मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ मोबदला… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं – सगळेजण त्याची वाट पहात बसले.अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. आता इथून पुढे)                    

तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले.आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता.तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला.

चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने न रहावून विषय काढला,

“अरे शिरीष अण्णांनी काही म्रुत्युपत्र करुन ठेवलं होतं का? नाही म्हणजे आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटे, हिस्से नको का व्हायला?”

” दादा मला तरी म्रुत्युपत्राबद्दल काही माहीत नाही आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लँट आणि आपली एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही.”

“असं कसं म्हणता भाऊजी? त्यांची काही फिक्स्ड डिपाँझिट्स असतील किंवा एखादा प्लाँट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मध्येच बोलली.

“हो शिरीष” गुणवंत म्हणाला “मरण्यापुर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे.”

वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्राँपर्टीची मात्र खुप काळजी होती हे स्पष्ट दिसत होतं.

” रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे.अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं.“ शिरीष आठवून म्हणाला.

” अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ” ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे.”

दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले.

वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.

” मृत्युपत्रात खास असं काही सांगण्यासारखं नाही. ” वकीलसाहेबांनी म्रुत्युपत्र काढून सांगायला सुरुवात केली ” निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लँटमध्ये रहातोय म्हणजे हाच फ्लँट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लँटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे. तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे.”

” याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.

वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं.मग म्हणाले “अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघां भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही आणि त्या तीस लाखाचं तुम्ही काय केलं? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर.”

निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.

“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा आणि अण्णा तुमच्याकडे असतांना तुम्ही त्यांचे काय हाल केले हेही मला चांगलंच माहित आहे. तेव्हा बोलतांना सांभाळून बोला. ”

वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.

“बस एवढंच होतं म्रुत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.

“पण वकीलसाहेब अजून काही प्राँपर्टी नव्हती का अण्णांकडे?” गुणवंतने विचारलं.

” ते मला कसं माहित असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा, पण लक्षात ठेवा ते सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी काहीही मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब रागाने म्हणाले.  वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायका-मुलांसह निघून गेले. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे, हिश्शांच्या भानगडीही मिटल्या.” ” ते ठिक आहे हो.पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?”

” त्यामानाने म्हणजे?”

” म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खुपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलय.”

शिरीष हसला. “नेहा,अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं,शिकवलं,मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही.”

“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या मानाने,असं मला म्हणायचं होतं.विचार करा.तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं?त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पँरँलिसीस झाला. पँरँलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. विचार करा या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो। अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हाँस्पिटलमध्ये अँडमीट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की ‘शिरीष किती बिल झालं? आम्ही काही मदत करु का तुला?’ अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही  शिकवलं, मोठं केलंय मग त्यांचीही काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतच सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही कोणती पध्दत? निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला.त्याचं मला वाईट वाटत नाही.पण आपण केलेल्या त्यागाचा,सेवेचा,खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा.”

शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं.शिरीषला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना.काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, “तुझं म्हणणं बरोबर आहे गं,पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा,गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा. “

नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, “तसं असू शकतं. पण मन काही मानत नाही हेच खरं. “

रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता.

दुसऱ्या दिवशी तो आँफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं.आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं?

क्रमश: २

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”) इथून पुढे —-

“जरी आम्ही इतके वर्ष इकडे राहिलो, तरी आम्ही बेताच्या परिस्थितीतच रहातोय. यांना सतत भारतात, पैसे पाठवावे लागतात. आमच्या मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळे घर घेतले, आणि तो आमच्याशी अजिबात सम्पर्क ठेवत नाहीये. यांची एक अगदी साधी नोकरी आहे, आणि मीही बेबी-सिटिंगचे काम करते. इकडे राहणीमान खूपच महाग आहे हो. आमच्याकडून आपण खूप मानपान, आणि इतरही कसली अपेक्षा ठेवू नका प्लीज… म्हणजे आम्ही हे करूच शकणार नाही. एक दिवसाचा लग्नाचा खर्च करूआम्ही. . एक छोटे गळ्यातले तेवढे तिच्यासाठी करून ठेवले आहे मी. माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, पगारही चांगला आहे तिला. आणि हे लग्न त्यांचे त्यांनीच ठरवलंय तर आपण एकमेकांच्या समजुतीने घेऊया. आम्ही तुमच्या तुलनेत खूप कमीच आहोत हे अगदीच मान्य आहे आम्हाला. “ 

गीता घरी आली. समीरला आईची नाराजी समजली. तो म्हणाला, “ कोणत्या काळात रहातेस आई? मोना आणि तिचे आईवडील खरोखर सज्जन आहेत. आणि आपल्याला काही कमी आहे का? मोना मिळवती मुलगी आहे. माझी आणि तिची वर्षभराची ओळख आहे. मला खात्री आहे, ती आणि मी नक्की सुखी राहू. मी सायलीशीही बोललोय परवा. तिलाही लग्नाला येता येणार नाहीये. पण तू मात्र ते करतील ते गोड मानून घे. मग भारतात गेलीस, की घे हवे ते. मी देईन की तुम्हाला भरपूर पैसे. ”. . . . समीर आपल्या आईला ओळखून होता.

ठरलेल्या दिवशी हिंदू टेम्पलमध्ये, अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. ना कोणते दिखाऊ समारंभ, ना मानपान. . . . . दोन तासात मंडळी घरी आलीसुद्धा. मोनाच्या आईवडिलांनी छान जेवण ठेवले होते. लग्नाला मोजकीच माणसे, ऑफिसचे मित्र, असे लोक होते. गीताने सगळे दागिने, भरजरी साडी मोनाला दिली. मोनाने हौसेने नेसली, आणि सगळे दागिनेही घातले. छान दिसत होती दोघांची जोडी.

राहून राहून गीताला मात्र वाटत होते, की काय हे लग्न. . . यापेक्षा गेट टुगेदर सुद्धा जास्त भपकेदार होते आपले. . . पण बोलणार कोण? आता आपल्या मैत्रिणी असले फोटो बघून काय म्हणतील? केवढे कौतुक सांगितले होते मी. . . . परदेशातले लग्न खूप सुंदर असते. . . यव आणि त्यव. . . . . आणि इथे २ तासात घरी. . . ना काही समारंभ, ना काही. . . एक साडी ठेवली माझ्या हातात ओटी भरून. . . आणि यांना साधासा कुर्ता आणि टी शर्ट. . . जाऊ द्या झालं.

दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या लग्नात, मला न विचारता सगळे करून टाकले. वर दोन्हीही असले बेताचे व्याही मिळाले. . . अतिशय नाराज होती गीता. गीताने विचारले, “ कुठे जाणार नाही का हनिमूनला? “

मोना म्हणाली, “ ममा, जाऊ ना !पण तुम्ही आहात ना, तोपर्यंत नाही. ” 

मोना दुसऱ्या दिवशी पट्कन उठून कामाला लागली. गीताच्या लक्षात आले, ही मुलगी सराईतासारखी वावरतेय स्वयंपाकघरात, म्हणजे ही इथे येऊन, राहून गेली असणार.

मोना म्हणाली, “ ममा तुम्ही खरच आराम करा. मला समीरचे सगळे किचन ओळखीचे आहे. मी कितीतरी वेळा येऊन करूनही गेलेय त्याच्यासाठी स्वयंपाक. ”. . . . मोनाने खरोखरच तासाभरात उत्तम स्वयंपाक केला. म्हणाली, “ ममा, पोळ्या मात्र बाहेरून आणल्यात हं. त्या करायला येत नाहीत मला, आणि वेळही नसतो. ” 

गीता, रवी, समीर, सगळे अगदी मनापासून जेवले. रवीने मोनाची मनापासून स्तुती केली.

गीता म्हणाली, “ वावा !मोना, मस्त केलंस ग सगळं. आवडलं मला सगळं हं. आता समीरची काळजीच नाही मला. ” 

मोना रात्री गीता आणि रवीच्या रूम मध्ये आली. म्हणाली, “ ममा, मला माहीत आहे, तुम्ही नाराज आहात. आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, माझे मॉम डॅड गरीब आहेत. पण ते खरोखर चांगले आहेत. मला, माझ्या भावाला, किती कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी. पण भाऊ निघूनच गेला अमेरिकेला. आज मी एवढा पगार, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणानेच तर मिळवतेय. तुम्हाला आणखी एक सांगणार आहे,. . त्या दोघांना काहीही मदत लागली तर मी करणार आहे. त्यांची सम्पूर्ण जबाबदारी मी घेईन. अर्थात ते दोघे इतके मानी आहेत, की कधीही माझ्यावर अवलंबून राहणारच नाहीत. समीरला होकार देताना, मी हे आधीच सांगितलं आहे. त्याची काहीही हरकत नाही, आणि तुमचीही नसावी. ममा, नाती पारदर्शक असावीत ना. मी त्यांच्याशी, आणि समीरचे आईवडील म्हणून तुमच्याशीही, कायमच आदरानेच वागेन. मला तुम्ही समजून घ्या. लग्नात दिलेले दागिने छान आहेत, पण असले इतके भारी दागिने मी कधी वापरू? ते लहान मंगळसूत्र मात्र ठेवून घेते. . आणि फक्त २ साड्या मला पुरे आहेत. बाकी प्लीज घेऊन जा. मला खरोखर कसलाच सोस नाही हो. फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या. “ 

गीता थक्क झाली. तिला आपल्या मैत्रिणींच्या सुना मुली आठवल्या. ’ मला लग्नात हेच हवे हं आई, आणि सासूलाही एखादा भारी दागिना तुम्ही द्यायला हवात, ’ हे बजावणारी सोनलची मुलगी आठवली.

मुलीला हिऱ्याचे मंगळसूत्र घेतले नाही, म्हणून लग्नात तमाशा करणारी प्रीतीची विहीण आठवली.

कोमलने लग्नात नुसतेच गुलाबजाम काय केले, आणखी काही स्वीट नाही का, म्हणून नाके मुरडणारी लता आठवली.

या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या मुलीसुना, तिला आठवल्याच एकदम. इतके मोठे खर्च करूनसुद्धा, न टिकलेली लग्नंही गीताला आठवली. . . एकाच वर्षात पल्लवीची सूनबाई निघून गेली होती. . . वर्षाची अत्यंत लाडावलेली मुलगी, सासरी सासूसासरे आणि नवऱ्याशीही पटत नाही म्हणून परत आली होती.

— हा सगळा चित्रपट गीताच्या डोळ्यासमोरून सरकला.

परदेशी जन्मलेली, पण संस्कार भारतीय असलेल्या या मुलीबद्दल एकदम माया दाटून आली गीताच्या पोटात. किती खरी वाटते ही मुलगी !

गीता उठली, आणि तिने मोनाला पोटाशी धरले. म्हणाली, “ मोना, मला आता माझ्या समीरची मुळीच काळजी नाही ग. फार छान निवड आहे त्याची. माझाच चष्मा बदलायला झाला होता. . . काय आहे ना समीर मोना, मी सामान्य आयुष्य कधी जगलेच नाही. सतत समाजातल्या श्रीमंत आणि उथळ मैत्रिणींसाठीच जगत आले. पार्ट्या, भिशी, सतत फार्महाऊसवर जाऊन मजा करणे, हेच आमचे आयुष्य !! पण खरं सांगू, अलीकडे उबग यायला लागला होता ग या दिखाऊ जगण्याचा. आता मात्र मी त्या ग्रुपमध्ये फिरकणार सुद्धा नाही. मोना, समीर, छान आहेत तुमचे विचार. सायलीसुद्धा मला हेच सांगत होती जीव तोडून. पण तेव्हा नाही पटलं. “

गीताच्या डोळ्यात पाणी आलं. रवीने तिला जवळ घेतले, आणि म्हणाला, “ मीही हेच सांगून शेवटी नाद सोडून दिला. पण गीता, मुळात तू खूप सरळ आणि भाबडी आहेस. चल, आता कबूल कर, आपल्या घरात, बाहेरची दोन्ही मुले लाख मोलाची आली आहेत … जावई आणि सून. ” 

गीताने मान हलवली, आणि म्हणाली, “ हो रवी. कधीतरी येते अशी डोळे उघडणारी वेळ. आता भारतात गेले की सगळे ग्रुप सोडून देणार. मी msw आहे, हेही मी कित्येक वर्षे विसरूनच गेलेय रे रवी ! माझी मैत्रीण माया, मला केव्हाची अंध शाळेत काम करायला बोलावतेय. सारखी म्हणत असते, ‘ गीता, तुझा टॅलेंट वाया घालवत आहेस तू या दांभिक उथळ बायकांच्यात. एकदा येऊन बघ समाजातली दुःखे. . . विसरून गेली आहेस का ग. . आपण msw आहोत ते?’. . . तिकडे नक्की जाईन म्हणते. ” 

अचानक झालेले हे परिवर्तन बघून, रवि आणि समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या, आणि डोळे पुसत मोनाने गीताला मिठी मारली.

अतिशय समाधानाने, भरल्या मनाने, आणि डोळ्यांनी, गीता आणि रवी भारतात परतले.

 – समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

त्या सगळ्या उच्चभ्रू बायका. नवरे अत्यंत श्रीमंत, म्हणून याही श्रीमंती मिरवणाऱ्या. पैसा मिळवायला कष्ट करावे लागतात, याची काडीमात्र जाणीव नसणाऱ्या —-

गीता अशीच, हाय सोसायटी लेडी. मस्त शोफरड्रिव्हन कार मधून फिरावे, खूप खरेदी करावी, क्लब मध्ये जावे, हेच आयुष्य. गीताला दोन मुले. समीर आणि सायली. सायली चांगली शिकली आणि 

तिच्या मध्यम वर्गीय मैत्रिणीच्या भावाच्या प्रेमात पडली. गीता म्हणाली, ” सायली, अग कोण शोधलास हा इतका सामान्य मुलगा? काय ग तो साधा चार खोल्यांचा फ्लॅट आणि काय ती माणसं. तुझा निभाव लागणार नाही असल्या घरात. मी किती छान मुलगे बघत होते तुझ्यासाठी. ‘

सायली शांतपणे म्हणाली, “ आई, बस झाल्या तुझ्या त्या श्रीमंत आणि उच्च कल्पना. मला नाही आवडत ते मूर्ख श्रीमंत मुलगे. मला खात्री आहे, मी कपिल बरोबर नक्की सुखी होईन. काय ग कमी आहे त्याच्यात? एवढा छान शिकलेला, किती चांगला पगार आहे त्याला. आई, मी कपिलशीच लग्न करणार. बाबांना सुद्धा फार आवडलाय कपिल. सून आण हो तुझ्या असल्या उच्च हाय ब्रो सोसायटीची. ” 

सायलीपुढे गीताचे काहीही चालले नाही. — खरं तर कपिल मध्ये नाव ठेवायला जागाच नव्हती. दिसायला छान, वागायला अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता तो. त्याचे आईवडील, बहीण सगळे खूप चांगले, आणि सायली त्यांना फार आवडायची. पण गीताला ही मंडळी अजिबात आवडत नव्हती. तिचा क्लब, हाय फाय मैत्रिणींमध्ये हे कुटुंब अगदीच मध्यमवर्गीय ठरणार होते.

सायलीला छान नोकरी लागली, आणि तिने कपिलशी लग्न केले.

”अग निदान, वेगळी तरी रहा सायली. कशी राहणार तू त्या चारच खोल्यात. ?” गीताने खरोखरच्या काळजीने विचारले.

“ आई, मी काका काकूंबरोबरच रहाणार सध्या तरी. उगीच का म्हणून मी वेगळी राहू? बघू नंतर. ” सायली खूषच होती सासरी.

गीताला आता समीरच्या लग्नाचे वेध लागले. समीर कॅनडाला जॉब करत होता. समीर बेताचा, फार काही हुशार नाही, पण कॅनडामधून त्याने थोडे थोडे कोर्सेस केले, आणि बऱ्यापैकी नोकरीही मिळवली. त्याला कॅनडाची सिटिझनशिप मिळाली आणि गीताचे हात गगनाला टेकले.

“समीर, आता मुली बघायला लागूया ना रे? करायचंय ना यंदा लग्न? तू कुठे ठरवले असलेस तर सांग. नाही तर मी आता बघायला लागणार मुली तुला. ” 

“ हो आई, बघा तुम्ही जरूर. मला फोटो पाठवत रहा, मग पुढे बघूया, काय काय होते ते. ”

गीताने मुली बघण्याची मोहीम हाती घेतली. विवाह मंडळात समीरचे नाव नोंदवले. दरम्यान गीताची मामी तिला म्हणाली, “ अग, आपल्या सीमाची मुलगी आहे लग्नाची. विचारू का, करतेय का लग्न तिचे? तुमच्या तोडीसतोड आहेत हो ते श्रीमंत. ”

गीता म्हणाली, ” हो, विचार मामी. सगळी माहिती काढ. मुलगी काय शिकलीय, तयार आहे का परदेशी कायम रहायला, ते विचार, आणि त्यांना मला फोन करायला सांग. ”

दोन दिवसांनी, गीताला फोन आला. — “ मी अजिताची आई बोलतेय. तुमच्या मामीनी मला तुमचा नंबर दिला. तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना?” 

त्यांनी त्यांच्या मुलीची सगळी नीट माहिती सांगितली. पत्रिका मेल करते, आणि बाकी सगळेही मेलवर पाठवते म्हणाल्या. — सगळी माहिती, प्रथमदर्शनी तरी योग्य वाटली गीताला. तिने रविला, तिच्या नवऱ्याला हे दाखवले, आणि आपण मुलगी बघायला त्यांच्या घरी जाऊया का असे विचारले. अजिताच्या आईवडिलांना तसा फोन गेला, आणि चार दिवसांनी दोघे दिघ्यांच्या घरी मुलगी बघायला गेले.

त्यांचा मोठा बंगला, थाटमाट, नुसत्या चहासाठी केलेले भरभरून पदार्थ, सगळं बघून गीता खूष झाली. अजिता चहा घेऊन आली. किती सामान्य होती ती दिसायला. आणि शिक्षणही नुसती आर्टस् ची डिग्री. — गीताला आणि रवीला प्रथमदर्शनी ती मुळीच आवडली नाही. पण अजिताच्या आईने खुबीने सुचवले,

“ एकुलती एक मुलगी आमची, हे सगळे तिचेच तर होणार आहे पुढे. ” 

गीताने समीरला तिचा फोटो पाठवला.

“ आई, किती ग सामान्य मुलगी आहे ही. मला मुळीच नाही आवडली. तू कितीही वर्णने केलीस ना, तिच्या श्रीमंतीची, तरी ही मुलगी मला अजिबात नको. मला बायको चांगली, हुशार स्मार्ट हवीय. बंगले दागिने नको आहेत. प्लीज केवळ श्रीमंती बघून नको ग असल्या मुली बघू आई. ” 

गीताला त्याचे म्हणणे अजिबात आवडले नाही, पण समीर हट्टी होता. गीताने मुली बघण्याची मोहीम चालू ठेवली, पण तिच्या चौकटीत बसेल अशी मुलगी मिळेना.

एक दिवस समीरचा फोन आला, “ आई, मी लग्न ठरवतोय. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारीआहे ती. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण ती मराठी मुलगी आहे अग. नुकतीच इथे बदलून आलीय, आणि मूळची कनेडीअन सिटीझन आहे. तिचे आईवडील खूपच वर्षांपूर्वी इथे सेटल झाले, आणि ही मोना इथेच जन्मली म्हणून सिटीझन झाली. मी गेले वर्षभर तिला भेटतोय, पण नक्की नव्हते आमचे, म्हणून तुम्हाला नाही सांगितले. मी फोटो पाठवतो. आता मुली बघू नकोस. चांगली आहे मोना आणि तिची सगळी फॅमिली. ”

गीताला आनंदच झाला. त्याचे त्यानेच ठरवले, ते उत्तमच झाले की. आणि पुन्हा तिकडची, मिळवती मुलगी. गीताने दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, आणि सगळी माहिती विचारली. समीर पुढच्याच महिन्यात लग्न करणार म्हणत होता. पण गीताला आणि तिच्या नवऱ्याला कॅनडाचा व्हिसा इतक्या लवकर मिळणे शक्य नव्हते.

“ अरे समीर, जरा उशिरा करा ना लग्न. एवढी काय घाई आहे रे? नाहीतर इकडे भारतात येऊन करा. ” 

“ नाही ग शक्य. मोनालाही व्हिसाचा प्रॉब्लेम नाही का येणार? आणि तिच्या आईवडिलांना पुढच्याच महिन्यात वेळ आहे. नंतर ते भारतात येणार आहेत. मोनाच्या आजी खूप आजारी आहेत, म्हणून जायलाच हवेय त्यांना. तिकीटेही बुक झाली आहेत त्यांची. ”

गीताने आणि रवीने लगेच व्हिसाची डेट मिळवायचा प्रयत्न केला, आणि नशिबाने, त्यांना लग्नाच्या तारखे अगोदरचा व्हिसा मिळालाही. मोठ्या आनंदाने त्यांनी हे समीरला सांगितले, आणि तोही खूषच झाला.

विमानाची तिकिटे बुक केली, आणि गीताची खरेदीची लगीनघाई सुरू झाली. नव्या सूनबाईसाठी, गीताने हौसेने खूप खरेदी केली. नवीन गळ्यातले, कानातले, मंगळसूत्र घेतले. हौसेने हिऱ्याची अंगठी, नेकलेसही घेतले. दरम्यान, विडिओ कॉलवर मोना समीरशी त्यांना बोलता आले, बघता आले. छान होती मोना दिसायला. तरतरीत होती, आणि चांगली वाटली बोलायला. चांगले बोलत होती मराठी.

ठरलेल्या दिवशी गीता रवी कॅनडाला पोचले. मोना आणि समीर दोघेही आले होते एअरपोर्टवर त्यांना न्यायला. गीताला, रवीला अतिशय आनंद झाला त्या दोघांना बघून. गीताला वाटले, बरेच झाले. ही मुलगी नशिबात होती समीरच्या.

जेटलॅग गेल्यावर, मोनाने त्यांना आपल्या आईवडिलांकडे नेले. अतिशय सामान्य वस्तीत त्यांचे घर होते. गीताला आश्चर्यच वाटले, इतकी वर्षे परदेशात राहूनही, हे इतक्या साध्या अपार्टमेंट हाऊसमधेच राहतात अजून?– मोनाचे आईवडील, बाहेर आले. अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. — म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?” 

– क्रमशः भाग पहिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित कथा – “रद्दीवाला” – श्री घनश्याम अग्रवाल ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अनुवादित कथा – “रद्दीवाला” – श्री घनश्याम अग्रवाल ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मूळ हिंदी कथा 👉 “रद्दीवाला”)

रद्दीवाला हे त्याचं नाव होतं आणि कामही. आपली चार चाकी हातगाडी, त्यावर एक तराजू, रद्दी, काही भंगार सामान घेऊन तो गल्लोगल्ली फिरायचा. ‘रद्दी, जुनंपुराणं, भंगार सामान,’ असा ओरडत तो फिरत रहायचा.  नेहमी बायका आणि आही काही वेळा पुरुषसुद्धा, त्याला बोलावून घरातली रद्दी किंवा घरातलं मोडकं तोडकं सामान मोलभाव करून देत. सामान्यत: रद्दीवाल्यांकडे लोक, त्यांचा एकूण चेहरा-मोहरा, त्यांची परिस्थिती आणि एकूण काम, यामुळे चोर, उचल्या वगैरे समजून,  त्यांच्याकडे तिरस्काराच्या दृष्टीनेच बघतात. सहा किलो रद्दी वजन करत चार किलो म्हणायचं, गृहिणीने स्वत: वजन केलं, तरी एखादा किलो मारणं हा त्यांचा डाव्या हाताचा मळ असतो.  कधी कधी एखादी छोटी-मोठी वस्तू उचलणं, पोटासाठी ते करतही असतात. त्यामुळे ते गेटच्या बाहेर पडेपर्यंत, त्यांच्याकडे शंकित नजरेने बघितलं जातं. उपेक्षित झाल्यावर केवळ पेपरच नाही, तर माणूसही रद्दी होतो, याचंच तो प्रमाण आहे.

त्या दिवशी पत्नी रद्दीवाल्याला रद्दी देत होती. मी तिथे पोचलो, तर म्हणाली, ‘मी बाहेर चालले आहे. याच्याकडून तीस रुपये घ्या.’ ती असं म्हणाली आणि निघून गेली.

मी प्रथमच त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक पाहीलं. तो घामाने थबथबलेला होता. खिशातून पैसे काढत होता. मी म्हटलं, ‘काही घाई नाही. आरामात दे.’ मग त्याला विचारलं , ‘पाणी पिणार?’ त्याने होकारार्थी मान हलवली. त्याने पाणी प्यालं आणि रडवेल्या डोळ्यांनी ग्लास परत करत म्हणाला, ‘शुक्रीया.’

‘अरे, पाण्यासाठी कसले आभार?’

‘पाण्यासाठी नाही साहेब. आजपर्यंत मागितल्यावर पाणी मिळालय. आज प्रथमच कुणी तरी आपणहून विचारून पाणी पाजलय!’

मला त्याच्या बोलण्याने बरं वाटलं. जुनी  का होईना, पण अनेक वर्षं पुस्तकं, वर्तमानपत्र वाचून, तो काहीसा लिहू-वाचू लागला होता. शिवाय उर्दू भाषाच अशी, की अशिक्षित जरी बोलू लागला, तरी त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा वेगळाच ढंग येतो.  मी त्याच्याशी बोलू लागलो तशी त्याचं जीवनच त्याच्या जिभेवर आलं.

‘सध्या परिस्थिती मोठी बिकट आलीय. कॉम्पिटिशन वाढलीय. जेव्हापासून टी. व्ही. आलाय, तेव्हापासून लोक गरज म्हणून नाही, तर सवय म्हणून वर्तमानपत्र घेतात. मासिके, पुस्तके कमी झालीत. तेव्हा किमती वाढणारच ना! रद्दी खरेदी कारायला जाताना आमच्या लक्षात येतं, की माणूस गरीब आहे की श्रीमंत, कंजूष आहे की दिलदार. शंकेखोर, झिक झिक करणारा आहे की साधा-सरळ माणूस आहे. आम्ही सगळ्यांना जाणतो, पण लोक मात्र आमच्याकडे तुच्छतेने बघतात. पहिल्यासारखी मजा आता धंद्यात राहिली नाही.’ काही क्षणांसाठी आपली विवशता दृष्टीआड करत, आणि डोळ्यात चमक आणत तो म्हणाला,        ‘ तरीही कशीबशी गुजराण होतेच आणि कधी कधी आपण किंवा दुसर्‍या मजल्यावरचे दिलदार, शानदार शायरसारखी माणसे भेटतात, तेव्हा वाटतं, जीवन सुंदर आहे. इथं जगणं सहज शक्य आहे.’

दुसर्‍या मजल्याप्रमाणे म्हणजे….’ मी विचारल्यावर मला त्याने सविस्तर सांगितलं, त्याचं असं झालं की रद्दीवाला जेव्हा ‘रद्दी रद्दी’ म्हणत चालला होता, तेव्हा त्या दुसर्‍या मजल्यावरच्या माणसाने त्याला वर बोलावलं. तो आपला तराजू आणि थैली घेऊन वर गेला. खोलीत काही वर्तमानपत्रे आणि मासीके इकडे तिकडे पडलेली होती. हे सगळं घेऊन जा, असं त्याने म्हणताच, रद्दीवाल्याने सगळं गोळा केलं. त्याने तराजू काढून वजन करायला सुरुवा केली, तशी तो म्हणाला, ‘वजन करण्याची गरज नाही. घेऊन जा.’ असं ऐकताच त्याने रद्दी थैलीत भरली. आज जरा जादाच कमाई होणार, या खुशीत  तो खिशातून पैसे काढू लागला. ‘राहू दे. राहू दे. पैसे नको देऊ. तशीच घेऊन जा.’ वजन न करता त्याने आत्तापर्यंत रद्दी खरेदी केली होती. पण फुकटात… आश्चर्य आणि आनंदाने त्याने त्याच्याकडे पहिले. तशी तो पुटपुटला, ‘ मी कुठे पैसे देऊन खरेदी केली आहेत. कवी झाल्याने बाकी काही मिळो, न मिळो, पण काही मासिके फुकटात जरूर घरी येतात.’ रद्दीवाला डोळ्यांनी शुक्रिया आदा करत आणि हातांनी सलाम करत पायर्‍या ऊतरू लागला. पायर्‍या उतरत काय जवळ जवळ पळतच तो खाली आला. वीस-पंचवीस रुपयांची फुकटात कमाई झालेली होती. त्याने गाडीवर थैली ठेवली एक क्षणभर पुन्हा दुसर्‍या मजल्याकडे बघितलं, जिथे त्याचा दिलदार, शानदार कवीसारखा माणूस रहात होता. दुसर्‍या मजल्याकडे बघत पुन्हा एकदा सलाम करत तो गाडी ढकलू लागला.

आता जेव्हा जेव्हा तो दुसर्‍या मजल्यापुढून जातो, तेव्हा तेव्हा त्याचा ‘रद्दी…. रद्दी…’ असा आवाज तीव्र होत जातो. दोनेक महिन्यांनंतर जेव्हा वरून आवाज येतो, तेव्हा तो घाई-गडबडीने, उत्साहाने जिन्याच्या पायर्‍या चढू लागतो. वजन न करता, फुकटात रद्दी घेऊन शुक्रिया म्हणत व सलाम करत तो जिना उतरतो. गाडीवर थैली टाकतो. मजल्याकडे बघतो. पुन्हा सलाम करतो आणि गाडी ढकलत पुढे जातो.

आजदेखील सगळं काही तसंच झालं. पण जेव्हा तो सलाम करून पायर्‍या उतरू लागला, तेव्हा त्याला एक उग्र, तिखट आवाज ऐकू आला. ….’ ए, जातोयस कुठे?…. पैसे…?

तो चमकला हतप्रभसा गोंधळून उभा राहिला. ते विवश डोळे आणि पसरलेला हात काही काळ बघत राहिला. त्याच्यात एवढीही हिंमत उरली नाही की आपली बाजू मांडण्यासाठी तो एवढं म्हणू शकेल की, ‘साहेब यापूर्वी आपण कधीच पैसे घेतले नाहीत, म्हणून आज…..’ त्याने गुपचूप खिशात हात घातला आणि विसाची नोट पसरलेल्या हातावर ठेवली. सलाम करून तो जिन्याच्या पायर्‍या असा काही उतरू लागला, जसा काही तो पहाड चढतोय. दोन किलोचं ओझं चाळीस किलोचं वाटू लागलं. तो जड मनाने आणि जड पावलांनी आपल्या गाडीपर्यंत  आला. थैली ठेवली. सवयीनुसार दुसर्‍या मजल्याकडे पाहीलं. सलाम केला आणि गाडी पुढे ढकलू लागला. मग पुन्हा थांबला. त्याला आताही, तो उग्र, तिखट आवाज ऐकू येत होता ….’ ए, जातोयस कुठे?…. पैसे…?’ ते विवश डोळे आणि पसरलेला हात अजूनाही दिसत होते. त्याने विनाअश्रूंच्या रडवेल्या डोळ्यांनी पुन्हा दुसर्‍या मजल्याकडे बघितलं आणि सलाम करत जड मनाने तो गाडी ढकलू लागला. जड मन…. यासाठी नाही की त्याला फुकटात रद्दी मिळाली नाही. त्याला वीस रुपये द्यावे लागले. हा तर याचा रोजचा धंदा आहे. पण यासाठी तो दु:खी झाला की त्याचा दिलदार, शानदार शायर साहेब आज गरीब झाला होता.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

मूळ लेखक – श्री घनश्याम अग्रवाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उत्तरायण… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

उत्तरायण… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पुरस्कृत कथा) 

जीजी ने लिहिलेली शेवटची ओळ होती,

” आता माझ्या आयुष्यातले उत्तरायण सुरू झाले. “

मी डायरी बंद केली. डोळ्यावरचा चष्मा काढला. आणि ओघळलेले अश्रू हातानेच पुसले. खूर्चीत मागे डोकं टाकून क्षणभर डोळे मिटून बसले. त्या क्षणी मला खूप थकवा जाणवत होता. अनंत भावनांचा सागर मनात उसळला होता. 

गेले काही दिवस मी जीजीची डायरी वाचत होते. जीजी म्हणजे आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता. तिच्या सावलीत आम्ही वाढलो, पोसलो. आमच्या जीवनावरच्या प्रत्येक क्षणावर तिचं अस्तित्व कोरलेलं आहे. पण आता या क्षणी असं वाटतंय की, तिला आम्ही ‘आमची आजी’ याच भूमिकेत पाहिलं. पण एक व्यक्ती म्हणून आम्ही तिचा विचार केला का? ती, तिचं आयुष्य, तिचं जगणं आणि त्यातून तिचं घडणं कसं होतं? ती जशी होती तशी का झाली याचा कधी विचारच केला नाही. तिला आम्ही बोललो, तिच्यावर रागावलो, वेळप्रसंगी तिला दुखावलेही पण पुन्हा तिच्याच मऊ मिठीत विसावलोही.

पण गेले काही दिवस तिने तिच्या मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली डायरी वाचताना, ती आणि तो काळ यात वावरताना मन पिळवटून गेले.

शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ.

दादाजींची अत्यंत लाडकी ऐलु. दादाजींना सात मुली. चार नंबरची ऐलु. थोडी निराळी, चतुर, चलाख, बंडखोर. तिच्या शाळेत जाण्याला दादाजींचा कडक विरोध होता. मुलींना शिकून काय करायचे आहे या समजुतीचा तो काळ होता. पण आईच्या मदतीने ऐलु चोरून शाळेत जायची. पाटीवर अक्षरे काढायची. फरशीवर गणितं सोडवायची. देवघरातल्या पोथ्या वाचायची. तिला वेगळं जगायचं होतं. प्रवाहाविरुद्ध.

एकदा गल्लीत एका तरुण गृहस्थाचा मृत्यु झाला. हाहा:कार झाला. आक्रोश, रडारड. कुणीतरी म्हणालं, “उत्तरायण सुरू व्हायला काहीच दिवस बाकी होते आता याला मुक्ती नाही.”

त्याहीपेक्षा जास्त त्याच्या या लहानग्या पत्नीचे आता काय होणार? या विचाराने ऐलु अस्वस्थ झाली. तिचं तर सारं आयुष्य म्हणजे दक्षिणायानच होणार का?

त्याचवेळी तिन ठरवलं, लग्नच करायचं नाही. लग्न झालं की नवरा मरतो आणि आयुष्याचं मातेरं होतं. एक लांब लचक दक्षिणायन बनतं. 

पण नारायणशी तिची पत्रिका छत्तीस गुण जमली. ऐलूचा जन्म षष्ठीचा. कोणी म्हणायचं षष्ठी आणि सदा कष्टी. तिची रास कर्क. चौथ्या स्थानात मंगळ. पण तरीही नारायणशी सगळे गुण जमले. दीर्घ वैवाहिक सौख्य, चांगला संततीयोग, ग्रह मैत्री, कुंडलीतली सारी घरं सुखाची. शिवाय नारायण एकुलता एक मुलगा.नारायणचे वडील कुठल्याशा नावाजलेल्या कंपनीत हिशोबनीस म्हणून काम करायचे.नारायणलाही नोकरी होती. तो पदवीधर होता. खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब होतं ते.

वधु परीक्षेच्या वेळी मुलाच्या आईने एकच प्रश्न ऐलुला विचारला होता,

” तुला चोळी शिवता येते का?”

” हो येते की.”

आणि तिने काही तासातच, तिथल्या तिथेच दिलेले कापड, कातर, सुई दोरा घेऊन सुरेख घाटदार चोळी शिवून दाखवली.

लग्न जमले. झाले. दादाजींनी भरल्या डोळ्यांनी तिची पाठवणी केली. आई म्हणाली, ” आता तू त्या घरची तुळस! सदैव हरित रहा, कधीच सुकू नकोस.”

त्यावेळी सूर्य आकाशात मध्यावर होता. सावली पायात होती. तिला उगीचच वाटलं कोणालातरी विचारावं, “उत्तरायण सुरू झालं का?”

कुंडलीतले ग्रह जमले होते पण ऐलू च्या मनात मणभर दगडांचं ओझं होतं. लग्न झालं म्हणजे नक्की काय झालं हे तिला कळत नव्हतं. या घरातून त्या घरात जायचं, या साऱ्याच अनोळखी माणसांना आपलं म्हणायचं. या सार्‍यांचे स्पष्ट अर्थ तिला लागत नव्हते. 

अवघं सोळा वर्षांचं वय. गर्भधारणा झाली. सासू आनंदली. “वंशाचा दिवा लागू दे ग बाई!” असं बडबडत ती ऐलुभवती फिरायची. तिची काळजी घ्यायची. नवऱ्याशी पुरती ओळखही झाली नाही आपली. चार शब्द मनमोकळेपणाने आपण कधी बोललो नाही. रीत, परंपरा, मर्यादा, बंधने तोडली नाहीत. फक्त निसर्गाने गर्भधारणे चे काम केले. 

मुलगा झाला. गोरापान, सुदृढ, टपोरे डोळे. सुईणीने जन्मलेला गोळा हातात झेलला आणि ती सहज म्हणाली “बयो!आता तुझ्या आयुष्यात हाच सुखाचा ठेवा ग बाई! जगलीस तरी याच्यासाठी आणि मेलीस तरी याच्यासाठीच.”

काय अर्थ होता या भाष्याचा? पुत्र जन्माचा आनंद तर होताच पण आकाशात सूर्य मावळत होता. दक्षिणायन संपले नव्हते. उत्तरायण सुरु झाले नव्हते. जन्म मृत्यूचे गणित कळत नाही. एक दिवा उजळला होता. आणि एक दिवा मालवत होता. कुंडलीतले भविष्य खोटे ठरले होते. दीर्घ वैवाहिक सौख्याचे त्यांनी मांडलेले भाकीत जळून खाक झाले होते.

काळाने नारायण चा घास घेतला होता. ऐलुच्या मांडीवर जना शांत झोपला होता. अंधारातले भविष्य पहात. 

इथून सुरू झाली ती ऐलू ची लढाई. तिच्या स्त्रीत्वाची परीक्षा. माता होणे म्हणजे काय हे समजण्याआधीच तिचं मातृत्व कसोटीला लागलं होतं. 

दादाजी तिला न्यायला आले होते. म्हणाले,

” चल. मी तुझी आणि जनाची जबाबदारी घेतो. उभं आयुष्य तुझा सांभाळ करेन.”

पुत्र निधनाने अल्पावधीतच वाकलेले वृद्ध सासू-सासरे ऐकत होते, पाहत होते. पण ऐलुने स्पष्ट नकार दिला. कशी जगशील? काय करशील? या कशाचे उत्तर तिच्याकडे त्या क्षणी नव्हतं. पण तरीही तिने दादाजींना माघारी पाठवलं. तिला एवढंच कळत होतं की आता काळा बरोबरची लढाई आहे. अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या संक्रमणाचा काळ किती मोठा असेल ते मात्र तिला माहीत नव्हते. पण लढण्याचा वसा तिने घेतला. स्थिर सूर्याच्या आभासी भ्रमणाला तिने वंदन केले. आणि उत्तरायणाच्या दिशेकडे पाहिले.

एक दिवस तिचा बाळ शांत झोपला होता. घरात सामसूम होती. उन्हे कलली होती. सावल्या लांब होत होत्या. अनवाणीच ऐलु बाहेर पडली. तळ्याकाठच्या कोपिनेश्वर देवळापाशी ती झपाझप आली. लांबलचक जलाशयाच्या किनारी शेवाळं साचलं होतं. पण मध्यावर असंख्य गुलाबी कमळ फुलली होती. क्षणभर तिला वाटलं या जळाला आपलं जीवन अर्पण करून टाकूया. पण ती मागे वळली. देवळाच्या पायऱ्या चढून गाभार्‍यात आली. बुवांचे कीर्तन चालू होते. सुरेल, संगीतमय, रसाळ वाणीत त्यांनी कथाकथन मांडले होते.

” कुरुक्षेत्री, अर्जुनाने सजविलेल्या बाणशय्येवर इच्छामरणी भीष्माचार्यांचा देह पहुडला होता. पांडव, कौरव सारे जवळ होते. द्रौपदी, कुंती, गांधारी या महान तत्वज्ञानी, आदर्शवादी, वचनबद्ध योद्ध्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र भीष्माचार्यांची नजर फक्त सूर्याकडे होती. दक्षिणायन संपून उत्तरायणाची ते वाट पाहत होते. शेवटचे श्वास त्यांनी त्यासाठी मनोबलाने धरून ठेवले होते.”

ऐलु, बुवांचा एक एक शब्द मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवत होती. तिला वाटलं आज आपणही अशाच टोकदार बाणशय्येवर आहोत. मात्र आपले उत्तरायण हे वेगळ्या अर्थाचे आहे.

त्यानंतर ती झपाटल्यासारखी घरी आली. तिने तिच्या गोऱ्यापान, गुटगुटीत, तेजस्वी डोळ्यांच्या बाळाला उचलले आणि मोठ्याने म्हटलं, ” बाळा! तुझ्यासाठीच मी जगेन. तुला मोठा करेन. सुखाच्या राशीवर आरुढ झालेला पाहीन आणि हा घेतलेला वसा उतणार नाही मातणार नाही.” 

सासुबाईंनी केलेला तो प्रश्न तिला आठवला. 

“तुला चोळी शिवता येते का?”

तिच्या जगण्याचा मार्ग तिला सापडला.

सुरुवातीला ती अब्दुल इसाक च्या ओटीवर बसून त्याच्याच मशीनवर शिवणकाम करायची. त्याला कापड बेतण्यात, काजं-बटणं शिवण्यात, टिपा घालण्यात मदत करायची. तो तिला मोबदला द्यायचा.

कधी दिवस असायचा. कधी रात्र असायची. कधी ऊन असायचं, कधी पाऊस असायचा. पण ती अखंडपणे अनवाणी चालत राहायची. सासूने प्रचंड विरोध केला. तिचे असे बाहेर जाऊन काम करणे, आणि तेही अब्दुल ईसाक नावाच्या माणसाबरोबर, यावर तिने कठोरपणे नापसंतीची मुद्रा उमटवली. 

पण आता मागे फिरणे नाही. ती ठाम राहिली. तिला तिचे आकाश दिसत होते. वाटेतले खड्डे ती ओलांडत राहिली. काटे वेचत राहिली. जळत्या निखाऱ्यावर अनवाणी चालत राहिली. 

स्वर्गारोहण करणारे पांडव तिला दिसायचे. पण पहिल्याच टप्प्यावर कोसळलेल्या द्रौपदी सारखे तिला नव्हते व्हायचे. तिने कधी मौन बाळगले तर कधी शब्दांचे टोकदार फटकरेही मारले पण सुरू केलेला प्रवास तिने अर्धवट सोडला नाही. 

कालांतराने तिला तिची ओळख मिळाली. आता ती एक बिचारी, दुर्दैवी, लहान वयातली विधवा नव्हती. तर गावातली, त्या काळातली एक अत्यंत कुशल अशी फॅशन डिझायनर होती. उच्चभ्रू सोसायटीतल्या बायका वेगवेगळ्या फॅशनचे झंपर तिच्याकडे शिवायला देत आणि घालून मिरवत.तिचा व्यवसाय विस्तारत गेला.

पैसा येऊ लागला. जनाही मोठा होत होता. आयुष्याचे एक एक टप्पे दिमाखदारपणे पार पाडत होता. ऐलू तिच्या साकारणाऱ्या स्वप्नांकडे साश्रु नयनांनी पहात होती. तिच्या रोजनिशीचं एक एक पान भरत होतं. पानापानावर मोगरा फुलत होता. अजुनही ती अनवाणीच चालत होती. पावलं रापली होती. टाचांना भेगा पडल्या होत्या. नखं काळवंडली होती.

आणि एक दिवस जना घरी आला. नेहमीप्रमाणे उंबरठ्यातच “आई!” म्हणून त्याने मोठ्याने हाक मारली. ऐलु लगबगीने बाहेर आली. 

” आलास बाबा. किती दमलास! बैस. तुझ्यासाठी कोलांजन केले आहे.ते पी. मग बरं वाटेल तुला.”

” ते राहू दे! आधी तू या खुर्चीत बस. पावले दाखव तर. त्यांनी एक पुडक सोडलं. त्यात सुरेख, दोन पट्ट्यांवर छान नक्षी केलेल्या सोनेरी रंगाच्या चामड्याच्या चपला होत्या. जनाने त्या चपला हळूच तिच्या पायात सरकवल्या. “आता तू अनवाणी चालायचं नाहीस. माझ्या पहिल्या कमाईतून तुझ्यासाठी आणलेले हे सुवर्णाचे जोडे समज.”

जनाने डोळ्यातल्या अश्रूंनी तिचे थकलेले चरण धुतले जणू! अश्रूंचा महापूरच उसळला. एका घट्ट मिठीत वात्सल्य विसावलं.

आणि त्या दिवशीच ऐलुने लिहिले,

” आता माझ्या आयुष्याचे उत्तरायण सुरू झाले.”

जीजी च्या डायरीतल्या या शेवटच्या ओळी होत्या. नंतर तिने काहीही लिहिले नाही.जणू तिचे व्रत पूर्ण झाले होते. तिचा संक्रमण काळ शुभ राशीत प्रवेशला होता. तिच्या खडतर प्रवासाचे, फसवणुकीचे, विश्वासघाताचे, विकृत नजरेचे, त्या काळातल्या स्त्री जन्माच्या कहाणीचे, आणि त्यातूनही अश्रुंची फुले झालेल्या क्षणांचे, तिने लिहीलेले, अनेक किस्से मी साश्रु नयनाने वाचले होते. मात्र या ओळीपाशी तिचे आत्मवृत्त संपले होते.

मी डायरी बंद केली. खुर्चीच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून घेतले. आता मला खऱ्या अर्थाने उत्तरायण याचा अर्थ समजला होता. ब्रम्हांडात सतत चालू असलेल्या ग्रहताऱ्यांच्या भ्रमंतीचा मानवी जीवनाशी असलेला संदर्भ आणि शिकवण मला मिळाली होती.मी आकाशाकडे पाहिले.मावळत्या सूर्याची कक्षा बदलली होती.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 3 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 3 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(आपला एवढा श्रीमंत मुलगा असल्या साध्या पायजमा शर्टात बघून पोटात तुटले शलाकाच्या…)  इथून पुढे —

नितिन समोर आला आणि म्हणाला, “ बाबा, जरा आत या.” त्याच्या वॉर्डमध्ये नितीनने त्याला नेले. सगळ्या भिंती सुंदर सुंदर चित्रांनी सुशोभित झाल्या होत्या. “ बाबा, हे मी काढलंय. आवडलं का?” डोळ्यात पाणीच आलं  शलाका आणि सुशीलच्या. लहान मुलाच्या डोळ्यात असते तशा अपेक्षेने नितीन आईवडिलांकडे बघत होता. सुशीलने त्याला पोटाशी धरले. “ किती रे सुंदर काढलं आहेस बाळा ! अजूनही वेळ गेली नाही. तू होऊ शकतोस चांगला आर्टिस्ट.”  नितिन काहीच बोलला नाही,आणि निघून गेला तिथून. सुशील तिथल्या संचालकांना भेटला. ते म्हणाले,” नितीन सुधारतोय  आणखी वेळ लागेल, पण नक्की बाहेर येईल यातून तो. नक्की बरा होईल.  मग ठरवू त्याचे काय करायचे ते.” 

नितीनला पूर्ण एक वर्ष लागलं यातून बाहेर यायला. तो पूर्ण वर्षभर त्या संस्थेत राहिला. तिथल्या साध्या सुध्या लोकांत अगदी मिसळून गेला. त्याला घरची आठवणही आली नाही कधी. एकदा अचानक आजोबा आजी त्याला भेटायला आले. नितिनला इतका आनंद झाला. आजोबांना मिठी मारून तो रडायला लागला. 

“ आजोबा, मला माफ करा. मी तुमच्या कोणत्याच अपेक्षा पुऱ्या नाही करू शकलो. बहकत गेलो आणि स्वतःच्या हाताने नुकसान करून घेतलं. तुम्ही परोपरीने सांगत होतात, “ नितीन, तुला हवं तेच करिअर कर . आयुष्य तुझं आहे,, तुला हक्क आहे हवं ते करायचा. ” पण मी ऐकलं नाही. आईच्या महत्वाकांक्षेपुढे माझं  काही चाललं नाही .अर्थात मी तिला दोष देत नाही. माझ्याच भल्यासाठी ती हे सांगत होती ना. पण मला ते  झेपलं नाही आजोबा !” आजोबांनी नितीनला जवळ घेतलं. त्याचे डोळे पुसले. “ नितीन, मागचं सगळं आता विसरून जायचं. तू आणखी एक वर्ष असा छान राहिलास, तर मी तुला सरप्राईज देणार आहे.”  आजोबांना बरे वाटले. आपला नातू आता नक्की मार्गी लागणार याची खात्री वाटत होती त्यांना. ते संचालकांना भेटून आले. त्यांनीही नितीनबद्दल समाधान व्यक्त केले. म्हणाले, “आजोबा, या मुलांवर लक्ष ठेवावे लागते. कधी ती पटकन पुन्हा व्यसनाकडे झुकतील, सांगता येत नाही. सलग पाच वर्षे गेली की मग बहुतेक तो धोका टळतो. मला खात्री आहे, तुम्ही त्याला नक्की वर काढाल. “  

शलाका घरी आली की अतिशय निराश होई. बाकीच्या डॉक्टरांची मुले बघितली की ती अस्वस्थ होई. कुणालचा मुलगा लंडनहून एफ.आर. सी.एस. होऊन आला.

नीलिमाची  पूर्वा  डेंटिस्ट झाली..  या बातम्या ऐकून कासावीस व्हायची शलाका. यात आपला मुलगा कुठेच नाही याचे शल्य तिला टोचत राही. आपलं काय चुकलं याचा विचार करून वेड लागायची पाळी येई शलाकाला. सुशीलने तिला समजावणेही हल्ली सोडून दिले होते. दोन वर्षांनी नितीन घरी आला. एक महिना त्याला सगळ्यांनी त्याचा स्वतःचा वेळ दिला. तो अगदी पूर्वीचा नितीन झालाय, ही खात्री पटली सगळ्या घराला. एक दिवस नितीन आजोबांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, “ आजोबा, मला तुम्ही सरप्राईज देणार होतात ना? तुम्हाला मी आता त्यासाठी योग्य झालोय असं वाटतंय का? “ आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं.. “. हो रे माझ्या बाळा. आपण उद्याच जाऊया तुझं सरप्राईज बघायला !” 

दुसऱ्या दिवशी गाडी काढून सगळे कुटुंब एका इमारतीपाशी गेले. आजोबा म्हणाले,” नितिन, इथेच रहात होतो बरं का आम्ही पूर्वी ! इथे  चाळ होती, तिथेच तुझे बाबा डॉक्टर होईपर्यंत राहिले. ती चाळ पडली आणि ही मोठी  इमारत उभी राहिली, त्यात मला तीन खोल्या मिळाल्या. आम्ही आमच्या जुन्या खोल्या विकल्या नव्हत्या. चल आत !”

 दुसऱ्या मजल्यावर  नवीन कोरा ब्लॉक तयार होता. “ नितीन, इथे तू तुझा स्टुडिओ काढ. तू उत्तम आर्टिस्ट आहेस. अरे, तुझ्या हातातली कला तर नाही ना कोणी काढून घेतली? नसली डिग्री तुला तर नसली ! ही तुला आजोबा आजीची भेट ! “ सुशील शलाका थक्क झाले. त्यांच्या आणि नितीनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ आजोबा, मी जिवापाड मेहनत करीन. तुम्हाला अपयश कधीही देणार नाही.” नितीनने आजोबांना मिठी मारली. “ बाबा, कमाल आहे तुमची हो ! मलाही पत्ता लागू दिला नाहीत कधी? किती ग्रेट असाल बाबा “ सुशीलने साष्टांग नमस्कार घातला आईवडिलांना. शलाकाने आजींना मिठी मारली. “ आजी, कसे फेडू उपकार तुमचे मी? माझा मुलगा तुमच्यामुळे माणसात आला.” 

या गोष्टीला आता सात आठ वर्षे झाली. आज नितीनचा स्टुडिओ नाव कमावून आहे. खूप मोठ्या पुस्तकांची कव्हर्स तो करतो. त्याच्या हाताखाली आणखी दहा आर्टिस्ट काम करतात. नितिनच्या, ‘ विनायक आर्टस् ‘ च्या  कामासाठी लोक सहा सहा महिने थांबायलाही तयार असतात.  पूर्वीचा नितीन आता कुठे गेला, हे कोणालाही आठवत नाही. नितीनने आपल्या आजोबांचे नाव स्टुडिओला दिलंय. ‘ विनायक आर्टस् ‘ . आजोबा आजी नितीनचं यश बघून सुखासमाधानाने  देवाघरी गेले.  नितीन त्यांना कधीही विसरू शकत नाही. आज नितीन प्रतिष्ठित जाहिरात स्टुडिओ असलेल्या लोकांमध्ये गणला जातो. त्यानेच मुखपृष्ठ करावे म्हणून लेखक हटून बसतात. त्याच्या सुंदर म्यूरल् नी मोठ्या उद्योगपतींचे हॉल सुशोभित झाले आहेत. कधी नितीन एकटा असला, की आपले मागचे दिवस आठवतो, सरळ उठून त्या व्यसनमुक्ती  केंद्रात जाऊन तिथल्या मुलांना भेटतो. त्यांना आपली कहाणी न लाजता सांगतो, आणि ‘ कधीही असे व्यसनात अडकू नका रे मुलांनो,’ असे कळवळून  सांगतो.

 नितीनने चोवीस तास आपल्या कलेला वाहून घेतले आहे. त्याने लग्न केले नाही, आणि करणारही नाही.  तो म्हणतो, ‘ मला आता वेळ नाही, आणि त्या व्यापात पडायचेच नाही मला.’ 

 शलाका सुशीलने हॉस्पिटल चालवायला दिले आणि सुशील  हौसेने नितीनच्या स्टुडिओचे सगळे आर्थिक व्यवहार बघतो.

एका अक्षरशः मातीमोल होणाऱ्या आयुष्याचे,  शंभर नंबरी सोने होण्याची किमया नितीनच्या आयुष्यात घडली….. फक्त त्याच्या आजी आजोबांच्या दूरदृष्टीने….. त्यांनी त्याच्यावर टाकलेल्या  गाढ विश्वासाने !

नितीन कायम त्यांच्या  ऋणातच आणि स्मृतीतच रहाणे पसंत करतो.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(नितिनला  बारावीला खूप कमी गुण मिळाले आणि भरपूर पैसे खर्च करायला लागून मलेशियाला मेडिकलला प्रवेश मिळाला त्याला.) इथून पुढे —-

सुशील  म्हणालाही होता, ‘ तुला तिकडे तरी झेपणार आहे का हा मेडिकलचा कोर्स? अवघड असतो तो. आम्ही गेलोय बरं यातून, तेही मेरिटवर. नितिन,तू उगीच नको मागे लागू. तुला कमर्शिअल आर्टस् ला मिळतेय ऍडमिशन तर घे ना. “ नाही बाबा ! मला आई म्हणते  म्हणून डॉक्टरच व्हायचंय. मग बघा,कसे खोऱ्याने पैसे ओढतो ते ! मला ती माझ्या  मनाप्रमाणे आर्टिस्ट होऊ देणार नाही ना,मग ठीक आहे,..” सुशील हे ऐकून हादरूनच गेला.आणि शलाका हे मोठ्या कौतुकाने ऐकत होती.

“ अग, काय बोलतोय हा? आपण असलं कधी केलं नाही,करणारही नाही. शलाका,वेळीच आवर  घाल बरं याला ! “—- “ छे हो ! नवीन पिढी आहे ही. एवढा खर्च आपण करणार, तो मग भरून काढायला नको का?“ 

सुशील काहीही बोलला नाही. पुढची वाटचाल अवघड आहे, हे मात्र ओळखले त्याने. मलेशियाला जाऊन  दोन वर्षे झाली होती, आणि तेवढ्यात नितिन चारवेळा येऊन गेला होता भारतात. केस वाढलेले,  वजन कमी झालेलं, नजर अस्थिर, आणि रात्ररात्र झोप नाही . सुशील ने विचारलंही, “ अरे, तिकडे सगळं ठीक आहे ना?— “ बाबा, मी आता परत जाणार नाही तिकडे. मला नाही आवडत तिकडलं काहीच. मुलं चांगली नाहीत, व्यसनी आहेत आणि माझ्याकडे सारखे पैसे मागतात.” 

हा मुलगा आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय असं वाटलं सुशीलला आणि नाही म्हटलं तरी तो थोडा काळजीत पडला होता. म्हणून यावेळी तो जबरदस्तीने स्वतः पोचवायला गेला त्याला मलेशियाला…. कॉलेज चांगले होते की… कितीतरी भारतीय मुले मुली अगदी आनंदात तिथे राहात होती, कोणी दुसऱ्या, कोणी तिसऱ्या मेडिकलच्या वर्षाला होती. सुशील कॉलेजच्या  प्रोफेसर्सना भेटला… आणि  एकेक धक्कादायक गोष्टी त्याच्या कानावर आल्या. नितीनने एकही परीक्षाच दिली नव्हती. त्याने कोणताही क्लाससुद्धा अटेंड केलाच नव्हता. त्याला कॉलेजने रस्टिकेट केले होते. अनेकवेळा वॉर्निंग देऊनही त्याने पेरेन्ट्सना काहीच सांगितले नव्हते की फोन केला नव्हता. डीनने सुशीलला स्पष्ट सांगितलं, “ आता आमच्या  हातात काहीही नाही. हा मुलगा एकही परीक्षा न देता इथे कसा ठेवून घेणार आम्ही? त्याला तुम्ही भारतात घेऊन जा. तिकडेच बघा काही जमलं तर.” .. 

हताश होऊन सुशील नितिनला भारतात घेऊन आला.  नितीनला त्याचे सुख दुःखही नव्हते.   तो घरी आला आणि शलाका हादरूनच  गेली. “ अरे, नक्की काय झालं तिकडे? सगळी मुलं नीट राहतात, ती आता तिसऱ्या वर्षाला गेली आणि तू, पहिल्या वर्षाचीही परीक्षा दिली नाहीस? मग करत काय होतास तिथे?”  यावर नितीन निर्विकारपणे म्हणाला, “ मला नाही समजायचे ते काय शिकवतात ते. मी मग वर्गात जाणेच सोडून दिले. मला आता शिकायचेच नाही काहीही.” शलाका सुशील हताश झाले. एवढा मोठा तरुण मुलगा चोवीस तास नुसता घरात बसतो, काहीही करत नाही, हे बघणे त्यांच्या सहनशक्ती पलीकडले होते. सगळ्या घराची शांतता भंग पावली.  

सुशीलने त्याच्या  सायकियाट्रिस्ट मित्राची अपॉइंटमेंट घेतली आणि नितीनला त्याच्याकडे नेले. दोन सेशन्स मध्ये लक्षात आले की त्याच्यावर रॅगिंग झाले होते आणि ,नितिन ते सहन करू शकला नाही….  आणि  बघता बघता पूर्ण डिप्रेशनमध्येच गेला.  डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्याला बोलते केले.  मग नितीन एकेक गोष्ट सांगू लागला. तिकडे परदेशातून आलेली मुलं त्याला पैसे मागायची,  कॅन्टीनमध्ये जाऊ द्यायची नाहीत, कपडे  लॉन्ड्रीत टाकू द्यायची नाहीत… आणि असे बरेच काही ..  आपल्या इंडियन मुलांनी खूप मदत केली. काही दिवसात हे प्रकारही थांबले. पण नितीनने याचा धसकाच घेतला. “ अरे,मुलीही तिकडे यशस्वीरीत्या सगळा कोर्स पूर्ण करतात, कोणताही त्रास त्यांना होत नाही आणि तुलाच हे कसे काय झाले?”  नितिन चक्क खोटे बोलत होता हेही डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याला तिकडे रहायचेच नव्हते. लहानपणापासून अत्यंत लाडावलेला, म्हणेल ते हातात पडत गेलेला, त्यामुळे स्वतः एकटे रहायची आणि आपली कामे करण्याची वेळच कधी आली नव्हती नितीनवर. सुशीलने नितीनच्या तिकडे असलेल्या रूम पार्टनरला फोन केला. सुदैवाने तो भारतीयच होता. त्याने सांगितले की, “ नितिनला कोणीही कधीही त्रास दिलेला नाही, रॅगिंग केलेले नाही. हा कधीही क्लासमध्ये आला नाही. मीच खूपदा समजावून सांगितले पण हा ऐकायचाच नाही काका. तुम्हाला माहीत नसेल, त्याला  ड्रग्स घ्यायची सवय लागली. सगळे पैसे तो उधळून टाकायचा. काका, मला नाही वाटत तो शिकेल. तुम्ही ट्रीटमेंट द्या त्याला. आम्हाला त्याने तुमचा नंबरही दिला नाही, नाही तर मी कॉन्टॅक्ट केले असते तुम्हाला. त्याला इकडे पाठवू नका, तो चांगल्या मुलांच्या संगतीत नाही.” 

सुशील आणि शलाका कमालीचे हताश झाले. डोळ्यादेखत आपला मुलगा असा  हातातून जात असलेला बघून त्यांचे जगणे म्हणजे यातनाघर झाले. नितीनला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते. नुसते खाणे, भटकणे आणि टी व्ही बघणे, हीच दिनचर्या झालेली होती त्याची. सुशील शलाका दिवसदिवस बोलत नसत त्याच्याशी ! तोही मुर्दाडासारखा नुसता हॉलमध्ये चोवीस तास सोफ्यावर लोळत पडे.

आजी आजोबांनाही  हे बघून अत्यंत वाईट वाटे. तो त्यांच्याशीही बोलत नसे. सोन्यासारखा हसरा, गुणी मुलगा असा झालेला बघून आणि त्यामुळे सगळ्या घरावर काळी सावली झाकोळलेली बघून त्यांना फार वाईट वाटे. यातून काय मार्ग काढावा, या विचाराने शलाका सुशीलची झोप उडाली. दिवसेंदिवस नितीन हाताबाहेर जाऊ लागला. घरातले पैसे चोरीला जाऊ लागले आणि घरातच स्वतःच्या खोलीत बसून तो ड्रग्ज घेऊ लागला. हे लक्षात आल्याबरोबर, सुशीलने त्याची चांगलीच कानउघाडणी केली आणि म्हणाला,” पुन्हा जर हे माझ्या लक्षात आले तर मी तुला नक्कीच ऍडमिट करणार नितिन ! बस झाले आता !” 

नितीनच्या विरोधाला न जुमानता सुशीलने बोलल्याप्रमाणे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. सुशील शलाकाला अत्यंत वाईट वाटले. सुशील म्हणाला, “शलाका, तुझ्या अति महत्वाकांक्षेचा बळी ठरला नितीन.

तुला मी दोष देत नाही, सगळीच मुलं काही व्यसनी होत नाहीत, की वाईट मार्गाला लागत नाहीत. आता काय होईल ते आपण फक्त बघायचे.”   सहा  महिन्यांनी दोघे भेटायला गेले नितीनला. तब्बेत छानच सुधारली होती त्याची. आपला एवढा श्रीमंत मुलगा असल्या साध्या पायजमा शर्टात बघून पोटात तुटले शलाकाच्या…..

–क्रमशः भाग दुसरा

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

शलाका आज मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीचा मुलगा आता बारावीला होता. जोरात अभ्यास चालला होता त्याचा. “ काय रे, तूही आईबाबांसारखा डॉक्टर होणार का? आमचा नितिन बघ. गेला बाबा मलेशियाला. छान चाललंय त्याचं अगदी ! “ शलाकाने ध्रुवला सांगितलं. ध्रुव म्हणाला, “ मावशी, माझं असं काहीही नाही. मी डॉक्टरच व्हावं असा काही आईबाबांचा आग्रह तर बिलकूल नाही. आणि मी सगळे ऑप्शन्स ओपन ठेवलेत. मार्क्स काय मिळतील त्यावर आहे सगळे अवलंबून.  प्रयत्न करणं फक्त माझ्या हातात ! ” ध्रुव शांतपणे म्हणाला.  

शलाका आणि सुशील दोघेही डॉक्टर होते.शलाका स्त्रीरोग तज्ञ आणि सुशील  सर्जन ! शलाकाला नितिन आणि नीति अशी दोन मुलं ! शाळेत असताना दोन्ही मुलं अतिशय हुशार होती. मुलांचे आजोबा त्या दोघांचा ठाकून  ठोकून अभ्यास करून घ्यायचे. हाडाचे शिक्षक होते आजीआजोबा दोघेही ! मुलांना सुरेख मार्क्स मिळाले, पहिले नंबर आले की आजी आजोबांना धन्य धन्य व्हायचे. सुशील त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मध्यमवर्गात सगळे बालपण गेले, पण सुशीलची कशाबद्दलही कुरकुर नसायची कधी. नेहमी अभ्यासात पहिलाच नंबर. अकरावीला बोर्डात आला होता सुशील आणि इंटरला  त्याला नामांकित  मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. आईवडिलांना धन्यधन्य झाले… हा घराण्यातला पहिला डॉक्टर मुलगा. त्याने सहज पूर्ण केले शिक्षण आणि एम एस ला प्रवेश घेतला. सर्जन झाल्यावर एका मोठ्या हॉस्पिटलला नोकरी घेतली त्याने आणि मोठा फ्लॅटही लगेचच घेतला. पण तोपर्यंत चाळीत रहाण्यात मात्र कोणताही कमीपणा वाटला नाही कधी सुशीलला !

आता राहणीमान सुधारले होते, आणि  मुलीही सांगून यायला लागल्या होत्या. सुशीलने त्याच्याच वर्गातल्या शलाकाशी लग्न ठरवलं. चांगलीच होती तीही, स्त्रीरोगतज्ञ आणि हुशार. पण श्रीमंत घरातून आल्यामुळे जरा गर्विष्ठ सुद्धा. पण सुशीलची पसंती महत्वाची होती. शिवाय त्याच्याच व्यवसायातल्या साथीदाराचा त्याला हॉस्पिटलमध्येही खूप उपयोगही झाला असताच.   सुशील शलाकाचे हॉस्पिटल छान चालू लागले. आजी आजोबांनी लेकाचे वैभव मनसोक्त उपभोगले. त्यांच्या समवयस्क लोकांबरोबर विमानाने प्रवासही केले,आणि तृप्त झाले.

 नीति नितीन– ही दोन्ही नातवंडेही अभ्यासात चांगलीच होती. पण आजी आजोबांनी सतत त्यांचा अभ्यास  करून घेतल्यामुळे त्यांची स्वतः नोट्स  काढणे, आपला अभ्यास आपण करणे, कोणते चॅप्टर्स महत्वाचे असतात हे सगळे स्वतःचे स्वतः जाणून घेणे, अशा महत्वाच्या आणि आवश्यक गोष्टींची सवय गेलीच होती… म्हणजे खरंतर तशी सवय लागलीच नव्हती. सगळे घरीच आयते सांगितले जात असे, आणि ते फक्त  घोकंपट्टी करून उत्तम मार्क्स मिळवत असत. 

पण शाळेत असेपर्यंत हे सगळे ठीक होते. दहावी पर्यंत पहिल्या तीन नंबरात येणारी नीति, कॉलेजच्या पहिल्या वर्षात कशीबशी फर्स्ट क्लास टिकवू शकली.कॉलेजचा अभ्यास तर आजी आजोबा घेऊ शकत नव्हते, आणि यांची आत्तापर्यंतची स्पून- फीडिंग ची सवय आता एकदम जाणार तरी कशी होती? परिणामी नीतिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं लक्षण काही दिसत नव्हतं. तिने बीएस्सी ला प्रवेश घेतला. शलाकाची अतिशय इच्छा होती– म्हणजे अशी महत्वाकांक्षाच होती.. की दोन्ही मुलं  डॉक्टरच झाली पाहिजेत. पण नीतिला कुठेही प्रवेश मिळाला नाही आणि भरमसाट पैसा देऊन कसातरी प्रवेश मिळवला असता, तरी ती हे शिक्षण पूर्ण करेलच याची खात्री तरी कुठे वाटत होती शलाकाला? 

काहीवेळा सुशीलला वाटायचं, ‘ या मुलांना वाढवण्यात आपण कुठे चुकलोय का ?’  एकदा तो आपल्या वडलांजवळ बसला आणि म्हणाला, ” बाबा, आपण चाळीत राहिलो, अगदी सामान्य परिस्थितीत सुद्धा  मी शिकलो, कुठेही डोनेशन न देता डॉक्टर झालो, मग ही मुलं अशी कशी?”

आजोबा म्हणाले, “राग येईल तुला, पण याला तुम्हीच कारणीभूत आहात. आणि शलाकाचे तरी ‘आई’ म्हणून किती लक्ष आहे सांग मुलांवर? सतत तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता, आणि त्याला पर्याय नाही हेही बरोबरच आहे.  पण म्हणून ती मुलं मागतील त्या गोष्टी तुम्ही त्यांच्या हातात देता हे बरोबर आहे का ? विचार कर जरा. नुसते बाहेरचे भरमसाट क्लास लावून काय उपयोग? मुळात एक गोष्ट लक्षात घे..  तुमची मुलं तुमच्यासारखी हुशार नाहीत.. दुर्दैवाने ! त्यांच्याकडून उगीच भलत्या अपेक्षा ठेवू नका. खरं सांगू का, मला नाही वाटत नितिनलाही मेडिकल झेपेल. करू दे की त्याला जे हवं ते ! त्यात कमीपणा मानायचे काय कारण आहे? करील तो पुढे पीएचडी सुद्धा. त्याचा कल कशाकडे आहे ते बघा ना ! तुम्ही डॉक्टर म्हणून त्यानेही डॉक्टरच  व्हायला हवे का? संगळ्यांचीच नसते तेवढी कुवत हे लक्षात घ्या रे जरा. “ 

सुशीलला बाबांचं म्हणणं तंतोतंत पटलं. तो लगेच शलाकाशी हे बोलला.. पण तिला ते अजिबात पटले नाही. “ हे बघ सुशील, नितीन डॉक्टरच झाला पाहिजे. आपले एवढे मोठे हॉस्पिटल….  आपल्यानंतर बघणार कोण मग ते ? आजोबा  आहेत जुन्या पिढीचे ! त्यांचं काय ऐकत बसतोस? हल्ली पैसे टाकले की कुठेही मिळते ऍडमिशन. आपण पाठवू त्याला परदेशात. आणि आता तू मध्येच असा नकारार्थी विचार करू नकोस.” पण सुशीलला तिचे म्हणणे अजिबात पटले नाही.  तो त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशीही बोलला. मनोज म्हणाला, “ अरे आपल्या मुलांनी आपलाच व्यवसाय पुढे चालवला पाहिजे असं कुठंय ? आता माझेच बघ की. आमच्या किरणला मेडिकलला मुळीच नव्हते जायचे. तो इंजिनिअरिंगला गेला आणि छान चाललंय की त्याचं. उत्तम नोकरी मिळालीय. आम्ही कधीही त्याच्यावर आमची मतं लादली नाहीत. न  का होईनात मुलं डॉक्टर. आपल्यानंतर आपल्या व्यवसायाचे काय..  हा विचार आपल्या मुलांनी केलाच पाहिजे हे मला तरी नाही पटत. सुशील रागावू नकोस, पण तुझी शलाका जरा वेगळीच आहे. बघ बाबा, तिच्या हट्टापायी मुलांचं भलतंच काही नुकसान होऊ नये याचा तू विचार करावास असं मी सुचवेन तुला.” मनोजने सुशीलला सावध केलं.  

एकदा सुशीलने  नितीनला विचारलंही होतं, “ नितिन, तुला काय व्हायचंय पुढे? मी तरी तुझ्यावर माझी मतं लादणार नाही. तुझा कल कशात आहे? “

नितिन म्हणाला होता,” बाबा, मला आर्टिस्ट व्हायचंय. माझं ड्रॉईंग बघा ना किती छान आहे. मला जेजे  स्कूल ऑफ आर्टस्ला जायला आवडेल. पण आईला  ते आवडणार नाही हे मला माहिती आहे. ती म्हणेल तेच मला करावे लागणार बाबा.” 

नितिनला  बारावीला खूप कमी गुण मिळाले आणि भरपूर पैसे खर्च करायला लागून मलेशियाला मेडिकलला प्रवेश मिळाला त्याला.

–क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

अल्प परिचय

शिक्षण – Bsc.B.ed.MMR.PGDPC

सम्प्रत्ति – निवृत्त शिक्षिका

अमृताचा चंद्र ह्या माझ्या व्यक्तिचित्रण पुस्तकास म.रा.सा.प.चे अनुदान प्राप्त. विविध मासिके आणि दैनिकात कथा प्रसिद्ध.

?जीवनरंग ?

☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

टे्रन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग दिल्लीला झालं. 6 महिने अजिबात रजा घेता आली नाही. आता, कधी एकदा गंधाला भेटू असं त्याला झालं होतं. तिला भेटण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता.

उद्या येतोय असं त्यानं कुणालाच कळवलं नव्हतं. 3-4 दिवसात कामाच्या व्यापात फोन झालाच नव्हता. तिचाही आला नव्हता.ं. आपल्याला समोर पाहून, गंधाला कसा सुखद धक्का बसेल, हे श्रेयसला डोळ्यासमोर दिसत होतं. तिचा चेहेरा कसा फुलून येईल, मोहोरून येईल, त्याच वेळेस कळवलं नाही, म्हणून रागवेल, डोळ्यात पाणी पण येईल, मग आपण तिची कशी समजूत काढू याच सुखस्वप्नात, तो रंगून गेला.

रागवल्यावर आपण तिची समजूत कशी काढू, ती मात्र तिच्या खास स्टाईलने कट्टी-फू करेल. जीभ काढून दाखवेल. अन् आपल्या काळजाचं पाणी-पाणी होईल. हाऽय!

गंधा-गंधा-गंधा! वेडं केलं होतं गंधाने त्याला. अगदी लहानपणापासूनच! दोघांची घरं शेजारी-शेजारीच होती. दोघांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, सख्य होतं. कुणीही त्यांच्याकडे पहातांना त्यांना शुभाशिर्वाद द्यायचे. जणू परमेश्वरानं ‘एकमेकांसाठी’ म्हणूनच जन्माला घातलं होतं. त्यांच्यात कधी ताई-दादा झालं नाही. नकळत्या वयापासून दोघं एकमेकांशी प्रेमाने वागत. धट्टा-कट्टा श्रेयस लहानग्या गंधाला उचलून फिरवायचा. तिला घेऊन झोक्यावर बसायचा. तिला उष्टं चॉकलेट भरवायचा. वय वाढत गेलं, तसतसं दोघांमधले प्रेमाचे बंध अधिकच घट्ट होत गेले. तारुण्यात हे प्रेम अधिकच गहिरं झालं. दोघांमध्ये आकर्षण वाढलं. एकमेकांशिवाय जग शून्य वाटू लागलं. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. श्रेयस रजा घेऊन आला की साखरपुडा करून घ्यायचा. नंतर लवकरच लग्न असं मोठ्यांनी ठरवलं होतं.

सार्‍या आयुष्यात पहिल्यांदाच दोघं एवढे दिवस एकमेकांना सोडून राहिले होते. आता श्रेयस 6 महिने भेटणार नाही, या विचाराने गंधाच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. श्रेयस वरवर तिला चिडवत होता, तोही फार दुःखी झाला होता. तिच्यापासून दूर जातांना…

आता 6 महिन्यांचा दुरावा संपला होता. उद्या…! उद्याच! गंधा आपल्या मिठीत असेल या विचाराने तो अधीर झाला होता. फक्त काही तास…! हो, पण गंधा ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा जीव तळमळत रहाणार होता. घरी पोहोचला तरी!

आई-बाबा नव्हतेच अपेक्षेप्रमाणे. आईची सकाळची शाळा. बाबांचा शनिवारचा दौरा!

सारं आवरून श्रेयस शांतपणे पेपर वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती.

वाचता-वाचता, त्याचा डोळा लागला. अचानक तो दरवळ जाणवला. खास! गंधाचा! तो टक्क जागा झाला. त्याचा विश्वासच बसेना! होय! निशिगंधा आली होती. चक्क! त्याच्या अगदी समीप! नाजूक निमुळत्या बोटांच्या ओंजळीतून त्याच्या चेहेर्‍यावर मोगर्‍याची फुलं ओतत होती. तिच्या दाट लांबसडक वेणीतही मोगर्‍याचा गजरा होताच नेहमीप्रमाणे. त्या-त्या ऋतुतल्या फुलांचा गजरा कायम तिच्या केसात असाचयाच! तिची आजी रोज म्हणजे रोज लाडक्या निशूसाठी गजरा करायची. बागेतल्या फुलांचा. त्यामुळेच निशिभोवती कुठला न् कुठला सुगंध कायम दरवळत असायचा. म्हणून तर श्रेयस तिला गंधा म्हणायचा! गंधाही त्याच्या मनात सारखी दरवळत असायची. तिचा दरवळ कायम त्याला वेढून असायचा. आताही ती त्याच्या मनातूनच जणू त्याच्या समोर येऊन उभी होती. अगदी समीप!

खरं तर तो तिला सरप्राईज देणार होता. पण प्रत्यक्षात तिनेच इथे येऊन त्याला धक्का दिला होता; तोही असा सुगंधी! सुंदर! त्याची आवडती आकाशी रंगाची, बारीक काठांची म्हैसूर सिल्कची साडी नेसून आली होती. सुंदर काळ्याभोर केसांमध्ये माळलेला मोगर्‍याचा गजरा, बदामी डोळे, रेखीव भुवया, केतकी वर्ण, लालचुटुक ओठांचं धनुष्य. नीतळ गळा, कमनीय बांधा… किती पाहू, पाहत राहू, असं त्याला झालं होतं. तेवढ्यात गंधाने तिचा केसांचा पुढे ओलेला शेपटा मागे टाकला. तिच्या केसांचा स्पर्श श्रेयसच्या चेहर्‍याला जाणवला. मोगर्‍यांच्या गंधाने तो रोमांचित झाला. त्याने चटकन् तिला पकडण्यासाठी हात पुढे केला. ती चटकन् एक गिरकी घेऊन मागे गेली. तिच्या पदलालित्याने श्रेयस वेडावून गेला. आसूसून तिच्याकडे पहात पहात तो पुढे पुढे गेला. ती मागे जात-जात भिंतीला टेकली. त्याने दोन्ही बाजूंनी हात भिंतीला टेकवले. तिला हलताच येईना. कैद झाली.

त्याची जवळीक… जीवघेणी! ती अस्वस्थ! स्तब्ध झाली! लाजेने पापण्या जडावल्या. दोघांचे श्वास एकमेकांत अडकले. ती चटकन् खाली बसली. सुळकन् बाहेर निसटली. तो निराश होऊन वळला. त्यानं टेबलावरची डबी घेतली. त्यातली अंगठी काढून तिच्या समोर धरली. खुणेनेच तिला जवळ बोलावलं. ती आली. तिच्या बोटात तो अंगठी घालणार, एवढ्यात बाहेर आईचा आवाज आला.

दोघांचीही भावसमाधी तुटली. तो चटकन् बाहेर आला. हे काय? आई-बाबा दोघेही इथे कसे? शाळा…ऑफिस सोडून? त्याला आश्चर्य वाटलं. आईलाही तो कसा काय आला, याचं आश्चर्य वाटलं. आई जवळ आली, तर आईचा नेहेमीचा प्रसन्न चेहरा खूप सुकलेला होता. डोळेही रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याला काही कळेना. त्याला पाहून तर आई त्याच्या कुशीतच कोसळली. हुंदक्यांनी तिचं सारं शरीर गदगदत होतं. तिच्या मागोमाग बाबाही आत आले. तेही गंभीर होते. श्रेयसच्या काळजात चर्रर् झालं. तो आईला घेऊन हॉलमध्ये आला. ते तिघंही सोफ्यावर बसले.

मघाशी त्याच्याजवळ बसलेली गंधा त्याला दिसली नाही. तो हाक मारू लागला. आई, गंधा कुठे गेली? गंधा, ए गंधा, अगं कुठं गेलीस? आई बघ का रडतेय. इकडे ये ना… तो जो-जो गंधाला हाका मारू लागला, तसतशी आई जोरजोरात रडू लागली.

श्रेयस बाहेर येऊन म्हणाला, ‘‘बापू गंधा गेली का? आत्ता आली होती ना?’’

बापूने डोळे विस्फारले अन् तोंडावर हात ठेवला. त्याला काही कळेना.

बाबा उठले, त्याच्याजवळ आले न् म्हणाले, ‘‘श्रेयस आत ये.’’

‘‘काय झालं बाबा? अहो गंधा आता आली होती. इथे माझ्याजवळ बसली होती. कितीतरी वेळ. खरंच. कुठं गेली अशी न सांगता?’’

बाबा म्हणाले, ‘‘अरे कशी येईल ती? शक्यच नाही.’’

‘‘का? का नाही येणार? अहो खरंच आली होती. इथेच माझ्याजवळ बसली होती.’’

आता तर आई खूपच रडायला लागली. रडत रडत म्हणाली, ‘‘अरे कशी येईल ती? आता कधीच नाही येणार.’’

‘‘का पण? असं का म्हणतेस आई? काही भांडण झालं का? सांग ना?’’

एव्हाना बापू, शांताबाई दोघंही खोलीत येऊन उभे होते. तेही रडत होते.

2-3 मिनिटं तशीच गेली. कुणी काहीच बोलेना. त्याला ती 2-3 मिनिटं 2-3 वर्षांसारखी वाटली. मग आई म्हणाली, ‘‘अहो सांगता का त्याला? कसं सांगायचं पण? तुम्हीच सांगा.’’ कसंबसं बोलून पुन्हा रडायला लागली. ‘काय सांगायचं’

‘बोल ना’ त्याची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती.

शेवटी त्याचे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, ‘‘श्रेया गंधा गेली सोडून आपल्याला. आत्ताच सकाळी 8 वाजता. तिकडंच होतो आम्ही. 3-4 दिवस ताप आल्याचं निमित्त झालं अन् आज सकाळी…’’ असं म्हणून तेही डोळे पुसू लागले.

‘‘क्काऽय? क्काऽय सांगता बाबा? काहीही काय बोलता? अहो मी 8 वाजता घरात होतो. विचारा बापूला. माझं सगळं आवरून इथंच बसलो होतो पेपर वाचत. तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती. चांगला अर्धा तास इथेच बसली होती.’’ हे बोलतांना त्याचा आवाज फाटला होता.

‘‘अरे कसं शक्य आहे बाळा? ती गेली रे राजा गेली…’’ रडतच पुढे म्हणाले, ‘‘खूप तपासण्या झाल्या. मेंदूत काही इन्फेक्शन झालंय, कदाचित मुंबईला हलवावं लागेल असे डॉक्टर म्हणाले. पण… पण म्हणून असं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं रे.’’

‘‘आता… आता सगळंच संपलंय. सगळंच!’’ असं म्हणून ते धाय मोकलून रडू लागले.

‘‘अहो काहीही बोलताय तुम्ही. हे बघा, हे बघा, तिने आणलेली मोगर्‍याची फुलं. ही बघा इथेच आहेत. ही बघा. इथे सोफ्यावरच आहेत. मी खोटं सांगतोय का?’’

खरंच तिथे मोगर्‍याची फुले पडलेली होती. शुभ्र, ताजी, सुगंधित!

आई-बाबा-बापू-शांताबाई सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना! फुलं खरंच होती तिथे.

काय बोलावं कुणालाच काही सुचेना. श्रेयसनं ती फुलं घेतली – गोळा करून. म्हणाला, ‘‘चला तुम्हाला दाखवतो. गंधा तिकडे असेल तिच्या घरी.’’ श्रांत, क्लांत, ढासळलेले बाबा त्याच्या बरोबर गेले. पाय ओढत.

घरात गेल्या-गेल्या निशिगंधाचं पार्थिव समोरच दिसलं.

तो ‘‘गंधाऽऽऽ’’ करून मोठ्ठ्यानं ओरडला. त्याबरोबर ती फुलं तिच्या पार्थिवावर पडली. अन् तोही कोसळला.

मोगर्‍याचा गंध दरवळतच राहिला… त्याने आणलेली… अंगठी… तिच्याजवळ पडलेली होती.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं-  अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.  आता इथून पुढे )

“कुठे गेली होतीस?” त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली.बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं.अजित आत आला.

” बरं वाटतंय का त्याला?”त्याने विचारलं.तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली.मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.

” साँरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे…..”

उत्तर न देता अनू रडत राहिली.अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं.त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला.

रात्री दोन वाजता त्याला जाग आली.अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.तो उठून बाहेर आला.अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.

” मी घेऊ त्याला?”त्याने अनूला विचारलं.तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं.अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला.एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते.मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही,ओरडत नाही.प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते.बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही.त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या.

दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं.पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक.तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही.अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची.

कंपनीत आलं की अजितला आज आँर्डर येणार नाही ना याची भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं.नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणउतारा केला.राचीची आँर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या आँफिसमध्ये गेल्याचं कळलं.नक्कीच तो आपली आँर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली.पण आता त्याने मनाची तयारी केली होती.अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती.पण तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हेही त्याला माहित होतं.आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला सुटी घेऊन यावं लागणार होतं.धावपळ होणार होती,त्रास होणार होता पण इलाज नव्हता.सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार कठीण होतं.

तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं.त्यात दुपारी शिपाई जी.एम.साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला.जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.

” मे आय कम ईन सर”

” येस कम ईन”

तो जी.एम.साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.

” हँव अ सीट माय बाँय”

अजित अवघडून  बसला.जी.एम.साहेबांनी ड्राँवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.

“धीस इज युवर आँर्डर.”

शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती आँर्डर आली होती.पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं.अजितच्या पायातलं त्राण गेलं.त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.

“काँग्रँच्युलेशन्स फाँर युवर प्रमोशन!”

त्याच्या कानावर जी.एम.साहेबांचे शब्द पडले आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

“प्रमोशन?विच प्रमोशन?”त्याने आश्चर्याने विचारलं.

“येस! यू हँव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट आँफ प्राँडक्शन मँनेजर.”

अजितला फारसा आनंद झाला नाही.राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला सांभाळणं सोपं नव्हतं.

” सर राचीका प्लांट कैसा है?जस्ट आस्कींग टू हँव अ नाँलेज बिफोर जाँयनिंग. “

“यु आर नाँट गोईंग टू राची.यु विल वर्क हिअर अँज प्राँडक्शन मँनेजर.”

“व्हाँट?”अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस माय बाँय”जी.एम.हसत म्हणाले.

“व्हाँट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?”

” उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाँज व्हेरी अँरोगंट पर्सन. ही नाँट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हँड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाँज व्हेरी मच नोन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाँर धीस पोस्ट. “

जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राँडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं होतं.म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता.

आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला.वाटेत त्याने पेढे घेतले.घरात तो शिरला तर बाळ हाँलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता.अनू किचनमध्ये काहितरी करत असावी.अजित बँग ठेवून बाळाकडे गेला.बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला.त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला.त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला.त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला.त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला.अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला.मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला.त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.

” द्या इकडे त्याला माझ्याकडे” अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.

” राहू दे ना थोडा वेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय.”

“नको.तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना” अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण आज बाळाचा मुड वेगळाच होता.त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली.आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला.अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.         ” बदमाश!विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते”हताश होऊन अनू म्हणाली.

“अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज” अजित कळकळीने म्हणाला.”     तो विसरेल. तुम्हीही विसराल हो.पण मी कशी विसरेन.नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात.त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं.बरं तरी सोफ्यावर आदळलं,फरशीवर आदळलं असतं तर…” बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.

” चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्या दिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो.”

” पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता.आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय.पण आँफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही.त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटँक आला होता.त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता.”

“अरे बापरे!अगं मग सांगायचंस ना!आपण गेलो असतो त्यांना भेटायला.”

” काय सांगणार?मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात.मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली.”

” आय अँम एक्स्ट्रिमली साँरी अनू.खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं.खुप पश्चाताप होतोय गं.माफ कर ना मला प्लीज!”

” मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस,निष्पापांचाच बळी गेला आहे.माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता.बस.परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे.”

” तुझी शपथ,अनू मी परत असं कधीही करणार नाही.”

बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं.आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.

” एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राँडक्शन मँनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली.बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ.”

“अहो त्यांना माईल्ड अटँक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाँक्टरांनी घरी पाठवलं.’      “मग तर पेढे खायलाच पाहिजे” असं म्हणून अजितने बँगेतला पेढ्यांचा बाँक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares