तेव्हा वेळ पुरत नसे आता जाता जात नाही.. तेव्हा कामं संपत नव्हती.. आता हाती कामच नाही —
या खोलीतून त्या खोलीत बिनकामाच्या येरझार्या.. गादीवर झोपू का खुर्चीत बसू.. कां व्हरांड्यात मारू फेऱ्या….
खायला काळ झालोय् का.. भुईला भार होतोय् का.. जगायला कारण उरलं का नाही.. काय करावं ते कळतंच नाही —
😣
वर्हाडकल्डा मित्तर बोलला.. नाय् ता इच्च्यार नको रे बाप्पा.. नन्नाचा पाढा काहून गायला.. देव तुजेवर व्हईल नं खप्पा —
तुये अशे रे उफराट बोलने माया त बिल्कुल नायच पटले.. तुयासारक्या टग्या बाप्यांनी होयाचे नाय् कदी केराचे टोपले —
👍
मालवणी दोस्त ऐकुन धावला.. मिठी मारून प्रेमानं बोलला.. वसाड्या तुजा म्हनना तरी काय.. शाळ्याचो पानी पी, ग्वाड किती हाय… !
नारल सोलुक झापा इणुक येळ माका पुरूचा नाय.. घरात बसून आंबट तोंडान् डोक्याचा खोबरा करूचा नाय्…
👍
तेवढ्यात आमची ही कण्हत आली.. कमरेत तिच्या उसण भरली.. झंडू बाम देत म्हणाली.. ” थोडसं चोळून द्याल का ?” तेवढ्यात मुलगा घाईत आला.. हातात कागद ठेवित म्हणाला “दहा कॉपीज् प्रिंटर वरून पटकन् काढून द्याल कां?”
आपण साधं कोपऱ्यावर जायचं तर घरी सांगून, कधी परत येणार त्याप्रमाणे किल्ल्या, कामाच्या बायका सगळ्या सोयी लावून निघतो… परगावी जाणार असलो आणि घरच्यांचा स्वैपाक येण्याचा उजेड असेल तर दोन दिवस असतील तर दोन भाज्या extra करून, श्रीखंड आणून ठेवून जातो.. जरा जास्त दिवस जाणार असू तर चिवडे लाडू चकल्या असे डबे भरून, स्वयंपाकाच्या बाई नसतील तर रोजच्या जेवणाचा सरळ डबा लावून, मुलांना १७६० गुणिले काही सहस्र सूचना देऊन, कामवाल्या बायकांना दांड्या मारू नका म्हणून धमकावून मग आपण जिथे जाणार असू त्याप्रमाणे आपल्या bag मध्ये अनंत गोष्टी भरून, शेजारी पाजारी, मैत्रिणी, घरातले छोटे, मोठे सगळ्यांचा निरोप घेऊन एकदाच्या बाहेर पडतो… परत येणार असू त्या तारखेनंतरचेही अनंत कार्यक्रम ठरवूनच आपण एकदाचे बाहेर पडतो…
ही अशीच बाहेर पडली असेल का? जरा तिथली देखरेख आणि थोडं पुढचं संशोधन करते आणि येतेच असं म्हणून ?? घरी दारी काय काय व्यवस्था लावून गेली असेल? तिला निघताना जाणवलं असेल का ती कधी परत येणार हे तिच्या हातात नाही ? तिची तयारी वेगळी, तिची प्रवासाची गाडी नव्हे तर यान, तिचं जाणं लग्न, मुंज, ट्रीप किंवा सेमिनार conference ला नव्हे… तिचं जाणं.. थेट अंतराळात… येणं… सगळं नीट असेल तर नियोजनानुसार.. नाहीतर… काहीच माहीत नाही…
काय असेल तिची मानसिक अवस्था… धडाडी आणि बुद्धिमत्ता आहेच हो तिच्याकडे पण स्त्रीच ना ती.. हुरहुर, भीती, भविष्याच्या अनिश्चिततेचे सावट, वाढणारे वय, तिथे अडकल्यावर झालेली घालमेल… काय काय सुरू असेल तिच्या मनात…
पण अशी अंतरिक्षात झेंडे लावणारी सुनिता आज सुखरूप परत आली.. तिनं धाडसाने ठेवलेलं प्रस्थान शास्त्र, तंत्रज्ञान आणि परमेश्वराची इच्छा यांच्यामुळे सुफळ संपूर्ण झाले..
कधीही न पाहिलेली ती सुनीता… पण ती परत आल्याचा आनंद आज प्रत्येकाला आहे.. ९ महिन्याने परत आली… जणु नवा जन्म घेऊन… तुझे पृथ्वीवर खूप खूप स्वागत सुनिता!!!
एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी… या गाण्याचा आज वेगळाच अर्थ समजला मला..
लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
होय. हे तीर्थस्थळ भारतात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात “हिवाळी” नावाच्या गावात. ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.
ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे. अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात. रविवार नाही, दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !
असं काय असतं या शाळेत ?
यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला. ३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या thumbnail ने मला थांबवलं. मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले, आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.
या शाळेचे कर्ता करविता आहेत, श्री केशव गावित गुरूजी. २००९ मध्ये DEd होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना येथे ‘टाकलं’ गेलं. बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत; नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.
या शाळेत बालवाडीपासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृति कार्यक्रम आहे. सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते. शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे. या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो, भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.
या शाळेत अॕम्फी थिएटर आहे. अद्ययावत वाचनालय आहे, संगणक कक्ष आहे. बोलक्या भिंती आहेत, गोशाळा आहे. परसबाग आहे. — – या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशव गुरुजी आहेत, गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत. नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !
– – डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे – तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !
या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाच वेळी करतात.
.. दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात. म्हणजे डावा हात एक ते दहा लिहीत असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो.
.. डावा हात मराठी शब्द लिहीत असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.
.. डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा (mirror image) उजवा हात लिहितो.
.. डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही कलमे अचूक सांगता येतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते. विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात. (विचारून पाहा, तुमची स्वतःची पाठ असली तर संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !
.. रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे (क्यूब साॕल्व्हर) काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.
.. मुलं प्रश्न विचारतात.
.. यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात, गाणी शिकतात, विविध भाषा शिकतात.
.. पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात. त्यांची काळजी घेतात.
ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळेपणाने मुलांसमोरच कबूल करतात. कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.
गो पालन ! यात गायीची काळजी घेणं, गोठा साफ करणं, शेणखत तयार करणं, गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.
परसबाग फुलवणं, झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे. शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात. मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.
केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरुवातीचा प्रवास खडतरच होता.
या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे. अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.
श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.
विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.
शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.
या विद्यार्थ्यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.
या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत. इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ, शेतकरी, चित्रकार, भाषा अभ्यासक, शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत. त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे. आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षण पद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.
त्यांची एकुलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे. तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.
गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही. घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरी पुरताच सहभाग घेतात. पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.
बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासा दोन तासांच्या भेटीत राजकारण, जातीधर्मकारण, या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या, व्यावहारिक प्रलोभनांपासून आश्चर्यकारक रीतीने लांब राहाणा-या या ऋषितुल्य श्री. केशव गावित या गुरूजींची स्तोत्रे किती गावित ?
नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पाहायला हवेच असे !
(फोटो आणि चित्रीकरण सहाय्यक श्री. अजय सिंह.)
लेखिका : सुश्री वैशाली पंडित
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “असाही एक आंतरराष्ट्रीय स्मरणदिन…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन ::: 25 मार्च हा दिवस“आंतरराष्ट्रीय स्मरण दिन” म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस प्रथम 2008 साली साजरा करण्यात आला, 400 वर्षांहून अधिक काळ अमानुषपणे छळ झालेल्या जवळ-जवळ 15 दशलक्षाहून अधिक गुलामांना ज्यात पुरुष, महिला आणि मुले यांचेही बळी गेले होते त्यांना हा दिवस स्मरण आणि सन्मानित करतो.
“मानवाधिकारांचे इतिहासातील सर्वात वाईट उल्लंघन” गुलामांच्या व्यापारामुळे केले गेले असे आपल्याला इतिहासच सांगतो. गुलामांचा व्यापार हा जगातील सर्वात मोठा सक्तीचा क्रूर व्यापार होता. 400 वर्षांहून अधिक काळ, आफ्रिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर निर्गमन जगभरात अशा प्रकारे पसरले जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते किंवा मानवी इतिहासात नोंदवले गेले नव्हते.
सन 1501 आणि 1830 च्या दरम्यान अमेरिकन लोकसंख्येत युरोपियन लोकांपेक्षा आफ्रिकन लोकांची वाढ जास्त झाली.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “तीन धडे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
तीन धडे – –
चीनचे राष्ट्रपती श्री जिनपिंग यांनी सांगितले की :
जेव्हां मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.
माझ्या वडिलांनी मला माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून तीन गोष्टींची शिकवणूक दिली.
एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाडगेभरून नूडल्स केले आणि नूडल्सचे दोन्ही वाडगे टेबलावर ठेवले. एका वाडग्यामधील नूडल्स वर एक अंड ठेवले होते व दुसर्या वाटीवर एकही अंड नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला जो कोणता वाडगा हवा असेल, तो तू घेऊ शकतोस. ”
त्यावेळी अंडी मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंड खायला मिळत असे.
म्हणूनच मी ज्या वाडग्यात अंड होते, तो वाडगा निवडला! जेंव्हा आम्ही जेवायला सुरुवात केली, तेव्हां मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंड खाण्यास सुरुवात केली.
जेंव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाडग्यात नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते, असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”
दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाडगेभरून नूडल्स बनवले : एका वाडग्यात वर एक अंड ठेवले होते आणि दुसर्या वाडग्यावर एकही अंड नव्हते. पुन्हा त्यांनी ते दोन वाडगे जेवणाच्या टेबलावर ठेवले व मला सांगितले, “बाळा, तुला जो वाडगा हवा असेल तो घे.”
ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेला वाडगा निवडला. मला फार आश्चर्य वाटले, जेंव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंड नव्हते.
पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, प्रत्येकवेळेस आपल्या आधीच्या अनुभवावर, तू विश्वास ठेऊ नकोस. कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. पण अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव, एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही पुस्तकं वाचून शिकू शकणार नाही.”
तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाडगेभरून नूडल्स बनवले, एका वाडग्यावर एक अंड होते आणि दुसऱ्या वाडग्यावर एकही अंड नव्हते. त्यांनी दोन्ही वाडगे जेवणाच्या टेबलावर ठेवले आणि मला सांगितले, “बाळा, आता तू निवड. तुला कुठला वाडगा हवा आहे ?”
या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहेत. ”
माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाडग्यावर एक अंड ठेवले होते, तो वाडगा निवडला. जेव्हां मी माझ्या वाडग्यातील नूडल्स खाण्यास सुरुवात केली, तेंव्हा मला खात्री होती, की माझ्या वाडग्यात अंड नसणार. परंतु जेंव्हा माझ्या वाडग्यात दोन अंडी निघाली, तेव्हां मी खूपच आश्चर्यचकित झालो!
माझ्या वडिलांनी अत्यंत प्रेमपूर्वक नजरेने माझ्याकडे पाहिले आणि मला सांगितले, “माझ्या बाळा, हे तू कधीही विसरु नकोस, की आपण जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतो, तेव्हां आपल्या बाबतीत ही आपसूकच नेहमी चांगलेच घडते !”
मी माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमीच लक्षात ठेवतो आणि त्यानुसार माझा व्यवसाय करतो. हे निर्विवाद सत्य आहे, की मला माझ्या व्यवसायात ह्यामुळेच सफलता मिळाली आहे.
– – शी जिनपिंग.
∞ ”स्वीकार्यतेला… हृदयाच्या उदारतेची आवश्यकता आहे. सर्व मतभेद लक्षात घेऊन, दुसऱ्यांचा दृष्टिकोन जाणणं आणि त्याचा सन्मान करणे हीच उदारता आहे. ”
☆
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- जोशीकाकांना भेटण्यासाठी अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची काहीही पूर्वकल्पना नसतानाही
जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचे सूचन करुन मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंच अघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची नकळत उत्तर देतादेताच मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं मला लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरु लागलं!!)
जोशी काकांकडून परतल्यानंतर त्या रविवारी घरी अर्थातच चर्चेला विषय होता तो हाच. पण तिथं काय घडलं, ते काय म्हणाले या सगळ्याची मला सविस्तर चर्चा करणं नकोसंच वाटलं. कारण ते जुन्या जखमांवरची खपली काढल्यासारखंच झालं असतं. पण कांही न सांगणं, गप्प बसणं योग्यही वाटेना आणि शक्यही. कारण पत्रिका आणि ज्योतिष यावर आरतीचा कितीही विश्वास नाही असं म्हंटलं तरी तिथं नेमकं काय झालं याबद्दल तरी तिला उत्सुकता असणं स्वाभाविकच होतं.
“आपलं रुटीन फारसं डिस्टर्ब होणार नाही असं त्यांचं रिडिंग आहे” असं मोघम सांगून मी विषय सुरु होताच संपवायचा प्रयत्न केला खरा पण तो संपला नव्हताच.
” तुम्हाला खरंच पटतंय हे? खरंच वाटतंय असं होईल?”
“माझ्यापुरतं म्हणशील तर केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही हेच खरं. ” मी हसत म्हंटलं. या संदर्भातील सगळ्याच चर्चांना पूर्णविराम देऊ शकेल असं हेच एकमेव समर्पक उत्तर माझ्याजवळ होतं!
खरं सांगायचं तर जोशीकाकांनी जे सांगितलं त्यात माझ्यापुरतं तरी न पटण्यासारखं कांही नव्हतंच. याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातल्या भूतकाळातल्या घटनांचे त्यांनी अंदाज घेत कां असेना पण दिलेले अचूक संदर्भ! माझ्या अंतर्मनाने ते केव्हाच स्विकारले होते खरे, पण त्यावरही खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार होतं ते माझी प्रमोशन पोस्टींगची आॅर्डर आल्यानंतरच!
पण त्यासाठी फार काळ वाट पहावी लागलीच नाही. सगळ्याच रहस्याचा भेद चार दिवसांत लगोलग झालाच. त्या दिवशीच्या इनवर्ड मेलच्या गठ्ठयांत सेंट्रल आॅफीसकडून आलेलं एक एन्व्हलप माझ्या नावावर होतं! मनात चलबिचल नव्हती, साशंकता नव्हती, जे होईल ते चांगलंच होईल हा विश्वास होता आणि जोशी काकांकडून मिळालेले संकेतही या सगळ्याला पूरकच होते.. आणि तरीही.. ते बंद एन्व्हलप हातात घेताच माझे हात थरथरू लागले… ! ती थरथर भीतीची होती कि उत्सुकतेची हे त्या क्षणी जाणवलंच नाही लगेच कारण मन त्या क्षणांत कणभरही रेंगाळलं नव्हतंच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखं वरवर शांत पण आतून उतावीळपणानं ते एन्व्हलप मी घाईघाईने फोडलं आणि पाहिलं तर आत माझ्याच नावाची पोस्टींग कम ट्रान्सफरची ऑर्डर होती! त्यातल्या चार ओळी माझं रुटीन पूर्णत: उलथंपालथं तरी करणार होत्या किंवा सावरणार तरी…. !
मी ती आॅर्डर वाचताच ‘त्या’नेच घडवून आणलेल्या त्या अद्भूत चमत्काराने मनोमन सुखावलो. ‘त्या’नेच जोशीकाकांच्या तोंडून वदवलेलं माझं भविष्य त्या ट्रान्स्फर आॅर्डरमधील शब्दरुपात माझ्या नजरेसमोर जिवंत झालेलं होतं!!…. होय. माझं पोस्टिंग लखनौला नव्हे तर आमच्या याच
रिजनमधल्या इचलकरंजी मुख्य शाखेत ‘हायर ग्रेड ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेलं होतं! ‘त्या’च्या आशीर्वादांच्या त्या
शब्दरूपावरून फिरणारी माझी नजर आनंदाश्रूंच्या ओझरत्या स्पर्शानेच ओलसर झाली… ! स्वप्नवतच वाटत राहिलं सगळं !! पण…. मी स्वतःला क्षणार्धात सावरलं. शांतपणे डोळे मिटून घेतले… ‘त्या’ला मनोमन नमस्कार केला… डोळ्यातून वाहू पहाणारा आनंद डोळे क्षणभर तसेच मिटून आतल्या आत जिरवला. अलगद डोळे उघडले न् त्या क्षणी आठवण झाली ती मला मनापासून सहकार्य करणाऱ्या, माझ्या भवितव्याची चिंता लागून राहिलेल्या माझ्या ब्रॅंचमधील स्टाफमेंबर्सची! ते सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त होते तरीही माझा आनंद आत्ताच सर्वांमधे वाटून मला द्विगुणित करायचा होता! त्याच असोशीने दुसऱ्याच क्षणी मी केबिनचं दार ढकलून बाहेर आलो.. !
त्यादिवशी लंचटाईममधे डायनिंग टेबलवर आणि पुढे दिवसभरही ‘ हे आक्रित घडलं कसं?’ हाच सर्वांच्या चर्चेचा मुख्य विषय होता! माझ्यापुरता तरी तो चमत्कारच होता पण तो घडला होता तो मात्र कुणी घडवल्यासारखा नाही तर सहज घडल्यासारखा!! यामागील कार्यकारणभावाची जी उकल पुढे एक दोन दिवसातच झाली, तीही कुणालाही अगदी सहजपणे पटावी अशीच होती!
खरंतर यावेळच्या प्रमोशन पोस्टींगसाठी सेंट्रल-ऑफिसने ठरवलेल्या पाॅलिसीनुसार सर्वच प्रमोटी-आॅफिसर्सची पोस्टींग्ज कोणताही अपवाद न करता आऊट आॅफ स्टेटच होतील असेच ठरले होते. त्यानुसार कुणाचे पोस्टींग कुठे करायचे याबाबतच्या निर्णयावर जी. एम्. नी सह्याही केल्या होत्या. त्याप्रमाणे कोल्हापूर रिजनमधील आम्हा सर्व प्रमोटीजची उत्तर-प्रदेश मधील शाखा किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसमधे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यानुसारच माझं पोस्टींग रिजनल ऑफिस, लखनौला होणार असल्याची ती बातमी अशी पूर्णत: सत्याधिष्ठीतच होती! असं असतानाही पुढच्या चार सहा दिवसात अशा कांही घटना आकस्मिकपणे घडत गेल्या की सेंट्रल ऑफिसला या प्रमोशन ट्रान्सफर पॉलिसीबाबत तडजोड करणे भाग पडले होते. कारण इकडच्या रिजन्सच्या तुलनेत बॉम्बे रिजनमधील प्रमोटिजची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. त्या मुंबईस्थित सरसकट सगळ्यांनाच प्रदीर्घ काळासाठी घरापासून परप्रांतात एकटंच निघून जाणं केवळ गैरसोयीचंच नव्हे, तर अनेक दृष्टीने अडचणीचेही ठरणारे होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन युनियनकडे लेखी तक्रारी दिल्या. आणि अर्थातच त्यामुळे युनियन हेडक्वाॅर्टर्ससाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला. त्यांनी बॅंकेच्या सेंट्रल-मॅनेजमेंटकडे हा विषय लावून धरला आणि त्यांच्या मिटिंगमधे झालेल्या चर्चांमधे ही पॉलिसी कांही प्रमाणात शिथिल करण्याची मॅनेजमेंटने तयारी दाखवली. त्यानुसार ऑलओव्हर इंडियाच्या, मेरीटनुसार बनवलेल्या हजारभर प्रमोटींच्या लिस्टमधे पहिल्या शंभरात नावे असणाऱ्या प्रमोटीजना त्यांच्या सध्याच्या रिजनमधेच पोस्टिंग द्यायचे आणि बाकी सर्वांचे मात्र ठरल्याप्रमाणे आऊट ऑफ स्टेट पोस्टींग करायचे अशी तडजोड मान्य झाली. आश्चर्य हे कीं त्या मेरिट-लिस्टमधे माझा नंबर ९८ क्रमांकावर होता! म्हणूनच केवळ माझं लखनौचं पोस्टिंग रद्द होऊन ते इचलकरंजी (मुख्य) ब्रँचला झालं!!
माझा पौर्णिमेचा नित्यनेम आता निर्विघ्नपणे सुरु रहाणार असल्याचा खूप मोठा दिलासा मला प्रमोशन नंतरची नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी अतिशय आवश्यक असं मानसिक स्वास्थ्य देणारा ठरला ही ‘त्या’चीच कृपा होती हे खरंच पण त्यापेक्षाही माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं ते जन्म आणि मृत्यू या दोन्हींकडे वेगळ्या आणि अधिक समतोल नजरेने पहायची मला मिळालेली नवी दृष्टी! अर्थात जोशीकाका याला निमित्त झाले होते हे खरेच पण त्यामागचा कर्ता-करविताही ‘तो’च होता आणि हे माझ्यासाठी अधिक मोलाचं होतं! म्हणूनच जन्म आणि मृत्यूला जोडणाऱ्या पुनर्जन्माच्या बंद दरवाज्याची दारं कांही अंशी तरी किलकिली झाल्याचा आभास माझ्या मनात कांहीकाळ निर्माण झाला तरी त्यात मी फार काळ रुतून बसलो नाही. यातून समीर गेल्याचं दुःख बऱ्याच प्रमाणात बोथट झालं हे एक आणि या ना त्या रुपांत बाबांची दिलासा देणारी सावली सिलिंडरच्या रूपात माझ्यासोबत आहे ही कधीच न विरणारी भावना आजही तितक्याच अलवारपणे माझी सोबत करते आहे हेही माझ्यासाठी फार मोठा दिलासा देणारेच ठरले आहे.
माझ्या आयुष्यात त्या त्या क्षणी मला अतीव दु:ख देऊन गेलेले, माझे बाबा आणि समीरबाळ यांचे क्लेशकारक मृत्यू त्यांच्याशीच निगडीत असणाऱ्या या सगळ्या पुढील काळांत घडलेल्या घटनांमुळे माझं उर्वरीत जगणं असं अधिकच शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारेच ठरले आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?
हे सगळं त्याक्षणी पूर्ण समाधान देणारं असलं तरी हा पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण आपली वाट पहातायत याची मला कल्पना नव्हती एवढंच!
विश्वास व श्रध्दा यांचा संबंध बुद्धी व हृदय दोघांशीही आहे. बुद्धीला जे पटतं ते व तसंच घडलं की आनंद मिळतो कारण तीच आपली तळमळ असते. मन म्हणतं पहा हे असंच व्हायला हवं होतं पण एक महत्त्वाचा विषय यात दुर्लक्षित रहातो तो म्हणजे हृदयाचा कल ! हृदय या आनंदात आनंदी आहे की नाही हा विचार व्हायलाच हवा. ही गरज आहे पण त्या आवाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं बुध्दी मनाला पटवत रहाते. आंतरिक तळमळ व बौद्धिक इच्छा वेगळ्या आहेत हे निश्चित ! अन्यथा जे जे मनासारखे झाले आहे त्यातून संपूर्ण समाधान मिळालेच असते व हुरहूर संपली असती. पण तसे का होत नाही याचा विचार विवेकाने करणे क्रमप्राप्त आहे.
याउलट फक्त हृदयाचा कौल घेतला तर लक्षात येतं की त्याला काहीच नको आहे. त्याला देण्यात सुख आहे. त्याचा स्वभावच प्रेम, भक्ती, समर्पण आहे. व आहे त्यातही तो समाधानी आहे पण मन स्वस्थ बसू देत नाही. वेगवेगळे विकार, तुलना, इर्षा, मीच का? हे शक्य नाही असेच ठसवत जाते व हृदयाकडे दुर्लक्ष होते. ही मानवी अवस्था संत, सज्जन ओळखतात व सत्याचा एक गुरुमंत्र देतात. पण बुद्धी तो ही आपल्या आनंदाच्या कल्पनांवर घासून पहातं व ती वचने खरी नाहीत असं मनाला पटवतं.
हाच भ्रमाचा खेळ सुरू असतो. तो आपण स्वतः स्वतः च्या बुध्दीला पटवणे व तिला हृदयाकडे वळवणे हा स्वधर्म आहे.
हृदयस्थ परमात्मा मग खूष होऊन “सदा सुखी भव” चा आशीर्वाद देतो जो स्वतःचा स्वतः ला जाणवतो.
☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
काळ बदलत गेला. समीकरण बदलत गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जेथे साधं पोस्ट कार्ड मिळायला दोन चार दिवसाचा, कदाचित आठ दिवस लागायचे, तिथे बातमी कळायला काही मिनिट पण लागतं नाही. रेडिओ गेला, ट्रानझीस्टर पण गेला. टेप रेकॉर्डिंग गेल. ग्रामो फोन गेला. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला, जग झटक्यात बदललं. त्याच रुपड बदललं.
इंटरनेट पण मोबाईलच्या कुशीत लोळू लागला. क्षणात हिकडची बातमी तिकडं. पोस्टाची काम कमी झाली. पोस्टकार्ड, अंतर्देशीय गेल.
एका मोबाईल मध्ये घड्याळ, कॅमेरा, internet, फोटो अल्बम, इन्स्टा ग्राम, फेसबुक अश्या नानाविध गोष्टीच घबाड हाती लागलं.
गेम्स नावाचा प्राणी तिथेच शिरला आणि बालपण माती मोल झालं. व्हाट्सअपनं तर जगण मुश्किल केल. माणुसकी गहाण पडली. व्हाट्सअप, फेसबुक ची व्यसन जडली. जी दारू पेक्षा घातक ठरली.
माणसातील संवाद आता स्क्रीन वर आला. एवढंच काय टीव्ही पण मोबाइलला अडकला. विसंवाद चालू झाला. घरात कोण आला कोण गेला हे पण कळल नाही. सदा भासमान दुनिया झाली. फायदे झाले तितकेच तोटे पण झाले. सतत खाली मान घालून माणुसकी टच स्क्रीन खेळायला लागला.
वाय फाय, डोंगल हे परवलीचे शब्द झाले. लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि बालपण हरवलं गेल. वयाच्या दोन चार वर्षाच्या मुलांच्या हातात गेम्स चालू झाले. त्याशिवाय पालकांची कामे खोळाम्बत होती. खेळतोय खेळू दे. गप्प तरी बसेल. त्याच्या व्यसनाने बाळ जेवण करेल, खाईल पीईल. ह्या कारणाने ते बालक ज्यास्त अधीन होतं गेले. पालकांना कळत होतं पण वळत नव्हतं. बाहेर बांगडण्याचे खेळायचे दिवस हरवले. आणि बालपण संपुष्टात आल! चार चौघात बोलायचे हसायचे दिवस सरले. बाळ ऐकलं कोंड होतं गेल ते कळल नाही. घरी पाहुणे मंडळी आली गेली त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्यात शिशुना पाळणा घर हे नवीनच तंत्र ज्ञान निर्माण केलं गेल!
ते तिथे काय करतय काय नाही हे देव जाणे! बाळ मोठं झाले घरी राहिले तर त्याला ब्लु व्हेल सारख्या गेम्सच व्यसन! बाहेरची शुद्ध हवा, शरीराला होणारा व्यायाम, ओळखी, मौज मजा ह्याला हरवून बसलाय. हेच काय ते संशोधन, हीच का ती मानवाची प्रगती! नुसते बालपणच नाही तर माणुसकी, आत्मीयता हरवलेली ही पिढी पुढे जाऊन काय काय करेल, ह्याची कल्पना सुद्धा करावी असे वाटतं नाही. सदा मान वाकडी मंडळी डोळ्याला चस्मा, येणारे पाठीला कुबड, कम्बर दुःखी इत्यादी गोष्टींची सांगड घालत देश प्रगती पथावर जात आहे. आधुनिक तंत्र ज्ञान काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी, येणारी पिढी ही रोगग्रस्त असेल एवढ नक्कीच! त्वरित मिळत असलेल्या गोष्टीची किम्मत मात्र कमी होतं आहे का युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी पण गहाण पडत आहे, हे तितकेच खरे.
☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆
(लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल.’) – इथून पुढे
पीएच. डी. झाल्यावर जयंतरावांना भारतामध्ये लगेच येता आले नाही. पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळत होती. शिवाय फ्रेड हॉएल यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ थिअरॉटिकल ॲस्ट्रोनॉमी सुरू केली होती. तेथे किमान पहिली पाच वर्षे जयंतरावांनी काम करावे आणि संस्थेची घडी बसवून द्यावी अशी हॉएलची इच्छा होती. जयंतरावांनी गुरूचा शब्द पडू दिला नाही. पाच वर्षे त्यांनी या संस्थेला दिली. त्या संस्थेचे मंगल झाले… आणि याच काळात जयंतरावांचे पण मंगलम् झाले. मंगल राजवाडे या गणितज्ञ मुलीशी लग्न. ❤️ मंगला नारळीकर.. जयंत नारळीकर यांची बेटर हाफ.. अगदी अक्षरशः. त्यांची थोडी माहिती घेतल्याशिवाय पुढे जायला काहीच मजा नाही.
मंगला राजवाडे.. गणित विषय घेऊन एमए करताना मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावून पहिली आलेली. जयंत नारळीकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या केंब्रिजमध्ये गेल्या. तीन वर्ष तिथे शिकवले. नंतर कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अध्यापनकार्यास काहीसा विराम दिला. या गणिती जोडप्याला तीन मुली झाल्या. कुटुंब भारतात परतले आणि पुढे सहा वर्षे त्यांनी TIFR मध्ये शिकवले. १९८१ मध्ये.. म्हणजे लग्नानंतर १६ वर्षांनी पीएचडी पूर्ण केली. त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ’नभात हसते तारे’ हे पुस्तक नारळीकर दांपत्याने मिळून लिहिले आहे. “पाहिलेले देश, भेटलेली माणसं”, दोस्ती गणिताशी, यासारखी अनेक पुस्तके मंगलाबाई यांनी लिहिली आहेत. करियर आणि कुटुंब याच्यात समतोल साधताना मंगलाबाईंना कुटुंबाला अधिक प्राधान्य द्यावे लागले.
नारळीकर कुटुंबाने जेव्हा ठरवले की आता भारतात परतावे, तेव्हा शास्त्री कालवश झाले होते. जयंतरावांनी इंदिरा गांधी यांना पत्र पाठवले, शास्त्री यांच्यासोबत झालेल्या बोलण्याचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला. “तुम्ही कुठे काम करू इच्छिता” अशी विचारणा झाली. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये काम करण्याची इच्छा नारळीकर यांनी व्यक्त केली अन् ती पूर्ण झाली देखील. नारळीकर कुटुंब मुंबईला टाटा संस्थेत दाखल झाले. आता मुलींना शाळेत टाकायचे होते. सोबत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची मुले महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जात होती. मात्र नारळीकरांनी त्यांच्या तिन्ही मुलींसाठी केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला.
गणित, विज्ञान, वा भाषा यांचे मूलभूत आकलन होण्यासाठी, माणसाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत वा तिच्या जवळच्या भाषेत झाले पाहिजे, ही त्यामागची भूमिका. मुलींना कुठला कोचिंग क्लास देखील लावला नाही. स्वतःच्या अभ्यासातून स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलींनी शोधली पाहिजेत. घरात अभ्यासाची सक्ती नाही. “घोड्यांच्या शर्यतीमध्ये जिंकल्यावर घोडा कधीच खूश होत नसतो. खूश फक्त जॉकी होत असतो. मुलांच्या बाबतीत देखील हेच लागू होते. ” असे नारळीकर दांपत्य मानायचे. मुलींना घरांमध्ये केवळ विनोद सांगायची सक्ती. रोज जेवायला बसले सगळे की सगळ्यांनी जोक सांगायचेच. भारी ना! ❤️ तिन्ही मुली मोठ्या होऊन संशोधन क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या आहेत. “गीता नारळीकर” या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवरसायनशास्त्र आणि जीवभौतिकी याच्या प्राध्यापिका आहेत. “गिरिजा नारळीकर” या मेलोन युनिवर्सिटीमध्ये संशोधिका आहेत. “लीलावती नारळीकर” या पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.
१९८८ मध्ये जेव्हा पुण्यात आयुका स्थापन करायचे ठरले, तेव्हा प्रा. यशपाल यांनी जयंत नारळीकर यांना बोलावले. आयुका आज संशोधनक्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहे, यात जयंत नारळीकर यांच्या दूरदृष्टी आणि कुशल व्यवस्थापनाचा खूप मोठा हात आहे. नासाच्या हबल दुर्बिणीपेक्षा कमी क्षमतीची दुर्बीण आयुकाकडे असली तरी नासाच्या शास्त्रज्ञांना शक्य झाले नाही, अश्या अनेक बाबी आपले भारतीय शास्त्रज्ञ आयुकामध्ये करून दाखवत आहेत. आयुका केवळ संशोधन कार्य करत नाही, तर सामान्य जनतेत विज्ञान रुजविण्याचे काम देखील करते. जगभरातील दिग्गज शास्त्रज्ञांना ऐकण्याची संधी तिथे उपलब्ध करून दिली जाते. २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे आयुकामधील जत्राच. अनेक कार्यक्रमाचे, व्याख्यानांचे दिवसभराचे नियोजन असते.
पृथ्वीवर जीवन परग्रहावरून आलेल्या सूक्ष्म जीवांपासून सुरू झाले असेल, असे एक गृहितक शेकडो वर्षांपासून मांडण्यात येत आहे. होएल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी देखील या गृहितकाचे समर्थन केले. हे गृहितक पडताळून पाहण्याचा प्रयोग नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली आयुकाच्या टीमने हैदराबाद येथे जानेवारी २००१ मध्ये केला. पृथ्वीच्या वातावरणात ४० किलोमीटर (मराठीमध्ये २० ते ५० किमी पर्यंतच्या पट्ट्याला स्थितांबर म्हणतात) उंचीपर्यंत फुगे सोडण्यात आले. २००५ मध्ये देखील पुन्हा एकदा हा प्रयोग करण्यात आला. या स्थितांबरात पृथ्वीवर न आढळणारे सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. या फुग्यांवर विविध उपकरणे जोडली होती. त्या उपकरणांनी जी निरीक्षणे नोंदवली, त्यातून आलेले निष्कर्ष – गृहितकाची पुष्टी करत असले तरी नारळीकर यांच्या मते त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
जयंतराव लेखनाकडे कसे वळले, त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे. मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. नारळीकरांनी गंमत म्हणून या स्पर्धेत भाग घेतला. मात्र एक जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण असा आपला लौकिक इथे स्पर्धकांच्या आड येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचं नाव बदलून ‘कृष्णविवर’ ही कथा पाठवली. ❤️ त्यांच्या नावाची आद्याक्षरे जविना यांचा क्रम उलट करून नाविज.. (नारायण विनायक जगताप) या नावाने ही कथा पाठवली. जेव्हा त्यांच्या कथेला पहिले बक्षीस मिळाले, त्या वेळेस हा सगळा खुलासा झाला. 😁
आईन्स्टाईन म्हणतो की, जी व्यक्ती विषयांमध्ये तज्ज्ञ असेल, तीच विषय सोपा करून मांडू शकते. नारळीकर यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा भाषणे, मुलाखती वाचताना, ऐकताना सुद्धा त्यांचे विषयातील प्रभुत्व लक्षात येते. कारण अतिशय सोप्या भाषेत वाचकांपर्यंत विज्ञान पोचवले जाते. त्यांच्या विज्ञानकथा इज माय लव, ❤️कारण कथेमधील प्रश्न नेहमी भारतीय शास्त्रज्ञच सोडवत असतो. 😍मात्र नारळीकर यांच्या मते विज्ञान हे एका देशासाठी मर्यादित नसते, संपूर्ण जगाचे असते. विज्ञानाची प्रगती होण्यासाठी प्रयत्न जगभरातून व्हावा आणि त्याचा फायदा देखील अखिल जगासाठी व्हावा. 👍
“पोस्टकार्डवरील उत्तर” हा त्यांनी केलेला प्रयोग तर अगदीच अफलातून. कोणत्याही शाळकरी मुलाने त्यांना साधे पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावे आणि नारळीकर यांनी त्याला उत्तर द्यावे.. तेही अगदी स्वाक्षरीसह. ❤️ तुम्हाला देशभरात हजारो व्यक्ती सापडतील ज्यांनी नारळीकर यांच्याकडून आलेल्या उत्तराचे पोस्टकार्ड जपून ठेवले असेल. व्याख्यानांच्या वेळी समोर जसे श्रोते असतील, त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे व्याख्यान होई. महाविद्यालयीन काळातील त्यांच्या एका शिक्षकाचे राहणीमान आणि उच्चार खूपच गावठी होते. सहाजिकच विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र त्याच्या ज्ञानाने नंतर मुले खूप प्रभावित झाली. कपड्यावर ज्ञान ठरत नाही, याचा धडा जयंतरावांना तेव्हाच मिळाला होता. त्यामुळे आयुकाच्या संचालकपदी असताना देखील त्यांचा पोषाख शक्यतो साधा असायचा. नवीन व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधताना हाच साधेपणा उपयोगी ठरायचा.
सामाजिक परिवर्तनासाठी आग्रही असणारे नारळीकर प्रसंग आला म्हणून बोटचेपेपणाची भूमिका घेताना कधी दिसत नाहीत. १९८६ साली मंगलाबाईंना कर्करोग झाल्याचे आढळून आले. मात्र या प्रसंगाने देखील त्यांची, मंगलाबाई यांची, अंगिकारलेल्या तत्त्वांवरची निष्ठा ढळली नाही. वि. वा. नारळीकर यांनीदेखील आजार आणि दैववाद यांना एकत्र येऊ दिले नाही. झालेल्या आजाराची व्यवस्थित कालमीमांसा केली, त्यावर उपचार केले आणि मंगलाबाई त्यातून पूर्णतः बऱ्या झाल्या. आज ही जोडी जराशी थकली असली तरी सामाजिक कार्यात पूर्वीप्रमाणेच क्रियाशील आहे.
शास्त्रज्ञ आस्तिक असो अथवा नास्तिक, मात्र त्याने चिकित्सक असले पाहिजे, विवेकी असले पाहिजे असा आग्रह नारळीकर धरतात. त्यांचा “पुराणातील विज्ञान विकासाची वांगी” हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. त्यात ते म्हणतात की “क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्म यांच्यात वरवर थोडे साम्य दिसत असले तरी क्वांटम फिजिक्समधील सर्व संकल्पना गणिताच्या भाषेत मांडल्या जातात आणि त्या प्रयोगाने पडताळता देखील येतात. पुराणकथांमध्ये अनेक वैज्ञानिक शोध असल्याचा दावा केला जातो. परंतु आजमितीला त्याचा पुरावा सापडत नाही, हेच सत्य आहे. “
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असो वा फलज्योतिषाचा भांडाफोड. आपल्या विनयी मात्र ठाम भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची चाचणी घेण्याचे आव्हान दिले होते. कुंडलीचा अभ्यास करून सदर व्यक्ती ती अभ्यासात हुशार आहे की नाही.. बस एवढेच सांगायचे होते. यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येणार होता. मात्र या चाचणीमध्ये कोणीही ज्योतिषी सफल झाला नाही. फलज्योतिष हे शास्त्र नाही, हे सिद्ध झाले. आजही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यामध्ये नारळीकर यांनी घेतलेल्या चाचणी-परीक्षा खूप बळ देणा-या ठरल्या आहेत. डॉ. लागू, निळूभाऊ फुले, पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर यांसारख्या वलयांकित व्यक्तींनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वजन प्राप्त झाले आहे.
पु. ल. देशपांडे आणि नारळीकर यांची इंग्लंडमध्ये अचानक भेट झाली होती, बरं का. इंग्लंडमध्ये बागेत फिरताना मराठी शब्द कानावर पडले म्हणून नारळीकर ‘कोण आहे’, हे पहायला गेले, तर साक्षात पु. ल. आणि सुनीताबाई समोर. तेव्हा त्या दोघांना नारळीकरांनी मोठ्या आवडीने केंब्रिज विद्यापीठ दाखवले. पुढे आयुकाचे काम पाहिल्यावर, आवडल्यावर पु. ल. आणि सुनीताबाई यांनी आयुकाला भरघोस देणगी दिली. त्यातून लहान मुलांसाठी एक नवी इमारत निर्माण करण्यात आली आणि कल्पक नारळीकर यांनी त्या इमारतीचे नाव “पुलस्त्य” ठेवले. पुलस्त्य हा सप्तर्षीमधील एक तारा आहे. पु. ल. आणि पुलस्त्य अशी छान सांगड घालण्यात आली.
पु. लं. बाबत अजून एक गमतीशीर किस्सा घडला आहे. नारळीकर यांचे लग्न व्हायचे होते. वयाच्या पंचविशीत पद्मभूषण मिळालेले (माझ्या माहितीत सर्वात कमी वयाचे पद्मभूषण) नारळीकर प्रसिद्धीपासून दूर राहायचा प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या भावी सासऱ्याने पु. लं. च्या “वाऱ्यावरची वरात”ची तिकीटे आणली होती. ‘मी नाटक पाहायला आलो आहे’, असा उल्लेख पु. ल. यांनी करू नये अशी जयंतरावांची इच्छा. मात्र खोडकर पु. ल. यांनी त्यांचा उल्लेख केलाच. त्यातही अशी गुगली टाकली की आज आपल्याकडे नारळीकर उपस्थित आहेत असे म्हणून नारळीकर बसले होते त्याच्याविरुध्द बाजूला नजर टाकली. आसपासचे प्रेक्षक शोधत बसले नारळीकर कुठे आहेत. 😂
जीवनाचा भरभरून आनंद घेणारे जयंत नारळीकर अतिशय हजरजबाबी. त्यांना एकदा विचारले गेले.. “पुनर्जन्मावर तुमचा विश्वास नाही. पण जर खरंच पुढचा जन्म घेताना पर्याय असेल, तर तुम्हाला काय व्हायला आवडेल?” नारळीकर उत्तरले “मला पुन्हा जयंत नारळीकर व्हायला आवडेल.” ❤️ एकदा त्यांना विचारले, “आर्यभट, भास्कर, ब्रह्मगुप्त ही नावे तुम्ही नेहमी वापरता. तुमच्यावर परंपरेचा पगडा आहे का?” नारळीकर म्हणाले, “या सर्वांनी सैद्धांतिक मांडणी केली होती. मात्र आर्यभटने सुरू केलेली परंपरा भास्करपर्यंतच संपली. दुर्बिणीने स्वतः तपासून पाहणाऱ्या गॅलेलिओच्या परंपरेचा मी पाईक आहे. “
मी खूप लहान होतो, तेव्हा ‘यक्षाची देणगी’ कथासंग्रह (पहिली आवृत्ती १९७९ सालची) वडिलांनी घरी आणला होता. वडिलांना का विकत आणावा वाटला, माहीत नाही.. पण मी आजवर त्याची किमान ५० वेळा तरी पारायणे केली आहेत. विशेष म्हणजे कागद अतिशय जीर्ण झाला असला तरी दर वेळेस आतील कथा ताज्याच वाटतात. हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या गणितज्ञाला अगणित पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात २००४ साली मिळालेला पद्मविभूषण आणि २०११ साली मिळालेला महाराष्ट्रभूषण यांचा समावेश आहे.
नारळीकरांचे एक वाक्य नेहमी वापरले जाते, “आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो का? असे जेव्हा मला विचारले जाते तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते. आश्चर्य यासाठी की ही व्यक्ती एकविसाव्या शतकात हा प्रश्न विचारत आहे. आणि खेद यासाठी की प्रश्न विचारणारी व्यक्ती भारतीय आहे. 😔 आगामी काळात असे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी आशा आपण बाळगूया.. विज्ञानाचा प्रसार करू या.”
एक क्षण पुरेसा आहे, कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने, मायेने हात फिरवा… त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल. झाडं, पान, फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात, मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात… त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो… कोणाचं बंधन नसतं.. निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी, अधिक बलवान बनवत. निसर्गाचं प्रेमच आहे तसं… हे ऋतुचक्र तसच तर ठरवल गेलं आहे की. खायला अन्न, प्यायला पाणी, सूर्यप्रकाश, सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन, फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची… पानांची… वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण… कड्या वरून झेप घेणं.. किनाऱ्यावर नक्षी काढणं… एखाद्या लहानग्या प्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करण…
… अस आणि किती अगणीत रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो. सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे… भगवंत प्रेमाचा भुकेला आहे… त्याला मोठे समारंभ नकोत, फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको, अवडंबर नकोच… एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण… त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला… एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा, आणि व्यक्त होऊन देण्याचा.
तुमचा पैसा, शिक्षण, बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो… एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा… एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती… व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी… पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं… अस नसत हो. ही निसर्गाची, भगवंताची…. प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते… ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी…
… आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं… भगवंताची देणगी आहे ही.. !!
हे आपल्यातलं प्रेम वाढले ना… भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल… जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे… की आपण नक्की बदलायला लागू… स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ, स्वच्छ सात्विक होऊ, प्रेम मय, आनंदमय होऊ… या जगाला त्याची खूप गरज आहे, आपल्याबरोबर…
फक्त रोज एक क्षण हवा…
आनंदात रहा..
☆
कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈