मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆  भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज आपण एक आगळीवेगळी कविता या ठिकाणी पाहणार आहोत… जीवन स्थिर नसतं,पण आपल्याला स्थैर्य हवं असतं… तुम्ही आम्ही सर्व जण कधीच एका जागी स्थिर असत नाही… सतत फिरते … प्रगती विकास च्या नावाखाली हलत राहतो… कधी स्वता तर कधी दुसरा आपल्याला हलवत असतो… गती देत असतो… जशी गती मिळते तेव्हढं आपण स्वता भोवती गिरकी घेत राहतो..

स्वताच्या पायावर उभे राहतो काही क्षण… गती संपताच आपण कलडूंन पडतो..पायाच नसल्या सारखं… एखादी भिंगरी सारखं…. होय आपण ओळखलंत .. कवि सौमित्र यांची भिंगरी घर या कवितेबद्दल बोलतोय…

☆ भिंगरी घर ☆

आधी घर छोटं होतं म्हणून तू बाहेर झोपायचास

नंतर डोक्याला शांतता हवी म्हणून बाहेर असायचास

*

मग गेले वडील तेव्हा त्यांची जागा तुझी झाली

काही दिवसांनी भावाचं लग्न,त्याची बायको घरात आली

गुपचुप उचललास बिछाना आणि हळुच देऊळ गाठलंस

फुटपाथ रस्ता देऊळ दुकान यानांच आपलं मानलंस

*

अचानक मग अधून मधून तू शहराबाहेर जायचास

एकटा एकटा एकटा फिरून पुन्हा परत यायचास

*

पैसे देऊन हक्काची जागा हाॅटेलमधे शोधायचास

काही दिवस काही रात्री काॅंफीडंटली वागायचास

*

एक दिवस प्रेमात पडलायस असं कुठुन कळलं

तुझं सारंच आठवलं अन् काळीज उगाच जडलं

*

एका जागी स्थिरावणार,तू याचंच हायसं वाटलं

शेवटी एकदाचं तुझ्या हक्काचं कुणी तुला भेटलं

*

आणि मग तू लग्न केलंसन घर घेतलस स्वत:च

खरंच खूप छान केलंस,ऐकलंस फक्त मनाचं

*

मग एक दिवस आई म्हणाली,’घर मोठ्ठं आहे तरी?’

तुझी बायको म्हणते,तू अधूनमधूनच असतोस घरी?

*

अंग थरथर कापू लागलं जीभ माझी कोरडली

आईनं हातात पट्टी घेतली,आई माझी ओरडली

*

सांग…सांग तुझी जागा तू कुठे जाऊन फेकलीस?

अशी कशी भिंगरी बाळा पाया लावून घेतलीस?

… छोट्या घरात राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाची कहाणी… झोपायची अडचण … वडीलधारी मंडळी घरी झोपावीत म्हणून बाहेर झोपणारा मी सतत दुसऱ्याची सोय बघत गेलो… वडील गेले नि घरात जागा झाली हक्काची काही क्षणाची… भावाने लग्न केले मुहूर्तावर बायको आली घरी नि माझी वरात फिरून दारी…पाहता पाहता त्या निरंकुशतेच्या कुशीत शिरलो… तिनं दाखवले ते आकर्षणाचं जगं… एक जागा अशी राहिली नाही सतत बदलत गेलो… फुटपाथ रस्ता देऊळ दुकान सगळा फुकटचा आणि उघडयावरचा कारभार… मग शहाराची लागली चटकं.. ते सुख सुखासुखी सोडवत नव्हते… कधी खिसा गरम असला तर चार पैसे टाकून हाॅटेलच्या गादीवर रात्र काढू लागलो बिनधास्त…

… प्रेमाचं बिंग फुटलं,.. आईला बरंच वाटलं..चंचलेला लगाम बसेल .. मी स्थिर होईन हि आशा वाटली… हक्काची सावली मिळणार होती… लग्न हि झालं तसं स्वताच घरही झालं… आता भिरभिरणाऱ आयुष्य संपलं असं त्यांना वाटलं…. पण ते माझं मन मला कासाविस करू लागलं… हक्काचं ते असून बाहेरचं सुख सुखासुखी सोडवत नव्हते…बायकोची तडफड आईला समजली… फैलावर घेत ती मला म्हणाली… घर असताना का भिकेचे डोहाळे लागले…. भिंगरी लावून घर घर का भिरभिरतोस … आता तरी स्थिर हो…

भिंगरीचं घर रुपक  सतत दुसऱ्यानं गती दिली तर फिरते… तेव्हा ती स्वताचं भान हरपते.. स्वताच्या पायावर तोल सा़भाळते स्थिर दिसते पण गती संपताच कलंडून कोलमोडून पडते… पायाच नसल्या सारखी.. अडगळीत पडल्या प्रमाणे…  माणसं भि़गरी सारखी गरगर फिरतात स्वताच्या जीवनामध्ये … स्थैर्य हवं असतं म्हणून… कुणाला लाभलं असं वाटतं तर कुणाला नाही … साराच भासआभासाचा खेळ असतो तो….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भिती…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “भिती…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नुसता विचार आला की मनात येणारी, वाटणारी, आणि आपल्याच अवतीभोवती पिंगा घालणारी. आणि विचार थांबवला की हळूहळू कमी होणारी एक अदृश्य गोष्ट म्हणजे भिती.

लहानपणी गंमत म्हणून कोणीतरी दाखवलेली भिती नंतर पाठ सोडत नाही. खरंतर पाठ काय, ती आपल्यालाच सोडत नाही. सतत वाटत नसली आपल्याला वाटते तेव्हा ती अवतीभवतीच फिरत असते. बटन दाबल्यावर चटकन दिवा लागावा, तशीच ती विचार केला की तात्काळ येते. पण बटन बंद केल्यावर दिवा लगेच बंद होतो, तशी मात्र ती लगेच जात नाही.

फटाका फुटल्यानंतर त्याचा वास काहीकाळ तसाच राहतो. तसाच विचार बंद केल्यावरही भिती काहीकाळ मनात रेंगाळते.

भितीची कारणं, वेळ, प्रसंग हे वेगवेगळे असतात. वयानुसार हि कारणं बदलतात सुध्दा. पण संबंध असतो तो विचारांशी.

धडपडणं, लागणं ही जी भिती मोठेपणी असते, ती कदाचित लहानपणी जवळपास सुध्दा फिरकत नाही. कारण तशा भितीचा विचारच नसतो. पण अंधार, अभ्यास, परिक्षा, रिझल्ट, मिळणारे मार्क हि लहानपणची साधीसाधी कारणं असतात. कारण हा विचार मनात आला नाही तरी याचा विचार कर…… असं कोणीतरी सांगत असतं.

नौकरी, नुकसान, फसवणूक, चोरी, अपयश, हि कारणं वाढत्या वयात येतात.

प्रवास, कार्यक्रम या गोष्टी व्यवस्थित पार पडतील नां… वेळेवर काही गोंधळ होणार नाही नां… अशी भिती त्या त्या वेळी असतेच.

मन लाऊन आणि व्यवस्थित केलेला पदार्थ सुध्दा… काही वेळा चवीसाठी दिला जातो. आणि कसा झाला आहे?… हे विचारतांना तो चांगला झाला असेल याची खात्री असली तरी पण… मनात एक भिती असते.

उतारवयात तर म्हातारपण हिच भिती त्यांच्या बोलण्यात जाणवते. यात अतिवेग, मोठ्ठा आवाज यांचीपण भिती वाटते.

राजकारण, व्यवसाय, पेशा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना सुध्दा एक प्रकारची भिती वाटत असते.

एकच भिती कायम असते असंही नसतं. ती बदलते सुध्दा. आणि हा भितीचा बदल विचारांबरोबर बदलत असतो.

राजकीय भिती, सुरक्षेची भिती, सामाजिक घडामोडींची भिती, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिती वाटतेच. पण पाल, विंचू , झुरळ, साप असे काही प्राणी. कोसळणाऱ्या पावसात कडाडणारी वीज. दहीहंडीसाठी केलेला उंच मानवी मनोरा. यांची सुध्दा भिती वाटते. जेवढे विषय तेवढी भिती.

आपल्या मनातली भिती दुसऱ्याला सागितल्यावर कधी कधी तो आपल्याला सावरतो. पण कधी त्याच्याही मनात तीच भिती निर्माण होते ज्याचा त्याने अगोदर विचारच केलेला नसतो.

थोडक्यात, भिती हि हाॅटेल मधल्या मेनू कार्ड सारखी असते. म्हणजे मेनू कार्डवर बरेच पदार्थ असतात, तशीच भितीची अनेक कारणं असतात. मेनू कार्ड वाचून हे पदार्थ आहेत हे समजतं . पण ते चविला कसे, आणि प्लेटमध्ये म्हणजे quantity किती असेल ते काहीवेळा माहीत नसतं. तसंच भितीच काहीवेळा असतं. नक्की कशी, का, आणि किती वाटते हे समजत नाही. पण ती वाटते.  हाॅटेल मधले पदार्थ आपण मागवले तरच मिळतात. तसंच भितीचं आहे, विचार केला तरच ती वाटते…….. केलाच नाहीतर…

आनंदी आनंद गडे…

“भय इथले संपत नाही.” किंवा “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती.” या सारख्या गाण्यांवरुन कवींना सुध्दा भिती या शब्दाची भुरळ पडल्याचं लक्षात येत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “समुपदेशन…  कुणाचे ?” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “समुपदेशन…  कुणाचे ?” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, “या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या.”

पण मी त्यांना म्हटलं की, “असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही. त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही.” त्यावर ते म्हणाले, “नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे. तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले, तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील.”

शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्‍यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या, पण तेसुद्धा स्वीकारले.  कारण तो शिकायला आलेला होता. जरी त्याचे वडील म्हणाले होते की, मुलाला तुम्ही काहीही देऊ नका…  तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते. महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की, आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो. तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो. सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला, तेंव्हा तो नाराज झालेला दिसला; पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले.

शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी  माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन ! त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ‘ माती, पंख आणि आकाश ‘ हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश !

पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले. नाराजीने त्याने पगार घेतला, आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.

हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली, कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो. त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात. त्याने एक उदाहरणही दिले.

सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे.  मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की, आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील. आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात……

अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले, तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो, तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ? पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ? त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.

या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे. एकापत्य संस्कृतीत नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण.  मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही.

दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे असे वाटते.

लेखक : श्री अभय शरद देवरे.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 1 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 1 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मी महाविद्यालयात शिकत असताना लोकांमध्ये संगणकाबद्दल खूप आकर्षण होते. कारण त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मी असेही अनेक महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक बघितले आहेत जे म्हणायचे, “तुमच्या कांपूटरपेक्षा आमचे कालकूलेटर भारीये.” एक शिक्षक तर त्याही पुढे जाऊन म्हणायचे, “क्याम्पूटर लैच भारी असतो, बटन दाबलं का माहिती भायेर…” महाविद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांची ही गत होती तर सामान्य माणूस कसा असणार? इथे मी त्या शिक्षकांना नावे ठेवत नाही. ठेवणारही नाही. कारण जे विषय ते शिकवत होते त्यात ते पूर्णतः पारंगत होते. आणि संगणक हा त्यांचा विषयही नव्हता. त्यावेळी मला तरी कुठे अंतरजालाबद्दल ( इंटरनेट ) काही माहिती होती? पण हे सांगायचा उद्देश इतकाच की संगणकाबद्दल इतके अज्ञान लोकांमध्ये होते. त्यामुळे त्याबद्दल कुतूहलही जास्तच.

त्यावेळी ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील नायिका, माधुरी दीक्षित हिच्या तोंडी एक वाक्य देण्यात आले होते. तिला विचारले जाते, “बाई गं, तू काय शिकतेस?” आणि ती सांगते “कम्प्युटर्स…” ( हे संवाद हिंदीत होते हं ) तिच्या तोंडी दिलेला तो शब्द ‘ती किती हुशार आहे’ हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्यात दिग्दर्शकाला यशही आले होते. 

१९९२ मध्ये शाहरुखखानचा एक चित्रपट आला होता. “राजू बन गया जंटलमन”. त्यात एक प्रसंग येतो. चित्रपटाचा नायक अभियंता ( इंजिनिअर ) म्हणून मुलाखत द्यायला जातो. मुलाखत घेणारे त्याला काही प्रश्न विचारतात. नायक आपली हुशारी दाखवत त्या लोकांनी केलेल्या आधीच्या कामात ५ करोड रुपये कसे वाचवता आले असते हे सांगतो. मुलाखत घेणारे लगेच संगणकासमोर बसलेल्या यंत्रचालकाला (  कॉम्प्युटर ऑपरेटर हो ) विचारतात, ‘बाबारे, तुझा संगणक काय सांगतोय?” आणि संगणकासमोर बसलेला माणूस त्याच्या समोरील कळफलकावर ( कीबोर्ड ) आपली बोटे चालवतो. आणि सांगतो, ‘या व्यक्तीने सांगितलेले पूर्णपणे बरोबर आहे.’ हा चित्रपट श्रीरामपूरमध्ये १९९३ मध्ये मी बघितला होता. आणि तो प्रसंग बघून त्यावेळीही मला हसू आवरले नव्हते. का? अहो जी गोष्ट मुख्य अभियंत्याला जमली नाही, ती गोष्ट एक साधा यंत्रचालक अगदी आठ दहा सेकंदात सांगतो हे कितपत पटू शकेल? बरे हे सांगत असताना संगणकाच्या पडद्यावर काय दिसते तर ‘आज्ञावलींची यादी.’ ( फाईल लिस्ट ). त्यावेळी आम्ही ‘DIR/W’ ही आज्ञा संगणकातील आज्ञावलींची यादी बघण्यासाठी वापरत होतो. मग हसू नाही येणार तर काय? पण ही गोष्टही त्यावेळी प्रेक्षकांनी खपवून घेतली.

आता काळ बराच बदलला आहे. चित्रपटही जास्तीत जास्त लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी दाखवू लागले आहेत. परवानगीशिवाय एखाद्याच्या संगणकाचा वापर करणाऱ्या ( हॅकिंग ) विषयावरील चित्रपट याचे चांगले उदाहरण आहे. पण त्याचसोबत युट्युबवर आजकाल असेही अनेक चलचित्र ( व्हिडिओ ) आपल्याला सापडतात, जे एकतर अर्धवट माहितीवर आधारित असतात किंवा काल्पनिक माहितीवर. आणि विशेष म्हणजे अनेक लोक आजही त्यावर विश्वास ठेवतात. अनेकांच्या मनात त्याबद्दल विनाकारण भीती निर्माण होते. याचे चांगले उदाहरण म्हणजे ‘काळेकुट्ट अंतरजाल’. ( डार्क वेब हो ) त्याबद्दलच्याच अनेक गोष्टी मी अगदी छोट्या छोट्या लेखांमार्फत वाचकांसमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. याचा उद्देश फक्त लोकांच्या मनातील विनाकारण भीती कमी करणे इतकाच असेल. 

(या आधीही काही जणांनी मला विचारणा केली होती की मी शक्य तितक्या मराठी शब्दांचा वापर का करतो? हे मी माझ्यासाठी करतो. माझा मराठी भाषेतील शब्दसंग्रह वाढावा यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे.)

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆वाचाच अन् लाजाही थोडं …– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वाचाच अन् लाजाही थोडं …– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्रीमंत लोक, जे लोक दिवसभरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात , ते गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्रि, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेंव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेंव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रीयांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयका बाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘काय देवून राहिले भाऊ त्यात?’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘१ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हीला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता न तूम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्यानं माझे लक्ष वेधले. त्यानं काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहिलं होतं…. “दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य“.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्याखोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव ते अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

म्हणजे तिकडे दिल्लीला ‘सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे.’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थीत नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘याची काय गरज?’

माझ्या सोबतचा तरूण पोरगा म्हणाला… ‘कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधपक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

एखाद्या गावात जैवविविधता किती आहे, म्हणजे किती झाडे, पशु पक्षी, सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनानं हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे रमेश मुंगीकर मुद्दाम या गावात येवून लोकांशी संवाद साधताना मी पाहिले.

मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले की ‘गेल्या ९ वर्षांपासून अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव आहे. ’म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्या भल्यांची कोण धांदल उडते. शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही.

या गावानं तब्बल ११०० एकर जंगल राखलं आहे. सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं. घरच्या माणसानं मला आत अगदी आत स्वयंपाकघरात येण्यास सांगितलं. त्या छोट्या खोलीत मला वाटलं चहा चुलीवर उकळत असेल. तर तिथे गॅस चालू होता. या गावानं ११०० एकर जंगल राखलं म्हणून यांना विशेष योजनेखाली एलपीजी गॅस सिलेंडर मिळतात.

डॉ हेडगेवार रूग्णालयातील डॉ आनंद फाटक यांनी या गावात कांहीं वर्षांपूर्वी… अनेक वर्षे आरोग्य सेवा दिली व या बदलाचा ते भाग आहेत….ते आत्ता पण या गावात नियमित भेट देऊन तेथील लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय मार्गदर्शन करत असतात.

या गावाच्या या आगळ्या वेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होतं आहेत की नाहीत हे पहात होते. त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे.

वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळपासच्या भागातून हजार एक नागरिक तिथे जमा झाले होते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावाने ३० रूपये इतके अल्प शुल्क आकारले होते.

चैतराम पवारांच्या मागे रांगेत उभे राहून आम्हीही ही ३० रूपयांची कुपनं घेतली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग करायला आलेले ‘एबीपी माझा’चे मिलींद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टिमनेही कुपनं घेतली.

नागलीची भाकरी, तुरीचे वरण, तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं.

कार्यक्रम आटोपला. स्पर्धा संपली. मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो. जवळच तिथले गावकरी स्त्री पुरूष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते.

एकूण ४०७ लोकांनी कुपनं घेतली आणि ताटं मात्र ५०० च्या पुढे गेली होती. कुपनं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोलेचनात. मला वाटले गावातीलच काही लोक, कार्यकर्ते असतील. पण मला कळले की गावातील एकही माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता. ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते. कुणीच काही सांगेना.

मला दिवसभर साथ करणार्‍या तरूण मुलाला मी जरा बाजूला घेतले. हळू आवाजात विचारले, ‘काय रे कुणीच काही सांगेना, कोण होते हे फुकटे जेवणारे?’

त्या पोरानं जे उत्तर दिलं त्यानं अन्नसुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं.

तो पोरगा म्हणाला, ‘अहो साहेब, हे जे शासनाचे लोक आले होते ना, वन विभागाचे, पोलिसांचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे लाचखोरी करतात तसेच महाविद्यालयातले प्राध्यापक ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो ते सगळे फुकट जेवून गेले.’

ज्याला गरीब समजून त्याच्यासाठी कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे.

तो कधीही भीकमाग्या योजनांची मागणी करत नाही. पण या गरीबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं….

—  असं हे बारीपाडा  गाव –   ता साक्री – जि.धुळे

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

उसाला झाली दोन दोन पोरं,

मोठा मुलगा ‘गूळ’  अन्

धाकटी मुलगी ‘साखर’

 

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,

गूळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर

 

साखर तशी स्वभावाला गोड,

तिच्यात उणेपणा शोधणं अवघड

 

गुळ मात्र स्वभावाला चिकट,

समोर दिसला की इतरांना वाटे संकट

 

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळून जाई,

गूळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही

 

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,

गूळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ओबडधोबड

 

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,

बापाने लगेच दोघांचे लग्नच लावून टाकले

 

तिला झाला एक मुलगा

दिसायला होता तो गोरागोरा,

यथावकाश बारसे झाले, नाव ठेवले ‘शिरा’

 

उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची,

त्याच्यासाठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची?

 

उसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रूप ना रंग,

सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग

 

बर्‍याच मुली पाहिल्या, कोणी त्याला पसंत करीना,

काळजी वाटे उसाला

रात्री झोप येईना

 

उसाला मित्र एक होता, नाव त्याचे तूप

त्याने प्रयत्न केले खूप,

अन् उसाला आला हुरूप

 

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,

जी दिसायला होती बेताची

 

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,

होते उसाच्या तोलामोलाचे,

ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे

 

अंगाने ती होती लठ्ठ नि जाडजूड,

रूपाला साजेसे, नांंव होते तिचे ‘भरड’

 

गव्हाला मुलीच्या रूपाची होती कल्पना,

तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

 

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,

लग्न जमले अन् सारे तयारीला लागले

 

किचन ओटा झाला,

लग्नासाठी बुक,

स्वयंपाकघर पण सजविले खूप

 

‘भरड’ला तूप कढईत घेऊन गेले,

तेथेच तिचे खरपूस मेकअप पण केले

 

भरपूर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,

गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’

 

लग्नाची तयारी पहायला आलेले दूधसुद्धा कढईत शिरले,

अन् हळूच त्याने गुळाला कढईत पाचारीले

 

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश

 

मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला,

‘भरडी’ चे रुप पाहून, वेळ नाही लागला पाघळायला

 

काजू बदाम किसमिसच्या पडल्या अक्षता,

कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता

 

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,

थाटामाटात बारसे झाले,

नाव ठेवले ‘लापशी’

 

आवडली ना

   शिरा आणि लापशी?

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना  (?)

त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते.आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर  साखर,चार लसूण पाकळ्या,दोन मिरच्या,दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे,भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.

सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.

त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे  मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हंटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे,कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.

अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत. 

पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा  आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक  स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या  घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.

माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही.पण मला लुप्त होत असलेले  शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सोनाराने टोचले कान… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ सोनाराने टोचले कान… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

मनुष्याच्या जन्मापासून तर म्रुत्युपर्यंत त्याच्यावर एकूण सोळा धार्मिक संस्कार केले जातात. त्यामधील पहिला संस्कार म्हणजे कान टोचणे. काही अपवाद वगळता अजूनही कान टोचण्यासाठी सोनाराचीच गरज पडते. आयुष्यात मी कितीतरी वेळा कान टोचले असतील. परंतु प्रत्येक वेळी कान टोचताना ते एक आव्हानच वाटते.

बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी कान टोचावे असा प्रघात आहे. बहुतेक घरांमधून तो अजूनही पाळला जातो. काही अपवादात्मक परीस्थितीत बाराव्या दिवशी जर जमले नाही, तर मग साधारण पहिल्या सव्वा महिन्यात कान टोचले जातात. अगदी लहान असतानाच कान का टोचायचे?तर त्या वेळी कानाच्या पाळ्या ह्या खुपच पातळ असतात. म्हणजे बाळाला कान टोचताना त्रास होत नाही.. आणि सोनारालाहि त्रास होत नाही. अजूनही काही घरांमध्ये पंचांगात मुहूर्त पाहून कान टोचण्यासाठी बोलावले जाते.

सोन्याची अतिशय बारीक तार घेऊन त्याचे सुंकले बनवतात. मात्र काही ठिकाणी बाळ्या हा शब्द वापरतात. साधारण अर्धा ग्रामची जोडी असे याचे वजन असते. काही जण यातही शुद्ध सोने वापरतात.त्यापेक्षा २२कैरेट सोने वापरले तर ते अधिक उत्तम. कारण त्याला थोडा कडकपणा असतो. त्याने कान अधिक सुलभतेने टोचले जातात.

या कान टोचण्याच्या विधीमध्ये खोबर्याची वाटी खूप महत्वपूर्ण भुमिका बजावते. सुंकल्याला टोक व्यवस्थित झाले आहे, हे केव्हा कळते.. तर ते खोबर्याच्या वाटीला टोचल्यावर.खोबर्याच्या वाटीला सुंकले व्यवस्थित टोचले गेले.. याचा अर्थ त्याचे टोक एकदम बरोबर झाले आहे. कारण जर टोकच व्यवस्थित नसेल तर कान नीट टोचले जाणारच नाही. हे पहिले कारण.

दुसरे कारण म्हणजे..सुंकल्याला जे खोबर्याचे तेल लागते ते कान टोचताना ग्रिसिंगचे काम करते. कोणत्याही इतर तेलापेक्षा हे तेल अधिक शुद्ध असते.

डावी तर्जनी कानाच्या पाळीखाली हातात धरून एकाच दाबात कान टोचणे आणि कान टोचताना थेंबभरहि रक्त न येणे हे कौशल्याचे काम असते. क्षणभर बाळ रडते आणि मग शांत होते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्या सुंकल्याची व्यवस्थित गाठ मारणे. ही गाठ मारताना बाळाने जर जास्त हालचाल केली तर तेथून थोडे रक्त येऊ शकते, पण हे क्वचितच.

कान टोचून झाल्यावर बाळाच्या आईने खोबरे आणि मीठ एकत्र चावून, बाळाच्या कानाच्या पाळीला लावायचे असते. याचे दोन उद्देश. एक म्हणजे खोबर्यामुळे कानाची पाळी जरा नरम रहाते, आणि मीठ हे जंतुनाशक असल्याने तेथे जंतुसंसर्ग होण्याची भीती नसते. काहीजण विचारणा करतात की, तेथे कुंकू लावु का? पुर्वी ही प्रथा असावी. हळदीपासुन बनवलेले कुंकू कदाचित चांगला परिणाम देऊन जात असेल.. पण अलीकडे बाजारात उपलब्ध असलेल्या कुंकवात काही भेसळ असण्याची शक्यता असते. परीणामी ते न लावलेले योग्य.

कान टोचण्यासाठी जेव्हा सोनाराला घरी बोलावले जाते,तेव्हा त्याला मोठी अपुर्व वागणूक मिळते.एकदा एका घरी मी कान टोचण्यासाठी गेलो होतो. घरात एखादे मोठे मंगल कार्य असल्यासारखी गर्दी. हॉलमध्ये मध्यभागी समोरासमोर पाट टाकले होते. एका पाटावर मी बसलो. समोरच्या पाटावर एक वयस्क स्त्री बाळाला घेऊन बसली. कान टोचताना बाळाची आई शक्यतो तेथे उपस्थित रहात नाही. कारण तिला बाळाचे रडणे बघवत नाही. त्यामुळे बाळाची आजी, किंवा आत्या बाळाला घेऊन बसते. तर येथे कान टोचण्यासाठी बसल्यावर आजुबाजुला खूप गर्दी. लहान मुलं कुतुहलाने गोळा झाली होती. बर्याच जणांनी हा सोहळा पाहिलेला नसतो. मग त्याचे खूप प्रश्न.

“अहो, खूप दुखेल का?”

“रक्त तर नाही ना येणार?”

“किती दिवसात बरे होईल?”

प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.मी इतका अनुभवी.. पण त्या परीस्थितीत मलाही घाम फुटला. आजुबाजुला हवा येण्यास जागा नाही. बाळाला त्रास होईल म्हणून पंखा बंद. शेवटी सर्वांना जरा बाजूला व्हायला सांगितले तेव्हा कुठे हायसे वाटले. आणि मग व्यवस्थित कान टोचले गेले.

कान टोचण्यासाठी ठराविक रकमेचा आग्रह मी कधीच धरीत नाही. एक सन्मान समजून ते काम करतो. मग कधी खुपच आदरातिथ्य झाले तर मोठी दक्षिणा मिळते.. तर अकरा रूपयांवरही संभावना होते. पण त्याबद्दल माझी कधीच तक्रार नसते. 

कान टोचण्याबरोबर कधीतरी नाक टोचण्याचाही प्रसंग येतो. त्यावेळी मुलगी मोठी झालेली असते. अलीकडे बुगडी घालण्याची फैशनही परत मुळ धरु लागली आहे. कानाच्या वरच्या भागात टोचण्यासाठी महिला येतात.या भागात टोचण्यासाठी सुंकले जरा जाड करावे लागते. कारण कानाचा तेथील भाग खुपच निबर आणि जाड झालेला असतो.काही जणींना त्यामुळे खुपच वेदना होतात. काही काळ त्या सहन करायची तयारी असेल तर बुगडी घालण्यासाठी कान टोचावे.

अलीकडे बऱ्याच ऐतिहासिक सिरीयल टीव्हीवर चालू असतात. त्यामुळे बिगबाळी घालण्यासाठी कॉलेजची मुले तसेच पौरोहित्य करणारी मंडळी कान टोचण्यासाठी येतात.

अखेरीस काय तर.. कान टोचणे हा एक व्यवसाय म्हणून न बघता तो आपला सन्मान आहे असे मी समजतो.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णमध्य… — लेखिका : सुश्री माधुरी बापट ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णमध्य… — लेखिका : सुश्री माधुरी बापट ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका ‘पोस्ट’ला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही ‘पोस्ट’ लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतून भारताच्या एक दोन वाऱ्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज हृदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणाऱ्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसऱ्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्णमध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रविवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.

लेखिका : सुश्री माधुरी बापट

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

स्त्रियांना कधी कामं करताना पहाल, तर दिसेल की , त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठताना बसताना दिसतात. कारण कामं चहूदिशेला असतात.एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं, तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा, पण न दिसणारा वाटा,  हेच यश असतं. प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.

टाईम झोन अनुसार किंवा नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्त्व मुळात शांत आणि रिलॅक्सड प्रवृत्तीचं आहे. स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे, पण आजच्या जीवनशैलीमुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते. आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना काही देत राहते. स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बुडून राहते, स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून, त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते.

शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांची वादळं वर येतात. विश्रांतीची गरज आहे, स्वतःला वेळ द्यायचाय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय अशी ओरड आतून येते, खरंतर त्याकडे लक्ष देऊन त्या वेदना हील करणं सोडून ती कामात बर्न आऊट होत रहाते, थकते दमते आणि तक्रार करते. या तक्रारींमुळे इतर आणखी लांब जातात. तिला टाळतात. मग ती आणखी एकटी पडते.

टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे.  स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो, यशासाठी जितकी धावपळ,गडबड,पळापळ गरजेची असते,तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.

एक उपाय सुचवत आहे. अनेक घरात असेलही. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा प्रयोग करुन पहा. आपल्या घरातल्या सगळया स्त्रिया जिथे जास्त वेळ उभ्याने काम करतात, जिथे जास्त वेळ घालवतात, तिथे एक लहानसा स्टूल बसण्यासाठी ठेवा. पटकन बसता येईल, टेकता येईल असा एक स्टूल ओट्यापाशी हवाच. चहा, दूध गरम होईपर्यंत, भाजी चिरताना, निवडताना ओट्यापाशी पटकन विसावता येईल.

स्टूल फार मोठा जागा व्यापणारा, अडचणीचा नको, लहानसा, हलका !

कोणी म्हणेल आमच्या किचनमधे डायनिंग टेबल आहे, पण कामात ती खुर्ची पटकन घेतली जात नाही. बायका उभ्यानेच खातात, चहा पितात आणि तासनतास बसत नाहीत. मग पाठदुखी कंबरदुखी मागं लागते.

हे स्टूल प्रतीक म्हणून काम करेल, विश्रांतीची आठवण करुन देणारं प्रतीक!

‘बस जरा. कामं पळून जात नाहीत. दोन मिनिटं शांत बस. पाणी पी,’

हे सगळं बोलणारं कुणी असायची गरज नाही. हे स्टूल बोलेल.

या क्षणभर विश्रांतीनं थकवा 50% कमी होईल. सगळं संपल्यावर एकदम कोसळायला होणार नाही आणि मनालाही शांतता मिळेल. किचनमधला असा हा कृष्णसखा क्षणभर विश्रांती देऊन कशी मदत करतो, हे खरंतर सवयीनं अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा प्रयोग करुन!

लेखिका : श्रीमती कांचन दीक्षित

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares