मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…आम्ही भाजी मंडईतून घरी निघालो होतो… अर्थात आम्ही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको… गद्दे पंचवीशीचा माझा बहर लग्नाच्या दशकपूर्ती दरम्यान केव्हाच उतरलेला… आणि हिचा गरगरीत बहरलेला… तिच्या हाताला पैश्याने भरलेल्या पाकिटाचाच भार तेव्हढाच सहन व्हायचा आणि माझा  पैश्याचं पाकिट सोडून बाकी सगळ्याचा भारच उचलून उचलून हर्क्युलस झालेला…त्या भाजीने भरलेल्या दोन जड पिशव्यांचे बंदानीं  माझ्या हाताला घातलेले आढेवेढे …तर  माणसानं सुटसुटीत कसं जगावं याचाच आर्दश जगापुढे ठेवायला हिचं पाऊल नेहमीच पुढे पुढे…. आणि हो भाजीवरुन आठवलं अहो त्या भाजी बाजारात मला ये पडवळ्या नि हिला ढब्बू मिरची या नावानेच  ओळखतात.. अहो त्यांना मी सतत डोळे मिचकावून ‘ असं निदान आमच्या समोर तरी म्हणून नका ‘ असं ज्याला त्याला डोळ्यांच्या सांकेतिक भाषेत सांगू पाहत राही.. पण  ते टोमणे ऐकून ज्याला त्याला  हि मात्र रागाने डोळे वटारून बघत असते.. आणि चुकून माकून त्याचवेळी मी करत असलेल्या नेत्रपल्लवीकडे  तिचे लक्ष गेलेच तर डोळे फाडून फाडून बघते हा काय पांचटपणा चालवलाय तुम्ही असे कायिक आर्विभाव करते… आता एकदा हिच्या बरोबर लग्न करून पस्तावा पावल्यावर लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला असताना आणि इथून तिथून बायकांची जात शेवटी एकच असते तेव्हा खाली मान घालून चालणं ठरवल्यावर पुन्हा मान वर करून दुसऱ्या स्त्री कडे बघण्याचा सोस तरी उरेल का तुम्हीच सांगा! तरी पुरूष जातीचा स्वयंभू चंचलपणा कधीतरी डोकं वर काढतोच… आणि तशी एखादी हिरवळ नजरेला पडलीच तर माझा मीच अचंबित होतो…  अहो तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या त्या घराच्या वाटेवर एक सुंदरशी बाग आहे… रोज संध्याकाळी तिथं प्रेमी युगुलांचा नि कुटुंब वत्सलांचा जथ्था जागोजागी प्रेमाचे आलाप आळवताना दिसतात ना डोळ्यांना.. अगदी सहजपणे… कितीतरी मान वळवून दुसऱ्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला तरी… मनचक्ष्चू तेच तेच चित्र दाखवत राहतात… मग वाटायचं आपलं मनं शुद्ध भावनेचं आहे यावर आपला विश्वास असताना कशाला उगाच दिसणाऱ्या सृष्टीला दृष्टिआड जबरदस्तीने करा… प्रत्येकाची आपापली तर्हा असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची… करू देत कि बिचारे… आपल्याला हे सुख मिळालं नाही याची खंत  करण्यापेक्षा ते प्रेमी युगुल किती नशीबवान आहे.. कि त्यांच्या वाट्याला काटे नसलेला गुलाब आला… आणि आपल्याला गुलाब तर कधीच कोमेजून, सुकून गळून गेला आणि हाती फक्त काटेच काटे असणारा देठ मिळाला… असा मी काहीसा मनातल्या मनात विचार करत तिथून चाललो असताना मधेच हिने माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि ती सुद्धा मनात विचार करू लागली… काय पाहतायेत कोण जाणे आणि कसल्या विचारात पडलेत काही कळत नाही.. इथं कशी जोडप्यानं बसलेले प्रेम करतात ते बघून घ्या म्हणावं.. अगदी तसच नसलं तरी बायकोवर कसं प्रेम करावं ते बघून तरी माणसानं शिकायला करायला काय हरकत आहे म्हणते मी… आणि मी एव्हढी घरात असताना जाता येता दुसऱ्यांच्या बायकांकडे बघणं शोभतं का या वयाला…

बराच वेळ मी माझ्या तंद्रीत होतो हे पाहून हिने माझी भावसमाधी कोपराची ढूशी देऊन भंग केली आणि वरच्या पट्टीत आवाज चढवून म्हणाली…  “बघा बघा तो नवरा आपल्या बायकोवर  मनापासून  कसं प्रेम करतोय आणि ती देखील छान प्रतिसाद देतेय… तुम्हाला कधी माझ्याबाबतीत असं जमलयं काय?… नेहमीचं एरंडाचं झाड असल्यासारखं तुमचं वागणं… “

माझ्यातल्या पुरूषार्थाला तिने चुनौतीच दिली…मग मीही ती संधी  साधली तिला म्हटले ” तुला जे दिसते ते कुठल्याही बाजूनें  खरं नाहीच मुळी… एकतरं  ते खरे नवरा बायको नसावेत, आणि  दुसरे  त्यांचे दोघांचे आपापले जोडीदार कुणी वेगळेही असू शकतात…प्रियकर प्रेयसीचं युगुल प्रेम करत आहेत तेच उद्या त्यांचं लग्न झाल्यावर आपल्या जागेवर ते नक्कीच दिसतील… भ्रभाचा भोपळा फुटायाचाच काय तो अवकाश… आणि शेवटचं लांबून कोणीतरी त्यांच्या या लवसिनचं शुटींग करत असणार.. कि या सिनसाठी त्यांनी पैसे घेतले असणार… हे विकतचं दिखाऊ बेगडी प्रेम पडद्यावर दाखवतात त्यावर तू भाळून जाऊ नकोस.. आणि तुला जर मी अगदी असच   तुझ्यावर प्रेम करावसं वाटत असेल तर मला थोडी तुझ्यापासून सुटका कर बाहेर प्रेमाचे धडे गिरवायला मला नवी प्रेयसीचा शोध घेतो  ते धडे शिकल्यावर मग तुझ्यावर प्रेमच प्रेम करत राहिन… “

माझं म्हणणं तिच्या पचनी पडणारं नव्हतचं मुळी.. तिने इतक्या झटक्याने मला म्हणाली “काही नको बाहेर वगैरे जायला तुम्ही जितकं प्रेम सध्या दाखवताय ना तितकसचं पुरेसे आहे मला… घरी तरी चला मग बघते तुमच्या कडे…म्हणे मला नव्याने प्रेयसी शोधायला हवी.. “

आमचा सुखसंवाद चालत असताना माझ्या मनाला सारखी ‘काटे नसलेला गुलाब मात्र दुसऱ्यांना मिळतो आणि मला मात्र गुलाब हरवलेला टोकदार काट्याचा देठच हाती यावा..’ हि सल सतत बोचत राहिली…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ८. – राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काही व्यक्ती अशा दिसतात की, आपण राहतो ते घर व सोसायटी, परिसर याची निंदा करताना दिसतात. पण ज्या परिसराने आपल्याला समाज,शेजार दिला त्या जीवनाधार असलेल्या परिसराची व घराची कधीही निंदा करू नये.

आपली नोकरी,व्यवसाय जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला रहावेच लागते. त्या स्थाना बद्दल मनात नेहेमी कृतज्ञता असावी. त्याला नावे ठेवू नयेत. आपण कितीही संकटात असलो तरी आपल्या घरा जवळच्या परिसरात आपल्याला सुरक्षित वाटते. मानसिक आधार मिळतो. बऱ्याच जणांचे बालपण त्या परिसरात गेलेले असते. त्या वेळी याच ठिकाणी आपण किती आनंदी होतो, किती काळ येथे व्यतीत केला आहे अशा चांगल्या आठवणी आठवाव्यात.

जरी काही गोष्टींची कमतरता असेल तरीही त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. गैरसोयी कायम स्वरुपी नसतात. जेथे राहतो त्या परिसरा विषयी आनंदी असावे. परिपूर्ण तर कोणीच नसते. आपल्यातही दोष असतातच. त्या परिसरात काय आहे या कडे लक्ष द्यावे. सदैव दोष, न्यूनत्व बघू नये. हे चराचर जग हे ब्रह्म आहे. त्या विषयी ममत्व,आपुलकी बाळगावी. म्हणजे दोष दिसत नाहीत आणि परकेपणा वाटत नाही.

प्रत्येकाने स्वतःशी विचार करून बघावा मी परिसराला नावे तर ठेवत नाही? आणि याचे उत्तर हो आले तर स्वतःची मनस्थिती बदलावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

सध्या भाकर ही पंचतारांकित झाली आहे. ती आता श्रीमंताची झाली आहे. हुरडा देखील असाच item झाला आहे वगैरे गुणगान करणारी एक क्लिप wapp वर आली होती. ती वाचून मी देखील व्यक्त झालो खालीलप्रमाणे… 

ज्वारी लयभारी… तुम्हाला प्यारी तर आम्हाला सगी सोयरी… तरी सुखी असे माहेरी.

मटणाच्या रश्याबरोबरची तर मला ज्ञात नाही ( तुम्हालाही नसेलच ही खात्री ) पण रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेल्या आणि रात्री बेरात्री अतिथी आलाच तर वेळेवर पिठलं करून वेळ साजरी व्हावी म्हणून आवेलाच्या मागे ताठ उभ्या असलेल्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळच्या लोणचं, कढवलेलं तेल व हाताने फोडलेल्या कांद्याबरोबरच्या चविष्ट न्याहरीची गोष्टच न्यारी.

उमरीच्या घरच्या गोदामाकडील अंगणात अखंड अग्निहोत्रासम धगधगणाऱ्या चूल-माऊलीच्या उदरात असलेल्या तप्त निखाऱ्यावर ज्वारीच्या पिठाच्या पानग्याला दोन्हीकडून पळसाची पाने लावून झोकून दिल्यावर तावून सुलाखून बाहेर आलेल्या पानग्याची चवच जगावेगळी.

शिळ्या भाकरी त्यावर तिळाची चटणी, तेल, आंब्याचं रायतं, दोन तीन कांदे स्वच्छ पालवात बांधून कुंभीपट्टीकडील झोरमळ्यावर ( नदीवर ) जाऊन त्या अन्नपूर्णा देवीच्या प्रसादावर ( भाकरीवर ) ताव मारण्याचा स्वर्गीय आनंद अपारच. जन्मांध असलेल्या आबईने केलेल्या चुलीवरील बेदाग, शुभ्र भाकरीचे देखणे पहात रहावेसे रूप अवर्णनीय.

रात्री नुकतीच सामसूम झालेली असायची. तसेच बारभाईचं ( धबडक्याचं) घर सोडलं तर इतरत्र उमरीला रात्री आठ म्हणजे निरव शांतता असायची. उकंडबाऱ्याच्या वाडीकडील गावकुसातून अनवाणी पायाने हळुवार चालत आलेली सखू शांतपणे फरसावरून आवाज द्यायची, ” भाकर हाय का मायजी ? “

तिचा हा अगतिक स्वर तिच्या घरातील त्यादिवशी उपाशी असणाऱ्या कुणासाठी तरी असायचा.

काकी किंवा माई सखूची हाक ऐकून चुलीच्या बाजूला उभ्या ठेवलेल्या भाकरीपैकी एक, दोन भाकरी कोरड्यासासोबत ( वरण, भाजी किंवा लोणचं) डेलजी ओलांडून फरसावर येऊन सखूने पसरलेल्या लुगड्याच्या पदरात हळुवार वाढून देत असत. याचक म्हणून आलेली सखू पण माऊली.. आणि तिची झोळी रिकामी न जाऊ देणारी पण माऊलीच. एकीकडे अगतिकता दुसरीकडे संपन्नतेचा अहंकार नाही.

अशी ही भाकर.

… अशीच एक संध्याकाळ संपून उगवलेली रात्र. सर्वांची जेवणं आटोपलेली. जेवणाची ओसरीला पोतेरं लागलेलं. दिवसभर कष्ट सोसलेली हाडं ( विशेषतः बायकांची ) सातरीवर पहुडण्याची वेळ झालेली.

दूरवरून कुत्र्यांचे भुंकणे कुंद असलेल्या शांततेचा भंग करणारे. अशात मारुतीच्या पाराजवळील शुभ्र दाढीधारी ‘ मलंग ‘ नावाचा फकीर पांडेबुवांच्या अंगणात, एका हातात लांब काठी, खांद्यावर झोळी दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभा ठाकलेला. अंगणातील प्रचंड कडुलिंबाच्या पानांची सळसळ थांबलेली आणि

” हाज़ीर है तो दे दे मां ” असं आर्जव.

… परत पांडे बुवांच्या घरातील लक्ष्मीच्या कानावर पडलेले ते शब्द. चुलीवर ठेवलेली भाकर परत फकीराच्या झोळीत समाऊन गेलेली.

” तुमची जेवणं झालेली आहेत, काही शिल्लक असेल तरच द्या “, अशी अपेक्षा असलेला मलंग फकीर. त्यांच्या किंवा त्याच्या कुंटुंबीयांच्या पोटात जाणारी ही मोलाची भाकर.

… ईश्वरदत्त भूक. याचनेतही विनय. सहज भावनेने, निर्लेप मनाने दिलेली ही “भाकर”.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांचे आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे..

पुणे नांवातच पुण्यभूमी आहे आणि पुण्याचा वेगळा असा स्वतंत्र इतिहासही आहे. कारण या शहराच्या अंगा खाद्यावर ऐतिहासीक खुणा आहेत. त्या काळात पुणे म्हणजे पेन्शनरांच शहर म्हणून ओळखल जायच. ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ त्याला कारण एकटेपणा, पण अहो!अशी आजची पण तीच परिस्थिती आहे, पण वेळ कसा? कुठे? कुणाबरोबर? घालवायचा हा राक्षसासारखा भेसूर पणे ‘आ ‘ वासलेला प्रश्न, तेव्हां इतका बिकट नव्हता, कारण जिवाभावाच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी सदाशिव पेठेच्या कट्ट्यावर आणि देवळांच्या पायरीवर बसून शेअर व्हायच्या. विद्येच माहेरघर म्हणून ओळखल जाणार हे शहर देवदेवतांच्या देवळानी भरगच्च भरलेल होत. कथा कीर्तन, काकड आरती, भजन यात माणसं एकरूप व्हायची. त्यामुळे गुंडगिरी खून दरोडे अशा कुविचारांचा ‘खच ‘कमी होता. शक्यतोवर सातच्याआत पोरी घरी पळायच्या. मवाली मुलांच्या मनांत शिवाजी महाराजांचा ‘परस्त्री मातेसमान’ हा बाणा ठसलेला होता.

नाना वाड्यावरून, हुतात्मा चौकातून पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर दुकानांच्या गर्दीत लपलय. गर्द केशरी कोरीव नक्षीकाम केलेल्या दरवाजामुळे आपली नजर तिथे स्थिरावते. आत पाऊल टाकल्याबरोबर समोर मारुतीच्या शेंदूरचर्चित मूर्तीचं दर्शन होत. शेंदुराच्या असंख्य पुटांमुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. पुण्यातील चित्रविचित्र नांवात या मारुतीची गणना होते. कारण पूर्वी ह्या परिसरात ‘भांग’ विकली जायची म्हणून या मारुतीरायाच नामकरण झाल, ‘ भांग्या’ मारूती. पुण्यात ‘करळेवाडी, ‘ प्रसिद्ध होती खूप बिऱ्हाड होती तिथे, सोमणांच्या हॉटेलवरून ‘फिम्को शू’ दुकानावरून पुढे गेल की कमानदार दरवाज्याची ‘करळेवाडी’ लागायची. तिथून शिरल की एकदम दक्षिण मुखी मारुतीच्या पुढ्यातच आम्ही पोहोचायचो. आणखी पुढे गेल की यायचा शनिवार वाडा, अस वाटायचं मस्तानी महाल, पेशव्यांची बैठक, दिवाणखाना, पेशवीण बाईंचे दागिने, थाटाच्या वस्तू बघायला मिळतील पण कसल काय! आतला सगळाच नक्षा बदललेला होता. तिथून बाहेर पडल्यावर म्हणूनच मन खट्टू व्हायच. कारण पेशवाई थाटाचे काहीच अवशेष तिथे आढळले नाहीत. नारायण महालातून बाहेर पडतांना आम्ही कानांत बोटे घालायचो, असं वाटायचं नारायणाच्या किंकाळ्या ऐकू येतील की काय! हीच दहशत बालमनांत ठसली होती. वसंत टॉकीजला त्यावेळी नेहमी ऐतिहासिक पिक्चरच लागत असत. नारायणाच्या खुनाचा, सगळा इतिहास आठवत डोळे पुसतच आम्ही बाहेर पडायचो.

मग शनिवार वाड्याच्या बुरुजाला वळसा घालून यायच ते शनी मंदिरापाशी. शनीच्या मंदिरात सगळी कडे तेलच तेल होत, मूर्ती, भिंती, जमीन, कठडे हात लावीन तिथे तेलच तेल असायचं त्यावेळी’ हात लावीन तिथे सोनं ‘हा पिक्चर गाजला होता. आम्हाला मोठ्या माणसांनी बजावलं होतं की शनीचं दर्शन अगदी त्याच्या समोरून घेऊ नये, नाहीतर फटका बसतो. लहानपणी बालमनाला वाटायचं प्रत्यक्ष शनीच मूर्तीतून बाहेर येऊन फटका मारतो की काय! आता हंसू येतेय पोरकट वयातले विचारही पोरकटच असतात नाही का. आम्ही मैत्रिणी एकमेकींना ढकलत कोपऱ्यात सरकायचो जमिनीवर सांडलेल्या तेलामुळे घसरगुंडी झालेली असायची. माझी मैत्रीण सुनंदा सटकन घसरली. ‘घालीन लोटांगण वंदिन शनिदेवा तुझे चरण. ‘अशीस्थिती झाली तिची. आणि तिने डोळे पांढरे केले, दोघी तिला धरायला आणि दोघी शनी महाराजांच्या विनवण्या करायला धावल्या, शनीदेव पावले. आणि सुनंदा शुद्धीवर आली. पण नंतर मात्र ती शनीमंदिराला ‘ दुरून डोंगर साजरे’ असं म्हणून रस्त्यावरून नमस्कार करायला लागली. आता मंदिर खूप स्वच्छ झालंय. पण त्यावेळी मात्र ‘आवजाव मंदिर तुम्हारा, असं होत. सगळेच अगदी मूर्ती जवळ जाऊन शनीला तैलस्नान घालायचे. भक्तांची ही श्रद्धा पुजाऱ्यांना फार महागात पडायची. कारण तिथे बसून तेही तेल्या मारुती झालेले असायचे. त्यामुळे मंदिरात बसताना गणवेशासारखा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. त्यांच्या तुंदीलतनु अवताराकडे बघून आम्हाला हंसू यायचं. पाय घसरून पडणाऱ्या लोकांकडे बघितल्यावर तोंडावर हात ठेऊन हंसू दाबाव लागायचं पोटात मात्र हंसण्याच्या उकळ्या फुटलेल्या असायच्या. ‘जपून टाक पाऊल गडे’ असे म्हणत आम्ही एकमेकींचा हात धरत पुढे सरकायचो. तर मित्र-मैत्रिणींनो अशी होती ही शनि मंदिरा तुझी कहाणी.  शनिमहाराज की जय.

– क्रमशः …  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर, आयुष्य ‘भावगीत’ आहे.

*

किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं

हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे.

*

किती आठवायचं आणि काय विसरायचं,

हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनूष्य’ आहे.

*

किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…

हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे.

*

कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं,

हे जाणवलं तर आयुष्य ‘नंदनवन’ आहे.

*

कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं?

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे.

*

त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं,

अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं,

– – – यालाच आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ म्हणतात.

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- लिलाताईचा हा श्रीदत्तदर्शनाचा नित्यनेम पुढे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण होणाऱ्या दुःखाच्या झंझावातात त्या दुःखावर हळुवार फुंकर घालणार आहे याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.)

आम्ही कोल्हापूरला रहात होतो तेव्हाची गोष्ट. १९७९ साल. आमच्या संसारात झालेलं समीरबाळाचं आगमन सुखाचं शिंपण करणारंच तर होतं. बाळाला घेऊन आरती माहेरहून घरी आली तेव्हाचं नजरेत साठवलेलं त्याचं रुप आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे. समीरबाळाचं छान गोंडस बाळसं,.. लख्ख गोरा गुलाबी रंग.. काळेभोर टपोरे डोळे.. दाट जावळ.. एवढीशी लांबसडक बोटं.. सगळंच कसं सुंदर आणि लोभसवाणं!

समीर माझ्या सहवासात येऊन मोजके दिवसच झाले होते. माझ्या नजरेत नजर घालून ओळख पटल्याचं छानसं कोवळं हसू समीर अजून हसलाही नव्हता त्यापूर्वीच कधी कल्पनाही केली नव्हती अशा त्या अरिष्टाची सुरुवात झाली. समीरला ट्रिपलपोलिओचा डोस द्यायचा होता. डॉ. देवधर यांच्या हॉस्पिटलमधे मी न् आरती त्याला घेऊन गेलो तर तिथे ट्रिपलपोलिओसाठी आधीपासूनचीच लांबलचक रांग. दुसऱ्या मजल्यावरील हाॅस्पिटलपासून सुरू झालेली ती रांग दोन जिने उतरून महाद्वार रोडच्या एका बाजूने वाढत चाललेली. पावसाळ्याचे दिवस. आभाळ गच्च भरलेलं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल असं वातावरण. आम्ही रांगेत ताटकळत उभे. त्यात समीर किरकिरु लागलेला. काल रात्रीपासून हवापाण्याच्या बदलामुळं असेल त्याचं पोट थोडं बिघडलेलं होतं. रांग हलायची शक्यता दिसेना तसे पाऊस सुरु होण्यापूर्वी घरी जाऊ आणि नंतर कधीतरी आधी अपॉइंटमेंट घेऊन येऊ असं ठरवून आम्ही तिथून निघालो. आमचं घर जवळच्या ताराबाई रोडवरुन पुढं आलं की चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. ताराबाई रोडवर येताच माझं लक्ष सहजच उजव्या बाजूच्या एका दवाखान्याच्या बोर्डकडे गेलं.

डाॅ. जी. एन्. जोशी. बालरोगतज्ञ बोर्ड वाचून मी थबकलो.

” इथं ट्रिपल पोलिओ डोस देतात कां विचारूया?” मी म्हंटलं. तिने नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. आजच्या आज डोस देऊन होतोय हेच महत्त्वाचं होतं. आम्ही जिना चढून डॉ. जोशींच्या क्लिनिकमधे गेलो. मी स्वतःची ओळख करून दिली. आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. समीरचं किरकिरणं सुरूच होतं. त्यात त्याने दुपटं घाण केलं. डाॅ. नी नर्सला बोलावलं. आरती समीरला घेऊन तिच्याबरोबर आत गेली. त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. ट्रिपल पोलिओचा डोस देऊन झाला. तेवढ्यांत त्याला पुन्हा लूज मोशन झाली. चिंताग्रस्त चेहऱ्याने डॉक्टर माझ्याकडेच पहात होते.

“बाळाचं पोट बिघडलंय कां? कधीपासून?” त्यांनी विचारलं.

“काल रात्री त्याला एक दोनदा त्रास झाला होता. आणि आज सकाळी इकडे येण्यापूर्वीसुध्दा एकदा. पाणी बदललंय म्हणून असेल कदाचित. पण तोवर छान मजेत असायचा. कधीच कांही तक्रार नव्हती त्याची. “

“ठीक आहे. एकदा तपासून बघतो. वाटलंच तसं तर औषध देतो. ” डॉक्टर म्हणाले.

त्यांनी समीरला तपासलं. त्याची नाडीही पाहिली. ते कांहीसे गंभीर झाले.

” बाळाला एक-दोन दिवसासाठी अॅडमिट करावं लागेल “

” अॅडमिट?कां? कशासाठी ?”

” तसं घाबरण्यासारखं काही नाहीय. पण इन्फेक्शन आटोक्यांत आणण्यासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. एक-दोन दिवस सलाईन लावावं लागेल. पुढे एखादा दिवस ऑब्झर्वेशनखाली राहील. “

घरी आम्ही दोघेच होतो. आई मोठ्या भावाकडे सातारला गेली होती. पुढच्या आठवड्यात आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपणार होती. त्यापूर्वी आई येणार होतीच. आत्ता लगेच अॅडमिट करायचं तर तिला लगोलग इकडे बोलावून घेणे आवश्यक होऊन बसेल. मला ते योग्य वाटेना.

“डॉक्टर, घरी आम्ही दोघेच आहोत. आम्हा दोघांच्या पेरेंट्सना आम्ही आधी बोलावून घेतो. तोवर त्याला तात्पुरतं औषध द्याल का कांही? तरीही बरं वाटलं नाही तर मात्र वाट न बघता आम्ही त्याला अॅडमिट करू. “

“अॅज यू विश. मी औषध लिहून देतो. दिवसातून तीन वेळा एक एक चमचा त्याला द्या. तरीही मोशन्स थांबल्या नाहीत तर मात्र रिस्क न घेता ताबडतोब अॅडमिट करा.”

त्यांनी औषध लिहून दिलं. जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून आम्ही ते घेतलं. यात बराच वेळ गेला होता. मला बँकेत पोहोचायला उशीरच होणार होता. मी समोरून येणारी रिक्षा थांबवली. दोघांना घरी पोचवलं. दोन घास कसेबसे खाऊन माझा डबा भरून घेतला आणि बँकेत जाण्यासाठी बाहेर आलो. आरती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती.

“त्याला औषध दिलंयस कां?”

“पेंगुळला होता हो तो. आत्ताच डोळा लागलाय त्याचा. थोडा वेळ झोपू दे. तोवर मी पाणी गरम करून ठेवते. जागा झाला की लगेच देते. ” ती म्हणाली.

तो शनिवार होता.

“आज हाफ डे आहे. मी शक्यतो लवकर येतो. कांही लागलं तर मला बॅंकेत फोन कर लगेच. काळजी घे ” मी तिला धीर दिला न् घाईघाईने बाहेर पडलो.

त्याकाळी क्वचित एखाद्या घरीच फोन असायचा. त्यामुळे फोन करायचा म्हणजे तिला कोपऱ्यावरच्या पोस्टात जाऊनच करायला लागणार. बाळाला घेऊन कशी जाईल ती?

हाफ डे असला तरी बॅंकेतून बाहेर पडायला संध्याकाळ उलटून गेलीच. त्यात बाहेर धुवांधार पाऊस. घरी पोचेपर्यंत अंधारुन तर आलं होतंच शिवाय मी निम्माशिम्मा भिजलेलो. आत जाऊन कपडे बदलून आधी गरम चहा घ्यावा असं वाटलं पण तेवढीही उसंत मला मिळणार नव्हती. कारण बेल वाजवण्यापूर्वीच दार किलकिलं असल्याचं लक्षात आलं. दार ढकलताच अजून लाईट लावलेले नसल्यामुळे आत अंधारच होता. पण त्या अंधूक प्रकाशातही समोर भिंतीला टेकून आरती समीरला मांडीवर घेऊन थोपटत बसली असल्याचं दिसलं.

“अगं लाईट नाही कां लावायचे? अंधारात काय बसलीयस?” मी विचारलं आणि लाईटचं बटन ऑन केलं. समोरचं दृश्य बघून चरकलोच. समीर मलूल होऊन तिच्या मांडीवर केविलवाणा होऊन पडलेला. निस्तेज डोळे तसेच उघडे. ऐकू येईल न येईल अशी म्लान कुरकूर फक्त.

“काय झालं?अशी का बसलीयस?”

“सांगते. आधी तुम्ही पाय धुवून या न् याला घ्या बरं थोडावेळ. पाय खूप अवघडलेत हो माझे. “

मनातली चहाची तल्लफ विरुन गेली. मी पाय धुऊन घाईघाईने कपडे बदलले आणि समीरला उचलून मांडीवर घेऊन बसलो. त्याचा केविलवाणा चेहरा मला पहावेना.

“जा. तू फ्रेश होऊन ये, मग बोलू आपण. ” मी आरतीला म्हंटलं. पण ती आत न जाता तिथंच खुर्चीवर टेकली. तिचे डोळे भरुन आले एकदम.

“तुम्ही ऑफिसला गेल्यापासून फक्त एक दोन वेळाच दूध दिलंय त्याला पण तेही पोटात ठरत नाहीय हो. आत्तापर्यंत चार दुपटी बदललीयत. काय करावं तेच कळत नाहीय. किती उशीर केलात हो तुम्ही यायला.. “

“तू फोन करायचा नाहीस का? मी रोजची सगळी कामं आवरत बसलो. त्यात हा पाऊस. म्हणून उशीर झाला. तू औषध कां नाही दिलंस?”

“दिलंय तर. दोन डोस देऊन झालेत. तिसरा रात्री झोपताना द्यायचाय. पण औषध देऊनही त्रास थांबलाय कुठं? उलट जास्तच वाढलाय. मला काळजी वाटतेय खूsप. काय करायचं?”

डाॅ. जोशी म्हणालेच होते. त्रास वाढला तर रिस्क घेऊ नका म्हणून. आम्हा दोघानाही या कशाचाच अनुभव नव्हता. अॅडमिट करण्यावाचून पर्यायही नव्हता. कुणा डाॅक्टरांच्या ओळखी नव्हत्या. समीरला डाॅक्टरांकडे न नेता रात्रभर घरीच ठेवायचीही भीती वाटत होती. माझी मोठी बहिण आणि मेहुणे सुदैवाने कोल्हापुरातच रहात होते. त्यांना समक्ष भेटून त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं. मी कपडे बदलून जवळचे सगळे पैसे घेतले न् बाहेर आलो.

” कुठे निघालात?”

“ताईकडे. त्या दोघांना सांगतो सगळं. त्यांनाही सोबत घेऊ. तू आवरुन ठेव. मी रिक्षा घेऊनच येतो. जोशी डाॅक्टरांकडे अॅडमिट करायच्या तयारीनेच जाऊ. बघू काय म्हणतायत ते. “

मी ताईकडे गेलो. सगळं सांगितलं.

“जोशी डाॅक्टर? पार्वती टाॅकीजजवळ हाॅस्पिटल आहे तेच का?” मेव्हण्यांनी विचारलं.

मी सकाळी डाॅक्टरांनी आम्हाला दिलेलं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड खिशातून काढलं. पाहिलं तर हाॅस्पिटलचा पत्ता तोच होता.

” हो. तेच. त्यांचं ताराबाई रोडवर क्लिनिक आहे आणि हॉस्पिटल पार्वती टॉकीजजवळ. तुमच्या माहितीतले आहेत कां?”

” नाही. पण नाव ऐकून होतो. तरीही कोल्हापुरात डॉ. देवधर हेच प्रसिद्ध पेडिट्रेशियन आहेत. आधी त्यांना दाखवू या का? “

 ” चालेल. पण असं ऐनवेळी जाऊन भेटतील कां ते?नाही भेट झाली तर? सकाळी खूप गर्दी होती आम्ही ट्रिपलपोलिओ डोससाठी गेलो तेव्हा, म्हणून म्हटलं”

” ठिकाय. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. चल. “

आम्ही रिक्षातूनच घरी गेलो. आरती दोघांचं आवरून आमचीच वाट पहात होती. पावसाचा जोर संध्याकाळपासून ओसरला नव्हताच. समीरबाळाचं डोकं काळजीपूर्वक झाकून घेत ती कशीबशी रिक्षात बसली. मी रिक्षावाल्याला पार्वती टाॅकीजजवळच्या डाॅ. जोशी हाॅस्पिटलला न्यायला सांगितलं. रिक्षा सुरु झाली न् माझा जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत सुरू होतं असं वाटलं खरं पण ते तसं नव्हतं यांचा प्रत्यय लगेचच आला. एकतर पावसामुळे रिक्षा सावकाश जात होती. रस्त्यात खड्डेही होतेच. आपण कुठून कसे जातोय हेही चटकन् समजत नव्हतं. तेवढ्यांत रिक्षा थांबली.

” चला. आलं हॉस्पिटल. ” रिक्षावाला म्हणाला. उतरतानाच माझ्या लक्षांत आलं की आपण महाद्वार रोडवरच आहोत. त्या अस्वस्थ मन:स्थितीत मला त्या रिक्षावाल्याची तिडीकच आली एकदम.

“मी पार्वती टॉकीजजवळ डॉ. जोशी असं सांगितलं होतं ना तुम्हाला? इथं उतरुन काय करू?”

 त्यांने चमकून माझ्याकडं पाहिलं. थोडासा वरमला. मी पुन्हा रिक्षात बसलो.

“इथं कोल्हापुरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डाकतरकडंच आणत्यात समदी. रोज चारपाच फेऱ्या हुत्यात बघा माज्या रिक्षाच्या. सवयीने त्येंच्या दवाखान्याम्होरं थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण….. ?

पण ती त्याची अनवधानाने झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा नियतीचाच एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदाचे डोही…  ☆ श्री सुनील देशपांडे

सध्या वयाच्या पंचाहत्तरी मधून मार्गक्रमण चालू आहे. ७५ नंतर पूर्वी वानप्रस्थाश्रम असे म्हणत. हळूहळू व्यावहारिक जगतापासून दूर होणे जमले पाहिजे. किंबहुना जीवनातील व्यवहारांपासून दूर होता आले पाहिजे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

‘आता उरलो उपकारापुरता’ असे पूर्वी म्हणत पण आता म्हणावेसे वाटते ‘आता उरलो समाजापुरता. ’ मृत्यूनंतर हळूहळू सगळे आपल्याला विसरतातच. परंतु या वयापासून जिवंतपणी सुद्धा माणसे विसरू लागतात.

माझे सासरे एकदा मला म्हणाले ‘ मी मेल्यावर तुम्ही माझ्याविषयी चार चांगले शब्द बोलाल. माझ्यावर कविता कराल. पण ती ऐकायला मी कुठे असेन ? त्याचा काय उपयोग? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल माझ्यावर एक कविता जिवंतपणी करून मला ऐकवा तेवढी माझी शेवटची इच्छा समजा’ खरोखरच मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कविता लिहून त्यांना ऐकवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव होता.

मला आता सर्वच परिचितांना सांगावेसे वाटते. ज्यांना प्रेमापोटी नाती जपायची आवड व इच्छा असेल त्यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कधीतरी येऊन जावे.

‘सुनील गेला’ असा फोन येईल तेव्हा तुम्ही ‘ताबडतोब निघतोच आहे’ असे म्हणून गडबडीने यावयास निघाल हे मला नको आहे. मुळातच मी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे मृत्यूनंतर कोणी भेटायला यावे इतका वेळ असणारच नाही. दुसरे म्हणजे मृत्यूनंतर ‘भेटणे’ शक्यच नाही. त्याला आपण पारंपरिक भाषेत दर्शन म्हणतो. हे कसले दर्शन? माणसाचे जिवंतपणी दर्शन न घेता मृत्यूनंतर दर्शन घेणे हे विडंबन आहे असे मला वाटते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देहदान करावयाचे असते. त्यामुळे अगदीच जवळचे चार नातेवाईक किंवा मित्र यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावे याशिवाय त्यात दुसरे काही साध्य नाही.

माझ्या एका मित्राच्या सासर्‍यांनी जिवंतपणी श्राद्धविधी अर्थात ‘साक्षात स्वर्ग दर्शन’ या नावाचा विधी त्यांचे गावी केला. सगळ्यांच्या गाठीभेटी गळाभेटी आणि सहभोजन असा मस्त समारंभ करण्यात आला. हीच आपली अंतिम भेट म्हणून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला आणि देहदान सुद्धा झाले. ही संकल्पना मला खूप भावली.

परंतु एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सर्वांना बोलावणे हा इतरांच्या सोयी गैरसोयीचा भाग असतो. बऱ्याच वेळा इच्छा असून सुद्धा तो दिवस सोयीचा नसतो. तसेच खूप जास्त माणसे एका वेळेला जमली की कुणाशीच नीट संवाद होत नाही.

म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते…. 

… वर्षामध्ये जेव्हा केव्हा जमेल, शक्य होईल तेव्हा येऊन भेटावे.

अर्थात त्यात औपचारिकता नको. जुळलेले भावबंध असतील तरच भेटीत आनंद असतो.

सोशल मीडियावर मेसेज टाकून मी जिवंत असल्याची खबरबात सातत्याने देत असतोच.

अर्थात मृत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो. कोणत्या क्षणाला तो येईल कुणी सांगावे? म्हणूनच  मी गुणगुणत असतो…..

… ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो, हर एक पल की खुशी को गले लगाते चलो ’.

त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचं सुख मी उपभोगत असतो. कुणाच्या येण्याने त्या सुखाला आणखी एक आनंदाची झालर लाभेल.

….. जे काही आयुष्याचे क्षण शिल्लक असतील त्या क्षणांमध्ये अधिकाधिक आनंद जोडता यावा आणि जिवंतपणीच स्वर्ग सुखाचा अनुभव घेता यावा ही मनापासून इच्छा.

‘ जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’.. या अनुभवापासून दूर होत.

आता फक्त अनुभूती हवी आहे… 

… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

… एक अभ्यासपूर्ण लेख – 

🎼 🎤🎻🎹 🎷🥁

रविवारी पुणे ओपीडी मधे कोणत्या रुग्णाला सांगितले नक्की आठवत नाही.

काय सांगितले ते आठवत आहे.

स्वयंपाक करत असताना, भोजन करत असताना आणि भोजन झाल्यानंतर १ तास ‘मंद स्वरातील’ संगीत घरी लावत जा.

 

इथे आपल्याला म्युझिक, डीजे, मॅश अप नको आहे. भावगीत, भक्तीगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यांचा शांत आवाज पुरेसे आहे.

त्याने काय होईल ?? रुग्णाचा प्रश्न! 

दोन महिने न चुकता करा आणि मला तुम्हीच सांगा… माझे उत्तर! 

संगीत – स्वर यांचा आणि आपल्या शरीरातील दोष स्थितीचा ‘थेट’ संबंध आहे.. त्या विषयी….

शरीरातील दोषांची साम्यावस्था आणि शरीराचा बाहेरच्या घटनांना मिळणारा प्रतिसाद यात पंचज्ञानेंद्रिय पैकी कानाशी बराच जवळचा संबंध असतो.

प्रकाश आणि आवाज याचा वेग प्रचंड असतो.

कित्येक मैल दूर वीज पडली तर आपला जीव घाबरा होतो.

चार रस्ते सोडून कोठे करकचून ब्रेक कोणी मारला तर आपण काळजी करतो.

घरी कोणी मोठ्याने बोलले तर नाजूक मनाच्या लोकांना चक्कर येते… इत्यादी! 

पूर्वी जेव्हा लग्न हा संस्कार असायचा, इव्हेन्ट नसायचा तेव्हा बिस्मिल्ला साहेबांची सनई आपले स्वागत करायची.

आता योयो किंवा बादशाह, डीजे किंवा ढोल पथक आपले वेलकम करते.

संस्कारापेक्षा भपका जास्त.

शांती पेक्षा गोंगाट जास्त.

याने काय होते ? मूळ हेतुकडे दुर्लक्ष होऊन विनाकारण हृदयात धडधड वाढते.

पुढील वर्ग पहा – 

१. जेवण बनवत असताना फोनवर बोलणारे.

२. जेवण करत असताना फोन वर बोलणे – व्हिडीओ पाहणे – टीव्ही पाहणे – इमेल्स पाहणे इत्यादी.

३. जेवण करत असताना भांडणे / मोठ्याने बोलणे, समोर असलेल्या प्रदार्थाबद्दल वाईट बोलणे.

४. गप्पा मारत जेवणे.

५. जेवण झाल्यावर ऑफिस चे काम / घरकाम / बाहेर जाणे इत्यादी.

या पाच प्रकारात आपण कोठे ना कोठे बसत असतो. अगदी रोज.

चार घास खायला मर मर करायची आणि चार घास युद्धभूमीवर बसून खायचे..

डोकं शांत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. जिभेवर नियंत्रण नाही. ही अनारोग्य निर्माण करणारी तिकडी! 

संगीत हे नादावर आधारलेले आहे.

अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ‘नाद ‘ म्हणतात.

आपल्या हृदयात २२ नाडी आहेत असं मानले जाते. या क्रियाशील नाड्यानी हृदय आणि शरीर याचे संचलन होते.

याच आधारावर संगीतात २२ श्रुती मानल्या आहेत. या एका पेक्षा एक वरच्या पट्टीत आहेत.

बावीस श्रुती मधून बारा स्वर.

हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे :

– षड्ज (सा),

– कोमल ऋषभ (रे),

– शुद्ध ऋषभ (रे),

– कोमल गांधार (ग),

– शुद्ध गांधार (ग),

– शुद्ध मध्यम (म),

– तीव्र मध्यम (म),

– पंचम (प),

– कोमल धैवत (ध),

– शुद्ध धैवत (ध),

– कोमल निषाद (नी),

– शुद्ध निषाद (नी) 

– आणि षड्ज (सा).

यातील षड्ज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा सूर्य.

श्रवणेंद्रिय मार्फत ऐकलेले जे ब्रह्मरंध्र पर्यंत पोहोचून त्या नादाचे विविध प्रकार होतात त्यांना श्रुती म्हणतात.

तीन सप्तक – 

१. मंद सप्तक – हृदयातून निघणारा आवाज 

२. मध्य सप्तक – कंठातून निघणारा आवाज 

३. तार सप्तक – नाभी पासून निघून ब्रह्म रंध्र पर्यंत जाणारा आवाज.

आपल्या दोषांची स्थिती दिवसभरात बदलत असते. सकाळी कफ वाढतो. दुपारी पित्त आणि रात्री वात वाढतो.

रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय.

हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध, शुद्ध असणारे राग रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग.

यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशावेळी संधिप्रकाशसमयी सामान्यतः रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात.

सकाळी ७ ते १० व 

रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून,

रात्री १० ते ४ व 

दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. शरीरातील दोषांचे संतुलन करायची क्षमता या रागात, संगीतात आहे.. ! 

आपल्याला कायम उद्दीपित करणारे संगीत ऐकायची सवय झाली आहे.

बेशरम रंग असेल किंवा काटा लगा व्हाया बदनाम मुन्नी ते शीला ची जवानी.. स्पोटिफाय वर हेच ऐकणे सुरु असते.

मी संगीतातील तज्ज्ञ नाही. मी संगीत शिकलेलो नाही.

ठराविक आवाजाला शरीर प्रतिक्रिया देते हे सत्य आहे.

स्वयंपाक करत असताना कानावर भिगे होठ तेरे पडत असेल तर सात्विक मेनू पण तामसिक गुणांचा होतो.

जेवण करत असताना कानावर रडकी गाणी पडत असतील तर राजसिक वाढ होते.

आपण काय खातोय यापेक्षा आपण कोणत्या वातावरणात खातोय हे महत्वाचे असते! 

वर उल्लेख केलेले संगीत आपल्या वृत्ती स्थिर करतात.

आपण जे काम करत आहोत त्यात एकाग्र करण्यास मदत करतात.

आपण जे खाल्ले आहे ते पचवायला मदत करतात… !

क्राईम पेट्रोल बघत जेवण करणारे कालांतराने आक्रमक होतात असे माझे निरीक्षण आहे! 

कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर दोन महिने हे करून बघावे.

मी स्वतः स्वयंपाक करत असताना, जेवताना, रुग्ण तपासणी करत असताना गीत रामायण, मनाचे श्लोक, क्लासिकल इत्यादी ऐकत असतो.

आपल्याला कोठे ‘कुंडी ना खडकाओ राजा सीधे अंदर आओ राजा’ असे स्टंट करायचे आहेत.

आजूबाजूचे वातावरण सात्विक असेल तरच खाल्लेले अन्न सात्विक गुणाचे होते.

नाहीतर फक्त सलाड चरून कायम शिंग मारायची खुमखुमी असलेले मेंढे आपल्या आजूबाजूला शेकड्याने आहेतच की..

🎼 🎤 🎼

लेखक : डॉ. अनिल वैद्य

 …. एक संगीत प्रेमी…

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”

दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”

मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”

तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”

“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.

ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.

या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.

त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”

मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!

पैशाचा प्रश्नच नाही. कारण..

…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द, शब्द आणि शब्द… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

🌺 विविधा 🌺

☆ शब्द शब्द आणि शब्द… 🤔 ☆ श्री सुहास सोहोनी ☆

थारेपालट की थालेपारट ??

परोक्ष की अपरोक्ष ??

व्यस्त की व्यग्र ??

चपल की अचपल ??

व्यासपीठ की मंच ??

असे अनेक शब्द आहेत ना, जे चुकीच्या जागी – चुकीच्या अर्थाने सर्रासपणे वापरले जातात ! एक म्हणजे अर्थ नीट माहीत नसतो किंवा चुकीचा शब्द वापरायची रूढी किंवा परंपरा असते.

वरीलपैकी पहिलाच शब्द बघा ना. थारेचा मूळ शब्द थारा म्हणजे जागा किंवा आश्रय. पालट म्हणजे बदलणे. जसे कायापालट, खांदेपालट. म्हणून थारेपालट हा योग्य शब्द. म्हणजे जागा बदलणे. पण थालेपारट हा शब्द सुद्धा अनेक ठिकाणी चुकीने वापरला जातो.

 

परोक्ष आणि अपरोक्ष मध्ये तर घोळ ठरलेलाच. परोक्ष म्हणजे नजरेआड आणि अपरोक्ष म्हणजे नजरेसमोर. पण सर्रासपणे हे शब्द उलट अर्थी वापरले जातात.

 

“मी कामात व्यस्त होतो. ” असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. “मी कामांत व्यग्र होतो. ” हे बरोबर. अस्त-व्यस्त म्हणजे सुलट व उलट. त्याचे रूप बदलून नित्य वापराचा शब्द झाला अस्ताव्यस्त. म्हणजे पसरलेलं, बेशिस्त, पसारा. सम आणि व्यस्त हे विरोधाभासी शब्द तर आपण नेहमीच वापरतो. त्यामुळे “मी कामात व्यग्र आहे” हे बरोबर. तथापि व्यस्त या शब्दाला सुद्धा अलीकडे कामात गुंतलेला असणे, कामात बुडालेला असणे, हे अर्थ प्राप्त झाले आहेत आणि त्याला लोकमान्यता मिळाली आहे.

 

आपण चपल-अचपल हे शब्द चुकीच्या रुढीमुळे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. “अचपल मन माझे नावरे आवरिता” चपल या अर्थाने अचपल हा शब्द श्री रामदास स्वामींनी देखील वापरला आहे.

 

महाविद्वान, बुद्धिवंत अशा व्यासमुनींनी ज्या आसनावर किंवा पीठावर बसून महाभारत सांगितले, त्या आसनाला व्यासपीठ असं म्हणतात. हे आसन किंवा पीठ पवित्र समजले जाते. आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानप्रबोधनाची प्रवचने ज्या आसनावरून दिली जातात ते व्यासपीठ.

एक किंवा अनेक वक्ते ज्या स्थानावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आधारलेली भाषणे देतात, त्या स्थानाला मंच असे म्हणतात.

ज्या स्थानावरून मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे – नाटके, गायन, नृत्य, तमाशा वगैरे सादरीकरण केले जाते, त्या स्थानाला रंगमंच असे म्हणतात. म्हणजेच व्यासपीठ, मंच व रंगमंच असे तीन प्रकार या स्थानांचे आहेत.

🌺

अशा स्वरूपाचे, चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे, इतर अनेक शब्द सुद्धा प्रचलित आहेत.

☘️

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares