☆ “देहभान ” – लेखक – श्री निरंजन मेढेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : देहभान
लेखक : निरंजन मेढेकर
पृष्ठ: १६८
मूल्य: २५०₹
बेंगळुरूमध्ये २०२२ मध्ये घडलेली घटना समस्त पालकवर्गाची झोप उडवायला पुरेशी आहे. परवानगी नसतानाही बरीच मुलं सोबत मोबाईल आणतात, याची कुणकुण लागल्यानं तिथल्या काही खासगी शाळांनी आठवी ते दहावीच्या मुलामुलींची दप्तरं अचानक तपासली. त्यांच्या दप्तरांमध्ये मोबाईलसोबतच निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, सिगारेट, व्हाईटनर अशा धक्कादायक गोष्टी सापडल्या. लैंगिकता शिक्षण आणि जबाबदार लैंगिक वर्तनाचे धडे हे किशोरावस्थेपासून देणं किती गरजेचं आहे, हे अशा घटनांमधून ठळक होत आहे. कारण पालकांनी आणि शिक्षकांनी ते दिलं नाही तर इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर ते एका क्लिकवर आज सर्वच वयोगटातील मुलांना उपलब्ध आहे. तरुणाईचा विचार करता सोशल मीडियावरील वाढत्या अवलंबित्वामुळेही त्यांच्याही नकळत स्क्रीनच्या, पॉर्नच्या विळख्यात ते अडकत आहेत.
लैंगिक गुन्हेगारीचा विचार करता सायबर क्राईममध्ये सेक्सटॉर्शन आणि हनीट्रॅपच्या केस झपाट्यानं वाढताहेत. पुण्यात सप्टेंबर २०२२मध्ये काही दिवसांच्या अंतरानं सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकलेल्या दोन तरुणांनी बदनामीच्या भीतीनं आत्महत्या केली. यांपैकी एक तरुण ३० वर्षांचा आयटीआय पासआऊट होता, तर दुसरा अवघा २२ वर्षांचा महाविद्यालयीन युवक होता. पण लैंगिक गुन्ह्यांच्या तसंच विकृतीच्या चक्रात होरपळणाऱ्या मुलांचं आणि मोठ्यांचं प्रमाणही झपाट्यानं वाढत असलं, तरी लैंगिक शिक्षणासाठी अजूनही ठोस म्हणावं असं कुठलंही शैक्षणिक अथवा सामाजिक धोरण नाही, ही समाज म्हणून आपली मोठीच शोकांतिका आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि ओटीटीच्या क्रांतीमुळे मानवी वर्तनात आमूलाग्र असे बदल झालेत, अजूनही होताहेत. यात मनुष्याच्या आदिम भावना आणि गरजांचा विचार करता झोपेवर जसा थेट परिणाम झालाय, तसाच तो कामभावनेवरही झालाय. थोडक्यात काम आणि लैंगिकतेसंदर्भात समाज म्हणून बहुतेक आपण सगळेच जण आज भांबावलेल्या स्थितीत आहोत. माहितीच्या विस्फोटामुळे यातलं नक्की बरोबर काय आणि चूक काय, हा विचार करायलाही कुणाकडे फुरसत नाहीये.
आपल्या समाजात बालपणी लैंगिकता शिक्षणाचा असणारा संपूर्ण अभाव हा कसा मोठेपणी लैंगिक विकृतींना, व्याधींना जन्म देतो ही बाब वेळोवेळी अधोरेखित होते. किशोरावस्थेत हस्तमैथुनाबाबत योग्य शास्त्रीय माहिती न मिळाल्यानं त्याविषयीचा न्यूनगंड तर मुलांच्या मनात वाढतोच, पण त्याचंच पर्यवसान मोठेपणी शीघ्रपतनासारख्या व्याधींमध्ये होऊ शकतं (शीघ्रपतन इतर अनेक कारणांनीही होतं). कारण हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे, ते करण्यात पाप नाहीये आणि म्हणूनच ती घाईघाईत उरकण्याची गोष्ट नाहीये, याचं मार्गदर्शनच लहानपणी कधी मिळत नाही. दुसरीकडे स्त्रियाही हस्तमैथुन करतात, याबद्दल तर कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. खुद्द स्त्रियांनाही आपल्या जननेंद्रियांविषयी, शिश्निकेसारख्या सुखसंवेदना निर्माण करणाऱ्या अवयवाची ओळख नसते. नकळत्या वयापासूनच स्वतःच्या शरीराबद्दल माहिती देताना जननेंद्रियांना केवळ संकोचामुळे वगळलं जातं. किंवा फारफार तर ते ‘गुड टच बॅड टच’पुरतं सीमित केलं जातं. पण ज्या अवयांबद्दल, ज्यांच्या कार्याबद्दल स्वतःलाही पुरेशी ओळख नाहीये, तिथे ध्यानीमनी नसताना तिहाइतानं केलेला स्पर्श हा बॅड टच असूनही सुखावह वाटू शकतो, याची माहिती किती मुलांना आणि मोठ्यांनाही असते ?
मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू…. .
आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते ?
उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं?
विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं?
सुखी संसाराचं गुपित काय?
बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते?
त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं ?
ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय?
हे आणि असे अनेक प्रश्न. . .
सर्व वयोगटाला पडणारे. . . ते कोणाला विचारायचे ?
– – – या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक.
या विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, स्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे लैंगिकतेच्या व्यापक विषयाकडे बघण्याच्या संकुचित दृष्टिकोनाचा अडसर दूर करत मोकळेपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला तुमच्या आप्तांसोबत असा मोकळा संवाद प्रस्थापित करता यावा, ही अपेक्षा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “उलघाल ” – लेखक : प्रा. यशवंत माळी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – उलघाल
लेखक – प्रा. यशवंत माळी
प्रकाशक – साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर
पृष्ठे – १८२,
मूल्य – २५० रु.
गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा. यशवंत माळी यांचं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. चकित होण्याचं कारण असं की माळीसर कथा लिहितात, हे मला माहीतच नव्हतं. मी त्यांची एकही कथा वाचली नव्हती, किंवा
कथालेखक म्हणून त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. विचार केला, प्रथम त्यांना फोनवरून पुस्तक मिळाल्याचं कळवावं. नंतर कथा वाचून पुन्हा फोन करावा. प्रा. यशवंत माळी माझे एम. ए. चे सहाध्यायी. आम्ही दोघेही नोकरी करत होतो. त्यामुळे रेग्युलर कॉलेजला जाणे शक्य नव्हते. बहिस्थ म्हणूनच आम्ही एम. ए. केले.
त्यावेळी बहिस्थ विद्यार्थ्यांना सांगलीचे प्रा. व्ही. एन. कुलकर्णी दर रविवारी मार्गदर्शन करत. म्हणजे नोट्स् देत. ते सांगत. आम्ही लिहून घेत असू. त्या नोट्सच्या जिवावर आम्ही बर्यापैकी मार्क मिळवून एम. ए. झालो. माळीसरांशी तशी तोंडओळख होती. नंतर आसपास होणार्या कवीसंमेलनातून, साहित्यसंमेलनातून आम्ही भेटत-बोलत राहिलो, पण त्यावेळी त्यांनी आपल्या कथालेखनाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे ‘उलघाल’ पाहून आश्चर्य वाटलं. अर्थात आनंदही झालाच. मी ‘उलघाल’ चाळलं. अतिशय देखणं पुस्तक. कागद, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ सगळंच छान. मुद्रणदोष फारसे नाहीत. पहिलंच पुस्तक हेवा वाटावा असं. म्हणजे त्यावेळी तरी मला ते त्यांचं पहिलंच पुस्तक आहे, असं वाटलं होतं.
‘उलघाल’ वाचलं. मला कथा अतिशय आवडल्या. यात एकूण १६ कथा आहेत. प्रत्येक कथा विषय –आशयाच्या दृष्टीने वेगळा. पण काही गोष्टी सर्वत्र समान आहेत. त्या म्हणजे आशयानुकूल प्रसंगनिर्मिती, ता प्रसंगातील तपाशीलांचे नानाविध मोहक रंग, त्यातून साकार झालेल्या साजिवंत वाटाव्या, अशा व्यक्ती, व्यक्तिचित्रणाला अनेक ठिकाणी दिलेली प्रतिमा-प्रतिकांची जोड, त्यातील मनोविश्लेषण, अनेक ठिकाणी
सूचकतेने घडणारे जीवन दर्शन, कथेचा परिपोष करणारी सुयोग्य भाषाशैली, अशी अनेक वैशिष्ट्ये यातील कथांमध्ये दिसतात. या कथांबद्दल मलपृष्ठावर, श्रेष्ठ लेखक आणि चिकित्सक कै. वसंत केशव पाटील यांनी लिहिले आहे, ‘ या लेखकाचे ग्रामीण आणि नागर संस्कृतिविषयक आकलन व अन्वय, अधिकतर अव्वल आणि गंभीर प्रकृतीचा आहे. त्यामुळे मानवी जीवनातील आदिम नि अपरिहार्य रीती-रिवाजाचे एक मनोहारी
प्रतिबिंब, सर्वच कथांमध्ये उतरले आहे. हा कथासंग्रह, एक अस्सल कलाकृती म्हणून जाणत्यांना नक्कीच विचारात घ्यावा लागेल. ’
कथासंग्रह वाचला आणि प्रा. यशवंत माळीसरांना तो आवडल्याचा फोन केला. फोनवर बोलताना कळलं, हा काही त्यांचा पहिला कथासंग्रह नव्हे. ‘केकत्यांचा बिंडा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. १९९२साली तो प्रकाशित झाला. त्याच्या 3 आवृत्या निघाल्या आणि त्याला ३ पुरस्कार मिळाले. त्यानंतर’ पोटगी’, ‘किराळ’, ‘परतीचा पाऊस’, ‘उलघाल’ असे कथासंग्रह निघाले. ‘वेगळी वाट’ हा कथासंग्रह फेब्रुवारी२००५ मध्ये
प्रकाशित झालाय. ‘परतीचा पाऊस’ला विविध संस्थांचे ७ पुरस्कार, तर ‘किराळ’ला १६ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांचा ‘सखी’ हा कविता संग्रह, ‘प्रतिज्ञा, आणि मिनीचे लग्न या बाल कादंबर्या आणि ‘माझी शाळा’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित आहे. या सार्यांनाच विविध संस्थांचे पुरस्कार आहेत. त्यांच्या एकूण पुरस्कारांची संख्या ९० होते, असं कळलं. म्हणजे माळी सरांनी पुस्तक काढावं आणि त्याला पुरस्कार मिळावा, हे ठरल्यासारखंच झालं जणू. ‘सीनातीर’ ( जामखेड – जी. अहमदनगर ) केवळ त्यांच्याच १० कथांचा २०२१ साली दिवाळी अंक काढला. ‘उलघाल’मधील ‘थायलंडची तुळस’ या कथेचा डॉ. चंद्रकांत
पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला, तर ‘किराळ’ या कथासंग्रहाचा हिंदीमध्ये अनुवाद झालाय. शब्बीरभाई बिलाल शेख यांनी तो केलाय. ‘‘केकत्यांचा बिंडा’ या कथासंग्रहाचा इंग्रजीमध्ये अनुवाद डॉ. संजय बोरूडे करताहेत. त्यांच्या काही निवडक कथांचे उडियातही अनुवाद होत आहेत.
माळी सरांची ही मिळकत ऐकून मी थक्क झाले. वाटलं, आपल्या माहितीचा परीघ किती इवलासा असतो.
‘उलघाल’ ही कथासंग्रहातील पहिलीच कथा. तिची नायिका अबोली. ती बडी माँकडे मोलकरीण आहे. एकदा बडी माँ आणि त्यांचे पती आठ दिवसांच्या टूरवर जातात. घरात तरुण मुलगा आहे. मनजीत. ती कामाला घरी यते, तेव्हा मनजीत व्यायाम करत असतो. त्याचं घामाने निथळणारं पीळदार रूप पाहून अबोलीचं मन तिकडे ओढ घेतं. मग अनेक प्रसंगातून ती त्याला निसटते –पुसटते स्पर्श करते. हे प्रसंग मुळातूनच वाचायला हवेत. मनजीतलाही तिचे आकर्षण वाटते. ती तरुण आहे. सुंदर आहे. नीट-नेटकीही आहे. तो कामाला जायला निघतो, तर त्याला गाडी चालवतानाही तीच पुढे दिसते. पण तो मनाशी निश्चय करतो, ‘तिच्या हरहुन्नरी मनाला कुठेही चुरगळू द्यायचं नाही. त्यावर कलंक लागू द्यायचा नाही. जखम होऊ
द्यायची नाही. मनात कसलीही उलघाल होऊ द्यायची नाही. ’ ओढाळ आणि आतुर मनाची अतिशय मुग्ध अशी कथा आहे ही.
‘न सुटलेले कोडे’ ही माया इनामदारची कथा. माया सुरेख आहे. सतत स्वत:ला आरशात पाहून ती स्वत:वरच खुश असते. इनामदारीचा डामडौल आता त्यांच्या वाड्याप्रमाणेच ढासळलेला आहे. आई आजारी. तिला मायाच्या लग्नाची मुळीच काळजी नाही. पुढे मायाला नोकरी लागते. कामात ती व्यवस्थित, नीट-नेटकी आहे. ती कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. पण तिच्यावर मेहेरनजर आहे, ती तिच्या
बॉसची. कारण ही अविवाहित सुंदरी आहे. तिथे येणारा प्रत्येक नवा बॉस तिच्याशी संबंध ठेवतो. या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार? आई की आपण ? याचं तिला कोडं पडतं. आता ती बरीच प्रौढ झाली आहे. केस मुळापासून पांढरे होऊ लागले आहेत. पण तरुण दिसणं, ही तिची गरज आहे.
‘थायलंडची तुळस’ म्हणजे किमी. नायक थायलंडच्या टूरवर गेला असताना तिथे ती त्यांची गाईड होती. तिला नायकाबद्दल विशेष आत्मीयता वाटते. गप्पा, जवळीक यातून ती त्याच्याशी विशेष सलगी करते. परतताना विमानातळावरून एका वेगळ्या रस्त्याने त्याला बाहेर काढते. टॅक्सीने एका जागी नेते. ती सांगते, तिचा नवरा हिजडा आहे. दोघे एकरूप होतात. ती लगेचच त्याला विमानतळावर आणून सोडते. खाऊचा पुडा म्हणून ती त्याला एक चिठ्ठीवर मेसेज पाठवते. ती म्हणते, ‘तुझ्या भेटीने माझ्या सुखाचा रंग बदलला. मी तृप्त आहे. मी लवकरच आई होईन. त्याचे नाव तुझ्या नावाचा अर्थ असलेले थायी भाषेतले नाव ठेवीन. ’ तिला नायक ‘थायलंडची तुळस’ का म्हणतो, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं.
.. ‘न सुटलेले कोडे’ आणि ‘‘थायलंडची तुळस’ या दोन्ही कथेत शरीरसंबंधाचा केवळ उल्लेख आहे. कुठेही उत्तानता नाही, हे लेखकाचे कौशल्य. वरील तिन्ही कथांचा आशय- विषय वेगळा असला, तरी यात एक अंत:सूत्र आहे, असे मला वाटते.
‘इगत’, ‘रतीब’, ‘शुटिंग’, ‘निवडणूक’ या ग्रामीण बाज असलेल्या कथा, गावरान बोली, संवादातून लोकांचे बेरकीपण व्यक्त होणारे, परिसर, प्रसंग, व्यक्ती आपण वाचत नाही, तर डोळ्यांनी बघतोय, अशी शैली. ‘इगत’ ही कथा तानाजी आणि हणम्या या दोन चुलत भावांची. भाऊ कसले वैरीच. जमिनीवरून वाद, भांडणे, मारामारी. एकदा तानाजी मारामारी केली म्हणून तालुक्याला जाऊन हाणमाविरुद्ध केस करतो. यातू बालबाल बचावण्यासाठी हाणमा कोणती ‘इगत’ साधतो, ते प्रत्यक्ष कथेतच वाचायला हवे.
तात्यानानांच्या मळ्यात ‘शुटिंग’ होणार, अशी बातमी पंचक्रोशीत पसरते. शुटिंग बघायला अख्खं गाव लोटतं. दिवसभर वाट पाहूनही तिथे कोणी येत नाही. मग कळतं, ती अफवा होती. लोक परततात. परतताना लोक तात्यानानांच्या मळ्याचा विध्वंस कसा करतात हे लेखकाने अगदी बारकाईने, तपशीलवार दिले आहे. ही अफवा कुणी आणि का उठवली, हे कथेतच वाचायला हवं.
प्रवास, सावली, दिशाहीन, पेन्शन, सत्कार, स्थलांतर, मी पुढे पुढे कथा वाचत जाते. प्रत्येक कथा वाचून झाली, की वाटतं, याचा समावेश परिचयात करायला हवा…. करायलाच हवा…. पण किती आणि काय
काय लिहिणार?
`व्यक्तिचित्रणाचा एक नमूना म्हणून बडी माँच्या बोलण्याबद्दल ( उलघाल ) त्यांनी काय लिहिले आहे, ते बघा. ‘चावी फिरवल्याबरोबर नळातून पाणी यायच्या आधी भसा-भसा वावटळासारखी हवा यावी, आणि पाण्याच्या फवार्याबरोबर नुसताच आवाज यावा, तसं बडीमाँचं बोलणं. काही कारण असू द्या की नसू द्या, त्यांचं तोंड अखंड चालू असायचं. कुणाशीही त्या रोखून बघतच बोलायच्या. बोलताना दारातल्या पायपुसण्याला खेटरं टराटरा पुसावीत, तसं डाव्या हाताच्या वाढलेल्या नखांनी साडीवरूनच डावी मांडी खरा-खरा खाजवणं मनमुराद सुरू असायचं. ’
‘न सुटलेलं कोडं’ मधील मायाच्या आजारी आईबद्दल त्यांनी लिहिलय, ‘आयुष्याच्या महावस्त्रात नकोसं
—- प्रा. माळी यांच्या व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या बाह्य रूपदर्शनाबरोबरच त्याच्या मनातील विचारही त्यांनी बारकाव्याने, तपशीलाने दिले आहेत. सर्वच कथांमधील पात्रात असे बारकाव्याने केलेले मनोविश्लेषण दिसत असले, तरी, ‘इच्छामरण’, ‘दिशाहीन’, ‘पेन्शन’, ‘प्रवास’, ‘निवडणूक’, ‘सत्कार’, ‘निर्णय’ या कथांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल.
रचना स्वामी या ‘समकालीन कथांमधील मनोविश्लेषणाचा’ प्रबंधासाठी अभ्यास करताहेत. त्यात समकालीन कथांच्या तूलनेत, प्रा. यशवंत माळी यांच्या कथेतील मनोविश्लेषणाचा प्राधान्याने अभ्यास करत आहेत.
प्रा. यशवंत माळी यांच्या कथा अधिकाधिक कसदार आणि लौकिकसंपन्न होतील याची ग्वाही ‘उलघाल’ हा कथासंग्रह निश्चितपणे देतो.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “मृत्यू… एक अटळ सत्य” – लेखक – सद्गुरु ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मृत्यू.. एक अटळ सत्य
लेखक : सद्गुरू
पृष्ठ: ३९१
मूल्य: ३९९₹
मृत्यू किंवा मृत्यूबद्दलचा उल्लेखही अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानला जातो. पण आपला हा दृष्टिकोन पूर्णपणे चूक असला तर? मृत्यूकडे एक आपत्ती म्हणून नाही, तर जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू, ज्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीच्या अनेक शक्यता दडल्या आहेत, अशा प्रकारे पाहता येईल का? अगदी पहिल्यांदाच कोणीतरी हे सांगत आहे.
या अगदी विलक्षण पुस्तकातून, सद्गुरू त्यांच्या आंतरिक अनुभवाच्या प्रगाढ सामर्थ्यातून, मृत्यूबद्दल क्वचितच बोलले जातील, अशा काही पैलूंचा उलगडा करतात. एखाद्याने त्याच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल एका अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून ते आपल्याला सांगतात.
सर्वांनी जरूर वाचावेच असे आहे हे पुस्तक.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जर – तर ‘ च्या गोष्टी (भाग १ आणि २)” – लेखक – डॉ. बाळ फोंडके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ‘जर – तर‘ च्या गोष्टी (भाग १ आणि २)
लेखक: डॉ. बाळ फोंडके
पृष्ठे: ३३८ दोन्ही मिळून
५००₹
आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आस्वादही घेतो. पण त्यांच्याविषयी का, कसं वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थितीही उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचं थंड माथ्यानं विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्या पायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं मिळवण्याची निकड भासू लागते.
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक
कोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. तोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर? प्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा ‘जर-तर’च्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “व्योम व्यथांचे व्यापक” – (कवितासंग्रह) – कवी : श्री शरद कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : व्योम व्यथांचे व्यापक (कविता संग्रह)
कवी : शरद कुलकर्णी. मिरज
9673737044
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर.
7588586676
मूल्य : रु. 200/_
सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे “ व्योम व्यथांचे व्यापक – — जगण्याच्या स्पर्धेत धावाधाव करताना आपल्याला स्वतःकडे पहायलाही वेळ असत नाही. अशा धकाधकीच्या जीवनात अंतर्मुख होऊन, स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहून, कविमनाच्या रसिकतेला धक्का न लावता, मनातील विचारघनांतून शब्दांचा शिडकावा करत व्यथांचे व्यापक असे व्योमही सुसह्य करणा-या कविता सादर करुन कवी श्री. शरद कुलकर्णी यांनी आपल्या सर्वांच्याच जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच त्यांचा ‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या कविता पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणून त्यांनी आपले मनच उघडे केले आहे. सुखदुःखाबरोबरच प्रेम, निसर्ग, आत्मचिंतन करणा-या कविता त्यांनी आपल्यासमोर आणल्या आहेत. आत्मसंवाद आणि आत्मानुभवाच्या या कविता वाचकालाही विचार करायला लावणा-या आहेत.
कलावंताला व्यक्त होण्यासाठी त्याच्या कलेचे माध्यम उपयुक्त ठरते. याठिकाणी कविने आपली कविता हेच माध्यम वापरुन आपल्या मनाचे पदर उलगडले आहेत. बहुना कवितेने कविला ‘आत्मज्ञाना’चा मार्ग दाखवला आहे असे वाटते. आयुष्यात आपल्याला नेमकं काय हवं आहे याचं ज्ञान आपल्याला व्हावं एवढच कवीचं मागणं आहे. म्हणून कवी म्हणतो,
“भूक समजावी माझी
आणि कळावी तहान
नाही आणिक मागणे
व्हावे इतुकेची ज्ञान “
…. कवितेनेही कवीचे मागणे मान्य केले आहे याचे प्रत्यंतर पुढच्या अनेक कविता वाचताना येतो.
जीवनातील सत्य काव्यात्म पद्धतीने समजावताना कवी म्हणतो,
“झाडांचे वैभव सरता
पाखरे उडून जाती
जखडून जायबंदी मी
शोधतो नव्याने नाती “
वैभव सरत असतानाही नवी नाती शोधण्याची कवीची वृत्ती जीवनावरील प्रेमाचे द्योतक आहे. त्याच वेळेला अंतीम क्षणाची जाणीव व्यक्त करताना कवी आपल्या आयुष्याकडे किती तटस्थपणे पाहू शकतो हे अनुभवायला मिळते. कवी लिहीतो आहे,
“नाही आक्रोश आकांत
नाही अश्रूंचे प्रपात
नेणिवेच्या पलीकडे
सारे अवकाश शांत “
कदाचित या तटस्थपणामुळेच कवी म्हणून शकतो की,
” सांभाळीत सर्व किनारे
मी व्रतस्थ कालसरिता
दैनंदिनीत जरी बंदिस्त
बंधमुक्त मी कविता “
अध्यात्माशी जवळीक साधल्यामुळेच अशी तटस्थ वृत्ती त्यांच्या अन्य कवितांमधूनही दिसून येते.
” कधी कधी चष्मा काढून
थोडेफार डोळेही पुसावे
तुका म्हणे उगी राहावे
एवढे तरी अध्यात्म जमावे “
किंवा
” आता प्रयोजन जगण्याचे,
आयुष्यालाच विचारावे
प्रत्येक ऋतू समजून घेत,
समजूतदार व्हावे “
या काव्यपंक्ती हेच दर्शवतात. या वृत्तीमुळेच कवी सहजपणे म्हणू शकतो,
” साफल्य, वैफल्य
दोन्हीही सापेक्ष
निरपेक्ष मन
असो द्यावे. “
तर कधी त्याला वाटते – –
” देह मानवाचा जरी व्यथा ईश्वरी भोगाव्या
डोळे संतांचे असावे, ठेवा दुःखाचा जपावा “
पण असे असले तरी कविलाही सामान्य माणसाप्रमाणे सुखदुःखे भोगावी लागतातच. मुळे त्यातून येणारे अनुभव कवितेतून शब्दबद्ध होत जातात. व्यावहारिक जगात पदोपदी येणारा खोटेपणाचा अनुभव मन उद्विग्न करुन टाकणारा असतो. त्यामुळे हे सगळं जगच खोटेपणाने भरुन राहिले आहे की काय अशी मनाची भावना होऊ लागते. सत्याचा क्वचित प्रसंगी येणारा अनुभवही असत्य वाटू लागतो. मनाला वाटते,
“स्वप्न खोटे, वास्तव खोटे
ऐहिकाचे ज्ञान खोटे
जिंकणारे वचनात अंतिम
सत्यही झूट खोटे “
पण याला पर्याय नाही हे जाणून घेऊन, जनरीतीचा आधार मदतीला घेऊन,
” तरी टेकविला माथा
केली तडजोड
सर्वत्र बिघाड
मान्य केला “
का ? तर दुसरे मन हेही बजावत असते की चुकली तरी ही माणसं आपलीच आहेत. सोसलं पाहिजे. हे भिन्न प्रवाह आपणच जोडले पाहिजेत. आपणच व्हावं,
” कधी सुजाण संयमी
कधी पूल समजूत
दोन विभिन्न मतांचा
पूल एक शांतिदूत “
…… पण ही शिकवण तरी कुठून मिळते ? डोळे उघडे ठेवून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सहज समजते की निसर्गच आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवत असतो.
“कधी असावे तटस्थ
कधी राहून व्रतस्थ
अध्यात्म जगावे
तरुवत “
किंवा
” कधी चिमणी होऊन
घर मेणाचे बांधावे
क्षेमकुशल ठेवावे
अबाधित “
मग निसर्गही आपला वाटू लागतो. जवळचा वाटू लागतो. आपल्या मनाच्या विविध अवस्था या निसर्गाशी निगडीत आहेत असे वाटू लागते. एक पाऊसच मनाला चिंब करुन टाकत असतो आणि त्याची विविध रुपे ही जणू मनाचीच विविध रुपं असतात. कवी या पावसाशी इतका एकरुप होतो की शेवटी त्याला जाणवते की,
“पाऊस थेंब थेंबांचा पाऊस एक सरिता
निःशब्द करुन ठरली नीरव शांत कविता “
निसर्गाशी एकरूप झाल्यामुळेच कविच्या प्रेमकाव्यातही निसर्ग भरुन राहिलेला दिसतो. ‘ती’ कधी श्रावणाची बरसात होते तर कधी तिच्यात कधी तरुचा धुंद बहर दिसू लागतो. कधी ती गंधयुक्त शीतल झुळूक असते तर कधी शांत सरिता बनते. कधी ती आठवणींचा सैलाब बनते. तर कधी सुखाची सावली होऊन रिझवत असते.
या सर्व कवितांच्या अर्थ व्यापकपणे समजून घेण्यासाठी संपूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. पण याशिवाय अन्य काही कवितांचा उल्लेख करणे उचित ठरेल.
‘यार होतो मी नवा ‘ ही कविता खूप वेगळी वाटते. कारण या कवितेत कविने मराठी, हिंदी आणि उर्दू शब्दांच्या चपखलपणे केलेल्या वापरामुळे शेरोशायरी गझल आठवल्याशिवाय रहात नाही. ‘नुसतंच’ या कवितेतून कवितेच्या निर्मिती अवस्थेत कविच्या मनाची होणारी अवस्था व्यक्त झाली आहे. पावसाची विविध रुपे विविध अर्थांनी व्यक्त करणारी कविता म्हणजे ‘ आर्त पाऊस ‘
तर ‘ यश ‘ ही कविता एक उत्तम उपहासात्मक प्रेमकाव्य म्हणावे लागेल. ‘ प्रश्न ‘ हे गझलसदृश काव्य त्यातील शेरांमुळे उठावदार झाले आहे. ‘ महाकवी मी बाजारी ‘ या कवितेतून कविने काळाबरोबर होणारी फरफट योग्य शब्दात व्यक्त केली आहे. तर ‘ प्रारब्ध ‘ या कवितेतून कविने जणूकाही अपयशाची प्रामाणिक कबुलीच दिली आहे. परिस्थितीला सामोरे जाताना जी भूमिका घ्यावी लागते, मग ती आपल्याला पटो न पटो, त्याचे चित्रण ‘ लिपीत मौनाच्या ‘ या अतिशय छोट्या कवितेत केलेले दिसते.
कविचे मागणे तरी काय आहे ? ‘ येवो मरण कधीही ‘ या कवितेत कवी म्हणतो कवितेशी, शब्दांशी इमान राहो, बाकी मरणाची फिकीर नाहीच. केव्हाही येवो. आणि त्या पश्चात ओळख राहणार असेल तर कवी म्हणून ओळख रहावी. अशी ही प्राणप्रिय कविता कशी अंकुरते याचे रहस्य ‘ आतल्याआत ‘ या कवितेत कविने उलगडले आहे. ‘आतून ‘ आल्याशिवाय कविता अंकुरत नाही हे सांगताना कविने दिलेले दाखले कविमनालाच समजू शकतात.
‘ चिमणी ‘ ही आणखी एक, चिमणीसारखी छोटी कविता, पण खूप मोठा आशय घेऊन आलेली. थोड्याश्या यशाने हुरळून जाणे, भ्रमात जगणे व्यर्थ आहे हे शिकवणारी ही चिमणी. संध्याकाळ नेमकी कशी असते हे चित्रमय शब्दात रंगवणारी कविता म्हणजे ‘ संध्याकाळी ‘. कातरवेळेचे नेमके चित्र डोळ्यासमोर उभे रहावे अशी कविता ! तर भूतकाळात रमणारी ‘ भातुकली ‘ ही कविता, आठवणींचे बोट धरुन हरवलेल्या गावात जाणारी.
अशा किती कविता सांगू ? कवीची काही दैवते आहेत. त्यांच्यावरही कविने काव्य केले आहे. मी दुःखाचा कवी असे म्हणणारे कवी ग्रेस, स्वरांचे चांदणे पसरणा-या किशोरी अमोणकर , स्वतःच्या हस्तस्पर्शाने वाद्यांतून मनमोहक स्वर उमटवणारे संगीतकार मदन मोहन
आणि चंदेरी सूरांच्या तलम वस्त्राने मनाला वेढून टाकणारे तलत मेहमूद यांच्याविषयी प्रेम, आदर आणि त्यांच्यातील दिव्यत्वाचे दर्शन घडवणा-या कविता अत्यंत मोजक्या शब्दात त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात.
‘व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शीर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून टाकले आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही. अवघ्या आयुष्याकडे पहायचे म्हणजे सुख-दुःखाचा ताळेबंद मांडायचा. आणि असा हिशेब मांडतानाही
कविला, ” अव्यक्ताला व्यक्त करत, कवितेच्या वाटेवरुन नियोजित ठिकाणी पोहोचायचं आहे. ” हा प्रवास कविनेच म्हटल्याप्रमाणे शब्दांशी इमान राखून आणि आपली काव्यमुद्रा उमटवून पूर्ण करायचा आहे.
‘पथ्य ‘ सांभाळून चालू असलेल्या या ‘उपचारांना’ नक्कीच यश येईल व अशीच सशक्त कविता कवीच्या लेखणीतून पाझरत राहील याविषयी शंकाच नाही.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “द लास्ट कोर्टेसान” – लेखक – श्री मनीष गायकवाड़ ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : द लास्ट कोर्टेसान (मराठी)
लेखक : मनीष गायकवाड
पाने : १९४
मूल्य : ३००₹
एक तवायफच्या आयुष्याचा वेगळा पट उलगडणारी कादंबरी…
१९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले.
तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते.
हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘निर्वासित’ हे डॉ. उषा रामवाणी यांचे आत्मकथन. त्यांच्या जीवन-संघर्षाची कहाणी. प्रस्तावनाकार डॉ. राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ) लिहितात, ‘हे आत्मकथन वाचनीय, प्रांजळ आहे. यात उषाच्या ‘धाडस करण्याला हाक देऊ आणि पुढे जाऊ’ या वृत्तीचा परिचय येतो. अंगावर कोसळलेले प्रसंग धाडसाने टिपताना आणि त्यातून मार्ग काढण्याची पायरी ओलांडताना त्यांना पदोपदी झगडावं लागलं. प्रस्थापित जीवनशैली झुगारून आत्मशोधनाचं धाडस ही त्यांची या आत्मकथनाचा ‘हीरो’ म्हणून प्रमुख भूमिका. ’ ते पुढे लिहितात, ‘आत्मकथा म्हणजे, आपल्याला समजलेल्या जीवनातील, स्वत:ला भावलेल्या अनुभवांचं कथन असतं. ’
आपलं ‘मनोगत’ व्यक्त करताना लेखिका म्हणते, ‘मी आत्मकथन लिहिणार असल्याचं शाळेत असल्यापासून ठरवलं होतं. आजवरचं माझं जगणं वाचनीय आहे, असं मला आणि अनेकांना वाटतं, म्हणून मला ते ग्रंथबद्ध करावसं वाटलं. ती श्वासाइतकी उत्कट गरज वाटली. या आत्माविष्काराला सार्वजनिक स्वरुपात ‘न्याय’ दिल्याशिवाय घुसमट थांबणार नव्हती. या लिखाणातून मला जे आत्मिक सुख मिळाले, ते अमूल्य आहे’.
‘हे आत्मचरित्र नाही. उत्कटतेने, उत्स्फूर्तपणे तुमच्याशी मारलेल्या या गप्पा, हितगुज आहे’, असंही लेखिका म्हणते.
आजवर मी मूलभूत गरजांसाठीच जीवघेणा संघर्ष केला आहे. घर, पैसा, प्रेम, आधार वगैरे… जगण्याच्या मूलभूत प्रश्नाशी इतर प्रश्न भिडत राहिले. जगावंसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळले होते. अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड लढाई चालू होती. लहानपणापासून मी टोकाची अलिप्त, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले होते. स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होता आणि माझीच मी मला नव्याने आकळत गेले.
तिने आपली संघर्षगाथा 2016मध्ये फेसबुकवर पोस्ट केली. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अविनाश धर्माधिकारी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो इ. अनेक जाणकार साहित्यिकांनी कौतुक केले. तिच्या या कहाणीला 5000 तरी लाईक्स आणि कमेंटस मिळाले असतील. मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा, सतीश बडवे यांनी खालील शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय, ‘या लेखनात खूप जागा आशा आहेत, की त्यातून आपली घर नावाची संस्था, विद्यापीठ नावाची संस्था आणि भोवतालचा समाज यातील ताणे-बाणे उलगडले जातात. त्यातही मुलीच्या वाट्याला येणारे संघर्षाचे प्रसंग फारच तीव्र होत जातात. तुम्ही सगळ्यात चांगली निभावलेली गोष्ट म्हणजे लेखनात कुठल्याच गोष्टीचे भांडवल केलेले नाही. घराची श्रीमंती, सामाजिकदृष्ट्या मागासलेले असणे, स्त्री असणे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे वगैरे… वगैरे… निखळ माणूस म्हणून तुम्ही हे सलग सांगत जाता. कोणताच अभिनिवेश न बाळगता. संवादी शैलीतील हे प्रभावी निवेदन म्हणूनच भावते. खोलवर रुतते. ’ पुढे असेच काही अभिप्राय लेखिकेने दिले आहेत.
‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली. ’ ललित, कल्पनारम्य लेखनाची लेखिकेला आवड नाही. ती म्हणते, ’माझा पिंड वैचारिक, सामाजिक लेखनाचा. ’ ‘निर्वासित’ हे त्यांचे आत्मकथन, याच दृष्टिकोनातून लिहिले आहे.
नंतरचे प्रकरण लेखिकेने आपल्या सिंधी समाजावर लिहिले आहे. फाळणीनंतर सिंधी लोक भारतात आले. जमेल तिथे, जमेल तसे स्थिरावले. रुजले. या समाजाची वैशिष्ट्ये तिने दिली आहेत. कुशल, व्यवहारी, सरळमार्गी, उदार, दिलदार, पापभीरू असे हे लोक दैववादी नाहीत. मिठास वाणी हा या समूहाचा विशेष गुणधर्म. श्रमांची त्यांना लाज वाटत नाही. सामाजिक आणि वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता, उत्सवप्रियता, चंगळवाद यांसारख्या दोषांबद्दलही तिने लिहिले आहे. ती म्हणते, यांना ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल. परांपरागत व्यवसाय करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. नोकरी करणार्यांचं प्रमाण 1%ही नाही. स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प. आपलं शाश्वत सुख, स्वातंत्र्य, आत्मभान याची जाणीव असणार्या स्त्रिया अभावानेच आढळतात. आपला जन्म ‘लासी’ नावाच्या तळागाळातल्या जमातीत झाल्याचे ती सांगते. सिंधी समाजाबद्दल बरीच माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने वाचायला मिळते. फाळणीनंतर सिंधी भारतात आले. सिंधी समाजाला आपण निर्वासित म्हणतो. उषाने आपल्या घरातच इतके भोगले आहे, की विनीता हिंगे म्हणतात, ‘’उषा तिच्या स्वत:च्या घरातच ‘निर्वासित’ होती’’. अर्थात, अधूनमधून वडिलांनी तिला किरकोळ आर्थिक मदत केल्याचेही तिने लिहिले आहे. पण तिला पुरेशी आणि हवी त्यावेळी तिला ती मिळालीच असे नाही.
‘बालपण आणि शाळा-कॉलेज’ व ‘माहेरवास’ प्रकरणांत उषाने आपल्या कुटुंबाची माहिती दिली आहे. आई- वडील, चार बहिणी, एक भाऊ, वहिनी, आजी, नानी, एक व्यंग असलेले गतिमंद काका यांची सविस्तर माहिती दिली आहे. आई सत्संगात, गुरूंमध्ये रमलेली. पुढे ती साध्वी झाली. वडील श्रीमंत, पण मुलाच्या म्हणजेच उषाच्या भावाच्या चैनी, उधळ्या स्वभावामुळे पुढे त्यांना खूप कर्ज झाले. मुले-मुली यांना समान वागणूक नाही. घरात शिक्षणाचे महत्त्व तिच्याशिवाय कुणालाच नाही. समाजालाही नाही. शिकावं, स्वाभिमानाने जगावं, आत्मभान जागवावं याची जाणीव कुणालाच नाही, याबद्दल ती खंत व्यक्त करते. तिची धाकटी बहीण 16व्या वर्षी साध्वी झाली. तिला अध्यात्मातलं त्या वयात काय कळत असेल? पण परतीचे मार्ग नाहीत. याबद्दल समाजाने, कायद्याने काही तरी करायला हवं, असं तिला वाटतं. तिच्याही मागे साध्वी होण्याबद्दल तगादा लागला होता, पण पुढे शिकण्याबद्दल ती ठाम होती. दहावीला चांगले मार्क्स असूनही वडिलांनी कॉलेजमध्ये घातले नाही. दोन वर्षांनंतर तिला गुरूंच्या सूचनेनुसार ती परवानगी मिळाली. दोन वर्षे वाया गेली, म्हणून ती हळहळली.
पुढल्या कॉलेजच्या जीवनातील निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नानाविध उपक्रम यांत ती रमून गेली. ती लिहिते, ‘कॉलेजमध्ये वाङ्मयीन जाणिवा विस्तारल्या. अभिरुची संस्कारित झाली. प्रतिभेला वाव मिळाला. ’ कॉलेजच्या जीवनातील आनंदक्षणांबद्दल तिने मनापासून लिहिले आहे. ती पदवीधर झाली, पण एम. ए. होऊ शकली नाही, याबद्दलही तिने विस्ताराने लिहिले आहे. विद्यापीठाच्या 0. 763 क्रमांकाच्या नियमानुसार तिला पीएच. डी. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. विषय कोणता घ्यावा, कसे काम करावे, याबद्दल मार्गदर्शन करणारे तिला कोणीच भेटले नाही. ‘एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ हा तिचा प्रबंधाचा विषय. तिच्या वैचारिक आणि गंभीर प्रकृतीला साजेसाच हा विषय, पण संदर्भ शोधायला कठीण. त्यासाठी खूप भ्रमंती करावी लागली. या काळात नोकरी करणंही अत्यावश्यक होतं. 17 वर्षे अथक परिश्रमानंतर, चिवटपणे परिस्थितीशी झुंज देत, 2006मध्ये तिला पीएच. डी. मिळाली. इतकंच नव्हे, तर उत्कृष्ट प्रबंधाचं प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिकही मिळालं. जीवनातले एक मोठे ध्येय साध्य झाले.
बी. ए. पासून उषा घर सोडून हॉस्टेलमध्ये राहू लागली. वर्किंग वुईमेन्स, हॉस्टेल, विद्यापीठाचे हॉस्टेल, पेईंग गेस्ट इ. अनेक ठिकाणचे अनुभव, त्याचप्रमाणे नोकरी, अर्थार्जन करत असताना आलेल्या प्रसंगांचेही सविस्तर वर्णन तिने केले आहे. यावेळी नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, विचित्र, विक्षिप्त वागणं, स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्ती या सगळ्याशी तिला जुळवून घ्यावं लागलं. तिची वर्णनशैली इतकी प्रत्ययकारी आहे, की हे सारे प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि त्यांच्यातील संवाद प्रत्यक्ष ऐकतो आहोत असे वाटते. ‘माहेरवास’, ‘मुंबई विद्यापीठ आणि माझी पीएच. डी. ’, ‘माझ्या नोकर्या वगैरे आणि अर्थार्जन’, माझी घरघर’, ‘माझे मित्रमैत्रिणी’ अशी काही प्रकरणे एखाद्या कादंबरीसारखी झाली आहेत. ती स्वत:च वाचून समजून घ्यायला हवीत.
कधी वाटतं, हे लेखन एकतर्फी तर नाही? पण लगेच जाणवतं, ज्याचं जाळतं, त्यालाच कळतं. अर्थात, काही चांगली माणसेही तिला भेटली. त्यांच्याबद्दल तिने कृतज्ञतेने लिहिले आहे. तिच्यावरील एका परीक्षणाला माया देशपांडे शीर्षक देतात, ‘उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा’.
‘माझं लग्न : माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी‘ हे या पुस्तकातील शेवटचे प्रकरण. ती लिहिते, की जीवनाचा जोडीदार शोधण्याचे काम तिलाच करावे लागले. वयाच्या 21व्या वर्षापासून तिने जाहिराती, वेगवेगळी वधू-वर सूचक मंडळे यांच्याशी संपर्क साधला. याही बाबतीतला तिचा संघर्ष दीर्घकालीन आहे. अनेक ठिकाणी तिला नकार आला, तर काही स्थळे तिने नाकारली. तिचं ’अमराठी’ असणं, तिची पत्रिका ‘चांगली’ नसणं, चष्मा, बेताचं रूप, कमी उंची, थोडासा लठ्ठपणा इ. तिला नकार मिळण्याची कारणे होती. तिच्या नकारामागे, लग्न न करता नुसतीच मैत्रीची अपेक्षा, चुकीची माहिती, फसवणूक, आधीच सेक्सची अपेक्षा इ. कारणे होती. पुढे जाहिरातीद्वारेच दीपक गायकवाड यांच्याशी भेट झाली. तीन-चार भेटी-गाठींनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती 53 वर्षांची होती, तर दीपक 58 वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी तेजस्विनी ही लग्न झालेली मुलगीही होती. ते BPCLमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी होते. पहिल्या पत्नीशी वैचारिक मतभेदांतून घटस्फोट झाला होता. उषाचे व त्यांचे लग्न रजिस्टर पद्धतीने 28 मे 2015ला झाले. आता उषा सुखात नांदते आहे. बर्याच वर्षांनी जीवनात, कदाचित प्रथमच, मानसिक स्थैर्य ती अनुभवते आहे. उषाच्या जीवनसंघर्षाची ही साठा उत्तरीची काहाणी, सुखी सहजीवनाच्या पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली आहे.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “शून्य” – लेखक – श्री एम – अनुवाद : श्री अमेय नातू ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : शून्य
लेखक : श्री एम
अनुवाद : अमेय नातू
पृष्ठ:१९२
मूल्य:२९९₹
केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला ‘शून्य’ म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण?
एक वेडसर मनुष्य? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लुच्चा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष?
सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या पाठीमागच्या अंगणातील छोट्या झोपडीमध्ये राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मन मोहून टाकणारी संगीतनिर्मिती करते.
सदाशिवन जो त्या ताडी विक्री केंद्राचा मालक आहे, दुकान बंद करून रात्री उशिरा गावाकडे घरी जातो. त्याचा रस्ता हा स्मशानाजवळून जाणारा! भुताकेताला न मानणारा सदाशिवन रोज रात्री गाडीवरून जाताना स्मशान आले की तिकडे न पाहता शक्य तितक्या जोरात तेथून निघून जातो… आजही तो असाच करत स्मशानात असताना पांढरे कपडे अंगावर असलेली एक आकृती त्याच्याजवळ येते… तो घाबरून गाडीवरून पडतो. ती आकृती त्याच्या आणखी जवळ येते.. त्याला नावाने हाक मारून फार लागलं नाही असं सांगून पुन्हा भेटू म्हणून निघून जाते. जाताना मी भूत नाही हे सांगायला तो विसरत नाही… ही कादंबरीची सुरुवात आहे.
कादंबरीत अनेक रहस्य आहेत. चित्त थरारक प्रसंग आहेत. बोलणारा कुत्रा असेच एक गूढ आहे. जो कुत्रा दिवसभर भटकत असतो. .कोठे ते कोणालाच माहित नाही. पण रात्री त्या झोपडी समोर येऊन झोपतो .रोज ताडी पिणारा पक्का बेवडा कुत्रा बोलतो हे जेंव्हा सदाशिवला समजते तेंव्हा त्याची मनस्थिती कशी झाली असेल?
हा वेडसर सामी स्वतःचा प्रभाव निर्माण करत आहे, आपल्याला त्याचा त्रास होत आहे हे तेथील ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्याला वाटतं आणि तो ज्या झोपडीत हा साधू झोपलेला असतो ती झोपडीत जाळून टाकतो…. पण सामी त्या रात्री झाडावर बसलेला असतो जेथे ते झोपडी जाळण्याचा प्लॅन करतात…. त्यांना तो माफ केल्याचं ही सांगतो….
अमेरिका रिटर्न कुमार ची ही कथा यात आहे… तेथे येणारे स्वतःला शोधायला येतात. हा वेडसर सामी त्यांना कधी मारून तर कधी बोलून उपदेश करतो… अवलिया!
कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला तशाच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून ‘शून्य’ एकाएकी नाहीसा होतो.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला ‘शून्या’ च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे.
या कादंबरीत काही भयंकर वास्तव मांडण्यात लेखक कचरत नाहीत. ख्रिश्चन धर्मगुरू धर्मांतरासाठी कसा पैशांचा सर्रास वापर करतात त्याचा तपशील समजतो.पैसे देऊन रुग्ण होऊन प्रार्थना सभेत जायचे आणि रोगमुक्त होण्याचं नाटक करायचे यासाठी दलाला मार्फत पैसे मिळवायचे…आणि अशा अनेक गोष्टी कादंबरीत वाचायला मिळतात.
कादंबरीची अध्यात्मिक धाटणी असली तरीही मानवी जीवनाच्या अनेक वास्तविक गोष्टी लेखकाने धीटपणे मांडले आहेत.लहान लहान प्रकरणे आणि सोपी आणि प्रवाही भाषा यामुळं ही कादंबरी सहज वाचली जाते.गूढ आणि रहस्यमय असल्याने वाचक खिळून राहतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पैशाचे मानसशास्त्र” – लेखक – बॉब प्रॉक्टर – अनुवाद : श्री प्रसाद ढापरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : पैशाचे मानसशास्त्र
लेखक : बॉब प्रॉक्टर
अनुवाद : प्रसाद ढापरे
प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ: २२७
मूल्य : २६०₹
जे लोक नफा आणि तोटा याच्या पलीकडे जाऊन स्वतःमधील प्रेरणा आणि कल ओळखून त्याप्रमाणे जीवन जगतात, ते स्वतः यशस्वी होतातच आणि इतरांनाही प्रेरणा देतात यावर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आहे.
या पुस्तकात,
* जगभरातील अतिश्रीमंत आणि यशस्वी लोकांना समजलेली रहस्ये
* जीवनामध्ये समृद्धी आणण्याच्या, टिकवण्याच्या सोप्या आणि प्रभावी संकल्पना
* पैशाबद्दल चुकीच्या धारणा
* पैसा आकर्षित करण्याचे प्राचीन ज्ञान
* तुमच्या मानसिकतेचा समृद्धीवर होणारा परिणाम
* सकारात्मक विचारसरणीच्या साहाय्याने समृद्धीच्या मार्गावर वाटचाल कशी करावी
‘
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अविनाशी बीज” – लेखक – डॉ. भास्कर कांबळे – अनुवाद : डॉ. श्रीराम चौथाईवाले / श्री आनंद विधाते ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : अविनाशी बीज
… भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास
मूळ इंग्रजी पुस्तक : The Imperishable Seed
लेखक : डॉ. भास्कर कांबळे
अनुवादक : डॉ. श्रीराम चौथाईवाले : श्री आनंद विधाते
पृष्ठ:२७८
मूल्य: ६००₹
प्राचीन काळापासून भारत हा उच्च मानवी मूल्यांचा देश आणि मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानपरंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ ही केवळ मानव जातीचाच विचार करीत नाही, तर ती चराचर सृष्टीचा, इतर प्राणीमात्र, सजीव, निर्जीवांचाही विचार करणारी आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार, व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचा विचार करणारी ही ज्ञानपरंपरा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडणारी सर्वांत प्राचीनतम ज्ञान परंपरा आहे. कोणत्याही परकीय संस्कृतीला हीन न लेखता, कोणत्याही संस्कृतीवर, प्रदेशावर आक्रमण न करता, कुणाच्याही श्रद्धेवर घाला न घालता, आस्तिक आणि नास्तिकाचाही (चार्वाक) विचार तितक्याच आदराने करणारी संस्कृती म्हणून, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहावे लागेल. ज्ञान-विज्ञान-आरोग्यशास्त्र, ललितकला, शिल्पकला, व्यवस्थापनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, साहित्य अशा कितीतरी क्षेत्रांत स्वामित्वाच्या पलीकडे विचार करीत, विश्वकल्याणासाठी भारताने संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाची निर्मिती केली आहे.
या समृद्ध ज्ञान परंपरेतून प्रसवलेल्या प्रत्येक विषयाचा संशोधनात्मक अभ्यास होणे अतिशय महत्वाचे असून ते एक जगव्याल कामही आहे. प्रस्तुत पुस्तकात ‘गणित’ हा विषय केंद्रीभूत ठेवत त्याच्या विविध शाखांतून झालेली ज्ञान निर्मिती तसेच सिद्धता पद्धती, त्यांचा दैनंदिन जीवनात वापर अश्या अनेक अंगांचा तपशीलवार अभ्यास भारतीय ग्रंथ तसेच पाश्चात्य दस्तावेजीकृत संदर्भांसह विस्तृतपणे मांडला आहे. यातही प्रामुख्याने कॅल्क्युलस, खगोलशास्त्र या सारख्या आधुनिक ज्ञान शाखांची रुजुवात कशी झाली आणि तिचा भारतातून अरबदेश, युरोप असा झालेला विश्वसंचार कसा झाला याचा रंजक आणि सप्रमाण इतिहासही भूतकाळाचे अवास्तव स्तोम न माजवता ससंदर्भ मांडण्यात आला आहे.
इतका विश्वसंचार आणि वापर असूनही भारतीय गणित मुख्य प्रवाहातील इतिहासात मोठ्या प्रमाणात अनुल्लेखनीय राहिले आहे.
भारतीय गणिताविषयी हे सार्वत्रिक अज्ञान का असावे?
तत्कालीन समृद्ध असलेली ही ज्ञानपरंपरा अचानक खंडित कशी झाली?
अश्या अनेक प्रश्नाची धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अंगाने ससंदर्भ उत्तरे शोधताना हरवत गेलेल्या आत्मप्रेरणेचाही उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
हे ज्ञान कसे निर्माण झाले आणि उर्वरित जगात कसे प्रसारित झाले हे दाखवण्यासाठी भास्कर कांबळे यांनी ‘द इम्पेरिशेबल सीड’ मध्ये ठोस पुरावे गोळा केले आहेत.
गणिताचे विद्यार्थी हे ‘पास्कलचा त्रिकोण’, ‘फिबोनाची अनुक्रम’, ‘रोलचा प्रमेय’ आणि ‘टेलर मालिका’ शिकत असतात. परंतु त्यांना हे समजत नाही की या संकल्पना त्यांच्या युरोपमधील तथाकथित शोधांपेक्षा खूप आधी पिंगल, हेमचंद्र, भास्कर आणि माधव यांसारख्या भारतीय गणितज्ञांनी स्पष्ट केल्या होत्या. आजच्या गणिताची अनेक क्षेत्रे-संख्यांचे दशांश प्रतिनिधित्व आणि साध्या अंकगणितापासून ते बीजगणित, त्रिकोणमिती आणि अगदी गणितापर्यंत-हिंदू गणितज्ञांनी विकसित केली होती किंवा त्यांची उत्पत्ती त्यांच्या कार्यामुळे झाली होती. केवळ गणितातच नव्हे तर खगोलशास्त्र आणि भाषाशास्त्र यासारख्या क्षेत्रांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या योगदानाची आणि हे योगदान आजही संगणक विज्ञानासारख्या क्षेत्रात कसे लागू होते यावर त्यांनी चर्चा केली आहे.
अखेरीस, भारतातील हिंदू गणिताची परंपरा का आणि कशी संपुष्टात आली आणि आज बहुतेक लोकांना तिच्या इतिहासाबद्दल का माहिती नाही याचा शोध ते घेतात.
‘गणित’ हा एक विषय समोर ठेवत त्याची उत्पत्ती, विस्तार आणि वापर, विश्वसंचार आणि खंड पडलेली संशोधन परंपरा असे दस्तावेजीकृत ससंदर्भ माहिती एकत्र संकलित स्वरुपात प्रथमच या पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जात आहे.
गेल्या काही वर्षात जगाला भारत जाणून घेण्याची एक विशेष उत्सुकता आहे असे दिसून येत आहे. पण जगाला भारत समजून घ्यायचा असेल तर आधी तो भारतीयांना समजावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि तोही स्व-बुद्धीने जाणून घ्यायला हवा. या दृष्टीने पुस्तकाची आखणी केली असून सर्वसामान्यांसाठीही सुबोध स्वरूपात आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमासही हे पुस्तक पूरक-संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.
भारतीय ज्ञान-परंपरेतून प्रसवलेल्या अनेक जीवनोपयोगी विषयांपैकी गणित, त्याच्या विविध उपशाखा भारताच्या कानाकोपऱ्यातून विकसित होत गेल्या आणि वापरात आल्या.
– – अंकगणितातील दशमान पद्धत, शून्य आणि ऋण संख्यांचा शोध आणि वापर
– – बीजगणित आणि भूमितीतील अनेक संकल्पना आणि सूत्रे
– – संयोजन शास्त्रातील शोध आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर
– – साहित्य निर्मिती आणि प्रसारास लागणारी भाषाविज्ञान आणि छंदशास्त्रातील नियमावली
– – खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना, प्रयोगातील उपकरणे, ग्रह-गती-विज्ञान आणि यातून हजारो वर्षे वापरात असलेली अचूक कालगणना
– – प्राचीन गणिताचे स्वरूप अधिकच विस्तारत आधुनिक गणिताचा गाभा असलेल्या कॅल्क्युलस संकल्पनांची गुरुवायूर मंदिराशी निगडित असलेल्या माधव आणि त्यांच्या शिष्य परंपरेतून झालेली रुजुवात आणि विकास
– – अनेक गणितीय शोधांचे आधुनिक गणिताशी तुलना
– – प्राचीन भारतीय विज्ञानातील शोध-सिद्धता पद्दती
– – प्रसिद्ध गणितज्ञ् आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कर – I, II आणि माधव यांचे संशोधन
– – ख्यातनाम पाश्चात्य गणिती इतिहासकारांच्या नजरेतून भारतीय आणि समकालीन पाश्चात्य गणिताचे गुण – दोष विवेचन
… असे अनेक विषय ससंदर्भ तसेच एकत्र संकलित स्वरुपात मांडणी असलेला सर्वसामान्यांसाठीही सुबोध वाटावा असा ग्रंथ !
– – – –
प्रतिक्रिया – – –
“डॉ. भास्कर कांबळे यांनी प्राचीन भारतीय गणिताची केवळ तथ्यपूर्ण माहिती एकत्र केली आहे असे नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतून ते नैसर्गिकरित्या कसे प्रसवले, याचेही विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. असे परस्पर-संबंध समजून घेतल्याने आपल्याला भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा ठरविण्यास नक्कीच मदत होईल. ”