मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रामराज्य…” – लेखक : श्री संदीप सुंकले ☆ परिचय – श्री अविनाश सहस्त्रबुध्दे ☆

पुस्तक – रामराज्य

लेखक- संदीप सुंकले,

सम्पर्क- 8380019676

प्रकाशक- संकल्प प्रकाशन, अलिबाग.

पृष्ठ –  ६४, 

मूल्य- ₹ १००

रामराज्याच्या दिशेने सम्यक पाऊल टाकण्यासाठी…

दैनंदिन जीवनात जगत असताना अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्याला येतो. एखादी वाईट घटना आपल्याला दिसली की घोर कलियुग असे म्हणत कलियुगाकडे बोट दाखवत आपण आपले नैराश्य अधिक वाढवतो. रामावर भरवसा असणारे आणि जे काही होते ते रामाच्या इच्छेने होते असे म्हणत त्या वाईट घटनेचा क्षण आपल्या मनःपटलावरुन हद्दपार करतात. पण चिंताक्रांत मंडळी रामराज्य कधी येणार, असा विचार करीत वर्तमानात जगण्याऐवजी रामराज्याची प्रतीक्षा करणेच पसंत करतात. पण रामराज्य म्हणजे काय, हे जाणून घेण्याचीदेखील आवश्यकता आहे.

श्री संदीप रामचंद्र सुंकले

आपल्या अंतरमनातील रामाला आपण कधीच स्मरत नाही, दुसऱ्या व्यक्तीतील ह्रदयस्थ रामालाही आपण धूडकावून लावतो. हे सगळे होऊ नये आणि रामराज्य नक्की काय होते, हे समजावे यासाठी एका रामभक्ताने रामराज्य या छोटेखानी पुस्तिकेचे लेखन केले आणि ते जनमानसात पोहचावे म्हणून त्या दासचैतन्याची धडपड सुरु आहे.

गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित असणारे दासचैतन्य म्हणजेच संदीप सुंकले यांची ओघवती, मृदु पण तेवढीच स्पष्ट असलेली भाषा रामराज्याची महती सांगते. लवकुशांनी सांगितलेल्या प्रभु रामचंद्रांच्या महतीबाबत आपण सर्वजण जाणतोच. त्या रामरायांचे रामराज्य कसे होते, हे श्री. सुंकले त्यांच्या सिद्धहस्त लेखणीद्वारे प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहचवतात.

शुद्ध आहार-विचार-आचार म्हणजे रामराज्य, शुद्ध आस-ध्यास-व्यास म्हणजे रामराज्य, शुद्ध जल-स्थल-बल म्हणजे रामराज्य, शुद्ध भावना-कल्पना-वासना म्हणजे रामराज्य, शुद्ध मन- तन-धन म्हणजे रामराज्य, शुद्ध वर्ण-कर्म-धर्म म्हणजे रामराज्य, शुद्ध जांबुवंत-हनुमंत- नलनील म्हणजे रामराज्य, शुद्ध राम-सीता-लक्ष्मण म्हणजे रामराज्य, शुद्ध कुटुंब-समाज-राष्ट्र म्हणजे रामराज्य असे नऊ लेख म्हणजे रघुकुळातील सात्विकतेची बीजे आहेत. केवळ दहाच लेख आणि प्रत्येक लेखातील ओजस्वी भाषा, ज्यातून रामराज्याची संकल्पना अधिक समृद्धतेने उलगडत जाते. शुद्धता, निर्मळपणा आणण्यासाठी जर काही आवश्यक असेल तर ते म्हणजे प्रयत्न. ज्या प्रयत्नांबद्दल समर्थ रामदासांनी दासबोधात अनेकदा सांगितले आहे. मूल्यधिष्ठित आचरण करणारे नागरिकांच्या सहाय्याने रामराज्य येऊ शकते. रामराज्य आणायचे असेल तर भौतिक सुखाच्या मागे धावणे सोडण्याची गरज आणि भोगांपुढे लोटांगण न घालणेच अधिक श्रेयस्कर असल्याचे लेखक सुचवतात.

बारामतीच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. रेवती राहुल संत यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रभु रामचंद्रानी  तुमच्याआमच्यातील अवगुणांवर केलेला शस्त्राघात आहे. सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीकडे पाहताना येणारे नैराश्य स्वाभाविकच आहे, पण ते नैराश्य, मरगळ झटकून  रामराज्य येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज लेखकाने अधोरेखीत केली आहे.

रामराज्यातील विचारांमधील सौम्यता आणि आधुनिक काळात परिस्थीतीत झालेला बदल यावर टोकदार भाष्य करताना श्री.सुंकले यांनी विज्ञानाची कास सोडलेली नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे. संस्कार, संस्कृती यांच्याबद्दलचा विचार करीत असतानाच विचार-भावना-वर्तन यावर मानसशास्त्रीय अंगाने केले जाणारे भाष्य करताना समर्थांच्या मनाच्या श्लोकाबद्दलही लेखक भाष्य करतात. रामराया म्हणले की समर्थांचे अनुषंगिकपणे तेथे येणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीतील प्रयत्नाबरोबरच, विवेक, वैराग्य, वृत्ती-बदल या बाबीही लेखक उद्धृत करतात. मनाचे श्लोक आणि मनापासून करण्याची सुधारणा त्यांनी वेळोवेळी या रामराज्य पुस्तकात मांडली आहे. 

प्रभु रामचंद्राबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल लिहित असताना लेखकाने त्यांच्या दासाचा म्हणजेच मारुतीरायांचा उल्लेख केला नसता तरच नवल. हनुमंताचा समर्पित भावदेखील या निमित्ताने त्यांनी मांडला आहे. हनुमंताप्रमाणेच लक्ष्मणाचे रामचंद्रांचे भाऊ म्हणून नाही, तर त्यांच्या दैदीप्यमान बंधूप्रेमाविषयी लिहिले नाही तर रामराज्य ही संकल्पना अर्धवटच राहिली असते, पण त्यांचा यथायोग्य उल्लेख यात आढळतो. रामतत्त्वांचे मूल्य जाणून घेतल्याने, त्यासाठी आवश्यक निश्चय आणि मार्गक्रमण केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही या विषयी लेखकाच्या मनात कोठेही किंतू जसा नाही, तसेच शुद्ध निश्चयाने मार्गक्रमण केल्यास लवकरच रामराज्य येऊ शकते. याबद्दल लेखकाला केवळ आशाच नाही, तर खात्री देखील आहे.

परिचय : श्री अविनाश सहस्त्रबुध्दे

इंदापूर , माणगाव .

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆“विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

“विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆ 

पुस्तक – विटामिन जिंदगी

लेखक – श्री ललितकुमार

परिचय : डॉ. मुग्धा सिधये तगारे

आयुष्याला खुराक पुरवणाऱ्या, निराशावादी माणसाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारं हे पुस्तक… 47 वर्षाच्या एका (पोलिओग्रस्त) दिव्यांगाच्या आयुष्याची ही कहाणी आहे. लेखकाने अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याचा पट इथे उलगडून दाखवला आहे. दिल्लीमधे सुतारकाम, मूर्तीकाम करणाऱ्यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षापर्यंत इतरांसारखाच तो सामान्य धडधाकट मुलगा होता. त्यानंतर एक दिवस खूप ताप आला… बरेच दिवस राहिला आणि पोलिओच्या विषाणूचं शरीरावर आक्रमण झालं. लेखक म्हणतो,” पुढच्या दुःख व कष्टांसाठी नियतीनं “माझी” निवड केली आणि जणु आणखी कोणाला वाचवलं.”  संपूर्ण पुस्तकामधे लेखकाने आपली संघर्षयात्रा विस्तृतपणे उलगडून तर दाखवली आहे पण कुठेही रडगाण्याचा सूर नाही! शरीर विकलांग असलं तरी मनं अत्यंत सुदृढ आहे. लहानपणापासूनच खरं तर सगळ्याच बाबी त्यांच्या विरोधात होत्या. घरी शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नाही (वडिल ११ वी शिकलेले) आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गीय, घराजवळ, शाळेत फारसे कोणी मित्र नाहीत…. तरीही त्यांच्याकडे असणाऱ्या + ve गोष्टींच्या जोरावर ते आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत गेले.

सुरुवातीपासूनच एकत्र कुटुंबातील आजी-आजोबा, आई-वडिल काका-काकू, बहिण भाऊ हे सारे ललितच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. बालपणी ४ वर्षांचा असताना अचानक पाय लुळे पडून उभं राहता येते नाही हा धक्का त्यांच्यासाठी मोठा होता. काहीही करून त्याला उभं करायचं या जिद्दीने त्याच्या घरच्यांनी वैदू, वैदय, डॉक्टर, जो कोणी जे काही सांगेल ते सर्व उपाय केले. सतत मालिश, पहाटे उठून गरम पाण्यात पाय बुडवून बसणे, नाही नाही ती चूर्ण, गोळ्या सतत खाणे काढे पिणे ह्या गोष्टी ४-५ वर्षाच्या मुलाच्या वयाला अतीच होत्या. पण लेखकाने बालपण कोमेजून गेलं असं न म्हणता घरच्यांचे प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, कष्ट त्यांनी अधोरेखित केली. 

शाळा कॉलेजमथले त्यांचे अनुभव वाचून समाज म्हणून आपण किती अससंस्कृत आहोत याचा सज्जड पुरावाच मिळतो. शाळेमधली मुलं त्याच्या कुबड्या हिसकावून घ्यायचे, चेष्टा करायचे पण शिक्षकही त्याच्यासमोरच त्याची कीव करायचे. एवढच की ११-१२ च्या वर्गातले शिक्षक, प्रयोगशाळा मदतनीसही त्याला काहीही मदत करायचे नाहीत. केवळ एका मित्राच्या मदतीमुळे मी रसायनशास्त्राचे प्रयोग करू शकलो असं लेखक म्हणतो. टोकाचा स्वाभिमानी, असलेल्या ललितला दुसर्‍याकडून कीव, दया, उपेक्षा मिळाली की चीड यायची. वाईट वाटायचं. आपल्याला इतरांसारखेच समानतेने वागणूक मिळावी एवढीच त्यांची इच्छा असायची. ती इच्छा फक्त परदेशी शिक्षणाच्या वेळी ‘स्काॅटलंड’ इथे पूर्ण झाली. होती. पण त्याची पायाभरणी फार पूर्वी शाळेतच झाली होती.

इतर दिव्यांगांपेक्षा ललित एवढा वेगळा आहे की त्याने आयुष्यात असाधारण गोष्टी केल्या. प्रत्येक वेळी सुरक्षित कोषातून तो बाहेर पडला व पुढे गेला. याचं कारण म्हणजे जिद्द व आत्मसन्मान. १२ वी मधे वर्गात त्याला सर्वात जास्त मार्क मिळाले. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी (best outgoing) म्हणून मंचावरून नाव घोषीत झाले तेव्हा खरं तर त्याला खूप आनंद  झाला होता. पण जेव्हा मागच्या ओळीत बसलेला मुलगा तो अपंग आहे ना.. असं म्हणाला तेव्हा क्षणार्थात तो आनंद झाकोळला गेला. तेव्हा मनाशी ठरवले की,  मी कधीही अपंग कोट्यातून कुठेही प्रवेश घेणार नाही. इथेच त्याचा ‘वेगळा’ ते ‘विशेष’ हा प्रवास सुरु झाला. पण त्याआधी शाळेच्या पायऱ्या चढण्यासाठी, कुबड्या घेऊन बसमधे चढण्यासाठी, 4-4 km. चालण्यासाठी त्याला अविरत शारीरीक कष्ट कसे घ्यावे लागले ते वाचून अंगावर काटा येतो. 

BSC करता करताच माहिती काढून (इ.स. २००० चा सुमार) नवीनच सुरु झालेले जीएनआयटीचे काँप्युटरचे कोर्सेस त्यांनी केले. तिथच उत्तम मार्क मिळवून आधीच्या वर्गातल्या मुलाना शिकवले. शिक्षणाला, ज्ञानाला कसा मान मिळतो याचा प्रथम अनुभव त्यांना तिथे आला. त्यानंतर त्यानी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिल्ली कार्यालयात काम करायला सुरुवात केली. बरचसं स्वयंसेवी प‌द्धतीचं हे काम होत. त्यातून पैसे कमी मिळाले तरी प्रचंड अनुभव गाठीशी आला. त्यातच पुढे त्या ऑफिसमधे कायम नोकरी मिळाली. तरी त्याचा राजीनामा देऊन त्यांनी परदेशात शिक्षणासाठी अर्ज केले. व संपूर्ण शिष्यवृत्तीसह स्कॉटलंडला बायोइनफोरमॅटिक्स मधे दीडवर्ष एकट्याने राहून डिग्री घेतली. पुढे भारतात परतल्यावर अपंगांसाठी online forum स्थापन, केला व भारतभरच्या दिव्यांगांशी ते जोडले गेले – computory ज्ञान वापरुन त्यांनी भारतीय काव्य एकत्र आणून विकीपिडियावर काव्यकोषाची निर्मिती केली. कॅनडामधे शिष्यवृत्ती मिळवून PHD साठीही ते गेले पण शरीर अजिबातच साथ देईना. त्यामुळे परत फिरावं लागलं तरी घरी राहून ते १०-१० तास, काम करतात. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष व्यक्तीचा रोल मॉडेल हा पुरस्कार मिळाला आहे.

आयुष्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल लेखक म्हणतो दुःख आणि असफलता हे जीवनाच्या इंजिनासाठी इंधन म्हणून उत्तम काम करतं. दुःखात जगणं व दुःखाबरोबर जगणं हया दोन्हीमधे खूप फरक आहे. खरंच किती समर्पक आहेत या ओळी ! म्हणूनच अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ – कवी : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ – कवी : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी  

पुस्तक– प्रेम रंगे ऋतुसंगे (काव्यसंग्रह)

कवी– श्री सुहास रघुनाथ पंडित, सांगली

प्रकाशक– अक्षरदीप प्रकाशन व वितरण, कोल्हापूर

मूल्य– 150/-

कवितासंग्रहावर परीक्षण लिहिण्याइतकी मी मोठी नाही, समीक्षक तर नाहीच… पण कवितेची अतीव आवड असणारी एक वाचक म्हणून मनापासूनअभिप्राय द्यावासा वाटला.

श्री सुहास रघुनाथ पंडित 

जेष्ठ कवी सुहास पंडित यांच्या ‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या कविता संग्रहासाठी अभिप्राय !

‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या काव्य संग्रहाच्या नावातूनच प्रेम आणि ऋतू म्हणजेच निसर्ग यांचं अद्वैत जाणवतं! 

कवी सुहास पंडित यांनी म्हटले आहे की, कवींच्या कविता… भावनांचा कल्लोळ ‘निसर्गदत्त’ असतो. निसर्गाचे मानवाने केलेले रूप पाहता, निसर्गाशी साहित्यातून जवळीक साधण्यासाठीची त्यांची धडपड त्यांच्या मनोगतातून दिसली.

एकीकडे माणसामाणसातला स्वार्थ, मत्सर वाढत असताना… दुसरीकडे कवी सुहास पंडीत  यांना वाटत की, जगणं समृद्ध होण्यासाठी माणसातील प्रेम, एकी, आपुलकी  नात्यातील जपणूक आणि निसर्गाचा अखंड सहवास, त्याच संवर्धन याचा  अतूट बंध निर्माण करणे खूप गरजेचे आहे.

जेष्ठ समीक्षक विष्णू वासमकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेतून साहित्य शास्त्रातील काव्याबद्दलचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यामुळे त्यांची ही नुसतीच प्रस्तावना वाटत नसून एक अभ्यास वाटला. प्राचीन काव्य आणि शास्त्रकारांची मते, त्याबाबतची माहिती अशा अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. काव्यशास्त्रीय विवेचन हे किती  महत्वाचे आहे हे लक्षात आले. काव्य म्हणजे काय इथपासून ते काव्य कसे करावे, ते कसे असावे त्याची शास्त्रीय तथ्य हे सर्व अतिशय विस्ताराने उलगडुन सांगितले आहे.

काव्य संग्रहातील ‘भेट अचानक’ ही पहिली कविता वाचून, कवीने प्रेयसीच्या भेटीचा आठव शब्दातून शृंगारला आहे त्या प्रीतीचे, रोमांचक भेटीचे चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहिलं.

 ‘अपुरी आपुली भेट’ या कवितेत रोजची प्रेयसीची भेट अधुरी, अपुरी वाटते… तृप्ततेतून, अतृप्तता जाणवते. भेटीचे समाधान पण विरह जाणवणारी ही कविता…

*शब्दांचे पक्षी होतील, ते गाणी गात ते तू समजून घे* असे कवी प्रेयसीला म्हणत आहेत. एक अतीव आर्तता ह्या कवितेतून जाणवली. हे वेगळेपण खूप भावले.

“पुढती पुढती काटे पळता, मन वैर असे का धरते, मनी का भलते सलते येते?”

कवींच्या कवितेतील वरील ओळीत, प्रेयसीच्या वेळेत न येण्याने त्याची जी व्याकुळ अवस्था होत आहे ती  सहज सुंदर शब्दात व्यक्त केली आहे. प्रत्येकाची अशी अवस्था कधीतरी होते, होत असते… तेव्हा कवींच्या  ह्या ओळी नक्कीच आठवतील!

कधीही न पाहिलेले असे काल रात्री पाहिले, असे ‘ध्यास’ ह्या कवितेत कवी सांगतात… तेव्हा ती उत्सुकता वाढत जाते. ओसंडून वाहणारं  यौवन…

‘संयमाला धार होती, तो रोख होता वेगळा’ ही ओळ बरेच काही सांगून जाते!

स्वप्न की सत्य, की भास हे न कळण्यासारखी अवस्था होती. एक  अत्युच्य उत्कटता प्रवाहीत होणारी ही कविता कवीचं हृदय कुठे गुंतले आहे याचे दर्शन घडवते.

प्रीतीची रीत कशी सर्वानाच खुणावते तशी कवीलाही प्रेमाची अनामिक ओढ वाटू लागते. ह्या प्रीतीला शब्दबद्ध करून या  कवितेसाठी ‘अमृतवेल’ हे शीर्षक दिले आहे. निसर्गाच अन प्रेमाच अद्वैत या शिर्षकातून उठून दिसते!

‘व्रत’ ही कविता खूप भावली, जगण्यातील उत्तर कवीने शोधले आहे.

हल्ली नात्यातील प्रेम संपत आले आहे, दुरावा निर्माण होत आहे त्यामुळे लोक म्हणतात कुणी कुणाच नसत. पण इथे कवीने हे म्हणणे खोडून काढत कुणी कुणाचं नसलं तरी मग आपण जगतो कुणासाठी? अस विचारलं आहे. नवीन नात्यासाठी, ते टिकण्यासाठी वागणं, बोलण कस असावं आणि तडजोड कशी करावी… हे तत्वज्ञान युक्त वर्णन अतिशय सुंदर केलं आहे! तुटत आलेली, लयास गेलेली नातीही कमलदलाप्रमाणे फुलतील अशी आशा कवी व्यक्त करतात.

मुलीच लग्न झालं! ती बाई अन आई ही झाली… तिला शहाणपण कस आलं! हे एक बाबा(कवी) ‘शहाणपण’ या कवितेतून हृदयस्पर्शी ओळीतून व्यक्त करतो!

‘सूर्यास्ताची वेळ असे’ ही कविता शब्दातीत वाटली! जीवन जगताना उतार वयात येणारी परिपक्वता ह्या ओळीतून जाणवते. शेवटी  जीवनाच्या सूर्यास्ताच्या वेळेस, काय सोडून द्यावं आणि काय शिल्लक आहे ते मनात ठेवावं हे उलगडून सांगताना कवी म्हणतात,

हिरवेपण जे उरले आहे… तेच जपू या समयाला     

सुर्यास्ताची वेळ असली तरी एक विलक्षण सकारात्मकता या कवितेतून जाणवली!

असतेस घरी तू जेव्हा

फिदा

खूप आवडल्या या कविता!

प्रत्येकाच्या घरी गुलमोहराचं झाड असत पण आपण कुठेतरी दूर शोधत असतो… हे खरं खुर सत्य कवींनी या कवितेत सांगितलं आहे. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील प्रसंग तुम्हा आम्हा सर्वानाच वाटलेल्या अन दाटलेल्या भावना, इथे कल्पनेपेक्षा सत्य जास्त असल्याचे जाणवले. ते आपल्या वेगळ्या शैलीतून कवितेतून कवी सुहास पंडित यांनी मांडले आहे.

एक वधुपिता स्वतःला समजवतोय… आणि अशा अनेक वधुपित्यानाही, आपल्या ‘वधूपित्यास’ या कवितेतून. हे हृदयस्पर्शी शब्द, अन समजवणीचे सूर… कंठ दाटून आला.

कवी सुहास पंडित यांच्या अनेक कवितांमधून त्यांचा शब्दसंग्रह अतिशय उच्च दर्जाचा असल्याचं जाणवलं. कवितेतील शब्दालंकाराने कवितेला वेगळीच खासियत निर्माण होते. फक्त शब्दच नव्हे तर आशय गर्भता, प्रेम -निसर्ग हे साम्य असले तरीही विषयांची विविधता आणि त्यातून त्यांना दिसणार, जाणवणार त्यांचं अद्वैत हे अनेक कवितेतून प्रकर्षाने दिसून आलं. कवी निसर्गाशी समरस झाल्यामुळे माणसातील प्रेमाचे त्याच्याशी अनेकानेक प्रकारे साधर्म्य, एकरूपता आहे असे त्यांना वाटते. इतकंच नाही तर एक वेगळाच असा उच्च कोटीचा उत्कट समागम आहे असे त्यांना वाटत असावे.

कवींच्या कविता वाचताना त्यांच्या शब्दांमधून स्पर्श, गंध, तालाने खऱ्या अर्थाने पंचेद्रिये जागृत होतात.

कवितांची सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट इतका निट्स वाटतो कारण ते सगळं सहज घडून आलेलं शब्दबद्ध केलं आहे. त्यांच्या कवितांना लय आहे, एक ठेका आहे… त्याप्रमाणे वाचत गेलं की ती अर्थ, आशय, विषय यांनी एकरूप झालेली कवीता एक त्रिवेणी संगम वाटते.

   स्वप्नातले विश्व फुलवायचे

   गृहप्रवेश

   मैत्र 

   स्नेहबंध

प्रत्येक कविता आपल्या परीने वेगळी आहे. कोणतीही अढी न ठेवता..स्नेह ठेवण्याच्या ओळी कवी लिहितात… अस कवी म्हणतात तेव्हा त्यांचा स्वभाव एकमेकांना जोडण्याचा आहे असं जाणवतं, त्यांचे विचार आदर्श वाटतात…

कारण स्नेहबंध, नाती, मैत्री  दुरावत असताना आभासी झालेले असताना… कवीला हे वाटण आणि त्यांची अक्षरे कवितेतून झळकण हे विशेष आहे.

त्यांच्या पावसाच्या कविता असोत, प्रेमाच्या असोत, नदीच्या, बळीराजाच्या शेताच्या, श्रावणाच्या असोत प्रत्येकातून चैतन्य फुलते! 

कधी कोपणारा पाऊस, दुष्काळ, कृष्णामाईचा क्रोध, झाडांच्या कत्तलेचा जाब हे चित्र आपल्या कवितेतून श्री पंडित सर उभं करतात.

त्यांना जे हृदयातून वाटत  तस ते लिहितात, उतरवतात… म्हणूनच ते लगेचच रसिकांच्या, वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं ! अस परोपरीने जाणवलं.

श्री. सुमेध कुलकर्णी यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ या कवीता संग्रहातील कवितांना अनुसरून चपखल वाटलं. ‘माणसाचं अन निसर्गाच प्रेम’ हृदयाच प्रतीक म्हणून मानवी हातानी आणि त्यांच्याच कवितेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात असलेल्या गुलमोहराच्या  झाडाच्या फांदीने केलेले बदामाचे चिन्ह आणि एकरूप झालेला निसर्ग हे बरच काही सांगून गेलं.

कविता संग्रहातील कविता अभ्यासण्यासारख्या आहेत. काही कवितांतून तत्वज्ञान मिळत, काही कविता नात्यांची गुंफण शिकवतात, काही कवीता दुष्काळात डोळे पाणावतात, तर काही कवीता निसर्गाचे व्यवस्थापन शिकवतात. काही कवीता समाजाच्या प्रश्नांनी डोळे उघडतात.

हा फक्त कवीता संग्रह नसून प्रेम आणि ऋतू यांना अग्रस्थान मानून, जाणवणारे सत्य, साध्या पण तितक्याच खऱ्या अर्थाने शब्दबद्ध केलेला सर्वांगीण समृद्धीसाठी तळमळ असणारा असा संग्रह आहे. अस मला वाटत. प्रत्येक वाचक- रसिकांनी यातील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. त्यांची कवीता… आपण अनुभवतोय ही जाणीव आल्याशिवाय राहवणार नाही!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆

सौ. अर्चना मुळे 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लामणदिवे” – लेखक : श्री सदानंद कदम ☆ परिचय – सौ. अर्चना मुळे ☆ 

पुस्तक – लामणदिवे

लेखक – श्री सदानंद कदम

प्रकाशक – अक्षर दालन

पृष्ठ संख्या – १४४

मूल्य – रु. २००/-

जेव्हा जेव्हा समाजात अनीती, भ्रष्टाचार फोफावतो तेव्हा तेव्हा समाजाला दिशा देणारा, अंधारात प्रकाश देणारा, छोटीशी ज्योत सतत तेवत ठेवणारा  कुणीतरी जन्माला येतो असं म्हटलं जातं. कोणताही काळ मनश्चक्षू समोर आणला तर फक्त एकच सत्य गोष्ट जाणवते, ती म्हणजे सदासर्वकाळ ‘शिक्षक’, ‘गुरु’ हे लोक लहान मुलांवर खरे संस्कार करतात. ही संस्काराची देण दिव्यासम सतत तेवत ठेवतात. हे तेवणारे दिवे मात्र संख्येने नगण्य आहेत हेच खरे.

शाळांमधे मुलाना तोच अभ्यासक्रम  सर्जनशील, कृतीशील राहून शिकवणारे, व्यावहारीक ज्ञान देणारे कल्पक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आवडले नाहीत तरच नवल! संपूर्ण महाराष्ट्रात असे कितीतरी शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक पालक अशा शिक्षकांच्या शोधात असतो. पण ते अवलिया शिक्षक हर शाळेत थोडेच असतात. ते असतात लाखात एक! दूरवर! 

अशाच शिक्षकांबद्दल भरभरून सांगणारं, त्यांचं कौतुक करणारं आणि त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवणारं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ‘आयुष्यात अक्षरांची जादू असणार्‍या सर्व गुरुजनांना सादर… ‘ असं म्हणत लेखकाने सुरुवात केली आहे. लेखकही साधा माणूस. त्याचं साधं वागणं, रांगडी बोलणं, मोकळंढाकळं राहणं याचा लवलेश अधूनमधून पुस्तकात डोकावतो. तो ज्या वाचकाला सापडला त्याला पुस्तकातील सर्व शिक्षक पात्रं नीट समजली असं म्हणता येईल. कारण लेखकाचं भाषेवर कितीही प्रभुत्त्व असलं तरी उगीचंच शब्दांच्या अलंकृतपणाचा आव कुठेही आणला नाही. पुस्तकात शिक्षक – विद्यार्थी, शिक्षक – प्रशासकीय अधिकारी, दोन शिक्षक, शिक्षक – गावकरी यांच्यातील संवाद अगदी सहज, साध्या, सोप्या शब्दात मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.

हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील १९ अवलिया शिक्षकांची विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारी उत्तम प्रयोगशाळा. शिक्षकांचं फक्त कौतुक करायचं म्हणून नाही तर या शिक्षकांनी केलेले प्रयोग अनेक शाळांमधे केले जावेत. मुलांचं शिक्षण आनंददायी व्हावं. मुलांचा आनंद कशात आहे हे लेखकाला चांगलं माहीत आहे कारण तोही एक जिल्हा परिषदेचा या पात्रांसारखा आगळावेगळा शिक्षकच. म्हणून हे पुस्तक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण ठरेल यात शंकाच नाही.

प्रत्येक शिक्षकाला लेखकाने जवळून अनुभवलंय. शिक्षकांचं शिकवणं, त्यानी केलेले प्रयोग स्वत: डोळ्यानी बघितलेत. काही अनुभवी शिक्षक सहकार्‍यांना गुरु मानलंय. त्यानुसार वेगळी, मुलुखावेगळी, तिची कथाच वेगळी, अवलिया, ध्येयवेडा, अंतर्बाह्य शिक्षक, चौसष्ठ घरांचा राजा, स्वप्नं पाहणारं नक्षत्र, विवेकवादाचं झाड, जिद्दी, झपाटलेल्या, सेवाव्रती, कर्मयोगी, कणा असलेले गुरुजी, स्वप्नं पेरणारा माणूस, हाडाचा मास्तर, जंगलातले गुरुजी, मूर्तीमंत आचार्य, मार्तंड जे तापहीन अशा शीर्षकांमधून त्या त्या शिक्षकी सेवेमधील त्यांचं तप दिसतं.

मुलांना मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान या सर्व विषयांचं आकलन व्हावं, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुलांच्या सर्वोत्तम प्रगतीसाठी झटणार्‍या या शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाला हृदयापासून माझा सलाम!!

महाराष्ट्रातील हे सर्व शिक्षक म्हणजे लेखक सदानंद कदम यांच्या नव्या पुस्तकातील मुलखावेगळे लामणदिवे.

लामणदिवे मधील ही शिक्षक पात्रं कोण आहेत? त्यानी नेमके असे कोणते प्रयोग केले आहेत? ते मुलखावेगळे का ठरले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या शाळेत हे शिक्षक काम करत आहेत? हे पुस्तक वाचल्यावर यातील पात्राना भेटावसं वाचकाना नक्कीच वाटेल. म्हणून शिक्षकांचे छायाचित्रांसह भ्रमणध्वनी क्रमांक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत.

हे पुस्तक म्हणजे पालक शिक्षकांच्या हातातील विद्यापीठ. अक्षरदालन, कोल्हापूर म्हणजे पीठाधिपती. प्रत्येक वाचक हा पुन:श्च असा विद्यार्थी ज्याला वाटेल की असे शिक्षक मला लहानपणी भेटले असते तर… मी वेगळा घडलो असतो.

पालक शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबरच समाज विकासाची ज्योत तेवत ठेवण्याची इच्छा बाळगणार्‍या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं! 

असं हे अद्भुत ‘ ला म ण दि वे!! ‘

परिचय : सौ. अर्चना मुळे

समुपदेशक

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जोहड…” – लेखिका : सुश्री सुरेखा शहा ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆ 

पुस्तक – जोहड

लेखिका – सुरेखा शहा

‘Waterman of India’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजेंद्र सिंह यांच्यावरचं हे चरित्रात्मक पुस्तक.फार वर्षापूर्वी लिहिलेलं. पुस्तकाची सुरुवात होते ती राजस्थानातील अलवर या जिल्ह्यातील एका दूरवरच्या खेड्यातून.हजार बाराशे वस्तीचं हे गाव पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशोधडीला लागलेलं असतं.शेतात फारसं पीक नाही,खायला अन्न नाही, सार्‍यांची पोटं खपाटीला गेलेली.म्हातारी व स्त्रिया मागे राहिलेल्या…पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन.. स्रियांना दूरवर पायपीट करायला लागते आहे.अशक्त, उपाशी मुलं, गरीबी,निरक्षरता, उपासमार अशा दुर्दैवाच्या भोवर्‍यात सापडलेली कुटुंब…

१९७५ सालातलं हे वर्णन आहे. सातपुडा पर्वत रांगांमधील सरिस्का जंगलाजवळचा हा जिल्हा. तिथे बेसुमार जंगलतोड सुरू आहे.सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्याचं’ आगमन होतं. तो एक ध्येयवादी तरुण राजेंद्र.समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेनं आलेला. नुसतंच लग्न, मुलं, संसार करत जगायचं आणि मरुन जायचं या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणूनच तरूण वयात सरकारी नोकरी सोडून, समान ध्येय असलेल्या चार मित्राना घेऊन राजास्थानातील या ‘किशोरी’ गावात तो येतो. काय काम करायचं हे या मित्रांचं ठरलेलं नसतं. हे सर्वजण शहरी, सुशिक्षित तरूण. राजेंद्र तर बी ए एम एस डाॅक्टर. पण तिथली एकूण परिस्थिती पाहून ‘पाणी’ प्रश्नावर काम करायचं निश्चित होतं.आजुबाजूला पाहणी केल्यावर लक्षात येतं की, पूर्वी इथे ‘जोहड’ होते. जोहड म्हणजे पावसाचं पाणी अडवणारे छोटे बांध. ज्यामुळे तळं निर्माण होतं व पुढचा पाऊस येईपर्यंत त्याचं पाणी पुरत असे. मात्र हे जोहड अनेक वर्षांमधे दुर्लक्षित होते. त्यात माती, गाळ साचून निरुपयोगी झाले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर राजेंद्रनी हे काम हाती घ्यायचं ठरवलं. सुरूवातीला गावातले लोक यासाठी पुढे येईनात. तेव्हा राजेंद्रने स्वत: हातात कुदळ घेऊन काम सुरू केलं.त्यांच्याबरोबर आलेले सुशिक्षित तरुणही हे श्रमाचं काम करायला कचरले. गावकर्‍याना किमत नाही तर आपण का घाम गाळा असे म्हणून ते निघून गेले. राजेंद्र मात्र हरला नाही. आठ दिवस एकटा घाम गाळत राहीला. नियती जणु त्याची कठोर परीक्षा घेत होती.अखेर गावातील एक स्त्री घुंघट घेऊन हातात घमेलं, फावडं घेऊन मदतीला आली. ते पाहून लाज वाटून आणखी काही लोक आले.हळूहळू चित्र पालटलं. पावसाळ्याआधी काम पूर्ण झालं. पावसाळ्यात त्यात पाणी साचून राहिलं.शेती चांगली झाली. अन् गावाचं चित्रच पालटलंच.हळूहळू राजेंद्रना ‘तरुण भारत संघ’ या संस्थेचे इतर कार्यकर्ते येऊन मिळाले. त्यानंतर गावागावात या ‘जोहड’ च्या कामाला गती आली. वीस वर्षांमधे ८६०० जोहड बांधून या मरूभूमीचा कायापालट झाला. हळूहळू शेती, शिक्षण, आरोग्य, वृक्षारोपण, बेकायदा जंगलतोड थांबवणे अशा सर्वच क्षेत्रात काम सुरू झालं.

वर्षामागून वर्षे गेली आणि झालेला विकास पाहून या कामाचं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आलं. घर सोडून माहेरी निघून गेलेली राजेंद्रची पत्नी परत आली. समाजानेही या कार्याची दखल घेतली. २००१ साली राजेंद्रना मॅगसेसे पुरस्कार मिळाला.२००५ साली जमनालाल बजाज पुरस्कार, २०१५ साली Stockholm पुरस्कार – Noble Prize for Water मिळाला. यानंतर त्याना अनेक पुरस्कार मिळाले.पाणी प्रश्नावर काम करणार्‍या विविध सरकारी व बिगर सरकारी समितीवर राजेंद्र निवडले गेले.जंगलातील बेकायदा खाणकाम थांबवलं.खाणमजूराना एकत्र केलं म्हणून चिडून खाणमालकानी, भ्रष्ट अधिकार्‍यानी तीन वेळा त्याना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिन्ही वेळा त्यातून ते वाचले.

उत्तर प्रदेशच्या खेड्यातील एका जमिनदाराचा हा मुलगा.शाळेतील शिक्षकानी त्याच्यावर समाजकार्याचे संस्कार केले. गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला.गांधीजी म्हणाले,’खेड्याकडे चला’ म्हणून ते राजस्थानात खेड्यात गेले. जयप्रकाश नारायण यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.२५ – ३० च्या कोवळ्या तरुण वयात घरदार आणि पत्नीला सोडून घरातलं फर्निचर विकून दूर खेड्यात जावून काम करणारा, दृढ निश्चय, प्रखर ध्येयनिष्ठा असणारा हा अवलिया…

त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “जांभळमाया…” – श्री सुभाष कवडे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जांभळमाया…” – श्री सुभाष कवडे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

नाव : जांभळमाया

लेखक : श्री सुभाष कवडे

माझा अभिप्राय मी देणारच आहे पण त्या आधी लेखकाने त्यांच्या मनोगतात जे सांगितलंय ते त्यांच्याच शब्दात : .. ” प्रत्येकाला आपलं बालपण आणि शालेय जीवन खूपच महत्वाचं वाटतं असतं. आपली जडण घडण खऱ्या अर्थाने याच काळात होत असते. आपली जन्मभूमी सभोवतालचे वातावरण, निसर्ग, समाज व्यवस्था, या साऱ्यांचा  परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो. यातूनच या काळात असे काही प्रसंग, घटना घडतात की ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. बालपणीच्या काळातला सभोवातीचा निसर्ग, शिक्षणासाठी केलेली धडपड, या धडपडीतून मिळालेले बळ या साऱ्यांचा आपल्या मनावर विलक्षण प्रभाव पडतो. शालेय जीवनातल्या संघर्षमय घटना आपल्या आयुष्यात उर्जादायी ठरत असतात.”

त्यांचे बालपणीच्या जगाचे र्हृद्य दर्शन त्यांनी या पुस्तकात आपल्याला घडवले आहे. यात लेखांचे दोन भाग केले आहेत.  पहिल्या भागात ते त्यांच्या – माझा माणदेश – जीवनाचा पूर्वार्ध मांडतात. यात एकूण ३१ गोष्टीरूपी लेख आहेत. भाषा सोपी व ओघवती आहे. वाचक जणू काही आपणच ती वास्तवता जगतोय असा रंगून जातो. ” भाकरीचा प्रवास “, ” ” करंजछाया “, ” आयुष्यातले संगीत “, ” माझा अक्षरांचा प्रवास ” हे लेख तर खूपच हृदयस्पर्शी आहेत. खरं तर हे लेख असे वेगळे करताच येणार नाहीत. 

पुस्तकातील दुसरा भाग ललित लेखांचा आहे. यातील १५ ही लेख म्हणजे एकेक हिराच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती या लेखांमधून दिसून येते.

” ते एक मिनिट “, ” ओले मूळ भेदी, पाषाणाचे अंग “, हे लेख मनात घर करून राहतात.

” वाचन, ग्रंथ, माणूस आणि निसर्ग ” या सर्वांचे एकमेकाशी असलेले जवळीकतेचे नाते किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे ते, तो लेख वाचल्यावरच समजेल. या लेखाच्या शेवटी ते म्हणतात – ” पुस्तकं घरात वाचता येतात. ग्रंथालयात वाचता येतात. मात्र माणसं व निसर्ग वाचण्यासाठी भटकाव लागतं. मग कधी झळा सोसाव्या लागतात तर कधी छानसा शिडकावा अंगावर येतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जसे हार – प्रहार सोसावे लागतात तसेच पुस्तकं, माणसं आणि निसर्ग वाचण्यासाठी आपणाला या वाचनाचा लळा लागावा लागतो ” तसेच ” रुमाल” हा लेख खरोखरीच वाचनीय आहे. रुमाल हा शब्द आपण किती सहजतेने वापरतो. हा उर्दू शब्द आहे. पण आपल्या जीवनात ती किती चपखल बसतो हे या लेखात समजते. 

एकंदरीत हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलंच पाहिजे.

या पुस्तकाला डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दिलेली प्रस्तावनाही खूप सुंदर वाचनिय आहे. 

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : चंद्रनागरीचा शब्द (काव्यसंग्रह)

कवी : प्रा. अशोक दास

प्रकाशक : तेजश्री प्रकाशन

प्रथमावृत्ती: ११|१२|२०२३

मूल्य : रु. १५०

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द प्रा. अशोक दास यांच्या ‘ चंद्रनागरीचा शब्द ‘ या काव्यसंग्रहाची सुरूवातच ‘ वारीस जाऊ चला ‘ या भक्ती काव्याने होते. इथून पुढे शब्दांच्या सहवासात वाटचाल करताना या मार्गावरूनच आपल्याला जायचे आहे असेच जणू काही कवीला सुचवायचे आहे. कवीच्या घरातील धार्मिक वातावरण व त्यातून झालेली सांस्कृतिक जडणघडण यांच्या प्रभावामुळे कवीच्या अनेक रचना या सात्त्विकतेने ओथंबलेल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते. ‘संतांची अमृतवाणी’ आपले जीवन घडवण्यासाठी वाट दाखवत असते याची जाणीव कवीला आहे. तोच वारसा पुढे चालू रहावा म्हणून कवीही ज्ञानदेव माऊलींप्रमाणे खळजनांचे मन सुंदर व्हावे आणि पांडुरंगाने सर्वांना सुखी करावे एवढेच ‘ मागणे ‘ मागत आहे. वारक-यांच्या ‘दिंडी’ तून अभंग गात गात जाताना माय मराठी तर धन्य होतेच आहे पण वातावरणच असे भक्तीमय होऊन जाते की ‘ देव सर्वांच्याच मनात ‘ वास करू लागतो. अशा भक्तीप्रवाहात डुंबत असताना सुखदुःखे, अहंकार, काळाचे भान सारे काही विसरून जायला होते आणि नकळत मन ‘ अध्यात्मिक ‘ बनून जाते. विठ्ठलाचे ‘ दर्शन ‘ झाल्यावर नेत्र सुखावतात आणि जन्मोजन्मी हेच मुख दिसत राहो एवढी एकच आस मनाला लागून राहते. पण काही कारणाने वारी घडलीच नाही तर ? तरी काही हरकत नाही. कारण आतून भक्ती करणा-याचा देव पाठीराखा असतो.. चराचरी त्याचे दर्शन होते. आपली दृष्टी विशाल असेल तर ‘ सर्वांठायी पांडुरंग ‘ भेटतो. अशी दृष्टी लाभली की पांडुरंगाच्या ठायी दिसू लागतात  ‘रुपे श्रीरामाची’. त्याच्या विविध गुणांचे दर्शन होते. नकळतपणे सितापती ‘ रखुमापती ‘ बनतो आणि भक्तांच्या अंतःकरणात वास करतो. अशा भक्तांना सुखी करण्यासाठी ‘विठ्ठल आमुचा कैवारी’ आहे याची खात्री पटलेली असते. संतांच्या ‘ भक्तीचा मळा ‘ तर चंद्रभागेकाठी कायम फुललेला असतो. याच ‘ संतांचे स्मरण करावे ‘ आणि त्यांनी शिकवलेल्या धर्माचे पालन करावे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून अवघे ज्ञान साठवावे

अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अनेक कविता आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. कवीचा पिंड त्यातून दिसून येतो. डाॅ. वासमकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कवीचे व्यक्तीमत्व त्याच्या कवितेतून प्रतिबिंबित होत आहे यात शंकाच नाही.

या संग्रहातील भक्तीमय काव्य रचना जशा लक्ष वेधून घेतात तशाच निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दास सरही त्याला अपवाद नाहीत. पावसाच्या थेंबामुळेच बीज अंकुरत आहे आणि हिरवाई भराला येणार आहे. ‘समृद्धीचा सागर ‘ पावसाच्याच हाती आहे. अशा पावसाची फार वाट पाहणे शक्य नाही. जीवघेणी प्रतिक्षा सहन होत नसल्यामुळेच कवी बरसण्यासाठी ‘पावसास आवाहन’ करीत आहे. नंतर कोसळणा-या या पावसात आपल्याच तो-यात नाचताना कवी फुलांच्या गंधात न्हाऊन निघत आहे. पण नको तेव्हा पडणारा ‘ अवकाळी पाऊस’ शेतात राबणा-याला उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र कवीचे मन उद्विग्न होते. मग तो ‘ वरुणास आवाहन ‘ करतो आणि तांडव थांबवण्याची विनंती करतो.

याच पावसातून उगवलेल्या झाडांकडे जेव्हा कवीचे लक्ष जाते तेव्हा कवीच्या हे लक्षात येते की ‘ झाडे ‘ म्हणजे निसर्गातील संतच आहेत. निरपेक्षपणे देत राहणे, स्पर्धा न करता आपला ध्यास जपत राहणे, दुस-याच्या प्रगतीत आनंद मानणे असे सगळे सद्गुण कवीला झाडांच्या ठायी दिसतात. यातून कवीच्या दृष्टीचे वेगळेपण दिसून येते. जगाव कसं हे शिकवणा-या या झाडांतून मग कुठेतरी डवरलेला, बहरलेला पारिजात दिसतो. आभाळाचे दान लाभलेला हा पारिजात जेव्हा मातीस्तव फुलून येतो तेव्हा आपले मनही विरक्तपणे त्या सुगंधी सौंदर्याचा आस्वाद घेते. असा हा पारिजात श्रावणाशिवाय कसा डवरेल ? कवीला तर ‘ श्रावण म्हणजे अवघा उत्सव ‘ वाटतो. रंग गंधाच्या या मासाचे कवीने केलेले चित्रण त्यातील ध्वनीसह डोळ्यासमोर श्रावणमास उभे करते. ऊनपावसाच्या जरतारी सरी लेवून येणारा हा मांगल्याचा मास कवीचा ‘ लाडका श्रावण ‘ होऊन जातो. असा निसर्ग काव्यातून उभा करता करता कवीची शब्द फुलांची बागही फुलून येते आणि सा-या परिसरात शब्द गंध पसरुन राहतो.

असा निसर्ग डोळेभरून जो पाहतो आणि संतांची शिकवण मनात साठवून ठेवतो, त्या कवीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल ? ऋतूच्या रंगांनी निसर्ग बहरावा तसे कवीचे जीवनही सुखदुःखाच्या ‘ ‘ऋतरंगा’नी रंगून गेले आहे. आलेल्या सर्व ऋतूंना अंगावर झेलत कवी ‘ आयुष्य ‘ नावाच्या नव्या ऋतूलाही सामोरा जात आहे. ही ताकद कुठून येते. निसर्गच तर शिकवतो, फक्त शिकून घ्यायला पाहिजे. ‘श्रावण’सरीत न्हाऊन निघणारा प्राजक्त विरक्ती शिकवतो, मनाची निर्मळता शिकवतो. दुस-याच्या जीवनात सुगंध पेरायला शिकवतो. आपल्या दुःखाचा बाजार न मांडता दुःख खांद्यावर घेऊन चालण्याचा आणि इतरांना आधार देऊन त्यांच्यासाठी सावली बनण्याचा ‘ धडा ‘ आत्मसात ‘ केल्याशिवाय मनाची एवढी तयारी होऊ शकत नाही. ‘ कालचक्रा ‘ च्या फे-यामध्य गेलेल्याचा, सरलेल्याचा शोक न करता निसर्ग नियम समजून घेऊन कालक्रमण करत राहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. फुलांच उमलणं आणि कोमेजणं समजून घेऊन त्यांच्याप्रमाणं आपल जीवन सार्थकी लावावं. सुख दुःखाच्या लहरी येतील आणि जातील, आपणच आपल्या आयुष्याच गणित सोडवायचं असतं.

भक्तीच्या मार्गाने आणि निसर्गाच्या सहवासात जीवनाचा अर्थ शोधत असताना कवीचे भवताली घडणा-या घटनांकडेही लक्ष आहे. सत्ता, संपत्ती, स्वार्थ यांत गुरफटलेल्या समाजात संयम आणि सत्य यांना मात्र फारसे स्थान नाही. एकीकडे युगपुरुषांचा

जयजयकार करत दुसरीकडे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारे नेते पाहिले की कवीचे मन विषण्ण होऊन जाते. गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतक-याला मदत करण्याचे नाटक करतानाही एकमेकांशी स्पर्धा करणारे पुढारी केवळ खुर्चीसाठी पळापळ करत असतात हे जनतेने आता ओळखले आहे. मतांचा जोगवा मागायला झुंडीने येणारे पुढारी हे लोकांचे तारणहार होऊच शकत नाहीत. सत्ता ही उपभोगासाठी नसते तर ते सेवेचे फक्त साधन असते हे यांना कधी समजणार ? तरीही कवी आशा सोडत नाही. कृतीशून्य सत्तांधाना फेकून देऊन नवी नीती घडवणारे नवे नेते, नवे राष्ट्रपुरुष जन्माला येतील अशी कवीला खात्री आहे. समाजातील आपपरभाव नष्ट करुया आणि एकमेकांचे मैत्र बनून राहुया हे कवीचे स्वप्न आहे. सर्वांची ताकद एकवटली तर मानवतेचे मंदिर उभारणे अशक्य नाही. या संग्रहातील गारपीट, झुंडी, सारे सारे आपुले, मानवतेची मंदिरे, ठेकेदार, नवे नेते नवी नीती या कवितांतून कविच्या सामाजिक जाणीवा स्पष्ट होतात.

या संग्रहात ‘ मैत्री ‘ चा चंद्रमा आहे. ‘ गुरुजनांच्या’ आठवणी आहेत. ‘ संस्कारशील घरा ‘ चे चित्र आहे. अनंत काळ सर्वांचे हित होत राहो अशी प्रार्थना आहे. प्रत्येकाचे मन आभाळाचे झाले तर विश्व सुखी व्हायला वेळ लागणार नाही हा आशावाद आहे. शहिदांचे मनोगत आहे अन् दीपाचेही मनोगत आहे. कवी बादासाहेबांच्या कार्याचा गौरवही करतो आणि आईच्या आठवणी मनात बाळगत तिच्या नसण्याच्या दुःखाने हळवाही होत आहे. तो कधी जगाच्या पसा-यापासून दूर जाऊन आत्ममग्न होतो तर कधी बालकांच्या समवेत गीतांमध्ये रमून जातो. हे सगळे कशामुळे शक्य होते ? केवळ शब्दांनी इमानाने साथ दिली म्हणून. एकप्रकारे ‘ शब्दांतूनच आयुष्य कहाणी ‘ सांगण्याची किमया कवीला साधली आहे. कवी खुल्या दिलाने मान्य करतो

 “शब्दांनीच जगण्याचे बळ दिले

 शब्दांनीच रस्ता ही दाखविला

 शब्दांनीच, आतल्या आत 

 रडताना

 आपसूक डोळे पुसण्याची क्रिया

 केली “

कवितासंग्रहातील अनेक कविता मुक्तछंदातील असल्या तरीही काही कवितांमधून उत्तम लय साधली आहे. संतांची अमृतवाणी, पारिजात मी, पाऊस, मैत्री, शोध या कवितांचा त्यादृष्टीने उल्लेख करावा लागेल. काही काव्यपंक्तीही उल्लेखनीय वाटतात. उदाहरणार्थ —- समृद्धीचा सागर पावसाच्या हाती, आयुष्य नावाचा ऋतुरंग, सत्ता सेवेचे केवळ साधन असते, इत्यादी. काही शब्द कदाचित सदोष छपाईमुळे अशुद्ध स्वरुपात छापलेले दिसतात. परंतू निरभ्र मुखपृष्ठावरील पूर्णचंद्र आणि अंतरंगातील शब्दांचे चांदणे मनाला शीतल करते यात शंकाच नाही. पूर्णचंद्राच्या प्रकाशात शब्दाचे हे चांदणे जास्त जास्त पसरत राहो एवढीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज” – मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर – परिचयकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज” – मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर – परिचयकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक: द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

(झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन) 

मूळ लेखक: पीटर ओहृललेबेन

मराठी अनुवाद:गुरुदास नूलकर

प्रकाशन: मनोविकास प्रकाशन

पृष्ठ:२०८  

मूल्य:३२०/

अतिशय लोकप्रिय ठरलेले पुस्तक:”द हिडन लाईफ ऑफ ट्रीज” मराठी अनुवाद ,पुन्हा उपलब्ध झाले आहे..कृपया आपल्या वृक्ष मित्रांना कळवावे!

सगळेच कसे अचंबित करणारे!

झाडं आपसात बोलतात, ते आपल्याकडील माहिती इतरांना पोहोचवतात!ते रडतात आणि आपल्या लेकरांची काळजी ही घेतात…जखमी झाडाची काळजी घेऊन त्याला दुरुस्त करतात….

अद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक “लाइफ ऑफ ट्रीज” या पुस्तकातून दाखवतात.

जंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात!

सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते…

तुम्हाला हे वाचताना खरचं वाटणार नाही….वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन!

झाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती आपल्याला आणि आपल्या पाल्यांना वाचताना नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्त्वाची माहिती वाचली याचा आनंदही!

हे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉ जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण होईल….कारण यांचा झाडांशी स्नेह होता.होय जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ही झाडांना बोलायचे….आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की, झाडांना संवेदना असतात…पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती वाचताना तो अद्भुत ग्रंथ निलावंती वाचतोय की काय असे वाटायला लागेल…सांगण्याचा हेतू हाच की वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक वाटतात….

तुम्हाला एकटं राहायला नको वाटतं अगदी तसचं तुमच्या झाडांनाही!एकट्या झाडाचे आयुर्मान ही कमी असतं!होय झाडं ही सामाजिक जीवन जगतात.ते एकमेकांची काळजी घेतात..इतकेच नव्हे तर तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला इतर झाडं अन्न पुरवठा होईल यासाठी मदत करतात….एक दोन दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे…इतकंच नव्हे तर झाडे ही परस्परांना माहिती पुरवतात.त्यांचे विस्तीर्ण असे www सारखे जाळे असते.ज्यात अमर्याद अशी माहिती असते.  त्यांचे ही एक www आहे…त्याला आपल्याला wood wide web म्हणावे लागेल इतकेच!

चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा चंदनाच्या शेतीत कडुलिंब का लावतात? तर तो हेच सांगेल की  हे सहजीवन त्यांना मानवते.अर्थात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. मित्रांमध्ये ते खुश राहतात….

आपल्याला नवल वाटेल की झाडांनाही स्मरणशक्ती असते. त्यांना ऐकू येत आणि त्यांची एक भाषा ही असते. ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात,त्यांना रंग दिसतात…. तुम्ही म्हणाल बस झालं ना राव…निघतो आता.पण थांबा हे वाचून घ्या आधी…

एखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठी ही माहिती देतो. सगळी झाडं या मुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात.आवश्यक ते जैवरासायनिक  बदल स्वतःमध्ये घडवून आणतात…

१९८० मध्ये डेहराडून जवळ चंद्रबनी मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमारत “साल” (समूहात वाढणारे झाडं)जंगलाला साफ करून उभी केली गेली. या संस्थेच्या आवारात एकटी राहिलेली “सालची” झाडं एक एक करून मरू लागली. आपल्या सजातीयांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांचा अंत झाला, पण हे त्यांना कसं कळलं? त्यांची संभाषण यंत्रणा कशी आहे ?

या पुस्तकाविषयी फार जास्त लिहिणं आवश्यक वाटत नाही….कारण याच्या प्रत्येक पानावर अतिशय अद्भुत अशी माहिती आहे. झाडांच्या  नवलाईची दुनिया आपण आणि आपली मित्र नक्की वाचणार याची खात्री आहे.

पोस्ट आपल्या प्रत्येक वृक्षमित्राला पाठवू !

मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन              

मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर   

परिचयकर्ता : अज्ञात 

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 e-id – [email protected]

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘विशाल होत चाललाय माझा सूर्य’ – सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆ परिचय – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆

सौ. मनीषा रायजादे-पाटील

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य’ – सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆ परिचय – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆ 

कवितासंग्रह – विशाल होत चाललाय माझा सूर्य

कवयित्री – अश्विनी कुलकर्णी

प्रकाशक – प्रतिभा पब्लिकेशन,इस्लामपूर

मूल्य – २२० रु

‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा कवयित्री आश्विनी  कुलकर्णी यांचा दुसरा कवितासंग्रह  रसिक वाचकांच्या भेटीला आला आहे .या अगोदर त्यांचा  ‘ शब्दगंध    या पहिल्या कवितासंग्रहाला रसिक वाचकांची भरभरून दाद लाभली आहे. विशाल होत चाललाय माझा सूर्य या कवितासंग्रहास जेष्ठ समीक्षक मा. वैजनाथ महाजन सर यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. तसेच अतिशय देखणे असे असे मुखपृष्ठ चित्रकार सुमेध कुलकर्णी यांनी रेखाटले आहे.जेष्ठ साहित्यिक मा. आनंदहरी अतिशय मार्मिक व प्रेरणादायी पाठराखण केली आहे. तसेच पुस्तकासाठी वापरण्यात आलेला कागद ,छपाई अतिशय चांगल्या प्रतीची असून प्रतिभा पब्लिकेशनने या पुस्तकाची निर्मिती अतिशय दर्जेदार, वाचकाला प्रथम दर्शनी भावणारी व मोहित करणारी अशीच आहे.

कवयित्रीचा जन्म मुंबईसारख्या  स्वप्ननगरीत झाला असला तरी त्या प्रत्येक घटनेकडे उघड्या डोळ्यांनी, चिकित्सक नजरेने पाहतात .  प्रत्येक गोष्टीच्या निरीक्षण, चिंतन मननातून त्यांची कविता जन्म घेते. कवयित्री आपल्या मनोगतात म्हणतातच की, ” कवी सृजनोत्सुक मनाचा असतो. जन्माला घालतो नवीन विचार ..नवीन शब्द ..नवीन भावना आणि नवीन कृती…” कल्पनाशक्ती आणि वास्तवाचे भान यांचा संगम करून लिखाणाद्वारे ‘ शब्दाचीं अपत्ये’ जन्माला घालण्याचं मातृत्व ही खूप मोठी देणगी आहे.आणि खरंच, ही खूप मोठी देणगी माझी सखी कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांना लाभली आहे.

समाजमनाची अस्वस्थता कवयित्रीच्या मनाला बोचत राहते .आणि तीच अस्वस्थता त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरत जाऊन  त्यांची  कविता जन्म घेते. या कविता काळजाचा ठाव घेतात. त्यांच्या कवितेत अनुभवाची, भावनांची कितीतरी विलक्षण वळणे आहेत. प्रत्येक वळणात अभावाची, दुःखाची, सकारात्मकतेची, प्रेमाची, विरहाची व मानसिक वृत्तीची परिचित अपरिचित स्पंदने आहेत .भावभावनांच्या  अगणित किरणातून साकारत, शब्दमय होत  त्यांचा सूर्य असा  विशाल होत चाललाय.

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या संवेदनशील मनातून अनेक  विषयांची आशयघन मांडणी आपल्या अनेक कवितेतून मांडत आहेत.  कवितासंग्रहातील कविता या विविध विषयांवरील कविता आहेत.. माणूस जसा कुटुंबात, समाजात वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलेला असतो तसेच तो त्याच्या भावतालाशी, निसर्गाशीही विविध भावनात्यांनी जोडला गेलेला असतो. पाऊस हा माणसाच्याच नव्हे तर अवघ्या निसर्गाच्या जगण्याचा अविभाज्य भाग.  पावसाची विविध रुपं कवीचेच नव्हे तर समस्त मानवजातीचे भावविश्व आंदोलीत करत असतात. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेतही याचे प्रतिबिंब दिसून येते. पावसाविना शुष्क झालेल्या धरतीमातेची चिंता त्यांच्या मनात, कवितेत डोकावताना दिसते.. पण ती शब्दातून व्यक्त होत असताना त्यात आजच्या काळातील स्त्री मनाची स्पंदने एकरूप होताना दिसतात. त्या आपल्या कवितेत म्हणतात,

मुसळधार नव्हेच,

रिमझिम ही नाही…

कसा येईल ग्लो धरणीवर?

कोणतं मॉयश्चरायझर लावायचं तिला?

जीवनात पुढे पुढे चालत राहणे हा मानवी स्वभाव आहे. त्याला प्रगती हवी असते.. पण प्रगतीची परिमाणे मात्र व्यक्तीपरत्वे भिन्न भिन्न असतात. एखाद्याला जी बाब प्रगतीची वाटेल ती दुसऱ्याला प्रगतीची वाटेलच असे नाही.  ज्या क्षणी माणसाने यंत्र युगात प्रवेश केला तिथून माणसाच्या प्रगतीच्या व्याख्या इतक्या बदलून गेल्या आहेत की निसर्गाचा एक घटक म्हणून विचार करता मनात प्रश्न निर्माण व्हावा की खरेच ही प्रगती आहे काय ?  हाच प्रश्न कवयित्रीच्या चिंतनशील मनाला सतावत राहतो आणि मग त्या आपल्या कवितेतून विचारतात,

माणसाच्या प्रगतीचा आलेख,

उंचावत असताना, 

निसर्गाच्या जपणुकीचं व्यवस्थापन,

कोलमडतंय का?

कवी-कवयित्रीचे भवतालाशी, निसर्गाशी अतूट असं जिव्हाळ्याचे नाते असते. मुळातच मानवी भावरूपाला भवतालाच्या परिस्थितीचे एक सोनवर्खी कोंदण असते. त्यात संवेदनशीलता, तरलता ल्यालेल्या कविमनावर तर भवतालाच्या रूपाची झुल असतेच. हे सांगताना कवयित्री म्हणते,

सगळीकडे हिरवंगार असतं,

तेव्हा कवींचे शब्द न् शब्द,

हिरवेगार प्रसवतात,

मंद गंधाळताना….

जीवनात संयमाचे महत्व खूप आहे. ‘धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी ‘ असे म्हणतातच. आजच्या या ‘ झटपट ‘ च्या बदलत्या काळात, जमान्यात धीर, संयम हे शब्दच मुळात दुर्मिळ झालेत.. पण त्यांचे मानवी जीवनात महत्व अबाधित आहे. हेच अबधितत्व अधोरेखित करताना कवयित्री म्हणते, 

उद्या पहाट बघण्या, रात्र ही रोज येते

रात्र संयमाची मोठी, पहाट खंत दूर करते

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांनी कविता कधी परखड होते तर कधी ती समजावण्याचा सूर घेऊन येते.  आपल्या समोरची व्यक्ती खरंच साधू आहे की साधुवेशधारी मायावी रावण हे सीतेलाही उमजले नव्हते..  आजही समोर, जवळपास असणारी व्यक्ती खरंच सज्जन आहे की सज्जनपणाचा मुखवटा धारण केलेला कुणी दुर्जन हे  आजच्या सीताही ओळखू शकत नाहीत.. इतकी ही साशंकता, भय पावलोपावली आहे हे आजच्या समाजातील भयाण वास्तव आहे. आणि म्हणून सावध राहायला हवे हे समजावून सांगताना त्या म्हणतात,

पटकन होऊ नये फुलांनी कुणाचं

देऊ नये आपला रंग, गंध, सर्वस्व

कोणत्याही हातांना

कोण जाणे..

किती हात खरेखुरे आहेत सोज्वळ?

कोणत्या हातांनी, आपण कुस्करणार?

कुठं माहीत असतं फुलांना…

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेची शीर्षक पाहिली तर त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य व नावीन्यपण आपल्या लक्षात येते.  ‘तुडुंब ओळी,  अभद्र मुखवटे, अदृश्य जखम, गैरसमजाच्या गाठी ,केंद्रस्थानची हिरवळ, पोलादी ढाल, नेढ सुईचं, अपराधगंड , शहरातील ऑक्सिजन, तुझ्या अस्थींची पालवी , माफ केलंय अंधाराला, अदृश्य चित्रकार , स्पेस व म्यान इत्यादी.

अतिशय अर्थपूर्ण व नाविन्यपूर्ण विषयांच्या कविता या कवितासंग्रहात नक्की रसिक वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतील असा विश्वास आहे. असाच वेगळेपण ल्यालेला त्यांचा पुढचा कवितासंग्रह लवकरच रसिक वाचकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आणि खात्री आहे.  कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांना त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !

प्रस्तुति – सुश्री मनीषा रायजादे-पाटील

सांगली

मो.  9503334279

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंतर्नाद ” – (कविता संग्रह)- कवयित्री : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंतर्नाद ” – (कविता संग्रह)- कवयित्री : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : अंतर्नाद (कविता संग्रह) 

कवयित्री : मंजुषा मुळे 

पृष्ठे           : १११ 

मूल्य         : रु. १००/-

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.

परिचय : श्री सुहास रघुनाथ पंडित

सौ. मंजुषा सुनीत मुळे

सौ. मंजुषा मुळे यांचा ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह. त्याला श्री. प्रवीण दवणे यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीची प्रस्तावना. त्यातून कविता हा आवडीचा विषय. त्यामुळे हा कविता संग्रह वाचून काढणे अगदी स्वाभाविक होते. काही कविता वाचल्यावर लक्षात आले की हा संग्रह फक्त पाने उलटवण्यासाठी नाही, तर लक्षपूर्वक वाचण्यासाठी आहे. मग त्या दृष्टीने अभ्यासच सुरू झाला आणि आता खूप छान छान कविता वाचायला मिळाल्या याचा आनंद आहे. तो आनंद सर्वांना वाटावा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न !

विषयांची कमालीची विविधता असलेल्या या काव्यसंग्रहाची सुरुवातच सौ. मंजुषा मुळे यांनी एका जीवनविषयक कवितेने केली आहे. शब्द, हास्य, अश्रू यातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्वतःला माणूस म्हणवून घेण्यासाठी शब्द कसे असावेत, हास्य कसे असावे हे सांगताना नात्यांचं नंदनवन फुलवता यावं अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

जगातील स्वार्थीपणाचे अनुभव “ चंद्र “ या कवितेतून चंद्राकडूनच वदवून घेणे ही वेगळीच कल्पना फार भावते.

जगण्याच्या प्रवासात आपली साथ कधीही सोडत नाही ते म्हणजे आपलं मन. या मनाचं आणि घनाचं असलेलं अतूट नातं त्यांच्या ‘वळीव’ या कवितेतून त्यांनी सुंदरपणे विशद केलं आहे.. मनाची होणारी फसगत पाखराच्या रूपातून पहायला मिळते.

असं हे त्यांचं कविमन प्रेमरसात नाही भिजून गेलं तरच नवल ! ‘आतुर’ आणि ‘येई सखी’ यासारख्या प्रेमकविता लिहिताना त्यांची लेखणी मृदू होते. खरं प्रेम म्हणजे काय हे त्या ‘प्रेम’ या कवितेतून स्पष्ट करतात. निसर्गातील सुंदर प्रतिकांचा वापर कवितेचे सौन्दर्य वाढवतो. — ‘ नाही आडपडदे, नाही आडवळणं…. नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं…… ’ ही निखळ प्रेमाची व्याख्या फार बोलकी आहे.

तर प्रेमभंगाच्या दु:खात होरपळत असतांनाही ‘ आपल्या प्रीतीचे निर्माल्य झाले ‘ ही कल्पना प्रेमाचे पावित्र्य उच्च पातळीवर नेऊन ठेवते.

स्त्री सुलभ वात्सल्य भावना त्यांच्या ‘हुरहूर’ या कवितेतून दिसून येते. पिल्ले घरातून उडून गेल्यावर ‘ मनी दाटे हुरहूर | रीत वाटे ही उलटी | पिल्लू भरारे आकाशी | घार व्याकुळे घरटी ||’ ही एका आईची भावना मनाला भिडलीच पाहिजे अशी.

स्त्री जीवनाविषयी भाष्य करताना ‘जातकुळी’ या कवितेत त्यांनी आकाशातील चांदण्यांचा दाखला दिला आहे. आजूबाजूला माणसांचा, सख्यांचा गोतावळा असला तरी स्त्रीचे विश्व हे तिच्यापुरते, तिच्या कुटुंबापुरते मर्यादित असते. ‘आखला परीघ भवती, तितुकेच विश्व आम्हा’ अशी खंत त्या व्यक्त करतात. याचबरोबर ‘ मी कोण ‘ या स्वतःला पडलेल्या प्रश्नाचं अगदी मार्मिक उत्तरही त्यांनी अगदी सोप्पं करून टाकलेलं आहे.

‘पूजा’ ही कविता म्हणजे भक्तीचा नेमका मार्ग दाखवणारी कविता असेच म्हणावे लागेल. पंढरीच्या वारीचे वर्णन करणारी, भक्तांच्या मनातील भाव व्यक्त करणारी अशा दोन कविता त्यांनी लिहिल्या आहेत. परमेश्वर हा आपला सखा आहे, पुत्र आहे की भाऊराया आहे असा प्रश्न त्यांना पडतो. देवाकडे त्यांनी मागितलेले एक वेगळंच ‘ मागणं ‘ त्यांच्या वैचारिक वेगळेपणाचं द्योतक आहे.

त्यांच्या वैचारिक आणि चिंतनात्मक कवितांचा विचार केला तर अनेक कवितांचा उल्लेख करावा लागेल. या कविता गंभीर प्रकृतीच्या, विचार करायला लावणा-या असल्या, तरी भाषेची कोमलता, चपखल प्रतिकांचा वापर, कल्पना आणि काव्यात्मकता यामुळे बोजड वाटत नाहीत.

‘वास्तव’ या रुपकात्मक, लयबद्ध कवितेतून सध्या सर्वांच्याच आयुष्यात घडणारे वास्तव त्यांनी अतिशय उत्तम अशा उदाहरणांनी समजावून दिले आहे. गंध म्हणजे फुलाचे मूल. गंध फुलापासून दूर जातो. फूल तिथेच असते. गंध फुलाकडे म्हणजे स्वतःच्या घराकडे कधीच परतून येत नाही. फूल मात्र त्याच्यासाठी झुरत असते. कर्तृत्वाचे पंख लावून लांबवर उडणारी चिमणी पाखरं घराकडे परततच नाहीत, तेव्हा घरातील थकलेल्या त्या जीवांचे काय होत असेल हे सांगण्यासाठी यापेक्षा सुंदर दुसरे कोणते उदाहरण असेल?

माणसाची संपत्तीची हाव संपता संपत नाही. पण इथून जाताना काहीही घेऊन जाता येत नाही हे त्यांनी साध्या सोप्या शब्दात ‘हाव’ या कवितेतून सांगितले आहे. ‘भान ‘ या आणखी एका कवितेत त्यांनी दिलेला उपदेशात्मक संदेशही तितकाच मोलाचा आहे. ‘घरटे अपुले विसरू नको’ किंवा ‘मातीला परी विसरू नको’ यासारखी सुवचने त्या सहज लिहून जातात.

‘अंधाराला उजेडाचे कोंब फुटावे, तसे मातीच्या गर्भातून उजळू पहाणारे नवचैतन्याचे अंकूर ‘ ही ‘आषाढमेघ ‘ कवितेतील कवीकल्पना मनाला भावून तर जातेच, पण त्यांच्या आशावादी मनोवृत्तीवर प्रकाश टाकते. जगण्याचे चक्रव्यूह भेदत असताना आपल्या वाट्याला आपले स्वतःचे असे किती क्षण येतात?अशा वेगळेपणाच्या संजीवक क्षणांची कवयित्री वाट पहात असते. कारण हे ‘ क्षण ‘च वादळवा-यात तेवत राहण्याचे बळ देत असतात.

जगणं सुसह्य होण्यासाठी त्या वेळीच सावध करतात आणि जगताना स्वतःला कसं सावरलं पाहिजे हे ‘सावर रे’ या कवितेतून सांगून जातात. जगतानाची अलिप्तता ‘उमग’ या कवितेतून दिसून येते.

देवाच्या हातून घडलेल्या चुका दाखवण्याचे धाडसही त्यांनी ‘चूक’ या कवितेतून केले आहे.. चूक देवाची दाखवली असली तरी कविता माणसांविषयी, त्यांच्या गुणदोषांविषयीच आहे. ‘गती’ या कवितेतून त्यांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. ‘ संसाराच्या खोल सागरी, अलिप्त मन अन् मती ‘ यासारख्या अर्थपूर्ण काव्यपंक्ती यात वाचायला मिळतात. आयुष्याचे केलेले उत्तम परिक्षण त्यांच्या ‘श्वास’ या चिंतनात्मक कवितेतून वाचायला मिळते. ‘अश्रूं’वरील त्यांचे चिंतन हे खूपच वेगळे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे……. एकूणच त्यांच्या चिंतनात्मक कविता वाचल्यावर त्या आयुष्याकडे किती गंभीरपणे आणि वेगवेगळ्या नजरेने पाहतात हे समजून येते. म्हणून तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी ‘आपली मती वापर ‘अशी कळकळीची विनंती त्या करतात.

कलावंताची आत्ममग्नता त्यांच्या ‘चांदणे’ या कवितेत अनुभवायला मिळते. जगाची पर्वा न करता स्वतःच्याच धुंदीत जगणारी कवयित्री या चांदण्यात चमकताना दिसते.

अशी आत्ममग्नता असली तरी वास्तवाचा स्वीकार करताना त्यांची लेखणी काहीशी उपरोधिक बनते. मनाला मनातून हद्दपार केल्याशिवाय जगणं शक्य होणार नाही याची जाणीव करून देऊन फाटलेलं आभाळ पेलायचं रहस्यही त्या सांगून जातात. ही ‘समज’ त्यांना अनुभवातून आणि आयुष्याच्या निरीक्षणातूनच आली आहे.

त्यांच्यातील वैचारिक गांभीर्यामुळे त्यांच्या हातून सामाजिक आशयाच्या अनेक कविता लिहून झाल्या आहेत. ‘गर्दी’ सारखी कविता आधुनिक समाजाचे दर्शन घडवते. ‘वृद्धाश्रम’ मधून त्यांनी वृद्धाश्रमाचे केलेले चित्रण आणि वृद्धांची मानसिक अवस्था लक्ष वेधून घेते. — “ अन्नासाठी जगणे की ही जगण्यासाठी पोटपूजा ? मरण येईना म्हणून जिते हे.. जगण्याला ना अर्थ दुजा “ हे शब्द मनाला फारच भिडतात.

’त्याने ‘ मांडलेल्या ‘ खेळा ‘ चे वर्णन करतांना जगातील उफराटा न्याय त्या सहज शब्दात दाखवून देतात. माणसाकडून चाललेल्या वसुंधरेवरील अन्यायाचे ‘कारण’ शोधण्याचा त्या प्रयत्न करतात. निसर्गातले दाखले देत देत त्या एकीकडे ढोंगीपणाचा निषेध करतात तर दुसरीकडे सकारात्मकतेतून ‘सुख’ शोधण्याचा मार्ग दाखवतात. ‘आमचा देश’ किंवा ‘जयजयकार’ या सारख्या कवितेतून भ्रष्टाचारग्रस्त समाजाचे चित्रण पहावयास मिळते. हे चित्र बदलून समानतेची, मानवतेला शोभेल अशी ‘दिवाळी’ यावी अशी अपेक्षा त्यांना आहे. स्वराज्यातून सुराज्याकडे जाण्यासाठी समाजाला त्या आवाहन करतात. ” मर्कट हाती कोलीत तैसा, स्वैराचारा जणू परवाना | दुर्दशेस या आम्हीच कारण, उठवू न शकतो निद्रिस्त मना ” हे त्यांचे शब्द फार अर्थपूर्ण आहेत.

‘कारागीर’ ही एक उत्तम रूपकात्मक कविता वाचायला मिळते. स्वतःला सर्वशक्तीमान समजणा-या मानवाची अवस्था काय झाली आहे हे आपण अनुभवतो आहोत. शेवटी शरणागती पत्करुन पश्चात्ताप करण्याची वेळ आलेलीच आहे. हेच अत्यंत प्रभावी शब्दात कवयित्रीने व्यक्त केले आहे. ‘राष्ट्र… पण कुणाचे?’ किंवा ‘साठी’ या सारख्या विडंबनात्मक कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ कळा ‘ या एकाच शब्दातून ध्वनित होणारे विविध अर्थ सांगतांना ‘ चंद्राच्या कला ‘ असा उल्लेख थोडा खटकतो.

याबरोबरच त्यांच्या निसर्गकविताही उल्लेखनीय आहेत. ‘सांजसकाळ’ या कवितेतून निसर्गात दररोज घडणा-या घटनांचे त्यांनी खूप वेगळ्या नजरेने पाहून नाट्यमय रितीने वर्णन केले आहे. पावसाच्या धारांमध्ये लपलेलं संगीत त्यांनी इतक्या सुंदर शब्दात ऐकवलंय की ही मैफिल संपूच नये असं वाटतं, पण ‘पाऊस’च ही मैफील संपवतो आणि आपण मात्र त्या श्रवणीय सूरांत हरवून जातो. लयबद्ध, गेय अशा भावगीताच्या वळणाने जाणारी ‘ साक्षात्कार ‘ कविता वाचतांना आपल्यालाही कृष्णसख्याचा साक्षात्कार घडून जातो. ‘ धुके ‘ ही कविता म्हणजे कल्पनाविलासाचा उत्तम नमुनाच आहे.

बालपणापासून मनाच्या कोप-यात लपून बसलेली कविता, संधी मिळताच डोके वर काढीत होती. शब्दांचा तो नाद मनाला ऐकू येत होता. मनातल्या भावना शब्दबद्ध करून सर्वांसमोर आणाव्यात असं वाटत होतं. या सा-याचं फलित म्हणजे ‘अंतर्नाद’ हा कविता संग्रह ! त्यांचा अंतर्नाद आता रसिक वाचकांच्या हृदयाला हात घालत आहे. आत्मचिंतन करून मुक्तपणे मांडलेले विचार, जीवनाविषयी दृष्टीकोन मांडतानाच निसर्गाशी असलेलं नातं जपणं, आस्तिकता जपतानाच सामाजिक जाणिवांचे भान असणं, जे जे वाईट आहे त्याची चीड येऊन त्याविषयी आपला संताप आक्रस्ताळेपणा न करता व्यक्त करणं, कधी उपहासाचे चिमटे काढणं तर कधी स्वप्नात रंगून जाणं…. अशा विविधांगांनी नटलेल्या कवितांचे दर्शन त्यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहात होते. त्यामुळे त्यांनी नकळतपणे रसिकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. त्यांच्या हातून अशाच कितीतरी उत्तमोत्तम रचनांची निर्मिती होत राहो या सदिच्छा.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares