मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(हो आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. 🙂 – इथून पुढे 

तर; लक्ष्मी रोड / टिळक रोड किंवा इतर खरेदीच्या ठिकाणी आपले हे लोक गळ्यात आपण दिलेली हि पाटी अडकवून फिरतील आणि ज्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे, अशा सर्वांना आपले हे लोक, आपली कापडी पिशवी त्यांना Get Well Soon म्हणत देतील…! (सिनेमा ने आपल्याला हा एक लय भारी शब्द दिला आहे)

जे आपले लोक रस्त्यावर अशा मोफत पिशव्या देतील, त्या प्रत्येकाला आपण एका पिशवी मागे पाच रुपये देणार आहोत,  म्हणजे एखाद्या व्यक्तीने शंभर पिशव्या वाटल्या तर त्यालाही पाचशे रुपये मिळतील… 

आपले लोक पिशव्या देतात की नाही….  

हे बघण्यासाठी मी आपल्या इतर 4 – 5 लोकांना (जे सध्या इमाने इतबारे भीक मागतात अशांना)  गुपचूप नजर ठेवण्यास सांगणार आहे…  त्यांनाही त्या बदल्यात दोन रुपये प्रति पिशवी देणार आहोत…. 

म्हणजे एखाद्याने शंभर पिशव्या दिल्या तर नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला आपोआप दोनशे रुपये मिळतील…

ज्या माझ्या लोकांना आपण पिशव्या वाटायला देणार आहोत ते अत्यंत विश्वासू आहेत, त्यांच्यावर खरंतर कोणीही नजर ठेवण्याची गरज नाही…. 

पण, दारू पिणाऱ्या माणसाला दारूचे दुकान बघितलं की दारूची आठवण येते… तसंच भीक मागण्याच्या काही जागा फिक्स असतात, त्या जागी गेल्यानंतर भीक मागण्याची इच्छा आपोआप होते…. 

आणि म्हणून नजर ठेवण्याच्या निमित्ताने / बहाण्याने इतर चार-पाच जणांना भीक मागण्याच्या जागेतून  त्यांच्याही नकळत बाहेर काढता येईल. इथे आपण माणसाच्या स्वभावाचा वापर करून घेणार आहोत. 

आता बरेच लोक मला असे म्हणतील…. फुकट कशाला द्यायच्या आपल्या पिशव्या??? 

परंतु हि एक बिझनेस ट्रिक आहे, आधी फुकट द्यायचं…. सवय लावायची…. आणि त्यानंतर तीच गोष्ट दामदुपटीने विकायची… ! (अधिक माहितीसाठी मागील पाच वर्षातील स्वतःच्या घरातील वर्तमानपत्रे स्वतः चाळावीत, सर्वच माहिती देण्याचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही. ताजा कलम : पाच रुपये किलो हिशोबाने आपण वर्तमानपत्रे अगोदरच रद्दीत विकली असतील तर त्याला आम्ही जबाबदार नाही) 

बापरे… चुकून एक टोमणा मारला गेला की…. सवय हो सवय…. दुसरं काय…. ? 

तर, अनेक लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी हि बिझनेस ट्रिक वापरतात…. आपण दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी, दुसऱ्या एखाद्याला जगवण्यासाठी जर हि ट्रिक वापरली तर त्यात गैर काय…? 

विचार करा…. इतक्या साध्या गोष्टीमुळे किती कुटुंबं उभी राहतील ? रस्त्यावरचे  किती भिक्षेकरी कमी होतील ?? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर किती कमी होईल ??? 

पिशव्या शिवणारे, विकणारे आणि नजर ठेवणारे यांना यातून पैसे मिळतील हा एक भाग आहेच…  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गोष्टींमुळे भीक मागण्यापासून आपण त्यांना विचलित करणार आहोत… हे सर्व करत असताना, नुसते फिरायचे त्यांना पैसे मिळत असतील, भीक मागायच्या जागेवर जर ते थांबणार नसतील…. तर त्यांना भीक मागायची आठवण तरी राहील का…. ??? 

रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं देऊन त्याचं लक्ष विचलित करून त्याला शांत करणं… जगातल्या प्रत्येक आई आणि बापाने हेच आजवर केलं आहे…. 

(हल्ली रडणाऱ्या बाळाच्या हातात आई मोबाईल फोन देते तो भाग वेगळा, बाळ शांत झालं की मग कसं शांततेत फेसबुक, इन्स्टा वगैरे पाहता येतं 

असो, तीच संकल्पना आपण इथे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. ! तेच साधं सोपं गणित वापरण्याचा इथे प्रयत्न आपण करत आहोत…. 

शिवाय फुकट देऊन सुद्धा, “चीत भी हमारी पट भी हमारी”…. !!! 

४.  यानंतर पुण्यातले मोठे मॉल, दुकानदार यांना मी स्वतः भेटेन…  हात जोडून त्यांना आपल्या पिशव्या विकत घ्यायची विनंती करेन. यातून जो पैसा मिळेल तो  पिशव्या शिवणाऱ्या, विकणाऱ्या आणि नजर ठेवणाऱ्या व्यक्तींना आपण परत करू. 

यानंतर मला माहित आहे…. 

आता आपला प्रश्न येईल, आम्ही यात काय मदत करू शकतो… ???

१. तर, पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकची पिशवी वापरणे बंद करा माय बाप हो…..आणि स्वतःच्या घरातील कापडी पिशवी वापरा; नसेल तर आमच्याकडे मागा. आम्ही ती तुम्हाला पाठवू “चकटफू”…!!! 

२. एक फूट उंच, अर्धा फूट रुंद अशा आकाराच्या पिशव्या शिवता येतील असे कापड आपण आम्हाला देऊ शकता. उदा.जुनी ओढणी, जुनी साडी, मांजरपाटाचे किंवा तत्सम कापड इत्यादी…. (अंगडी टोपडी, फाटके बनियन, विरलेले रुमाल, तसेच घरात जुने शर्ट पॅन्ट पडलेच आहेत तर देऊन टाकू….  असे टाकाऊ कपडे इत्यादी गोष्टी देऊ नयेत… वितभर कपड्यापासून हातभर पिशवी तयार करायला आमचे पितामह काही स्वर्गातून ट्रेनिंग घेऊन आलेले नाहीत…  )

नाही म्हणता म्हणता, अजून एक टोमणा गेलाच की राव चुकून…. ! 

जाऊ द्या…. 

३. आपल्या परिसरातील दुकानदार / मॉल यांना आमच्या वतीने या पिशव्या कमीत कमी किंमतीत विकत घ्यायला विनंती करू शकता. यालाही ते तयार नसतील तर आम्ही त्यांना Get well soon म्हणत फुकट पिशव्या पाठवू…. 

प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि भिक्षेकर्‍यांचे लक्ष विचलित करणे हा आमचा मूळ हेतू आहे, यातून कोणताही व्यवसाय करण्याचा हेतू नाही…! 

४. माझ्याकडे जमा होत असलेल्या देणगीचा विचार करून मी सुरुवातीला साधारण दहा ते बारा लोकांना अशा प्रकारे काम देऊ शकतो. पण भीक मागणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून, त्यांना मानधन मिळावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद व्हावा…. हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर करता यावा…. यासाठी आपण आम्हाला ऐच्छिक देणगी देऊ शकता. 

17 एप्रिल माझा वाढदिवस… याच दिवशी श्रीराम नवमी होती…. याच दिवसाच्या मध्यरात्री मला हि संकल्पना सुचली…. योगायोग म्हणायचा की आणखी काही ? मलाही कळत नाही….! 

आपण कुणीही श्रीराम बनू शकत नाही…. पण आपल्या जवळ असणारे “भात्यातले बाण” आपण समाजासाठी “रामबाण” म्हणून तर नक्कीच वापरू शकतो… 

बघा पटतंय का… ??? 

माझ्या वाढदिवसा दिवशी मला सुचलेली ही संकल्पना… ! 

यामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्लास्टिकचा वापर कमी होईल, त्यामुळे निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचू शकतील, अनेक सामाजिक आणि वैद्यकीय धोके थोड्या तरी प्रमाणात कमी होतील… माझे भीक मागणारे किमान दहा ते बारा लोक पहिल्या फटक्यातच भिकेतुन बाहेर पडतील… 

“भिक्षेकरी”  म्हणून नाही…. तर “कष्टकरी” होऊन; ‘गावकरी” म्हणून जगण्याकडे ते एक पाऊल टाकतील…! 

वाढदिवसाचं इतकं मोठं गिफ्ट या अगोदर मला कधीही मिळालं नव्हतं…!!! 

आयुष्यभर ऋणात राहीन मी या गिफ्टच्या….!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

विसरशील खास मला दृष्टिआड होता …

कुणी काही म्हणा .. कुणी काही म्हणा …

रामचंद्र मनमोहन .. नेत्र भरून पाहीन काय …

त्यांच्याच पावलांचा .. हा नाद ओळखीचा …

अशी एकापेक्षा एक सरस भावगीते लिहिणाऱ्या कवीचं नांव तुम्हाला माहित असेलच … ज.के.उपाध्ये !

कवी – ज. के. उपाध्ये

(जन्म १८८३ आणि मृत्यु १९३७.)

काहीसं बेफिकिर, भरकटलेलं, मस्त कलंदर आयुष्य जगलेल्या या कवीच्या एका भावगीताला यशवंत देव यांच्या अतिशय आकर्षक चालीचं लेणं मिळून ते सुधा मल्होत्राच्या आवाजांत आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते १९६०-६१ साली.  पण खऱ्या अर्थानं ते आमरसिकांपर्यंत पोहोचलं १९७६ मध्ये आशाबाईंची ध्वनिमुद्रिका आली तेव्हा. म्हणजेच कवीच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी. या भावगीतानं साऱ्या रसिक मनाला हेलावून टाकलं. हे गाणं होतं – “विसरशील खास मला दृष्टिआड होता !!”

नंतर त्यांच्या इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका येतच राहिल्या. पण स्वतः कवीला मात्र आपल्या हयातीत आपले शब्द रसिकांपर्यंत पोचल्याचं भाग्य कधीच बघायला मिळालं नाही.

आईचं छत्र लहानपणीच हरवलेलं आणि वडील अतिशय तापट-संतापी! त्यामुळे लहानपणापासूनच फारशी माया, जिव्हाळा उपाध्ये यांच्या वाट्याला आला नाही. कदाचित त्यामुळेच उपाध्ये काहीसे एककल्ली, तऱ्हेवाईकही झाले होते.

१९०५ मध्ये विरक्ती आल्यामुळे, कुणालाही न सांगता, उपाध्ये अचानकपणे हनुमान गडावर गेले. तेथे त्यांनी दासबोधासह अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणं केली.

१९०८ साली ते हनुमान गडावरून परत आले. विवाह झाला. कन्यारत्न घरी आले. पण दहा वर्षांतच पत्नीच्या आणि कन्येच्या मृत्यूमुळे, त्यांचे कौटुंबिक आयुष्य संपुष्टात आले. याच काळात त्यांच्या काव्यरचना आणि अन्य गद्य साहित्य यांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. १९२४ मध्ये “लोकमान्य चरितामृत खंड १” हा त्यांचा लो. टिळकांवरचा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे “पोपटपंची” हा कवितासंग्रह. १९३२ साली उमर खय्यामच्या रुबायांचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. “वागीश्वरी” आणि “सावधान” या त्या काळच्या नियतकालिकांची जबाबदारी सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

चालचलाऊ भगवद्गीता ” हे विडंबनात्मक काव्य लिहायला त्यांनी सुरुवात केली होती. पण ते खंडकाव्य काही ओव्या लिहिल्यानंतर अपूर्णच राहिलं असावं. याच काव्यावरूनच ज्येष्ठ विद्वान राम शेवाळकर यांनी उपाध्यांचा गौरव मराठी विडंबन काव्याचे आद्य उद्गाते अशा शब्दांत केला आहे.

“सावधान” हे त्यांचं नियतकालिक ऐन बहरांत असतांनाच, विषमज्वराच्या व्याधीनं १ सप्टेंबर १९३७ रोजी ज.के.उपाध्यांना मृत्यूच्या हवाली केलं.

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली अखेरची कविता म्हणजे :

एकटाची आलो आता

एकटाची जाणार

एकटेच जीवन गेले

मला मीच आधार ||

आपलं भाग्य असं की आपल्याला हा कवी त्याच्या कर्णमधुर भावगीतांमधून अनुभवायला मिळाला !

☆ चालचलाऊ भगवद्गीता : ज.के.उपाध्ये ☆

पार्थ म्हणे गा हृषीकेशी

या युद्धाची ऐशीतैशी

बेहत्तर आहे मेलो उपाशी

पण लढणार नाही  -१-

धोंड्यात जावो ही लढाई

आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावई

बाप, दादे, मामे, काके  -२-

काखे झोळी, हाती भोपळा

भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला

आपसात लठ्ठालठ्ठी  -३-

या बेट्यांना नाही उद्योग

जमले सारे सोळभोग

लेकांनो होऊनिया रोग

मरा ना कां  -४-

लढाई कां असते सोपी

मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी

मुंडकीहि छाटती  -५-

कृष्ण म्हणे रे अर्जुना

हा कोठला बा बायलेपणा

पहिल्याने तर टणाटणा

उडत होतास  -६-

लढण्यासी रथावरी बैसला

शंखध्वनि काय केला

मग आताच कोठे गेला

जोर तुझा मघाचा?  -७-

तू बेट्या मूळचाच ढिला

पूर्वीपासून जाणतो तुला

परि आता तुझ्या बापाला

सोडणार नाही बच्चमजी  -८-

अहाहारे भागूबाई

आता म्हणे मी लढणार नाही

बांगड्या भरा की रडूबाई

बसा दळण दळत  -९-

कशास जमविले अपुले बाप

नसता बिचा-यांसी दिला ताप

घरी डाराडूर झोप

घेत पडले असते  -१०-

नव्हते पाहिले मैदान

तोवरी उगाच केली टुणटुण

म्हणे यँव करीन त्यँव करीन

आताच जिरली कशाने  -११-

अरे तू क्षत्रिय की धेड

आहे कां विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड

टाळक्यांत शिरले कोठुनी  -१२-

अर्जुन म्हणे गा हरी

आता कटकट पुरे करी

दहादा सांगितले तरी

हेका कां तुझा असला  -१३-

आपण काही लढणार नाही

पाप कोण शिरी घेई

ढिला म्हण की भागूबाई

दे नांव वाटेल ते  -१४-

ऐसे बोलोनि अर्जुन

दूर फेकूनि धनुष्य-बाण

खेटरावाणी तोंड करून

मटकन खाली बैसला  -१५-

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः

कवी – ज. के. उपाध्ये 

माहिती संग्राहक व लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“पुणेरी टोमणे मारूया… प्लास्टिकला पळवून लावूया… “

प्लास्टिकच्या वस्तू…. खास करून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या यांचे विघटन होत नाही.

पुरातन काळात राक्षस नावाची संकल्पना होती, आजच्या काळात प्लास्टिकच्या पिशव्या हाच एक राक्षस आहे. विघटन न झाल्यामुळे पर्यावरणाला धोका… माणूस म्हणून आपल्यालाही अनेक वैद्यकीय – सामाजिक धोके…. आणि उकिरड्यात पडलेल्या पिशव्या निष्पाप मूक प्राण्यांच्या पोटात जातात आणि त्यांचे मृत्यू होतात.

गोहत्या थांबवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात; परंतु प्लास्टिक पिशव्या खाऊन ज्या गोमाता देवाघरी गेल्या, त्यांचा हिशोब कोणी ठेवला आहे का… ? 

हा विषय विविध स्तरावर सांगितला, तरी काही मूठभर लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

“भिक्षेकरी” हा असाच दुसरा ज्वलंत विषय…

भीक मागणारे मागतात आणि दोन पाच रुपये भीक देऊन, पुण्य मिळेल या भावनेने लोक भीक देतात…

… दोन पाच रुपयात पुण्य मिळतं ??? पुण्य इतकं स्वस्त असतं… ? 

अशा दोन पाच रुपये भीक देण्याने; देणारा, अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवायला मदत करतो, भीक मागण्यासाठी आपली मुलं पळवली जातात, चांगल्या लोकांना धाक दाखवून भीक मागायला लावली जाते, यांची मुलं कधीही शाळेत जात नाहीत, मुलांचं अख्ख आयुष्य बरबाद होतं….

अजून सुद्धा खूप काही आहे… विषय मोठा आहे, तो मी माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे…

“भीक नका देऊ… एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करा… ” हे मी विविध स्तरावर जीव तोडून सांगितलं आहे, तरी आपल्यासारखे काही संवेदनशील लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

तर या दोन समस्यांची सांगड एकत्र कशी घालता येईल याचा विचार करत होतो… ! 

भीक मागणाऱ्या लोकांची खूप मोठी ताकद आज माझ्या मागे उभी आहे…. या सेनेचा सेनापती म्हणून कसा वापर करून घेऊ ? हा सतत विचार मी करत असतो….

रस्त्यात जाताना कितीतरी वेळा आपल्याला पाईपलाईन फुटलेली दिसते, आकाशाकडे हे पाणी उंच उसळी घेत असतं…. त्याचा फोर्स खूप जास्त असतो….. म्हणजे फुटून बाहेर पडणाऱ्या या पाण्याला सुद्धा आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यात तितकी धम्मक आहे, परंतु योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही… म्हणुन मग ते पाणी निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतं आणि शेवटी एखाद्या गटारात वाहत जातं… आणि मग गटारातलं पाणी म्हणून पुढे कधीही याचा उपयोग होत नाही…. ! 

हाच संबंध मी भीक मागणाऱ्या लोकांशीही जोडतो…

त्यांच्याकडे असणारी ताकद अशीच अफाट आहे… त्यांच्यातही खूप मोठा फोर्स आहे…. त्यांनाही आभाळात उंच भरारी घ्यायची आहे; परंतु योग्य वेळी योग्य ती साथ मिळत नाही… शेवटी थकून ते सुद्धा निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतात… पुढे एखाद्या गटारात सापडतात…. आणि मग “भिकारी”असं हिनवून, त्यांच्यावर शिक्का मारून, त्यांनाही कधीही माणसात आणलं जात नाही…. !

भीक मागणाऱ्या माझ्या लोकांमध्ये असलेल्या इतक्या मोठ्या ताकदीला, सेनापती म्हणून आवरण्यास… सांभाळण्यास… वळण लावण्यास… बऱ्याच वेळा मी कमी पडतो… बऱ्याच वेळा मला अपराधी वाटतं…. !

निसर्गाने या समाजाच्या देखभालीसाठी माझी निवड केली, परंतु मी खरंच तितका सक्षम आहे का ? या विचाराने काही वेळा मी खचून जातो…. ! 

खूप वेळा मी परिस्थिती समोर गुडघे टेकतो… खाली मान घालतो… पण खाली मान घालून सुद्धा विचारच करत असतो; की मला यांच्यासाठी अजून काय करता येईल ??? 

कित्येक लोक मला म्हणतात, ‘डॉक्टर, तुम्ही किती सुखी आहात… तुम्हाला किती सुखात झोप लागत असेल…. ‘

पण मला झोपच लागत नाही; ही वस्तुस्थिती आहे… अजून काय करता येईल ? काय करता येईल ??  काय करता येईल??? – हा इतकासा किडा रोज रात्री मला चावत असतो… मग माझी झोप उडून जाते, मी घड्याळाकडे कुस बदलत येड्यासारखा पहात राहतो…. बारा वाजतात, मग दोन वाजतात, चार वाजतात, पुढे  सहा सुद्धा वाजतात… घड्याळाचा काटा शांतपणे फिरतच असतो… तो मला चिडवत असतो… आणि हे कमी म्हणून की काय अलार्म वाजतो…. उठ रे बाबा…. ! 

उठायला मी झोपलोच कुठे आहे मित्रा…. ? पण कोणाला सांगू ? 

रात्रीच्या त्या अंधारात आम्ही दोघेच जागे असतो….

एक तो घड्याळाचा काटा आणि दुसरे माझे विचार… ! 

तो शांतपणे फिरत असतो…. आणि मी  सैरभैर… !

याच सैरभैर विचार मंथनातून, एक संकल्पना माझ्या डोक्यात परवा मध्यरात्री जन्माला आली…

मला नाही वाटत, या अगोदर संपूर्ण जगामध्ये अशी काही संकल्पना राबवली गेली असेल… !

संकल्पना सांगतो थांबा…. त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….

मी मूळचा साताऱ्याचा, परंतु आख्ख आयुष्य पुण्यात गेलं… मग वाण नाही तर गुण लागणारच की…. ! 

माझ्या या पुण्यानं मला खूप काही दिलं…. त्याबरोबर टोमणे मारायला सुद्धा मला शिकवलं…

त्या अर्थाने “पुणेरी माणूस” माझा गुरु आहे… ! 

म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या घरात बसून एक फूल, सर्व अस्सल पुणेरी माणसांना नेहमीच समर्पित करतो… (हो एकच फूल मिळेल… आमच्या बागेतली सर्व फुलं तुम्हाला वहायला, आम्ही काय कुठचे जहागीरदार नाही किंवा कुठल्या संस्थानचे संस्थानिक सुद्धा नाही… शिवाय तुम्ही काय आमचे जावई नाहीत किंवा व्याही सुद्धा नाहीत… तेंव्हा एक फूल घ्यायचं तर मानानं घ्या, नाहीतर तेही आम्ही परत काढून घेऊ… )

तर हा असा आहे पुणेरी टोमण्यांचा झटका… ! 

टोचत नाही…. बोचत नाही…. पण विषय हृदयापर्यंत भिडतो थेट…. !!! 

आता वर जाऊन कंसातील वरील वाक्य परत वाचा…. वाचताना मनातल्या मनात नाकातून वाचावे, म्हणजे “कोंकणी” हापूस आंब्याचा खरा स्वाद येईल….

ओके… वर जाऊन, नाकातून वाचून…. परत खाली आला असाल, तर आता संकल्पना सांगतो…

ती मात्र नाकातून वाचायची नाही…

१. तर, अशाच पुणेरी टोमण्यांचा वापर करून मी काही बोर्ड तयार करणार आहे…. ! 

“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या आमच्याकडून घ्या…. किंमत तुम्ही ठरवाल ती…. ” अशा अर्थाचे बोर्ड तयार करून घेणार आहे, अर्थात पुणेरी स्टाईलनेच, टोमण्यांच्या स्वादासह…. ! 

२. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे अशा, सुरुवातीला किमान चार लोकांना पिशव्या शिवायला लावायच्या. त्यांना पिशव्या शिवता येईल अशा प्रकारचे कापड आपणच द्यायचे, एक पिशवी शिवल्यानंतर त्याचे पाच रुपये त्यांना द्यायचे. (दिवसातून शंभर पिशव्या त्यांनी शिवल्या तर त्यांना पाचशे रुपये मिळतील)

३. शिवलेल्या पिशव्या यानंतर पाच ते सहा भीक मागणाऱ्या इतर लोकांना देऊन; तयार केलेल्या  “पुणेरी टोमण्यांच्या पाट्या” त्यांच्या गळ्यात आणि पाठीवर अडकवायच्या….

हो – आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. :-

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी… ☆ श्री संभाजी बबन गायके 

चित्रपट संगीत श्रोत्यांच्या डोईवरचं ‘पठाणी’ कर्ज आणि आपल्याला स्वर‘सम्राज्ञी’ देणारा ‘गुलाम’!

संगीतातील ताल स्वरगंगेच्या प्रवाहावर स्वार होऊन स्वत:ला व्यक्त करीत राहतो. जाणकार म्हणतात की, ताल म्हणजे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत मूळ बारा स्वरांच्या अंगाखांद्यावर क्रीडा करीत असते. परंतू प्रत्यक्षात आपल्या कर्णपटलांना अलगद स्पर्शून जाणिवेच्या पृष्ठभागास श्रवणाची अनुभूती देणारे नाद एकूण बावीस आहेत, असं म्हणतात. सर्वपरिचित सारेगमपधनी हे सप्तशुद्ध आणि रे, ग, ध, नी हे कोमल स्वर आणि तीव्र स्वर म्हणजे म! पण या द्वादश-स्वरांच्या अंतरंगात आणखी खोलवर बारा स्वरकमलं असतात. स्वरांच्या या खोल डोहात सहजी ठाव घेऊन पुन्हा श्वास राखून गाण्याच्या पृष्ठभागावर येणं फक्त एकाच मानवी कंठाला शक्य झालं… तो कंठ म्हणजे लता मंगेशकर यांचा कोकिळकंठ! लता शब्द उलट्या क्रमानं म्हणला तर ताल बनून सामोरा येतो !

हा ताल आणि ही स्वरलता रसिकांच्या हृदयउपवनातील एखाद्या डेरेदार वृक्षाला कवेत घेऊन आभाळापर्यंत पोहोचली असतीच केव्हा न केव्हा तरी. जसे कृष्णपरमात्मा धर्मसंस्थापनार्थाय कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्मायचेच होते….. देवकी निमित्त्त झाल्या आणि यशोदा पालनकर्त्या !

विपरीत कौटुंबिक परिस्थितीमुळे लतादीदींना मुंबईत येणं भाग पडलं. आणि मनाविरुद्ध अभिनय करावा लागला. मनात गाणं असतानाही पोटातलं भुकेचं गाणं वरच्या पट्टीतलं होतं… त्यामुळे वीजेच्या प्रखर दिव्यांसमोर उभं राहून खोटं खोटं हसावं लागलं, रडावं लागलं आणि दुस-यांच्या स्वरांवर ओठ हलवत गावंही लागलं. पण हे सुद्धा मागे पडलं. रोजगारासाठी काहीतरी करणं भाग होतं आणि एकेदिवशी एका स्नेह्यांच्या पुढाकारानं गाण्याची संधी मिळाली. वसंत जोगळेकरांच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात दीदींना ‘पा लागू… कर जोरी…. कान्हा मो से ना खेलो होरी’ गायलं. हे त्यांचं पहिलं ध्वनिमुद्रीत हिंदी चित्रपट गीत. , वर्ष होतं १९४६. बडी मां या चित्रपटातही एक गाणं मिळालं होतं ‘मां तेरे चरनों में’! आणि पुढे सुभद्रा या चित्रपटातही एक भजन मिळालं होतं. पण या कामगिरीचा प्रभाव त्यावेळच्या हिंदी चित्रपट सृष्टीवर फारसा पडला नव्हता.. लता नक्षत्र अजून ठळकपणे उदयास यायला अवकाश होता. पुढे ज्या लव इज ब्लाईंड या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली तो चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही. हा इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट कायमचे डोळे मिटून बसला. त्यामुळे या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत झालेली गाणी मूक झाली. पण याच वेळी एका पठाणाच्या कानांनी हा आवाज मनात साठवून ठेवला. या पठाणाच्या मूळ नावाचा शोध काही केल्या लागत नाही. खरं तर चित्रपटांसाठी मामुली भूमिका करणारे लोक (एक्स्ट्रा कलाकार) निर्मात्यांना पुरवणारा हा माणूस. पण त्याला संगीताचा कान असावा, हे विशेष आणि आपल्यासाठी आनंददायी ठरले. या माणसाने मास्टर गुलाम हैदर अली यांच्याकडे त्यावेळी केवळ अठरा वर्षे वय असलेल्या या कोवळ्या आवाजाची महती गायिली. गुलाम हैदर हे पाकिस्तानातून भारतात आले होते तेच मूळी संगीतकार म्हणून कारकीर्द करायला. आणि संगीत दिग्दर्शक म्हणून तर ते अतिशय उजवे होतेच. परंतू यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या आवाजांना संधी देणे. शमशाद बेगम, सुधा मल्होत्रा, सुरींदर कौर या गायिका मास्टर गुलाम हैदर यांनीच रसिकांसमोर आणल्या. आता त्यांच्या हातून एक अलौकिक रत्न चित्रपट-संगीत क्षेत्राला सोपवले जाणार होते…. लता मंगेशकर!

मास्टरजींनी लतादीदींना भेटीस बोलावण्याचा निरोप याच पठाण दादाच्या हाती धाडला. दीदींना त्यांना त्यांचेच एक गाणे ऐकवले… त्यांनी आणखी एक गाणे गा असा आग्रह धरला आणि मास्टर हरखून गेले. मात्र दीदींनी त्या ध्वनिमुद्रिकांत गायलेल्या गायिकांच्या आवाजाची नक्कल करीत ती गाणी हुबहू गायली होती. त्यांनी लतादीदींचा आवाज ध्वनिमुद्रीत केला आणि ते दीदींना घेऊन ताबडतोब दीदींना शशधर मुखर्जी या निर्मात्याकडे नेले. मुखर्जींनी लतांचे ध्वनिमुद्रीत गाणे ऐकले. मूळातच अतिशय कोवळा आणि विशिष्ट पातळीवर लीलया जाणारा आवाज, त्यात कोवळे वय. शशधर मुखर्जींच्या चित्रपटातील नायिका कामिनी कौशल वयाने लतादीदींपेक्षा मोठी होती आणि त्यामुळे हा पातळ आवाज त्या नायिकेला शोभणार नाही अशा अर्थाने त्यांनी यह आवाज नहीं चलेगी! असं म्हटलं असं म्हणतात. यात नायिकेसाठी हा आवाज चालणार नाही असं त्यांना म्हणायचं असावं! आणि ते खरेच होतं. कारण पुढे याच शशधर मुखर्जी यांनी अनारकली आणि नागिन या चित्रपटांसाठी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली!

परंतू यह आवाज नहीं चलेगी असं ऐकल्यावर मास्टर गुलाम हैदर रागावले. त्यांनी काहीशा तिरीमिरीनेच दीदींना स्वत:सोबत यायला सांगितले. एका स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या चित्रपटासाठी एक गाणं हवं होतं स्त्री गायिकेचं. दीदी आणि मास्टरजी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. मास्टर्जींनी खिशातून ५५५ ब्रॅन्डचं सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यावर ठेका धरला. आणि दीदींना गाण्याचा मुखडा सांगितला… दिल मेरा तोडा…. हाय… मुझे कहीं का न छोडा! मुखर्जींनी बहुदा गुलाम हैदर यांचं दिल फारच जोरात तोडलं असावं! मग त्यांनीही जिद्दीनं जगाला कहीं का सोडलं नाही! रेल्वेगाड्यांच्या, प्रवाशांच्या, विक्रेत्यांच्या गदारोळात एक भावी गानसम्राज्ञी गात होती! मास्टर गुलाम हैदर त्यांनी त्याच दिवशी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचं नाव होतं मजबुर (1948). मुन्नवर सुलताना नावाची अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. आणि तिच्यासाठी शमशाद बेगम किंवा नूरजहां यांचा आवाज मास्टर गुलाम हैदर वापरतील असा सर्वांचा होरा होता. परंतु त्यांनी तर लता मंगेशकर नावाच्या नव्या मुलीला हे गाणं देऊ केलं होतं. त्यामुळे निर्माते नाराज झाले होते. यावर मास्टरजींना अतिशय राग आला. आधीच शशधर यांनी नकारघंटा वाजवून मास्टरजींच्या पारखी नजरेवर प्रश्नचिन्ह उमटवलं होतंच! त्यांनी मी हा चित्रपट करणारच नाही असं सांगितलं आणि आपल्या साहाय्यकाला निर्मात्यांचे पैसे परत देण्यास फर्मावले. आणि त्याला त्यांना हे ही बजावून सांगायला सांगितलं की ही छोटी मुलगी पुढे गानसम्राज्ञी होईल हे लक्षात ठेवा! पण सुदैवाने निर्मात्यांनी गुलाम हैदर यांचे म्हणणे मान्य केले. आणि मजबूर ची गाणी लतादीदींना मिळाली. मास्टर गुलाम हैदर अतिशय कडक शिस्तीचे संगीतकार होते.. त्यांनी लतादीदींकडून अतिशय मेहनत करून घेतली. मास्टरजींकडे दीदींचं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रीत झालं ते मुकेश यांच्यासह गायलेलं होतं…. अब डरने की कोई बात नहीं… अंग्रेजी छोरा चला गया!

आता दीदींना आपला स्वत:चा आवाज गवसला होता. दिल मेरे तोडा या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर मास्टर गुलाम हैदर यांनी लतादीदींना सांगितलं… लोक नूरजहांला सुद्धा विसरून जातील तुझं गाणं ऐकल्यावर! मास्टरजींची भविष्यवाणी पुढे अक्षरश: प्रत्यक्षात उतरली हा इतिहास आहे. चित्रपट संगीताच्या राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी यशस्वीपणे जगापुढे आणण्याचं भाग्य लाभलेल्या या श्रेष्ठ संगीतकाराचं नाव गुलाम असावं हा योगायोग. आणि यांची भेट घडवून आणण्यात लोकांना व्याजानं पैसे देऊन ते दामदुप्पट वसूल करणा-या एका पठाणाची भूमिका असावी.. हा ही योगायोगच. या अर्थाने या पठाणाचे कर्ज रसिकांच्या माथी आहेच आणि ते कधीही फिटणार नाही! आणि मास्टर गुलाम हैदर… या गुलाम नावाच्या माणसाने आपल्याला गाण्याची राणी नव्हे सम्राज्ञी दिली हे ही खरेच. गुलाम या नावाचा अर्थ केवळ नोकर, सेवक, दास असा नसून स्वर्गातील देखणे, तरूण सेवेकरी असाही होतो! आपल्या चित्रपट संगीताच्या बाबतीत या गुलामाने मोठीच सेवा केली असं म्हणायला काही हरकत नाही, असं वाटतं. दस्तुरखुद्द लता दीदींनीच मास्टर गुलाम हैदर यांना त्यांचा ‘गॉडफादर’ म्हटलं आहे! मास्टर गुलाम हैदर नंतर पाकिस्तानात परतले. त्यांच्या पत्नीला लतादीदी मां जी म्हणून संबोधत आणि त्यांच्या मुलांना भाऊ मानत. मास्टरजी खूप आजारी पडले होते तेंव्हा त्यांना दीदींना भारतात उपचारांसाठी येण्याची विनंतीही केली होती आणि सर्व खर्चही करण्याची तयारी दाखवली होती.

लतादीदींबद्दल आणखी दोन तीन लेख होतील एवढं डोक्यात आहे. आपली पसंती समजली तर लिहावं असा विचार आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

एक जुनी लोककथा आहे

एकदा एक गाढवाने वाघाला म्हटलं; “कसलं निळंशार गवत आहे बघ.”

वाघ म्हणाला; ” निळं गवत? उगाच काहीही काय सांगतो रे? गवत हिरवं असतं. हेही तसंच हिरवं आहे की.”

“अरे बाबा निळंच आहे हे गवत. तुझे डोळे खराब झाले आहेत.” असं म्हणून गाढवाने “वाघाचे डोळे खराब झाले आहेत” म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू केला. 

यामुळे वैतागलेला वाघ सिंहाकडे गाढवाची तक्रार घेऊन गेला. पूर्ण प्रकरण सांगितल्यावर वाघ म्हणाला; 

“महाराज; गवत हिरवं असूनही गाढव मला मात्र निळंच असल्याचं सांगत राहिला. आणि बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकरणही न सांगताच थेट माझे डोळे खराब आहेत म्हणून खुशाल माझी बदनामी करत सुटलाय. याला शिक्षा करा महाराज.” 

सिंहाने बाजूला पडलेल्या हिरव्यागार गवताच्या गंजीकडे शांतपणे पाहिलं आणि वाघाला चार चाबकाचे फटके मारायची शिक्षा सुनावली आणि गाढवाला सोडून दिलं !

या निर्णयामुळे हैराण झालेल्या वाघाने सिंहाला शिक्षेबद्दल विचारलं. 

” महाराज; इतकं हिरवंगार गवत समोर दिसत असूनही तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच उलट शिक्षा? असं का महाराज?”

सिंह म्हणाला; ” शिक्षेचं गवताच्या रंगाशी काही देणंघेणं नाहीये. ते हिरवंच आहे; हे तुला मलाच काय .. सगळ्या जगाला माहिती आहे. पण तू वाघ असूनही एका गाढवाशी वाद घालत बसलास यासाठी तुला शिक्षा दिली आहे “

आपल्या आयुष्यात; त्यातही विशेषत: सोशल मीडियावर कोणाशी वाद घालत बसायचं याचा निर्णय नीट घेत चला ! सुप्रभात !!

लेखक – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “घेई छंद…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

“घेई छंद…. “

नागपुरातील धंतोली्वर त्या रात्री एक सुरांची अविस्मरणीय मैफिल जमली होती. तसं म्हटलं तर ती सगळी तरुण मुलंच होती. समोर श्रोत्यांमध्ये मात्र नागपुरातील जाणकार, बुजुर्ग संगीतप्रेमी होते. सुरांची ती अचाट मैफिल संपल्यानंतर समोर बसलेल्या, मैफीलीत रत असलेल्या श्रोत्यांना दाद देण्याचेही भान राहिले नव्हते. काहीतरी अलौकिक घडल्यानंतर, अनुभवल्यानंतर वातावरणात भिनलेली ती धुंद शांतता… ती अनुभवणारा तो गायक… त्याचे साथीदार…

आणि अचानक श्रोत्यांमधील एक बुजुर्ग, म्हातारा विचारता झाला…

“काहो देशपांडे… आपले घराणे कुठले ?

“आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं…. ” त्या गायकाने ताडकन उत्तर दिले… आणि

दिवाणखान्यात बसलेल्या रसिक नागपुरकरांनी आता मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.

तिशीच्या आसपास असलेला तो गायक होता… वसंतराव देशपांडे.. तबल्यावर मधु ठाणेदार… आणि पेटीच्या साथीला साक्षात पु. ल. देशपांडे.

कोणत्याही एकच घराण्याची शागिर्दी न पत्करता वसंतरावांनी अनेकांकडे सुरांची माधुकरी मागितली. आणि ती त्यांना मिळालीही. नागपुरात असलेल्या शंकरराव सप्रे गुरुजींकडे वसंतरावांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सप्रे गुरुजींच्या त्या गायनशाळेत त्यावेळी वसंतरावांबरोबर अजून एक शिष्य गायनाचे धडे गिरवत होता. दोघेही पुढे जाऊन आपल्यागुरुचे नाव त्रिखंडात गाजवतील याची सप्रे गुरुजींना कल्पनाही नसेल. त्यावेळी वसंतरावांबरोबर शिकणारा त्यांचा जोडीदार होता… राम चितळकर…. म्हणजेच सी. रामचंद्र.

नागपुरातील सप्रे गुरुजींनी गायकीचे प्राथमिक धडे तर दिले… पण आता पुढे काय?

नेमके त्याच वेळेला वसंतरावांचे मामा नागपुरात आले होते. ते रेल्वेत नोकरीला होते. लाहोरला. मामाने त्यांना आपल्याबरोबर लाहोरला नेले. त्याकाळी लाहोरला मोठमोठ्या गवयांचे वास्तव होते. अनेक मुसलमान गवयांची मामाची ओळख होती.

कुठूनतरी वसंतरावांना समजले. रावी नदीच्या पलिकडे एक कबर आहे. तेथील विहिरी जवळ काही फकीर बसतात. ते उत्तम गवयी आहेत. वसंतराव तेथे जाऊ लागले. गाणे ऐकू लागले. मामाने पण सांगितले… त्यातील मुख्य फकीर जो आहे… असद अली खां, त्याची क्रुपा झाली तर ती तुला आयुष्यभर कामाला येईल.

खांसाहेबांकडुन गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांना राजी करणे महत्त्वाचे. मामाने सांगितले… टोपलीभर गुलाबाची फुले आणि मिठाई घेऊन खांसाहेबांकडे जा. सोबतीला थोडा चरस असेल तर उत्तम. त्यांचे पाय धर. विनंती कर. हट्ट कर. मग तुला ते गायन शिकवतील.

मामाने सांगितल्याप्रमाणे वसंतरावांनी फुले, मिठाई, आणि हो…. कुठुनतरी चरसही आणला. सर्व वस्तू खांसाहेबाना अर्पण केल्या. विनंती केली. खांसाहेबाना राजी केले.

खासाहेबांनी जवळ असलेल्या विहिरीकडे त्यांना नेले. दोघेही काठावर बसले. संध्याकाळची वेळ होती. वसंतरावांच्या हातात त्यांनी गंडा बांधला. गंडा बांधणे म्हणजे शिष्य या नात्याने गुरुशी नाते जोडणे. गंडा बांधून झाला. मग त्यांनी वसंतरावांना अर्धेकच्चे चणे खायला दिले. हाही एक त्या विधीचा भाग. असले चणे खाताना, चावताना त्रास होतो. कडकडा चावून खावे लागतात. विद्या मिळवण्याचा मार्ग कसा खडतर आहे हे कदाचित त्यातून सुचवायचे असेल. चणे खाऊन झाल्यावर एक लहानसा गुळाचा खडा तोंडात घातला. कानात कुठल्यातरी रागाचे सुर सांगितले.

तालमीला सुरुवात झाली. खांसाहेबांनी जवळच्या एका फकिराला इशारा करताच त्याने ‘मारवा’ आळवायला सुरुवात केली.

वसंतराव सांगतात, “विहीरीवर बसून गाण्यातली गोम अशी होती की काठावर गायलेला सुर विहिरीत घुमुन वर येत असे आणि तंबोर्याचा सुर मिळावा तसा सुर विहीरीतुन मिळत असे “.

सतत तीन महिने खांसाहेबांनी मारवा हा एकच राग शिकवला. वसंतराव म्हणतात की तो त्यांनी असा काही शिकवला की त्या एका रागातून सगळ्या रागांचे मला दर्शन झाले.

मारवा गळ्यात पक्का बसला. आता बाकी रागांचे काय? तशी त्यांनी विचारणाही केली. त्यावर खांसाहेब म्हणाले,

” जा. तु आता गवयी झालास. एक राग तुला आला… तुला सगळे संगीत आले”.

आणि शेवटी म्हणाले….

“एक साधे तो सब साधे…

सब साधे तो कुछ नही साधे “

वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट गायक आहेत पण ते उत्तम अभिनेते पण आहेत हे सर्वांना समजले केंव्हा? तर  ‘कट्यार काळजात घुसली ‘हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा. यातील ‘खांसाहेब’त्यांनी अजरामर केला. वास्तविक त्यापुर्वी त्यांनी पु. लं. च्या ‘तुका म्हणे आता’, ‘दूधभात’ या चित्रपटांतून कामे केली होती. पण ‘कट्यार… ‘मधील खांसाहेब ने त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेले.

या महान गायकाने उदरनिर्वाहासाठी, प्रपंच चालवण्यासाठी आयुष्यातील भर उमेदीची २४ वर्षे चक्क कारकुनी केली. रात्र रात्र मैफिली गाजवणारे वसंतराव सकाळ झाली की सायकलवर टांग टाकून मिलीटरी ऑफिसमध्ये खर्डेघाशी करायला जात. सदाशिव पेठेत असलेल्या एका खोलीत संसार. एक दोन नाही…. पंचवीस तीस वर्षं. त्यावेळी एका ज्योतीषाला त्यांनी कुंडली दाखवली होती. तो ज्योतिषी वसंतरावांना म्हणाला….

“वसंतराव.. मोठी खट्याळ कुंडली आहे तुमची. तुम्हाला आयुष्यात धन, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही लाभणार आहे. खडिसाखरेचे ढीग तुमच्या पुढे पडणार आहे. पण अश्यावेळी की त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या मुखात दात नसतील”.

त्या ज्योतीष्याकडे पहात मिस्कील स्वरात वसंतराव म्हणाले…

“ठिक आहे. दात नसले तरी हरकत नाही. आम्ही ती खडीसाखर चघळून चघळून खाऊ”.

आयुष्यभर स्वरांचे वैभव मोत्यांसारखे उधळले वसंतरावांनी. सुबत्ता, मानसन्मान, पुरस्कार आयुष्याच्या उत्तरार्धात मिळु लागले. पण फार काळ नाही. निव्रुत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिले असतानाच संरक्षण खात्याने त्यांची बदली ईशान्येकडील नेफाच्या जंगलात केली. जंगलातील तंबूत त्यांचे वास्तव्य. पाऊस पाणी, रोग राई, जीवजंतू याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रक्रुतिवर झाला. तेथून ते परतले. निव्रुत्त झाले. पण तेथे जडलेली पोटाची व्यथा त्यांना त्रास देऊ लागली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा एकसष्ठीचा सत्कार झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी वयाच्या… बासष्ठाव्या वर्षी अकोला येथे झालेल्या बासष्ठाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. आणि वर्षभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आज २ मे. वसंतरावांचा  जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

कॉलेजच्या रियुनियनला सहकुटुंब गेलेलो. अनेक मित्र-मैत्रीणींची भेट झाली. जुन्या आठवणी, भरपूर खाणं अन पोटभर गप्पांमुळे संध्याकाळ संस्मरणीय झाली. मस्त मूड होता. कधी नव्हे ते गाणं गुणगुणायला लागलो. बायको आणि मुलीला आश्चर्य वाटलं. घरी पोचलो तर दार सताड उघड आणि हॉलमध्ये खुर्चीत मांडी घालून आई बसलेली.

“काय गं, दार उघड ठेवून अशी का बसलीयेस”

“बरं झाला आलास. किती वेळची वाट बघतेय. ”आई.

“काय झालं. अर्जंट होतं तर फोन करायचा ना”

“म्हटलं तर अर्जंट म्हटलं तर नाही. ”

“आई, मूड चांगलाय. नीट सांग. काय झालं”

“घरात पाहुणा आलाय. ”

“मग त्यात टेंशन कसलं”

“विशेष पाहुणा आहे”

“कोण?कुठयं?

“आत्ताच कपाटामागे गेलाय”

“पाहुणा कपाटामागे??आई, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतयं का?” 

“अरे, उंदीर मामा घरात शिरलेत. तास झाला खुर्चीतून हलली नाहीये. ”आईचं ऐकून बायको आणि मुलगी “ईssईss”करत किंचाळत घराबाहेर गेल्या. पाठोपाठ आईसुद्धा. खरं सांगायचं तर मीसुद्धा जाम घाबरलो. उंदीर पाहिला की कसंतरीच होतं. शिसारी येते. खूप भीती वाटते.

“अहो, आधी त्याला बाहेर काढा”

“बाबा, लवकर”

“ही काठी घे आणि त्याच्या डोक्यात घाल. ईकडून तिकडं फिरून मेल्यानं वात आणलंय. ”

“ए, बायांनो!!जरा थांबता का?”.

“आता कशाला थांबायचं”आई.

“अगं हो, जरा बघू तर दे. ”

“ईss उंदराला काय पहायचं. ”मुलगी 

“मी बाहेर जातो. काय करायचं ते तुम्हीच ठरवा. ”  

“आधी त्याला घालवा मग कुठंही जा”बायको.

“मग एकदम गप्प बसायचं आणि आधी घरात या. उगीच आख्ख्या सोसायटीला कळायला नको”. आई खुर्चीवर तर मुलगी आणि बायको सोफ्यावर बसल्या. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ न्यायानं मीच तो काय सोकॉल्ड धीट, शूर??भीती वाटत होती तरीही उसनं अवसान आणून भिरभिरत्या नजरेनं काठी कपाटाजवळ आपटायला सुरुवात केली.

“जास्त जवळ जाऊ नको रे”

“अहो, बेतानं नाहीतर एकदम अंगावर येईल. ”

“उंदीर चावतो का” आई, बायको, मुलगी पाठोपाठ बोलल्या.

“शांत बसा नाहीतर काठी घ्या त्याला हाकला. ”मी चिडलो.

“आमच्यावर रागवण्यापेक्षा उंदराला बाहेर काढा. बघू या जमतयं का?”बायकोचं बोलणं सहन न झाल्यानं रागाच्या भरात जोरात काठी जमिनीवर फेकली तेव्हा कपाटामागचा उंदीर भसकन बाहेर आला. अचानक समोर आल्यानं घाबरून मागे सरकलो तर उंदराला पाहून आई, बायको, मुलगी एकदम ओरडल्या त्या आवजानं उंदीर जागेवरच एक इंच उडाला आणि किचनमध्ये पळाला. पाठोपाठ अस्मादिक किचनमध्ये. नक्की कुठं लपलाय कळत नव्हतं त्यातच परडीला धक्का लागून एक कांदा पायावर पडला. घाबरून जोरात ओरडलो.

“अहो, आधी दोन्ही बेडरूमची दारं लावून घ्या. ”

“दारं बंदच आहे”आई.

“आता काय करायचं”मुलगी.

“फक्त वाट बघायची. ” भिंतीला टेकून उभा राहिलो. नजर शोधत होतीच. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल जाणवली नाही. पुन्हा ओटा, ट्रॉली, शेल्फवर काठी आपटायला लागलो.

“उंदराच्या नादात किचनमध्ये तोडफोड करू नका. सावकाश!!”बायकोचा अनाहूत सल्ला.

“मला कळतं. ऐकून घेतो म्हणून प्रत्येकवेळी नवऱ्याला सुनवायची गरज नाही. ”

“ते माहितीये पण स्वभाव धसमुसळायं ना म्हणून आधीच सांगितलं नंतर सॉरी म्हणून उपयोग होणार नाही. ” गरज नसताना बायकोनं टोमणा मारल्यानं संताप अनावर होऊन रॅकवर जोरात काठी मारली तर उंदीर एकदम अंगावर आला, हेलपाटलो कसंबसं सावरत काठी मारली पण नेम चुकला. घाबरलेला उंदीर आईच्या दिशेने गेला तर ती ओरडायला लागली. हातातली काठी फेकली तेव्हा तो कपाटामागे लपला. पुन्हा काहीवेळ शांतता आणि एकदम तो तुरुतुरु पळत सोफ्याच्या दिशेनं गेल्यावर बायको आणि मुलगी घाबरून सोफ्यावरच उभ्या राहिल्या. बायको जोरजोरात “हाड हाड” करायला लागली.

“ममा, तो कुत्रा नाहीये, ” 

“तू गप गं. आधी त्याला हाकल मग मला अक्कल शिकव” मायलेकी वाद घालायला लागल्या अन यागडबडीत उंदीर पुन्हा बेपत्ता. झालं पुन्हा शोधाशोध!!सगळेच बेचैन, अस्वस्थ. जरा कुठं खट्ट वाजलं तरी दचकत होते. उंदीर घरात असेपर्यंत कोणालाच शांत झोप लागली नसती त्यामुळे काहीही करून त्याला बाहेर घालवणं किवा मारणं गरजेचं होतं परंतु तो हाती लागत नव्हता. इकडून तिकडं नाचवत होता. खूप दमलो. भीतीची जागा संतापानं घेतली. रात्रीचे अकरा वाजून गेलेले अन आम्ही एवढ्याशा जीवाच्या दहशतीखाली होतो आणि कदाचित तो आमच्या………

“आता रे???, शेजारच्यांना बोलावू का?” आई म्हणाल्यावर मी भडकलो.

“जरा दम धरतेस. आल्यापासून तेच करतोय ना. कशाला उगीच गाव गोळा करायचाय”

“तुम्ही चिडू नका. मदतीसाठी म्हणून त्या म्हणाल्या. ”बायकोनं समजावलं.

“आता त्याला सोडायचा नाही. तू एक काम कर, किचनची वाट आडव. आई, तू खुर्चीवरून हलू नकोस. कार्टे, तो फोन बाजूला ठेव आणि शोकेसजवळ थांब. हातात काहीतरी ठेवा जर अंगावर आलाच तर उपयोगी पडेल. ” बोलत असतानाच तो दिसला जोरात काठी मारली पण परंतु परत नेम चुकला.

“बाबा, त्याला बाहेर घालवू. मारायला नको. छोटसं पिल्लूयं”

“बरं, रेडी. घाबरू नका. फक्त पाच मिनिटं लागतील”स्वतःसकट सर्वांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न केला. हातात झाडू घेऊन आई खुर्चीत, फरशी पुसायचा मॉप घेऊन बायको किचनच्या दारात, प्लॅस्टिकचा ट्रे घेऊन मुलगी शोकेसच्या बाजूला उभी राहिली.

“सगळे तयार आहात. तुमच्या बाजूला येऊन द्यायचं नाही. दाराच्या दिशेने ढकलायचं. ओके”काठी आपटायला लागल्यावर काही वेळानं तो बाहेर आला अन किचनकडे गेला पण टिपॉय आडवा टाकून वाट बंद केल्यामुळे शोकेसच्या बाजूला गेला पण मुलीनं ट्रेनं ढकललं. लपायला जागा सापडत नसल्यानं त्याची पळपळी सुरु झाली अन गोंधळ वाढला. पळापळ करून थकलेला अन घाबरलेला उंदीर हॉलच्या कोपऱ्यात थांबला. दरवाजाच्या दिशेनं वळवण्यासाठी प्रयत्न केले तर एकदम तो किचन नंतर सोफ्याकडं मग शोकेसच्या दिशेनं गेला पण आवाजामुळं मागे फिरला. काही क्षण एका जागी थांबून अंदाज घेतल्यावर अचानक तो एकदम घराबाहेर गेला. अवघ्या काही सेकंदात हे सगळं घडलं. पटकन दार लावून घेतलं. आई जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली तर मुलगी बायकोला बिलगली. मी मात्र  “हुssssश” करत मटकन खाली बसलो. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तितक्यात बायकोनं विचारलं “सासूबाई, नक्की पाहुणा एकच आला होता की… ” ते ऐकून मी कोपरापासून हात जोडले. तिघीही जोरजोरात हसायला लागल्या. —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॲडॉल्फ हिटलर — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ ॲडॉल्फ हिटलर ☆ श्री प्रसाद जोग

ॲडॉल्फ हिटलर —

आत्महत्या :  ३० एप्रिल, १९४५

हा जर्मनी देशाचा हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.

ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा हिटलर  (चौथा) मुलगा होता. आपल्या संघर्षकाळात याने काहीकाळ व्हिएन्नामधे हस्तचित्रे विकून रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन करुन उपजिविका चालवली. त्याने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. फलस्वरूप त्याला शिक्षा देखील झाली तुरुंगामध्ये असताना १९२३ साली माईन काम्फ (माझा लढा) या आत्मकथेच्या लिखाणाला त्याने सुरवात केली आणि त्याचा लेखनिक होता त्याचा सहकारी रुडाल्फ हेस.

जर्मनीचा हुकूमशहा अडाॅल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेली आत्मकथा ‘माईन काम्फ’ (माझा लढा) ची विक्री झाली. अमेरिकेत ८. ३२  लाखांना लिलावात ही प्रत विकली गेली आहे.

या आत्मकथेच्या पहिल्या पानावर हिटलरची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षरीखाली ‘ युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिवंत राहतील. ’ 

१८ ऑगस्ट, १९३० 

“अडाॅल्फ हिटलर”  —- असं वाक्यही दस्तरखुद्द हिटलरने लिहिलंय.

पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांच्या देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदल उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.

हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’ हे त्यांचे घोषवाक्य होते. आर्यन संस्कृतीमधील शुभ चिन्ह मानले गेलेल्या स्वस्तिकचा समावेश त्याने ध्वजामध्ये केला.

राईश साम्राज्य एक हजार वर्षे टिकेल असे त्याचे म्हणणे होते, प्रत्यक्षात १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरु झालेले महायुद्ध हिरोशिमा, नागासाकी वरील अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर १९४५ सालीया  सहा वर्षातच संपुष्टात आले.

सुरवातीला त्याच्या सैन्याने प्रचंड मुसंडी मारून मोठमोठे विजय मिळवले होते, एक वेळ अशी आली होती की रशियाचा पाडाव होत होता, आणि हिटलर हे संपूर्ण युद्ध जिंकत होता, परंतु निसर्ग देखील त्याच्या विरोधात गेला आणि प्रचंड बर्फ वृष्टी झाली आणि जर्मन सैन्य जागीच अडकून पडले, इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरवात झाली आणि शेवटी त्याचा पराभव झाला.

दुर्दम्य आत्मविश्वासाचे प्रतीक बनलेल्या इंग्लंडच्या पंतप्रधानांचे “विन्स्टन चर्चिल” यांचे वक्तृत्व लंडनवर होत असलेल्या बॉम्बफेकीच्या वेळी जनतेला धीर देत होते. त्यांचे म्हणणे होते “आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू, आकाशात लढू आणि अंतिम विजयी होऊ. वेगवेगळ्या आघाड्यांवरील छोट्या मोठ्या लढाया दोस्त राष्ट्रे हरत होती, त्या वेळी सैन्याला धीर देताना ते म्हणाले होते,

“Though we loose the battle we will conquer the war”

त्यांच्या जादुभऱ्या शब्दांनी सैनिक प्राणपणाने लढत राहिले. जपान्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अल्बर्ट आईन्स्टाईन च्या अणुबॉम्बच्या शोधाने या युद्धाला कलाटणी मिळाली, आणि शेवटी नाझी जर्मनी आणि हिटलरचा शेवट झाला.

२० एप्रिल, त्याच्या ५६ वाढदिवसाच्या दिवशी हिटलर भूमिगत बंकर मधून बाहेर आला, हे त्याचे लोकांना झालेले शेवटचे दर्शन.

२३ एप्रिल, १९४५ लाल सैन्याने बर्लिन, वेढले होते. होते. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर, हिटलरच्या बंकर मध्ये एक लहान समारंभात त्याने इव्हा ब्राऊन या त्याच्या सखीबरोबर विवाह केला. त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटवर जोसेफ गोबेल्स आणि मार्टिन बोरमान यांनी सह्या केल्या. हे सर्टिफिकेट इंटरनेट वर डिजिटली बघायला उपलब्ध आहे. इव्हा ब्राऊन या त्याच्या प्रेयसीने त्याला शेवटपर्यंत साथ दिली. हिटलर नसलेल्या जगात तिलाही जिवंत राहायचे नव्हते म्हणून तिनेही हिटलर सोबत जीवनाचा अंत करून घेतला.

“युद्धामध्ये फक्त महान व्यक्तीच जिंवत राहतील !” असे लिहिणारा हिटलर जिवंत राहू शकला नाही. ही त्याची शोकांतिका. ३० एप्रिल, १९४५ रोजी त्याने डोक्यात गोळी मारून घेतली आणि जीवन संपवले.

तीनेक वर्षांपूर्वी माझ्या वाचण्यात अगदी वेगळे पुस्तक आले होते. लेखक आहेत पराग वैद्य आणि पुस्तकाचे नाव आहे ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास. या पुस्तकात त्यांनी इतिहास जेते लिहितात आणि जितांची बाजू कधी समोर येत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या लिखाणाचा अर्थ हिटलर तसा नव्हता. त्याला जगाने निष्कारण वाईट क्रूरकर्मा ठरवले असा आहे.

वाईटात वाईट व्यक्तींमध्ये सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. हिटलरची काही वचने वाचली की याची प्रचिती येते. यात मला हिटलरचे उदात्तीकरण अजिबात करायचे नाही.

  1. “If you win, you need not have to explain… If you lose, you should not be there to explain!”
  2. “Do not compare yourself to others. If you do so, you are insulting yourself. ”
  3. “if you want to shine like a sun, first you have to burn like it. ”
  4. “Think Thousand times before taking a decision, But – After taking a decision never turn back even if you get thousand difficulties!!”
  5. “When diplomacy ends, War begins. ”
  6. “Words build bridges into unexplored regions. ”
  7. “To conquer a nation, first disarm its citizens. ”
  8. “I use emotion for the many and reserve the reason for few. ”
  9. “The man who has no sense of history, is like a man who has no ears or eyes”

शेवटचे जे फारच महत्वाचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीला लागू पडते

  1. “If you tell a big enough lie and tell it frequently enough, it will be believed. ”

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मदारी… एक बोधकथा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मदारी… एक बोधकथा…☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक मदारी असतो. तो आपल्या माकडाला घेऊन गावोगावी फिरायचा, माकडाचे खेळ करून दाखवायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा.

ते माकड सुद्धा अगदी छान काम करायचे. कोलंट्या उड्या मारायचे, पाणी आणून द्यायचे आणि मालक सांगेल तसे सगळे काम करायचा. त्याने त्या माकडाचे नाव रघुवीर ठेवले होते.

सगळे त्याला म्हणतात अरे याचे नाव रघुवीर का ठेवलेस? हे तर श्री रामांचे नाव आहे ना? याचे नाव हनुमान, मारुती असे काही तरी ठेव.

यावर त्या मदाऱ्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला कामात राम असतो. मग माझे माकडाचे खेळ करून दाखवणे हे काम म्हणजे रामाचे झाले ना? दुसरे असे की त्या निमित्ताने माझ्या तोंडून श्रीरामाचे नाव दिवसातून 1000 वेळा तरी घेतले जाते. तेवढाच रामाचा जपही होतो आणि श्रीरामाचे स्मरणही होते.

मग श्रीरामाचे स्मरण करणारा मीच हनुमान होतो. मग मला आठवतात हनुमंताच्या लीला आणि त्या लीला मी माझ्याशी पडताळून पहातो.

मग हनुमानाने सीता माईने घातलेल्या मोत्याच्या माळेत श्री राम आहेत का ते बघितले होते तसे मी या रघुवीरला सांगितलेल्या कामात राम शोधतो आणि मला तो गवसतो. जर गवसला नाही तर मग माझे काही चुकले आहे असे मला समजते आणि मी ते सुधारतो आणि मग मला माझा राम सापडतो.

हनुमानाने आपली छाती फाडून तेथे श्री राम वास करत असल्याचे दाखवले होते. मला खात्री आहे मी माझ्या कामाप्रती श्रद्धा ठेवली असल्याने आणि माझे काम हे ईश्वराचे काम मी मानत असल्याने माझ्याही ह्रदयात श्रीराम वास नक्कीच आहे.

हनुमंताने श्रीरामाची सेवा मनोभावे केली तशी मी माझ्या या रघुवीरची करतो. त्याने दिवसभर माझे काम केले असले तरी मी रात्री त्याचे पाय चेपतो, त्याला चांगले न्हाऊमाखू घालतो आणि हो मला स्वतःला मी कपडे नाही घेतले तरी मी नेहमी याच्यासाठी नवे कपडे घेतो. अशी मी त्याची सेवा माझा राम म्हणून करतो.

मला खात्री आहे की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम ईश्वराचे काम समजून केले, आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणत्याही कामात सफलता मिळाल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत चांगले घडल्या शिवाय राहणार नाही.

श्रद्धा असेल तर भक्ती नकळत होते आणि अशी निस्वार्थ, निष्काम भक्ती केली तर तुमचे चांगलेच होणार.

आयुष्यात राम मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही हनुमान व्हायला पाहिजे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वाळवी‘ – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

‘वाळवीलेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एकदा एका ग्रंथालयाला लागली वाळवी..

ती ” ती ” होती म्हणून तिला खायची खूप सवय, दिसेल ते खाsss त सुटली.

कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह, स्फुट लेखन, इथं पासून ते महाकाव्या पर्यंत सगळं तिने खाल्लं. व. पु. , पु. ल. , ना. धो. , चिं. त्र्यं. , अहो तिने सगळं खाल्लं, मग मात्र तिचं पोट लागलं दुखायला.

मग ती मेडिकल ची पुस्तकं खायला लागली.

तिला त्याच्यात पोटदुखीवरचे इलाज सापडायला लागले.

” ए, तू कुठं आहेस आत्ता ? ” वाळवीने विचारलं, वाळवा म्हणाला, “वस्त्रहरण”

” बरोबर, मला वाटलंच होत कि, तू आधी वस्त्रहरण च खाणार ” वाळवी उत्तरली, ” पुरुष सगळे सारखेच, महाभारतात पुरुषांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त वस्त्रहरण, ” 

” अग बाई, पण वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णानेच साड्या पुरवल्या ना ? बरं तू काय खातेस ? ” 

” मी आत्ता कर्णाची कवच कुंडलं ! ” ” वा !म्हणजे तू आता अजरामर व्हायचा विचार करतेस कि काय ? ” ” अरे बाबा, कर्ण कवच कुंडलामुळे अजरामर होणार असता, तर कवच कुंडलं व्यासांनी आपल्या जवळच नसती का ठेवली ? “

आत्ता मात्र वाळव्याच्या एक गोष्ट लक्षात आली कि ह्या वाळवीने, गुन्हेगारी कथा आधीच हजम केलेल्या आहेत.

महाभारत खाता खाता दोघांनाही थोडी झोप लागली, आणि अचानक एका पुस्तकातून आवाज यायला लागला. वाळवा म्हणाला, ” ए काही घाबरायचं कारण नाहीये ते पुस्तक  धारपांचं आहे, थोडी भुतं असतील अजून जिवंत तीच बडबडत असतील ! बराच वेळ महाभारत खाऊन सुस्तावलेले दोघं विचार करत होते, की महाभारतात लिहिलंय तेच आत्ता सगळीकडं घडतंय – का जे घडणार आहे ते महाभारतात लिहिलंय ? स्त्रियांची विटंबना आजही होतेच आहे की !

” ए, तू विनोदी खाल्लंयस कधी ? “वाळव्यानं विचारलं, ” अरे बाबा हल्ली विनोदी कुठं मिळतंय खायला, त्यालाच जास्त डिमांड आहे. त्रासलेले सगळे लोक विनोदी वाचूनच आपलं आयुष्य सुखी बनवताहेत. सामाजिक साहित्य हल्ली कुणी वाचतच नाही, त्यामुळे ते खूप मिळतं  खायला, पण चव नाहीरे त्याला. ” ते तुझं खरंय ग, पण मला सध्या डॉक्टरांनी विनोदी काही खाऊ नका म्हणून सांगितलंय. ” रोमॅंटिक, विनोदी, गुन्हेगारी, मला सगळं वर्ज्य आहे.

” ए, बाय द वे, तुला खरंच मनापासून कुणाला खायला आवडतं ? ” वाळवा, वाळविला विचारत होता. पण वाळवीचं लक्षच नव्हतं ती आपली मस्त, व. पु. मध्ये दंग होती. बहुतेक वपुर्झा असावं. ” काय रे सारखं सारखं डिस्टर्ब करतोस, छान चव लागली होती मला आत्ता, ” वाळवी ओरडली.

व. पु. वाचणाऱ्यांचं पण असंच होत असेल नाही ? कुणी डिस्टर्ब केलं कि लगेच राग येत असेल ? तो पर्यंत वाळवा भाऊंच्या पुस्तकात घुसला होता.

तो लगेचच वॅक वॅक करत उलट्या करतच बाहेर आला. ” अरे अरे कुठल्याही पुस्तकात घुसताना जरा , प्रस्तावना तरी वाचत जा !”  वाळवी ओरडली. तुला हे असलं पचणाऱ नाही बाबा ! वाळवी ओरडली.

एक दिवस वाळवा सकाळपासूनच हातात, झेंडा घेऊन ओरडत फिरत होता, तेंव्हा वाळवीच्या लक्षात आलं, ती मनातल्या मनात पुटपुटली. बहुतेक विद्रोही साहित्य संमेलनातील पुस्तकांचा स्टॉक आलाय…

इकडे वाळवीला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि तिने ते वाळव्याला सांगितलं, तसा तो हसत हसत म्हणाला ”  म्हणून मी तुला सांगत होतो, ती पक्वान्न रेसिपिची पुस्तकं खाऊ नको, ऐकलं नाहीस माझं, आता जा तिकडे शेवटच्या कपाटात आणि ” कुठलाही आजार दोन मिनिटात पळवा ” ह्या पुस्तकाची दोन पानं खाऊन ये, बरं वाटेल तुला !”

पण वाळवी लाजत लाजत त्याला म्हणाली, अहो वाळवेश्वरराव तुम्ही आता बाप होणार आहात !

आणि वाळवा उडाला, तो मनात विचार करायला लागला ” मी तर नियमितपणे संतती नियमनाच्या पुस्तकाची रोज दोन पानं खातो तरी असं कसं काय झालं ? “

पण नंतर त्याच्याच लक्षात आलं आपण परवा, ” डे ” काकूंच्या गार्डनची थोडी चव घेतली होती आणि नंतर वाळवी कडे गेलो होतो.

नंतर  वाळविला यथावकाश दिवस गेले, एक दिवशी ती हटूनच बसली ” मला वैभव आणि संदीपच्या कविता पाहिजेत ” वाळवा म्हणाला ” अगं बाई, ते दोघं सध्या आघाडीचे कवी आहेत, त्यांच्या कवितांच्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या खपाखप खपताहेत त्या कशा तुला मिळतील, त्या अजून लोकांनाच मिळत नाहीत, अजून आपल्या लायब्ररीमधे ती पुस्तकं आलेलीच नाहीत “

तुला नवकवींची पुस्तकं देऊ का ? ती बरी असतात, चविष्ट नसतात पण हल्ली आपल्याला फार चमचमीत परवडत पण नाही.

” त्यापेक्षा तु एक काम कर, सरळ राजकारण्यांची आत्मचरित्र वाचत जा, म्हणजे आपली पोरं सगळं काही शिकतील, कारण हल्ली एकमेकाच्या तोंडावर, न बोलता थेट आत्मचरित्रात कथन करण्याची चढाओढ सुरू आहे.

” शि ssss काय हो, तसली पुस्तकं खाऊन पोरांना कशाला बिघडवायचं ? त्यापेक्षा ” वृत्तपत्र ” बरी, आता या यू ट्यूबच्या जमान्यात, पुस्तकांची आवक जरा कमीच झालीय, जो तो येतो आणि ” नमस्कार ! मी….. बोलतोय, तुम्ही बघत आहात….. असं म्हणून सुरू करतो. आपल्याला पुढे अन्नाचा तुटवडा भासणार आहे बरं का ! आपल्या पोरांना सुद्धा फार फालतु आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य खावं लागणार आहे.

पुढे कालांतराने मेडिकलच्या पुस्तकात वाळवीची डिलिव्हरी झाली आणि त्यांची पुढची पिढी अजस्त्र संख्येने बाहेर पडली, पण त्यांना हे साहित्य फारच बेचव वाटायला लागलं, आणि ती पिढी ह्या आपल्या आई बापाना जुन्याच साहित्याच्या वृद्धाश्रमात सोडून, संगणकाच्या मागे लागली. तिथे त्यांना गुगल बाबाच्या आश्रमात ” बग्ज ” नावाने प्रसिद्धी मिळाली, ते मोठे मोठे ” हॅकर ” म्हणून प्रसिद्ध झाले. पूर्वीची वाळवी आता व्हायरस झाली आणि लाखोच्या संख्येने त्यांनी  ॲटॅक सुरू केले.

आज जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने पुस्तकांच्या विषयावर लिहावं असं वाटलं आणि डोक्यातल्या वाळवीने माझं डोकं खात खात, बोटांच्या माध्यमाने ते मोबाईलवर उतरवलं, तेच तुमच्या समोर ठेऊन  जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो – – खास जागतिक पुस्तक दिनानिमित्त !

धन्यवाद !

लेखक : श्री सतीश वैद्य

(खास जागतिक पुस्तक दिना निमित्त !) 

 मो 9373109646

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares