बैठकीत विश्वास मिळतो तर माजघरात आपुलकी. स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.
खरंच वास्तुदेवते, या सगळ्यांमुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक.’
दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर.’
भिंती म्हणतात, ‘मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस.’
छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर.’
जमीन म्हणते, ‘कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत.’
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही.’
इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि
निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं, असा आशीर्वाद दे.
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.
एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंबपद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही, पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !
कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाही, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटा मातीचं!
पण एक मात्र छान झाले की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते,ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.
खरंच. हा अमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.
वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची, ‘शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरुष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.’
मग आज इतकंच म्हणतो की, ‘तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं,मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत.’
आणि या माझ्या मागण्याला तू ‘तथास्तु’ असंच म्हण, हा माझा आग्रह आहे .
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- निघताना बाबांनी त्यांचे आशिर्वाद म्हणून दिलेला तो छोटासा कागदी फोटो म्हणजे पिवळ्या धमक रंगाचं जरी काठी सोवळं नेसलेलं, हसतमुख, प्रसन्न मुद्रा असलेलं दत्तरूप होतं. आज इतक्यावर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय. आजही त्याचं दर्शन घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडित असणारी माझ्या बाबांची त्या क्षणीची ही आठवणसुद्धा!)
आईबाबांचा निरोप घेऊन मी निघण्यासाठी वळलो. बाहेर पडलो. आई मला निरोप द्यायला दारापर्यंत आली…
“जपून जा. गेल्यावर पोचल्याचं पत्र टाक लगेच. सांभाळ स्वत:ला…” तिचा आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. मी कसंबसं ‘हो’ म्हंटलं.. आणि चालू लागलो. आता क्षणभर जरी रेंगाळलो तरी हे मायेचे पाश तोडून जाणं कठीण जाईल याची मला कल्पना होती.
माझा लहान भाऊ शाळेत गेलेला होता. मोठा भाऊ बँकेत मॅनेजरना सांगून मला बसमधे बसवून द्यायला आला होता.
“कांही अडचण आली, तर माझ्या ब्रँचच्या नंबरवर मला लगेच फोन कर” तो मनापासून म्हणाला. एरवी अतिशय मोजकंच बोलणारा तो. पण त्याचं प्रेम आणि आधार मला त्याच्या कृतीतून जाणवायचा. आम्हा दोघात सव्वा दोन वर्षांचं अंतर. त्यामुळे माझ्या अजाण वयात माझ्याशी माझ्या कलानं खेळणारा माझा हक्काचा जोडीदार तोच. तो पहिलीत गेला तेव्हा हट्ट करून मीही त्याच्या मागे जाऊन वर्गात बसलो होतो.आई रोज त्याचा अभ्यास घ्यायची, तेव्हा त्याच्याबरोबर मीही अभ्यासाला बसायचो. पहिली आणि दुसरी अशी दोन वर्ष मी त्याच्याजवळ रोज वर्गात जाऊन बसत दोन इयत्ता एकदम करुन त्याच्याबरोबर थेट तिसरीतच प्रवेश घेतला होता. पूर्वी हे सगळे अधिकार मुख्याध्यापकांकडे असल्याने माझी वेगळी परीक्षा घेऊन मला थेट तिसरीत प्रवेश मिळाला होता. पुढे पूर्वीच्या एसएससी म्हणजे ११ वी पर्यंत आम्ही दोघेही एकाच वर्गात एकाच बाकावर बसून शिकलो. त्यामुळे आम्ही दोघे सख्खे भाऊ वर्गमित्रही. परिस्थितीवशात हेच त्याच्यावर खूप मोठा अन्याय करणारं ठरलं होतं. तो माझ्यापेक्षा खूप हुशार असूनही माझे नोकरीचे वय नसल्याने मी पुढे शिकू शकलो आणि तो मात्र आम्हा सर्वांसाठी शिक्षण तिथंच थांबवून मिळेल ती नोकरी करीत भटकंती करत राहिला. त्याची सुरुवातीची अशी कांही वर्षें संघर्ष आणि तडजोडीत गेल्यानंतर एस् एस् सी मधल्या चांगल्या मार्कांमुळे त्याला नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळाला होता. तरीही आम्हा सर्वांच्या जबाबदारीमुळे त्याचा त्यावेळचा सुरुवातीचा सगळा पगार घरखर्चासाठीच संपून जायचा. तरीही त्या वयातल्या स्वतःच्या हौसामौजा बाजूला ठेवून तो हे मनापासून करीत राहिला. मला आठवतंय, पगार झाला की तो स्वतःसाठी अगदी मोजके पैसे ठेवून बाकी सगळे आईकडे घरखर्चासाठी द्यायचा. मी इस्लामपूरला रहायला गेल्यानंतरच्या त्याच्या पगाराच्या दिवशी त्याने मला बाजूला बोलवून घेतले आणि स्वतःसाठी ठेवून घेतलेल्या दहा रुपयातले पाच रुपये माझ्या हातावर ठेवले.
“हे काय? मला कशाला? नको” मी म्हणालो.
“असू देत”
“पण का?.. कशासाठी? मला लागलेच तर मी घेईन ना आईकडून. आणि तसेही मी इथे असताना मला कशाला लागणारायत?”
त्याला काय बोलावं सूचेना. त्यानं मला आधार दिल्यासारखं थोपटलं. म्हणाला,
“नाही लागले, तर नको खर्च करूस. तुझे हक्काचे म्हणून वेगळे ठेव. कधीतरी उपयोगी पडतील.”
खरंतर म्हणूनच माझं मुंबईला जायचं ठरलं तेव्हा माझ्या भाडेखर्चाची जुळणी करायचा विषय निघाला तेव्हा त्यानेच दर महिन्याला मला दिलेले ते पैसे खर्च न करता मी साठवलेले होते, ते त्याला दाखवले.
त्याचेच पैसे बरोबर घेऊन मी आज मुंबईला निघालो होतो.
त्याचा हात निरोपासाठी हातात घेतला, तेव्हा हे सगळं आठवलं न् माझे डोळे भरून आले.
रात्रभरच्या संपूर्ण बस प्रवासात मी टक्क जागा होतो. न कळत्या वयापासूनच्या या अशा सगळ्या आठवणी मनात गर्दी करत होत्या. रात्र सरेल तसा मनातला हा अंधारही दूर होईल असं वाटलं.’सगळं सुरळीत होईल. काळजी करू नको ‘ घर सोडतानाचे बाबांचे हे शब्द आठवले आणि मनातलं मळभ हळूहळू दूर झालं.
मुंबई मी पूर्वी कधी पाहिलेलीही नव्हती. माझं असं ध्यानीमनी नसताना मु़बईला येणं माझ्या आयुष्यातल्या निर्णायक वळणावर मला घेऊन जाणाराय याची त्याक्षणी मला कल्पना कुठून असायला?पण यानंतर घडणाऱ्या घटनांची पावलं सूत्रबध्दपणे त्याच दिशेने पडत होती हे आज मागे वळून पहाताना मला लख्खपणे जाणवतंय.आणि या जाणिवांमधेच ‘त्या’च्या दत्तरुपातल्या आस्तित्वाच्या दिलासा देणाऱ्या गडद सावल्याही मिसळून गेलेल्या आहेत!
मुंबईतलं सुरुवातीचं माझं वास्तव्य अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडी दादरलाच होतं.त्यामुळे माझं ‘घरपण’ शाबूत होतं!एकच रुखरुख होती ती म्हणजे माझ्या बालवयापासून इतकी वर्षं विनाविघ्न सुरु असलेल्या दत्तसेवेत मात्र खंड पडणार होता. एरवीही ते तसं सगळं इथं शक्यही नव्हतंच.इथं गुरुचरित्राची ती पोथी नव्हती.बाबांना मिळालेल्या प्रसाद पादुका नव्हत्या. ही सगळी हरवलेपणाची भावना मनात घर करू लागली. पहिल्या दिवशी आंघोळ होताच मी तिथल्या देवघरातल्या दत्ताच्या तसबिरीकडे पाहून हात जोडले. अलगद डोळे मिटले. पण मिटल्या डोळ्यांसमोर ती तसबिरीतली दत्तमूर्ती साकार झालीच नाही. अंत:चक्षूंना दिसू लागलं होतं, बाबांनी मला दिलेल्या फोटोतलं पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, लालचुटूक रंगाचं उपकरण घेतलेलं हसतमुख, प्रसन्नमुद्रा असणारं ते दत्तरुप!! त्याच्या नजरेचा स्पर्श होताच मनातली कांहीतरी हरवलेपणाची भावना खालमानेनं निघून गेली!
एक-दोन दिवस असेच गेले. मग एक दिवस रात्री माझी बहीण आणि मेहुणे दोघांनीही मला दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे जाऊन माझं नाव नोंदवून यायला सांगितलं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस कुठे आहे, तिथे किती नंबरच्या बसने, कोणत्या दिशेला कसे जायचे हे सगळे समजावूनही सांगितलं. मुंबईत कुणीही बरोबर नसताना एकट्यानेच हे सगळे करायचे याचं दडपण होतंच शिवाय मला त्याची काही गरजच वाटत नव्हती. कारण माझी स्टेट बँकेच्या टेस्ट इंटरव्ह्यूमधून नुकतीच निवड झाली होती. फक्त पोस्टिंग व्हायला काही दिवस वाट पहायला लागणार होती. थोडा उशीर झाला तरी अनिश्चितता नव्हती. शिवाय तोपर्यंत एका खाजगी नोकरीच्या बाबतीत मेव्हण्यांनी स्वतःच बोलणीही पक्की करत आणली होती. असं असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव कशाला नोंदवायचं असंच मला वाटत होतं.
“नाही..नको.आता त्याची काय गरज आहे?” मी म्हणालो.
“हे बघ. आता गरज नाहीय असं वाटलं तरी अचानक गरज उद्भवलीच तर? त्यानंतर नाव नोंदवायचं म्हटलं तर वेळ हातातून निघून गेलेली असेल. आत्ता मोकळा आहेस तर ते काम उरकून टाक.त्यात नुकसान तर कांही नाहीये ना? हवं तर मी रजा घेऊन येतो तुझ्याबरोबर.”मेव्हणे मनापासून म्हणाले. ‘ते माझ्या हिताचंच तर सांगतायत. त्यांना विरोध करून दुखवायचं कशाला?’असा विचार करून मी ‘ एकटा जाऊन नाव नोंदवून यायचं कबूल केलं.
प्रत्येकाला भविष्यात घडणाऱ्या विविध घटना, त्यांचा घटनाक्रम, त्यांचं प्रयोजन..हे सगळं पूर्णत: अज्ञातच तर असतं. पण घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग विनाकारण घडत नसतोच. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच. माझ्या बहिण आणि मेव्हण्यांचं मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं. कारण नंतर पुढे घडणाऱ्या सगळ्याच अनपेक्षित घटना त्या त्या वेळी नकारात्मक परिणाम करणाऱ्या असल्या तरी त्यांतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचं ‘त्या’नेच माझ्यासाठी केलेलं हे नियोजन होतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!
ते सगळंच अघटीत वेळोवेळी मला कडेलोटाच्या काठावर नेऊन उभं करणारं,माझी कसोटी पहाणारं ठरणार तर होतंच आणि माझ्या मनातलं ‘त्या’चं स्थान अधिकाधिक दृढ करणारंही!
(त्यात परत अजून गोळी चहा,डस्ट,चाॅकलेट, ग्रीन टी ,लेमन टी हे ही उपप्रकार आहेतच)…
काही हाँटेल्समध्ये तर चहाला वेगळे नाव देऊन तो प्रसिद्धीस उतरवलाय.पुण्यामध्ये ‘अम्रुततुल्य चहा ‘ प्रसिद्ध आहे तर सांगलीमध्ये ‘ हरमन चहा ‘म्हणून प्रसिद्ध आहे.याशिवाय ‘ मटक्यातील चहा ‘सुध्दा नावारुपाला येतोय.
चहा कसा प्यायचा यातही खूप गमतीदार प्रकार आहेत.पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी खेड्यामध्ये,झोपडीत चुलीवर साखरेऐवजी गुळ घालून चहा केला जातो.चहा पिण्यासाठी कपाचा वापर केला जातो.कपभर चहा किंवा चहाचा कप ही संकल्पना यामुळेच रुजली असेल.पण व्यक्ती आणि स्थान परत्वे चहा पिण्याच्या साधनात पण बदल होत गेला.पुर्वी किंवा आजही काही लोक चहा पिण्यासाठी कपबशीचा वापर करतात,पण आता मात्र या कपबशीची जागा ‘ मग ‘ ने घेतली आहे.बशी न देता नुसत्या मगमधून चहा देण्याची फँशन आली आणि ती रुढही झाली.वेगवेगळ्या रंगांचे,डिझाईनचे मग बाजारात उपलब्ध आहेत.त्याही पुढे जाऊन आता थर्माकोलचे युज अँड थ्रो वाले मग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.विशेषतः समारंभात, टपरीवर अशा कपांचा वापर केला जातो.
उत्साह वाढविणार पेय म्हणून चहाकडे पाहिल जात असल तरी या चहाच्या अतिरिक्त सेवनाने त्याचे दुष्परिणाम सुध्दा दिसून येतात. चहा पिण्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो.चहा खरतरं दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो.पण काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा घेतात.शिवाय घरात कुणी पाहुणा आला तर त्यांना कंपनी म्हणून, आँफिसमध्ये काम करताना उत्साह वाटावा म्हणून चहा घेत रहातात.दिवसातून दहा कप चहा पिणारे सुध्दा काही लोक आहेत.इतका चहा पिण्याने भूक मरते,जेवणावर परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत.शरीरात उष्णता वाढते,पित्त वाढते हे बरेचजण विसरतात. आयुर्वेदात तर चहा पिणे वर्ज्य आहे असे म्हणतात. चहा कधीही नुसता न पिता त्याबरोबर काहीतरी खावे म्हणजे त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही.
चहाबद्धल कितीही चांगल्या वाईट समजूती असल्या तरी ते एक उत्साह वाढविणारे तसेच मैत्री वाढविणारे पेय आहे हे नक्कीच.
आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन
‘अहोss’ …….
या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे.
या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल……
….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे, आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे. हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.
यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.
यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.
हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं. हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की, कडक उन्हाळ्यात तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं.
अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते.
माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल संपायच्या आत मी हजर असतो.
प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं!
प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा!
हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे.
नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे. एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल.
…. यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेला जनाबाईचा हा अभंग ऐकला तेव्हा आतून अगदी हलून गेले. बाई म्हणून जनाबाईचा विचार तोपर्यंत इतका थेट, इतका स्पष्ट आणि इतका तीव्र असा मनात आला नव्हता. इतर संतांचे अभंग, तसे जनीचेही अभंग. ऐकता- वाचताना तिच्या स्त्रीत्वाची अशी झणझणून जाणीव नव्हती झाली.
हा अभंग ऐकताना डोळ्यांसमोर सहज आली ती एक तरुण मुलगी. निळ्यासावळ्या मंजिर्यांनी बहरलेल्या, हिरव्यागार पानांनी डवरलेल्या तुळशीच्या बनात उभी असलेली. तिच्या विठ्ठलाची आवडती तुळस. जनी त्या तुळसबनात आपली वेणी उकलून केस मोकळे करते आहे. लांब असतील का तिचे केस? आणि दाटही? की असतील लहानसर, पातळ आणि मऊशार? कुरळे असतील, का असतील सरळच? कोण जाणे ! पण तिचा विठू त्या केसांच्या मुळांना लोणी लावून चोळणार आहे. मग गरम पाण्यानं तिला न्हाऊ घालणार आहे. केवढा आनंद आहे जनीला त्या गोष्टीचा ! तिला तिचं असं कुणीच नाही जगात. पण विठू आहे. तो तिचाच आहे. अगदी तिचा. किती साधेपणानं सांगते आहे जनी, की माझा सखा मला न्हाऊ घालणार आहे.
जनीच्या या साधेपणानं मी हलून गेले. तुळशीचा असावा तसा तिच्या बाई असण्याचा वेगळाच दरवळ या अभंगातून आला. त्यानं मी हलून गेले. आणि त्याहीपेक्षा तिच्या आणि विठूच्या जगावेगळ्या जवळिकीनं हलून गेले.
जनाबाईचं महिपतींनी लिहिलेलं लौकिक चरित्र अगदी साधं आणि थोडकं आहे. ती मराठवाड्यातली- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची मुलगी. पाच-सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. पंढरपूरला नामदेवांच्या घरी तिच्या वडलांनी तिला नेऊन ठेवलं. पुढे तेही वारले. जनी नामदेवांच्या घरीच राहिली, वाढली. बस्स. इतकंच तर तिचं चरित्र !
पण माणसाचं जगणं अशा ढोबळ तपशिलांपुरतं थोडंच असतं? त्या पलीकडेच तर ते बहुतेककरून उरलेलं असतं. जनीची सगळी कविता म्हणजे तिचं आंतरचरित्र आहे. आणि मराठी कवितेच्या प्रारंभकाळात अशी धीट, कणखर, नि:संदिग्ध आणि जगण्यात घुसळून आलेली कविता एका बाईनं लिहिली आहे, हे अद्भुतही फार अभिमानाचं आहे.
जनीच्या पोरकेपणाची, अनाथपणाची जाणीव तिच्या अभंगांच्या मुळाशी सारखी उमळते आहे. अगदी एकटी आहे ती. तिला तिचं माणूस कोणी नाहीच. म्हणून तर तिचं विठूशी असलेलं नातं अनेकपदरी आणि दाट, गहिरं आहे.
‘तुजवीण बा विठ्ठला । कोणी नाही रे मजला’
– असं तिनं विठूला कळवळून सांगितलं आहे.
‘माय मेली, बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला’
– असं स्वत:ला त्याच्यावर निरवलं आहे. आणि त्यानंही तिचा शब्द फुलासारखा झेलला आहे. आई, बाप, सखा, सहचर, मुलगा- तिला हव्या त्या नात्यांनी तो तिला भेटला आहे.
माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करणारी जी जी नाती आहेत, ती ती सगळी नाती जनीनं विठ्ठलाशी जोडली आहेत.
‘राना गेली शेणीसाठी । वेचू लागे विठो पाठी’
किंवा
‘पाणी रांजणात भरी । सडासारवण करी ।
धुणे धुऊनिया आणी । म्हणे नामयाची जनी ।’
– असे तिचे अभंग पहा. जनी जी जी कामं करते, ती ती सगळी तिच्याबरोबर तिच्यासाठी विठू करतो आहे. तिचा एक सुंदर अभंग आहे.
साळी कांडायासी काढी । चक्रपाणी उखळ झाडी
कांडिता कांडिता । शीण आला पंढरीनाथा
कांडिताना घाम आला । तेणे पीताम्बर भिजला
पायी पैंजण, हाती कडी । कोंडा पाखडोनी काढी
हाती आले असे फोड । जनी म्हणे, मुसळ सोड
देवच साळी कांडतो आहे. घामेजून जातो आहे. हाताला फोड आले आहेत. शेवटी जनीच म्हणते आहे की, ‘पुरे कर आता. मुसळ बाजूला ठेव.’
जनीला पडणारे कष्ट, तिची होणारी दमणूक, तिचे सोलवटून निघणारे हात- जनीच्या आंतरविश्वात त्या विठ्ठलानं तिचं सगळं दु:ख स्वत:वर ओढून घेतलं आहे. तोच दमला आहे. घामानं भिजला आहे. त्याच्या हातांना फोड आले आहेत. कष्टांचं, दु:खाचं, एकटेपणाचं हे रूपांतर विलक्षण थक्क करणारं आहे.
देवाच्या थोरवीची जाणीव जनीला आहे. अगदी स्पष्ट आहे. त्याच्या पीताम्बराचा, हातातल्या सोन्याच्या कड्याचा, पायातल्या पैजणांचा उल्लेख ती करतेच आहे ना ! पण तिच्यासाठी दोघांमध्ये द्वैत नाहीच आहे. गरीब आणि श्रीमंत, किंवा उपेक्षित, वंचित आणि सुपूजित, प्रतिष्ठित, इतकाच नव्हे तर माणूस आणि परमेश्वर हा भेदही त्यांच्या नात्यात सहज नाहीसा झालेला आहे. म्हणून विठूचं तिच्याबरोबर कष्ट करणं, तिच्यासोबत सतत असणं, हे तिच्यासाठी स्वाभाविकच आहे. ती त्याला इतकी बरोबरीच्या नात्यानं वागवते, इतकी सहज त्याला रागावते, त्याला जवळ घेते, त्याला सलगी देते, की अरूपाला रूप देण्याचं, निर्गुणाला सगुण केल्याचं किंवा अलौकिकाला लौकिकात साक्षात् केल्याचं तिनं जे अपूर्व साहस केलं आहे, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. चमत्काराच्या पातळीवर जनी विठूशी नातं सांगतच नाही; ती जणू वस्तुस्थितीचंच निवेदन करते.
पहा ना, तिच्या एका अभंगात- ती धुणं घेऊन नदीकडे निघाली आहे. उपाशी आहे. विठूवर रागावली आहे. तो मागे धावतो आहे. मला का टाळून चाललीस, म्हणून विचारतो आहे. ती फटकारते आहे त्याला. ‘कशाला मागे आलायस?’ म्हणून झिडकारते आहे. आणि तो बिचारा खाली मान घालून मुकाट तिच्यामागे चालतो आहे. इतर कुठे पाहिलं आहे असं दृश्य? फक्त जनीचाच हा अनुभव आहे.
अर्थात् हे तिला शक्य झालं आहे ते केवळ संतपुरुषांमुळेच. तिच्या बाईपणाचा अडसर तिच्या परमार्थाच्या वाटेतून त्यांनी दूर केला. त्यांनी तिच्यावरचं दडपण दूर केलं. आपण बाई आहोत म्हणून बंदिनी आहोत, क्षुद्र आहोत, असहाय आहोत आणि नीचतम आहोत, ही त्या काळात प्रत्येक बाईच्या मनात आणि जीवनात स्पष्ट जागी असणारी जाणीव संतांमुळे मालवली. संतांनी देवापाशी स्त्री-पुरुष भेद नाही, असं आश्वासन दिलं म्हणून जनीसारखीला आपलं स्त्रीपण स्वाभाविकपणे स्वीकारता आलं, ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ अशी एक समजूत मिळाली.
या समजुतीनं जनीचं स्त्रीपण फार मनोज्ञ केलं आहे. तिच्या अभंगांमधून ते सारखं जाणवतं. असं वाटतं की, पुरुष जाणतो, पण ते बुद्धीनं जाणतो. बाई जाणते ती हृदयानं जाणते. जनीची प्रगल्भता आणि तिचं शहाणपण हे काही पुस्तकांतून आलेलं, शिक्षणातून आलेलं शहाणपण नव्हे. ते तिच्या जगण्यातून, तिच्या अनुभवांतून, तिच्या बाईपणातून आलेलं शहाणपण आहे.
ती एक शहाणी, बुद्धिमान, प्रतिभावंत आणि अनुभवी अशी बाई आहे. ती बाई आहे म्हणून विठ्ठलाला लेकुरवाळा झालेला पाहते. ती बाई आहे म्हणून त्याला ‘माझे अचडे बचडे’ म्हणून कौतुकानं कुरवाळते. ती बाई आहे म्हणून ‘विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असं त्याला प्रेमानं रागे भरते. ती बाई आहे म्हणून रात्री शेज सजवून त्याची वाट पाहते. आणि ती बाई आहे म्हणून ‘पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग धाला’ असा तृप्तीचा उद्गार काढते.
तिच्या बाईपणाचा सर्वात उत्कृष्ट उद्गार मात्र विठूसाठी नाही. तो ज्ञानदेवांसाठी आहे. कदाचित ज्यांच्यासाठीच्या खर्याखुर्या कळवळ्यानं ज्ञानदेवांनी मराठी गीताभाष्याचा अट्टहास केला, त्या स्त्री-शूद्रांची ती प्रतिनिधी आहे म्हणून असेल, किंवा कदाचित त्या विलक्षण प्रज्ञावंताचं कोवळं वय तिच्यातल्या प्रौढ, जाणत्या बाईला विसरता येत नसेल, किंवा कदाचित- काय असेल सांगता येत नाही, पण ज्ञानदेवांविषयीची आपली आंतर-ओल व्यक्त करताना जनीनं लिहिलं आहे-
‘मरोनिया जावे । बा माझ्या पोटी यावे’
पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये ज्ञानदेवा ! अविवाहित, एकट्या जनीचे हे विलक्षण उद्गार तिच्या बाईपणाच्या आंतरसालीमधला जो कोवळा गाभा प्रकट करतात, त्या गाभ्यातला तुळस मंजिर्यांसारखा निळासावळा अंधार मी इतर कुठे कधी पाहिलेलाच नाही.
(संपादित)
लेखिका : अरुणा ढेरे
संग्राहक : अनिल कुमकर
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नरसिंहाचे नवरात्र जवळ आलं की तयारी सुरू होते. घर स्वच्छ केले जाते. पूजेची उपकरणे घासली जातात. पूजेचे सामान बाजारातून आणले जाते .अगदी देवही उजळले जातात…
खरं सांगायचं तर नेहमी सगळी स्तोत्र , म्हटली जात नाहीत. नवरात्र जवळ आलं की आधी पुस्तकं बाहेर निघतात .
नृसिंह कवच, स्तवन, प्रार्थना, भक्तीभावाने म्हटले जाते .प्रल्हादाची आरती म्हणायची.
विष्णुसहस्रनाम म्हटले जाते. द्वादशनाम स्तोत्र, शंकराचार्यांचं संकटनाशन स्तोत्र म्हणताना वृत्ती लीन होते .
रोज घरी देवाची नेहमी एकच आरती सवयीने म्हटली जाते. बाकीच्या आरत्यांची नवरात्रीच्या आधी आठवण येते..त्या म्हणून घ्यायच्या…नरसिंह पुष्पांजली म्हणायची..
या सगळ्यांची आधी जरा उजळणी करून घ्यायची असते.
आता तयारी कशाची करायची समजले आहे ……
ती करून घेतली की मग नंतर म्हणताना आनंदाने सहज हे सगळे म्हटले जाते.
आमच्या नरसिंहाचे नवरात्र सुरु होते.
साग्रसंगीत पूजा ,आरती होते.
खरंतर देव देवघरात रोजच असतात…
पण नवरात्र सुरू झालं की एकदम वेगळं वातावरण होतं.
मंद दिवा समोर तेवत राहतो..
हार फुलं घालून केलेली पूजा बघत रहावीशी वाटते …येता-जाता त्याच्याकडे बघूनही समाधान वाटतं….
आजची आरती खरचं आतून आर्ततेनी म्हटली जाते .
नमस्कार पंचक वाचताना….
दयासागर दीननाथा उदारा
मला ज्ञान देऊन अज्ञान वारा
कृपेचा तुझ्या नित्य मेवा मिळावा.
नमस्कार साष्टांग लक्ष्मी नरसिंहा
अशी प्रार्थना करायची .
आता त्याची कृपा हाच मेवा आहे हे पूर्णपणे समजले आहे .
भक्ती करत राहू ..
देवाला आळवत राहू..
मनातली श्रद्धा जागृत ठेऊ…
सांभाळायला तो आहेच ही खात्री आहे .
संकटकाळी तोच धावून येणार आहे.
फक्त त्याची सेवा आपल्या हातून प्रामाणिकपणे घडू दे.
☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆
मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो, बढाया मारतो व देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो, ते खरे पाहता हास्यास्पद आहे, याची जाणीव या लेखात होते.
माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक. वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्षे गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण तेरा वर्षांत अब्जावधीचा जप होऊनही ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.
तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय वाढला, तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली.
“आलं लक्षात! गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष केलीत, तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल.”
अवधुतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्यांनी साधनेला सुरुवात केली. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली. कधी सुरू केली, हेही विसरलेले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना त्यांना
“मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे?” असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली.
“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”
पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली.
“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”
आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले,
“आपण कोण आहात? जे कोणी आहात, ते पुढे येऊन बोलाल? माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे.”
“ज्याची उपासना तू करत आहेस,तोच काळभैरव मी मनुष्यरुपात आलोय. वरदान माग.”
“मग समोर का नाही येत?”
“माधवा! तेरा वर्षे जो तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास, त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्याभोवती आहे. माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तूला सामोरा येऊ शकत नाही.”
“जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल, तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत. आपण जाऊ शकता.”
“मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला जाताच येणार नाही.”
“तर मग, गेली तेरा वर्षांचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही? याचं उत्तर द्या.”
“माधवा! ते निष्फळ झालं नाही. ते अनुष्ठान तुझी जन्मोजन्मीची पापे नष्ट करत होते. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते.”
“मग आता मी काय करू?”
“परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून एक वर्ष करायचंय. हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल.”
“तुम्ही किंवा गायत्री कुठे असता?”
“आम्ही इथेच असतो. पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात. ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता.”
माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत, स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. एक वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार, तोच,
“मी आलेय माधवा! वरदान माग.”
“मातेssss”
टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले.
“माते! पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हटला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको गं. तू पावलीस तेच खूप.”
“माधवा! मागितलं तर पाहिजेच.”
“माते! हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील, असं वरदान दे.”
“तथास्तु!”
पुढे तीन वर्षांत माधवाचार्यांनी ‘माधवनियम’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे.
लक्षात घ्या. जो काही मंत्र, जप, कर्मकांडं तुम्ही श्रद्धेने करता, त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसजसे तुम्ही उपासना वाढवता, तसतसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की ‘तेज’ चढलं. ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं.
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सुश्री स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“काय बाई तरी, त्या मालतीबाईंच्या घरी गेले, तर साधा चहासुध्दा विचारला नाही “, ” चहाला या बरं का घरी, ” ” पावणं चला जरा च्या घेऊ”, ” झालं का चहापाणी?”, मालक, जरा च्या-पान्याच बघा की ” मंडळी या सगळ्या बोलण्यातून एकच शब्द वारंवार येतोय आणि तो म्हणजे ‘ चहा’. या सगळ्यामध्ये महत्वाचे जाणवते ते म्हणजे आपुलकीची जाणीव. एकमेकांच्या मैत्रीतला दुवाच जणू या चहाने जपलाय. या चहामुळे अनेक नाती जोडली जातात, शिवाय अनेक कार्यक्रम, मिटींग यांची सांगता चहापानाने होते.
भारत आणि आता काही प्रमाणात परदेशात सुध्दा ‘चहा’ एक अनमोल पेयच बनून राहिले आहे. कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वेळी चहा प्यायला चालतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्ती, स्त्री-पुरुष, देशविदेशातील व्यक्ती यातील कुणालाही चहा पिणं वर्ज्य नाही. झोपून उठल्यावर, कामाचा शीण जावा म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून, अभ्यास करताना, ड्रायव्हिंग करतान झोप येऊ नये म्हणून, खूप थंडी आहे म्हणून, डोक दुखतयं म्हणून, टाईमपास, पाहुणचार म्हणून यातील कोणतेही कारण चहा पिण्यास पुरेसे आहे.
पूर्वी चहा पावडरची एक जाहीरात रेडिओ वर लागायची ” अवं सुवासिनीनं कुकवाला आन् मर्दानं चहाला नगं म्हणू नये”. म्हणजे इथेसुध्दा चहाला एक मानाचं पेय म्हणून प्रसिध्दी, दर्जा मिळवून दिला गेलाय हे लक्षात येत. तस अगदी साध वाटणारं चहा नावाच हे पेय म्हणजे पाणी, दूध, साखर आणि चहापावडर भांड्यात एकत्र करुन गँसवर उकळलेल एक पेय आणि ते गरम पिण्याचीच मजा. यामध्ये मग काहीजण आलं, वेलची, गवती चहा, चाँकलेट पावडर, चहाचा मसाला असे आपल्या आवडीनुसार चहात घालतात, तर काहीजण कच्चे दूध घालतात, काहीजण पाणी न घालता नुसते दूध वापरतात. दुधाऐवजी लिंबू टाकून काहीजण पितात. अशा कितीतरी प्रकारे चहा प्याला जातो. काही हाँटेल्स किंवा टपऱ्या, गाडे या निव्वळ चहासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे तर चहाचे अजून वेगळे प्रकार पहायला मिळतात. विशेषतः टक्कर चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, साधा चहा, गुळाचा चहा इत्यादी.
प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या पध्दती पण वेगवेगळ्या. कुणाला जास्त साखरेचा गोड चहा लागतो तर कुणाला चहापावडर जास्त टाकलेला, कुणाला एकदम फिक्का तर कुणाला बिन दुधाचा, कुणाला फक्त दुधाचा तर कुणाला मसाल्याचा. प्रत्येकाची चहा पिण्याची पध्दत वेगळी काहींना एकदम गरम चहा लागतो, काहींना थोडा थंड आवडतो, काहींना चहात दुधाची साय घातलेली आवडते. अर्थात चहा पिण्याच्या कितीही वेगळ्या पध्दती असल्या तरी चहा पिण्याची एक तल्लफ असते आणि तो त्याचवेळी प्याला तर त्याची लज्जतही वाढते हे खरचं.
चहा बनविण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चहा पावडरमध्येसुध्दा खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सध्या प्रसिद्ध असलेले म्हणजे जी. एस् चहा, रेड लेबल, ब्रुकबाँड, सोसायटी, ताजमहल, गिरनार, वाघ बकरी, सरस्वती, अग्नी, लाँयन, मगदूम चहा, फँमिली मिक्श्चर चहा असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्यात परत अजून गोळी चहा, डस्ट, चाँकलेट, ग्रीनटी, लेमनटी हेही उप प्रकार आहेतच.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
वैद्यकीय
रस्त्यावरच भिक्षेकर्यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे….आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही….कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!
—- असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून….हा मूळ मुद्दा… ! यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता….आपण म्हणजे “आपण”….मी नव्हे….!!! – करता आपणच….मी फक्त “सांगकाम्या”….!!!
एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते….???
अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती….मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….
एक अपंग आजी….जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…
या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…
काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ?
दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो….पण तरीही ते कमीच आहे… !
शैक्षणिक
भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.
….मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत….मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..!
माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत….पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….!
(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका….अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा….)
असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….! या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.
आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो ) – मी आपल्यासमोर नतमस्तक आहे….!
भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ? त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत… ? गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे…..
हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे….!
आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… !
अन्नपूर्णा
रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)
दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे..It’s our win-win situationz
इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली….तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं….सोबत थंडगार पाणी… ! जेवून तृप्त झालो….यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या….तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….!
प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो… रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….
खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
मनातलं काही – –
आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं….तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ, नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.
… रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ? की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू… ???
कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.
यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….. प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.
याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत. जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.
स्वार्थातून परमार्थ….!!!
जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…
तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील….कापडी पिशव्यांचा प्रसार करतील….पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… !
पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.
मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय….पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.
..छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय… !’ यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.
मला खूप आनंद झाला….तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला….?
यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….!
……यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही….कळतच नाही राव….!
लेख खूपच लांबलाय….! मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….आज माझं सुद्धा तसंच झालंय… !
तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू….तर आणखी कुणा जवळ करू….?
☆ उगवत्या सूर्याचे तेज लाभलेला वैराग्यवान योद्धा !☆ श्री संभाजी बबन गायके☆
लेफ्ट्नंट जनरल हनुतसिंग साहेब!
धर्मासाठी संसाराचा त्याग केलेल्या बैराग्यांनी धर्मासाठी, मातृभूमीसाठी शस्त्रे हाती घेऊन प्रसंगी प्राणांची बलिदाने दिल्याची उदाहरणे आपल्या इतिहासात निश्चितपणे आढळतात. नजीकच्या इतिहासात डोकावू जाता एकाच लढाईत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल दोन हजार साधुंनी लढता लढता प्राणार्पण केल्याची नोंद आहे.
राजस्थानात चौदाव्या शतकात एक विवाहीत संतयोद्धा होऊन गेले….रावल मल्लिनाथ त्यांचे नाव. यांच्याच वंशात विसाव्या शतकात त्यांच्यासम कीर्ती प्राप्त करणारे एक योद्धे जन्मले. सैनिकी जीवनात युद्धभूमीवर आणि आध्यात्मिक जीवनात एक कठोर वैराग्यवान संत म्हणून त्यांची कामगिरी अजोड म्हणावी अशीच आहे. त्यांचं नाव होतं हनुत. हनुत म्हणजे उगवत्या सूर्यासमान तेजस्वी! हेच आपले लेफ्टनंट जनरल हनुतसिंग राठौर साहेब. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातले एक महानायक.
लेफ्टनंट कर्नल अर्जुनसिंग यांच्या पोटी ६ जुलै, १९३३ रोजी जन्म घेतलेल्या हनुत सिंग यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत १९५२ मध्ये भारतीय सैन्याच्या १७, हॉर्स अर्थात पुना हॉर्स रेजिमेंट मध्ये अधिकारी म्हणून दिमाखात प्रवेश केला. याच रेजिमेंटच्या सर्वोच्च नेतेपदापर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मजल मारली! द पुना हॉर्स नावामागेही एक रंजक इतिहास दडलेला आहे. दुसरे बाजीराव पेशवे आणि लॉर्ड हॅस्टिंग यांच्यात १३ जून १८१७ या दिवशी एक लष्करी करार झाला होता. यानुसार दी पूना इररेग्युलर हॉर्स नावाचे अश्वदल उभारले गेले. या दलाचा सर्व खर्च दुस-या बाजीराव पेशव्यांनी करायचा आणि हे दल आणि हे दल पेशव्यांच्याच इलाख्यात राहील असे ठरले. पुण्यात करार झाल्याने या रेजिमेंटला पुणे हे नाव चिकटले. या रेजिमेंटमध्ये प्रामुख्याने उत्तम प्रजातींच्या अश्वांचा समावेश असे. पुढे काळानुसार स्वयंचलित वाहने, रणगाडे इत्यादी आधुनिक साधनांचा समावेश केला गेला. मात्र नाव तेच ठेवले गेले हॉर्स रेजिमेंट.
जमिनीवरच्या युद्धात रणगाड्यांचं महत्त्व आजही अपार मानले जाते. विशेषत: पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राजस्थान सारख्या सपाट, वालुकामय प्रदेशातून पुढे मुसंडी मारायाची असेल तर रणगाड्यांना पर्याय नाही. म्हणूनच आजवर झालेल्या युद्धांत दोन्ही बाजूंनी रणगाड्यांचा वापर केला गेल्याचे दिसते. हे रणगाडे म्हणजे मरूभूमीवरचे अश्वच म्हणावेत! १९६५ च्या भारत-पाक युद्धापासून पुना हॉर्सकडे सेंचुरियन नावाचे रणगाडे होते. या युद्धात लेफ्ट्नंट कर्नल ए. बी. तारापोर यांनी प्रचंड कामगिरी करून पाकिसानचे ६० रणगाडे उध्वस्त केले होते. पण दुर्दैवाने तारापोर साहेबांच्या रणगाड्यावर तोफगोळा आदळून साहेब वीरगतीस प्राप्त झाले. त्यांना परमवीर चक्र मरणोत्तर दिले गेले. याच रेजिमेंटमध्ये हनुतसिंग साहेब पुढे सहभागी झाले होते.
१९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध कधीही सुरू होईल अशी चिन्हे होती. आणि तत्कालीन सेनाप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी काळाची पावले ओळखून रणगाड्यांची व्युहरचना आधीच निश्चित करून सरावही सुरु केला होता….याला म्हणतात लष्करी नेतृत्व! आणि ही जबाबदारी पेलली होती हनुत सिंग साहेबांनी. पुढे सैन्य इतिहासात अमर झालेली बसंतरची लढाई होणार होती आणि या लढाईचे नायक असणार होते लेफ्टनंट कर्नल हनुतसिंग साहेब.
पाकिस्तानने आगळीक केल्यानंतर भारतानेही प्रतिआक्रमण केले. इंडियन फर्स्ट कोअरचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट जनरल के. के. सिंग साहेबांनी पाकिस्तानी क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. त्यांच्यासोबत ५४वी इन्फंट्री डिवीजन, १६वी आर्मर्ड ब्रिगेड होती. परंतू त्यांना पाकिस्तानच्या जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. विशेषत: शत्रूने युद्धक्षेत्रात हजारो भूसुरुंग पेरून ठेवलेले होते. भूसुरुंग निकामी करून रस्ता सुरक्षित केला गेल्यावरच सैन्याला पुढे सरकता येत होते आणि यात वेळ लागत होता. आणि युद्धात तर प्रत्येक क्षण मोलाचा!
इकडे रस्त्यात भूसुरुंग आणि पाकिस्तान्यांचा बेफाम बॉम्बवर्षाव… परिस्थिती नाजूक होती. एका नदीच्या पुलाजवळ वेगाने पोहोचता आले तर रणगाडे आणि सैन्य पुढे जाऊ शकणार होते. आणि सुमारे सहाशे मीटर्समधील रस्त्यातले सुरुंग निकामी करण्याचे काम शिल्लक होते.
इथे हनुतसिंग साहेबांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. यात धोका तर प्रचंड होता. जमिनीखाली मृत्यू टपून बसला होता. सरावाने आणि मनोबलाने पाकिस्तानच्याही पुढे दोन पावले असणा-या हनुत सिंग साहेबांच्या सैनिकांनी साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांनी आपले रणगाडे त्या रस्त्यावरून पुढे हाकारले. कोणत्याही क्षणी सुरुंग फुटू शकला असता आणि रणगाड्याच्या चिथड्या उडाल्या असत्या. पण त्यादिवशी रणदेवता हनुत सिंग साहेबांवर प्रसन्न असावी. कर्तव्यावर असताना मनातल्या मनात अध्यात्मिक उपासना आणि फुरसतीच्या वेळी प्रत्यक्ष उपासना करणा-या हनुत सिंग साहेबांच्या पुण्याचे फळ म्हणावे हवं तर पण त्या दिवशी या रणगाड्यांच्या रस्त्यात एकही सुरुंग फुटला नाही. संपूर्ण दल नदीपर्यंत सुखरूप पोहोचले… एका महाधाडसी निर्णयाला दैवानेच आशीर्वाद दिला होता! दुस-याच दिवशी याच मार्गाने गेलेली आपली दोन लष्करी वाहने भुसुरुंगात नष्ट झाली. याला हनुतसिंग साहेबांनी देवाचा आशीर्वादाचा हात मानले. योगायोगाने पुना हॉर्सच्या मानचिन्हात उंचावलेल्या हाताची प्रतिमा आहे….हाच तो दैवी आशीर्वादाचा हात असावा!
या कारवाईदरम्यान पाकिस्तान प्रचंड प्रमाणावर बॉम्बवर्षाव, गोळीबार करत होता. परंतू मरण वर्षावातूनही हनुत सिंग साहेब युद्धक्षेत्रात एका जागेवरून दुस-या जागेवर नीडरपणे आणि अतिशय चपळाईने फिरत होते. त्यांनी प्रशिक्षित केलेला प्रत्येक टॅंक कमांडर अर्थात रणगाडा प्रमुख त्यांना वैय्यक्तिकरीत्या माहित होता. प्रत्येक रणगाडा त्यांच्या जणू हाता खालून गेलेला होता. युद्धपूर्व काळात त्यांनी आपल्या रेजिमेंटमध्ये अतीव धैर्य, उत्साह आणि साहस जणू पेरून ठेवले होते… जसा एखादा निष्णात शेतकरी पावसाच्या आधी उत्तम बियाणे पेरून ठेवतो तसा. आणि इथे तर हे बियाणे उगवण्यास आणि फोफावण्यास अगदी उतावीळ होते. या रेजिमेंटमधील कुणालाही उन्हाची, धुळीची आणि जीवाची पर्वा नव्हती. शांतता काळात त्यांनी सरावात गाळलेले घामाचे थेंब युद्धात मोत्यांसारखे शोभून मातृभूमीच्या कंठात विजयमालेत शोभून दिसणार होते.
पुढे गेलेला रणगाडा एक इंचही मागे सरकता कामा नये असा हनुतसिंग साहेबांचा स्पष्ट आदेश होता. एखादा रणगाडा मागे फिरला म्हणजे आपला पराभव होतो आहे, असे सैन्याला वाटून मनोबल खालावू शकते, असा साहेबांचा विचार होता आणि तो योग्यही होता. निशाण पडले की सैन्याची पावलं डगमगू शकतात असा इतिहासही आहेच. अर्थात भारतीय सैनिक असे काहीही होऊ देणार नव्हते. त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांना मागे रेटीत रेटीत नेले आणि आपण ती लढाई जिंकलो. यात पाकिस्तानच्या अत्यंत शक्तिशाली १३, लान्सर्स ही रणगाडा दल तुकडी पुरती नेस्तनाबूत झाली होती. त्यांच्याकडे अमेरिकेतून आयात केलेले शक्तीशाली पॅटन रणगाडे होते. पण शस्त्रांमागची मनगटे आणि मने बलवान असावी लागतात. आणि भारतीयांची तशी असतातच हे सिद्ध झाले. खुद्द पाकिस्तानी सैन्याने आपल्या या पुना हॉर्स रेजिमेंटला ‘फक्र-ए-हिंद अर्थात ‘हिंदुस्थानचा अभिमान’ म्हणून गौरवले!
हनुत सिंग साहेब अंगाने सडपातळ आणि उजळ वर्णाचे. नाक टोकदार. डोळे पाणीदार. रेजिमेंटमधील सर्वसामान्य सैनिकांसाठी भावाप्रमाणे, पित्याप्रमाणे वागणारे. पण शिस्तीत अतिशय नेमके आणि कडक. रेजिमेंटमधील कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरतून सुटत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनावश्यक गोष्टीत त्यांना जराही रस नव्हता. मूर्खांसाठी त्यांच्याकडे वेळ नसे. सैन्यात कागदोपत्री कामेही भरपूर आणि महत्त्वाची असतात. पण या कामांमुळे मूळच्या कर्तव्याला पुरेसा वेळ देता येत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही, असे ते स्पष्टपणे बजावत असत. सैनिक कागदांत गुंडाळला गेला तर शस्त्रं कधी चालवणार असा त्यांचा खडा सवाल असे. स्वत: साहेबांनी १९५८ मध्ये इंग्लंड येथे सेंन्च्युरीयन रणगाडा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत उत्तीर्ण केला होता. आणि यामुळेच त्यांना आपल्या महाराष्ट्रातील नगर येथील आर्मर्ड कोअर सेंटर अॅन्ड स्कूल येथे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले होते. पायदळ ज्या तत्वावर युद्ध लढते ती तत्वे आणि स्वयंचलित वाहनांच्या साहाय्याने जी लढाई लढली जाते त्यात बराच फरक असतो हे त्यांनी ताडले. स्वयंचलित वाहनांचा लढाईत वापर जर्मनांनी खूप परिणामकारक रितीने केला होता. त्यांच्या पॅन्झर रणगाड्यांच्या व्युव्हरचनेचा हनुतसिंग साहेबांनी खूप बारकाईने अभ्यास केला. आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक साहित्य तयार केले. इथून हनुतसिंग साहेबांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर नेमले गेले. १९७० मध्ये साहेबांना पुन्हा नगर मध्ये नेमले गेले. १९५८ मध्ये केलेल्या नोंदी त्यांनी जपून ठेवल्या होत्या. त्यांच्या साहाय्याने साहेबांनी पुन्हा नवे लेखी साहित्य तयार केले. त्यावर आधारीत युद्धाभ्यास करवून घेतला. मुख्य म्हणजे सैनिकांत नवा जोश भरला. १९७० मध्ये साहेबांना पुना हॉर्समध्ये नेमले गेले. १९७१ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी आणि ते हाकणा-या बहाद्दरांनी जी कामगिरी बजावली ती जगजाहीर आहे. या लढाईत स्वर्गीय अरूण खेत्रपाल यांनी बजावलेली कामगिरी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढील लेखात लिहीनच.
एक वीर योद्धा, सैनिक प्रशासक, प्रशिक्षक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या महान व्यक्तीची दुसरी बाजू सुद्धा तितकीच वेगळी आहे. संसाराच्या जबाबदा-या सैनिक कर्तव्यात बाधा आणतील म्हणून हनुत सिंग साहेबांनी लग्न केले नाही. १९६८ मध्येच त्यांनी शिवबालयोगी नावाच्या विरक्त संतांचे अनुयायीत्व स्विकारले होते. आणि सैन्यजीवनातही अध्यात्मिक साधना सुरूच ठेवली होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:ला अध्यात्मिक चिंतनात अधिक रममाण करून घेतले. एका सैन्याधिका-याच्या अंगावर आता साधुची वस्त्रे आली होती. आणि याही क्षेत्रात ते अभ्यासू, कडक शिस्तीचे आणि कठोर योगी म्हणून नावारूपास आले. सैनिक तो योगी हा त्यांचा प्रवास अनोखा आणि वंदनीय आहे. १० एप्रिल, २०१५ या दिवशी संत हनुतसिंग साहेबांनी समाधी घेऊन आपले जीवीतकार्य संपवले. समाधी अवस्थेत गेल्यानंतर तिस-या दिवशी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. या तिन्ही दिवसांत त्यांचा देह, मुख अत्यंत तेजस्वी दिसत होते….. त्यांच्या नावाला साजेसे… हनुत म्हणजे उगवणा-या सुर्याचे तेज!
भारतमातेच्या या सुपुत्रास साष्टांग दंडवत आणि श्रद्धांजली.