मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तकाचे नाव – एक उलट एक सुलट

लेखिका – अमृता सुभाष

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या – 178

किंमत – 225

वाचनालयात पुस्तके चाळताना माझी नजर एका पुस्तकावर गेली. त्यावर अमृता सुभाष चा फोटो होता आणि लेखिका देखिल अमृता सुभाषच.

पटकन हे पुस्तक मी निवडलं.हे पुस्तक निवडण्याचे मुळ कारण म्हणजे  अमृता सुभाषचं खूप वर्षापूर्वी ती फुलराणी नाटक पाहीले होते. तेव्हा पासून तिने माझ्या मनावर अधिराज्य केले. तिचं ते “तुला शिकवीन चांगलाच धडा “काही केल्या डोळ्यासमोरून हटत नाही.त्यामुळे हे पुस्तक वाचायची प्रबळ इच्छा झाली.

सुरवातीपासूनच हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि तिच्या प्रेमात पडायला लावतं. लोकसत्ता चतुरंग पुरवणीतील लेखिकेच्या एकत्रित लेखांचाच हा लेखसंग्रह आहे.

प्रस्तावनेपासूनच लेखिकेच्या लेखनाचे अक्षरशः गारुड पडते. प्रस्तावनेमध्ये तिने तिच्या नातेवाईकांचा आणि लिखाणाचा परस्पर संबंध कसा आहे यावर भाष्य केलेले आहे.

पहिला लेख तिने तिचे “अमृता सुभाष ” हे पडद्यावरिल नाव  कसे ठरविले याबाबत उहापोह केला आहे. तिने जाणून बुजून स्वतःचं आडनाव लावले नाही कारण “जात “ही बाब तिच्यासाठी गौण आहे. त्यांच्या घराण्यात बरेच आंतरजातीय विवाह झाले असून त्या बाबतीत त्यांच्या घरात खूप पुढारलेला दृष्टीकोन आहे. गरज संपल्यावर माणसाची शेपूट गळून पडली तशी जातही गळून पडायला हवी असे तिचे ठाम मत आहे.हे मला खूप आवडले.

दुसऱ्या लेखामध्ये मन मनास उमगत नाही यावर लिहीले आहे या लेखामध्ये कोणालाही मानसोपचार तज्ञांची  मदत लागू शकते व मानसोपचार घेणे म्हणजे एखादयाला तुझ्यात काहीतरी कमी आहे असे सांगणं न्हवे तर आय केअर फॉर यू असे सांगणे आहे शहाणं आणि वेडं मधे भानासकट उतू जाणे नावाचा प्रदेश असतो. तेव्हा आपणाला सावरू शकण्याची मुभा असते तेच काम मानसोपचार करते असे लेखिकेचे मत खूप विस्तृत पणे लिहीलेले आहे.

पुढे मग तिची आई नटी असल्याने तिचे बालपण कसे होते हे ” नटी आई” व आई-वडीलांचे गुण दोष ” वारसा ” या लेखामध्ये मांडले आहेत.

तसे या लेख संग्रहातील सर्वच लेख अप्रतिम आहेत पण गिंको बिलोबा हा लेख खूप भावला. जपान नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला गेला आणि ही दोन्ही शहर पूर्ण बेचिराख झाली. सगळे काही नष्ट झालेले असतानाही त्या राखेतील फक्त सहा जीवांनी जगणे निवडलं ते होते.ती ही सहा झाडे. ती झाडे अजूनही आहेत. आजही त्या झाडांना आशेचे प्रतिक म्हणून मानतात. या झाडाची प्रेरणा घेऊन जपान्यांनी टोकियो येथे एक फार सुंदर रस्ता तयार केला आणि दोन्ही बाजूला भरघोस पिवळ्या रंगाची पाने फुले असलेली गिंको बिलोबाची झाडे वाढवण्यात आली.या रोडचे  पाहात रहावे असे अतिशय सुंदर फोटो इंटरनेटवर पहायला  मिळतात. सगळ्या मोडतोडी नंतर जिवंत रहाणाऱ्या झाडांचे  तेथील लोकानी कौतुक वाटण्यासारखे संवर्धन केले आहे.हे वाचताना नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मकतेचे स्फुरण चढते.

ऋतूपर्ण  या लेखामध्ये समलिंगी व्यक्तीबददल समाजाची खूप क्लेशदायक वर्तणूक या बद्दल लिहीले आहे. कितीही निष्णात असले तरी अशा व्यक्तींना समाजातून मिळालेल्या हीन वर्तणुकीवर या कथेत लेखिकेने पोटतिडकीने लिहीले आहे ते वाचून अंगावर शहारे येतात.

वेगळा या लेखामध्ये स्पेशल चाईल्ड बद्दल लिहीले आहे ते चटका लावून जाते मनाला. अशा मुलां बद्दल आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी  आपल्याला कुठेतरी खूप आतमध्ये हलवून सोडतात.धन्य ते माता-पिता जे अशा मुलांना वाढवतात. हा लेख हतबलता अधोरेखित करतो.

हिरवं तळं आणि गाभारा. हा लेखही अतिशय विलक्षण लेख.नैनिताल येथील एक तळं आहे.जेव्हा त्याचा रंग हिरवा होतो तेव्हा तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नसते. कारण ते तळं पाहणाऱ्याना स्वत:कडे आकर्षित करतं.जसे नायगारा धबधबा प्रत्यक्ष पाहिल्यावर कित्येकांना त्यात उडी घ्यावीशी वाटते व काहींनी ती घेतली सुद्धा आहे.

निसर्गाचं सौंदर्य एखाद्याला स्वतः कडे इतकं आकर्षित करू शकतं की त्यामुळे एखाद्याचा जीव देखिल जाऊ शकतो ते का व कसं हे या लेखामध्ये विस्तृत पणे या मांडलं आहे.

त्यानंतरच्या अस्तु, एकलव्य, टोकियो स्टोरी-मुंबई स्टोरी हे  लेखही भाव भावनाचे विविध कंगोरे अधोरेखित करतात. एक वेगळे पण सच्चे विश्व जणू उलगडत जाते.

अभिनयाबरोबर लिखाणानेही दिल जित लिया अमृता तुमने😘💞 असंच म्हणाव असं पुस्तक.

आयुष्याचे विविध पैलू अगदी सहज अलवार उघडून अनेक विध भावभावनांचा सुंदर आविष्कार घडवला आहे  तिच्या लेखणीने. जियो अमृता मस्तच लेख संग्रह😍💕

या पुस्तकातील आवडलेली वाक्ये – Beautiful young people are accident of nature, but beautiful old people are works of art.

ट्रँजिक फ्लॉ म्हणजे कोणाच्याही अंगी असा एखादा गुण विशेष असतो जो स्वतःचाच घात व्हायला कारणीभूत असतो.

निवडीचा क्षण – एकदा का आयुष्याला निवडलं की पुढचं सगळं आयुष्य बदलते

अगदी पुस्तकाच्या कव्हरवरील अमृताचा फोटो ते मलपृष्ठावरील कविता सारं काही लाजवाब. अविस्मरणीय अनुभव. संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. 

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

26-07-2023

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

सौ.मनिषा विजय चव्हाण

अल्प स्वपरिचय

मी सौ.मनिषा विजय चव्हाण फार्मासिस्ट म्हणून मेडिकल मध्ये रूजू आहे. वाचनाची आवड आहे,पुस्तके वाचून अभिप्राय लिहिते. कविता लिहिते. 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

पुस्तक – अस्तित्व 

लेखिका  – सुश्री सुधा मूर्ती 

अनुवाद – प्रा ए आर यार्दी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 

पृष्ठसंख्या – १०४   पाने

पुस्तकाचे मूल्य – ११0  रुपये

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

मुकेश उर्फ मुन्ना याच्या जिवनपटावर आधारीत कादंबरी ‘अस्तित्व’.स्वतःचे अस्तित्व किती महत्वाचे आहे.अस्तित्व असणे ,ते जपणे म्हणजे जणू लढाईच.स्वतःचे अस्तित्व हरविलेल्या माणसाची अवस्था अतिशय दयनीय होते .

हिच गोष्ट आपणास ‘अस्तित्व’ कादंबरी वाचल्यावर कळते.

मुन्नाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.

मग माझी आई कोण?तिने मला का टाकले? तिच्यावर अशी कोणती वेळ आली कि तिने मला दुस-याच्या स्वाधीन केले? हे शोधण्यासाठीचा त्याचा प्रवास,त्याने केलेला संपत्तीचा त्याग.आईवडिलांवरील त्याची श्रद्धा,प्रेम,त्याच्या स्वभावातील खरेपणा.सत्य स्विकारण्याची त्याची मानसिकता.सर्व काही ह्रदयाला भिडते.

स्त्रीचे  परमपावन स्वरूप म्हणजे ‘आई’.

त्या आईची तीन रूपे यात अनुभवायला मिळतात.

जन्म देणारी आई, दूध पाजणारी आई.

पाळणारी, घडवणारी,संस्कारक्षम पूर्ण माणूस बनवणारी आई.

महान अश्या थोर मनाच्या माता यात दिसतात.दोघीही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत.दिला शब्द पाळताना,वचन निभावताना,सगळ्या गोष्टींसाठी झगडताना

करावा लागलेला त्याग, मनाचा मोठेपणा, विश्वास दिसून येतो.

आणखी एक म्हणजे जन्म कोणत्याही कुळात,गोत्रात ,देशात होऊ देत.माणूस घडतो तो फक्त आणि फक्त त्याच्यावर केल्या गेलेल्या योग्य संस्कारांमुळे हे या कादंबरी मध्ये प्रकर्षाने जाणवते.

रावसाहेबांच्या रूपात एक सच्चा दिलदार माणूस,खरेपणा जपणारा प्रेमळ बाप दिसतो.रक्ताचा नसताना,पोटी जन्म न झालेला, ज्याला आपला मानला तो आपलाच.तसेच अतिशय व्यवहारकुशल माणूस.

आपण म्हणतो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका पण इथे भावनेला प्राधान्य देऊनच रावसाहेबांनी संपत्तीचे वाटे केले.ही संपत्ती माझी नसून मी याचा मालक नाही.ही सारी संपत्ती मुन्नाची आहे,तोच या सा-या संपत्तीचा एकमेव मालक आहे.ही त्यांची भावना,हा विचार उद्दात्त आहे.सत्यप्रिय,निष्ठावान,असेच त्यांचे व्यक्तित्व आहे.

संपत्तीचा मोहन बाळगता ती स्वतःहून दुस-याच्या स्वाधीन करणारा त्यांचा मुलगा मुकेश उर्फ मुन्ना पाळलेला नसून त्यांचा सख्खा मुलगाच शोभतो ना?

यापेक्षा नात्यातील गोडवा अजून काय असू शकतो?

आजच्या काळात अश्या संस्कारांची अतिशय गरज आहे अतिशय सोप्या भाषेत मांडणी…

वाचताना भावनाविवश व्हायला होते….

खूपच सुंदर आणि वाचनिय…

खरचं सगळ्यांनी वाचायला हवेच….

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

सांगली, मो. नंबर….9767090659

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – ‘आनंदाच्या गावा जावे’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – १६३  पाने

पुस्तकाचे मूल्य – १६१ रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

विश्वास सरांच्या विविधरंगी लेखणीतून साकारलेले त्यांचे जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. त्यांच्या लेखणीला असे विविधरंग प्राप्त होण्याचे कारण, त्यांचे विविध विषयांवरील अफाट वाचन, गहन चिंतन आणि अनवरत मनन असावे, असा मला विश्वास आहे! बरे, नुसते वाचन करतील ते विश्वास सर कसले? कारण त्यांची जबरदस्त निरीक्षणशक्ती, जी, हे जेथे जातात तेथे यांच्या सांगाती असतेच असते. मी हे ‘निरीक्षण’ यासाठी नोंदवीत आहे, की या बहुल-विषय सामग्रीने सुसज्जित पुस्तकात असलेले विषय! पुस्तकातील समग्र ३९ लेख वाचले, अन पुस्तक वाचल्यावर मी माझ्या अल्पमतीने त्यांना कांही श्रेणींमध्ये विभागले अन ते-ते विषय परत चाळले. ते लेख असे (कंसात लेखांची संख्या दिली आहे): प्रेरणादायी व्यक्तिचित्रे (११), शिक्षण आणि तत्वज्ञान (११), भक्तिरसपूर्ण लेख (५), समाजबोध (४), संगीत (३), आरोग्य (२), कविता (२) आणि साहित्यिक विनोद (१). अर्थात या श्रेणी ढोबळ मानानेच विभागल्या आहेत. या माहितीचा हेतू इतकाच की, लेखकाने या पुस्तकात हाताळलेले बहुरंगी आणि बहुढंगी विषय आपल्यापर्यंत पोचावेत.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

यावरून हे लक्षात येते की प्रत्येक जाणत्या अन नेणत्या, तसेच प्रत्येक वयोगटातील वाचकासाठी या पुस्तकात कांही ना कांही आहे, इतकंच काय, ज्यांना विविध विषयांवर ललित साहित्य वाचायची आवड आहे, त्या वाचकांसाठी तर ही अत्यंत पौष्टिक तसेच रुचकर साहित्यिक मेजवानीच समजावी. अर्थात आभासी मेजवानीचे महत्व आपण जाणतोच, विचारांना खाद्य (food for thought) पुरवायचे असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही असेच मी म्हणेन. आता यातील सर्वाधिक लेख असलेले विषय बघू या. लेखकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहेच, याचा अनुभव त्यांनी आजवर लिहिलेल्या पुस्तकांतून, लेखमालांमधून, रेडिओवरील आणि प्रत्यक्ष भाषणांतून आपल्याला येतच असतो. त्याच अनुभवाचे संपन्न रूप या ११ लेखातून प्रकर्षाने जाणवते. मोजकी उदाहरणे द्यायची तर यांत आदर्श व प्रसिद्ध व्यक्ती (अंधत्वावर मात करून कर्तृत्वाने आकाशदीप झालले राहुल देशमुख, बहुआयामी शिक्षणाच्या धनी डॉक्टर शारदा बापट, आपल्या हृदयसिंहासनावर सदैव अधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी) आहेतच. परंतू आधी अप्रसिद्ध असून देखील लेखकाच्या सानिध्याने आणि या पुस्तकाच्या पानांवर आता अधिष्ठित होऊन प्रसिद्ध झालेल्या व्यक्ती अधिक आहेत. त्यांच्या हरहुन्नरी आणि विशेष कर्तृत्वाची दखल घेऊन लेखकाने त्यांचा यथोचित सन्मान केलाय, याबद्दल मी सरांचे आणि त्या व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करते. यात लेखकाची चोखंदळ अभिरुची दिसते. कारण या व्यक्ती विविध क्षेत्रातील आहेत. उदाहरण द्यायचे तर आधुनिक रामदास, हे सामान्य असूनही असामान्य सामाजिक कार्य करणारे! आणि माळे गुरुजी. अशाच इतरही व्यक्तींचा मनोज्ञ वेध लेखकाने घेतलाय! सजीव व्यक्तिचित्रण तर सरांचे बलस्थान. म्हणूनच त्या सर्वांना जणू भेटण्याचे समाधानच लाभावे इतक्या त्या सरांनी आपल्या सहज सुंदर ओघवत्या लेखनातून जिवंत केल्या आहेत. या पुस्तकाचे मला तरी हेच सर्वोच्य आनंदाचे निधान वाटले.

आता अन्य श्रेणीकडे वळू या. शैक्षणिक विषय आणि तत्वज्ञान हे तर सरांचे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक अनुभवाचे लाडके विषय! यामुळे ते लिहितांना लेखकाला अन वाचतांना वाचकांना आनंदाचे डोही आनंदतरंग असा अनुभव आला नाही तरच नवल! अशिक्षित कोण (उदा.बहिणाबाई), उन्नयन विचारांचे अन भावनांचे, कौशल्यासुत (हा राम नाही, पण कौशल्य नसेल तर कधी-कधी जीवनात राम नाही हा सरांचा एकदम अनवट विचार!) कोण कुणाजवळून शिकले ही मला अत्यंत भावलेली भावस्पर्शी गोष्ट, (पाश्चात्त्य असूनही आपल्या हृदयाचा संपूर्णपणे ठाव घेणारी) एका शिक्षिकेची अन तिच्या टेडी या विद्यार्थ्याच्या हृदयंगम नात्याची. मंडळी, आपण शिक्षक असा किंवा विद्यार्थी, या संपूर्ण कथेचे वाचन हा दैवी अनुभव हे आणखी एका अश्रूभरल्या आनंदाचे पान!

मंडळी, आता ज्या प्रकरणाचा उल्लेख करते ते शेवटचे आणि अतिशय वाचनीय, कारण संपूर्ण पुस्तकातील सर्वात अधिक पानांचे म्हणून नव्हे, तर ध्येयनिश्चितीच्या मार्गावरील पायऱ्या, खाचाखळगे आणि मळलेल्या वाट सोडून देखील मार्गक्रमण कसे करता येईल याचे विस्तृत, सुनियोजित, परखड आणि अनुभवपूर्ण, तरीही पायरी-पायरीने वृद्धिंगत होणारे रोमांचकारी विवेचन. कारण प्रत्येक पायरीच्या पुढे काय विचार असेल याची उत्सुकता! हे शीर्षक वाचून हे समस्त प्रकार विद्यार्थ्यांकरिता राखीव असावेत असे मला (उगीच) वाटले, मात्र, मित्रांनो मला यात मला पहिला धडा हाच मिळाला की बाह्यरंगावर (शीर्षक) जाऊ नका, अंतरंगात जाऊन बघाल तर या परीस आनंदाचे क्षण नोहे! विश्वास सर, या शेवटच्या भागात आपण आनंदाचेच नव्हे तर आपल्या लेखनकौशल्याचे देखील शिखर गाठलेत बरं का!

आता इतर भागांविषयी लिहिणे म्हणजे डुप्लिकेट पुस्तक छापल्यासारखे होणार. शिवाय आपल्याला पुस्तक वाचायला प्रवृत्त करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे.

सरांची लालित्यपूर्ण भाषा म्हणजे त्यांच्यासारखीच साधी, सुलभ आणि सर्वांना आपलीशी वाटणारी. क्लिष्ट शब्दांचे आणि अवजड कल्पनांचे जाळे नसल्याने या सुगम आणि नितांतसुंदर साहित्याचा आस्वाद प्रत्येक जण घेऊ शकेल. अभिजात लेखन वजनदार असलेच पाहिजे असे नाही. शिक्षकी बाणा जपत त्यांनी हे ललित लेखन असे केले आहे की मागील बाकावर बसलेल्या मस्तीखोर किंवा ढ विद्यार्थ्याला देखील याचे आकलन होईल. किंबहुना हाडाच्या शिक्षकाचे टार्गेट बहुदा हेच विद्यार्थी असतात. साहित्याच्या बाबतीत मी पण बॅकबेंचर होते. म्हणूनच या पुस्तकाबद्दल मला विशेष प्रेम निर्माण झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, आपण कोठेही बसा मित्रांनो, मल्टिप्लेक्समधील मेगास्क्रीनप्रमाणे हे सर्व लेख तुमच्या डोळ्यांचे अन हृदयाचे पारणे फेडणार यात मला कुठलीच शंका नाही.

या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी माझे मत मांडते. यात आनंदाच्या वाटाच वाटा आढळतील. कुठलेही पान उघडा, ३-४ पानांत आनंदाचे दार उघडलेलं दिसणार. आपण फक्त चालायचे काम करा (चालण्यावर देखील एक धडा हाय! चालतंय की म्हणून, न चालणाऱ्यांसाठी खास आहेर!) आणि सरांच्या ऋजू व्यक्तिमत्वासमान मृदू, मुलायम भाषेत सूचना आहेत. (त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर तलत सारख्या असे म्हटले असते) योग, व्यायाम, सामाजिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि बरंच कांही!

आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच या पुस्तकातील व्यक्तिरेखांनी त्यांच्या प्रेरणादायक आयुष्यात आनंद शोधलाय. काहींच्या जीवनात अपार दारिद्र्य, हाल, कष्ट, मेहनत, या सर्वांत देखील आनंद असतो हे या पुस्तकाच्या वाचनातून कळले. मला तर हे पुस्तक वाचतांना असे वाटले की आपण एका अत्यंत रमणीय अशा उपवनात विहार करतोय! त्यात दिसलेत काटेरी विविधरंगी गुलाब, जाई-जुई या जुळ्या बहिणी, रंगीबेरंगी शेवंती, नाजूक पारिजातक, धुंद गंध असलेला सोनचाफा, कमलिनी आणि कुमुदिनी वगैरे वगैरे, एक विसरले: बकुळीची नाजूक फुले देखील दृष्टीस पडली की! यांच्या मनमोहक रंगांचा अन मनोवेधक गंधांचा किती अन कसा आस्वाद घ्यावा हा प्रश्नच होता. पण एकदा उपवनाची मालकी मिळाली की, कधीही अन कितीही वेळा हे अवर्णनीय सुख अनुभवता येईल याचा आनंद आहे. अन शेवटी जाता जाता आठवले ते निराळेच, या उपवनाची हिरवीजर्द वाट चाळीगावावरून सुरु झाली, दूर-दूर गेली आणि परत मुक्काम पोस्ट, आनंदाचे गाव, म्हणजे चाळीसगावातच येऊन थांबली की!

विश्वकर्मा पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि दुसऱ्यांना भेट द्या, हेच आजच्या दिनाचं आनंदवनभुवन समजा!

धन्यवाद!

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

पुस्तक – गुजगोष्टी शतशब्दांच्या

लेखिका – वीणा रारावीकर

प्रकाशक – सृजनसंवाद प्रकाशन

पृष्ठ संख्या – ११५

 किंमत – २२५ /-

वीणा रारावीकर या पदार्थविज्ञान,संगणक तंत्रज्ञान व्यवस्थापन या विषयातील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.लोकप्रिय  ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.अनेक प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांचा नावीन्यपूर्ण ” गुजगोष्टी शतशब्दांच्या “  हा लघुकथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे शंभर शब्दांच्या शंभर लघुकथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाच्या नावात गंमत आहे. आपण जवळच्या माणसांशी हितगुज करत असतो. आपल्या खोल मनाच्या कप्प्यात दडलेलं त्यांना  सांगून मन मोकळं होतो. आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार होते. मला वाटते त्याच अधिकाराने लेखिकेने या लघुकथातून वाचकांशी संवाद साधला आहे. एखादी गोष्ट पाल्हाळ लावून सांगणे एक वेळ सोपे, पण नेमक्या शब्दात मांडणं अवघड आहे. ते अवघड  काम लेखिकेने या पुस्तकात नेमके साधले आहे.

सुश्री वीणा रारावीकर

वाचनाची आवड तर आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढणे मोठी गोष्ट झाली आहे. अशा वेळी खूप मोठी गोष्ट वाचत बसायला वेळ नसतो. तसेही आजच्या नव्या पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. त्यांची ही वाचण्याची भूक भागवण्याचा प्रयत्न लेखिका वीणा रारावीकर यांनी ” गुजगोष्टी शतशब्दांच्या ” या लघुकथा संग्रहातून केली आहे. शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी ही आपल्याला सोपी गोष्ट वाटू शकते..पण प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथेचे मूल्य हरवू न देता आशय संपन्न कथा मर्यादित शब्दात लिहिणे म्हणजे कसोटीचे काम आहे. हे लघुकथा लेखनाचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. लघुकथा लिहिण्याचा एक प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

लघुकथेतील  शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी– यातली प्रत्येक गोष्ट नेटकी झाली आहे. कथेची मांडणी उत्तम आहे. नेमक्या शब्दात कथा मांडायची असल्याने शब्दांचा फाफटपसारा कुठे दिसत नाही. प्रत्येक शब्द विचार करून लिहिला आहे. तरीही कोणतीही कथा ओढूनताणून झाली आहे असे वाटत नाही. कथा प्रवाही आहेत. पटपट वाचून होतात.

लघुकथेतील विषय रोजच्या दैनंदिन जीवनातील असल्याने वाचकाला प्रसंग आपले वाटतात. वाचक कथेचा विषय आपल्या अनुभवाशी जोडून बघतो. कोणत्याच विषयाचे लेखिकेला वावडे नाही. आई, सासू, सून, नणंद भावजय, मुलगी, फिटनेस, ऑनलाईन शिक्षण,अपंगत्व, माणुसकी, वयोवृद्ध लोकांच्या समस्या,पदर,यासारख्या अनेक विषयांवर गोष्टी लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे. 

लघुकथेची मांडणी प्रसंगाला धरून आहेत. लघुकथेचे काही विषय हलकेफुलके आहेत तर काही विषय विचार करायला भाग पाडणारे आहेत, तर काही विषय नवी शिकवण देणारे आहेत. तर काही विषय  प्रबोधन करणारे आहेत. लघुकथेतून समाजाचे, व्यक्तीच्या स्वभावाचे, मनोवृत्तीचे निरिक्षण नेमक्या शब्दात लेखिकेने शब्दबद्ध केले आहे.

समाजात पावलोपावली पैश्याचे महत्व वाढताना दिसत आहे. आज पैश्यापुढे नात्यांची किंमत शून्य होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज नाती सोयीनुसार आठवतात, हे ‘ निर्मळ नाती ‘ या कथेतून स्पष्ट झाले आहे. गरज निर्माण झाली की विसरलेली नाती  आठवतात. मनात तर असते पण आपण  काही कारणाने दुरावतो. पण एखादा प्रसंग असा येतो  जेव्हा आपल्याला  कुणाच्या तरी आधाराची गरज निर्माण होते . जिथे नाती निर्मळ असतात  तिथे कसलीच अडचण येत नाही.

आईचं प्रेम शाश्वत असतं. ते कोणत्याही कारणानं कमी किंवा जास्त होत नाही. आईचं प्रेम व्यक्त करण्यापलीकडेचे असते. सूनेने बोलणे तोडले, संबंध तोडले तरी आईच्या प्रेमावर याचा परिणाम होत नाही. आपलं मुल संकटात आहे म्हटल्यावर आई आपलं सर्वस्व पणाला लावते, हे “अहो आई” या लघुकथेतून अधोरेखित होते. आताच्या नव्या पिढीचे विचार,आचार, जीवनशैली वेगळी आहे.तरी त्यांच्यात प्रामाणिकपणा जिवंत आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नव्या पिढीत आहे, हेच लेखिकेने ‘ पत्रास कारण की’ आणि ‘ पत्रास उत्तर की ‘ या लघुकथेतून मांडले आहे.

गरिबीनी गांजलेल्या मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे भरणारी श्यामल ” फुगे घ्या फुगे ” 

या लघुकथेतून दिसते. पदर, निर्णय, हळदी कुंकू अशा अनेक गोष्टी मनात घर करून राहतात.

जीवनात अनेक समस्यांना समोरे जावे लागते. हेच खरं जगणं आहे. गुजगोष्टीतील लघुकथा हेच सांगतात. गोष्टी खूप मोठ्या नाहीत, प्रसंग साधेच आहेत. पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा हवा. म्हणजे जगणं वेगळं, सोपं आणि सुंदर होते. प्रत्येकांने * गुजगोष्टी शतशब्दांच्या* हे पुस्तक जरूर वाचावे. या गोष्टीचा आनंद घ्यावा. जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलावा.

लेखिकेला पुढील लिखाणासाठी, साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

स्व-परिचय

मी सौ. मंजिरी येडूरकर, MSc, BEd  असून मिरज येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्या काळात रोजच्या सांगली – मिरज बस प्रवासात मिळणाऱ्या वेळेत काव्य निर्मिती सुरू झाली. पण त्या प्रसंगानुरूप! कुणाचा वाढदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन, निरोप समारंभ, लग्न मुंज अशा समयोचित कविता करायला सुरुवात झाली. मी निवृत्ती जरा लवकरच घेतली. त्यामुळं वेळ मिळत होता. सुचलेलं लगेच लिहायला बसू शकत होते. मग कथा ललित लेख लिहायला सुरवात झाली. ‘जाहल्या तिन्हीसांजा’ हा कवितासंग्रह व ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा कथा, ललित लेख यांचा संग्रह मुलाने प्रकाशित केला. अर्थात फक्त घरगुती वितरणासाठी. स्वरचित कवितांना चाली लावून, त्या  विविध कार्यक्रमात सादर करत होते. पण खरी सुरवात झाली ती कोविड मध्ये आम्ही भावंडांनी सुरू केलेल्या साहित्य कट्ट्या पासून. त्याच्या थोडं आधी महावीर वाचनालयाच्या साहित्य कट्ट्या मध्ये सहभाग घेत होते. त्यामुळेच साहित्यिक मैत्रिणी मिळाल्या. कांहीतरी लिहिण्याची उर्मी निर्माण झालीच होती, त्यात भावंडांनी भर घातली.आता थांबायचं नाही असं ठरवलंय. बघू!

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कालिंदी (लघु कादंबरी)

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – नवदुर्गा प्रकाशन 

पृष्ठ संख्या – 136

किंमत – 250 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

मुखपृष्ठ खूपच बोलकं आहे. कालिंदी मातोश्री या वृद्धाश्रमाचा आधार घेण्याचा विचारात आहे.असं दृश्य चित्रित केलं आहे.

श्रीमती अनुराधा फाटक

या लघुकादंबरीत एका स्त्रीची विविध रूपं फुलवली आहेत. आपला मुलगा लहान असतांना रणांगणावर निघालेल्या पतीच्या मनातील चलबिचल पाहून, कठोर होऊन त्याला स्वतःचं कर्तव्य बजावण्याचा आग्रह धरणारी वीरांगना, पती निधनानंतर मुलाचं संगोपन करणारी, त्याच्या विकासासाठी, उन्नतीसाठी झटणारी आई, मुलानं न सांगता लग्न केल्यानंतर ही त्याला समजून घेणारी शांत आई, एका रात्रीत पूर्णपणे बदललेला मुलगा बघून कांही न बोलता त्याच्या आयुष्यातून बाजूला होऊन वृद्धाश्रमाचा आधार घेणारी संयमी आई, अर्थात तीच नंतर त्या वृद्धाश्रमाचा आधार बनते. आपला मुलगा अडचणीत आहे व त्याला अडचणीत आणणारी त्याची पत्नीच आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या नकळत मदत करणारी हळवी आई, मुलाला कफल्लक करून त्याची बायको सोडून गेली व तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला हे समजल्यावर आपली सर्व मिळकत त्याच्या नावावर करणारी वत्सल आई, मुलानं दिलेली हीन वागणूक  विसरू न शकलेली व त्यामुळे पुन्हा त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवणारी स्वाभिमानी आई, मुलाची वाताहात सहन न झाल्यामुळे प्राणत्याग करणारी आई! ही कालिंदीची सारी रूपं आपल्या काळजाला स्पर्श करून जातात.कालींदीचं भावविश्व, समाजासाठी झटण्याची वृत्ती, दुःखीताच्या हृदयात प्रवेश करून त्याचे डोळे पुसण्याची ताकद या गुणांनी या व्यक्तिरेखेला आणखीनच झळाळी आली आहे.  असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत नेण्याचं शिवधनुष्य लेखिकेने लीलया पेलले आहे.निराधार झालेला मुलगा आईला शोधत येतो.तोपर्यंत आईनं वैकुंठाचा रस्ता धरलेला होता. तो विचारतो,” आई कुठे गेली?” याचं उत्तर डॉ सुनील देतात,” मुलाचं बालपण शोधायला गोकुळात गेली.” अशा सुरेख कल्पना तुम्हाला या लघुकादंबरीत वाचायला मिळतील. आवश्य वाचा.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक .. ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर

लेखिका .. विनया खडपेकर

प्रकाशक .. राजहंस प्रकाशन पुणे

प्रथमावृत्ती  2007

सातवी आवृत्ती: एप्रिल २२

पृष्ठे …288

अहमदनगर आता अहिल्यानगर नगर म्हणून ओळखलं जाईल….ज्या कर्तुत्वान मातेचे नाव या जिल्ह्याला देण्यात आले आहे …त्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा ग्रंथ !

ग्रंथाचा आरंभ करताना लेखिका विनया लिहितात की ….

अहिल्याबाई होळकर…

ती सत्ताधारी होती .पण ती सिंहासनावर नव्हती.ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.

ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.

ती व्रतस्थ होती पण ती संन्यासिनी नव्हती.

जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्याचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता ,तेव्हा..

तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळा असे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरातून घुमले…. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती, तर तिला माणुसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.

… लेखिकेने अहिल्याबाई चरित्र ग्रंथ मांडताना हा जो पहिलाच परिच्छेद लिहिला आहे ,त्यात ग्रंथाचे सार आहे, तसेच लोकमातेचेही जीवनसार आहे.

युगपुरूष ,लोककल्याणकारी राजांची आई राजमाता जिजाऊसाहेब, मुत्सद्दी येसूबाई राणीसाहेब, भद्रकाली ताराराणी मातोश्री  ,लोकमाता अहिल्याई ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक नारी नररत्नांनी इतिहासाच्या पानावर अतुलनीय छाप सोडलेली आहे. दुर्दैवाने त्या काळात स्त्रियांविषयी लिहून ठेवण्याची रीत नव्हती किंवा लिहिलं तरी भरभरून लिहावं अशी वहिवाट नव्हती. त्यामुळे नारी वंशात जन्माला येऊन  आणि नरश्रेष्ठाहून काकणभर अधिकची कामगिरी करूनही या अग्निरेखा थोड्या दुर्लक्षितच राहिल्या. अलीकडील काळात बरेचसे लेखन झाले आहे ,हा भाग वेगळा.

कुंभेरीच्या लढाईपासून लेखिकेने या चरित्र कादंबरीची सुरूवात केली आहे. सुरजमल जाटासोबत चाललेली ही लढाई अंतापर्यंत पोहचत नव्हती. निकराची झुंज चालू होती पण अंतिम परिणाम येत नव्हता. दुर्दैवाने १७ मार्च १७५४ रोजी  भर दुपारी अत्यंतिक दुर्दैवी घटना घडली. फिरत्या तोफेतून आलेला एक गोळा खंडेराव होळकरांच्या वर्मी बसला ,अन् होळकरशाहीच्या एकुलत्या एक खांबास उद्धवस्त करून गेला. खंडेरावांच्या जाण्याने मल्हारबाबा कोसळून पडले. उणंपुरं तिशीचं वय ,पदरात दोन लेकरं असताना अहिल्यामाईस वैधव्य आलं. धार्मिक आचरणाचा पगडा असलेल्या अहिल्यामाई सती जाण्याचा निर्णय घेतात पण मल्हारबाबा त्यांना परावृत्त करतात. संसार हे मिथ्या मायाजाळ असल्याचे एक मन सांगत असले तरी लहानग्या मालेरावातून व लाडक्या मुक्ताईतून लोकमातेचा जीव निघत नव्हता. मल्हारबाबा हे अहिल्यामाईस गुरू होते, पिता होते. त्यांच्या आज्ञावजा विनंतीचा मान ठेऊन अहिल्याई मागे थांबतात.

धर्मपरायण राज्यकारभार करताना अहिल्यामाईंनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले.त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग, घटना लेखिकेने सविस्तर मांडल्या आहेत. अहिल्यामाईंचे चरित्र मांडताना थोरले बाजीराव पेशवे ते दुसरा बाजीराव पेशवा असा अठराव्या शतकाचा राजकीय पट लेखिकेने वकुबाने मांडला आहे. शिंदे व होळकर हे पेशवाईचे दोन नेत्र होते. शिंदे-होळकरातील संघर्ष ,दुरावा व जवळिकताही लेखिकेने मांडली आहे. कर्तबगार राज्यकर्ती व धर्मपरायण पुण्यश्लोक म्हणून अहिल्यामातेस दोन बाजू आहेत. या दोघांचाही सार ग्रंथात आला आहे.

मल्हारबाबा व मालेरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादा इंदूर संस्थानावर वरवंटा फिरविण्याच्या विचारात असतात. अर्थात याला माधवराव पेशव्यांची संमती नसते. पण तरीही पेशवेपद न मिळाल्यामुळे अस्वस्थ राघोबा काहीतरी अचाटच उद्योग करत असतात. त्यांच्या या निकृष्ट चालीला अहिल्यामाईंनी मुत्सद्दीपणे प्रतिशह दिला, या घटनेला तोड नाही. पण पुढे राघोबादादा दुर्दैवाच्या फे-यात अडकतात. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरही बारभाई कर्ते राघोबास पेशवाईची वस्त्रे मिळू देत नाहीत. गोरे अस्वल (इंग्रज ) राघोबाला गुदगुल्या करत ,स्वतःच्या जाळ्यात ओढतात. राघोबा भरारी फरारी जीवन जगत असताना   राघोबाच्या पत्नीस म्हणजे आनंदीबाईस आसरा देतात. राघोबाच्या पापाच्या छायेची आठवण न करता मायेची छाया देतात…. हे सगळेही या पुस्तकातून समजते. 

धार्मिक कार्य करताना अहिल्यामाईंनी राज्याची सीमा लक्षात घेतली नाही. पश्चिम टोकाच्या गुजरातच्या सोरटी सोमनाथपासून ते अति पूर्वेच्या जगन्नाथ पुरीपर्यंत ,समुद्र काठच्या रामेश्वर दक्षिण तीरापासून ते उत्तरेत अयोध्या ,बद्रीनाथ, गया ,मथुरा अशी सर्वत्र मंदिराची बांधकामे, नदीवरील घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे लोकमातेने घडवून आणली. त्यांचा न्यायनिवाडाही चोख होता. चोर ,पेंढारींचा बंदोबस्त करताना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देऊन ,विघातक हात ,विधायक हात बनविले.

प्रजाहितरक्षक लोकमातेचे कार्य देवगणातले असले तरी मनुष्य गणातले दुःख त्यांना चुकलेले नव्हते. सत्तर वर्षाच्या दीर्घ आयुत त्यांनी दोन डझनाहून अधिक जवळच्या लोकांच्या मृत्यूचे कडवट घास गटगट गिळले. पती खंडेरावांचा आभाळदुःख देणारा मृत्यू, पतीसोबत सती गेलेल्या स्त्रियांचे मृत्यू, पितृछत्र देणारे सासरे मल्हारबाबा, पुत्र मालेराव, सासू गौतमाबाई, सती गेलेल्या सुना, जावई यशवंत फणसे, नातू नथोबा ,लेक मुक्ताईचं सती जाणं ,सुभेदार तुकोजी होळकरांच्या पत्नी रखुमाईचा मृत्यू …..असे किती प्रसंग सांगावेत…  मृत्यूचे कडवट प्याले रिचवत रिचवत मातोश्रींचे जीवन पुढे पुढे सरकत होते. मुक्ताईच्या मृत्यूनंतर मात्र लोकमाता खरोखरीच खंगल्या होत्या. त्यानंतर अल्पावधीतच लोकमातेचा देह निष्प्राण झाला.

अखेरचे पर्व व उपसंहार या शेवटच्या दोन प्रकरणात लोकमातेच्या कर्तृत्वाचा अर्क मांडला आहे. वाचकाने शेवटचं  लेखनतीर्थ जरूर प्राशन करावं.

ऐतिहासिक शब्दांचे अर्थ देण्यासाठीही लेखिकेने आठ पाने खर्ची घातली आहेत.अनेक ऐतिहासिक संज्ञा स्पष्ट होण्यासाठी हा दस्तऐवज उत्कृष्ट आहे. ‘ अहिल्यामाईंचे जनकल्याण कार्य ‘ ही यादी वाचताना त्यांच्या आसेतुहिमाचल नवनिर्माणाची आपल्याला कल्पना येते. त्यानंतरच्या पानावर लोकमातेच्या जीवनातील ठळक घटनांचा तपशील तारीखवार मांडला आहे. संदर्भ सूची वाचताना लेखिकेच्या परिश्रमाची कल्पना येते. व शेवटच्या पानावर आपल्याला लेखिकेचा परिचय वाचायला मिळतो.

बीड-अहमदनगरच्या सीमेवर छोट्या गावात जन्मलेली एक ग्रामकन्या, पेशवाईच्या मातब्बर सुभेदाराची सून होऊन परराज्यात जाते, दुःखाचे अगणित कढ झेलत होळकरशाहीचा ध्वज लहरता ठेवते, आदर्शाचे नवनिर्माण पीठ तयार करत पुण्यश्लोक बनते…. हा अहिल्यामाईंचा जीवनप्रवास रोमांचकारी व प्रेरणादायी आहे. ‘ ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई ‘ वाचत असताना अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी ज्ञात होतात.एवढे मात्र खरे. “ ज्ञात-अज्ञात “  एकदा तरी वाचावेच ,अशी विनंती करतो.

पुण्यश्लोक लोकमातेस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

जगण्याचा नाट्यपूर्ण वेध ! – बिटवीन द लाईन्स (एकांकिका संग्रह)

लेखक : डॉ. मिलिंद विनोद. 

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.               

डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘बिटवीन द लाईन्स’ हा दहा एकांकिकांचा संग्रह. या सर्वच एकांकिका,नोकरी व्यवसायानिमित्त लेखकाचे विविध परदेशांमधील प्रदीर्घकाळचे वास्तव्य त्याच्या अनुभवांचा पैस विस्तारित करणारे ठरल्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.

या एकांकिका विषय-वैविध्य आणि आशय  यादृष्टीने लक्षवेधी आहेत. तसेच त्यातून डाॅ.मिलिंद विनोद यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जगण्यातली विसंगती न् कालातीत तसेच कालपरत्त्वे बदलणाऱ्या प्रश्नांचे बोचरेपण अधिकच तीव्र करीत असल्याचेही जाणवते.

‘मा सलामा जव्वासात’ व ‘वेसोवेगल सिनकाॅप’ अशी वरवर अनाकलनीय तरीही अर्थपूर्ण शीर्षकांसारखीच ‘बिटवीन द लाईन्स’ , ‘विजिगिषा’ यासारखी सुबोध वाटणारी बाकी एकांकिकांची शीर्षकेही रसिकांची उत्सुकता वाढवणारी आणि या एकांकिकांचे वेगळेपण अधोरेखित करणारीही आहेत.

‘मा सलामा जव्वासात’ आणि ‘विजिगिषा’ या एकांकिकांमधील नाट्य अनुक्रमे दुबई व अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘मा सलामा जव्वासात’ मधील जीवनसंघर्ष अस्वस्थ करणारा आहे. आपलं कुटुंब, आपला देश यापासून दूर परदेशी कामधंद्यासाठी जाऊन तिथे वर्षानुवर्षे असह्य कष्टप्रद आयुष्य व्यतीत करावं लागलेल्या मजूर- कामगारांचं उध्वस्त भावविश्व आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतला भ्रमनिरासांती व्यथित करणारा अखेरचा प्रवास वाचकांच्या मनाला चटका देऊन जातो !

‘विजिगिषा’ ही एका सत्यघटनेवर आधारलेली, ‘अॅराॅन’ नावाच्या इंजिनिअरच्या, एका अनपेक्षित वळणावर सुरु झालेल्या घुसमटीमधील उलघालीचा नाट्यपूर्ण वेध घेणारी एकांकिका आहे.

या दोन एकांकिकांचा हा ओझरता परिचयसुध्दा इतर एकांकिकांचा कस आणि जातकुळी यांचा अंदाज येण्यास पुरेसा ठरावा असे वाटते.

इतर सर्व एकांकिकांची पार्श्वभूमी भारतीय असून त्यांच्या आशय-विषयांचं वेगळेपणही गुंतवून ठेवणारे आहे. अर्थशून्य अशा निरस मराठी मालिकांचं उपरोधिक चित्रण (‘टी आर पी’ अर्थात ‘थर्ड रेटेड पब्लिक’), गीतरचना,संगीत आणि गायन यापैकी कोणती कला श्रेष्ठ असा पेच पडलेला नायक आणि  गीतकार,संगीत-दिग्दर्शक आणि गायिका या रुपात त्याच्या सहवासात आलेल्या तीन स्रियांपैकी  कुणा एकीची निवड करावी हा त्याला पडलेला प्रश्न (‘त्रिधा’ द म्युझिकल), सरोगेट मदरची मानसिक ओढाताण, अस्वस्थता, दुःख आणि परिस्थितीशरणता (ओव्हरी मशीन), दयामरणाचा प्रश्न (वेसोवेगल सिनकॉम), संगीतप्रेमींची कालानुरुप बदललेली अभिरुची आणि त्यामुळे जुन्या संगीताचा वारसा प्राणपणाने जपू पहाणाऱ्या एका बुजूर्ग कलाप्रेमीची होणारी मानसिक कुतरओढ (रुखसत विरासत), विडी-कामगार स्त्रियांचं शोषण (पॅसिव स्मोकर), ‘वेड (अन)लाॅक’ मधे विभक्त जोडप्याला अनपेक्षित अल्पसहवासात झालेला हरवलेल्या प्रेमाचा साक्षात्कार, ‘बिटवीन द लाईन्स’ मधलं समाजापासून तुटलेलं किन्नरांचं वेदना आणि वैफल्यग्रस्त जगणं…..! ही या संग्रहातील एकांकिकांची ओझरती झलक !!

या सर्व एकांकिकांचं सादरीकरण अर्थातच दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचाच कस पहाणारं ठरणार असलं, तरी लेखक-दिग्दर्शकाच्या योग्य समन्वयातून तयार होणाऱ्या या एकांकिकांच्या रंगावृत्ती प्रेक्षकांना उत्कट नाट्यानुभव देण्यास पूरक ठरतील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ रणांगण… श्री विश्राम बेडेकर ☆ परिचय – श्री समीर सरदेसाई ☆

श्री समीर सरदेसाई

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रणांगण… श्री विश्राम बेडेकर ☆ परिचय – श्री समीर सरदेसाई ☆

पुस्तक नाव: रणांगण

लेखक : विश्राम बेडेकर

प्रकाशक: रा. ज.देशमुख अँड कंपनी अँड पब्लीशर्स प्रा. लि.

पृष्ठे: ११४

किंमत: रू १८०/-

परिचयकर्ता:- समीर सरदेसाई(रत्नागिरी)

१९३० च्या दशकात साहित्य वर्तुळात प्रसिद्धीस येत असलेली ती तरुण आणि बंडखोर लेखिका, आणि तो मराठी चित्रपट सृष्टीत लेखक  पटकथाकार म्हणून स्थिरावू पहाणारा एक धडपड्या तरुण. अशी तरुण साहित्यिक जोडी जेवायला बसलेली असते.अर्थात गप्पा साहित्या विषयी च सुरू असतात.पत्नी च्या अनेक कादंबऱ्याचा मोठाच बोलबाला सुरू झालेला असतो.त्यामुळे पत्नी खुश असते.ती त्याला उत्सुकतेने विचारते अरे तू माझी ही कादंबरी वाचलीस का? तिने लिहलेली पुस्तके हा तिचा अभिमानाचा विषय असतो.खरे तर याला ही तिची दोन पुस्तके आवडलेली असतात पण उघड स्तुती करणे याच्या जिभेला जड जाते.तरीही तो चार बरी वाक्य टाकतो.पण तिचे काय समाधान होत नाही.ती अजून एका तिसऱ्या पुस्तकां बद्दल त्याला विचारते.आधीच त्याला स्तुतीपर बोलण्याचे कुपथ्य झाले होते. याने म्हटले त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं बरं, म्हणून नाही बोललो, ती विचारते.. म्हणजे? ते पुस्तक भिकार आहे! तुझा मेहुणा प्रकाशक, त्याला तुला आधी मिळालेल्या नावाचा बाजार करायचा होता. म्हणून त्यांना तुला ते लिहायला लावलं आणि तू बळी पडलीस. एवढ सगळं एकल्यवर ती भयंकर संतापली…. यांन लिहिलं तरी काय आहे?….. जन्मल्यापासून सहा महिन्यात मेलेल एक नाटक. आणि आपल्याला इंग्लंडहुन लिहिलेली प्रेम पत्र पण त्यात सुद्धा कितीतरी चुका…. ती थोडे घुश्याने म्हणाली…. बोलणं सोपं असतं आधी करून दाखवावं मग बोलावं…. ते शब्द याला डिवचून गेले आणि मग याने ठरवलेच आता लिहून दाखवायचं. दुसऱ्याच दिवशी याने कागद पेन्सिली गोळा केल्या आणि खोलीचे दार लावून आत बसला. हा नुकताच  इंग्लंडहून बोटीने आला होता.बोटीवरच्या अनुभवांनी याचे मन खदखदत होते.याने ते मन कागदावर उपडे केले.त्या वेदनेच्या रसायनाला  लेखणीने पाट काढून दिले .हा लिहीत राहिला,लिहीत गेला…भान विसरून.आणि असं रोज एक महिना हा लिहीत होता. रोज लिहिलेले कागद तिच्यापासून लपवून ठेवत होता. आणि एक दिवस सगळं लिहून झाल्यावर हे हस्तलिखित आपल्या हरी नावाच्या जिवलग प्रकाशक मित्राकडे त्याने सोपवले, आणि म्हणाला तू छाप हे. पण यावर लेखक म्हणून माझे नाव कुठेही असता कामा नये.मित्राने पुस्तक एक महिन्यात  छापून दिले… पुस्तकावर लेखकाचं नाव “एक प्रवासी”; काही दिवसातच पुस्तकाचा साहित्य वर्तुळात बोलबाला सुरू झाला.त्यात केव्हातरी हे पुस्तक तिच्या हाती पडलं तिने ते लगेचच वाचून काढलं आणि ह्याला दाखवून म्हटलं खूप छान आहे हे पुस्तक… तू वाचलायस ?…. हा म्हणाला नाही…..मी लिहिलं आहे.

ती म्हणाली…”तू? खरच तू लिहलं आहेस हे?”

हा म्हणाला…..”म्हणाली होतीस ना आधी करून दाखवाव मग बोलावं? मी नंतर करून दाखवलं एवढच”.

 *मित्रांनो ही गोष्ट आहे 1939 सालातली आणि यातील तो आहे “तो” म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्री “विश्राम बेडेकर ” आणि यातील “ती” म्हणजे तीन नावांनी प्रसिद्ध असलेल्या ख्यातनाम लेखिका….विभावरी शिरुरकर …. बळूताई खरे आणि याची पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या मालतीबाई बेडेकर होय……ही झाली या कादंबरीची जन्म कथा.

 तब्बल 84 वर्षे झाली तरीही रणांगण आजही ताजेतवाने आहे महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नसेल की जिथे या कादंबरीचा पदवी किंवा पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला नसेल.  मराठीतील गाजलेल्या  कादंबरी ची यादी ही रणांगणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अनेक वर्तमानपत्रे खाजगी संस्था यांनी वेळोवेळी घेतलेल्या वाचक कौलांमध्ये रणांगण या कादंबरीचे खूप वरचे स्थान आहे.प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे कोसलाच्या प्रस्तावनेत म्हणतात …” बेडेकरांच्या रणांगण नंतर एकही चांगली कादंबरी मराठीत झाली नाही” .तब्बल 84 वर्षे होऊन आजही या कादंबरी मधील आशय ताजा आहे. साहित्य क्षेत्रातील मैला चा दगड ठरलेली ही कादंबरी वाचताना अगदी गुंगून जायला होतं. कादंबरीचा काळ आहे 1930 च्या दशकाचा आणि  दुसऱ्या महायुद्धाची नुकतीच सुरुवात होत असलेल्या 1939 मधला आहे इंग्लंड कडून परत मुंबईकडे येताना जहाजावर या कादंबरीचा कथानायक चक्रधर हॅर्टा नावाच्या जर्मन ज्यू तरुणीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. सर्वच कथानक हे या बोटीवरच उलगडत जाते. बोटीवरचा हा अकरा दिवसाचा प्रवास आहे. बोटीवर विविध देशांचे धर्माचे वंशाचे तसेच भारतातील ही विविध जाती धर्माचे लोक असतात. या अकरा दिवसाच्या प्रवासात घडलेले हे कथानक आहे.

व्यक्ती  व्यक्ती मधील प्रेम भावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक आणि वांशिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकरांनी अगदी बेमालूम पणें एकत्र गुंफलेले आहे.. प्रेम हा या कादंबरीचा मूळ गाभा असला तरी दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी,धार्मिक आणि वांशिक विद्वेष त्यातून बदलत गेलेले जागतिक राजकारणांचे संदर्भ आणि  त्यातून निर्माण होणाऱ्या व्यापाऱ्याचा   हव्यास, आणि मानवी जीवन व्यवहाराचे यश अपयश हे सगळं या कादंबरीत अतिशय चपखलपणे मांडण्यात आलेले आहे. बऱ्याच वाचकांना ही कादंबरी म्हणजे निव्वळ प्रवास वर्णन व त्यातील प्रेम कथा असे वाटते परंतु जशी ती प्रेमकथा आहे तशीच ती युद्ध कथाही आहे दोन संहारक युद्धांच्या दरम्यान घडलेली मानवी मनाची युद्धकथा आहे.हे युद्ध काही साधेसुधे नव्हते ते महायुद्ध होते. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातीलाच जर्मनीत वांशिक विद्वेषाचे वारे खूप मोठ्या प्रमाणावर वाहायला लागले होते.आणि याची झळ पूर्ण युरोपभर पसरायला लागली होती. आणि याच वातावरणाचा अनुभव घेऊन, चक्रधर नावाचा या कादंबरी चा मराठी नायक भारतात परतण्यासाठी निघाला होता. ज्या इटालियन बोटीतून हा प्रवास करत असतो, त्याच बोटीवर कथेची नायिका हॅर्टा सुद्धा असते. हिटलरशाहीमुळे ज्यांची त्यांच्या देशातून हकालपट्टी होते त्यातीलच एक अभागी हॅर्टा एक होती.पुढे काय होणार आहे याचा काही आगा पिछा नसलेल्या या हॅर्टा ला चक्रधर भेटतो.आणि बघता बघता या बोटीवर च दोघांचेही प्रेम फुलते.दोघांचेही आधी प्रेमाचे जोडीदार वेगळे होते. चक्रधरची प्रेयसी उमा दुसऱ्याशी लग्न करून जाते. आणि हॅर्टाचा प्रियकर जर्मन सैन्याकडून मारला जातो.तिच्या पूर्ण कुटुंबाला एकंदरच जर्मनीतील द्वेष  आणि क्रौर्य पाहता आपण जगू की मरू याची खात्री नसते.त्यामुळे हे कुटुंब जर्मनी सोडून चीन ला चाललेलं असत.आणि त्याचवेळी तिला बोटीवर चक्रधरच्या रूपाने पुन्हा प्रेमाचा ओलावा मिळतो.बोटीवरच्या अवघ्या दहा दिवसाच्या त्याच्या सानिध्यात ती स्वर्ग सुख अनुभवते. तिला मिळालेले हे थोडेसे सुखही सोडवत नसते.आणि म्हणूनच चक्रधरच्या प्रेमात नी:संकोचपणे बुडून जाते. यावेळी ती आजूबाजूच्या परिस्थितीची कसलीच पर्वा  न करता चक्रधर पुढे समर्पित होण्याची तयारी दर्शवते. आपण ज्यू असल्याने आपल्याशी चक्रधरला  कधीही लग्न करता येणार नाही याची तिला पुरेपूर जाणीव असते. परंतु तरीही चक्रधर तिच्यापासून कायमचा दुरावण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्याचे दुःख करत वेळ न घालविता ती त्या परमोच्य सुखाच्या क्षणासाठी धडपडते. अखेर ती बोट मुंबईच्या किनाऱ्याला लागल्यानंतर हॅर्टा ला चक्रधरला पासून कायमचे दूर जावे लागते. कधीही न परतण्यासाठी. हॅर्टाला आपली चक्रधर शी पुन्हा कधीही भेट होणार नाही याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र ती उन्मळून पडते. बोटीवरून चक्रधरला पत्र पाठवूनही तिला आपल्या मनाचा कोंडमारा सहन करता येत नाही आणि ती बोटीवरून उडी घेऊन आत्महत्या करते आणि चक्रधर…! तो मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये तिची आठवण काढत कुढत बसलेला असतो.  कारुण्य व मानवी जीवनाची हतबलता याचे सुरेख मिश्रण या कादंबरीत पाहायला मिळते.धर्म, वांशिकता व त्यातून निर्माण होणारा सत्तासंघर्ष  व व्यापारच्या लालसे पोटी होणारे महायुद्ध, आणि यात होरपळून निघणारी व सर्वस्व गमावून बसलेली सर्वसामान्य जनता.आपलीं जन्मभूमी आणि कर्मभूमी सोडून मर्जी विरुद्ध अन्य देशात करावे लागलेले स्थालंतर त्यातून  जगण्यासाठी  करावी लागणारी अगदी केविलवाणी धडपड. याचे अचूक व मर्मभेदी वर्णन बेडेकरांनी यात चित्रित केले आहे.एखाद्या खऱ्याखुऱ्या रणा सारखेच हे प्रत्येकाच्या आयुष्यातील वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? हे सगळे प्रश्न बेडेकर उपस्थित करतात.*

अवघ्या ११४ पानी पुस्तकात बेडेकरांनी जे चितारले आहे, ते सगळ परिचयात देणं खूप अवघड नव्हे दुरापस्त आहे.तसेच या पुस्तकातील खरी दाहकता अनुभवायला प्रत्येकाने  स्वतः हे पुस्तक वाचून संदर्भ लावणे शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते.

पुस्तक परिचय – श्री समीर सरदेसाई

रत्नागिरी

९६६५०५९९१४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : बिंदूसरोवर 

लेखक : राजेंद्र खेर.

प्रकाशक : विहंग प्रकाशन, पुणे. 

पृष्ठसंख्या : २०७.  

काही योग हे विलक्षण आश्चर्यकारक असतात. ध्यानीमनी नसताना एखाद्या पुस्तकाची आपण निवड करणं आणि त्या पुस्तकाने आपल्याला झपाटून टाकणं इतकं की जणू आता तेच आवश्यक होतं असं वाटण्याएवढं… मला वाटतं अशावेळी ते पुस्तक वाचन घडणं ही गोष्ट सहज घडलेली नसून ती नियतीचा एखादा भाग असते‌. 

‘बिंदूसरोवर’ हे राजेंद्र खेर यांच्या पुस्तकाचं वाचन हा असाच एक योग…  वाचनालयात जाताना डोक्यात गंभीर, विचारप्रवर्तक असं पुस्तक न घेता, आता एखादं विनोदी हलकंफुलकं असं पुस्तक घ्यावं असा होता. पण तोंडून अचानक राजेंद्र खेर यांचं नाव बाहेर पडलं. तेव्हा हे पुस्तक समोर आलं. वाचून तर बघूया या भावनेतून हे पुस्तक घेऊन मी घरी आले आणि त्या पुस्तकानं मला वाचता वाचता झपाटून टाकलं. आपल्याला आत्ता हे नाव का सुचलं आणि आपण आत्ता अशा स्वरूपाचं पुस्तक का वाचत आहोत हा प्रश्न मला मी ते पुस्तक वाचेस्तोवर पडलेला होता. पण जसं जसं मी ते पुस्तक वाचत गेले तसं मला जाणवलं की आत्ता माझ्या मनाला, विचारांना ज्या प्रकारचं वाचन किंवा बौद्धिक खाद्य हवं होतं, ते हेच पुस्तक देऊ शकतं. आणि उलट आश्चर्य वाटलं की २००८ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजपर्यंत आपण का वाचली नाही? 

संपूर्णतः काल्पनिक म्हणावी अशी (अर्थात प्रत्येक कल्पनेची नाळ ही कुठेतरी, कधी ना कधीतरी वास्तवाशी जोडलेली असतेच) ‘बिंदूसरोवर’ ही कादंबरी भारतीय अध्यात्माचं विलोभनीय रूप दाखवते. आणि गंमत म्हणजे कादंबरीचा कालखंड हा २०२५ सालचा घेतलेला आहे. २००८ साली कादंबरी लिहिताना सतरा वर्षानंतर काय परिस्थिती असेल असा विचार करून यात लेखन केलेलं आहे, याचं मला नवल वाटलं. अर्थात सतरा वर्ष हा काळ संख्येच्या दृष्टीने पाहता फार मोठा नाही. पण वैज्ञानिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून आजच्या वेगवान गतीच्या सापेक्ष नक्कीच महत्त्वाचा आहे. तरीही या ‘सतरा’ च संख्येमागे अजून काही कारण असेल का हा विचार मात्र मनात सतत डोकावतो आहे. माझ्यामते याचं उत्तर लेखकच देऊ शकेल. 

सबंध जगाला अध्यात्माच्या मार्गाने उन्नत मानवी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भारतीय संस्कृतीचा कालसुसंगत उत्तम परिचय करून देणारी ही कादंबरी… या कादंबरीत बिंदूसरोवर हे एक अध्यात्मातील उच्च अनुभूती देणारं महत्त्वाचं, पवित्र, अजेय असं ठिकाण असून, त्याचा मुक्ती या संकल्पनेशी घनिष्ठ संबंध आहे. आजकाल मुक्ती वगैरे थोतांड असून मुळात अध्यात्मातल्या अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत, त्या माणसांमध्ये तेढ, श्रेष्ठ-कनिष्ठ भेद निर्माण करतात असं जोरदारपणे सांगितलं जातं. त्यावर सकस भाष्य करणारं हे कथानक आहे. 

यात अत्यंत भिन्न परिस्थितीत असलेल्या चार व्यक्ती या बिंदूसरोवराचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या सरोवरापाशी पोहोचण्याची आणि आपलं नियोजित कर्तव्य पूर्ण करण्याची ओढ लागलेली असते. फक्त तिलाच या बिंदूसरोवराची महती माहीत असते. पण योगायोगाने काही व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात आणि झपाटल्यासारख्या तिच्याबरोबर या प्रवासात सहभागी होतात. अनेक प्रसंग जीवावर बेतणारे असूनसुद्धा आणि यातून आपल्याला नक्की काय लाभ होणार आहे? हे माहीत नसूनसुद्धा त्या व्यक्ती कसल्या तरी अनामिक ओढीने या सबंध प्रवासात एकत्र राहतात. 

विश्वातल्या मुक्तीच्या प्राप्तीसाठीची तीन महत्त्वाची द्वारं …  वस्तुनिष्ठ, मनोनिष्ठ आणि आत्मनिष्ठ ..  याबाबत फार सुंदर उहापोह यात केला आहे. थेट उल्लेख नसला तरी स्वर्ग, नरक या कल्पना, तसंच पृथ्वीप्रमाणे इतरही विश्व असण्याची कल्पना यात सांगितलेली आहे. काही ठिकाणी पुराणातील घटनांचा आधार घेत या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 

या सगळ्यांच्या मुळाशी मानवाची पूर्ण सृष्टीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववृत्ती ही किती संहारक असू शकते आणि ती दिवसेंदिवस किती बळावत चालली आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं. 

सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या आपल्यासारख्या या चार व्यक्तींचा बिंदूसरोवरापर्यंतचा उत्कंठावर्धक, रहस्यमय आणि थरारक प्रवास हा अत्यंत वाचनीय तर आहेच. पण त्याहीपेक्षा तो जास्त विचार प्रवर्तक आहे. आणि म्हणूनच सत्य आणि असत्याच्या सीमारेषेवर उभे असलेले हे कथानक वास्तव असावे असा मोह पडणारे आहे.

अज्ञानातून… ज्ञानाकडे 

ज्ञानातून… आत्मज्ञानाकडे

विकारातून… विचाराकडे 

आणि 

अस्विकृतीतून… स्वीकृतीकडे नेणारा हा विचारप्रवाह खरोखरच पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. 

***

एक उत्तम विचार, काल्पनिक आणि एकदम वेगळ्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक राजेंद्र खेर यांचे मनापासून आभार ! 

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तक – प्रेम रंगे,ऋतूसंगे

कवी –  सुहास  रघुनाथ  पंडित

सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह.  सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्‍या झर्‍याप्रमाणे, ती संथ, शांतपणे प्रवाहीत होते.. ती जीवनावर प्रेम करते. माणसांवर प्रेम करते. प्रेमभावनेवर प्रेम करते आणि निसर्गावरही प्रेम करते. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमानाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्‍या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. निसर्गाचा अखंड सहवास आणि माणसामाणसातील प्रेम, आपुलकी, नात्यांची जपणूक याशिवाय आपलं जगणं समृद्ध होऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं, आणि ते खरेच आहे. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन येतात. वृत्तात बद्ध होऊन येतात. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. ‘शब्द त्यांच्या सोबतीला’ नेहमीच राहिले आहेत.  त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्याशी त्यांची कविता नाळ जोडते.

श्री सुहास रघुनाथ पंडित 

‘अचानक भेट’ या कवितेत ते सांगतात, तिची अचानक भेट झाली, की जीवनात सुखाची बरसात होते, पण निरोप घेताना मात्र  एकांतात तिच्याशिवाय रात्र घालवायाची  कशी?’ या विचाराने ते अस्वस्थ होतात ‘अपुरी आपुली  भेट’ कविता वाचताना ‘अभि ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नाही.’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण येते. पण त्यापुढे जाऊन ते विचारतात,  ही अपुरी भेट पुरी कधी होईल? ते म्हणतात, ‘शब्दच होतील पक्षी आणिक गातील गाणी तव दारी.’ तू मात्र तो अर्थ समजून घे, म्हणजे माझ्या मनाला पुन्हा उभारी येईल.’ प्रेमाचे नाते हे स्पर्शाच्या आणि शब्दाच्या पलीकडले असल्याचे ते सांगतात आणि तिनेही ते समजून घेतले आहे. म्हणूनच मग प्रीतीचे गीत ती मनातच गाते. म्हणते, ‘मी कधीच ‘नाही’ म्हटले नव्हते तुला … उमलायाचे? उमलू दे तुझ्या मनातील प्रीतफुला. ‘ होकार देण्याची ही तर्‍हाच न्यारी नं?  ‘ध्यास’ कवितेत तिला भेटायचा ध्यास त्याला लागलाय. की त्याला भेटायचा ध्यास तिला लागलाय. कवितेची गंमत अशी की हा ध्यास त्याला लागलाय की तिला? स्पष्ट होत नाही, पण ते म्हणतात,

   स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो

   गुंतले हे ह्रदय माझे एकच आता ध्यास तो

एकदा हृदये परस्परात गुंतली आहेत. परस्परांची ओळख पक्की झाल्याने आता प्रेमाची अमृतवेल बहरेल आणि जीवनात सुखाची बरसात होईल. मग तसेच होते. दुराव्याचा काळ संपतो. ती येते. लक्ष फुलांच्या गंध कुपीतील सुगंध उधळत येते. देवघरातील लक्ष ज्योतींचा प्रकाश होऊन येते. लक्ष कल्पना कवि प्रतिभेसह मनात फुलवत येते. धुंद जीवनी कसे जगावे, समजावत ती येते. ती म्हणजे श्वासातून फुलणारी साक्षात कविता त्याला वाटते. आता दुरावा संपतो. दोघे एकमेकांची होतात. सुखाचे घरटे बांधले जाते. या नव्या नव्हाळीत असतेस घरी तू तेव्हा मन फुलापाकरू होतं आणि जगण्याचं अत्तर होतं. ‘तुझा असा सहवास लाभता, चिंता, व्याधी सारे मिटते. ते तिच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक लिहितात, व्रत कसले हे जन्मभराचे घेशी?  … ना मागशी पण अनंतरूपे देशी ‘ यामुळे आश्वस्त होत तिच्यावर  सगळं घर सोपवून आपण निर्धास्त झाल्याचे ते सांगतात. त्यांना जगण्याचं उत्तर सापडतं. कोणतं? ते काही लिहिलेलं नाही. त्यांनी  ते सुचवलय. ते उत्तर म्हणजे तिचं अस्तित्व. तिचं असणं.

अनेक दिवसांच्या सहवासानंतर तिच्या मनातली दु:खे, खंत, आनंद त्याला अचूक कळतात. मुलांच्या आठवणीने ती दु:खी, सैरभैर झाली आहे, हे लक्षात येताच, ते तिला समजावतात,’ सहज जाणतो’मध्ये ते म्हणतात, पंख फुटले की घरट्यातून पाखरे उडून जाणारच. ‘असती सुखरूप कशास चिंता गगन तयांना खुले

     ‘पंख लाभता नाते त्यांचे नव्या युगाशी जुळे

     विश्वासाचा बांधुनी सेतू हासू येवो तव वदनी तुझ्या माया-ममतेचा आणि सदिच्छांचा आशीर्वाद तेवढा त्यांना लाभू दे म्हणजे झालं.

दिवस सरतात. वय वाढतं. मन प्रगल्भ होतं. तशीच कविताही प्रगल्भ होते. सूर्यास्ताच्या वेळी ते म्हणतात, लोकांतातील गप्पा नकोत. एकांतातील जवळीक साधू . आता हिशेब कसला मागायचा, जे आहे, ते आपली शिल्लक आहे. आपलेही काही चुकले असेल, सगळी काही तिची चूक नसेल, याचीही त्यांना जाणीव होते. इतकं जगणं झाल्यावर आताच कुठेशी ओळख झाली., असेही त्यांना वाटते आणि ते म्हणतात,

     ‘असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा.

     आता जराशी ओळख झाली, परस्परांवर होऊ फिदा ‘ 

तर ‘विश्रांतीचा पार जुना’ मध्ये ते सांगतात,

     ‘खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

     खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना  पुढच्याच कवितेत ते म्हणतात,

     विसरायाचे अन् सोसायाचे आता सारे झाले गेले’ 

त्यांच्या बहुतेक सगळ्या कवितांचा केंद्रबिंदू ती आहे. अर्थात काही कविता हटके, वेगळे सूर आळवणार्‍याही आहेत. ‘एक झाड गुलमोहराचं’ ही कविता आईविषयीच्या भावना व्यक्त करणारी. ‘वाढतो आपण तिच्याच सावलीत गोळा करतो पाकळ्या

ती नेहमीच जपत असते फुलं आणि कळ्या. म्हणजे मुलं- नातवंड. ती दिसताक्षणीच मन तिच्याकडे ओढ घेते. आपण कसेही वागलो तरी तिच्या मनात मात्र नसते पाप, म्हणजे त्यांच्याविषयीचे वाईट विचार. ’वधूपित्यास’ ही कविता यातली एक सुरेख कविता. वधुपित्याची मन:स्थिती जाणणारा कुणी आत्मीय म्हणतोय,  आल्या क्षणाला सामोरा जाणारा तू आज का केविलवाणा झालाहेस? मन घट्ट कर आणि  तिची पाठवणी कर. दु:ख होतय? खुशाल रडून घे घळघळा . आजच्या दु:खाच्या धारातून बरसणार आहेत उद्याच्या अमृतधारा. ‘सोड हात फिरव पाठ जाऊ दे तिला गाणं गात. तिचा सूर तिला सापडेल डोळ्यांमधलं स्वप्न फुलवेल. तू फक्त वाचत रहा तृप्ती तिच्या चेहर्‍यावरची अन् बरसात करत रहा आशीर्वाद आणि शुभेच्छांची

आणि एक कविता ‘शहाणपण’. या कवितेच्या पुढची. ‘बाबा, तुम्ही काळजी करू नका. सांभाळीन मी सगळं’ असं मुलगी म्हणते, तेव्हा बाबाला प्रतीत होतं, ‘मुलीची झाली बाई आणि बाईची झाली आई. आणि घेतलं तिने ‘शहाणपण’ अंगभर लपेटून गच्च पदरासारखं.

‘ऋणानुबंध ‘ हीही एक अशीच वेगळी कविता. ते म्हणतात, मी कधी ऋण काढले नाही. पण ऋणी मात्र झालोय. ‘इथली व्याख्या , नियम सगळंच निराळं. ज्याचे ऋण अधीक, त्याचाच मी प्रेमाभाराने गौरव केला. ‘ या ऋणाच्या बंधनाने मज असे बंदिस्त केले.

ज्यांनी मला बंदिस्त केले, मी त्यांना हृदयस्थ केले.’ हे ऋण त्यांच्या कवीवरील प्रेमभावनेचे आहे.   

पुस्तकात निसर्गचित्रांचे एक सुंदर सजलेले  दालन आहे. शब्दातून सुरेख अशी निसर्ग दृश्ये कवीने डोळ्यापुढे उभी केली आहेत. चैत्रापासून श्रवणापर्यंतच्या ऋतूंची लावण्य रुपे, त्यांच्या नाना कळा इथे शब्दातून अवतीर्ण होतात. प्रत्येक कविता, त्यातील प्रत्येक ओळ उद्धृत करण्याचा मोह होतो. भिंतीवर चढणार्‍या वेलीबद्दल त्यांनी लिहिलय,

     किती मुरडावे, किती लचकावे, वळणे घ्यावी किती

     सहजपणाने चढून जाते वेल ही भिंतीवरती.

     किंचित लवते, कधी थरथरते, शहारते कधी वार्‍यानी

     सांजसकाळी, कातरवेळी, बहरून येते  कलिकांनी

सुहासजींना बागकामाची अतिशय आवड आहे. त्यामुळे त्यांची रोजची सकाळ निसर्गाच्या, त्यातील झाडा-पेडांच्या सहवासात जाते. ते करताना वेलीचं जे सहज दृश्य नजरेस पडलं, त्याचं किती सहज दर्शन त्यांनी या ओळीत घडवलय.

      चैतन्याच्या लाख खुणा मध्ये ते म्हणतात,-  

     डोंगरमाथ्यावरती कुरळे कुरळे मेघ दाटतील.

     इंद्रपुरीचा दरबारी मग सौदामिनीचे पाय थिरकतील.

     वनावनातून होईल आता जलधारांचा धिंगाणा

     हिरव्या कोंबामधून फुटती चैतन्याच्या लाख खुणा   

प्रत्येक ओळीतून आलेल्या हिरव्या शब्दाची पूजरुक्ती असलेली ‘हिरवाई’ ही कविता, चित्त न लागे कुठेही ही मोरावरची कविता, रात्र काळी संपली, रानवाटा , किरणोत्सव, सूर्याचे मनोगत अशा आणखी किती तरी चांगल्या कविता यात आहेत. खरं तर   सगळ्याच कविता चांगल्या आहेत, असं म्हणायला हवं. इंद्रधंनुष्य. मोहक. नाना रंग ल्यालेलं. त्याला धारणीमाता म्हणते,

     काळ्या माझ्या रंगावरती जाऊ नको तू असा

     रंगांची मी उधळण करते विचार तू पावसा

     फळे, फुले अन् पानोपानी  खुलून येती रंग

     रूप पाहुनी माझे गगनी होशील तूही दंग 

दोन कविता यात अशाही आहेत, की ज्यात निसर्गाचे लावण्यरूप नाही. पाऊस कोपतो तेव्हामध्ये अतिवृष्टी आणि अनावृष्टी दोन्हीबद्दल लिहिले आहे. क्रुद्ध जाहली कृष्णामाई ( संथ वाहते कृष्णामाईच्या चालीवर) मध्ये त्यांनी लिहिले, मानवनिर्मित सर्व चुकांची ती जाणीव करून देते. ते लिहितात, निसर्ग छोटा, आपण मोठे मस्ती मगही अशीच जिरते.

शक्ती, बुद्धी व्यर्थची सारे विवेक नसता काही.     

ती मग  आपल्या हजार जिव्हा पसरून अपुल्या सारे कवेत घेते.

नाही म्हणायला या दोन कविता तेवढ्या प्रबोधनपर आहेत.

तर असे हे सुहासजींच्या कवितांचे नाना रंग. नाना आविष्कार. नजरबंदी, नव्हे मनबंदी करणारे.

निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तिपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्‍यांना स्पर्शून जाते.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares