ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?   १९ डिसेंबर –  संपादकीय  ?  

आपटे गुरुजी या नावाने ओळखले जाणारे आणि येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा सुरू करणारे गांधीवादी लेखक म्हणजे पांडुरंग श्रीधर आपटे. त्यांचा जन्म ६, ऑक्टोबर रोजीझाला.

त्यांची पुस्तके – १. अलौकिक अभियोग – पशू, पक्षी आणि वनस्पती यांनी मानवनिर्मितीत होणार्‍या निसर्गर्‍हासाबद्दलकेलेली तक्रार असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

२. आपल्या पूर्वजांचा शोध – डार्विनच्या सिद्धांतावर हे पुस्तक आधारलेले आहे.

३.कुटुंब रंजन, ४. जवाहरलाल नेहरू, ५. म. गांधी दर्शन ६. लाडला मुलगा, ७. श्रीकृष्णाची आत्मकथा ८.श्री विद्यानंद सरस्वती महाराज व श्री केशव गोविंद महात्म्य ९ सानेगुरूजी ओझरते दर्शन १०. सेनापती बापट ओझरत दर्शन, ११.स्वराज्य मार्गदर्शक लो. टिळक इये. पुस्तके लिहिली.

☆☆☆☆☆

सुरेंद्र बरलिंगे                

तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि तत्वचिंतक म्हणून जगभर मान्यता पावलेले लेखक म्हणजे सुरेंद्र शिवदास बारलिंगे. १९३२ ते ४२ च्या काळात ते स्वातंत्र्य सैनिक होते. १९४०च्या सुमाराला हैद्राबादच्या संग्रामातही ते सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २० जुलै १९१९चा. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच डी॰ घेतली. प्रबंध उत्तम झाल्यामुळे त्यांना पुढील संशोधनासाठी त्यांना छात्रवृत्ती मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा वविषय होता, द कन्सेप्ट ऑफ चेंज.  त्यांनी मराठी, हिन्दी आणि इंग्रजी  आशा तीनही भाषातून तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिले. त्यांनी  पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, युगोस्लाविया इ. ठिकाणी अध्यापनाचे  काम केले. त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा तत्वज्ञान विषयक आहे.  व ती तीनही भाषांतून आहे. त्यांनी ३ त्रैमासिकांचे संपादन केले. त्यापैकी, परामर्श ही मराठी व हिंदी त्रैमासिके व इंग्रजीत फिलॉसोफिकल क्वार्टरली हे त्रैमासिक होते. तत्वज्ञाना पुस्तके सोडून त्यांनी मराठीत खालील पुस्तके लिहिली. आकाशाच्या सावल्या, इन्किलाब , खरा हा एकाची धर्म, गोष्टीचे गाठोडे, , माझा देश, माझे घरइये. त्यांचे कथासंग्रह आहेत. ओंजळभर पाणी हे आत्मकथन आहे. पुन्हा भेटू या हे   व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे. मी पण माझे ही कादंबरी आहे.

सुरेंद्र बरलिंगे हे १९८० ते १९८९ साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते.

त्यांच्या देहावसानांनंतर त्यांच्यावर परामर्शने विशेषांक काढला. ‘डॉ. बरलिंगे यांचे तत्वज्ञान आणि ललित लेखन यातून त्यांचे जाणवणारे ‘विचारविश्व’ हा विशेषांकाचा विषय होता.                

सुरेंद्र बरलिंगे आणि पांडुरंग श्रीधर आपटे या विद्वानांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक प्रणाम.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ डिसेंबर –  संपादकीय  ?

कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संपादक आणि संग्राहक अशी विशेष ओळख असणारे श्री. चिंतामण गणेश कर्वे यांचा आज स्मृतिदिन. ( ४/२/१८९४ –१७/१२/१९६० ) 

श्री. कर्वे यांनी रूढार्थाने साहित्यनिर्मिती केली नसली, तरी अशा निर्मितीसाठी अत्यावश्यक सहाय्य करणाऱ्या शब्दकोशांच्या निर्मितीचे फार महत्वाचे आणि मोठे काम त्यांनी करून ठेवलेले आहे. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ‘ ज्ञानकोश ‘ प्रकल्पात काम करताकरता त्यांनी ‘कोश संपादन ‘ म्हणजे नेमके काय , त्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे, कुठचाही पूर्वग्रह न बाळगता काळाबरोबर विस्तारणाऱ्या ज्ञानाच्या कक्षांचा सतत वेध घेणे, यासारख्या महत्वाच्या आणि अशासारख्या, कुठल्याही कोशाच्या निर्मितीसाठी मर्मस्थानी  असणाऱ्या गोष्टी आत्मसात केल्या. आणि ज्ञानकोशाचे काम पूर्ण झाल्यावर काही सहकाऱ्यांच्या मदतीने “ महाराष्ट्र शब्दकोश, खंड १ ते ७ “ याची निर्मिती केली. मराठी भाषेत तयार केलेला हा व्यापक स्वरूपाचा पहिला सर्वसमावेशक कोश समजला जातो. त्यासाठी वऱ्हाडी, खानदेशी, कोंकणी, बागलाणी, अशासारख्या वेगवेगळ्या रूपातल्या पण मराठी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ज्या ज्या भाषा बोलल्या जातात, अशा बोलीभाषांमधले शब्दसंग्रहही त्यांनी प्रयत्नपूर्वक गोळा केले होते. या शब्दकोशाच्या रूपाने त्यांनी भाषेच्या अभिवृद्धीचे कायमस्वरूपाचे आणि संस्मरणीय असे मोठेच काम करून ठेवले आहे. याव्यतिरिक्त ‘ सुलभ विश्वकोश ‘–६ भाग, ‘ संयुक्त महाराष्ट्र ज्ञानकोश ‘- दोन खंड, ‘ महाराष्ट्र परिचय ‘, असे इतर कोशही त्यांनी स्वतंत्रपणे संपादित केलेले आहेत, ज्यातून वाचकांना बऱ्याच गोष्टींची विस्तृत माहिती उपलब्ध होईल. 

पाश्चात्य नीतिशास्त्र , सुबोधन आणि धर्मचिन्तन, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, असे वेगळ्याच विषयांवरचे ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. 

‘ लोकसाहित्य ‘ या त्यांच्या आवडत्या विषयातल्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची नोंद घेत, महाराष्ट्र शासनाने १९५६ साली स्थापन केलेल्या ‘ लोकसाहित्य समिती ’चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. 

ज्ञानोपासक आणि  ज्ञानसंग्राहक अशी ख्याती प्राप्त केलेल्या ‘ कोशकार ’ कर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

संस्कृतचे प्रगाढ पंडित असणारे श्री. श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर यांचा आज स्मृतिदिन. 

( २/८/१८७७ – १७/१२/१९४२ ) 

मुंबई विद्यापीठाचे मराठी विषयात एम.ए. केलेले हे पहिले विद्यार्थी (सन १९०३ ). कवी आणि साहित्य-समीक्षक म्हणून ते सर्वांना परिचित झालेले होते. याच्या जोडीने त्यांना नाटकाची विशेष आवड असल्याने, “ उत्तम नाटक कसे असावे “ याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यामुळे तेव्हाची ‘ नाटक मंडळी ‘ आणि अभिनेते नेहेमी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. ते अभिनय-क्षेत्रातलेही जाणकार असल्याने, अनेक नटांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले होते. 

‘ एकावली ‘ हा एकश्लोकी कवितांचा संग्रह ( सन १९३३ ), ‘ गुणसुंदरी ‘ या नावाने, सरस्वतीचंद्र नावाच्या गुजराथी कादंबरीचा मराठी अनुवाद ( सन १९०३ ), आणि ‘ सुवर्णचंपक ‘ हा १९२८ सालातला काव्यसंग्रह, असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झालेले होते. 

पुण्यामध्ये १९२३ साली भरलेल्या १९ व्या, आणि १९२७ साली भरलेल्या २२ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते. 

काव्यसमीक्षेचा महत्वाचा भाग असणाऱ्या ‘ काव्यातील रसव्यवस्था ‘ या विषयावर महत्वपूर्ण लेखन करणारे श्री. श्री. नी  चापेकर यांना मनापासून अभिवादन. 

☆☆☆☆☆

साहित्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज म्हणून सुपरिचित असणारे श्री. मधुसूदन कालेलकर यांचा आज स्मृतिदिन. ( २२/३/१९२४ – १७/१२/१९८५ )

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लिहिलेले एक नाटक, ही त्यांच्या लिखाणाची सुरुवात. इथेच त्यांनी साहित्यक्षेत्रात आपले पाऊल ठामपणे रोवले, आणि पुढची कितीतरी वर्षे त्यांनी विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. नाटककार, कथाकार, कवी म्हणून प्रसिद्धी मिळवत असतांनाच, मराठी आणि हिंदी चित्रपट-विश्वात ते गीतकार आणि पटकथाकार म्हणून ख्यातनाम झाले. त्यांनी थोडीथोडकी नाही तर एकूण २९ नाटके, आणि मराठी व हिंदी मिळून तब्बल १११ चित्रपटकथा लिहिल्या होत्या. त्यामध्ये कौटुंबिक, सामाजिक, गंभीर, विनोदी, असे अनेक विषय हाताळले होते. त्यांची अनेक नाटके गुजराती भाषेत अनुवादित झाली आहेत, ज्याचे प्रयोग अजूनही होताहेत. काही नाटकांवर मराठी, तसेच हिंदी चित्रपटही झाले आहेत. त्यांनी स्वतः चार नाटकांची निर्मितीही केलेली होती. ‘ बात एक रातकी ‘, ‘ झुमरू ‘, ‘ ब्लफ मास्टर ‘, अखियोंके झरोकेसे ‘, गीत गाता  चल ‘,’ फ़रार ‘, हे त्यांचे काही नावाजलेले हिंदी चित्रपट. त्यांच्या ‘  दुल्हन वही जो पिया मन भाये ‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा  १९७८चा सर्वोत्तम पटकथालेखक हा पुरस्कार मिळाला होता. 

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात, सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद, यासाठी दिले जाणारे पुरस्कार त्यांना नऊ वेळा दिले गेले होते. ‘ आम्ही जातो आमुच्या गावा ‘, ‘ पाहू रे किती वाट ‘,

‘ अपराध ‘, ‘ जावई विकत घेणे आहे ‘, ‘ अनोळखी ‘, हे त्यातले काही चित्रपट. ‘ हा माझा मार्ग एकला ‘ या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना मिळालेले इतर पुरस्कार असे —-    

‘ निंबोणीच्या झाडाखाली –’ या त्यांच्या अंगाईगीताला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार.

रसरंग- फाळके गौरव पुरस्कार ( हा त्यांना तीन वेळा दिला गेला आहे. )

गदिमा प्रतिष्ठानकडून उत्कृष्ट लेखक म्हणून विशेष गौरव व पुरस्कार. 

‘ जन्मदाता ‘ या चित्रपट कथेला गुजरात शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार ( मरणोत्तर ). 

‘ मधुघट ‘ हा त्यांनी लिहिलेला व्यक्तिचित्र-संग्रह, ज्याला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. 

‘ तो राजहंस एक ‘ हे त्यांच्या या प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्दीवर लिहिलेले पुस्तक, श्री रमेश उदारे यांनी संपादित केलेले आहे. 

श्री. कालेलकर यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १४ डिसेंबर –  संपादकीय  ?

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆  

आज १४ डिसेंबर : –

‘कवी, गीतकार, साहित्यिक, पटकथा व संवाद लेखक, आणि मोजक्याच भूमिका करूनही त्या सर्वच भूमिका संस्मरणीय करणारे चरित्र-अभिनेता, अशा अनेक पैलूंनी नटलेले अतिशय ख्यातनाम व्यक्तिमत्व ‘ म्हणून रसिकांना सुपरिचित असणारे, आणि आपल्या लेखन-कर्तृत्वाने, “ आधुनिक वाल्मिकी “ म्ह्णूनच अगदी उत्स्फूर्तपणे आणि उचितपणे गौरविले जाणारे श्री. ग.दि.माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन. ( ०१/१०/१९१९–१४/१२/१९७७ ) 

‘ गदिमा ‘ हे त्यांचं सगळ्यांच्या तोंडी असणारं आवडतं नाव. 

संत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य, भावकाव्य, अशा वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या काव्यशैलींचा अनुभव या एकाच कविवर्यांच्या असंख्य गीतांमधून रसिक घेऊ शकतात हे गदिमांचे खास वैशिष्ट्य. “ अतिशय अर्थपूर्ण असणाऱ्या कितीतरी सुरेख काव्यांचा चित्रदर्शी सुंदर गोफ “ असेच ज्याचे यथार्थ वर्णन करायला हवे, त्या त्यांच्या अजरामर झालेल्या ‘ गीतरामायण ‘ या काव्याचे, इतर भारतीय भाषांमध्येही अनुवाद झालेले आहेत. “ भूमिकन्या सीता “ या नाटकातली ”मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी“, “ मानसी राजहंस पोहतो “, यासारखी भावगीतांच्या धाटणीची असलेली त्यांची नाट्यगीतेही खूप गाजलेली आहेत. त्यांनी उत्तम बालगीते आणि समरगीतेही लिहिलेली आहेत.

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असतांना गदिमांनी त्यांच्याकडची खूप पुस्तके वाचली, आणि त्यांच्या गद्य लेखनाला जोमाने सुरुवात झाली. त्यांनीच लिहिलेली चित्रपट कथा, त्यांनीच लिहिलेले संवाद, आणि त्यांनीच लिहिलेली गीते, यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या “ लोकशाहीर रामजोशी “ या एका चित्रपटाचे उदाहरणही याबाबतीत पुरेसे आहे. कारण इथूनच “ मराठी चित्रसृष्टीचा भक्कम आधार “ अशी त्यांची ख्याती झाली. त्यांचे सोपे पण प्रभावी आणि मनाला सहजपणे भिडणारे संवादलेखन, हा अनेक वैविध्यपूर्ण आणि यशस्वी चित्रपटांचा कणा होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कथाकार आणि संवादलेखक म्हणून त्यांनी पंधरा हिंदी चित्रपटांसाठीही काम केले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे.

 गदिमांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्युत्कृष्ट आणि चौफेर कामगिरीबद्दल अगदी तपशीलवार लिहायचे झाले तर आपोआपच एक प्रदीर्घ प्रबंध तयार होईल. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण “ गदिमा विशेषांक “ प्रकाशित केला होता, ज्यात आपल्या लेखक-लेखिकांनी त्यांच्या साहित्यासंदर्भात उत्तम लेख लिहिले होते. त्यामुळे आज पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळत आहे. 

पद्मश्री गदिमा यांना अतिशय भावपूर्ण आदरांजली.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १३ डिसेंबर –  संपादकीय  ?  

  २००३मध्ये कर्‍हाडमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नंतर वळवयी येथे झालेल्या अखिल गोमंतकीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ मध्ये बोरी यथे झाला. केपे हे त्यांचे मूळ गाव. तिथून ते शिकण्यासाठी आधी सांगलीला मग पुण्याला गेले. त्यांनी अर्थशासत्रात डॉक्टरेट मिळवली. नंतर मुंबईतील कीर्ती कॉलेज इथे अध्यापन केले. गोवा मुक्तीसंग्रहानंतर साहित्यिक म्हणून ते प्रकाशात आले.

सुभाष भेंडे यांची आगतिक, अदेशी, अंधारवाटा , आमचं गोय आमका जय, उध्वस्थ, ऐसी कळवळ्याची जाती, कागदी बाण, खुसखुशीत, गंभीर आणि गमतीदार , द्राक्ष आणि रुद्राक्ष  इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते अतिशय वाचकप्रिय लेखक होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण या ग्रंथाचा शिल्पकार चरित्र कोश या दुसर्‍या खंडाचे त्यांनी संपादन केलेगोमंतकाच्या ७० – ८० वर्षात झालेल्या राजकीय, सामाजिक परिवर्तनाचा वेध घेणारी कादंबरी ‘होमकुंड’ या नावाने प्रसिद्ध आहे.

भेंडे यांनी काही अनुवादही इंग्रजीतून मराठीत केले. अल्लाउद्दीन आणि अलीबाबा, इसापाच्या गोष्टी कुमाऊंचे नरभक्षक इ. त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.  

आपल्या अमेरिकेतील अनुभवावर ‘गाड्या आपुला गाव बरा हा लेख त्यांनी लिहिला. तो १२वीच्या पाठ्यपुस्तकात आहे.

सुभाष भेंडे यांचा आज स्मृतीदिन . त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भेंडे कुटुंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी नवोदित लेखकांसाठी पुरस्कार ठेवला आहे. 

आत्तापर्यंत हा पुरस्कार, बाबन मिंडे, किरण गौरव, गणेश मतकरी, शिल्पा कांबळे, बालिका ज्ञानदेव, रश्मी कशाळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

 ☆☆☆☆☆

सखाराम कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ला बेळगाव येथे झाला. घराची गरीबी असल्यामुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण मोठ्या कष्टाने, स्वत: अर्थार्जन करून घ्यावे लागले. वी.स. खांडेकर यांच्या प्रयत्नाने त्यांना देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या कॉलेजमध्ये ग्रंथपालाची  नोकरी लागली. साहित्याची आवड असल्याने ते या नोकरीत रमले. शेवटी या कोलजमधील ग्रंथपाल पदावरूनच ते  निवृत्त झाले. थोडेच पण कलात्मक लेखन त्यांनी केले. ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा १९५९ साली सत्यकथेत आली. या कथेला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांचे बहुतेक लेखन सत्यकथेत प्रकाशित झाले आहे. सांज, ढग, हे त्यांचे कथासंग्रह आहेत, तर ‘पार्टी’ हा ललित लेख संग्रह आहे.

सुभाष भेंडे, सखा कलाल या लेखक द्वयीला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र श्रद्धांजली.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १२ डिसेम्बर –  संपादकीय  ?

पं. महादेवशास्त्री जोशी.

वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र अशा विषयांचे पारंपारिक पद्धतीने अध्ययन करून शास्त्री ही पदवी संपादन करणारे पं. महादेवशास्त्री जोशी यांचा आज स्मृतीदिन! (1992)

गोव्यात जन्मलेले शास्त्रजी गोवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झाले होते. गोवा व सांगली येथे शिक्षण घेतल्यानंतर  त्यांनी गोव्यात सत्तरी शिक्षण संस्था स्थापन केली व शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. चैतन्य या मासिकाचे संपादन करून लेखन चालू केले. ‘राण्यांचे बंड ‘ ही त्यांची पहिली कथा याच मासिकातून प्रकाशित झाली.  वेलविस्तार हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर  त्यांनी एकूण दहा कथासंग्रह लिहिले. कल्पवृक्ष, खडकातील पाझर, विराणी हे त्यापैकी काही. शिवाय भारतदर्शन प्रवासमाला,   मुलांचा नित्यपाठ व आईच्या आठवणी हे बालसाहित्य, आत्मपुराण, आमचा वानप्रस्थाश्रम ही  आत्मचरित्रे असे त्यांचे अन्य साहित्य आहे. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड संपादित केले आहेत. तसेच मुलांच्या संस्कृती कोशाचे चार खंड  

संपादित केले आहेत. त्यांच्या रसाळ, ओघवत्या भाषेतून गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडते.

त्यांच्या काही कथांवर चित्रपट निघाले असून ते लोकप्रिय झाले आहेत. कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते हे सर्व चित्रपट त्यांच्या, कथांवरील आहेत.

1980 साली गोवा येथे झालेल्या गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

निरंजन  उजगरे.

सुप्रसिद्ध कवी, लेखक व अनुवादकार  निरंजन उजगरे यांचाही आज स्मृतीदिन आहे. (2004)ते व्यवसायाने अभियंता होते. पण त्याचबरोबर त्याना लेखन कलेची देणगीच लाभली होती. सुरूवातीला ते ‘किरण’ या टोपणनावाने लिहीत असत. पुढचे लेखन मात्र त्यांनी निरंजन या नावानेच केले. इंग्रजी, रशियन, तेलगू, सिंधी, हिंदी, मराठी अशा विविध भाषा त्यांना अवगत होत्या.

काव्यपर्व, जायंटव्हील, परिच्छेद, फाळणीच्या कविता,

हिरोशिमाच्या कविता, दिनार, दिपवा, तत्कालीन, कवितांच्या गावा जावे ही त्यांची काही पुस्तके. कवितांच्या गावा जावे हा  कार्यक्रमही त्यांनी लोकप्रिय केला होता.

सोविएट लॅन्डचा नेहरू पुरस्कार आणि  कविवर्य ना. वा. टिळक हे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

1996 साली  मालवण येथे झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1999 साली डोंबिवली  येथील 32व्या काव्य रसिक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वास सलाम !

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया,विकासपिडीया.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ११ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज ११ डिसेंबर : –

संस्कृत आणि भारतीय संस्कृती या विषयांचे गाढे अभ्यासक, आणि त्यासंदर्भात विपुल लेखन करणारे प्रसिद्ध लेखक श्री. रामचंद्र नारायण तथा रा.ना. दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. ( १७/०३/१९०९ – ११/१२/२००१ ) 

१९३६ साली जर्मनीतून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नंतर पुणे विद्यापीठात संस्कृत व प्राकृत भाषाविभाग प्रमुख, कला विभाग प्रमुख, पुढे संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक, भांडारकर प्राच्यविद्या मंदिराचे मानद सचिव आणि नंतर उपाध्यक्ष, अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. आपल्या उपखंडातील विविध भाषांसंदर्भात संशोधन आणि इतर संलग्न कामे करणाऱ्या अनेक भारतीय, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामात त्यांचा सतत सक्रीय सहभाग असायचा. “ युनेस्को “ चे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

त्यांनी बरेचसे साहित्य इंग्लिशमध्ये लिहिले होते– वैदिक सूची– ६ खंड, इनसाईट इनटू हिंदुइझम, हडप्पन बिब्लिओग्राफी, रिसेन्ट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी, संस्कृत स्टडीज आउटसाइड इंडिया, वैष्णविझम अँड शैविझम,- अशासारखी त्यांची अतिशय सखोल अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे अभ्यासकांसाठी महत्वाचे मार्गदर्शक ठरलेले आहेत. हिंदुधर्म–इतिहास आणि आशय, तसेच, वैदिक देवतांचे अभिनव दर्शन, ही त्यांची मराठी पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. 

१९६२ साली भारत सरकारने “ पद्मभूषण “ हा सन्मान देऊन त्यांना गौरविलेले होते. आणि २००० साली त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप देण्यात आली होती. 

पद्मभूषण श्री रा.ना.दांडेकर यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली. 

☆☆☆☆☆

आज र. गो. ( रघुनाथ गोविंद ) सरदेसाई यांचाही स्मृतिदिन. ( ७/९/१९०५ – ११/१२/१९९१ ) 

लेखक, पत्रकार, संपादक, कथाकार, नाट्य-चित्र समीक्षक, आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे लेखक,  अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारा  कर्तृत्ववान माणूस अशीच श्री. सरदेसाई यांची ओळख सांगायला हवी. 

चित्रमय जगत, आणि स्फूर्ती या मासिकांचे ते अनु. सहसंपादक व संपादक होते. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या चित्रा, तारका, नवयुग, विविधवृत्त, विहार, या साप्ताहिकांमध्ये, मराठा या दैनिकामध्ये, आणि यशवंत या मासिकासाठी त्यांनी अनेक वर्षे संपादकीय काम केले होते. नवाकाळ या प्रसिद्ध दैनिकाचे सहसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. क्रीडा व नाट्य या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले होते. त्यांचे क्रीडाविषयक लिखाण ‘ हरिविवेक ‘ या टोपणनावाने ते करत असत.  

याव्यतिरिक्त, त्यांची पुढील पुस्तकेही प्रसिद्ध झाली होती —-’ आमचा संसार ‘ हा विनोदी लेखसंग्रह, ‘ कागदी विमाने ’ , ‘ चलती नाणी ‘, हे लघुनिबंध संग्रह, ‘ खेळ किती दाविती गमती ‘ 

या नावाने विविध खेळांच्या कथा, ‘ खेळाचा राजा ‘ हा लॉन टेनिसचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ, 

‘ क्रीडा ‘ हे खेळ आणि खेळाडू यांच्याबद्दलचे चुटके सांगणारे पुस्तक, ऑलिम्पिक सामन्यांविषयी माहिती देणारे ‘ खेळांच्या जन्मकथा ‘ हे २ भागातले पुस्तक.

 त्यांनी लिहिलेले ‘ हिंदी क्रिकेट ‘ या नावाचे पुस्तक हे मराठीतले क्रिकेटसंबंधीचे पहिले पुस्तक म्हणून ओळखले जाते. 

चित्रा, स्वाती, महाश्वेता, असे त्यांचे कथासंग्रह, बहुत दिन नच भेटती या नावाने ललित लेख, माझ्या पत्र-जीवनातील शैली हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह, सुरसुरी हा विनोदी लेखसंग्रह, असे त्यांचे इतर वैविध्यपूर्ण साहित्यही  प्रसिद्ध झालेले होते. 

श्री र.गो.सरदेसाई यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी सादर अभिवादन.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १० डिसेंबर –  संपादकीय  ?

आज आचार्य जावडेकर, दिलीप पु.. चित्रे आणि चंद्रकांत खोत या तिन्ही अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या स्वरूपाचा लेखन करणार्यां लेखकांचा स्मृतीदिन.

आचार्य जावडेकर म्हणजेच शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्म २६ सप्टेंबर १८९४ मध्ये झाला. ते मराठी लेखक, तत्त्वचिंतक, बुद्धिवादी विचारवंत होते. ‘आधुनिक भारत’ या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. मराठीतील तत्वज्ञ कादंबरीकार वा. म. जोशी यांनी ‘गीतारहस्य’ नंतरचा थोर ग्रंथ असं ‘आधुनिक भारत’ या ग्रंथाबद्दल म्हंटलं आहे. जावडेकर यांच्यावर आगरकर, टिळक आणि गांधीजी यांचा प्रभाव होता. या द्रष्ट्या लेखकांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामधील देशाला  व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल, असा भाग त्यांनी साक्षेपनेंहाराष्ट्रीय जंनतेसमोर मांडला. ‘बोले तैसा चाले’ याचा आविष्कार त्यांच्या आचारात आणि कृतीत होता. त्यांचे जीवन आणि विचार दोन्हीही आदर्शवत होते. जावडेकरांची साहित्य संपदा – ‘आधुनिक भारत’, लो. टिळक आणि म. गांधी, लोकशाही, हिंदू मुसलमान ऐक्य इ.

याशिवाय आचार्य जावडेकर यांच्यावरहीपुस्तके लिहिली गेली आहेत. प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या ग्रंथालय विभागाने त्यांच्यावर आचार्य शं. द. जावडेकर व्यक्तित्व आणि विचार हे पुस्तक काढले आहे. याशिवाय, शं. द. जावडेकर विचार दर्शन हे नागोराव कुंभार यांनी, गांधींच्या शोधत जावडेकर हे राजेश्वरी देशपांडे यांनी पुस्तक लिहिले आहे.

इस्लामपूरला आचार्य जावडेकर गुरुकुल नावाची शाळा आहे.

☆☆☆☆☆

दिलीप चित्रे हे मराठीतील बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ मध्ये झाला. त्यांनी कविता, कथा, कादंबर्या, समीक्षा लिहिल्या.  त्यांनी इंग्रजीतही लेखन केले. ते चित्रकार आणि शिल्पकारही होते.

दिलीप चित्रे यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल सांगायचं झालं तर – १. एकूण कविता –   १ ते ४ भाग, कवितेनंतरची कविता, गद्य लेखनात, तिरकस आणि चौकस,  दहा बाय दहा, भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कविता, शिबाराणीच्या शोधत, ओर्फियस पुन्हा तुकाराम (३ आवृत्या)

इ. पुस्तकांची नवे घेता येतील.

अभिरुची, मुंबई दिनांक, रविवार सकाळ, लोकसत्ता इ. मधून त्यांनी स्तंभलेखन केले. ५४ ते ६० च्या दरम्यान त्यांनी शब्द या त्रैमासिकाचे सापडन केले. लघुनियत्कालिकांच्या चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता. तुकारामाच्या अभंगांचा त्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद Says Tuka खूप गाजला. त्यांच्या साहित्याचे जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेत भाषांतरे झाली

दिलीप चित्रे यांना १९९४ मध्ये साहित्य अॅंकॅदमीचे अवॉर्ड एकूण कविता – भाग १ साठी मिळाले. मजेची गोष्ट म्हणजे याच वर्षी त्यांना इंग्रजी भाषेतील पुस्तकासाठीही साहित्य अॅळकॅदमीचे अवॉर्ड मिळाले.त्या पुस्तकाचे नाव Says Tuka.

चित्रपट क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. गोदान चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांचेच. ‘विजेता’ चित्रपटाची कथा पटकथा त्यांचीच होती.

मराठी साहित्य विश्वात दिलीप चित्रे यांनी असे विविध अंगाने काम केले आहे.

☆☆☆☆☆

बिनधास्त चंद्रकांत खोत यांचा जन्म भीमाशंकर इथे ७ सप्टेंबर १९४० साली झाला. त्यांच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. स्वकष्टाने त्यांनी एम ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना पीएच.डी. ही करायची होती पण गाईड न मिळाल्याने त्यांचे स्वप्न अपूरे राहिले. पण गमतीची गोष्ट आशी की त्यांच्याच गावाच्या तरुणाने त्यांच्या साहित्यावर संशोधन करून प्रबंध लिहिला आणि त्याला पीएच.डी. मिळाली.

साहित्य क्षेत्रात कवी म्हणून त्यांनी पदार्पण केले॰ १९६९ मध्ये प्रकाशित झालेला ‘मर्तिक’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह नंतर ते कादंबरीकडे वळले.१९७० साली त्यांनी पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अव्यय ही कादंबरी लिहिली. त्यानंतर ‘बिनधास्त, नंतर ‘विषयांतर’ या सगळ्या लैंगिक वीषयांवरच्या कादंबर्याल. खोतांनी आपल्या कादंबर्यायतून कामगार वस्तीतीl जीवन, तेथील लैंगिक घुसमट बेधडक मांडली.

‘अबकडई’ या गाजलेल्या दिवाळी अंकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केलय. हा अंकही वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचकप्रिय होता.

एकीकडे त्यांनी बिनधास्त म्हणता येईल, अशी पुस्तके लिहिली, तर दुसरीकडे, अनाथांचा नाथ ( साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक  चरित्र ), अलख निरंजन (नवनाथांच्यावरील पुस्तक),गण गण गणात बोटे (गजाणणा महाराज), दोन डोळे शेजारी ( शारदामाता यांच्या जीवनावर आत्मनिवेदनात्मक  चरित्र ), बिंब प्रतिबिंब ( विवेकानंदांच्या जीवनावर आत्मनिवेदनात्मक  चरित्र ),, संन्याशाची सावली, (विवेकानंदांच्या जीवनावर), हम गया नाही, जिंदा है (रामदासस्वामी ), अशी त्यांनी संतांवर आणि महान विभूतींवरही पूस्तके लिहिली. पण वाचकांना लक्षात राहिले, ते बिनधास्त खोत.

लेखनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘यशोदा’ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणीही गाजली.

वङ्मायाच्या क्षेत्रात विविध अंगांनी योगदान देणार्या. या तिघाही प्रतिभावंतांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

श्री.विठ्ठल हरी कुलकर्णी :

मराठीतील लेखक,समीक्षक,चरित्रकार विठ्ठल हरी कुलकर्णी यांचा आज स्मृतीदिन.(1982)शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील महाविद्यालयात प्राध्यापक पदी नोकरी केली. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास अशा विविध टोपणनावानी लेखन केले.सदर लेखन त्यांनी ज्योत्स्ना,तुतारी,प्रतिभा,विविधवृत्त या विविध नियतकालिकांमधून केले.व्यक्तिचित्रे या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य लेखक,व्यक्ती यांच्यावर चरित्रपर लेखन केले आहे.त्यांनी निबंध स्वरूपाचे अभ्यासपूर्ण लेखन ह त्यांनी केले आहे.अखेरच्या काळात त्यांनी जाॅर्ज बर्नार्ड शाॅ आणि अच्युत बळवंत कोल्हटकर व्यक्ती आणि वाड्मय हे दोन मोठे अभ्यासंपूर्ण चरित्रग्रंथ लिहिले. व्यक्तीरेखा आणि वि.ह.कुलकर्णी निवडक लेख हे त्यांचे दोन ग्रंथ 1986 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

धर्मपाल कांबळे.:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव आपणा सर्वांचेच परिचयाचे आहे.पण त्यांचे सर्व साहित्य संपादित करून तीन खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचे महत्वपूर्ण कार्य ज्यांनी  केले ती संशोधक व्यक्ती म्हणजे धर्मपाल कांबळे.ते पुण्यातील पोस्टामध्ये पोस्टमनची नोकरी करत होते.त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती.वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी तीन खंडांत साठे यांचे साहित्य प्रसिद्ध केले.पहिल्या खंडात पोवाडे,लावण्या व गाणी आहेत.दुसरा खंड लोकनाट्याविषयीचा आहे.तिस-या खंडात त्यांच्या कथा आहेत.त्यांचे स्वतःचे लेखन विपुल प्रमाणात आहे.त्यापैकी काही:

अण्णा भाऊ साठे – आंबेडकर चळवळीचे वारसदार, प्रबोधनकार ठाकरे – व्यक्तित्व, कार्य, साहित्य मृत्यूकडून जीवनाकडे, भारतरत्न राजीव गांधी इ.

प्राप्त पुरस्कार व सन्मान :

चंद्रशेखर आगाशे पुरस्कार, नाट्य चित्र कला अकादमीचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पुणे पोस्टस् टेलिग्रामवर सोसायटीचा गुणवंत कामगार पुरस्कार.

आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन!.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया, इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ७ डिसेंबर –  संपादकीय  ?

भा. रा. तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

आज लोकप्रिय गीतकार, राजकवी भा.रा. तांबे यांचा स्मृतीदिन. आज त्यांची आठवण काढताना एकापेक्षा एक सरस कविता आठवू लागताहेत. त्यांच्या विषयी विस्तृत माहिती वाचा, आजच्या मनमंजुषेत – ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी ….’

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :  इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ६ डिसेम्बर –  संपादकीय  ?

डाॅ.भि.रा.तथा बाबासाहेब आंबेडकर :

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन !(1956)

बाबासाहेब हे थोर न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनितीज्ञ, तत्वज्ञ, कायदेतज्ञ,समाज सुधारक,दलितोद्धारक,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सर्वांना ज्ञात आहेत.मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स या संस्थातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.सर्वांत प्रतिभाशाली व सर्वांत उच्च विद्याभूषित राजकारणी अशी त्यांची ख्याती होती.

त्यांना मराठी,इंग्रजी,संस्कृत,हिंदी,पाली,फ्रेंच,जर्मन,गुजराती, बंगाली, कन्नड आणि पारसी या भाषा येत होत्या.इंग्रजीत त्यांनी  विपूल लेखन केले आहे.22 ग्रंथ,पुस्तके व 10 शोधनिबंध पुर्ण असून 10 ग्रंथ अपूर्णावस्थेत आहेत.मराठी व अन्य भाषांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांच्या लेखनात त्यांनी धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा यावर भर दिला आहे.त्यांच्या साहित्याचे आतापर्यंत 22खंड प्रकाशित झाले आहेत.अद्याप अनेक खंड प्रकाशित करावे लागणार आहेत एवढे साहित्य उपलब्ध आहे.सर्वांत जास्त लेखन करणारी राजकीय व्यक्ती असा त्यांचा उल्लेख करता येईल.

ते उच्च विद्याभूषित तर होतेच,पण त्यांना अनेक सन्मानही मिळाले होते.कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डाॅक्टर ऑफ लाॅ ही व उस्मानिया विद्यापीठाने डाॅक्टर ऑफ लिटरेचर ही मानाची पदवी दिली.भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे.शिवाय बोधिसत्व,मैत्रेय या बौद्ध धर्मातील उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.त्यांच्या नावाची व छायाचित्राची पोस्टाची तिकीटे,चलनातील नाणी काढून ह त्यांना गौरविण्यात आले आहे.                                                                       

भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान हे किती मोलाचे आहे हे शब्दात सांगणे अवघड आहे.जगभरात कौतुकास पात्र ठरलेल्या  संविधानाच्या या निर्मात्यास स्मृतीदिनी लाख लाख प्रणाम.!  

पद्मजा फाटक :

विविध मासिके,दूरदर्शन अशा  माध्यमातून साहित्य सेवा करणा-या पद्मजा फाटक यांचा आज स्मृतीदिन.(2014)

एकोणीसशे ऐशी च्या दशकात सुंदर माझे घर,शरदाचे या सारख्या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकांचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते.  

ललित,कथा,बालसाहित्य,प्रवासवर्णन,चरित्रात्मक असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.प्रसन्न,खेळकर लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.किडनीच्या आजाराने दीर्घकाळ त्रस्त असूनही त्यांनी आपल्या लेखनातील ताजेपणा टिकवून ठेवला.आयुष्य मजेतच जगायचं अस म्हणत आजारपणानंतरचे लेखन त्यांनी ‘मजेत’ या टोपण नावानेच केले.

गर्भश्रीमंतीचे झाड,आवजो,रत्नाचं झाड,बाराला दहा कमी,वडील व मुलगी यांच्यातील नाते उलगडून दाखवणारे,’बापलेकी’ हे संपादित पुस्तक,चंमतग चष्टीगो हे बालसाहित्य ,शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचे चरित्र ,ही त्यांची काही प्रमुख पुस्तके.स्त्री मासिकातील ‘पुरूषांच्या फॅशन्स’ हा त्यांचा लेख खूप गाजला होता.

गर्भश्रीमंतीचे झाड या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

2014 मध्ये त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ?

☆☆☆☆☆

मुरलीधर खैरनार :

छ.शिवरायांची सुरतेची लूट सर्वांनाच ठाऊक आहे.या लूटीतील बराच मोठा हिस्सा गायब झाला होता.त्याच्या घेतलेल्या शोधाची अभ्यासपूर्ण कथा ‘शोध’ या कादंबरीतून सांगणारे मुरलीधर खैरनार यांचा आज स्मृतीदिन.(2015)

खैरनार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.ते इतिहासाचे अभ्यासक तर होतेच.पण नाट्यकर्मी,निर्माता,दिग्दर्शक,अभिनेता,मुक्त पत्रकार,संघटक अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या.आवर्त,आणखी एक नारायण निकम,अजब न्याय वर्तुळाचा,घालिन लोटांगण,शुभमंगल इ.नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.गाढवाचे लग्न या पुन्रनिर्मित नाटकाचे ही त्यांनी दिग्दर्शन केले व त्याचे शेकडो प्रयोग झाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणा-या सर्जनशील लेखनासाठीच्या अभ्यासवृत्तीचे ते प्रथम मानकरी ठरले.

अ.भा.नाट्य परिषद,अ.भा.विद्यार्थी परिषद,शेतकरी संघटना,या संस्थांचे ते पदाधिकारी होते.संघटनेच्या ग्यानबा या मासिकाचे त्यांनी संपादन केले होते.

शोध या त्यांच्या कादंबरीला सार्वजनिक वाचनालय,नाशिक आणि म.सा.प.चा ह.ना.आपटे पुरस्कार मिळाला होता.

2015 मध्ये त्यांचे निधन झाले.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया,दिव्यमराठी ,म.टा.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares