मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानाचे आत्मवृत्त… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ कानाचे आत्मवृत्त लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

मी आहे कान !

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत ‘ कान !

कारण आम्ही दोन आहोत !

आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही.

कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या,

चांगलं असो की वाईट,

सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हांला ‘खुंटी’ सारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे.

आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला !

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं.

त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही.

डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक!

पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटॅालचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

किती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे सर्व भार सांभाळायला !

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी  रहा ! …

टवकारलेत ना कान !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

रसास्वाद  : ज्योत्स्ना तानवडे

समाजात गैर रूढी, परंपरा चुकीच्या धारणा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या विरुद्ध अनेक समाजसेवी कार्यकर्ते अतिशय तळमळीने कार्य करीत असतात. पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. तरीही मोठ्या निर्धाराने ते आपला लढा सुरूच ठेवत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची तळमळ मांडली आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अजून मी आहे या त्यांच्या एका वेगळ्या विषयावरच्या अतिशय सुंदर कवितेतून. आज आपण त्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

☆ अजून मी आहे ☆

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

 

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्री-भृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती-जमातीतील तेढ मिटविण्याचे

———

———

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

 

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ (व्रात्य) पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

 

कधी संभ्रम पडला सश्यासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत राहणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून.

 

म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे

अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

 

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

मुक्तछंदातील ही कविता प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. कवी समाजाच्या भल्यासाठी झटणारा एक प्रामाणिक, तळमळीचा कार्यकर्ता आहे. तो त्याच्या वाटचालीविषयी आपल्याशी संवाद साधतो आहे.

तो आयुष्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मानवी जीवनाचा थांग सहजासहजी लागणे शक्य नसते. पण तो जिद्दीने असा थांग शोधतो आहे. समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. कवी आपली अशी कर्तव्ये करण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आनंदात जगताना समाजासाठी असलेले आपले कर्तव्य सुद्धा उत्तम रीतीने पार पाडायला हवे. दोन्हीचा छान समन्वय साधायला हवा.

कवी अशी वाटचाल बऱ्याच काळापासून करतो आहे. हे ‘अजून’ या शब्दातून स्पष्ट होते आहे. निवृत्तीचे वय होत आले, बरीच वाटचाल झाली तरी त्याने आपली सामाजिक भूमिका बदललेली नाही. तो पूर्वीच्या जोमाने अजूनही काम करीत आहे.

कवीने इथे अन्योक्ती अलंकाराचा छान वापर केलेला आहे. स्वतःचे मनोगत सांगत असताना ही कविता समाजातील थोर कार्यकर्त्यांना उद्देशून पण आहे. त्यांच्या प्रती आदर दाखवणारी आहे.

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्रीभृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती- जमातीतील तेढ मिटवण्याचे

———-

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

मन व्यथीत करणाऱ्या असंख्य दुष्प्रवृत्ती समाजात आहेत. त्यातून असंख्य वाईट घटना घडतात. स्त्रीभृणहत्या हा तर मानवतेला लागलेला फार मोठा कलंक आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने स्त्रीवर सतत अन्याय, अत्याचार केलेले आहेत. जाती-जमातीत तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडणारी विघातक कृत्ये केली जातात. कवीने या फक्त या तीन स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर दोन ओळी नुसत्याच मोकळ्या सोडल्या आहेत. त्यांना फार मोठा अर्थ आहे. समाजाच्या  भल्यासाठी काम करण्याच्या अनुल्लेखित अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची यादी खूप मोठी आहे. हेच त्या दोन ओळी दर्शवितात.

समाजात इतर वाईट कृत्ये, अत्याचार, स्वकेंद्रित व्यवस्था अशा अनेक अपप्रवृत्ती, आपत्ती आहेत. त्यांना संपवण्याची, समाज धारणा बदलण्याची अशी कितीतरी स्वप्ने कवीने पाहिलेली आहेत. मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात तसेच कवीने असंख्य दृष्टीने, विविध अंगाने ही स्वप्ने पाहिली आहेत. त्याची तीव्रता मोराच्या पिसाऱ्यातील डोळे ही उपमा अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते. या गोष्टींमुळे कवीच्या  मनात खूप आर्तता दाटलेली आहे.

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ ( व्रात्य )पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

कवीने पुन्हा पुन्हा काही स्वप्नं बघीतली. त्यातल्या काहींची चाहूलही लागली. आता ती स्वप्ने खरी होतील अशी आस वाढली आणि ती स्वप्ने एखाद्या नाठाळ पोरासारखी दूर निघून गेली. एखादे नाठाळ ( व्रात्य ) पोर कसे करते, त्याला एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस असे कितीदाही बजावले तरी ते अजिबात ऐकत नाही. तशीच ही स्वप्नेही फक्त वाकुल्या दाखवतात आणि सत्यात न येता नाहीशी होतात. त्यांना ‘नाठाळ’ ही अगदी छान आणि समर्पक उपमा कवीने योजलेली आहे.

रणरणत्या वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नसतेच. तो फक्त आभास असतो. तसाच काही स्वप्नांचा फक्त आभासच होता. त्यामुळे कवीच्या पदरी निराशाच येते.चक्रवाक जसा पावसासाठी आर्ततेने वाट पाहत असतो तसेच कवीचे मन आर्तपणे आशा निराशेच्या हिंदोळ्यावर नुसतेच झुलत राहते. पण हाती काही गवसत नाही.

कधी संभ्रम पडला सशासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्त्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी ?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्त्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत रहाणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून

ससा जसा बिळातून बाहेर जाताना बावचळतो. बाहेर कोणी नाही ना, कोणत्या दिशेला जावे, नक्की काय करावे अशी त्याची संभ्रमावस्था होते. तशीच इथं स्वप्नं सत्यात येत नसल्याने आता नक्की काय करावे अशी कवीची संभ्रमावस्था होते आहे. माकडीण जशी पिलाला उराशी अगदी कवटाळून धरते तशीच कवीने आपली स्वप्ने निगुतीने जपलेली आहेत. पण ती खरी होत नाहीत हे बघून शेवटी कवीला आपली तत्त्व तर खोटी नाहीत ना अशी शंका वाटू लागते. एखाद्या चकव्यातल्या कोणत्याही वाटेने गेले तरी शेवटी पहिल्याच ठिकाणी परत येणे होते. वाट पुढे जातच नाही. तसंच काहीसं स्वप्नांच्या बाबतीत झाल्याने कवीला संभ्रम पडला आहे. तरीही त्याने जिद्द सोडलेली नाही.

दीपस्तंभ जसा कितीही लाटा आदळल्या तरी ठाम रहातो तसाच कवी सुद्धा कितीही अडथळे आले, समाजाचा विरोध अंगावर आला तरी खचून न जाता आपल्या विचारांवर ठाम आहे. त्याचबरोबर दीपस्तंभ जसा मार्ग दाखवण्याचे काम करतो तसाच कवी सुद्धा समाजाला योग्य विचार, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम करतो. आपली तत्त्व, आपली स्वप्नं, आपल्या आदर्शांना त्याने अजूनही आपल्या उराशी तसेच घट्ट कवटाळून धरलेलं आहे. दुर्दम्य आशावादाचे प्रतीक म्हणजे कन्याकुमारी. तशीच आशा कवीच्या मनात अजूनही शाबूत आहे. आशा निराशेची बरीच पायपीट झाली. तरीही कवी खचलेला नाही. निराश झाला नाही. ती स्वप्ने खरी करण्यासाठीचा त्याचा लढा अद्यापही तसाच सुरू आहे. हे वास्तव ‘अजूनही’ या शब्दातून सामोरे येते. कितीदाही जाळी तुटली तरी पुन्हा पुन्हा ती विणत रहाणाऱ्या कोळ्याचा आदर्श त्याच्या मनावर पूर्णपणे ठसलेला आहे. त्यामुळे कवी अजूनही आस न सोडता धडपडतोच आहे.

 म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे .

म्हणूनच कवी सांगतो आहे की ,” मी हार मानलेली नाही. अजूनही मोठ्या जिद्दीने मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहे. कितीही अपयश आले तरी त्यातूनही धडा शिकत नव्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेतो आहे. या जीवन प्रवाहात कितीही जरी गटांगळ्या खाव्या लागल्या तरी, मी त्यात तग धरून आहे आणि त्याचा थांग अजून शोधतोच आहे. या माझ्या प्रयत्नांना समाजाने नावे ठेवली, मला अपमानित केले तरीही मी माझी कर्तव्यं सोडलेली नाहीत. समाजाच्या सुखासाठी मी धडपडतोच आहे आणि समाजऋण फेडायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.” म्हणूनच शेवटी कवी मोठ्या  उमेदीने सांगतोय,”  मी हरलेलो नाही. मी अजून आहे.”

समाजातील अन्याय्य प्रथा बंद व्हाव्यात, समाजमनात चांगला बदल व्हावा, समाज पुन्हा एक होऊन जवळ यावा यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारा कवी हा असंख्य लहानथोर समाजसेवकांचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशी माणसे शेवटपर्यंत ध्यास न सोडता या अन्यायाविरुद्ध लढत रहातात. यातूनच अनेक वाईट अन्यायकारक गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणूनच इथे कवीही जिद्द न सोडता ‘मी अजून आहे’ असे सांगतो आहे.

एखाद्या कुटुंबावर काही संकट आले, कुणी काही त्रास देत असेल, अन्याय करत असेल तर घरातील वडीलधारी व्यक्ती घरातल्यांना समजावते,” घाबरू नका. मी अजून आहे.” तशीच भूमिका हे समाजसेवक बजावत असतात. समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. पाठीराखे होतात. हेच वास्तव कवी  इथे सांगतो आहे.

कवितेची सौंदर्य स्थळे :–  समाजाच्या भल्यासाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचे हे मनोगत यथार्थ वर्णन करण्यासाठी कवीने ‘चक्रवाकाची आर्तता’ ही उपमा दिली आहे. परमोच्च आर्तता म्हणजे चक्रवाक. त्यामुळे या शब्दातून कवीचीही आर्तता अचूक लक्षात येते. कवी अनेक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे, हे सांगण्यासाठी मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यांची सुंदर उपमा दिलेली आहे.

समाज बदलण्यासाठी कवी जी स्वप्ने बघतोय त्यांचेही खूप अचूक आणि समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ही स्वप्न काहीही झाले तरी खरी होत नाहीत हे सांगतोय ‘नाठाळ’ शब्द. त्यातून व्रात्य, नाठाळ मुलासारखी अजिबात न ऐकणारी ही स्वप्नं  कवीला सतत सतावतात हे लक्षात येते. ही स्वप्न आभासीच ठरतात. तरीही ती चोर पावलांनी चाहूल देत असतात. असे असूनही यामुळे खचून न जाता कवी ठाम राहतो कसा तर, दुर्दम्य आशावादी कन्याकुमारी सारखा, दीपस्तंभासारखा ठाम राहतो. या सर्व उपमा कवितेच्या सौंदर्यात भर घालत सखोल अर्थ उलगडून दाखवतात.

या कवितेतील ‘अन्योक्ती’ अलंकारांमध्ये मुळे ही कविता कवी बरोबरच अशा सर्व थोर सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर दाखविणारी झाली आहे.

अशा या अतिशय आशयघन कवितेमध्ये कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी एका अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ मांडलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

वसंतोत्सव ☆ श्री प्रसाद जोग

२६ मार्च पासून वसंतोत्सवाला सुरवात झाली आहे.

सहा ऋतूंमधे वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात .दहा दिशांना बहरून टाकत येतो तो हा ऋतुंचा राजा. याच्या आगमनाच्या आधीच निसर्गाच्या सुगंधाच्या रूपाने याची चाहूल लागते .आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

होळीपासून वाढत चाललेल्या गरमीमध्ये, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव शोधत असतात.अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांवर अचानक एके दिवशी कोवळी कोवळी, हिरवीगार पोपटी पालवी फुलते  नुसती पालवीच नाही तर पळस रंगाची उधळण करायला लागतो,गुलमोहर  फुलतो ,बहावाचे घोस लटकायला लागतात, फुलेही बहरायला लागतात.

दयाळ, कोकीळ, भारद्वाज अश्या पक्षांना वसंत ऋतुत कंठ फुटेल आणि वसंताच्या आगमनाची वर्दी गोड आवाजात द्यायला सुरवात करतील.

या काळात दिवसाचा,उन्हाच्या काहिलीचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान झालेली असते. घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असतात, या काळात शारीरिक शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.

‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी, कारण वसंत नांव असणाऱ्यांनी वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

साहित्यातले वसंत 

वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला.

रंगभूमीवरील वसंत 

आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,

संगीतातले  वसंत

आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार वसंत निनावे,वसंत आजगावकर, वसंत कानेटकर,वसंतकुमार मोहिते आणि वसंत अवसरे असे टोपण नाव घेऊन गाणी लिहिणाऱ्या शान्ता शेळके  यांनी.

अशा या ऋतुराज वसंता मुळे कविंना देखील स्फूर्ती येते आणि ते वसंताचा गौरव करताना वेगवेगळी गाणी लिहितात

वसंत ऋतू आला

आला वसंत देही, मज ठाउकेच  नाही

उपवनी गात कोकिळा

हृदयी वसंत फुलताना 

कुहू कुहू येई साद

साद कोकीळ घालतो कधी वसंत येईल

कोकीळ कुहू कुहू बोले

गा रे कोकिळा गा

मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला

ऋतुराज आज वनी आला ऋतुराज आज वनीं आला

बसंत की बहार आयी,

(नाट्क> मंदारमाला)

अजूनही खूप गाणी आहेत चला तर मंडळी आपणही वसंतऋतूचे स्वागत करूया त्याचा.आनंद साजरा करताना म्हणूया

चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो

चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो

पक्षी कूजन मधुर ऐकू ये, आसमंत हा गुंगुन जावा

फुलाफुलातून साद उमलते,

 

वसंत घ्यावा

वसंत घ्यावा

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

मी शिकलेला किंवा

न शिकलेला.

विचार करणारा किंवा

न करणारा.

कसाही असलो, तरी माझ्या हातात काय आहे?

एक तर जे लोक निवडणुकीला उभे आहेत म्हणजे उमेदवार. त्यापैकीच एकाला मत द्यायचा अधिकार आहे किंवा सगळ्यांना नाकारण्याचा अधिकार अलीकडे मिळाला आहे.

परंतु त्याने साध्य काय होणार आहे? वरील सर्व योग्य वाटत नाहीत असे म्हणून मी नोटाला मत दिले तर त्यातून साध्य काय होते ? शेवटी निवडून येणार तो त्यापैकीच कुणीतरी एक. अगदी नोटाला जास्त लोकांनी मते दिली तरी त्या उमेदवारांच्या यादी पैकी कोणी तरी निवडून येणारच.

व्यवस्था अशी हवी की नोटाला सर्वात जास्त मते मिळाली तर जे उमेदवार उभे आहेत ते सर्व उमेदवार पुढील सहा वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील.

असे झाल्यास स्वतःचे राजकीय करियर सांभाळण्यासाठी उमेदवारांना काळजी घ्यावीच लागेल. कुणी उठाव आणि नॉमिनेशन फॉर्म भरावा असे ऐरे गैरे लोक उभे राहणार नाहीत.

अशी सुधारणा कायद्यात होऊ शकेल काय ? खूप फरक पडेल असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट.

तेव्हा आम्ही सांताक्रुजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर अकरा वाजता च्या लोकलने जात असू. ती अंधेरी वरून सुटत असल्याने तिला (त्याकाळी) फार गर्दी नसे.

त्या दिवशी मी व माझी मैत्रिण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट  मिळाली.

समोर एक बाई होती .तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालीपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा दिसतच नव्हता. शेजारी सुमारे पाच व तीन वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात  कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किट होती.

 गाडी सुटली आणि त्या बाईने दोन्ही मुलींना जवळ घेतले. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळले…..

आणि जोरजोरात रडायला लागली.  अगदी तारस्वरात ती  रडत होती.

 ” झालं का परत सुरु …गप्प बैस.. काय झालं ग इतकं रडायला…. “

एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काही कळेना..

“अहो सारखी रडते आहे . काय झालय काही सांगत पण नाहीये.  नुसती गळे काढून रडतीय “

 

सगळ्या नुसत्या  तर्क करायला लागल्या..

“कोणी घरी वारलं असेल..”

“नवरा मारत असेल …”

“भांडण झाल असेल…”

” नवऱ्याने सोडलं का काय….”

प्रत्येक जण कारण हुडकत  होतो. खार स्टेशन येईपर्यंत तिचं  रडणं चालूच होतं ….

 

मुलींना प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी. त्या मजेत खात होत्या .

गाडी बांद्राकडे निघाली .थोडावेळ ती गप्प होती. आता परत रडणं सुरू झालं ……

मुलींना सारखी मिठीत घेत  होती. जवळ घेत होती….  कोणी किती रागवलं तरी ती रडायची थांबतच नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या …तरी तिचं रडणं सुरूच होतं.

….  बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली शांत झाली .

 

प्रत्येक जण आपापल्या नादात… काही वेळानंतर आम्ही पण दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो.

आम्ही नंतर तिच्याकडे पाहिलंही नाही….. माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता.

माहीम आले.. उतरणाऱ्या  बायका उतरल्या चढणाऱ्या चढल्या…

मध्ये चार-पाच सेकंद शांत होते……..

… आणि अचानक ती बाई उठली..  प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि सरळ पळत पळत निघूनच गेली….

 

त्याच क्षणी लोकल पण सुरू झाली….. क्षणभर काय झालं आम्हाला कळलच नाही..

“बाई पळाली … बाई पळाली “

एकच गडबड झाली…

 

“पोलिसांना फोन करा”

“दादरला गाडी गेली की बघू “

“साखळी ओढायची का “

“अशी कशी गेली”

… एकच आरडा ओरडा गोंधळ  सुरू होता….

 

तेवढ्यात कोपऱ्यातून एक आवाज आला …

” ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेली नाही आपण तिला ओळखणार ही नाही..”

.. अरे बापरे खरंच की ..

शांतपणे ती बाई म्हणाली ….. 

” पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे … ..आणि मध्ये आपल्याला काही करता येणार नाही  गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू “

 

खरचं की पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम दोन मिनिटं थांबणार तेवढ्यात काय करणार?

सगळ्यांना ते पटले…. प्रचंड भीती कणव…. दोन्ही पोरी तर रडायला लागल्या…

विचारलं ” कुठे राहता? “

“तिकडे लांब “….  एवढेच सांगत होत्या. काय करावं कुणालाच कळेना.

दादर आलं गेलं .

 

मुलींना कोणीतरी सांगितलं ..

“थोड्या वेळाने आई येणार आहे हं…”  त्यामुळे मुली गप्प बसल्या.

 धाकटीला आता झोप यायला लागली होती .ती मोठी च्या मांडीवर झोपली . मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती .

… विलक्षण करूण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या .

 

“अशी कशी ही आई …” एवढच म्हणत होतो..

स्टेशन येत होती जात होती..

एक बाई म्हणाली….. 

” मी वकील आहे. मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला.”

 

“पोलीस ”  ….म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही सगळ्याच तयार झालो. चर्चगेट जवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं .दोघींनी त्यांचे हात धरले.

त्या सारख्या म्हणत होत्या … ” मला आई पाहिजे..  मला आईकडे जायचंय .. आईकडे नेणार ना…”

“हो हो “….असं सांगितलं … त्या दोघींना खाली उतरवलं.

 

पोलिसांशी त्या वकिलीण  बाई बोलत होत्या.  मुलींना बाकावर बसवलं होतं…  इतरही आम्ही बऱ्याच जणी होतो…  मुलींना वाटत होतं  .. ‘ आई येणार आहे…  बिचार्‍या ….आईची वाट पहात  होत्या…

“आई कधी येणार ? आई कुठे आहे ?” असं सारखं विचारत होत्या. कितीतरी वेळ आम्ही तिथे होतो

 

आता या मुलींचं काय होणार… या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः  आपोआप वाहत होते… आम्ही मूकपणे  उभ्या होतो .

या मुलींना परत आई कधीही भेटणार नव्हती…. याचे आम्हाला प्रचंड दु:ख वाटत होते.

 

काही वेळानंतर दोन महिला पोलीस आल्या आणि मुलींना घेऊन निघाल्या.

त्या  दोघी लांब  जाईपर्यंत आम्ही बघत होतो …… 

 

या मुलींचे भवितव्य  काय असेल..

मुलींचा काय दोष…

 मुली म्हणून सोडून दिल्या का…

मुलं झाली असती तर सांभाळली असती का ?

मग मुलींना का टाकलं?

… अनेक अनुत्तरित प्रश्न  मनात उमटत होते….

 

या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात.

आज कुठे असतील त्या मुली….. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

दोन जानेवारी. स्मरण दिन !

शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !

बाळाने या जगात पाऊल ठेवताच एक जोरदार आरोळी ठोकली! त्या एवढ्याशा गोळ्याचा तो दमदार आवाज ऐकून डॉक्टर म्हणाले, ”लगता है कोई आर्मी अफसर जन्मा है… क्या दमदार आवाज पाई है लडकेने!” तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुत्रमुख पाहिलेल्या पुष्पलता म्हणाल्या, ”आर्मी अफसरही है… कॅप्टन जन्मेज सिंग साहब का बेटा जो है!” झारखंड मधील रांची जवळच्या नामकुम इथल्या एका प्रसुतिगृहातील १ फेब्रुवारी १९७८ची ही गोष्ट. 

बाळाचे नामकरण त्रिवेणी सिंग झाले. वडिलांना सेनेच्या गणवेशात लहानपणापासून पाहिलेल्या त्रिवेणी सिंग च्या मनात आपणही असाच रूबाबदार गणवेश परिधान करून देशसेवा करावी अशी इच्छा निर्माण होणं साहजिकच होतं. उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले त्रिवेणी अभ्यासात सुरूवातीपासून अव्वल होते परंतू स्वभावाने एकदम लाजरे-बुजरे. कधी कुणाशी आवाज चढवून बोलणे नाही की कधी कुणावर हात उगारणे नाही. सणासुदीसाठी अंगावर चढवलेले नवेकोरे कपडे नात्यातल्या एका मुलाला आवडले म्हणून लगेच काढून त्याला देणारे आणि त्याची अपरी पॅन्ट घालून घरी येणारे त्रिवेणी!

त्रिवेणी मोठे झाले तसे वडिलांनी त्यांना मार्शल आर्ट शिकायला धाडले. यात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकून दाखवले. उंचेपुरे असलेले त्रिवेणी बॉडी-बिल्डींग करीत. ते पोहण्यात आणि धावण्यात ही तरबेज होते. एक लाजरेबुजरे लहान मूल आता जवान झाले होते.

कॅप्टन जन्मेज सिंग हे मूळचे पंजाबमधल्या पठाणकोटचे रहिवासी. घरी चाळीस एक एकर शेतजमीन होती. शेती करूनही देशसेवाच होते, अशी त्यांची धारणा. आपल्या एकुलत्या एक मुलाने शेतीत लक्ष घालावे, घरदार सांभाळावे अशी त्यांची इच्छा होती.

शिक्षणाच्या एक टप्प्यावर त्यांनी नौसेनेची परीक्षा दिली आणि अर्थातच निवडलेही गेले. प्रशिक्षणास जाण्याचा दिवस ठरला, गणवेश शिवून तयार होता, प्रवासाची सर्व तयारी झालेली होती. 

जाण्याच्या आदल्या दिवशी त्रिवेणी यांच्या आई,पुष्पलता यांच्या मातोश्री घरी आल्या आणि त्यांनी त्रिवेणी यांना नौसेनेत जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी अनुनभवी, लहान असलेल्या त्रिवेणींनी घरच्यांच्या इच्छेचा मान राखला आणि पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला… आता घरात जय जवान ऐवजी जय किसानचा नारा गुंजत होता!

एकेदिवशी त्रिवेणींनी वडिलांना फोन करून सांगितले की “पिताजी, मेरा डेहराडून के लिए रेल तिकट बुक कराईये! मैं आय.एम.ए. में सिलेक्ट हो गया हूँ!” खरं तर त्रिवेणी यांनी ते सैन्य अधिकारी भरतीची परीक्षा देत आहेत याची कल्पना दिली होती आणि हे ही सांगितले होते की इथे जागा खूप कमी असतात आणि अर्ज हजारो येतात, निवड होण्याची तशी शक्यता नाही! त्यामुळे जन्मेज सिंग साहेबांनी ही बाब फार गांभिर्याने घेतलेली नव्हती. या परीक्षेत त्रिवेणी टॉपर होते, कमावलेली देहयष्टी, मैदानावरचे कौशल्य यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. वळणाचे पाणी वळणावर गेले होते… त्रिवेणी आता जन्मदात्या जन्मेज सिंग साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकून  सैन्याधिकारी बनणार होते आणि याचा जन्मेजसिंग साहेबांना अभिमानही वाटला! जन्माच्या प्रथम क्षणी डॉक्टरांनी केलेली भविष्यवाणी त्रिवेणीसिंगांनी प्रत्यक्षात उतरवलेली होती!

त्रिवेणी सिंग यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथील प्रशिक्षणात अत्यंत लक्षणीय कामगिरी बजावली, अनेक पदके मिळवली आणि बेस्ट कॅडेट हा सन्मानसुद्धा! जेवढे आव्हान मोठे तेवढी ते पार करण्याची जिद्द मोठी… ते बहिणीला म्हणाले होते…. ”मैं मुश्किलसे मुश्किल हालातों में अपने आप को परखना चाहता हूँ… मन, शरीर की सहनशक्ति के अंतिम छोर तक जाके देखना मुझे अच्छा लगता है.. दीदी!” आणि त्यांनी तसे करूनही दाखवले.

८ डिसेंबर,२००१ रोजी ५,जम्मू कश्मिर लाईट इन्फंट्री (जॅकलाय) मध्ये त्रिवेणी सिंग लेफ्टनंट म्हणून रूजू झाले आणि त्यांनी त्यावेळी झालेल्या अतिरेकीविरोधी धाडसी कारवायांमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली. शेतात लपून गोळीबार करणाऱ्या अतिरेक्याच्या समोर धावत जाऊन, त्याचा पाठलाग करून त्याला यमसदनी धाडण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवला होता. युनीटमधील सहकारी त्रिवेणीसिंग यांना ‘टायगर’ म्हणून संबोधू लागले होते!

त्यांची हुशारी, सर्वांचे सहकार्य मिळवून काम करून घेण्याचे कसब पाहून त्यांना युनीटचे अ‍ॅड्ज्युटंट म्हणून कार्यभार मिळाला. 

वर्ष २००३ संपण्यास काही दिवस शिल्लक होते. त्रिवेणीसिंग यांचे मूळ गाव पठाणकोट, जम्मू पासून फार तर शंभर किलोमीटर्सवर असेल. त्यात त्रिवेणीसिंग लग्नबंधनात अडकणार होते…. एंगेजमेंटही झाली होती. फेब्रुवारी २००४ मध्ये बार उडवायचे ठरले होते.

सतत कामामध्ये व्यग्र असलेल्या त्रिवेणीसिंग साहेबांना त्यांच्या वरिष्ठांनी नववर्ष घरी साजरे करण्यासाठी विशेष सुटी दिली आणि साहेब ३१ डिसेंबर २००३ ला घरी आले.. आपले कुटुंबिय, मित्र आणि वाग्दत्त वधू यांच्यासोबत छान पार्टी केली. पहाटे दोन वाजता आपल्या वाग्दत्त वधूला तिच्या एका नातेवाईकाकडे सोडून आले. “सुबह मुझे जल्दी जगाना, माँ! ड्यूटी जाना है!” असे आपल्या आईला बजावून ते झोपी गेले…. नव्या संसाराची साखरझोप ती!

२ जानेवारी,२००४. नववर्षाच्या स्वागतसमारंभांच्या धुंदीतून देश अजून जागा व्हायचा होता. सायंकाळचे पावणे-सात, सात वाजलेले असावेत. थंडी, धुकंही होतं नेहमीप्रमणे. आज जम्मू रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वैष्णोदेवीला जाणाऱ्या-येणाऱ्या सुमारे हजारभर यात्रेकरूंचा, देशभरातून कर्तव्यावर येणाऱ्या -जाणाऱ्या शेकडो सैनिकांचा आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेचा या गर्दीत समावेश होता. 

जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली!

– क्रमशः भाग पहिला  

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना . पुणे तेथे काय उणे  !

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते || 

(जातिकोश – जायफळ)

वसंततिलका 

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

मालिनी 

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे…!!

सौजन्य :  श्री आनंदराव जोशी

(एक अस्सल पूर्वाश्रमी सदाशिव पेठी आणि आजीव पुरणपोळीचे उपभोक्ते ! )

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खेळताना रंग बाई होळीचा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ खेळताना रंग बाई होळीचा…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(होळी – अध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयीचा लेख.)

ऋतू वसंत आलेला

मास फाल्गुन सजला

रंग रंगीला गुलाल

माझ्या मनात रुजला

फाल्गुन म्हणजे गुलाल, गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे व त्यागाचे प्रतीक. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचे काम करतो. या सणाला महाराष्ट्रात “शिमगा” व “होळी” तर उत्तर प्रदेशात “होरी” असे म्हणतात. ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात. फाल्गुन शुद्ध १३ ते १५ अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते “दोलोत्सव” म्हणतात. बंगाल प्रांतात “दोलायात्रा” तर दक्षिणेत “कामदहन” या नावाने संपन्न होणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

अध्यात्मिक दृष्टीकोन

या घटनांमुळे होळीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

१) भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने बहीण होलीकेला आमंत्रित केले. मी तुला जाळणार नाही असा अग्नीने होलीकेला वर दिला होता. हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला होलीकेसह चितेवर बसवून ती पेटवली त्यात होलिका भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वराचा दुरुपयोग केला होता. प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे लोकांना आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवतात.

२) रामाच्या राज्यात ढुंढा नावाची राक्षसीण होती “जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद्यवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल”. असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ढुंढा राक्षसीण लहान मुलांना पळवून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटवली व तिच्याभोवती दोन्ही हाताने बोंब ठोकून अपशब्द वापरले ढुंढा राक्षसीण पळून गेली. त्या आनंदा प्रित्यर्थ पेटविलेल्या होळीत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली.

३) कंसाज्ञेने आलेल्या पुतना राक्षसीचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांनी पुतनेला जाळून, होळी पेटवून व्यक्त केला.

४) त्रिपुरा सुराचा मुलगा तारकासुर लोकांचा छळ करू लागला भगवान शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा शंकर ध्यानमन अवस्थेत होते त्यांचा ध्यानभंग करण्यासाठी मदनांनी सोडलेल्या मदनबाणामुळे शंकरांनी मदनाला भस्म केले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.

५) या दिवसाला महत्त्व आहे कारण श्रीराम आणि सुग्रीवाची भेट याच फाल्गुन पौर्णिमेला झाली.

६) होळीमध्ये रंग खेळताना भांगेची सेवन केले जाते त्यामागे एक अध्यात्मिक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी शंकरांनी जेव्हा विष प्राशन केले. तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत असताना त्यांनी भांग पिली भांग ही वनस्पती थंड असल्यामुळे त्यांचा दाह कमी झाला म्हणून वाढत असलेल्या उष्ण दिवसांमध्ये होळी हा सण येतो आणि उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या उत्सवात खास करून भांग पिली जाते.

सांस्कृतिक दृष्टीकोन

आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. बाराही महिन्यामध्ये होणारे सणवार याला सांस्कृतिक महत्त्व आहे. निसर्गातील सर्व चांगल्या गोष्टींना आत्मसात करून त्याचे संगोपन व संवर्धन करायला लावणारी आपली श्रेष्ठ संस्कृती आहे.

पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक करावा लागे. दुसरे कुठलेच ईंधनाचे साधन नव्हते घरोघरी गाई गुरे असत. त्यामुळे दही दूध घरोघरी असावयाचे तसेच गाई गुरांच्या शेणापासून गोवऱ्या लावल्या जायच्या. त्या उन्हाळ्यात वाळवून त्याचा साठा करण्यासाठी एक शेणाचा ‘उडवा’ रचला जायचा(उडवा म्हणजे मधे गोवऱ्या गोल रचून गोलाकार त्याला शेणामातीने लिंपले जाई व पावसात भिजू नये म्हणून पूर्ण बंद केले जाई.अगदी एखाद्या छोट्याशा डेरेदार झोपडी सारखे ते दिसत असे त्याला गोवऱ्या काढण्यासाठी पुढच्या बाजूने एक माणूस आत जाईल असे तोंड ठेवले जाई.त्याला उडवा म्हणत.)अजूनही ग्रामीण भागात हे पहायला मिळते.त्यामध्ये त्या गोवऱ्या सुरक्षित ठेवल्या जायच्या. पावसाळा सुरू झाला की लाकूड मिळत नसे किंवा सर्व ओले असे त्यामुळे या गोवऱ्यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जायचा. त्याची तयार होणारी राख तिचा वापर भांडे घासण्यासाठी व्हायचा, किती ठिकाणी तर दात घासण्यासाठी देखील या राखुंडीचा वापर व्हायचा. झाडाच्या आळ्यामध्ये ही राख घातली जायची आणि त्यामध्ये नवीन बिया लावल्या जायच्या जेणेकरून नवीन रोपे लवकर तयार होतील हा उद्देश त्यामध्ये असायचा. होळीसाठी खास मुले घरोघरी जाऊन “होळीच्या गोवऱ्या पाच पाच गोवऱ्या नाही दिल्या तर…..”असे म्हणून बोंब मारतात. या जमवलेल्या गोवऱ्या पानगळ झालेली सारी पाने गोळा करून त्याची होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी याच होळीच्या राखेची धुळवड खेळली जाते ती राख एकमेकांच्या अंगाला फासली जाते.अजूनही होळीच्या राखे मध्ये. भोपळ्याचे वेल लावले जातात, कारल्याचे वेल लावले जातात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी कुठेही कधीही पुरणपोळी मिळायची नाही ती केवळ काही खास सणांना केली जायची त्यातलाच एक सण म्हणजे होळी. “होळी रे होळी पुरणाची पोळी”असे खास म्हटले जाते. पुरणपोळी खाण्यासाठी सर्वजण आतुरतेने होळीची वाट पाहायचे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

आगीपासून जीव अर्थहानी होऊ नये म्हणून या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकून नारळ अर्पण करतात व होळीत दूध टाकून तिचे विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात म्हणून या सणाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परांतील प्रेम संबंधाने फुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी १४ मन्वादी म्हणजे मन्वंतराच्या प्रारंभ तिथी आहेत दक्षिण हिंदुस्थानातील बहुसंख्य उत्सव या महिन्यात संपन्न केले जातात या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा व्रत करतात या व्रतात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा करतात गावातील तरुणांनी एकत्र जमून गाव स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करावा व त्याची होळी करावी परंतु लाकडांची होळी करू नये म्हणजे वृक्षहानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल अशी प्रथा आहे.होळी किंवा रंगपंचमीला अंगावर थंडगार पाण्याचे रंग उडवले जातात यातून ऋतूबदलाचा सुंदर संदेश दिला आहे तो म्हणजे आता थंडी संपली आहे उष्णतेच्या काहिलीत गरम पाणी हे आरोग्यास अपायकारक असते म्हणून होळी नंतर थंड पाण्याने स्नान करावे.आपले पूर्वज खूप श्रेष्ठ होते प्रत्येक ऋतुमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सणवार निर्माण केले व त्यानुसार आपण वर्तन केल्यावर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येऊ शकतो.

होळी जेव्हा रचली जाते तेव्हा त्याच्या मध्य भागात एरंडाच्या झाडाची मोठी फांदी ठेवली जाते. केवढा मोठा शास्त्रीय विचार आहे पहा याच्यामागे. एक कथा मी ऐकलेली येथे सांगावीशी वाटते. आफ्रिकेतील जंगलामध्ये काही लोक झाडे तोडून तेथे घर उभारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी तेथे लाकडाचे खांब उभे करतात, दुसऱ्या दिवशी येतात तर सगळे खांब अस्ताव्यस्त पडलेले असतात ते पुन्हा उभे करतात पुन्हा दुसऱ्या दिवशी अस्ताव्यस्त केलेले असते. पुन्हा उभे करतात आणि रात्री डबा धरून बसतात तर वानरांची एक टोळी येते आणि सर्व अस्ताव्यस्त करत असते तिसऱ्या दिवशी रात्री ते लोक तिथे खिरीचे भांडे ठेवतात आणि त्यामध्ये विष घालतात ठरल्याप्रमाणे वानरांची टोळी येते आणि त्या खिरीच्या भांड्या भोवती येऊन थांबते. त्यांच्यापैकी सर्वात वयस्क वानर येऊन त्या खिरीचा वास घेते व नंतर जंगलात जाऊन एरंडाचे लाकूड आणून खिरीच्या भांड्यामधून फिरवते आणि मग ती खिर ते सर्व वानरं खातात आणि त्या खिरीतील विष नष्ट झालेले असते आपल्याकडे होळीमध्ये ही एरंडाची फांदी ठेवण्याचे कारण म्हणजे होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वापरलेले असतात व नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण त्याची धुळवड आपल्या अंगाला फासतात त्यामुळे त्याचा काहीही अपाय होऊ नये व त्यात एखादे विषारी द्रव्य असेल तर ते नष्ट व्हावे म्हणून एरंडाच्या झाडाची फांदी होळीमध्ये ठेवली जाते जेणेकरून त्याची राख त्या सर्व धूळवडीमध्ये मिसळली जाईल व कोणाला काही अपाय होणार नाही किती मोठा शास्त्रीय दृष्टिकोन यामागे आहे पहा.

समाजात जसे चांगले लोक असतात तसेच वाईट प्रवृत्तीचे देखील लोक असतात. मानवी मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर वाईट भावना असतील तर तो त्या कोणासमोर बोलून दाखवू शकत नाही आणि मग ती प्रवृत्ती मनामध्ये कुठेतरी घर करून राहते ते वाईट विचार मनातले बाहेर पडावेत म्हणूनही होळीची निर्मिती झाली असावी होळी समोर सर्वजण काहीही वाईट शिवीगाळ करू शकतात, बोंबाबोंब करू शकतात जेणेकरून मनातील अपप्रवृत्ती नष्ट होऊन मन स्वच्छ आणि निर्मळ होईल. एकूण काय माणसाला मन मोकळे करण्यासाठी या होळीची निर्मिती झाली असावी.

होलीकोत्सवा मागची ही मानसशास्त्रीय बैठक आहे हुताशनी हे तिचे नाव अर्थपूर्ण आहे हुत म्हणजे हवन केलेले आणि अर्पण केलेले आणि अशनी म्हणजे खाऊन टाकणारी आपल्या दुर्भावना होळीत अर्पण केल्या तर ती त्या खाऊन टाकते असा भाव. फाल्गुन पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा यानंतर जी पौर्णिमा येते ती नव्या वर्षातील पौर्णिमा म्हणून या वर्षातील शेवटच्या पौर्णिमेला मनातील दुष्ट भावना ओकून होळीमध्ये टाकाव्यात हाच या उत्सवा मागचा मूळ हेतू असावा.

आयुर्वेदात सांगितले आहे जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजूक तूप नाजूकपणे वापरायचे नाही म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते पण तुपाने कोलेस्ट्रॉल वाढेल याचे काय? त्यासाठी आपण करतो कटाची आमटी या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इत्यादी कोलेस्ट्रॉल कमी करते.आहे की नाही वैज्ञानिक दृष्टिकोन.

आहे होळी

खा पुरणपोळी

वाटी तुपाची

आमटी कटाची

नका करू काळजी

आरोग्याची

फक्त पूर्वजांचे ऐकावे सारे

जीवनात येईल सुखाचे वारे

असीम प्रेमाचे महत्त्व श्रीकृष्णाने वृंदावनात राधिकेसोबत रास करून होळी खेळली आणि सर्व जगाला पटवून दिले. जगात प्रेम ही भावना नसेल तर माणूस सुखाने आयुष्य जगू शकणार नाही त्याच्या आयुष्यात कुठेतरी प्रेमाचा ओलावा हा असलाच पाहिजे हा गोड संदेश श्रीकृष्णांनी गुलाल उधळून,रास खेळून साऱ्या जगाला करून दिला.

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –मनमंजुषेतून ☆ “डी. लिट. … आणि… डिलीट…” ” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

??

☆ “डी. लिट. … आणि… डिलीट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही शब्दांच्या भोवती एक वेगळंच वलय असतं. आपल्या बाबतीत तो शब्द  नुसता ऐकल्यावर त्याचा अर्थ नीट समजून न घेता आपण आनंद व्यक्त करायला सुरुवात करतो. अगदी ते होणं शक्य नसलं तरी…… असाच गोंधळ झाला होता तो  शब्दाचा. आणि घेतलेल्या अर्थाचा.

मला एक फोन आला. त्या व्यक्तीने मुद्द्याला हात घालत सरळ बोलायला सुरुवात केली…… (सरळ मुद्याला हात घातल्याने तो कोणत्या गावाचा असावा हे समजलं असेल.)

मी…….. अमुक अमुक……. आम्ही विचारपूर्वक तुमचे नांव आमच्या डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतले आहे. तुम्हाला पुर्व कल्पना असावी म्हणून फोन करतोय. आपलं काही म्हणणं असेल तर विचार करून अर्ध्या तासात सांगा…..‌

        माझ्याबद्दल घेतलेल्या निर्णयाला विचार करायला मलाच वेळ द्यायचा….. हिच गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. बाकी सगळे निर्णय मला मान्य असायलाच पाहिजेत हे गृहीत धरून सांगितले जातात……

अर्धा तास…… अरे वेळ कुणाला आहे थांबायला….. तरी देखील मी विचार करतोय, असं भासावं म्हणून, कळवतो असं सांगितलं……..

आता डिलीट च्या लिस्ट मध्ये नांव. मी काय विचार करणार….. खरं मी विचार करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या विचारावरच मला विचार करायची वेळ आली होती…..

आता काय?……. अर्ध्यातासाने ही बातमी सगळीकडे पसरणार…… कौस्तुभच्या नावापुढे डि.लिट……अर्थात पसरवणार मीच…….

मी त्यासाठी तयारी सुरू केली. कालच दाढी केली होती तरीही आज परत केली. एक चांगला फोटो असावा (मागीतला तर द्यायला. हल्ली मला फोटो कोणी मागत नाही, मागीतला तर जूना नाही का? असं विचारतात. वर तो जरा बरा असेल असं सांगतात. आजकाल फोटो काढायला सांगणारे डाॅक्टरच असतात. आणि ते चेहऱ्याचा काढायला सांगत नाहीत.) म्हणून झब्बा पायजमा घालून घरातच मोबाईल वर दोन चार चांगले फोटो काढायला म्हणून तयारी केली. बायकोला देखील तयार व्हायला सांगितलं. 

फोन आल्यावर काय झालं आहे तिला कळेना….. माझी धावपळ पाहून तिचाच चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. पण फोटो काढायला तयार हो म्हटल्यावर ती सुद्धा कारण न विचारता (नेहमीप्रमाणे मनापासून) तयार झाली. तेवढ्यात मिळेल त्या फुलांचा गजरा पण करून झाला.

इथे नको, तिथे, असं म्हणत घरातल्या सगळ्या भिंतीपुढे उभं राहून झालं. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रंग असणाऱ्या भिंतीपुढे, शेजारच्यांना हाताशी धरत फोटो काढले. आमचे फोटो काढायचे म्हणून त्यांना हाताशी धरलं…… नाहीतर……

त्यांनाही फोटो काढायची संधी मिळाल्याने मागे, पुढे, थोड जवळ, खांदा वर, नजर समोर, मान थोडी तिरपी अशा सुचना देत, सगळे दिवे लाऊन, मोबाईल एकदा आडवा, एकदा उभा धरून, एकदाचे वैयक्तिक आणि दोघांचे फोटो काढले. बघू बघू म्हणत आम्ही देखील ते दोन चार फोटो, पाच सहा वेळा पाहिले.

माझं नांव (कोणीतरी) डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. असं मी बायकोला सांगता सांगता ते व्हाॅटस्ॲप वर पाठवलं सुध्दा…..

अय्या…… काय…… म्हणत ती जवळपास किंकाळलीच…… आता आम्हाला आमच्या अशा किंकाळीची सवय झाली आहे. प्रसंगानुसार आम्ही त्याचा अर्थ आमच्या सोयीने लाऊन घेतो.

आणि बातमी पसरली ….. मग काय?…. थोड्याच वेळात दोघांच्याही मोबाईलवर उजव्या, डाव्यांचे अंगठे, (हो दोघांचे उजव्या आणि डाव्या विचारवंतांचे) अभिनंदन संदेश, हसऱ्या चेहऱ्यापासून आश्चर्य वाटणाऱ्या चेहऱ्यांचे ईमोजी, अरे व्वा…..  पासून कसं शक्य आहे?….. अशी  वास्तववादी विचारणा, हे कधीच व्हायला पाहिजे होतं…… असा काहींचा दाखला…… असं सगळं व्हाॅटस्ॲप वर भराभर जमा झालं.

काही जणांनी मला फोन केले तर काही जणांना मी फोन केले…… मी काही करत नव्हतो तरी सुद्धा बायकोच्या फोनवरून मलाच फोन करून काही वेळ दोघांचा फोन व्यस्त ठेवला. तर मी कामात नसतांना सुध्दा कामात आहे असं भासवण्यासाठी बायकोला माझे आलेले फोन उचलायला सांगितलं. काहींना ते खरं वाटलं. तर मी कामात आहे असं बायकोने म्हटल्यावर कसं शक्य आहे?‌….. अशी शंका देखील काहींनी उघड उघड घेतली.

बरं पण असं मी काय मोठ्ठं काम केलं आहे की त्या कामाची दखल घेत माझ्या नावाचा डी.लिट साठी विचार केला. आणि असे कोण आहेत हे…..

कारण यांच्या यादीत राहू देत. पण गल्लीतल्या कार्यक्रमात सुध्दा माझं नांव कधीच आणि कोणत्याच यादीत नसतं. अगदी पत्रिकेतसुध्दा (प्रोटोकॉल) म्हणून काही ठिकाणी येतं……आणि यांनी अगदी डि.लिट साठी म्हणजे……. 

शेवटी मी न राहवून त्या व्यक्तीला फोन करून विचारावं म्हणून फोन लावला……. ती व्यक्ती म्हणाली “वाचाल तर वाचाल” हे वाक्य ऐकून माहिती आहे. आणि त्यात खूप चांगला अर्थ आहे. पण तुम्ही लिहिलेलं का वाचावं हेच समजत नाही. उलट ज्यांनी वाचलं नाही ते एका मनस्तापातून वाचले आहेत.

त्यामुळे आमच्या गृपमधून तुम्हाला वगळण्यात का येऊ नये? या अर्थाने आम्ही तुमचं नांव डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. यावर काही म्हणायचे आहे का यासाठी फोन केला होता……. बोला. काही सांगायचं  आहे का तुम्हाला……

मी काय सांगणार……. मी पाठवलेले सगळे मेसेज आता मीच डिलीट करत बसलोय……..

आणि हो तो गृप पण मी डिलीट केला आहे……..

मीच मला विचारतोय…. हे कसं शक्य आहे…….. हे कधीच व्हायला हवं होतं…… डिलीट……..

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

असा बॉस होणे नाही… 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?” 

कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?” 

“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.” 

“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.” 

“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले. 

साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं. 

इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?” 

“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?” 

ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.” 

कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!” 

“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.” 

मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते. 

(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.) 

माहिती संकलक :  श्री प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares