(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 115 ☆ देश-परदेश – समय और साधन तो बदल गए लेकिन हम नहीं बदले ☆ श्री राकेश कुमार ☆
दो दशक पूर्व अजमेर से जयपुर बस द्वारा यात्रा करते हुए एक ग्रामीण को बीड़ी पीने से मना करने वाली सूचना की तरफ ध्यानाकर्षण किया था। उसने लपक कर कहा था, हम तो पहले भी बीड़ी पीते थे, अब भी पियेंगे। तू बड़ा आदमी है, तो अपनी माचिस की डिबिया (मारुति कार) में यात्रा किया कर, हम तो बस में बीड़ी पीते ही रहेंगे।
विगत सप्ताह जयपुर की मेट्रो ट्रेन में यात्रा करते हुए पढ़े लिखे प्रतीत हो रहे दो युवा तेज आवाज़ में मोबाइल पर राजनीतिक बहस के मजे ले रहे थे। मेट्रो में तेज आवाज़ के साथ मोबाइल उपयोग निषेध सूचना भी अंग्रेजी और हिंदी दोनों भाषा में बताई जाती है।
अब बीड़ी का चलन बदलकर गुटखे का हो चुका हैं। नियम तोड़ने के लिए नए साधन मोबाइल ही सहारा रह गया हैं। रेल यात्रा में देर रात्रि तक वीडियो सुने और देखे जाते हैं। पुराने समय में कुछ यात्री ट्रांजिस्टर लेकर चलते थे, लेकिन चलती ट्रेन में उसकी कनेक्टिविटी नहीं मिल पाती थी।
हवाई यात्रा जहां सब के बैठने का स्थान निश्चित होता है, लेकिन जैसे ही बोर्डिंग की सूचना मिलती है, पहले हम पहले हम के धक्के लगने लग जाते हैं। अंतरराष्ट्रीय यात्रा में सीट नंबर के अनुसार प्रवेश मिलता है, तो कुछ स्थिति नियंत्रण में रहती हैं।
हवाई यात्रा की समाप्ति पर अधिकतर यात्री गंतव्य स्थान से बहुत पहले उठ कर केबिन से अपना सामान निकालने लग जाते हैं। उतरने की इतनी जल्दी होती है, मानो जहाज में आग लग गई हो। बाहर निकल कर सबका लगेज तो बेल्ट में एक साथ ही आता है। हम सब बेचैन प्राणी हो चुके हैं। सब को जल्दी रहती है, पर कारण कुछ विशेष नहीं होता है। इतनी शिक्षा और विगत कुछ वर्षों से तो व्हाट्स ऐप का भरपूर ज्ञान भी खूब मिला है, हम सबको, लेकिन हम नहीं बदलेंगे। यदि आज अवकाश है, फिर भी आप सब तो जल्दी जल्दी इस लेख को पढ़ रहें हैं, ना ?
“स्वीकार” सुध्दा दैवी गुणच आहे ह्याची मला जाणीव झाली. देणे सोपे नाही हे आपण मानतोच पण मन:पूर्वक स्वीकार सुध्दा कठीणच बरं.
वरवर स्वीकारणे व खरे स्वीकारणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देणार्याने देत जावे व घेणारा त्या क्षमतेचा असेल तरच ती दैवी संपत्ती ची देवाण घेवाण होते.
सद्गुरू परमहंस तळमळत होते त्यांच्या ज्ञानदानासाठी. गोष्ट प्रथम ऐकली विशेष वाटली नाही. पण अनुभवाने समजतंय सत्पात्रही तितकेच महत्त्वाचे आहे. विवेकानंद दिसल्याबरोबर तळमळ शांत झाली व ज्ञानदान करत असताना दैवी आनंदाची अनुभूती दोघांनाही आली.
हा सुयोग असतो ते दैवी कार्य असते ते क्वचितच घडत असते.
त्याला चमत्कार म्हणता येईल. सृष्टी चमत्कार.
असे दैवी संकेत व कार्य अव्याहत सुरू असते.
स्वामीजी हे एक उदाहरण स्वरूप लिहिले.
शंखामध्ये मौक्तिकाची निर्मिती हे दैवी क्षणाचे द्योतक आहेत.
म्हणून देणे व घेणे या परस्परपूरक क्रिया आहेत हे पटते.
यालाच once in a life time opportunity म्हणतात.
एकतर देण्याची किंवा घेण्याची पूर्ण तयारी करणे हेच खरे जीवन आहे. एक मार्ग निवडणे आवश्यक आहे.
(अन्यथा जास्तीत जास्त गोष्टी आपण वायाच घालवतो.)
गुरू शिष्य जोडीच अमरत्व प्राप्त करू शकते. मधला पर्याय नाहीच.
या अशा क्षणांची अनुभूती घेणे अध्यात्म आहे.
||जय भवानी जय शिवाजी ||
।।जय शिवराय।।
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराज्यांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”
मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
ही अशी जाज्वल्य राजमुद्रा ज्यांची आहे व शुकासारखे पूर्ण वैराग्य व वशिष्ठासारखे ज्ञान असणारे रामदास स्वामी ही उत्तम गुरू शिष्य जोडी आहे. अश्या या सुवर्ण युग निर्मित्यावर स्वातंत्यवीरांनी केलेले कवन म्हणजे सर्वोत्तम कलाकृती च म्हणावी लागेल.
प्रखर देशभक्त, उत्तम कवी व युगनिर्मात्याचे चरित्र हे ह्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
सावरकर म्हणताहेत यवनाचा पृथ्वी वर अतोनात भार झाला व हिंदूंची श्रध्दास्थाने व गोमातेचा वध करू लागलेत. हे श्री महाराजांना सहन होणे शक्यच नव्हते. अशा दयनीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी…
प्रभूवर भूवर शिववीर आला…
हे हिंदूंचे हाल जिजाऊ कसे पाहू शकणार? त्यांना सावरकर जगताची जननी उद्बोधत आहेत. अशा या मातेने शिवबांना असे बाळकडू व ओतप्रोत देशप्रेम दिले व कुलभूषण हा संस्कृतीसंरक्षकच नव्हे तर संवर्धक बनला.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
सावरकर जिजाऊ शिवबा जोडीची तुलना राम कौसल्या, कृष्ण यशोदा यांच्या शी करतात.
रामकृष्णांनी जसा राक्षसांचा वध केला तसेच महाराजांनी अती क्रूर यवनांचा नि:पात करुन स्वराष्ट्र निर्मिती केली व चंद्र जसा कलेकलेने वृध्दिंगत होतो तसे सुराज्य प्रस्थापित केले.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
“जय जय रघुवीर समर्थ” चा उद्घोष दिशादिशात घुमला व सर्वोत्तम गुरू शिष्य जोडी उदयास आली. देश व धर्म जागवणे व वाढवणे हेच त्यांचे ब्रीदवाक्य ठरले. राजकारण डावपेच शिकवणारे गुरु कृष्णनीतीची आठवण करून देणारे ठरलेत.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
पुढील दोन कडव्यात सावरकर अफजलखानाचा अतर्क्य असा खातमा व नंतर आई भवानी चा गोंधळ याचे रसभरीत वर्णन करतात. काय तो दैदिप्यमान सोहळा असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मातोश्रीचे स्वप्न व कुलस्वामिनी जगदंबेने स्वप्नात भवानी तलवार देणे अद्भुत अलौकिक च असे ते गाताहेत.
प्रभूवर भूवर शिववीर आला…
शेवटी सावरकर गदगद् होऊन म्हणतात या सुपुत्राने “अवतार कार्य” पूर्णत्वास नेले. अशक्य कार्यास अवतार कार्य म्हणताहेत. व कार्यपूर्ती करून निजधामास गेले. अशा या युगपुरुषाचे कवन विनायकासोबत इतर सगळे कवी गाताहेत ही अत्युत्तम कोटी ते करताहेत. (सविनायक कविनायक)
प्रभूवर भूवर शिववीर आला…
असा हा त्रिवेणी संगम आपणासमोर यथामती मांडताना परमानंद होतो आहे.
☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆
१. आई कधी रिटायर होते का !
मूळ हिंदी कथा : क्या माँ भी कभी रिटायर होती है!
दहा वाजायला काहीच मिनिटं बाकी होती. सगळ्यांच्या नजरा मुख्य दारावर खिळल्या होत्या. आणि मिसेस अनिता जोशींनी ऑफिसात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडून त्यांनी आत पाय ठेवताच सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यांना कुंकू लावलं, ओवाळलं, हार घातला आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. सर्वांनी त्यांना सुखी, संपन्न, निरोगी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस विशेष आहे, हे त्यांना जाणवून द्यायचा सगळेच जण प्रयत्न करत होते. अगदी क्षणक्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.
कितीही प्रयत्न केला, तरी त्या आपल्या भावना अडवू शकल्या नाहीत. डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंना पदराने पुसत त्या पुढे गेल्या. एका कर्मचाऱ्याने खाली वाकून त्यांच्या पुढ्यात मस्टर ठेवलं. मिसेस जोशी सही करू लागल्या. मस्टरवरची ही त्यांची शेवटची सही होती. सहीच कशाला, ऑफिसचा प्रत्येक क्षणच त्यांच्यासाठी शेवटचा होता. भावुक होऊन प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाच्या कॅमेऱ्यात कैद करत प्रत्येक क्षण जगायचा त्या प्रयत्न करत होत्या.
मिसेस जोशींना माहीत होतं, की उद्यापासून हे ऑफिस त्यांच्यासाठी परकं होणार आहे. नोकरीचा हा शेवटचा दिवस त्यांना उलटसुलट झटके देत होता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून मुक्तीचा आनंद की खुर्ची जाण्याचं दुःख.. ! द्विधा मनःस्थिती.. !
” मॅडम, आज तुम्ही काम करू नका. सगळ्यांशी बोला आणि फक्त निरोपसमारंभाची तयारी करा. ” असा नियम नाही. पण मॅनेजरसाहेबांनी सहृदयता दाखवली. टार्गेटच्या या काळात ती दुर्मिळच झालीय!
मिसेस जोशींनी मोबाईल उघडताच त्यांच्या डोक्यात भविष्यातल्या योजनांचा प्रवास वेगात सुरू झाला. त्या विचार करू लागल्या – नोकरी करता करता चाळीस वर्षं कशी निघून गेली, कळलंच नाही. मुंबईचं हे वेगवान आयुष्य, रोजची ट्रेनची धावपळ…. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर घर-संसाराचं दृश्य तरळलं. ते तर त्यांना यापुढेही निभवायचं होतंच. मुलीचं डोहाळजेवण, मुलगे, सुना, नवरा, सासूच्या जबाबदाऱ्या, नंतर नातवंडांशी खेळायचं स्वप्न, त्यांना सांभाळणं, त्यांच्या अभ्यासाची काळजी, वयपरत्वे येणारी दुखणी, स्वयंपाकाची जबाबदारी…. हे सगळं तर निभवायचंच आहे. सेवानिवृत्ती म्हणजे ऑफिसातून मिळणाऱ्या पगारातून निवृत्ती! आई कधी रिटायर होते का?
आणि मोबाईल बंद करून त्या पुन्हा वर्तमानात आल्या.
मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
२. तुझं तुलाच अर्पण
मूळ हिंदी कथा : ‘तेरा तुझको अर्पण ‘
शहरातल्या सुप्रसिद्ध उद्योगपती अगरवालजींचा 75वा वाढदिवस होता. त्यांच्या हवेलीत होम -हवन, पूजा-पाठ आणि मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबातील सर्व लहान -मोठे सदस्य भटजींबरोबर पूजाविधीत सहभागी झाले होते. यावेळी भटजींनी जीवनाचं मर्म सांगणाऱ्या कथेद्वारा जीवनात आनंद व सुखाचा ताळमेळ कसा साधावा, त्याची युक्ती सांगितली. कथा संपताच भटजी होमाकडे वळले.
अगरवालजी आपल्या स्वभावानुसार हात राखून समिधा समर्पित करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच समिधा उरल्या होत्या. शेवटी भटजींनी होम -हवनाची सांगता झाल्याचं सांगत अंतिम मंत्र म्हटला आणि म्हटलं, ” आता जी काही उरली असेल ती सर्व सामग्री हवनकुंडात एकदमच समर्पित करा आणि मोठ्याने बोला, ” स्वाहा!”
हवनकुंडात समिधांचं प्रमाण जास्त झाल्याने सगळीकडे धूर पसरला. अगरवालजी डोळे चोळू लागले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे त्यांचा भूतकाळ तरळू लागला. त्यांच्या डोक्यात विचार आला – ‘ अरे ! हात राखून खर्च करत पैसे वाचवण्याच्या नादात मी माझ्या जीवनातही भरपूर समिधा वाचवल्या आहेत. जीवनाचा आनंद घ्यायचं तर राहूनच गेलं. आता तर एकदमच सर्व समर्पण करायची वेळ आली आहे. इथून फक्त डोळ्यांत पाणी आणि समोर धुरळाच धुरळा दिसत आहे. याचा अर्थ, आपल्या जीवनातही समिधासमर्पणाचं संतुलन चुकलं होतं. ‘
‘तुझं तुलाच अर्पण’ म्हणत त्यांनी डोळे उघडले आणि संकल्प केला की यापुढे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गरीब, असाहाय्य, विकलांग तसंच गरजवंतांच्या सेवेसाठी ते आपल्याजवळील जास्तीच्या पैशांचा उपयोग करतील. लगेचच निराशेचे ढग विरून गेले आणि नव्या जोशाने ते आनंदाचे क्षण उपभोगू लागले.
मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
३. ऑक्सिजन लेव्हल
मोबाईलची रिंग वाजली. त्याने नाव बघितलं आणि तो चकित झाला. घेऊ की नको, या द्विधेत फोन बंद झाला. ते नाव बघून त्याचं मन विचलित झालं. त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य आलं, ‘ त्या घटनेला मी एकटाच जबाबदार होतो का? आम्हा दोघांमध्ये एवढा चांगला ताळमेळ होता, एवढं चांगलं बॉण्डिंग होतं, तर ऑफिसात सगळ्यांसमोर असा तमाशा करण्याची गरज होती का? ‘
हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्यापडल्या, आशा-निराशेच्या गर्तेत गोते खाताखाता तो विचार करत होता. तशी त्याची स्थिती तेवढी गंभीर नव्हती. पण ऑक्सिजन लेव्हल 70-75 मध्येच अडकली होती. सगळीकडून येणाऱ्या बातम्या भीती आणि दहशत निर्माण करत होत्या. महामारीचा काळ होता तो.
संध्याकाळ होताहोता पुन्हा फोनची रिंग वाजली. तेच नाव दिसत होतं. पण यावेळी त्याने फोन घेतला.
“हॅलो प्रकाश, मी नीलिमा बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे आता?”
” आधीपेक्षा सुधारलीय. पण ऑक्सिजन लेव्हल अजूनही कमी आहे. “
” तुला हॉस्पिटलात ऍडमिट केल्याचं कळलं, तेव्हा मी स्वतःला फोन करण्यापासून थांबवू शकले नाही. दोनदा फोन केला, पण तू उचलला नाहीस. अजूनही नाराज आहेस माझ्यावर? जे घडलं, तो अपघात होता, असं समजून विसरून जा. मीही विसरले आहे. “
सुटकेचा श्वास सोडत तो म्हणाला, ” मॅडमजी, तुमच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती. किती मोठं आहे तुमचं मन ! आय ऍम सॉरी, मॅडमजी ! चूक माझीच होती. “
” ए… ! मॅडमजी नाही. नीलू मॅडम म्हण. मला तेच आवडतं. फक्त तुझीच नाही, तर माझीही चूक होतीच की. आपण दोघंही विवाहित आहोत, हे माहीत असूनही आपल्या घरच्या गोष्टीही आरामात एकमेकांना सांगायचो. तुझ्याशी बोलल्यावर माझ्या मनावरचं दडपण कमी व्हायचं. तू ह्याला माझा स्वार्थही म्हणू शकतोस. पण त्या दिवशीच्या घटनेनंतर मला जाणवलं की माझा एका मर्यादेपलीकडचा मोकळेपणा आणि चंचल स्वभाव हेच मुख्य कारण होतं. त्यामुळेच तुझा गैरसमज झाला आणि तू बहकलास. “
” हो, मॅम. खरं आहे हे. मी माझं संतुलन घालवायला नको होतं. “
” प्रकाश, तेव्हा माझ्या मनात हा विचार आला नाही, की पुरुषांच्या मनात स्त्रियांविषयी असणारं आकर्षण जास्त असतं. आणि ही निसर्गदत्त, स्वाभाविक प्रक्रिया आहे. तू माझा फक्त सहकारी नव्हतास, तर माझा जवळचा मित्र झाला होतास. “
“मॅम, माझ्याही नंतर लक्षात आलं की मी माझ्या मर्यादेत राहायला हवं होतं. तुमचा स्वभाव फ्री होता, त्यामुळे मी एकतर्फी… प्रेम… “
“बस, बस… नो मोअर डिस्कशन… ! टॉपिक क्लोज्ड नाऊ. आणि हो, जेव्हा केव्हा तुला गरज पडेल, तेव्हा निःसंकोच मला फोन कर. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. उद्या पुन्हा याच वेळी कॉल करीन. ओके. बाय! टेक केअर. “
फोन बंद होताच त्याला वाटलं, की त्याचे हात स्वर्गाला टेकले आहेत. आता तो पूर्णपणे तणावमुक्त झाला होता. आपल्या आत एका नव्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारखं त्याला वाटत होतं.
आठवी इयत्तेत गेल्यानंतर आमच्या शालेय अभ्यासक्रमात थोडा बदल झाला होता. कुशल व्यावसायिक प्रशिक्षण बाबतीतला अभ्यासक्रम होता तो आणि त्यात होम सायन्स, चित्रकला आणि संगीत या तीन विषयांचा समावेश होता माझ्या बहुतेक वर्गमैत्रिणींनी पटापट त्यांच्या आवडीचची क्षेत्रं निवडली आणि नावेही नोंदवली. वेळ मलाच लागला कारण त्या वेळच्या माझ्या व्यक्तिमत्त्वासाठी यातला एकही विषय माझ्यासाठी तसा बरोबरच नव्हता म्हणजे यापैकी कुठल्याही विषयात मला फारशी गती होती असे वाटत नव्हते.
होम सायन्स या शब्दाविषयीही मला त्यावेळी फारशी आस्था नव्हती. माझ्या मते होमसायन्स म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक वगैरे… त्यावेळी तरी मला यात काही फारसा रस नव्हता.
चित्रकला हा विषय मात्र मला आवडायचा पण त्या कलेनच मला जन्मतःच नकार दिलेला असावा. माझी चित्रकला म्हणजे मोर, बदक, फारफार तर दोन डोंगरा मधला किरणांचा सूर्य, एखादी झोपडी, त्यामागे नारळाचं झाड आणि समोर वाहणारी दोन रेषांमधली नदी पण यातही सुबकता, रेखीवपणा वगैरे काही नसायचं. आधुनिक कला किंवा ज्याला आपण अॅबस्ट्रॅक्ट वगैरे म्हणतो ते त्यावेळी इतकं प्रचलित नव्हतं नाहीतर माझं हे चित्र कदाचित खपून गेलं असतं. फ्रीहँड, ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या वेळी माझी अक्षरशः भंबेरी उडायची. अशावेळी माझ्या प्रिय मैत्रिणी विजया, भारती, किशोरी या मला केवळ करुणेपोटी खूप मदत करायच्या ते वेगळं पण विशेष कौशल्य म्हणून मी चित्रकला हा विषय घेणे केवळ विनोद ठरला असता.
मग राहता राहिला तो संगीत हा विषय. एक मात्र होतं की आमच्या घरात सर्वांना संगीताविषयी खूप आवड होती. विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीत पप्पांना आणि ताईला फार आवडायचे. ताई सुंदर पेटी वाजवायची. ताईचा आवाज थोडासा घोगरा असला तरी तिला सुरांचं आणि तालांचं ज्ञान उपजतच होतं. ( असे पप्पा म्हणायचे आणि तिने गायनात करिअर करावी असे पप्पांना वाटायचे त्याबाबत आमच्या घरात काय काय गोंधळ घडले हा संपूर्ण वेगळा विषय आहे तर त्याविषयी सध्या फक्त एवढंच.. ) पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी संगीत सभा आम्ही सर्वजण न चुकता ऐकायचो. त्या शास्त्रोक्त सुरावटीचा झोपेत का असेना पण थोडासा तरी अंमल चढायचा आणि त्यासोबत होणारी ताई -पप्पांची आपसातली चर्चाही मजेदार असायची..
“पपा पाहिलंत? हा कोमल गंधार किती सुंदर लागलाय.. !”
नाहीतर पप्पा म्हणायचे, ”वा! काय मिंड घेतली आहे.. ”
यानिमित्ताने ताना, आलाप, सरगम, सुरावट, कोमल, तीव्र, विलंबित, दृत लय, राग, तीनताल, झपतात या शब्दांची जवळीक नसली तरी उत्सुकता वाटू लागली होती. आपल्याला हे पेलवेल किंवा झेपेल का याविषयीचा विचार त्या क्षणी इतका प्रबळ नव्हता. परिणामी मी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात संगीत हाच विषय निवडला.
आजही कधी कधी मनात येतं निदान पप्पांनी किंवा ताईने अर्थात मी ताईचा सल्ला मानला असताच असे जरी नसले तरीही मला थोडं योग्य मार्गदर्शन नको होतं का करायला? पण आमच्या घरात हा नियमच नव्हता. “ तुमचे निर्णय तुम्हीच घ्या” हीच प्रथा होती आमच्या गृह संस्कृतीत. “एकतर यश मिळवा, नाही तर आपटा, डोकं फोडून घ्या आणि त्यातूनच शहाणपण मिळवा आणि स्वतःला घडवा हेच तत्व होतं पण त्यातही एक मात्र अदृश्यपणे होतं की यशात अपयशात हे घर मात्र तुमच्याबरोबर आहे हे लक्षात असू द्या. ” या एकाच आशेवर मी संगीत हा विषय घेतला.
एकदाच मी वर्गात ऑफ तासाला “एहसान तेरा होगा मुझपे…” हे गाणं म्हटलं होतं आणि मैत्रीचा मनस्वी आदर राखून आशा मानकर माझ्या पाठीवरून मी गात असताना हात फिरवत होती. तिच्या त्या स्नेहार्द स्पर्शाने तरी सूर-ताला चा संगम होऊ शकेल असा दुर्दम्य आशावाद आशाला वाटला असेल कदाचित त्यावेळी.
जाऊ दे !
पण आम्हाला संगीत शिकवणाऱ्या फडके बाई मात्र मला फार आवडायच्या. तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व फारसं प्रभावी नव्हतं. मध्यम उंचीच्या, किरकोळ शरीरयष्टी, किंचित पुढे आलेले दात यामुळे त्यांची हनुवटी आणि ओठ यांची होणारी विचित्र हालचाल, नाकीडोळी नीटस वगैरे काही नसलं तरी रंग मात्र नितळ गोरा आणि चेहऱ्यावरची मृदू सात्विकता त्यामुळे त्या मनात भरायच्या. विशेषतः शिक्षकांमध्ये जो दरारा असतो आणि त्यामुळे जे भय निर्माण होते तसं त्यांच्या सहवासात असताना वाटायचे नाही कुणालाच. शिवाय त्या जेव्हा गात तेव्हा त्या विलक्षण सुंदर दिसत. तसा त्यांचा आवाज पातळ होता पण त्या अगदी सफाईदारपणे एकेका सुराला उचलत की ऐकत रहावंसं वाटायचं. पेटीचे सूर धरताना त्यांची निमुळती गोरी बोटं खूपच लयदार आणि सुंदर भासायची.
या संगीताच्या वर्गात आम्ही पाच सहा जणीच होतो. सुरुवातीला त्या राग, रागाची माहिती, सरगम, अस्थायी, अंतरा, वगैरे आम्हाला वहीत लिहून घ्यायला लावायच्या मग एकेकीला प्रश्न विचारून त्या रागाची बैठक चांगली पक्की करून घ्यायच्या. नंतर यायचा तो प्रत्यक्ष गायनाचा सराव. सुरावट त्या गाऊन दाखवायच्या आणि मग सामुदायिक रित्या उजळणी आणि त्यानंतर एकेकीला म्हणायला लावायचे सगळ्यांना. तेव्हा “छान” “सुरेख जमलं” “थोडा हा पंचम हलला बघ” असे सांगायच्या पण एकंदर समाधानी असायच्या. मात्र माझी गायनाची पाळी आली की त्यांचा चेहरा कसनुसा व्हायचा हे मला जाणवायचं. सुरुवातीला माझ्या आवाजाची पट्टी जमवण्यास त्यांना कठीण जायचं. काळी चार, काळी पाच.. कसलं काय?
मग त्या हातावरच तीनताल वाजवत म्हणायच्या, ” हं!असं म्हण. भूपरूप गंभीर शांत रस.. ”
मी हे पाचही शब्द सलग एकापाठोपाठ एक म्हणून टाकायचे. त्यात संगीत नसायचंच. आळवणं, लांबवणं शून्य. फडके बाईंच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचायला मिळायचं, ”का आलीस तू इथे?”
आज हे आठवलं की वाटतं, ” कोण बिच्चारं होतं?” मी की फडके बाई ?”
पण एक मात्र होतं की मला संगीताच्या लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत. कुठला राग कुठल्या थाटातून उत्पन्न होतो, कुठला राग कोणत्या प्रहरी गातात, कोणत्या तालात गायला जातो, त्यातले कोमल, तीव्र मध्यम स्वर.. रागाची बंदीश या सर्वांवर मी माझ्या दांडग्या स्मरणशक्तीने किंवा घोकंपट्टीने मात करायची.
“काफी रागातले कोणते स्वर कोमल?”
मी पटकन सांगायची, ” ग आणि नी”. “भूप रागात कोणते सूर व्यर्ज असतात?” “मध्यम निशाद” अशी पटापट उत्तरं मी द्यायचे पण प्रत्यक्ष गाणं म्हटलं की सारे सूर माझ्या भोवती गोंधळ घालायचे. एकालाही मला कब्जात घेता यायचे नाही.
“संगीत” या विषयामुळे माझा वर्गातला नंबर घसरू लागला. प्रगती पुस्तकात कधी नव्हे ते संगीत या विषयाखाली लाल रेघ येऊ लागली. ती बघताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी फडके बाई खूप चांगल्या होत्या. त्या माझ्याबाबतीत कितीही हताश असल्या तरी त्यांनी माझं कधी मानसिक खच्चीकरण केलं नाही. मला कधीही सुचवलं नाही की, ” अजुनही तू विषय बदलू शकतेस. “
उलट “राग ओळखा” या तोंडी प्रश्न परीक्षेच्यावेळी वेळी त्या माझ्यासाठी नेहमी सोपी सरगम घ्यायच्या. ” हं ओळख.. सखी मोssरी रुमझुम बाssदल गरजे बरसेss”
संपलं बाई एकदाचं…ही रॅपीड फायर टेस्ट मी पार करायची.
सर्व बरोबर म्हणून पैकीच्या पैकी गुण. गातानाचे मार्क्स मात्र त्या केवळ कॉम्प्लिमेंटरी म्हणून देऊन टाकायच्या.
पण आता मला वाटतं, की फडकेबाईंनाच वाटायचं का की माझा वर्गातला वरचा नंबर केवळ संगीतामुळे घसरू नये. कुठेतरी माझ्या इतर विषयातल्या प्राविण्याविषयी त्यांना अभिमान असावा म्हणून त्या मला कदाचित असेच गुण देऊन टाकत असतील.
संगीत विषयात माझी कधीच प्रगती होऊ शकली नाही हे सत्य कसे बदलणार?
पण पूर्ण चुकीच्या निर्णयाने सुद्धा मला खूप काही शिकवलं मात्र. मी आपटले, डोकं फोडून घेतलं, माझं हसं झालं, मैत्रिणींच्या नजरेत मला ते दिसायचं. मी टोटल फ्लॉप ठरले. आजच्या भाषेत बोलायचं तर माझा पार पोपट झाला.
पण तरीही काहीतरी “बरं” नंतर माझ्या मनात येऊ लागलं होतं. संगीतातल्या अपयशानेच मला एक सुंदर देणगी दिली. संगीत किती विलक्षण असतं! त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करताना मला प्रत्यक्ष खूप कष्ट पडले असले तरी एक आनंददायी कान त्यांनी मला दिला. गाता आले नाही म्हणून काय झाले? मी संगीत या शास्त्राचा पुरेपूर आनंद ऐकताना घ्यायला नक्कीच शिकले. अनोळखी सुरांची सुद्धा शरीरांतर्गत होणारी काहीतरी आनंददायी जादू मला अनुभवता येऊ लागली. ती किमया मला जाणवू लागली आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला एक सुरमयी दिशा मिळाली. माझ्यातल्या जिवंत, संवेदनशील मनाची मला ओळख झाली. पुढे पुढे तर आयुष्य जगत असताना मला या संगीतातल्या शास्त्रानेच खूप मदत केली.
सात सूर कसे जुळवावेत, कोणते सूर कधी वर्ज्य करावेत, तीव्र, कोमल, मध्यम या पायऱ्यांवर कशी पावले ठेवावीत, योग्य प्रहरांचं भानही ठेवायला शिकवलं, कधी विलंबित तर कधी द्रुतलय कशी सांभाळावी, धा धिन धिन्ना ता तिन-तिन्रा या तालांचे अपार महत्त्व मला संगीतातूनच टिपता आले. गाता नाही आले पण म्हणून काय झाले? जीवनगाण्याचे मात्र मी बऱ्यापैकी सूरताल सांभाळू शकले. या क्षणी नाही वाटत मला की माझा निर्णय चुकला होता म्हणून! एका चुकलेल्या वाटेने माझ्या अनेक अंधार्या वाटांना उजळवले.
काही वर्षांपूर्वी मी ठाण्याला माहेरी गेले होते तेव्हा भाजी मार्केटमध्ये मला अचानक फडके बाई भेटल्या. एका क्षणात आम्ही एकमेकींना ओळखले. खरं म्हणजे त्यांनी मला ओळखावे हे नवलाईचे होते. एका नापास विद्यार्थिनीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडावा हेही विशेष होते. त्यांनी आवर्जून माझी विचारपूस केली. घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि पटकन् खाणाखूणांसहित घरचा पत्ता ही दिला.
मी बराच विचार करून पण संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातले तानपुरे, अंथरलेली सतरंजी, पेटी- तबला पाहून सुखावले. फडकेबाई खूप थकलेल्या दिसत होत्या. वय जाणवत होतं पण गान सरस्वतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हाही होतं.
त्याच म्हणाल्या, “ माझी मुलगीही आता सुंदर गाते. अगदी तैय्यारीने.. ”
खरं सांगू ? मला क्षणभर काही सुचेचना काय बोलावे? संगीताच्या वर्गात होणारी माझी फजिती मला त्या क्षणीही आठवली. डोळे भरून आले. फडके बाईंनी माझ्या पाठीवर अलगद हात ठेवला. म्हणाल्या, ” नाही ग! तू निश्चितच एक चांगली विद्यार्थिनी होतीस. तुझ्यात शिकण्याची तळमळ होती. त्यासाठी तू प्रयत्नशीलही होतीस. ”
कदाचित त्यांनी त्यांच्या मनातलं बोलायचं टाळलं असेल तेव्हा मीच म्हणाले, ”आडात नाही ते पोहर्यात कुठून येणार?”
मात्र त्या क्षणी मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. गुरुपादस्पर्शाचा एक भावपूर्ण प्रवाह अनुभवला. गुरु-शिष्याचा वारसा नाही राखला पण मान राखला. माझ्यात नसलेल्या आणि त्यांच्यात असलेल्या कलेला केलेलं ते वंदन होतं.
“ बाई ! माझ्यासाठी तुमचं ऋण न फिटण्यासारखं आहे. काय सांगू? कसं ते? “
☆ “बालकांच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉक्टर !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
ती अकरा वर्षांची असताना तिची आई क्षयरोगाने दगावली… आणि तिलाही किंचित क्षय देऊन गेली. त्यामुळे तिचे ते दिवस आजारपणातच गेले. सततच्या खोकल्यामुळे तिच्या श्रवणशक्तीवर खूप विपरीत परिणाम झाला. नीट ऐकता न आल्यामुळे तिला वाचनही करता यायचे नाही… अक्षर-अक्षर जुळवून तयार होणारा एखादा शब्द तिचा मेंदू लवकर स्वीकारायचा नाही… आणि शिक्षणात तर हा सर्वांत मोठा अडथळा ठरला. पण हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ असलेल्या तिच्या वडिलांनी तिला प्रचंड आत्मविश्वास दिला. प्रश्न अभ्यासाचा होता. मग तिने अभ्यासाच्या निरनिराळ्या युक्त्या शोधल्या, एकदा लिहिलेले तीन तीनदा तपासून पाहिले आणि माध्यमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला… महाविद्यालयात ती उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध झाली होतीच. पण तिला डॉक्टरच व्हायचे होते! कारण तिचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांना जीवशास्त्र विषयात खूप रस होता. त्यांचीच प्रेरणा या मुलीने घेतली असावी.
आणि त्यावेळी महिलांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून प्रवेश मिळणे दुरापास्त होते. महिला परिचारिका उत्तम करू शकतात… मुलांना वाढवू शकतात पण मग डॉक्टर का नाही होऊ शकत? हा विचार त्यावेळी फारसा केला जात नव्हता. हार्वर्ड विद्यापीठाने तिला वैद्यकीय शिक्षणाच्या तासांना बसायची परवानगी तर दिली मात्र डॉक्टर ही पदवी देण्यास असमर्थतता दाखवली… म्हणून ती बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात गेली. हे विद्यापीठ मात्र महिलांना वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बाजूने होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेलेन तौसिग झाल्या … डॉक्टर हेलेन ब्रुक तौसिग. जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात निवासी वैद्यक अधिकारी होण्याची त्यांची संधी मात्र अगदी थोडक्यात हुकली. हृदयरोग विभागात एक वर्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांची पावलं बालरोग विभागाकडे वळाली…. आणि त्यांचे लक्ष बालकांच्या हृदयाकडे गेले !
बालकांच्या हृदयरोगावर उपचार करणा-या डॉक्टर एडवर्ड पार्क यांच्या क्लिनिकमध्ये त्या स्वयंस्फूर्तीने म्हणून काम करू लागल्या…. ही एका इतिहासाची पहिली पाऊलखूण होती. पुढे या क्लिनिकचा संपूर्ण ताबाच त्यांच्याकडे आला. त्यावेळी बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया ही कल्पनाच पुढे आलेली नव्हती. बालके हृदयरोगाने दगावत…. जगभरात अशी हजारो बालके आयुष्य पाहण्याआधीच जगाचा निरोप घेत होती… त्यांच्या जन्मदात्यांना दु:खाच्या खाईत लोटून निघून जात होती. ह्या कोवळ्या कळ्या अशा झाडावरच सुकून गळून पडताना पाहून डॉक्टर हेलन यांचे कोमल काळीज विदीर्ण होई.
स्टेथोस्कोप हे उपकरण म्हणजे डॉक्टर मंडळींचा कान. पण डॉक्टर हेलन यांचे कानच काम करीत नसल्याने स्टेथोस्कोप निरुपयोगी होता… मग त्यांनी बालकांच्या हृदयाची स्पंदने तळहाताने टिपण्याचा अभ्यास केला ! त्यांचा हात बालकाच्या काळजावर ठेवला गेला की त्यांना केवळ स्पर्शावरून, त्या स्पंदनामधून त्या हृदयाचे शल्य समजू लागले. फ्ल्रूरोस्कोप नावाचे नवीन क्ष-किरण तंत्रज्ञान त्यांच्या मदतीला आले. कित्येक लहानग्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून त्यांनी हृदयरोगाची कारणे शोधण्याचा अथक प्रयास आरंभला. हा साधारण १९४० चा सुमार होता… हृदयक्रिया बंद पडून बालके मृत होत आणि त्यावर काहीही उपाय दृष्टीपथात नव्हता. पण डॉक्टर हेलन यांचा अभ्यास मात्र अव्याहतपणे सुरूच होता. सायनोसीस नावाची एक वैद्यकीय शारीरिक स्थिती बालकांचे प्राणहरण करते आहे हे डॉक्टर हेलन यांना आढळले. एका विशिष्ट वैद्यकीय स्थितीत असलेल्या बालकांच्या फुप्फुसांना प्राणवायूयुक्त रक्त पुरेसे पोहोचत नाही हे त्यांनी ताडले. ह्रदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडली तर हा पुरवठा वाढू शकेल, असा तर्क त्यांनी लावला…. आणि तो पुढे अचूक निघाला !
ही युक्ती मनात आणि कागदावर ठीक होती, पण प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण होते. याच काळात जॉन्स हाफकिन्स मध्ये प्रसिद्ध सर्जन डॉक्टर आल्फ्रेड ब्लालॉक, त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक विवियन Thomos यांच्यासह संशोधन विभागात रुजू झाले होते. डॉक्टर हेलन यांनी आपली ही कल्पना त्यांना ऐकवली आणि ते कामाला लागले… विशेषत: विवियन यांनी ही कल्पना चांगलीच उचलून धरली ! आता तीन देवदूत बालकांच्या जीवनाची दोरी बळकट करण्याच्या उद्योगाला लागले. पण या कामात त्यांना मानवाच्या सर्वाधिक निष्ठावान मित्राची, श्वानाची मदत घ्यावी लागली… कित्येक श्वानांना या प्रयोगात जीव गमवावा लागला… आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे !
मानवाच्या हृदयात ज्या प्रकारे हृदयदोष निर्माण होतो, त्याचसारखा दोष कुत्र्याच्या हृदयात निर्माण करणे, आणि तो दुरुस्त करणे हे मोठे आव्हान होते.. ते विवियन यांनी पेलले.
दरम्यानच्या काळात डॉक्टर हेलन यांनी बालकांना हा हृदयरोग होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण शोधून काढले. त्यावेळी अमेरिकेत प्रसूतीपूर्व आजारावर Thalidomide हे औषध अगदी सर्रास दिले जाई. अत्यंत किचकट संख्यात्मक माहिती गोळा करून डॉक्टर हेलन यांनी हे औषध घेण्यातले धोके जगाला समजावले… आणि Thalidomide चा वापर टाळला जाऊ लागला… आणि त्यातून मातांच्या पोटातील बालकांना होणारा ‘ब्लू बेबी’ नावाने प्रसिद्ध असणारा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. निम्मी लढाई तर इथेच जिंकल्या डॉक्टर हेलन.
९ नोव्हेंबर, १९४४ रोजी पंधरा महिन्यांच्या एका बालिकेवर ब्लू बेबी विकार बरा करण्यासाठीची पहिली शस्त्रक्रिया झाली. यासाठी शोधल्या गेलेल्या प्रक्रियेला ‘ Blalock-Taussig-Thomos shunt ‘ असे नाव दिले जाऊन या तीनही जीवनदात्यांचा उचित सन्मान केला गेला.
डॉक्टर हेलन ब्रुक Taussig यांना पुढे विविध सन्मान प्राप्त झाले.. पण सर्वांत मोठा सन्मान आणि आशीर्वाद त्यांना जीव बचावलेल्या बालकांच्या पालकांनी दिला असावा, यात काही शंका नाही. त्यांना वैद्यकीय जगत “Mother of pediatric cardiology” म्हणून ओळखते.
याच डॉक्टर हेलन यांनी भारताला एक वैद्यकीय देणगी दिली…. भारताच्या पहिल्या महिला हृदयशल्य विशारद पद्मविभूषण डॉक्टर शिवरामकृष्णा पदमावती यांनी डॉक्टर हेलन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि भारतात अतिशय मोठे काम उभारले.. १०३ वर्षांचे कर्तव्यपरायण आयुष्य जगून डॉक्टर पदमावती कोविड काळात स्वर्गवासी झाल्या !
या दोन महान आत्म्यांना परमेश्वराने सदगती दिली असेलच.. आपण त्यांच्या ऋणात राहूयात…..
(माझ्या अल्पबुद्धीला अनुसरून या वैद्यकीय विषयावर लिहिले आहे. तांत्रिक शब्द, नावांचे उच्चार चुकण्याची शक्यता आहे आणि याबद्दल आधीच दिलगीर आहे. तज्ज्ञ मंडळींनी जरूर आणखी लिहावे आणि या महान आत्म्यांना प्रकाशात आणावे. संबंधित माहिती मी इंटरनेटवर वाचली (परवानगी न घेता केवळ सामान्य वाचकांसाठी भाषांतरीत केली. कारण मराठीत असे लेखन कमी दिसते) आणि जमेल तशी मांडली.)