मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

रात्रीच्या गडद अंधारात चोर त्या घराच्या आवारात शिरला.

एका खिडकीतून अल्लाद आत शिरण्यासाठी तो आवाज न करता त्या खिडकीवर चढला आणि अचानक काड्काड् आवाज करत ती खिडकी मोडली, चोर खाली पडला, त्याचा पाय मोडला. घरमालक जागा झाला. त्याने चोराला रक्षकांच्या ताब्यात दिलं.

दुसऱ्या दिवशी भलतंच आक्रीत झालं. ‘ त्या घरमालकाने तकलादू खिडकी बनवल्यामुळेच आपला पाय मोडला, त्याची त्याने नुकसान भरपाई द्यायला हवी,’ असा खटलाच चोराने दाखल केला होता.

खटल्याच्या दिवशी न्यायालयात अभूतपूर्व गर्दी उसळली होती.

घरमालक न्यायाधिशाला म्हणाला, “ महाराज, हा काय उफराटा प्रकार आहे? हा माणूस माझ्या घरात चोरी करायला शिरत होता. तो माझं केवढं नुकसान करणार होता. त्यात त्याच्या चुकीने माझ्या घराची खिडकी मोडली आणि मीच नुकसान भरपाई द्यायची? “

न्यायाधिशाने चोराकडे पाहिलं. चोर म्हणाला, “ मी चोरी करणार होतो. केली नव्हती. यांचं नुकसान होणार होतं, झालेलं नाही. माझं नुकसान मात्र झालेलं आहे आणि ते यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. कधीतरी खिडकीवर कोणी, भले चोर का होईना, चढू शकतो, याचा विचार करून मजबूत खिडकी बांधणं हे याचं काम नव्हतं का? “

न्यायाधीश म्हणाले, “ याचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे.? “

घरमालक म्हणाला, “ महाराज, मी हे घर बांधताना बांधकाम कंत्राटदाराला पूर्ण पैसे दिले होते. त्याने तकलादू बांधकाम केलं असेल, तर माझा काय दोष? “

कंत्राटदाराला न्यायालयात हजर केलं गेलं.

तो म्हणाला, “ मी पूर्ण पैसे घेतले. चांगला माल आणला. चांगले कारागीर आणले. त्यांना चांगले पैसे दिले. आता ही खिडकी बांधणाऱ्या कारागिराने तरीही चूक केली असेल, तर माझा काय दोष?”

कारागीराला न्यायालयात हजर केलं गेलं. 

तो म्हणाला, “ मी भिंत नीटच बांधली होती. त्यातली चौकट बसवताना सुताराने गडबड केलेली असणार. त्यात माझा काय दोष?”

सुतार न्यायालयात हजर झाला.

तो म्हणाला, “ महाराज, माझ्या हातून गडबड झालीये यात शंका नाही. पण, त्यात माझा दोष नाही. मी ही खिडकी बसवत असताना अगदी मोक्याच्या वेळेला एक रूपसुंदर स्त्री समोरून गेली. तिच्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. तिने इंद्रधनुषी रंगाची ओढणी घेतली होती, हे मला अजूनही आठवतं. आता सांगा यात माझा काय दोष?”

त्या स्त्रीला बोलावलं गेलं. 

ती म्हणाली, “ मी त्या दिवशी तिथून गेले, हे खरंच आहे महाराज. पण, माझ्याकडे नीट पाहा. मी किती सामान्य रंगरूपाची स्त्री आहे. माझ्यासारख्या स्त्रीकडे कोणी रस्त्यात वळूनही पाहणार नाही. या सुताराचं माझ्याकडे लक्ष गेलं ते माझ्या इंद्रधनुषी दुपट्ट्यामुळे.” तिने तो झळझळीत दुपट्टा काढला आणि सगळं न्यायसभागार मंत्रमुग्ध झालं. खरंच तो दुपट्टा नजरबंदी करणारा होता. ती स्त्री म्हणाली, “ या दुपट्ट्याला हा रंग लावणारा रंगरेझच खरा दोषी आहे.”

“बोलवा त्याला,” न्यायाधिशांनी हुकूम दिला.

ती स्त्री लाजून म्हणाली, “ बोलवायचं कशाला? माझा पतीच आहे तो आणि या न्यायालयातच हजर आहे.” 

तिने पाय मोडलेल्या चोराकडे बोट दाखवलं आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला.

लेखक – ओशो

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो!

आजच्या लेखाचा विषय भूतकाळातील मंतरलेल्या मोरपिशी दिवसांच्या रम्य आठवणींत गुंतवून टाकणारा! आठवतेय, उन्हाळी सुट्टीच्या एक एक क्षणाचा आनंद लुटून झाला. कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळ, गप्पा टप्पा, तर कधी मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीत सफर, झालंच तर एखाद्या रम्य ठिकाणी घालवलेले आनंददायी दिवस, अगदीच कांही नसेल तर भावंडांबरोबर घरीच राहून केलेली मजा अन लुटीपुटीची भांडणे! एक ना दोन! एक मात्र खरे, यांत ‘अभ्यास’ नामक गनिमाला अजिबात एन्ट्री नव्हती. हेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुखसागरात मनसोक्त पोहण्याचे गमक आणि ‘गमभन’ होते.

बदलत्या काळानुसार या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचे तंत्र थोडे वेगळे झाले. अभ्यासक्रमानुसार (स्टेट, सी बी एस इ अथवा आय सी एस इ इत्यादी) सुट्यांचे वेळापत्रक अन शाळा सुरु होण्याची तारीख थोडीफार वेगळी झाली. मात्र त्यातला आत्मा अबाधितच राहिला आहे हे महत्वाचे! इयत्तेनुसार या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याचे मुलांचे अन पालकांचे वेगळे गणित असते. नर्सरी अन के जी वगैरेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांचे बहुदा रडणे जास्त कॉमन, शाळेत जातांना गोड हसत आईला निरोप देणारे गोजिरवाणे बाळ फक्त टी व्ही वर असते असे मला वाटते. आईच्या पदराला (किंवा ओढणीला) गच्च पकडत ‘मी नाही जात’ असा घोष करीत मूल शाळेच्या ‘मावशीबरोबर’ एकदाचे आत जाते. अशा वेळेस आत्तापर्यंत मुश्किलीने रोखलेले अश्रू माऊलीच्या डोळ्यातून घळ घळ वाहायला लागतात.

कांही शाळांत (फक्त) ‘पहिल्या दिवशी’ गेट पासून तर वर्गापर्यंत मुख्याध्यापिकेपासून तर शिक्षक अन शिक्षिका दुतर्फा गुलाबाची फुले घेऊन मुलांचे स्वागत करायला अटेन्शन मध्ये उभे असतात. त्यांचे चित्रीकरण बऱ्याचदा आपण बघतो. मला हे बघून पोलिसांच्या ‘सौजन्य सप्ताहाची’ आठवण येते. यातला छुपा अजेंडा जाणती अन हुशार मुले लगेच ओळखतात. गुलाबाचे काटे उद्यापासून कसे अन केव्हां बोचकारणार याचा ते अंदाज घेत असतात. (शारीरिक इजा नाही बरे का, आता नियमावली नुसार ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे सर्व कालातीत विचार समजावेत!)

 मुले शाळेत पहिल्या दिवशी जायला बहुदा इतकी उदासीन का असतात? घरी मुक्तपणे खेळणे, बागडणे, खाणे पिणे अन झोपेच्या वेळा इच्छेनुसार ठरवणे, झालेच तर मोबाईल, टीव्ही, मॉल, चित्रपट बघणे असे विस्कळीत अन बहुदा अनियोजित टाइमटेबल, या सर्वांची सवय मुलांना जर सुट्टीत सवय लागली तर शाळेकरता अचानक घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागणारच. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून आईचा उठ रे बाळा/ उठ ग राणी असा (सुरुवातीला) मधाळ तगादा सुरु होतो. अन मग त्यापुढे सर्व रुटीन! ‘काय कटकट आहे!’ हा ऍटिट्यूड घेऊन शाळेच्या प्रथम दिवसाचे स्वागत कां होते मुलांकडून? हा विचार मला नेहमी व्यथित करतो. या उलट शाळेच्या प्रथम दिनाची मोजकी मुले वाट पाहत असतात. वरच्या इयत्तेत गेल्याचा अपरिमित आनंद असतो, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले असल्यास हा आनंद अभिमानाने उजळून निघालेला असतो. सक्काळी सक्काळी लवकर शाळेचा नवा कोरा युनिफॉर्म (वयाबरोबर उंची वाढल्याने नवा युनिफॉर्म अत्यावश्यक असतोच), वर्षभर वापरून झालेले जोडे, दप्तर, कंपास, वॉटर बॅग इत्यादी नव्या दिवसाचे स्वागत करायला कसे चालतील? तेही नवे कोरेच हवेत! मंडळी या नव्या आयटम्सच्या गर्दीत कव्हर घातलेली नवथर सुगंधाने रसरसलेली नवीन वर्षाची पुस्तके यांच्याहून अधिक रोमांचक काय असू शकते बरे?

जर इयत्ता बदलली तर यासोबत अनोळखी वर्गमित्र, वर्गशिक्षिका, नवीन वर्ग आणि नवीन बसायची जागा! मुले हे सगळे हळू हळू अनुभवायला लागतात अन मग त्यातील ‘गंमत जंमत’ मजेने स्वीकारायला लागतात. सर्वात मुख्य म्हणजे शाळेचा पहिला दिवस सगळीकडे ‘ओरिएंटेशन’ (अभिमुखता) चा असतो. त्या दिवशी फक्त सर्व नवीन गोष्टींची पहिली ओळख करून देणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य असते.

शाळेतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मधल्या सुट्टीतील डब्बा’! प्रत्येक मुलाच्या डब्यात कांहीतरी वेगळे असते, मला वाटते मुलांच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला तर ‘भाजी पोळी’ ला पर्याय नाही. रोज वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय लागते. या बाबतीत एक आठवले, आमच्या लहानपणी डब्यात रोज सुक्की बटाटा भाजी असायची. इतर भाज्यांच्या आवडीबद्दल आम्हा भावंडांचे कधीच एकमत व्हायचे नाही. कधी काचऱ्या, कधी खूप कांदे घालून, तर कधी फक्त मिरचीची फोडणी देऊन उकडलेल्या बटाट्यांची भाजी इतकीच व्हेरायटी असायची. मात्र आई याची भरपाई रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या खायला घालून करीत असे. गंमत अशी की बहुदा सर्वांच्या डब्ब्यात बटाटा असूनही प्रत्येक बट्टूची चव मात्र निराळी असे. आजकाल आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मुलांच्या डब्यात काय काय व्हरायटी असते हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. मात्र मुलांची शारीरिक आणि मानसिकरित्या जोमाने जोपासना करायची असेल तर आईने ‘मधल्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा’ याविषयी आहारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन ‘इष्ट भोजन’ रांधण्याची गरज नक्कीच आहे.

एक बदल निश्चितच जाणवतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते! आमच्या लहानपणी प्रायमरी शाळेत एकच शिक्षक किंवा शिक्षिका वर्षभर सर्व विषय शिकवत असत. त्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची समग्र माहिती असायची, एक सुंदर भावनिक नाते गुंफले जायचे. पुढील वर्षीच्या पहिल्या दिवशीच जर ते शिक्षक वर्गावर नसतील तर विद्यार्थ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. आता मात्र विषयानुसार तेच शिक्षक पुढील वर्षी भेटत राहतात. इमोशनल बॉण्डिंगचे प्रमाण कमी झालेले वाटत असले तरी, मायेचा ओलावा अजूनही निश्चितच टिकून आहे असे मला वाटते. एक सुचवावेसे वाटते. पालकांनी आपल्या मुलाचा/ मुलीचा मागील वर्षीचा धडधाकट असलेला गणवेश, पुस्तके आणि शाळेला लागणाऱ्या इतर वस्तू नुसत्याच फेकून न देता गरजू मुलांना द्याव्यात. यासाठी डोळस नजरेने बघितले तर, ही गरजवंत मुले आपल्या आसपासच आढळतील, अथवा अशा कामात हातभार लावणाऱ्या समाजसेवी संस्था देखील उपलब्ध आहेत. हे समाधान आगळे वेगळे असते.

मंडळी, हा शाळेचा पहिला दिवस अगदी नवसंजीवनी दिल्यासारखा पालकांनाच नव्हे तर, प्रत्येकाला सुखदायी वाटतो. जून महिना असला तरी वसंत ऋतू असल्याचा भास होतो. वेगवेगळ्या वयाच्या अन विविध रंगांच्या नव्या कोऱ्या गणवेशात, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा कंपास, नवी वॉटरबॅग अन डबे यांच्या जामानिम्याने नवथर उत्साहाने सळसळत बागडणारी गोड गोजिरी मुले शाळेच्या बस मध्ये, रिक्षात किंवा पायी जात असतात. मित्र मैत्रिणींसोबत त्यांची ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अवस्था होत असते. कधी तर जिवलग मैत्रिणीसोबत ‘गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत’ असे प्रायव्हेट संभाषण सुरु असते. मग त्यांचे आल्हाददायी बोलणं अन किंचाळत केलेला कल्ला देखील पक्षांच्या कलरवासारखंच मधुर वाटत असतं. जणू कालपावेतो उन्हाने कोमेजून गेलेल्या बागेत आज अवचित नवचैतन्य आलंय, वृक्षवेलींना नवीन पालवी फुटलीय अन रंगीबेरंगी फुलांचे उमलले आहेत, त्यांच्या सुगंधाने अख्खी बाग मोहरून गेलीय असे जाणवते. मैत्रांनो, चला तर मग बिगी बिगी! आपण देखील ‘मातीला सुगंध फुलांचा’ या परिपाठाप्रमाणे या नवोन्मेषात ‘शाळेचा पहिला दिवस’ साजरा करीत आपल्या बालपणात हरवून जाऊ या!

धन्यवाद!

डॉ. मीना श्रीवास्तव

मोबाईल- ९९२०१६७२११

टीप- एका समूहगीताची लिंक जोडत आहे.

 

‘आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा’ (स्वाध्याय)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अशीच श्यामल वेळ..सख्या रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अशीच श्यामल वेळ..सख्या रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.”.. तुमची काही हरकत नसेल तर इथे या बाकड्यावर थोडावेळ बसावं म्हणतो.!”..

..”. मगं बसा की!.. माझी कसली हरकत आली आहे.?. या बागेतला बाक तर सार्वजनिक आहे… कोणीपण बसू शकतो त्याला हवा तेवढा वेळ… मात्र बाक आधीच पूर्ण भरलेला असेल तर मग बसायला मिळायचं नाही बरं… आणि मी तर या बाकावर एकटीच बसलेली आहे.. तसा बाकीचा बाक मोकळाच आहे की!… “

.”..  एक विचारु,मी तुम्हांला रोज या वेळेला इथं असचं या बाकावरं एकटचं बसलेलं पाहत आलेलो आहे… त्यावेळी मी मागे तिकडे झाडाजवळ  उभा राहून संध्याकाळची शोभा पाहता पाहता या शोभेकडे कसे डोळे खिळले जातात तेच कळेनासं होतं… अगदी अंधार पडू लागला की तुम्ही उठून जाईपर्यंत हि नजर मागे पर्यंत वळत जाते… “

.”.. माझा काय पाठलाग करत असता कीञ काय या वयात देखील?… शोभतं का तुम्हाला असलं वागणं.?.. आणि माझं नावं शोभा आहे हे कसं शोधून काढलतं तुम्ही?… हेरगिरी वगेरे नोकरीपेशा तर करत नव्हता ना रिटायर्ड होण्याआधी… “

.”.. वा तुम्ही सुद्धा कमी हुशार नाहीत बरं.!.. मी पूर्वी काय करत होतो हे बरोबर ओळखलतं… बायका मुळीच जात्या हुशार असतात हे काही खोटं नाही.!.. “

..”. तुम्हाला ही  बाग फार आवडते असं दिसतयं… नेहमी संध्याकाळी इथं जेव्हा येता तेव्हा माझी आणि तुमची येण्याची वेळ कशी अगदी ठरवल्याप्रमाणे  जुळते… “

.”.. मला देखील ते लक्षात आलयं बरं.!. पण मी काही ते चेहऱ्यावर माझ्या दाखवून दिलं नाही!… उगाच परक्या माणसाला गैरसमज व्हायचा… आणि आणि… “

…” आणि आणि काय.?.. “

“.. न.. नको.. नाहीच ते!.. काय बोलून दाखवयाचं ते!…तुम्हाला म्हणून  सांगते या बागेशी माझं नातं खूप खूप जुनं आहे… ही  संबंध बाग माझ्या ओळखीची आहे… इथं खाली तळ्याजवळ गणपतीचं सुंदर मंदिर आहे… संध्याकाळच्या वेळी आरतीला वाजणारी किण किण झांज तो घंटानाद ऐकू येतो तेव्हा आपलं मन तल्लीन होऊन जातं… अगदी स्वतःला विसरून जायला होतं… . पण सात वाजले कि बागेचा रखवालदार कर्कश शिट्या मारून सगळ्यांना बाहेर जायला भाग पडतो… आणि तसं घरी आईनं पण ताकीद केलेली असायची कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी सात च्या आत घरात आलचं पाहिजे म्हणून… मग त्या भीतीनं पावलं झपझप टाकत घरी जाणं व्हायचं… जी लग्नाच्या आधी शिस्त तिनं लावली ती लग्नानंतरही तशीच पाळली गेली… तेव्हा आई होती आता सासूबाई आहेत.. एव्हढाच फरक… “

“… बस्स एव्हढाच फरक.!. आणखी काही फरक पडलाच नाही!

… त्यावेळी कुणाची तरी वाट पाहणे होत असेलच की.. मग कधीतरी नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला असणारं की.. आईची बोलणी खावी लागली असतील… चवथीच्या चंद्राची कोर खिडकीतून डोकावून बघत असताना… आईला संशय आला असेल…  मग घरच्यांना त्या चंद्राचा शोध लागला… आणि ही चंद्राची शोभेची पाठवणी केली असचं ना! “

… ” माझ्या देखील अशाच आठवणी आहेत… आणि इथं आल्यावर त्या एकेक उलगडत जातात…”

… ” काय सांगतायं अगदी सेम टू सेम… म्हणजे पाडगांवकर म्हणतात तसं प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.. अगदी तसचं की  हे…

बरं झालं बाई तुमची या निमित्ताने ओळख  झाली…अंधार पडायला लागला..आणि तो रखवालदार दुष्ट शिट्या मारतोय.. बाहेर निघा म्हणून… मग मी येऊ चंद्रशेखर… “

..” शोभा काय हे.. किती छान रंगला होता खेळ.. कशाला मधेच घाई केलीस खेळ थांबविण्याची.. .  तुझं नेहमीच असं असतं जरा म्हणून कल्पेनेत वावरायचं नाही.. सदानकदा वास्तवात राहणारी तू… “

” पूरे चंद्र शेखर.. घरी सुना नातवंड आहेत आपल्या.. त्यांना विसरून कसं चालेल… आपला आजचा खेळ परत उद्या यावेळेला पुढे सुरू करुया… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तुझ्या वासाने, आणि तुझ्या रंगकांतीने मी इकडे आलो, ओढावलो गेलो,  तुझ्या त्या मनमोहक रूपानी माझ्या मनास भुरळ घातली .  काय तुझा तो सुवास, तुझा तो रंग आणि परिमळ …. विधात्याने नक्कीच खुबीने तुला निर्माण केले असेल बरं ! तुझ्या ह्या मुलायम अंगकांतीने म्हण की , विलोभनीय रंगाने म्हण, मी पुरता तुझ्या प्रांगणात शिरलो .. . मी आत कसा घुसलो ते कळलंच नाही ..  केवढी ही जादू .. जी तुझ्या फक्त दिसण्यात आहे, रूपात आहे.. . तर मग मी अंतरंगात शिरलो तर काय होईल हे कळणारच नाही !

सुगंधाने एवढं मोहित होता येतं का रे  ? ते भ्रमरांना विचारावे लागेल , त्यांची पण माझ्यासारखीच गत होणार. 

मनुष्य काय किंवा भृंग काय, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, आकृष्ट होण्याची ओढ ही जन्मजातच ! बहुतेक आपण आकर्षित व्हावे म्हणूनच विधात्याचा हा खटाटोप नाही का ? भ्रमराने तरी कोणत्या फुलावर यावे, बसावे !  चुंबन घ्यावे !  हे त्याच्या प्राक्तनातच लिहिले असेल का ? कोणत्या फुलावर बसावे, त्याचा  कोणता रंग असावा, ते कोणत्या जातीचे असावे,  सुगन्ध कोणता असावा  ह्याला बन्धन तर नाही ना ! कोणतेही फूल भ्रमरास प्रिय आहे, त्याला कश्याचेच बंधन नाही , जातिपात तो मानत नाही…  क्षुद्र, श्रेष्ठ , उच्च कनिष्ठ, असा भेदभाव तरी त्याच्या मनात येत असेल का ?  मग मी तर साधा मानव प्राणी , सुगंधाने मला भुरळ पडणारच.  मन हे असंच रसायन आहे, असं नाही का वाटतं ?  जिथे निसर्ग आहे तिथे ते ओढ  घेतच. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला वय आड येतं का ? नाही ना ? मग मी तर साधा जीव …. 

कठीण लाकूड  पोखरणारा  भृंग मृदु, नाजूक अश्या कमलदलात .. त्याच्या पाशात अडकून पडतो. कमलदलं केव्हा मिटतात व तो केव्हा मृत होतो, ते त्याला ही कळत नाही …. असा का बरं हा निसर्ग 

नियम ! असे म्हणतात की फुलपाखरांचं मिलन झाल्यावर नर मरून जातो !  मादी तेवढीच जिवंत राहते. .. का ?  तर पुढील पिढी वाढविण्यासाठी. मग नर फुलपाखरांच्या नशिबी मरणच  का? कोणता निसर्ग नियम विधात्याने लावला?  त्यासाठीच का नराचा जन्म आहे , नेहमीच शमा-परवानाचे नियम का बरं असावे, हे माहीत असून देखील  नर हे कसं काय धाडस करतो? तर केवळ आंतरिक ओढ, माया जिव्हाळा,  प्रेम ! 

प्रेम हे असंच असतं का हो ? का मग दरीत उडी टाकायची …. षड्रिपु  हे निसर्गतःच सगळीकडे वास करतात का ?  अगदी फुलांच्या-पानांच्या -वेलीच्या -सौंदर्याच्या -सुगंधाच्या  ठाई !  पण त्यांचे अस्तित्व  आहे का ?  की विधात्याने विश्वमोहिनीचे रूप चराचर निसर्गात भरून ठेवलं आहे ? काळ्या कपारीतून थंडगार गोड पाण्याचा स्रोत, कुंडातून सतत ओसंडून वाहणारे थंड गार जलप्रवाह ! काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड. भूगर्भात असणारा तप्त लाव्हारस ….  काय काय बघायचे हे ! आकाश व सागर निळेच का !  सागराचे पाणी खारट का ?  सागराला जर तहान लागली तर त्यानी कुठं जायचं ? सरितेला सागराची ओढ का ?  अश्या अनेक गूढ प्रश्नांनी मन सैरभैर होते.

देवा तू आमच्यासाठी काय काय निर्माण केलेस व हे मोहिनी-तंत्र कशासाठी वापरलेस? वर धर्म अर्थ काम करून मोक्ष मिळवण्यासाठी का भाग पाडलेस ? मोक्ष आहे की नाही मला माहित नाही  पण ….  

पुनरपि जननं पुनरपी मरणं 

पुनरपि जननी जठरे शयनं ।। 

… हाच सिद्धांत मला भावतो कारण तुझं निसर्गरूप मला सतत पहावे वाटते. म्हणूनच ययातीही  पण स्वतःच्या मुलाकडून तरुणपण मिळवण्यासाठी मोहाच्या आहारी गेलाच ना ! 

हे सखी ..  दे दे मला ..  आज सर्व काही हवं आहे, जे जे असेल ते ते दे ! उधळण कर तुझ्या मृदु मुलायम  हाताने तुझ्या नक्षत्रांची, तुझ्या सुगंधाने मी बेधुंद झालो.  तुझ्या दरबारात कसलीच कमतरता नाही ,  तुझी पखरण अशीच चालू ठेव.  मला आज मनमुराद अमृत लुटवायचं आहे, कोठेही कमतरता नको. आस्वाद घेवू दे मला …तुझ्या पवित्र नक्षत्रांचा , मुलायम पाकळ्यांचा वेडापिसा होवून मला भ्रमर होवू दे,  मग मी जन्मभर तुझ्या सानिध्यात मृत झालो तरी चालेल ! कर खुली तुझी कवाडे ! सुगंधाची किंमत एवढी तरी किमान द्यावीच लागेल ना ! जन्मभर तुझ्या महिरपी मेघडंबरित विसावा घेण्याची तयारी आहे माझी . 

मला तुझे एकतर्फी प्रेम नको, बलात्कार पण नको, मला तुझे सौंदर्य विद्रूप पण करावयाचे नाही. 

तुझ्यातील  प्रेमभावनेचं शिंपण कर. तू जशी असशील तशी तू मला प्रिय आहेस, तुझ्या सुगंधानी

माती पण भिजेल. ओला होईल गंधित वारा.  हाच तर खरा निसर्ग नियम आहे .

विचार ..  खुशाल विचार त्या सर्व लतावेलींना , फुलांना, पानांना, त्याच्या सुगंधाना,  त्या पारिजातकाला विचार , आम्रकुसुमांना विचार, गुलाबाला विचार,  गुलबकावलीला विचार ! निसर्गत: जे अव्याहत चालत आले आहे, त्या कालपुरुषाला विचार, त्या चंद्र सूर्य तारे ग्रह यांना विचार ..  निसर्ग नियम ते कधी विसरले आहेत का ?  मग मी तरी का विसरु ! 

असेच विचार त्या ययातीच्या मनात आले असतील का ?  क्षणभंगुर वासनेचा विरक्त सोहळा, हाच मनुष्याला प्रिय आहे का ?  हे निसर्गदेवते हेच तुला पण अपेक्षित आहे का ? ह्यालाच जीवन म्हणतात का ?  

ययाती व्हायचं की संन्यासी, की ऋषी मुनी,  की मानव धर्माचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. 

होय फुला हेच इंगित आहे का जीवनाचं ? तुझ्या परिमळ एवढी  प्रचंड उलथापालथ करतो, तुझ्या मनमोहक रूपाने तो भ्रमर असो वा फुलपाखरू .. त्या दोघांचंही रुपडं तुला भावतं का रे ?  

… हे ज्या त्या विविधरंगी फुलांनीच ठरवावं . मानवाला ह्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ?  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ’गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भयाण वाळवंटात नजर जाईल तिथवर फक्त क्षितिजाला स्पर्श करणारी तापली वाळूच दिसत होती. आणि याच वाळूत तो मागील सोळा तासांपासून पालथा पडून आहे. त्याचे डोळे मात्र त्याच्या रायफलच्या नळीवरल्या दुर्बिणीमधून सतत समोर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताहेत. पापणी लवण्याच्या दरम्यानचा काळही त्याला नकोसा आहे. त्याच्या समोर शंभरेक मीटर्स अंतरावर एक पडकी भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे काय याचा त्याला अंदाज नसला तरी भिंतीच्या शेजारी आडोशाला आपल्या सारखीच रायफल,आपल्यासारखीच दुर्बिण डोळ्यांना लावून कुणीतरी आपल्याकडेच पहात आहे गेल्या सोळा तासांपासून याची त्याला स्पष्ट जाणिव आहे. या सोळा तासांच्या मध्ये एक संपूर्ण रात्रही संपून गेली आहे. पण याला जराही हालचाल करण्याची परवानगी नाही…कारण जराशी हालचाल म्हणजे शरीराची हालचाल कायमची संपून जाण्याची नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव दशांश टक्के खात्री…बाकी एक दशांश म्हणजे नशीब! 

या गेल्या सोळा तासांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याचेच साथीदार असेच दूर कुठेतरी त्यांच्या त्यांच्या निशाण्यांकडे अक्षरश: डोळे लावून बसलेले असतीलही कदाचित. पण युद्धाच्या धुमश्चक्रीत इतकी चौकशी करीत बसायला वेळ आणि गरजही नव्हती म्हणा! याला एक लक्ष्य दिलं गेलं होतं…ते भेदायचं आणि पुन्हा शांतपणेच नव्हे तर अगदी पाषाणासारखं पडून रहायचं होतं..दुसरं लक्ष्य दिलं जाईल तोवर. 

भिंतीपाशी कुठलीही हालचाल नव्हती गेल्या सोळा तासांपासून. आणि हे तास आता वाढतच चालले होते बेटे! तसं त्याला प्रशिक्षण आणि सराव होता कित्येक तास खरं तर दिवस एकाच जागी लपून बसायचा..त्याला छद्मावरण म्हणतात. म्हणजे जिथे आपण आहोत तिथल्या जमिनीशी,मातीशी,झाडांशी पूर्णपणे एकरूप होऊन जायचं. झाडं तरी हलू डुलू शकतात….पण यांच्याबाबतीत हालचाल म्हणजे मृत्यूला मिठी…स्वत: होऊन मारलेली मिठी! 

असेच आणखी चार तास निघून गेले. कोण कशाला इतका वेळ लपून बसेल आपल्यावर गोळी डागायला? आणि तिकडून गोळी आलीच तर त्याचाच ठावठिकाणा नाही का लागणार आपल्या माणसांना? गोळी उडाली की ठिणगी उडतेच की…किमान धूर तरी दिसतोच दिसतो! शेवटी मनाचा खेळ! संयमाचा खेळ! जो हलला तो संपला या खेळात! आणखी साडेतीन तास गेले. एकूण साडेतेवीस तास उलटून गेलेत…हा खरा एलेव्हन्थ अवर सुरु आहे म्हणायचा. तो स्वत:शीच पुटपुटला आणि त्याने दुर्बिणीला लावलेले डोळे किंचित वर केले…त्याबरोबर त्याचे डोकेही अगदी एखाद्या इंचाने वर उचलले गेले…आणि…..थाड! एकच गोळी!…काम तमाम! 

हा आवाज ऐकून त्याच्या शेजारील वाळूतही हालचाली झाल्या….रायफली धडाडल्या…आता लपून राहण्यात काहीही हशील नव्हता! पण यावेळी समोरच्यांनी लढाई जिंकली होती…यांच्यापेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहण्यात अंतिम यश मिळवून ! 

समोरासमोरची हातघाईची लढाई करण्याचे दिवस बंदुकांच्या शोधाने संपवून टाकले. लपून बसून अचानक गोळीबार करण्याचेही दिवस असताना छद्मावरण धारण करून प्रतिस्पर्ध्याला बेसावध गाठून यमसदनी धाडण्याची कला विकसित झाली….स्नायपर्स! या शब्दाचं स्पेलिंग स्निपर असा उच्चार करायला भाग पाडतं काहीजणांना. खरं तर इंग्रजी भाषेत एका अगदी लहान,चपळ पक्षाला स्नाईप हे नाव आहे. याची शिकार करणं खूपच अवघड. जरा कुठं हालचाल झाली का हा पक्षी प्रचंड वेगाने उडून जातो. आणि याची शिकार करणारे मग स्नायपर या नावाने ओळखले जाऊ लागले. 

युद्धात प्रतिस्पर्ध्याची अशा प्रकारे लपून शिकार करणा-यांना मग स्नायपर हे नाव पडले…१८२०च्या सुमाराचे हे वर्ष असावे. या प्रकारात अत्यंत दूर असलेल्या एकांड्या शत्रूला,त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून राहून गोळीने अचूक उडवणे हे स्नायपर्सचे काम. आणि इकडे स्नायपर असेल तर तो त्या विरुद्ध बाजूलाही असणारच. अशा स्थितीत जो आपले अस्तित्व शत्रूला जाणवू देणार नाही त्याची सरशी होणार,हे निश्चित. नव्या युद्धतंत्रात स्नायपरच्या जोडीला आणखी एकजण असतो..एकाने पहायचे…लक्ष्य निश्चित करायचे आणि दुस-याने रायफलचा ट्रिगर दाबायचा! हे तंत्र खूपच परिणामकारक आहे. सीमो हेह्या नावाचा फिनीश स्नायपर दुस-या महायुद्धात रशिया विरोधात लढला…याने पाचशेपेक्षा अधिक सैनिकांना एका एका गोळीत संपवून टाकल्याचा इतिहास आहे. 

आसपासच्या वातावरणाशी मेळ असणारे किंवा तसा भास करून देणारे छदमावरण तयार करणे,तशी वस्त्रे अंगावर घालणे याला कॅमॉफ्लॉज असा शब्द आहे..camouflage! 

 यात झाडांच्या फांद्या,पाने,गवत आणि तत्सम गोष्टी अंगावर घातल्या जातात आणि अंग झाकले जाते. तोंडाला विविध प्रकारचे रंग फासले जातात…जेणेकरून शरीर सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन जावे. या प्रकारच्या वेशभूषेला “ गिली सूट (Ghillie Suit) “असे नाव आहे. गिली हे एका बहुदा काल्पनिक वन्य व्यक्तिरेखेचे नाव होते. तो अंगावर असेच गवत,पाने लेवून जंगलात फिरायचा…आणि त्याला लहान मुलांविषयी अत्यंत प्रेम असे. असो. 

तर भारतीय सैन्याने या कलेवर खूप आधीपासूनच पकड मिळवली आहे. कोणत्याही  वातावरणात,हवामानात आपले जवान एका जागी कित्येक तास आणि दिवसही स्थिर राहू शकतात. झाडांसारखे, दगडांसारखे निश्चल राहू शकतात आणि कित्येक मीटर्सवर असलेल्या दुश्मनाच्या मेंदूच्या चिंधड्या उडवू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी जसा परदेशात असे स्नायपर कार्यरत असतात, तसे आपल्याकडे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठीही स्नायपर्स असतात…फक्त ते सामान्य लोकांच्या नजरेस पडत नाहीत! 

स्नायपर म्हणून प्रशिक्षण घेणं खूप अवघड. यात शारीरिक,मानसिक कसोटी लागते. एकांतात इतका वेळ,एकाच स्थितीत पडून,लपून राहणे काही खायचे काम नाही. यात पुरुष सैनिक आजवर मक्तेदारी राखून होते. पण मागील दोनच महिन्यांपूर्वी या स्न्यापर्समध्ये एक महिला सामील झाली…तिने आठ आठवड्यांचे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रशिक्षण प्राप्त केले आणि आज ही महिला सैनिक स्नायपर्सना प्रशिक्षण देणारी एकमेव महिला सैनिक बनली आहे. या आहेत सीमा सुरक्षा दलात अर्थात बी.एस.एफ.(बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून सेवा करणाऱ्या सुमन कुमारी. त्यांच्या रायफलमधून ३२०० कि.मी.प्रति तास वेगाने लीलया गोळी सुटते आणि लक्ष्याचा अचूक वेध घेते…आणि गोळी चालवणारे हात जराही डळमळत नाहीत…गोळी कुठून आली हे कुणालाही समजत नाही. गिली सूट घालून या कुठे बसल्यातर अजिबात दिसून येत नाहीत…त्या स्वत: हलल्या तरच दिसतात! सुमनताईंचे वडील साधे इलेक्ट्रीशियन तर आई गृहिणी आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या सुमन कुमारी २०२१ मध्ये बी.एस.एफ.मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या आणि पंजाब मध्ये एका मोहिमेत एका तुकडीचे नेतृत्व करीत असताना त्यांना सीमेवरून अचूक गोळ्या डागणाऱ्या  शत्रूच्या स्नायपर्सच्या भेदक ताकदीचा अंदाज आणि अनुभव आला..आणि त्यांनी स्नायपर होण्याचा निश्चय केला. ५६ पुरुष सैनिकांच्या तुकडीत या एकट्या महिला होत्या. इंदोरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अ‍ॅन्ड टॅक्टीक्स मध्ये त्यांनी आठ आठवड्याच्या प्रशिक्षणात अव्वल स्थान मिळवत इन्स्ट्रक्टर म्हणून दर्जा हासिल केला! 

सुमन कुमारींचा अभिमान वाटावा सर्वांना. इंग्रजीत असलेली ही माहिती जमेल तशी लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवली..तुम्ही तुमच्या जवळच नका ठेवू. न जाणो आपल्यातल्या एखाद्या सुमनताईला स्फूर्ती मिळेल ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

(वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी  (भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा))

“शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले, मुख्यतः आशियाई; ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.” 

खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.

जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते, तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.

आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा, एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: “सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात, परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?”.

मी आजूबाजूला पाहिले, आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात, मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात. 

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत; 

गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. 

ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात…

प्रसारमाध्यमांच्या मते, चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके, व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके, भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी ७ पुस्तके वाचतात. 

केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष 40 पुस्तके आहेत; 

एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष 55 पुस्तके आहेत. 

2015 मध्ये, 44.6% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.

आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.

📚 – एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे). 

त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात. 

ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात, सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.

📚 – दुसरे म्हणजे, त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही. 

त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. 

लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.

📚 – तिसरे म्हणजे ‘परीक्षाभिमुख शिक्षण’, त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही. 

बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात, म्हणून ते परीक्षांसाठी असतात. 

जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे, पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.

इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत. 

इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. 

मुलांना समजायला लागल्यापासून, जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते: “पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत, जे पैसे, खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

हंगेरीमध्ये सुमारे 20,000 लायब्ररी आहेत आणि 500 लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; 

लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे. 

हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे, ज्यात दरवर्षी 5 दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात, देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त. 

ज्यू हे एकमेव लोक आहेत ज्यांना निरक्षर नाही; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. 

त्याच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.

जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते. 

पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.

ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे.  जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.

एक महान विद्वान एकदा म्हणाले: “एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे. किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील.”

लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ११ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ११ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा होतो.ते सर्वांना दिलासा देणारं असं एक अनोखं वळण होतं. आता अनिश्चिततेचा लवलेशही माझ्या मनात नव्हता. मला सोमवारी स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन व्हायचं होतं. त्या क्षणी यापेक्षा जास्त आनंददायी दुसरं कांही असूच शकत नव्हतं. त्या आनंदासोबत मनात होती एक प्रकारची आतूर उत्सुकता! पण..? ते सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार होतं याची मला कल्पना कुठं होती?)

रविवारी मी अंथरुणाला पाठ टेकली पण रात्रभर झोप लागलीच नाही. मनातला अंधार विरून गेला होता. मन हलकं होऊन स्वप्नरंजनात तरंगत होतं. त्यामुळे पुरेशी झोप झाली नसूनही रात्र क्षणार्धात सरुन गेल्यासारखं वाटलं.पहाट होताच मी उत्साहाने उठलो.लगबगीने सगळं आवरलं. बहिणीने दिलेला पोळी-भाजीचा डबा घेऊन मी बँकेत जाण्यासाठी तयार झालो. देवाला आणि घरी सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो.

बसमधून उतरताच चटके देणाऱ्या उन्हात झपाझप चालत स्टेट बँकेच्या वरळी ब्रॅंचसमोर येऊन क्षणभर थबकलो. वरळी ब्रॅंचची समोरची ही प्रशस्त इमारत हेच आता मला उत्कर्षाकडे नेणारं माझं भविष्य होतं जे माझ्या स्वागतासाठी जणू सज्ज होतं! स्वप्नवत वाटाव्या अशा त्या क्षणी मी भारावून गेलो होतो.त्याच मनोवस्थेत ब्रॅंचचं काचेचं जाड प्रवेशद्वार अलगद ढकलून मी आत पहिलं पाऊल टाकलं. रणरणत्या उन्हातून आत आलेल्या माझं ए.सी.च्या गारव्याने प्रसन्न स्वागत केलं होतं! जणूकांही त्याक्षणी मला जे हवं ते हवं त्यावेळी प्रथमच मिळत होतं!

मी रिसेप्शन काऊंटरकडे गेलो.

“येस प्लीज..?” रिसेप्शनिस्टने माझं हसतमुखाने स्वागत केलं. तिला विश करून मी माझं ‘जॉईनिंग लेटर’ तिच्याकडे सुपूर्द केलं. तिने त्या पत्रावरून नजर फिरवली.माझं नाव वाचताच ती थोडी गंभीर झालीय असा मला भास झाला. मी तो विचार क्षणार्धात झटकून टाकला. ती काही बोलेल म्हणून वाट पहात उभा राहिलो. क्षणभर विचार करून तिने मला बसायला सांगितलं आणि ती इंटरकाॅम वरून कुणाशीतरी बोलू लागली.

‘असू दे. इट इज अ पार्ट ऑफ हर जॉब ‘.. माझ्या मनानं तिच्या शब्दात माझी समजूत घातली. मी तिचं बोलणं संपायची वाट पहात राहिलो.

एक एक क्षण मला आता युगायुगासारखा वाटू लागला.

रिसिव्हर खाली ठेवून लगेचच तिनं मला बोलावलं.ती काहीशी गंभीर झाली होती.

“मि.लिमये…आय अॅम साॅरी.. पण… तुम्हाला जॉईन करून घेता येणार नाहीये…”

“कां..?”

“युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट…”

ऐकून मला धक्काच बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा मला भास झाला. खुर्चीचा आधार घेत मी स्वतःला सावरलं. माझ्या हातातून खूप मौल्यवान असं कांहीतरी निसटून जात होतं आणि ते प्राणपणाने घट्ट धरून ठेवण्यासाठी मीच धडपड करायला हवी होती.

“क..काय?कसं शक्य आहे हे? मी..मी..ब्रॅंच मॅनेजरना भेटू..? प्लीज…?”

“ही इज आॅल्सो हेल्पलेस.जस्ट नाऊ आय टाॅक्ड वीथ हिम ओन्ली.यू मे कॉल ऑन अवर मेडिकल आॅफिसर, डाॅ.आनंद लिमये.ही इज द राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन…”

मी नाईलाजाने मनाविरुद्ध जड पावलांनी पाठ फिरवली. सोबतचा बहिणीने निघताना दिलेला पोळीभाजीचा डबा मला आता खूप जड वाटू लागला. नि:शक्त झाल्यासारखी हातापायातली शक्तीच निघून गेली जशीकांही.

मी मघाच्या त्याच काचेच्या जाड दारापाशी येऊन थबकलो. काही वेळापूर्वी अतिशय उत्साहाने हेच दार ढकलून मी आत आलो होतो तेव्हा ए.सी.च्या थंडाव्याने केलेलं माझं स्वागत ही एक हूलच होती तर. आता तेच दार ढकलून मी पुन्हा बाहेरच्या रणरणत्या उन्हात पाऊल टाकलं तेव्हा बाहेरच्या उन्हाचे चटके अधिकच तीव्र झालेले होते!

‘कां?’आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्या क्षणी तरी उत्तर नव्हतंच.’आता पुढं काय?’

हा प्रश्न अनुत्तरीत होऊन मनातच लटकत राहिला. त्याही परिस्थितीत मी स्वतःला कसंबसं सावरलं.आता ‘डॉ.आनंद लिमये’ हाच एकमेव आशेचा किरण होता. त्यांचं सौम्य,हसतमुख, तरुण व्यक्तिमत्त्व नजरेसमोर आलं आणि त्यांचा खूप आधार वाटू लागला….!

माझी पावलं नकळत त्यांच्या क्लिनिकच्या दिशेने चालू लागली. मी अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला गेलो होतो आणि आता काडीच्या आधारासाठी धडपडत होतो! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा खिसा चाचपला.पण….?पण.. तो फोटो नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता. सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्याही नकळत मी तो घरीच विसरलो होतो! त्या अस्वस्थतेतही माझी पावलं मात्र न चुकता ‘डॉ.आनंद लिमये’ यांच्या क्लिनिक समोर येऊन थांबली होती…!

माझं भवितव्य आता सर्वस्वी फक्त त्यांच्याच हातात होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे आम्ही सर्वजण एका  वृद्धाश्रमाला भेट द्यायला निघालो होतो. संचालकांनी  “एकदा येऊन बघून जा” असे सांगितले होते . आमचे अध्यक्ष श्री जोशी यांची बायको आणि मी जाताना  जवळ बसलो होतो. त्या जरा वेळाने मला म्हणाल्या ,

“अग माझी नणंद यांची सख्खी बहिण तेथे आहे. आज  आठ महिन्यांनी आमची भेट होईल.”

” ती तिथे असते” ?

मला आश्चर्यच वाटले .

” हो..अग तिचा मुलगा अमेरिकेत.. तो एकुलता एक.. आईची इथं सोय करून गेला आहे. गेली आठ वर्ष ती तिथेच आहे. पहिल्यांदा आम्ही सारखे  जात होतो तिला भेटायला. पण आता आमची आमची ही वयं झाली ….प्रेम आहे ग… पण ….”

यावर काय बोलणार? सत्यच होते ते…

“तुमच्या घरी त्या येत होत्या का?”

” त्या लोकांनी सांगितलं ..घरी जास्ती नेऊ नका .कारण नंतर मग त्यांना इथे करमत नाही. “

“त्यांना  ईतरांच्या अनुभवाने ते जाणवले असणार…”

“हो ग… पहिले काही दिवस भाचे, पुतणे, नातेवाईक त्यांना भेटायला गेले. नंतर हळूहळू त्यांचेही जाणे कमी होत गेले …. हल्ली इतका वेळही नसतो ग कोणाला..”

हे सांगताना  वहिनींचा गळा दाटून आला होता….

आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतून उतरलो .एक नीटस, गोरीपान, वयस्कर अशी बाई धावतच आली…..

तिने जोशी वहिनींना मिठी मारली. शेजारी काका उभे होते. त्यांना वाकून नमस्कार केला .तिघांचे डोळे भरून आले होते .

मी ओळखले या नणंदबाई असणार… त्यांना झालेला आनंद आम्हालाही जाणवत होता. तिथे आम्ही चार तास होतो .तेव्हढा वेळ त्या दोघांच्या आसपासच होत्या .

सेक्रेटरींनी संस्थेची माहिती दिली. आणि संस्था बघा म्हणाले.सगळेजण गेले.

मी जोशी वहिनींबरोबर त्यांच्या नणंदेच्या रूममध्ये गेले .वहिनी दमल्या होत्या. नणंदेनी त्यांना कॉटवर झोपायला लावले. चादर घातली आणि पायाशी बसून राहिल्या.

विश्रांती घेऊन वहिनी उठल्यानंतर ते तिघ गप्पा मारत बसले. लहानपणीच्या ,आईच्या, नातेवाईकांच्या आठवणी काढत होते. हसणं पण चालू होतं.

इतक्यात “जेवण तयार आहे” असा निरोप आला.

जेवण वाढायला तिथे लोक होते. तरीसुद्धा नणंदबाई स्वतः दोघांना वाढत होत्या. काय हवं नको बघत  विचारत होत्या .

त्यांचं जेवण संपत आल्यावर त्यांनी पटकन जेवून घेतलं.

थोड्यावेळाने आम्ही निघालो.

तेव्हा नणंदबाईंना रडू आवरेना… तिघही नि:शब्द रडत होते.. बोलण्यासारखं काय होतं?

सगळं समोर दिसतच होत….

सर्वात शेवटी दोघे गाडीत चढले.

बाहेर पदर डोळ्याशी लावून उभ्या असलेल्या नणंदबाई….

आम्हाला सर्वांनाच पोटात कालवत होत.

परत येताना वहिनी तर हुंदके देऊन रडत होत्या.

गप्प गप्प होत्या….

नंतर काही वेळानंतर म्हणाल्या

” वाईट वाटतं ग.. पण माझ्याकडे तरी कस आणणार? आमची एक मुलगी. आमचचं आजारपण करताना तिची किती तारांबळ होते …नणंदेची जबाबदारी तिच्यावर कशी टाकणार?तीलाही तिचा संसार नोकरी आहे. आणि हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही ग….पण नणंदेला एक  सांगितलं आहे …आमच्या दोघांपैकी एक जण गेलं की मी  किंवा हे तिकडेच राहायला येणार…”

हे ऐकल आणि  माझेही डोळे भरून आले..

जे वास्तव आहे ते वहिनी सांगत होत्या तरीपण…….

वहिनी पुढे म्हणाल्या

 ” ती नेहमी म्हणते  तुम्ही दोघ एकत्रच रहा…..तुम्हाला  दोघांना उदंड आयुष्य देवो देवांनी… “

पण ते झालंच नाही…. जोशी काका गेले आणि पंधरा दिवसांनी वहिनी पण गेल्या……

अशाच कधीतरी मला नणंदबाई आठवतात …आणि डोळे भरून येतात…. 

तिथे राहणाऱ्या प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे………

तुम्ही घरी तक्रार न करता सुखात आनंदात रहा…

कारण असं जाऊन राहणं सोप्पं नसतंच…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सी. डी. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सी. डी.” ☆ श्री सुनील शिरवाडकर

दुपारची निरव शांतता..विस्तीर्ण हिरवळीवर दाट व्रुक्षांच्या छाया पडल्या आहेत.त्याला लागुनच ऐसपैस ग्रंथालय..त्याच्या ऊंचच ऊंच काचांच्या खिडक्या.. आणि त्या खिडक्यांजवळ असलेली टेबल्स,खुर्च्या. तेथे बसलेली एक एक अलौकिक व्यक्तीमत्वे.कधी अब्दुल कलाम.. कधी अम्रुता प्रीतम..कधी गुलजार.. तर कधी नरसिंहराव.

हो..अशी एक जागा आहे दिल्लीत.’इंडिया इंटरनैशनल सेंटर’. तेथे नजरेस पडतील फक्त आणि फक्त प्रतिभावंत. मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो.

देशातील विविध क्षेत्रातील नामवंतांना म्हणजे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत,पत्रकार, राजनितिज्ञ,विचारवंतांना  एकत्र येण्यासाठी.. विचार विनिमय करण्यासाठी एक जागा असावी ही मुळ कल्पना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची.हे असे केंद्र प्रत्यक्षात उभे करायचे तर त्यासाठी तश्याच उत्तुंग व्यक्तीमत्वाची गरज होती.

१९६० च्या आसपासची ही गोष्ट. संयुक्त महाराष्ट्र प्रकरणात वाद झाल्यामुळे डॉ.सी.डी.देशमुख मंत्रीमंडळातुन राजीनामा देऊन बाहेर पडले होते. पं.नेहरुंमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बाबतीत  मतभिन्नता जरुर होती.पण पं.नेहरु ‘सिडीं’ ची विद्वत्ता, योग्यता जाणुन होते. त्यांनी या प्रकल्पाची संपुर्ण जबाबदारी ‘सी.डीं. ‘ वर सोपवली. त्यांच्या सोबत होते जोसेफ स्टाईन…. एक अमेरिकन वास्तुविशारद. यांच्या विचारांवर..किंवा एकूणच व्यक्तीमत्वावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता.

सर्वप्रथम जागा निवड… नवी दिल्लीत लोधी गार्डन परीसर आहे. पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या निसर्गरम्य परीसरातील जवळपास पाच एकराचा भूखंड निवडण्यात आला.बांधकाम सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरले. प्री फैब्रीकेटेड बांधकाम साहित्य आणि जोडीला ओबडधोबड दगड असा एक प्रयोग करण्यात आला. आणि हळुहळु सिडींना अभिप्रेत असलेली साधेपणात सौंदर्य शोधणारी वास्तु आकार घेऊ लागली.

प्रशस्त हिरवळीच्या पार्श्वभूमीवर असलेली ही देखणी वास्तू .. .प्रवेशद्वारापासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं.आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला ग्रंथालय आणि सीडींच्या नावाचे भव्य सभागृह. सीडींना अभिप्रेत असलेली बौध्दिक सौंदर्य खुलवणारी ही वास्तू उभी करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नाही.

पन्नास सदस्यांनी सुरुवात झालेल्या ‘आयसीसी’ चे आजची सदस्य संख्या सात हजारांपर्यंत पोहोचली आहे. येथील सदस्यत्व मिळणे तितकेसे सोपे नाही. मोठी वेटिंग लिस्ट असते. वर्षोनुवर्षे प्रतिक्षा केल्यानंतर योग्य व्यक्तीस तेथे सदस्यत्व बहाल केले जाते. पण तरीही केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाच्या समर्थक व्यक्तीला तुलनेने प्राधान्य दिले जाते. आणि ते साहजिकच आहे.

येथील सदस्यसंख्या मोठी आहे.. पण त्यात स्वाभाविकच वयस्कर अधिक आहे. नवीन रक्ताला वाव मिळुन नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण व्हावे अशी भावना तेथील तरुण प्रतिभावंतांची आहे.

सध्या ‘आयसीसी’ अनेक उपक्रम सुरु आहेत.थिंक टँक.. चर्चासत्रे.. संमेलने..पुस्तक प्रकाशने हो आहेतच.लंच किंवा डिनर पार्टीच्या निमित्ताने विचार, कल्पनांची देवाणघेवाण होत असते.

साठ वर्षे उलटुन गेल्यानंतरही या वास्तुचे सौंदर्य तसुभरही कमी वाटत नाही. आजही राजधानीतीलच नव्हे तर देशातील बुध्दीमानांना आकर्षित करुन घेणारे हे ‘आयसीसी’..आणि त्याचे शिल्पकार आहेत डॉ.चिंतामणराव देशमुख. येथील प्रमुख सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात आल्या आहेत.

यंदाचे वर्ष म्हणजे सीडींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. बरोब्बर १२५ वर्षापुर्वी जन्म झालेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे राजधानीत असलेले हे स्मारक समस्त मराठी जनांना अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

आपल्या स्वतःच्या कवितेच्या दोन ओळी किंवा शब्द कुठे लिहून ठेवण्याआधी अगदी मनातल्या मनात हरवून जातात तेव्हा होणारी मनाची घालमेल शब्दात न सामावणारी असते. आपली कविता दुसऱ्याने स्वतःच्या नावाने किंवा नाव न देताच माध्यमावर दिली की जीवाची होणारी बेचैनीही शब्दातीत असते. एकूणच, कविता हरवणे हा अनुभव शब्दात व्यक्त करणे आणि ती व्याकुळ अवस्था इतरांपर्यंत पोहोचवणं सोपे नव्हे. 

परंतु कवी वा.रा कांत यांच्यासारखा  कवी कवितेचे हे हरवणं इतक्या उत्कटपणे काव्यातून व्यक्त करतो की त्या काव्याचं एक अविस्मरणीय असं विरहगीत म्हणूया किंवा भावगीत  पिढ्यान पिढ्या मनाचा ठाव घेत आहे. 

“त्या तरुतळी  विसरले गीत” हे वा.रा कांत यांचं गीत एका “हरवण्याच्या” अनुभवातून आकारलं आहे. वा. रा कांत हे नांदेडचे कवी सायकल घेऊन नोकरीच्या ठिकाणी  जात असत. हा रस्ता रानातून जात असे. तिथेच एका तळ्याकाठी असलेल्या  झाडाखाली बसून ते अनेकदा कविता लिहीत असत. या कविता किंवा सुचलेल्या ओळी एका वहीत लिहून ठेवत असत. एक दिवस घरी परतल्यावर आपण कवितांची वही  त्या झाडाखालीच विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मनाची झालेली घालमेल व्यक्त करताना शब्द त्यांच्या समर्थ लेखणीतून  आले –  

“ त्या तरुतळी विसरले गीत “ 

जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकत असे  तेव्हा अपुऱ्या राहिलेल्या भेटीची ही व्याकुळ आठवण आहे असं मला वाटत असे. “हरवलेल्या वही”ची ही गोष्ट कळल्यावर मात्र ह्या गीतातील शब्दांचे संदर्भ मनाला अधिकच अस्वस्थ करू लागले. 

आपली वही उद्या मिळेल का? ही. मनाची घालमेल सांगणार तरी कुणाला? मनाच्या या अवस्थेतून   वा,रा कांत यांच्यातील सृजनशील कवी कडून कशा ओळी लिहिल्या जातात बघा –  

त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊनि फिरतो, 

इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना

स्वरातुनी चमकते वेदना

तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत.

आपण आणखी कविता लिहू शकतो, लिहिल्या जातील इतकी विशाल प्रतिभा आपल्याकडे आहे हे जाणणाऱ्या कवीच्या मनात गेलेल्या कवितांची हुरहूर आहेच. 

“विशाल तरु तरी फांदी लवली”

दुसऱ्या दिवशी सकाळी साशंकपणेच ते त्या तळ्याकाठी   पोचतात तेव्हा काय आश्चर्य? 

त्यांची वही तिथे असतेच पण ती झाडाखाली नुसतीच पडलेली नाही. तर झाडाला रेलून आपल्या सख्याची  वाट बघत उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीच्या हातात ती वही आहे असे दृश्य त्यांना दिसते. आणि ते लिहून जातात – 

मदालसा तरुवरी रेलुनी

वाट बघे सखी अधिर लोचनी

पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

आणि त्या तरुणीचं वर्णन करताना शब्दचित्रच रेखातात –

पदर ढळे, कचपाश भुरभुरे

नव्या उभारित ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत.

वाट बघून ती तरुणी जणू शिणली आहे, थकलेली आहे. कवीची अवस्था तरी  कुठे वेगळी आहे? कवितेच्या वही साठी वणवण करून माझाही देह (तनु ) थकलेला आहे. मात्र  दोघांची परिस्थिती त्या क्षणी  अशी एक  अशी असली तरी दोघांच्याही हृदयातील  आकांक्षा मात्रवेगवेगळी आहे. दोघांच्यात असलेले हे साम्य आणि विरोधाभास  वा.रा  कांत किती सुंदर शब्दात लिहून गेलेत  –  

उभी उभी ती तरुतळि शिणली

भ्रमणी मम तनु थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत तरुतळी गीत विसरल्यानंतर झालेली मनातील घालमेल उत्कटतेने व्यक्त करणारं भावगर्भ  असं  हे गीत यशवंत देवां सारख्या संवेदनशील संगीतकाराला भावणं हा आणखी एक सुंदर योग. कवीच्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं  आणि ते गाण्यासाठी  साक्षात सुधीर फडके यांचा आवाज लाभावा? हा सुवर्ण योग ?  आपण आपल्या पुरते तरी याला रसिकांचे भाग्य समजूया.   

त्या तरुतळी विसरले गीत कवितेमागची कथा संपूर्णपणे  खरी असो वा नसो. तो विचार दूर सारून.

“ तप्त रणे तुडवीत हिंडतो” 

 “त्या तरुतळी विसरले गीत” 

..हे शब्द  सुधीर फडके यांच्या आवाजात कानावर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी  आपल्याला व्याकुळ आणि भावनावश करतात इतके मात्र खरे.    

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares