ट्री काय आहे, ते माहित आहे का ?

मी : नक्कीच. बाहेरची कामे करतांना पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत म्हणून पूर्वी जगभर आंदोलने झाली / निदर्शने झाली आणि स्त्रियांना त्यात यश मिळाले. आणि हा आनंद साजरा करण्याकरता ८ मार्च १९१७ या दिवशी “जागतिक महिला दिन” चा जन्म झाला. जगातल्या बहुतेक सगळ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. काही देशात या दिवशी सुटी पण असते.

मेघना : पूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे स्त्रियांचा खरंच खूप फायदा झाला आहे. आता बहुतेक देशात स्त्रियांना समान हक्क मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज कार्यरत आहेत. काही ठिकाणी त्या उच्च पदांवर काम करत आहेत आणि काही ठिकाणी तर त्या सर्वोच्य पदांवर पण कार्यरत आहेत.

मनवा : मैदानी खेळांमध्ये पण स्त्रिया पुढे आहेत. राजकारणात पण पुढे आहेत. या क्षेत्रात तर पंतप्रधान / राष्ट्रपती या पदांपर्यंत पण आपल्या आणि जगभरातल्या महिला पोहोचल्या आहेत. ही नक्कीच सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटावा अशीच बाब आहे. आता तर मंगळावर उतरणारी पहिली व्यक्ती हा बहुमान स्त्रीला मिळणार आहे, असे सांगतात.

मेघना : कला क्षेत्रामधे, जसे चित्रकला, गाणी, नृत्य, साहित्य, सिनेमा वगैरे मधे पण स्त्रिया आघाडीवर आहेत.

मी : खरंच अभिमान वाटावा असंच आहे. पण सिनेमा / टीव्ही या क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्याकरता त्यांनी निवडलेली अंगप्रदर्शनाची वाट मात्र मनाला खटकते. पैशांकरता आणि / किंवा ग्लॅमर करता अगदी खालच्या थरापर्यंत अंगप्रदर्शन पोहोचले आहे. सिनेमा आणि टीव्ही वरचे ग्लॅमर बघून घराघरातल्या स्त्रिया याचे अनुकरण करत आहेत आणि अगदी लहान लहान मुलींना या ग्लॅमर मध्ये ओढत आहेत. आता लहान मुलींना बाहेर पडतांना फॅशनेबल तोकडे कपडेच पाहिजे असतात. आया लिपस्टिक, आयब्रो, आयलायनर, परफ्युम असे सगळे त्यांना लावून त्यांचे कौतुक करत असतात, थोड्या थोड्या वेळानी या सगळ्यांवर पुन्हा पुन्हा हात फिरवत असतात, आणि त्यांचे निरनिराळ्या अँगल मधून सारखे फोटो काढत असतात. यामुळे कळत नकळत लहान वयातच मुलींमध्ये मॉडर्न फॅशन चे विषारी बीज पेरल्या जात आहे. परदेशी संस्कृतीचे असे अनुकरण आपल्या संस्कृतीला कुठपर्यंत घेऊन जाईल, हे काळचं ठरवेल.

मनवा : तुमचे म्हणणे एकदम मान्य. पैशापुढे माणूस बुद्धी गहाण ठेवतो, हे जागतिक सत्य आहे, पण ग्लॅमर पुढे स्त्रिया पण बुद्धी गहाण ठेवतात हे न रुचणारे सत्य आहे. स्त्रिया या बाबतीत बदलतील अशी शेजारीच असलेल्या देवळा मधल्या देवतेला आपण प्रार्थना करूया..

मी : नक्कीच 

मेघना : जागतिक महिला दिन सुरु करण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो आता पूर्ण होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी या दिवसाचं महत्व फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करणे इतपतच राहिलं आहे, आणि जागतिक दिवस आहे, या नावाखाली, काही सत्कार समारंभ, कुठे रॅली, असे ओघानी येतेच.

मी : बाहेरच्या जगामधे समान हक्क मिळालेल्या स्त्रियांना आपल्या घरांमध्ये पण समान हक्क आहेत कां ?

मनवा : सगळ्या स्त्रियांनी जर मनापासून याचं उत्तर दिलं, तर ‘नाही’ असेच त्यांचं उत्तर येईल. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नुसत्या “हॅपी महिला दिन ” अशा शुभेच्छा देऊन त्या घरामधे आनंदित होतील का ? स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares