मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक/आई आणि माता/आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक / आई आणि माता / आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

सुश्री मीरा जैन 

१. रक्षक की भक्षक

हाय स्टँडर्ड साड्यांचं दुकान. एक बाई दुकानदाराशी साड्यांच्या किमतीबाबत बारगॅनिंग करत होती. त्यांच्या दुकानातील साड्यांच्या किमती फिक्स असतात. बारगॅनिंगचा काहीही उपयोग होत नाही, अशी त्या दुकानाची ख्याती होती. कुणी बारगॅनिंग करू लागलंच तर दुकानदार फटकन म्हणे, ‘आपल्याला जमत असेल, तर घ्या. जबरदस्ती थोडीच आहे?’ त्यामुळे त्या बाईच्या बारगॅनिंगकडे दुकानातले सगळेच जण कुतुहलाने पहात होते.

 आताही दुकानदार आपल्या फिक्स रेटबद्दल पुन्हा पुन्हा संगत होता, पण ती बाई काही ऐकायला तयार नव्हती. अखेर तिचा विजय झाला. ५०००ची साडी तिने ४००० ला मिळवलीच.

 ती जाताच दुकानातील बाकीच्या बायकांनी दुकानदारावर पक्षपात करत असल्याचा आरोप करत, त्याच्याशी भांडण काढलं. त्यावर हात जोडून दुकानदाराने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं, ’ आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. पण आपणच निर्णय करा. मरू घातलेला काय करणार नाही? तुम्ही ती बाई आलेली गाडी पाहिलीत ना! त्यावर पिवळा दिवा होता. पोलिसांची गाडी…. मला याच वस्तीत राहयचा आहे. कामवायचं आहे आणि खायचंही आहे.

मूळ हिन्दी कथा – रक्षक या भक्षक

मूळ लेखिका – मीरा जैन 

अनुवाद – उज्ज्वला केळकर

२) आई आणि माता –

दहा वर्षाच्या राजूच्या एका हातात मोतीचुराचा लाडू होता आणि दुसर्‍या हातात तिरंगा झेंडा. राजू पळत पळत घरी येत होता, इतक्यात तो एका दगडाला थडकला आणि चिखलात पडला. त्याचा स्वच्छ गणवेश तर चिखलाने माखलाच, पण त्याच्या हाता-पायालादेखील खरचटलं. चेहरादेखील चिखलाने बरबटला होता. तो तसाच घरी आला. त्याला त्या अवस्थेत पाहिल्यावर उमा, त्याची आई प्रथम घाबरली. मग त्याला रागावत म्हणाली, ‘नीट बघून चालता येत नाही? चालताना असा कसा पडलास? अगदी गांवंढळ आहेस तू! ‘

त्यावर राजू म्हणाला, ‘मम्मी, माझ्या उजव्या हातात तिरंगा झेंडा होता. हा हात मी जमिनीवर टेकवला असता, तर कदाचित मला एवढं लागलं नसतं. पण माझ्या राष्ट्रध्वजाला चिखल लागला असता. मला ते नको होतं. माझ्या राष्ट्रध्वजावर चिखलाचा एक ठिपकाही पडणं, मला सहन झालं नसतं. ’

तिरंग्याबाबत राजूच्या मनात इतकी सन्मानाची भावना आहे, हे बघून, उमाचे डोळे भरून आले. तिला वाटलं आज आपल्या मातृत्वाचं सार्थक झालं. तिने राजूच्या डोक्यावर हात फिरवत म्हंटलं, ‘बाळा, तुझे विचार ऐकून मी अतिशय खूश आहे. माझं म्हणणं नीट ऐकून ठेव. तू तिरंगा नेहमीच स्वच्छ ठेवशील हे हीक आहे, पण जरी कधी दुसर्‍या कुणी याच्यावर चिखल उडवायचा प्रयत्न केला, तरी तू त्याचा प्रतिकार करायला हवास. आपला तिरंगा नेहमीच स्वच्छ, स्वस्थ आणि वर्चस्ववान राहील, याची तू काळजी घ्यायला हवीस!’

आईचं बोलणं ऐकल्यावर राजू आपलं सगळं दू:ख विसरून प्रफुल्लित आणि भाव-विभोर होऊन आपल्या आईकडे पाहू लागला. त्याला आपल्या आईमध्ये साक्षात् भारतमाता दिसू लागली होती.

मूळ हिन्दी कथा – माँ और माता

मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

३) आज्ञाधारक 

दोन गाढवांमध्ये वाद चालू होता. वादाचं कारण होतं, दोघांमधे कोण जास्त सुंदर आणि शहाणा आहे. वादातून जेव्हा काहीच निष्पन्न झालं नाही, तेव्हा ते दोघे निर्णयासाठी कोल्ही काकीकडे गेले. कोल्हीने दोघांचं बोलणं ऐकलं. मग ती म्हणाली, ‘मी याचा निर्णय दोन दिवसांनी देईन पण तोपर्यंत तुम्ही आपआपल्या घरात राह्यचं आणि मी सांगेन ते करायचं. दोघांनी कोल्हीची ही अट मान्य केली.

कोल्हीने दोन दिवस त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले. दोघांनीही कुरकुर न करता, कोल्ही म्हणेल, ती ती कामे केली. आता कोल्हीला प्रश्न पडला, ‘कुणाला श्रेष्ठ म्हणून घोषित करायचं? कारण दोघेही रूप-गुण, अंग – बांधा, आज्ञाधारकता, सहनशीलता याबाबतीत सारखेच आहेत. निर्णयाचा क्षण जसजसा जवळ येत चालला, तशी दोन्ही गाढवांप्रमाणे कोल्हीच्या हृदयाची धडधडही वाढली. कुणाच्या बाजूने निर्णय द्यायचा? अचानक कोल्हीला एक उपाय सुचला. तिने दोन्ही गाढवांकडून वचन घेतलं, की ती एका चिठ्ठीवर निर्णय लिहून देईल. दोघांनीही तो कुठलाही वाद न घालता मान्य करायचा आणि या निर्णयाबाबत दोघांनीही जीवनभर आपापसात काही बोलायचं नाही. ’गाढवांनी ते मान्य केलं।

कोल्हीने मग आपला निर्णय तोंडी न सांगता चिठ्ठ्या लिहिल्या आणि दोन्ही गाढवांना एकेक चिठ्ठी दिली. ते दोघेही आपापली चिठ्ठी वाचून अतिशय खूश झाले. या निर्णयाला अनेक वर्षे झाली पण आजही ते, त्या दिवसाइतकेच खूश आहेत. त्या दिवशी त्या दोघाच्याही चिठ्ठीत कोल्हीने एकच वाक्य लिहिलं होतं, ‘तू जास्त सुंदर आणि शहाणा आहेस.’ 

मूळ हिन्दी कथा – आज्ञाकारिता

मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शांतीचे मनोगत…” ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सुश्री ज्योती कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “शांतीचे मनोगत…” ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी

एका पुरुषाला जिने घडवलं ती ‘जिजाऊ’!

एका पुरुषाने जिला घडवलं ती ‘सावित्री फुले ‘!

 

पुरुषांनी लाथाडलेली स्त्री शांताबाई!

पुरुषांनी लाथाडल्यावर तिची काय अवस्था होते, ही व्यथा मी तुमच्या पुढे मांडणार आहे.

मी सादर करते आहे कोल्हाट्याचं पोर मधील शांताबाईचे मनोगत. ‘कोल्हाट्याचं पोर’ या किशोरच्या आत्मकथनाच्या आधारेच मी ते लिहिलेले आहे.

पुरुषांनी लाथाडल्यावर त्या स्त्रीची काय अवस्था होते हे व कोल्हाटी समाजाचे चित्रण या पुस्तकात केलेले दिसून येते त्याचप्रमाणे स्वतःचीच आई शांताबाई हिच्या माध्यमातून कोल्हाटी समाजाची समाजातील स्त्रियांची अवस्था किशोरने मांडली आहे.

हे आहे कोल्हाट्याचं पोर मधील किशोर ची आई शांताच मनोगत….

मी शांता! किशोरची आई.

कोल्हाट्याचं पोर असलेल्या किशोर नं, माझ्या किशोरने त्याची कैफियत तुमच्यापुढे मांडलीच आहे. त्याच्यासोबत माझीही कहाणी त्याला तुम्हाला सांगावीच लागली. कारण कोल्हाट्याची पोर शांता जन्माला येते म्हणूनच कोल्हाट्याचं पोर किशोर जन्माला येतो.

माझी कहाणी मला तुम्हाला सांगायचीही लाज वाटते पण

पण सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी ती कशी कळणार ?

जीजी साळी समाजातली होती पण माझ्या आज्याने, कृष्णा कोल्हाट्याने लक्ष्मीला, म्हणजे तिच्या निराधार आईला आसरा देण्याचं नाटक केलं व तिच्यासोबत ठेवलेल्या बाईप्रमाणे राहू लागला. तिची मुलगी जीजी त्याची स्वतःची नसल्यामुळे कृष्णा कोल्हाट्याने कोल्हाट्याच्या पिढीजात व्यवसायाला तिला लावले. ती तरी काय करणार? स्वतःचे वेडसर वडील घरातून पळून गेल्याने तिच्या आईला व जिजीला ते जीवन स्वीकारावेच लागले.

जीजी खूप सुंदर असल्यामुळे माधवराव पाटीलांनी तिला बायको प्रमाणे जवळ वागवले. स्वतःला दोन बायका असतानाही!

किशोरची आई शांता ही कृष्णा कोल्हाट्याच्या लग्नाच्या बायकोपासून झालेल्या कोंडीबा नावाच्या मुलाची मुलगी. म्हणजे मीच! मी पण सुंदर असल्याने आयतं बसून खाण्यासाठी माझ्या बापानं कोंडीबानं, मला नाच गाण्याच्या व्यवसायाला लावले.

पण जीजी सोबत माझाही सांभाळ माधवराव पाटलांनी मुलीप्रमाणे केला व मला शिक्षिका व्हायचे स्वप्न दाखवले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर आम्हा दोघींना पण घराबाहेर काढल्या गेले.

जीजी सोबत माधवराव पाटलांनानी माझाही उद्धार केला एका शिळेची अहिल्या केली पण दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्याने या अहिल्येची पुन्हा शिळा झाली.

झाली कसली! माझा जन्मदाता प्रत्यक्ष कोंडीबा यानंच ती केली. स्वतःच्या स्वार्थासाठी !आयतं बसून खाण्यासाठी! स्वतः सारखेच बैल असलेले माझेच भाऊ पोसण्यासाठी! कोल्हाटी पुरुष ना ते !

याच कोल्हाटी जातीत सुंदर स्त्री म्हणून जन्माला येण्याच्या माझ्या दुर्दैवानेच माझा घात केला !

कोल्हाटी समाजात जन्माला येऊनही माधवराव पाटलांनी माझ्या मनात निर्माण केलेलं मास्तरीण होण्याचं आरशासारखं स्वच्छ सुंदर स्वप्न !

पाटलाच्या मृत्यूनंतर कोंडीबा ने त्याचा एका क्षणात चुराडा केला.

माझ्या मनात उत्पन्न झालेलं नव्या जीवनाच्या स्वप्नाचं बीजांकुर उगवायच्या आतच तुडवल्या गेलं! या….

या माझ्या बापानच चंद्रकलाबाईच्या पार्टीत मला नाचायला पाठवलं व माझ्या पायाला घुंगरू बांधले.

चंद्रकला बाईची पार्टी बंद पडली आणि मी घरी आले.

पुन्हा कुठल्या बाईच्या पार्टीत नाचायला जायची माझी इच्छा नव्हती. वाटत होतं नको ते पार्टीतलं जिणं!

माझ्या बापाला तर हृदय नव्हतंच! आणि बाहेरच्या समाजातील तरी आता कोण माझ्याशी लग्न करणार होतं?

घुंगराची बेडी एकदा पायाला पडली की ती पक्की होऊन जाते. दलदलीत फसलेल्याला बाहेर येणे कठीण असते!

हं! एखाद्या बाप आपल्या पोरीला घडवतो एखादा स्वार्थासाठी बिघडवतो.

करमाळ्याचे आमदार जगताप यांनी माझ्याशी चिरा लावला आणि किशोर चा जन्म झाला.

किशोरच्या जन्मा अगोदरच जगताप यांनी मला सोडलं.

एका नाचणारीणची समाजात काय किंमत असणार !

मला सोडल्याबद्दल त्यांना कोण जाब विचारणार !

आमचे भाऊ आणि बापच तर आमच्याशी सावत्रपणाने वागतात !

पुन्हा नशिबाला पार्टी आलीच! किशोरला रडत ठेवूनही नाचायला जावं लागायचं छातीवर दगड ठेवूनच.

ढेबेगावला किसन पाटलांनं माझी खोडी काढली. जीजीने तर त्याला चप्पलच मारली. गुंडाप्पा पाटलाच्या तावडीतून सुटून कसेबसे आम्ही नेरल्याला आलो. पुन्हा दुसरी पार्टी! पुन्हा धारूरकरांशी माझा चिरा लागला आणि दीपक चा जन्म झाला.

धारूरकर तसे चांगले. पण माझ्या दुर्दैवाने तिथेही माझा घात केला. धारूरकरांना मृत्यू आला. पुन्हा मला नाचायला जावं लागणार होतं.

कारण कोंडीबा च घर माझ्यावरच होतं.

आता तर माझी लहान बहीण सुशीलाही माझ्याबरोबर नाचायला तयार झाली होती.

‘ शांता सुशीला’ पार्टी नावारूपाला आली. आता हेच काम मनापासून करायचं ठरवलं होतं. मी गायची सुशीला नाचायची. गाण्यातच मी प्रगती केली. कारण पुन्हा नाचगाणं करायला जायचं असं जीवन मला नकोस झालं होतं. म्हणून कित्येकांनी मला मागणी घातली तरी मी त्यांना नको म्हटलं.

पण नाना वाडकर मात्र मला रडून रडून खूप विनंती करायचे. अखेरीस त्यांच्या भुलथापांना मी बळी पडले. माझ्याही पायातलं घुंगरू सुटणार याचा आनंद मला मनातून होताच!

स्त्रीचे दैव पुरुष कसे फिरवतो पहा त्यातून मी तर एक नाचणारी

माधवराव पाटलांनी मास्तरीण होण्याचं बीज लहानपणीच रुजवलं.

कोंडीबानं माझ्या बापान ते पायदळी तुडवलं.

तमाशात येणाऱ्या पुरुषांनी शेलक्या शिव्यांनी माझं स्त्रीत्व हवं तसं हिणवलं

‌नाना वाडकर यांनी मला पुन्हा संसाराचं आमिष दाखवलं.

‌त्यांच्याशिवाय मला गती नाही हे कळताच त्यांनी मला हवं तसं छळलं!

‌मुख्य म्हणजे माझ्या किशोरला मला मुकावं लागलं! कारण पायात पक्के फसलेले घुंगरू मला काढायचे होते ना!

पाय रक्तबंबाळ होणारच होते !मन जखमी होणारच होतं!

‌माझ्याच नाही तर माझ्यासारख्या माझ्या भगिनींच्याही माथ्यावरचा कलंक मला धुवून काढायचा होता !कायमचा !

‌नानांनी माझा किती छळ केला तरी म्हणूनच मी तो निमुटपणे सहन केला. त्यांनी किशोर आणि माझी ताटातूट केली.

 

आदर्श संसारी स्त्री बनण्याच्या नादात किशोरवरही माझ्याकडून अन्यायच झाला.

कारण माझ्या मनात केवळ एकच विचार होता!

पायातलं घुंगरू कायमचं फेकण्याचा! त्या एका वेडापायी किशोरच्या बाबतीत मी चुकलेच.

 

किशोरनंच एकदा म्हटले आहे आईच्या पायातलं घुंगरू सुटलं आणि मी मात्र तुटलेल्या घुंगराप्रमाणे एकाकी झालो. या कोल्हाटी समाजातच राहिलो. खरंच माझ्या किशोरला ही दलदलीतून बाहेर निघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

 

त्यातूनही माझा किशोर एमबीबीएस डॉक्टर झाला.

पण किशोरला मला सांगावसं वाटतं की माझ्यासारख्या अनेक शांतांच्या पायातलं घुंगरू कायमचं सुटल्यावर या समाजातल्या अनेक किशोर वर तुटलेल्या घुंगरासारखं जीवन जगायची वेळ येणार नाहीये…

वेळ येणार नाहीये…

© सौ. ज्योती कुलकर्णी

अकोला.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आहे अभिजात तरी ??” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “आहे अभिजात तरी ??” ☆ श्री मंगेश मधुकर

प्रसंग एक

सोसायटीच्या वॉचमनची ड्यूटी संपून अर्धा तास झाला तरी बदली वॉचमन आला नव्हता. काही वेळाने दुसरा आला. “सॉरी!!बस चुकली म्हणून उशीर झाला”

“कब से राह देख रहा हू”

“सॉरी म्हटलं ना”

“हररोज कोई बहाना करते हो. कभी तो टाइम पे आओ”

“घरी चाललाय ना. मग गप जा. ”

“कल भी बिना बताए छुट्टी ली. हमको डबल ड्यूटी करनी पडी. ”

“महत्वाचं काम होतं म्हणून दांडी मारली. ”

“दांडी मतलब!!”

“अरे बाबा!!वो मराठी मे बोला”

“लेकीन उसका मतलब क्या?”

“बिनाबताए छुट्टी मतलब दांडी मारना”

“अच्छा ऐसे हमको समझ मे आये ऐसा बोलो ना”

“ठिक है रे बाबा!!महाराष्ट्र इतने साल से काम कर रहे है फिर भी मराठी आती नही. तेरे वास्ते लिये हिन्दी बोलना पडता है. ”

“मेहरबानी”नंतर दोघं हिंदीत बोलायला लागले.

— 

प्रसंग दोन 

एक मध्यमवर्गीय कुटुंब वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या हॉटेलमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर तिथली भव्यता, अलीशान फर्निचर, चकचकीतपणा पाहून नवरा, बायको आणि मुलगी तिघांचेही डोळे विस्फारले. कोपऱ्यातल्या टेबलावर जागा मिळाल्यावर वेटरनं यांत्रिकपणे स्वागत केलं. “गुड ईव्हनिंग सर, गुड ईव्हनिंग मॅडम”

“मेनूकार्ड”नवरा 

“शुअर सर”वेटरच्या वागण्या-बोलण्यातली आदब कमालीची कृत्रिम होती.

“मेन ऑर्डर नंतर आधी दोन मसाला पापड आणि टोमॅटो सूप टु बाय थ्री घेऊन या” 

“येस सर”ऑर्डर ऐकून विचित्र चेहरा करून वेटर निघून गेला 

“अहो, हे काय केलंत”बायको खेकसली.

“काय झालं”नवऱ्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव.

“कसं बोललात आपण पॉश हॉटेलात आलोय. निदान आजूबाजूचं वातावरण तरी लक्षात घ्यायचं ना. टपरीवर देतात तशी ऑर्डर दिलीत. आता एक शब्द बोलू नका. ”बायकोच्या बोलण्यावर नवऱ्यानं मान डोलावली.

“एक्सक्युज मी”

“येस मॅडम”

“मेन कोर्स का ऑर्डर देना है. आपके यहा अच्छा डिश कौनसा है”

“हमारी सभी डिशेश बेहतरीन है”

“वैसा नही रे बाबा, सबसे बढीया”

“आपको क्या पसंद है”वेटर 

“ऐसा करो. तुम्हारी पसंद कि एक डिश साथ मे एक पनीर मटर और बटर रोटी आणि लवकर लाना”

ऑर्डर घेऊन वेटर निघून गेल्यावर नवऱ्यानं बायकोला विचारलं “एकदम हिंदीत ” 

“हेच तर तुम्हांला कळत नाही. असल्या भारी वातावरणात मराठीत बोलणं फार ऑड दिसतं. लोकं विचित्र नजरेनं बघतात. ” बायकोकडे पाहत नवऱ्यानं कोपरापासून हात जोडले. बायकोला ते कौतुक वाटलं.

—-

प्रसंग तीन

भला मोठा काचेचा दरवाजा ढकलून रामरावांनी बँकेत प्रवेश केला सोबत बायको होती. बॅंकेतलं हाय-फाय वातावरण बघून दोघंही गांगरले. एका काउंटरवर जाऊन रामरावांनी विचारलं “एफडी विषयी कोण सांगेल”

“क्या चाहीये”

“एफ डी!!”

“चार नंबर पे जाइये”

“माझ्या तीन एफडी एकत्र करून एकच मोठी करायची आहे. ”रामरावांनी एका दमात बोलून टाकलं.

“अंकल, हिन्दी मे बताएंगे”काउंटर पलिकडच्या मॅडम.

“का?”

“मुझे मराठी नही आती”

“ठिक है. ”म्हणत रामराव मोडक्या-तोडक्या हिन्दीत बोलायला लागले मधूनच इंग्लिश वाक्य जोडत होते.

“अहो, मराठी समजणाऱ्या माणसाला बोलवायला सांगा”शेजारी बसलेली बायको रामरावांच्या कानात म्हणाली.

“नको. आजकाल सगळ्याच ठिकाणी मराठी बोलणारे असतात असं नाही त्यापेक्षा मीच हिंदीत बोलतो. ”

“असं कसं!!एकतरी मराठी समजणारा असेलच ना. बँक महाराष्ट्रात आहे का अमेरिकेत??बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केरत रामराव बोलत राहिले.

*****  

मराठी भाषा दिन साजरा करण्यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत सुरवातीला वरील तीनही प्रसंगाचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

“प्रधानजी, हे काय होतं”राजांनी विचारलं 

“वस्तुस्थिती. ”प्रधान.

“म्हणजे”

“स्वतःच्याच घरात पाहुणी झालेल्या मराठीची अवस्था….. ”

“पण का?”

“माझ्याकडं उत्तर नाही. आता आपण पाहीलं. ते प्रातिनिधिक होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे मराठी बोलणं टाळलं जातं. खास करून शहरी भागात हे प्रमाण प्रचंड आहे. ”

“पण आपलेच लोक असं का वागतात”

“मराठी बोलण्याचा न्यूनगंड किवा डाउन मार्केट वाटतं म्हणून.. ”

“याला जबाबदार कोण?”

“मुद्दाम मराठीत बोलणं टाळणारे आणि मराठीविषयी दिखाऊ अभिमान असणारे, समोरच्याला मराठी येत नाही म्हणून भाषा बदलणारे महाराष्ट्रातले आपण सगळेच.. ”

“मातृभाषेत बोलायची लाज वाटणं हे संतापजनक आहे. कडक नियम केले पाहिजेत”

“काही उपयोग होणार नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा आपली माणसंच चुकीची वागतात. कोणीही सांगितलं नसताना, बळजबरी नसताना, दबाब नसताना मराठी बोलणं टाळलं जातं. मानसिकताच तशी झालीय. ”

“यावर उपाय??

“शक्य तिथं मराठीतच बोललं पाहिजे. मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे. इतर भाषांबद्दल आकस नाही. गरजेनुससार वापर जरूर करावा परंतु अतोनात महत्वही देऊ नये. नेमकं तेच होतंय. आपलेच लोक मराठीत बोलणं कमीपणाचं समजतात. म्हणूनच मग वाटतं की आहे अभिजात तरी ??????” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पुळणीवर फेरफटका मारायला लागलं की, असंख्य वाळूचे कण पायावर उधळत असतात! मग हे बघू का, ते बघू अशी अवस्था होते! ती वाळू पायाला गुदगुल्या करत असते तर कधी ओलसर असेल तर ती चिकटून बसते, जशी मनाला एखादी आठवण सोडत नाही!

तसं आपलं हे आयुष्य म्हणजे एक स्वतःसाठी असलेला मर्यादित सागरच असतो जणू! ज्याप्रमाणे सागराचा अंत कळत नाही, तसंच आपल्याला या मनाची खोली कळत नाही! ओहोटीच्या वेळी जितके आत जावे, तितके समुद्रात ओढले जातो, तसंच या मनाचे! जितके खोल खोल विचार करत राहू, तितकं मन आत आत रुतत जाते! त्या आठवणींची पुळण(वाळू) आत इतकी पाळेमुळे धरून असते की, एक एक जुना क्षण क्षण ही त्या वाळूचा कण कण असते. त्यात पाय नकळत रुतत जातात.

आयुष्याची भरती तर आता संपत आली याची जाणीव आहे. मागे वळून पाहताना जाणवतं, एवढं आयुष्य कसं गेलं आपलं! बालपणाचा काळ सुखात, शिक्षणात गेला. पुढे ४०/५० वर्ष संसार सागरात बुडलो होतो.

काठावरची रेती सुद्धा भेटत नव्हती. सतत उसळणाऱ्या परिस्थितीच्या एकावर एक लाटा येत होत्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्या सारखे आपण लाटावर लाटा झेलत होतो. कधी कधी नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या मारायला व्हायचं, पण आपला जीव सांभाळत, तोल सांभाळत त्या लाटांवर स्वार व्हायचं! नवीन उमेद मिळायची मोठ्या लाटा पार पाडताना! बघता बघता काळ सरत चालला आणि शरीराची आणि मनाचीही ताकद कमी होत चालली. आता समुद्र डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यातील लाटांवर स्वार होण्यापेक्षा किनाऱ्यावर बसून लाटा बघणं हेच बरं वाटतं – म्हणजे तेवढेच करता येतं! समुद्रात न जाताही त्याची विशालता, खोली, रंगरूप, सगळं मनाशी साठवत राहावंसं वाटतं!

तो आहे तसाच आहे – स्थिर, त्याच्या रूपात मग्न! आभाळाची निळाई प्रतिबिंबित होऊन त्याची निळाई कायम दिसते. त्या निळाईत पार बुडून गेलाय तो.. आणि मी- त्याच्यात!

सागराला किनारा आहे, तीच त्याची सीमा आहे आणि आपली ही एक वेगळीच सीमा रेषा आहे! आठवणींची वाळू पायाखालून सरत चालली आहे… एक दिवस असा येईल की हे वाळूत चालणारे पाय मंद मंद होत जातील.. पाणी, वाळू निसटून जाऊ लागेल पाया खालून, आणि शोधता शोधता तो किनारा गवसेल जिथून परतायची शक्यता नाही! त्या अनंत, अथांग सागर किनारी नकळत थांबतील हे पाय आणि डोळ्यासमोर येईल आपल्या गतायुष्याची मन- सागरात उमटणारी झलक! त्यातच विरून जाईल सगळी ऊर्जा, उमेद आणि उभारी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सेवेची गोष्ट’ –  लेखक : अज्ञात – माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सेवेची गोष्ट’ –  लेखक : अज्ञात – माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

आमचे वडिलोपार्जित घर भोपाळमध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडिलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.

समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा टि. सी. काही बोलणार नाही.

डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता. ” 

मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला, “माझ नाव आलोक आणि मी इस्रो (ISRO) मध्ये शास्‍त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए. सी. डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”

ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”

एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”

माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.

खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.

काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.

रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे. ”

पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”

मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.

काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.

नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”

त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”

ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो. कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”

त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.

त्यावर छापले होते – डाॅ. जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.

आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए. सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!

एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि. सी. च्या मदतीने खाली उतरले.

रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए. सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”

ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”

नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.

आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.

म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जगही आपोआपच बदलेल.

लेखक : अज्ञात 

माहिती संकलक : सुश्री पद्मिनी सरदेसाई 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला.

थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.

 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.

दिवसा कधी दिसत नसायचा.

खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.

 

रात्रीचे साडेबारा वाजले असतील.

मी त्या मंदिराकडे आलो.

तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला.

मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात हसला.

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 

सर माझ्या घरात लाईट नाही.

माझी आई आजारी असते.

दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.

बाळ तू मला बघून का गोड हसलास ? 

सर तुम्ही देव आहात !

नाही रे! 

सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.

ते जाऊदे तू जेवलास का? 

मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.

सर म्हणूनच मी हसलो.

मला माहित होतं.

तो (देव) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार.

मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो, तो काहींना काही मला देतोच.

कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो.

आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो.

मला माहित होतं…. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात.

तुम्ही देव आहात ना !

मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं.

रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.

माझे डोळे तरळले.

त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.

तो पाच मिनिटांनी परत आला.

त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.

सर,

माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.

क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले.

देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.

असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही.

वाईट वाटलं मला.

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे ना ना प्रश्न आ वासून उभे राहिले.

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले.

असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन दगावला.

मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले.

सर्व आपल्या घरी निघाले.

निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो.

पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.

मला बघून त्याने आवाज दिला,

सर….

अरे तू इथे काय करतोस ? 

सर आता मी इथेच राहतो.

आम्ही घर बदललं.

भाडं भरायला पैसे नव्हते.

त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.

मग मला घेऊन आई इथे आली.

काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे.

त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.

तिथे जीवंत माणसं यायची आणि इथे मेलेली.

ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो.

 

सर मी हार नाही मानली.

आई सांगायची……..

ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.

 

बरं… तुझी आई कुठे आहे ? 

सर ती कोरोनाच्या आजारात गेली.

तीन दिवस ताप खोकला होता.

नंतर दम अडकला.

मी कुठे गेलो नाही.

इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला.

१४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो.

सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची.

आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.

 

सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही.

ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.

कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.

ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.

 

असो 

सर,

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? 

सर,

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.

 

त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.

चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.

सर तोंड गोड करा.

 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.

भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

 

सर,

मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.

आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो…

न सांगता.

 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण,

मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला…

मी देव पाहिला…


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

(हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी शेअर करतोय… कारण मलाही कळले माणसातच देव आहे.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अॅप्रोच – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अॅप्रोच – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- “रोहन? ज्याला स्वतःलाच काही नीट समजून घेता आलेलं नाही तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. “

“मी वाट पहाते तुझ्या फोनची. “

” हो.. थॅंक्स.. “)– इथून पुढे —- 

रेस्टॉरंटमधे फारशी वर्दळ नव्हती. सानिका पाठोपाठ तीही फॅमिली रूमच्या दिशेने निघाली. सानिका थोडी सावरलेली वाटली तिला पण नेहा स्वत: मात्र अस्वस्थ होती. कुठून सुरुवात करावी तिला समजेचना.

” थँक्स. ” नेहाकडे पहात सानिका मनापासून म्हणाली.

” कशाबद्दल ?”

“मघाशी माझं ऐकलंत त्याबद्दल. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तर आई-बाबा येईपर्यंत अट्टाहासानं थांबून तमाशाही करू शकलं असतं. तुम्ही समंजसपणा दाखवलात. त्याबद्दल थँक्स. “

“बाबांची तब्येत कशी आहे?”

“रूटीन चेकअप होतं. ही इज क्वाईट नॉर्मल. “

“ओके. आपण मुद्याकडे वळूया?”

सानिका मानेनेच ‘हो’ म्हणाली. तिच्या मनावरचं दडपण हळूहळू वाढत चाललं होतं. ती कावरीबावरी झाली. नेहाच्या नजरेने ते अचूक हेरलं. तिचा राग यायच्या ऐवजी नेहाला आता तिची कींव वाटू लागली.

“मघाशी ‘मी कसलेही रंग उधळलेले नाहीत’ असं तू म्हणाली होतीस. ‘रोहननेच नीट समजून घेतलेलं नाहीय तो तुम्हाला काय सांगणार?’ असंही तुझं स्टेटमेंट होतं. याचा अर्थ अजूनही तुझी कांहीच चूक नाहीये असं वाटतंय कां तुला?”

नेहाच्या प्रश्नातला थेटपणा आणि स्वरातला शांतपणा सानिकाला अनपेक्षित होता. तिचा घरून निघतानाचा बचावाचा पवित्रा तिच्याही नकळत आपसूक गळून पडला. मनातलं नेमकं बोलायची ही संधी तिला घट्ट धरून ठेवायची होती. ती मनातल्या मनात कसेबसे शब्द जुळवू लागली…

” चूक किंवा बरोबर हे व्यक्तिपरत्वे वेगळं असू शकतं. माझं कांही चुकलंय कां हे मात्र आता तुम्ही ठरवायचंय. रोहननं त्यादिवशी तुमच्याइतक्याच शांतपणे मला हे विचारलं असतं तर त्या दिवशी त्याला जे सांगितलं असतं तेच आज तुम्हाला सांगते. त्यादिवशी रोहन मला भेटायला आला तोच खूप संतापून. त्याची ती प्रतिक्रिया खूप नैसर्गिक असेलही आणि त्या अवस्थेत तो मला समजून घेऊ शकणंही अपेक्षित नव्हतंच. म्हणूनच रोहनच्या मनात खदखदणारा संताप सहन करून मी शांतच राहिले होते. पण मला कांहीही बोलायची संधी न देता त्याने माझ्यावर केलेले गंभीर आरोप मला सहन झाले नाहीत. स्वीकारताही आले नाहीत. आजकालच्या पोरी फार पोचलेल्या असतात असं त्याचं स्टेटमेंट होतं. ‘मी वरुन साधीसुधी वाटते पण हे माझे दाखवायचे दात आहेत’ यावर तो माझं बोलणं ऐकून घेण्यापूर्वीच ठाम होता. मी एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करणारी मुलगी आहे काकू. रोहनही याच क्षेत्रात काम करतोय. इथलं वर्क कल्चर आणि निसरड्या वाटा त्याला परिचित असूनही तो हे बोलत होता. चुकीची किंवा बरोबर पण मलाही माझी कांही एक बाजू आहे हे जाणून घ्यायची त्याला गरजच वाटली नाही. मला कांही बोलायची किमान संधी न देता थेट मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मोकळा झाला तो! अशा परिस्थितीत खरंतर स्वच्छ मनाने संवाद व्हायला हवा होता. आमचे मात्र फक्त वादच झाले. आय एम सॉरी फॉर दॅट. त्याचा राग मी समजू शकते, पण माझं ऐकून घेणंही त्याला अगत्याचं वाटतं कां हेही महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी त्याच्या निरोपाची एक-दोन दिवस वाट पहायची ठरवलं होतं म्हणून घरी नव्हतं सांगितलं. “

” तो मुलगा कोण होता?”

” माझ्याच कंपनीतला माझ्या कलिग आहे तो. “

” त्यांने असं कां करावं? तुमचं अफेअर होतं का?”

सानिका एक क्षण थांबली. नेमकं उत्तर द्यायची हीच वेळ आहे हे तिनं ओळखलं. आता हातचं कांहीही राखून ठेवायची गरजच तिला वाटेना.

” चाणाक्षपणानं, माझ्या सोयीचं उत्तर द्यायचं, तर ‘त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं पण माझ्या नकारामुळे तो दुखावला गेला’ असंही मी सांगू शकते. पण मी तसं करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाहीय. थोडीच.. पण वेगळी आहे! त्याचं मुळात माझ्यावर ‘प्रेम’ नव्हतंच. आणि माझं म्हणाल तर मी अधांतरी होते. मी माझ्या वागण्या- बोलण्यातून कधीच कम्युनिकेट केलं नव्हतं त्याला पण तो मला प्रथमदर्शनी आवडला होता. मी वहावत जाणाऱ्यातली किंवा तुम्हाला वाटलं, तसं रंग उधळणाऱ्यातली नव्हते. पण म्हणून माझ्या मनात एखाद्याबद्दल जवळीक निर्माण होणं मी टाळूही शकत नव्हते हेही तेवढंच खर आहे. त्याचं हसणं, बोलणं, दिसणं, वागणं, त्याचा डिसेण्ट प्रेझेन्स सगळंच कुणालाही आवडावं असंच होतं. पण ते खरंच ‘प्रेम’ होतं की त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतचं ‘आकर्षण’ या संभ्रमात मी तरंगत होते. मला ते एकदा नीट तपासून पहायचं होतं. पण मला तेवढीही उसंत न देता त्याने मैत्रीसाठी हात पुढे केला. त्या मैत्रीच्या भरंवशावरच मी त्याला पारखून घ्यायचं ठरवलं. एकत्र गप्पा, कधी कॉफी-शॉप हा आता एक विरंगुळाच झाला होता जसा कांही. एक दिवस त्याने मला पिक्चरला यायचा आग्रह केला. मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले. तो रुसला. नाराज झाला. त्याने आधीच काढून ठेवलेली सिनेमाची दोन तिकीटं खिशातून काढली आणि तो ती फाडू लागणार तेवढ्यात एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे झेपावले आणि त्याला अडवलं. मला त्याला दुखावावंसं वाटेना. ती खरंतर त्याच्या जिंकण्याची आणि माझ्या हरण्याची सुरुवात ठरू शकली असती, पण माझ्या सुदैवाने तसं कांहीं झालं नाही. निसरड्या वाटेवरून मी सावरलं माझं मलाच. त्याला दुखवायचं नाही म्हणून मी त्याच्याबरोबर सिनेमाला गेले खरी पण आजही त्याचा मला पश्चाताप होत नाहीय. मी गेले ते बरंच झालं असंच वाटतंय. कारण म्हणूनच थिएटरमधल्या त्या मिट्ट काळोखातही त्याचे विकृत रुप मला स्वच्छ दिसलं! अंधार होताच तो अलगद मला खेटून बसू लागला तेव्हा मी थोडं नीट सावरून बसले. पण हार न मानता त्याने हळूच खुर्चीमागून आपला हात माझ्या खांद्यावर टाकला आणि माझ्याशी लगट करू लागला. मी त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि न बोलता माझ्या खांद्यावरचा त्याचा हात मी बाजूला केला. तो चिडला. बेचैन झाला. त्याने क्षणभर वाट पाहिली न् तडक उठून बाहेर निघून गेला. त्याचा उतावीळपणा मला आवडला नव्हता म्हणूनच स्वीकारताही नाही आला. त्याची किळस वाटू लागली आणि किंवही. त्याने परत आत येऊच नये असंच वाटतं राहिलं. इंटरव्हल झाला न् मी उठून बाहेर आले. दबा धरून माझीच वाट पहात असलेला तो सरळ पुढे येऊन माझी वाट अडवून उभा राहिला. जळजळीत नजरेने माझ्याकडे पहाणारा, संतापाने थरथरणारा. नाईलाजाने मी थांबले.

” खेळवतेयस मला?” त्यानं चिडून विचारलं.

” काहीतरीच काय बोलतोयस?”

“खेळवत, तिष्ठत नको ना ठेवू आता, चल. “

“कुठं?” त्याच्याकडे रोखून पहात मी विचारलं.

“तू म्हणशील तिथं. प्लीज.. नाही म्हणू नको. रुमवर येतेस?”

मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले.

” कां पण?” तो संतापलाच एकदम. आता एक घाव दोन तुकडे करण्याखेरीज पर्यायच नव्हता.

” तू जा आता. तू काय बोलतोयस, वागतोयस त्याचा रात्रभर शांतपणे विचार कर आणि आज मला जे विचारलंयस ना आत्ता ते सगळेच प्रश्न उद्या आपण ऑफिसमधे भेटू तेव्हा सगळ्या स्टाफसमोर मला विचार. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिथे सर्वांसमक्षच तुला देईन. नीघ आता. “

त्याला झिडकारुन मी निघून गेले. आजवरच्या आयुष्यात मी कांही रंग उधळलेच असतील ना काकू, तर हे एवढेच… ” 

आवाज भरून आला तसं ती बोलायची थांबली. सानिकाचा हात नेहाने अलगद हातात घेतला. सानिकाने तो कसनुसं हसत दूर केला.

“आता विषय निघालाय म्हणून सांगते, राग मानू नका. रोहन तुम्हा कुणाच्या दबावाखाली लग्नाला तयार झाला तर मलाच ते नकोय. खरं सांगू? त्याची रागाच्या भरात व्यक्त झालेली कां असेनात पण आजकालच्या मुलींविषयीची टोकाची मतं मला धोक्याची वाटतायत. माझी बाजू समजून घेण्याइतकंच त्याने स्वतःची मतं तपासून बघणंही गरजेचं आहे असं मला वाटतं. आमच्या संसाराची उभारणी परस्परांबद्दलचा आदर आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभी रहाणार असेल तरच ते आम्हा दोघांच्याही हिताचं आहे. मी रोहनच्या फोनची वाट पाहेन. ” 

नेहाचा निरोप घेऊन सानिका गेली तरी नेहा दिङमूढ होऊन उभीच होती. काहीही झालं तरी रोहनला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करायचं हे तिने मनोमन ठरवूनच टाकलं. त्यासाठी अर्थातच ती निरंजन आणि प्रिया दोघांची मदत घेणार होतीच. पण तरीही… ? तरीही ती अस्वस्थ होतीच. सानिकाला समजून घेणं जेवढं सोपं गेलं तेवढंच रोहनला समजावणं तिला अवघड वाटत राहिलं.

कांही क्षणापूर्वी उध्वस्त करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जातानाचा सानिकाचा ‘अॅप्रोच’ तिला कौतुकास्पद वाटला होता. पण आता.. ? आता मनात रेंगाळणाऱ्या त्या कौतुकावर रोहनचा अॅप्रोच कसा असेल या भीतीचा एक तवंग अलगद तरंगू लागलेला होता….!!

— समाप्त —

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अॅप्रोच – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अॅप्रोच – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- ” मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर उखडलीच ती माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस? ‘ असं मलाच विचारतेय. याला लग्न मोडणं याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मला. आता काय करायचं ते मी ठरवलंय आणि ते तुलाही सांगितलंय. ” रोहन म्हणाला.

“काय करायचं ते ठरवलंस पण कसं करायचं ते ठरवायला हवं कीं नको? मी.. आज रात्री.. पुण्याला यायला निघतेsय.. ” नेहाने रोहनला बजावून सांगितलं.)

(“आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “

“काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs? .. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.) – इथून पुढे —

“ठीक आहे. ये.. ” वरमल्यासारखा रोहन शांतपणे बोलला खरा, पण ‘ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल? ‘ या शंकेने नेहा धास्तावलीच. कितीतरी प्रश्न तिच्या मनात गर्दी करू लागले. पूर्वीच्या काळी आपल्यावेळी काळजी फक्त मुलींच्या लग्नाचीच असायची. मुलाच्या लग्नाची काळजी फारशी नसायची. आता मात्र मुलाच्या लग्नाची काळजीच नव्हे फक्त तर एक वेगळंच दडपणही असतं याचा अनुभव आज आपण प्रत्यक्ष घेत आहोत या विचाराने तर तिचं टेन्शन आणखीनच वाढलं. मुली मुलांच्या बरोबरीने शिकू लागल्या, नोकरी व्यवसायासाठी आत्मविश्वासाने समाजात वावरू लागल्या, स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेऊ लागल्या ही प्रगती म्हणायची की अधोगती? आजपर्यंत कधीच मनात न उभारलेला हा प्रश्न या सानिकाच्या निमित्ताने तिच्या मनात निर्माण झाला. खरं तर त्या दोघांची प्राथमिक पसंती, भेटणं-बोलणं हे सगळं झाल्यानंतर मग दोन्ही घरच्यांनी परस्परांशी चर्चा करून पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण केले होते आणि अचानक कुणा एका मुलाचा फोन रोहनला येतो काय आणि पत्त्याच्या बंगल्यावर फुंकर मारल्यासारखं सगळं क्षणात कोसळतं काय.. सगळं एखादं दु:स्वप्न असावं असं तिला असोशीनं वाटलं खरं, पण त्याचवेळी पुढं वाढून ठेवलेलं वास्तव या दु:स्वप्नापेक्षाही भयंकर नसेल ना अशी भीतीही वाटत राहिली..!

पुण्यापर्यंतच्या प्रवासात रात्रभरातला एकही क्षण तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. उलट सुलट विचार तिच्या मनात सतत भिरभिरत राहिले होते. साखरपुडा होऊन पंधरा दिवसही झालेले नाहीयेत, पुढच्याच महिन्यातला मुहूर्तही ठरलाय, निरंजनच्या बहिणीकडे आणि प्रियाच्या सासरी अशी दोन्हीकडची केळवणंही झालीयत. निमंत्रणाचे फोन तर सर्वांनाच गेलेत. निम्म्याशिम्या पत्रिकाही पोस्टांत पडल्यात. त्यामुळे लग्न मोडण्याइतकंच हे पुढचं सगळं निस्तरणंही खूप अवघड होऊन बसेल या कल्पनेने ती धास्तावलीच!

रोहन म्हणाला ते सगळं खरंच नेमकं तसंच असेल? सानिका अशी वहावत जाणारी मुलगी असेल? वाटत तरी नाहीय तसं. आपण तिलाच एकदा समक्ष भेटावं कां? बोलावं कां तिच्याशी? थेट तिलाच विचारावं? मनाला या विचारांचा स्पर्श झाला आणि त्या ओझरत्या स्पर्शानेही तिला तरतरी आल्यासारखं वाटलं. यामुळे एक झालं, नेहा रोहनकडे पोचली तेव्हा कालच्यासारखं दडपणाचं ओझं तिला जाणवत नव्हतं. बोलण्याच्या ओघात ती ‘एकदा सानिकाला भेटावं म्हणते’ असं रोहनला म्हणाली आणि तो खवळलाच एकदम.

“तू अजिबात तिचे पाय धरायला जायचं नाहीस बघ. सांगून ठेवतो. ” त्यानं फर्मावलं. ती त्या क्षणी गप्प बसली, पण आता असं हातावर हात ठेवून स्वस्थ बसायचं नाही हेही तिनं मनोमन ठरवून टाकलं. सानिकाला नाही पण तिच्या आई-वडिलांना तरी भेटायला हवंच ना? न भेटून कसं चालेल?

*****

नेहाने दाराची बेल वाजवली. दार सानिकानेच उघडलं. नेहाला अचानक दारात पाहून ती चपापली.

” येऊ..? “

“अं? .. हो.. ” सानिकाच्या मनातली अस्वस्थता लपत नव्हती. घरी बाकी कुणाचीच चाहूल लागली नाही तशी नेहा विचारांत पडली.

” तुम्ही.. बसा ना.. ” मान खाली घालून सानिका म्हणाली. नेहा मनाविरुद्ध बसल्यासारखी अवघडून सोफ्यावर टेकली.

” मी.. मी पाणी आणते… आलेच. “

” नाहीs नको. ” नेहा तुटकपणे म्हणाली. “काय गं? तू घरी सांगितलंयस ना सगळं? म्हणजे नेमकं काय घडलंय ते ठाऊक आहे ना त्यांना? “

” न… नाही.. ” सानिका कसंबसं एवढंच बोलली. आपण असं अचानक आलेलं पाहून ती भेदरलीय हे नेहाच्या लक्षात आलं होतं.

” ठीक आहे. मीच बोलते त्यांच्याशी. तुझ्या आईला बोलाव.? मी आलेय असं सांग त्यांना. “

सानिकांने चमकून वर पाहिलं. तिची अस्वस्थ नजर थोडी गढूळ झाली.

“नाही.. तुम्ही.. तुम्ही आता इथं सांगू नका कुणाला कांही. मी.. मी सांगेन ना.. सांगायचं आहेच मला.. हो.. “

नेहाला सणकच आली एकदम. लग्न म्हणजे खेळ वाटतो कां हिला?

“तू बोलाव तरी आईंनाs” नेहाने फर्मावलं. आता मात्र तिचे डोळे भरून आले. केविलवाण्या भरल्या डोळ्यांनी तिने नेहाकडे पाहिले.

“आत्ता आई नाहीये घरी. ती बाबांना चेकअपला घेऊन गेलीय. “

‌”हो कां? ” नेहा उपरोधाने म्हणाली. ” बरंs मी थांबते ते दोघे येईपर्यंत. ” 

“असं नका करू, प्लीsज.. प्लीज ऐका माझं. बाबा हार्ट पेशंट आहेत. त्यांना खरंच त्रास होईल या सगळ्याचा. म्हणून म्हणते, ऐका माझं. “

“हा विचार तू रंग उधळण्यापूर्वीच करायला हवा होतास. ” आता असं एक घाव दोन तुकडे करण्याशिवाय नेहाकडे तरी दुसरा पर्याय होताच कुठे? सानिका थोडी गंभीर झाली. मनाशी कांही एक ठरवून तिने भरुन येणारे आपले डोळे पुसून कोरडे केले…

” मी कसलेही रंग उधळलेले नाहीयेत. पण तरीही हात जोडून विनंती करते मी तुम्हाला.. हवं तर पाया पडते तुमच्या पण हा विषय निदान आत्ता तरी वाढवू नका. आई बाबा केव्हाही येतील. “

” हे बघ, हे घोंगडं आता मला असंच भिजत ठेवायचं नाहीये. “

“मलाही. ” ती ठामपणे म्हणाली. ” मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. “

” माझ्याशीच नव्हे आई-बाबांशीही बोल तुझ्या. मला रोहनकडून सगळं समजलंय. “

” रोहन? ज्याला स्वतःलाच नीट कांही समजून घेता आलेलं नाहीय, तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. आपण बोलू. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. विश्वास ठेवा माझ्यावर. “

” कधी भेटायचं? आणि कुठे? “

” आई बाबा आले कीं लगेच मी बाहेर पडेन. तुम्ही असाल तिथून जवळच्याच एखाद्या रेस्टॉरंटमधे बसू. “

” मी वाट पहाते तुझी. “

” हो. थँक्स. “

– क्रमश: भाग दुसरा

©️ श्री अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अॅप्रोच – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अॅप्रोच – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

नेहाच्या संसारात गेल्या वर्षभरात एका मागोमाग एक इतक्या चांगल्या घटना घडल्या कीं पहाणाऱ्यांना तिचा हेवाच वाटावा. पण या सर्व घटनांची परिणती म्हणून नेहाच्या वाट्याला आलेलं एकटेपण तिलाच नकोसं वाटू लागलं. कारण या सर्व घटनांमुळे नेहा आणि निरंजनचं एक सुखी, आनंदी असं चौकोनी कुटुंब अचानक चार दिशांना विखरून गेलं होतं! रोहन आणि प्रिया ही काल-परवापर्यंत एवढीशी वाटणारी त्यांची पिल्लं अचानक पंख पसरून दूर उडून जावीत तसं झालं. कॅंम्पसमधून सिलेक्शन होऊन रोहन काॅक्निझंटला जॉईन होण्यासाठी पुण्याला गेला. प्रियाचं लग्न होऊन ती तिच्या मुंबईतल्या वेगवान रूटीनमधे व्यस्त होऊन गेली. रोहन आणि प्रिया दोघंही इतकी गोड आणि लाघवी होती कीं त्याची अनुपस्थिती कितीही अपरिहार्य असली तरी ती स्वीकारणं नेहाला सुरुवातीला खूप जडच गेलं. तरी बरं तेव्हा नेहाला निरंजनची हक्काची सोबत होती. पण ती सोबतही तात्पुरतीच ठरली. त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याचं पोस्टिंग झालं ते थेट नागपूरला! नेहा तिच्या नोकरीमुळे कोल्हापूरला एकटी पडली. दिवसभर ऑफिसमधे फारसं जाणवायचं नाही पण संध्याकाळी ती दार उघडून घरी आली कीं मात्र घर तिला खायला उठायचं. अर्थात हे सगळं तिची कसोटी पहायला घडलेलं असावं असं क्षणिकच ठरलं आणि नेहाला अनपेक्षित असा विरंगुळा मिळाला. कारण प्रियाच्या लग्नानंतर रोहनसाठी वधूसंशोधन सुरू झालंच होतं आणि अगदी अचानक त्याच्यासाठी पुण्याचं सानिकाचं स्थळ सांगून आलं होतं. एकमेकांची पसंती झाली आणि रोहनच्या लगीनघाईत तिचं एकटेपण तिच्याही नकळत विरून गेलं… !

 आता कधी नव्हे ते रोहन दर विकेण्डला कोल्हापूरला येऊ लागला. लग्नाच्या तयारीत जमेल तशी मदत करू लागला. घरी त्याच्या मित्रांची ये-जा सुरू झाली. दर विकेंडचे दोन दिवस या मित्रांच्या राबत्यामुळे घर जिवंत वाटू लागलं. पूर्वीसारखं हसू, खेळू लागलं.

 आनंदाचे, सुखाचे, कृतार्थतेचे क्षण असे नाचत- बागडत हसत-खेळतच येतात, पण दुःख मात्र भित्रं असतं. ते लपून दबा धरून बसतं आणि अचानक हल्ला करतं. त्यादिवशी नेहाला तिच्या ऑफिसमधे आलेला रोहनचा फोन या चोर पावलाने येणाऱ्या भित्र्या दुःखासारखाच होता! आज अचानक तो फोन आला आणि सगळ्या आनंदावर विरजणच पडलं जसं कांही. मन तळापासून ढवळून निघालं!

 “आई, थोडं महत्वाचं बोलायचंय.. कामांत आहेस?”

 “बोल ना… “

 “तू दडपण न घेता शांतपणे ऐकून घ्यायचं बघ.. तरच बोलतो. “

 रोहनचा आजचा हा हळवा स्वर नेहाला वेगळा वाटला.

 “बोल अरे.. बोल. ऐकतेय मी… “

 ती वरकरणी सहज बोलल्यासारखं बोलली खरी, पण आतून अस्वस्थच होती. ‘असं अचानक काय बोलायचं असेल याला.. ?.. ‘ ती स्वतःशीच विचार करत राहिली 

 “आई, माझं लग्न मोडायचंय… ” ऐकून ती हादरलीच.

 ” भलतंच काय बोलतोयस रोहन ? काय झालंय काय एवढं?.. “

 “आईs.. प्लीsज. तू अशी पॅनिक होऊ नकोस.. “

 ” मी.. मी पॅनिक होत नाहीये.. हो.. मी.. मी शांतपणे ऐकते.. हां… बोल तू. सांग मला सगळं‌. काय घडलंय… ? “

 “आई,.. “

 “एक.. एक मिनिट रोहन.. मी बाहेर ऑफिस कॅन्टीनमधे जाते.. म्हणजे नीट बोलता येईल मला… हां.. बोल आता.. “

 कपाळावरचा घाम रुमालाने टिपतानाही तिचा हात थरथरत होता..

 “आई, या आजकालच्या मुलींचं ना, काही खरं नसतं. साध्याभोळ्या वाटतात पण पार पोचलेल्या असतात.. ” 

 भलतंच काय बोलतोय हा?सानिकाचा हसरा प्रसन्न चेहरा तिच्या नजरेसमोरून क्षणभर तरळून गेला..

 “कांहीतरीच काय बोलतोयस रोहन.. ?”

 “कांहीतरीच नाहीs, खरं तेच बोलतोय. शी कान्ट बी ए परफेक्ट मॅच फॉर मी.. “

 “हे इतक्या उशिरा लक्षात आलं कां तुझ्या?” नेहा खवळलीच.. ” पसंतापसंती, नंतरच्या तुम्हा दोघांच्या गाठीभेटी, साखरपुडा.. सगळं होऊन गेल्यानंतर ?”

 “लग्न होण्यापूर्वी हे लक्षांत आलय तेच नशीब समज. “

 आजचा हा रोहन नेहाला एकदम अनोळखीच वाटू लागला.

 “इतक्या टोकाला जाण्याइतकं खरंच गंभीर आहे कां कांही ?” 

 ” होs.. आहेss.. शी इज ऑलरेडी इनव्हाॅल्व्ड इन समबडी एल्स.. “

 ” तुला कुणी सांगितलं? तिनं स्वत:?”

 “ती कशाला सांगेल? त्या मुलाचाच फोन आला होता. “

 ” तुझा मोबाईल नंबर त्याला कुणी दिला?”

 “ते मला काय माहित? तिला सांगायचं धाडस नाही, म्हणून तिने स्वतःच दिला असेल. “

 ” हे बघ, तू शांत हो.. असा 

सूतावरून स्वर्ग गाठू नकोsस. तू सानिकाला भेट. तिच्याशी बोल एकदा. “

 “मी बोललो नसेन असं वाटलं कां तुला? पार पोचलेली आहे ती भटकभवानी.. ” रोहन एवढा चिडला होता की पुढे काय बोलावं ते नेहाला समजेचना.

 “मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर ती उखडलीच माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस?’ असं मलाच विचारतेय. ‘तू काय स्वतःला धुतला तांदूळ समजतोयस कां?’ असं विचारलंन्. याला ‘लग्न मोडणं’ याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मलाs.. “

 “रोहन,.. मी काय म्हणते… ” नेहा चाचपडत राहिली.

 “आई, आता काय तो सोक्षमोक्ष आत्ताच लावून टाकायचा एकदाचा आणि मोकळं व्हायचं. मी आता लगेच बाबांनाही फोन करणाराय. त्यांनाही सगळं सांगून टाकणाराय.. “

 “ए.. ए.. रोहन.. ऐक.. ऐक. तू आता निरंजनला अजिबात फोन करायचा नाहीयेस लक्षात ठेव. तो तिकडे नागपूरहून काय करू शकणाराय? विनाकारण त्रास मात्र करून घेईल. हे बघ, मी.. मी आजच रात्री पुण्याला यायला निघतेय. पहाटपर्यंत पोचेन. आधी शांतपणे बोलू आपण, मग त्यानंतर मीच निरंजनला फोन करीन.. ” 

 “आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “

 “काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs?.. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.

– क्रमश: भाग पहिला

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकोशी…☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

नकोशी ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

गार वारं अंगावरनं गेलं तसं तिने पांघरूण अधिकच लपेटून घेतलं. वरतून वारं तर खाली दगडी फरशी गार गार. देवळाच्या ओट्यावर निजण्याचा आज सातवा दिवस. डोक्याखाली उशी म्हणून घेतलेलं गाठोडं तिनं तेवढ्यातही चाचपून घेतलं. तिच्याकडे होतं तरी काय? एक राखाडी रंगाची साडी अंगावर तर दुसरी फिकट बदामी रंगाची गाठोड्यात, तीही विरलेली. एक पेला पितळी व अल्युमिनियमची ताटली व हातात नेहेमी असलेली छोटीशी जपमाळ. ऐवज म्हणावा तर असा. गार वाऱ्यानं एक काम केलं. तिचा डोळा लागला पुन्हा तो पहाटे भजन म्हणत जाणारा जथा जवळून गेला तोपर्यंत.

पहाट झाल्याचे जाणवल्यावर ती लगबगीने उठली. तशी कुंभनगरीत रात्रंदिवस लगबग ही कुठे ना कुठे चालूच. माणसांचा अव्याहत राबता. सर्वांची पाऊले संगमाकडे जात असलेली सतत. तिनेही गाठोडं बगलेत धरत संगमाची वाट धरली. पहाटे बाहेर जरी गारवा असलातरी नदीत पाणी तसं कोमटच असतं हे लहानपणापासून ठाऊक असलेलं. गावी असलेली नदी तशी छोटीच होती पण ती नदी असो वा हा संगम पाण्याचा गुणधर्म सारखाच. त्यामुळे पहाटेचं स्नान गेल्या सात दिवसात तिने चुकवलं नव्हतं. एरवी दिवसभरात ही तिने कितीवेळा डुबकी मारली हे तिनं मोजणंच सोडून दिलेलं. साताजन्माचं पाप एका मेळ्यातच नाहिसं करायचं का? या विचाराने तिचं तिलाच हसू आलं.

आंघोळ आटपून तिनं कपाळावर पांढरं गोपीचंदन रेखाटून घेतलं. भाळीचं कुंकू सात वर्षांपूर्वीच पुसलं गेलं होतं. मग गावातल्या रीतिरिवाजानुसार गोपीचंदन जवळ केलं. खेडोपाडी असलेल्या कर्मठ प्रथा पाळल्याविना गत्यंतर नव्हतं. गावाहून आल्याला आठवडा उलटला पण सवयीनुसार कपाळावर गोपीचंदन उमटलंच.

पूर्वेला तांबडा सूर्य वर येत असताना तिनं आपसूक हात जोडून नमस्कार केला. हाताचा टेका घेत ती हलकेच उठली. आंघोळीमुळे टवटवी आलेली पण आताशाने तिच्या हालचाली मंदावत चाललेल्या. चालताना गुडघे एकमेकांवर आपटत असलेले. पाठीला जरी वाक आला नव्हता तरी संधी मिळाली की टेकून बसत असे. थोडं चालणं झालं की थांबणं आलंच. तशी कुंभनगरी डावी उजवी, पुढे मागे अवाढव्य पसरलेली. तंबू रहाट्यांची माळच माळ. त्यात अखंड धुनी लावून बसलेले साधू बैरागी. पहाटेपासूनच रहाट्यांवर लावलेले कर्णे वाजू लागायचे. कुठे अखंड नामसंकीर्तन, तर कुठे भागवत कथा, कुठे शिवमहापुराण तर कुठे उपनिषदांवर चर्चा. हे सर्व पाहण्या ऐकण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नसे. तिला केवळ नामसंकीर्तनात गोडी वाटायची. बाकीचे उपदेश डोक्यावरून जायचे.

आपल्या संथ चालीने ती कुंभनगरी न्याहाळत होती. दालबाटी, मालपुवा, मिठायांचे जेवण अखाड्यांमधून मिळून रहायचं. शिवाय यात्रेसाठी आलेले भाविक दानपुण्य कमावण्यासाठी काही ना काही पदरात टाकत असे. ती ते आनंदाने घेई. फळफळावळ, क्वचित सुकामेवा ही मिळायचा. मात्र तिने कधीही हात पसरला नव्हता वा कुणाकडे काही मागितलं नव्हतं. पैशाला तर हातच लावायचा नाही हे तिने ठरवूनच घेतलं होतं. देणारे देत होते तर ही ठामपणे नकार द्यायची. काहीजण आदराने माई म्हणून पायाही पडायचे व पैशे घेण्याचा आग्रह ही करायचे. पैसे गोळा केले असते तर सात दिवसात मालामाल झाली असती, पण नकोच ती माया! तिचं मन सांगत असे!! 

‘चलो तुम्हें थानेदारने थानेपे बुलाया है!’ खाकी वर्दीतील हवालदारने हाळी दिली तशी ती चपापली. अगदी चारच दिवसांपूर्वीच तर चौकीत जाणं झालं होतं. थानेदारने तेव्हा तू कोण, कुठली, नाव, गाव सगळं विचारलं होतं. सुरूवातीस आस्थेवाईकपणाने नंतर जरबेने, पण ती बधली नव्हती. तोंडून चकार शब्द ही काढला नव्हती. तरणाबांड थानेदार तसा सालस वाटत होता, पण त्याचे डोळ्यातून आरपार पाहणं अस्वस्थ करणारंच, पण तिनेही दाद दिली नव्हती. आज पुन्हा चौकीत पाऊल टाकलं तशी ती दचकलीच. समोर लच्छीराम, पोटचा गोळा. तिला ब्रह्मांडच आठवलं. गेला महिनाभर तो व त्याची बायको, “चल आई तुला कुंभमेळ्यात स्नानाला नेतो!” म्हणून आग्रह करत कुंभनगरीत आणलं होतं! तेव्हा किती बरं वाटलं होतं. गेली सात वर्षे हे गेल्यापासून जणू वनवासच नशिबी आला होता.. स्वतःच्या राहत्या घरात परक्यांसारखं जिणं. जीव तर तसा आयुष्यभर सर्वांनाच लावला होता. अगदी नातवंडांवर ही जीवापलिकडची माया केली होती. तीही आता मोठी झालेली. सगळ्यांना सांभाळत संसाराचा गाडा हाकला होता. तीच माणसं असं मेळ्यात आणून सोडून निघून जातील असं स्वप्नीही वाटलं नव्हतं. पहिलं स्नान घडलं तसं मुलगा सून गायब. दोन दिवस वाटलं येतील शोधत, घेऊन जातील, पण लक्षात यायला तसा वेळ लागलाच नाही. गावातही जाऊन सांगितलं असेल सर्वांना ‘मैया कुंभमें खो गयी!!’ दिवसभर रडणं झालं होतं. अश्रू नकळत सुकले गेले, डोळे कोरडेठाक. जणू कुंभ रिता होऊन राहिलेला. घरच्यां बरोबरचं नातं संपलेलं. तसं ते कधीचंच संपलं होतं. वेड्या आशेनं चिकटून होतो. आतातर ती आशा संगमात विरघळून गेलेली. आता स्वतःचं असं काहीच उरलेलं नव्हतं. सोडावं लागतं काहीतरी मेळ्यात आल्यावर! रोज समोर नागा साधू, तसेच बैरागी, नावाच्या शेवटी, आनंद, पुरी, गिरी लावून घेणारे संन्यासी हे सर्वसंगपरित्याग करून मोक्षाच्या मार्गाला लागलेले हे ती पहात आलेली.

समोर ठाणेदार, लच्छीरामची खरडपट्टी काढत असलेला. तिला आठवलं, चारच दिवसापूर्वी कुठल्यातरी यंत्रावर अंगठा दाबून घेतला होता थानेदारने व आधारकार्डावर लच्छीरामचा फोन नंबर. थानेदारने तिला खुर्चीत बसवत तिची कुंडलीच उघड केली. “नाम: गेहनाबाई, गांव: ठकराहा, जिला: चंपारण बिहार. देखो माई, कुंभमें आके मांबाप को छोडकर जाना, ये हमारे लिए नया नहीं है। हम आपके उपर सीसीटीव्ही कॅमरेसे नजर रखे हुए थे। अब आपका बेटा आपके सामने है। जाईये उसके साथ। उसे समझाया है।”

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. हातातील जपमाळ कपाळी लावली. मग निग्रहाने म्हटलं, “हा जरी माझा मुलगा असला तरी मी त्याच्याबरोबर जाणार नाही. त्याने आपली बायको व अपत्यांबरोबर सुखेनैव संसार करावा. कुंभमेळ्यात आल्यावर तर माझे भागच खुल गये. हे विश्वची माझे घर. नकोच मला ती तकलादू माया!!” 

ठाणेदार व खजील झालेला लच्छीराम अवाक् होऊन गेहनाबाईकडे पाहत होते. दूर कुठल्यातरी राहुटीतून शंखनाद होत होता.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares