मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव – (काव्यसंग्रह) अरुणोदय

प्रकाशन – १५ मार्च २०२२

प्रकाशक – शाॅपीझेन.काॅम

किंमत – रु ४०/—

 

आज मी तुम्हाला सुश्री अरुणा मुल्हेरकर यांच्या शाॅपीझेन या डीजीटल मीडीयावर नुकताच प्रकाशित झालेल्या अरुणोदय या काव्य संग्रहाचा परिचय करुन देणार आहे. या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.

त्यांचे वैशिष्ट्य असे की, यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून, प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे.

षटकोळी, कृष्णाक्षरी, शोभाक्षरी, शंकरपाळी, नीरजा, मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात.

प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी, यमक, वर्ण अक्षरं, शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे संपूर्ण तपशील यात दिले आहेत. त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते. आणि वाचकाला त्या रमवतात.

या सर्व कवितातून त्यांनी विवीध विषयही हाताळले आहेत. निसर्ग आहे.मनातली स्पंदने आहेत. सामाजिक दूषणे आहेत.

नव्या पीढीच्या समस्या आहेत. जीवनातली सुख दु:ख प्रेम यावरचे मोकळे भाष्य आहे. भावनांचे अविष्कार आहेत….

नाते प्रेमाचे या षटकोळी रचनेत त्या म्हणतात,

मधुप आणि कुसुम

धेनु वाढवी वासराला

पाखरे झेपावती नभात

घेत उंच भरारी

कोटरात परतती सांजवेळी

प्रेम आहे चराचरात..

या सहा ओळीच्या रचनेत अत्यंत सहज शब्दांत त्यांनी निसर्गातले प्रेम टिपले आहे.

द्विशब्दी रचनेतले आई विषयीचे दोनच शब्द मनाला भिडणारे आहेत.

आई देई

संस्काराचे आंदण

दारात तिच्या

बागडते अंगण…

मधुदीप काव्यांमधे शब्दांची मांडणी तेवत्या दीपासारखी असते. या कविता वाचताना अक्षरांच्या सुबक चित्राकृतीही खूप आकर्षक आहेत.

संगीताक्षरी.. तीनओळीची अक्षरबद्ध काव्यरचना.

चंदन झिजतसे

सुगंध भरीतसे

सदाकाळ…

लीनाक्षरी हे दोन ओळीचं, २४ अक्षरे असलेले काव्यही अतिशय लोभस आहे.

संकटाशी सामर्थ्याने लढायचे

शांतचित्त समाधान ठेवायचे…

शब्द साधे पण अत्यंत ओलावा असलेले. प्राणमय आणि सजीव. प्रत्येक रचना ही त्या त्या भावनेसकट,विचारांसहित मनाला भिडते. नियमबद्ध असूनही अवघड नाही. रुक्ष नाही. फाफटपसारा नाही. ओढूनताणून केलेली अक्षरांची कसरत नाही. एक सहजता, नाद लय गती.. या कविता वाचताना जाणवते. मन गुणगुणायला लागतं.. अरुणोदय या काव्यसंग्रहाचं हेच वैशिष्ट्य आणि यशही.

अरुणाताईंनी अतिशय अभ्यासपूर्ण असा हा काव्यसंग्रह प्रकाशित करून, नवोदित कवी कवयित्रींसाठी एक दालन उघडले आहे.

साहित्य कला व्यक्तिमत्व मंचाचे प्रमुख, आणि मान्यवर लेखक, कवी गझलकार या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात की या काव्य सरितेत प्रथम मी सहज डोकावलो नंतर त्यात कसा ऊतरलो, पोहू लागलो नि संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर वर येउन पाहतो तर मी एकामहासागरात होतो. अरुणाताईंची प्रतिभा आणि प्रतिमा खूप काही शिकायला ठेवून गेली. तेव्हां रसिकहो आपणही  हा अनुभव घ्यावा. त्यासाठी शॉपीझेन डॉट काॅम या साईटवर जाउन अरुणोदय हा काव्यसंग्रह जरुर वाचावा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

नमुना नमुना माणसं

लेखिका | मंजिरी तिक्का

साहित्य प्रकार | अनुभवकथन

प्रकाशक | अक्षरमानव प्रकाशन

सात-आठ वर्षांपूर्वी चक्रम माणसांशी कसे वागावे हे कि.मो. फडके यांनी लिहिलेलं त्रिदल प्रकाशनचं पुस्तक मी वाचलं होतं. यात चक्रमपणाबद्दल व्यवस्थित माहिती दिली होती. त्याची लक्षणं, तीव्रता त्याचे होणारे परिणाम वगैरेंचे किस्से वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, याच्यातली बहुतांशी सौम्य का होईना लक्षणं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येकांमध्ये आढळतात अगदी आपल्यातही. वागण्याची पद्धत किंवा अमुक प्रकारचा स्वभाव हा चक्रमपणात कसा नोंदला जाऊ शकतो किंवा इतरांसाठी तो कसा ठरू शकतो याची जाणीव या पुस्तकातून करुन दिली आहे.

तर मंडळी,

हे सगळं चऱ्हाट लावण्याचं कारण म्हणजे मी नुकतंच वाचलेलं ‘नमुना नमुना माणसं’ हे मंजिरी तिक्का यांचं पुस्तक. एव्हाना नावावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की नमुना नमुना माणसं असं म्हणताना त्यात चक्रमपणा हा हळुच डोकावतोय. अगदी थेट नसला तरी एखाद्या नुकसानकारक गुणाचा अतिरेक हा त्याच्या जवळपास जाणाराच गुण आहे. हेच गुण अंगी असलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि त्यांचे त्याबाबत घडणारे विनोदी किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

अतिशय साध्या-सोप्या आणि संवादी शैलीत हे किस्से असल्यामुळे क्वचित प्रसंगी आपल्या हातूनही घडलेले असे फजितीचे प्रसंग किंवा आपल्या इतर मित्र-मैत्रिणी, भावंड यांच्यापैकी कोणाच्या तरी बाबतीत घडलेले प्रसंग आठवून आपल्याला खुदकन् हसू येतं. बालपणीच्या आठवणींमध्ये अधिक तर अज्ञानाचा, निरागसतेचा भाव असल्यानं त्यांचं वैषम्य जाणवत नाही. पण मोठेपणी मात्र आपल्या स्वभावामध्ये योग्य त्या प्रकारे बदल करता आला नाही तर त्याचा किती गैरफायदा घेतला जातो हे लक्षात आल्यावर हसू येण्यापेक्षा हळहळायलाच होतं.

मला या पुस्तकाची भावलेली आणखीन एक बाजू म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे जे घडलं ते जसंच्या तसं स्वरूपात मांडल्याचं जाणवतं. त्यात अतिरंजितपणा, पाल्हाळीकपणा, अकारण विनोद निर्मितीचा प्रयत्न, शब्दविक्षेप आढळत नाही. त्यामुळे हे किस्से आपल्या घरातलेच आहेत, किंवा आपल्या समोरच घडताहेत असं वाटतं.

अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये आढळणाऱ्या अतिचिकित्सक, अतिचिकट, अतिस्वच्छतावेड्या, अतिअबोल, अतिवाचाळ, अतिभिडस्त, तारतम्याचा अभाव असलेल्या नमुन्यांचा यात अंतर्भाव आहे. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे नात्यांमध्ये, कामामध्ये होणारा गोंधळ हा अतिशय सहजतेने टिपला आहे. प्रसंगांची मांडणी, किस्से हे जरी विनोदी पद्धतीने सांगितले असले तरी ते वाचून हसता हसता आपण नकळत अंतर्मुख होतो. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जास्त जाणीवपूर्वक बघू लागतो, हे खरंतर या पुस्तकाचं यश.

मंजिरी तिक्का यांचं हे पुस्तक जरी पहिलंवहिलं असलं तरी काहीसं स्वशोध घेणारं, स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लावणारं आहे. त्यांच्यातल्या उत्तम निरीक्षकाची, लेखकाची चुणूक दाखवणारं आहे. शंभरेक पानांच्या या पुस्तकात वाचताना कुठेही कंटाळवाणेपणा जाणवत नाही. मात्र क्वचितप्रसंगी प्रसंग वर्णन करताना पुनरावृत्ती झाल्याचं जाणवतं.

पुस्तकाची महत्त्वाची आघाडी सांभाळणाऱ्या दोन गोष्टी एक मुखपृष्ठ आणि शीर्षक या अतिशय उत्तम जमून आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी साकारलेले पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि विषयाला समर्पक असं आहे. माणसाच्या वेगवेगळ्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या चौकटीतल्या व्यंगचित्रातून ‘नमुना नमुना’ माणसाचं उत्तम प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर नमुना या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे निर्माण होणारा भाव पुस्तकाच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू आणतो.

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या दिवसात एका बैठकीत वाचून संपणारं आणि मनाला प्रसन्नता देणारं हे पुस्तक आवर्जून वाचा. आणि आपल्या आजूबाजूची नमुनेदार माणसं शोधतानाच आपल्यातही लपलेला नमुनेदारपणा शोधून काढा.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकाचे नाव- ‘गाणाऱ्याचे पोर’

लेखक – राघवेंद्र भीमसेन जोशी

प्रकाशक- यशोधन पाटील

प्रथम आवृत्ती- 22 नोव्हें. 2013

 

पंडित भीमसेन जोशी, राघवेंद्र यांचे वडील. राघवेंद्र यांच्या आईचे नाव सुनंदा, भीमसेन जोशींची पहिली पत्नी. भीमसेन जोशी यांचे लहानपणी चे वास्तव्य गदग मध्ये गेले. 1944 मध्ये भीमण्णा यांचे लग्न सुनंदा कट्टी यांच्या बरोबर झाले. त्यानंतर त्यांचे गाण्याचे दौरे चालू झाले. कुटुंबाबरोबर घराबाहेर पडून नागपूर येथे  बिर्‍हाड केले. 

औरंगाबादमध्ये  त्यांची वत्सला मुधोळकर यांच्या शी गाठ पडली आणि कार्यक्रम करता करता ते त्यांच्या प्रेमात पडले. वत्सला यांचा उल्लेख राघवेंद्र यांनी ‘त्यांचा’ अशा शब्दात केला आहे. भीमसेनजींचा दुसरा विवाह ही गोष्ट च सर्वांना खटकणारी होती. पहिली पत्नी आणि मुले यांना भीमसेनजीनी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर  वेगळे बिऱ्हाड करून दिले.

भीमसेन जोशीं बद्दल आदर बाळगूनही त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रेमळ तितकेच लहरी, बेफिकिरीने राहणारे होते, त्याचबरोबर गाण्यातील तन्मयता अशा अनेक गोष्टी राघवेंद्र यांच्या लिखाणातून दिसून येतात. सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची हजेरी हा एक गौरवास्पद प्रसंग असे.  त्यांच्या बादशाहीच्या बोर्डातील घरी पैसे आणण्यासाठी आई ज्यांना पाठवत असे. तेव्हाचे त्यांचे रूप राघवेंद्र यांच्या मनात ठसले होते. ‘भरदार छाती, बलदंड बाहू, असे मर्दानी रूप, कुरळे केस, देहाला एक विशिष्ट देह गंध होता, तो नुसत्या घामाचा वास नव्हता, तर त्यात तुळशी तल्या मातीच्या वासाचाही अंश  आहे असं वाटे.’ अशा शब्दात त्यांनी भीमसेन यांचे वर्णन केले आहे.

त्यांच्या पैशावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असे. त्यामुळे त्यांचे पहिले कुटुंब व मुले यांना त्यांचा सहवास मिळून नये असा  ‘त्यांचा’ प्रयत्न असे. राघवेंन्द्र म्हणतात,’ आई-भीमण्णा-त्या-… या त्रिकोणात  पिंगपाॅंग चेंडूसारखी माझी त्रिशंकू अवस्था होई! एकीकडे पैशाची बरसात,तर सुनंदा च्या घरी पैशाची ओढाताण!’असे काही वाचले की मनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला हा कसला डाग!

एकदा राघवेंद्र यांच्या घरी आई पुरणाच्या पोळ्या करीत असताना भीमसेनजीनी एका बैठकीत चार पाच पोळ्या संपवल्या याचेही राघवेंद्र ना कौतुक! एकदा लहानपणी साखर झोपेत असतानाच तंबोर्‍याच्या सूर राघवेंद्र यांच्या मनात चैतन्य निर्माण करून गेले’ ही बदामीची आठवण अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे!

लहानपणीच्या अनेक आठवणी सांगता सांगतानाच राघवेंद्र भीमसेनजींच्या अनेक गोष्टी व स्वभाव वैशिष्ट्ये सांगत जातात. त्यावरून त्यांचे गाणे, त्यांचे खाणे, कलंदर स्वभाव, गाण्यातील एकतानता, राघवेंद्र स्वामी वरील श्रद्धा अशा अनेक गोष्टी आपल्या ला दिसून येतात. त्यांना कार ड्रायव्हिंग ची खूप आवड होती आणि काय संबंधी सखोल ज्ञान त्यांनी मिळवले होते असे दिसून येते.

भीमसेनजीनी मुलांची शिक्षणं पुण्यात केली.

दुसऱ्या घरी भीमसेनजीनी खूप खर्च केला, पण  पहिल्या कुटुंबाला मात्र गरीबीत ठेवले याची राघवेंद्र यांच्या मनात खूप खंत होती. पण तरीही त्यांनी वडिलांचा मोठेपणा जाणून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. त्यांची कीर्ती आणि समृद्धी जगभर पसरली होती. मोठा मुलगा म्हणून वडिलांची काळजी घेतली. भीमसेनजीनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच मानाने वागवले नाही.

मनात येईल ते करण्याची भीमण्णांची वृत्ती अनेक प्रसंगातून दिसून येते असेच माझे मत झाले. त्यांना पांढराशुभ्र रंग फार आवडे.’ सात स्वर रंग सामावलेला शुभ्र प्रकाश हेच या स्वरभास्कराचे वैशिष्ट्य होते.

राघवेंद्र यांच्या लिखाणातून मला असे जाणवले की सुरांच्या पलिकडे असणारे भीमसेन वेगळेच होते!त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, त्या प्रसंगाचा फोटो भीमाण्णांनी  त्यांना दिला.

भीमसेन जींचा मुलगा म्हणून राघवेंद्र यांनी स्वतः चा फायदा करून नाही घेतला.  राघवेंद्र नी आपली व्यावहारिक प्रगती स्वतः च केली. पाणी शोधण्याचे तंत्र त्यांना कसे सापडले, धायरीला त्यांनी घर केले, भीमाण्णांनी त्यांच्या’सह नवीन घराला भेट दिली.

भीमाण्णांना  भारत रत्न हा बहुमान मिळाला.

‘त्यांच्या मैफिलींच्या आठवणी काढणे म्हणजे मोत्याची थैलीच  मोकळी सोडण्यासारखे आहे. प्रत्येक मोती गोळा करताना परत मनात तोच आनंद!’ अशा शब्दात राघवेंद्र यांनी भीमसेनजींचा सन्मान केला आहे!

त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्यात राघवेंद्र यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ १२ जुलै १९६१… सुश्रीआश्लेषा महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ १२ जुलै १९६१… सुश्री आश्लेषा महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

१२ जुलै १९६१

साहित्य प्रकार | कादंबरी

लेखिका | आश्लेषा महाजन

प्रकाशक | इंकिंग इनोव्हेशन

~~~~~~

१२ जुलै १९६१

काही तारखा काळावर आपलं अस्तित्व कोरून ठेवतात त्यातलीच ही एक तारीख. या तारखेनं पुनवडी ते पुणे अशा एका मोठ्या स्थित्यंतरावर आपला ठसा उमटवलेला आहे.

पानशेत पूर ! पुण्याचा संपूर्ण कायापालट करणारी घटना ही समस्त पुणेकरांची एक दुखरी नस आहे. करोनासारख्या जागतिक महामारीनंतरही ही घटना पुणेकर विसरू शकले नाहीत. याचा पुरावा म्हणजे करोनावासात १२ जुलै २०२१ या दिवशीच या पुराला तब्बल साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कादंबरी प्रकाशित झाली.

पानशेत पुराच्या अनेक आठवणी आजही पुणेकरांच्या मनात जिवंत आहेत. माझा या आठवणीशी अप्रत्यक्ष संबंध असा की आमची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही सुरुवातीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा होती. ती पुरात पूर्णपणे नष्ट झाल्यानं आबासाहेब गरवारे तिचं पुनर्वसन केलं. नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतरही शाळेत हॉलमधल्या भिंतीवर पुराचं पाणी चढलं होतं तिथे लाल रंगात खूण केली असून पुराचा उल्लेख केलेला आहे. यावरूनच पानशेत पुराचं महत्त्व दिसून येतं. तसंच पुराच्या काळात पुणेकर असणाऱ्या माझ्या वडिलांनी तो पूर स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्यात ते स्वतः आर्किटेक्ट असल्यानं पूरग्रस्तांची घरं, त्यांचं बांधकाम, डागडुजी अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यात यायच्या त्यामुळे ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली.

जेव्हा एखाद्या सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथानकाची निर्मिती केली जाते तेव्हा लेखकाचा खरा कस पणाला लागतो. त्यात ती सत्य घटना जर अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारी असेल तर त्याच्याशी निगडीत अनेक धागेदोरे हे पिढ्यानुपिढ्या जपले गेलेले असतात. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे स्थित्यंतरं निर्माण झालेली असतात त्यामुळे त्या घटनेकडे ते केवळ कथा किंवा साहित्य या अंगाने बघू शकत नाहीत. अशावेळी वाचकांच्या मनातला हा ‘सल’ ओळखून त्यांची जखम तीव्रतेनं भळभळणार नाही याची काळजी घेत पण वास्तवातले अनेक धागे पुराव्यानिशी उलगडून सांगत त्यावर आधारित काल्पनिक कथानक रचणं हे अवघड काम आश्लेषा महाजन यांनी सहज पेललं आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरुन त्यावेळच्या हाहाकाराची झलक पहायला मिळते. त्यामुळे पुस्तक उघडल्यानंतर पुराच्या कुठल्या अनामिक प्रसंगांची लाट आपल्यावर कोसळणार आहे अशी साशंकता मनात होती. पण तसं घडलं नाही कारण ही कादंबरी या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिली आहे. आणि ही घटना उलगडली ती आजच्या काळातल्या तरुणांनी… त्यामुळे या घटनेची तीव्रता ही प्रत्यक्षात जरी जास्त असली तरी काळाच्या फरकाने, कथानकाच्या मांडणीमुळे तितकीशी जाणवत नाही. या पन्नास वर्षांत पुण्याचा झालेला कायापालट केवळ एक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या ही झालेला बदल आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो. आणि या बदललेल्या दृष्टिकोनातून ही घटना वाचली जाते.

मोबाईल, वाय-फाय, इंटरनेट, लॅपटॉप अशा आधुनिक जगात जन्मलेली पिढी आणि तिच्याद्वारे उलगडत गेलेली पानशेत पुराची ही घटना आपल्याला या पुराकडे त्रयस्थपणे बघायला प्रवृत्त करते. पुरात घटनांचा इतिवृत्तांत, त्यावरच्या बातम्या, झालेलं नुकसान, आरोपप्रत्यारोप, राजकारण, समाजकारण अशा गोष्टी थेट न सांगता पात्रांच्या शोध मोहिमेतून कथानकाचा एक भाग म्हणून सांगितल्या आहेत.

पुरातन वस्तू आणि वास्तूंची आवड असलेली आर्किटेक्ट, इंटेरियर डेकोरेटर शैली, भाषाप्रेमी देश-विदेशात सतत भटकंती करणारा इंटरनॅशनल लॅग्वेज सर्व्हीसेसचा संस्थापक चित्ततोष, पर्यावरण प्रेमी ऋतुपर्ण आणि पुरातत्त्व अभ्यासक सुदर्शन या मुख्य पात्रांच्या संशोधन कार्यातून ‘पानशेत पूर’ समजू लागतो. प्रतिभा, वसंत आजोबा, पुणतांबेकर आजी, इ. उपपात्रंही ही पुरकथा आपापल्यापरीने उलगडून सांगतात. शिवाय घटनेचे साक्षीदार असलेली यातली अमानवी पात्रं म्हणजे जुने वाडे आणि खिडक्या यांच्या असण्यातून आणि नसण्यातूनही पुराची तीव्रता जाणवत राहते.

कादंबरीची सुरुवातच होते ते मुळी पुराणकालीन रचनेचा उत्तम नमुना असलेल्या खिडक्यांच्या शोधातून… आणि मग पुढे या खिडक्यांच्या निमित्ताने बंद वाड्याआड घडणाऱ्या आणि पुराने दबून गेलेल्या काही घटना काही प्रसंग हे समोर येतात. या कथानकात खिडकीचा केलेला वापर हा अनेक अर्थानं प्रतीकात्मक आहे. तसंच वाडा हे पुण्याचं गतकालीन सांस्कृतिक वैभव असलेलं प्रतीक आणि त्याच्या नामशेष होण्याच्या घटनेतून उलगडत जाणाऱ्या काही उपकथा यादेखील प्रतीकात्मकतेचा उत्तम नमुना म्हणता येतील.

आधीच म्हटल्याप्रमाणे या कादंबरीतून केवळ पुराबाबतच नव्हे तर बदलत चाललेल्या मानवी नातेसंबंधांबाबतचाही वेगळा विचार वाचायला मिळतो. विशेषतः स्त्री पुरुष संबंध, मैत्र या भावनेवरती या कथानकात ऊहापोह केला आहे.

आश्लेषा महाजन यांची ही पहिलीवहिली कादंबरी… त्यामुळे लेखनात ताजेपणा जाणवतो पण त्याबरोबरच काही प्रसंग हे गरजेपेक्षा अधिक सविस्तर लिहिले गेलेत असंही जाणवतं. कथानकात रंजकपणा यावा, पात्रांचे आपसातले बंध जाणवावेत यासाठी ते लिहिले गेले असले तरी क्वचित प्रसंगी शोधकार्यातला थरार त्यामुळे मंदावल्यासारखा वाटतो.

असं असलं तरीही तरुणाईच्या उत्साहातून या कथानकाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन, कादंबरी वाचनातला रस शेवटपर्यंत टिकवतो हे नक्की. एका गंभीर आणि वास्तव घटनेवर आधारित काल्पनिक कथनातली ही मांडणी प्रत्येकानं आवर्जून वाचावी अशी आहे.

चित्रपट अथवा वेबसिरीजसाठी हे कथानक उत्तम पर्याय असून लवकरच या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळावं ही सदिच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी” – संकलन….सु.ह.जोशी ☆ परिचय – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी” – संकलन….सु.ह.जोशी ☆ परिचय – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

पुस्तकाचे नाव:  वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी

संकलन: सु.ह.जोशी.

प्रकाशक: सु.ह.जोशी.पुणे मो. 9922419210:

मूल्य: रू.180/-

पुस्तकावर बोलू काही :

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक पुस्तकांची निर्मिती झाली आहे.नुकतेच आणखी एक पुस्तक हातात पडले.वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी.मागच्या वर्षी म्हणजे 26/02/2021 ला हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.पुस्तकाचे नाव आणि आकार बघता सहज पाने चाळली.पण मग थोड्याच वेळात पुस्तक वाचून पूर्ण केले.

असे वेगळे काय आहे या पुस्तकात? मुख्य म्हणजे हे एखाद्या चरित्रकारने लिहीलेले सावरकरांचे चरित्र नव्हे.या आहेत सावरकरांविषयी आठवणी व त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी,घटना यांची घेतलेली नोंद.या सर्व गोष्टींचे,आठवणींचे संकलन केले आहे श्री.सु.ह.जोशी यांनी.

या पुस्तकात स्वा.सावरकरांचे विचार जसे वाचायला मिळतात तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेली लहान मोठी  माणसे,त्यातून घडणारे त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन,मतप्रदर्शन,विरोध,साधेपणा,नामवंतांचा  सावरकरांविषयी  असलेला दृष्टीकोन अशा  विविधरंगी पैलूंचे दर्शन घडते.प्रस्तावनेत न.म.जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे हे नुसते संकलन नाही तर हा सावरकरांच्या वीर चरित्राचा कॅलिडोस्कोप आहे.कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक आहे.अनेक पुस्तकातील उतारे,वृतपत्रातील वृत्ते,सहवासातील व्यक्तींचे अनुभव असे विविध प्रकार वाचायला मिळत असल्याने पुस्तक रंजक व माहितीपूर्ण झाले आहे.स्वा.सावरकरांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

परिचय:सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “लाॅकडाऊन” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लाॅकडाऊन” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तकाचे नाव – ‘लाॅकडाऊन’

लेखिका – संध्या साठे-जोशी

बी-१०९, तुलसी सोसायटी, मार्कंडी, या. चिपळूण, जि.रत्नागिरी

पुस्तकाचा प्रकार – कथासंग्रह

दिलिप राज प्रकाशन प्रा.लि.

प्रथमावृत्ती १५ आॅक्टोबर २०२१

लेखिकेने या पुस्तकात लाॅकडाऊन आणि कोरोना काळाशी संबंधित अशा अनेक कथा लिहिल्या आहेत.साधारणपणे २०२० च्या मार्चमध्ये कोरोना भारतात आला. जास्तकरून पुणे, मुंबई या भागात.. परदेशात आपल्या नातेवाईकांकडे गेलेल्या आई-वडील, किंवा जवळचे नातेवाईक यांना या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले.त्या गोष्टी चा अनुभव आम्हाला ही घ्यावा लागला, कारण आम्ही दोघे तेव्हा दुबई हून आलो होतो.त्यामुळे कथेतील काही अनुभव आम्ही घेतले होते.

कोकणातील मालघर सारख्या लहान खेड्यात राहून लेखिका तेथील रसरशीत आयुष्य अनुभवते आहे.तेथील अनुभव कथेच्या रुपात वाचायला खूपच आवडले.

२३ कथांचा हा संग्रह आहे.त्यांत कोकणातील चालीरीती,उत्सव, जीवनशैली या सर्व गोष्टी दिसून येतात.’स्पर्शतृष्णा’, मातृत्व’ती आई होती म्हणुनी’यासारख्या कथा मनाला स्पर्शून जातात.’कोरोनाची गोष्ट’ वाचताना दोन वर्षांपूर्वी आपण जे पाहिले,अनुभवले ते अगदी डोळ्यासमोर उभे राहते.

आत्ता च्या काळाशी सुसंगत आणि ओघवत्या भाषेत लिहिलेल्या कथा वाचायला खूप छान वाटले..

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जाणिवांच्या परिघात” …स्वाती दाढे “सुखेशा” ☆ परिचय – सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जाणिवांच्या परिघात” …स्वाती दाढे “सुखेशा” ☆ परिचय – सुश्री प्रभा सोनवणे 

प्रगल्भ जाणिवेची कविता ….

स्वाती दाढे “सुखेशा” हे नाव वाङ् मय क्षेत्रात सुपरिचित आहे. गेली अनेक वर्षे  अनेक दर्जेदार मासिकांमधून तिच्या  कविता प्रकाशित होत आहेत.

सुखेशा झाडाझुडपात, पानाफुलात, पक्षांमध्ये रमणारी संवेदनशील कवयित्री,तिची कविता तिच्या सौम्य, मृदुल व्यक्तिमत्त्वासारखीच तरल, हळूवार आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही. या कवयित्रीने कुठलीच पताका खांद्यावर घेतलेली नाही, या कवितेत कुठलाच “वाद” नाही तरीही ही समग्र कविता अतिशय प्रगल्भ आहे,

या कवितांना आध्यात्मिक बैठक आहे, निसर्गाची ओढ आहे,स्त्रीजाणिवा, मैत्री, प्रेम, सामाजिक बांधिलकी, आई…..असे अवती भवतीचे सारे विषय ही कविता चितारते!

“जाणिवांच्या परिघात” हा सुखेशाचा दुसरा कविता संग्रह आहे. तिचा “मन हिंदोळा हिंदोळा” हा कविता संग्रह २०१५ मधे प्रकाशित झाला आहे. “जाणिवांच्या परीघात” मध्ये त्यानंतरच्या म्हणजे २०१६ ते २०२१ या कालखंडात लिहिलेल्या आहेत, बहुतांश कविता विविध मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत!

या संग्रहातील कविता सुसंस्कृत मनाचे हुंकार आहेत, एक शिस्तबद्ध सहजसुंदर, सुरेख शब्दकाळा असलेली ही कविता निश्चितच मोहात पाडते. कवयित्रीने आपल्या कवितेचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात सुंदर अभंग रचना आहेत.

कमलिनी पत्र कोरडे जलात

निर्लिप्त, स्वमग्न डोलतसे

या अभंग रचनेमागे कवयित्रीचे फार मोठे चिंतन आहे हे जाणवते, एकूणच काव्य रचनेत चिंतन, मनन, अभ्यासू वृत्ती, व्यासंग जाणवतो!

व्यासांची प्रतिमा उष्टावे जगात

ते महाभारत नित्य येथे ॥

जीवनातील सत्य उकलून दाखवणारे अनेक अभंग दाद घेऊन जातात.

स्वशोधाची, आत्मभान असलेली ही कविता आहे. स्री म्हणून जगताना आलेले अनुभव, क्वचित कुचंबणा,उपेक्षा खूप बारकाईन तिची लेखणी टिपते, तिने केलेल्या रचनांना  ती गझलसदृश म्हणते, ती कुठल्याही वादात अडकत नाही,

या ठिकाणी मला ख्यातनाम हिंदी कवी निरज यांचा कुणीतरी सांगितलेला किस्सा आठवला, ते गझल समीक्षकांना म्हणाले होते, “तुम्ही माझ्या रचनांवर काही टीका करा, त्या माझ्या गितिका आहेत. “

सृष्टी घेते बहुविध रूपे,मोहक कधी भेसूर

परी न लोपो अंतरीचा तो निर्मळ उमदा सूर

या सर्व कवितांमध्ये कवयित्रीने अंतरीचा निर्मळ उमदा सूर जपलेला आहे.अनेक रचना खूप मोहक आहेत, अगदी मनात रुंजी घालणा-या !

नकळत हासुनि पाहता तुझ्याकडे

वावडि इश्काची उठवतात लोक

किंवा 

हवे तसे सजून धजून, पुरव हौस स्वतःची

हाक येता सोडून सारे निघायला हवे

 या सर्व कवितांमधे आत्मचिंतन आहे, ही कविता प्रांजळ,प्रामाणिक आणि स्वच्छ आहे! या कवितेने स्वानंद स्वर जपलेला आहे.कवयित्रीने बंगाली भाषा आत्मसात केली,त्यात विशेष प्रावीण्यही मिळवले. मा.रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अभ्यास व अनुवाद केला आहे, सुखेशाची लेखणी चौफेर संचार करणारी आहे,या कवयित्रीला चांगल्या गोष्टींचा ध्यास आहे आणि  एकला चालो रे…..या उक्ती प्रमाणे ती आत्ममग्न राहून  हा ध्यास जपते आहे.

माझ्यावर मी टीका करणे आहे सोडून दिले

मीच स्वतःला कमी लेखणे आहे सोडून दिले

आजकालच्या जमान्यात प्रत्येकाची श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली दिसते, अत्यंत सामान्य वकुबाची माणसेही बढाचढाकर स्वतःच्या कार्य कर्तृत्वाची खोटी शेखी मिरवताना दिसतात तेव्हा खरोखर असा प्रश्न पडतो आपणच का स्वतःला इतकं कमी लेखतोय? विनयशील रहातोय? आपल्याकडे जे आहे ते स्वतःचं आहे, प्रांजळ आहे, निखळ आहे मग का स्वतःला कमी लेखतोय आपण?

 या संग्रहातील पुढील द्विपदी पहा–

भरभर किती बाई आवरु हा पसारा

चिडचिड अति होई कोंडला जीव कारा

अशी अप्रतिम रचना ती सहजपणे लिहून जाते.

तिस-या भागात संमिश्र कविता आहेत, तृणी या पादाकुलक वृत्तातील कवितेत मनोहर निसर्ग चित्र आहे, “रद्दी” ही कविता मला विशेष आवडली,यात प्रत्येक कवयित्री/लेखिकेचे  सनातन दुःख नेमकेपणाने आले आहे, प्रतिभा ही ईश्वरदत्त देणगी असलेल्या स्त्रीची उपेक्षा…श्रेय न देण्याची वृत्ती हे सार्वत्रिक सत्य आहे, ” ” श्रेयाचा लाभ न होणं,या सारखा दुसरा शाप नाही ” असं म्हटलं जातं ते  “रद्दी” या कवितेत दिसतं.

“तिनोळी” या नाजूक काव्य प्रकारातल्या काही कणिका–

माघाची चाहूल

खोडांवर खळबळ

आली की पानगळ

*****

वाढतं वय

ओसरतं सौंदर्य

मनभर औदार्य

या सर्व कवितांमध्ये विविधता आहे,जीवनातील महत्वपूर्ण असे विषय या कवितांमधे आले आहेत.

सावळ मेघांनी कोंदले आभाळ

आता रानोमाळ जलोत्सव

ही कवयित्री निसर्गावर नितांत प्रेम करते हे तिच्या अनेक कवितांमधून जाणवते!

स्त्रीपुरूष समानतेची तिची मागणी सौम्य शब्दात ती व्यक्त करते.

सद्यस्थितीवर भाष्य करणारी दोन विडंबन गीते अंतर्मुख करणारी आहेत.  “जाणिवांच्या परिघात” दखल घेण्याजोगा, वाचनीय, आरस्पानी कविता संग्रह आहे. या कवितांमधून कवयित्रीच्या प्रगल्भ जाणिवा जाणवत राहतात!हा काव्यसंग्रह अनाहत प्रकाशनाची सुंदर पुस्तक निर्मिती आहे.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ जंगलवाट ….सौ. सावित्री जगदाळे ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ जंगलवाट….सौ. सावित्री जगदाळे ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

सौ. सावित्री जगदाळे

जंगलवाट – सौ सावित्री जगदाळे

झाडं, प्राणी आणि पक्षांनी जंगल गजबजलेलं असतं. त्या जगलाचं माणसाशी नातं असतं. माणसाला जंगलाची ओढ असते. लेखिकेनं मुलांच्या निरागसतेतून जंगल आणि माणसाचं नातं उलगडलेलं आहे. मोविची साल, बारशिंग, मखर, हेडशिंग, मोडशिंग, रायगोंदण्या, कडूशेंदण्या, होले, चित्तर, धपचिड्या, कुंभारकड्या आणि भूक लाडू या सारखे शब्द जंगलाची भाषा सांगतात. जंगलाशी मैत्री केली तर आपल्याला जंगलाची भाषा कळू लागते, आपण जंगलाशी एकरूप होऊन जातो. जंगलातील ही वाट आपल्याला नक्कीच निसर्गात घेऊन जाते. आपण या वाटेने चालत जाऊ!

‘जंगलवाट’  किशोर वयाच्या मुलांना नक्कीच आवडेल. मुलांचे भावविश्व रुंद होऊन निसर्गाशी नातं घट्ट होईल.

सावित्री जगदाळेंच्या जंगलवाटेला वाचताना प्रत्यक्षात जंगलातील निरागस मायाळू लेकरं – माणसं, पशू – पक्षी, अलगद आपल्याला आपलसं करून घेतात . पोहे कमी भरले म्हणून एवढया छोट्याशा कारणासाठी भावानं बहिणीला मारण्याची हळहळ, माणसाच्या हातांनी होणाऱ्या निसर्गाच्या नुकसानाची तळमळ, कुत्र्याप्रमाणे माणसालाही जिभेचा वापर औषध म्हणून  करता आला तर हा आशावाद नक्कीच वाचनिय, संस्कारक्षम व निसर्गाकडे घेवून जाणारा आहे. निसर्ग शब्द, नाते, भावना व आत्मियता समृद्ध करणारी ही जंगलवाट. आपल्या लेकरांनी एकदा नजरेखालून घालायला हवीच !

०००

जंगलवाट – कुमार कादंबरी

लेखिका- सावित्री जगदाळे

किंमत – १०० / – रू .

पृष्ठ – ८७

प्रकाशक – डॉ. कल्पना भगत, गाथा कॉग्निशन

*Gatha Cognition ने ‘किशोर’ वयीन मुलांसाठी पुस्तकमाला सुरु केली आहे.

किंमत – १००/- रुपये (टपाल खर्च वेगळा)

सदर पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी डॉ. कल्पना भगत (9511896365) यांच्याशी संपर्क साधावा.

पुस्तक या लिंक/संकेतस्थळावरून सुद्धा खरेदी करता येईल. >>  गाथा कॉग्निशन 

तसेच ग्रंथांच्या रु. १५००/- पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी COD(Cash on delivery) ची सुविधा उपलब्ध आहे.

 

लेखिका – सौ. सावित्री जगदाळे

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सुनृत” – लेखिका सुश्री ऊषा ढगे ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सुनृत” – लेखिका सुश्री ऊषा ढगे ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव… सुनृत

कवीयत्री… सुश्री ऊषा ढगे.

प्रकाशक… यशोदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती… १२सप्टेंबर २०२१

पृष्ठे.. ६४

मूल्य.. रु.१३०/—

परिचय… राधिका भांडारकर.

सुश्री उषा ढगे

सुनृत हा उषा ढगे यांचा दुसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या  पहिल्या  “पोटनाळ” या काव्यसंग्रहातला काव्यानंद घेतल्यानंतर! हा दुसरा संग्रहही वाचण्याची उत्सुकता  वाढलेलीच होती.

या संग्रहात त्यांच्या चाळीस कविता आहेत.

मला नेहमी असं वाटतं,कविता ही कुठला ठराविक विषय घेउन निर्माण होत नसते.

जेव्हां भवताल आणि मन यांचं कुठेतरी नकळत नातं जुळतं आणि त्या स्पंदनातून शब्द अवतरतात तेव्हां कवितेचा जन्म होतो.शब्दांनंतर विषय ऊमटतो.उषाताईंच्या या कविता वाचताना हे प्रकर्षाने जाणवतं.त्यांच्या प्रत्येक कवितेत टिपणं आहे. वेचणं आहे. स्पंदनं आहेत. हास्य आहे, हुंकार आहेत. उपहास आहे, तशी स्वीकृतीही आहे. प्रश्न आहेत अन् उत्तरंही आहेत.

वास्तविक उषाताई यांचा मूळ पिंड चित्रकाराचां.

मुंबईच्या प्रसिद्ध, नामांकित कला महाविद्यालयात (J J School of Arts) त्यांनी कलाशिक्षण घेउन पदवी प्राप्त केली.

रंग रेषेत रमणार्‍या उषाताई,शब्द प्रवाहातही सहजपणे विहार करु लागल्या. रंग रेषा आणि शब्द यांची एक लयबद्धता ,त्यांच्या प्रत्येक कवितेत जाणवते.चित्रकार हा अंतस्थ कवी असतो हे उषाताईंनीसिद्ध केले आहे.

काव्य हे, हलकं फुलकं तरलच असतं,असं नव्हे.

ते भेदकही असतं .बोचणारंही असतं.

निसर्गातील तरलता टिपतानाच, उषाताईंच्या काव्यात कधीकधी भेदकताही जाणवते. जसा गारवा, तसा तप्तपणाही जाणवतो. आणि या दोन्ही स्तरांवर उषाताईंचं काव्य हे, अस्सल वाटतं. खरं वाटतं.

परिमळ ही या संग्रहातील पहिलीच कविता.

रंगी बेरंगी, सुगंधी फुलांची ओंजळ भरलेली आहे.मन तृषार्त आहे. पण तरीही शेवटच्या चार पंक्तीत ,त्यांनी सहजपणे ,एक प्रकारची व्याकुळता व्यक्त केली आहे.त्या  म्हणतात,

शब्दातीत होते सारे।

मग मन होई विव्हळ।

सुगंधामधूनी पाठव ना रे।

एक संदेश स्नेहाळ।।

याओळींत असलेली कसलीतरी अनामिक प्रतीक्षा मनाला भिडते….जाणवते.

पृच्छा या कवितेत एक प्रश्न ,एक सहज शंका आहे.काट्याकुट्यात जगणारे ,फाटक्या  ,तोकड्या ,अपुर्‍या कपड्यातले भटके भिल्ल ,अपुर्‍या कपड्यात ,फॅशनच्या नावाखाली हिंडणारी शहरी मुले पाहून अचंबीत होतात.आणि सहजपणे म्हणतात,

शोभा दावूनी लाजशरम

अशी बाजूस ठेवूनी

वावरती विचीत्र वंगाळ

भलतेच लेउनी…..

पहाडातले ,जंगलातले आदीवासी आणि शहरातली ही सो काॅल्ड फॅशनेबल माणसे…

दोघंही अपुर्‍या वस्त्रांत..पण एक नैसर्गिक आणि दुसरे मात्र बाजारी…हे वास्तव काव्यरचनेत चपखल मांडलंय…

त्यांच्या कवितेत ,हिरवी धरती आहे.हसरा नाचरा श्रावण आहे.मृद्गंध आहे.मिस्कील पाउस आहे.गाणारे पक्षी आहेत.बागडणारी फुलपांखरे आहेत.आणि या सर्वांमधे वाहणारं एक सुंदर कवीमन आहे.

कधी कधी त्यांच्या  काव्यात आत्म संवाद जाणवतो.त्यांना सतावणारे अनेक प्रश्न त्या सहजपणे काव्यरुपात मांडतात.

वास्तव सत्यात की

असत्य जगात

कां बरं अशी मी

व्याज संभ्रमात….

कधी म्हणतात,

आज असे मुक्त मी

निवृत्त मी निवृत्त मी

माझ्याच जीवनाचे

वाचेन एक मोठे

वृत्त मी….

तर कधी त्या बेफिकीर ,कलंदर होतात..उपहासाने म्हणतात,

काय घडेल ..होईल काय उद्याला

माहीत नाही ..मग फिकीर कशाला….??

खुशीत आपुला ,माझा मीच भला…

सुनृत या शीर्षक कवितेत निसर्गाची भावलहर आहे.लाजणं आहे .शृंगार आहे.आणि निर्मीतीचं सत्यही आहे.

पर्णपाचू पालवी ही

भारावून गेली

उन्मुक्त भावनांना

तरुण वेल सुखावली…

पाने ती ऋतुगान गाती…

सुमन उरी गोंजारुन घेई,,.

गाली निर्झर हसली…

अशा काव्यपंक्ती वाचकाला काव्यानंद देतात…

सुंदर प्रपाताखाली नहावतात…

काही कवितांमधे सहज दिलेले संदेशही आहेत…

कशास रे उणे दुणे

देउनी सकळास दूषणे

नको करुस हेवादावा

मत्सर अन् दुस्वास….

कोल्ड वाॅर सारखी हलकी फुलकी हसवणारी घराघरातील कविताही त्या अगदी सहजपणे सादर करतात…

बायकोला हवा असतो

नवानवा नेटका संसार

नवरा म्हणतो

कुठून देउ सारं

अजुन झालाच नाही

बघ की गं माझा पगार…

शेवटच्या बिंबीतया कवितेत,त्या म्हणतात,

सदृष्य सारं समेटलेलं

यादगारीचा दर्पण

प्रांजल संवेदनेचे प्रतिबिंब

चिंब उर्मीचे अंतरंग..

अशा विवीध भावनांच्या,रंगांच्या,नादाच्या,लयीच्या शब्दरेषांच्या काव्यपंक्ती वाचताना,सहजच कवीयत्रीच्या आयुष्याचा एक पथ सहज उलगडून जातो.ज्या पथावर त्या थिरकल्या, चालल्या ,थबकल्या,कधी ऐटीत,कधी कोसळत, कधी मोडत पण जगण्याचा एक सकारात्मक धागा पकडत….म्हणूनच या कविता मनात उलगडत  तात…डुबवतात.भारावून टाकतात.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वत: उषा ढगे यांनीच चित्रीत केले आहे.आणि ते अतिशय बोलके आहे.उंच चढणारी वेल,विखुरलेली फुले पाने आणि एक थेंब..हा थेंब जीवनाचे प्रतीक आहे.

तो पाण्याचाही आहे..दंवाचा आहे..आणि अश्रुंचाही आहे..

सुनृत हे शीर्षक एक नवा, अप्रचलीत शब्द नवा अर्थ घेउन येतो. मनाच्या डोहातून वाहत आलेलं सत्य, सुंदर शब्दांतून हलकेच अनावृत केलं… सुरेख!!! कवीयत्रीच्या कल्पकतेला मनापासून दाद  द्यावीशी वाटते..

या चाळीस कविता वाचताना मला दिसलं ते एक पाखरु.. त्यानं आकाशातून धरती टिपली ,अन् धरतीवरुन आकाशही कवेत घेतलं….

कवीवर्य अरुण पुराणिक यांची प्रस्तावना लाभलेला,यशोदीप प्रकाशनाने सौंदर्य जपत सादर केतेला हा उषा ढगे यांचा सुनृत हा काव्यसंग्रह केवळ आनंद देणारा,रिझवणारा आणि तितकाच विचार करायला लावणारा…

उषाताई मनापासून अभिनंदन आणि पुढील काव्य प्रवासा साठी शुभेच्छा!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ –  सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ –  सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई 

23 जानेवारी – जीवनरंग   (एक आस्वादन)

आज सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांच्या जीवनरंग या ललित, वैचारिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यातील काही लेख वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने लिहिले गेले आहेत. त्या त्या लेखांखाली तसा तपशील लेखिकेने नोंदविलेला आहे. यापैकी बरेच लेख यापूर्वी ई-अभिव्यक्तीवरही प्रसारीत झाले आहेत. आता हे सगळे लेखन एकत्रितपणे बघताना लेखिकेइतकाच वाचकालाही आनंद होत आहे.

कोणत्याही ‘शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी’  गणेशाचे स्मरण, स्तवन, पूजन करण्याची आपली परंपरा आहे. इथेही लेखिकेने पहिला लेख श्री गणेशावरच लिहिला आहे, ‘मला भावलेला गणेश.

गणेशाच्या सूक्ष्म रूपाविषयी त्या लिहितात, ‘निसर्गाची नियमबद्धता टिकवणारा नियंता,  तोच गणेश. पंचमहाभूतांची शक्ती म्हणजे गणेश. गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता, ती शक्ती म्हणजे गणेश. ‘त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम’ असं संस्कृत अवतरणही त्या देतात.  उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे गणेश.

हे झालं, गणेशाचं सूक्ष्म रूप. गणेशोत्सवाचे वेळी आपण  गणपती आणून पूजा-अर्चा करतो, ते याचं स्थूल रूप आहे. या पार्थीव गणपतीची पूजा करताना, निसर्गाचा र्‍हास होऊ नये, म्हणून काळाजी घ्यायला हवी असं त्या सांगतात आपल्याला गणेशाचं सूक्ष्म रूपच भावतं असंही सांगत त्या लेख संपवतात.

पुष्पाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्या त्या विषयाची अद्ययावत माहिती त्या लेखात देतात. पर्यावरणआणि मी  असा शब्द उच्चारताना  पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते त्यांच्या मनापुढे आहेत. यात सातत्याने प्रदूषण होत चाललाय, याची त्यांना खंत आहे. या प्रदूषणापुढे जाऊन त्या म्हणतात, अंतराळात, याने, रॉकेटस यांच्या स्फोटातून येणारी धूळ, धूर, वाफ, आवाज सगळं  भयावह होत चाललय.. प्रदूषणावर उपाय योजना सांगताना, त्या म्हणतात, ‘वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. यासंबंधी त्या आणखी लिहितात, सोमवल्लीसारखी प्रचंड ऊर्जा देणारी वनस्पती आज केरळ आणि हिमालयातच फक्त 50 किलो . उरली आहे. प्रदूषणाचा विचार करताना, त्या पुढे लिहितात, या पंच महाशक्तींबरोबर माणसाचा मन ,बुद्धी, अहंकार हेही प्रदूषित होत चालले आहेत.

वटवृक्षाची सावली या पुढच्या लेखात त्या लिहितात, कीटक, पक्षी, प्राणी, माणसं यांना आधार देणार्‍या, शांत, गार सावली देणार्‍या वटवृक्षाचं जतन करायला हवं. मग ती आज या वृक्षाचं जतन केलेली ठिकाणे  सांगते. ‘शिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली इथे अडीच एकरात वटवृक्ष पसरला आहे. कोलकत्याला ‘शिवफूट बोटनिकल गार्डन’ मधल्या वटवृक्षाचा पसारा एवढा आहे की त्याच्या छायेत चार ते पाच हजार लोक बसू शकतात.त्याचे वय 350 वर्षे आहे.  असे वृक्ष जपायला हवे. ज्यांनी ते जपले, त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.

अखंड सावधपण हे लेखाचे नाव वाचल्यावर वाटतं, माणसाने अखंड सावध का असाव? कसं असावं  याबद्दल  लेखिकेला काही सांगायचं असावं, पण तसं आजिबात नाही, अगदी लहान लहान कीटकांपासून मोठ-मोठे पशू जगताना सावधगिरी कशी बाळगतात, याचे वर्णन आहे. सहवासातुनी जीवन घडते, या लेखातही, त्यांच्या घरातल्या कोंबड्या, बोके, कुत्री , पोपट इत्यादींच्या सहवासाविषयी लिहिले आहे. त्यांच्या आठवणींविषयी लिहिले आहे, ‘’माणुसकीचे व्रत या लेखात त्यांनी म्हंटले आहे, ‘जीवसेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्व लक्षात घेऊन अनेक संस्था सेवा करीत आहेत. त्या संस्थांना तीर्थक्षेत्र, स्वयंसेवकाला तीर्थरूप आणि त्यांच्या हातून घडणारी सेवा हे तीर्थकर्म असं म्हणायला काय हरकत आहे? असं म्हणत, बेवारशी प्राणी, पक्षी  यांची काळजी घेणार्‍या ब्लू क्रॉस’, मुंबईची S. P. C.M. (सोसायटी फॉर प्रिव्हेंशान ऑफ कृएल्टी टू अ‍ॅनिमल), इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटी, राहत या संस्थांची महिती दिलीय. व काही काही प्राण्यांची माहिती देऊन, त्यांना तिथे कसा आसरा मिळाला, ते संगीतलय. प्रारब्ध’मधे मिल्ट्रीमध्ये सामान वाहणार्‍या पेडोंगी खेचराची माहिती येते. पाकिस्तानने या खेचरासहित काही खेचरांना पळवून नेलं. संधी मिळताच ते खेचर पाठीवरच्या सामनासहित, ज्यात बॉंबगोळे, माशिनगन  इ. साहित्य होतं, त्याच्यासकट भारतीय हद्दीत आलं. त्याचा सत्कार होऊन त्याचं नाव गिनीज बुकामध्ये नोंदलं गेलं. ही सगळी माहिती दिल्यावर आपणही एका जखमी, लंगडणार्‍या गाढवावर कसे उपचार केले. हे सांगते. दत्तक विधान या लेखातही बंड्या आणि गुंडी या कुत्र्याच्या पिलांचे दत्तक विधान कसे झाले, ही माहिती येते ‘ लेखिकेला कुत्रा, मंजर, घोडा, गाढव इ. प्राण्यांबद्दल ,लळा, आपुलकी असल्याने, त्यांच्यावरचे अनेक लेख पुस्तकात आहेत.

सामाजिक समरसताया लेखात टेलिफोन बुथ असल्यामुळे  फोन करायला येणार्‍यांशी थोडं-फार बोलून त्यांची सुखदु:ख  समजून घेऊन, त्यांना सहानुभूती दाखवल्यामुळे, तसंच त्यांच्या. आनंदात सहभागी झाल्यामुळे सामाजिक समरसतेचा सुंदर अनुभव कसा आला, त्याचे वर्णन केले आहे.

वनौषधी संरक्षण: एक आव्हान आणि उपाय या लेखात एक पुराणकथा येते. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना निरुपयोगी वनस्पती आणायाला सांगतात. एक जण कुठलीच वनस्पती आणत नाही. ऋषी त्यालाच शाबासकी देतात आणि सांगतात, जगात निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. आहेत त्या वनौषधींचं जतन केलं पाहिजे व वेगवेगळ्या वनौषधींची लागवड करायला प्रोत्साहनही दिलं पाहिजे.

याशिवाय नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे , विवेकानंद स्थापित रामकृष्ण  मिशनचे ऐतिहासिक कार्य, मराठीच बोलू कौतुके इ. लेखही अगदी वाचनीय झाले आहेत.

सर्वांनी एकदा तरी वाचून बघावे, असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्याने लेखिकेबद्दलेच्या अपेक्षा अधीक उंचावल्या आहेत. 

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares