मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे

ऐनवेळी गोंधळ नको म्हणून त्याने एसटीची तिकिटे आधीच आरक्षित करून ठेवली होती. अगदी तिला आवडते तसे खिडकीतले तिकीट आणि अगदी पुढची जागा. त्याने सामान वरती लावले, तिला खिडकी उघडून दिली आणि खाली उतरला. बस निघेपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आठवणीच्या वहीवर तिच्या सूचना नोंदवून घेत होता. बस स्थानकातून बाहेर पडली तशी त्याची पावले मागे वळाली.

ती तिच्या परीक्षेला गेली होती. पण खरी परीक्षा त्याचीच होती. माहेरच्या गावी परीक्षा केंद्र खालच्या सरकारने नव्हे तर वरच्या सरकारने ठरवून दिले होते. ” कधी नव्हे ते सणांव्यतिरिक्त माहेरी येणे होतेय, राहू देत की लेकीला चार दिवस “, सासूबाईंचा थेट त्याला फोन. पडत्या फळाची आज्ञा मानत, मी देखील,

“हो ना, तेवढाच मोकळा वेळ मिळेल तिला.”, असे म्हणत त्याने त्यांच्या होकारामध्ये होकार भरला.

“तुम्हाला काय जातंय होय म्हणायला, दोन लेकरं आहेत पोटाशी. त्यांचे कोण पाहणार? तुम्ही सकाळी जाणार कामावर, ते संध्याकाळी उजाडणार. आणि उजाडले तरी कोपऱ्यावर मित्र मंडळीत जाणार. माझी लेकरं राहायची उपाशी. त्यांना शाळेत सोडणार कोण – आणणार कोण, शंभर धंदे असतात माझ्यापाठी. आईला काय जातंय म्हणायला ‘ ये चार दिवस म्हणून ‘ .” तिने दांडपट्टा चालवला.

तिचे माहेरी राहणे बहुधा रद्द होते आहे पाहून तो आतून सुखावला. पण मग पट्ट्याची पट्टी झाली आणि तिही खाली उतरली. त्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही.

“आईचेही बरोबर आहे म्हणा. सणवार सोडले तर एरवी कुठे तिच्याकडे जाणे होतेय. आणि सणवार म्हणजे पाहुण्यांची उठबस. बरं घरात दुसरं बाई माणूस नाही. भावाचं  लग्न लावून दे म्हटले तर तो बसलाय तिकडे राजधानीत. आम्हाला बोलायला उसंत काही मिळत नाही. मी काही सांगेन म्हणते, ती काही सांगेन म्हणते, जरा बाबांच्या मांडीवर डोके ठेवेन म्हणते, पण कसले काय. तिकडे जाऊनही रांधा वाढा उष्टी काढा. आता जाईन तर छान गप्पा होतील. आवडी निवडीचे हक्काने मागून खाता येईल. बरे मागे मुलांचा व्यापही नाही. ते काही नाही. आई म्हणते ते बरोबरच आहे. परीक्षा झाली की, तशीच आईच्या घरी जाते आणि चांगली चार दिवस राहून येते. कळू देत मुलांनाही माझी किंमत.” … तिचा खालचा सूर कधी वरती गेला तिलाही कळाले नाही. तो मात्र चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता आत गेला.

आपल्याला इथेच ठेवून आई एकटीच माहेरी जात आहे म्हटल्यावर मुले जाम खूश. बाबा काय दिवसभर बाहेर असतो. म्हटल्यावर दिवसभर घरावर आपले साम्राज्य म्हणून मुले आनंदली. लेकीची शाळा दुपारची तर लेकाची सकाळची. दोघांनी टीव्ही, संगणक, मोबाईल व इतर खेळांच्या वेळा आपापसात वाटून घेतल्या. चार दिवस अभ्यासाला सुट्टी. पण चार दिवस बाबा सुट्टी काढून घरी थांबणार आहे कळल्यावर त्यांच्या आनंदावर विरझण पडले, अगदी मगाशी बाबांच्या आनंदावर पडले तसे. बाबांना त्यांच्या साहेबांशी बोलताना तिघांनी चोरून ऐकले होते. हो तिघांनी म्हणजे आईनेसुद्धा. तिने तर लगेच पिशवी भरायला घेतली.

“अग हो, वेळ आहे ना अजून. आधी परीक्षा मग माहेरपण. तेव्हा आधी अभ्यास मग पिशवी भरणे.” त्याने उसने अवसान आणून रागे भरले. तिचा पुढचा आठवडा माहेरपणाचे नियोजन करण्यात, तिच्या पश्चात घरात करायच्या कामांची त्याला व मुलांना सूचना देण्यात आणि मधेआधे वेळ मिळेल तसा अभ्यास करण्यात गेला. आणि शेवटी त्याच्यासाठी महाप्रलयाचा तर तिच्यासाठी महाआनंदाचा दिवस उजाडला.

गाडी सकाळचीच होती आणि तिची कालपासून तयारी सुरू होती. तिच्या डोळ्यांतले पाणी आता हे तिघे चोरून पाहात होते. हो, पुन्हा तिघेच. यावेळी बाबा त्या दोघांना सामील झाले होते. तिचा पाय निघत नव्हता. तरी बरं ती निघाली तेव्हा मुले साखरझोपेत होती. धाकट्याचं मी पण येणार हे पालूपद आठवडाभर चालूच होतं, पण तिने काही त्याला दाद दिली नाही.

तिने देवापुढे निरांजन लावले. देवाला धूप अगरबत्ती दाखवली. नमस्कार करून पिशव्या उचलायला गेली. ” सगळे  घेतलंय ना बघ एकदा.”, त्याने बाहेरूनच गाडी काढता काढता आवाज दिला. ” हं काही राहिले तरी मी माघारी थोडीच फिरतीये.” उंबरा ओलांडतानाच तिचे प्रत्युत्तर आले. ” अगं तसं नव्हे, परीक्षेचे सगळे घेतले का?”, असे मला म्हणायचे होते. त्याने सारवासारव करतच गाडी सुरू केली.

पुढे तिच्या पिशव्या आणि मागे ती अशी ओझ्याची कसरत करीत ते स्थानकावर पोहोचले. बस अजून फलाटावर लागायची होती. दोघांनी गरमागरम चहा घेतला. तसे तिचे माहेरी जाणे आता काही कौतुकाचे राहिले नव्हते. लग्नाला जेवढी वर्षे झाली नसतील त्याहीपेक्षा अधिक वेळा ती माहेरी गेलेली होती. दोन जीवांची आई झाली तशी सोबतच्या पिशव्या वाढल्या, पण जाणे कमी झाले नाही. पण यावेळी तिची कच्चीबच्ची बरोबर नव्हती आणि म्हणून जीव तुटत होता.

“अगं राहतील व्यवस्थित. आता मी चार दिवस रजा घेतली आहे ना, मग काय काळजी करतेस. आणि सोबतीला राधाक्का आहेच की. तूच तर नेहमी म्हणतेस ‘ मुले तुझी कमी आणि राधाक्काची जास्त वाटतात.’ मग कशाला काळजी करतेस. तू फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित कर आणि मग माहेरपणावर. इकडली काळजी इथेच फलाटावर सोडून दे.”, तिला बसवता बसवता त्याने धीर दिला. पण खऱ्या धीराची गरज तर त्याला होती. हे तो कोणाला सांगणार.

तिची गाडी दिसेनाशी झाली तशी त्याने गाडी काढली आणि घराची वाट धरली. गाडी लावून घराकडे वळला तशी जिन्यातच राधाक्का भेटली. ” पोरं अजून झोपली आहेत. लेकीला झोपू दे हवे तर, पण मुलाला उठवावे लागेल, नाहीतर उशीर होईल शाळेला.”, राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो, डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आसावरी… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आसावरी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत.) – इथून पुढे. 

“बरं, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा.” असं सुधाकरनं म्हटल्यावर वहिनी म्हणाल्या, “मी असं ऐकलंय की मागे तुम्ही घरोघरी पेपर टाकत होता, हे खरं आहे का?”    

सुधाकर मनातल्या मनात चरकला. तो एकेकाळी पेपर टाकत होता म्हणून या आधी एका स्थळाकडून नकार आलेला होता. सुधाकरने सांगून टाकलं, “होय, खरंय मी पेपर वाटप करीत होतो.”

आसावरी वहिनी म्हणाल्या, “खरं सांगू, तुम्हाला होकार देण्यासाठी मला एवढं एकच कारण पुरेसं वाटलं. जो माणूस श्रमाला एवढी प्रतिष्ठा देतो तो माणूस आयुष्यात कधीही मागे राहणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत देखील घट्ट पाय रोवून उभी असणारी माणसं मला आवडतात. आजचा दिवस उद्या राहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही नक्कीच प्रगती कराल याची खात्री वाटली म्हणूनच मी होकार दिला.” 

लगेच मी म्हटलं, “सुधाकर तुला आसावरी रागातील गाणी आवडतात. आता ‘आसावरी’ याच नांवाची कन्या तुझ्या आयुष्यात पत्नी म्हणून येते आहे. चला हा सुंदर योगायोग आहे.” यावर ते दोघेही हसले. 

मार्चमध्ये लग्न ठरलं आणि झालं ते डिसेंबरमध्ये. सुधाकरने तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. एकमेकांना संपूर्णपणे अनोळखी असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकदम एकत्र राहायला येणं, सहजीवन सुरू करायला लागणं हे त्याच्या हिशेबात बसत नव्हतं. एकमेकांना समजून घ्यायला, पुरेसं जाणून घ्यायला, महत्वाचं म्हणजे दोघांमध्ये भावनिक ओढ, एक भावबंध निर्माण व्हायला एवढा अवधी असणं त्याला गरजेचं वाटलं होतं. 

सुधाकरच्या आयुष्यात आसावरी वहिनी आल्या आणि त्याला पावलोपावली यश मिळू लागलं. पुण्यातल्या एका प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट फर्मकडून त्याला चांगली ऑफर आली. त्यांनी राहण्यासाठी छोटासा फ्लॅटही दिला. 

इकडे गावाकडे असलेल्या त्याच्या बहिणींच्या लग्नांच्या जबाबदाऱ्या ते जोडपे यथासांग पार पाडत होते. वहिनींकडून सुधाकरच्या कर्तृत्वगुणांना सतत प्रोत्साहन मिळत गेले. संसारवेल फुलताना दोन मुलं झाली. त्याचबरोबर आर्टिकलशीप करता करता तो एकदाचा चार्टर्ड अकौंटंट झाला आणि सुधाकर त्याच्या क्षेत्रात नावाजला जाऊ लागला. 

आजच्या कार्यक्रमाला डॉ. भीमाशंकर देखील सपत्निक आला होता. आम्ही तिघे मित्र सहकुटुंब दरवर्षी न चुकता सहलीला जात असतो. 

सौ. वहिनींच्या वाढदिवसानिमित्त घरी धार्मिक अनुष्ठान केलेले होते. मोजकेच नातेवाईक आणि मित्रांच्या समवेत तो सोहळा साजरा होत होता. सौ. वहिनींचं औक्षण झाल्यावर कुलदेवतांचे स्मरण करून उपस्थित वरिष्ठांनी त्यांच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकल्या. 

‘जन्मदिनं इदं अयि प्रिय-सखे I शन्तनोतु ते सर्वदा मुदम II प्रार्थयामहे भव शतायुषी I ईश्वर: सदा त्वां च रक्षतु II पुण्य-कर्मणा कीर्तिमर्जय I जीवनं तव भवतु सार्थकम II आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली मंगलकामना करणारी प्रार्थना वाजवली गेली. त्यावेळी वातावरणात एक वेगळीच सात्विकता भरून राहिली होती. 

ते जोडपे कुणाकडूनही कुठलीच भेटवस्तू घेत नसत. सर्वांनी मन:पूर्वक अभिष्टचिंतन केले. उपस्थितांचे तोंड गोड करण्यासाठी पेढे देण्यात आले.  

सुधाकर बोलायला उभा राहिला. “आज आसावरीचा साठावा वाढदिवस आहे. आजवर तिच्याविषयी बोलायचा कधी प्रसंग आला नाही. एवढंच सांगतो, आम्हाला परस्परांच्या विषयी खूप आदर आहे. आम्ही एकमेकांच्या मनातलं वाचू शकतो. माझ्या क्षमतेवर सदैव विश्वास दाखवत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून मी यशस्वी चार्टर्ड अकौंटंट होऊ शकलो. आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात तिची मोलाची साथ लाभली.

एवढ्या वर्षाच्या सहजीवनात ती मला कधीच सोडून राहिलेली नाही. माहेरी कधी जाऊन राहिल्याचं मला आठवत नाही कारण माझ्याबरोबर अखंड चालण्याचा तिने वसा घेतलेला होता आणि तो वसा ती अतिशय प्रेमाने निभावते आहे. 

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी आसावरीला सांगत असतो, त्याशिवाय मला राहवत नाही. एकमेकांवरचा अटळ विश्वास हेच आमच्या सहवासाच्या यशस्वीतेचं गमक आहे. मुलांच्यावर उत्तम संस्कार करीत तिने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

घर सांभाळत ती माझ्या ऑफिसचं व्यवस्थापनही सांभाळते. आमच्याकडे आर्टिकलशीपसाठी ती गरीब घरांतल्या होतकरू मुलांना निवडते. त्यांच्यासाठी घेतलेल्या फ्लॅटमध्ये त्या मुलांची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून ती काळजी घेते. आसावरीबरोबरचं माझं आयुष्य सुखात चाललं आहे.” सुधाकर आसावरी वहिनींविषयी अत्यंत समरसून बोलत होता.

समोर बसलेल्या एका युवकाने विचारलं, “साहेब, तुमची कधी भांडणं होत नाहीत का?”

सुधाकर हसत हसत म्हणाला, “भांडणं नाही पण अधूनमधून वादविवाद होतात. एखादे जोडपे, ‘आमचे कधीच वादविवाद होत नाहीत’ असं म्हणत असेल तर खुशाल समजावं की ते चक्क खोटं बोलताहेत.

दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वे एकत्र आली की कमी जास्त वादविवाद होणारच. कित्येक वेळा वादविवादातून चांगलंच फलित निष्पन्न होतं याबद्दल आम्हाला कधीच शंका नसते. त्यामुळं अशा वादविवादामधून आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं आहे. ती अजूनही पूर्वीसारखीच साधी राहते. आसावरी ‘थाट’ राग असतो हे तिला ठाऊकच नाही. 

माझे दोनच जीवलग मित्र आहेत, एक रत्नाकर आणि दुसरा भीमाशंकर, पण लग्नानंतर मला मात्र आसावरी नांवाची एक जीवलग मैत्रिण देखील लाभलेली आहे. आणखी काय हवंय?” 

कुणीतरी म्हणाले, “सर, आसावरी रागातलं एखादे हिंदी गाणे असेल तर सांगा ना.” 

सुधाकर उत्साहाने म्हणाला, “सांगायचं कशाला? आज गाऊनच दाखवतो” आणि वहिनींच्याकडे पाहत अगदी रोमॅंटिक मूडमध्ये सुधाकरने गायला सुरूवात केली, “जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. तू हाँ कर या ना कर……..” आसावरी वहिनींचा चेहरा लाजेने चूर झाला होता. 

गाणं संपताच बिस्मिलाखाँ साहेबांचे सनईचे सूर आसमंतात घुमत होते आणि उपस्थित मंडळी स्वच्छ चांदण्यांत प्रीतीभोजनाचा आस्वाद घेत होती. 

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आसावरी… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आसावरी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळीच सुधाकरचा फोन आला होता. सौ. आसावरी वहिनींच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिलेल्या स्नेह-संमेलनाला आम्हा उभयतांना आग्रहाचं आमंत्रण होतं.

‘आसावरी’ हा शब्द मी पहिल्यांदा एका ज्युकबॉक्स सेंटरमध्ये ऐकला होता. लक्ष्मी टॉकीजच्या शेजारच्या हॉटेलात नुकताच ज्युकबॉक्स बसवलेला होता. पंचवीस पैश्यात मनपसंत गाणं ऐकायला मिळायचं. 

सुधाकरची फर्माइश एका गाण्यासाठीच असायची ती म्हणजे, ‘लो आ गयी उनकी याद, वो नही आए.’ लताजींनी गायलेल्या असंख्य सुरेल गाण्यातील दो बदन या चित्रपटातलं हे एक उत्कृष्ट गाणं आहे. आम्ही वैतागून म्हणायचो, “अरे यार, दरवेळी हे दर्दभरं गाणं काय आम्हाला ऐकायला लावतोस? एखादं उडत्या चालीचं गाणं ऐकव ना.” भीमाशंकरने तक्रार केली. मग त्यानं ‘बडी बहेन’ या जुन्या चित्रपटातलं, ‘चले जाना नही नैन मिला के’ या गाण्याची फर्माइश केली.  

भीमाशंकरच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून गल्ल्यावर बसलेला गृहस्थ बोलला,  “साहेब, तुमच्या मित्राने फर्माइश केलेली ही दोन्ही गाणी ‘आसावरी’ रागातील आणि केहरवा तालातील आहेत बरं कां. त्यांची संगीतातली जाण चांगली दिसतेय.” 

आम्ही आपलं “हो कां?” म्हणून गप्प बसलो. आमचे कानसेन मित्र सुधाकर मात्र डोळे मिटून ‘आसावरी’ रागाचा आस्वाद घेत होते. 

अभ्यासाला, सिनेमाला, फार कशाला संध्याकाळी फिरायला जाताना देखील आम्ही तिघेच असायचो. सुधाकर, मी म्हणजे रत्नाकर आणि भीमाशंकर असं आमचं त्रिकूट होतं. आमच्या त्रिकुटाला बाकीचे मित्र ‘सु-र-भी’ म्हणायचे. त्या गोष्टीला जवळपास पन्नास एक वर्ष झाली असतील.

सुधाकरच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाहेर गेलो की चहापाण्याचा, सिनेमाचा खर्च मी किंवा भीमाशंकरच करीत असू. “पचीस पैसे भी बडी चीज होती है बाबू” असं तो म्हणायचा.

आठवड्याच्या मंगळवार बाजारात जाऊन तो पंचवीस पैश्याला एक या भावाने जुनी इंग्रजी मासिके खरेदी करायचा. त्यातून स्वत:ची शब्दसंपदा वाढवत राहायचा अन त्यात वाचलेली छानशी माहिती आम्हाला सांगत राहायचा. रात्री आमच्याबरोबर बसून तो अभ्यास करायचा. आम्ही गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजता उठून तो पेपरलाईनवर जायचा. सायकल दामटत दीड दोनशे घरात वृत्तपत्रे टाकून साडेसात वाजता गडी परत यायचा. एक मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र स्वत:साठी ठेवायचा. 

आम्ही चेष्टेत म्हणायचो. “एक तर मराठी पेपर वाच किंवा इंग्रजी तरी वाच. बातम्या त्याच असतात ना? इंग्रजीच्या किचकट बातम्या वाचायला नकोशा वाटतात.” 

सुधाकर म्हणायचा, “लेको, आधी मराठी पेपरातल्या बातम्या वाचा. मग इंग्रजी पेपरातल्या बातम्या वाचताना किती सोप्या वाटतात ते बघा. हा मराठी पेपर घरच्यांसाठी आहे.” असं म्हणत त्याने त्याच्या दफ्तरमधून एक लांबडीशी वही काढली आणि म्हणाला, “आता मी डायरेक्ट इंग्रजी पेपर वाचतो. इंग्रजी पेपरातला कुठलाही शब्द अडला की ते संपूर्ण वाक्यच काढून या वहीत लिहायला लागलो. त्यातल्या अवघड शब्दाला अधोरेखित करून त्याचा नेमका अर्थ डिक्शनरीत पाहून बाजूला मराठीत लिहित राहिलो. 

किती मोठा संपादक असला म्हणून काय झालं, तो आपल्या सात आठशे शब्दांच्या वर्तुळातच फिरत असतो. महिन्यानंतर लक्षात आलं की संपादकांचा नवीन शब्दांचा ओघ संपलेला आहे. मग इंग्रजी पेपर सुगम मराठीसारखा होऊन गेला. आहे काय, नाही काय?” सुधाकर आम्हा दोघांच्यासाठी इंग्रजीचा ‘सुधारक’ ठरला हे आम्हा दोघांना मान्य करावंच लागेल. 

इंटरसायन्स नंतर इंजिनियरिंगसाठी म्हणून मी सांगलीला गेलो आणि भीमाशंकर मेडिकलसाठी हुबळीला गेला. आमच्या आग्रहाखातर सायन्सला अ‍ॅडमिशन घेतलेल्या सुधाकरला सायन्सचा खर्च झेपणे अवघड चालले होते. इंटरसायन्सला असतानाच तो नोकरी शोधत राहिला. लेखी परीक्षा व इंटरव्यू या दिव्यातून पार पडल्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत क्लार्क म्हणून रूजू झाला. कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेतल्याने त्याला पेपरलाईन सोडावी लागली. सकाळी कॉलेजच्या पहिल्या तीन तासांना हजेरी लावून तो कंपनीचं ऑफिस गाठायचा. 

जात्याच हुशार असल्याने सुधाकर प्रथम श्रेणी मिळवून बी. कॉम झाला. कंपनीच्या अकाउंट्स खात्यात त्याला प्रमोशनही मिळालं. दोनशे सत्तर रूपयावरून त्याचा पगार चारशेपर्यंत वाढला. 

सुट्ट्या पडल्या अन गावात आलो की सुधाकरबरोबर आमचे नेहमीप्रमाणे फिरणे असायचे. आता मात्र सुधाकर आम्हाला खिशात हात घालू द्यायचा नाही. 

सुधाकरच्या घरच्यांनी वधू संशोधन सुरू केलं. कमी शिकलेल्या मुली सांगून येत होत्या. मुलगी किमान मॅट्रिक पास झालेली तरी हवी ही सुधाकरची अपेक्षा चुकीची नव्हती.

त्याच दरम्यान आसावरी वहिनींचं स्थळ सांगून आलं. त्या चक्क पदवीधर होत्या. चहा पोह्यांच्या सर्व सोपस्कारानंतर त्यांच्याकडून होकार आला. अंतिम निर्णय घ्यायच्या अगोदर सुधाकरला परत एकदा नियोजित वधूशी बोलायचं होतं. मध्यस्थांकरवी कळवून मी आणि सुधाकर त्यांच्या घरी गेलो. 

आसावरी वहिनी आमच्या समोरच बसल्या होत्या. काही वेळ असाच गेला. मग सुधाकरनं हळूच विचारलं, “कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् । बांधवाः कुलमिच्छंति मिष्टान्नमितरे जनाः ॥”  हा श्लोक ऐकला आहे काय?”

वहिनींनी माहीत नसल्याचं सांगितलं. 

शाळेत असताना सुधाकर संस्कृत टॉपरच होता. त्याने अर्थ सांगितला – कन्येला वराचे रूप पाहिजे असते, मातेला धन व पित्याला त्याची विद्या हवी असते; बांधव कुल पाहतात.  इतर लोकांना मात्र नुसते मिष्टान्न पाहिजे असते. बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘वऱ्हाड…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘वऱ्हाड…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

लालजी शेतकरी आहे. शिकलेले नाहीत पण समजदार व्यक्ती आहेत .धार्मिक वृत्तीचे लालजी संतुष्ट व्यक्ती आहेत. बालपणापासून त्यांची एक सवय आहे. जवळपास दररोज गावातील आठ दहा मंदिरांतील कोणत्याही एका मंदिराची साफ सफाई ते जरूर करतात….. लालजींच्या चेहऱ्यावर सदा स्वस्थ आणि तरुण हास्य असे विलसत असते, जसे त्या हास्याने अमृत प्राशन केलेले आहे.

आईच्या आशिर्वादापासून बालपणापासूनच वंचित असलेल्या लालजींना वडिलांचा आशीर्वाद अजूनही प्राप्त होत आहे. बालपणापासूनच त्यांचा आवाज नाही, थोड़ी ऐकण्याची क्षमताही कमजोर आहे. परंतु पत्नी वर ते खूप प्रेम करतात. असे ही.… भावना या शब्दांच्या अधीन नसतात. लालजींना नन्हकी देवीच्या रूपात खूपच सुंदर पत्नी मिळाली आहे. बहुतकरून ज्या कुटुंबात स्त्रिया नसतात, त्या कुटुंबात आलेली नवी सून घरातील सत्ता लवकरच आपल्या हातात घेते. पण नन्हकी देवीचे वागणे  याच्या एकदम उलट होते. बहुतेक तिची इच्छा असेल, आपल्या मूक बधिर पतीच्या अधीन राहण्याची, की आपल्या पतीला असे वाटायला नको की या स्रीने मूक बधीर पुरुषाचा पतीच्या रूपात स्वीकार करुन उपकार केला आहे. संतुष्ट स्वभावाच्या लालजींना सत्ता, अधिकाराशी काही  घेणेदेणे नव्हते…… या दोघांचे आपसातील प्रेम व समर्पणाचा  भाव यात घराची सत्ता ठोकर खात लालजींच्या वडिलांजवळच पडून राहिली होती. 

लालजींना दोन मुलं झाली. जसे मोठा मुलगा मंटूने तारुण्यात पदार्पण केले, तसे लगेच त्याचे लग्न करून लालजीने घराचा कारभार मुलगा व सूनेच्या हातात देऊन टाकला. मुलंही आपल्या बापावरच गेली होती. सर्व काही छान चालले होते. लालजींचे कुटुंब आजच्या काळात एक आदर्श कुटुंब होते. मंदिरात झाडू मारणाऱ्या लालजींच्या घराची सफाई करण्याचे काम ईश्वराकडे सोपवलेले होते. लालूच, द्वेष, छळ, कपट यांसारखा कचरा लालजींच्या घराच्या आसपासही फिरकत नव्हता.

जेव्हा लालजींच्या वयस्कर वडीलांवर पक्षवाताने हलकासा आघात केला, तेव्हा त्यांना स्वतः चालण्या फिरण्याला त्रास होऊ लागला. असेही ते खूपच म्हातारे झाले होते. आता लालजींचा दिनक्रम बदलला होता. आपल्या वडिलांच्या सेवेला त्यांनी आता आपल्या दिनचर्येत प्राधान्य दिले होते. शेती मोठा मुलगा आधीपासून सांभाळत होताच. त्याचे वागणेच असे होते की लवकरच तो मंटू ऐवजी “मंटू भाऊ” झाला होता. 

छोटा मुलगा बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होता. त्याच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपापल्या हिश्श्याचा त्याग केला होता. भावाने आपला घाम दिला तर वहिनीने आपले दागिने मोडले. नन्हकी देवीने आयुष्यभराचे सारे आशिर्वाद एकत्र करून लहान मुलावर ओवाळून टाकले होते. लालजी काय देऊ शकतील, नेहमीप्रमाणे मंदिरा-मंदिरांत जायचे आणि आता देवांकडे काही वेळ बघतच रहायचे. मुक्या तोंडाने काय बोलणार….? पण म्हणतात ना !! आज मिळेल किंवा कदाचित उद्या मिळेल, पण प्रत्येक पूजेचे फळ जरूर मिळेल.

देवांनी या मुक्या तोंडाच्या आवाजाचा मान राखला. हेमंत उर्फ हेमूने सरकारी इंजीनियरची नोकरी मिळवण्यात यश प्राप्त केले. मंटूभाऊची छाती अजून फुगली. लालजींचे संतुष्ट हास्य अजून विस्तारले. 

आता छोट्या भावाला लवकरात लवकर विवाहबंधनात अडकवावे अशी मंटू सिंगची इच्छा होती. बोली लावली जावू लागली. अचानक मंटू सिंगचे खूप सारे दोस्त, नातेवाईक पैदा झाले. लालजीच्या क्षमतेला तोलले जावू लागले. 

वहिनीने एक फोटो बघून मुलीला बघण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही कुटुंबे भेटली. नन्हकी देवी ला मुलीचे काही शोधणारे, भिरभिरणारे डोळे आवडले. वहिनीचे मन  इतक्या शिकल्या सवरलेल्या मुलीने तिला वाकून पाया पडून नमस्कार करण्याने जिंकून घेतले. मुलीला तिचे नाव विचारले गेले, मुलगी काही बोलू शकली नाही. शोधक नजरेने लालजींकडे बघत राहिली. ‌अगदी तसेच…. जसे लालजी मंदिरातील मूर्तींना बघत रहात होते. त्रासाने त्रासाला ओळखले. लालजी जीवनात पहिल्यांदा बोटाने इशारा करत “आँ आँ” म्हणत ओरडत काही मागत होते – ” हीच सून पाहिजे !!! हीच पाहिजे !!!”

आणि अचानक तेथे खूपच गुढ शांतता पसरली. मुलगी आपल्या वाहत्या डोळ्यांनी, शोधक नजरेने लालजींना एकटक बघत होती. लालजी कधी मंटू तर कधी हेमूकडे खूपच विवश व लालूच भरल्या नजरेने  एकटक बघत होते. दोन्ही बाजूंचे कुटुंबीय हेमंतकडे बघत होते. 

हेमंत हातवारे करत म्हणाला – ” मी काय …..माझा आवाका तरी काय?? त्यांची मागणी प्रत्यक्ष इंद्रानेही नाकारली, तर मी त्याच्याशी भिडेन !!! ते वडिल आहेत माझे !! पण एकदा मुलीला तर विचारा.” 

मुलीला इशारे करून विचारण्यात आले तर ती उठून पुढे आली आणि तिने लालजींचे पाय पकडले. लालजींनी दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले. गूढ शांततेला एक आनंदी चित्कार भेदून गेला. 

सर्वच्या सर्व अति उत्साहात होते. मुलीच्या शोधक नजरेत आता संतुष्टीचा भाव होता. शोध पूर्ण झाला. डोळ्यांतील अश्रूंची धार वाहू लागली.  रितीरिवाजाप्रमाणे हुंडा देण्याघेण्याचा विषय निघाला. मुलीच्या दोन्ही भावांनी मंटू सिंहच्या समोर हात जोडले – ” तुम्ही काहीच मागू नका. वडील खूप संपत्ती मागे सोडून गेले आहेत. आम्ही तुमच्या अपेक्षेच्या चारपट देवू. यासाठी नाही की तुम्ही आमच्या मुकबधीर बहिणीला स्विकारले !!! यासाठीही नाही की तुमचा भाऊ सरकारी इंजीनियर आहे !! पण यासाठी की असे कुटुंब आम्ही न बघितले….न ऐकले आहे‌.” 

वरातीची तयारी जोरात सुरू होती. मंटू भाऊ आपल्या लग्नात ज्या इच्छा अपूऱ्या राहिल्या होत्या त्या भावाच्या लग्नात पूर्ण करू पहात होता त्यामुळे खूपच व्यस्त होता.  पण एक दिवस हेमू घरातील सर्वांसमोर मोठ्या आवाजात आपल्या मोठ्या भावाला बोलला– ” दादा !!! प्रत्येक गोष्टीत तुमची दादागिरी नाही चालणार.”

सर्वांना एकदम धक्का बसला. मंटू जेथे होता तेथेच थांबला. हेमू पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावाशी मोठ्या आवाजात बोलला होता.

मंटूने हबकून विचारले- ” वेडा झालास का?? काय बोलत आहेस ?” 

भावाच्या दटावण्याने आतल्या आत थरकापला हेमंत. पण पुन्हा हिम्मत करुन बोलला – ” वेडा नाही आहे दादा !!! लग्न माझे आहे, माझ्याही काही इच्छा आहेत.” 

” काय हवे आहे तुला ? ” 

” नवरीसाठी जे पण दागिने बनवत आहात, ते भले थोडे कमी बनवा…. पण प्रत्येक दागिन्यांचे दोन सेट बनवा…. एक तिला आणि एक वहिनीसाठी पण !! ” – हेमंत आपल्या वहिनीच्या सुन्या गळ्याकडे पहात बोलला.

मुलाचं बोलणं ऐकून  नन्हकी देवीचे मन गर्वाने प्रफुल्लित झाले. वहिनी भावूक झाली. मंटू बडबडत , मानेला झटका देत तेथून निघून गेला – ” वेडा कुठला.”

हेमंत व्हाट्सएप वर आपल्या होणाऱ्या नवरीला मेसेज टाइप करु लागला – ” तुझी इच्छा पूर्ण झाली.”  इंजीनियरने एकदाचे तोंड उघडले आणि ते बंदच करू शकला नाही. 

” हेमूसाठी फॉर्च्यूनर ठरवून दिली आहे, पप्पांसाठी बोलेरो केली आहे,” – मंटू सिंह घरात सांगत होता.

” पप्पांसाठी पण फॉर्च्यूनरच ठरवा दादा ” – हेमंतने आपली इच्छा जाहीर केली.

” का?? “

” ते वडील आहेत माझे ” – हेमंत गर्वाने बोलला.

” बाबा आणि पप्पांसाठी धोतर आणि शर्ट शिवायला दिला आहे.” 

” माझ्या आणि तुमच्यासाठी ?? “

” कोट पॅंट चे माप दिले आहे ना !! “

” पप्पांसाठी पण कोट पॅंट घ्या ना दादा ” – हेमंत मोठ्या भावाची मनधरणी करत बोलला.

” वेडा आहेस का?? ” 

” वडील आहेत ते माझे !!” – इंजीनियर गर्वाने बोलला.

नन्हकी देवीने डोक्याला हात लावला, म्हातारपणी बापाला कोट पॅंट घालायला लावणार?? वहिनी हसत राहिली, पण मंटू सिंह ‘हो’ म्हणत घरातून गेला.

सर्व तयारी झाली होती. आजोबा प्रकृतीमुळे लग्नाला जायला असमर्थ होते. त्यांची काळजी घ्यायला एक माणूस घरी ठेवला होता. लालजी कोट पॅंट घालून मुलाच्या लग्नात मिरवतील हा साऱ्या गावात चर्चेचा विषय होता.  व-हाड निघायची वेळ झाली. सर्व लोक व्यवस्थित गाडीत बसले की नाही हे बघण्यासाठी मंटू स्वतः गाडीमध्ये बघत फिरत होता. त्याला पप्पा कुठे दिसत नव्हते. दोन चार लोकांना विचारले – कुणालाच काही माहित नव्हते. सर्व लोक कुजबुज करू लागले. सगळे व-हाडी घाबरून एक दूसऱ्याला विचारू लागले. लालजींना शोधू लागले. 

अचानक काहींची नजर घराकडे वळली. बघून सर्वांना आश्चर्य वाटले. सगळे आपल्या आसपासच्या लोकांना इशारा करत घराकडे बघायला सांगू लागले. सर्व व-हाडी डोळे फाडून घराकडे बघत होते. मंटू सिंह ने घराकडे बघितले आणि डोके धरून खालीच बसला.—

—  घरातून लालजी निघाले. आपल्या खांद्यावर आपल्या वृद्ध बापाचा हात ठेवत, त्यांना सांभाळत, अडखळत ते गाड़ीकडे येत होते. स्वतः साठी शिवलेला कोट पॅन्ट आपल्या म्हाताऱ्या वडिलांना घालून त्यांच्यासाठी घेतलेले धोतर कुडता त्यांनी स्वतः घातला होता !!!  नजर वर करत गावकऱ्यांकडे बघत, ते म्हणत होते – ” हे वडील आहेत माझे !!!”

मंटू सिंहने पळत जात आजोबांच्या दुसऱ्या खांद्याला आधार दिला.

हिंदी लेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.) ‘‘खूप धक्का बसला ना तुला? आठ दिवस बेशुध्द होतीस अस समजलं’’ अभय म्हणाला. ‘‘धक्का बसणारचं, आमची मैत्री होती तशीच ! कोल्हापूरात असताना सतत दोघी बरोबर असायचो. वर्गात शिक्षक ‘‘त्या दोघी’’ कुठे गेल्या असे विचारायचे.’

‘‘खरंच अशी मैत्री विरळाच आजकाल’’ अभय म्हणाला.

‘‘स्मितू गेली म्हणजे माझ्या शरीराचा अर्धा भाग लुळा पडला असच मला वाटतं. त्या शेवटच्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. मला कल्पना न देता. तणावाखाली होती. खूप दिवसांनी मी तिच्या केसांना तेल लावलं. केस विंचरुन दिले. मग तिने गरम पाण्याची आंघोळ केली. आम्ही जेवलो आणि मी तिला थोपटून थोपटून झोपवलं. कोल्हापूरात असताना झोपवायची तशी. सुलभा जुन्या आठवणीत रमली.

‘‘तिच्या सर्व विमा पॉलिसीज, म्युच्युअल फंड, शेअर्स ही सर्व गुंतवणूक किती आहे ? तसेच नॉमिनीवगैरे बरोबर आहे ना याची तिने खात्री करुन घेतली. तिच्या पॉलिसीज बघून मी तिला म्हटलं – अग हे पैसे तुला नाही, तुझ्या वारसांना मिळणार। मला काय कल्पना त्या पॉलिसीज एवढ्यात ड्यू होतील. अभय, तेजू स्मितू गेली पण तुम्हाला कोट्याधिश बनवून गेली. या तुमच्या पॉलिसीज, फंड डिटेल्स, शेअर्स तुमच्या ताब्यात घ्या आणि मला मोकळं करा. एवढ्यासाठीच मी आले होते.

तेजश्री – मावशी खरं आम्हाला नको हे पैसे, आईच्या बँकेतून मिळणारा फंड खूप झाला आमच्यासाठी, आम्ही पैसे मिळवू. एवढे दिवस ऐतखाऊ सारखं जगलो आता स्वाभिमानाने जगू.’

अभय – जो पर्यंत ती व्यक्ती आजूबाजूला असते, तो पर्यंत तिची किंमत नसते. स्मिता गेली तेव्हा लक्षात आलं, आम्ही खर्‍या अर्थाने अनाथ झालो. आम्ही तिला गृहित धरले. ती नोकरी करणार, घरातले सामान आणणार, जेवण बनवणार, कपडे ईस्त्रीला पाठवणार, गुंतवणूक करणार. सुलभा हे सर्व आम्हाला नकोच. स्मिता म्हणत होती कोल्हापूरातल्या शाळेची इमारत पडायला आलीय. त्यासाठी पैसे जमवणं सुरु आहे. हे पैसे त्यासाठी वापरुया.

सुलभा – कोल्हापूरच्या शाळेसाठी पैसे जमवणे सुरु आहे हे खरे, पण ती जबाबदारी दोन हजार माजी विद्यार्थ्यांनी घेतलीय. त्यात पाहिजे तर या पैशातील पाच लाख देऊया. पण बाकी पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. कारण तिची तशी इच्छा होती.

तेजश्री – मावशी आई गेल्यानंतर मामा-मामी आले होते. खूप रडला गं श्यामू मामा. त्याची लाडकी ताई ना गं ती! मावशी, मामाचे कोल्हापूरातील घर तीन-चार पिढ्यांचे जुने. मी मागे पाहिले तेव्हा फार जीर्ण झाले होते. आईची इच्छा होती मामाला घर बांधून द्यायचं. त्याची घर बांधण्याची परिस्थिती नाही. मला वाटते की, आईच्याच पैशातून मामाला घर बांधून देऊ. मजबूत, पुढिल तीन पिढ्यांनी काळजी करता कामा नये असे मजबूत.

सुलभा – स्मितू माझ्याशीपण हे बोलली होती. खरंच चांगली कल्पना आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना, भावांना मदत करायलाच हवी. तुझ्या श्यामू मामाला गरज आहे. मला वाटतं यातून पन्नास लाख रुपयात ते घर बांधता येईल. आणि वर दोन ब्लॉक्स बांधले तर त्याचे भाडे मामाला मिळेल.

तेजश्री – पण मावशी या सर्व पैशांच्या देवीघेवी तुलाच करायला हव्यात. तुला एकदम यातून मोकळं होता येणार नाही. आम्ही फक्त सह्या करायला येणार.

सुलभा – हो, ग हो. माझं पिल्लू ते! तुला सोडून कशी जाईन मी ?

अभय – सुलभा, तुझ्या मनात एक विचारायचं असेल तेजूचं लग्न ? ते तुला तेजूच सांगेल. तेजश्री – मावशी आईची बँकेत मैत्रीण होती कल्पना, आईची इच्छा होती कल्पनाचा मुलगा विराज याच्याशी माझं लग्न व्हाव, तो चांगला सीए आहे. आणि वडिलांच्या फर्ममध्ये काम करतोय. पण माझ्या डोक्यात खुळ भरलं होतं. मी वेळीच सावरले पण आईच्या अपघाताचे मोल देऊन. विराजशी लग्न ठरते आहे माझे. तेजश्री रडत रडत सांगत होती.

सुलभा – रडू नकोस तेजू, ती असताना हे सर्व झाले असते तर ती समाधानी झाली असती. तिच्या डोक्यातील वादळे कमी झाली असती. पण….

अभय – आणि सुलभा लग्न फक्त वीस पंचवीस जवळच्या लोकांमध्येच आणि ते पण सहा महिन्यानंतर लग्न करायचं आहे. तो पर्यंत आम्हाला पण सावरु दे. आणि कन्यादान तुला आणि राजनला करायचं आहे. नाही म्हणून नकोस. स्मिताला असेल तिथून समाधान वाटेल.

‘‘ठिक आहे’’ सुलभा डोळे पुसत म्हणाली. मी आले होते तुमचे सर्व व्यवहार तुमच्या हाती देऊन त्यातून मोकळी होण्यासाठी पण तुम्ही दोघांनी मला पुन्हा अडकवलंत याच्यात. पण तिच्यासाठी हे मला करावचं लागेल. कारण आमची जोडी होतीच तशी..

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन:शांती… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मन:शांती… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“काहीतरी कमी करा आणि कढीपत्ता द्या. त्याचे पैसे देणार नाही.”

“माउली, तुमच्याकडून कशाला जास्त घेईन? दोनशे वीस झाले.दोनशे द्या.”

म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बोलले की आपसूक हात पर्समध्ये गेला. पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला.

बॉसचा फोन.

“येस सर.”

“मेल चेक कर, दहा मिनटात रिप्लाय दे. इट्स अर्जंट.” फोन कट झाला.

बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाले.

“माउली, अवो ताई,”

म्हातारबा हाका मारत आहेत, असं वाटलं. पण मी लक्ष दिलं नाही. अर्जंट मेलच्या नादात घरी पोहोचले अन लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले.

तासाभराने काम संपलं . टेन्शन कमी झालं. कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी ठेवायची आहे. सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरवात केली. म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता. चक्क कढीपत्ता फुकट दिला होता. रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली, तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या. नोटा पाहून डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो आहोत.

 “अय्योsssss ”मी जोरात किंचाळले.

“काय गं,काय झालं?” घाबरून नवऱ्यानं विचारलं.

सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला,

“बरंय की मग.भाजी फुकट मिळाली…”

“काहीही काय!”

“म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगले वागले आणि मी पैसे न देताच…

माझ्याविषयी ते काय विचार करत असतील?”

“हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस.”

 “त्यांचं विनाकारण नुकसान झालं हो..”

“पण तू मुद्दाम केलं नाहीस ना.”

“हो. तरी पण नुकसान ते नुकसानच.”

“मग आता काय करणार ???”

“मी जाऊन पैसे देऊन येते.”

“अग…बाहेर मुसळधार चालूये. उद्या सकाळी दे…”

“अरे पण…

मनाला चुटपूट लागलीय. म्हातारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं. मी अशी का वागले?डफर…”

“तू ओव्हर रिऍक्ट करतेस.

एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही.”

नवरा वैतागला.

“मला खूप अपराधी वाटतंय.

म्हातारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही.”

“मग चेहरा पाडून दु:ख व्यक्त करत बस. मला काम आहे.”

कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला.

माझी अवस्थता वाढली. ‘शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात. नावालाच चांगल्या घरातली.बाकी …..’.असं म्हणत भाजीवाले बाबा शिव्या हासडतायेत असं वाटायला लागलं.

नको त्या विचारांचे डोक्यात थैमान सुरु झालं. कामात लक्ष लागेना. झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली.

तडक जाऊन पैसे देऊन यावे असा विचार आला. पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटले नाहीत.

निराश होऊन घरी परतले. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं. काही बोलला नाही, पण खवटपणे हसला.

नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला. दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली कामं आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसले नाहीत. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी माहिती नव्हती. प्रचंड निराश झाले.अपराधी भाव प्रचंड वाढला. त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरु झाली.

“बास आता,अति होतंय”

नवरा डाफरला.

“तुला माहितीय. म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.”

“तू प्रयत्न केलेस ना. थोडी वाट पहा. जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे.

आपल्याला पैसे बुडवायचे नाहीत.”

“आता आठ दिवस लॉकडाऊन आहे”

“म्हणजे दोनशे रुपयांचे भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही.”नवऱ्यानं चिडवलं, तेव्हा मला सुद्धा हसायला आलं.

लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात, तिथं रोज जात होते. पण एकदाही बाबा भेटले नाहीत.

 म्हातारबांविषयी सारखी चौकशी करत असल्याने तिथले भाजीवाले ओळखायला लागले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्याने म्हातारबांच्या भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितले.

“दादा, मला तुमच्या आजोबांना भेटायचे आहे.”

नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं,

“कशासाठी ?काय काम आहे ?”

“कुठं भेटतील ?”

“आज्याची तब्येत बरी नायी. घरीच हाय. ते आता गाडीवर येणार न्हाईत.”

“मला त्यांना भेटायचंय. पत्ता देता, प्लीज.”

नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला.

“माज्याकडे द्या. आज्याला देतो.”

“नाही. मला बाबांनाच भेटायचंय. त्यांची माफी मागायचीय.”

त्याने घरचा पत्ता दिला.

ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले. एकाला एक लागून असलेली घरे आणि त्यांच्यामधेच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता. अरुंद बोळ, उघडी गटारं, धो धो वाहणारे नळ, तिथंच कपडे धुणाऱ्या बायका, खेळण्यात हरवलेली लहान मुलं…अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो. अलीबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळंच जग होते.

अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एकदाचं घर सापडलं.

“आजोबा आहेत का?”

दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं ?

त्यांनी हाका मारल्यावर म्हातारबा बाहेर आले.

“आजोबा, ओळखलं का ?”

चटकन डोळ्यात पाणी आलं. “वाईच थांबा.चष्मा आणतो.”

म्हातारबा चष्मा घालून आले. मी तोंडावरचा मास्क बाजूला केला.

“आ…,माउली..,तुमी इथं?आत या.”

म्हातारबांचे आदरातिथ्य पाहून आम्ही दोघंही भारावलो.

घरी आलेल्यांचे मनापासून स्वागत होणं,हे आजकाल दुर्मिळ झालंय.

“बाबा,पुन्हा येईन. आज जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले होते.”

“कसले पैसे?”

“भाजीचे. त्या दिवशी गडबडीत…..”

दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला, तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले.

“माफ करा. चुकून झालं.”

मी हात जोडले.

“अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती.”

“कशावरून??”

“माणूस चांगला की लबाड, हे माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं.”

“ताई, पैशासाठी यवडी इतवर आलात तवा घोटभर च्या तरी घ्याच.”

आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही. चहा घेऊन निघताना….

“बाबा, पुन्हा सॉरी…..”

मी वाकून नमस्कार केला. तेव्हा म्हातारबांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला.

“हॅप्पी ?” घरी जाताना नवऱ्याने विचारलं…

तेव्हा मी मान डोलावली.

“पैसे दिले नसते तरी चाललं असतं.बाबा तर साफ विसरले होते.”

“ते विसरले होते. पण मी नाही. त्या चुकीची सल मला त्रास देत होती.”

“काय मिळवलं एवढं सगळं करून??”

“ मनःशांती…!”

मोजता येणार नाही असं समाधान मिळालं. ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही तर स्वतःसाठी केली.

माझ्यातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठीच हा सगळा आटापिटा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पहिले – कुणीतरी स्मिताचा मृतदेह बाजूच्या पोलीसांच्या खोलीत असल्याचे राजनला सांगितले. राजन सुलभाच्या हाताला धरून त्या खोलीत गेला. संपूर्ण झाकलेला तो देह आणि बाजूला बसलेले अभय, तेजश्रीला पाहून सुलभा ‘‘स्मिते’’ म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुध्द झाली. आता इथून पुढे – )

आठ दिवसानंतर….

गेले आठ दिवस सुलभा पार्ल्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होती. गेल्या आठ दिवसात तिने अन्नाचा कण पोटात घेतला नव्हता. सलाईनमधून थोडंफार व्हिटामिन जात होतं तेवढंच. तिच्या अवतीभवती राजन, त्यांची मुलगी विनया, जावई बिपीन उभे होते. एक नर्स खास सुलभासाठी बाजूलाच होती. सुलभाला थोडावेळ शुध्द येत होती सर्वांकडे पाहता पाहता तिचे डोळे भरुन येत होते आणि ओठातून स्मितू, स्मितू असे हलकेच शब्द बाहेर पडत होते. विनया तिच्या तोंडात दूध घालू पाहते पण ती हाताने चमचा दूर लोटत होती. सर्वजण मोठ्या काळजीत होते. डॉक्टर्स म्हणत होते काहीतरी करा आणि त्यांच्या पोटात दूध, अन्न जाऊ द्या. विनयाने ठरविले आता गप्प बसून चालणार नाही. दुपारी बारा वाजता सुलभाने डोळे उघडले, ती आजूबाजूला बघत होती. पुन्हा तिचा चेहरा रडवेला झाला. तेव्हा विनया आईला म्हणाली –

‘‘आई, स्मितू मावशी गेली ती परत येणार नाही पण तुझं काय चाल्लयं ? तुला बाबांचा विचार आहे ना ? तू जगली नाहीस तर बाबांनी काय करायचं ? मला माझी नोकरी आहे, संसार आहे, त्यांना तुझ्याशिवाय कोण आहे? तू गेल्यावर त्यांनी पण विष घ्यायचं का ?’’

विनयाचं हे बोलण ऐकून सुलभा गप्प झाली. हळूच तिने नवर्‍याकडे पाहिलं. अर्ध्या तासाने तिने विनयाकडे दूध मागितलं. थोड्यावेळाने मोसंबी रस घेतला. दुसर्‍या दिवसापासून सुलभा सावरली. थोड थोड खाऊ लागली.

पंधरा दिवसानंतर विनया आईला म्हणाली, -‘‘आई स्मिता मावशीचे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड डिटेल्स तुझ्याकडे असेल ना?’’

‘‘हो, तिच्या नोकरीतले फंड वगैरे सोडून, सर्व गुंतवणूक माझ्याकडेच आहे. खरं तर त्या दिवशी तिने आपली सर्व गुंतवणूक, इन्शुरन्स वगैरे पाहिलं, त्यावरील वारस वगैरे पाहिलं. मी तिला म्हटलं होत, ही विमा रक्कम तुझ्या पश्चात तुझ्या वारसांना मिळणार पण एवढ्यात नाही. पण मला काय माहित तिने एवढी कोटीच्यावर रक्कम नवर्‍याला, मुलीला ठेवून ती गेली. मी तिला म्हणत होते अग सर्वच पॉलिसी तुझ्या नावावर कशाला? ती म्हणायची, मला माझी खात्री वाटत नाही. मला काय माहित एवढ्यात स्मितू जाईल म्हणून.’’

‘‘ते जाऊदे आई, एकदा जाऊन आणि अभय काकाला आणि तेजूला भेटून त्यांच्या सर्व पॉलिसीज, फंड वगैरे देऊन येऊ या.’’

‘‘नाही तरी ती मंडळी त्याचीच वाट पाहत असतील. काही काम ना धंदा. आता या पैशावर मजा करा म्हणावं.’’

‘‘आई, दोघही तुझी चौकशी करत असतात.’’

‘‘या पैशासाठी करत असतील. तिच्याबद्दल कुठलं आलयं त्यांना प्रेम?’’

‘‘आई असं बोलू नकोस. शेवटी अभय काका तिचा नवरा होता आणि तेजश्रीला तिने जन्म दिला होता.’’

‘‘हो ग हो मला माहिती आहे म्हणूनच मी गप्प आहे. नाही तर….’’

‘‘आई, मी अभय काकाला विचारते मग आपण जाऊया.’’

‘‘पण विनया स्मितूनंतर त्या घराच काय झालं असेल ते मला पाहावणार नाही. ती नोकरी सांभाळून घरदार व्यवस्थित ठेवायची, यांना जमणार आहे का ते?’’

‘‘जर घर व्यवस्थित नसेल ना तर आपण दोघी त्यांच घर लावून देऊ. पण आता जायलाच हवं.’’

दोन दिवसांनी विनया आणि सुलभा गोरेगांवला स्मिताच्या घरी गेल्या. सुलभा मनात म्हणत होती, स्मितू नंतर घर अस्ताव्यस्त पडलं असेल, कचरा तरी काढतात की नाही कोण जाणे? खरं तर या दोघांची तोंड पाहू नयेत असं वाटतं, पण एकदा स्मिताची गुंतवणूक त्यांच्या ताब्यात द्यायची आणि संबंध संपवायचा.

दोन मजले चढून ती दोघं वर पोहोचली. तेजश्री वाटच पाहत होती. सुलभाने आत पाऊल टाकताच पहिल्यांदा स्मितूचा मोठ्ठा फोटो हार घातलेला दिसत होता. ती फोटोतली स्मितू हसत होती. कदाचित लग्नातील फोटो इनलार्ज केला असावा. सुलभाने हॉलमध्ये नजर टाकली सर्व काही व्यवस्थित होते. कोचवरच्या गाद्या, उश्या व्यवस्थित लावलेल्या होत्या. सुलभा गॅलरीत गेली तिला माहिती होते या ठिकाणी स्मिताची छोटी बाग आहे. तिथे नवीन झाडे आणि व्यवस्थित झाडांना पाणी घातलेले होते. सुलभा स्वयंपाकघरात शिरली. सर्व भांडी स्टँडवर व्यवस्थित अडकवलेली, गॅस शेगडी व्यवस्थित पुसलेली, ओटा धुतलेला. सुलभा घर बघत होती. तिच्या मागे विनया आणि तेजश्री येत होत्या. सुलभाने बेसीन पाहिलं, स्वच्छ होतं. वॉशिंग मशिनला व्यवस्थित कव्हर घातलेलं होतं. फ्रिज उघडून बघितला, भाजी, अंडी, फळ व्यवस्थित ठेवलेली होतं. बाथरुम उघडलं. स्वच्छ होतं, साबण वगैरे जागच्या जागी होतं.

‘‘कामाला कोण येत?’’ सुलभाने विचारलं.

‘कुणीच नाही. मावशी, सर्व मी आणि बाबाच करतो. ‘तेजश्री उद्गारली.’’

‘‘मग जेवण, भांडीकुंडी ?’’

‘‘जेवण चुकतमाकत करतो, अजून व्यवस्थित जमत नाही. पण जमेल. थोडफार पुस्तकात बघून, युट्युबवर बघून.’’

‘‘आणि बाजार, भाजी वगैरे?’’

‘‘ते बाबा आणतो.’’

‘‘मग स्पोर्टस् क्लबला केव्हा जातो ?’’

‘‘ते सोडलयं त्याने’’

‘‘का?’’

‘‘त्यात फारसे पैसे मिळत नाहीत. आणि सतत दौरे असतात बाहेरगावी आणि आता बाबाने जॉब घेतलाय. सोमवारपासून हजर होणार.’’

‘‘कुठे ?’’ विनयाने आणि सुलभाने एकदम विचारले.

‘‘ब्रोकर्स ऑफिसमध्ये, बाबाचं सीएस झालेलं त्यामुळे त्याला पटकन नोकरी मिळाली ती पण मालाडला, जवळचं आहे.’’

‘‘आणि तू काय करणार आहेस?’’

‘‘माझं आता कॉलेजचं शेवटचं वर्ष, ते पूर्ण करीन मग बघू. कदाचित बाबासारखं सीएस करेन.’’

एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.

क्रमश: भाग ३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

जीवांरंग

         त्या दोघी… भाग २  लेखक – प्रदिप केळूसकर  –

( मागील भागात आपण पाहिले – – ‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ….’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही. आता इथून पुढे )

आज काही काम नव्हतं म्हणून सुलभा घरातच थांबली. तिने चादरी, बेडशीटस् धुवायला काढल्या. दहा वाजायला आले. दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडलं तर बाहेर स्मिता.

‘‘अगं स्मितू ! फोन न करता आलीस ? नशिब मी आज घरी होते. ये आत.’’

‘‘होय  फोन करायचं पण विसरले. हल्ली विसरायला होतं गं. वय झालं का आपलं?’’

‘अगं वय कसलं, अजून पन्नाशी नाही आली.’’

‘‘मग अस का होत? काल भाजी घ्यायला विसरले, अभयचे कपडे इस्त्रीला द्यायचे विसरले. त्यावरुन सकाळी सकाळी अभय चिडला. घरची कामे जमत नसतील तर नोकरी सोड म्हणाला.’

‘‘आणि काय करु म्हणाव? टाळ घेऊन भजन करावं का ? स्मितू तू फार साधी मुलगी गं. त्याचा फायदा घेतो हा अभय आणि त्याचे पाहून तेजू. जगात एवढं साध राहून चालत नाही बाई. माती मऊ दिसली की जो तो खणू पाहतो. आता तुझा अभय . नोकरी सोडून दे म्हणाला, आपण नोकरी आधीच सोडली. मग घर खर्च कसा करणार ? मोठा सावकार लागून गेला तो. बेफिकीर माणूस. स्मितू तुला वाईट वाटेल म्हणून जास्त बोलत नाही, नाहीतर….’’

‘‘बोलून काही उपयोग आहे का सुलु? ’’

‘‘आज बँकेत नाही गेलीस’ ?’’

माझं कशात लक्ष लागत नाही गं…तेजूशी बोललीस काय ?’’

‘‘बोलले बाई, ती मला काय सरळ उत्तर देते? त्याच्याशी रिलेशन मध्ये राहणार म्हणे. मग वाटलं तर लग्न करीन म्हणते. मी तुमच्यासारखी मुळमुळीत नाही म्हणाली. अभय कानविंदेसारख्या स्मार्ट बापाची मुलगी आहे म्हणे.’

हे असं रिलेशन वगैरे आपण याचा विचार तरी केलेला का गं सुलु ?’’

‘‘आपण जुन्या संस्कारातल्या मुली गं…. आपले नवरे राम आणि आम्ही सिता. पण आपणच सितेची भूमिका निभावतो म्हणून अभय सारख्यांच फावतं.

‘जाऊ दे सुलु ! मला कंटाळा आला आहे तोच तोच विषय बोलून. मी आज मुद्दाम आले होते. माझ्या इन्शुरन्स पॉलिसीज किती रकमेच्या आहेत ते पहायला.

आज काय अचानक ? तरी पण तू म्हणते आहेस तर पाहू. सुलभाने कॉम्प्युटर उघडला आणि स्मिताच्या सर्व पॉलिसीज, हप्ते चेक केले.

‘‘एकंदर एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या पॉलिसीज आहेत ग स्मितू.’’

‘‘आणि नॉमिनीज वगैरे, केवायसी ?’’

‘‘नॉमिनीज बहुतेक अभय कानविंदे, काहीवर तेजश्री कानविंदे. केवायसी अपटूडेट केलेल्या आहेत.’’

‘आणि मॅच्युअल फंड?’ 

‘‘तीन फंड हाऊस मध्ये तुझी एसआयपी सुरु आहे. त्याची आजची किंमत अंदाजे सोळा लाख आहे.’’

‘आणि शेअर्स ?’

‘‘तुझ्या शेअर्सची आजची किंमत सहा लाख पन्नास हजार आहे. पण हे सर्व आजच का पाहते आहेस तू स्मितू ?’’

‘‘तसं नाही गं. नवरा म्हणतो ना नोकरी सोड म्हणून समजा नोकरी सोडली तर किती रक्कम मिळेल याचा अंदाज घेत होते.’’

पण तुझ्या या इन्शुरन्स पॉलिसीज चालू आहेत बरं का ? एवढ्यात त्याचे पैसे मिळणार नाहीत किंवा एकदम कमी मिळतील. हा तुझ्या पश्चात वारसांना आत्तासुधा मिळतील.’’

‘‘झालं तुझे इन्शुरन्स फंड वगैरे? किती दिवसात तुझ्या केसांना तेल घातलं नाही. सुलभाने स्मिताला पुढे बसवलं आणि ती तिच्या केसांना मालीश करु लागली.’’

‘‘सुलू केव्हा केव्हा मला वाटतं आपण लग्न केलेल्या मुली फक्त आपला नवरा, मुलं यांचीच काळजी घेतो. पण आपली माहेरची माणसं आई, बाबा, भाऊ, वहिनी, भाचरं यांचा पण विचार करायला हवां. आपली आई नऊ महिने पोटात वाढविते. आई-बाबा किती प्रेमाने संगोपन करतात. भाऊ प्रेम देतो, संरक्षण देतो, पण आपण जेव्हा अर्थार्जन करतो तेव्हा आपला संसार पाहतो. माहेरच्या मंडळींना गरज असेल तर आपण त्यांना मदत करायला नको ?’

‘‘करायला हवीच बाई ! तू आता ही नोकरी करतेस, तू पण तुझ्या भावाचा श्यामूचा काहीतरी विचार कर. ’’

तेल घालून केस विंचरल्यावर सुलभाने गरम पाणी काढले आणि स्मिताला आंघोळ करायला सांगितली. आंघोळ झाल्यावर दोघी जेवायला बसल्या. सुलभाने तिच्याशी कोल्हापूरातील मैत्रिणींच्या आठवणी जागवल्या. दामले सरांची नक्कल केली. पाटील बाईंचे विनोद सांगितले. स्मिता पण हसली. दोघींनीही झटपट ओटा, भांडी आवरली आणि बेडरुममध्ये आल्या. सुलभा म्हणाली, स्मितू थोडी झोप आता. पूर्वी कोल्हापूरात असताना मी तुला थोपटायचे ना ? तशी आज थोपटते आणि सुलभा हळू आवाजात गाणं म्हणू लागली आणि स्मिताला झोप लागली. सुलभा पण झोपली. तासा दिडतासाने स्मिताला जाग आली.

‘‘सुले किती दिवसात अशी गाढ झोपले नव्हते गं !’’

‘‘मी थोपटलं ना स्मितू राणीला म्हणून गाढ झोप बरं का ’’

‘‘होय बाई सुले, तू म्हणजे माझी आईच आहेस. चल निघते आता.’’

‘‘जा ग सावकाशीनं दुपारची वालाची उसळ आहे ती देऊ का डब्यातून ?’’

‘‘दे, तेजुला फार आवडते वालाची उसळ.’’ सुलभा स्वयंपाक घरात डबा भरायला गेली तो पर्यंत स्मिताने फोनवर कुणाचे फोन, मेसेज आलेत का हे पाहू लागली. फोनवरचे मेसेज वाचता वाचता एकदम रडू लागली.

‘‘काय हे ? आता काय करायचं मी ?’’

सुलभा बाहेर आली तर स्मिता रडते आहे.

‘‘अग काय झालं?’’

‘‘वाच हा तेजूचा मेसेज’’ स्मिताने रडत रडत मोबाईल सुलभाला दाखवला. सुलभाने मेसेज वाचला, तेजश्रीने लिहिलं होतं –

‘‘मी आज रात्री घरी येत नाही, जहाँगिर बरोबर बाहेर जात आहे. ’’

‘‘आता काय करायचं गं सुले? हे आपले संस्कार का ? मला नाही सहन होत आता.’’

‘‘आता काय करणार बाई, मनाची तयारी करायला हवी. काळच तसा आलाय.’

सिनेमातल्या आणि मालिकेतल्या नट्या काय काय करतात ते या मुली पाहतात. ते आदर्श त्यांचे. तू शांत हो पाहू.’

कितीतरी वेळ स्मिता रडत राहिली आणि सुलभा तिला थोपटत राहिली. संध्याकाळ होत आली तशी स्मिता उठली, तिनं तोंड धुतलं आणि ‘‘येते गं सुले’’ असं म्हणत तिने पायात चप्पल घातले.’’ सांभाळून गं स्मिते, मी येऊ का घरापर्यंत?’’

‘‘नको बाई, किती दिवस माझ्यासाठी रडणार तू. शेवटी मलाच तोंड द्यायला हवे. येते. अस म्हणत स्मिता बाहेर पडली . सुलभा गॅलरीत उभी राहिली. लांब पर्यंत चालणारी स्मिता तिला दिसत राहिली. मग हळू हळू गर्दीत गडप झाली.

विषण्ण मनाने सुलभा घरात आली. तिचे मन काळजीने आणि दुखःने भरुन गेले होते. तिला स्मितूची काळजी वाटत होती. आपल्या एकुलत्या एक मुलीने आपल्या पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या पुरुषाबरोबर रात्रौ बाहेर जाणे आणि तसा मेसेज आईला करणे ह किती दुखःचे आणि त्रासाचे. सुलभाच्या मनात आलं. काळ किती बदललाय कोल्हापूरला असताना आम्ही वर्गातल्या मुली, शेजारच्या मुलांबरोबर बोलायचोसुद्धा नाही. आता गळ्यात गळे घालून सगळीकडे मुल-मुली फिरतात. काळ बदललाय.

तिने कन्येला विनयाला फोन केला. तिला आत्ता स्मितू मावशी येऊन गेल्याचे सांगितले. हॉलमध्ये येऊन तिने टिव्ही लावला आणि कार्यक्रम पाहत राहीली. टिव्ही पाहता पाहता तिचे डोळे मिटू लागले. हॉलमध्ये कोचवर कधी ती झोपली हे तिलाच कळले नाही. दरवाजाच्या बेल वाजत राहिली त्याने तिला जाग आली. तिने घड्यात पाहिले साडेसात वाजत होते. यावेळेस कोण आले ? असे पुटपुटत तिने टिव्ही बंद केला आणि दरवाजा उघडला. बाहेर राजन होता.

‘‘अरे, आज एवढ्या लवकर ? मेनन सध्या तुमच्यावर खूष दिसतो.’’ ती हसत हसत म्हणाली.     ‘‘नाही, नाही मी मुद्दाम आलो. स्मिताचा अ‍ॅक्सिडेंट झालाय गोरेगांवला, एसव्ही रोडवर. ’’

‘‘काय !’’ सुलभा किंचाळली.

‘‘आत्ता ती पाच वाजता येथून घरी गेली.’’

‘‘इथे आली होती काय ? तिच्या भावाचा कोल्हापूरहून मला फोन आला. रस्ता क्रास करताना, म्हणजे हिचीच चूक सिग्नल नसताना ही क्रॉस करत होती म्हणे, टॅक्सीने उडवले’’

‘‘पण आता कसं आहे ?’’ सुलभा किंचाळत बोलली.

राजन चाचरत चाचरत तिची नजर चुकवत म्हणाला,

‘‘श्यामू म्हणाला बरं आहे म्हणून, पण डोक्याला मार लागलाय. अ‍ॅडमिट केलंय, आपण निघायला हवं.’’ सुलभा रडायलाच लागली. राजनने तिचा ड्रेस आणून दिला.

‘‘चल चल घाल हा ड्रेस, मी उबर मागवतो.’’

सुलभाने रडत रडत ड्रेस बदलला आणि खाली उभ्या असलेल्या उबर मध्ये दोघे बसले. संध्याकाळच्या सुमारास मुंबईतील रस्त्यावर गर्दी त्यामुळे उबर हळूहळू चालत होती. शेवटी रात्रौ नऊ वाजण्याच्या सुमारास उबर भगवती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गर्दी. राजनने सुलभाच्या हाताला धरुन तिला अ‍ॅक्सिडेंट विभागाकडे नेले. राजन व सुलभा आत जाताच त्याठिकाणी आधीपासून आलेली स्मिताची बँकेतील मंडळी तसेच बिल्डींगमधील मंडळी पुढे आली. स्मिताची बँकेतील जवळची मैत्रिण कल्पना रडत रडत पुढे आली. सुलभाच्या गळ्यात पडून – ‘‘गेली ग स्मिता आपली !’’ म्हणून आक्रोश करु लागली. तिच्या सोबतीच्या अनेक स्त्रियांनी पण हुंदके देत रडायला सुरुवात केली. राजनला स्मिताच्या निधनाची कल्पना होतीच तरी तो भांबावून गेला. आता स्मिताला कसे सांभाळावे याचा तो विचार करत होता पण सुलभा शांत होती. कदाचित ती बधीर झाली असावी. हा आक्रोश तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. कुणीतरी स्मिताचा मृतदेह बाजूच्या पोलीसांच्या खोलीत असल्याचे राजनला सांगितले. राजन सुलभाच्या हाताला धरून त्या खोलीत गेला. संपूर्ण झाकलेला तो देह आणि बाजूला बसलेले अभय, तेजश्रीला पाहून सुलभा ‘‘स्मिते’’ म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुध्द झाली.

क्रमश: – २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-१  ☆ श्री प्रदीप केळूसकर

घरातून बाहेर पडता पडता सेलफोन वाजला म्हणून सुलभाने पर्स उघडली आणि फोन हातात घेतला आणि फोनवरचे नाव पाहताच तिच्या चेहर्‍यावर स्मित आले कारण फोन तिच्या मैत्रिणीचा स्मिताचाच होता.

‘‘काय ग ? आज सकाळीच ? बँकेत गेली नाहीस का ?’’

‘‘अग बँकेतूनच बोलते. संध्याकाळी स्टेशनवर भेटतेस ?’’

‘‘हो, भेटूया. सहा वाजता ना ?’’‘‘हो, नेहमीच्या जागेवर.’’

‘‘येते.’’

सुलभा झपझप पोस्टाच्या दिशेने चालू लागली. काल जमा केलेली सर्व कलेक्शन आरडी पोस्टात जमा करायची होती. आणि मग इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. काल एक पॉलिसी मिळाली होती ती ऑफिसमध्ये द्यायची होती. शिवाय तीन वाजता डेव्हलपमेंट ऑफिसर ज्योतीने मिटींग ठेवलेली आहे. ती मिटींग करुन साडेपाच पर्यंत बाहेर पडायचं आणि सहाच्या आधी विलेपार्ले स्टेशनवर नेहमीच्या जागी स्मिताला भेटायचं. ही एवढी कामं डोक्यात ठेवून सुलभा पोस्टात पोहोचली. रोजच्या प्रमाणे पोस्टाची कामे केली. मग इन्शुरन्स कंपनीत जाऊन आणि तीनची मिटींग अटेंड करुन साडेपाचला बाहेर पडली. आणि झपझप स्टेशनच्या दिशेने चालू लागली. कधी एकदा स्टेशनवर पोहोचतो आणि स्मिताला भेटतो असे तिला झाले. खर तर स्मिता आणि ती सोमवारीच भेटल्या होत्या आणि आज शुक्रवार मध्ये फक्त चार दिवस झाले. पण त्या दोघींची कोल्हापूरातली बालवाडीपासूनची मैत्री. दोघींची जोडी शाळा, कॉलेजात तशीच राहिली. सुलभा लग्न होऊन पार्ल्याला आली आणि स्मिता गोरेगांवात. सुलभा पोस्टाचे आणि इन्शुरन्सचे काम करायची आणि स्मिता बँकेत लागली. दोघींची एवढी मैत्री की, संसारातल्या बारीक सारीक गोष्टी पण एकमेकींना सांगायच्या.

आज काय एवढे अर्जंट काम काढल स्मिताने, असे मनात म्हणत सुलभा सहा वाजता विलेपार्ले स्टेशनवर पोहोचली. तेव्हा स्मिता नुकतीच तिथं आली होती आणि रुमालाने घाम पुसत होती. रेल्वेचा जिना उतरता उतरता सुलभाला स्मिता दिसली. तिला बघून सुलभाच्या मनात आले -‘‘काय परिस्थिती झाली स्मितूची किती देखणी ही, कोल्हापूरात असताना महाद्वार रोडला आपण फिरायला जायचो तेव्हा कोल्हापूरातील पोरं मागून मागून यायची. स्मिताने सुलभाला पाहताच हात दाखवला तशी स्मिता तिच्या दिशेने पुढे आली. मग दोघी तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या टोकाला आल्या. ही दोघींची बोलण्याची जागा होती. इथे थोडी शांतता होती. सुलभा स्मिताला म्हणाली –

‘‘काय ग एवढ काम काढलस? सोमवारी तर भेटलो होतो ना ?’’

‘‘काय सांगायचं कप्पाळ ! माझ्या मागे एक एक टेन्शन आणि टेन्शन’’

‘‘काय झालं ?’’

‘‘तेजू कोणाबरोबर तरी फिरते अशी बातमी होतीच. काल माझ्या व्हॉटस् अ‍ॅपवर कोणीतरी दोघांचा फोटो पाठविला. तिच्याबरोबर एक दाढीवाला पुरुष, हिच्यापेक्षा वयानं बराच मोठा दिसत होता. शेवटी काल तिला खडसावलं. तेव्हा कळलं तो गोरेगांव स्टेशन जवळचा लोखंडाचा व्यापारी जमीर.’’‘‘मुस्लिम दिसतोय।’’ सुलभा ओरडली.

‘‘हो गं माझे विचार तुला माहित आहेत ना ? माझे आईबाबा होते संघाशी संबंधित, माझेपण विचार त्यांच्यासारखेच. ते तर झालंच शिवाय तो वयानं पण पंधरा वर्षांनी मोठा.’’

‘‘बाप रे ! मग अभयला कळलं का ?’’

‘‘ तो असतो का घरी ? सकाळी टेबल टेनिस खेळायला बाहेर पडतो आणि सायंकाळी क्लबमध्ये ब्रिज खेळायला जातो. त्याच्या मॅचिस आणि टुर्नामेंटस. तो बेफिकीर बाप. आयुष्यात जबाबदारी कसली घेतली नाही त्याने. त्याला काय? तो खांदे उडवित म्हणेल, ‘‘तिच लाईफ आहे ते. मी कोण लुडबुड करणारा?’’ असं म्हणून तो गाढ झोपेल. झोप माझीच उडाली गं सुलु.’’

‘‘खरं आहे गं स्मितू, हे वयच असं असतं. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी मुलं निर्णय घेतात. ती ठाम आहे का? मी तिच्याशी बोलून बघू?’’

‘‘बघ तुझं ऐकतेय का ते, मी निघते. घरी जाऊन जेवण करायचं आहे. दहा वाजल्यानंतर दोघं बाप लेक गिळायला येतील. त्यांना काहीतरी घालायला हवं ना? आणि परत उद्याचा माझा डबा – त्याची तयारी. जाते.’’

‘‘सांभाळून जा ग स्मितू, रस्ता सांभाळून क्रॉस कर. आजूबाजूच्या गाड्या बघ आणि मगच रस्ता ओलांड.’’

‘हो’ म्हणत स्मिता गेली आणि तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे सुलभा पाहत राहिली. स्मिता दिसेनाशी झाली तशी ती घरी जायला वळली. आज खूप दगदग झाली म्हणून सुलभाने रिक्षा केली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि डोळे मिटून रिक्षाच्या पाठीवर टेकून बसली. आपल्या संसारापेक्षा तिला स्मिताच्या संसाराची आणि स्मिताची जास्त काळजी वाटत होती. बेजबाबदार नवरा, हाताबाहेर गेलेली एकुलती एक मुलगी. कुटुंबासाठी नोकरी करण्याची गरज, नोकरी आणि संसार सांभाळता सांभाळता होणारी दमणूक कधी या स्मिताला विश्रांती मिळणार आहे कोण जाणे ? त्यात आता तिच्या मुलीने तेजश्रीने घेतलेला निर्णय. पहिल्यापासून ही तेजश्री आपल्याला आवडत नव्हती. बेफिकीर मुलगी. आईच्या कष्टाचे आणि धावपळीचे काहीसुध्दा पडले नाही तिला. रिक्षा थांबवून सुलभा घरी आली. नवरा नऊच्या पुढेच येणार, कन्या विनयाचा पाच वाजताच फोन आलेला. आता थोडा वेळ विश्रांती घेऊ. पोळ्या साडे आठनंतर केल्या तरी चालतील. असे म्हणत वॉश घेऊन, कपडे बदलून सुलभा बेडवर पडली. तिच्या मनात आले – यावेळी स्मिता काय करत असेल? गोरेगांवला उतरुन भाजी, ब्रेड घेऊन दोन किलोमीटर अंतर चालत असेल. तिला किती वेळा सांगितलं अगं स्टेशनवरुन रिक्षाने जा. पण कुटुंबासाठी पैसे वाचवायचे म्हणून चालत जाते. पुन्हा घर दुसर्‍या मजल्यावर. लिफ्ट नाही. घरी गेल्या गेल्या जेवणाची तयारी. बरं या दोघांना साग्रसंगीत जेवण हवं. अधून मधून नॉनव्हेज हवं. दोघांची मदत शून्य. सुलभाच्या अंगाचा संताप संताप झाला. आपला नवरा असा असता तर मी सरळ केला असता. पण स्मितू पडली गरीब गाय. स्वतः रडत बसेल पण नवर्‍याला बोलणार नाही. त्यात आता तेजश्रीने ठरविलेले लग्न. आपण आता उद्या फोन करावा. यावेळी कुठेतरी मित्राबरोबर नाहीतर मैत्रिणीबरोबर हुंदडत असेल असा विचार करता करता सुलभाचा डोळा लागला. दारावरची बेल वाजली तशी ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिचा नवरा राजन आला होता. तिने घड्याळ्यात पाहिले. साडेआठ वाजले होते.

‘‘आज लवकर ! मेनन ने लवकर सोडलं वाटतं’’

‘‘हो मेनन साहेब पण अंधेरीला जात होते त्यांनीच सोडलं’’

‘‘माझ्या पोळ्या करायच्या आहेत, वॉश घ्या तो पर्यंत जेवण वाढतेच.’’

हो म्हणत राजन कपडे बदलून वॉशरुममध्ये गेला तोपर्यंत सुलभाने गॅस पेटवून पोळ्या करायला घेतल्या. राजन बाहेर आला तो पर्यंत तिने ताटात जेवण वाढायला घेतले.

‘‘आज पोस्टात गेली होतीस का?’’

‘‘हो तर. आज खूप धावपळ, पोस्ट, एलआयसी, त्यात ज्योतीने मिटींग लावलेली आणि स्मितूचा फोन – स्टेशनला भेटायला ये म्हणून…’’

‘‘पण स्मिता सोमवारीच भेटलेली ना?’’

‘‘भेटलेली पण आज पुन्हा भेटू म्हणाली. तिच्या पोरीने तेजूने लग्न जमवलयं म्हणे’’

‘‘आ ऽऽ कोणाबरोबर ?’’

‘‘आहे कोणी मुस्लिम, लोखंडाचा व्यापारी गोरेगांव स्टेशनजवळचा.’’

‘‘अरे बापरे, मग स्मिता – अभयची काय म्हणतोय ?’’

‘‘स्मितूची झोप उडालीय बिचारीची, अभय काय बिनधास्त माणूस, तुमच्या एकदम विरुध्द.’’ ‘‘म्हणजे ?’’

‘‘तुम्ही अति काळजी करणारे, आपल्या विनूने स्वतः लग्न जमवल म्हणून ब्लड प्रेशर वाढवून घेतलंत. पण विनूने लग्न जमवलं ते उच्च शिक्षित, एमबीए झालेला, चांगल्या कुटुंबातील मुलाशी, आता बिपीन तुम्हाला मुलगा वाटतो.’’

‘‘अगं बाप हा असाच हळवा असतो. तो बाहेरुन फणसासारखा वाटत असला तरी’

‘‘पण त्याला आहे ना अपवाद ! हा स्मितूचा नवरा अभय’’

‘‘अग त्याला पण वाटत असेल, बाहेरुन दाखवलं नाही तरी.’’

‘‘कुठलं काय ? स्मितू सांगत होती उद्यापासून तो ट्रेकिंगला चाललाय चार दिवस भिमाशंकरला’’ सुलभाने दोघांचं जेवण घेतलं पण तिच्या डोळ्यासमोर होती स्मिता. कोल्हापूरातून ग्रॅज्युएट झाल्यावर स्मिता आणि मी नोकरीसाठी कसल्या कसल्या परीक्षा देत होतो तेवढ्यात मुंबईत सचिवालयात नोकरी करणार्‍या अभयचे स्मितासाठी स्थळ आले. मुंबईत जायला मिळणार म्हणून स्मिता लग्नाला तयार झाली. अभय होता पण देखणा. आम्ही तिच्या मैत्रिणी तिच्या भाग्याचा हेवा करत होतो. पण लग्नानंतर चार पाच महिन्या नंतर स्मिता आली ती निराश होऊन. तिच्यामते अभय अती आळशी, बेफिकीर माणूस होता. सचिवालयात नोकरीला होता पण त्याचे नोकरीत धड लक्ष नव्हते. सतत खेळ, ट्रेकिंग, मित्र मंडळी, पार्ट्या, पैसे किती खर्च करायचा त्याला मर्यादा नव्हती. एका वर्षानंतर स्मितूची बँकेत निवड झाली आणि तिचा पगार घरात यायला लागला तसा तो जास्तच बेफिकीर झाला. त्याच्या पार्ट्या वाढल्या. खर्च वाढले. त्याच दरम्यान सुलभाचे राजनशी लग्न झाले. राजन इन्शुरन्स कंपनीत नाकासमोर चालणारा, काटकसरी, संसारी. सुलभा पार्ल्यात आणि स्मिता गोरेगावला. सुलभा मुंबईत आली तशी दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. स्मिताची बँकेची नोकरी होती. मग स्टेशनवर भेटणे सुरु झाले. मग सुलभाचे बाळंतपण आले. कोल्हापूरात न्यू महाद्वार रोडवर चिपलकट्टी हॉस्पिटलमध्ये विनया झाली. सुलभाची काळजी घ्यायला स्मिता कोल्हापूरात हजर होती. मग बारसं करुनच मुंबईला गेली. एका वर्षाने स्मिताचं बाळंतपण. पुन्हा चिपलकट्टी हॉस्पिटल. तेजश्रीचा जन्म. तेजश्रीच्या बारशाला अभय आला नाही हे सर्वांना खटकलं.

सुलभाची विनया दोन वर्षाची झाली आणि सुलभाने पोस्टल एजन्सी घेतली. एलआयसीचे काम करु लागली. मॅच्युअल फंड एजन्सी घेतली. सुलभाचा नवरा राजन तिला सहकार्य करणारा. रविवारी सुट्टी असेल तेव्हा सुलभाला मदत करणारा. प्रसंगी पोस्टाचं कलेक्शन आणणारा. स्मिताचा नवरा सतत बाहेर, स्पोर्टस, मित्र, ट्रेकिंग. वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिताच्या नवर्‍याने – अभयने नोकरी सोडली आणि टेबल टेनिसचा ट्रेनर म्हणून गोरेगांव स्पोर्टस क्लबमध्ये नोकरी पकडली. मग पहाटे उठून जाणे, दुपारी येणे, दुपारी भरपूर झोपणे, संध्याकाळी जाणे, रात्रौ उशिरा येणे, मग खेळाच्या स्पर्धा कधी इथे, कधी तिथे. मग जय पराजय, पार्ट्या, बाहेर खाणे, पैसे उडविणे हे सुरूच. यात स्मिताची खूप ओढाताण झाली. नवरा सतत बाहेरगावी म्हणून तेजश्रीचे लाड झाले आणि तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.

जेवता जेवता सुलभाच्या डोळ्यासमोर सर्व येत होते. स्मिता मग नर्व्हस होत गेली. सतत आपल्या विचारात राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. केस गळू लागले. सुलभाच्या एक लक्षात आले. गेली काही वर्षे स्मितू स्वतःच्या विमा पॉलिसीज काढू लागली आहे. आपण तिला म्हणायचो अग सगळ्या पॉलिसी स्वतःच्या नावाने कशाला काढतेस? काही तेजूच्या नावाने काढ, अभयच्या काढ. तिचे म्हणणे – तिला स्वतःचे काही खरं वाटत नाहीय. अभयला नोकरी नाही, आपल्यामागे तेजूला काही कमी पडायला नको.

रात्री झोपताना सुलभाने मनाशी ठरविले, उद्या तेजूला काय ते विचारायचे. दुसर्‍या दिवशी तिने तेजश्रीला फोन लावला. तिचा फोन कशासाठी हे तिने ओळखले असावे.

‘‘काय ग मावशी, आई काही बोलली वाटतं?’’

‘‘काय ?’’

‘‘माझ्या लग्नाचं’’

‘‘होय बाई, काहीतरी घाईघाईत निर्णय घेऊ नकोस तेजू’’

‘‘मावशी, मला समजतं आता. मी तेवीस वर्षाची आहे. तुमच्या टिपीकल मिडलक्लास लोकांचे रडगाणं मला सांगू नकोस.’’

‘‘अग पण त्याचा धर्म ?’’

‘‘मी एवढ्यात लग्न करीन असं नाही गं मावशी, सुरुवातीला मी रिलेशनमध्ये राहीन, तो आवडला तर मग लग्न.’’

‘‘अगं बाई असलं काहीतरी बोलू नकोस. मी काय, तुझी आई काय? आम्ही कोल्हापूरातल्या साध्या मुली गं, असले संस्कार आमच्यावर नाहीत.’’

‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ….’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही.

क्रमश: १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मानिनी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमध‌डाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी.”) – इथून पुढे —-

“राधाक्का, नवरा जरी राम असला तरी त्या मृण्मयी असलेल्या सीतेच्या नशीबीसुद्धा वनवास आलाच होता ना? त्या सीतेला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात तरी आश्रय मिळाला होता. हिला कोण आहे? बिचारी बापाविना पोर….” मी नकळत बोलून गेलो, त्यासरशी मृण्मयीचे डोळे पुन्हा भरून आले. आईच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं मनसोक्त रडून घेतले. पटकन डोळ्यांतले अश्रू पुसत ती म्हणाली, “सर, मला लग्नाच्या आधी स्वावलंबी व्हायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. त्यानंतर माझ्या आईसकट मला स्वीकारणारा राम भेटला तरच मी लग्न करेन. तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. मला नुसतं पदवीधर व्हायचं नाहीये. मला डॉक्टर व्हायचं आहे. आता तूर्त मला मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी प्रशांत सरांचा कोचिंग क्लास लावायचा आहे. सांगा हिला. मी प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये आले नाही तर ती सांगेल ते करीन हा माझा शब्द आहे.” 

“सायेब, एकीकडे कर्जाचे हप्ते भरतेच आहे. कोचिंग क्लासची फी कुठनं भरू सांगा?” 

“राधाक्का, तुमची लाडकी लेक बोर्डात मेरिटमध्ये पास झालीय. तिला तिचा मार्ग शोधू द्या. कोचिंग क्लासच्या फीची तुम्ही काळजी करू नका. मी प्रशांत सरांशी बोलतो. माझं ऐका. तिला आता फक्त क्लासला जाऊ द्या. नंतर काय करायचं ते आपण नंतर ठरवू या.” असं म्हणत मी मृण्मयीच्या हातात पुष्पगुच्छ ठेवला आणि पेढ्यांचा बॉक्सही दिला.   

मृण्मयी पटकन उठली आणि मला नमस्कार करायला आली. मी म्हटलं, “घरी जा, देवापुढे दिवा लावून पेढ्यांचा बॉक्स ठेव आणि त्याचे आशिर्वाद घे. काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल.”    

ते दोघे बाहेर पडताच मी प्रशांतला फोन लावला. फोन उचलताच “साहेब, या महिन्याचा कर्जाचा हप्ता आला नाही काय? हाऊसिंग लोन की कार लोन? तुमचा फोन आलाय म्हणून विचारतोय.” प्रशांतनं विचारलं. त्यावर मी हसतच म्हटलं, “अरे काही खात्यांची मी काळजीच करत नसतो, त्यात तुझी कर्जखातीदेखील आहेत. बरं ते जाऊ दे, मी तुला दुसऱ्याच कामासाठी फोन करतोय असं म्हणून मृण्मयीविषयी त्याला सांगितलं. फी मध्ये किती कन्सेशन देता येईल ते सांग.” 

क्षणभर थांबून तो म्हणाला, “साहेब, ती मुलगी तुमच्या नात्यातली ना गोत्यातली. तिच्या शिक्षणासाठी तुम्ही इतक्या आपुलकीने आस्था दाखवता आहात तर, मलासुद्धा काहीतरी करायला हवं ना? मग माझ्याकडून शंभर टक्के कन्सेशन. तिला प्रवेश फी म्हणून फक्त पाचशे रूपये भरायला सांगा. आणि हो, ती मेरिटमधे आली तर माझे शंभर टक्के वसूल झाल्यासारखेच ना !” असं म्हणत त्याने आपली व्यावसायिकता शाबित असल्याचं सिद्ध केलं.

मृण्मयीची जिद्द कामी आली. ती प्रवेश परीक्षेत मेरिटमधे आली. फ्लॅट बॅंकेकडे तारण होताच. गवर्नमेंट मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळताच तिचं शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. मृण्मयीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. 

एका शनिवारी संध्याकाळी तिच्या समाजबांधवांच्याकडून तिचा भव्य सत्कार होता. कार्यक्रमाला मलाही निमंत्रण देण्यासाठी मृण्मयीनं सुचवलं असावं. दोघे संयोजक निमंत्रण देण्यासाठी स्वत: बॅंकेत आले. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता घट्ट पाय रोवून उभे राहतात त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. 

मी कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहोचलो. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हार आणि पुष्पगुच्छ देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील एक कन्या स्वत:च्या हिंमतीवर घवघवीत यश मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवते ह्याचा समाजबांधवांना कोण कौतुक वाटत होते. प्रत्येकजण आपल्या छोटेखानी भाषणात मृण्मयीवर कौतुकाचे गुलाबपाणी मनसोक्तपणे शिंपडत होता. 

शेवटी समाजाचे अध्यक्ष उभे ठाकले. बोलता बोलता ते म्हणाले, ‘आपल्या मुली शिकून पुढे जायला पाहिजेत. एका चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असूनदेखील मृण्मयीने जे यश मिळवले आहे, ते यश म्हणजे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. मी माझ्याकडून तिला पाच हजार रूपयांची मदत जाहीर करतो आहे. इतर समाजबांधवांना देखील मी मदतीचे आवाहन करतोय. मदत करणार आहात ना?’ असं म्हणताच सभेतल्या कित्येकांचे होकारार्थी हात उंचावले गेले. 

सत्काराचं उत्तर देण्यासाठी मृण्मयी उभी राहिली. “माझ्या शाळेत, कॉलेजात सत्कार झाले. परंतु आपल्या समाजबांधवांकडून मायेपोटी, अभिमानापोटी झालेला हा घरचा सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आताच आपल्या अध्यक्ष महोदयांनी माझा उल्लेख चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असा केला. मला त्यात किंचितही कमीपणा वाटला नाही हे मी आधीच नमूद करते. मुळात प्रामाणिकपणे करता येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला कमी लेखताच कामा नये. त्याच व्यवसायावर माझे वडील आजन्म स्वाभिमाने जगले. माझ्या पित्याच्या माघारी माझी आईदेखील तीच टपरी त्याच जोमाने चालवून मला शिकवते आहे. या प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माझ्यासाठी मदत तर जाहीर केलीच आहे तसंच तुम्हा सर्वांना सहृदयपणे मदतीचे आवाहन केले आहे. मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते की मला फक्त तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सदिच्छा हव्या आहेत. माझ्या स्वर्गीय पित्याला आणि माझ्या आईलादेखील मी असं कुणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेलं आवडणार नाही. माझ्या आईबाबांच्या विश्वासार्हतेमुळे म्हणा, आणि मी उत्तम मार्काने पास झाल्याने बॅंकेने मला शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे, ते पुरेसे आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला शक्य असेल तर, प्राप्त परिस्थितीमुळे व्यवसायात कोलमडून पडलेल्या आपल्या एखाद्या समाजबांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी मदत करा, त्यामुळे त्याचे एक अख्खे कुटुंब उभे राहिल. धन्यवाद !!” 

कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. एका विनम्र, मृदुभाषिणी असलेल्या मृण्मयीचा मानिनी अवतार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता. 

बेंगलुरूच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आम्ही झपझप पावलं टाकत बोर्डिंग गेटकडे निघालो.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares