मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

२० मार्च, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस! २००६ ते २०१२ या काळात संयुक्त राष्ट्रांनी एक मोहीम चालवली. २०११ मध्ये या दिवसाची कल्पना मांडली. आणि २०१३ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. यात लोकांना आनंदाचे महत्व पटवणे. आपले काम करताना आपण आनंदी असलो तर त्याचे होणारे फायदे प्रत्यक्ष दाखवले गेले. त्याच प्रमाणे विविध वेळी, विविध ठिकाणी आपण आनंदी मनोवृत्ती ठेवली तर कोणते फायदे होतात ते सांगितले गेले. त्या साठी कोणत्या कृती कराव्यात हेही सांगितले गेले. मानवी विकासासाठी आनंद किती महत्त्वाचा असतो याचेही महत्व विषद करण्यात आले.

हे सगळे करण्याची आवश्यकता का वाटली असेल? याचा विचार केला तर काही लोकांची मते, किंवा कामाच्या ठिकाणी आनंदी असणे, घरात आनंदी असणे याचा फारसा स्वीकार केला गेला नव्हता. जे आनंदी दिसत असत त्यांना नावे ठेवली जायची. आनंदाने किंवा हसऱ्या चेहऱ्याने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांना कोणतीच गंभीरता नसते, ते कोणतेही काम नीट करू शकणार नाहीत असेही गैरसमज होते. कोणतेही काम गंभीरतेने, तणावपूर्ण केले तरच ते प्रामाणिकपणे व व्यवस्थित होते. असेही गैरसमज होते. प्रत्यक्षात काही निरीक्षणे, अनुभव व काही सर्व्हेक्षण केल्यावर असे लक्षात आले, की आनंदी मनाने काम केले तर ते अधिक चांगले होते. आणि करणाऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो. आनंदाचा संबंध कल्याण व एकूण जीवनातील समाधानाशी जोडलेला असतो. ज्यांची आनंदाची पातळी जास्त असते त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असते. त्यांचे सामाजिक संबंध मजबूत असतात. प्रतिकूल परिस्थितीला ते तोंड देऊ शकतात.

आनंदाची कोणतीही ढोबळ व्याख्या करता येत नसली तरी त्यात सकारात्मकता ही भावना, उद्देशाची व परिपूर्णतेची भावना अशी मनाची स्थिती दिसून येते. अर्थात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या व ज्यातून आनंद मिळतो या विषयी दृष्टिकोन भिन्न असतो. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा आनंद बदलत असतो. हा एक वेगळाच विषय आहे.

पण आनंदी राहिल्याने आपल्या कडून समोरच्याला नक्कीच आनंद मिळतो. त्याच्या पर्यंत त्या आनंद लहरी पोहोचतात. खरे तर ही आनंदाची भावना प्रत्येक सजीवात असते. आणि तो व्यक्त करण्याची किंवा ते आनंदी आहेत हे ओळखण्याची पद्धत वेगळी असते. हा आनंद पण असा असतो, तो आपल्याला मिळावा असे वाटत असेल तर तो दुसऱ्यांना द्यावा लागतो. म्हणजे आपला आनंद द्विगुणित होतो. आणि मग आनंदी आनंद गडे, जिकडे तितके चोहिकडे असे होऊन जाते.

आजच्या आनंदाच्या दिवसाच्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या! स्वतः आनंदी होऊन इतरांनाही आनंदी करु या!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

 

🔆 मनमंजुषेतून 🔆

☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

भाजीच्या दुकानात आपण नेहमीच जात असतो. कधी एकटे जातो, कधी बरोबर बायको असते किंवा नवरा असतो. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच तंद्री मध्ये असतो. त्यामुळे आसपास घडणाऱ्या मजेशीर घटनांना आपण मुकत असतो. आपण नेहमीच वर्तमान काळात राहू शकलो, आणि आसपास घडणाऱ्या घटनांशी समरस होऊ शकलो, तर भरपूर आनंद मिळू शकतो, हे नक्की. हा लेख आणि ही घटना यावरच आहे.

—–

आज सकाळी फिरून येतांना नेहेमीप्रमाणे साने डेअरी मध्ये दूध घेतले. मुलीकडे सकाळी जातांना भाजी न्यायाची होती, म्हणून बायको बाजूच्याच भाजीच्या दुकानात भाजी घ्यायला गेली. दुकानदार तरुण मुलगाच होता. मी तिथेच उभा होतो.. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या —

मॅडम : अरे, टमाटे कसे आहेत ? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की परत याल.

मॅडम : अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत ?

मुलगा : मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल, तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

मॅडम : अरे कसे आहेत, म्हणजे कसे दिले ? 

मुलगा : मॅडम, अजून दिले कुठे ! आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडम ना भेंडी दिली, एकांना पालक दिला. टमाटो ची बोहोनी तूम्हीच करा. किती देऊ?

मॅडम : अरे, पण देणार कसे, ते सांग ना.

मुलगा : मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन. नाहीतर आमची कापडी पिशवी घेऊन जा आणि उद्या पुनः भाजी न्यायला याल, तेव्हा पिशवी घेऊन या. पिशवी ८ रु ची आहे, पण मी फक्त ५ रु डिपॉझिट घेतो. आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ठेवत नाही, कारण त्यावर बंदी आहे. आम्हाला थोडा त्रास होतो, पण बंदी योग्यचं आहे. कुठल्याही धोरणाला विरोध करायचा, म्हणून विरोध करणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण सगळ्यांनी बंदी चे पालन केले, तर शेवटी फायदा आपलाच आहे. बोला किती देऊ टमाटे ?

मॅडम : अरे भाव सांगशील का नाही ! भाव केल्याशिवाय कसे घेणार !

मुलगा : मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्स्ड रेट, असे म्हणून त्यांनी बाजूच्या मोठ्या बोर्ड कडे बोट दाखवले.

बोर्ड वर लिहिले होते “इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. आज भाजी न्याल, तर रोजचं भाजी न्यायला इथेच याल”. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता.

मॅडम नी बोर्ड बघितला आणि म्हणाल्या १ किलो लाल टमाटे दे.

मॅडम : अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का 

मुलगा : मॅडम, तुम्ही टमाटो चा रेट विचारलाच कुठे !

भाजी घेऊन मॅडम बाहेर पडल्या आणि बायको पण भाजी घेऊन बाहेर आली.

 मॅडम आणि दुकानदार मुलाचा संवाद, हे आपल्या सगळ्यांचेच विचारांची देवाण – घेवाण करण्याचे एक बोलके उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपले पण असेच होते. आपल्याला काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय सांगायचे आहे, हे समोरच्याला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगता येत नाही. “नाही, मला असे म्हणायचे नव्हते”, “माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, अशी लांबण नंतर सुरु होते. त्यामुळे समज – गैरसमज, वाद – विवाद, भांडण – तंटे, यांचे पेव फुटते / ताण – तणाव वाढतात. अशा घटना घरी घडतात, बाहेर घडतात, ऑफिस मध्ये घडतात. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आणि अनुभवतो.

म्हणूनच गुरुजन सांगतात : Be specific, Be to the point, Be brief.

आता यापुढे भाजीवाल्याशी संवाद साधतांना, तिथला बोर्ड बघून मग ठरवायला पाहिजे कि आपण काय विचारायला पाहिजे हे लक्षात आले.

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) —-

सकाळी फिरायला गेलो, डेअरी मध्ये दूध घेतले. बाजूच्या भाजीच्या दुकानात बायको भाजी घ्यायला गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या, ‘अरे टमाटे कसे आहेत’ ? बघितलं तर या मॅडम वेगळ्या होत्या. मला वाटलं, की मुलगा आता भाव लिहिलेल्या बोर्ड कडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉग बाजी साधारण परवा सारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत, टमाटे घेऊन बाहेर पडल्या.

बायकोची भाजी घेऊन झाली. पैसे देतांना मी मुलाला विचारले —

मी : दादा, एक विचारू का ?

मुलगा : काका जरूर विचारा 

मी : टमाटे कसे आहेत विचारल्यावर, तुम्ही रेट म्हणजे भाव सांगायला पाहिजे ना ! अशी लांबण का लावता. एखादा गिऱ्हाईक चिडेल ना !

मुलगा : काका, you are absolutely right

मुलगा : काका, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गंमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले, तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहेऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का ! किंवा नाही काही गिऱ्हाईक पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली मंडळी पण काही वेळा चर्चेत भाग घेते. लोकांच्या आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य येते.

मी : (मुलाचं इंग्रजी वाक्य आणि विचार ऐकून मी अवाकच झालो) बरोबर आहे. मला ऐकतांना मजाच आली.

मुलगा : काका ‘joy and happiness is to be spread. Is it not !’ पण त्याकरता मजा happiness generate व्हायला पाहिजे ना ! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो whats app वर टाकणार आणि ते ५० जण वाचणार. This is the chain of joy.

मुलानी टोपलीतलं एक सुंदर मोठं सफरचंद माझ्या हातात दिलं आणि म्हणाला —

मुलगा : This is for you. This is for spreading the taste. तुम्ही दुकानात नेहेमी भाजी घेता, पण फळे कधी घेत नाही. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. This is called spreading of business.

मी : वाह, क्या बात है ! दादा, चहा घेणार का ? 

मुलांनी होकार दिला आणि मी बाजूच्या दुकानदाराला खूण करून ३ कटिंग चहा मागवले.

चहाचे घोट घेतांना मुलाला म्हटलं : This is for spreading togetherness.

मुलाला थँक्स म्हणून आणि बाय करून आम्ही हसत हसत बाहेर पडलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -१- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – १  – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय… कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञानकथांमधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा…

विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि समजून घेतो. वेळ आणि परिश्रम दोन्हींचा अपव्यय.. सदर ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असल्यास जास्त सहजगत्या आत्मसात होते असे नारळीकर म्हणायचे.. मराठी भाषा ही नारळीकर यांच्यासाठी पावित्र्याची नाही तर जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत इंग्रजी शब्दाऐवजी अट्टाहासी मराठी शब्द वापरायचा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागला नाही. भाषेच्या सहजतेमुळे त्यांचे लिखाण वाचले गेले आणि विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत लोकप्रिय झाला. मराठी साहित्याचे विश्व खऱ्या अर्थाने विस्तारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली आहे याचा अगदी “दिलसे” आनंद झाला आहे. ❤️

‘चार नगरांतील माझे विश्व’ या जयंत नारळीकर यांच्या आत्मवृत्ताला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात त्यांची जडणघडण कशी झाली हे समजून घेता येते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरात झाला. विद्वत्ता ही जणु त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती. मोठा जयंत आणि छोटा अनंत असे आटोपशीर कुटुंब. आई सुमती संस्कृत भाषेमधील पंडिता. तसेच एसराज या वाद्यावर त्यांची हुकूमत. (एसराज म्हणजे काय पाहायचे असेल तर सत्येंद्रनाथ बोस यांची पोस्ट पहा. ) प्रसिद्ध सांख्यिकी विजय शंकर हुजुरबाजार हे जयंतरावांचे मामा.

जयंत आणि अनंत दोघे आईला ‘ताई’ म्हणायचे आणि वडिलांना ‘तात्या’. रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. रँग्लर ही पदवी लय मोठी. केंब्रिज विद्यापीठामध्ये दरवर्षी गणित विषयात पहिल्या वर्गात पास होणारे रँग्लर म्हणवले जातात. जयंतराव आणि त्यांचे वडील हे दोघे पण रँग्लर. ❤️वि. वा. नारळीकर खूपच हुशार. वि. वा. यांचे आईन्स्टाईनने मांडलेल्या सापेक्षतावाद सिद्धांतावर प्रभुत्व होते. त्यांना १९२८ साली BSc मध्ये ९६% मार्क पडले होते. त्यांना केंब्रिजमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. एन. टाटा स्कॉलरशिप मिळाली. त्यांची हुशारी पाहून कोल्हापूर संस्थानाने त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली, परत आल्यावर संस्थानात नोकरी करायची या अटीवर.

कोल्हापूरच्या जवळील “पाचगाव” हे नारळीकर यांचे मूळगाव. जयंतरावांचे आजोबा वासुदेवशास्त्री भिक्षुकी करून पोट भरत होते. मात्र वि. वा. यांनी घराण्याचे नाव रोशन केले. घराण्याच्या नावाची पण एक मजा आहे. त्यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला म्हणे नारळाएवढे आंबे लागत.. म्हणून यांचे नाव नारळीकर. अशी दंतकथा लहानपणापासून ऐकली असल्याचे जयंतराव सांगतात, मात्र त्यांनी कधी ते झाड पाहिलेले नाही. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीत झाला असला, तरी त्यांचे कुटुंब वाराणसी येथे स्थलांतरित झाले होते. रँग्लर वि. वा. नारळीकर यांना बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुखपदी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर संस्थानाने दिलेली रक्कम परत करून वि. वा. १९३२ मध्ये वाराणसी येथे स्थायिक झाले होते.

घरात मोठ्या माणसांचा राबता. विनोबा भावे ते गोळवलकर गुरुजी अशी दोन ध्रुवावरील माणसे त्यांच्या घरी यायची. (दाढी ही एकच सामाईक बाब असावी त्यांच्यात, जसे रविंद्रनाथ टागोर आणि आपल्या भाऊमध्ये आहे. भाऊचे नाव सांगायला नको ना) सी. डी. देशमुख यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ असो, वा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखा शिक्षणतज्ज्ञ.. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकार असो वा पु. ल. देशपांडे यांच्यासारखा हरफनमौला… तुकडोजीमहाराज असो वा रँग्लर परांजपे (पहिले भारतीय रँग्लर) कोणतीही महत्त्वाची मराठी व्यक्ती वाराणसीमध्ये आली तर नारळीकर कुटुंबाकडे त्यांचे जेवण ठरलेले असे. रँग्लर परांजपे यांची मुलगी शकुंतला, नात सई परांजपे (होय त्याच.. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका.. जयंतराव आणि त्या समवयस्क) यांचे देखील येणेजाणे होते. जयंत नारळीकर यांचा ८० वा वाढदिवस आयुकामध्ये साजरा झाला, तेव्हा सईने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्याच एका विज्ञानकथेवर एक नाटक बसवून सादर केले होते.

लहानपणी आई जयंत, अनंत यांना गणिताची कोडी घालत असे.. त्यामुळे त्यांना गणित आवडायला लागले. आई दोघांना रोज झोपण्यापूर्वी इंग्रजी, मराठी मधील नामांकित लेखकांच्या गोष्टी क्रमशः भागात सांगत असे. मात्र उत्सुकता ताणली गेली की पोरं थोडीच २४ तास वाट पाहणार.. सकाळी उठल्यावर पुस्तक हाती घेणे आणि गोष्टीचा फडशा पाडणे. यातूनच जयंतरावांना वाचनाची आवड लागली. (पोरांना पुस्तक वाच म्हणले की वाचत नाहीत.. त्यापेक्षा ही आयडिया भारी आहे राव, ट्राय केली पाहिजे आपण पण.. ) सुमतीबाई यांचा भाऊ मोरेश्वर हुजुरबाजार हा एमएससी करण्यासाठी वाराणसी येथे नारळीकर कुटुंबात तीन वर्षं राहिला होता. तेव्हा घरातील फळ्यावर रोज मोरुमामा जयंतसाठी एक गणितीय कोडे लिहून ठेवायचा.. जोवर ते सुटत नाही, तोवर जयंतला चैन पडायची नाही. त्यामुळे शाळेतील गणिताचा अभ्यास आधीच झालेला असायचा. ❤️

जयंत आणि अनंतचे शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमात सुरू झाले. हिंदी ही रोजची व्यवहार भाषा.. घरात मराठी भाषा बोलली जायची, मराठी पाहुण्यांची वर्दळ, वर्षा दोनवर्षाने सुटीमध्ये महाराष्ट्र भेट व्हायची.. त्यामुळे मराठी एकदम पक्की. इंग्रजी पुस्तकातील गोष्टी वाचूनवाचून या भाषेची पण तयारी, तर सकाळ-संध्याकाळ संस्कृत श्लोकांचे पाठांतर.. जयंतराव लहानपणीच बहुभाषिक झाले. एका रात्री सर्वपल्ली राधाकृष्णन जेवायला आले असताना या दोघा भावांनी शंकराचार्यांचे दशश्लोकी स्तोत्र सादर करायचा प्रयोग केला. एका खोलीत बसून पेटीच्या साथीवर हे दोघे गात आहेत.. आणि बाहेर लॉनमध्ये बसलेली मंडळी गप्पा मारणे थांबवून हे ऐकत आहेत.. त्यांना वाटले की गाणे आकाशवाणीवर सुरू आहे. स्तोत्र संपल्यावर त्यांना समजले की, अरे ही तर या दोघा भावांनी केलेली गुगली आहे. दोघांचे गाण्याचे, पठणाचे आणि उच्चारांचे खूप कौतुक झाले. प्रयोग प्रचंड यशस्वी.

रस्त्यावर डोंबा-याचा पायाला काठी बांधून चालण्याचा खेळ पाहिला. घरी तसेच करायचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे त्याला ताई तात्यांचे प्रोत्साहन आणि सहाय्य. दोन्ही पोरं पायांना काठी बांधून चालायला लवकरच शिकली देखील. अर्थात लहानपणी अनेक अयशस्वी प्रयोग देखील केले आहेत. गाद्यांवर उड्या मारताना एकदा अंदाज चुकला आणि उडी थेट पलीकडल्या काचेच्या कपाटावर.. तेव्हा घुसलेल्या काचेचा व्रण आजही जयंतरावांच्या पायावर आहे. त्यासोबत बालपणातील अजून एका घटनेची आठवण त्यांच्या हृदयावर कोरली आहे. नारायणराव व्यास हे नारळीकर कुटुंबाचे स्नेही. त्यांचे नेहमी येणेजाणे. दररोज लाड करणारे व्यासमामा एक दिवस वेगळ्या मूडमध्ये होते. जयंत आणि अनंत दोघांना बोलून सांगितले की तुम्ही दोघे खूप ऐदी आहात.. सगळे आयते पाहिजे तुम्हाला.. घरातले काहीच काम करत नाही. अभ्यास करताना देखील दिसत नाही.

कधीही बोलून न घेण्याची सवय असलेले जयंत, अनंत या गोष्टीने खूपच नाराज झाले. व्यासमामा तेवढ्याने थांबले नाहीत, तर त्यांनी वि. वा. आणि सुमतीबाई यांचीदेखील हजेरी घेतली. तुम्ही मुलांना धाक लावत नाही, अशी तक्रार केली. वि. वा. म्हणाले “हे दोघे शाळेमध्ये कायम वरचा नंबर काढतात. त्यामुळे कधी बोलायची गरज पडली नाही. ” व्यासमामा म्हणाले, “आता अभ्यास सोपा आहे म्हणून ठीक. पण कष्ट करायची सवय लागली पाहिजे. ” झाले… तात्यांचा खटका पडला आणि रोज पहाटे उठून चार तास अभ्यास करायचे फर्मान काढले गेले. दोघा भावांनी तेव्हा मामांचा किती उदोउदो केला असेल काय माहित.. पण हीच अभ्यासाची सवय जयंत, अनंत यांना जीवनात यशस्वी करून गेली. जयंतराव आज व्यासमामांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. ❤️

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून जयंतराव उत्तीर्ण झाले, मात्र त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. गणित, विज्ञानासोबत संस्कृतची आवड होती. सर्वच विषयात चांगले मार्क होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत. एकतर आर्ट्स घ्या किंवा सायन्स. (आपल्याकडे लयच बंधन.. बाहेर देशात तसे नाही. जेनिफर डॉडनाने बायोकेमिस्ट्री विषय घेऊन आर्टसची पदवी मिळवली होती) नारळीकर म्हणतात, “अशी विभागणी चुकीची आहे. आजच्या स्थितीत कलाशाखेचा विज्ञानशाखेशी संवादच उरत नाही, म्हणून उपविषय निवडणे ऐच्छिक असावे. ”

बनारसमध्येच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. घरात वडील वैज्ञानिक असल्याने कोणत्याही संकल्पनेचा शेवटपर्यंत पिच्छा करायची सवय लागली. अनेक दिग्गज शास्त्रज्ञांची व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली जात होती. बुद्धीला नवी क्षितिजे खुणावत होती. १९५७ साली बी. एसस्सी. च्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व, उच्चांकी गुण प्राप्त करून जयंतराव विद्यापीठात पहिले आले. वडीलांप्रमाणे जयंतरावांना देखील टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी बोट पकडली.

केंब्रिज येथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी या सर्व पदव्या मिळवल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. रँग्लरची परीक्षा लय भारी. परीक्षार्थी विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टूलावर बसायचे (या ट्रायपॉडमुळे ही परीक्षा ‘ट्रायपॉस’ परीक्षा या नावाने देखील ओळखली जाते.) समोर प्रश्नांची फेरी झाडायला प्राध्यापकांची फौज. चहूबाजूंनी हल्ला करून बिचाऱ्या विद्यार्थ्याला जेरीस आणणारी.. विद्यार्थ्याच्या ज्ञानाची खरी कसोटी पाहिली जाते. या परीक्षेत जो टिकला, तोच जिंकला. १९५९ मध्ये बी ए (ट्रायपॉस) परीक्षेच्या वेळी जयंतराव अपघातग्रस्त होते. पायाला प्लास्टर.. मात्र त्यांनी सर्व प्राध्यापकांना अशी उत्तरे दिली की, त्या परीक्षेत जयंतराव सर्वात पहिले आले. म्हणजे सिनियर रँग्लर झाले. बापसे बेटा सवाई. ❤️

स्टीफन हॉकिंग आणि नारळीकर दोघे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. जयंतरावांच्या एक दोन वर्षं मागे होता स्टीफन. त्यांची भेट स्टीफन केंब्रिजमध्ये यायच्या आधीच झाली. १९६१ मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेमध्ये जयंतराव व्याख्यान देत होते. तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आलेल्या स्टीफनने सर्वात जास्त प्रश्न विचारले होते. याच विज्ञान परिषदेत दोघांनी टेबलटेनिसचा एक सामना देखील खेळला, ज्यात जयंतराव विजयी झाले होते. (तेव्हा स्टीफनचा आजार जास्त बळावला नव्हता) स्टीफनची आठवण सांगताना जयंतराव म्हणतात, “विद्यार्थीदशेत असलेला स्टीफन पाहता तो नंतर एवढे मोलाचे संशोधन करेल असे वाटले नव्हते. तेव्हा तो अगदी सामान्य विद्यार्थी होता. त्याने त्याच्यामधले ‘बेस्ट’ नंतर बाहेर काढले. ” १९६६ साली नारळीकर यांना ॲडम पारितोषिक मिळाले. स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज यांच्यासोबत विभागून. खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी फोन करून नारळीकर यांना ही बातमी दिली होती. गणितात मिळणारी टायसन, स्मिथ आणि ॲडम अशी तीनही बक्षिसे नारळीकरांनी पटकावली.

एम ए करत असताना जयंतरावांनी सन १९६० मध्ये खगोलशास्त्रसाठी असलेले टायसन पारितोषिक मिळवले. तर पीएचडी करताना सन १९६२ मध्ये स्मिथ पारितोषिक देखील पटकावले. १९६३ साली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी करताना जयंत नारळीकर यांना सर फ्रेड हॉएल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉएल हे संशोधनातील मोठे नाव. आइन्स्टाइनने मांडणी केलेला बिगबँग सिद्धांतातील त्रुटी काढून दाखवणारा हा शास्त्रज्ञ. अनेक वर्षं बिगबँग समर्थक आणि हॉएल यांच्यात वादाच्या फेरी होत होत्या.. कधी या गटाची तर कधी त्या गटाची सरशी होत होती. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल मात्र यांच्यासोबत “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी” मांडली आणि या वादावर पडदा पडला.

आइन्स्टाइन म्हणतो की, विश्व विस्तारत आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी सिद्धांताला स्थिरांकाचे ठिगळ देखील लावले आहे. तरीही ताऱ्यांच्या जन्माचे गणन करताना काही गणितीय त्रुटी राहून जातात. यावर हॉएलने आक्षेप घेतले. मात्र नारळीकर आणि हॉएल यांनी संशोधन केले असता असे लक्षात आले की विश्व वेळोवेळी प्रसरण देखील पावते आणि आकुंचन देखील. (पुढे हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांवरून हे सिद्ध देखील झाले. ) हा शोध खूप महत्त्वाचा होता. एका भारतीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनवर मात केली, ही बाब “१६ वर्षे वयाच्या देशासाठी” खूप महत्त्वाची होती. (देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम १६ वर्षे झाली होती. ) भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केला. १९६५ साली जेव्हा ते काही महिन्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांना बघायला तोबा गर्दी.. जयंत नारळीकर हे खूप मोठे स्टार झाले होते.. लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल. ‘ 

– क्रमश: भाग पहिला 

जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष.. पंचतत्वात विलीन झाला आणि… चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं – – अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

“चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायची जबाबदारी माझी आहे. आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात, आता जरा उसंत घ्यावी. “ चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

“चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. “ यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

“ नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता…. अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात. श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं, सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला.. इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल, आणि खाली मूर्त्या आणि टाक होतील माझ्या. मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे. “

“भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही. या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.“

राजे पुन्हा हसले, “ देवा, माझी वही नीट तपासलीत ना, तुरी द्यायची कला अवगत आहे मला. “

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला. आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला. जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन, राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे, राजकारणात जाईल, सुराज्य देईल. ’

‘ नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल असंच मूल हवंय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती २

‘ देवी, हे मूल देतोय तुला, संस्कारी आहे, रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल. ’ 

‘ नको देवा, आपण भलं आणि आपलं घर भलं असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ३

‘ देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे, रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही, प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल. ’ 

‘ नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला, असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ४, ५, ६…

‘ देवींनो, होऊ घातल्या मातांनो, इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय.. स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय.. सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी, स्वतःच निर्मिलेल्या राज्यात, पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय.. कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात सामावून घ्या हा सूर्य. ’ 

‘ देवा, कितीदा सांगावं तुला, जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं, निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता. अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला… हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक. आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ. ‘ 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

“ राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताहात मला. एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी, मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्त्याही विसावल्यात देव्हा-यात. पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला. “

“ देवा, असा हताश झालो असतो तर चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती.. कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो.. सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो.. अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती.. दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता.. स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती, आणि…. माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं… एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन. “ 

पण तोपर्यंत…?

तोपर्यंत – – 

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि 

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार.. !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचे घर… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदाचे घर… डॉ. माधुरी जोशी 

 कुटुंब प्रमुख “सा”

मैफल सांगतेकडे आलेली. रात्र रात्र गायन वादनानी भारलेला मांडव…. स्वरांचंच साम्राज्यच पसरलेलं…. आताही रंगमंचावर ते चार तानपुरे… सारेच आत्यंतिक सुरेल… दोन काळे.. खूप साऱ्या नक्षीनं, मीनाकारीनं सजलेले… दोन अगदी नीतळ, साधे… पण चौघांची भाषा एकंच… गुंजारव ही तोच…. “सा”… “षडज्”…. फक्त तोच मांडवभर पसरलेला… कानाकोपऱ्यात… कनातीच्या रंगीत झुलत्या कापडात… मंदशा अगणित दिव्यांच्या प्रकाशात…. फक्त “सा”…. अजून गाणं सुरूच नाही झालेलं…. पण ते जुळलेले तानपुरे, तो षड्जाचा गुंजारवही अनुभूती देतो वेगळीच…. ते जव्हारदार, घुमारदार, मधुर, निषादात बोलणारे  तानपुरे भारावून टाकतात…. उमटतं राहतात षड्जाची आवर्तनं…. लाटा… ती पहाट वेळा… कोवळी किरणं अजून क्षितीजाच्या किनाऱ्याकडे…. मंडपाजवळच्या मंदिरातून काकड आरतीची अस्पष्ट घंटा… तरंगत येणारा उदबत्तीचा मंद दरवळ…. आणि मांडवात फक्त “सा” भरुन राहिलेला… आधार स्वर… साऱ्या स्वरांचं मूळ.. उगमस्थान.. सा.. “साधार “…. तो “साकार”करतो राग चित्र… तो “सामर्थ्य” सप्तकाचं… तो सारांश.. स्वरार्थ… संगीतार्थ

“सा” महत्वाचाच…. इथूनच निर्माण होणार प्रत्येक स्वरांचा आत्मा.. या “सा” चं सर्व स्वरांशी घट्ट नातं, दृढ भावनिक मैत्री…. आणि साऱ्या स्वरांनाही याचीच ओढ.. साऱ्या श्रुती, स्वर… साऱ्यांचे इथेच समर्पण…. आणि त्या अथांग स्वरसागराला सामावून घेणारा “सा”…. शांत…. मंद्र, मध्य, तार सगळीकडे तसाच….

“सा” ला माहिती आहे प्रत्येक स्वर कुठे आहे… कसा आहे… किती आहे… कधी भेटणार आहे…. ते सारे स्वर एकमेकांच्या संगतीनं सजतात.. राग घडतो.. फुलतो… सजतो…

दरवळतो…. सारं सतत “सा “मधे विलीन होत राहतं… खरंतर हा अचल… योग्यासारखा… मास्टर  दिनानाथ म्हणंत तसे साधुपुरूष… स्थिर आपल्या जागी… तो मूलभूत आधार संगीताचा… ठाम… निश्चल…

पण तो स्वरांचा, रागांचा भाव जाणतो. प्रत्येक रागाच्या स्वरांना हवं असेल तसा वागतो. ना तो कोमल.. ना तो तीव्र… पण तो कधी हळवा होतो कधी लख्ख ठाम…. राग रूपाच्या भावनेत, रागाच्या लयीत, स्वरवाक्यांच्या वजनात अगदी एकरूप होत राहतो. आपलं अटल स्थान राखंत स्वरांचा सन्मान करतो. रागरुप जपत मंद्र, मध्य, तार  सर्व सप्तकात राहतो.

“सा” सात स्वरांचा जनक… पु ल म्हणतात शारदेचं वस्त्र धवल आहे ते रंगहीन म्हणून नाही तर सात रंगांचा मिलाफ होऊन होणारा शुभ्र आहे तो. एका थेंबातून सात रंगांचे किरण फुटतात आणि परत धवल रंगात विलीन होतात… तसंच आहे ना सप्तकाचं…. सा आधार सप्तकाचा… स्वरनिर्माता.. पण त्याला अहं नाही. तो असणारच असतो पण सतत समोर येऊन दाखवत रहात नाही… स्वरांना सजू देतो… रमू देतो.. रंगू देतो कारण त्याला माहिती आहे ते सारे त्याच्यापाशीच परत येणार आहेत. तो त्यांच्या सहज सोबत असतो अदृश्यपणे…. कोमल, शुद्ध, तीव्र साऱ्यांच्या भावनांसोबत असतोच तो… कधी कधी तर राग रचनेत, चालीत कुणी स्वर वर्ज्यही असतात… पण म्हणून नातं तुटतं नाही. सुटत नाही “सा” चं… ते तेवढ्यापुरते दुरावतात आणि दुसऱ्या वेळी प्रधानही होतात. हे सारं “सा” मनात जाणतो. ते सोबत असोत नसोत हा सदैव संगतीला असतोच… ते नसले तरी इतर स्वरांची नाती जपतो…. “सा” शांतपणे सारं ऐकतो, पाहतो, जपतो, सांभाळतो… त्याला दृढ विश्वास आहे सारे भाव, रस, रंग, श्रुती कितीही सजले तरी त्यांना ओढ आहे त्या अचल “सा” ची…. जिथून प्रवास सुरू तिथेच समर्पण आहे… तो समजुतदार “सा” सर्वांना आपल्या मायेच्या दुलईत घेतो….

प्रत्येक स्वर वेगवेगळे भाव भेटवतो… राग सजवतो… “सा” आपल्या जागेवरून सारं न्याहाळतो…. कल्याणच्या गंधार तीव्र म निषादाची मैत्री.. बिहागच्या दोन मध्यमांचं अद्वैत आणि गंधाराचा सुवास… बागेश्रीच्या कोमल गंधार निषादावर धैवताची मध्यमाची सत्ता, त्याच कोमल निषादाशी रागेश्रीतलं शुद्ध ग चं जुळलेलं सूत… रात्रीकडे अलगद पाऊल टाकणारा मारव्याचा कोमल रिषभ पहाटे भैरवाच्या सूर्याला अर्ध्य देतो. करूण रहात नाही तर उदात्त होतो… ऊन्ह तापतात… माध्यान्हीला शुद्ध सारंगचा चढा पण काहिसा करूण तीव्र म शुद्ध मध्यमाच्या प्रभावात वावरतो…. तिलककामोदचे स्वर गंधाराची आर्जवं करतात… जणू काही ग जवळ भेटू असं ठरलंय  सगळ्यांचं… अगदी “सां प”ही मींड देखील… किती रागांचे किती खेळ… काही स्वरांना खूप महत्व… तर काही फक्त रागात असतात. ते नसून चालंत नाही आणि आहेत म्हणून फार सन्मान ही नाही. पंचम किंवा मध्यम तर काही वेळा हात सोडून दूर जातात. साsssरं “सा” पाहतो. पण तो सर्व रागरूपात समयचक्रात, सदैव, सतत असतोच. तो आहे म्हणून तर स्वर निवांत रंगतात, खेळतात आणि या आनंदाच्या घरी परततात… समाधानानं

… तृप्तीनं…

“सा” चा आग्रहंच नाही की मी पाया… मूळ स्वर… आधार… सतत माझा सन्मान करा… पण तो अटळ… आहेच… असणारच आहे…. सजणाऱ्या सर्व रंगांबरोबर… रसांबरोबर…

श्रुतींबरोबर…. “सा” सगळं जाणतो.. अगदी सहज स्वतःचा पोतही बदलतो… कधी स्पष्ट कधी लख्ख कधी अंधुक होतो. पण प्रत्येक “कहन ” चा तो “पूर्णविराम” असतो. शांत, तृप्त… त्याला माहिती आहे स्वर कितीही सप्तकात हिंडले, कितीही लयीत खेळले तरी अखेर “सा ” च्या तेजाशीच एकरूप होणार.. मिसळून जाणार… समर्पित होणार… तेच तर त्यांचं मूळ, कूळ, गोत्र…. आणि तिथे ते छान एकरूप झाले तरंच हे पक्कं होईल की ते काही तरी चांगलं, अचूक, सुरेल, रंगवून, सजवून आलेत. स्वर, लय, शब्द सारी अंग… घराणं, राग, ताल कोणतंही असो…. लोकगीत, भावगीत, दादरा, ठुमरी, नाट्य, चित्रपट कोणती का गायकी असेना हा सर्वत्र……

अचल!! अटल!! ठाम!!

तो भारदस्त, अचूक, स्थिर, गोल, गोड, भावपूर्ण असा लागला तरंच रंग भरणार…. आनंदाचं घर रस भावानी लयदार सजणार. बेहेलावे, मुरकी, खटका, मींडची तोरणं डोलणार…. राग, स्वर, शब्दांच्या रंगभऱ्या रांगोळ्या सजणार…… अशा सुंदर गायकीचा पत्ता सांगू?…..

आनंदाचं घर🏡

कुटुंब प्रमुख “सा”🎼

कुटुंबातले सदस्य “१२”🎼

आणि महत्वाची सहज सापडणारी खूण म्हणजे.. सभोवती अगणित स्वर, भाव, रंग गंधांची फुललेली फुलबाग…

© डॉ. माधुरी रानडे जोशी.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

प्रश्न

। नृपस्य चित्तं कृपणस्य वित्तम्

 मनोरथा:  दुर्जनमानवानाम्

 त्रिया चरित्रं पुरुषस्य भाग्यम्

 देवो न जानति कुतो मनुष्य:।।

राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे दैवाला सुद्धा जाणता आले नाही ते सामान्य मनुष्याला कसे काय उमगणार?

खरं आहे! एक सामान्य बुद्धीची व्यक्ती म्हणून मी जेव्हां जेव्हां रामायण, महाभारत आणि इतर अनेक ऐकलेल्या दंतकथांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तेव्हाही राहत होते आणि आजही तेच तेच प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतात.

अशा अनेक स्त्रिया ज्या मनावर स्वार आहेत..

आंधळ्या पतीसाठी आयुष्यभर डोळस असूनही डोळ्यावर पट्टी बांधून जगणारी गांधारी… हिला पतिव्रता म्हणायचं की जर ही धृतराष्ट्राचे डोळे बनून जगली असती तर वेगळे महाभारत घडू शकले असते का? पांडव आणि कौरवातले केवळ राज्यपदासाठीचे वैर मिटवता आले असतते का? कुरुक्षेत्रावरचं ते भयाण युद्ध टळलं असतं का?असा विचार करायचा?

कुंतीसारख्या महाराणीला जन्मभर दुर्वास ऋषीच्या क्रोधित शापवाणीमुळे लाभलेलं शापित मातृत्व का भोगावे लागले?

द्रौपदीने  पाच पांडवांचं पत्नीपद कसं निभवलं  असेल? नक्की कुणाशी ती मनोमन बांधली गेली होती? युधीष्ठीराबद्दल तिच्या मनात नक्कीच वैषम्य असणार आणि भीमाबद्दल आस्था. समान भावनेने पंचपतींचा तिने मनोमन स्विकार केला असेल का?

वृषालीने मनोमन कर्णावरच प्रेम केले. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कर्णाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करावा लागला तरीही वृषालीने पती म्हणून फक्त कर्णाचाच विचार मनात बाळगला.

अहिल्याचा कोणता दोष होता की, गौतमी ऋषीने केवळ त्यांच्या कुटीच्या वाटेवरून जाताना इंद्राला पाहिले आणि अहल्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवून तिचे शापवाणीने पाषाणात रूपांतर केले आणि त्याच अहल्येचा कालांतराने रामाने उद्धार केला.

.. मीरा, राधा यांना आपण नक्की कोणत्या रूपात पाहतो? प्रेमिका की भक्तिणी की समर्पिता?

.. रामाबरोबर वनवासात गेलेल्या सीतेला एखाद्या सामान्य स्त्री सारखा कांचन मृगाचा लोभ का व्हावा?

.. रावणासारख्या असुराची  पत्नी मंदोदरीसाठी आपल्या मनात नक्कीच एक हळवा कोपरा आहे.

.. वालीची पत्नी तारा ही सुद्धा एक राजकारणी चतुर स्त्री म्हणूनच आपल्या मनात का राहते?

। अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी 

पंचकन्या स्मरेत नित्यम | महापातक नाशनम्।।

…. हा श्लोक म्हणताना खरोखरच जाणवते की कोणत्याही कारणामुळे असेल, त्या त्या काळाच्या परिस्थितीमुळे असेल पण कुठला ना कुठला  कलंक चारित्र्यावर घेऊन जगणाऱ्या या स्त्रियांना काळानेच दैवत्व कसे दिले?

हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. आणि म्हणूनच स्त्रीच्या चारित्र्याविषयी नेमकं काही ठरवताना जिथे देवही दुर्बल ठरले तिथे आपल्यासारख्यांचं काय?

पुरुषस्य भाग्यम्  हा सुद्धा असाच प्रश्न उभा करणारा  विषय आहे.

— रघुकुलोत्पन्न, सच्छील, मर्यादा पुरुष, एकपत्नीव्रती  पितृवचनी, बंधुप्रेमी, कर्तव्यपरायण रामाला  चौदा वर्षे वनवास का घडावा?

— राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यप्रिय, वचनबद्ध, राज्यकर्त्याचे समस्त राज्य जाऊन त्याची दैना का व्हावी?

— भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या महारथींना  दुर्योधनासारख्या अधर्मी व्यक्तीला कोणत्या लाचारीला बळी पडून साथ द्यावी लागली?

— युधिष्ठिराने  कौरवांसारख्या नीच वृत्तींबरोबर द्युताचा डाव मुळातच मांडलाच कशाला?

— आणि कौंतेय? सूर्यपुत्र, प्रचंड बलशाली, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेल्या या कर्णाला सुतपुत्र म्हणून का जगावे लागले? परशुरामाचा शाप, इंद्राची चालाखी आणि अपात्र व्यक्तीशी मैत्रीच्या वचनात अडकलेल्या कर्णाचे भाग्य कसे भरकटत गेले हा केवळ जर— तरचाच प्रश्न उरतो.

— अर्जुनासारख्या धनुर्धराला  बृहन्नडा बनून स्रीवेषात वावरावे लागले.

— भीमाला गदेऐवजी हातात झारा घ्यावा लागला.. बल्लवाचार्याची भूमिका करावी लागली.

— कृष्णासारख्या युगंधराचाही शेवट मनाला थक्क करतोच ना?

— आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो हे सत्य केवळ कल्पनेच्या पलीकडचं नाही का?

अर्थात हे सर्व पुराणातलं आहे. पिढ्यानुपिढ्या ते आतापर्यंत आपल्याकडे जसंच्या तसं वाहत आलेलं आहे. पण या सर्व घटनांचा संदर्भ मानवाच्या सध्याच्या जीवनाशी आजही आहे. कुठे ना कुठे त्यांचे पडसाद आताच्या काळातही उमटलेले जाणवतात.

फूलन देवी पासून ते नरेंद्र मोदी इथपर्यंत ते उलगडता येतील.

जन्मतःच कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतोच. तो घडत जातो. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण रूप जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. संस्कार, नितीअनितीच्या  ठोस आणि नंतर विस्कटत गेलेल्या कल्पना, भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अगतिकता, अपरिहार्यता किंवा ढळलेला जीवनपथ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे कुणाच्या चारित्र्याबद्दल अथवा भाग्याबद्दल जजमेंटल होणं हे नक्की चुकीचं ठरू शकत.

रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली एखादी स्त्री नव्याने शुचिर्भूत  होऊन पिडीतांसाठी देवासमान ठरू शकते.

कुणाचं भाग्य कसं घडतं याविषयी मला एक सहज वाचलेली कथा आठवली ती थोडक्यात सांगते.

— दोन भाऊ असतात. त्यांचे वडील दारुडे व्यसनी असतात. दोन्ही भावांवर झालेले कौटुंबिक संस्कार हे तसे हीनच असतात. कालांतराने वडील मरतात. दोघे भाऊ आपापले जीवन वेगवेगळ्या मार्गावर जगू लागतात. एक भाऊ अट्टल गुन्हेगार आणि बापासारखा व्यसनी बनतो. मात्र दुसरा भाऊ स्वतःच्या सुशील वागण्याने समाजात प्रतिष्ठा मिळवतो. हे कसे? त्यावर उत्तर देताना व्यसनी भाऊ म्हणतो, ” आयुष्यभर वडिलांना नशेतच पाहिलं त्याचाच हा परिणाम. ”

पण दुसरा भाऊ म्हणतो, ” वडिलांना आयुष्यभर नशेतच पाहिलं आणि तेव्हांच ठरवलं हे असं जीवन आपण जगायचं नाही. याच्या विरुद्ध मार्गावर जायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं ”

म्हणूनच भाग्य ठरवताना कुळ, गोत्र खानदान, संपत्ती, शिक्षण अगदी सुसंस्कार हे सारे घटक बेगडी आहेत. विचारधारा महत्त्वाची आणि त्यावरच चारित्र्य आणि भाग्य ठरलेले आहे. मात्र कुणी कसा विचार करावा हे ना कुणाच्या हातात ना कोणाच्या आवाक्यात. बुद्धिपलीकडच्याच या गोष्टी आहेत 

या श्लोकाचा उहापोह  करताना मी शेवटी इतकेच म्हणेन की,

* दैव जाणिले कुणी 

लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी…।।

— तेव्हा जजमेंटल  कधीच होऊ नका. काही निष्कर्ष काढण्याआधी  वेट अँड वॉच.

अहो जे देवालाही  समजले नाही ते तुम्हा आम्हाला कसे कळेल?

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ श्री जगदीश काबरे ☆

जगण्याशिवाय अनुभवांना सामोरे जाता येत नाही. अनुभवाशिवाय विचार संभवत नाही. आणि विचारांशिवाय जगणे उमगत नाही. जगणे अनुभवणे आणि विचार हे असे अन्योन्याश्रयी आहेत. सोयीसाठी आपण कधी कधी त्यांची फारकत करतो. पण या फारकतीचा अतिरेक झाला की ‘विचारांपेक्षा अनुभव श्रेष्ठ’ किंवा अनुभव व्यक्तिसापेक्ष म्हणून मर्यादित तर विचार सार्वत्रिक म्हणून व्यापक यांसारख्या दर्पोक्ती ऐकू येऊ लागतात. अनुभव व विचार यांच्यातील सहकार्य धूसर होत जाऊन अनुभववादी विरुद्ध विचारवादी असे द्वंद्व सुरू होते. या द्वंद्वयुद्धाची नशा योद्ध्यांना धुंद बनवते.

सामान्य माणूस मात्र या द्वंद्वाला काही काळानंतर कंटाळतो. या कंटाळण्यातून त्याचे तीन प्रतिसाद संभवतात.

1) तो विचारांबाबत ‘सिनिक’ – तुच्छतावादी बनतो 

2) तो आपले व्यक्तिगत अनुभवच निव्वळ कवटाळून ते सार्वत्रिक सत्य म्हणून सांगू लागतो व स्वतः बंदिस्त होतो 

3) तो स्वतःचे अनुभव नाकारता नाकारता स्वतःलाही नाकारू लागतो. हे व्यक्तित्वाचे खच्चीकरण असते.

आपण बंदिस्त होण्याचे कारण नाही. तुच्छतावादीही असता कामा नये आणि स्वतः च्या अनुभवांचा अकारण धिक्कारही करता कामा नये. स्वतःलाच पुसून टाकण्याइतके किंवा नाकारण्याइतके आपले आणि कोणाचेही आयुष्य कवडीमोलाचे नसते. दुःख, अपमान, संकट, जीवन उद्ध्वस्त करणारे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात येतातच. त्यांना चिवटपणे सामोरे जायला हवे. हे सामोरे जाण्याचे बळ शेवटी विचारच आपल्याला देतात. कारण विचार हा आपण आपल्याशी केलेला तर्कशुद्ध आणि विश्वसनीय संवाद असतो. इतर विचारांची सोबत व मार्गदर्शन हा संवाद अधिक प्रगल्भ बनवते. म्हणूनच माणसाला विचारदर्शनाची गरज लागते.

एकदा आपण आपली ही गरज ओळखली की मग आपल्याला भेडसाविणारे अनेक स्वतः संबंधीचे व समाजासंबंधीचे प्रश्न समजू लागतात. त्यांच्या नजरेला नजर देण्याची ताकद आपल्याला लाभते. विचारांचा व विचारदर्शनांचा आदरपूर्वक स्वीकार वा त्यांना विधायक नकार देण्याची ऋजुता आपल्यापाशी येते. ही ऋजुता आपल्याला स्वतःच्या व इतरांच्याही जीवनाचा आदर करायला शिकवते. या आदरभावातून आपण विनम्र होतो. ही विनम्रता आपल्याला स्वागतशील बनवते.

स्त्रीवादी काय किंवा अन्य आधुनिक विचारदर्शनांची ओळख का करून घ्यायची, तर आपल्या जगण्याचे संदर्भ आपल्या लक्षात यावेत म्हणून. विचारांचे जगण्याशी असलेले नाते असते ते हेच. हे नाते जे नाकारतात ते एका परीने जीवनच नाकारित असतात. वाढत्या आत्मनिवेदनाच्या व आत्याविष्काराच्या या जमान्यात वास्तविक विचारांचे श्रद्धेने उत्तरोत्तर स्वागत व्हायला हवे. त्यांचा उत्सव साजरा व्हायला हवा. पण असे न होता विचारांबाबतची तुच्छता का वाढावी, विचारांच्या अंताची भाषा का बोलली जावी, माहितीच्या स्फोटाने कर्णबधिरता व संवेदनशून्यता का यावी हे प्रश्न विचारल्याशिवाय आधुनिक विचारदर्शनांशी संवाद होणार नाही.

लेखक : श्री यशवंत सुमंत

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “समज आणि उमज…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “समज आणि उमज…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या  वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे…

१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.

२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 

४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी  एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.

१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन  चिंता करत बसत

आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा

आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण

आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल

🌹खूप खूप शुभेच्छा (७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l🌹
 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

काव्यानंद

सांज ये गोकुळी सावळी सावळी

जेंव्हा दिवस संपून रात्र होण्यास सुरवात होणार असते, त्या वेळी म्हणजेच संध्याकाळी वातावरणात एक गूढता निर्माण होते. उन्हे कलत असतानाच आकाशात रंगीबेरंगी रंगाची उधळण होत असते आणि अशा वेळी अंधारून यायला सुरवात होते… दिवसाच्या प्रकाशात जेंव्हा रात्रीचा अंध:कार मिसळला जात असतो, तेंव्हा निर्माण होणारा सावळा रंग कवी सुधीर मोघे यांना ही मोहवून गेला आणि सांज ये गोकुळी.. सावळी सावळी! .. या सुंदर गाण्यांचे नादमय शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसवले.

एकच शब्द जेंव्हा दोनदा कवितेत वापरला जातो, तेंव्हा होणारा नाद हा कानाला सुखावतो. या गाण्यात ही सावळी सावळी… या पुन्हा पुन्हा येणार्‍या शब्दांनी जो नाद निर्माण केला आहे, तो नाद आशा ताई यांनी आपल्या आवाजात इतक्या अप्रतिम पणे सादर केला आहे की, हे गाणे ऐकताना आपण अगदी नकळत या गाण्यावर डोलत राहतो. आणि या गाण्यातील शब्दांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अक्षरश: उभे राहते. संगीताच्या सुरांचे बादशाह श्रीधर फडके यांनी पूर्वा कल्याण रागात या गीताला आशा ताई यांचा आवाज देताना गाण्याला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. आशा ताई यांनी सुरवातीचा जो आलाप घेतला आहे, त्या आलापातच त्यांनी संपूर्ण गाणे जिंकले आहे. हे गाणे “ वजीर ” या चित्रपटामध्ये अश्विनी भावे या अभिनेत्रीवर चित्रीत केले गेले आहे.

सांज ये गोकुळी

सावळी सावळी

सांवळ्याची जणू साउली! ..

या कडव्यात गीतकार सुधीर मोघे यांना संध्याकाळच्या वातावरणात पसरणारी संध्याछाया ही जणू काही सावळ्या कृष्णाचीच सावली भासते! … किती सुंदर उपमा! .. त्या सावळ्या कृष्णाची सावळी छाया.. या सावळ्या वातावरणात अवघे वातावरण हे कृष्णमय होऊन गेले आहे आणि कृष्णाच्या गायी या संध्यासमयी गोधुळ उधळवत निघाल्या आहेत.. ( गायी जेंव्हा संध्याकाळाच्या वेळेस आपल्या घरी जायला निघतात, तेंव्हा त्यांच्या खुरांनी जी धूळ उडते, तिला गोधुळ म्हणतात ) त्या उडणार्‍या गोधुळी मुळे आधीच सावळ्या झालेल्या वातावरणात पायवाटा ही गोधुळीमय झाल्या.. या रंगाला कवी सुधीर मोघे श्यामरंग असे नाव देत पुढे लिहितात…

धूळ उडवीत गाई निघाल्या

श्यामरंगात वाटा बुडाल्या

परतती त्यांसवे

पाखरांचे थवे

पैल घंटा घुमे राउळी…

गोधुळ उडवत गाई निघाल्या आणि त्यांच्या सोबत पाखरांचे थवे ही आपल्या घरट्याकडे परतू लागले आहेत… अशा सावळ्या संध्याकाळच्या रंगात देवळात वाजणार्‍या घंटेचा नाद ऐकू येतो आणि सुंदर असे हे वर्णन या गीतात ऐकताना आपल्या डोळ्यासमोर सावळ्या श्रीकृष्णाची हातात मुरली धरलेली सावळी छबी उभी राहते! ..

वातावरणात भरून राहिलेल्या या सावळ्या रंगात दूर दिसणार्‍या उंचच उंच अशा पर्वतांच्या टोकांवर सावळा रंग हा असा झाकोळला गेलेला आहे की, ती पर्वतांची रांग जणू काही काजळाची रेघ दिसत आहे आणि वातावरणातल्या सावळ्या रंगामुळे समोर असलेल्या डोहात पडलेले पांढरेशुभ्र चांदणे ही सावळे होऊन गेले आहे. आणि हे सर्व कवी आपल्या शब्दांत साकारताना म्हणतात….

पर्वतांची दिसे दूर रांग

काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले

चांदणे सावळे

भोवती सावळ्या चाहुली! ….

कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांतली गूढता इथे जाणवते. सावळ्या रंगात रंगून जाताना अवघे विश्व सावळे म्हणजे कृष्णमय होऊन गेले आहे ही त्यांची कल्पना कृष्णप्रेमाची ओढ दर्शविते.

माऊली सांज अंधार पान्हा

विश्व सारे जणू होय कान्हा..

मंद वार्‍यावरी

वाहते बासरी

अमृताच्या जणू ओंजळी…

सांजेच्या सावळ्या रंगात आता अंधाराला पान्हा फुटत आहे, म्हणजेच आता अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. आणि सावळ्या रंगाच्या श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात अवघे विश्व रंगून ते ही कान्हामय होऊन गेले आहे… संध्याकाळी सुटलेला हा मंद गार वारा हलकेच सुटला आहे आणि झाडापानातून वाहणार्‍या वार्‍याचे सूर हे सावळ्या श्रीकृष्णाच्या सावळ्या साउलीच्या वातावरणात त्या सावळ्या श्रीकृष्णाच्याच बासुरीतूनच वहात येताना अमृताच्या ओंजळीत सामावून जात आहेत, अशी सुंदर कल्पना या गीताच्या ओळींत सुरमय केली आहे.

©️ रसास्वाद – सुश्री कविता आमोणकर

प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपले मरण पहिले म्या डोळा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ आपले मरण पहिले म्या डोळा…  ☆ सौ शालिनी जोशी

आपले मरण पाहिले म्या डोळा l

तो झाला सोहळा अनुपम्य ll

संत तुकारामांचा हा अभंग. आपले मरण आपणच पाहणे आणि मरण हा अनुपम्य सोहळा होणे, सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळेच अतर्क्य, अद्भुत, विचित्र. त्यामुळे हा एक वेगळाच विचार करायला लावणारा अभंग. कारण मरण ही कल्पनाच सामान्य माणसाला भीतीदायक, दु:खद वाटते. लौकिक जगातील सुखोपभोगाना चटावलेला माणूस मरण ही कल्पना सहन करू शकत नाही. पण येथे मरण आहे ते पंचभूतीक देहाचे नव्हे तर देहबुद्धीचे आहे. अहंकाराचे आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या मी माझेपणाचे आहे. मी माझे पणामुळे दोरीला बांधलेल्या माकडासारखे माणसाची स्थिती होते. तो आपल्या संकुचित विश्वाचा मी शहाणा, मी विद्वान, माझे घर, माझे मुले, एवढाच विचार करतो. पण यांतून बाहेर पडणारा जगाचा विचार करतो. मी देह हा मर्यादित विचार जाऊन हे विश्वाच माझे आहे. मी आत्मा आहे. हा भाव निर्माण होतो. म्हणजे देह असून विदेही अशी ही अवस्था, तुकाराम येथे मृत्यूच्या रूपकाने वर्णन करतात.

खरे पाहता तुकाराम सर्वसामान्य माणसांसारखे प्रापंचिक, व्यावसायिक व सुखवस्तू होते. विठ्ठल भक्ती परंपरागत होती. पण घरातील व बाहेरील प्रतिकूल प्रसंगाने त्यांचे चित्त उद्विग्न झाले. संसार तापाने तापलेले मन ईश्वरचिंतनात रमू लागले. गुरुउपदेश आणि ईश्वरचिंतन यामुळे ‘नित्य नवा जागृतीचा दिवस’ अनुभव लागले. देहबुद्धी कमी झाली. मी माझे पणाची जागा ईश्वराने घेतली. दुष्काळ संपला. सुकाळ आला. माया, मत्सर, काम, क्रोध हे देहाची निगडीत विकार, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे आणि नाम, रूप, कुळ या सर्व उपाधी लोप पावल्या. त्यांची राख झाली. म्हणजे एका दृष्टीने सर्व देहभावाचे मरणच. शरीर आहे पण विकार नाही. असा हा मुक्तीचा सोहळा तुकारामांनी आपल्या डोळ्यांनी जिवंतपणेच पाहिला. त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी स्थान मिळाले. त्याचाच ध्यास राहिला. ते भगवंतमय झाले. सर्वत्र तोच हा अनुभव आणि मी तोच, मग जन्म मरण कोठून आणि त्याच्याशी निगडित सोयर सुतक व इतर विधीही नाहीत. असा हा अनुपम सोहळा. सच्चिदानंदाची ऐक्य, अखंड आनंद. त्रैलोक्य त्या आत्मानंदाने भरून गेले. ‘ आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी ही अवस्था. अणु रेणु एवढा तुका आकाशाप्रमाणे व्यापक झाला. संकुचित देह बुद्धीतून विश्वव्यापक झाला. हे विश्वचि माझे घर आणि मग त्याच्यासाठीच कार्य, तोच ध्यास. अशा प्रकारे झालेल्या या पुनर्जन्माचे वर्णन ‘मीच मज व्यालो l पोटी आपुलिया आलो’ असे तुकाराम करतात. जिवंतपणे झालेले हे मरण’ जिता मरण आलेl आप पर गेलेl मूळ हे छेदिलेl संसाराचेll’ संसाराचे चिंता संपली. चिंता करितो विश्वाची अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून हे मरण अनुपम्य झाले. मी ची जाणीव संपली. ‘आता उरलो उपकारापुरता. ‘ स्वतून विरक्त होऊन स्वकियांसाठी कार्य सुरू ठेवणे, हा अनुभव, हा बदल, हे मरण आणि पुन्हा जन्म तुकारामांनी स्वतः अनुभवले आणि लोकांना सांगितले.’

तुका म्हणे दिले उमटून जगी l

घेतले ते अंगी लावूनिया ll

सर्व जगापुढे आदर्श ठेवला. म्हणूनच महात्मा फुले, अण्णासाहेब कर्वे यांचे सारखे समाज सुधारक निर्माण झाले. स्वतःला विसरून जगाचे झाले. जगाचा प्रपंच केला. त्यामुळे त्यांचे कार्यही मीच्या मरणातून, स्वर्गाची- आनंदाची निर्मिती या स्वरूपाचे झाले. क्रांतिकारकांनी स्वतःच्या घराची, स्वतःची पर्वा कधीच केली नाही. त्याचे मरण पत्करून भारत मातेला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामांसारख्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून. ‘बुडते हे जन देखे डोळा’ यासाठीच हा सगळा अट्टाहास. प्रत्येकाची पद्धत वेगळी. कुणी अभंग ही शस्त्रे आणि बाण केले. तर कुणी (सावरकर, सुभाषचंद्र बोस) खऱ्या शस्त्रांची प्रेरणा दिली. गांधींनी सत्याग्रहाचा तर टिळकांनी लेखणी व वाणीचा मार्ग अनुसरला. पण त्यासाठी आधी देह भावाचे मरण सगळ्यांनीच अनुभवले. अशा प्रकारे संत तुकारामांनी जन्म आणि मरण यांना वेगळा अर्थ दिला, जगद्गुरु झाले.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares