मराठी साहित्य – जीवनरंग ☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

मुंबईच्या टर्मिनल २ च्या डिपार्चर जवळ एक गाडी येऊन थांबली. लगबगीने व्हील चेअर आणली गेली. गाडीतून रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकरांना उचलून व्हील चेअर मध्ये बसवण्यात आलं. विमान कंपनीने त्यांना दिलेला त्यांचा अटेंडंट त्यांची व्हील चेअर डीपार्चर गेटच्या दिशेने ढकलू लागला आणि अशोक केतकरांच्या डोळ्या समोरुन त्यांचा भुतकाळ सरकू लागला!

ते सर्व्हिस मध्ये असताना एका विमान अपघातात त्यांचा जीव तर वाचला होता. पण त्यांनी दोन्ही पाय गमावले होते. दोन युद्धात भारत मातेची सेवा केलेला तो भारत मातेचा सुपुत्र आता कायमचा व्हील चेअर वर बसला होता. एकेकाळी आभाळाला गवसणी घालणारा तो शूर वीर आता जमिनीवर देखील उभा राहू शकत नव्हता! दर वर्षी एकदा ते दिल्लीला मात्र जात असत. प्रजासत्ताक दिनी ते आणि त्यांचे काही जुने कलिग्स इंडिया गेट जवळ जमत असत. मग दोन दिवस दिल्लीत त्या फ्रेंड्स बरोबर मुक्काम करून ते परत येत. आजही ते त्यासाठीच निघाले होते. गेल्या अनेक वर्षांचा ते शिरस्ता होता.

पण गेली चार पाच वर्ष मात्र त्यांना दिल्लीला जाण जीवावर येत असे. कारण त्यांच्या सगळ्या कलीग ची मुलं एकतर सैन्यात, एअर फोर्स मध्ये होती किंवा चांगल शिकून चांगल्या पोस्टवर नोकरीला होती. ह्यांची मुलगी भार्गवी मात्र सेकंड इयरला असतानाच एक मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून गेली होती. कारण काय तर त्याची आई दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि तिला तिचे डोळे मिटायच्या आत मुलाचं लग्न झालेलं पहायचं होतं. ह्यांनी आणि बायकोने बराच विरोध केला. एकुलत्या एका मुलीचं छान करिअर व्हावं हे त्याचं स्वप्न होतं. पण तिने ऐकलं नाही. मग ह्यांनीही संबंध तोडले. आज त्यालाही पाचेक वर्ष उलटली होती!

त्यांची व्हील चेअर चेक इन सोपस्कार पूर्ण करून बोर्डिंग गेट पर्यंत आणली. अटेंडंट त्यांच्या शेजारी उभा होता. बोर्डिंग ची घोषणा झाली. शिरस्त्या प्रमाणे ह्यांची व्हील चेअर सर्वात आधी आत नेण्यात आली. त्यांना पहिल्या रो मध्ये स्थानापन्न केल्यावर बाकी प्रवासी बोर्ड झाले. विमान टॅक्सी वे वरून रन वे वर येऊन थांबल. अशोक रावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांना त्यांच्या फ्लाइंग दिवसांची आठवण आली. त्यांनी नकळत डोळे पुसले. ते अजस्त्र धुड रन वे वर जवळ जवळ ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावू लागल. आणि एका क्षणी आकाशात झेपावलं. खिडकीतून खाली बघत असलेल्या अशोक रावांचे हात आपसून जॉय स्टिक धरल्या सारखे हालचाल करत होते! जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. त्या अपघातानंतर सर्व्हिस सोडल्यावर ते करत असलेल्या प्रत्येक विमान प्रवासात येत असे तसंच!

विमान आता आकाशात स्थिरावलं आणि सीट बेल्ट काढायचे संकेत मिळाले. अशोक रावांनी सीटबेल्ट काढला आणि एअर होस्टेस ला बोलवायला वरच बेल बटण दाबल. एअर होस्टेस आली. अशोक रावांनी पाणी मागितलं आणि ते बरोबर आणलेलं पुस्तक वाचू लागले. काही मिनिटात एक लहानसा मुलगा हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि त्याने त्यांना पाणी दिलं. त्याला पाहून अशोक रावांना आश्चर्य वाटलं आणि तितक्यात पायलट ने अनाउन्समेंट सुरू केली.

पायलट – प्रिय गेस्ट. फ्लाईट ६इ ६०२८ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक अत्यंत महत्वाचे आणि आदरणीय गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकर. ते पहिल्या रांगेत a सीटवर आहेत. विंग कमांडर अशोक केतकर ह्यांनी भारतासाठी दोन मोहिमांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखवून शत्रूचा पराभव करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. एका अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असले तरी त्याचा लढवय्या स्वभाव मात्र अजूनही जिवंत आहे. एअरफोर्सची शिस्त, सिनियर च्या आदेशांचे पालन ह्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातही पाळल्या. इतक्या की त्यांच्या मुलीने करिअर सोडून त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण मुलगी बापाला कशी विसरू शकत होती? ती दुसऱ्या शहरात असली तरी तिचं वडिलांवर लक्ष होतं. तिने लग्न केल्यावर एका महिन्यातच तिच्या नवऱ्याची, राहुलची आई गेली. ती नवऱ्या बरोबर दिल्लीत रहात होती. पण वडिलांची इच्छा तिच्या लक्षात होती. तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. उत्तम गुण मिळवून ग्रॅज्युएट झाली. पुढे चांगल्या कॉलेज मध्ये admission मिळवली… तिने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असलं तरी त्यांनी तिच्यासाठी ठरवलेलं करिअर मात्र तिने पूर्ण केलं.

अशोकराव हे ऐकून स्तिमित झाले. सगळ्या प्रवाश्यांना उत्सुकता लागली होती. पायलटचा आवाज आला.

पायलट – बाबा… तुम्हाला मला पायलट झालेली पहायचं होतं ना? ते तुमचं स्वप्न होतं ना? मग आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आज हे विमान तुमची लाडकी भार्गवी उडवते आहे. तीच भार्गवी जिच्यावर रागावला आहात… आणि हो तुम्हाला आता ज्या मुलाने पाणी दिलं ना तो माझा मुलगा आहे आदित्य… तुमचा नातू…

प्रचंड शॉक बसलेल्या अशोक रावांनी भरलेल्या डोळ्यांनी त्या गोड मुलाकडे पाहिलं. तो त्यांच्याकडे बघत निरागस हसत होता. त्यांनी आदित्यला उचलून घेतला आणि त्याचे मुके घेतले. एव्हाना भार्गवी बाहेर आली होती. हातात फोन माईक धरून डोळ्यातून धारा तश्याच वाहू देत अशोक रावांकडे बघत बोलू लागली..

भार्गवी – बाबा मला माफ करा… मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केल… पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. आणि बाबा राहुल खुप चांगला मुलगा आहे. एका mnc मध्ये तो मोठ्या पदावर आहे. आम्ही दिल्लीला असतो. आज तुम्ही ह्या फ्लाईट ने दिल्लीला जाणार हे मला आई कडून कळल्यावर मी ही फ्लाईट मागून घेतली आणि आदित्यला घेऊन आले. बाबा प्लीज मला माफ करा… मला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाबा… म्हणूनच आज मी, एक कमर्शियल पायलट तुम्हाला, एका फायटर पायलट ला salute करते आहे.

हे बोलून भार्गवी ने एक कडक salute केला. विमानातील सगळे प्रवासी आणि क्रू देखील salute करत उभे होते…. भार्गवी हळूच अशोक रावांच्या शेजारी बसली आणि त्यांना मिठी मारून हमसून हमसून रडू लागली. बाप आणि मुलीची अनेक वर्षांनी अशी भेट होत होती. अशोक रावांचा शर्ट तिच्या श्रूंनी भिजला होता…. तितक्यात आदित्य बोबड्या आवाजात म्हणाला – 

आदित्य – आजोबा मी ना तुमच्या सारखा फायटर पायलट होऊन देशाची सेवा करणार आहे. मला मम्मी रोज तुमच्या स्टोरी सांगून फायटर पायलट बनायला सांगते.

हे ऐकून अशोकरावांना प्रचंड आनंद झाला. तेवढ्यात आतून को पायलट ने विमानाच्या डीसेंड ची घोषणा करून सिट बेल्ट बांधायची सुचना केली. भार्गवी त्यांचा निरोप घेऊन कॉकपीट मध्ये गेली. विमान आता उतरू लागलं. आत भार्गवी विमान उतरवत होती. इथे शेजारी बसलेल्या आदित्यला अशोकराव विमान उतरवताना काय काय करतात ते अभिनय करून सांगत होते. खिडकीबाहेर अस्ताला जाणारा सूर्य एका माजी, एका आजी आणि भविष्यातील एका पायलटला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत होता. विमानाचा डिसेंड सुरू झाला असला तरी आता कुठे अशोकरावांच्या आयुष्याच्या विमानाने परत एकदा टेकऑफ करायला धावपट्टीवर वेग घेतला होता!

लेखक : श्री मंदार जोग 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. अर्धे अधिक लोकं गरीबच होते. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. तेव्हा लोकं आहे त्यात सुखासमाधानात, काटकसरीत राहणारी असायची. घरात दहा-बारा लोकं सहज असायचे. इतके जण असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे, ज्याला सगळेच ” गोदरेजचे कपाट ” म्हणत असत. त्यात घरातल्यांचे चांगले कपडे ठेवलेले असायचे.

घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे… ” लोखंडी कॉट” असायची.

तिचा अनेक प्रकारे उपयोग व्हायचा. त्या कॉटवर एकावर एक गाद्या ठेवलेल्या असायच्या त्या सुद्धा दोन किंवा फारतर.. तीन असायच्या. घरातला कर्ता पुरुष कॉटवर झोपणार हे ठरलेले असायचे. बायका तर कधीच कॉटवर झोपायच्या नाहीत. खाली सतरंजीवरच झोपायच्या.

शर्टाची घडी घालून गादीखाली ठेवली की झाली इस्त्री… कारण तेव्हा क्वचितच कोणाकडे इस्त्री असायची.

काॅटखाली लोकं लोखंडी ट्रंक, लाकडी पेट्या ठेवतं. त्यात कागदपत्रांची एक पेटी असायची. स्वेटर, मफलर, टोप्या अशा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ट्र॔केत ठेवत असत.

नेहमी न लागणारं सामान गाठोड्यात बांधून ती गाठोडी पण कॉटखाली ठेवलेली असायची.

आणि खालचा हा सगळा पसारा दिसू नये म्हणून खालची बाजू झाकायला जुन्या साडीचा एखादा पडदा केलेला असायचा.. तो लावलेला असायचा.

चादरी काही ठिकाणी गादीखाली ठेवलेल्या असायच्या. उशा कॉटवर एका बाजूला भिंतीला लागून रचून ठेवलेल्या असायच्या. जरा धक्का लागला की त्या पडायच्याच. … मग आई रागवायची…

प्रत्येक घरी असंच असायचं.. त्यामुळे कोणाला त्याची लाज वाटायची नाही. काही कार्यक्रम असला की घरातली ती काॅट घडी करून ठेवता येत असे. तेव्हा घर एकदम मोठे वाटायचे. ती बाहेर अंगणात ठेवली जायची.

पन्नास वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा पहिली खरेदी म्हणजे यांनी मोठी, भक्कम अशी लोखंडी कॉट घेतली. तेव्हा फार आनंद झाला होता. खूप मोठी खरेदी केली असं वाटत होत. कारण तेव्हा पगार अगदी कमीचं होता. काॅटला कडेला छान गोल असे बार होते. त्याला टेकवून तक्या ठेवला की पाय पसरून आरामात बसता येत असे. दर दोन वर्षांनी हे त्याला रंग देत असत. वापरातल्या वस्तूंची नीट काळजी घेऊन जपून, सांभाळून ठेवायच्या असा नियमच होता. आणि तो बहुतेक वेळा पाळला जायचा.

आमची बदली माढा, उदगीर, उस्मानाबाद, मुरुड, पुणे आणि सांताक्रुज मुंबई येथे होत गेली. या सगळ्या प्रवासात ती कॉट आमच्याबरोबरच होती. डबल बेड घेतले तरी ती कॉट काढायचा विचार कधीच मनात आला नाही. मुंबईला सांताक्रुझला बँकेचे क्वार्टर होते. तिथे वर गच्चीत काॅट ठेवली होती. आम्ही मैत्रिणी काॅटवर बसून गप्पा मारत असू…

हे रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथे पण गच्ची होती. मग ती काॅट गच्चीत ठेवली. नातवंडांनी त्या कॉटचा चांगला उपयोग केला. आता रंग द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. पण दोघं अगदी उत्साहाने दर दोन वर्षांनी कॉटला रंग देत असत. त्यामुळे इतकी वर्ष 

होऊन सुध्दा कॉट अगदी छान होती. आमची डबा पार्टी त्या कॉटवर होत असे. नातू सतरंज्या, गालीचा, ऊशा घेऊन वर जायचा. तक्या ठेवायचा. काॅटवर झोपायला त्याला फार मजा वाटायची.

या काॅटचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगचे री डेव्हलपमेंट होणार म्हणून ती जागा सोडावी लागणार होती.

तेव्हा आता या काॅटच काय करायचे? … हा विचार मनात आला.

तेव्हा अश्विनीला भाचेसुनेला विचारले. कारण त्यांचा बंगला आहे. ती म्हणाली, ” मामी ती कॉट मी नेते “

ती नेते म्हणाली याचा मला फार आनंद झाला. टेम्पो आणुन ती काॅट घेऊन गेली. आता काॅट तिच्या गच्चीत आहे. त्यावर बसून तिचा अभ्यास चालू असतो.

पन्नास वर्षाच्या संसारात साथ दिलेली काॅट योग्य स्थळी गेली असे मला वाटले.

सहवासात असलेल्या या गोष्टी निर्जीव नसतातच… त्यांच्यात आपला जीव गुंतलेला असतो.

आपण आयुष्यभर वापरलेल्या वस्तूंची मनात असंख्य आठवणींची साखळी असते…. ठेव असते.

या आठवणींचा मनात एक हळवा.. सुखद असा कोपरा असतो. तो असा मधूनच उघडायचा…

मग त्यांच्या आठवणीत आपले आपण दिवसभर रमुन जातो…. घरी बसून मिळणारा हा सहज सोपा आनंद उपभोगायचा….

तुमच्याकडे होती का अशी कॉट? आल्या का काही आठवणी? …

आता आपलं ठरलंच आहे … अशा गोष्टीत रमायचं…

… त्याचा मनाने पुन्हा एकदा अनुभव, आनंद, आस्वाद घ्यायचा… हो की नाही…

… मग कळवा तुमच्या आठवणी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर

नेहमीच्या वेळेत ऑफिसला निघालो. पिकअवर असल्यानं रस्त्यावर तोबा ट्राफिक. गाडी इंच इंच पुढे जात होती. ही रोजचीच परिस्थिती त्यामुळे आताशा राग, संताप, चिडचिड यापैकी काहीही होत नाही. डोकं शांत असतं. काही वेळानं पुढे सरकत चौकात पोचलो तर रेड सिग्नल लागला. सिग्नलच्या आकड्यांकडे पाहताना “वॉव, वॉव” असा सायरनचा आवाज यायला लागला लगेचच सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. शांत जलाशयावर दगड मारल्यावर जसे तरंग निर्माण होतात अगदी तसं सायरन ऐकून गाडीवाल्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.

“घ्या पुढे.. ”

“रस्ता मोकळा करा”

“लाल गाडी हो की पुढे.. ”

“ए बुलेट, फोनवर नंतर बोल आधी गाडी बाजूला घे” एकेक गाडीवाले बोलायला लागले सोबत हॉर्नचा किलकिलाट होताच. अंब्युलन्सला वाट देण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला. सिग्नलजवळ सर्वात पुढे असलेल्या पाच-दहा जणांना मागचे गाडीवाले पुढे जाण्यासाठी आग्रह करायला लागले.

“ओ, गाडी घ्या पुढे! ! ”एकजण माझ्याकडे बघत ओरडला.

“सिग्नल! ! ”

“घ्या पुढे काही होत नाही. मामांनी पकडलं तर अंब्युलन्सचं कारण सांगायचं. ते पण काही करत नाही. ”सिग्नल तोडण्यासाठी दबाव वाढत होता. आम्ही मात्र कफ्यूज काय करावं ते समजेना. शेवटी माणुसकी जिंकली. तीस सेकंद बाकी असताना आम्ही गाडी पुढे दामटली आणि काही वेळातच अंब्युलन्स मार्गस्थ झाली परंतु मी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलो. पन्नाशीचा पोलिस जाम खतरुड दिसत होता. माझ्याआधी पकडलेल्या लोकांशी उर्मटपणे बोलत होता. माझं लायसेन्स, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासल्यावर साहेब तुसडेपणाने म्हणाले “सभ्य दिसताय आणि सिग्नल मोडता. ” 

“सभ्य म्हणालात त्याबद्दल धन्यवाद! ! सिग्नल मुद्दाम मोडला नाही. महत्वाचं कारण होतं.”

“काहीही असो”

“अहो, अंब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला” 

“दंड भरावा लागेल”

“साहेब, मी नियम पाळणारा माणूस आहे”

“असं तुम्ही म्हणताय पण आत्ताच सिग्नल तोडला हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. ”

“सिग्नल मी एकट्यानेच तोडला नाही अजून चारपाच जण होते. ”

“पण सापडलेले तुम्ही एकटेच. बाकीच्यांना नोटिस जातीलच. ”

“चांगुलपणा दाखवला ही चूक झाली का? ”

“ते मला माहिती नाही”

“अहो, जरा समजून घ्या. सीरियस पेशंट असलेल्या अंब्युलन्ससाठी सिग्नल तोडला”

“तुम्हांला काय माहिती की ऍम्ब्युलन्समध्ये सीरियस पेशंट होता. ”

“अंदाज…. साधी गोष्ट आहे. थोडी माणुसकी दाखवली”

“त्यासाठी ट्राफिकचे नियम तोडायची गरज नव्हती. गाडी कडेला घ्यायची”

“एवढं मलाही कळतं पण जागा नव्हती म्हणून.. ”

“तुमच्यासारखे जंटलमन लोक असे वागतात आणि मग ट्राफिकच्या नावानं.. ”

“ओ, बास!! जास्त बोलू नका. इतका वेळ समजावतोय पण ऐकतच नाही. जनरली अशावेळी पोलिस मदत करतात पण तुम्ही..”

“नियम म्हणजे नियम”

“पण काही परिस्थिती अपवाद असतात ना. उगीच दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढताय. जाऊ द्या. ”

“मी कुठं थांबवलयं. तुम्हीच वाद घालताय. दंड भरा आणि जा”

आमची वादावादी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली. आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे मी माघार घेत दंड भरून पावती घेतली आणि गाडी घेऊन निघालो तेव्हा संतापाने डोकं भणभणत होतं. काहीही चूक नसताना खिशाला भुर्दंड पडला तोही एक चांगलं काम केलं म्हणून… डोक्यात विचारांचं वादळ, मी वागलो ते चूक की बरोबर????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ती तिथे नुकतीच राहायला आली होती. तीचं अजून घर आवरणं सुरू होतं. नंदा नावाची बाई कामाला मिळाली होती. बाई साधी भोळी प्रेमळ होती. त्यादिवशी नंदा काम करायला आली म्हणाली,

” वहिनी आज काही ज्यादा काम असेल तर ते करून घेऊ. आज मला एका कामावर सुट्टी आहे. “

” अगं बरं झालं पुस्तकांचं खोकं ऊघडायच आहे. पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ. “

नंदाने सगळी पुस्तकं काढली. बरेच दिवस पॅक असल्याने जरा धूळ जमा झाली होती. ओल्या कपड्याने पुसायला घेतली. ,

” वहिनी फॅन सुरू करा. वाळली की मग आत ठेवू. “

एक, एक पुस्तक नंदा पुसत होती.

” केवढी पुस्तकं हो. एव्हडी कधी वाचता? “

“अग अभ्यासाची, कथा, कादंबऱ्या प्रवासवर्णन, काही इंग्रजी पुस्तकं आहेत. परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत. “

ती म्हणाली…

तिच्या मनात आलं ह्या अडाणी बाईला आपण सांगतोय… पण तिला ते काय कळणार..

नंदा म्हणाली, ” बैजवार सगळी पुस्तकं नीट लावून ठेवते. तुम्ही तुमचं दुसरं काम असलं तर करा. “

” अगं नको तुलाच मदत करते”

आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली.

“तुला वाचायला लिहायला येतं का? ” 

” वहिनी आम्ही गावाकडे राहत होतो. माझा बाप फार गरीब होता. दुसऱ्याच्या शेतात काम करायचा. आई पण रोजंदारीन जायची.. आम्ही चार बहिणी एक भाऊ. जेमतेम हाता तोंडाची गाठ पडायची. कुठली शाळा.. अन् काय हो.. “

” म्हणजे तू काही शिकली नाहीस?

” नाही हो लहानपणापासून कामचं करायला लागले शेतातलं तणं काढायला जायचं, गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा, लोकांच अंगण झाडायला जायचं, दूध घालायला जायची… “

” अग म्हणजे घरात कोणी शिकलं नाही? “

” बापाने लहान भावाला.. तो मुलगा म्हणून शाळेत घातलं. आमची लग्न सोळा-सतरा वयातच लावून दिली. माझा नवरा इथे बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथे शहरात आले. “

तिला वाईट वाटलं.. काय या बाईचं आयुष्य… हीच कशाला अशा अनेक बायका अडाणीच राहिल्या.. आई-वडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं.. अर्थात यात या बिचाऱ्या बायकांचा तरी काय दोष म्हणा…..

” तुला काहीच लिहिता वाचता येत नाही? “

“अगदी थोडं येतं पण कुठंही गेलं तरी अंगठाच द्यावा लागतोय बघा… वाईट वाटतंय… पण बापाचा पण नाईलाजच होता. तो तरी काय करणार? एकापाठोपाठ चार पोरी घरी होतो… “

“हो.. तेही खर आहे म्हणा”

“शिक्षण नाही झालं पण नवऱ्याने इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा”

ती काय म्हणते आहे तिच्या लक्षातच येईना..

” अग कसलं कल्याण?

” अहो वहिनी बघा इथल्या लोकात मिसळले, कामं मिळाली, काम करतीयं.. चार पैसे हातात येतायत”

“अग पण किती कष्ट.. “

” अहो कुठेही काम केलं तर कष्ट करावेच लागणार ना? आम्हाला त्याची सवय असते. त्याचं काही वाटत नाही. दहा ते चार कामं करते साडेचारला घरी जाते. “

” अग पण थोडं तरी लिहिता यायला पाहिजे. मी शिकवीन तुला. साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो. “

“अहो आता शिकून काय करू? घरी गेले की घरचं काम असतं. “

” अग तशी तु हुशार वाटतेस म्हणून तु थोडं तरी शिकावं असं मला वाटतं”

” तसं नाही वहिनी…. मला पण आवडलं असतं पण संध्याकाळचं अजून एक काम असतं बघा”

” संध्याकाळी काय करतेस? “

” त्या पाच नंबरातल्या आगाशे आजींना बागेत नेते. त्या तिथल्या बाकावर मैत्रिणींशी गप्पा मारतात. मी बाजूच्या बाकावर बसते. नंतर त्यांना घरी आणून सोडते. तेवढे चार पैसे मिळतात.. संसाराला उपयोग होतो”

” हो का… बरं बरं… “

रोज नंदा येऊन काम करून जायची. आज कामं करता करता तिच्याशी गप्पा सुरू होत्या. ती पण आनंदात काही काही बोलत होती.

” वहिनी माझी मुलगी रोज वीस मुलांना डबे देते. ती साबुदाणा खिचडी, कटलेट, बटाटेवडे, पावभाजीची ऑर्डर घेते. कधी तुम्हाला काही लागलं तर सांगा “

” अरे हो का…. सांगेन हं”

बोलता बोलता पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली.

“वहिनी बघा बरं नीट लागलीत का? “

” हो ग… छान काम केलंस”

“वहिनी हे काय आहे? हे आत ठेवायचं का? “

“हो… त्यात अगदी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. त्यात आमची सगळी सर्टिफिकेट्स आहेत. “

तिने स्वतःच ते फोल्डर नीट कपाटात ठेवले.

तेवढ्यात नंदाला एक फोन आला.

बोलून झाल्यावर ती म्हणाली,

” वहिनी तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय बघा. मला जमेल तसं मी शिकेन.. मध्येच मला पण वाटतय तुमच्यासारखं शिकावं शहाणं व्हावं…. “

” मी शिकवते तुला आणि चांगलं शहाणं करते “ती म्हणाली.

” बरं आता निघते मी. माझी मुलगी इथेच ऑर्डर द्यायला आली आहे. तिच्याबरोबर गाडीवर जाते घरी. “

” ती गाडीवर येते? “

” अहो जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत. त्यांची जुनी गाडी विकत घेतलेलीय लेकीनी. निघते वहिनी”

” अग थांब तुझा पगार काढून ठेवला आहे. तो देते”

” वहिनी रोख पैसे नको. तुम्हाला माझं पासबुक दाखवते. त्या नंबरावर खात्यावर टाका. सगळे तसेच करतात. “

असं म्हणून नंदाने पासबुक तिच्या हातात दिले.

तिने उघडून बघितलं तर सोळा हजार जमा झाले होते.

“माझं वन बीएचकेच जुनं घर आहे. आता एक नविन टू बीएचके घेतलं आहे.. पगारातनं हप्ता भरते. माझा नवरा, मुलगा पण बँकेत पैसे भरतो. चार महिन्यात आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा. दोन लाख तेवढे द्यायचे राहिलेत.. ” नंदा सहजपणे हे सांगत होती.

” दुसरं घर घेतलस? “

” मुलाचं लग्न होईल. मग घरात सुनबाई येईल.. मोठं घर हवं… वाढता संसार.. म्हणून घेतलय.. “

” अरे वा… “

” बर वहिनी येते मी. खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला व्हाट्सअप ला पाठवते. त्यावर पैसे पाठवा”

असं म्हणून नंदा गेली. ती विचारातच पडली…

इतका वेळ आपण तिला मी तुला शिकवते….. मी तुला शिकवते…. असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली…. आज मात्र तिने मनाशी तिने ते कबुल पण केले..

लिहिता वाचता येणं… हातातं डिग्री असेल तर तेच खरं शिक्षण… असचं ईतकी वर्षे आपण समजत होतो….. ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्ता भरत होती…. लाखाची गोष्ट करत होती…

रोजच्या जगात वावरताना लागणार व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं…

खरंतरं तिच्याकडूनच आपण शिकायला हवे असे तिला मनोमन वाटले..

महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही…. आणि हिला मी अडाणी अशिक्षित समजत होते…

ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडे…. त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडे बघत राहिली….

या शिक्षणातून मिळालेले ज्ञानही असचं आपण डोक्यात बंद करून ठेवले आहे. कधी त्याचा उपयोग केला नाही.

नुसता डिग्रीचा अभिमान बाळगला. आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं…..

खंत वाटली…

ती उठून गॅलरीत आली. मुलीच्या मागे बसून नंदा निघाली होती. तिच्याकडे पाहून…

ती प्रांजळपणे मनात म्हणाली…

नंदा खरी शहाणी तर तुच आहेस…

अक्षरं ओळख नसल्याने..

अंगठे उठवणारी….

खरी बहाद्दरीण…

आत्मनिर्भर असलेली…

माझा सलाम आहे तुला…..

आणि आम्हाला रोज मदत करणाऱ्या तुझ्यासारख्या असंख्य मैत्रिणींना… सख्यांना पण… मनापासून वंदन.

तुमच्यामुळे आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे…

वाचता वाचता…. डोळ्यात का ग पाणी… तुलाही तुझ्या कपाटातलं बंद करून ठेवलेलं सर्टिफिकेट आठवलं का…

तुझीच कथा वाटली का तुला…

असू दे… तुझ्यासारख्या असंख्यजणींची हीच कथा आहे..

पैसे मिळवण्यासाठी नको पण निदान तुझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी कर..

घराबाहेर पड… अजूनही वेळ गेलेली नाही.. तू मिळवलेल्या ज्ञानाचा.. डिग्रीचा कर काहीतरी ऊपयोग…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ यंदा कर्तव्य आहे… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ यंदा कर्तव्य आहे…  ☆ डॉ. शैलजा करोडे

“अग सीमा, एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी, यंदा कर्तव्य आहे ग. पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही. तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे. ” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं. पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय सगळीकडे. लग्नाची मुले जास्त व मुली कमी. मग या मुलीवालेही जणू सातव्या आसमानावर असतात. अपेक्षा खूप असतात यांची मुलगी जरी सुमार असली तरी. शिक्षण कमी, दिसायला यथातथा असलेल्या मुलींनाही गोरा, गोमटा, राजबिंडा मुलगा हवा. शहरात राहणारा हवा. खेड्यातला नको, डाॅक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर हवा. , सासू सासरे, दीर नणंदेचा फापट पसारा नको. हवा फक्त राजाराणीचा संसार, हम दो हमारे दो. बाकी मंडळी जाऊ दे हवेत उडत, यांना काही घेणं देणं नसतं. “

” बरोबर आहे ग तुझं म्हणणं. पण माझा रोहितही एकुलता एकच आहे. चांगला M. Sc. Agri. डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरी पण मिळणार होती. पण आमची वडिलोपार्जित भरपूर शेती. ती कसायची सोडून नोकरी कसा करणार तो. सोन्यासारखी जमीन आमची. नोकरीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पट उत्पन्न देणारी, मग हातचं सोडून पळत्याच्या मागे काय लागायचं. राबणारी गडी माणसं, आपली देखरेख. शिवाय रोहित कृषी क्षेत्रातील विद्यानिष्णात, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बियांणाच्या विविध प्रजाती, खतांची जोड, ठिबक सिंचन, शेतीचं आधुनिकीकरण, मार्केटिंग, शेतीसाठी असणार्‍या विविध योजना, विम्याचं संरक्षण, शेतमाल साठविण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज गोदामं, त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे.

” होय ग प्रतिमा, सगळं पटतंय मला. पुढच्या महिन्यात पुण्यात भव्य वधु वर मेळावा आहे. online अर्ज भरायचा आहे. नोंदणी करून ठेव. ” ” होय, मी घरी गेल्यावर आधी ते काम करते “

” अहो, रोहितच्या लग्नाचा काही विचार करता कि नाही. आता रोहितचं शिक्षणही संपलं, त्याने आपला शेती व्यवसायही सांभाळलाय. आता कसली अडचण. ” अडचण कसली ? आता रोहितनं मनावर घ्यावं ” ” रोहित व्यस्त आहे आपल्या कामात. शिवाय तो मूळातच अबोल, आपला आदर करणारा. तो काय मनावर घेणार, आणि आपलंही काही कर्तव्य आहे कि नाही ? ” ” कर्तव्य आहे ग, आपण कोठे नाकारतोय. पण त्याचंही मत घ्यायला हवं. शिवाय त्याच्या मनात कोणी आहे काय ? हे ही जाणून घ्यायला हवं, तू चिंता नको करूस. मी बोलतो रोहितशी. “

मृगाच्या सरी चांगल्याच कोसळल्या होत्या. तप्त धरतीची तृष्णा शमून ती जणू नवकांतीने उभारली होती. चोहीकडे पसरणारा मृदगंध वातावरणात आल्हाद निर्माण करत होता. दुकानांमध्ये बि बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड उडाली होती. रोहितनेही नवीन संकरीत बियाणे घेतली. ज्वारी बरोबरच, उडीद, मूग, चवळी या भरड धान्याबरोबरच तो कांदा व काही प्रमाणात विविध भाज्यांचीही लागवड करणार होता.

रात्री जेवतांना शांतारामरावांनी रोहितला म्हणाले, ” काय रोहित मृगसरी कोसळल्या. सर्वत्र मृदगंध दरवळतोय. आनंदी, आल्हाददायी वातावरण आहे. काळ्या आईच्या सेवेसाठी आपणही सज्ज आहोत. आणि ही काळी आई एका दाण्याच्या बदल्यात हजार दाणे देईल. पण बेटा तुझ्या ह्या आईची पण काही इच्छा आहे. तुझेही दोनाचे चार, पुढे चाराचे सहा व्हावे. ” ” बाबा, मी काय सांगणार ? ” ” अरे काय सांगणार म्हणजे ? तुलाच तर सांगावं लागेल ? कोणी आहे

काय तुझ्या पसंतीची ? असेल तर आमचं काम सोपं होईल. फक्त अक्षता टाकण्याचं काम आमचं. ” ” नाही बाबा, माझी कोणी पसंती नाही. आईलाच करू देत हे काम “” अहो ऐकलंत का ? तुम्ही लागा आता कामाला “. ‘ मी सुरू केलंय माझं काम. पुढच्या महिन्यात वधु वर मेळावा आहे. रोहितचं नाव नोंदवलंय मी. आपण जाऊ तिथे ‘.

दुपारचे जेवण झाले व सगळी मंडळी हाॅलमध्ये परतली. सकाळपासून सुरु झालेल्या वधु वर मेळाव्यात मान्यवरांची भाषणे, सन्मान, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय यातच सकाळचं सत्र संपलं होतं. आता दुसर्‍या सत्रात वधु वर परिचय होणार होता. वधुपेक्षा वरांचीच संख्या भरपूर होती. एक एक उमेदवार मंचावर येऊन आपला परिचय देत होता, अपेक्षा सांगत होता. सांगलीची अलका लोणकर व अमरावतीची विद्या बनकर या दोन मुली मला (प्रतिमाला) रोहितसाठी योग्य वाटल्या. त्यांच्या पालकांशी मी तिथेच संपर्क साधला. गोरा, उंच, राजबिंडा दिसणार्‍या रोहितला कोण नाकारणार ? मी मनोमन खुश होते.

” रोहित चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, सधन स्थितीतील आहे, आम्हांला पसंत आहे, पण मुलाने खेड्यात राहून शेती करण्यापेक्षा शहरात नोकरी करावी एवढी आमची माफक अपेक्षा ” सांगलीच्या अलका लोणकरचे पालक बोलत होते.

‘ आपली गडगंज संपत्ती व शेती सोडून त्याने नोकरी म्हणजे दुसर्‍यांची चाकरी करायची ? ” ” आमची मुलगी शहरात राहणारी, पुढेही मुलांचे शिक्षण, इंग्रजी शाळा, विविध शैक्षणिक सुविधा शहरातच मिळणार. शिवाय आमची मुलगीही उच्च शिक्षित आहे, ती नोकरी करणारच, तिच्या ज्ञानाचा उपयोग करणार, खेडे गावात हे शक्य तरी होईल काय ?” 

आता माझं लक्ष अमरावतीच्या विद्या बनकर वर केंद्रित झालं. ” प्रतिमाताई तुमचा मुलगा चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, होतकरू आहे. आम्हांलाही असाच मुलगा हवा होता. विद्या आमची एकुलती एक कन्या, माझा बिझनेस, उद्योग व्यवसाय सांभाळायला मला रोहितसारखा मुलगा हवा होता. ” रोहितने तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळायचा आणि त्याचा स्वतःचा कोणी सांभाळायचा ? ” ” ताई शेतीकडे पाहायला तुम्ही दोघं आहात, शिवाय गडी माणसं आहेत. उद्योग व्यवसायात स्वतः लक्ष घालावं लागतं ” ” आम्ही थकलोत आता, पुढील पिढीने ही जवाबदारी सांभाळावी ही आमची अपेक्षा, पण तुम्हांला तर घरजावई हवा “. ते शक्य नाही. विद्याचं स्थळावर मी क्रास मार्क केला.

पुन्हा परिस्थिती जैसे थे वर येऊन ठेपली.

‘ प्रतिमा, नको चिंता करूस. मिळेल आपल्या रोहितलाही साजेशी मुलगी “

” कशी मिळणार, पाहिलंत ना वधुवर मेळाव्यातही किती कमी मुली होत्या. “

” होय, स्त्री भ्रूण हत्येचा मार्ग अनेकांनी चोखाळला व समाजातील स्त्री पुरूष समतोल ढासळला. हे परिणाम तर होणारच होते. तरी बघूया, रोहित आपला हुशार, होतकरू आहे. त्याला मुलगी मिळेल. नव्हे घरबसल्या सांगून येईल. “

लग्नाचा हा सिजन तर निघून गेला. माझे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

” अरे रोहित आलास. मी केव्हाची वाट पाहात होते. आणि सोबत ही कोण ? ” आई ह्यांना घरात तर येऊ दे. या आहेत मीनाक्षी मॅडम, कृषी अधिकारी, कृषी मार्केटिंगसाठी मला बरीच मदत होते यांची. शेतीचं पोत, आणि इतर घटक लक्षात घेऊन विविध बियाणांचे वाण, खतांचं मागदर्शन करण्यासाठी या स्थानिक सर्व्हे सुद्धा करतात. आज आपल्या जमिनीचा सर्व्हे करुन, मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला देतील व आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतील. ” ” होय काय, ठीक आहे. काय घेणार मॅडम, चहा, काॅफी कि थंड बनवू काही ” ” मला मॅडम नाही मीनाक्षी म्हणा आई, तुम्ही मला आईसारख्या आहात. “

किती चांगली मुलगी, मला आई म्हणाली, आंटी नाही, संस्कारी वाटते. रोहितला शोभेशी आहे.

मीनाक्षी आपले काम आटोपून निघून गेली, पण माझ्या मनात घर करून गेली.

‘ रोहित, मीनाक्षी कशी वाटते रे ? काही विचार केलास काय ? ‘ ‘ आई, काय बोलतेस हे ? तू असा विचार कसा करू शकतेस ? माझ्या मनात तसलं काहीही नाही आणि मीनाक्षी मॅडमच्या मनातही नसावं. तू रात्रंदिवस माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहेस. कोणत्याही मुलीमध्ये तू आपली सून शोधतेस. ” ” तसं नाही रे. मला मुलगी चांगली वाटली. गळ्यात सौभाग्य अलंकार नव्हते म्हणून लग्नाची वाटली. यात माझं काय चुकलं. ” ” नाही आई, तसं नव्हतं म्हणायच मला. “

मीनाक्षी कामानिमित्त गावात आली कि मलाहि भेटून जायची. हळूहळू परिचय वाढला. मीनाक्षीला एक धाकटा भाऊ व घरी आई वडील होते. वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तर आई गृहिणी. निम्नमध्यम वर्गीय कुटुंब.

“मीनाक्षी लग्नाचा काही विचार केलास”. तशी मीनाक्षी निरूत्तर. ” अग, असं मौन राहून कसं चालेल. बरं, मीच घालते विषयाला हात. माझा रोहित कसा वाटतो तुला ? ही माझी, मेलीची इच्छा. तुझ्या मनात नसेल तर विसरुन जा हा माझा प्रश्न. ” ” मी नंतर कळवलं तर चालेल आई ” ” होय, तुला पाहिजे तेवढा वेळ घे “

मीनाक्षीने घरी आई बाबांना रोहितविषयी सांगितलं. ” तुला पसंत आहे ना. मग पुढील फाॅर्म्यालिटीज आम्ही करू. रोहितच्या आई बाबांना सांग आम्ही येतो भेटीला म्हणून “

नक्षत्रासारख्या सुनेचं स्वागत करतांना आज मन आनंदानं उचंबळून आलं होतं. ” ये सूनबाई, उंबरठ्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं ये ” ” खूप छान आहे हो मुलगी, अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभतेय. लग्न घरातील सगळ्यांची हिच प्रतिक्रिया होती. यंदा कर्तव्य आहे म्हणत असतांना चार वर्ष भुरsss कन उडून गेली होती

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

अल्प परिचय 

शालेय शिक्षण विदर्भामध्ये वाशिम येथे व इंजीनियरिंग भोपाळला झाले. एक वर्ष नाशिकला ओझर येथे विमान कंपनीत नोकरी. नंतर पुण्याला टाटा मोटर्स मध्ये. २००९ मध्ये निवृत्त . निवृत्तीनंतर अवांतर लिखाणाला नकळतच छान सुरुवात झाली आणि वाचकांकडून छान चालना मिळत गेली.

🔆 जीवनरंग 🔆

☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.

शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.

रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.

फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.

शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.

म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.

त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.

चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.

ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.

झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.

शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.

अमिताभ : किससे पूछना चाहोगे?

शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!

शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू 

अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?

शाम : हा, सर. पक्का 

अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.

टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर 

अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल

ओबामा : यस्, आय नो दॅट यु आर ऑन द लाईन. हाऊ कॅन आय हेल्प यू?

अमिताभ : सर, शाम वॉन्टस टू आस्क यु समथिंग. यु विल बी गिव्हन 30 सेकंड्स. नेक्स्ट व्हाईस इज फ्रॉम शाम, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ 

ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर 

शाम जाम खुश झाला.

शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?

ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.

सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.

फोन कट झाला.

ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.

सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.

पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला 

शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक/आई आणि माता/आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक / आई आणि माता / आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

सुश्री मीरा जैन 

१. रक्षक की भक्षक

हाय स्टँडर्ड साड्यांचं दुकान. एक बाई दुकानदाराशी साड्यांच्या किमतीबाबत बारगॅनिंग करत होती. त्यांच्या दुकानातील साड्यांच्या किमती फिक्स असतात. बारगॅनिंगचा काहीही उपयोग होत नाही, अशी त्या दुकानाची ख्याती होती. कुणी बारगॅनिंग करू लागलंच तर दुकानदार फटकन म्हणे, ‘आपल्याला जमत असेल, तर घ्या. जबरदस्ती थोडीच आहे?’ त्यामुळे त्या बाईच्या बारगॅनिंगकडे दुकानातले सगळेच जण कुतुहलाने पहात होते.

 आताही दुकानदार आपल्या फिक्स रेटबद्दल पुन्हा पुन्हा संगत होता, पण ती बाई काही ऐकायला तयार नव्हती. अखेर तिचा विजय झाला. ५०००ची साडी तिने ४००० ला मिळवलीच.

 ती जाताच दुकानातील बाकीच्या बायकांनी दुकानदारावर पक्षपात करत असल्याचा आरोप करत, त्याच्याशी भांडण काढलं. त्यावर हात जोडून दुकानदाराने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं, ’ आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. पण आपणच निर्णय करा. मरू घातलेला काय करणार नाही? तुम्ही ती बाई आलेली गाडी पाहिलीत ना! त्यावर पिवळा दिवा होता. पोलिसांची गाडी…. मला याच वस्तीत राहयचा आहे. कामवायचं आहे आणि खायचंही आहे.

मूळ हिन्दी कथा – रक्षक या भक्षक

मूळ लेखिका – मीरा जैन 

अनुवाद – उज्ज्वला केळकर

२) आई आणि माता –

दहा वर्षाच्या राजूच्या एका हातात मोतीचुराचा लाडू होता आणि दुसर्‍या हातात तिरंगा झेंडा. राजू पळत पळत घरी येत होता, इतक्यात तो एका दगडाला थडकला आणि चिखलात पडला. त्याचा स्वच्छ गणवेश तर चिखलाने माखलाच, पण त्याच्या हाता-पायालादेखील खरचटलं. चेहरादेखील चिखलाने बरबटला होता. तो तसाच घरी आला. त्याला त्या अवस्थेत पाहिल्यावर उमा, त्याची आई प्रथम घाबरली. मग त्याला रागावत म्हणाली, ‘नीट बघून चालता येत नाही? चालताना असा कसा पडलास? अगदी गांवंढळ आहेस तू! ‘

त्यावर राजू म्हणाला, ‘मम्मी, माझ्या उजव्या हातात तिरंगा झेंडा होता. हा हात मी जमिनीवर टेकवला असता, तर कदाचित मला एवढं लागलं नसतं. पण माझ्या राष्ट्रध्वजाला चिखल लागला असता. मला ते नको होतं. माझ्या राष्ट्रध्वजावर चिखलाचा एक ठिपकाही पडणं, मला सहन झालं नसतं. ’

तिरंग्याबाबत राजूच्या मनात इतकी सन्मानाची भावना आहे, हे बघून, उमाचे डोळे भरून आले. तिला वाटलं आज आपल्या मातृत्वाचं सार्थक झालं. तिने राजूच्या डोक्यावर हात फिरवत म्हंटलं, ‘बाळा, तुझे विचार ऐकून मी अतिशय खूश आहे. माझं म्हणणं नीट ऐकून ठेव. तू तिरंगा नेहमीच स्वच्छ ठेवशील हे हीक आहे, पण जरी कधी दुसर्‍या कुणी याच्यावर चिखल उडवायचा प्रयत्न केला, तरी तू त्याचा प्रतिकार करायला हवास. आपला तिरंगा नेहमीच स्वच्छ, स्वस्थ आणि वर्चस्ववान राहील, याची तू काळजी घ्यायला हवीस!’

आईचं बोलणं ऐकल्यावर राजू आपलं सगळं दू:ख विसरून प्रफुल्लित आणि भाव-विभोर होऊन आपल्या आईकडे पाहू लागला. त्याला आपल्या आईमध्ये साक्षात् भारतमाता दिसू लागली होती.

मूळ हिन्दी कथा – माँ और माता

मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

३) आज्ञाधारक 

दोन गाढवांमध्ये वाद चालू होता. वादाचं कारण होतं, दोघांमधे कोण जास्त सुंदर आणि शहाणा आहे. वादातून जेव्हा काहीच निष्पन्न झालं नाही, तेव्हा ते दोघे निर्णयासाठी कोल्ही काकीकडे गेले. कोल्हीने दोघांचं बोलणं ऐकलं. मग ती म्हणाली, ‘मी याचा निर्णय दोन दिवसांनी देईन पण तोपर्यंत तुम्ही आपआपल्या घरात राह्यचं आणि मी सांगेन ते करायचं. दोघांनी कोल्हीची ही अट मान्य केली.

कोल्हीने दोन दिवस त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले. दोघांनीही कुरकुर न करता, कोल्ही म्हणेल, ती ती कामे केली. आता कोल्हीला प्रश्न पडला, ‘कुणाला श्रेष्ठ म्हणून घोषित करायचं? कारण दोघेही रूप-गुण, अंग – बांधा, आज्ञाधारकता, सहनशीलता याबाबतीत सारखेच आहेत. निर्णयाचा क्षण जसजसा जवळ येत चालला, तशी दोन्ही गाढवांप्रमाणे कोल्हीच्या हृदयाची धडधडही वाढली. कुणाच्या बाजूने निर्णय द्यायचा? अचानक कोल्हीला एक उपाय सुचला. तिने दोन्ही गाढवांकडून वचन घेतलं, की ती एका चिठ्ठीवर निर्णय लिहून देईल. दोघांनीही तो कुठलाही वाद न घालता मान्य करायचा आणि या निर्णयाबाबत दोघांनीही जीवनभर आपापसात काही बोलायचं नाही. ’गाढवांनी ते मान्य केलं।

कोल्हीने मग आपला निर्णय तोंडी न सांगता चिठ्ठ्या लिहिल्या आणि दोन्ही गाढवांना एकेक चिठ्ठी दिली. ते दोघेही आपापली चिठ्ठी वाचून अतिशय खूश झाले. या निर्णयाला अनेक वर्षे झाली पण आजही ते, त्या दिवसाइतकेच खूश आहेत. त्या दिवशी त्या दोघाच्याही चिठ्ठीत कोल्हीने एकच वाक्य लिहिलं होतं, ‘तू जास्त सुंदर आणि शहाणा आहेस.’ 

मूळ हिन्दी कथा – आज्ञाकारिता

मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शांतीचे मनोगत…” ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सुश्री ज्योती कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “शांतीचे मनोगत…” ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी

एका पुरुषाला जिने घडवलं ती ‘जिजाऊ’!

एका पुरुषाने जिला घडवलं ती ‘सावित्री फुले ‘!

 

पुरुषांनी लाथाडलेली स्त्री शांताबाई!

पुरुषांनी लाथाडल्यावर तिची काय अवस्था होते, ही व्यथा मी तुमच्या पुढे मांडणार आहे.

मी सादर करते आहे कोल्हाट्याचं पोर मधील शांताबाईचे मनोगत. ‘कोल्हाट्याचं पोर’ या किशोरच्या आत्मकथनाच्या आधारेच मी ते लिहिलेले आहे.

पुरुषांनी लाथाडल्यावर त्या स्त्रीची काय अवस्था होते हे व कोल्हाटी समाजाचे चित्रण या पुस्तकात केलेले दिसून येते त्याचप्रमाणे स्वतःचीच आई शांताबाई हिच्या माध्यमातून कोल्हाटी समाजाची समाजातील स्त्रियांची अवस्था किशोरने मांडली आहे.

हे आहे कोल्हाट्याचं पोर मधील किशोर ची आई शांताच मनोगत….

मी शांता! किशोरची आई.

कोल्हाट्याचं पोर असलेल्या किशोर नं, माझ्या किशोरने त्याची कैफियत तुमच्यापुढे मांडलीच आहे. त्याच्यासोबत माझीही कहाणी त्याला तुम्हाला सांगावीच लागली. कारण कोल्हाट्याची पोर शांता जन्माला येते म्हणूनच कोल्हाट्याचं पोर किशोर जन्माला येतो.

माझी कहाणी मला तुम्हाला सांगायचीही लाज वाटते पण

पण सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी ती कशी कळणार ?

जीजी साळी समाजातली होती पण माझ्या आज्याने, कृष्णा कोल्हाट्याने लक्ष्मीला, म्हणजे तिच्या निराधार आईला आसरा देण्याचं नाटक केलं व तिच्यासोबत ठेवलेल्या बाईप्रमाणे राहू लागला. तिची मुलगी जीजी त्याची स्वतःची नसल्यामुळे कृष्णा कोल्हाट्याने कोल्हाट्याच्या पिढीजात व्यवसायाला तिला लावले. ती तरी काय करणार? स्वतःचे वेडसर वडील घरातून पळून गेल्याने तिच्या आईला व जिजीला ते जीवन स्वीकारावेच लागले.

जीजी खूप सुंदर असल्यामुळे माधवराव पाटीलांनी तिला बायको प्रमाणे जवळ वागवले. स्वतःला दोन बायका असतानाही!

किशोरची आई शांता ही कृष्णा कोल्हाट्याच्या लग्नाच्या बायकोपासून झालेल्या कोंडीबा नावाच्या मुलाची मुलगी. म्हणजे मीच! मी पण सुंदर असल्याने आयतं बसून खाण्यासाठी माझ्या बापानं कोंडीबानं, मला नाच गाण्याच्या व्यवसायाला लावले.

पण जीजी सोबत माझाही सांभाळ माधवराव पाटलांनी मुलीप्रमाणे केला व मला शिक्षिका व्हायचे स्वप्न दाखवले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर आम्हा दोघींना पण घराबाहेर काढल्या गेले.

जीजी सोबत माधवराव पाटलांनानी माझाही उद्धार केला एका शिळेची अहिल्या केली पण दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्याने या अहिल्येची पुन्हा शिळा झाली.

झाली कसली! माझा जन्मदाता प्रत्यक्ष कोंडीबा यानंच ती केली. स्वतःच्या स्वार्थासाठी !आयतं बसून खाण्यासाठी! स्वतः सारखेच बैल असलेले माझेच भाऊ पोसण्यासाठी! कोल्हाटी पुरुष ना ते !

याच कोल्हाटी जातीत सुंदर स्त्री म्हणून जन्माला येण्याच्या माझ्या दुर्दैवानेच माझा घात केला !

कोल्हाटी समाजात जन्माला येऊनही माधवराव पाटलांनी माझ्या मनात निर्माण केलेलं मास्तरीण होण्याचं आरशासारखं स्वच्छ सुंदर स्वप्न !

पाटलाच्या मृत्यूनंतर कोंडीबा ने त्याचा एका क्षणात चुराडा केला.

माझ्या मनात उत्पन्न झालेलं नव्या जीवनाच्या स्वप्नाचं बीजांकुर उगवायच्या आतच तुडवल्या गेलं! या….

या माझ्या बापानच चंद्रकलाबाईच्या पार्टीत मला नाचायला पाठवलं व माझ्या पायाला घुंगरू बांधले.

चंद्रकला बाईची पार्टी बंद पडली आणि मी घरी आले.

पुन्हा कुठल्या बाईच्या पार्टीत नाचायला जायची माझी इच्छा नव्हती. वाटत होतं नको ते पार्टीतलं जिणं!

माझ्या बापाला तर हृदय नव्हतंच! आणि बाहेरच्या समाजातील तरी आता कोण माझ्याशी लग्न करणार होतं?

घुंगराची बेडी एकदा पायाला पडली की ती पक्की होऊन जाते. दलदलीत फसलेल्याला बाहेर येणे कठीण असते!

हं! एखाद्या बाप आपल्या पोरीला घडवतो एखादा स्वार्थासाठी बिघडवतो.

करमाळ्याचे आमदार जगताप यांनी माझ्याशी चिरा लावला आणि किशोर चा जन्म झाला.

किशोरच्या जन्मा अगोदरच जगताप यांनी मला सोडलं.

एका नाचणारीणची समाजात काय किंमत असणार !

मला सोडल्याबद्दल त्यांना कोण जाब विचारणार !

आमचे भाऊ आणि बापच तर आमच्याशी सावत्रपणाने वागतात !

पुन्हा नशिबाला पार्टी आलीच! किशोरला रडत ठेवूनही नाचायला जावं लागायचं छातीवर दगड ठेवूनच.

ढेबेगावला किसन पाटलांनं माझी खोडी काढली. जीजीने तर त्याला चप्पलच मारली. गुंडाप्पा पाटलाच्या तावडीतून सुटून कसेबसे आम्ही नेरल्याला आलो. पुन्हा दुसरी पार्टी! पुन्हा धारूरकरांशी माझा चिरा लागला आणि दीपक चा जन्म झाला.

धारूरकर तसे चांगले. पण माझ्या दुर्दैवाने तिथेही माझा घात केला. धारूरकरांना मृत्यू आला. पुन्हा मला नाचायला जावं लागणार होतं.

कारण कोंडीबा च घर माझ्यावरच होतं.

आता तर माझी लहान बहीण सुशीलाही माझ्याबरोबर नाचायला तयार झाली होती.

‘ शांता सुशीला’ पार्टी नावारूपाला आली. आता हेच काम मनापासून करायचं ठरवलं होतं. मी गायची सुशीला नाचायची. गाण्यातच मी प्रगती केली. कारण पुन्हा नाचगाणं करायला जायचं असं जीवन मला नकोस झालं होतं. म्हणून कित्येकांनी मला मागणी घातली तरी मी त्यांना नको म्हटलं.

पण नाना वाडकर मात्र मला रडून रडून खूप विनंती करायचे. अखेरीस त्यांच्या भुलथापांना मी बळी पडले. माझ्याही पायातलं घुंगरू सुटणार याचा आनंद मला मनातून होताच!

स्त्रीचे दैव पुरुष कसे फिरवतो पहा त्यातून मी तर एक नाचणारी

माधवराव पाटलांनी मास्तरीण होण्याचं बीज लहानपणीच रुजवलं.

कोंडीबानं माझ्या बापान ते पायदळी तुडवलं.

तमाशात येणाऱ्या पुरुषांनी शेलक्या शिव्यांनी माझं स्त्रीत्व हवं तसं हिणवलं

‌नाना वाडकर यांनी मला पुन्हा संसाराचं आमिष दाखवलं.

‌त्यांच्याशिवाय मला गती नाही हे कळताच त्यांनी मला हवं तसं छळलं!

‌मुख्य म्हणजे माझ्या किशोरला मला मुकावं लागलं! कारण पायात पक्के फसलेले घुंगरू मला काढायचे होते ना!

पाय रक्तबंबाळ होणारच होते !मन जखमी होणारच होतं!

‌माझ्याच नाही तर माझ्यासारख्या माझ्या भगिनींच्याही माथ्यावरचा कलंक मला धुवून काढायचा होता !कायमचा !

‌नानांनी माझा किती छळ केला तरी म्हणूनच मी तो निमुटपणे सहन केला. त्यांनी किशोर आणि माझी ताटातूट केली.

 

आदर्श संसारी स्त्री बनण्याच्या नादात किशोरवरही माझ्याकडून अन्यायच झाला.

कारण माझ्या मनात केवळ एकच विचार होता!

पायातलं घुंगरू कायमचं फेकण्याचा! त्या एका वेडापायी किशोरच्या बाबतीत मी चुकलेच.

 

किशोरनंच एकदा म्हटले आहे आईच्या पायातलं घुंगरू सुटलं आणि मी मात्र तुटलेल्या घुंगराप्रमाणे एकाकी झालो. या कोल्हाटी समाजातच राहिलो. खरंच माझ्या किशोरला ही दलदलीतून बाहेर निघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

 

त्यातूनही माझा किशोर एमबीबीएस डॉक्टर झाला.

पण किशोरला मला सांगावसं वाटतं की माझ्यासारख्या अनेक शांतांच्या पायातलं घुंगरू कायमचं सुटल्यावर या समाजातल्या अनेक किशोर वर तुटलेल्या घुंगरासारखं जीवन जगायची वेळ येणार नाहीये…

वेळ येणार नाहीये…

© सौ. ज्योती कुलकर्णी

अकोला.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आहे अभिजात तरी ??” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “आहे अभिजात तरी ??” ☆ श्री मंगेश मधुकर

प्रसंग एक

सोसायटीच्या वॉचमनची ड्यूटी संपून अर्धा तास झाला तरी बदली वॉचमन आला नव्हता. काही वेळाने दुसरा आला. “सॉरी!!बस चुकली म्हणून उशीर झाला”

“कब से राह देख रहा हू”

“सॉरी म्हटलं ना”

“हररोज कोई बहाना करते हो. कभी तो टाइम पे आओ”

“घरी चाललाय ना. मग गप जा. ”

“कल भी बिना बताए छुट्टी ली. हमको डबल ड्यूटी करनी पडी. ”

“महत्वाचं काम होतं म्हणून दांडी मारली. ”

“दांडी मतलब!!”

“अरे बाबा!!वो मराठी मे बोला”

“लेकीन उसका मतलब क्या?”

“बिनाबताए छुट्टी मतलब दांडी मारना”

“अच्छा ऐसे हमको समझ मे आये ऐसा बोलो ना”

“ठिक है रे बाबा!!महाराष्ट्र इतने साल से काम कर रहे है फिर भी मराठी आती नही. तेरे वास्ते लिये हिन्दी बोलना पडता है. ”

“मेहरबानी”नंतर दोघं हिंदीत बोलायला लागले.

— 

प्रसंग दोन 

एक मध्यमवर्गीय कुटुंब वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या हॉटेलमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर तिथली भव्यता, अलीशान फर्निचर, चकचकीतपणा पाहून नवरा, बायको आणि मुलगी तिघांचेही डोळे विस्फारले. कोपऱ्यातल्या टेबलावर जागा मिळाल्यावर वेटरनं यांत्रिकपणे स्वागत केलं. “गुड ईव्हनिंग सर, गुड ईव्हनिंग मॅडम”

“मेनूकार्ड”नवरा 

“शुअर सर”वेटरच्या वागण्या-बोलण्यातली आदब कमालीची कृत्रिम होती.

“मेन ऑर्डर नंतर आधी दोन मसाला पापड आणि टोमॅटो सूप टु बाय थ्री घेऊन या” 

“येस सर”ऑर्डर ऐकून विचित्र चेहरा करून वेटर निघून गेला 

“अहो, हे काय केलंत”बायको खेकसली.

“काय झालं”नवऱ्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव.

“कसं बोललात आपण पॉश हॉटेलात आलोय. निदान आजूबाजूचं वातावरण तरी लक्षात घ्यायचं ना. टपरीवर देतात तशी ऑर्डर दिलीत. आता एक शब्द बोलू नका. ”बायकोच्या बोलण्यावर नवऱ्यानं मान डोलावली.

“एक्सक्युज मी”

“येस मॅडम”

“मेन कोर्स का ऑर्डर देना है. आपके यहा अच्छा डिश कौनसा है”

“हमारी सभी डिशेश बेहतरीन है”

“वैसा नही रे बाबा, सबसे बढीया”

“आपको क्या पसंद है”वेटर 

“ऐसा करो. तुम्हारी पसंद कि एक डिश साथ मे एक पनीर मटर और बटर रोटी आणि लवकर लाना”

ऑर्डर घेऊन वेटर निघून गेल्यावर नवऱ्यानं बायकोला विचारलं “एकदम हिंदीत ” 

“हेच तर तुम्हांला कळत नाही. असल्या भारी वातावरणात मराठीत बोलणं फार ऑड दिसतं. लोकं विचित्र नजरेनं बघतात. ” बायकोकडे पाहत नवऱ्यानं कोपरापासून हात जोडले. बायकोला ते कौतुक वाटलं.

—-

प्रसंग तीन

भला मोठा काचेचा दरवाजा ढकलून रामरावांनी बँकेत प्रवेश केला सोबत बायको होती. बॅंकेतलं हाय-फाय वातावरण बघून दोघंही गांगरले. एका काउंटरवर जाऊन रामरावांनी विचारलं “एफडी विषयी कोण सांगेल”

“क्या चाहीये”

“एफ डी!!”

“चार नंबर पे जाइये”

“माझ्या तीन एफडी एकत्र करून एकच मोठी करायची आहे. ”रामरावांनी एका दमात बोलून टाकलं.

“अंकल, हिन्दी मे बताएंगे”काउंटर पलिकडच्या मॅडम.

“का?”

“मुझे मराठी नही आती”

“ठिक है. ”म्हणत रामराव मोडक्या-तोडक्या हिन्दीत बोलायला लागले मधूनच इंग्लिश वाक्य जोडत होते.

“अहो, मराठी समजणाऱ्या माणसाला बोलवायला सांगा”शेजारी बसलेली बायको रामरावांच्या कानात म्हणाली.

“नको. आजकाल सगळ्याच ठिकाणी मराठी बोलणारे असतात असं नाही त्यापेक्षा मीच हिंदीत बोलतो. ”

“असं कसं!!एकतरी मराठी समजणारा असेलच ना. बँक महाराष्ट्रात आहे का अमेरिकेत??बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केरत रामराव बोलत राहिले.

*****  

मराठी भाषा दिन साजरा करण्यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत सुरवातीला वरील तीनही प्रसंगाचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

“प्रधानजी, हे काय होतं”राजांनी विचारलं 

“वस्तुस्थिती. ”प्रधान.

“म्हणजे”

“स्वतःच्याच घरात पाहुणी झालेल्या मराठीची अवस्था….. ”

“पण का?”

“माझ्याकडं उत्तर नाही. आता आपण पाहीलं. ते प्रातिनिधिक होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे मराठी बोलणं टाळलं जातं. खास करून शहरी भागात हे प्रमाण प्रचंड आहे. ”

“पण आपलेच लोक असं का वागतात”

“मराठी बोलण्याचा न्यूनगंड किवा डाउन मार्केट वाटतं म्हणून.. ”

“याला जबाबदार कोण?”

“मुद्दाम मराठीत बोलणं टाळणारे आणि मराठीविषयी दिखाऊ अभिमान असणारे, समोरच्याला मराठी येत नाही म्हणून भाषा बदलणारे महाराष्ट्रातले आपण सगळेच.. ”

“मातृभाषेत बोलायची लाज वाटणं हे संतापजनक आहे. कडक नियम केले पाहिजेत”

“काही उपयोग होणार नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा आपली माणसंच चुकीची वागतात. कोणीही सांगितलं नसताना, बळजबरी नसताना, दबाब नसताना मराठी बोलणं टाळलं जातं. मानसिकताच तशी झालीय. ”

“यावर उपाय??

“शक्य तिथं मराठीतच बोललं पाहिजे. मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे. इतर भाषांबद्दल आकस नाही. गरजेनुससार वापर जरूर करावा परंतु अतोनात महत्वही देऊ नये. नेमकं तेच होतंय. आपलेच लोक मराठीत बोलणं कमीपणाचं समजतात. म्हणूनच मग वाटतं की आहे अभिजात तरी ??????” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पुळणीवर फेरफटका मारायला लागलं की, असंख्य वाळूचे कण पायावर उधळत असतात! मग हे बघू का, ते बघू अशी अवस्था होते! ती वाळू पायाला गुदगुल्या करत असते तर कधी ओलसर असेल तर ती चिकटून बसते, जशी मनाला एखादी आठवण सोडत नाही!

तसं आपलं हे आयुष्य म्हणजे एक स्वतःसाठी असलेला मर्यादित सागरच असतो जणू! ज्याप्रमाणे सागराचा अंत कळत नाही, तसंच आपल्याला या मनाची खोली कळत नाही! ओहोटीच्या वेळी जितके आत जावे, तितके समुद्रात ओढले जातो, तसंच या मनाचे! जितके खोल खोल विचार करत राहू, तितकं मन आत आत रुतत जाते! त्या आठवणींची पुळण(वाळू) आत इतकी पाळेमुळे धरून असते की, एक एक जुना क्षण क्षण ही त्या वाळूचा कण कण असते. त्यात पाय नकळत रुतत जातात.

आयुष्याची भरती तर आता संपत आली याची जाणीव आहे. मागे वळून पाहताना जाणवतं, एवढं आयुष्य कसं गेलं आपलं! बालपणाचा काळ सुखात, शिक्षणात गेला. पुढे ४०/५० वर्ष संसार सागरात बुडलो होतो.

काठावरची रेती सुद्धा भेटत नव्हती. सतत उसळणाऱ्या परिस्थितीच्या एकावर एक लाटा येत होत्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्या सारखे आपण लाटावर लाटा झेलत होतो. कधी कधी नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या मारायला व्हायचं, पण आपला जीव सांभाळत, तोल सांभाळत त्या लाटांवर स्वार व्हायचं! नवीन उमेद मिळायची मोठ्या लाटा पार पाडताना! बघता बघता काळ सरत चालला आणि शरीराची आणि मनाचीही ताकद कमी होत चालली. आता समुद्र डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यातील लाटांवर स्वार होण्यापेक्षा किनाऱ्यावर बसून लाटा बघणं हेच बरं वाटतं – म्हणजे तेवढेच करता येतं! समुद्रात न जाताही त्याची विशालता, खोली, रंगरूप, सगळं मनाशी साठवत राहावंसं वाटतं!

तो आहे तसाच आहे – स्थिर, त्याच्या रूपात मग्न! आभाळाची निळाई प्रतिबिंबित होऊन त्याची निळाई कायम दिसते. त्या निळाईत पार बुडून गेलाय तो.. आणि मी- त्याच्यात!

सागराला किनारा आहे, तीच त्याची सीमा आहे आणि आपली ही एक वेगळीच सीमा रेषा आहे! आठवणींची वाळू पायाखालून सरत चालली आहे… एक दिवस असा येईल की हे वाळूत चालणारे पाय मंद मंद होत जातील.. पाणी, वाळू निसटून जाऊ लागेल पाया खालून, आणि शोधता शोधता तो किनारा गवसेल जिथून परतायची शक्यता नाही! त्या अनंत, अथांग सागर किनारी नकळत थांबतील हे पाय आणि डोळ्यासमोर येईल आपल्या गतायुष्याची मन- सागरात उमटणारी झलक! त्यातच विरून जाईल सगळी ऊर्जा, उमेद आणि उभारी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares