मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं. एक मजली, खालच्या पायरीवर पाण्याचा नळ असलेलं,  वर जाण्यासाठी एक लाकडी जिना,  उजवीकडे दरवाजा,  मधल्या भागातलं छोटसं लँडिंग,  दरवाजा लाकडाचा आणि घरात जाताना ओलांडावा लागणारा लाकडी उंबरठा. दरवाजाच्या बाहेरच्या,वरच्या  भागावर लटकणारी एक लोखंडी साखळी.  बाहेर जाताना ती साखळी अडकवायची आणि त्यात लोखंडी कुलूप लावायचं.  जाताना दोन वेळा कुलूप ओढून बघायचं.  आता हे आठवलं की वाटतं त्यावेळी अशा कुलपातलं बंद घर कसं काय सुरक्षित राहायचं?  आता आपण घराला दोन दोन दरवाजे, एक जाळीचा,  एकाला पीप होल,  अत्याधुनिक कुलुपे, गुप्त नंबर असलेली,  शिवाय कॅमेरे, सीसीटीव्ही आणि असेच बरेच काय काय… तरीही आपलं घर सुरक्षित राहील का? याविषयी शंकाच असते.

तो काळच वेगळा होता का? स्वप्नात जेव्हा जेव्हा मला ते घर दिसतं तेव्हा तेव्हा मी मनोमन त्या वास्तुदेवतेस  मनापासून नमस्कार करते.  कारण याच वास्तुदेवतेने माझी जडणघडण केली. इथेच मी खरी मोठी झाले आणि आयुष्यातले असंख्य आनंदाचेच नव्हे तर अनेक संमिश्र भावनांचे क्षण वेचले.

४/५ शा.मा. रोड, धोबी गल्ली, टेंभी नाका ठाणे.

या पत्त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण माझं बालपण याच गल्लीत गेलं.  बालपणीचा तो रम्य काळ आणि धोबी गल्ली याचं अतूट नातं आहे. या गल्लीचं आजही माझ्या मनात अस्तित्व आहे.  ती जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येते, हळूहळू आकारते आणि चैतन्यमय होते. अरुंद पण लांबलचक असलेली ती गल्ली,  एकमेकांना चिकटून समोरासमोर उभी असलेली काही बैठी,काही एक मजली घरं.. त्या सर्व घरांची दारं मनातल्या मनात फटाफट उघडली जातात आणि माझे ते बाल सवंगडी माझ्या भोवती नकळत गोळा होतात. चित्रा,चारू, बेबी, दिलीप, सुरेश, अशोक, लता, रेखा, अरुण, शरद, आनंद कितीतरी आणि मग आमचे खेळ रंगतात.

डबा ऐसपैस, लगोरी, सागरगोटे, कंचे, लंगडी, खो-खो, अगदी क्रिकेट सुद्धा! आरडाओरडा,  गोंगाट, धम्माल!

पद्धतशीर क्रीडा साहित्य म्हणजे काय याच्याशी आमची ओळख ही नव्हती.  खरं म्हणजे आम्हाला त्याची जरुरीच भासली नाही.  धुणं धुवायच्या धोपटण्याने आम्ही क्रिकेट खेळलो. असमान उंचीच्या मिळेल त्या  काठ्यांनी आम्ही यष्टी रचली. गद्र्यांचं घर ते सलाग्र्यांचं  घर ही आमची विकेट आणि त्यापलीकडे चौकाराच्या, षटकाराच्या रेषा. समोरासमोर असलेल्या पायऱ्यांवर उभे राहून फिल्डींग  व्हायचं आणि असं आमचं गल्ली  क्रिकेट जोरदार रंगायचं. रडी खडी सगळं असायचं पण मुल्हेरकरांचे नाना आमचे थर्ड अंपायर असायचे.  नाना तसे काही फारसे खिलाडू वृत्तीचे नव्हते. आम्हा खेळणाऱ्या मुलांचा खूप राग राग करायचे. चुकून त्यांच्या गॅलरीत आमचा बॉल गेला तर ते परतही द्यायचे नाहीत. 

“मस्तवाल कार्टी! रविवारी सुद्धा शाळेत पाठवा यांना.  नुसता गोंगाट करतात, दुपारची वामकुक्षीही  घेऊ देत नाहीत.” पण तरीही आम्ही खेळत असताना गॅलरीच्या धक्क्याला टेकून उभ्याने आमचा खेळही बघत असत आणि त्यांना अंपायरचा मान दिला की मात्र ते खूष व्हायचे. आम्ही पोरंही काही साधी नव्हतो बरं का! चांगले चतुर, लबाड, लुच्चेच होतो आणि प्रचंड मस्तीखोरही. आज जेव्हा मी पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग पॅक घेऊन स्कूलबसच्या रांगेत आजी किंवा आजोबांचा हात धरून उभं असलेलं बाल्य बघते ना तेव्हा पोटात कळवळतं कुठेतरी.  हरवलेलं, बॅकपॅक मध्ये कोंबलेलं ते बालपण माझं काळीज चिरून जातं. 

धोबी गल्लीतली ती घरं म्हणजे नुसत्या चुना मातीच्या भिंती नव्हत्या. या भिंती बोलक्या होत्या. या भिंतींच्या आत आणि पलीकडे असलेल्या जगाचा एक सुंदर बंध होता. एक रक्ताचा आणि दुसरा सामाजिक. घरात असलेली नाती आणि भिंतीच्या पलिकडची नाती बांधणारा तिथे एक अदृश्य पूल होता आणि या पुलावरच मी घडले.  त्या वातावरणात मी वाढले, तिथे माझ्यावर असंख्य वेगवेगळे संस्कार झाले.

माझी संस्कारांची व्याख्या आणखी थोडी निराळी आहे.  सर्वसाधारणपणे संस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणे, रीती, परंपरा,  देवधर्म पाळणे,  नेहमी खरे बोलणे,  नम्रता, शालीनता, सुहास्य, सुभाष्य वगैरे वगैरे खूप काही. संस्कार म्हणजे एक आदर्श तत्वांचं भलं मोठं गाठोडच म्हणा ना!  ते तर आहेच. ते नाकारता येणारच नाही पण त्या पलिकडे जाऊन मी म्हणेन संस्कार म्हणजे स्वतः केलेलं निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली वाईट भलीबुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रितीने शोधणं,  ते शोधता येण्याची क्षमता असणं म्हणजे संस्कार.

धोबी गल्लीत माझं बालपण फुलत असताना कळत नकळत अनेक चांगल्या वाईट भावभावनांचं, प्रसंगांचं नकळत मेंदूत झालेलं रजिस्ट्रेशन आजही डिलीट झालेलं नाही.  बालपणी हसताना, खेळताना, भांडताना, बागडताना, बघताना फारसे प्रश्न पडले नसतील किंबहुना प्रश्न विचारण्याची क्षमता तेव्हा नसेल पण पुढच्या आयुष्यात जगताना आणि मागे वळून पाहताना अनुभवलेल्या या प्रसंगांनी आपल्याला किती शिकवण दिली याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा संस्काराची व्याख्या व्यापक  होते.

धोबी गल्ली म्हणजे माझ्यासाठी बालभारती होती.

धोबी गल्लीतलं जग लहान होतं.  काही थोड्याच लोकसंख्यांचं होतं.  फार तर दहा-बारा  घरं असतील  पण आता विचार केला तर वाटतं जग लहान किंवा मोठं नसतं. जे जग तुम्हाला किती दूरवर नेऊ शकतं  किंवा किती दूरवरचे दाखवते,  किती विविधतेत तुम्हाला वावरायला लावते त्यावरून त्याचं क्षेत्रफळ ठरत असतं.

धोबी गल्ली तशी होती.

ते एक निराळं जग होतं.  लहान— थोर सर्वांचंच. या गल्लीत जितकी  एकजूट आणि एकोपा अनुभवला तितक्याच मारामाऱ्या आणि आणि भांडणही पाहिली.  जिथे देवांच्या आरत्या ऐकल्या, म्हटल्या तिथे प्रचंड शिवराळ भाषेचाही भेसूरपणा अनुभवला.

मुळातच या धोबी गल्लीचे दोन भाग होते. एक इकडची गल्ली आणि एक तिकडची गल्ली.  दोन्ही भागातलं जग निराळं होतं, दोन्ही भागातली संस्कृती वेगळी होती.  आम्ही मुलं इकडच्या गल्लीतली होतो.  कुटुंबात सुरक्षितपणे वाढत होतो. आम्ही शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, गृहपाठ, परीक्षा.. सहामाही— वार्षिक यांचा तणाव बाळगत होतो, परवचा, शुभंकरोती प्रार्थना  म्हणत होतो.  मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत मुक्तपणे धांगडधिंगा घालत होतो. घरातल्या मोठ्या माणसांचा दमही खात होतो आणि प्रत्येक जण कधी ना कधी, लपून-छपून गुन्हेही करत होते. गुन्हा शब्द फार मोठा वाटेल पण त्यावेळी घंटीच्या गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खाणे, कुणाच्या परसदारात जाऊन झाडावरच्या कैऱ्या नाहीतर जांभळं तोडणे, बटुबाईच्या कोंबड्यांना पळवणे, नाहीतर तिकडच्या गल्लीत राहणाऱ्या एबी आणि रोशन या बहिणींशी गप्पा मारायला जाणं वगैरे अशा प्रकारचे  मोठ्यांचे अज्ञाभंग करणारे गुन्हे असायचे. 

इकडच्या गल्लीतलं पहिलं घर होतं मथुरे यांचं आणि शेवटचं दिघ्यांचं. त्यामुळे मथुरे ते दिघे हे आमचं जग होतं पण पलीकडच्या म्हणजेच तिकडच्या धोबी गल्लीतलं जीवन फार वेगळं होतं. तिथे राहणारी माणसं, त्यांचे व्यवसाय, त्यांचे आचार विचार वागणं अगदी त्यांचा आर्थिक स्तर, जात धर्म यांतही भेद होते. हे अंतर , हा भेद त्यावेळी का राखला गेला, का बाळगला  गेला किंवा तो का पार करता आला नाही हे सारे प्रश्न आता मनात येतात पण त्यावेळी मात्र माझं बालपण या दोन भिन्न विश्वात नकळतपणे विभागलं गेलं होतं.

बाकीचं फारसं आठवत नाही पण एबी आणि रोशन या ईस्रायली बहिणींबद्दल मात्र मला खूप कुतूहल होतं हे नक्कीच.  त्या दोघी अतिशय सुंदर होत्या.  त्या काळात त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या समूह नृत्यांगना होत्या. त्यांच्याकडे नृत्य शिकवायला कोणी कोणी येत.  खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती पण त्या दोघींना त्यावेळी मस्त फॅशनेबल कपडे घालून, आता आपण ज्याला मेकअप म्हणतो पण त्यावेळी रंगवलेल्या चेहऱ्याने त्यांना गल्ली ओलांडताना मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीतून  पहायची आणि खरं सांगू मला त्या दोघींबद्दल खूप आकर्षण वाटायचं.  त्याही वयात वाटायचं की यांच्याशी आपण का नाही बोलायचं? का नाही त्यांच्याशी मैत्री करायची?

त्या उदरनिर्वाहासाठी सिनेमात गेल्या. त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती. रोशन तर साधारण माझ्याच वयाची होती. एबी थोडी मोठी होती.

उदरनिर्वाह,घर चालविणे यातलं गांभीर्य तेव्हा मला कळतही नव्हतं. इतकंच कळत होतं आपल्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत.

काही वर्षांनी ते सारं कुटुंब पॅलेस्टाईनला स्थलांतरित झाले.

अशा या पार्श्वभूमीवर आजही ती धोबी गल्ली मला एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी भासते.  तिथल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या घटनांची खरी साक्षीदार वाटते. सर्व धर्म आचार विचार समावेशक वाटते. 

तो एक अथांग जीवन प्रवाह होता आणि माझं बालपण त्याच प्रवाहात वल्ही मारत  घडत होतं.

 – क्रमशः भाग १. 

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गंधर्व स्मरण” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “गंधर्व स्मरण …” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

“नाना”, बालगंधर्व  ह्यांचं एक नाटक “संत कान्होपात्रा” – ह्या नाटकावर त्यांचा अतिशय लोभ होता. त्यातील कान्होपात्रा ह्या भूमिकेत ते अंतर्बाह्य रंगत असत. जेव्हा हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातील शेवटचा – पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या देवालयातील प्रवेश, म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ति आणि त्यालगतचे गर्भगृह, हे पडद्यावर दाखवत असत.

बालगंधर्व ह्यांनी त्यांच्या नाटकातील मंडळींना पंढरपूर येथे पाठवले. तिथली छायाचित्रे आणवली अन् रंगभूमीवर तसेच्या तसे सर्व उभे केले. ह्यासाठी सावंतवाडी येथील ‘भावजी’ ह्या नावाचा कसबी कलाकार नानांनी गाठला. सुतारांच्या सोबत हे कलाकार काम करू लागले. भावजी ह्यांनी विठ्ठलमूर्तिकरता शिरसाचे लाकूड मुद्दाम निवडून आणले, अन् त्या मूर्तीचे काम प्रचंड जीव ओतून केलं. मंदिराचा सेट आणि मूर्ति, सर्व घडवण्यासाठी २ वर्षं काळ गेला. अतिशय देखणी मूर्ति घडवली, ज्याने लोक तासंतास तिच्याकडे बघत बसत. दुर्दैवाने ती व्यक्ती पुढं मानसिक संतुलन बिघडून बसली, पण नानांनी त्यांच्या कलागुणांना जाणून त्यांची अखेरपर्यंत  काळजी घेतली. त्यांस अंतर दिले नाही. पुढं हा मंदिराचा देखावा अन् मूर्ति प्रथम मुंबईत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधे दाखवले गेले, जे पाहण्यास प्रचंड गर्दी लोटली.

त्यानंतर नाना कंपनीला घेऊन पंढरपूर येथे गेले. कान्होपात्रा प्रयोग लावला. मंदिराचा सेट अन् विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. प्रयोग रंगला. थिएटर प्रचंड गर्दीने भरून गेले होते. नाटक पाहताना सर्व थिएटर स्तब्ध होते, डोळे लावून तो थाट अन् अभिनय बघत होते. नाटकाच्या शेवटी पांडुरंगाच्या पायांवर डोके ठेवून कान्होपात्रा देह ठेवते, ह्या प्रसंगानंतर पडदा पडून प्रयोग संपला. रसिक त्या प्रयोगाने इतके प्रचंड भारावून गेले. त्यांना भान राहिले नाही. सर्व रसिकांनी स्टेजवर येऊन कल्लोळ केला. सर्वांचे म्हणणे, ‘आम्हाला कान्होपात्रा ह्यांचे दर्शन पाहिजे’!!

ही गर्दी स्टेज मॅनेजरला पांगवता आली नाही. काय करायचं  त्यास समजेना. एवढा कसला गलबला झाला म्हणून बालगंधर्व मेकअप न उतरवता स्टेजवर आले, तेव्हा काय विचारावे? लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी टेकवून नमस्कार केला. गर्दी कमी होता होईना. सर्वांना दर्शन घ्यायचेच होते आणि नाना मात्र, “अरे देवा! हे काय करता? माझ्या काय पाया पडता?” म्हणत लोकांना विनंती करत होते, “असे नका करू, असे नका करू!!!” सर्व प्रेक्षकांचे दर्शन घेऊन झाले. “झाले आमचे काम”, असे म्हणत सर्व प्रेक्षक निघून गेले.

त्याच वेळी योगायोगाने एकादशी आली. नानांच्या मनात पांडुरंगाला महापूजा, अभिषेक करण्याची प्रचंड इच्छा जागी झाली. पंचामृत स्नानासाठी त्यांनी तयारी केली. कोऱ्या दुधाच्या घागरी आणल्या, त्यातील अनेक घागरींमधील दुधाचे विरजण लावून पंचामृतस्नानासाठी श्री पांडुरंगाची महापूजा सिद्धता झाली.श्री विठ्ठलाला भरजरी पोशाखही तयार करून घेतला. एकादशी दिवशी भल्या पहाटे नानांनी चंद्रभागेत स्नान केले, सोवळे नेसून आत गाभाऱ्यात जाऊन पंचामृत स्नान आणि पूजन केले. हा सोहळा गाजला. ही बातमी समजली म्हणून हे सर्व बघायला पंढरपूरच जणु तिथं लोटले होते. पूजा झाल्यावर अतिशय आपुलकीने प्रेमाने सर्वांना पंचामृत तीर्थ, प्रसाद वाटला…  ही त्यांच्यामधील मुरलेल्या ‘कान्होपात्रा’ची खरी आणि ‘नाना’ ह्या व्यक्तीची खरी भक्ती!!!

बालगंधर्व हे निरपेक्ष स्नेहाचे, निःस्वार्थ प्रेमाचे लोभी होते. उत्कट प्रेमाचे तंतू जपून ठेवणारे अतिशय हळवे व्यक्तिमत्त्व!! जीवन हे सौंदर्य आस्वादासाठी अन् त्यातून प्राप्त होणारा दिव्य आनंद अनुभवण्यासाठीच आहे. नानांनी आयुष्यभर जणु हाच प्रसाद स्वतःच्या कलेतून, गायनातून भरभरून सर्वांना दिला. त्यास अनुभवून तर त्यांच्या काळास “गंधर्वयुग”  म्हणून मानले जाते!!

ह्या गंधर्वयुगाची सुरूवात २६ जून १८८८ ला नानांच्या जन्माने झाली, त्यास काल १३६ वर्षे झाली!! 

दोन दिवसांवर आषाढीवारीसाठी ज्ञानेश्वरमहाराज पालखी प्रस्थान आहे पंढरपूरकडे आणि कालच नानांचा जन्मदिवस झाला, म्हणून हा लेख ! हा एक योगायोगच! 

© श्री नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.

3. “The quick brown fox jumps over the lazy dog” ह्या इंग्रजी वाक्यात इंग्रजीतीलसर्व अक्षरे आलेले आहेत.

4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वाळूच्या कणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.

11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दर माणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाइट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्ल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टम वर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पट वेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड” — तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहे.

20.  डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील उच्चारण्यास सर्वात अवघड वाक्य मानले जाते. 

22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.

     – इस्पिक – राजा डेव्हिड

     – किलवर – अलेक्झांडर

     – बदाम – चार्लमॅगने

     – चौकट – जुलियस सीझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही  पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जॅकेट, अग्निरोधक, कारचे वायपर व लेझर प्रिंटर्स … ही सर्व स्त्रियांनी  शोधलेली साधने आहेत.

29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यंत झोपू शकतो.

32. सर्व विषुववृत्तीय अस्वलेडावरी असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.

37. मृत्यूपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. वीज-दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात. 

43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.

44. सिगरेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 6 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मागील भागात डार्कवेब चांगल्या कामासाठी कोण आणि का वापरते याबद्दल चर्चा केली. आज मात्र डार्कवेबच्या अनुचित वापराबद्दल बोलणार आहे. यातील सगळ्यात वाईट गोष्ट ही की डार्कवेबचा ७०% ते ८०% वापर अनुचित गोष्टींसाठीच केला जातो. 

डार्कवेबवर त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्याला सभ्य समाज मान्यता देत नाही. किंवा त्या त्या देशाचे कायदे अटकाव करतात. इथे तुम्हाला हत्यारांची खरेदीविक्री, माणसांची खरेदी विक्री, लहान मुलांच्या अश्लील फिल्म, आतंकवाद्यांचे परस्परातील व्यवहार या सगळ्याच गोष्टी येतात. कारण यावर कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा सुरक्षा यंत्रणाना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकत नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्णतः बंद करणे शक्य नसते त्यावेळी त्या गोष्टीचा समाजासाठी चांगला वापर कसा करता येईल हेच बघणे जास्त फायदेशीर असते. आणि तेच अनेक देशांच्या सुरक्षा यंत्रणा करतात.

याचे एक उदाहरण देतो. अमीर खानचा एक चित्रपट आला होता. ‘सरफरोश’ नावाचा. त्यात दोन पात्र दाखवले आहेत. एक आहे इन्स्पेक्टर ‘सलीम’ आणि दुसरा आहे ‘फटका’ ( जो मुंबईच्या अशा भागात राहतो जिथे अपराधिक गोष्टी केल्या जातात. ) इन्स्पेक्टर सलीम कायम त्या ‘फटका’ला पैसे देऊन त्याच्याकडून वेगवेगळी माहिती मिळवत असतो. आता जर तो अधिकारी त्या भागात ये जा करत असेल तर त्याला ते बंद करता येणे शक्य नाहीये का? उत्तर मिळते, ‘नाही’. कारण त्याने एका ठिकाणी धाड टाकली तर तो व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालू होईल. दुकान बंद करता येईल पण पण मानसिकता कशी बदलणार? त्यापेक्षा त्या गोष्टी तशाच चालू द्यायच्या, फक्त त्यातून समाजाचा समतोल ढळणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी त्याच प्रमाणे अनेक सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी आपली ओळख लपवून डार्कवेबवर वावरत असतात. आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळेल त्यातून समाजाचे कमीत कमी नुकसान होईल याचा प्रयत्न करतात. 

आता काहींना असाही प्रश्न पडेल की नुसते वावरल्याने माहिती कशी मिळते? डार्कवेबवर कायम वेगवेगळे समूह बनवले जातात. जे अगदी काही दिवसांपुरते किंवा अनेकदा तर काही तासांपुरते सक्रीय असतात. ज्या सदस्यांना अशा समुहात सामील व्हायचे असते त्यांना एक लिंक पाठवली जाते ज्याच्या आधारे ते त्या समूहात सभासद बनतात. ( whatsapp चा वापर करणाऱ्या माणसाला हे लगेच लक्षात येऊ शकेल. कारण त्याचे बरेचशे कार्य डार्कवेबसारखेच असते. ) त्या समूहाच्या माध्यमातून संदेश दिले घेतले जातात. किंवा मग एखादी खरेदी विक्री केली जाते. एकदा का त्याचा उद्देश पूर्ण झाला की तो समूह बंद केला जातो. आणि हेच कारण आहे की जोपर्यंत सुरक्षा यंत्रणा अशा समूहातील गोष्टी डिकोड करतात, समूह बंद केलेला असतो किंवा त्या सदस्यांनी आपले स्थान बदललेले असते. मग कसे कुणाला पकडता येईल?

तुम्हाला हे whatsapp चे उदाहरण यासाठी दिले कारण मध्यंतरी एका मित्राशी चर्चा करताना त्याने हा प्रश्न उपस्थित केला होता की, whasapp ला डार्कवेब म्हणता येईल का? इथेही सगळे संदेश एनकोड करून पाठवले जातात. इथे कधीही समूह तयार करता येतो, कधीही बंद करता येतो. इथे कोणकोणते समूह आहेत हे कुणालाही कुणी सांगितल्याशिवाय समजत नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडला का? या प्रश्नांचे उत्तर आहे, ‘whatsapp ला डार्कवेब म्हणता येत नाही.’ याला दोन कारणे आहेत. पाहिले कारण म्हणजे इथे तुम्ही तुमच्या फोन नंबर किंवा इमेल आयडी वरून लॉगीन होतात. या दोन्ही गोष्टी तुमची ओळख असतात. म्हणजेच इथे तुम्ही आपली ओळख लपवू शकत नाहीत. आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही whasapp वर जे समूह बनवतात त्याचा डेटा जरी एनकोड केलेला असला तरी तो एका सर्व्हरवर साठवलेला असतो. आणि जर सुरक्षा यंत्रणानी सबळ कारण देऊन मागणी केली तर तो त्यांना मिळू शकतो.     

आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. नेटवर्क जर सर्व्हर आणि क्लाईंट मिळून तयार होते तर इथेही सर्व्हर असणार ना? हो असतोच. पण कोणत्याही सरकारचे त्यावर नियंत्रण नसते. सरकारला त्यावर का नियंत्रण ठेवता येत नाही हे मात्र पुढील भागात. 

– क्रमशः भाग सहावा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंदू चॅम्पियन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ चंदू चॅम्पियन ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक दिवशी सूर्य एकाच दिशेला आणि साधारण सकाळीं त्याचं वेळेला उगवतो तरीही गंमत बघा प्रत्येक दिवस हा रोज अगदीं निराळाच असतो. कधी खूप आशा एकवटल्या असताना हवे तसे मनासारखे घडत नाही आणि कित्येकदा ध्यानीमनी नसताना परमेश्वराने लीला केल्यागत खूप काही आपल्या कल्पनेपेक्षाही आपल्या पदरात घालतो की आपली ओंजळ भरगच्च भरते.

मागील सोमवार असाच माझ्यासाठी  काहीही कल्पना नसतांना खूप काही देणारा असा उजाडला. अमरावतीला मनापासुन तळमळीने समाजासाठी  भरघोस काम करणारे सुप्रसिद्ध गोविंद काका कासट आणि सुदर्शनजी गांग ह्यांनी भरीव प्रेरणा मिळवून देणारा “चंदू चॅम्पियन” ह्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन सरोज टॉकीज मधे केले होते. त्या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठीच्या निमंत्रक यादीत माझे नाव असल्याने मला एक सुखद धक्का दिला. आणि त्यामुळेच मी एक खूप जास्त सकारात्मक आणि शब्दात वर्णन करता येणार नाही असा सुंदर चित्रपट बघण्याचे भाग्य मला लाभले. आता ह्या चित्रपटाविषयी माझ्या शब्दात.

त्यासाठी आधी आपल्याला हे मुरलीधर पेटकर कोण, त्यांचे कार्य काय हे जाणून घ्यावे लागेल.  मुरलीकांत पेटकर हे स्वतः एक अत्यंत विलक्षण जीवन जगले आहेत. पेटकर म्हणजे एक नम्र , अत्यंत  प्रामाणिक, आणि समर्पित जीवन जगणार अफलातून व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. त्यांनी  कठोर परिश्रमाने विलक्षण सिद्धी प्राप्त केली.

त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1944 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथील पेठ इस्लामपूर भागात झाला. त्यांनी भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) मध्ये जवान म्हणून काम केले.  सिकंदराबादमध्ये असताना त्यांनी बॉक्सर म्हणून लढा दिला. १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात नऊ गोळ्या लागल्याने पेटकर अपंग झाले होते. त्याच्या दुखापती बऱ्या झाल्यावर त्यानी हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा पोहणे आणि इतर खेळांमध्ये भाग घेऊ लागले.

अखेरीस, त्यांनी भारताला पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. पेटकरांनी 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा जिंकून 37.33 सेकंदाचा नवा विश्वविक्रम केला. फक्त पोहणेच नाही तर स्लॅलम, भालाफेक आणि अचूक भालाफेक यातही ते निपुण होते.

चंदू चॅम्पियन हा बायोपिक भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे.  “मुरलीकांत पेटकर यांची कथा ही मुक्त भारताची कथा आहे”, ट्रेलरमध्ये म्हटले आहे. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, मुरलीचा प्रवास देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रतिबिंबित करतो, कारण तो निर्धाराने महानता मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करतो. 

1965 च्या भारत-पाक युद्धात नऊ गोळ्या लागल्याने मुरलीकांत पेटकर ऑलिम्पिक मेडल च्या ध्यासाने  पोहण्याकडे वळले. मूलतः भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि सेवा शाखेतील बॉक्सर, त्याने इतर खेळांमध्येही प्रावीण्य मिळवले, 1968 पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्लॅलममध्ये अंतिम फेरी गाठली, चार वर्षांनंतर (1972, जर्मनी गेम्स) पोहण्यात सुवर्णपदक मिळवण्याआधी.  

त्याच्या नावावर ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम आहे. त्यांच्या कामगिरीच्या 46 वर्षांनंतर भारताने 2018 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्याच्या जिद्द आणि कर्तृत्वामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने खास अपंग खेळाडूंवरील पुस्तकात पेटकरचा उल्लेख करण्यास प्रवृत्त केले.

सुशांत सिंग राजपूतचा एमएस धोनी, फरहान अख्तरचा भाग मिल्खा भाग आणि विनीत कुमार सिंगचा मुक्काबाज यांसारख्या चित्रपटांची आठवण हा चित्रपट बघताना होते. खुप दिवसांनी टॉकीज मधे बघितलेला अतिशय चांगला सिनेमा खुप काही शिकवून कायम आठवणीत राहील.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाली ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ लाली ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

सुलु जेव्हा सिबीएस वर उतरली तेव्हा तीन वाजले होते.सुलु बीवायके कॉलेज मध्ये शिकत होती.शेवटच्याच वर्षाला होती.सध्या कॉलेजला सुट्ट्या होत्या.. दिवाळीच्या..त्यामुळे ती गावी घरी गेली होती.

तिचं गाव नाशिकपासून तास दिड तासाच्या अंतरावर होतं..निफाड जवळ.एका मैत्रीणीकडुन तिला काही नोट्स घ्यायच्या होत्या.. म्हणून ती नाशकात आली होती.

आज तिच्या सोबत तिची लहान बहीण होती..लाली तिचं नाव.आठ दहा वर्षांची होती.पहील्यांदाच ती नाशकात आली होती.शहर म्हणजे काय हे ती केवळ ऐकुन होती.बसमधुन उतरल्या पासून ती नुसती इकडे तिकडे बघत होती.सगळीकडे गर्दी..माणसांची..गाड्यांची.. सिग्नलला तर त्यांना खुप वेळ थांबावं लागलं.एवढ्या सगळ्या गाड्या कुठुन येतात.. आणि कुठं जातात हाच प्रश्न तिच्या मनात आला.

तिचं गाव सोडून ती कधी कुठे गेलेलीच नव्हती.तिचं गाव अगदीच छोटं..खेडचं म्हणा ना! तिच्या त्या एवढ्याश्या गावात तिच्या ताईचा रुबाब खुप.शहरात शिकणारी मुलगी ना! कुणाला नाशिकहून काही आणायचं असलं तर तिच्या ताईचीच सर्वांना आठवण यायची.मोबाईल मधलं काही अडलं तरी सुलुताईच लागायची सर्वांना.लालीला खुप अभिमान वाटायचा आपल्या ताईचा.

आत्ताही तिनं पाहिलं.. किती सहजतेने ती या शहरात वावरत होती.सिबीएस वरुन उतरल्यावर तिनं समोरुनच बस पकडली.कुठली बस.. किती नंबरची बस..कुठुन येते.. कुठे जाते सगळं काही तिला माहीत.

“ताई मला टी शर्ट पॅन्ट घेणार ना तु?मग चल ना..”

“हो लाली.. माझं काम झालं ना..की मग आपण जाऊ शालीमारला..”

“आणि गंगेवर पण ना?मला आईस्क्रीम खायचीए”

“हो..हो.. आहे माझ्या लक्षात”

दोघी बसमधून उतरल्या.कॉलेज रोडवरची दुकाने..शोरुम्स.. बिल्डिंग पाहून लाली अचंबित झाली.सुलुने तिचा हात घट्ट पकडला.. एका बिल्डिंग मध्ये त्या आल्या.सुलुने सहजपणाने लिफ्ट खाली बोलावली.दोघी जणी लिफ्टमध्ये शिरल्या.दरवाजा आपोआप बंद झाला.

“हं..ते पाच नंबरचं बटन दाब”

सुलु म्हणाली.लालीला खुप मजा वाटत होती.लिफ्ट थांबली.. दरवाजा उघडला.दोघीजणी एका फ्लॅटमध्ये आल्या.

सुलुच्या मैत्रिणीनं दोघींना पाणी दिलं..मग सरबत दिलं.लालीच्या तोंडुन शब्दच निघत नव्हता.तो फ्लॅट..ते उंची फर्निचर.. आणि याही पेक्षा सुलुची ती मैत्रीण..तिची आई.. सगळ्यांच्या पुढे आपण खुपच गावंढळ दिसतो आहोत.. नाही आपण गावंढळच आहोत असंच तिच्या मनानं घेतलं.

सुलुचं काम झालं.दोघी खाली उतरल्या.सगळीकडे दुकानच दुकानं.

“ताई मला पॅन्ट..ते बघ तिकडे.. किती मोठ्ठं दुकान आहे”

लाली मागेच लागली.सुलुने तिची समजुत घातली.

“आपण तिकडे शालीमारला जाऊ.. इकडे खुप महाग असतात कपडे”

लाली खुप चिडली.तिला ताईचा रागच आला.मघाशी त्या फ्लॅटमध्ये जाऊन आल्यानंतर तिला आपली ताई एकदमच गावंढळ वाटायला लागली.त्यात ताईने आता इकडुन पॅन्ट घ्यायची नाही म्हणून सांगितलं.पाय आपटतच ती ताईचा हात धरुन चालत होती.

“ताई..पाय दुखायला लागले माझे..मला रिक्षात बसायचं”

“नाही लाले..ती बघ आलीच बस”

सुलुने ओढतच तिला बसमध्ये खेचलं.बस खचाखच भरली होती.लालीला आता खुप कंटाळा आला होता.आजूबाजूला रिक्षा..कार्स..टु व्हिलर्स धावत होत्या.. आणि ती ताईचा हात धरुन कशीबशी उभी होती.

शालीमारला दोघी उतरल्या.लालीच्या मनात ताई बद्दल खुप राग भरुन राहिला होता.तिकडे किती छान मोठ्ठी दुकानं होती.. रस्ते..इमारती..ती श्रीमंती..आपली ताई ही अशीच..खेडवळ..गावठी.. काही काही घेऊन देत नाही मला.पळुन जावसं वाटतं मला.

इकडे शालीमारला पण दुकानच दुकानं..गर्दीच गर्दी..रोड क्रॉस करताना ताई तिला ओढत होती..पण..

..पण गडबडीत ताईचा हात सुटला.इकडे तिकडे बघती तर ताई कुठे? कुठे गेली ताई?

लाली घाबरली..बावरली.. सगळ्या बाजूंनी माणसंच माणसं..पण तरीही तिला एकटेपणाची जाणीव झाली.डोळे भरुन आले.बाजुला एक मारुतीचे मंदिर होतं.तिथल्या पायरीवर बसुन ती रडायला लागली.

तिचं ते रडणं ऐकुन एक बाई तिच्या जवळ आली.

“काय नाव तुझं बाळ?”

असं म्हणून तिची समजुत घालु लागली.तुला खाऊ देते..गाडीत फिरवते.. असं खुप काही काही सांगु लागली.

मघाशी या सगळ्या गोष्टी लालीला हव्या होत्या..पण त्या ताईच्या सोबतीने.

लालीचं एकच वाक्य.. मला ताई पाहिजे.. मला तिच्याकडे जायचं.मघाची ती बाई आता लालीवर चिडली.तिचा हात धरुन ओढु लागली.बाजुला असलेल्या रिक्षात ती लालीला घेऊन जाऊ लागली.

लाली जीवाच्या आकांताने ओरडली..

“ताई.. ताई..”

तेवढ्यात कुठुनतरी तरी सुलु आली.ती शोधतच होती लालीला.त्या बाईच्या खाडकन कानाखाली मारत तिनं लालीला ओढून जवळ घेतलं.

गर्दी जमली.. पोलिस आले. ‌.त्या बाईला आणि रिक्षावाल्याला घेऊन पोलीस निघून गेले.. गर्दीही पांगली.

सुलुनं लालीला घट्ट धरून ठेवलं होतं.लालीला आता खुप सुरक्षित वाटत होतं.तिच्या मनात आलं..आपली ताई खरंच किती ग्रेट..किती शुर आहे.मघाशी आलेला राग आता कुठल्या कुठे पळून गेला होता.

ताईची ओढणी धरुन लाली म्हणाली.‌.

“ताई..चल ना आता घरी लवकर..आई वाट पहात असेल.”

“अगं हो हो.. आपल्याला अजुन खरेदी करायचीए.. आईस्क्रीम खायचं आहे.. जायचं ना गंगेवर?”

“हो..हो..”

लाली पुन्हा एकदा तिच्या ताईला बिलगली.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चूल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ चूल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

होय, 

मी चूल! 

अलीकडच्या काळात नामशेष झालेली मी चूल! अजूनही कुठे कुठे माझं अस्तिव आहेच! तस ते जगाच्या इतिहासात कोणत्या ना कोणत्या प्रकारे राहील यात तिळमात्र शंका नाही! फार पूर्वीच्या काळापासून  अस म्हणण्या पेक्षा मी यावत चंद्र दिवाकर! जगाच्या अस्तित्वातच मी आहे!  माझं रूप अग्नी महाभूता पासून झालेलं!  सूर्य नारायण हेच त्याच प्रतीक! अवकाशात माझं प्रतिबिंब! 

तस धरतीच्या पोटात असलेला तप्त लाव्हारस हे पृथेवरच प्रतीक! मी कुठे नाही ? चराचरात माझं अस्तित्व आहे ते अग्नी महाभूताच्या  रुपात! पाण्याच्या थेंबात पण मी आहेच! काळ्याजर्द मेघात घर्षण झाले की मी रुपेरी सौंदमीनीच्या रुपात मी भूतलावर अवतरते! माझं उष्ण दाहक रूप हे मानवाच्या हितकरता! माझ्याशिवाय जीवनाची भट्टी पेटत नाही! मी आहे म्हणूनच आयुष्य आहे! 

।।अहं ही वैश्वानरो देवो प्राणिनांम देह आश्रिता ।।

।। प्राण आपनो समयुक्तम पश्चमन्यांम चतुर्वीधम ।।

मीच तो अग्नी तुमच्या शरीरात राहून प्राण व अपान वायूचे पोषण करतो व तुम्ही घेतलेल्या चतुर्वीध अन्नाचा पचन करतो! शरीर पोषण म्हणजेच जीवन यापन पण करतो.

ऋषीमुनींची मी आवडती! त्यांनीच मला प्रथम ह्या पृथ्वीवर पचारण केल!  माझ्या आयुष्याचा अग्नी तृप्त करण्यासाठी मला वेळोवेळी समिधा अर्पण केल्या! व माझी भूक भागवली! 

होम यागादी कृत्यात मी प्रथम प्रविष्ट झाले! ते नन्तर मग प्रत्येक प्राणिमात्रांची भूक भागवण्याचे श्रेय व काम माझ्याकडे जस आले, तसा माझा जन्म झाला! मला चूल म्हणून नामकरण करण्यात आलं! 

तसे कित्येक आकारात मी असले तरी, माझा मूळ आकार त्रिकोणीच!  तीन दगडाची चूल!!  माझा अवतार हा मूळ आदी मायेचा! विश्व साकारण्यासाठी माझी उत्पत्ती!  तीन कोन तीन दगड!  त्रिगुणात्मक माझी रचना! सत्व रज तम! 

तिन्ही गुणांचा समन्वय साधण्यासाठी अग्निरूपी इंधनाची तजवीज पण करून ठेवली! 

अग्निप्रधान महाभूताचे प्रतीक असलेल आदिमायेच रूप म्हणजेच मी!!! माझ्या शिवाय आयुष्य हे अपूर्ण! 

प्रचंड ज्वाळा उत्पन्न करण्याची क्षमता! वेदनेची धग उष्णता चटके सोसण्यासाठी मला त्रिकोणी आकारात बंदिस्त व्हावं लागलं! एकदा  मी पेटले की  

कुणाचेही ऐकत नाही! येईल ते इंधन, मग ते कोणत्याही झाडाचं, असो त्याला भस्म सात करण्याची शक्ती मला देवांनी दिली!  मला शमविण्यासाठी ऋषी मुनीनी

दूध ह्या पूर्ण अन्न निवडले! 

राखेच्या आड मी  धगधगत असतेच! 

चुलीच्या बंदिस्त वातावरणात, माझं काम योग्य होत असावे अस विश्वकर्म्यला वाटले असावे . 

माझा अन स्त्रीचा सम्बन्ध फार जुना आहे! सक्ष्यात अन्नपूर्णा देवीनेच मला प्रगट केलं .  भगवान शंकराला ज्यावेळी भूख लागली, त्यावेळेस मला पाचारण करून बोलवलं! त्यावेळी पासूनच काम आजपर्यंत सतत चालूच आहे! 

भूख ही मानवी प्राण्यांची गरज लक्ष्यात घेऊन, शाक पाक सिद्ध करण्याची जबाबदारी एकदम  मला व पार्वती अन्नपूर्णेवर आली . हेच जगाच्या उत्पत्ती चे मूळ कारण असावे! 

भूक भागवण्यासाठी प्रत्येक्षात शंकर म्हणाले होते

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।

माता च पार्वती देवी पिता देवो माहेश्वरा ।। 

भगवान शंकर म्हणतात ज्ञान व वैराग्य मिळवण्यासाठी मला भिक्षा वाढ! मला सर्वज्ञान मिळू दे!  विश्व दर्शन पण होऊ दे व ते फक्त तुझ्यामुळे शक्य आहे .

जगाच्या संगोपनाची शक्ती, भूख भागवण्यासाठीची युक्ती फक्त माझ्यात व स्त्रीत्वात आहे!  मानवीय म्हणा किंवा पक्षी वा पशूंची म्हणा भूख ही अनेक प्रकारची आहेच . स्त्रीला चूल व मूल हे कधी चुकले आहे का ? मग ती स्त्री अडाणी असो वा शिकलेली असो, त्यातच तर जीवनाचे गुपित दडले आहे . 

स्त्री काय किंवा मी काय, आमच्या दोघीत साधर्म्य आहेच म्हणूनच आमची निर्मिती ईश्वरीय आहे. आज माझं रुपडच बदलुन टाकलं आहे! बर्शन ची शेगडी, इलेक्ट्रॉनिक शेगडी, सौर ऊर्जेची शेगडी, वाटर हिटर, मोठया पावाच्या भट्ट्या, तंदुरी, टर्बाईन,  ही सर्व माझीच रूपे! 

आहेत  आणि सदैव राहतील! फक्त  मानवाची गरज भागविण्यासाठी!!!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 5 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 5 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

खरे तर या भागात मी डार्कवेब वरील ‘रेड रूम’ याबद्दल भाष्य करणार होतो, पण मागील दोन भागात काही जणांनी विचारणा केली होती, ‘जर डार्कवेब इतके भयंकर असते तर लोक ते का वापरतात?’ किंवा ‘डार्कवेबचा वापर फक्त हॅकरच करतात का?’

एखाद्याला हे प्रश्न खूप बाळबोध वाटतील, पण हे प्रश्न बिलकुल बाळबोध नाहीत. कारण या प्रश्नांची उत्तरे आपल्या मनातील अनेक प्रश्नांचे निरसन करतात. त्यामुळे आजचा लेख याच प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात देणारा आहे. ‘काही प्रमाणात’ हा शब्दप्रयोग यासाठी केला, कारण इथे येणारा माणूस कोणत्या मानसिकतेचा असतो हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. अनेकदा माणसाची मानसिकता त्याला कुणी ‘ओळखत असते’ त्यावेळी वेगळी, आणि ‘ओळखत नसते’ त्यावेळी वेगळी असू शकते.

पहिल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाले तर डार्कवेबचा वापर अनेक जण वेगवेगळ्या कारणासाठी करतात. त्यातील काही लोकांचा उद्देश चांगला असतो तर काहींचा वाईट.

ज्यावेळी कुणी डार्कवेबचा वापर करतो त्यावेळी ९९% त्याला त्याची ओळख लपवायची असते. डार्कवेब वापरण्यासाठी उपयोगात आणले जाणारे टोर ब्राउजर हेच काम करते. नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आला होता. नाव होते शहंशाह. त्या चित्रपटात नायक पोलीस असतो. पण चित्रपटातील खलनायकांशी सामना करताना त्याला त्याचा गणवेश आड येणार असतो. कायद्याच्या चौकटीत राहून खलनायकांशी सामना करणे त्याला अवघड असते. त्यासाठी तो एक युक्ती योजतो. दिवसा लाचखोर पोलीस बनतो आणि रात्री शहंशाह बनून त्याच गुंडांना शिक्षा करतो. ज्यावेळी तो आपली ओळख बदलतो त्यावेळी आपोआपच त्याच्या मर्यादा कमी होतात. हीच गोष्ट इथेही असते. आपल्याला जर हे माहिती असेल की आपल्यावर कुणाचेतरी लक्ष आहे, किंवा कुणीही आपल्याला ओळखू शकतो, तर आपल्यावर अनेक मर्यादा येतात. तेच ज्यावेळी आपल्याला कुणी ओळखणार नाही अशी आपली खात्री पटते, आपले धारिष्ट्य वाढते. 

ज्यावेळी आपण इंटरनेटचा वापर करत असतो त्यावेळी आपली ओळख असते आपल्या कॉम्प्युटरचा आयडी. जो एकमात्र असतो आणि तो कधी बदलता येत नाही. आता काहींच्या मनात असाही प्रश्न निर्माण होईल, जर आयडी बदलता येत नाही तर टोर ब्राउजर आपली ओळख कशी बदलते? याचे उत्तर आहे मास्किंग. थोडक्यात नवीन मुखवटा चढवणे. ज्यावेळी तुम्ही एखादा मुखवटा चढवतात त्यावेळी तुम्ही बदलत नाहीत, तर तुम्ही दुसरेच कुणी आहे असा भास निर्माण होतो. तो एक प्रकारचा बनाव असतो. ‘बदलणे’ आणि ‘बदलला आहे’ असे वाटणे यात फरक असतो. टोर ब्राउजर तुमच्या खऱ्या आयपीवर दुसऱ्याच एखाद्या आयपीची लेअर चढवते. अशा अनेक लेअर चढल्यावर तुम्ही इतरांशी जोडले जातात. त्यामुळे तुम्ही खरे कोण हे शोधणे अवघड होऊन बसते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथे ‘अवघड होते’ हा शब्द वापरला आहे, ‘अशक्य होते’ असे म्हटलेले नाही. कारण मी पहिल्यांदाच सांगितले आहे, टोर ब्राउजर आयपी बदलत नाही तर असलेल्या आयपीवर वेगळ्या आयपीची लेअर चढवते. जर एखाद्याने एकेक करून शेवटपर्यंत जायचेच ठरवले तर शेवटचा आयपी हा खराच असणार आहे. तो शोधण्यात जो वेळ लागेल त्या वेळात माणूस स्वतःला वाचविण्याचा वेगळा उपाय शोधतो. 

डार्कवेबचा वापर चांगल्या कामासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सैन्य तसेच पोलीस यंत्रणा यांच्याकडून केला जातो. यामागील उद्देश म्हणजे समजा अशा ठिकाणाहून एखादी माहिती लिक झाली तरी त्यावर सहसा विश्वास ठेवला जात नाही. आपोआपच लोकांचा अविश्वास हे एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून काम करते. काही पत्रकार देखील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी किंवा ती उघड करण्यासाठी डार्कवेब वापरतात. त्याच प्रमाणे हॅकिंग क्षेत्रात करिअर करणारे लोकही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी, त्याचे प्रयोग करण्यासाठी डार्कवेबचा वापर करतात. डार्कवेबसाठी वापरले जाणारे टोर ब्राउजर हे दर दिवसांनी नवीन अपडेट घेऊन येते. यावर कोणत्या जाहिराती नसतात, ते वापरायलाही फुकट आहे, तरीही याचे अपडेट येतात म्हणजे कुणीतरी त्यावर कायम काम करत असणार ना? मग त्यांना पैसा कोण देत असेल? याचा विचार केलाय कधी? अनेकांचा विश्वास बसणार नाही पण यासाठी फंडिंग करणारे अमेरिकन सरकार तसेच गुगल इंजिन सारख्या कंपन्या आहेत. 

डार्कवेबच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मोठमोठे घोटाळे उघड झालेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अनेक अप्रिय घटना वेळेआधीच रोखण्यात यश मिळवले त्याचे कारणही हे डार्कवेब हेच आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू याच्या अगदी विरुद्ध आहे. छापा सोबत काटा असतोच ना. तो तर निसर्गनियम आहे. त्याला डार्कवेब तरी अपवाद कसे असणार? पण ते मात्र पुढील भागात. 

क्रमशः भाग पाचवा. 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

अल्प परिचय

शिक्षण – MSc, MA, B.Ed (English literature).

मूळअमरावती. पुण्यात स्थायिक.

English मध्ये 50च्या वर कविता व short philosophical write ups लिहिल्यानंतर Divine Meet नावाचे booklet प्रकाशित झाले.

मराठीत पण कविता, ललित, चारोळ्या व निवडक दासबोध निरूपण असे अमृतकण नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

🌳 विविधा 🌳

☆ ✍️सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सहजता म्हणजे नैसर्गिकता..

म्हणजेच कृत्रिमतेच्या विरुद्ध…

साधा सरळ विचार व आचार. काहीही मनात आले, येऊ द्यावे शांतपणे विचार करत करत कोणतीही कृती न करता विचारांना निघून जाऊ द्यावे. त्याची जागा दुसर्याने घेतली तरीही हाच प्रकार चालू ठेवावा.

काही दिवस असे केले की कोणत्याही विचारांकडे तटस्थपणे पहाणे जमते. काहीही विशेष परिणाम दिसत नाहीत व मग जी कृती केली जाते ती अतिशय संयमाने विचारपूर्वक घडते. परिणाम काहीही असोत, सध्याच समाधान मिळते कारण सहजता येते. कोणताच व कशाचाच अट्टाहास त्यात नसतो. म्हणून जे व जसे घडत जाते त्याकडे विवेकाने पहाण्याची दृष्टी मिळते व कृतीत साहजिकच आनंद मिळतो.

समाधान हे नेहमी अपूर्णतेतच असते हे निश्चित मानावे.

मोठे ध्येय ठरवण्यापेक्षा छोटे काहीतरी निश्चित करावे, ते करत असतानाच जर समाधान मिळाले तर पुढे ठरवलेले पूर्ण होईलच त्याचबरोबर आताचा वेळ सत्कारणी लागेल. क्षणाक्षणाचा आनंद मिळेल.

एखादा चांगला लेख video वाचनात आला की त्याचा त्याच क्षणी आनंद घ्यावा याचा लेखक कोण, त्यांचे इतर लेख कोणते वगैरे नी पाठपुरावा करत बसले तर कदाचित त्यांचे सगळेच साहित्य आवडेल असे नाही, उलट वेळ वाया जाऊ शकतो. एकाचेच एककल्ली वाचन, श्रवण करण्यापेक्षा विविध प्रकार हाताळावेत म्हणजे तो motto टिकून रहातो व जे हवंय, रुचतंय तेच मिळत जातं. तसंही सत्य एकच असतं, ते कोणी कसंही मांडू देत. यात स्वत: चीच आवड जपली जाते व अट्टाहासाचा त्रागा वाचतो.

आताचा आनंद‌ उद्यावर किंवा इतर कुठे कसा असेल? हे उमगले की शांतता येते. हे लिहिणे सुध्दा कोणताही कशाचाही जोर नाही. जे जे जसे असेल ते तसे तसे मनापासून स्वीकारणे‌ हा साधा सरळ योग आहे.

तुलना, अपेक्षा, मोठमोठी स्वप्ने आपले आताचे आयुष्य बिघडवत असतील तर ते पूर्ण झाले तरी काय उपयोग?

पूजा हा ध्यानाचा सगळ्यात मोठा राजमार्ग!!! पण तिथेही हेच, असेच, ह्यानेच, त्यानेच, हा देव तोच देव, ही उपासना ती उपासना मग मन भरकटते व पूजा फळत नाही. एक श्लोक भगवंताकडे बघत आनंदाश्रूसकट म्हंटल्या गेला व कृतज्ञता जाणवली की झाली पूजा!!!

इतकं साधं सरळ असताना नको त्या उपचारात अडकणे म्हणजे कृत्रिमताच.

आईवर निबंध लिहून, तिला भारी भेटवस्तू देण्यापेक्षा “आई” ही “कृतज्ञ हाक” तिला गहिवरून टाकणार नाही का?  देवाचेही अगदी तसेच आहे.

तो आपल्या आतच असल्यामुळे सगळे जाणतो व अनैसर्गिक जे आहे ते तो‌ ओळखतो सुध्दा!! हेच सत्य आहे.

आपणच आपले खूष रहायचे तर तो‌ आतील परमात्मा मनापासून प्रेम करतो व त्याच्यासारखा सतत आनंदी रहाण्याचा आशिर्वाद देतो.

आनंद ही आत्मवस्तू आहे, ती इतरांवर अवलंबून कशी असेल?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकं जगावं कसं ?  तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…! 

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….! 

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…! 

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,! 

“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच… 

पण कुणावर विशेष लोभ नाही…

कोणावर राग तर मुळीच नाही… 

कुणाचा द्वेष नाही… 

कुणाचा तिरस्कार नाही… 

आपला संबंध फक्त तिकिटापुरता… ! 

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही… 

कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही… 

दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं… 

येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते…. 

प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं …. 

आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं…. 

पण त्या गावात अडकायचं नाही…. 

आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….

“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…! 

हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. ! 

उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो… 

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…

शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…! 

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

वैद्यकीय

  1. नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले,अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!

डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…! 

माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…! 

असो… 

पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….! 

“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!! 

जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… ! 

मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!

हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !

अं… हं…. !  मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…  

तुम्ही “तुमचा कप्पा” खोला…  प्रेमायसिन आणि मायामायसिन…  आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….

गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!! 

या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही…. 

झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…! 

Try करके देखो, अच्छा लगता है …!!!

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला,या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
  2. म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी”बेधुंद” असतो…मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)
  3. चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !

आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…

आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”

भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!

पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…! 

जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…

आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… ! 

या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत… 

यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!

रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने;  “वाटाड्या”  होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!! 

4. जिला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!

तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे. 

 तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे. 

वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….! 

तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…! 

भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…! 

शैक्षणिक 

दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…! 

या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…! 

माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…! 

जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…! 

ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत. 

यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’ 

त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…! 

डोळे तपासणी

ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं. 

परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…

अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे. 

जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. ! 

सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…! 

आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…! 

कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…! 

चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!

जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले… 

अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…! 

माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares