मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – अष्टदीप 

लेखक – श्री. विश्वास देशपांडे,

प्रथम आवृत्ती – जुलै २०२२

एकूण पृष्ठ 300

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

या पुस्तकात आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध लेखकाने घेतला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री प्रथमेश नाझरकर यांनी केले आहे ते अत्यंत समर्पक व आकर्षक आहे. ते बघितल्यावर लहानपणीचे थोरांची ओळख व लहान पुस्तकांची चरित्रमाला आठवते. पण या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती समजते. लेखकाची भाषाशैली सोपी, सरळ, सुटसुटीत व ओघवती आणि आबालवृद्ध सर्वांना आकलनास अत्यंत सोपी आहे. ती वाचकांना आपलेसे करणारी आहे. वाचक त्यात रंगून जातात.

 

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आठ भारतरत्नांची नावे त्यांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ठयांसह दिसतात.

त्या नंतर आपण लेखकाचे मनोगत वाचू शकतो. खरे तर बरेचदा मनोगत, प्रस्तावना वाचले जात नाही. परंतु मनोगताची सुरुवात ” आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे “. हे वाक्य पुढचे मनोगत वाचण्याची उत्सुकता वाढवते. हे मनोगत काही संस्कार देते व लेखकाच्या वाचन, लेखन याचा प्रेरणास्त्रोत सांगते.

अष्ट म्हणजे आठ. या आठ महान व्यक्तिंनी दिव्याप्रमाणे उजळून, वाती प्रमाणे जळून निस्वार्थीपणे भारताला उजळून प्रकाशमान करून टाकले. लेखकाच्या भाषेत सांगायचे तर, ‘या सर्वांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. किंवा ते निराश झाले नाहीत’. हे वर्णन करताना पुढील समर्पक काव्यपंक्ती योजल्या आहेत. “आली जरी कष्टदशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर। त्यामुळे हे मनोगत वास्तव व रंजक झाले आहे.

हे पुस्तक म्हणजे फक्त जन्म, मृत्यू व त्रोटक कार्य सांगणारे साधारण चरित्र किंवा निबंध नाही. तर आठ भारतरत्नांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यात आपले विचार जोडून व्यक्तिंकडून वाचकांनी काय घ्यावे, त्यांचे आदर्श कसे रूजवावेत हे सगळे सहज सांगावे अशा ओघवत्या शैलीत सुचवले आहे. लेखकाची शब्द क्षमता, लेखणी सामर्थ बघून ते ‘सिद्धहस्त’ लेखक अहेत हे जाणवते. या आठ भारत रत्नांना जी अर्थपूर्ण विशेषणे वापरली आहेत त्यातून हे लक्षात येते.

मनोगता नंतर ‘प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तक’ हे पुस्तकाविषयी विशेष माहिती देणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख, लेखक व माजी संमेलनाध्यक्ष यांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे मनोगत अतिशय वाचनीय व पुस्तकाचे यथार्थ महत्व विशद करणारे आहे.

या नंतर आपल्या समोर अतिशय महत्वाची माहिती सांगणारा लेख येतो. तो म्हणजे ‘ भारतरत्न पुरस्काराविषयी थोडेसे. ‘ हे सगळे लेख मुख्य पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतात. व उत्सुकता वाढवतात. यात प्रत्येक व्यक्तिचे नाव त्यांच्या मुख्य वैशिष्ठयासह वाचायला मिळते. प्रथम आपल्या भेटीला येतात – निश्चयाचा महामेरु महर्षी धोंडो केशव कर्वे.

लेखाचे नाव वाचताच लक्षात येते, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अचल निश्चय असणारे व ठाम ध्येय ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व. त्यांनी विधवांचे पुनरुत्थान करून व स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना जगात वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. या काळात समाजाचा झंझावातरूपी विरोध सहन करून हे कार्य करणे, या साठी ठाम निश्चयाचा अचल महामेरूच पाहिजे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु झालेली छोटी संस्था आज मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत होऊन अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना समाजात ठामपणे उभे करत आहे. त्यांचे हे कार्य लेखकाने इतके प्रभावीपणे मांडले आहे, की त्या काळातील परिस्थतीची वास्तवता लक्षात येते आणि आपण नतमस्तक होतो.

या नंतर बालपणीच देशाचा विचार करणारे, हित जपणारे द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया यांचे चरित्र समोर येते. यांना लहानपणी मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करावे लागले. पण हुशारीच्या आड कोणत्याही गोष्टी येत नाहीत. याच बालवयात धबधबा बघताना त्यांची प्रतिक्रिया इतर मुलांप्रमाणे नव्हती. तर या द्रष्ट्या बालकाच्या मनात असा विचार होता, “केवढा हा पाण्याचा व शक्तीचा अपव्यय, याचा काही उपयोग नाही का करता येणार? मोठा झाल्यावर मी नक्कीच काहीतरी करणार, ” आणि हाच विचार त्यांनी मोठेपणी अंमलात आणला. व आपल्या कार्य कर्तृत्वाने पाणी, बंधारे, कालवे यावर प्रयोग व संशोधन केले. जे आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत. आणि त्यांना काही पर्याय नाहीत. त्यांची शिस्त, वक्तशीरपणा विविध कार्य, त्यांच्या काही इमारती, वृंदावन गार्डन या विषयी अत्यंत आदरपूर्वक लिहीले आहे.

पुढे आपण भेटतो, ते भारत एकसंध करण्याच्या कामी अत्यंत मोलाची कामगिरी करणारे- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना. यांच्या कार्याचा व लोहपुरुष या विशेषणाचा अत्यंत सखोल अभ्यास करून कार्यपट समोर ठेवला आहे. ५६५ संस्थाने किती प्रयत्न पूर्वक आपल्या बुध्दिमत्तेने एका छताखाली आणली व त्या साठी काय काय करावे लागले, याचे अगदी बारकाईने वर्णन वाचायला मिळते. म्हणूनच ते भारताचे ‘लोहपुरूष’ या नावाने ओळखले जातात. भारताची एकता व अखंडता या साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. हे सगळे वाचताना या लोहपुरुषाचे प्रयत्न, विचार यांचे समग्र दर्शन घडते. व हे व्यक्तिमत्व नसते तर काय घडले असते या विचाराने आपला थरकाप उडतो. हे सगळे वाचताना आपण किचकट इतिहास वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही. यातच लेखकाच्या लेखणीचे व अवघड विषय सोपा करून सांगण्याचे कसब लक्षात येते.

द्रष्टा उद्‌योगपती जे आर डी टाटा यांचे वर्णन करताना लेखक ‘ ओबड धोबड दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर ‘ असे शब्द वापरतात. भारतात साखरेप्रमाणे विरघळून जाणे इथपासून टाटांचे खरे देशप्रेम व कार्य याची माहिती मिळते. यांचे चरित्र म्हणजे रत्नांची खाणच! असे वर्णन लेखक करतात. द्रष्टा उद्योगपती आपल्याला सोदाहरण वाचायला मिळतो. त्याच बरोबर सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर, पारख असणारा, अनेक उद्‌योगांची टाटा समूहात भर घालणारा, माणसांचे गुण हेरुन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा माणूस हळवा व कुटुंबवत्सल होता हे या लेखातून समजते.

यानंतर आपण भेटतो अशा व्यक्तिला, ज्यांची घोषणा लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘जय जवान जय किसान ‘ ते म्हणजे निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी रहाणी, उच्च विचार सरणी असलेला नेता) लाल बहादूर शास्त्री. यांचे जीवन समजणे व समजून घेणे आणि अंमलात आणणे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. परंतू लेखकाने अत्यंत सोप्या नेमक्या व नेटक्या शब्दात सांगीतले आहे. १९४२ ची चळवळ त्यांचा तुरुंगवास, घरची साधी रहाणी, चीनचा विश्वासघात, भारत नेपाळ संबंधात फूट, हजरतबल प्रकरण, रेल्वे अपघात असे अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले. पण या सर्वांना समर्थपणे तोंड कसे दिले. व त्यातून त्यांच्या निश्चयी स्वभावाची व उच्च कर्तृत्वाची ओळख अतिशय आदर व कौतुकाने करून दिली आहे.

अजातशत्रू नेता अटलबिहारी वाजपेयी अगदी उचित ‘विशेषण योजून या भारतरत्नाची ओळख करुन दिली आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याच कवितेच्या ओळींमधून सांगीतल्या आहेत. ‘यमुना तट, टीले रेतीले, माँ के मुँह में रामायण के दोहे – चौपाई रस घोले।’

त्यांचे ग्वाल्हेरचे शिक्षण या पासून ते त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांच्या घरी जाऊन दिलेल्या सर्वोच्च पुरस्कारा पर्यंत लेखक आपल्याला प्रवास घडवतात. हे सगळे लेखकाच्या अनोख्या शैलीत पुस्तकात वाचणे अधिक योग्य ठरेल.

या नंतर आपल्या समोर येते गान कोकीळा, भारताची शान आनंदघन लता मंगेशकर सर्वच भारतीयांना जिचा अभिमान आहे. जिच्या सुरांनी सर्वावर मोहीनी घातली आहे. जगभरात हा सूर निनादतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी ऐकू येतो आणि जवळीक साधतो असा सूरी जणू या हारातील ‘तन्मणी! या स्वरलतेचे बालपणी पासूनचे टिपलेले सुंदर बारकावे व त्यातून घडलेले संस्कार खूपच वाचनीय आहेत. लता नामक महावटवृक्षाचा एकंदर जीवन प्रवास मांडणे म्हणजे ‘शिवधनुष्य पेलणे आहे. पण लेखकाने ते आपल्या लेखणीने समर्थपणे पेलले आहे. त्यांची सांगीतीक कारकिर्द अतिशय सुंदर व मनोवेधक पध्दतीने उलगडून दाखवली आहे. सर्व बारकावे वाचताना लेखक दर्दी व संगीतप्रेमी आहे, हे लक्षात येते. सदर पुस्तकातील जास्त पाने ‘लतागान’ गुणगुणत आहेत असे जाणवते. तिच्या गाण्याचे रसग्रहण करताना ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ…. ‘ या अभंगाचा आधार घेऊन लता नामक स्वरकमलाकडे रसिक श्रोते भ्रमराप्रमाणे कसे आकर्षित होतात ते सांगीतले आहे. या स्वरसाम्राज्ञीला शेवटी भा. रा. तांबे यांच्या शब्दात भावपूर्ण श्रध्दांजली वाहतात.

या पुस्तकात शेवटी आपण भेटतो ते उज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना. त्यांचे कष्टमय बालपण, निःस्वार्थीपणे केलेली देशसेवा, त्यांचे विद्यार्थी प्रेम, त्यांची रुद्रवीणा वाजवण्याची आवड. त्यांनी लिहिलेली प्रेरणादायी पुस्तके हे सर्व बारकावे वाचायला मिळतात. त्यांची अपार विज्ञाननिष्ठा सर्वपरिचित आहे. शिवाय ते दररोज कुराण व भगवतगीता यांचे पारायण करतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या कार्यशैली मुळे ते राष्ट्रपती कसे बनले हे सर्व लेखकाच्या दृष्टीतून व सिद्धहस्त लेखणीले लिहीलेले वाचणे अधिक योग्य आहे. सदर ‘अष्टदीप’ पुस्तक आपल्या मनात हे आठ दीप उजळवून आपल्याला प्रकाशमान करून टाकतात.

 या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनलचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मी हे पुस्तक का वाचले?

एकदा रेडिओवर संगीत व माहिती यावर आधारित कार्यक्रम ‘आनंदघन लता मंगेशकर’ ऐकला. त्यातील निवेदक अतिशय शांत, धीरगंभीर आवाजात दिदींची माहिती सांगत होते. व त्यांनी हजारो गाण्यातून निवडलेली प्रसंगानुरूप गाणी लावत होते. चौकशीअंती समजले की या कार्यक्रमाचे लेखन, सादरीकरण करणारे लेखक श्री विश्वास देशपांडे आहेत आणि हे लेखन त्यांच्या ‘अष्टदीप पुस्तकातील आहे. त्यानंतर हे पुस्तक उत्सुकतेने वाचले, तर अतिशय सुंदर चरित्रे समोर आली. याच लेखकांची दहा पुस्तके प्रकाशित झाली अहित. व त्यातील ललित लेखाचे व रामायण महत्व आणि व्याक्तिविशेष याचे सादरीकरण रेडिओवर होत असते. त्यांची सगळीच पुस्तके अत्यंत सकारात्मक, अभ्यासपूर्ण, निरीक्षणात्मक असतात. भाषा अत्यंत सोपी, सहज असते. त्यामुळे ती आपल्याला आपलीच वाटतात.

अशीच अजून पुस्तके यावीत आणि आपण सर्वांनी ती आवर्जुन वाचावित. या सदिच्छेसह धन्यवाद!

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षणसुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)” – कवयित्री- सुश्री आसावरी काकडे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆

सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)” – कवयित्री- सुश्री आसावरी काकडे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

पुस्तक – स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)

कवयित्री- आसावरी काकडे 

प्रकाशनवर्ष – 2006 

पृष्ठ संख्या -87

 मूल्य -100/

मराठी व हिंदीत कथा, कविता, ललितलेख, पुस्तक परीक्षणे लिहिणाऱ्या सिद्धहस्त अनुवादिका, तत्त्वचिंतक, भाष्यकार, लेखिका कवयित्री आसावरी काकडे यांचा मोठा लेखनप्रपंच आहे. त्यामधील “स्त्री असण्याचा अर्थ ” हा एक छोटा काव्यसंग्रह.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रस्थापित चौकट मोडून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या (स्त्रीसदृश्य) प्रतिकृतींचे पेंटिंग दिले आहे. त्या पुसट असंख्य रेखांमध्ये साध्यासुध्या जगणाऱ्या असंख्य स्त्रिया घडल्या आहेत. मलपृष्ठावर “स्त्री असणं म्हणजे” ही कविता दिली आहे. शीर्षक “स्त्री असण्याचा अर्थ” त्यातून उलगडून दाखवला आहे.

त्या लिहितात,

स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही.

 स्त्री असणं म्हणजे 

अखंड तेवती ठेवणं जिजीविषा,

 टिकून राहणं तुफानी वादळातही,

 जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश- रेखांश

 सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं.. सहवेदना.. प्रेम.. तितीक्षा. “

या प्रस्तुत काव्यसंग्रहात 21 कविता आहेत. सुरुवातीला “देता यावी प्रतिष्ठा” या कवितेत त्या उद्देश बोलून दाखवतात. स्त्रीचे दुःख वर्णन करताना त्या लिहितात,

” दुःखावर दुःख, दुःखापुढे दुःख,

 दुःखापाठी दुःख, चमकते. “

तिच्या या दुःखास ” भूकंप, महापूर, दुष्काळ, ढगफुटी, उल्कापात, दंगली, उन्हाळे पावसाळे, वादळ वारे इत्यादी उपमा दिल्या आहेत.

सर्वात श्रेष्ठ नाते- आईचे वर्णन करताना, सर्व काही सोसून ती आपले अस्तित्व वटवृक्षासारखे ठेवते हे सांगताना त्या लिहितात,

” वरचा विस्तार सांभाळण्यासाठी,

 मूळ घट्ट रोवून धरलीस,

 जीवाच्या आकांताने. ” 

शिकलेल्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,

” तरी अजूनही आई प्रश्न विचारला की मोडतात घर,

 ज्यांना आवरत नाही आतला आवेग, त्यांना पडावं लागतं घराबाहेर,

 त्यांची घरं मोडतात

 आणि त्यासाठी

 जबाबदार धरलं जातं त्यांनाच”.

या काव्यसंग्रहात अशा अनेक स्त्रिया भेटतात. स्वतःच्या स्वप्नांना बंदिस्त करून सर्वमान्य सुखाची कवाडे त्या उघडतात हे सांगताना त्या लिहितात,

” दर श्रावण मासात पूजेला एक व्रत जुन्या स्वप्नांच्या वरती रचायची एक वीट”.

एका क्षणी तिला पडलेली भूल नी त्यातून जन्मास आलेले मुल या वास्तवाचा स्वीकार करून जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,

” दिस उगवला नवा, स्वप्न नव्हते शेजारी,

 डोळे उघडले तेव्हा, पिस गळालेली सारी”.

नवऱ्याच्या अवगुणांमुळे त्याला सोडून स्वतःच्या मुलासहित संसार थाटणारी आणि मुलांमध्ये पुन्हा नवऱ्याचेच आलेले अवगुण सहन करणार्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,

” आकांताने सारे करतीच आहे,

टक्क जागी आहे, आत आत”.

 परिस्थितीशी झगडणाऱ्या स्त्रीचे वर्णन करताना त्या लिहितात,

बुडत्याचा पाय खोलातच जाई

 कुठे काठ नाही आधाराला “.

 स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या स्त्रियांसाठी त्या लिहितात,

कर्तव्याचे माप पुरे भरलेले,

 बाकी उरलेले तिचे तिला”.

प्रेमात फसवणूक झालेली, माहेर तुटलेली स्त्री जिद्दीने ठामपणे उभी राहते. व तिच्याकडे पुन्हा सारी नाती नव्याने परत येतात हे सांगताना त्या लिहितात

” सोसण्याचे झाले लकाकते सुख वळाले विन्मुख, जुने दुःख. “

लहान भावंडासाठी आई बनून जिने स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही ती मुले मोठी होऊन गेल्यानंतर तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी दोन मुलांच्या बाबांशी संसार थाटण्यासाठी घेतलेला निर्णय चित्रीत करताना त्या लिहितात,

पंख फुटता भावंडे गेली सोडुन घरटे मागे उरले उन्हात उभे आयुष्य एकटे, पुन्हा प्रसूतीवाचून तिची झाली आई, त्याला सार्थक म्हणू.. की संभ्रमात आहे बाई”.

नवऱ्या बायकोचे नाते तसेच ठेवून मुक्तपणे वेगवेगळं आयुष्य जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,

” मने जुळलेली त्यांची, छत नाही एक तरी,

 लय साधलेली छान, तारा तुटल्या तरी” 

समलिंगी विवाहातील समान अधिकार हा त्यांना ‘शकुनाचा क्षण’ वाटतो त्या लिहितात,

” कुणी ना दुय्यम कुणी ना मालक, दोघींचा फलक, दारावर. “

 संसाराचे दोर कापून माणुसकीने सर्वांना मदत करणार्या स्त्रीबद्दल तिच्या स्त्रित्वाचा अर्थ उलगडून दाखवताना लिहितात,

ओलांडले तिने बाईपण छोटे,

 मनही धाकटे पार केले. “

 शेवटी शीर्षकगीत लिहिताना, स्त्रीत्वाचा अर्थ सांगताना त्या लिहितात,

कुणी भांडले भांडले तरी उभ्या ताठ घट्ट धरूनी ठेवती जगण्याचा काठ”.

प्रस्तुत पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगताना मला असं वाटते कि आसावरी काकडे यांच्या कविता अनुभवातून, चिंतनातून व अभ्यासातून आलेल्या आहेत. यामध्ये अनेक छंद, वृत्तांचा, अलंकारांचा वापर करण्यात आला आहे. सर्वत्र स्त्रियांच्या अस्तित्वाची नवीन वाट शोधण्याची भावना अधोरेखित आहे. त्या समाजाभिमुख आहेत. स्त्रियांच्या वास्तवाचे भान, त्यातील सूक्ष्मता, त्यांची व्याप्ती व घुसमट त्यांना कळते. एक संवेदनशील कवयित्री व समाजाभिमुख स्त्री म्हणून त्यांचा परिचय आपल्याला होतो. यामधील पात्रे प्रातिनिधिक आहेत.

प्रस्तावनेत विद्या बाळ यांनी म्हटल्याप्रमाणे, “स्त्रीच्या धडपडीला डोळ्यात साठवून ते सहज पाझरताना त्याची कविता झाली आहे “. चौकट मोडून नव्या वाटा चोखाळणाऱ्या या स्त्रिया आपल्यालाही अंतर्मुख करतात. स्त्रीचा देह आहे म्हणून स्त्री आहे हा समज गळून पडतो.

कवयित्रीने स्त्री असण्याचा लावलेला अर्थ खोलवर समजून घेण्यासाठी हा काव्यसंग्रह नक्की वाचायला हवा…

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

मो 9921524501

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

प्रो. भारती जोगी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ काव्यसुधा (काव्यसंग्रह) – कवी : चिंतामणी ज. भिडे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

पुस्तक : काव्यसुधा (काव्यसंग्रह)

कवी : चिंतामणी ज. भिडे 

मुद्रक— आसावरी इंटरप्रायझेस, ठाणे.

मूल्य– ₹ १००/-

‘काव्य सुधा ‘ हा श्री. चिंतामणी ज. भिडे लिखित, काव्यसंग्रह माझ्या हाती आला तो आंतरजालाच्या माध्यमातून! एका समूहावर नेहमीच होणाऱ्या, एका खास बाजाच्या, वैशिष्ट्यपूर्ण लहेजातल्या, काव्य सुधा सिंचनाचा आनंद घेणारी मी! मला सतत तो सुधाघट काठोकाठ भरलेला बघण्याची इच्छा! आणि एक दिवस तो काव्यसुधा संग्रह, अचानक माझ्या हाती आला… तो ही हवेतून… स्पीड पोस्टाने (मारूत तूल्य वेगम् ) असाच! 

हा काव्यसंग्रह हाती आला. सवयीने आधी मुखपृष्ठावर नजर गेली. कारण मुखपृष्ठ आरसा असतं त्या-त्या साहित्य कृतीचा! माझ्या दृष्टीस पडलं ते एक सुंदर असं… पूर्ण विकसित, उन्मिलित झालेलं… कमल पुष्प! आणि शीर्षस्थानी ‘ काव्यसुधा ‘ हे शीर्षक, एकेरी अवतरण चिन्हांत, मोठ्या दिमाखात विराजमान झालेलं! 

वाटलं की… नक्कीच श्री. भिडे यांच्या मनातील विविध रंगी विचारांच्या पाकळ्या, त्यांच्या शब्दांतील, काव्य अमृताच्या सिंचनाने, अंग-प्रत्यंगाने उमलून आल्या असाव्यात. आणि मग त्याचाच हा अमृत कलश… काव्यसुधा!!

पुस्तकाच्या प्रस्तावनेला लाभलेला ; श्री. वामन देशपांडे यांचा शब्द स्पर्श अतिशय अभ्यास पूर्ण !! अर्वाचीन मराठी कवितेच्या आजवरच्या प्रवासाची वळणं थेट नव्या रूपापर्यंत आणून… चिंतामणी भिडे या कविच्या कविता लेखनाचं सुंदर रूप विशद करणारा!! तसेच… प्रा. डॉ. अनंत देशमुख यांचं… कवीच्या निवडक अशा, मनात ठसलेल्या, मनाला भिडलेल्या कवितांचं भाव भरलं असं अभिप्रायी मनोगत वाचायला मिळतं. तसेच प्रदीप गुजर यांचंही… भिडे यांच्या कवितेतले, मन तृप्त करणारे पैलू उलगडणारा अभिप्राय ही आस्वादायला मिळतो.

संग्रहाची… मलपृष्ठावरील पाठराखण केलीयं… श्री. प्रभाकर शंकर भिडे यांनी! ‘ अल्पाक्षर रमणीयता ‘ अगदी भिडेंच्या मैत्रीच्या रंगात रंगून, एकरंग झालीये जणू!! 

‘काव्यसुधा’ या काव्यसंग्रहात जवळपास ६५ कविता समाविष्ट आहेत. त्यात “फुल्ल कुसुमितं, द्रुमदल शोभिनिम्! ” हीच अनुभूती येते. कवीने रोजच्या जगण्यात, आसपासच्या जगतात, जे जे संवेदनशील मनाने आणि वृत्तीने बघितलं, अनुभवलं, जाणवलं, टिपलं… ते ते सगळं त्यांच्या कवितांमध्ये स्पष्ट, नितळ आणि पारदर्शीत्व घेऊन उमटलयं!

त्यांच्या कवितांमध्ये, राजकीय, सामाजिक, पौराणिक, राष्ट्रीय अशा विषयांवरील उपहासात्मक, उपरोधिक भाष्य, मातृभाषा प्रेम, यावरील तळमळीची व्यक्तता दिसून येते. त्या-त्या वेळी घडलेल्या, चर्चा रंगलेल्या, न्यूज चॅनेलचा टी. आर. पी. वाढविणा-या घटना, त्यावर कवीने केलेलं भाष्य अगदी… स्पष्ट, परखड! 

कवीच्या लेखन शैलीचं… अगदी खास, त्यांचंच म्हणावं लागेल, ज्यावर त्यांचीच नाममुद्रा ठसवावी… इतकं वैशिष्ट्यपूर्ण, वैशिष्ट्य… म्हणजे.. त्यांच्या कवितांची शीर्षके आणि श्लेषात्मक अनुभूती देणारे शब्द!! 

कवी ते-ते शब्द () कंसात विराजमान करून, त्यांचा योग्य तो अर्थ लावून, यथोचित सार्थकता प्रदान करण्याचं स्वातंत्र्य मात्र, सुजाण, समजदार वाचकांवर सोपवून टाकतात. ही सूचकता भिडेजींच्या कवितेत, ठायीं-ठायी आढळते.

ऑक्टोबर हीट ही पहिलीच कविता… मी टू च्या चर्चेनं तापलेल्या वातावरणाची धग थेट पोहोचवणारी. आणि… सहावं इंद्रिय जागृत असलेल्यांना विचारलेल्या प्रश्नातल्या उपरोधाने बोच ही अगदी जाणवणारी….

 “शोषण झालं हे कळायला,

 त्यांना इतकी वर्षे लागली?… ! “

मतदार ( राजा )? या रचनेतली एका संवेदनशील मनाची तळमळ बघा…

 ” सत्तेची आसुरी लालसा, पैशांचा सारा खेळ,.. शेतक-यांचे अश्रू पुसायला आहे कुणाला वेळ? “

बळी (राजा) ची हार या कवितेतही, शेतकरी बांधवांविषयीचा कळवळा जाणवलेल्या ओळी…

 “अनीती, अधर्म, कपटाने

 पुन्हा अभिमन्यु ला घेरला। 

 जिंकले गलिच्छ राजकारण

 गरीब शेतकरी मात्र हरला. “

कोविड काळातील सत्य घटनेवर आधारित रचना, ख-या समर्पणाची किंमत न ओळखणा-या पत्रकारितेवर उपरोध किती बेधडकपणे बघा…

 “रुग्णशय्या आपुली देती एका गरजू तरूणाला,

वयोवृद्ध ते नारायणराव, कवटाळिती मृत्यूला! 

समर्पणाच्या भावनेची मांडलिकांना काय महती? 

मिंधी झाली पत्रकारिता, अनीती हीच असे नीती! “

कवीने … उपेक्षित, सपूत… यांसारख्या रचनांतून, लालबहादूर शास्त्रीजींच्या कार्याचा गौरव करून, ते सपूत असूनही, एकाच तारखेला जन्मले असूनही, महात्मा गांधींच्या तुलनेत कसे दुर्लक्षित, उपेक्षित राहिले याची खंत ही व्यक्त केली आहे…

 जन्मले दोघे एकाच दिवशी,

 मृत्यू ही तितकाच अनपेक्षित। 

 आजही जयजयकार एकाचा

 दुसरे कायम उपेक्षित|

देवपण या कवितेत तर… एक काळा दगड आणि विठ्ठल यांत संवाद दाखवून…

 “एकदा एक दगड काळा, गेला विठ्ठलाच्या देवळात…

म्हणे,

” अरे विठ्ठला, दोघे आपण काळे कुठे आहे फरक? 

मला बी उभं रहायचयं इथे, जरा तू सरक! “

मग पुढे काय झाले, ते कवितेत वाचण्यातंच खरा आनंद! आणि मग मिळालेला बोध… “सोसल्याविना टाकीचे घाव, कधी मिळतं का देवपण! 

काही रचनांमध्ये कवीची गाव, गावपण, बारा बलुतेदार, यांविषयीची आस्था, कळकळ, हळूहळू ओस पडत गेलेली गावं, याचं ही अतिशय भावपूर्ण चित्रण बघायला मिळतं.

 ” गावाचं ‘गावपण’ गेलं,

 ‘हायवे’ वरून पुढे,

 पहिली, दुसरी पिढी

 आता मनातच कुढे. “

तसंच… बारा बलुतं या रचनेत.. कालौघात गडप होत चाललेल्या बारा बलुतेदारांतील, सुतार, लोहार, न्हावी, मोची, शिंपी… यांच्या भेटीची कल्पना करून, त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेत… आपल्या खास… शाब्दिक कोटी करण्याच्या शैलीचा साज चढवून, जो एक वेगळाच बाज आणलायं ना, तो खरंच वाचनीय!

बघा की… सुतार म्हणतोय…

 थोडीच आहेत कामं,

 पण करवतच नाही.

रेडिमेड मुळे संपत चाललेला शिंपी म्हणतोय…

 आभाळंच फाटले

 किती लावू ठिगळं?

असे शब्दच्छल आणि त्यातला मतितार्थ,… कवी जणू सांगतो… शोधा म्हणजे सापडेल.

 भिडेंच्या काही कविता मिश्किलीच्या रुपांत ही वावरत आहेत संग्रहात! 

 कवी आणि कविता या कवितेत…

कवीने मित्राशी संभाषण दाखवून… विनयशील आणि जमिनीवर असण्याचा छान पुरावा दिलायं..

म्हणतोयं… “आम्ही म्हणजे उगीच आपलं वासरात लंगडी गाय शहाणी”! 

कवीची वैशिष्ट्ये सांगतांना म्हंटलयं…

 ” खरे कवी ते, व्यासंग फार ज्यांचा, अन् नाचे जीभेवर सरस्वती। 

ओघळती शब्द त्यांचे, जसे तुटल्या सरातून मोती! “

असे त्यांचेच शब्द मोती झरतांना बघायला मिळतात त्यांच्या मैतर नावाच्या पंचाक्षरी कवितेत. असेही काही टपोरे, पाणीदार मोती ओवले आहेत त्यांनी! 

कवी सांगतोयं… मैत्रीचं नातं, ना त्यापेक्षा ही पुढं, सहज आणि…

नात्याहून ही मैतर खोल!! फक्त खोली ओळखता आली पाहिजे.

कवितेबद्दल च्या भावना आणखी एका कवितेत व्यक्त करून कवी म्हणतोयं,

” साहित्य देई मुक्त प्रांगण,

 शब्दांची करा अशी गुंफण

 कविता व्हावी मनी गोंदण

कवी भिडे यांनी निसर्गाचे भानही राखलयं! त्याच्या निसर्ग प्रेमाला फुटलेली पालवी, आलेला बहर, आणि झालेला वर्षाव चिंब भिजवतो आणि…

 ” विविध रंगांनी

 नटली अवनी

 फुटते पालवी

 वठलेल्या मनी|”

‘मातृभाषा *दीन…’ ही कविता, कवीला मातृभाषा दीन झाल्याचं दु:ख, वैषम्य, याची भावपूर्ण जाणीव करून देणारी! 

“करंटे आम्ही असे, केले मातृभाषेस दीन

तरीही दरवर्षी सजतो आमचा मराठी भाषा दिन! 

हे आणि असे विडंबन विविध रचनांमध्ये आढळते आणि आपण ही मग विचार करायला प्रवृत्त होतो. कवीच्या सहज, सोप्या पण परिणामकारक शब्दांमध्ये हे सामर्थ्य सतत जाणवंत रहातं.

 आम्ही कोण?, मुक्ताफळे, अहिंसेचा खिडकी, स्वातंत्र्याचे मोल… यांसारख्या विडंबनात्मक रचना, त्यातल्या उपहासाची बोच ; त्यामागचा उद्देश, नंतरही लक्षात रहाणारा! 

 निवृत्ती नंतर… या कवितेत, कवीच्या मिश्किलीला, वात्रटिकेची झालर जोडलीयं! निवृत्ती नंतर…

” लवकर उठावे, चहा करावा,

 आपलाच नव्हे तर सर्वांचा ठेवावा

 चहा घेऊन बाहेर पडावे

 मोबाईल ही जवळ ठेवावा

 धडपडल्यास उपयोग व्हावा

 सौंदर्य दर्शन जरी कां घडेल,

 वळून न पहावे, मान अवघडेल!”

किती सहज, हलक्या फुलक्या शब्दांत दिलेला हा इशारा, आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं जावं म्हणून सांगितलेले सूत्र! हे असे, वरून अगदी साधे वाटणारे, हसत-खेळत घेतलेले चिमटे, दिलेल्या कानपिचक्या… भिडेंच्या कवितेत अगदी… भीडेचीही, भीड न बाळगता, निर्भिडपणे घेतलेल्या आढळतात… आणि आपण ही मग, अगदी उगीचच भिडस्तपणा दाखवत, गालातल्या गालांत हसत…

“आपण नाही बुवा! “… असं म्हणंत पुढे जातो. इथेच तर कवीच्या काव्यलेखनाची जीत होते, उद्देश पूर्ण होतो. लिखाणाचं चिज होतं! 

कवीने, ” अध्यात्मास थोडे स्थान द्यावे ” म्हणत… काही रचनांना अध्यात्माचा स्पर्श देत…

“मना पहावे, ‘आपणांसी आपण’

न लागे तयाला कोणताही दर्पण

घेता रामनाम मनी वा वैखरी

आत्माराम शोधू मनाच्या गाभारी”

असं म्हणत… नाम महात्म्यही विशद केले आहे.

पुढे त्यांनी मुक्तीचा मार्ग ही शोधून काढला…

” भजतो तव सगुण रूपा,

 निर्गुण निराकारा!

तुझ्या विना कोण सोडवी,

जन्म-मृत्यू चा फेरा? “

शेवटी… “अव्याहत चालला तुझाच शोध,

द्यावी मुक्ती मज, व्हावा आत्मबोध! “

असाही एक सुंदर विचार रचनांमध्ये आढळतो.

 विविधतेतलं सौंदर्य, त्यातलं लावण्य मांडतांना कवी, कव्वालीचाही वाली झालाय ;हे विशेषच ना!! 

 आईचं ऋण ही व्यक्त केलयं आणि भावपूर्ण जाणीव करून दिली आहे…

 “नको तिला कौतुक सोहळे,

 नको तिला मातृदिन! 

 ऋणात निरंतर रहावे तिच्या,

 प्रेमाविना ती होईल दीन… “

शेवटी मनाचे यान आत्मबोधाकडे वळवत… “मन हारता होई हार, मन जिंकता जीत! “… हे सुवचन रूजवत, स्थिरावलयं!! 

असं हे काव्यसुधा सिंचन, त्यातल्या प्रत्येक थेंबातलं, नितळ, स्वच्छ, पारदर्शी असं साधेपणातलं, एक वेगळंच सौंदर्य लेऊन झालयं! त्या-त्या वेळी मनांत आलेल्या विचार किरणांच्या परावर्तनाने, त्या थेंबांना, जे… कविता, वात्रटिका, विडंबन, पंचाक्षरी, षडाक्षरी, उपहास, उपरोध, देशभक्ती, मातृभाषा प्रेम, अध्यात्म, निसर्ग भान, मैत्री भावाची जाण, राजकीय हालचालीं चा उहापोह, त्याबद्दलचा उद्वेग,…. हे आणि असे… इंद्रधनूचे रंग, त्याच्या विविध छटांचा आनंद घेण्यासाठी आणि, साध्याही विषयांत आढळलेला मोठा आशय, गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी… यांतलं अर्थाचं मोठेपण आणि खोली, जाणून घेण्यासाठी तरी एकदा हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.

श्री. चिंतामणी भिडे यांना या निवडलेल्या, वेगळ्या वाटचालीसाठी, पुढील अशाच, तैल विनोद बुद्धीच्या, सूक्ष्म निरीक्षणातून, शब्दच्छलाचा निर्भेळ आनंद देणा-या रचनांचे सृजन करण्यासाठी शुभेच्छा! 

परिचय – प्रा. भारती जोगी

पुणे

मो ९४२३९४१०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी   

 पुस्तक : सावळ्या विठ्ठलाच्या देशात

 लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर

 परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी 

साहित्य सारांश पुरस्काराच्या निमित्ताने वर्षाताईंची भेट झाली. त्या माझ्या शेजारीच बसल्या होत्या. दोन तीन तास आम्ही एकत्र होतो. बोलता बोलतांना त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समजल्या, विचारांची देवाण घेवाण झाली. खूप बरं वाटलं त्यांना भेटून! मी माझा कवितासंग्रह त्यांना दिला आणि त्यांनी त्यांचं पुस्तक मला दिलं. त्यांच्या पुस्तकाचं नाव ‘ सावळ्या विठ्ठलाच्या देशात ‘!

‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’! हे पुस्तकाचे नावच मला इतकं आवडलं की केव्हा एकदा ते मी वाचते असं मला झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वाचण्यासाठी घेतलं. विविध विषयांचे ज्ञान असलेल्या प्रख्यात व्याख्यात्या धनश्री लेले यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यानंतर वर्षाताईंची स्वतःच मनोगत यातून पुढील पुस्तकाचा म्हणजेच प्रवास वर्णनाचा ट्रेलर डोळ्यासमोर उभा राहिला म्हणायला हरकत नाही.

नवीन देश, नवीन वातावरण तिकडे जाण्याची उत्सुकता भीती त्यांच्या लिखाणातून प्रथम जाणवली. त्यांच्या केनियाला जाण्याच्या तयारीपासूनच लिखाण त्यांनी खूप मनापासून लिहिलं आहे. अगदी सुरुवातीपासून ज्या लसी त्यांनी घेतल्या, अर्थात त्या घ्याव्यात लागतात. इतर तयारी केली तिथपासून त्यांनी जी घोडदौड सुरू केली यांच्याही त्यांच्या नोंदी महत्वाच्या आहेत.

अलिबागच्या वर्षाताई, केनीयाला गेल्यावर अनेक अनुभवातून त्यांना काय काय वाटत गेलं हे त्यांच्या रोजच्या दैनंदिनीतून आपल्याला समजू शकत. साठीहून अधिक वय असणाऱ्या वर्षाताई! त्यांची जिज्ञासा वाचून खूप आश्चर्य वाटलं की त्यांना नवीन शहर फक्त जाणून घ्यायचे नव्हतं तर त्याच्यावर लिहावसं वाटलं. सुरुवातीपासूनच लिहावंसं वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने तिथे गेलेल्या दिवसापासून लिहायला सुरुवात केली. एकटेपणा सांभाळणं अवघड असतं असं त्या म्हणाल्या पण ते सांभाळायचा एक विधायक धागा त्यांना नक्कीच मिळाला आहे, असं मी म्हणेन. हा धागा म्हणजे लिखाण! अशा पद्धतीने वेगळ्या आणि अगदीच अनोख्या देशांमध्ये इथल्या बारीकसारीक गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत सगळे लिहिणं साधी गोष्ट नाही.

तिथलं वातावरण, तिथला आहार, खाणं-पिण हे खूप वेगळं आहे. आपल्या पदार्थापेक्षा खूपच तफावत. सुरुवातीला तर हॉटेल मधील काही पदार्थ बघूनही ते त्यांना नको वाटले. त्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर जशी माहिती होत गेली तस तशी त्यांना दुकान आणि भारतीय पदार्थ कळले तेव्हा त्यांना कसं बरं वाटलं, भारतातील लोकं भेटली तेव्हा कसं वाटलं त्याबद्दल त्यांनी लिहिलंय.

तिथली गरिबी… इंग्रजांनी तिथल्या लोकांना कसं गुलाम केलं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा तिथे आलेली गरीबी याबद्दल त्यांनी सांगितलं. ही नवी माहिती आहे. तिथे संध्याकाळी सात नंतर घराच्या बाहेर पडलं तर लूटमार करतात, खून करतात. मध्यंतरी मी ही याबद्दल वाचलं होतं… पण त्यांच्या पुस्तकातून हे खरंच आहे हे ठळक झालं. तिथले लोक गरीब असले तरीसुद्धा प्रेमाने वागलं तर प्रेमळ आहेत हेही त्यांच्या लेखनातून लक्षात आल.

त्यांनी तिथले काही ठिकाणचे रस्ते, माती, अस्वछता पाण्याचा प्रॉब्लेम, दुकाने, उद्योग, वाहतूक, काही बेदरकार लोक, झोपडपट्ट्या आणि विकसित भागातील लोक याची तफावत या सर्वांचा जणू बारकाईने अभ्यास केला. विकसित भागाचाही त्यांनी दौरा केला.

एकंदरीतच त्यांनी साधसरल, सोपं सर्वाना समजेल अस, प्रवाही लिखाण केले आहे. त्यामुळे ते लगेच भावत!

त्यांचं लिखाण हे फक्त लिखाण राहणार नाही… यातून काय मिळेल? तर भारतीय नागरिकांना जेव्हा केनियाला जाण्याचे प्रसंग येतील त्या वेळेस वर्षाताईंनी पुस्तकाद्वारे केलेले अनुभव कथन/प्रवासवर्णन हे एक उत्तम गाईड ठरेल. त्या अनुभव भारतीयांना तिथे जाण्यासाठी आणि जगण्यासाठी सुसह्य होईल. अस मी ठामपणे सांगेन. या पद्धतीचे लेखन त्यांनी केलेलं आहे. कुठेही, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळताना दुसर्यांनाही सांभाळून घेणं. कोणतीही तक्रार न करता वेगळ्या देशात एकरूप होताना

‘परिस्थितीशी समायोजन करून, तिच्याशी मैत्री करणं’ हा त्यांचा स्वभाव दिसून आला. तिथल्या लोकांना जीव लावत त्यांचीही ‘मम्मा’ होत, त्यांनी हे दाखवून दिलं.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला गुंतवून घेण्यासाठी वाचनाइतकच, लेखनासारख दुसरं साधन नाही अस मला तरी वाटत. लिखाणाची आवड, जिज्ञासू वृत्ती आणि इच्छा शक्ती याचा त्रिवेणी संगम होऊन ह्या पुस्तकाचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन.

‘स्त्री ही सृजनाचे सृजन आहे ‘! अस मला नेहमी वाटत. या पुस्तकाच्या रूपाने वर्षा ताईंनी हे सिद्ध केलंय.

इतकं सुंदर प्रवास वर्णन आपण रसिकांपर्यंत पोहोचवलत, त्याबद्दल धन्यवाद आणि ताईं पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा!

© परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, कवयित्री, लेखिका, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भगतसिंगचा खटला” – मूळ लेखक : ए. जी. नुराणी – मराठी अनुवाद : सुश्री रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भगतसिंगचा खटला” – मूळ लेखक : ए. जी. नुराणी – मराठी अनुवाद : सुश्री रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

पुस्तक : भगतसिंगचा खटला

“The trial of Bhagatsingh“ — ‘न्यायाच्या हत्येचे कारस्थान’

मूळ लेखक : ए. जी. नुराणी.

मराठी अनुवाद : रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे 

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

१७ डिसेंबर १९२८ ला भगतसिंगने सॉंडर्सची हत्या केली. खरे तर त्याला पोलीस अधिक्षक स्कॉटला मारायचे होते. पण चुकीच्या संदेशामुळे मारला गेला तो सॉंडर्स.

या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी ८ एप्रिल१९२९ ला दिल्लीत विधीमंडळात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉंब टाकले.

एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी इंग्रज सरकार पेटून उठले यात नवल नाही. त्यांनी धरपकड सुरू केली. काही जण पकडले गेले.. पोलीसी छळाला कंटाळून त्यातील काही जण माफिचे साक्षीदार झाले आणि थोड्या दिवसातच भगतसिंग आणि त्याचे साथीदार यांना अटक झाली.

पुस्तकात हा सर्व घटनाक्रम तपशीलवार आला आहे. त्यानंतरच्या घटना… तुरुंगात घडत असलेल्या आणि बाहेर.. म्हणजे देशभर.. वाचताना एक नवीनच इतिहास माहीत होत जातो.

देशभरात भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल सहानभूती होतीच.. पण त्यातही विसंगती होती विधीमंडळात केलेली बॉम्बस्फोटाची कृती अनेकांना पसंत नव्हती. म. गांधी, जवाहरलाल नेहरू आणि एकूणच काँग्रेसची भूमिका काय होती? भगतसिंग आणि त्याचे सहकारी तुरुंगात गांधींचा मार्ग अनुसरतात. तुरुंगात त्यांना मिळणारी वागणूक.. दिला जाणारे अन्न.. पाणी याच्या निषेधार्थ ते अन्न सत्याग्रह सुरु करतात.

एकामागून एक घडणार्या घटनांमुळे देशभर आगडोंब ऊसळतो. आणि मग खटला उभा राहतो.

पुस्तकाचा हा मुख्य विषय. लाहोरच्या केंद्रिय तुरुंगात १० जुलै पासून खटल्याचे कामकाज सुरू झाले. भगतसिंग यांनी आपले कायदेशीर सल्लागार म्हणून लाला दुनीचंद यांची निवड केली. ते आणि इतर सात आठ जण या खटल्यात आरोपींचा बचाव करण्यासाठी उभे राहिले. खटल्याचे कामकाज सर्वसामान्य जनतेसाठी खुले नव्हते.

इथून पुढे जे घडत गेले त्यावर प्रकाश टाकणे हा या पुस्तकाचा मुळ उद्देश. या खटल्याची कठोर चिकित्सा कधीच झाली नाही आणि लाहोर कटाचा तपशीलवार अभ्यासही झाला नाही. या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. हा खटला म्हणजे एक फार्सच होता. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंग्रज सरकारने या खटल्याचा पुरेपूर वापर केला. खटल्याच्या काळातच इंग्रज सरकारने एक वटहुकूम काढला. त्या अन्वये एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. त्याचा हेतू काय होता? तर या खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये. त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा कायम राहील.

शालेय इतिहासात भगतसिंगबद्दल वाचले होते. त्यानंतर कधीच या विषयावर काहीच वाचनात आले नाही. मराठीत यावर काही पुस्तके असतीलही.. पण कधी वाचनात आली नाही. हे पुस्तक हातात घेतले आणि सगळा इतिहास नव्याने समजत गेला. भगतसिंगाचा पूर्व इतिहास काय होता.. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती यावर देखील एक प्रकरण पुस्तकात आहे. तसं पाहिलं तर हा विषय क्लिष्ट. पण तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. ए. जी. नुराणी यांच्या ‘ The trial of Bhagatsing ‘ या इंग्रजी पुस्तकाचा सुबोध अनुवाद रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी केला आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक मोलाचे आहेच, पण सामान्य वाचकांनी देखील नेमका इतिहास समजून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पिंगळावेळ” – लेखक : जी. ए. कुलकर्णी ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆

सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “पिंगळावेळ” – लेखक : जी. ए. कुलकर्णी ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

 पुस्तक – पिंगळावेळ

 लेखक – जी. ए. कुलकर्णी

 प्रकाशन वर्ष – 1977

 मूल्य -20/( जुनी आवृत्ती) 225/

 पृष्ठ संख्या-  257

मराठी कथा लेखनाचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ लेखक श्री जी. ए. कुलकर्णी यांचा ” पिंगळावेळ” हा गाजलेला कथासंग्रह. सदर पुस्तकाचे शीर्षक “पिंगळावेळ” हे खुप अर्थपूर्ण आहे. यामध्ये ‘पिंगळा’ व ‘वेळ’ असे दोन शब्द एकत्रित आले आहेत. पिंगळा याचा अर्थ घुबड असा होतो. भारतीय संस्कृतीत लक्ष्मीचे वाहन घुबड हे शुभकारक मानले असले तरी, दैनंदिन व्यवहारात ते अशुभ मानले जाते. आणि अशी.. अशुभ वेळ म्हणजे पिंगळावेळ. मुखपृष्ठावरील घुबडाचे रंगीत तोंड त्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. या चित्रांमध्ये जरी विविध रंगछटा वापरल्या असल्या तरी त्याखालील काळी चौकट ही मृत्यूची किंवा त्यासम आयुष्यातील भीषणता सांगणारी आहे. या विविध रंगछटेमध्ये, गडद हिरवा रंग हे माणसाच्या आयुष्यातील जबरदस्तीने आलेला एकांतवास, निळा रंग आसमंत, निसर्गातील खुलेपणा सांगतो. लाल -पिवळा रंग आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, तर काळा रंग हा वेदना, भीषणता दाखवते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्राचीन मंदिरावरील शिलालेखाचे शब्दांकन केले आहे की जे आयुष्यातील कटू वास्तव शब्दबद्ध करते.

प्रस्तुत कादंबरीत एकूण अकरा ग्रामीण कथा दिल्या आहेत. यातील पहिली “ऑफिसर्स” ही आहे. तंतुवाद्य वाजवताना संपूर्ण निसर्ग सजीव, चैतन्यपूर्ण करणारा ऑफिसर्स मृत झालेली प्रेयसी युरिडीसीच्या शोधात सर्व संकटे पार करीत देवापर्यंत पोहोचतो पण तिला परत घेऊन येताना आयुष्यातील प्रकाशाची व अंधाराची अर्थात जीवन व मृत्यू या दोन बाजूंची वास्तविकता प्रकट होते व शेवटी देव मान्य करतात की आयुष्यात मृत्यू ने आलेला एकटेपणा हा स्वीकारून आयुष्याची किंमत करता आली पाहिजे व भरभरून जगता आले पाहिजे. ” स्वामी” कथेतील महंत अनोळख्या व्यक्तीस स्वामी बनवून समाधी मरण घेण्यास भाग पाडणाऱ्या तपोवनभूमीत फसवून नेतो. त्या दगडी शिळा, हाडाचे सांगाडे, सरपट जाता येईल अशी गुफा, त्या फटीतून उगवणारा कारंजाचा वेल, अफूची गोळी खाऊन त्याने स्वीकारलेला मृत्यू व त्यावेळी गायलेले गाणे, ” तू असाच वर जा” हे दांभिकता चे प्रतीक आहे. “कैरी” या कथेत अडाणी तानीमावशी बहिणीच्या मृत्यूनंतर, पतीचा विरोध स्वीकारून, तिच्या पोराला शिकायला घेऊन येते व मास्तरांनी त्याला “भिकार्डे” म्हटल्यावर, शिवलीलामृताचा अध्याय म्हणून दाखवते. “मी काय शेनामातीची, पांडवपंचमीची गवळण न्हाय. ” असे ठणकावून सांगणारी तानीमावशी शेवटी विषाची पुडी खाऊन आत्महत्या करते. आणि लेखकाच्या मीठ तिखटाच्या कैरया खायचे राहून जाते. यातील “कैरी” हे अपुऱ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. “वीज”या कथेत, रद्दीची प्रत्येक ओळ वाचणारा, बळवंत मास्तर ला एका सर्कसवाली च्या सोनेरी केसाची भुरळ  पडते व एक दिवस विमानाची गोष्ट सांगताना, फांदीवर चढून तीच दोरी स्वतः भोवती गुंडाळून तो आत्महत्या करतो. यामध्ये विजे सारखे स्वप्नामागे धावून, आयुष्य जाळून घेणाऱ्या लोकांच्या जीवनाचे वास्तव उघडे पडते. “तळपट” या कथेत, सिदधनहळ्ळी तील ग्रामीण जीवन, तिथल्या प्रथा परंपरा, ( कडकलक्ष्मी, नागपंचमीला नाग दाखवून पूजा करणारे व त्यावर उदरनिर्वाह करणारे) कळतात. उपाशीपोटी भूक भागत नाही म्हणून शेवटी दानय्या सर्पदंशाने आपल्या वंशाची तळपट करून घेतो अर्थात वंशाचा नाश करून घेतो. “मुक्ती” या कथेत, उजव्या हाताचा अंगठा देणारा तो, घेणारे व रक्तपितीचा शाप देणारे आचार्य, बैरागी, अंध तरुणी इ. ऐतिहासिक पात्रांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या जल स्पर्शाने  डोळस होणार होती पण त्यासाठी लागणारा त्याचा उजवा अंगठा च नसतो. असे नियतीने ठरवून ठेवलेल्या आणि मुक्तीसाठी जगणार्या त्या जीवांना कधीच मुक्ती मिळणार नसते. उर्वरित कथांमध्ये देखील दारिद्र्यामध्ये कुटुंबासाठी धडपडणारी लक्ष्मी, यमनीचे मढे पाडणारा संगा इ. पात्रे  दिलेल्या क्षमतेनिशी नियतीला टक्कर देताना दिसतात. पण नियती जिंकते.

एकंदरीत, लेखकाच्या भाषाशैली बद्दल बोलताना स्पष्ट दिसून येते की त्यांच्यावर कर्नाटक व महाराष्ट्रातील संस्कृतीचा पगडा खोल आहे. पौराणिक उल्लेखा बरोबरच ग्रामीण प्रांतातील शब्द यात आहेत. यामध्ये दानय्या, सिदधनहळ्ळी, हुच्च म्हातारी असे शब्द आढळतात. यातील पात्रे विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. पण त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत नसल्याने शेवटी स्वतःचे अस्तित्वच नव्हे तर वंशावळ (तळपट) संपवताना दिसतात. त्यांच्या पुढील संघर्ष हा भावनिक, सामाजिक, पारंपारिक, धार्मिक असा आहे. या  कथांमध्ये प्रकाशाचे गीत गाणारी पात्रे आहेत पण त्यांना शेवटी अंधार सहन होत नाही व ते मृत्यू स्वीकारतात. लेखकाने त्यांना नियतीच्या हातातील बाहुले झालेले दाखविले आहे व त्यांच्या आयुष्यातील निर्णयाच्या क्षणी अशुभ वेळांमुळे ते शरणागती पत्करताना दिसतात.

(ऑफिसरला जसे तंतुवाद्य वाजवण्याचे वरदान आहे तसे) लेखकाला शब्दांचे वरदान आहे. त्यांच्या अचूक भाषाशैलीमुळे डोळ्यांसमोर हुबेहूब दृश्य जिवंत होते. घरबसल्या सृष्टी दर्शन घडते. लेखकाने खूप बारकावे टिपलेले आहेत. अगदी फुटलेल्या टाचातील वाळूचे कण काढणारी तानी मावशी सुद्धा नजरेतून सुटत नाही. कथा वेगवेगळ्या असल्याने कोणतीही आधी आपण सुरू करू शकतो. या कथा मोठ्या असल्या तरी, एकदा त्या प्रवाहात पडलो की भावनिक तल्लीनता साधते आणि लेखक आपल्याला इप्सितापर्यंत घेऊन जातो. लेखकाच्या पोतडीतून अनेक नवीन शब्द आले आहेत. उदाहरणार्थ, झपाटसंगत, जाळानं जीभ दाखवली, आयुष्याची निरी सुटली, बिनआतड्याचे ऊण, भुरका रेडा निर्लज्ज साठी निलाजरा, वंशाचा नाश करणारा तळपट, फुका म्हणजे झटका फांदीला पान न उरणे, जाते उपाशी असणे, वादाच्या प्रसंगात घातलेल्या शिव्या इत्यादी. गावरान भाषेत बोलणारी जरी ही  सामान्य पात्रे असली तरी, तत्त्वज्ञान सांगतात, ” उत्कट आशेला क्षितिज नसते, एकाच वस्तूकडे ध्यान देणारा डोळस असून आंधळा असतो, जिवंत माणसाचा आनंद ओल्या पावलांनी येतो नी भिजल्या डोळ्यांनी संपतो, सुख म्हणजे अटळ तडजोड असते. “असे अनेक, जीवनाला समरूप तत्त्वज्ञान वाचायला मिळते. या कथांतून लेखक जीवन- मृत्यू यांचा संघर्ष, सूर्यप्रकाशाचे -अंधाराशी नाते आशावादी- निराशावादी दृष्टिकोन इत्यादी समांतर सांगताना दिसतात. पण शेवटी नकारात्मकता ठळक होते. लेखकाचा जन्म एकसंबा मधील असल्याने मराठी व कन्नड भाषेच्या प्रांतातील लोकांना त्यांनी जवळून अभ्यासले आहे. सर्व कथा अंगावर शहारे आणतात, विचार सुन्न करतात व काही अंशी त्यांनी स्वीकारलेल्या मृत्यूचे समर्थन करतात. अशा या कथा वाचताना, नवीन वातावरणात नवीन व्यक्तीं भेटतात, वर्तमानाचा विसर पडतो, मात्र त्यांचा मृत्यू वाया जात नाही. आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करतात. व आपल्याला जीवनाची खरी किंमत कळते; असा हा कथासंग्रह नक्की वाचायला हवा !  

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “आमेन” – लेखिका : सिस्टर जेस्मी — भावानुवाद सुश्री सुनंदा अमरापुरकर ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आमेन” – लेखिका : सिस्टर जेस्मी — भावानुवाद सुश्री सुनंदा अमरापुरकर ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली  

पुस्तक : आमेन – द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन (Amen-the autobiography of a nun)

लेखिका : सिस्टर जेस्मी 

अनुवाद : सुश्री सुनंदा अमरापुरकर

मूल्य: ३००₹ 

फ्री होम शिपिंग : संपर्क हर्षल भानुशाली 9619800030

तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.

सिस्टर जेस्मी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद खूप छान झाला आहे. मूळ पुस्तकच मराठीत आहे असं वाटतं. कुठेही बोजडपणा आलेला नाही.

एका केरळी भारतीय “नन”ने- तेहेतीस वर्षं कॉन्व्हेंट मध्ये घालवली अनेक अन्याय, अत्याचार सोसत. आणि या अत्याचारांचा अतिरेक झाल्यावर शेवटी कॉन्व्हेंट सोडायचा निर्णय घेतला. आणि त्या तथाकथित सेवाभावी, पवित्र गणल्या गेलेल्या संस्थांमधील गैरप्रकार, अनैतिक लैंगिक संबंध, भ्रष्टाचार, राजकारण, उच्चनीचता, अंधश्रद्धा या बद्दल लिहिती झाली.

नन होण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे, कठीण आहे. त्यासाठी वरिष्ठांची अज्ञा पाळण्याची शपथ, आणि दारिद्र्याची शपथ घ्यावी लागते. ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित असतं. पण सर्वच नन्स ना ब्रह्मचर्य सांभाळणं जमत नाही त्यामुळे वाढीला समलैंगिक संबध लागलेले आहेत. लेखिकेलाही इतर शिकाऊ नन्स प्रमाणे एखाद्या वरिष्ठ “सिस्टर”(?) च्या अशा भुकेलाही बळी पडावं लागलं. काही “फादर”(?) कडून अत्याचार झाले. आणि येशूची इच्छा, येशू मार्ग दाखवेल अशा अंधविश्वासापोटी तिला सगळं सोसावं लागलं.

लेखिका हेही सांगते की चर्चमध्येही ननच्या सामाजिक आणि सांपत्तिक स्थितीनुसार नन्समध्ये भेदभाव केला जातो. खालच्या दर्जाच्या नन्सना (ज्यांना चेडुथी म्हणतात) फक्त राबवलं जातं शारिरिक श्रमांसाठी. पुरुष सभासद (फादर, ब्रदर) यांच्या तुलनेत महिलांना खूपच कष्टाची कामं करावी लागतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही कमी मिळतं सेवेच्या नावाखाली चालवलेल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, डोनेशन कसं उकळलं जातं आणि त्याला विरोध करणाऱ्या सज्जन लेखिकेला शारिरिक मानसिक छळाला तोंड द्यावं लागलं, अपप्रचाराला तोंड द्यावं लागलं, इतकंच काय तीला वेडं ठरवण्याचा प्रयत्न “मदर”(?), “फादर(?)” यांनी केला.

विशेष म्हणजे लेखिकेने ज्या मुद्द्यांना हात घातला आहे त्या समस्यांचं निराकरण करण्याऐवजी चर्च मात्र लेखिकेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला खोटं पाडण्याच्या उद्योगातच आहे.

चर्च, कॉन्व्हेंट आणि इतर धार्मिक संस्थांवर आंधळेपणाने विश्वास टाकणाऱ्या, धर्मांतरित होणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे पुस्तक आहे. तसंच हिंदूधर्म आणि इतर भारतीय धर्मांतच ज्यांना फक्त वाईट दिसतं त्यांना विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे.

परिचय : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सो कूल” – लेखिका : सुश्री सोनाली कुलकर्णी☆ परिचय – सुश्री प्रतिभा शिंदे ☆

सुश्री प्रतिभा शिंदे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सो कूल” – लेखिका : सुश्री सोनाली कुलकर्णी☆ परिचय – सुश्री प्रतिभा शिंदे  

सो कूल

लेखिका : सोनाली कुलकर्णी

प्रकाशक : राजहंस प्रकाशन 

किंमत : 309

परिचय : प्रतिभा शिंदे

हे पुस्तक लिहिलं आहे माझी आवडती मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने (गुलाबजाम, सिंघम सिनेमातील सीनियर सोनाली कुलकर्णी).

2005 ते 07 या दोन वर्षाच्या काळात तिने दैनिक लोकसत्ता मध्ये स्तंभ लेखन केले होते. त्याचेच एकत्रीकरण करून राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

एक- दोन पानाचे 102 लेख यामध्ये आहेत. दैनंदिन आयुष्य जगताना, बालपणीचे अनुभव, कॉलेजमधले, प्रवासातले, अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातले व यशस्वी झाल्यानंतरचे असे आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरचे विविधरंगी अनुभव तिने या पुस्तकांमध्ये अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात शब्दबद्ध केलेले आहेत.

एक व्यक्ती म्हणून तिच्यात असणारी संवेदनशीलता प्रत्येक लेखातून जाणवते.

‘आजीचा बटवा, ” बुगडी माझी’ या लेखातून तिचे मजेशीर बालपण तिच्या असणाऱ्या विविध आवडी कळतात. या लेखांमध्ये अनेक मजेदार किस्से ही सांगितले आहेत.. जे वाचताना तिच्यातील बालिशपणा अजूनही आहे हे जाणवते.

“रात्रीच्या गर्भात”, “स्त्रीलिंगी असणं”, “पिकलं पान “अशा लेखांमधून तिच्यात असणारी प्रचंड संवेदनशीलता जाणवते. “सावळाच रंग तुझा” या लेखातून अभिनयाच्या पदार्पणाच्या वेळी तिच्या सावळ्या रंगावरून तिच्यावरती मारलेले शेरे व तिने त्यांना दिलेली ठाम उत्तरे खूपच कौतुकास्पद वाटतात.

शूटिंगच्या वेळी आलेले अनुभव, रस्त्यावर सिग्नल वरती फुगे विकणाऱ्या बायका, त्यांची मुलं, यांच्या विषयी वाटणारी कमालीची सहानुभूती तिच्यातील मनाचा मोठेपणा व माणुसकीचे दर्शन घडवते.

मुंबई -पुण्यासारखी महानगरे, देश विदेशातील अनुभव, तिथली संस्कृती, गमतीजमती वाचताना गंमत वाटते. तर उच्चभ्रू समाजातील आतल्या गोष्टी, नातेसंबंध, वाढणारा व्यभिचार, मुलांची परवड, हे वाचताना मन नक्कीच विषण्ण  होते.

दोन बहिणी, सासू सून, मैत्रिणी, कलाक्षेत्रात काम करणाऱ्या दोन अभिनेत्री, त्यांच्यातील जेलसी, स्पर्धा, यावरती तिने केलेलं भाष्य आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे.

“जळलं मरो ते बायकी राजकारण का नाही आपण एकमेकींचा आदर करायचा” हे तिच्याच लेखणीतील वाक्य निश्चितच आपणाला विचार करायला लावतं..

तिचा स्पष्टवक्तेपणा, परखडपणा व प्रेमळ पणा सगळ्यात लेखांतून जाणवतो.. 235 पानांचे हे पुस्तक दोनच दिवसात वाचून पूर्ण झालं. अगदी सहजतेने तिच्यासमोर बसून गप्पा मारत आहोत असेच वाटलं..

इतकी यशस्वी अभिनेत्री असून सुद्धा आज ही तिचे पाय जमिनीवरच आहेत. तिच्यात प्रचंड माणुसकी व संवेदनशीलता आहे याचं खूप कौतुक वाटलं. व तिच्या विषयी मनात असणारी आवड आणि आदर निश्चितच दुणावला..

परिचय : सुश्री प्रतिभा शिंदे

मो. ९८५९७१७१७७ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. ज्योत्स्ना तानवडे  

प्रेम रंगे, ऋतू संगे

कवी: सुहास रघुनाथ पंडित

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण

प्रथम आवृत्ती:१ मे २०२३

श्री सुहास रघुनाथ पंडित

हिरवाईच्या प्रेमात पडताना…!’

नुकताच  प्रेम रंगे, ऋतूसंगे हा कवी. श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा एक अतिशय सुंदर असा काव्यसंग्रह वाचण्यात आला. निसर्गाच्या प्रेरणेन, निसर्गाच्या सानिध्यात नव्याने प्रेमात पडणाऱ्या, प्रेमात पडलेल्यांच्या प्रेम भावनेच्या विविध रंगी छटांच्या हळुवार कवितांचा समृद्ध खजिनाच हाती आल्यासारखे झाले.

या काव्यसंग्रहाचे प्रेम रंगे ऋतुसंगे हे शीर्षक अतिशय समर्पक आहे. बहरणारे प्रेम आणि बहरणारे ऋतू यांचे अतूट नाते असते. आपण ते नित्य अनुभवत असतो. या कवितांमधून त्याचा पुन:प्रत्यय येतो.

सुरुवातीलाच या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने लक्ष वेधून घेतले. निळे आकाश आणि हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर उठून दिसतो. मन वेधून घेतो. त्याच्या शेजारी एक मानवी हात आहे. त्यातली तर्जनी एका फांदीच्या टोकाला आणि अंगठा खोडाला अगदी अलगद टेकले असताना हृदयाचा आकार तयार होतो. म्हणजेच आपल्या भावना, मन निसर्गाशी सहज जोडले जाऊन तादात्म्य पावते आणि एक अतूट बंध निर्माण होतो. माणसाचे आणि निसर्गाचे हे गहिरे नाते दाखवणारे हे मुखपृष्ठ काव्यसंग्रहाचे सार अचूकपणे सांगणारे आहे. अतिशय सुंदर, कलात्मक, अर्थपूर्ण असे हे मुखपृष्ठ आहे. 

कवीने आपल्या मनोगतामधे प्रेम, निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याविषयी, विविध भावनांविषयी आणि त्यातून सूचलेल्या कवितांविषयी सुंदर शब्दांत लिहिले आहे. निसर्ग आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कवी निसर्गवेडा आहे. त्यांनी निसर्गाची अनेक लोभस रूपे तितक्याच सुंदर, शब्दमधुर, लय-तालात शब्दबद्ध केली आहेत. त्यामुळे निसर्गाच्या विविध छटा या कवितांमधून साकार होतात. प्रेम आणि निसर्ग यांची एवढी घट्ट सांगड असते की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. कवी म्हणतो, ” प्रेमाचे शिंपण आणि निसर्गाचे संवर्धन यातच आपले कल्याण आहे. “

या काव्यसंग्रहाला डॉ. विष्णू वामन वासमकर सरांची प्रस्तावना लाभलेली आहे. काव्यलेखना संदर्भात अतिशय माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक अशी ही प्रस्तावना आहे. काव्यलेखन वाङ्मयाचे अगदी सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे. काव्यशास्त्र, काव्याचे लक्षण, काव्यशरीर हे महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून दिले आहेत. अलंकार, रस, वृत्त, छंद, प्रतिभा आणि अभ्यास यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सुरुवातीला ही विस्तृत मीमांसा वाचल्यामुळे पुढे कवितांचा आस्वाद घेणे जास्त आनंददायी होते.

या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. प्रेम आणि निसर्ग हातात हात घालून वाटचाल करतात. ऋतुसंगे बदलणाऱ्या निसर्गाच्या विविध छटांबरोबर आपली प्रेम भावना पण विविध आकर्षक असे रंग धारण करते. निसर्गाला मध्यवर्ती ठेवत प्रेमाचे वेगवेगळे अविष्कार कवीने शब्दबद्ध केले आहेत. या सर्वच कवितांमधून कवीची उत्तुंग प्रतिभा, अभ्यास आणि निसर्गाशी असणारे घट्ट नाते प्रत्ययाला येते.

सर्वच कविता अतिशय दर्जेदार, अलंकार, रस, वृत्त, छंद यांनी परिपूर्ण असल्याने पुन्हा पुन्हा वाचनाचा आनंद कसा घ्यावा याचा प्रत्यय येतो. समृद्ध शब्दकळा, ताल लयींची उत्तम जाण यामुळे कवितेची प्रतिभासंपन्नता जाणवते आणि आपणही या प्रेम कवितांच्या प्रेमात पडतो. काही कविता तत्त्वज्ञान, काही नात्यांचे महत्त्व, काही निसर्गाचे व्यवस्थापन कसे करावे सांगतात.

‘प्रेम रंगे ऋतूसंगे ‘  ही कविता प्रेमाचे निसर्गाशी अद्वैत वर्णन करणारी कविता आहे.

प्रेमभाव दान मोठे, निसर्गाने दिलेले।  

अंकुरते हृदयांतरी ऋतूंतुनी मोहरले।

निसर्ग, मानव आणि प्रेम द्वैत ना होणे कधी।

प्रेम लाभावे निसर्गास मानवा येवो बुद्धी।

‘एक झाड गुलमोहराचं’ मधे घरची गृहिणी, स्त्री, आई, पत्नी जी असेल ती एक गुलमोहराचे झाड असते ही कल्पनाच खूप सुंदर. कवी म्हणतो,

 सारं कसं निसर्गाच्या नियमानुसार चाललेलं 

मी नाही पाहिलं कधी गुलमोहराला वठलेलं ||

‘व्रत’ मधील पत्नी एखाद्या व्रताप्रमाणे घर संसार चालविणारी असते.

‘शहाणपण ‘मधे मुलीचं लग्न झालं, ती आई झाली की सगळं अल्लडपण विसरून जाते आणि अंगभर पदरासारखं शहाणपण लपेटून घेते. खूप सुंदर कविता.

‘सूर्यास्ताची वेळ ‘ मधे कवी सांगतोय, आयुष्याच्या संध्याकाळी सर्व भलेबुरे सोडू या आणि 

” हिरवेपण जे उरले आहे तेच जपू चल या समयाला।”

‘वसा’ या कवितेत उत्प्रेक्षा अलंकाराची रेलचेल आहे. ‘वनराणी ‘ कवितेत उपमा, रूपक, उत्प्रेक्षा अलंकारांचा सुंदर वापर केला आहे. शेवटी कवीची प्रिया निसर्गातील विविध घटकांचे साज लेऊन जणू एखादी वनराणी अशी शोभून दिसते हे वर्णन खूप सुंदर आहे.

‘ चांदण्याचे नुपूर, केशराचे मळे ‘ ( रात्र काळी संपली ), ‘डोंगरमाथ्यावरचे कुरळे कुरळे मेघ, इंद्र दरबारातील नृत्यांगना सौदामिनी ‘( चैतन्याच्या लाख खुणा ) , ‘वणव्या सम हा टाकीत जाई उष्णरश्मीचे सडे’ (वैशाख) या उपमा अप्रतिम आहेत.

एखाद्या गोष्टीचे सर्वांगसुंदर वर्णन करायचे असेल तर कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ सर्वांसाठी फुलत राहते….’ ही कविता.

किती मुरडावे, किती लचकावे, वळणे घ्यावी किती 

सहजपणाने चढून जाते वेल ही भिंतीवरती॥

किंचित लवते,कधी थरथरते,शहारते कधी वाऱ्यानी

सांजसकाळी कातरवेळी बहरून येते कलिकांनी॥

 ‘ हिरवाई ‘ निसर्गाच्या हिरवाईचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता. प्रत्येक ओळीत हिरव्या शब्दाचा अनुप्रास असल्याने छान लय आली आहे. कविता वाचताना हिरवा निसर्ग आपल्याही मनात उतरतो आणि या हिरवाईचे हिरवे गोंदण मनावर कोरले जाते. याच कवितेने कविता संग्रहाचा समारोप केलेला आहे. इथे हे हिरवे गारुड अक्षरशः भारून टाकते.

कवीने प्रेमाच्या विविध छटांच्या सुगंधित फुलांची ही ताजी ओंजळ रसिकांसाठी सादर केलेली आहे. तिचा दरवळ निश्चित रसिकांना आवडेल ही खात्री वाटते. अशाच सुंदर सुंदर कवितांचा रसिकांना लाभ घडावा यासाठी श्री सुहास पंडितांना पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

परिचय : सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “यक्षरात्र” – कवयित्री : अरुणा ढेरे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆

सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “यक्षरात्र” – कवयित्री : अरुणा ढेरे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

 पुस्तक – यक्षरात्र

 कवयित्री -अरुणा ढेरे

 प्रकाशन वर्ष -१९८७

मूल्य- २५/

अरुणा ढेरे या कथा, कादंबरी ,काव्य, ललितलेखन, कुमार व किशोर वयोगटासाठीचे लेखन, सांस्कृतिक व ऐतिहासिक लेखन करणाऱ्या मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीयुत र .चि. ढेरे यांची समृद्ध भाषा श्रीमंती त्यांना लाभली आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहात कवयित्रीच्या 1980 ते 1986 या काळातील एकूण 72 छोट्या कवितांचा संग्रह आहे.

शीर्षक “यक्षरात्र”हे विशेष आहे. यक्ष व रात्र यांनी मिळून यक्ष रात्र हा शब्द तयार झाला आहे. यक्ष सुंदर आणि मायावी असतात. त्यांची तुलना ‘रात्रीशी’ केली आहे. आयुष्यातील धुंद करणाऱ्या, मंतरलेल्या, मायावी रात्रींतील प्रसंगांचे वर्णन यात आहे. या यक्षरात्रींचे कवितेशी संबंध सांगताना त्या म्हणतात , याच मंतरलेल्या रात्रीत नवनिर्मिती होते आणि नवनिर्मितीचे व कवितेचे जन्मोजन्मीचे नाते असते. ‘यक्षरात्र’ या नावाच्या कवितेत त्या म्हणतात,

“….. आणि रंग गर्द क्षितिज पेटले,

       रात्री उजाडले क्षणमात्र 

       तमाने टाकली प्रकाशाची कात, 

        झाली काळजात यक्षरात्र”.

अबोल भावना कवितातून कशा झरतात हे सांगताना, त्या म्हणतात,

     “तुला समजू न शकणाऱ्या         

     जाणिवांचे हुंदके गळाभर दाटून

     येतात आणि फारच असह्य झाले 

     की कविता होऊन कागदावर        

     ठिबकू लागतात .”

आयुष्यातील स्वार्थी नाती व त्यामुळे कवितेला लाभलेले कोरडेपण याबद्दल कवयित्री लिहितात,

   ” पाहिले मोर तत्वांचे,

    ते सर्व पिसे झडलेले,

    अन ओळख हिरवी जिथे,

     ते पान कुणी खुडलेले .”

पुढे एक ठिकाणी त्या लिहितात

“मी माझ्या आत आत उतरते आणि     

नुसतीच बाहेर पाहते …

तेव्हा भीती वाटते.”

 पुढे एके ठिकाणी त्या लिहितात,  

‘शब्दांचे दुःख निराळे.

 ना कळत्या अर्थापाशी मोराचा पंख झळाळे.’

 दुःखातून बाहेर पडून लेखनातून स्वतःची ओळख निर्माण करताना, संघर्ष करताना त्या म्हणतात,

‘ माझी नाव वलवायला मला माझेच हात हवे होते ,

आता हात नाहीत ,

शब्दांचे वागणे बदलले आहे ,

माझे पाणी बदलले आहे,

 माझे जाणे आणि गाणे ही बदलले आहे .,’

विसर पडलेल्या नात्यांबद्दल त्या लिहितात ,

“सागांच्या भिंती मधुनी कोंडल्या सुखाच्या हाका,

 पाखरे विसरून गेली आश्वासक आणाभाका’.

अश्रू लपवून स्मितहास्याने जीवनास सामोरे जाताना,आत्मविश्वास वाढवताना त्या लिहितात ,

“देहाचे पान थरारी ,

मज हवीच माझी माती ,

दुःखाच्या ओटी वरती

 तु लाव स्मिता ची पणती.’

 पतीच्या विरहात ” तू नसताना “या कवितेत त्या लिहितात ,

   ‘तेव्हा या देहस्वी प्रदेशाशिवाय   

   अन्यत्र कुठे तृप्तीची तळी असतील

   असे वाटले ही नव्हते,

   आता आभाळ निवड ,हवा संथ

   आहे, 

  विलासीचंद्र मी जरा काढून ठेवला  

  आहे .”

रात्रीत भेटणाऱ्या प्रेमाची जग जाहीर रीत सांगताना त्या लिहितात,

   “प्रेम भोगावे जरासे पांघरूनि

    वासना, आतडी सजवून भोळी,

    रंगवावा पाळणा”.

 शृंगारसात  त्या लिहितात ,

“उगीच नेसले हिरवी साडी, काळे काठ.

 झुलवीत आले जुन्या नदीचे नवखे घाट,

 पायात पैंजण चांदीचे,

 घुंगुर गाणे धुंदीचे.

 राघू लाल चोळीवरती,

 केसातून पिवळी शेवंती”.

सासुरवाशीणीला “माहेरी बोलवा” या कवितेत त्या लिहितात,

” चार दिवसांवर उभा ओला श्रावण झुलवा.

 न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा,

 तिच्या अंगावर इथे किती गोंदले निखारे,

 तिथे फिरेल त्यावरी रक्त चंदनाची वारे.

थोडा वेळ दे गारवा, तिला माहेरी बोलवा,

सोसायचाच ना आहे पुन्हा वैशाख वणवा .”

“पाऊस” या कवितेत त्या लिहितात,

आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे.

पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो खोवून पीस मोराचे कान्हा होतो.

हिमशुभ्र कळ्यांवर तमाम झुकतो, जेव्हा पाऊस रसिक राधेचा राणा होतो.” 

“पाऊस  कुणा राव्याला दाणे देतो ,

तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो ,

दिशा मोकळ्या दाही ,

पाण्याला पाऊस रत्न पैंजण देतो.”

आयुष्यात शब्दांचे कवितेचे गाण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात

    “उघडना ,ओठ जरा .जुळू दे ना 

     गाणे. गाण्या विना खरे का ग

      माणसाचे जिणे?”

अशा अनेक कविता वाचल्यानंतर या काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये सांगताना मला आवर्जून सांगावेसे वाटते यातील कित्येक ओळी साड्यांच्या घडी प्रमाणे  हळुवार आयुष्याची रीत उलगडून दाखवतात. यांच्या कविता लयबद्ध आहेत .डोळ्यासमोर खेडेगावातील पावसातले वातावरण, जांभळे डोंगर ,हिरवीगर्द झाडी , गार उनाड वारा, चंदेरी पाणांतून टपटपणारे थेंब ,डोहाकटी नाचणारा मोर ,हिरवा राघू ,साजनाची ओढ हे सोबत असल्याचा भास होतो . कवयित्री शब्दांची धनी आहे. तिच्या पोतडीतून आलेले काही शब्द अगदी नवे कोरे वाटतात. “पायांना भुईच्या रंगाचे धन, चंद्र भाकरीचा तव्यात उतरून घ्यायचा, पानावर चढते चांदी, मोरांचे पंख झाडले इ.अशा अनेक शब्दांना मोरपिसांपरी पावसात न्हात, गार वारा पीत ,कधी विरहाच्या कधी मिलनाच्या स्पर्शांना अनुभवत या कविता जीवनाचं वास्तव स्त्री मनातून सांगून जातात. आणि या संसाराच्या पाशातून मुक्त करत कवयित्रीला लिखाणाचे बळ देतात. त्या उंचीवर बसून ती पुन्हा वळून पाहते तेव्हा तिच्या आयुष्यातले हे क्षण, या रात्री तिला यक्षरात्रीसारख्या भासू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने प्रत्येकीच्या आयुष्यातली यक्षरात्र त्यां सोबत चमकू लागते. असा अनुभव देणारा हा काव्यसंग्रह नक्की वाचायला  हवा.. 

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares