मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #199 ☆ ‘केवड्याचा भास…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 199 ?

☆ केवड्याचा भास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

केवड्याचा भास होतो

नागिनीचा त्रास होतो

 

हो म्हणावे ही अपेक्षा

खालीवरती श्वास होतो

 

आज का परका समजते ?

काल तर मी खास होतो

 

प्रीतिचा वनवास नव्हता

केवढा बिंधास होतो

 

काल तर तू पास केले

आज का नापास होतो ?

 

कावळ्यांनी संप केला

त्रास तर पिंडास होतो

 

मेघ नसता अंबरी का ?

मातिला आभास होतो

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेशरम ☆ सौ.वंदना हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ बेशरम… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

स्त्रीत्वाच्या ठिकऱ्या उडाल्या

झोप उडाली

कुठली जात

कुठला धर्म

कुठला नवरा

कुठला भाऊ

कुठले पोलिस

कुठली सत्ता

इथं तर

मानवता झाली बेपत्ता

माणसाच्या गराड्यात तिला

जनावरा सारखं ओढतात

तिच्या वस्त्रा बरोबर

तिचे सत्व उतरवतात

हवा तसा छळ करून

वाऱ्यावर सोडतात

व्यवस्थाच नग्न झाली

अब्रु कशी टिकणार….?

बेटी बचावच गुणगान

कुठं कुठं पुरणार….?

स्त्रीत्वाच्या सन्मान

कुणाला कसा भेटणार….

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाहीरअण्णाभाऊ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाहीरअण्णाभाऊ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

अन्याया विरुद्ध हाक देणारा

वाटेगावचा कोहिनूर हिरा

दीन दलितांना दिला न्याय खरा

साहित्य सम्राटाला या मानाचा मुजरा

 

शिक्षण शाळेत नाही घेतले

जेथे जातीयतेचे विष उगवले

जगाच्या शाळेत ज्ञान मिळविले

दीनांच्या कैवाऱ्याला हा मानाचा मुजरा

 

पायी चालत मुंबई गाठली

पायांची त्या चाळण झाली

कष्टकऱ्यांच्या अन्याया वाचा फोडली

लोकशाहिर अण्णाभाऊंना या मानाचा मुजरा

 

फकिरा लिहूनी अमर जाहला

ज्ञानाचा हा सूर्य तळपला

साहित्य क्षितीजी तारा झळकला

तेजस्वी प्रकाशाला हा मानाचा मुजरा

 

चरित्र यांचे प्रेरक ठरले

समानतेचे वारे वाहिले

दलितांचे कैवारी जाहले

समाजाच्या दीपस्तंभा हा मानाचा मुजरा

🍃

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आज १ ऑगस्ट …. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. ( १ ऑगस्ट १९२० ). 

दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याचं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात आहे. या राष्ट्रीय पुरुषाने विपुल लेखन केले.

” माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदूच वाटतो. 

माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ओतीव बांधा। रंग गव्हाळा।

कोर चंद्राची ।उदात्त गुणांची।

मोठ्या मनाची। सीता ती माझी रामाची ।

हसून बोलायची। मंद चालायची।

सुगंध केतकी। सतेज कांती ।

घडीव पुतळी। सोन्याची।

नव्या नवतीची। काडी दवण्याची।

रेखीव भुवया ।कमान जणू इंद्रधनुची।

हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची ।

तशी ती माझी। गरीबाची मैना ।

रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण।

नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली। माझ्या जीवाची होतीया काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. ती गरिबीमुळे झालेली आहे ..असावी.  राघू— मैने ची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत तिच्या प्रेमाचं, देहाचं,तिचं त्याच्या जीवनात असण्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे.  थोडक्यात हे एक सुंदर प्रेम गीत आहे.

पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला या रचनेमागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.  

माझी मैना ही एक छक्कड आहे.  छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे.  माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णाभाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

अण्णा भाऊंना गरिबीमुळे त्यांचं मूळ गाव वाटेगाव सोडावं लागलं.  काम धंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं.  हेल्पर, बुटपॉलिशवाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे केली.  ही कामे करता करता कोहिनूर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले.  या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली.  ते लेखक, शाहीर बनले.  त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला.

चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते.  नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.  त्याचवेळी माझी मैना ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणून.

ही मैना कोण याचे उत्तर या चळवळीत सापडलं.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.( एक मे १९६०) पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडले तरी देखील संयुक्त महाराष्ट्र हवा तसा झाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला.  माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत सुंदर मैना म्हणजेच निसर्गरम्य बेळगाव आणि कारवार.

आजही ही मैना प्रासंगिक आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वी लिहिलेली ,गायलेली ही छक्कड आजही  तितकीच ताजी तवानी आहे कारण अजूनही सीमा प्रश्न सुटलेला नाही म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल आहेच.

(कै. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून आणि अभिनयातून “माझी मैना” प्रचंड लोकप्रिय केली)

तर असा हा अलौकिक लोकशाहीर ! अण्णाभाऊ साठे…..  त्यांनी विपुल लेखन केले. कथा, कविता, गीत, लावण्या, कादंबऱ्या व नाट्य वृत्तांत, प्रवास वर्णने असे सर्व साहित्यप्रकार हाताळले. पण त्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ साहित्य कार्य म्हणजे त्यांनी लोकसंस्कृतीला रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ती गौरवली. जनमानसात रुजवली.

अण्णाभाऊ यांच्या जन्मदिनी या असाधारण लोकशाहीरास  भावपूर्ण श्रद्धांजली.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – विरह…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– विरह…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

आठवणींच्या आसवांनी,

भिजले भूतकाळाचे पान !

तुझ्याचसाठी रे झुरतेय मी,

नशिबाने चूकवले तुझे दान !

दिवस उगवतो अन् मावळतो,

छळते ती मज अनामिक कातरवेळ !

अपूर्ण आणाभाकांची सल टोचे मनी,

अपूर्णत्वाने खेळते जीवनाचा खेळ !

दाटून येतात रोज,

आठवणींचे काळे ढग !

भिजवतात ह्रदयाला,

दुरावला कसा तू जिवलग !

माझं हास्य मलाच फसवी,

जगात हसत कशी वावरतेस !

तुझ्या स्मृतींच्या क्षणाला,

एकल्या विश्वात का बावरतेस !

नियतीच्या कुंचल्यातील फटकाऱ्यांनी,

रेखाटलंय जीवनाचं अजब व्यंगचित्र !

कुणीही हसावं, कुणीही बोलावं,

भावनांनी खेळ मांडलाय विचित्र !

हृदयाच्या किनाऱ्यावर  आदळतात,

आठवणींच्या रोज आक्राळ लाटा !

तुझ्या माझ्या आयुष्यात दुभंगलेल्या,

चालतेय काट्यांनी सजलेल्या वाटा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(एक गेय रचना)

आला आला ग धावुनी/ सखा पाऊस साजणी.

आला आला ग धावुनी/ सखा पाऊस साजणी.———–!!धृ !!

 

आता सरला उन्हाळा/ ढग आभाळी सावळा

देतो नव्यानं उभारी / लावी धरतीला लळा

मग मिळतो इशारा /आता करावी पेरणी —————————! १ !

 

चालू झाली बातचीत/ आता सरली उसंत

नव्या उमेदीने नवी /आस जागली मनात

चला भिडुया कामाला / माती  कपाळी लावूनी————–!२!

 

एक सपान जोमात/ पीक पिकवलं रानात

होऊ सुखी समाधानी/ सखा बोलला कानात

भोगताना सुखदुःख / जड होईल पापणी———————–!३!

 

कष्ट सोसता सोसता/ वाढे संसाराचा गुंता

नाही निसर्गावरती / इथं कुणाचीच सत्ता

देव येतो धावुनीया /सोडवाया अडचणी ————————!४!

 

झाली आबाळ देहाची/ तगमग या जीवाची

खुळ्या काळजाला आता / आस लागली भेटीची

नाही दुजा भाव मनी / झालं रंग तसं पाणी ———————–!५!

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

ही दुनिया एक प्रचंड मोठा रंगपट आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेली भूमिका यथाशक्ती वठवत असतो.  कोणी अगदी नटश्रेष्ठ ठरतो तर कुणाची नुसती दखल सुद्धा घेतली जात नाही. या सर्व खेळाचा सूत्रधार चराचर व्यापून उरलेला तो विश्वेश असतो. हा एक खूप मोठा चिंतनशील, विचारप्रवर्तक अभ्यासाचा विषय आहे. याच विषयावरील डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांची ‘संसाराच्या रंगपटावर’ ही अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला या खेळाचा जणू ट्रेलरच दाखवते.

☆ संसाराच्या रंगपटावर ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 

जगण्याला भूमिका घेवूनी

          सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

©️ डॉ.  निशिकान्त श्रोत्री

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

☆ रसग्रहण ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

हे तीन ओळींचे वेगळे असे या गीताचे वैशिष्ट्यपूर्ण ध्रुवपद आहे. या अखिल ब्रम्हांडात तो विश्वेश लपलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेला असतो. वेळोवेळी तो वेगवेगळी रुपे घेऊन साकार होतो. प्रत्येकातच हृदयस्थ आत्माराम म्हणजे तोच ईश्वरी अंश असतो. तोच वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने प्रकट होतो.

मंचावर येताना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||१||

या पहिल्या कडव्यात कवीने जन्म आणि मृत्यू या घटनांचे सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे. बाळ जन्माला आले की सर्वांना अतिशय आनंद होतो. नव्या जीवाचे जल्लोषात स्वागत होते. तोही आपल्या बाललीलांनी,  पुढे आपल्या गुणांनी सर्वांना कधी आनंद देतो तर कधी रडवतो. हे करीत असताना स्वतः त्यात न गुरफटका तो मात्र वाट्याला आलेली भूमिका जगून घेतो. शेवटी डाव संपला की खेळाची कनात उतरवली जाते म्हणजे त्याचा मृत्यू होतो. त्यावेळी मात्र त्याच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख होते. याच पद्धतीने तो विश्वेश वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळी भूमिका साकारत असतो. इथे कनात उतरवण्याच्या रूपकातून मृत्यूची संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. एखाद्या डाव किंवा खेळ संपला की उभारलेली कनात उतरवतात. त्याचप्रमाणे जन्माला आलेला जीव मृत्यू पावतो. ही कनात उभारण्याची आणि कनात उतरवण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

जन्माला आलेला जीव आपली भूमिका कशी निभावतो हे कवीने या दुसऱ्या कडव्यात विशद केलेले आहे. कधी कधी जगण्यासाठी काही विहित कर्म बरोबर घेऊन त्याला योग्य अशी भूमिका घेऊनच हा जीव जन्माला येतो. कधी राजा म्हणून, तर कधी उच्चपदस्थ कार्यनिपुण अधिकारी म्हणून, कधी कलानिपुण कलाकार म्हणून, तर कधी समाजाचे भूषण अशी सन्माननीय व्यक्ती म्हणून जन्माला येतो. कर्तृत्वाचा, सन्मानाचा शेला पांघरून येतो. तर कधी तपस्वी, संन्याशी, विरक्त योगी बनून सर्वांना जीवनाचे वर्म, जगण्याचे प्रयोजन, सार्थकता याविषयी प्रबोधन करतो. असा हा विश्वेश अखंड ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो. सगळी पृथ्वी किंवा अख्खी सूर्यमालाही जिथे त्याला सामावून घेऊ शकत नाही तिथे देशाच्या सीमांचा तर प्रश्नच येत नाही. त्यात तो मावणारच नाही.

समाजात आदर्श म्हणून आदर सन्मान मिळून सन्मानाचे उच्च पद मिळणे आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य, सौख्य उपभोगणे यालाच भरजरी शेल्याचे रूपक योजिले आहे. तर उग्र तपश्चर्या करून वैराग्य प्राप्त केलेले विरक्तयोगी तपस्वी यांच्यासाठी नागव्याचे रूपक योजिले आहे. म्हणजे ते जगरुढीत न गुरफटता आपली वाट आपल्या मनाप्रमाणे चोखाळतात.

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधात राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||३||

या तिसऱ्या कडव्यात अविनाशी आत्म्याचा प्रवास कवीने स्पष्ट केलेला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति  नरोऽपराणी

तथा शरीराणि विहाय  जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ||

गीतेतील या श्लोकाचा अर्थ कवीने इथे अधिक स्पष्ट केलेला आहे. जसा खेळ संपला की पडदा पडतो. त्याप्रमाणे आपले विहितकर्म संपले की जीवाचा शेवट म्हणजे मृत्यू होतो. आत्मा हा जीव सोडून निघून जातो. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र जीर्ण झाले की ते बदलून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आत्मा एका देहातून निघाला की दुसऱ्या नवीन देण्यात अवतीर्ण होतो. इथे कवी म्हणतो की त्या जीवाचे जगणे संपले, पण कर्म अजून शिल्लक राहिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहाला शोधत फिरतो. अशाप्रकारे तो एका देहानंतर दुसऱ्या देहाच्या शोधासाठी नव्या जोमाने फिरत राहतो आणि नवीन वेश परिधान करून नव्या भूमिकेत रंगपटावर येतो.

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||४||

एक भूमिका संपते. पुढे दुसरी,  त्यातून तिसरी असा जीवाचा प्रवास सुरूच असतो. त्याचे वर्णन कवीने या शेवटच्या कडव्यात केलेले आहे.

पुन्हा नवा खेळ सुरू होतो. नवीन भूमिका असते. पण त्याची नेमकी कथा कुणालाच ठाऊक नसते. आपण म्हणतो ना,  ” प्रारब्धात काय काय लिहून ठेवले आहे कुणास ठाऊक ?” पण त्या अज्ञानात सुख मानून जगताना आपण कशासाठी जन्माला आलो?  आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचाच विसर पडतो आणि या देहाचे चोचले पुरविण्यात देहात रमून जातो. त्या जीवाला आपल्या संवादाची तोंड ओळखली नसते. हा नवा प्रवेश किती काळाचा आहे हेही ठाऊक नसते. तरीही तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन रंगपटावर येत असतो.

या सर्व प्रवासातून हे कळते की, आत्मा अविनाशी आहे, तो जुने वस्त्र बदलावे तसा देह बदलतो. पण एका जीवातून दुसऱ्यात प्रवेश, एका भूमिकेतून नव्याने वेषांतर करून नवी भूमिका वठवत या आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. कथा, संवाद, कार्यकाळ काहीही आधी माहीत नसताना काही भूमिका अप्रतिम ठरतात. समाज मानसात कायमच्या कोरल्या जातात. तर काही उत्तम, काही ठाकठीक, काही सुमार, तर काही अगदीच नाकारल्या जातात.

ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर असतो आणि तो वेगवेगळी रूपे घेत प्रकटतो. तर प्रत्येक जीव अंतरात्म्यामुळे वेगवेगळ्या भूमिका वठवतो हे मुख्य रूपक आहे.

पहिल्या कडव्यात कनात खाली उतरणे या रूपकातून मृत्यू होणे हा अचूक अर्थ स्पष्ट होतो.

दुसऱ्या कडव्यात भरजरी शेला हे सामाजिक मानसन्मान, ऐश्वर्य, सौख्य यासाठी योजलेले रूपक आहे. तर नागवा हे रूपक निर्भीडपणे, परखडपणे समाज प्रबोधन करणारा विरक्त योगी, संन्यासी यांच्यासाठी योजले आहे .

तिसऱ्या कडव्यात पडदा पडला की खेळ संपतो या रूपकातून मृत्यू झाला की  जीवात्मा तो देह सोडून जातो आणि ती भूमिका संपते ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीने उत्तम शब्द योजनेतून ही कविता जन्म-मृत्यूचे अव्याहत सुरू असणारे चक्र, त्या मागचा सूत्रधार आणि त्याच्या विविध भूमिका अतिशय सुंदर रीतीने विशद करते. जगाच्या व्यवहारावर अगदी चपखल शब्दात प्रभावीपणे प्रकाश टाकणारी डॉक्टर श्रोत्री यांची ही एक अतिशय सुंदर  कविता आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ पावसाळा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ पावसाळा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

मेघ बरसला

श्वास गंधाळला

मनी उतरला

अलगद

 

वारा वेडावला

सुसाट सुटला

बेभान जाहला

नकळत

 

थेंब ओघळले

अंग शहारले

मन मोहरले

पावसात

 

हाच पावसाळा

भुलवितो मला

प्रत्येक क्षणाला

असा कसा

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मिड-लाईफची कथा – मानवाची व्यथा” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मिड-लाईफची कथा – मानवाची व्यथा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

निम्म्या अंतराची कथा

ऐकुन तू घेशील का

आहे माणूसच मी

व्यथा तुला कळेल का

 

उधाणाच्या या दर्यात

कश्ती तुझी टिकेल का

दर्याच्या खोल मनातली

दौलत तुला दिसेल का

 

तापलेल्या जिंदगीची

बरखा तू बनशील का

विझत चाललेल्या सूर्याची

पहाट लाली होशील का

 

आजवर चाललेले अंतर

क्षणात या मिटवशिल का

अंतराच्या अंतरात्म्याची

कहाणी तू ऐकशील का

 

शब्दांना या माझ्या

अर्थ तू देशील का

एकसूरी बेसूर गाण्याला

चाल काही लावशील का

 

गुंता या निरर्थक खेळाचा

अलगद बोटांनी सोडवशील का

कधी न भरणाऱ्या या पोटाची

भूक तू संपवशील का

 

सोडून लाज सारी

कुशीत मला घेशील का

मनातल्या निर्लज्ज बाळाची

आई बनूं शकशिल का…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गंधवती मी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गंधवती मी– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मूळास ओटीपोटी धरूनी

माती मजला उठ म्हणाली

फोडून  माझे अस्तर वरचे

पानोपानी हळू फुट म्हणाली

मी न सोडीन मूळास कधीही

तुझ्या कुवतीने वाढ म्हणाली

नभास पाहंन हरकून मीही

पिसार्‍यासम फुलत राहीली

काही दिसानी सर्वांगावरती

इवले इवले कळे लागले

क्षणाक्षणांनी कणाकणांनी

ते ही हळूहळू वाढू लागले

पहाटे अवचित  जागी होता

गंधाने मी पुलकीत झाले

अय्या आपला चाफा फुलला

आनंदाने कुणी ओरडले

भराभरा घरातील सगळे

माझ्या भवती झाले गोळा

फुलवती मी गंधवती मी

मी अनुभवला गंध सोहळा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares