मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्यांना समजून घेताना… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈 

☆ त्यांना समजून घेताना… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

(World Bipolar day निमित्त…) 

एक साठीच्या आसपासचे गृहस्थ आपल्या ३४  वर्षाच्या ‘क’ नावाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. कसबसं याला घरातल्या चौघांनी  धरून आणले  बघा मॅडम अस ते म्हणाले. घरी सर्वांच्या अंगावर ‘क’ धावून जातो. घरातून पळून रस्त्यावर जातो. अजिबात झोपत नाही. सारख्या येरझाऱ्या घालतो. सारखी बडबड करतो.  आठवडा झाला अस करतोय. कामावर जात नाही.

‘क’ बोलण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हतेच. त्यांना त्यांच्या आजाराचीही कल्पना नव्हती. मी ‘क’ ची केस हिस्टरी  घेण्यासाठी अनेक प्रश्न रुग्णाच्या वडिलांना विचारले. त्यांच्यासोबत त्याचे भाऊ,मित्र ही आले होते. त्यांकडूनही क च्या केस बद्दल उपयुक अशी माहिती मिळत गेली.

वडील सांगत होते, क आणि त्याच्या पत्नीमध्ये सारखे किरकोळ कारणास्तव वाद होत होते. एके दिवशी पत्नी घर सोडून माहेरी गेली. परत आलीच नाही. त्यानंतर हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. आता हा अस वागतोय. पण याआधी काही दिवस, वेगळंच वागण होत त्याच.  मी खूप थकलोय, माझ्यात शक्ती नाही म्हणत होता. जेवत नव्हता. एकटक कुठंतरी बघत बसायचा. अधून मधून रडायचा. सारख दिवसभर झोपायचा. आत्महत्येबद्दल विचार येत होते. आम्हाला काही कळत नाहीए. काय झालंय याला ? दोन तीन महिने झाले ,मधूनच कधी गप्पच होतो तर कधी तरी एकदम अंगात काही संचारल्या सारखा वागतो. सगळे देवधर्म केले,काही उपयोग नाही झाला. गावातल्या डॉक्टरांनी औषध दिली पण त्याचाही काही उपयोग नाही झाला.

‘क’ यांचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि इतर सर्व गोष्टी मानसशास्त्रीय दृष्टीने जाणून घेतल्या. त्यांची आजाराची लक्षण,  कालावधी निकषाद्वारे पडताळून पाहता, ‘क’ हे सध्या अत्योन्माद(Mania) अवस्थेत होते. आणि यापूर्वीची त्यांची अवस्था विषादावस्था (Depression) होती. आलटून पालटून येणाऱ्या या भावावस्था म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती-1 (Bipolar Disorder-1) अशी त्यांची विकृती होती.

पण एकंदरीत त्यांची सध्याची भावावस्था, लक्षणांची तीव्रता  ही नुसत्या चिकित्सेने कमी होणारी नव्हती. त्यामुळे मी क च्या आजाराबद्दल त्याच्या वडिलांना कल्पना दिली. आणि त्यांना मनोविकारतज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला.

मनोविकारतज्ञांचे उपचार सुरू झाले. काही दिवसानंतर त्यांच्या उपचारांसोबतच  ‘क’ व्यक्तीवर, मी थेरेपी सत्र सुरू केली. उपचार आणि थेरेपीने काही महिन्यातच  ‘क’ मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. तो कामाला जाऊ लागला. त्याचे आत्महत्येचे विचार बंद झाल्याने, त्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा वाटू लागली. व्यायाम,योगा करत आपली मानसिक अवस्था सुधारण्यासाठी तो स्वतःही प्रयत्न करू लागला. 

भावस्थिती विकृती (Mood Disorder) – एमिल क्रेपलिन यांनी १८९९ मध्ये अतिउत्साहविषाद विकृतीचे (Manic Depressive Insanity) वर्णन केले आहे. हिच विकृती उभयावस्था भावविकृती म्हणून ओळखली जाते. या विकृतीस उन्माद अवसादविकृती असेही म्हटले जाते. भावस्थिती विकृतीमध्ये दोन भावस्थिती प्रामुख्याने आढळतात…

द्विध्रुवीय भावविकृती – । मध्ये अत्योन्माद (Mania) आणि विषाद (Depression)अश्या दोन्ही अवस्था व्यक्ती अनुभवते. 

द्विध्रुवीय भावविकृती – ॥ मध्ये अल्पोन्माद (hypomania) आणि विषाद/अवसाद (Depression) या दोन्हीचे झटके आलटून पालटून दिसून येतात. 5 ते 10 टक्के केसेस मध्ये द्विध्रुवीय ॥ विकृती ही द्विधृवीय – 1 मध्ये विकसित झाल्याचे दिसते.

चक्रीय विकृती (सायक्लोथायमिक डिसॉर्डर)-

अल्पोन्माद आणि विषाद आलटून पालटून येणारी स्थिती. 

या विकृती उद्भवण्यास अनेक जैविक तसेच मानसशास्त्रीय घटक कारणीभूत असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

कित्येक कुटुंबात, नात्यात, परिसरात अशा अनेक व्यक्ती असतात की, परिस्थितीनुसार, घटनेनुसार,आघातानुसार आणि इतर अनेक कारणांनी व्यक्तीची मानसिक अवस्था बिघडलेली असते. त्यांना नक्की काय होत आहे हे कुटुंबातील इतर व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. कुणी मानसोपचाराचा सल्ला दिला तर ते उधळून लावतात.  मानसोपचार घेतोय अस समजलं तर समाज काय म्हणेल? वेडा म्हणून लेबल लागेल का? आपण घरापासून, नात्यांपासून,समाजापासून दूर जाऊ का?  ह्या अस्वीकाराच्या विचारांनी आणि भीतीपोटी रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीय रुग्णासाठी इतर  विविध उपचारांचा अवलंब करतात. तोपर्यंत त्रास वाढलेला असतो. रुग्णाचे वर्तन क्षतीग्रस्त झालेले असते. 

विकृतीची लक्षणे हळूहळू सुरू झाली की, काही वेळेस कुटुंबियांना वाटू शकते ही व्यक्ती असे वर्तन मुद्दाम करते आहे का? परंतु लवकरात लवकर मानसोपचार तज्ञाद्वारे उपचार घेणे गरजेचे आहे.  अर्थात या आजारापासून बरं होण्यासाठी औषधे घेणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच रुग्णाला मानसिक उपचार, थेरपी, स्वतःला मदत करणाऱ्या स्ट्रॅटेजी वापरून बरे होता येते. मात्र यासाठी रुग्ण व्यक्तीस पुरेशी झोप, योग्य आहार, कुटुंबाची साथ नक्कीच मिळायला हवी.

आज World Bipolar day म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती जनजागृती दिवस. 

30 मार्च हा दिवस विन्सेन्ट वॅन गॉग या जागतिक कीर्तीच्या फ्रेंच चित्रकाराचा  जन्मदिन आहे. वॅन गॉगला हा रोग असल्याचे त्याच्या निधनानंतर लक्षात आले. त्यामुळे त्याच्या जन्मदिनीच हा दिवस याबाबत जनजागृती व्हावी म्हणून साजरा केला जातो.  वॅन गॉगशिवाय यो यो हनी सिंग, शामा सिकंदर, विन्स्टन चर्चिल यांनी या रोगावर यशस्वी मात केली. जगातले अंदाजे २.८ टक्के नागरिक याने ग्रस्त आहेत.  भारतात हे प्रमाण अंदाजे ६.७ टक्के इतके आहे.           

मानसिक आजार असलेल्या सर्व व्यक्तींना इतर नागरिकांप्रमाणेच समाजात राहण्याचा, काम करण्याचा आणि उपचार घेण्याचा अधिकार कायद्यात आहे. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे अत्यावश्यक आहे, तसेच अशा व्यक्तींना, समाजातील व्यक्ती या नात्याने स्वीकारून, त्यांची  मनं समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी

मनात उतरणारी हळवी अक्षरं! निसर्गाशी होणारा संवाद, अक्षरांशी आशयाची होणारी एकतानता, एकरूपता, सुंदर निरागस भावना, तेवढाच सुंदर आशय व त्यांच्या बद्दल मनात असणारी भक्ती, जीवनाचा आस्वाद घेण्याची आतुरता, समरसता, या सगळ्याचा परिपाक म्हणजे कागदावर अवतरलेली अक्षर शारदा! हो, अगदी अ – क्षर शारदा असते. संजीवनी मराठे यांची कविता ही स्वप्नांची निर्मिती असते. तरीही सत्य, संस्कृती, समाज यांच्याशी जोडलेल्या नाळेचं भान असणारी असते. त्यांच्या मते प्रेम हे कधीच, कशालाही अडकाठी बनत नसते, उलट जगण्याला, व्यक्तिमत्व विकासाला, स्वर्गीय चैतन्याचा वेध घेण्याला पोषक व पूरक असते. निसर्गात, चराचरात परमतत्व पाहण्याची दृष्टी त्यांना रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून मिळाली होती. त्यांच्या कवितात जशी सहजता आहे तशी प्रासादिकता पण आहे.

त्यांची आपल्या ओठावर रेंगाळणारी कांही गाणी, सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ कां, या गडे हासू या.

त्यांच्या पुरस्कार प्राप्त ‘बरं का गंआई ‘ ह्या कवितेची कल्पना फार सुंदर आहे. छोटी मुलगी आईला म्हणते, “तू आहेस बेबी, मी आहे आई, हे विसरायचं नाही, झोपताना मात्र तू आई व्हायचं, अंगाई म्हणत थोपटत राह्यचं, दुपारचं काही आठवायचं नाही, बरं का गं आई!”

आज 1एप्रिल, कवियित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतिदिन! त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. त्यांना संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय घ्यायचा होता, त्यामुळे त्या मुलींच्या शाळेत गेल्या आणि नंतरही त्यांनी SNDT महिला विद्यापीठातून MA पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या  १६ व्या वर्षी कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनात त्या कवियित्री म्हणून सगळ्यांना परिचित झाल्या. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचा ‘काव्य संजीवनी ‘ हा कविता संग्रह प्रसिद्ध केला होता.

पद्मा गोळे त्यांच्या वर्ग मैत्रीण होत्या. दोघींच्या वहीत निदान एकदिवसाआड  एक नवीन कविता असायची. ही गोष्ट शिक्षकांनाही माहित असायची त्यामुळं ते ही वर्गात वाचून दाखवायला सांगायचे. कधी कधी गायला सांगायचे.लहानपणा पासून घरून व शाळा कॉलेजातील शिक्षकांकडून कविता लिहिण्याला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांच्या कवितांवर  काही प्रमाणात भा. रा. तांबे व रविकिरण मंडळातील  कवींचा प्रभाव होता. त्यांचे ७ – ८ काव्य संग्रह, बालसाहित्य, लेख संग्रह, गीतांजली हा काव्यानुवाद प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची मुलगी अंजूने परदेशातून त्यांना लिहीलेल्या पत्रांचे संकलन त्यांनी प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘बरं का गं आई’, ‘हसू बाई हसू’ या बालगीतांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने गौरविले आहे.

त्यांचा आवाज चांगला होता व त्यांनी सुरांचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे कविता करताना शब्द आणि सूर एकत्रच यायचे, नि लयीत कविता व्हायची. त्या कविता  गाणाऱ्या म्हणूनच प्रसिद्ध होत्या. काव्य वाचनाच्या कार्यक्रमात स्वतःची कविता वाचायला त्यांना आवडायचं नाही. गद्य वाचायचं, पद्य कसं वाचायचं हा त्यांना प्रश्न पडायचा. त्यामुळे कायम त्या सुरात काव्य वाचन –नव्हे गायन करायच्या.

आपल्याला सांगली करांना अभिमान वाटावा अशी गोष्ट मला कळली, ती म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात त्या पतीबरोबर खानापूर – बेळगावी सोडून सांगलीला आल्या होत्या. राम मंदिराजवळ त्यांचा ‘ रामकृपा ‘ नावाचा बंगला होता. काही दिवस त्यांनी सांगलीला शिक्षिका म्हणूनही काम केले.

संजीवनी मराठे यांची आकाशवाणी वर मुलाखत घेतली होती, त्यातील प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरे आहेत. पण मी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडी अधिक माहिती मिळेल अशी त्यांच्या तोंडची वाक्ये देत आहे. त्या म्हणतात, “आयुष्याचं चिंतन केल्यावर त्यातून निघणारं नवनीत म्हणजे कविता! मला जेंव्हा कवितेतला आशय व सूर यांचं ऐक्य लक्षात यायला लागलं तेंव्हा कवितेचं गाणं होणं सोपं झालं. कविता लिहितांना सूर, भाव, शब्दरचना, व स्पष्ट आशय यांचं भान ठेवावं लागतं. जसं फूल आणि सुगंध यांना आपण वेगळे करू शकत नाही, तसंच आयुष्य व कविता तितकेच सत्य आहेत, एकरूप आहेत, त्यांना आपण वेगळे करू शकत नाही. आयुष्य पेलत असतांना त्यातला मतितार्थ सापडतो, तीच कविता असते. कवितेत भाव असतो त्यामुळे मला वृत्तांपेक्षा छंद व जाती आवडतात. स्वप्नांचा बुरखा घ्यायचा आणि त्यातून वास्तवाकडे पहायचं, तीच कविता! माझ्या कवितात प्रेम असतं कारण मला प्रेम आवडतं. प्रेमात देवघेव असते, प्रेम निरपेक्ष असतं. प्रेमात आपण एकमेकांचे असतो. मी लहान मुलांच्या कविता केल्या. कारण मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं लावण्य, निरागसता यात मी गुंतून, हरवून जाते. अलीकडच्या कविता देवाशी, त्या निराकाराशी बोलणाऱ्या आहेत.माझ्यावर संस्कार असे आहेत कि कर्मकांडात गुंतू नये, इतर मार्गांनी त्या देवत्वाशी नतमस्तक व्हावं. आता त्याच्या जवळ जाण्याचा एक ध्यास आहे. त्याच्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे. मी कवितेकडेच वळले कारण गद्य लेखनाला तपशीलात जावे लागते आणि मला अजिबात तपशील कळायचे नाहीत आणि कळले तरी जो सांगायचा विषय, आशय आहे तो इतका मोठ्ठा लिहीत बसण्यापेक्षा कवितेतून सांगणं सोपं वाटायचं.”

आत्ता कविता दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची ‘ मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी ‘ ही कविता वाचली आहेच.

लाघवी, सहज फुलणाऱ्या कल्पना, प्रासादिक शब्द, उपमा, रुपके यांचा मुक्त वापर करून  सुंदर कविता करण्याचं , हे त्यांचं कसब या कवितेतून लक्षात येते.अशीच त्यांची आणखी एक सुंदर पण थोडी भावुक कविता —

जायचे असेल जरी, न कळता निघून जा, न कळता निघून जा

फूल फूल हुंगता, चांदण्यात दंगता, देहभान हरपता, खुशाल मज पुढून जा

न कळता निघून जा

केशपाश सोडूनी, त्यात वदन झाकुनी, रुसूनी बैसते तदा, लपत छपत दूर जा

न कळता निघून जा

गान गायिल्या वरी, बीन सारुनी दूरी, थकून नयन झाकते, त्याक्षणी उठून जा

न कळता निघून जा

क्षणिक जायचे असे, लागू दे तुला पिसे, विरही मीलनी सुखे, मजसी गुंगवून जा

न कळता निघून जा

आणि जर अखेरचे, तुज असेल जायचे, जात जात पदतली, प्राण हे चुरुन जा

न कळता निघून जा

न कळता निघून जा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मग एकाने मला पटवून दिलं पक्ष बघून मत द्या उमेदवार बघून नको.

एकूण परिस्थिती बघता समजा पक्ष म्हणून मत दिलं तर तो उमेदवार त्या पक्षात राहील का? तो पक्षच त्या पक्षात राहील का? तो पक्षच दुसऱ्या पक्षात सामील होणार नाही का ? त्या पक्षाची फाटा फूट होऊन वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक पक्ष त्यातून निर्माण होणार नाहीत का ?

मग त्यात मी पुन्हा कोणाला मत द्यायचं? आत्ता दिलेलं माझं मत वाया गेल्यास त्याचं काय ? खरं म्हणजे सगळंच कन्फ्युजन आहे.

आज जे पक्षाचे धोरण आहे तेच धोरण उद्या असेल का? कशाचाच कशाला काही मेळ लागत नाही. आज जे नेते पक्षाबद्दल त्या धोरणाबद्दल खूप भरभरून चांगलं चांगलं बोलतात ते पुन्हा काहीतरी वेगळी भूमिका घेणार नाहीत का? मग माझं मत वाया जाईल ना ?

त्यापेक्षा मतदान न केलेलं काय वाईट ?

पण मग मी मतदानच नाही केलं तर जे मतदान करतील ते सगळे पैसे घेऊन भ्रष्ट पद्धतीने मतदान करणारेच बहुसंख्य असतील. मग भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीचा माणूस निवडून येणे हे 100% नक्की. मग मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी मतदान न करणं ही चूक झाली असं होणार नाही का ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहिणाई ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बहिणाई… ☆ श्री सुनील शिरवाडकर

  

जो असतो परंतु दिसत नाही तो देव..

आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”

ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवियत्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते.पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता.त्यांचा देव निसर्गात..शेतामध्ये.. पिकांमध्ये होता.शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनी

जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर..जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.

आला पाऊस पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परीमय 

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

घरी दारी..कामात.. विश्रांतीत..सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.

कवियत्री इंदिरा संत म्हणतात..

बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.

आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती,दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.

आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.

बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच..पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.

आसु नाही ती सासु कशाची?

आसरा नाही तो सासरा कशाचा?

आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले…

त्या लिहीतात..

पिलोक पिलोक,आल्या पिलोकाच्या गाठी

उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी

पिलोक पिलोक,आली नशिबात ताटी

उचललं रोगी

त्यानं गाठली करंटी

करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).

सध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत.बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.

माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे..त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसर्या आव्रुत्तीची एक.त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.

यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहीलेले दोन दिर्घ लेख आहेत कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.थोर विदुषी प्रा.मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.

बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.

आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा.भ.बोरकर.

त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..

देव तुझ्या ओटीपोटी

देव तुझ्या कंठीओटी!

दशांगुळे उरलेला

देव तुझ्या दाही बोटी!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च

‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.

जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

१९६१ साली युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एके काळी काही मातब्बर नाटय़गृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटय़गृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटय़गृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.

पूर्वी नाटक कंपनी बस घेऊन त्यामध्ये सर्व नेपथ्य व कलाकारांना समवेत दौऱ्यावर निघायची व १५ / २० दिवसांचा दौरा आटपून परत जायची गावोगावच्या स्थानिक वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिराती यायच्या. दोन दिवस आधी तिकीट विक्री सुरु व्हायची आणि रसिक प्रेक्षक रांग लावून तिकिटे खरेदी करायचे.

हल्ली नाटकांचे दर ५०० /३००/२०० असे असतात.या मुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित  बिघडते  म्हणून प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे.

लंडन मध्ये दि माउस ट्रॅप नावाचे नाटक सुरु आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑक्टोबर ,१९५२ रोजी सादर केला गेला. तेंव्हापासून हे नाटक रोज अव्याहतपणे सादर केले जाते. रूढी आणि परंपरा प्रिय ब्रिटिश जनता या अगाथा ख्रिती च्या या रहस्यमय नाटकाचा  शेवट माहीत असला तरी येणाऱ्या पाहुण्याला  हे नाटक दाखवायला नेतात. कधी कधी एका दिवसात जास्त प्रयोग देखील केले जातात. १८ नोव्हेंबर,२०१२ साली या नाटकाचा २५००० वा प्रयोग सादर झाला.कलाकार बदलत गेले मात्र नाटक सुरूच आहे.१६ मार्च २०२० पर्यंत सतत चालू राहिला. कोविड-१९ साथीच्या आजारा दरम्यान हे नाटक तात्पुरते बंद करावे लागले. त्यानंतर १७ मे २०२१ रोजी या नाटकाचे पुन्हा प्रयोग सुरु झाले.

तसे एखादे गाजलेले  नाटक मुंबई / पुण्यासारख्या शहरात दररोज सादर व्हायला हवे. महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपये कितीतरी टाळता येणाऱ्या गोष्टीवर खर्च करत असते. सरकारने मराठीचा मानबिंदू म्हणून असे एखादे नाटक निवडावे व गावोगावीच्या कलाकारांना ते सादर करायला सांगावे आणि त्यांना त्या बद्दल मानधन द्यावे. तिकीट विक्री अल्प दरात करावी म्हणजे प्रेक्षक येतील आणि कमी पडणारे पैसे शासनाने घालावेत, या मुळे रंगभूमी जिवंत राहील आणि त्या साठी फार मोठा खर्च येईल असे वाटत नाही.मात्र परंपरा जपल्याचे श्रेय सरकारला जाईल.नाटक कोणते ठरवावे ते त्यातल्या जाणकार लोकांना विचारून किंवा प्रेक्षकांचे बहुमत घेऊन ठरवावे असे वाटते. पुणे आणि मुंबई ही दोन्ही महानगरे आहेत आणि येथे दररोज ये जा करणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळे प्रेक्षकांची उणीव भासणार नाही.

जीव तोडून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या,मन लाऊन काम करणाऱ्या,पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना आणि त्यांना टाळ्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन, दाद आणि प्रेरणा देणाऱ्या रसिक प्रेक्षक वर्ग यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

मा. श्रीमती निर्मला सीतारामन यांचे विचारात पाडणारे प्रगल्भ चिंतन !

तिरुचिरापल्ली येथील आमच्या संयुक्त कुटुंबाच्या घरात आम्ही 5 ते 95 वर्षे वयोगटातील 14 जणं राहत होतो. सर्व मुले, नातवंडे, आजी-आजोबा जे कुणी होते ते त्यात अगदी आनंदाने आणि ‘समाधानाने राहिले, जगले …!’ पण आज, मी दोन्ही वडिलोपार्जित घरे सोडली आहेत.  ज्या बागेची माझी आई तासनतास निगा राखत़ होती, काळजी घेत होती तीचा आता पालापाचोळ्याने ताबा घेतला आहे. जांभुळ, शेवगा, काही कडुनिंब आणि पिंपळ मात्र अजून टिकून आहेत. परंतु हे ही खरं की सर्व सौंदर्य क्षणिक असतं. दुर्लक्ष झालेल्या गोष्टींवर नियमांचे नियंत्रण कसे राहणार ! दुर्लक्ष किती शक्तिशाली असतं हे आता लक्षात येते. असंख्य रंगांची मनमोहक फुलं होती … ती ही गेली.  माझी आई खारूताई, मोरांना रोज दाणे घालायची, त्या पक्षांच्या कुटुंबाचे काय झाले असेल याची मला हुरहूर वाटत असते.  बुलबुल, चिमण्या, पोपट, अन्य पक्षी, कोकिळा यांनी किलबिल चालू असे. माकडांची एखादी टोळी, जे कधीतरी महिन्यातून एकदा या ठिकाणी येऊन नासधूस करीत असत.

“माणसे निघून गेली की घर घर राहत नाही”.

सुरुवातीला मला विकावेसे वाटले नाही आणि आता जावेसे वाटत नाही. 

कालौघात तेथे राहणाऱ्या चौदापैकी दहा जण जग सोडून निघून गेली.

मी आमच्या आजूबाजूच्या परिसरात फिरले आणि एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांची अशीच अवस्था झालेली मी पाहिली. काही जागा आता आईवडीलांना सोडून रहाणाऱ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या अपार्टमेंट्सने घेतली आहे.

ओऽहो ! सारं कसं शांत शांत! सर्व काव काव संपली की!!

आपण घरे बांधण्यासाठी किती आटापिटा करतो, ताणतणावात जगतो, नाही?  खरं तर आमच्या मुलांना याची गरज असते का? किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्यासाठीची आपली मरमर !

पर्मेश्वरानी दिलेलं आयुष्य तसं पाहता एक भाडेतत्त्वावर मिळालेली संधी असते.  त्याला कुठल्याही वाटाघाटीच्या सीमा नसतात पण त्यावरही ताबा मिळवण्यासाठी आपण बॅंक हप्त्यांच्या ओझ्याखाली विवेकशुन्य जीवन जगत असतो.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व काही एकतर संपलेल असेल, भांडणात अडकलेलं असेल किंवा विकलं जाईल.

प्रत्येक वेळी मी ‘कायमचा पत्ता’ विचारणारा फॉर्म भरते तेव्हा मला आपल्या मानवी मूर्खपणाचेच हसू येतं.

झेनची एक कथा आहे की एक वृद्ध भिक्षू एका राजाच्या राजवाड्यापाशी गेला आणि त्याने रक्षकाला सांगितले की या अतिथी गृहात मला एक रात्र घालवायची आहे.” “तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?” रक्षक चिडून म्हणाला.  साधू म्हणाला, “मी दहा वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा येथेच थांबलो होतो, तेव्हा येथे दुसरा कुणीतरी राजा होता. काही वर्षांनी, त्याची गादी कोणीतरी घेतली नंतर कोणीतरी. जिथे रहिवासी सतत बदलत राहतात ते एक अतिथीगृहच असतं.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात “घर ही केवळ अशी एक जागा आहे जिथे तुम्ही बाहेर जाऊन खूप काही मिळवता अन् मिळवलेल्या सगळ्या गोष्टी येथे साठवत असता!”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात.  जेव्हा घरात सगळे असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घर रिकामं पडतं, तेव्हा आपल्याला सगळ्यांचा सहवास हवा असतो!

आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी जगणं सोडून देणाऱ्या व शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून मानलेल्या अतिथिगृहातून निघून जाणाऱ्या माणसांवर पशू, पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील!

विवेकशुन्य मानवी इच्छा, अन् काय !!

स्वैर अनुवाद :  श्री नंदकिशोर मुळे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक कानसेन (?) ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक कानसेन (?) ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या आधी माझा डोळस पणा सांगितला होता. आज काही गाणी ( माझ्या कानसेन असण्याची ) सांगते. आज ज्यावेळी ती  नीट समजतात त्यावेळी ती गाणी

कोण होतास तू ….

काय ऐकू आलास तू….

अशी अवस्था होते.

असे नुसते सांगू कशाला… काही उदाहरणेच ( थोडीच बरं का ) सांगते ना…

*आदर आणि पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. ( आज राणी पूर्वीची…. )

*इनीला गोंडे लेलिना दुपट्टा मेरा ( इन्ही लोगोने….)

*माझी रेणू कामावली झाली झाली सावली ( माझी रेणुका माऊली… )

*केसरा केसरा जो भी हो

*कंपास आये यू (तू) मुस्कुराए (तुम पास आये…)

*आदिनाथ गुरू सकाळशी जाता (आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा….)

*एक लाजरा साजरा माकडा डुकरा वाणी…

*रात्र काळी घागर काळी याची तर मी पार वाट लावली होती. फार थोडे शब्द बरोबर म्हणत असे.

*आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये तो बाप बन जाये….

*संधिकाली या आशा

*झाली फुले कल्याणची

*स्वर गंगेच्या कथावर्ती

*देवास तुझे फुल वाहायचे

*आज हृदय मामा विशाल झाले

*चिंधी बांधिते द्रौपदी उजव्या बोटाला

*काळ्या मातीत मातीत

ती पण चालते मी पण चालते

आणि हो, सर्व परिचित ज्यांना आपण अगदी लहानपणापासून मुखोदगत म्हणजे तोंडपाठ म्हणतो आणि मोठमोठ्याने टाळ किंवा टाळ्या वाजवून म्हणतो त्या पारंपरिक आरत्या!  त्यांच्या समजुतीची कमाल राहिलीच आहे.

अगदी आवडती बाप्पाची आरती…

*सुखकर्ता दुःखकर्ता….

त्यातीलच बरेच शब्द

*ओटी शेंदुराची

*फळीवर वंदना

*दसरा माझा वाट पाहे सदना

*संकष्टी पावावे….

*जय देवी महिषासुर मथिनी

*घालीन पटांगण वंदून शरण…

आणि शेवटची मंत्र पुष्पांजली म्हणजे तर सगळ्या चुकीच्या शब्दांचा उच्चांकच…

तर अशी माझ्या कानसेन असण्याची फजिती. यात कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या बरं का..

फक्त चुकीच्या समजुतीमुळे चुकीचे उच्चार होऊन मूळ अर्थ कसा बदलतो हे सांगायचे होते. आणि हो अशी अजून बरीच गाणी आहेत. यात पूर्वीची काही नाट्यगीते घेतलीच नाहीत. मला तर असे वाटायचे, यातील शब्द कळू नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे.

पण मंडळी वाचताना गंमत वाटली ना? आणि थोडे फार हसूही आले असेल. म्हणजे माझा उद्देश सफल झाला म्हणायचा. आणि हो, आता आपली पण विचारचक्रे चालू झाली असतील आणि असे शब्द धुंडाळायला सुरुवात झाली असेल. हो ना? असे शब्द सापडले की नक्की कळवा वाट बघत आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी ठरवलं नोटाचा काही उपयोग नाही. आपण असं करावं का? जे काही उमेदवार उभे आहेत त्यापैकी त्यातल्या त्यात जो बरा उमेदवार असेल त्याला मत द्यावं ? दगडापेक्षा वीट मऊ !

क्र. एक – उमेदवार ज्या पक्षाचा आहे तो पक्ष कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही. पण सत्तेसाठी अथवा पैशासाठी तो पक्ष दुसऱ्या पक्षाशी संगणमत करू शकेल. मग कशाला मत द्यावं ? आणि का ?

क्र. दोन – हा चांगला असला तरी तो निष्क्रिय आहे कधीच काही काम करत नाही. फक्त निवडून येतो. किंबहुना तो काही काम करत नाही म्हणूनच तो बरा आहे असं वाटतं का ? याला मत देण्यात काय अर्थ आहे ?

क्र तीन – समजा हा चांगला म्हणजे त्यातल्या त्यात बरा आहे. (कारण जो खरंच चांगला असतो तो निवडणुकीचा उमेदवार होईपर्यंत मोठा होतच नाही. किंवा राजकारणात सुद्धा येत नाही) पण त्याच्या पक्षाची धोरणं ही चुकीची आणि देशाला अयोग्य दिशेने नेणारी आहेत, असं माझं मत असेल तर, याला मी का मत द्यावं ?

क्र चार – हा उमेदवार वाईट आहे परंतु त्याचा पक्ष चांगला आहे त्या पक्षाची धोरणे चांगली आहेत मला ती योग्य वाटतात पण या माणसाला मी मत का द्यावं ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

परिचय :

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

(बी एससी, बी टेक, एलएलबी, एमपीएम, एमबीए)

  • एनडीए आणि आयएमए मध्ये प्रशिक्षणानंतर १९८१-२००७ सैन्यदलात इंजिनियर. 
  • SSB मधील सेनाधिकारी निवडप्रक्रियेत चार वर्षे सहभाग. 
  • २००७ ते आजपर्यंत खाजगी कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि केंद्र व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय.
  • छंद – लेखन, वाचन, संगीतश्रवण, प्रवास.

? मनमंजुषेतून ?

बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९९७ साली, पुण्याच्या एका सिग्नल युनिटमध्ये मी काम करीत होतो. राजस्थान बॉर्डरवरची टेलिफोन एक्सचेंजेस बारा महिने चालू अवस्थेत ठेवण्यासाठी, आमच्या काही छोट्या तुकड्या तेथेच वास्तव्याला असत. कंपनी कमांडर या नात्याने, त्यांच्या कामाच्या देखरेखीसाठी अधून-मधून मला पुण्याहून तेथे जावे लागे. 

माझ्या कंपनीत, मी आणि लेफ्टनंट गीता असे दोनच अधिकारी होतो. मी पुण्याबाहेर असल्यास आमच्या कंपनीचा दैनंदिन कारभार गीता उत्तम प्रकारे सांभाळत असे. 

वार्षिक युद्धसरावासाठी वर्षातून किमान एकदा, संपूर्ण युनिटला बॉर्डरवर हलवावे लागे. त्या काळात, पुण्याहून बॉर्डरपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन, सर्व उपकरणे, व इतर सामानाच्या बांधाबांधीवर देखरेख, CO साहेबांसोबत चर्चा, मीटिंग्स अश्या उपद्व्यापात माझी खूपच धावपळ चालू असे. 

एकदा, मी अश्याच गडबडीत होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. माझ्या लक्षात आले की तो जवानांच्या पगाराचा दिवस होता. मीटिंगला जाता-जाता मी गीताला सांगितले की पगाराची सर्व रक्कम मुख्य ऑफिसातून आणवून जवानांना पगार वाटण्याचे काम तिने पूर्ण करावे. ते काम सहजच तास-दीड तासाचे होते. 

गीताला आदेश देऊन मी पुढच्या कामासाठी बाहेर पडणार तेवढ्यात तिच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. ती जरा अस्वस्थ आणि विचारमग्न दिसली. मी मागे वळलो आणि तिला विचारले, “काही प्रॉब्लेम आहे का गीता?”

ती गडबडीने उठून मला म्हणाली, “नाही नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी लगेच कामाला लागते.” 

पण, माझे समाधान झाले नाही. कोणतेही काम केंव्हाही चालून आले तरी नाराज होणे हा गीताचा स्वभाव नव्हता.

मी पुन्हा खोदून विचारल्यावर ती म्हणाली, “सर, मी पगाराचे काम संपवूनच घरी जाईन. पण, एक विनंती आहे. आज संध्याकाळी गेम्स परेडसाठी मी नाही आले तर चालेल का? 

सर, चार महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, काल प्रथमच माझे सासू-सासरे माझ्याकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. अजून पक्के घर न मिळाल्याने आम्ही दीड खोलीच्या टेम्पररी घरातच राहत आहोत. किचनच्या नावाने, गॅस ठेवण्यापुरते एक टेबल फक्त आहे. जगदीप [गीताचा आर्मी ऑफिसर नवरा, जो त्यावेळी पुण्यातच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (CME) मध्ये पुढील शिक्षण घेत होता] परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसभर CME मध्येच असतो. घरी गेल्यावर गरम रोट्या बनवून सासू-सासऱ्यांना जेवू घालेपर्यंत उशीर होईल. म्हणून मी थोडी सवलत मागितली, इतकेच.”

एक अधिकारी, आणि नवीन लग्न झालेली सून, अश्या दुहेरी भूमिकेत असलेल्या गीताचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी तिला सांगितले, की तिने वेळेवर घरी निघून जावे आणि संध्याकाळच्या परेडसाठीही येऊ नये. पगारवाटपाचे काम मी स्वतः करेन, कारण माझ्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती.

पण, गीता माझी धावपळ देखील पाहत होती. संध्याकाळी तिला परत यायचे नसल्याने पगारवाटपाचे काम केल्याशिवाय ती घरी जाणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, कृतज्ञता आणि माझ्याप्रति असलेली आस्था असे तीनही भाव मला स्पष्ट दिसले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला. 

पुढे आम्ही वार्षिक युद्धसरावासाठी राजस्थानात जोधपूर, बाडमेर, जैसलमेर भागात गेलो. नवीन टेलीफोन केबल्स टाकणे आणि ठिकठिकाणी खांब रोवून त्या केबल्स सुरक्षित करण्याचे काम गेल्या-गेल्या सुरु झाले. जवानांकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी गीतावर होती. दूरदूर पसरलेल्या रेडिओ तुकड्यांवर देखरेख करण्यासाठी मी दिवसभर जीपमधून हिंडत होतो. केबल्सचे काम कसे झाले आहे ते पाहायला मला रात्रीपर्यंत वेळच मिळाला नव्हता. रात्री जेवण झाल्यावर, टॉर्च घेऊन एकटाच माझ्या तंबूमधून बाहेर पडलो आणि केबल्सच्या इन्स्पेक्शनसाठी निघालो. 

अचानकच गीता तिच्या तंबूमधून बाहेर आली आणि म्हणाली, “सर, दिवसभर तुम्ही बाहेर-बाहेरच असल्याने केबल्सच्या कामाचा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकले नाही. आता तुम्ही तिकडेच चाललेले दिसताय, तर मीही तुमच्यासोबत येते.”  

मी तिला सांगितले की जेवणानंतरचा फेरफटका आणि इन्स्पेक्शन अश्या दुहेरी हेतूने मी बाहेर पडलो होतो. तिने दिवसभर उभे राहून काम करून घेतले असल्याने, तिने विश्रांती घ्यावी. काम पाहून आल्यावर काही सूचना असल्यास त्या मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी देईन. 

“सर, काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या आणखी काही सूचना असतील तर त्या जागच्याजागी मला समजतील आणि उद्या काम करणे सोपे जाईल.” असे म्हणत गीताही माझ्यासोबत निघाली. 

मी केबल रूटचे निरीक्षण करण्यात गर्क होतो. गीताला वेळोवेळी काही सूचना देत असलो तरी तिच्याकडे माझे लक्षही जात नव्हते. आमच्या तंबूच्या जवळ आल्यावर माझी परवानगी घेऊन आणि सॅल्यूट करून ती तिच्या तंबूकडे निघाली. 

ती जात असताना प्रथमच माझ्या लक्षात आले की ती जरा लंगडल्यासारखी, पाय वेळावून टाकत होती. मी तिला त्याबद्दल विचारताच ती हसू लागली. मला काहीच कळेना. उत्तरादाखल तिने पाय वर करून मला तिचा बूट दाखवला. तिच्या बुटाच्या तळव्याचा अर्धा भाग टाचेकडून उकलला जाऊन लोंबत होता. 

“सर, आपण निघालो आणि थोड्याच वेळात एका ठिकाणी वाळूत माझा पाय रुतला. मी पाय जोराने खेचला आणि बुटाची ही अवस्था झाली. नशीब, मी आणखी एक बुटांची जोडी आणलीय, नाहीतर उद्या प्रॉब्लेमच आला असता.”

मला आश्चर्यच वाटले, “गीता, माझं लक्ष तर नव्हतंच, पण तू तरी मला तेंव्हाच सांगायचं होतंस.”   

“ठीक आहे सर, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता.” असे म्हणून ती  हसत-हसतच निघून गेली. 

मी विचारात पडलो. तिच्या जागी कोणीही, अगदी मी जरी असतो तरी कदाचित, अचानक उद्भवलेली अडचण वरिष्ठांना दाखवून आपल्या तंबूकडे परत वळलो असतो. केबल रूटच्या इन्स्पेक्शनकरिता जाणे म्हणजे काही युद्धजन्य परिस्थिती नव्हती. पण, गीताला ते मान्य नसावे. एक स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊन, आपण अवाजवी सवलत मागितल्याची शंका चुकूनही आपल्याबद्दल कोणाच्या मनात येऊ नये याकरिता ती अतिशय जागरूक होती.

गीतासारखेच कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित वृत्तीचे पुरुष अधिकारीही वेळोवेळी माझ्या हाताखाली होते.  आजही त्यांची आठवण येते तेंव्हा मला त्या सर्वांचे गुणच आठवतात.

स्त्री-पुरुष समानता किंवा विषमता याबद्दलचे विचार माझ्या मनाला शिवतदेखील नाहीत.

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्रिवेणी संगम !! भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ त्रिवेणी संगम !! भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

दोन जानेवारी. स्मरण दिन !

शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !

(जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली !) – इथून पुढे 

वरीष्ठांनी अ‍ॅडज्युटंट त्रिवेणीसिंग यांना सूचना दिली गेली की त्यांनी ड्यूटीवर तैनात असलेल्या जवानांना, अधिकाऱ्यांना सावध करून त्वरीत जम्मू रेल्वे स्टेशनकडे कूच करण्यास सांगावे…. त्रिवेणीसिंग यांनी तिकडे जाणे अपेक्षित नव्हते! पण इथे त्रिवेणीसिंग यांच्या मनातील बहादूर सैनिक जागा झाला. “साहेब,सर्वांना तयार होण्यास थोडा वेळ लागेल. मी क्विक रिअ‍ॅक्शन टीमच्या घातक कमांडोंना घेऊन पुढे जाऊ का? कारण स्टेशनवर यावेळी खूप गर्दी असेल… अतिरेक्यांना जास्त वेळ अजिबात मिळता कामा नये!” त्रिवेणीसिंग साहेबांनी आपल्या वरिष्ठांना विनंतीवजा आग्रहच केला आणि त्यांना परवानगी मिळाली!

लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांच्या नेतृत्वात शस्त्रसज्ज होऊन दहा घातक कमांडोज एका मिलिटरी जीप मधून वेगाने निघाले… चार किलोमीटर्सचे अंतर त्यांनी अवघ्या आठ-दहा मिनिटांत पार केले. अतिरेक्यांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या अधून-मधून जागा मिळेल तसे नागमोडी पद्धतीने वाहन दामटले.

तोपर्यंत कर्तव्यावर असलेले एक पोलिस, बी.एस.एफ.चे दोन जवान, दोन रेल्वे कर्मचारी आणि दोन नागरीक असे एकूण सात लोक हे सैन्याच्या वेशभूषेत रेल्वे स्टेशनमध्ये घुसलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या आधुनिक शस्त्रांतून झाडल्या गेलेल्या गोळ्यांना बळी गेले होते.

त्रिवेणीसिंग यांच्या पथकाने रेल्वेस्टेशनमध्ये धावतच प्रवेश केला. स्वत: त्रिवेणीसिंग अग्रभागी होते. प्लॅटफॉर्मवरच्या आडव्या पुलावरील आडोश्यामागे लपून एक अतिरेकी खाली तुफान गोळीबार करीत होता. जम्मू कश्मिर पोलिसांमधील एक पोलिस जवान त्याला प्रतियुत्तर देत होता. 

अशा भयावह स्थितीत त्रिवेणीसिंग साहेब वायूवेगाने पायऱ्या चढले आणि थेट त्या गोळीबार करीत असणाऱ्या अतिरेक्याच्यापुढे यमदूत बनून उभे ठाकले व त्याला सावरण्याची संधीही न देता त्याच्यावर धाडधाड गोळ्या झाडून त्याला त्याच्या ‘आखरी अंजाम’तक पोहोचवले.

इकडे पठाणकोट मध्ये जन्मेज सिंग यांच्या घराच्या हॉलमध्ये हलवाई येऊन बसला होता. लग्नात मेजवानीचा काय बेत करावा याची चर्चा सुरू होती. लगीनघरात आणखी कसले वातावरण असणार? लाडक्या लेकाच्या लग्नात सर्वकाही व्यवस्थित होईल याची तयारी सुरू होती! हॉलमधला टी.व्ही. सुरूच होता, त्यावरील बातम्याही! 

जन्मेजसिंग यांना त्यांच्या घराच्या बाहेर काही लोकांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. जम्मू रेल्वे स्टेशनवर हल्ला झाल्याची ती चर्चा होती. तेवढ्यात त्रिवेणीसिंग यांच्या होणाऱ्या सासुरवाडीमधील कुणाचा तरी फोन आला! “टी.वी. देखिये! कुछ तो बडा हो गया है!…..

इकडे रेल्वेस्टेशनवरील पुलावर त्या अतिरेक्याचा समाचार घेतल्यावर त्रिवेणीसिंग दुसऱ्या अतिरेक्याच्या मागावर निघाले. तो अतिरेकी अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज होता.. ऑटोमॅटिक रायफल, हॅन्डग्रेनेड… शेकडो लोकांचा जीव सहज घेऊ शकणारा दारूगोळा! 

तो गोळीबार करीत दुसऱ्या जिन्याने खाली येऊन प्लॅटफॉर्मवर पोहोचलाही होता.. प्लॅटफॉर्मवरील पार्सलरूमच्या दिशेने तो गोळीबार करण्याच्या प्रयत्नात होता… तिथे तीनएकशे लोक जीवाच्या भीतीने लपून, गोठून बसलेले होते. आत शिरून फक्त रायफलचा ट्रिगर दाबला जाण्याचा अवकाश…. मृतदेहांचा ढीग लागला असता!

पण… त्रिवेणी ‘टायगर’ भक्ष्यावर झेपावला! ‘हॅन्ड-टू-हॅन्ड’ अर्थात हातघाईची लढाई झाली.. त्रिवेणीसिंग यांनी अतिरेक्याला खाली लोळवला.. त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या.. इतक्यात त्या भस्मासूरानं त्रिवेणीसिंग साहेबांवर हातबॉम्ब टाकला…. भयावह आवाजाने परिसराच्या कानठळ्या बसल्या…. त्रिवेणीसिंग जबर जखमी झाले…. त्यातच त्या अतिरेक्याच्या रायफलमधील एक गोळी त्रिवेणीसिंग यांच्या जबड्यात समोरच्या दातांच्या मधून घुसून मानेतून आरपार झाली……! तोवर पाकिस्तानने भारताविरुद्ध डोकं भडकावून, भारतातल्या निष्पाप नागरीकांना ठार मारायाला पाठवलेला ‘फिदायीन’ कामगिरीवर अतिरेकी नरकातील त्याच्या साथीदारांना भेटायला वर पोहोचलाही होता. ..त्याच्यासमोर त्याच्याकडे पाय करून त्रिवेणीसिंग ही कोसळले…. तेवढ्यात इतर अधिकारी, सैनिक तिथे पोहोचले…. त्यात त्रिवेणीसिंग यांचे वरीष्ठ मेजर जनरल राजेंद्रसिंग ही होते…

त्रिवेणीसिंग तशाही अवस्थेत उभे राहिले….साहेबांना सॅल्यूट ठोकला…. आणि म्हणाले… ”मिशन अकंम्प्लीश्ड,सर!…. कामगिरी फत्ते झाली,साहेब!”…

त्रिवेणीसिंग जीवनाच्या कर्तव्य, निष्ठा, बलिदानाच्या त्रिवेणी संगमात विलुप्त झाले! 

हे सर्व केवळ काही सेकंदांमध्ये घडले होते…. एवढ्या कमी वेळ चाललेल्या कारवाईत शूर त्रिवेणीसिंग यांनी अलौकिक कामगिरी करून आपले नाव अमर करून ठेवले…!

पठाणकोट मधल्या आपल्या घरात जन्मेज सिंग यांनी टी.वी. वरच्या बातम्या धडकत्या काळजाने पहायला सुरूवात केली… टी.वी.च्या स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर अक्षरे उमटली… लेफ्टनंट त्रिवेणीसिंग शहीद हो गये! 

डोळ्यांवर विश्वास बसेना… त्यानंतर ही पट्टी पुन्हा दिसेना…! हाच का आपला त्रिवेणी? हे नाव तसे कॉमन नाही! त्यांनी जम्मूला फोन लावले… काहीही निश्चित माहिती मिळेना… त्वरीत जम्मू गाठावी… निघाले…. दोन तासाच्या प्रवासाला धुकं, जागोजागी होणारी सुरक्षा तपासणी यांमुळे आठ तास लागले. युनीटबाहेर सर्व सैनिक, अधिकारी स्तब्ध उभे होते… जन्मेज सिंग यांनी ओळखले… त्रिवेणी आता नाहीत… “मेरी तो दुनिया ही उजड गयी!”

पुष्पलतांच्या दोन मुली आणि तिसरा त्रिवेणी… या संगमातील एक प्रवाह आता आटला होता. “भगवान त्रिवेणी जैसा बेटा हर माँ को दे!” त्या म्हणाल्या. “आज इतकी वर्षे झाली तरी त्रिवेणी आम्हांला सोडून नाही गेला…सतत आमच्या आसपासच असतो. उसके जाने की तकलीफ भी है, दुख भी है और अभिमान भी… उसने सैंकडो जिंदगीयाँ बचाई! युँही नहीं कई लोगों के घर में अब भी त्रिवेणी की फोटो लगी हुई है…. खास करके वैष्णोदेवी के भक्तों के, जो उस दिन जम्मू स्टेशनपर मौजुद थे!”

शांतता काळात दिला जाणारा सर्वोच्च ‘अशोक चक्र’ पुरस्कार लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांना मरणोत्तर दिला गेला…. २६ जानेवारी २००४ रोजी दिल्लीत मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लेफ्टनंट त्रिवेणी सिंग ठाकूर यांच्या वतीने ‘अशोक चक्र’ स्विकारताना कॅप्टन जन्मेज सिंग (सेवानिवृत्त) यांच्या एका डोळ्यात पुत्र गमावल्याची वेदना आणि दुसऱ्या डोळ्यात पुत्राच्या अजोड कामगिरीचा अभिमान स्पष्ट दिसत होता.

या बहादूर सैनिकास मानवंदना.

– समाप्त –

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares