मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

गावातलं एक शेतकरी कुटुंब.

आई, वडील व तीन मुलं, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब.वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक आणि मेहनती. एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली.नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या.

मात्र घरातली  कोणती कामं कुणी करायची,यावर गोंधळ होऊ लागला आणि कामं खोळंबू लागली. एकीला वाटायचं की,’ हे काम मी का करू? धाकटीने करावं.’ असं इतर दोघीनाही वाटायचं अन् त्यामुळे गुंता वाढत गेला.

वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन् एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल त्यांनी चक्क वाटणीच करून दिली.

ते म्हणाले, “सर्वांत लहान सून… हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा, हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिनं पाहायचा. बाकी दिवसभर मग तिनं वाटलं, तर इतरांना मदत करावी, मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आरामदेखील करू शकते.

मधली सून…. नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिनं घरची धुणीभांडी पाहायची.बाकी काही नाही केलं तरी चालेल.

थोरली सून…. जुन्या काळातली आहे.कष्टाळू आहे. शेतीभातीचे ज्ञान आहे.परंपरा रीतिरिवाज माहीत आहेत.तर आजपासून तिनं फक्त शेताकडं पहायचं.बाकी तिन्ही मुलं शेतात असतातच. त्यांना हातभार लावायचा. घरची बाकी कामं नाही केली तरी चालेल.

यावर मग सासू बोलली, “सगळ्यांना कामं सांगितलीत. मलाही काही काम सांगा की,मी काय करू ते.”

सासरा म्हणाला, “खूप वर्षं तू माझ्या बरोबरीनं कष्ट केले आहेस.त्यामुळं तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं असं वाटत नाही.आराम कर, सुख घे.”

तर सासू म्हणाली, “तसं नको.नुसतं बसून आजारी पडेल मी ! काहीतरी काम सांगाच.”

सासरा म्हणाला, “बरं,मग एक काम कर.आजपासून घराची मुकादम तू. सगळीकडं लक्ष ठेवायचं.पै पाव्हणे पाहायचे आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील, तिथं तू त्यांना पाठबळ द्यायचं.”

कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खूश !

आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालू लागले.गाडी रुळावर आली आणि अशाच एक दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती.भाकरी भात वगैरे झाला होता. फक्त आता भाजी राहिली होती. भाजीही चिरून वगैरे तिने घेतली. कढई चुलीवर चढवली.फोडणी केली. नंतर चिरलेली भाजी टाकली. तिखट, मसाला, हळद टाकली. मीठ मात्र टाकलं नाही. का नाही टाकलं ? तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो. म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते. (गोष्टीच्या निमित्तानं नव्या पिढीच्या महिलांना ही टीप दिली)

आणि रश्श्यासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली. इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघालीय. तर पाच मिनिटं तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटल.

पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती. त्यात वेळ जाणार होता.

मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडं (म्हणजे जावेकडं) गेली. अन म्हणाली की, “माझी मैत्रीण निघालीय. मला जायचंय, तर आजच्या दिवशी जरा भाजीला उकळी आल्यावर मीठ तेव्हढं घालता  का ?”

त्यावर मधली जाऊ म्हणाली, “माझ्यापेक्षा लहान असून मला काम सांगतेस ? तुला काही संस्कार बिंस्कार आहेत की नाहीत? निघ तू…. तुझं तू बघ.”

धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली.

थोरलीने तर मधलीपेक्षा मोठा आवाज करून धाकटीला “तुझं तू बघ” म्हणून घालवून दिलं .

धाकटी मग तोंड लहान करून शेवटी हायकमांडकडे

(सासूकडे) गेली. तसं सासूनंही नकार देत… “तुझं तू पहा. मला आता कामं झेपत नाहीत बाई,” असं म्हणत तिला घालवून दिलं.

या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेव्हढ्या वेळेत भाजीला उकळी आली पण ! ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ टाकून झाकण ठेवून ती गेली मैत्रिणीला भेटायला.

 

आणि मग या दोन सुना व सासू स्वतःशीच विचार करत बसल्या की,’आपण केलं ते चूक की बरोबर ?’

मधलीनं विचार केला,’कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली.  आपण घालवून दिली. हे बरोबर नाही केलं आपण.’

असं म्हणत ती स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

थोरलीनंही तसाच विचार केला आणि थोड्या वेळानं तीही स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

आणि सासूलाही पश्चाताप झाला, ‘नको होतं इतकं रागवायला तिला.’असं म्हणत  थोड्या वेळानं तिनंही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकलं.

सर्वांनी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की, आपण चुकलो होतो, पण नंतर दुरुस्ती केली.

पण आता जिथं एक चमचा मीठ पडायचं होतं, त्या भाजीत चार चमचे मीठ पडलेलं.

दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले.

सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं.

सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला अन त्यांच्या लक्षात आलं, भाजी खारट झालीय.

त्यांनी सुनेला सांगितलं, “अग बेटा,घरात दही आहे का ? असेल तर वाटीभर आण.”

सुनेनंही पटकन जाऊन दही आणलं. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं अन मस्त मजेत जेवण करून शेताला निघालेसुद्धा.(बाय द वे दुसरी टीप : पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा. काम होऊन जातं.)

नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली.

त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुणेनं “काही खरं नाही भाजीचं,” असं सांगितलं.

थोरल्या मुलानं आईला विचारलं, “आबा जेवून गेले का ?”

आईनं ‘हो’ सांगितल्यावर त्यानं विचारलं, “काय जेवले आबा?”

तर आई म्हणाली, “हेच जेवण की, जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहीत, त्यांनी दही मागून घेऊन ते भाजीत टाकून खाल्लं, बाबा.”

यावर पटकन तिन्ही मुलं म्हणाली, “आम्हालाही दही आणा.”

त्याप्रमाणं मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून ते शेतात गेले.

नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या, तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूनं याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी “मी पण मीठ टाकलं,”असं सांगितलं. शेवटी मग त्यांनीही भाजीत दही मिसळून जेवण केलं.

गोष्ट इथं संपलीय !

 एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं  वाद होऊ शकतो, मनं कलुषित होऊ शकतात, अशावेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, जी कृती करून नकळत मार्गदर्शन करतो, तो बाकीच्यांनी मानला, तर मग वरील गोष्टीप्रमाणे  वाद न होता तो मुद्दाच अडगळीत पडतो आणि घरात एकोपा राहतो.

प्रश्न मीठ जास्त पडण्याचा नसतो तर नंतर त्यावर काय करावं ? याचा असतो.

प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता. पण त्यानं तसं केलं नाही. कारण  बिनभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचं दही कसं मिसळायचं हे तो शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली अन तेही जेवण करून खूश झाले. वाद टळला.

कुटुंबप्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील. पण तुमच्यापेक्षा चार पावसाळे त्यानं जास्त पाहिलेले असतात. त्या अनुभवाचं भांडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात.

ते लाथाडू नका ! स्वीकारा !

त्यातच भलाई आहे!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धुळवड… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

धुळवड ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज  न्युजपेपरला धुळवडीची सुट्टी. धुळवड म्हंटली की चटकन नजरेसमोर येतं ते गोकुळ. तो नटखट किशनकन्हैय्या आणी त्या कान्हावर  जिवाभावाचं मानसिक प्रेम करणा-या त्या गोपिका. त्यामुळे एका मैत्रीणीच्या खास आग्रहास्तव ब-याच जणांना खूप आवडलेली पोस्ट आज परत एकदा मांडते आहे.

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर. श्रीकृष्णाची अनंत रुपे, वेगवेगळी नावे. त्याचं  सगळ्यांना सगळ्यातं भावलेलं नाव म्हणजे कान्हा.

कान्हा म्हंटलं की अगदी जवळचा, आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला, समजायला पुढे पुढे जावं तितका तितका तो मारुती च्या शेपटीसारखा अनाकलनीय वाटतो. पण त्या कान्ह्याला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून वीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळूहळू माझ्यासारख्या वाचकांच्या. बुद्धीस झेपेल, पचेल, आकलन होईल असा माझा कान्हा उलगडायला सुरवात केली. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला आपला हा मधुसुदन किती कमी कळलायं. हिमनगाप्रमाणं. जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.

“युगंधर “आणल्याबरोबर एकदा सलग वाचून काढलं. तरीही आता परत एकदा “युगंधर” वाचायला सुरवात केल्यानंतर असं जाणवलं की आपल्याला आपला हा मुरलीधर परत नव्याने कळतोयं. ” युगंधर”हे खूप अप्रतिम पुस्तक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी कृष्णप्रेमींसाठी लिहीलयं. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तकं. आणि जो एकदा हे पुस्तक हाती घेईल तो हमखास नेहमी उशालगत कायम वाचण्यासाठी जवळ बाळगणारचं.

खूप सुंदर कृष्णाची विविध रुपं ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत. ह्यामध्ये महाभारता दरम्यान घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा वाचायला मिळतो.

ह्या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला सखे अनेक

गुरु दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, तसेच बहु पत्नी, कन्या, पुत्र होते सख्या मात्र दोनच एक राधा आणि दुसरी द्रौपदी. “राधा”ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळलायं युगंधर मधून. “रा” मँहणजे लाभो किंवा मिळो, आणि “धा” म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती.

खरचं युगंधरची निर्मीती ही श्रीकृष्ण लीलांपैकीच एक लीला असावी. त्याच्या कृपेशिवाय एवढा अद्भुत अविष्कार शक्यच नव्हता.

आज गोकुळाष्टमीच्या निमीत्ताने मी परत माझी रचना सादर करतेय.

  गजबजलेल्या गोकुळात होता कान्हाचा वास,

त्या कान्ह्याला मात्र सदा दुधालोण्याची आस,

सगळ्यांची नजर चुकवून हट्ट पुरवी राधा,

असे हा प्रेमाचा खेळ सिधासाधा ।।।

नव्हता ह्या खेळात दोघांचाही स्वार्थ,

एकमेंकांची काळजी घेणे एवढाच ह्यात अर्थ,

मात्र राधाशिवाय कृष्णाचे जीवन होते व्यर्थ,

राधाकृष्णानेच केले प्रेमाचे नाव सार्थ ।।।

राधा होती मोठी, कृष्ण होता तान्हा,

प्रेमरज्जूंनी बांधल्या गेले राधा अन कान्हा,

वयामुळे नाही आली कधीच प्रेमात बाधा,

अशी ही राधाकृष्णाच्या प्रेमाची अलौकिक गाथा ।।

कृष्णाला कळली राधेच्या प्रेमातील खरी आर्तता,

राधेशिवाय कधी होणारच नाही श्रीकृष्णाची पूर्तता,

राधाकृष्णाच्या प्रेमाची गोष्टच न्यारी,

जरी कृष्णावरती प्रेम करीती सारी ।।।

सोडीताच गोकुळ सा-यांना वाटे भिती,

कसे होईल आता, कोमेजेल का ही प्रिती,

शरीर होती भिन्न पण जुळले आत्म्यांचे सूर,

म्हणून कोसो अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर

म्हणून हे अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर ।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खूप दिवसांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली होती. मथळा असा होता..

एका तरुण दांपत्याची आत्महत्या सविस्तर बातमीत  लिहिले होते,

“हे दांपत्य तरुण आणि संगणक क्षेत्रात उच्च शिक्षित होते. दोघंही नामांकित कंपनीत उच्च पदाधिकारी होते. वर्षाचे भरभक्कम आर्थिक पॅकेज होते. मुंबईसारख्या शहरात उच्चस्थांच्या वस्तीत त्यांचा अद्ययावत, सुसज्ज असा ऐसपैस फ्लॅट होता. दोघांच्याही ब्रँडेड महागड्या गाड्या होत्या. ”

पोलीस तपास चालू आहे. आत्महत्येपूर्वी दोघांचीही सही असलेली त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात लिहिले होते,

“आमच्या आत्महत्येस फक्त आम्हीच जबाबदार आहोत. अल्पवयातच आम्ही जीवनात जे मिळवायचं ते सारं मिळवलं. आता पुढे काय हा प्रश्न आम्हाला सतत सतावायचा आणि या प्रश्नानेच आम्हाला खूप नैराश्य आले. असे वाटू लागले की जगण्यासाठी आता काही लक्ष्यच उरले नाही. मुले— बाळे —संसार या आमच्या जगण्याच्या संकल्पना होऊच शकत नाही. म्हणून आम्ही इथेच थांबायचं ठरवलं. जीवनच संपवून टाकायचं ठरवलं. या विचारापाशी आमचे अत्यंत आनंदाने एकमत झाले. म्हणून आमच्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. जगाचा निरोप घेताना आम्ही खूप आनंदात आहोत. ”

ही बातमी वाचून आजच्या तरुण पिढी विषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी सखोलपणे विचार करायला लागण्यापूर्वी माझ्या मनात इतकेच आले, ” खरंच ऐकावे ते नवलच. ”

सुदर्शन नावाचा माझा एक जुनियर मित्र अनेक वर्षे मस्कतला होता. त्या दिवशी अचानक आमची एका कार्यक्रमात भेट झाली. मी त्याला विचारले, ” किती दिवस आहेस भारतात?”

तो म्हणाला, ” अगं मी आता भारतात परत आलोय. मी निवृत्त झालोय्. ”

“निवृत्त? तुझं निवृत्तीचं वय तरी झालं का?”

“नसेल. पण आता मला काम करायचं नाही. मला माझे साहित्यिक आणि इतर छंद जपायचे आहेत. ”

तशी हरकत काहीच नव्हती पण तरीही मी थोडी संभ्रमित झाले. मग तोच सांगू लागला,

“कसं असतं ना? मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि एका घड्याळाच्या दुकानात मी एक सुंदर घड्याळ पाहिले होते. खूप महागडे आणि त्यावेळी मला ते विकत घेणे परवडण्यासारखे नव्हतेच. पण मी ठरवले, आयुष्यात कधीतरी याच ब्रँडचं हे महागडे घड्याळ घ्यायचं. पैसे मिळवण्यासाठी मी दुबई, मस्कत येथे नोकऱ्या केल्या. बायको आणि मुले भारतातच होती. बायकोला बँकेत चांगला जॉब होता. आजही आहे. मी खूप पैसा कमावला आणि एक दिवस मी माझे घड्याळ घेण्याचे स्वप्नही पूर्ण केले. मी खूपच आनंदात होतो. स्वतःला यशस्वी समजत होतो आणि नंतर एकदमच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका बिझ्नेस कॉन्फरन्स मध्ये एका परदेशी  व्यक्तीशी माझा छान परिचय झाला आणि गंमत म्हणजे त्याच्या मनगटावरच्या घड्याळाने मी फारच प्रभावित झालो. मी त्याला सहज किंमत विचारली आणि ती ऐकून मी पार उडालो. माझ्या स्वप्नातल्या घड्याळापेक्षा पाचपट ते महाग होते आणि तेव्हांच जाणीव झाली याला काहीही अर्थ नाही. या पैशाच्या पाठी धावण्यात आपलं आयुष्य वाया जात आहे. ही प्रलोभनं न संपणारी आहेत. त्याच दिवशी मी राजीनामा दिला आणि भारतात परतलो. आता फक्त स्वतःचे छंद जोपासायचे. ” असे सांगत त्याने सहज माझ्या हातावर टाळी दिली. माझा संभ्रम वाढलाच होता. खरं म्हणजे मला माहित होतं, हा माझा मित्र सुंदर कविता लिहितो, तो अजिबात कलंदर वृत्तीचा माणूस नाही, जबाबदार कुटुंब वत्सल आहे.. ”

तरीही?  असो! ऐकावे ते नवलच.

माझी मुलगी अमेरिकेहून फोनवर बोलत होती. बोलता बोलता तिने मला सांगितले, ” मम्मी! अगं कृष्णाचे आणि शिवानी चे ब्रेकअप झाले. ”

“काय सांगतेस काय? किती छान दांपत्य होते ते! सदैव एकमेकांच्या प्रेमात असायचे. ”

माझ्या अमेरिकेच्या वास्तव्यात मी त्यांना अनेक वेळा भेटले होते. मला फार आवडायचे ते दोघे. ”

“अग! पण असं झालं काय?”

“फारसे डिटेल्स मला माहित नाहीत पण कुठल्यातरी एका क्षणी त्यांना वाटायला लागले की ती दोघं दोन भिन्न व्यक्ती आहेत आणि यापुढे एकत्र राहणं शक्य नाही. दोघांनी स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला आहे. They have just moved on. ”

मला इतकंच वाटत होतं की हे काही माझ्या संस्कृतीच्या पठडीतलं नक्कीच नाही.

पण यापुढे मुलीने आणखी एक धक्का दिला.

“आज त्यांच्या ब्रेकप पार्टीला आम्हाला जायचं आहे. ”

ब्रेकअप ही काय साजरी करण्याची बाब आहे का? मी पार चक्रावून गेले होते.

माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मला जायला जमलं नव्हतं म्हणून मी काही दिवसानंतर तिला भेटायला गेले. माझं मन खूप जड झालं होतं. कशी असेल माझी मैत्रीण? एकाकी पडली असेल. इतक्या वर्षांचा त्यांचा संसार! काय बोलायचं तिच्याशी? कसं सांत्वन करायचं तिचं?

मी तिच्याकडे गेले तेव्हा ती एकटीच घरात होती. तिनेच दार उघडलं.

“ये बैस. ” म्हणाली.

खूप सावरलेली वाटली. गप्पांच्या दरम्यान ती म्हणाली,

“अगं! दिनेश नेहमी म्हणायचा ‘ मला ना असा झोपेतच मृत्यू यावा. यातना, वेदना आजारपण काहीही नको. सकाळ व्हावी, तू चहासाठी मला उठवायला यावंस आणि मी उठत नाही म्हणून मला हलवावस आणि तेव्हाच तुला कळावं की मी आता हे जग सोडून गेलो आहे. ’ आणि तुला सांगते, अगदी तसंच घडलं. दिनूला जसा मृत्यू यावा वाटत होते तसाच त्याचा मृत्यू आला. किती भाग्यवान ना तो! त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे पण दिनेशच्या मनासारखे झाले म्हणून मला समाधानही  वाटते. ” जीवनात कुणी कसा विचार करावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?

आणि आता आणखी एक मजेदार किस्सा सांगते. तत्पूर्वी एकच सांगते की हा किस्सा वाचल्यानंतर केंद्रस्थानी असलेल्या त्या व्यक्तीविषयी आपण मुळीच गैरसमज करून घेणार नाही.

तेव्हा मी शाळेत होते. असेन आठवी नववीत. त्यावेळी काळ— काम —वेगाच्या गणितांनी मला अगदी बेजार केले होते. ते हौद, त्या तोट्या, ते पाणी नाहीतर भिंतीचे बांधकाम, कामगार, दिवस यांची गणितं मांडताना माझी दमछाक व्हायची. माझे वडीलच मला गणित शिकवायचे. खूप सुंदर पद्धतीने, सुलभ करून शिकवायचे. छान आकृत्या काढून समजावायचे.

एक दिवस असेच एक कठीण गणित मी महाप्रयत्नाने सोडवले. अगदी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचले. तरीही वडील झटकन म्हणाले, ” चूक. शून्य गुण. मांडणी विस्कळीत..”

मला इतका राग आला त्यांचा! इतका वेळ झटापट करून मी गणिताचं बरोबर उत्तर मिळवलं आणि वडील म्हणतात, “चूक?” त्या क्षणी माझे भानच सुटले जणू! तीव्र क्रोधाचे भूत माझ्या मानगुटीवर बसले जणूं! आणि त्या तिरीमीरीत  मी वडिलांच्या गालावर जोरदार थप्पडच मारली.

मंडळी! या क्षणी तुमच्या मनातला माझ्याविषयीचा उरला सुरला आदर पार संपुष्टात आला आहे हे मला जाणवतेय्. पण थांबा! नंतरचे ऐका. दुसऱ्याच क्षणी माझे मन अपार गोंधळले. हे काय केले मी?

पण वडील शांत होते. त्यांचे टपोरे, पाणीदार, तेजस्वी, मोठे डोळे माझ्यावर त्यांनी रोखले. मी पुटपुटत होते. “पप्पा! मी चुकले हो! मी पुन्हा नाही अशी वागणार. ”

“ थांब बाबी. ”

वडील म्हणत होते, ” तुझ्या रागाच्या निचऱ्यासाठी माझा गाल हे तुझ्यासाठी सहज उपलब्ध असलेलं एक माध्यम होतं फक्त. तू माझी अत्यंत लाडकी, चांगली, आणि हुशार मुलगी आहेस. या क्षणी मला तुझा अभिमान वाटतो आणि विश्वासही वाटतो. तुझ्या आयुष्यात तू कधीही तुझ्यावर अन्याय झाला तर सहन करणार नाहीस. बेटा! शुभास्ते पंथान:सन्तु।।”

आजही या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझे मन अनेक भावनांनी उचंबळून येते. मी कुठलंही समर्थन देऊच शकत नाही. आणि तुम्हालाही हे नवलाचं वाटलं तर त्यात काहीच नवल नाही.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुका आकाशाएवढा…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

तुका आकाशाएवढा…! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

संत तुकाराम बीज —. फाल्गुन कृ. २, शके १९४५ – (या वर्षी दि. २७. ०३. २०२४)

सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा काळ ! भारतातील एक गांव !! गावात बारा बलुतेदार !!! पैकी एक सावकार !  आता सावकार म्हटलं की आपल्या समोर नमुनेदार सावकाराचे चित्र उभे राहिले असेल. स्वाभाविक आहे कारण सावकार म्हटलं की तो लालची असलाच पाहिजे, तो लांडीलबाडी करणारा असलाच पाहिजे अशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. पण हे सावकारी करणारे कुटुंब याहून वेगळे होते. सगळ्याच दगडांच्या मूर्ती घडवता येत नाहीत, कारण मूर्तिकार कितीही माहीर असला तरी दगड ही त्या प्रतीचा लागतो. हे अख्खे कुटुंब वेगळेच होते. आपले कर्तव्य म्हणून, पांडुरंगाने सोपवलेलेले पांडुरंगाचे काम म्हणून हे कुटुंब पिढीजात सावकारी करीत होते. घरात पंढरीची वारी होती, पैपाहुण्याचे स्वागत होत होते, गावातील प्रत्येकाला या कुटुंबाचा, घराचा आधार होता.

चारशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मोगलाई !!! आता मोगलाई म्हणजे काय हे आमच्या पिढीला, आजच्या पिढीला कळणे तसे अवघड आहे, कारण ना आम्ही पारतंत्र्य अनुभवले ना मोगलाई !! पण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर इतकेच सांगता येईल, ‘मोगलाई’ म्हणजे ‘मोगलाई’!!! 

‘मोगलाई’चा अधिक चांगला अर्थ ज्याला समजून घ्यायचा असेल त्याने आपल्याच देशात स्वतःच्या राज्यातून परागंदा होण्याची पाळी ज्या ‘काश्मीरी पंडितां’वर आली त्यांची भेट जरूर घ्यावी. ‘ सर्वधर्मसमभावा ‘बद्दल असलेले सर्व समज (खरे तर गैरसमज ! ) आपसूक स्पष्ट होतील आणि विशेष म्हणजे आजची ती गरज देखील आहे. हे सर्व थोडे विषय सोडून आहे असे वाचकांना वाटू शकेल परंतु ज्यांच्याबद्दल हा लेखन प्रपंच करीत आहे त्यांची शिकवण डोळेझाक करणे मला जमण्यासारखे नाही. ते स्वच्छ शब्दात सांगतात,

मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु. ॥ 

“मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥

भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥

मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥ 

अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥ 

तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥”

(अभंग क्रमांक ६२१, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

त्याकाळातील मोगलाईचा सुद्धा ‘सात्विकतेचे बीज’ जीवावर उदार होऊन टिकवून ठेवणारी काही मंडळी होतीच. त्यापैकीच हे कुटुंब!! मूळ आडनाव आंबिले!! पंचक्रोशीत मान होता, वकुब होता. ही तीन भावंडे!! तिघेही भाऊच!! त्याकाळातील प्रचलित पद्धतीनुसार मुलांनी बापाचा व्यवसाय पुढे चालवायचा असा दंडक त्याकाळी होता. त्यामुळे या तिघांनी सुद्धा हेच करावे असे त्यांच्या बाबांना वाटणे हे त्याकाळातील रितीला धरूनच होते. पण मोठा भाऊ ‘संसारात’ पडला पण तसा तो विरक्तच होता. म्हणून सावकारी दुसरा मुलगा, ‘तुक्या’वर आली. त्याने ती जबाबदारी सचोटीने पार पाडण्याचा प्रयत्न देखील केला.

आपण मनात एक चिंतीतो, पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं. इथेही तसेच झाले. आईवडिलांचे छत्र हरपले, मोठा भाऊ संसार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला आणि धाकट्या भावाने वाटणी मागितली, त्यात अस्मानी संकट आले. “न भूतो… !” असा दुष्काळ आला. महाभयंकर दुष्काळ होता तो. त्याकाळात लाखो माणसे देशोधडीला लागली, लाखों जीव प्राणास मुकले, याची झळ तूक्याच्या कुटुंबाला बसणे हे ही स्वाभाविक होते. तसा तो बसलाही आहे. कुटुंबातील अनेक माणसे अन्न अन्न करीत प्राणास मुकली. एक काळी सावकार असलेल्या कुटुंबास घासभर अन्नास मोताद व्हावे लागले. कल्पना करा, सावकार असलेल्या कुटुंबावर अन्न-अन्न करण्याची पाळी आली तर त्यांची काय मनःस्थिती असेल. जे कुटुंब अनेकांचा पोशिंदा होते त्यावर भिकेची पाळी यावी!! यापेक्षा ‘दैवदुर्विलास’ काय असू शकतो. त्याकाळातील शेतकरी दुष्काळ आला म्हणून आत्महत्या करून कर्तव्यच्युत होत नव्हते, त्यामुळे या तुक्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून देऊ, कधी विचारही केला नाही. त्याने यातून धीराने मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि ‘प्रयत्नांनी परमेश्वर’ या उक्तीनुसार ते यशस्वीही झाले.

या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘हरिनामाचा’ उपयोग करून घेतला. आपल्याकडे एखादा संत झाला की त्याची पूजा करायची, त्याला देवत्व प्रदान करायचे आणि आपण निवांत रहायचे अशी पद्धत पडून गेली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते, आपलेही हेच मत असेल असा विश्वास आहे. पण आज मात्र नुसती पूजा करून भागेल अशी परिस्थिती नाही, आज या संतांच्या चरित्राचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. ऐकणे म्हणजे कृती करणे आणि अभ्यासणे म्हणजे आत्मसात करणे, आत्मानुभूती घेणे, हे समजून घ्यायला हवे.

‘श्रीमान तुका आंबिले’ हे ‘संत तुकाराम’ होऊ शकले कारण त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि कृतीत आणली. नुसती कृतीत न आणता ती आत्मसात केली. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या पंक्तीनुसार ते जीवन जगले. हे सर्व लिहायला जितके सोपे तितकेच करायला अवघड.

*अखंड नामस्मरण, त्याला ‘सम्यक’ चिंतनाची जोड आणि ‘अरण्यवास’ यामुळे श्रीमान तुकाराम आंबिले संवेदनशील होऊ लागले, निसर्गाशी समरस होऊ लागले. एक दिवस सोनपावलांनी आला, तुक्याची वाचा अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली.

….. आणि मग ‘जीवा-शिवाची भेट झाली

तुक्याची ब्रह्मानंदी टाळी लागली. ‘अवघा’ रंग एक झाला नि तुक्या विठ्ठल रंगात न्हाऊन गेला!! तुक्या अंतर्बाह्य बदलून गेला. सर्व ठिकाणी एकच हरी भरून राहिला आहे याची त्यास अनुभूती आली, एक चैतन्य सर्व सृष्टीत भरून राहिले आहे याची चिरजाणीव त्यास झाली. सर्व ठिकाणी त्यास एक विठ्ठल दिसू लागला, देह विठ्ठल झाला, चित्त विठ्ठल झाले, भाव विठ्ठल झाला, क्षेत्र विठ्ठल झाले, आकाश विठ्ठल झाले, चराचर सृष्टि विठ्ठल झाली, आणि  असे होता होता तुका तुकाराम झाला नव्हे तुका आकाशा एवढा झाला!!!* सामान्य मनुष्य अथक परिश्रमानें, साधनेने ‘आकाशा एवढा’ होऊ शकतो, हे त्यांनी स्वानुभवाने सिद्ध करुन दाखवले आणि सामान्य जनांना भगवंत प्राप्तीचा सोपान सुगम करून दिला.

‘आकाशा’ एवढ्या झालेल्या तुकारामांना वैकुंठाला नेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले. तोच आजचा दिवस!! आजचा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. आजच्या पावनदिनी अल्पमतीने वाहिलेली ही शब्द सुमनांजली श्री संतश्रेष्ठ तुकारामांच्या चरणी अर्पण करीत आहे.

या लेखाचा समारोप त्यांच्याच एका अभंगाने करतो…

विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृ. ॥

संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥

करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥ 

काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥ 

तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥”*

(अभंग क्रमांक ५५३, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय राम कृष्ण हरि…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर वामनराव जोशी … ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ वीर वामनराव जोशी… ☆ श्री प्रसाद जोग

वीर वामनराव जोशी

जन्मदिन  १८ मार्च १८८१

वऱ्हाड प्रांतामध्ये प्रखर देशभक्तीसाठी प्रसिद्ध वीर वामनदादा ह्यांचा जन्म अमरावती येथे झाला. अमरावतीत त्यांचे बालपण गेले. वडील गोपाळराव व आई अन्नपूर्णा होते. आईच्या सेवाभाव, निस्पृहता, सत्यप्रियता ह्या गुणांच्या संस्कारात दादा वाढले असल्याने लहानपणापासूनच त्यांचा देशसेवेकडे ओढा होता. स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला त्यांच्या हृदयात धगधगत होती. देशभक्ती ही त्यांची जीवननिष्ठा होती.

भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केले व त्यांचे संघटन करून त्यांना देशभक्ती शिकवली. लष्करी वाङमय ग्रंथ त्यांनी वाचनालयात ठेवले. व्यायामाकरिता आखाडे काढले. शस्त्रं जमविली, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले व बॉम्ब प्रयोग शाळा काढली.

१९०२, १९०८ आणि १९०८  ते १९१४ च्या सशस्त्र क्रांती उठावाचे नेतृत्व वामनरावांनी केले होते. त्यांना वाटत होते भारतमातेला मुक्त करण्याकरिता इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनतेला उघडपणे बंड  पुकारावेच लागेल. त्यावेळी संघटित, शिस्तबद्ध, धैर्यवान, स्वसंरक्षणक्षम असे तरुण सरसावले पाहिजे म्हणून विविध संघटना या दादांनी उभारल्या. त्यात अकोट येथे ३०० युवा संघटित झाले होते. युद्ध विषयक डावपेच समजावे याकरिता दादांनी या संदर्भातील १००० पुस्तकांचा संग्रह केला होता. त्या पुस्तकांचे  वाचन करण्यात येत असे. तसेच त्यात वर्णन केलेल्या डावपेचावर चर्चा सुद्धा केली जात असे. यातील डावपेचांचा उपयोग कित्येकदा वामनराव निवडणुकीच्या लढतीत करीत.

या काळात सरकार कडून क्रांतिकारकांचा कसून शोध घेणे सुरू झाले. गुप्त पोलीसही  दादांच्या व सहकाऱ्यांच्या शोधात होते. म्हणून दादांनी सर्व शस्त्रास्त्रे, युद्ध विषयक पुस्तके, बॉम्ब तयार करण्याची साधने सर्व जमिनीत पुरून ठेवण्याचा सल्ला सहकाऱ्यांना दिला.

दादांचे हस्तलेखन सुंदर व सुवाच्च होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘गीतारहस्या’ची हस्तलिखीत प्रत तयार करण्यासाठी बोलाविले. ‘गीतारहस्या’च्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख आहे. ‘गीतारहस्य’ ची  हस्तलिखीत प्रत तयार करताना गीतेचे तत्त्वज्ञान दादांनी आत्मसात केले. त्यांनी जीवनभर कर्मयोगाचा सिध्दांत आचरणात आणला.

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वामनदादा हे उत्तम वक्ते, लेखक, नाटककार होते. त्यांचे लिखाण राष्ट्रजागृतीसाठी जहाल व ओजस्वी असे होते. रणदुंदुभी, राक्षसी महत्वाकांक्षा, धर्मसिंहासन ही दादांची तीन नाटके रंगभूमीवर चांगलीच गाजली. त्यामुळे ते श्रेष्ठ नाटककार ठरले. ही नाटके राष्ट्र चळवळीस प्रेरक ठरली.

१९२१ साली भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे दादा अध्यक्ष होते.

१९४३ते १९५३ या काळात वामनराव दादांनी अमरावतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

रणदुंदुभि  नाटकांमधील त्यांची पदे विशेष गाजली होती आणि आजही ऐकली जातात.

१) आपदा राजपदा भयदा

२) दिव्य स्वातंत्र्य रवी

३)वितरी प्रखर  तेजोबल

४)परवशता पाश दैवें

५) जगी हा खास वेड्यांचा

वीर  वामनराव जोशी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही. पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मुलांना मार मिळत असे!

  1. मारल्यावर रडल्या बद्दल.
  2. मारल्यावर न रडल्या बद्दल.
  3. न मारता रडल्या बद्दल.
  4. मित्रांबरोबर खेळल्याबद्दल.
  5. मित्रांबरोबर न खेळल्याबद्दल.
  6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्याबद्दल.
  7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल
  8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.
  9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.
  10. उपदेशपर गाणं गायल्याबद्दल.
  11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.
  12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्याबद्दल.
  13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केल्याबद्दल.
  14. खायला नाही म्हटल्यावर.
  15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.
  16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्याबद्दल.
  17. हट्टी असल्याबद्दल.
  18. खूप उत्साही असल्याबद्दल.
  19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्याबद्दल.
  20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्याबद्दल.
  21. खूप सावकाश खाल्ल्याबद्दल.
  22. भराभर खाल्ल्याबद्दल.
  23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्याबद्दल.
  24. पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्याबद्दल.
  25. चालताना घसरून पडल्याबद्दल.
  26. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्याबद्दल.
  27. मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्याबद्दल.
  28. मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्याबद्दल.
  29. मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्याबद्दल.
  30. रडणार्‍या मुलाकडे पाहून हसल्याबद्दल.

उगाच नाही आपण इतके निर्मळ, शहाणे झालो…

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सखा… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “सखा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

माणूस माणसाशी बोलताना नकळत हातात हात घेतो. सहज कृती आहे ती. जसा सहज श्वास घेतो तसा सहज जगू शकतो का ? याचे उत्तर बहुधा नाही असेच आहे. जगणे सोपे व्हावे म्हणून प्रत्येकालाच एक मितवा हवा असतो. तो प्रसंगी मित्र , तत्वज्ञ किंवा वाटाड्या, मार्गदर्शक होवू शकेल असा कोणीही आपल्याला हवाच असतो. बरेचदा काय होते , आयुष्यातला प्रॉब्लेम जेवढा मोठा तेवढे समोरचे आव्हान मोठे वाटू लागते. आव्हान आपल्या अहंकारला सुखावण्यासाठीच असते. मुळात अहंकार नसतोच पण तो निर्माण केला जातो. यात मुख्य सहभाग त्या लोकांचा असतो जे त्यांना स्वत:ला आपले हितचिंतक मानतात. एखाद्या छोट्या गोष्टीला डोंगराएवढी करण्यात त्यांचा पुढाकार असतो,  Psychoanalyst, गुरु मंडळी, तत्ववेत्ते तुमच्या नसलेल्या problems ना अस्तित्व देतात नाहीतर त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागेल. अडचणीत जर कोणी आलेच नाही तर ते मदत कोणाला करणार? हा ही प्रश्न उरतोच. खरेतर नक्की काय शोधत असतो आपण? नेमके काय हवे असते आपल्याला? याचा विचार का करत नाही आपण? आपण जे पचायला सोपे ते आणि तेवढेच स्वीकारतो आणि जे पटत नाही ते सोडून देतो. बरेचदा सरावाने आपल्याला कळत जाते काय घ्यायचे आणि काय नाही,  पण त्यातही आपली कुवत आड येतेच.

आपण सारेच तसे अर्जुन असतो.आपापल्या कुरूक्षेत्रांवर लढण्यासाठी ढकलले गेलेले अर्जुन..आणि प्रत्येकाला कोणी कृष्ण भेटतोच असे नाही.म्हणून आपल्याला स्वतःमधला कृष्ण  चेतवावा लागतो परिस्थितीप्रमाणे.. कृष्णच का ??..तर कृष्ण ही वृत्तीची तटस्थता आहे.आपल्या वर्तनाचा त्रयस्थ राहून विचार करणारी.स्वतःला ओळखण्यासाठी त्रयस्थ व्हा..आरसा व्हा स्वतःचाच ..” प्रत्येकात कृष्ण असतोच .तो कोणाला सापडतो , कोणाला भासमान दिसतो , कोणी कृष्ण होतो तर कोणी कृष्णमय…” अर्जुनालाही कृष्णमय व्हावे लागले तेव्हाच त्याला महाभारतीय युद्धाची आवश्यकता , त्यासाठीचे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे असणे उमजले…” कृष्णायन ”

पण कृष्णायन म्हणजे गीता नव्हे.स्वतःला ओळखणे , स्वतःच्या अस्तित्वाचा हेतू ओळखणे , स्वतःच्या कोषातून बाहेर काय आहे याची जाणिव होणे म्हणजे गीता.एखादा कोणी जेव्हा म्हणतो की तुझ्याकडे कोणतीच कसलीच प्रतिभा नाही..तेव्हा हा विचार करावा कृष्णाने सांगीतलेला..दुस-या कोणापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःला जास्त ओळखू शकता..तुमची ताकद , तुमची मर्यादा तुम्हाला माहिती हवी..असे कोणी म्हणल्याने तुमच्याकडे काही येत नाही तसे जातही नाही.ते असतेच अंगभूत.. माऊलींनी देखील स्वतःचा स्वतःमध्ये लपलेल्या अर्जुनापासून विलग होऊन कृष्णरुप होण्याचा प्रवासच जणु ज्ञानेश्वरीत मांडला आहे. आपल्याला काय काय हवे आहे ह्याची बकेट लिस्ट  नक्कीच करावी. पण आपल्याकडे काय काय आहे आणि नाही  हे आपल्याला कळले आहे का ह्याची लिस्टही जरुर करावी आणि ह्या कळण्यातही किती वाढ झाली हे पण पहावे. आपल्याकडे असलेल्याचा वापर आपण कसा करतो यावर आपले व्यक्तिमत्व घडते. “माझ्याबाबतीच असे का होते”? “त्याला मिळू शकते तर मग मला का नाही”?  असे प्रश्न पडत असतील तर आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळलेच नाही हे पक्के ओळखावे. आयुष्य अनुभवानी आपल्याला समृद्ध करत असते. आणि श्रीमंत ही ! आपले असमाधान आपल्या अपेक्षांना जन्म देते त्यामुळे असे असमाधानी असण्यापेक्षा अप्रगतच असणेच  बरे नाही का?

चोरी फक्त गरजा भागवण्यासाठीच केली जाते असे नाही होत.  काहीजण गरजा लपवण्यासाठीही चोर्‍या  करतात. उघडपणे केले तर समाज बहिष्कृत करेल या भितीने चोरुन करतात. काय हवे,  काय नको हेच साठत जाते नंतर. काय हवे आहे आणि का हवे आहे  ह्याचा विचारच करायला विसरतो आपण. हे नाही, हे सुध्दा नाही. असे सगळेच नाकारून पहा एकदा, सर्व नकार संपले. . . की एक आणि एकच होकार उरेल. हेच हवे असते आपल्याला.  हेच असते आपले खरे सत्य, सत्व आणि अस्तित्व. मानवी प्रयत्न , मानवी जीवन , मानवी आकांक्षा या सर्वांमध्ये ..यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा परिपाक आपल्याला मानवतेच्या छटांचे दर्शन घडवत राहतो….” पिंडी ते ब्रम्हांडी ” जे मनात उपजते तेच आपण अंगिकारतो.हिग्ज बोसाॅन , क्वांटम थिअरी , ब्लॅक होल या संकल्पना ज्ञानेश्वरांनी अभ्यासल्या होत्या  की नाही हे माहिती नाही पण  ” मी विश्वरुप आहे ” ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.प्रत्येकाने आहे आणि नाही यामधला अवकाश समजून घेतला पाहिजे ही जाणिव जिथे उमगते…तिथे कृष्ण भेटतो. ….

घनसावळ्या….

अजूनही थिरकतात मीरेची पावलं

तुझ्या त्या मुरलीच्या स्वरांवर

आजही बावरी होते राधा

तुला कदंबाखाली शोधताना

राधा काय किंवा  मीरा काय

तुझीच रुपं अद्वैत 

तू जादुगार. ..

बांबूच्या  पोकळीत स्वर गुंफून त्यांना सजीव करणारा

तुझ्या वेणुच्या स्वरांतून जन्मतात मानवी देहाचे

षड्ज

तू निराकार , साकार ,सगुण, निर्गुण

तूच सर्वत्र

तूच आदिम तूच अंतिम सोहळा

हे घनसावळ्या. …….

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हिंदोळ्यावर…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

परिचय

शिक्षण: एम ए मराठी-

व्यवसाय: मैत्री गंधर्व फॅमिली रेस्टॉरंट, उमरगा-पार्टनर आणि गृहिणी. कॉलेज जीवनापासून लेखनाची आवड. कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेत सहभाग LR (लेडीज रिप्रेझेंटिटीव) पदाची मानकरी. 

लेखन–

  • मुरुड येथील साप्ताहिक गणतंत्र मध्ये पहिला लेख “एक शाम मस्तानी मदहोश किये जाय”. प्रकाशित. औसा येथील दर्पण मासिकातून कविता प्रकाशित… लातूर येथील “ब्रह्मसमर्पण”, मासिकातून 36 लेख प्रकाशित. फुलोराच्या पंधराव्या काव्य संमेलनात “फुलोरा रत्न” पुरस्काराने सन्मानित.
  • फुलोरा साहित्य समूहाच्या सतराव्या काव्य संमेलनात विशेष साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  शुभंकरोती साहित्य समुहाकडून.. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित.
  • शब्दवेधी बाणाक्षरी समूहाकडून मला साहित्य रागिणी पुरस्कार आणि काव्यरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • “ काव्यरेणू “ हा पहिला काव्यसंग्रह १ फेब्रुवारी २०२४ धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात प्रकाशित झाला.
  • धुळे येथील काव्य संमेलनात सांजवात कला साहित्य पुरस्काराने सन्मानित
  • शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे महिला दिनी अष्टभुजा पुरस्काराने सन्मानित

सांजवात हा रांगोळी आणि चारोळी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.

राहणार औसा.

? मनमंजुषेतून ?

☆ हिंदोळ्यावर…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

उंच झोका झाडावर

पाळण्याची सय आली

झोपाळा ओसरीवर

मंद मंद झोका घाली

*

हिंदोळ्यावर सुखदुःखाची

स्वप्ने सारी पाहिली

गतकाळाची आठव पूंजी

झोपाळ्यावर राहिली

*

झोपाळा म्हटलं की ओसरीवर अगदी मधोमध माळवदाच्या कड्यांना बांधलेला झोपाळा आणि त्यावर घातलेली गादी आणि लोड आठवतात. बालपणापासून कितीतरी रूपात हा झोका आपल्याला भेटतो नाही का. अगदी जन्मल्याबरोबर विधिवत बाळाला पाळण्यात घातलं जात. त्याला नामकरण म्हणतात. आणि तिथून हा झोक्याचा प्रवास सुरू होतो. माझ्या घरी अजूनही माझा सागवानी लाकडी पाळणा आहे ज्या पाळण्यामध्ये मी तर खेळलेच, पण माझी मुलं देखील त्याच पाळण्यात खेळली. पाळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास मग झोक्यापाशी येऊन थांबतो.

माझ्या बालपणी तर आमच्या सरकारी वाड्यामध्ये उंच माळवदाला झोका बांधलेला असायचा आम्ही भावंड नेहमी नंबर लावून झोका खेळायचो.

कोण सर्वात उंच झोका घेऊन चौकटीला पाय लावतो त्याची स्पर्धा लागायची आमची. किती सुंदर काळ होता ना तो बालपणीचा!

झोका आठवला की बालपणीची आठवण येते. आणि

“एक झोका चुके काळजाचा ठोका”अशी काहीशी अवस्था माझी होते त्याला कारणही तसेच आहे. माझ्या माहेरी चिंचेचे मोठं बन आहे. त्याला चिंच मळा म्हणतात. चिंचेची झाडं इतकी जुनी आहेत, उंच आहेत की नागपंचमी आल्यानंतर त्याच उंच झाडांना झोके बांधले जातात. माझ्या शेजारी एक ताई राहायची आणि ती मला झोका खेळायला घेऊन जाण्यासाठी घरी आली.मी तेंव्हा जेमतेम पाचवी सहावीच्या वर्गात असेन. माझ्या आईला सांगून मला ती ताई घेऊन जात होती तेव्हा आई म्हणाली, “तिला जास्त मोठ्या झोक्यावर नको हो बसवूस.”त्या ताईने मला तिच्या पायामध्ये बसवले आणि ती त्या उंच झोक्यावर उभी राहिली झोका उंच उंच गेला. चार-पाच जणांनी दिलेला झोका तो खूपच उंच गेला आणि जणू काही आम्ही आकाशात गेलो की काय असे वाटून मी घाबरून गेले उंच गेलेल्या झोक्यावरून एकदम सटकले, डोळे पांढरे झालेले. मी सटकलेली पाहून खालची सर्व मुलं-मुली मग मोठ्यांनी ओरडू लागली. सर्वजण खूप घाबरले होते पण प्रसंगावधान राखून त्या ताईने झोका थांबेपर्यंत मला तिच्या पायामध्ये आवळून धरले व एका पायावर ती झोक्यावर उभी राहिली व मला खाली पडू दिले नाही. पण तेव्हापासून मी कधीच तितक्या उंच झोक्यावर बसले नाही… अशी ही झोक्याची काळजाचा ठोका चुकवणारी आठवण.

ओसरीवरचा चौफाळा अजून आमच्या घरामध्ये आहे. माझ्या चुलत्यांनी त्याचा फक्त आता पलंगा सारखा वापर सुरू केला आहे. किती आठवणी असतील ना या चौफळ्याच्या. किती जणांची सुखदुःख ऐकली असतील याने. सुखदुःख ऐकवणारी सर्व माणसं काळाच्या पडद्याआड गेली. पण या चौफाळ्याच्या मनात मात्र यांचा शब्द न शब्द रुंजी घालत असणार. खरंच याला जर बोलता आलं असतं ना तर याने पूर्ण घराण्याच्या कथा ऐकवल्या असत्या अगदी पानाचा डबा घेऊन करकर सुपारी कात्रत गावकीचा कारभार पाहणारे घराचे कारभारी झोपाळ्यावर बसूनच तर बोलत असणार. दोन-तीन माणसं आरामशीर बसू शकतील इतका मोठा हा चौफाळा आहे. दुपारच्या वेळेला पुरुष मंडळी नसताना स्त्रियांनी देखील याचा आस्वाद घेतला असणार. कारण पूर्वीच्या काळी पुरुष माणसे घरात असताना, स्त्रिया कधी ओसरीवर येत नसत. पण ते  बाहेर गेल्यानंतर मात्र ह्या स्त्रिया चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी नक्की ओसरीवर आणि चौफळ्यावर बसत असणार. नुसतं कुठल्या हो गप्पा मारणार हातात वातीचा कापूस, संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी नीट करणे, अशी सवडीची काम घेऊन मगच त्या गप्पा मारणार. कितीतरी स्त्रियांची हितगुजं, ऐकली असतील नाही का या झोपाळ्यांने. नाही नाही तो जणू त्यांचा सांगातीच झाला असेल.

घरात कोणी नसताना एखादं तरुण जोडपं देखील नक्कीच विसावलं असणार झोपाळ्यावर. ओसरीवरून अंगणातलं टिपूर चांदणं आणि थंड वाऱ्याची झुळूक घेतली असणार त्यांनी अंगावर. कधी घरातल्या आजी आजोबाही पत्ते खेळत बसले असणार. किंवा त्या काळात सोंगट्या देखील खेळायचे, झोपाळ्यावर बसून.घरातली छोटी मुलं देखील या झोपाळ्यावर दंगामस्ती करायची, आणि मग एखादं डोहाळे जेवण जर घरामध्ये असेल तर मात्र काय थाट वर्णावा या झोपाळ्याचा. त्याच्याकड्यांना छान छान फुलांच्या माळा वेली पाने लावून सुरेख सजवले जायचे. त्या रुबाबदार झोपाळ्यावर बसवून मग त्या पहिलटकरणीचे सर्व लाडकोड करत सोहळे साजरे व्हायचे. घरात माणसांची खूप गर्दी झाली तर एखादं माणूस झोपून जायचं या झोपाळ्यावरचं. कितीतरी जणांच्या परसामध्ये हा चौफाळा असायचा. हिरव्यागार झाडीमध्ये या चौफाळ्यावर बसून मंद मंद झोके घेत सर्वजण आनंद घ्यायची. कितीतरी उपयोग होता या झोपाळ्याचा. आणि भल्या मोठ्या ओसरीची शान होता हा झोपाळा.

काळानुरूप झोपाळ्याचे स्वरूप बदलले. पितळी कडया जाऊन त्या जागी लोखंडी कड्या आल्या. काही ठिकाणी जाड सोल लावूनही झोपाळा बांधला जातो. त्यातही आजकाल आधुनिकीकरण आले आहे. खुर्ची वजा झुला बाल्कनी मध्ये आजकाल आढळतो. शहरांमध्ये मोठमोठ्या उद्यानात झोपाळे असतात.

काळ बदलला तरीही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हा झोपाळा आपल्या आयुष्यात अजूनही त्याचे स्थान टिकवून आहे. म्हणून शेवटी झोपाळा, झुला, चौफाळा, झोळी, पाळणा, झोका या सर्व हिंदोळ्याच्या रूपांना उद्देशून मी म्हणेन-

बदललेल्या रूपातून

आजही झोपाळा दिसतो

हिंदोळा सुखाचा देतो

आणि गोड हसतो

 

हितगुज करतात 

त्याच्या सवे वारे

झुल्यावर झुलताना

सुखावती सारे

 

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वडिलांना पत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वडिलांना पत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

प्रिय बाबा,

तुमचं आणि आईचं पत्र मिळालं.आपल्या भावना पाहून खूप वाईटही वाटलं. तुम्हाला माझी गरज आहे, हे कळतंय हो बाबा. आई आणि तुम्ही आता थकलाय. माझी तुम्हाला प्रचंड आठवण येते. मी जवळ असावं, असं वाटतंय. त्याला जबाबदार बाबा, मीही नाही आणि तुम्हीही नाही.

तुमच्या आशीर्वाद आणि इच्छेनं मी अमेरिकेत बिझी आहे. तुमच्या अभिमानाचे फळ  आहे मी, बाबा.

मला कळतंय, तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमचं दुःख वाटून घ्यायला पाहिजे , तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत.पण या अमेरिकेत सगळं आहे फक्त वेळच नाही.कारण प्रांताची दुरी , मुलांचं शिक्षण , कामाचा लोड किती जरुरी आहे हे कसं सांगू तुम्हाला?  मनात असूनही मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.

मला व्हाट्सअपवर खूप मेसेज येतात. आई -वडिलांच्या कष्टाचे , त्यागाचे , प्रेमाचे. वाचलं की खूप वाईट वाटतं. बाबा, या सगळ्याला मी एकटा जबाबदार आहे?

आज धाडस करून तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढी संवेदनाशून्यता माझ्यात कुठून आली? बाबा उत्तर देऊ शकाल ? मला लहानपणी कुठं माहीत होत की इंजिनिअरिंग काय आहे? परीक्षा काय आहे? पैसा काय आहे?

मला फक्त हेच कळत होतं की बाबांनी मला मिठीत घ्यायला पाहिजे , आईस्क्रीम- भेळ माझ्या बरोबर खायला पाहिजे. आईनं मला भरवायला पाहिजे, माझ्याशी खेळायला पाहिजे.

त्या वेळी माझ्यासाठीच तुम्ही कष्ट करत होता. कधी तुमच्या जवळ येऊन बसलो तर फक्त अभ्यास कर , हा क्लास जॉईन कर ,असं वाग, तसं वाग…. याव्यतिरिक्त बाबा आपण दुसरं काय बोललोय, तुम्हाला आठवतंय का?

आईने सतत दुसऱ्या नातेवाईकाची मुलं कशी आहेत, हे सांगता सांगता तिचं बाळ काय मागतंय, हेच तिच्या लक्षात आलं नाही.बाबा, मी तुम्हा दोघांची चूक काढत नाही. मी एवढा मोठाही नाही.

पण अमेरिका काय आहे, पोस्ट काय आहे , पैसा काय आहे ,सुविधा काय आहेत , रुतबा काय असतो हे सगळं मी तुमच्या मांडीवर बसून शिकलोय. आईच्या नजरेतून मला कळायचं की या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत.

रात्रंदिवस फक्त आणि फक्त हेच शिकवलं की पोस्ट / आय आय टी /पैसा, मोठया पदांच्या नातेवाईकाची किंमत किती महत्त्वाची असते.

आईने जेवण देताना , दूध पाजताना , शाळेत जाताना , शाळेतून येताना हेच शिकवलं की माझा राजाबेटा खूप मोठा होणार , खूप पैसा कमावणार , हवेत उडणार आणि ह्या तुमच्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणुन कितीतरी नवस केले.

बाबा, मला एवढं संवेदनाशून्य आयुष्य का दिलं? का असं मला घडवलं?

बाबा,आई, सगळा दोष माझाच आहे का हो?

 -आपला पुत्र

प्रत्येक आई वडिलांनी विचार करणं गरजेचं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास करायचा की त्याला एक यंत्र बनवायचं?

शिक्षण तर अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाची आहे नैतिकता, राष्टप्रेम. मातीची गावाची आत्मीयता. आपण काही चूक तर करत नाही ना?

प्रत्येक आई बाबांनी विचार करावा असा विषय .

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाई माणूस…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाई माणूस…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

‘ब्राईट ईन्डिया साॅफ्टसोल्यूशन्स प्राईव्हेट लिमिटेड’.

येस्स… मी इथेच काम करतो. ॲन्ड , आय ॲम प्राऊड ऑफ ईट.

फायनल ईयरला, कॅम्पस मधनं सिलेक्ट झालो. आता दोन वर्ष होत आलीयेत. खरंच.. कळलंच नाही, कधी दोन वर्ष संपलीयेत ती. आय.टी. ईन्डस्ट्रीत राहून सुद्धा, ही कंपनी टोटली वेगळीये. नो पाॅलीटीक्स. हेल्दी वर्क कल्चर. डेडलाईन्सचा अतिरेक नाही. कामाची कदर करणारी लोकं. चांगलं काम केलं की, पटाटा मिळणारी ईन्क्रीमेंटस्.

बाॅस… बाॅस वाटलाच नाही कधी. जस्ट लाईक एल्डर ब्रदर. चांगलं काम करवून घेणारा. चुकलात, धडपडलात, तरी पाठीशी ऊभा राहणारा. सांभाळून घेणारा. स्वतःहून काही चांगल्या टिप्स देणारा. पुढं कसं जायचं ? हार्ड वर्क पेक्षा, स्मार्ट वर्क कसं करायचं ? हातचं न राखता सांगायचा. एखादवेळी रात्र कंपनीत काढायची वेळ आलीच तर आमच्या जोडीला तोही थांबायचा.

प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला की, सेलीब्रेशन. मनापासून. कुठंतरी महाबळेश्वर, नाहीतर लोणावळा, खंडाळा. टाॅपक्लास रिसाॅर्टमधे. सॅटरडे सन्डे. दोन दिवस फूल टू एन्जाॅय. पार्टीत आमच्याबरोबर धमाल नाचायचा सुद्धा. कूऽऽल. मन्डेपासून नव्या दमानं आम्ही नवा प्रोजेक्ट सुरू करायचो.

आमच्या ग्रुपमधे आम्ही चार पोरं आणि दोन पोरी. सगळी बॅचलर्स गँग. रूमवर टाईमपास करण्यापेक्षा, ऑफीस बरं. आम्ही जास्तीजास्त वेळ ऑफीसमधेच पडीक असायचो. खूप शिकायला मिळालं.

खरं सांगू ? मेसपेक्षा कंपनीचं कॅन्टीन बरं वाटायचं. आठवड्यातून तीनदा तरी रात्रीचं जेवण कंपनी कॅन्टीनमधेच व्हायचं. पोरींचं तसं नसायचं. सातच्या ठोक्याला त्या पळायच्या.

काहीही असो. आमचं वर्कोहोलीक असणं, बाॅसचं सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, त्याचा टॅलेन्ट, आमचं हार्डवर्क. प्रोजेक्ट डेडलाईनच्या आतच, कम्प्लीट व्हायचा. कंपनी खूष होती आमच्या टीमवर्कवर.

अचानकच. मन्डे ईव्हीनींग. बाॅस म्हणाला, “आज रात्री सगळे माझ्या घरी डिनरला या.” गेलो. ग्रुपमधल्या पोरीही होत्या. 

बाॅसची बाॅस. त्याची बायको. तीनं आमच्या गँगला मनापासून एन्टरटेन केलं. जेवण छानच. गप्पा मारल्या.

ती.. बाॅसनं ओळख करून दिली. “म्रिनाल. माय कझिन. आय. बी. एम. यू.ऐस. ला असते. पण कंटाळलीय तिकडे. लवकरच परत येईल इकडे.”

आम्ही पहातच राहिलो. वेड्यासारखं… नो डावूट. ती फेअर होतीच. पण तिचं स्माईल.  जबरा. आमच्या गँगमधल्या पोरांचे, ईसीजी काढावे लागले असते. धकधक..

तीनं हात पुढं केला. प्रत्येकाचा हात हातात घेवून शेक हॅन्ड केलं तीनं. तीचा स्पर्श झाला अन्… 11 के. व्ही.चा शाॅक बसला. कुछ कुछ… बहोत कुछ होने लगा.

ती प्रत्येकाशी बोलली. नेटिव्ह टाऊन, काॅलेज, हाॅबीज, गर्लफ्रेन्ड, बाॅयफ्रेन्ड, फ्युचर प्लॅन्स… सबकुछ. आम्ही हिप्नोटाॅईज्ड झालेलो. सब कुछ ऊगल दिया.

रात्रीचे अकरा वाजत आलेले. आमच्या गँगमधल्या पोरी अस्वस्थ. आम्ही.. आम्हाला वाटत होतं, ये मुलाकात खतमही ना हो.

एकदम बाॅसने बाॅम्ब फेका. मार डाला. “फ्रेन्डस्, आय ॲम रिझायनिंग. शिफ्टींग टू सिंगापोर. फ्राॅम टूमारो आय विल नाॅट बी देअर अराऊंड यूवर डेस्क. बेस्ट लक फाॅर युवर फ्यूचर. स्टे ट्यून्ड गाईज.”

आम्ही बैलासारख्या माना डोलावल्या. बुरा लगा. मनापासून वाईट वाटलं. आम्ही थोडं ईमोशनल झालेलो. बाॅसला हातात हात घेवून बेस्ट विशेस दिल्या. निघालो. खाली आलो.

म्रिनाल तिच्या गाडीपाशी. पोरींना ती ड्राॅप करणार होती. एकदम माझ्याकडे वळून म्हणाली. “तू त्याच एरियात राहतोस ना. चल, तुला ड्राॅप करते.”

मी टुणकन ऊडी मारून तिच्या गाडीत. ड्रायव्हींग सीटशेजारी. तीची मरून होंडा सिटी. कारमधला अफलातून फ्रेग्रन्स. तीचं असणं. मोतीदार दात दाखवत, हसून बोलणं. बॅग्राॅऊंडला जगजीतसिंगाचं गजल गाणं.. अहाहा…

साला, माझं घर फार पटकन् आलं. मी तिला बाय केलं. ईन्फानाईट टाईम्स, तिच्या पाठमोऱ्या गाडीकडे बघत बसलो. 

नेक्स्ट माॅर्नींग. बाॅस की बिदाई. आँखो में आंसू.

व्हेरी नेक्स्ट माॅर्नींग. नये बाॅस की मुँहदिखाई.

अर्थक्वेक झालेला. म्रिनाल ईज आवर न्यू बाॅस.

पुन्हा आँखों में आंसू. खुशी के आंसू. सरप्राईज के आंसू. सगळ्या पोरांचा देवावरचा विश्वास एकदम वाढला. भगवान, तेरी लीला अगाध है ! आणि म्रिनाल भी.

मुद्दामहून बाॅसच्या घरच्या पार्टीला येणं. स्वतःची ओळख लपवणं. आमची कुंडली काढून घेणं.. येस बाॅस.. मान गये.

हल्ली आम्ही जरा ब्युटी काॅन्शस झालेलो. भांगाच्या रेघा काढणं वाढलं. हजामाचं बिल वाढत गेलं. जीन्स पिदाडणं कमी झालेलं. फाॅर्मल्समधे वावरणं वाढलं. काहीही असो.. आमच्या ऑफीसचा स्वर्ग झालेला. तरीही. म्रिनालचं वेगळेपण जाणवायचं.

पहिल्या दिवशीच तीनं सांगितलं. “काॅल मी म्रिनाल. जस्ट म्रिनाल.”

ती प्रचंड हुशार. तितकीच मेहनती. सतत नवीन काहीतरी शिकायच्या मागे. तीचं नाॅलेज नेहमी अपटू डेट असायचं. आमच्याबरोबरही ती ते शेअर करायची. हळूहळू आम्हालाही ती सवय लागली. शक्यतो कुणी ओव्हरटाईम करावा, असं तिला वाटत नसे. एरवीचा टाईमपास बंद झाला. सहा वाजेपर्यंत आमचं काम आवरायचं.

अर्थात पहिल्या बाॅसईतकीच ती हेल्पींग नेचरवाली. व्यवस्थित गाईड करायची. छोटी छोटी टारगेटस् ठेवायची. डे टू डे टार्गेट. आम्ही ते कम्प्लीट करायच्या मागे लागायचो. प्रोजेक्टचा लोड जाणवायचाच नाही.

बाकीचंही ती भरपूर वाचायची. एखादं चांगलं बेस्टसेलर रेफर करायची. आम्ही वाचायचो. फ्रेश वाटायचं.

ती स्वतः खूप हेल्थ काॅन्शस होती.

जिम करायची. भरपूर वाॅक घ्यायची. गिटार वाजवायची. स्वतःला फ्रेश ठेवायची.

आम्ही काय ? काॅपी पेस्ट करायला टपलेलोच. जागरणं कमी झाली. अचरट चरबट खाणं कमी झालं. जिम सुरू झाली. आम्हीही हेल्थ काॅन्शस झालो. ऑफिसमधल्या स्मोकींग झोनच्या वार्या कमी झाल्या. ओव्हरऑल, हळूहळू ॲज अ पर्सन आम्ही डेव्हलप होत गेलो.

म्रिनाॅल वाॅज स्ट्राँग मॅग्नेटिक फिल्ड. आणि … ऑल वुई वेअर अन्डर ईन्फ्ल्युएन्स ऑफ ईट. ती सुंदर होतीच. अजून सुंदर वाटायला लागली.

वाटायचं की, आपण स्वतःला तिच्यासारखं डेव्हलप करायला हवं.

म्रिनाल वाॅज नो मोअर अ ब्युटी क्वीन. बट नाऊ शी हॅज बिकम आयडाॅल. आणि आम्ही सगळे तिला काॅपी करत होतो. तरीही छान वाटत होतं.

प्रोजेक्ट संपत आलेला. यू. ऐस. चा क्लायंट. दिवाळी दोन दिवसावर. म्रिनालनं त्याला ठणकावून सांगितलं. “दिवाळीत जमणार नाही. तुम्ही ख्रिसमसला काम करता का ? हे तसंच आहे.”

काही क्वेरीज होत्या. आज रात्री थांबावंच लागणार. म्रिनाल म्हणाली ,  “सगळे नकोत, कुणीतरी दोघं थांबा.”

मी आणि गार्गी तयार झालो. संध्याकाळी सहाला बाकीची लोकं गेली.

हॅपी दिवाली. आमची नाईट शिफ्ट सुरू.

रात्रीचे दोन वाजत आलेले. मी म्रिनाल आणि गार्गी. तिकडे तो राॅबर्ट. चुन चुन के प्रत्येक क्वेरीचा फडशा पाडला. टेस्टेड ओके. मिशन कम्प्लीटेड.

जरा रिलॅक्सलो. तेवढ्यात म्रिनाल आमच्या दोघांसाठी स्वतः काॅफी घेवून आली. खूपच छान वाटलं. आमच्या दोघांच्या पाठीवर थोपटलं. “वेल डन. नाऊ ईटस् रिअली अ हॅपी दिवाली.”

खरं तर खूप भूक लागलेली. असं वाटेपर्यंत म्रिनालनं तिच्या टिफीनमधली सॅन्डविचेस काढली. और मोतीचूर का लड्डू भी. मजा आली.

आम्ही तिघं निघालो. खाली आलो तर, म्रिनालचा नवरा त्याची कार घेवून आलेला. त्याच्याशी ओळख करून दिली.

तिच्यासारखाच. हुशार, हॅन्डसम. बिलकुल फॅक्टर जे नाही वाटलं. शी रिअली डिझर्व्हस् ईट. 

त्याच्या गाडीतून मी रूमपर्यंत. रूमवर पोचलो. रूमपार्टनरनं विचारलं.

“साल्या, तुझं कामात लक्ष कसं लागलं ?

एवढ्या सुंदर दोन पोरी शेजारी होत्या. मी पागल झालो असतो.”

मला त्याच्या पागलपणाची कीव वाटली. खरंच.. कामात इतकं हरवलेलो. त्यांचं बाईपण कधीच विसरलेलो.

म्रिनाल दोन एक वर्ष आमच्या इथे होती. आता बरीच वर्ष बंगलोरला.

गार्गी. माय कलीग ॲन्ड नाऊ माय वाईफ. आम्हाला नेहमी म्रिनालची आठवण येते. आज जे काही थोडं फार अचिव केलंय, क्रेडिट गोज टू म्रिनाल.

आजही कुठली यंग चार्मींग लेडी दिसली की, काय वाटतं सांगू ? ही म्रिनालसारखी हुशार असेल. ती भरपूर वाचत असेल. नाहीतर गिटार वाजवत असेल. ओव्हरऑल, तिच्या सुंदर दिसण्यापेक्षाही, ती खरंच जास्त सुंदर असेल.

माझी नजर सुधारलीय. सुंदर बाईमाणूस दिसली की हल्ली माझं त्यातल्या माणसाकडे जास्त लक्ष जातं. त्या स्वच्छ नजरेला बाईपणाचा मोतीबिंदू होत नाही.

परवा एकदम म्रिनालची आठवण झाली. आठ मार्च होता. फोन केला. आम्ही दोघंही बोललो. “हॅपी वुमन्स डे, म्रिनाल.”

ती तिकडून हसली. “वीई शुड सेलीब्रेट ह्युमन्स डे. देन विमन्स डे विल बी सेलीब्रेडेड एव्हरी डे !”

काय बोलणार ?

“ओके म्रिनाल , हॅपी ह्युमन्स डे !”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares