मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘! प्रेमाची परिभाषा !’ – अँड्रो लिंकलेटर ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘! प्रेमाची परिभाषा !’ – अँड्रो लिंकलेटर ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

!! प्रेमाची परिभाषा !!

मूळ लेखक— अँड्रो लिंकलेटर 

अनुवाद— मेघना जोशी 

मेहता पब्लिशिंग हाऊस 

प्रेमाची परिभाषा…प्रेम , विरह, वेड आणि युद्ध यांची एक अतिशय हृदयस्पर्शी कहाणी..” द कोड ऑफ लव्ह ” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेघना जोशी यांनी सहज सोप्या हळूवार शब्दांमध्ये आणला आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अँड्रो लिंकलेटर यांनी ही सत्यकथा अतिशय कौशल्याने आणि संवेदनशीलतेने लिहिली आहे. असे हे पुस्तक माझ्या वाचनात आले..

1939 सालचा वसंत ऋतू…सुंदर तरुणी पामेला किराज व देखणा पायलट डोनाल्ड हिल याला भेटते व पाहताच क्षणी कलिजा खलास झाला या उक्तीनुसार ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण दुस-या महायुद्धामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडतो. आनंद, दुःख, नैराश्य, चैतन्य अश्या अनेक रूपांमधून तिने प्रेमाचा अनुभव घेतला. पण हे प्रेम मात्रं तिला सहजासहजी मिळाले नाही. पण तिच्या या प्रेमावरच्या एकनिष्ठेनेच त्या एकमेव बंधनाला एक खोली आणि उत्कटता प्राप्त करून दिली. महायुद्धाने त्यांना परस्परांपासून वेगळे केले. त्यांचे युद्धा नंतर परत येणे हेच एवढे वेगळे होते की नंतरच्या पिढीमध्ये अश्या प्रकारचा वेगळेपणा सापडणे केवळ अशक्यच होते. हे स्पष्ट पुस्तक वाचताना जाणवते. 

डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते आणि तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो. डायरी मधील सुरुवातीच्या शब्दांमध्येच त्याने स्पष्ट लिहिले आहे की त्याला त्या क्षणांपासून सर्व घटनांची नोंद का ठेवावीशी वाटली?  पण त्याने त्यातला मजकूर मात्रं सांकेतिक भाषेत लिहिला आणि ती भाषा मात्र रहस्यमय आकड्यांची असते. डायरी मधील पहिल्याच ओळीमधून डायरी लिहिणा-याची दूरदृष्टी दिसून येते. डोनाल्डचा दृष्टीकोन मात्रं वेगळा होता. त्याच्या बाबतीत जे काही घडेल त्याच्या तो नोंदी ठेवायचा. त्याच्या स्वभावाची आणखी एक खासियत होती ती म्हणजे काही घटना गोष्टी लपवण्याकरता सांकेतिक भाषेची मदत घेतली होती. सुरूवातीला त्याने गुपिते लिहिण्याकरता शाॅर्टहँडचा वापर केला  पण काहीच महिन्यानंतर त्याला आपला मजकूर वाचली जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्याने त्यावर सांकेतिक शब्दांचे वेष्टण चढवले व मजकूरा भोवती एक गूढ वलयं निर्माण केलं त्यामुळे तो खूपच गुंतागुंतीचा बनला. फक्त त्याला एकट्यालाच तो वाचणे शक्य होते. पण त्याचे शेवटचे शब्द हे तिच्या नावाभोवतीच गुंफले होते…तर ती होती फक्त आणि फक्तच पामेला..!! ती डायरी म्हणजे त्याचे गुपित..

हाँगकाँगचे युद्ध अश्या प्रकारे सुरू झाले होते की ते फार काळापर्यंत टिकणारेही नव्हते. त्याचे दूरगामी परिणाम डोनाल्डच्या उभ्या आयुष्यावर कायमचे झाले. त्याला प्रत्यक्ष युद्धानंतर युद्ध कैद्यांच्या छावणी मध्ये नेण्यात आले. आणि हा माणूस सर्वच बाबतीत कायमचा आणि पूर्णपणेबदलून गेला. युद्धा पूर्वीचा आणि युद्धा नंतरचा डोनाल्ड यामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता तो म्हणजे त्याची ती डायरी आणि त्याचे पामेलावरचे प्रेम….या दोन गोष्टी मरेपर्यंत त्याच्या जवळ होत्या..

डोनाल्ड युद्धाहून परत येतो पण युद्ध कैदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर व आयुष्यावरही होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात…पामेलाला मनापासून वाटते की डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील रहस्ये समजून घेतली पाहिजे. हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील?  त्याची सांकेतिक भाषा तिला जाणून घेता येईल?..

आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची एका शोधाची ही सत्यकथा…त्याच्या या डायरीचे रहस्य त्याच्या मृत्युनंतरही काही वर्षे तसेच होते…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “जीवन प्रवास” – (आत्मवृत्त) – सौ. वर्षा महिंद भाबळ ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जीवन प्रवास” – (आत्मवृत्त) – सौ. वर्षा महिंद भाबळ ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव: जीवन प्रवास (आत्मवृत्त)

लेखिका: सौ. वर्षा महेंद्र भाबळ.

प्रकाशक: सौ. अलका देवेंद्र भुजबळ.(न्यूज स्टोरी टुडे)

प्रथम आवृत्ती: डिसेंबर २०२२

पृष्ठे:१३६

किंमत:२००/—

“आयुष्य फार सुंदर आहे.  आयुष्य जगताना प्रत्येकाने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला, तर सर्व मानव जातीला ही दुनिया सुखमय भासेल.”

” सुख आणि दुःख ही जीवन पुस्तकाची दोन पाने आहेत. दुःख सहन करता आलं पाहिजे आणि सुख निर्माण करता आलं पाहिजे.  पण या दोन्ही भावनांची आपण अनुभूती घेतली पाहिजे.”

” कितीही वाटलं तरी, मानवाच्या भावनांचे नाजूक असे स्वाभिमानाचे आवरण कुठे ना कुठे विरतेच.  मग ते स्वाभिमानाचे आवरण कसं जपायचं, कसं वापरायचं नि कसं टिकवायचं हे आपणच ठरवायचं असतं .”

— अशी आणि अशाच प्रकारची सुंदर, जीवनाचे धडे देणारी भाष्ये,  सौ वर्षा महेंद्र भाबळ यांच्या 

‘ जीवन प्रवास ‘ या आत्मकथनपर पुस्तकात वाचायला मिळतात.

वर्षा ताईंचे जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात प्रथम विचार आला तो असा की ,आजपर्यंत आत्मवृत्तपर पुस्तके ही  सर्वसाधारणपणे प्रसिद्धी मिळवलेले, विशेषतः कलाकार, नावाजलेले लेखक, राजकीय नेते, चित्रपट क्षेत्राशी संबंधित, किंवा उद्योजक थोडक्यात जे सेलिब्रिटी असतात त्यांचीच वाचली जातात. पण जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर या विचारांना फाटा फुटतो. हा गैरसमज दूर होतो.

 लाखो— करोडो स्त्री पुरुषांसारखं वर्तुळातलं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीलाही जर प्रातिनिधिक स्वरूपात 

‘जगणं ‘ या संज्ञेचा विशिष्ट अर्थ सापडला असेल, तर त्याने का लिहू नये? वर्षाताईंनी चाकोरीतल आयुष्य जगत असताना,  जे टिपलं, जे अनुभवलं, आणि त्यातूनच जगण्याच्या अर्थाचा जो प्रामाणिक, अत्यंत बोलका, डोळस शोध घेतला आहे.. त्याचंच प्रतिपादन त्यांनी त्यांच्या आत्मकथनात इतकं सुंदरपणे केलं आहे की, वाचणारा त्यांच्या जीवनाशी त्या संदर्भांशी अगदी सहजपणे  बांधला जातो.  

माणूस कुठल्या कुटुंबात, कुठल्या जातीत, समाजात, गावात , जन्माला आलाय हे महत्त्वाचं नसतंच.  तो कसा जगला आणि त्याने आपल्या जगण्यातून इतरांना काय दिले हेच महत्त्वाचे.  सामान्य— असामान्य, प्रसिद्ध— अप्रसिद्ध, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब— श्रीमंत हे सर्व शब्द संदीग्ध  आहेत. प्रत्येकाच्या निरनिराळ्या दृष्टिकोनातून या प्रस्थापित शब्दांचे रूढार्थच बदलू शकतात, याची जाणीव जीवन प्रवास हे पुस्तक वाचताना पावलोपावली होते. 

प्रथम तुमच्यामध्ये जीवनाविषयीची प्रचंड ओढ असायला हवी. तुमच्या ठायी सुप्तपणे असलेल्या अनेक गुणांची तुम्हाला योग्य वेळी ओळख झाली पाहिजे.  आणि सुसह्य जीवनासाठी या गुणांचा कसा वापर करता येईल हेही उमजले पाहिजे.  आणि हे ज्याला जमतं तो वाळवंटातही हिरवळ निर्माण करू शकतो.  रुक्ष पाषाणातूनही एखादा शितल पाण्याचा झरा जन्माला येऊ शकतो, याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.

.. नव्हे ! तशी मनाची खात्रीच पटते.

वर्षाताईंच्या सामान्य जगण्यातलं असामान्यत्व असं सुरेख दवबिंदू सारखं मनावर घरंगळतं.

जवळजवळ २५  लहान लहान भागातून वर्षाताईंनी त्यांच्या जीवनसफरीतून वेचलेले मोती वाचकाच्या ओंजळीत घातले आहेत.  त्यांचे बालपण, त्यांचे गाव, आई-वडील, भावंडे ,गणगोत,शिक्षण, प्रेमविवाह, वैवाहिक जीवनातले अटीतटीचे प्रसंग, नोकरी, मुलांचे संगोपन नातेसंबंध, समाजाने दिलेली भलीबुरी वागणूक, जोडीदारासोबत चालवलेले अभ्यास वर्ग, विद्यार्थ्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाती, स्वतःचे छंद, भेटलेले गुरु,  आदर्शवत व्यक्ती, या सर्वांविषयी वर्षाताईंनी यात भरभरून आणि मनापासून लिहिले आहे. आणि ते वाचत असताना एका अत्यंत संवेदनशील, कोमल, मृदू तरीही कणखर जबरदस्त टक्कर देणारी, सर्वांना सांभाळून सोबत घेऊन जगणारी आणि केवळ स्वतःपुरतेच न बघता सतत एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून  विश्वासाने,चौकस बुद्धीने, कृतज्ञतेने, दिमाखाने जगणाऱ्या व्यक्तीचेच दर्शन होत राहते.  यात कुठलाही अतिरेक नाही. पोकळ शब्दांचा… केवळ ग्लोरी फाय करण्याचा कुठलाही हेतू नाही. हे सारं मनापासून वाटलं म्हणूनच लिहिलं.

आवारातल्या नारळाच्या झाडाची आठवण देतानाही वर्षाताई  एकीकडे सहज म्हणतात,

” देवांना अर्पण केले जाणारे फळ म्हणजे श्रीफळ! कल्पतरूला आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. माडाचा प्रत्येक अवयव उपयोगात येणारा आहे. अर्थात्  गुणसंपन्न!  त्या तरूचे गुण आमच्यात रुजावेत, अशी मनी सुप्त इच्छा ठेवून या वृक्षासोबत आमच्या नव्या पर्वाला आम्ही सुरुवात केली.!”

— वा वर्षाताई!! तुमच्या या सोन्यासारख्या विचार प्रवाहाला माझा मानाचा मुजरा! 

अध्यात्म तत्त्वज्ञान हे वाचून रुजत नाही, तर त्याची बीजं अंतरंगातच असावी लागतात हे तुम्ही सिद्ध केलंत.

एखाद्या नोकरीच्या ठिकाणीही कामाव्यतिरिक्त पारिवारिक, सांस्कृतिक, नात्यानात्यातला आगळावेगळा जिव्हाळा…ईर्षा, प्रसिद्धी, चढाओढ, द्वेष मत्सर यांच्या पलीकडे जाऊन कसा निर्माण होऊ शकतो आणि कामातला आनंद कसा गुणित करू शकतो याचा सुंदर वस्तूपाठच,  वर्षाताईंच्या अडतीस वर्षाचे  एमटीएनएल मधले नोकरी विषयक किस्से वाचताना मिळतो. 

सर्वांग सुंदर असेच हे पुस्तक आहे.  वाचकाला खूप काही देणारं आहे !  संदेशात्मक, सकारात्मक आणि कुठलाही अभिनिवेश, अहंकार नसणारं  हे नम्र लेखन आहे. 

हे पुस्तक वाचताना मला असे वाटले की सर्वसाधारणपणे आपण एखादा पडलेला दगड पाहतो, एखादा चुरगळलेला कागद दिसतो, एखादं साचलेलं पाणी पाहतो… पण आपल्या मनात येतं का या दगडातून एकेदिवशी  सुंदर शिल्प निर्माण होऊ शकतं,  हा चुरगळलेला कागद थोडा उलगडला तर आपण एखादा सुविचार त्यावर लिहू शकतो, या साचलेल्या पाण्यावरही कमळ फुलवू शकतो.?   नसण्यातून असण्याला जन्म देणं हीच महानता ! आणि या महानतेचं दर्शन सौ.वर्षा भाबळ यांच्या “जीवन प्रवास” या पुस्तकातून अगदी सहजपणे होतं. 

सुंदर भाषा, सुंदर विचार आणि सुंदर मन यांचं सुरेख मिश्रण म्हणजे जीवन प्रवास हे पुस्तक !

सौ अलका भुजबळ यांनी हे पुस्तक देखण्या स्वरुपात प्रकाशित करून फार मोलाची कामगिरी केली आहे रसिक वाचकांसाठी !  त्याबद्दल मी समस्त मराठी भाषा प्रेमिकांतर्फे आणि वाचकांतर्फे आपले आभार मानते ! मा. देवेंद्रजी भुजबळ यांनी सुरेख प्रस्तावना लिहून पुस्तकाचा  यथोचित गौरव केला आहे.

वर्षाताई ! प्रथम आपणास मानाचा मुजरा करते. आणि नंतर अभिनंदन आणि आपल्या उर्वरित जीवनप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! धन्यवाद !

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ भगव्या वाटा… सुश्री अरुणा ढेरे ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ भगव्या वाटा… सुश्री अरुणा ढेरे ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तकाचे नाव : “भगव्या वाटा “

लेखिका :  अरुणा ढेरे 

प्रकाशक : सुरेश एजन्सी 

 

स्त्री म्हणजे पाश

स्त्री म्हणजे भावनिक गुंतागुंत 

स्त्री म्हणजे आसक्ती 

हे समीकरण मानणाऱ्या प्रत्येकाला 

‘स्त्री म्हणजे विरक्ती’

हे गणित पटकन सुटेल असं वाटत नाही.

कारण खरंच स्त्रीला संसाराच्या पाशात इतकं गुरफटवून ठेवलं आहे आपण की, ती ‘मुक्तीसाठी अधिकारी असू शकते’, संसाराच्या पाशातून मुक्त होणं हे तिचं ‘स्वप्न’ असू शकतं असा आपण विचारदेखील करत नाही. 

वास्तविक पाहता स्त्री इतकं सहज डिटॅचेबल होणं पुरुषाला जमणं जरा अवघडच. 

अख्खं बालपण म्हणजे वयाची पंधरा-वीस वर्षें वडिलांच्या घराला आपलं घर मानून काढल्यानंतर परत पतीच्या घरात जाऊन तिथे आपलं स्थान निर्माण करणं, नऊ महिने पोटात जपलेल्या जीवाला जन्माला घातल्यानंतर देखील क्षणार्धात त्याची नाळ आपल्यापासून तोडून त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वतःला रुजवणं तिथून बाहेर पडणं आणि परत दुसऱ्या ठिकाणी रुजवणं, फुलणं यामध्ये तिच्या सगळ्या स्त्रीत्वाचा, व्यक्तित्वाचा कस पणाला लागतो. पण या प्रत्येक वेळी ती अत्यंत सहजतेने या सर्व प्रसंगांना सामोरी जाते. आणि संसारातला सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडते.

अशी स्त्री आसक्ती, पाश, मोह यात खरंच गुंतून राहू शकते? खरंच फक्त हेच तिचं अस्तित्व असू शकतं?

किती मर्यादित करून ठेवलं आहे आपण ‘स्त्रीत्वा’ला… 

पण ज्या वेळेला अरुणा ढेरे यांचं ‘भगव्या वाटा’सारखं पुस्तक हाती येतं तेव्हा स्त्रीत्व म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय? हे जास्त चांगलं समजतं. स्त्रीत्वाचा आत्तापर्यंत अप्रकाशित राहिलेला विरक्तीचा पैलू मोठ्या ताकदीने आपल्यासमोर येतो आणि अक्षरशः अचंबित करतो. 

भारतीय इतिहासाला संत परंपरेचं प्रदीर्घकाळाचं वरदान लाभलेलं आहे. या संत परंपरेत पुरुषांइतकंच अनेक स्त्रियांचं देखील योगदान आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे? काही ठराविक संत स्त्रिया सोडल्या तर बाकी अन्य संत स्त्रिया, वैराग्य पत्करणाऱ्या स्त्रिया यांबाबत आपण तसे अनभिज्ञच आहोत. याचं  कारण म्हणजे आपल्याला या स्त्रियांची माहिती सहजासहजी सापडत नाही. स्त्रियांच्या या पैलूबाबत विचार करावा, शोध घ्यावा, चर्चा करावी असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. पण याचा अर्थ तशा स्त्रिया झाल्याच नाहीत, असा होत नाही. इतिहासामध्ये अशा स्त्रियांची नोंद मोठ्या प्रमाणात लक्षात येण्याजोग्या रीतीने केलेली नसली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना केलेली आहे. 

गौतम बुद्धांच्या काळात अशा कितीतरी स्त्रिया बौद्ध भिक्षुणी झालेल्या आहेत. त्यात अगदी सामान्य स्त्रियांपासून ते राजघराण्यातील स्त्रियांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर केवळ उतारवयातल्याच नव्हे तर तरुण वयातल्या स्त्रियादेखील बुद्धाच्या सांगण्याने प्रभावित होऊन मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी आनंदाने भिक्षुणी झालेल्या आढळतात. 

अशा स्त्रियांच्या कथा थेरी गाथा,  या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. थेरी गाथा म्हणजे स्थविरींच्या गाथा. स्थविरी म्हणजे बौद्ध भिक्षुणी. एकूण ३७ जणींच्या गाथा यात आपल्याला वाचायला मिळतात. या गाथांमध्ये त्या त्या बौद्ध भिक्षुणींचा पूर्वेतिहास आणि त्यांचा बौद्ध भिक्षुणी होण्याचा प्रवास आणि त्या प्रवासाची पुढील वाटचाल अगदी थोडक्यात पण अतिशय उत्कंठावर्धक रीतीने दिलेली आहे.  

मुक्ती म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? त्यासाठी काय मर्यादा असतात? त्याची बलस्थानं काय असतात? हे देखील आपल्याला या गाथांमधून समजतं. एकेका भिक्षुणीची कथा वाचताना आपण रंगून जातो. विषय वैराग्य असला तरी वाचताना किंचितही कंटाळा येत नाही. एखाद्या आजीने आपल्या मांडीवरील नातवंडांना गोष्ट सांगावी अशा पद्धतीने अतिशय आपुलकीने, सहज-सोप्या शब्दांत या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. 

यातला मला भावलेल्या काही कथांचा उल्लेख : वासिष्ठी आणि सुजात, एका रूप गर्वितेची कथा, अक्कमहादेवी, प्रणयशरण शिवसुंदर, तिलकवती, भयचकित नमावे तुज रमणी, लल्लेश्वरी, धर्म रक्षति रक्षित:, विद्रोहाची शोकांन्तिका, भद्रा कुंडलकेशा, महादाईसा इ. आहेत. 

आज जागतिक महिला दिन साजरा करताना निरनिराळ्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या महिलांचे कौतुक केलं जातं, त्यांचे दाखले दिले जातात. त्याबरोबरच मुक्ती आणि वैराग्य यासारख्या विषयांमध्ये देखील स्त्रियांचं कर्तृत्व काही कमी नाही हे सांगणार हे पुस्तक सर्वांनीच आवर्जून एकदा तरी वाचायला हवं. त्यानिमित्ताने भारतीय परंपरेमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या मुक्ततेचा विचार कृतीत अमलात आणणाऱ्या स्त्रीशक्तीची दखल घेतली जाईल.

अभिमान आहे स्त्री शक्तीचा! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशझुला… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

अल्प परिचय 

पुणे महानगर पालिकेच्या शाळेत ३७ वर्षे प्राथमिक शिक्षिका व मुख्याध्यापक पदावरून २०२१ साली सेवा निवृत्त. सेवेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणल्या. विविध प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.

  • रेकी मास्टर असून मेडिटेशन व समुपदेशन करीत असते.
  • कलश मासिकात लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत.
  • विविध माध्यमातून समाजकार्य सुरू असते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ आकाशझुला… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

निखळ वाचनाचा आनंद घ्या…

विश्वकर्मा प्रकाशन, पुणे यांनी विश्वास देशपांडे यांचं ‘आकाशझुला’ हे पुस्तक  प्रकाशित केलंय . या पुस्तकात विश्वास देशपांडे यांनी विविध विषयावर हलक्याफुलक्या भाषेत केलेलं ललित लेखन असलेले एकूण ५३ विविध लेख वाचायला मिळतात. सगळे लेख मनाला आनंद देणारे असे विविध विषयांवरचे आहेत. लेखकाची भाषा ओघवती, साधी सोपी आहे. कुठेही भाषेचं किंवा शब्दांचं अवडंबर नाही. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो. प्रत्येक लेख अगदी दीड ते दोन पानांचा. साधारणपणे तीन मिनिटात वाचून होणारा. हे सरांचे दुसरे पुस्तक आहे. आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या पुस्तकातील कोणतेही पान काढून आपण वाचू शकतो.

सरांचे अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना विशेष जाणवते. जोडीला तरल निरीक्षणशक्ती आहे. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारी लेखनशैली आहे. निसर्ग हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळयाचा विषय आहे. त्यांच्या पुस्तकातील आकाश के उस पार भी … या पहिल्याच लेखातील ही काही वाक्ये पहा

‘हिवाळा संपण्याच्या उंबरठ्यावर आणि उन्हाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होता. असा हा काळ. छानपैकी वारा सुटला होता. वाऱ्याच्या झुळकीत हिवाळ्याचा सुखद गारवा होता. अंगाला मुलायम, रेशमी मोरपिसाचा स्पर्श व्हावा, तसा तो अंगाला स्पर्शून जात होता. काही न करता येथे असंच बसून राहावं आणि हे सुखद वारं अंगावर घ्यावं असं वाटत होतं .’ जीवनातील विविध प्रसंग, घटना त्यांच्या मनाला स्पर्शून जातात. आणि त्यातील चिंतनातून उमटत राहते, ती विविध प्रकारची तरल संवेदना.

या पुस्तकातील सगळे लेख वाचकाला सकारात्मक दृष्टिकोन देणारे आहेत. सरांना संगीताची सुद्धा विशेष आवड आहे आणि या पुस्तकातील काही लेख त्याची प्रचिती आपल्याला देतात. या गाण्यांच्याच आधारे जीवनातील सत्यावर मार्मिक भाष्य वाचायला मिळते. जीवन चलने का नाम यातून संकटावर मात करून दिव्यांग असून स्वयंदीप झालेल्या मुलीची प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे.

गाण्यातून संदेश देता देता लाख मोलाचा सूर्यप्रकाश,पाय जमिनीवर आहेत का? यातून आरोग्य कसे जपावे हा संदेश मिळतो.

निसर्ग नियमानुसार की निसर्गनियमा विरुद्ध यातून प्यारीबाई,प्रल्हाद जानी असे संत कित्येक वर्षे ईश्वर भक्तीत तल्लीन होऊन  अन्ना वाचून  जिवंत राहू शकतात ही अनोखी महती कळते.

मारुतीराया,रामराया यांचे भक्ती,श्रद्धा सांगणारे त्याच प्रमाणे संत रामदास,संत एकनाथ,गजानन महाराज,आद्य शंकरचार्य यांची संत वचने वाचू शकतो.

तर ज्ञानेश्वर  माऊलींची माऊली, राष्ट्रमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, किरण बेदी, मेरी  कोम, मलाला युसूफझाई  या महिलांची माहिती म्हणजे जणू स्त्री शक्तीला लेखकाने केलेले वंदन आहे !

या पुस्तकात जसा निसर्गावर प्रेम करणारा लेखक दिसतो, तसाच तो विविध विषयांवर सामाजिक बांधिलकीतून भाष्य करणारा एक जबाबदार नागरिक आपल्याला दिसतो. काही लेखातून पालक आणि शिक्षकांना आपल्या अनुभवाचे दोन शब्द सांगणारा अनुभवी शिक्षक दिसतो. या पुस्तकात काही व्यक्तीचित्रेही आहेत.

सखे सोबती हा लेख … झाडे बोलत नाही असे आपल्याला वाटते हे काही खरे नाही कारण जेव्हा तुम्ही झाडांशी बोलता तेव्हा ते देखील बोलतात वेगळ्या प्रकारे..

गांधी तीर्थ आणि अजिंठा लेणी ह्या लेखात व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छ्ता ह्याचे महत्त्व आपल्या समाजात आणि प्रशासनात देखील अजून रुजले नाही हेच खरं.. मॉल स्वच्छ पण रेल्वे स्टेशन अस्वच्छ,गजानन महाराज मंदिर आणि तिथली स्वच्छ्ता इतर अनेक मंदिरात का नसते ? सामाजिक भान आणि तळमळीने कार्य करण्याची इच्छा शक्ती हे बदल करू शकतील.असो…

आणि आकाश झुला या लेखाचे शब्दांकन अप्रतिम, नितांत सुंदर. सुख, दुःख, संकटे हे सर्व आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना अतिशय सकारात्मकेने सामोरी जाणाऱ्या सौ.सारिका ची वृत्ती नक्कीच प्रेरणा देणारी आहे.तसेच हार न मानता जिद्दीने आपले लक्ष्य साध्य करणे हे देखील कौतुकास्पद आहे. आपल्या पाशी असलेले संस्कार आणि सुसंस्कृतता हे देखील तिच्या जिद्दी आणि ध्येयनिष्ठ स्वभावाचे कारण आहे असे वाटते.

असे विविध विषयांना स्पर्श करणारे पुस्तक आपल्या संग्रही असावेच.तसेच स्नेही जनांना पुस्तकरूपी उत्तम भेट देऊ शकतो.

या पुस्तकांचे मला जाणवलेले एक वैशिष्ठ्य असे आहे पुस्तकांचे आभावलाय ( ऑरा ) खूप उत्तम आहे. त्यातून नेहेमी सकारात्मक लहरी बाहेर पडतात.ज्या वेळी लेखक अत्यंत उत्तम,आनंदी व सकारात्मकतेने लेख लिहितो त्याच लहरी वाचक अनुभवतात.

त्या मुळे लेख वाचताना सुद्धा आपण ट्रान्स मध्ये जातो.

सर्वांनी हा अनुभव घ्यायलाच हवा. असे मी आग्रहाने सांगेन.

या आणि त्यांच्या इतर पुस्तकातील लेखांचे सादरीकरण दर मंगळवारी व शुक्रवारी रेडिओ विश्वास वर या सुखांनो या या कार्यक्रमात स्वतः लेखक करतात.ते ऐकणे ही एक पर्वणी असते.

परिचय – विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नाती वांझ होताना… कवयित्री मनिषा पाटील ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ नाती वांझ होताना… कवयित्री मनिषा पाटील ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

कविता संग्रह –नाती वांझ होताना

कवयित्री—मनीषा पाटील- हरोलीकर

प्रकाशक–संस्कृती प्रकाशन. पुणे

पृष्ठ संख्या–९५

किंमत–१५० रू

‘अस्वस्थ नात्यांचा आरसाःनाती वांझ होताना’

“नाती वांझ होताना” हा मनीषा पाटील-हरोलीकर यांचा कविता संग्रह हाती आला.कविता संग्रहाच्या शीर्षकाने मनाला आधीच गोठवून टाकले.किती समर्पक नाव!!!खरं तर मानवी जीवन समृध्द करण्याचा महामार्ग म्हणजे नात्यांची गुंफण.नात्यातला ओलावा जगायला शिकवतो.पण आज मात्र याच नात्यांचा ओलावा आटत जाताना दिसत आहे. सर्वत्र नात्यांत वांझोटेपण येताना दिसत आहे.कोरडेपणाचे एक वादळ सर्वत्र घोंगावत आहे.म्हणूनच कवयित्री मनीषा या अस्वस्थ होत आहेत.ग्रामीण भागातील बाई आज ही मोकळेपणाने वागू शकत नाही.बोलू शकत नाही .तिची नेहमी घुसमट होते.हे सारे कवयित्रीने जवळून अनुभवले आहे.बदलत जाणारे ग्रामीण जीवन ही अस्वस्थ करणारे आहे.हे सगळे भाव कवयित्रीने कवितेतून व्यक्त केले आहेत.नाती वांझ होताना या कविता संग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे एक शब्द शिल्प आहे.शब्द लेणं आहे.पुन्हा पुन्हा कविता वाचली की नवा आशय सापडतो.नवा भाव सापडतो.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा एक एक भावपदर उलगडून दाखवते.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा आरसा आहे,असे मला वाटते.बाईचं सोसणं,घडणं, असणं,दिसणं, सारं या कवितेतून व्यक्त होतं.सगळ्याच कविता मनात विचाराचं वादळ उठवून जातात.आजच्या वर्तमानाला चेहरा नाही.कोणता मार्ग सापडत नाही तेव्हा कवयित्री म्हणते,

कोणतेच प्रहर नसलेले

हे कसले वर्तमान

जगतेय मी

बाईचं विश्व घर असते.घर तिचा श्वास असतो. आज घडीला तिच्या श्वासावर कुऱ्हाड घातली जात आहे. तिचं जगणंच हिरावून घेतलं जातं आहे. तेव्हा  ‘मी बंद केलेय ‘या कवितेत कणखरपणे  कवयित्री म्हणते,

माझ्या वाळवंटात वारा बनून ही येऊ नकोस मी बंद केलेय आता नात्यांचे वृक्षारोपण खोट्या सहानुभूती ची तिला आता गरज नाही.

किती संकटे आली, तरी बाई हिंमत सोडत नाही. तेवढी ती चिकट,चिवट असते.पण सहनशीलतेला ही मर्यादा असते.सहनशीलतेचा कडेलोट होतो तेव्हा बाई विहीर जवळ करते.त्या विहीरीची कणव कवयित्रीला येते.तिला विहीर शापित आई वाटते. गावातल्या किती लेकी -बाळींची  दुःखे तिने पाहिली. त्यांना पदरात घेता घेता या आईचा पदर शापित झाला.ही भावना ‘शापित आईपण ‘या कवितेत त्यांनी मांडली

ज्यांच्यासाठी भूमी

दुभंगलीच नाही

अशा किती सीतांना

घेतले असेल सामावून

या विहिरींनी

आणि थंडावली असेल

तडफड

त्यांच्या रोजच्या मरणाची

आज ही विधवा बाईला समाजात मान नाही.प्रत्येक वेळी शरीरानेच सती कशाला जायला पाहिजे?बाईच्या जगण्याचा अधिकारच नवऱ्या मागे काढून घेतला जातो. तिचे जगणे उध्वस्त होऊन जाते. ‘आज ही बाई सती जातेच की’ या कवितेत कवयित्री समाजाचा एक विद्रुप चेहरा समोर आणतात.

पांढऱ्या कपाळाच्या बाईला

कुठे असतो अधिकार

मनासारखे जगण्याचा

देहावर इंद्रधनू सजविण्याचा

आज गाव आपला चेहरा बदलत आहे.नात्यात निबरपणा वाढला आहे.कोणाचे सोयरसुतक कोणाला नाही. हा आशय ‘काय झालंय माझ्या गावाला?’ या कवितेत मांडला आहे.

कुणी पेटता ठेवलाय

ज्याच्या त्याच्या मनात

हा द्वेषाचा अंगार

एकाच बांधावरच्या बोरी- बाभळी

फाडत सुटल्यात

प्रत्येक फांदीचं पानन् पान

त्याच कवितेत कवयित्री म्हणते,

कोरड्या विहिरीसारखा

विद्रुप झालाय गावाचा चेहरा

मलाही, सांभाळावेत ऋतू, बायका टाळतात बायकांना,शोधायला हवे,बायका प्रत्येक कविता मनात ठसणारी, विचार मांडणारी आहे.

‘हवाय नवा जन्म’ मधून नवी आशा,स्वप्न,नवी उमेद व्यक्त केली आहे.तिला वनवास संपवून फुलपाखरू व्हायचंय.तिला आपल्या वाटणीचा सूर्यप्रकाश हवा आहे.ही आशा कवितेतून मांडली आहे.

कवितेतून कवयित्री संवाद साधते आपलं मन मोकळं करते.कवयित्रीचे अनुभव विश्व संपन्न आहे.निरीक्षण उत्तम आहे हे कवितेतून आलेल्या प्रतिमा आणि प्रतिभेतून कळते. मनिषाच्या कविता मला खूप आवडतात.ती माझी मैत्रीण आहे.तिचा कवितासंग्रह अतिशय देखणा झाला आहे.या पुढे ही तिच्या हातून उत्तम साहित्य सेवा घडावी.तिला अनेक शुभेच्छा.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆

कथासंग्रह: अवकाळी विळखा

लेखक: सचिन वसंत पाटील.

प्रकाशक: गवळी प्रकाशन, इस्लामपूर

पाने: २०४

किमंत: ३१० रुपये

श्री सचिन वसंत पाटील

शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा

विळखा म्हणजे मिठी ! या मिठीचे अनेक प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या कंबरेभोवती पडलेला अनेक संकटांचा विळखा म्हणजे जणू मगरमिठीच ! कितीही धडपड केली तरी सैल न होणारा अजगराचा विळखाच तो . हाडं खिळखिळी करुन त्यांचा भुगा केल्याशिवाय तृप्त न होणारा अक्राळविक्राळ…!! असाच प्रकर्षाने अनुभव येतो तो कथाकार सचिन वसंत पाटील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला “अवकाळी विळखा” हा कथासंग्रह वाचताना. शेती, माती आणि शेतकरी यांची जीवा – शिवाची नाळ जन्मताच जुळलेली असते. कुठल्या ना कुठल्या  विळख्यात ती आवळत जाते. बळीराजा या उपाधीने गौरवलेला बळीराजा नवीन अर्थव्यवस्थेत भरडला जातो, चिरडला जातो. आतल्या आत झुरत राहतो. त्यामुळे बळीराजा ही उपाधीच हास्यास्पद ठरली आहे कि काय, असे वाटू लागते.

या संग्रहातील सर्वच कथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या टांगत्या तलवारीची भिषण सत्य वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. या अवकाळी विळख्यात ‘घुसमट’ कथेत आपणास परिस्थितीचे चटके सोसत द्विधा अवस्थेत होरपळणारा विलास भेटतो. शेती मातीवर आईप्रमाणे श्रद्धा असणारा विलास शेत विकण्याच्या सल्ल्याने काळजात फाटत जातो. पैसेवाल्यांच्या त्याच्या दारिद्र्याच्या जखमांवर मिठ चोळणारे उग्र शब्द आणि व्यवहाराने अंतरबाह्य घुसमटून जातो. कथा वाचताना तो विलास म्हणजे आपण कधी होतो हे कळतच नाही.

शेतीत पीक पेरुन त्याचं उत्पन्न हातात येईपर्यंत कोणकोणत्या दिव्व्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. डोक्यावरील अनेक समस्यारुपी टांगत्या तलवारींचा प्राणपणाने सामना करावा लागतो. त्यातून तावून सुलाखून निघालं तर कुठे चार पैसे हातात पडतात, . मजुरांची टंचाई हाही अलिकडे भेडसावणारा प्रश्न, अर्थात विळखाच झाला आहे. निसर्गाचे तांडव आणि मजूर समस्या यात हवालदिल झालेला नामा ‘टांगती तलवार’ या कथेत बरंच काही सांगून जातो.

मातीत जन्मलेला आणि मातीतच विलीन होणारा एक सच्चा शेतकरी नारुकाका ‘सुर्यास्त’ या कथेत भेटतो.  एक सच्च्या भुमिपुत्र असलेल्या नारुकाकाच्या भयानक वास्तववादी जगण्याची ही शोकांतिका आहे. पिढीतील अंतर आणि काळानुसार होणाऱ्या बदलात, निसर्ग बदलात त्या त्या पिढीतील लोकांची होणारी घुसमट या कथेत वाचून मन हेलावते. शेती-मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या शेतकरी जीवनाचा अचूक वेध घेणारी ही कथा साहित्यिक मुल्ल्याच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाची आहे.

कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार  ही तर नेहमीचीच समस्या ! ‘उद्रेक’ या कथेत रासायनिक खताची ऐन मोक्याच्या वेळी कृत्रिम टंचाई होते. शासकीय भ्रष्टाचारावर वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात कसा संताप येतो आणि त्यातून होणारा त्यांचा उद्रेक  कसा व्यक्त होतो हे दाखविले आहे.

तसेच शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाचा फायदा दलाल उठवतात हे ‘तुपातली वांगी ‘ या कथेत दिसून येते. कर्ता धर्ता बळीराजा भिकेकंगाल राहतो हे सांगत असतानाच सचिन पाटील यांनी जर शेतकऱ्यांनी ही मधली दलालांची फळी मोडून काढली आणि आपला माल आपणच विकला तर शेतकरी व ग्राहक या दोघांनाही ते फायद्याचे ठरणार असल्याचा भविष्यकालिन दृष्टिकोण कथन केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तसा शेतकऱ्यांचा दृष्टिकोणही आज उदयास येताना दिसतो आहे.

या कथासंग्रहात ‘वाट’ कथेत ऊस शेतीची परिस्थिती आणि इतरांनी त्यात जाणून-बुजून नाडलेला हतबल पांडबा भेटतो. त्याची घरसंसाराचा मेळ घालण्यासाठी होणारी घुसमट पाहून मन द्रवते. ‘दिवसमान’ कथेत  राबराब राबून मुलांच्या जवानीत आपल्याला सुख मिळेल या आशेवर वाटचाल केलेला महादेवबापु भेटतो. उतारवयातही पोरांच्या अविचारी कर्तव्याने त्याची पोटासाठी चाललेली धडपड पाहून अंतःकरण व्यथीत होते. ‘कष्टाची भाकरी’ कथेत द्राक्ष बागेतील नुकसानीने वैफल्यग्रस्त होवून व्यसनात बुडालेल्या विनायकला जेंव्हा शिक्षणाची खोटी प्रतिष्ठा सोडून कोणतेही काम करुन कष्टाची भाकरी मिळवण्यातली गोडी लागते हे वाचून मनाला दिलासा मिळतो.

नानाची कुस्तीतली ‘लढत’ ही खरी कुस्तीतली लढत नसून संसाररुपी कुस्ती जिंकण्याचा त्याचा प्राणपणाने चाललेला लढा असल्याचे जाणवते. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याची प्रकर्षाने प्रचिती येते. तर ‘मैत्री’ कथेत अलिकडे फोफावलेल्या फसव्या स्किमा, त्यात होणारी फसगत, व्यसनाधिनता, नामदेवसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाची मित्राने केलेली फसवणूक पहायला मिळते. ‘बुजगावणं’ कथेमध्ये झटपट मिळणाऱ्या पैशासाठी शेत एम. आय. डी. सी. ला देणारा अधुनिक पोरगा आणि या धक्क्याने वेडा झालेला वृद्ध शामूतात्या आहे.

‘सांभाळ रे… ‘  कथेत पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला गेलेल्या विकाची विठ्ठलाभोवती पडलेल्या संधीसाधुंच्या गराड्यात होणारी घोर निराशा पहायला मिळते. पवित्र चंद्रभागेची केलेली गटारगंगा, श्रद्धा- अंधश्रद्धांच्यात अजूनही अडकलेला समाज वाचून मन उद्वीघ्न होते. याउलट ‘रान’ कथेत रानमातीच्या सुगंधासाठी असुसलेला सखाराम भेटला की मन आनंदते. शिर्षक कथेत अवकाळी विळख्यात बेचीराख झालेली शेती पाहिली की अंतःकरण करपल्याशिवाय राहत नाही. पण या अवकाळीला वृक्ष तोड हीच कारणीभूत असून आता झाडे लावली पाहिजेत हा विचार ऐकला की दिलासाही मिळतो.

या पुस्तकातील प्रसंग वाचताना लेखकाच्या सुक्ष्म निरीक्षण आणि वर्णन करण्याची खुबी वाचकाला खिळवून ठेवते. काही कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. त्यातला आशय पुन्हा पुन्हा गडद होत वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावतो.

असा हा अतिशय बोलके आणि समर्पक मुखपृष्ठ असलेला कथासंग्रह ‘अवकाळी विळखा’. यातील शेतकरी अनेक संकटात अडकुन सुद्धा शेती माती व शेतकरी यांची नाळ तुटू न देता सुखेनैव वाटचालीची बीजे रुजवणारा आहे. हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाला आहे हे मला अभिमानपुर्वक नमूद करावेसे वाटते.

©  श्री महादेव बी. बुरुटे

संपर्क – ६५०, जे. मार्ग, शेगांव, ता., जि. सांगली  Pin – 416404 Mob- 9765374805, Email: burutemahadev@gmail

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ महा-सम्राट… श्री विश्वास पाटील ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ महा-सम्राट…  श्री विश्वास पाटील ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकाचे नाव – महा-सम्राट

लेखक -विश्वास पाटील

खंड पहिला – झंझावात (छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी माला)

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा.लि., १९४१, सदाशिव पेठ, माडीवाले काॅलनी. पुणे ४११०३०

प्रकाशन काल -१ आॅगस्ट २०२२

किंमत – रू.५७५/-

या पुस्तकाचा पहिला भाग आपल्याला शहाजी महाराजांच्या काळातील बऱ्याच गोष्टी सांगून जातो शहाजीराजे मंदिर निजामशाही, आदिलशाही या दोन्ही ठिकाणी कामगिरी गाजवलेले एक मातब्बर सरदार म्हणून माहीत होते. परंतु या पुस्तकात सुरुवातीलाच त्यांनी लढलेल्या अनेक लढाया, गाजवलेले शौर्य आणि त्यांची मनातून असणारी स्वातंत्र्याची ओढ याविषयी अगदी परिपूर्ण माहिती मिळते. शिवराय आपल्या पिताजींबरोबर बंगळूर येथे फक्त सहा वर्षापर्यंत होते. त्यानंतर राजमाता जिजाऊ सह ते पुनवडी म्हणजेच पुणे येथे आले. आणि खरा स्वराज्याचा इतिहास सुरू झाला. पण त्यासाठी त्यांच्या आधीच्या काळात शहाजीराजे किती झगडले हे या पुस्तकात वाचायला मिळते. पुरंदर, जावळी, प्रबळगड, पेमगिरी अशा विविध ठिकाणी त्यांनी युध्दे खेळली.तसेच जे राजकारण केले ते या पुस्तकातून कळते. गुलामगिरी विरुद्ध पहिला एल्गार त्यांनी केला. शिवरायांना स्फूर्ती देणारे हे त्यांचे पिताजी! परक्यांची चाकरी करताना त्यांच्या मनात केवढी मोठी खंत होती हे वाचताना जाणवते.

जिजाऊंच्या माहेरच्या माणसांची त्यांना वैर घ्यावे लागले पण ज्या मुस्लिम राज्यांची त्यांनी सरदारकी पत्करली होती त्यासाठी कर्तव्य म्हणून त्यांनीही युद्ध केली.

शहाजीराजांना घोड्यांची चांगली पारख होती सारंगखेड्याच्या घोड्यांचा बाजार भरत असेल तेथे “दिल पाक” नावाचा अश्व  शहाजीराजांनी खरेदी केला होता.

आदिलशाही, निजामशाही आणि मुगल शाही या तीनही मुसलमानी शाह्यांना तोंड देत 30-40 वर्षे शहाजीराजांनी कार्य केले होते. शिवबांना लहानपणीच स्वराज्याचे बाळकडू जिजामातेकडून कसे मिळाले त्याचेही वर्णन या कादंबरीत खूप छोट्या छोट्या प्रसंगातून दिसून येते.

या पुस्तकाचा शेवटचा भाग राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी कशी घडली. तसेच शिवरायांनी छोटे-मोठे किल्ले घेत घेत स्वराज्याची पायाभरणी कशी केली हे सांगतो. अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी येण्याच्या प्रसंगाचे वर्णन या पुस्तकात शेवटच्या भागात आहे शिवरायांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी चांगले विचार स्वराज्य स्थापनेसाठी दिले. अफजलखानाच्या वधा नंतर ‘देहाचे शत्रुत्व संपले’ या विचाराने त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यासाठी वेगळी जागा शिवरायांनी दिली.

शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी मालेतील या पहिल्याच झंजावातात आपल्याला शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने वाचण्याचा आनंद मिळतो!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आर्ट अफेअर – डाॅ.मिलिंद विनोद ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  आर्ट अफेअर – डाॅ.मिलिंद विनोद ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

पुस्तक   – “आर्ट अफेअर”

(कथासंग्रह/स्फुट लेखन संग्रह)

लेखक    – डॉ मिलिंद विनोद

प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.

डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘आर्ट अफेअर’ हा कथासंग्रह वाचण्याआधी त्यांचा परिचय व श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली. उत्साहात मी पण पुस्तक वाचले आणि खूप आनंद झाला.

आनंद अशासाठी की डॉ. विनोद हे C.A.; C PA; P.HD; या पदव्या प्राप्त केलेले  प्रथितयश अर्थतज्ञ असूनही, अत्यंत सोप्या साध्या भाषेत त्यांनी सर्व लेखन केले आहे. कुठेही लटांबर वाक्ये नाहीत, बोजड शब्दरचना नाही, तरीही मूद्देसूद लेखन, आर्थिक विषयांवर असलेली पकड, रुक्ष माहितीही रंजकपणे सांगण्याची हातोटी, ही वैशिष्ट्ये कथांमध्ये तर दिसतातच, पण स्फुट लेखनात जास्त दिसतात. काही गोष्टींना दुबई / गल्फ कंट्रीची पार्श्वभूमी लाभली आहे. श्री विनोद यांच्या दुबईच्या वास्तव्याशी  जोडलेल्या कथा या संग्रहात आहेत, उदाहरणार्थ अँब्सेंट, Emirates अर्थात emi@rates या कथा.

ह्यातील ‘ अँब्सेंट ‘ ही कथा फार वेगळी आहे आणि मनाला चटका लावून जाते.  परिक्षेच्या हॉलमध्ये एका मुलाचे आईवडील येतात.  ते का बरं आले असावेत असा विचार करत असेपर्यंतच ते एका टेबलापाशी उभे रहातात.  त्या विद्यार्थ्याचे आय-कार्ड, हॉल टिकेट व एक गुलाबाचे फूल त्या जागेवर ठेवतात. एक मिनिट शांतता पाळून ते तिथून निघता निघता सांगतात, की दोन दिवसापूर्वी अपघातात निधन पावलेल्या विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत. सर्व मुले आणि परिक्षक चित्रासारखे स्तब्ध होतात. हा मुलगा फक्त परिक्षेला अँब्सेंट नाही, तर आता तो त्यांच्या आयुष्यातूनच अँब्सेंट झाला आहे ह्या विचाराने लेखक खिन्न होतो.   १८-१९ वर्षाच्या मुलाचा मृत्यु सहन करणे कोणत्याही आईवडिलांना फार कठीण ! ही भावना आपल्यापर्यंत ही जशीच्या तशी पोहोचते.

अशीच ‘ Emirates ‘ ही रमेशच्या आयुष्याची  गोष्ट वाचण्यासारखी आहे. १२-१५ वर्षे  दुबईत राहिल्यानंतर

१९९८ च्या आर्थिक संकटात रमेशची नोकरी जाते. एक वर्ष तो तेथे कुटुंबाला घेऊन कसेबसे काढतो.  पण नाईलाजास्तव त्याला बायको व मुलांना मुंबईला पाठवावे  लागते. दोन वर्षानंतर तो सुट्टी घेऊन येतो तेव्हाची बदललेली बायकामुले पाहून तो खंतावून जातो. आर्थिक बदलांबरोबर नीतीमत्तेतीलही बदल तो परिस्थितीप्राप्त म्हणून मान्य करतो. ही खूप कठीण गोष्ट बाजूला सारून तो आयुष्य सावरण्यासाठीची धडपड परत करू लागतो…..  श्री. विनोदांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे की जणू काही  घटनास्थळी आपणही प्रत्यक्ष हजर आहोत की काय असे वाटायला लागते. रमेशची सुखदुःखं आपलीच आहेत ही भावना बेचैन करते.

कथासंग्रहात  एकूण ८ कथा व ११ स्फुट लेख आहेत. 

सगळ्याच कथांचे विषयही  वेचक व वेधक आहेत. या सर्व मधमाश्याच्या पोळ्याची राणी आहे ‘आर्ट अफेअर’ ही कथा. एखाद्या वेगवान इंग्रजी थ्रिलरप्रमाणे कथा पुढे सरकत रहाते. खिस्तीजच्या ऑक्शनमध्ये एकाच कॅनव्हासवर मागे/पुढे काढलेले भगवान कृष्ण आणि गौतम बुद्ध  यांचे अतिशय वेगळ्या शैलीत काढलेले चित्र  विकावयास येते. अतर्क्य किमतीला हे पेंटिंग विकले जाणार, एवढ्यात सेलर ऐनवेळी चित्र ऑक्शन मधून विथड्रॉ  करतो. आणि एक जगप्रसिध्द चित्रकार उभ्या करत असलेल्या इन्स्टिट्यूटला, एका खाजगी कार्यक्रमात, भेट म्हणून देतो. हे सगळे का आणि कशासाठी हे प्रत्यक्ष गोष्टीतच वाचण्यासारखे आहे. माणसाच्या आयुष्याचा गुंता  लेखक सोडवत असताना वाचकही त्यात गुंततच जातो, आणि हीच त्या गोष्टीची जादू.

मिलिंद विनोद यांना माणसाच्या स्वभावाचा अभ्यास करायला आवडते. माणसाच्या वागण्याचे/कृतींचे ते निरीक्षण करतात, त्याचा विचार करतात, पर्यायांचाही विचार करतात, व त्यातून त्या पात्रांची  कथाबीजाला पोषक अशी वर्तनशैली बनते . मग कथा आश्चर्यकारकपणे पुढे सरकते व शेवटी वाचकाला चकित करून सोडते.  ‘Flagship of the group’ अशा या कथेचं नाव संग्रहाला दिले यातच सर्व काही आले. 

आर्ट अफेअरच्या बरीच जवळ जाणारी अजून एक रहस्यकथा म्हणजे ‘ फोटोप्लॉटर’ . लग्नाचा अल्बम वेळेवर येत नाही म्हणून फोटोग्राफरची शोधाशोध सुरू होते आणि त्यातून एक हाय टेक फायनान्शियल स्कॅमचा गुंता हातात येतो. पुढची गोष्ट लेखकाच्या शब्दातच वाचण्यात मजा आहे.

डॉ. विनोद यांचे स्फुट लेखनही स्वतंत्र विचारांचे आहे. देश सोडून जायचे असल्याने इतक्या वर्षांच्या सवयीच्या असलेल्या आयकिया स्टोअरच्या आठवणी, विमानतळावरील करोनाचा धमाका, द्वयर्थी इंग्रजी न समजल्यामुळे काहीही सांगणारी महिला, हिंदी गाण्यांवरचे प्रेम, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले आहे. ‘ अंकुर ‘ हा लेख अगदी तरल व भावस्पर्शी आहे. एक छोटे झाड जागा बदलताना हलले  जाते. लहान मुलासारखे तेही घाबरते. पण मायेचा स्पर्श, ऊब मिळाल्यावर त्याला छोटा अंकुर फुटतो…  सर्वच कल्पनारम्य आहे. दहा एक वाक्यात अतिशय संवेदनशील असा हा लेख आहे. असाच अजून एक लेख म्हणजे ‘ व्यथा बाबांची’ . सर्व आधुनिक बाबा ही अति बिझी माणसं !  मनात इच्छा असूनही त्यांना मुलांजवळ रहाता येत नाही. आता ते आजोबा झालेत तरी त्यांची मुले दूर आहेत, आणि त्यांच्या छोट्या नातवंडात ते आपलं मूल शोधताहेत. परिस्थिती कोणीही बदलू शकत नाही. आपल्या आठवणी मागे ठेवून मुले दूर जातात. त्या आठवणींच्या सोबत आयुष्य काढणे म्हणजे मनावर मोठा दगड ठेवणे, हे सर्व बाबाला करावे लागते. अपरिहार्य अशा ताटातुटीचे वर्णन वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.

वेगळ्या विषयावरील कथा आणि दर्जेदार स्फुट लेखन ह्यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. डॉ. मिलिंद विनोद यांच्या पुढच्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

 

 

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

लेखिका : अर्चना देशपांडे जोशी. 

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन 

पृष्ठसंख्या : १२६ 

किंमत : रु. १७५/-  

सध्याच्या मोबाईलच्या जगात सर्वच जण फोटो काढत असतात आणि लाईक मिळवत असतात. “फोटो काढणे” हा एक खेळ झाला आहे. अशावेळी मनात शंका येते,  “फोटोग्राफी” ही कला म्हणून आता अस्तित्वात आहे का? याचे उत्तर आपल्याला अर्चना देशपांडे जोशी यांच्या ‘क्लिक ट्रिक’ या पुस्तकात मिळते. खरी फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि आपले आयुष्य यांचा मेळ घालत, बत्तीस ललित लेखांची मालिका असलेले हे पुस्तक. ‘छायाचित्र कलेवरच सोप्पं भाष्य’ असे सांगत प्रस्तावनेलाच सुधीर गाडगीळसरांनी पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. तर विनायक पुराणिक सरांनी या पुस्तकाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. फोटो काढण्याची एक वेगळी नजर या पुस्तकातून मिळते, असे ते सांगतात. तर यापुढे जाऊन मला वाटते, फक्त फोटोच नाही, तर जीवनातील विविध प्रसंगाना वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी यातून मिळते. ‘मनाला मुग्ध करणाऱ्या फोटोंचे मंत्र’ सांगतानाच लेखिकेने ‘आपल्या लक्षात न येणारे सध्याच्या मोबाईल फोटोग्राफीचे तोटे’ यावरही खरपूस भाष्य केले आहे.

हल्ली क्लिक करणे खूप सोप्पे झाले आहे. हवे तेवढे, हवे तसे दशसहस्र क्लिक सारेच सतत करत असतात. पण त्यातील उत्तम क्लिक कोणता झाला? या एका क्लिकचे महत्व आणि तो कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे .. प्रत्येक लेखातून याचा परिचय होत जातो.

सावली, प्रतिछाया, आपली प्रतिमा. एकच शब्द. अनेक वळणे घेत आपल्या समोर येतो. ‘आधीच उल्हास’ या लेखात फोटोच्या विषयाएवढेच, त्याच्या सीमारेखेचे महत्व सांगितले आहे. फोटोत जिवंतपणा आणण्यासाठी गरज असते थोडा विचार करण्याची आणि शोधक नजरेची. फोटो कंपोझीशनप्रमाणेच त्याच्या बॅकग्राऊंडचा देखील विचार केला पाहिजे. ट्रॅंगल कंपोझिशनची युक्ती स्टील लाईफ फोटोग्राफीप्रमाणे फूड फोटोग्राफीत देखील वापरली जाते. ‘झाले मोकळे आकाश’ या लेखातून वाईल्ड आणि टेली लेन्स मधला फरक सांगताना, लेखिका चिवड्याचे गंमतीशीर उदाहरण देते. कॅमेरा हा कॅनव्हास आणि लेन्स हा ब्रश आहे, हे जर लक्षात आले तर आपले आपणच कलात्मक, सुबक देखणे फोटो काढू शकतो. फोटो एकतर चांगला असतो किंवा नसतो. हल्ली बऱ्यापैकी फोटो सगळेच काढत असतात. फोटो तिथे आधीपासून असतो. तो काढण्यासाठी  नजरेबरोबर आपल्या बुध्दीला श्रम घ्यावे लागतात. म्हणजे नेमका फोटो काढल्याचा आनंद आपल्याला मिळतो, असे ‘तो तिथे आहे’ यामधून समजते. ‘जाड्या-रड्या’ तून फोटोग्राफीमधील वेट बॅलन्स म्हणजे काय? हे लेखिकेने नमूद केले आहे. निसर्गात चौकट जागोजागी असते. त्याचा योग्य उपयोग फोटोची चौकट ठरवताना केला पाहिजे. ‘प्रत्येक फोटो काढताना आधी विचार करावा लागतो. हल्ली फोटो काढून झाल्यावर विचार करत बसतात.’ ‘आखीव रेखीव’ मधील लेखिकेचे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. नियम बनवावे लागतात कारण कोणीतरी नियमबाह्य वर्तन केलेले असते म्हणून. ब्रेकींग रूल्स फक्त कुठे आणि किती करायचे असतात, हे सत्य फक्त फोटोग्राफीत नाही तर जीवनात देखील शिकणे आवश्यक आहे. याची जाणीव ‘नियमातील अनियम’ यातून होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथला गृहपाठ करणे जरुरीचे आहे. आपल्याला ट्रिपला जायचे असेल तर हे जितके आवश्यक, तितकेच फोटोप्रवासासाठी कोणती सावधगिरी बाळगायाची हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाळयात फोटोग्राफी करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल लेखिकेने टिप्स दिल्या आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे घटनेपलिकडे बघण्याची दृष्टि. ॲग्रीकल्चरल, आर्किटेक्चर आणि इंटीरीयर, मॉडेल, कल्चरल फोटोग्राफी आणि टुरिझम, ऐतिहासिक वास्तू, शिल्प व जंगल असे फोटोग्राफीतील विविध प्रकार आहेत. फोटोक्राफ्ट व कॅन्डीड फोटोग्राफी वाचून आपल्याला आश्चर्य वाटते.

फोटो येण्यासाठी प्रकाशयोजना, कंपोझीशन, ॲंगल, लेन्स, उत्तम गृहपाठ, आपली बुध्दी, विचार, कल्पनाशक्ती आणि नशीबाची साथ लागते. तरीही सर्वोत्तम फोटोसाठी उत्तम कॅमेरा हाच फोटोग्राफरचा उजवा हात असतो, असे लेखिका नमूद करते.

काळ नेहमी पुढे धावत असतो, पण फोटोग्राफीच्या कलेमध्ये काळाला पकडून ठेवायची कला आहे. कलेने ‘आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे की समृध्द’ असा विचार आपल्याला करायला लावत, लेखिका समेवर येते. प्रत्येक कलेचा मान राखायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे.

मोबईलला ठेवलेले फोटोबाईल हे नाव, योग्यच वाटते. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील सौंदर्य लोप पावत आहे, याची खंत लेखिकेला आहे. यासाठी तिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंसाठी ‘फोटोफ्राय’ स्पर्धा सुरू केलेली आहे.

एखाद्या विस्तृत कुरणावर ससा मनसोक्त बागडत असतो तशी लेखिका आपल्या लेखात सर्वत्र पळताना दिसते. प्रत्येक लेखात एकेका शब्दांचे अर्थ लिहिताना अनेक अर्थ सहजपणे उलगडले आहेत. आणि त्यातून लेखिका अगदी नकळतपणे आयुष्यातील सत्य सांगून जाते. म्हणूनच फक्त फोटोग्राफी शिकणाऱ्या लोकांनी नव्हे तर आपण सर्व जण हे पुस्तक वाचू शकतो. 

फोटोग्राफी इतकाच लेखिकेचा मराठी कविता, चित्रकला याविषयांवर भरपूर अभ्यास झालेला दिसतो.

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव – तर मी का नाही?

लेखक – डॉ. बिंदुमाधव पुजारी

पृष्ठे – ३२४ मूल्य – ४५० रु.

नुकतेच एक चांगले पुसताक वाचनात आले. ‘…. तर मी का नाही?’ मिरजेतील ख्यातनाम सर्जन डॉ. बिंदुमाधव पुजारी यांचे हे आत्मचरित्र. वेगळे वाटणारे हे शीर्षक पाहिले आणि मनात कुतुहल निर्माण झाले.

सुरूवातीला त्यांनी लिहिलय, ‘माझा डॉक्टर आणि त्यानंतर सर्जन होण्याचा प्रवास हा योगायोग, दैव, आणि खूप खडतर वाटचाल इत्यादींचे मिश्रण होते. मी वैद्यकीयशास्त्र हे आवडीने घेतले नाही किंवा नाकारले पण नाही. जे नशिबी आले, ते जिद्दीने स्वीकारले. एक गोष्ट मात्र नक्की. कोणताही विषय स्वीकारला की मी त्यात स्वत:ला संपूर्ण झोकून देत असे. मग कितीही कष्ट करावे लागले आणि यातना सोसाव्या लागल्या तरीही माझी तयारी असे.  एखादी गोष्ट जर दुसर्‍याला करता येत असेल, तर ती  मला का करता येणार नाही? मी ती करणारच.’ ते पुढे लिहितात, ज्यावेळी इंग्रजी चौथीत इंग्रजीत ते नापास झाले होते, तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले होते, ‘तुझ्या वर्गातील अठ्ठावीस मुले पास झाली आहेत. तर तू का पास होणार नाहीस? अभ्यास कर म्हणजे तूही पास होशील.’ त्यांनी भरपूर अभ्यास केला. ते नुसतेच पास झाले नाहीत, तर चांगले  गुण त्यांनी मिळवले. त्यावेळी  गुरुवाणीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी जीवन प्रवास सुरू केला आणि ते उत्तम गुण मिळवत राहिले. अव्वल येत राहिले. त्यांच्या सार्‍या जीवनाचे सूत्र, ‘हे इतर करू शकतात, तर मी का नाही? (करू शकणार?) हे राहिले. ते त्यांनी हृदयस्थ केले  म्हणून मग आत्मचरित्राचे नावही नक्की झाले,   ‘…. तर मी का नाही?  

नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) इथे वेदशास्त्र पारंगत, पौरोहित्य करणार्‍या अशा पुजारी घराण्यात २४ एप्रील १९३५ मध्ये डॉक्टर बिंदुमाधव यांचा जन्म झाला. सुरूवातीला ते नरसोबाची वाडी हे गाव कसं वसलं आणि पुजारी हे आडनाव कसं अस्तित्वात आलं, त्याचा इतिहास देतात. श्रीनृसिंहसरस्वती १४२२साली या स्थानी तपश्चर्येला आले. तेथून जवळच असलेल्या आलास या गावातून भैरव जेरे त्यांचे दर्शन घेऊन पुढे शिरोळ येथे जोसकी करण्यासाठी जात. श्रीनृसिंहसरस्वती जेव्हा गाणगापूरला जायला निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या पादुकांचे ठसे तिथे ठेवले आणि त्यांनी भैरव जेरे यांना तुम्ही वंशपरांपरागत या पादुकांची पूजा करावी, असे सांगितले. पुढे त्यांना एक मुलगा, नंतर त्या मुलाला चार मुले झाली. त्यांचा वंशवेल वाढत गेला. श्रींच्या पादुकांची पूजा करणारे म्हणून जेरे घराणे पुजारी या नावाने ओळखले जाऊ लागले. भैरंभट हा त्यांचा मूळ पुरुष. त्याप्रमाणेच गावाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, लोकजीवन, श्रींची पूजा-अर्चा, सण- उत्सव, इत्यादिंची माहितीही सुरूवातीला सांगितली आहे. त्यावेळच्या समस्या- दुष्काळ, साथीचे रोग, वैद्यकीय (अ)सुविधा, शिक्षणाच्या सोयी, गांधीवधांनंतर गावात झालेले जळीत प्रकरण, त्याचा लोकजीवनावर झालेला परिणाम या सगळ्याचे वर्णन सुरूवातीला येते. ही सगळी माहिती वेधक आणि मनोरंजक पद्धतीने यात येते.

गावातील धार्मिक वातावरण, घरातील जुने वळण, एकत्र कुटुंब, यामुळे, ‘सहनशीलता, समानता, समजूतदारपणा, खिलाडू वृत्ती, सांघिक भावना, कष्टाची तयारी इ. गोष्टी लहानपणीच आमच्या अंगात मुरल्या होत्या. त्याचा पुढील आयुष्यात आम्हाला फार उपयोग झाला’, असे ते सांगतात.  त्या काळात, सोयी-सुविधांच्या अभावी, जीवन, विशेषत: ग्रामीण जीवन कष्टप्रद होते. लहान मुलांनाही त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे कष्टाची कामे करावी लागत. डॉक्टर म्हणतात, त्यांचे लहानपण कष्टात, तरीही आनंदात मजेत गेले.

माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती. त्यासाठी कुरूंदवाडला जावे लागे. वर्षातले नऊ महीने, प्रथम नावेतून पंचगंगा नदीच्या पलिकडे जावे लागे. नंतर कुरूंदवाडच्या वेशीपर्यंत चालत जाऊन पुढे तीन मैल अनवाणी चालत जावे लागे. पावसाळ्यात, भरपूर पाऊस, प्रचंड वेगाने वहाणारे पाणी, घोंगावणारे वारे, यातून नाव बाहेर काढणे बिकट असे. प्रवास भीतीदायक, धोकादायक वाटायचा. असा सारा त्रास, कष्ट सहन करत वाडीतील अन्य मुलांप्रमाणे डॉक्टरांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. ७८% गुण मिळवून ते शाळांत परीक्षा पास झाले.

पुढे कॉलेज ते एम.बी.बी.एस.पर्यंतच्या खडतर शैक्षणिक प्रवासाची माहिती येते. आर्थिक विवंचनेमुळे हा शैक्षणिक प्रवास खडतर झाला होता. शिष्यवृत्ती होती, पण जेवणाचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी मेसच्या सेक्रेटरीचे काम केले, कधी एका मुलाला तासभर अ‍ॅनाटॉमी शिकवून त्याच्या डब्यात जेवणाची सोय करून घेतली.

बिंदुमाधव मुळात मेडिकलकडे कसे गेले, याचाही एक किस्सा आहे. एफ. वाय. ला ते सायन्स विभागात व गणितात विद्यापीठात पहिले आले. इंजींनियारिंगला जायचा त्यांचा विचार होता, पण रिझल्टच्या वेळी काही प्रतिष्ठित मंडळी त्यांना भेटायला आली. त्यांनी सुचवले, त्याने डॉक्टर व्हावे. पंचक्रोशीत कुरूंदवाडच्या डॉ. वाटव्यांशिवाय कुणी एम.बी.बी.एस. डॉक्टर नाही. बिंदू उत्तम डॉक्टर होऊ शकेल. त्यांच्या वडलांनाही ती कल्पना पसंत पडली. त्या सर्वांचा आग्रह पाहून ते मेडिकलला जायला तयार झाले.  

या पुस्तकात त्यांनी आपल्या लहानपणाच्या, शिक्षण घेत असतानाच्या, नोकरी करत असतानाच्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतरच्या, कॉन्फरन्स काळातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पुस्तकात शेवटी व्यवसाय काळातल्या निवडाक बारा आठवणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे लेखन, व्याख्याने, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्या त्या वेळचे फोटो असा सगळा भाग पारिशिष्टात दिलेला आहे

डॉक्टर१९५९ आली एम.बी.बी.एस. झाले व १९६३ साली एम.एस. झाले. सुरवातीला चार वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. १९६५पासून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९६८साली त्यांचे ‘श्री हॉस्पिटल’ स्वत:च्या वास्तूत गेले.

१९६४साली त्यांचा विवाह बंगलोरयेथील डॉ. इंदुमती कुलकर्णी यांच्याशी झाला. त्या माधवी कुलकर्णी बनून डॉक्टरांच्या घरात आल्या आणि दुधात साखर विरघळावी, तशा त्यांच्या जीवनात विरघळून गेल्या.

प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस ला जाऊ लागले. तिथे होणारी भाषणे, चर्चा यातून त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपल्या ज्ञानाचाही इतरांनाही  फायदा करून दिला.

पुस्तक वाचत असताना डॉक्टरांची खास गुणवैशिष्ट्ये लाक्षत येतात, ती अशी— प्रखर बुद्धिमत्ता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, अभ्यास आणि संशोधनाची वृत्ती, सौजन्यशील-मृदू स्वभाव, अफाट लोकसंग्रह. नीटनेटकेपणा हा त्यांचा आणखी एक विशेष. आपल्या सगळ्या पेशंटसचे व्यवास्थित रेकॉर्ड त्यांनी ठेवले. ओपरेशन्सच्या वेळचे फोटो घेऊन तयार केलेल्या पारदर्शिका (स्लाईडस), प्रबंध-व्याख्यानांची तयारी या सगळ्यात त्यांचा नीटनेटकेपणा जाणवतो.

‘… तर मी का नाही?’ हे आत्मचरित्र जितके माहितीपूर्ण आहे, तितकेच ते रसाळही झालेले आहे. त्याचे श्रेय उत्तम शब्दांकन करणार्‍या प्रा. डॉ. मुकुंद पुजारी यांनाही द्यावे लागेल. साधी प्रासादिक, ओघवती, उत्सुकता वाढवणार्‍या भाषेत पुस्तकाचे लेखन झाले आहे. डॉ.चा मोठेपणा सांगणारा त्यांचा स्वत:चा लेखही यात आहेच. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.(श्रीमती) स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना पुस्तकाचे सार आणि महत्व मोजक्या शब्दात सांगणारी, लक्षवेधी अशी आहे. एका कृतार्थ जीवनाची वेधक कहाणी यात आपल्याला वाचायला मिळते.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares