मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. तदुसऱ्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.

 

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

 

ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.

ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.

 

तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.

तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.

याचा विचार करा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.

 

 पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून… !!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पत्यांचा डाव…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पत्यांचा डाव…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

(दै‌. लोकमत मंथन पुरवणीत २२ सप्टें. २०१९ ला प्रकाशित)

सकाळपासून माझी थोडी चुळबुळ सुरु होती. पण कोणाशी बोलावं हे काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.

मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरच वातावरण थोड गढूळ झाल होत. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो.

माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटतं. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बैस, जरा दोन डाव खेळ. फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.

पत्ते खेळतांना ते काही जास्त बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात, उशीरा लागतात, पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही समोरच्याने टाकलेले किंवा आपण ओढून घेतलेले उपयोगात येतील का हे बघावे लागतं.

आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्यांच्या डावासारखा आहे. काय सोडावं आणि काय धरावं याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पध्दतीने सोडवण्यास मदत होते.

काही वेळा वेगळ्या डावांमध्ये आपण हुकूम सुध्दा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पाना पुढे निष्प्रभ ठरतात. पण यातुनच सावरायचे असते. आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.

हे सगळं बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.

जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. म्हणून समोरचाही उचलत नाही.

जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो.

आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात, व बऱ्याचवेळा आपल्याला हे माहीत सुध्दा असते.

आपल्या रोजच्या जीवनातही येणाऱ्या प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरुपयोगी आहेत त्या सोडून द्याव्या. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केला तर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्या.

जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्या वेळी एकमेकांचा डाव लागतील असे पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्षा असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तु सुध्दा नाही असा विचार असतो. पण रोजच्या डावात तो विचार ठेऊन चालत नाही.

प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हा त्रास आहे की तुम्हाला लगेच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्विकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.

आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ शांत होईल.

आता मात्र मी मित्रांकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे, व काय कोणी द्यायचे हे ठरवून त्यांचा डाव व्यवस्थित लाऊन देईन या बद्दल माझी खात्री झाली आहे.

धन्यवाद आजोबा, पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडण, जुळवण, व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल. असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कॅटॅलिस्ट— – लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ कॅटॅलिस्ट— – लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

” हल्ली वयाची तीस-पस्तीस वर्षं उलटून गेली तरी मुलांची किंवा मुलींची लग्नच ठरत नाहीत “….. हा विषय सध्या ऐरणीवर आहे.. यावर पॉडकास्टमधे, अनेक निरनिराळ्या माध्यमांवर, पालकांमधे चर्चासत्रं घडतायत…

अशातच परवा माझ्या तेहतीस वर्षांच्या एका लग्नाळु भाच्याने ” ही मुलगी फारच बारीक आहे ” असं कारण देऊन विवाहसंस्थेतून आलेली एक मुलगी माझ्यापुढेच नाकारली. त्या मुलीत असलेल्या चार चांगल्या गोष्टी आमच्या भाच्याच्या दृष्टीने नगण्य होत्या…

यात मला फारसं आश्चर्य वाटलं नाही… तो नाही…. त्याचं तारुण्य ते बोलत होतं..

पण ” बरं, तुला फार बारीक वाटतेय न ही मुलगी मग राहूदे… ऐपवर इतर अनेक मुली आहेत… त्या बघ… ” असं म्हणत माझ्या मैत्रिणीने म्हणजे त्याच्या माऊलीने जेंव्हा ” त्या मुलीचा विषय ” पाच मिनिटांत निकालात काढला… तेंव्हा मात्र या पोराचे चाळीशीपर्यंत काही दोनाचे चार हात होत नाहीत, याची खात्री पटली….

रिक्षातून घरी परतताना माझ्या समस्त आई, आज्या, मावश्या, काकवा, आत्या, माम्या यांनी माझ्या डोक्यात फेर धरला… आम्ही सख्खी, चुलत, मामे, आते, मावस भावंडे लाडाकोडात वाढत केंव्हा मोठी झालो ते कळलचं नाही… शिक्षणं पार पडली … मुलगे नोकरी धंद्याला लागले.. साहजिकच उपवर झाले..

मुली मोठ्या दिसू लागणं.. फारतर पदवीधर होणं… एवढंच क्वालिफिकेशन त्याकाळात मुलींच्या लग्नासाठी पुरेसं असायचं.. “करीअर ” हा शब्द मुलांसाठीही जिथं फारसा महत्त्वाचा नसायचा तिथं मुलींची काय बात ?

मुलानं नोकरीधंदा करावा.. स्वयंपाकपाणी थोडक्यात गृहकृत्ये येणा-या मुलीशी लग्न करावं..

मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क नाही तर तिच्या वडिलांनी किमान दोन-चार तोळे सोनं मुलीच्या अंगावर घालून दोन्ही अंगानं लग्न करून द्यावं… लग्नात मानपानावरून रुसणं हा वरपक्षाचा हक्क..

लग्नानंतर वर्षाच्या आत हललेला पाळणा.. ही लग्नाची यशस्वीता..

…. संसारवेलीवर एक मुलगा नि एक मुलगी फुलणं.. ही संसाराच्या स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्ती…

नव-याने इमाने-इतबारे केलेला नोकरीधंदा, बायकोने टुकीने केलेला संसार-आदरातिथ्य, मुलांचं संगोपन… आईवडिलांच्या वृद्धापकाळात केलेली त्यांची सेवा, यथासांग पार पाडलेले त्यांचे दिवसकार्य…

चांगली निघालेली सुसंस्कृत मुले नि त्यांची वेळेवर झालेली लग्नकार्ये..

आणि…. मुलांनी साजरी केलेली आईची साठी नि वडिलांची पंचाहत्तरी…

एवढ्या माफक अपेक्षा असलेलं जीवन…

कधीतरी हॉटेलातला डोसा.. बांधलेलं एखादं टुमदार घर… बायकोला अस्सल सोन्याचा केलेला छोटासा दागिना…. एखादा दूरचा नाहीतर अगदी क्वचित परदेश प्रवास … हा एखाद्यालाच नशीबाकडून मिळालेला बोनस…

अशा परिस्थितीत जीवनाच्या साथीदाराकडून लग्नासाठीच्या कितीशा अपेक्षा असणार ?

तरीही पसंती -नापसंती असायचीच…

माझ्या आतेभावाला एखादी मुलगी सांगून आलेली असायची… बघण्याचा कार्यक्रम पार पडलेला असायचा.. घरातील समस्त मंडळी गोल बसलेली.. अर्थातच ” मुलगी ” हाच चर्चेचा विषय..

गोरटेली एकशिवडी ती मुलगी सगळ्या महिलावर्गाच्या मनात भरलेली..

” मला नको ही… फारच बारीक आहे.. ” आतेभावाचं डायरेक्ट रिजेक्शन…

” अरे पद्या… नलूमामीकडं बघं.. लग्नात या मुलीच्या निम्मी होती.. उसाचं चिपाड बरं.. आता बघ कशी झालीय… गादीची वळकटी बरी…

(इथं बायांच्या चेह-यावर पदराआड दडलेलं मिश्किल हसू )

“अरे प्रदीपबाळा, पहिल्या बाळंतपणानंतर बायका नको म्हणण्याइतक्या भरतात…

म्हणून सुरुवातीला बारीकच ब-या.. !!” 

– – प्रदीपभाऊंना हा सुशीलामामीचा युक्तीवाद पटायचा नि दिवाळीनंतरच्या पहिल्या मुहुर्तावर ते बोहल्यावर चढायचे..

” फार जाड आहे गं ही मुलगी, नाही म्हणून कळवून टाका.. ” वैतागलेल्या पुतण्याला हीच सुशीलाकाकू सांगायची,

” अरे जयंता… काय करायची बारीक मुलगी घेऊन… सासरची माणसे खायला घालतात की नाही, असे लोक विचारणार… शिवाय अशा बारीक पोरींना सारखी आजारपणे…. त्यापेक्षा ही खाल्ले -प्यालेले अंगावर दिसणारी मुलगी बरी रे.. अशा पोरी कामाला वाघ असतात.. आणि दोन पोरं झाली की हे बाळसं जातं रे… !!

…… जयंता केंव्हा त्या बाळसेदार मुलीला पसंती देऊन बसायचा, ते त्याचं त्यालाच कळायचं नाही..

” या टकलू मुलाशी मी आजिबात लग्न करणार नाही ” म्हणून हटून बसलेल्या माझ्या मावसबहिणीच्या तोंडावर

” खल्वाटो निर्धनो क्वचित् ” म्हणजे टकलू माणूस कधीच निर्धन नसतो.. ( नेहमी श्रीमंत असतो ) असं संस्कृत सुभाषित फेकून तिला ” मी याच्याशीच लग्न करणार ” असं म्हणायला माझ्या आईनं. भाग पाडलं होतं…

पुण्यातील मामेबहीण जेंव्हा मिरजेसारख्या लहान गावातील मुलाला केवळ गाव लहान म्हणून नाकारू लागली तेंव्हा…

.. पुणं, पुण्यातील महागाई, तिथली माणसं, लांब-लाब अंतरं, लहान घरं… यापुढे मिरज हे कसं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या कफ प्रवृत्तीला मिरजेतच राहणं कसं श्रेयस्कर आहे… हे माझ्या शोभामावशीनं एखाद्या निष्णात वकिलाला लाजवेल, अशा युक्तीवादानं पटवून दिलं होतं.. अन् खरच सविताताई लग्न करून जी मिरजेत आली… तिने मिरज कधीच सोडलं नाही…

“कुटुंबाची आर्थिक स्थिती गरिबीची.. स्वत:चं घरही नाही”… म्हणून अतिशय हुशार, उच्चशिक्षित नि कष्टाळु अजितरावांना नाकारणा-या अपर्णाताईला आमच्या आजीने असं काही फैलावर घेतलं…

“तुला देवानं हातपाय दिलेत, आईवडिलांनी शिक्षण दिलं.. ते कशासाठी ?आयतं बसून खाण्यासाठी ?

नव-याबरोबर कष्ट कर… त्याला साथ दे… अगं दोघे मिळून एकच काय चार घरं बांधाल… “

…. अपर्णाताईच्या डोळ्यात तेंव्हा पाणी आलं.. पण तिला आजीचं कुठेतरी पटलं.. तिने अजितरावांना होकार दिला…. नुसताच होकार नाही तर कष्टाचीही साथ दिली…. अजितराव-अपर्णाताईचे चार कारखाने, महालासारखा बंगला.. त्यांचं दृष्ट लागण्यासारखं वैभव पहायला दुर्दैवानं आजी या जगात नव्हती…. पण अपर्णाताईने तिच्या प्रत्येक वास्तुत आजीचा फोटो मात्रं आठवणीने लावलाय… !!

ही वानगीखातर दिलेली काही उदाहरणे…

आम्हा भावंडांपैकी प्रत्येकाच्या लग्नात आमचे आई, बाबा, आजी-आजोबा, मावशी, काका-काकू, आत्या, मामा-मामी, वडील भाऊ-बहिणी..

यांनी कधी आंजारून -गोंजारून, कधी रागावून, कधी क्वचित खरं-खोटं बोलूनही लग्नाला तयार केलं..

अर्थात यामागे त्यांनी पाहिलेल्या अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा अनुभव होता.. आपल्या पोरांचं भलं व्हावं.. सारं काही वेळच्या वेळी व्हावं… आयुष्याच्या सप्तरंगांचं त्यांना दर्शन व्हावं.. ही सदिच्छा होती…

अन् त्यासाठी वाईटपणा घेण्याचीही तयारी होती…

कारण त्यांनी आम्हा मुलांना आपलं मानलं होतं..

परवा मला एक बाई भेटल्या.. ज्ञानवृद्ध नि वयोवृद्ध…

” मी नं कुणाचं लग्न ठरवण्याच्या भानगडीत पडत नाही.. अगदी जवळच्या नात्यातही नाही… काही झालं तर उगीच वाईटपणा कोण घेणार ?”

मी दचकले..

… हे बोल या काळाचं प्रतीक तर नव्हेत ? कुणीच कुणाच्या अध्यात मध्यात शिरायचं नाही…

अगदी आई-वडिलांनी सुद्धा… ?

मुलं शिकलेली असतात, वयानं मोठी असतात… त्यांची मतं ठाम असतात..

त्यानी स्वत:च्या आयुष्याची आखणी केलेली असते…

विवाहसंस्था असतात.. मुलं नाव नोंदवू शकतात.. एकमेकांना भेटू शकतात… पटलं तर लग्नही ठरवू शकतात… आई-वडिलांची, नातेवाईकांची यासाठी काहीच गरज नसते..

पण मग वय वाढलं तरी लग्नं का ठरत नाहीत?

ठरली तरी होतीलच असं नाही…

झालं तरी टिकतीलच असंही नाही..

लग्न ठरायचा दर खूप कमी झालाय

 नि

लग्न मोडायचा दर खूप वाढलाय..

– – कारण लग्न ही एक अभिक्रिया आहे… रिएक्शन आहे.. अन् अभिक्रियेसाठी -रिएक्शनसाठी उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट असला तर ती अभिक्रिया होते… वेगाने होते… अन् वेगाने होते म्हणून कंटाळवाणी होत नाही…

काही अभिक्रिया तर कॅटॅलिस्टशिवाय होतच नाहीत… लग्नाच्या या अभिक्रियेत आपले गणगोत हे कॅटॅलिस्ट असतात -असले पाहिजेत..

…. पण दुर्दैवाने कॅटॅलिस्टना अभिक्रियेत भागच घ्यायचा नाहीये नि रिएक्टंटना कॅटॅलिस्टची गरजच वाटत नाहीये…. म्हणूनच अभिक्रियेचा लोचा होतोय…. चूक समजून सांगणारी मायेची माणसंच नाहीयेत…. आणि असली तरी मुलांना त्यांचं ऐकायचं नाहीये..

आम्हाला पटवून, आमची समजूत काढून, प्रसंगी रागावून आम्हाला या आमच्या माणसांनी बोहल्यावर उभं केलं… म्हणून आमचं सारंच आलबेल होतं का?.. नक्कीच नाही..

रूळ बदलताना होणारा खडखडाट झालाच.. पण गाडीनं रूळ सोडू नये किंवा रुळावरून घसरू नये, यासाठी सासर-माहेरच्या वडीलधाऱ्यांनी कवचाचं काम केलं.. स्वत:ची जबाबदारी समजून..

कारण लग्न ठरवणं ही जशी त्यांनी आपली जबाबदारी मानली होती तशी ते टिकवण्याचा ठेकाही त्यांनी मायेने घेतला होता.. नि तो आम्हालाही मान्य होता..

ना प्रदीपदादाची बायको कधी जाड झाली…. ना जयंतदादाची कधी बारीक झाली…

सुरुवातीला दोघांना थोडी लाज वाटायची.. रागही यायचा…

पण नंतर एकमेकांना एकमेकांचा सहवासाने असा काही लळा लागला की एकमेकांवाचून रहाणं अशक्य झालं… जाडी, बारीकपणा, टक्कल, गाव, आर्थिक स्थिती… सारं बाजूला पडलं… नि….

तुझं मन माझं झालं 

माझं मन तुझं झालं 

आता सगळेच साठी -सत्तरीला आलेत..

कुणाची साठी साजरी होते.. कुणाची पंचाहत्तरी..

कुणाचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस..

त्या मंगलप्रसंगी फार वर्षापूर्वी लग्नासाठी कॅटॅलिस्ट झालेली नव्वदीतली काकू बोळक्या तोंडाने म्हणते,

” हा गधड्या तेंव्हा हिच्याशी लग्न करायला तयार नव्हता.. आणि आता बघा कसा बायकोशेजारी हसत बसलाय “

… तेंव्हा आयुष्यात लाभलेल्या सुखाची नकळत उजळणी होते, डोळे भरतात नि तोंडात आपोआप शब्द येतात – – ” थॅंक यू !! “

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले

प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘लिगो…’’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लिगो…’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

…लिगो म्हणजेच Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.

जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात, आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढा नागनाथ इकडे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी. ए. ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षांपासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठं प्रोजेक्ट करत आहे, इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनात कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.

लिगो म्हणजे नक्की काय? समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕव्हिटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी) समजून घ्यावी लागेल. विश्वात अशा अनेक घटना घडत असतात की, ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडं ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालनं उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की, जेव्हा वैश्विक घटना म्हणजे कृष्णविवरांचं (Black Holes) मीलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अशा घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात, त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांवर आदळतील, तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल, त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं.

पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकीच प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणं कठीण आहे. कारण ह्या तरंगांमुळे पृथ्वीचं होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघं एका फोटाॅनच्या आकाराचं असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमताही त्या उलथापालथीवर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अशा गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात, तर दोन कृष्णविवरांचं मीलन, दोन न्युट्रॉन ताऱ्याचं एकमेकांभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अशा घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात, तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणं आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटाॅनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान जसं पुढे जात आहे, त्यामुळे आता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत, ते नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली, ह्याबद्दल सांगू शकतो.

२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही गुरुत्वीय लहर १. ३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १. ३ अब्ज वर्षांपूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्षं लागली. आतापर्यंत प्रकाश हे एकाच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १. ३ अब्ज वर्षांपूर्वीची माहिती पृथ्वीवर पोहोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितलं आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली, ती तब्बल ३ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.

भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की, लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हिटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचं योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकांत भारताच्या अनेक संशोधकांनी आपलं योगदान दिलं आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा ग्रॅव्हीटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते. तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबीमध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की असं लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन कॅबिनेटने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा (जशा DAE, TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc. ) ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे.

आईनस्टाईनने बघितलेलं आणि अभ्यासलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत, हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचं स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे लिगोचे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम. 🙏

लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ …आणि आनंदाने जगा… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …आणि आनंदाने जगा… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले…?

1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.

स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल… पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.

घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली… !

घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही… ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे…!

घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !

स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले… ?

1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.

अमेरिकेत 15% स्त्रीया एकट्या राहतात.

12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.

19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.

केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.

अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे…

41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत कौमार्य असे काही उरले नाही…

परिणामी, अमेरिकेत सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,

 67 टक्के द्वितीय विवाह आणि 

74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.

फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.

 स्वयंपाकघर नसेल तर….

 युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.

 आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.

बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो…

घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!

अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.

म्हणूनच पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………

आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो… स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो…

अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.

भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे…

आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात… जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल…

 आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.

 म्हणूनच घरी स्वयंपाक करा,

 आणि…

 आनंदाने जगा…!

(सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.)

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !”

हे एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मान्यवराच्या तोंडातलं वाक्य, कोणी दिग्गज कलाकार किंवा नेता आपल्या सर्वांना कायमचा सोडून गेल्यावर त्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहतांना हमखास ऐकायला मिळत. पण या वाक्याचं खरेपण किती पोकळ आहे हे आपल्या सर्वांच्या मनांत असलं, तरी उघडपणे ते कोणी बोलून दाखवत नाही. कारण शिष्टाचार !

अशा कोणा एकाच्या जाण्यामुळे आपल्या सर्वांच्याच जीवनात खरंच अशी, कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होते का हो ? आपण मला विचाराल तर पोकळी वगैरे काही नाही, पण थोडे दिवस त्या व्यक्तीच्या आठवणीने दुःख होतं, व्याकुळ व्हायला होतं वगैरे, वगैरे ! गेलेली व्यक्ती आपल्या किती जवळची होती यावर त्या दुःखाची इंटेंसिटी अवलंबून असते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.

मंडळी, राम-कृष्णासारखे अवतार या भूतलावरून गेले तरी जग रहाटी थांबल्याचे किंवा एखादी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या सारख्या मर्त्या मानवामुळे आपण गेल्यावर पोकळी वगैरे निर्माण व्हायचा प्रश्नच कसा निर्माण होईल ? एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर तो किंवा ती, आपल्या कितीही जवळचा किंवा जवळची असली तरी हे त्रिवार सत्य आपण नाकारू शकतो का ? अगदी आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा, कोणी उरलेल्या सगळ्या आयुष्यात दुःख करत हातावर हात ठेवून बसलाय असं माझ्या तरी पाहण्यात नाही. शेवटी प्रत्येकाला स्वतः जिवंत राहण्यासाठी स्वतःच हातपाय हलवणे गरजेचे नाही का ? यावर हे “तुमचं पोकळ मत पटलं नाही बुवा !” असं कोणीही म्हणू शकेल, त्याला माझा ईलाज नाही. पण या बाबतीत भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या “जन पळ भर म्हणतील….. ” या अजरामर ओळी आपण आठवून पहा, असं मी त्या लोकांना नक्कीच सांगेन ! असो !

मंडळी, अनेक शोक सभांच्या दुःखद प्रसंगी, त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना ज्याच्या त्याच्या तोंडी तेच तेच वाक्य ऐकून मला तर कधी कधी हसू येत, अर्थात मनातल्या मनांत ! कारण असा एखादा दिग्गज कलाकार गेला, तरी भविष्यात कुठल्यातरी नवीन कलाकाराची अदाकारी किंवा त्याच गाणं किंवा वादन ऐकून आपल्याला गेलेल्या कलाकाराची आठवण येते असं आपण अनेकदा म्हणतो! गेलेल्या नेत्याच्या बाबतीत आजच्या “या” तरुण नेत्यामधे “त्या अमुक तमुक नेत्याचे” गुण दिसतात, असं म्हटलं जात.

आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी ज्यांची काहीच भरीव कामगिरी नाही, पण ज्यांना सामान्यपणे आपली माय मराठी भाषा बोलता अथवा लिहिता येते, कळते, तो किंवा ती सुद्धा माझ्या आधीच्या वाक्याशी सहमत होतील, याची मला खात्री आहे !

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !” हे लेखाच्या सुरवातीच वाक्य आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी आणि कोण गेल्यावर त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना उच्चारलं असेल, या बद्दल मला खरंच माहिती नाही, पण मला ते जाणून घ्यायची पोकळ नाही पण भरीव इच्छा नक्कीच आहे ! या बाबत श्रद्धांजली वाहण्याच्या विषयात तज्ञ असलेली मंडळी, मला पोकळ आश्वासन न देता काहीतरी ठोस माहिती पुराव्यासकट देतील अशी मला आशा आहे.

बरं वर्षान वर्ष कोणत्याही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हेच वाक्य अजून आपली जागा राखून आहे, याच सुद्धा मला कधी कधी नवल वाटतं ! आपली मराठी भाषा इतकी समृद्ध असतांना या वाक्याला अजून तोडीस तोड वाक्य मिळू नये, हे मराठी भाषेच दुर्दैव म्हणायचं का ? का या गंभीर विषयात “आपण कशाला नाक खुपसा” असा सूज्ञ विचार मराठी भाषेच्या विचारवंतांनी किंवा श्रद्धांजली वाहण्यात एक्स्पर्ट असलेल्या लोकांनी केला आहे ? पूर्वापार चालत आलेल्या जशा अनेक परंपरा आपल्याकडे आपण डोळे मिटून पाळत आहोत, तशाच पद्धतीने हे घासून गुळगुळीत आणि पोकळ झालेलं वाक्य, अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली वाहणाऱ्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येत असावं, असं मला स्वतःला कधी कधी मग वाटून जात.

एखादा माणूस आपला मुद्दा दुसऱ्याला समजावतांना त्याच्या बोलण्यातून, देह बोलीतून तो खरंच मनापासून पोट तिडकीने बोलतोय का वरवरच बोलतोय, हे सामान्यपणे लोकांना कळतं. पण या लेखाच जे ब्रीद वाक्य आहे ते कोणी कधीही, कितीही वेळा बोलला तरी त्यातील पोकळपणा लगेच मला तरी दिसून येतो. अर्थात तो इतरांना सुद्धा दिसत, कळत असेल, पण वर म्हटल्याप्रमाणे तो उघडपणे म्हणून दाखवायचं किंवा बोलायचं हे शिष्टाचाराच्या आड येत असल्यामुळे तसं कोणी बोलून दाखवत नाही, हे ही तितकंच खरं !

शेवटी, इतक्या वर्षांनी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर, आता तरी मराठी भाषेच्या अभ्यासकांनी या “पोकळ” भासणाऱ्या वाक्याला बदलून, त्या ऐवजी अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला काहीतरी नवीन असं भरीव वाक्य तयार करावं, शोधावं असं मला मनापासून वाटतं ! त्यामुळे होईल काय, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला, या श्रद्धांजलीच्या नवीन वाक्याने थोडं तरी आत्मिक समाधान मिळेल, अशी आशा करायला काय हरकत आहे ?

ताजा कलम – आपण अटेंड केलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, एखाद्या वक्त्याने “पोकळी” या शब्दाशिवाय कोणाला श्रद्धांजली वाहिली असेल, तर कृपया मला ते वाक्य जरूर कळवा !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

“ मावशी, उद्या कॉलेज मध्ये साडी डे‌ आहे, मी तुझी पैठणी नेसणार आहे चालेल ना तुला?”

“अगं चालेल काय पळेल, पण ब्लाऊज…… “,

“don’t worry मावशी I will manage”… ‘इती केतकी’,

एक बरं आहे या जनरेशनचे, त्यांच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असतात. केतकी येईलच इतक्यात…… पैठण्या पण दोन तीन त्यातली तिला कोणती आवडेल… जाऊ देत तिन्ही तिच्यासमोर ठेवाव्यात, आवडेल ती नेसेल. आपण पैठणी नेसून किती वर्ष, महिने झालेत आठवायलाच हवे.

कपाट उघडले तसा कपाटातून आवाज येऊ लागला. कोणी तरी आपापसात बोलत आहेत असा मला भास झाला.

“अगं मला नेस मला नेस, ” आवाजाच्या दिशेने पाहते तर‌, हॅंगर जोरदार हेलकावे घेत होते. नारायणपेठी हलल्यासारखी वाटली,

“ए तू बाजूला हो गं, ” नारायण पेठीला कोणीतरी दूर लोटले. तशी ती पटकन बाजूला झाली.

“बायकांना माहेरचा खूप खूप अभिमान असतो असं ऐकलं होतं, पण छे:, गेली वीस वर्षे मी बाहेरचं जग पाहिलं नाहीये. वीस वर्षांपूर्वी ‘सौरभच्या’ मुंजीसाठी, ‘माहेरची (पांढरी) साडी’, हवी म्हणून खास गर्भरेशमीची फर्माईश होती.. येतयं का काही लक्षात, बघ बघ जरा माझ्याकडे”.. बिचारी पांढरी साडी विरविरली.

‘अगं बाई खरंच की’, माझे मलाच वाईट वाटले.

आता सौरभचे लग्न ठरत आलयं. खरंच वीस वर्ष झाली आपण कसे काय विसरलो माहेरच्या साडीला. साडीला चुचकारले, आईची आठवण आली, क्षणभर गलबलल्या सारखे झाले.

“आम्ही पण कपाटात आहोत बरं का, तुझ्या लक्षात तरी आहे का, ‘बरोबर-बरोबर, आम्ही आता काकूबाई झालो ना., ‘अहो’ इंदोरला गेले होते, अहोंना किती instructions दिल्या होत्यास, डाळिंबी रंगच हवा, काठ सोनेरीच हवेत. सुरुवातीला नेसलीस, आता आम्ही बसलोय मागच्या रांगेत.. “ प्रेमाने मी इंदूरीवरून हात फिरवला. तशी ती आक्रसून गेली..

“माझ्याकडे बघता का जरा मी तर अजून गुलाबी कागदात तशीच आहे गुंडाळलेली”… अगं बाई खरंच वास्तूशांतीची आलेली, त्यालाही पाच वर्ष झाली.. मला तो रंग आवडला नव्हता, मग ती पिशवीत तशीच राहिली, नवी कोरी.. ” 

“मी कित्ती लकी आहे, डिझायनर बाईसाहेब पुटपुटल्या. “.. खरंच होतं तिचे.. पण, त्यातली मुख्य मेख तिला कुठं माहिती होती… तेवढा ‘एकमेव’ ब्लाऊज मला अंगासरशी बसत होता.

तेवढ्यात, शिफॉन बाईंनी लगेच तिला टाळी मागीतली,

“अगं मी नेसले ना की बाईसाहेब बारीक दिसतात, मग कायं, आमचा नंबर ब-याचदा लागतो बरंका…. “

कपाटातल्या साड्यांची सळसळ जरा जास्तच होवू लागली. पटकन कपाटाचे दार लावून टाकले.

आतल्या कांजीवरम, इरकलं कलकत्ता, पोचमपल्ली, ऑरगंडी, पुणेरी.. सगळ्यांची एकमेकींच्यात चाललेली कुजबूज बाहेर मला स्पष्ट ऐकू येत होती. प्रत्येकीची आपली आपली कहाणी होती. त्या कहाणीचे रूपांतर आता रडकथेत झाले होते आणि याला सर्वस्वी मीच जबाबदार होते..

बाहेर येऊन पहिलं गटागटा पाणी प्यायलं. खरंच मोजायला गेले असते तर ‘सेन्च्युरी’ नक्की मारली असती साड्यांनी. पण नाही नेसवत आता. काही जरीच्या साड्या जड पडतात. आताशा पंजाबी ड्रेसच बरे वाटू लागलेत. वावरायला सोप्पं पडतं ना. कपाटातल्या डझनभर साड्या मिळालेल्याच आहेत, तिथं आपल्याला choice थोडाच असतो. प्रेमापोटी मिळालेल्या, काही सरकवलेल्या(म्हणजे घडी बदल, इकडून तिकडे)मग काय नगाला नग, कपाट ओसंडून वाहणार नाही तर काय… सगळ्यांना सांगून दमले, आता काही देत जाऊ नका, साडी तर नकोच नको… पण…

असो…..

आता मात्र मनाशी पक्की खूणगाठ बांधली, जास्तीत जास्त वेळा साडीच नेसायची आणि हो, त्याच्यावरचे ब्लाऊज होण्यासाठी ‘१ तारीख आणि सोमवार’ ज्या महिन्यापासून येईल तेव्हा पासून जिम चालू करायचे..

मनावरचा ताण एकदम हलका झाला.

‘केतकी’ साठी पैठणीसोबत अजून दोन चार साड्या काढून ठेवल्या, तेवढीच हवा लागेल त्यांना.

खरं तर ‘साडी’ नेसणे‌ हीच समस्त महिला वर्गाची दुखरी नस‌ असावी…….

… हव्या हव्याश्या‌ तर वाटतात.. पण……

लेखिका : सौ क्षमा एरंडे

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’शिवगंगा’ आली हो अंगणी…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “’शिवगंगा’ आली हो अंगणी…☆ सुश्री शोभा जोशी ☆

— झाबुआचा सर्वांगीण विकास

(अगदी आत्ताच्या काळात सुध्दा पाण्यासाठी वणवण करणार्‍या, २/२ मैलांवरून पाण्याचे हंडे डोक्यावरून वाहून आणून पाण्याची गरज भागवणार्‍या लोकांविषयी आपण ऐकतो पाहतो. विशेषतः महिलांना हे काम करावं लागतं. पावसाच्या पाण्याला योग्य प्रकारे अडवून, ते साठवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी, जंगलवाढीसाठी योग्य रितीने उपयोग केला तर हे संकट टळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाबुआ या आदिवासी बहुल भागात ‘शिवगंगा’ संस्थेने केलेलं काम. )

‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं।

गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं’।।

खरं तर आपल्या देशातील बर्‍याच गावांमध्ये पाटाचं पाणी ही कवी कल्पनाच राहिली आहे.

माणूस, प्राणी, पशू पक्षी, झाडं एकूणच जीवसृष्टीसाठी पाणी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जीवसृष्टीच्या निर्मितीपासूनच पाण्याचं महत्व अधोरेखित झालं आहे.

महाभारतात कौरव-पांडव युध्दानंतर युधिष्ठिराच्या राज्यात एकदा नारदमुनी त्याच्या भेटीला गेले. प्रजेचे क्षेमकुशल विचारताना त्यांनी युधिष्ठीराला विचारले…

कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानि वहन्ति च।

भागशः विनिविष्टानि न कृषि देवमातृका।।

हे राजा, तुझ्या राष्ट्रात जलसिंचनासाठी मोठमोठे तलाव खोदण्यात आले आहेत ना? हे सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरलेले आहेत ना? शेती, देवमातृका म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर निर्भर नाही ना? ‘ म्हणजेच पावसाचं पाणी साठवणं हे हजारो वर्षांपूर्वी सुध्दा महत्वाचं मानलं जायचं हे नारदांनी विचारलेल्या प्रश्र्नावरून सिध्द होतं.

झाबुआ हा मध्यप्रदेशातील एक जिल्हा. जिल्ह्याची लोकसंख्या १०२४०९१ (२०११ च्या जनगणनेनुसार) आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची११७१’ आहे. साक्षरतेचं प्रमाण ४४. ४५% आहे. प्रमुख नद्या माही, अनास या आहेत. जिल्ह्यामध्ये जवळ जवळ ३७%लोक भिल्ल, भिलाला आणि पटालिया या जनजातींचे आहेत. इथल्या जनजातींबद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले होते. त्यांना बदनाम करण्यात आले होते.

झाबुआ जिल्ह्यात पाऊस बर्‍यापैकी पडतो. पण ते पाणी अडविण्याची सोय नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जात असे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होई. पिण्याला पाणी मिळणे दुरापास्त होई. जंगले उजाड होत. जल, जंगल, जमीन यावर अवलंबून असलेले आदिवासी ना धड शेती पिकवू शकत ना जंगल संपत्तीवर गुजराण करू शकत. त्यामुळे त्यांना कामाच्या शोधात गुजराथ, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात जावे लागे.

काही संस्थांनी या भागात पाण्याच्या व इतर समस्यांवर कामं केली पण त्यात त्यांनी आदिवासींना सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाहीत. त्यामुळं ही कामं वरवरची झाली. त्यांच्या समस्या तशाच राहिल्या.

या समस्या खर्‍या अर्थी दूर केल्या पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा आणि त्यांच्या टीम मध्ये असलेल्या डाॅ. हर्ष चौहान, राजाराम कटारिया आणि इतर सहकार्‍यांनी.

पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा, संघाचे स्वयंसेवक. १९९८ला संघाने त्यांच्यावर वनवासी कल्याण परिषदेची जबाबदारी सोपवली. महेशजींनी झाबुआ जिल्ह्यात प्रवास केला. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, ज्या लोकांना चोर, दरवडेखोर ठरवून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आहेत. कोणाचे पैसे बुडवत नाहीत. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची पाणी ही मुख्य समस्या आहे. म्हणून शर्माजींनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.

२००७ साली त्यांनी ‘ शिवगंगा ‘ प्रकल्पाची स्थापना केली. त्यांच्या मदतीला होते, दिल्ली आय आय टी मधून सुवर्णपदक प्राप्त करून एम् टेक् झालेले, देश-विदेशातील उच्चपदस्थ नोकर्‍यांकडे पाठ फिरवलेले, संघ प्रचारक, भिल्ल राजघराण्यातले श्री. हर्ष चौहान आणि जनजातीतील राजारीम कटारिया, ज्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर जनजातीतील लोकांसाठीच काम करायचे ठरविले. हे तिघे वत्यांचे इतर साथीदार यांनी झाबुआला जलमय करायचे ठरविले.

या टीमने प्रथम गावातील तरूणांबरोबर संवाद साधला. संकटात साह्य करणार्‍या गावातील तरूणांचे सघटन केले. इंदोर मध्ये ‘ ग्राम इंजिनियर वर्क ‘ या संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा ६ ‘ उंचीचे तलाव बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली.

महाभारतातील कथेनुसार भगिरथाने तपश्र्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा तिचा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून शंकराची प्रार्थना करून त्याच्या जटांमधून ती जमिनीवर आणली.

अगदी याच तत्वाचा अवलंब करून ‘शिवगंगा ‘ च्या कार्यकर्त्यांनी२००७ पासून पाणी अडविण्यास सुरूवात केली. पावसाळ्यात डोंगरातून धो धो वाहणारे, नुसतेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी उपयोग करण्यात येऊ लागला. लोकांच्या साह्याने तलाव बांधले गेले. हजारो बांध बांधले. ग्राम अभियंत्यांना; समतल रेषा, (कंटूर) काढण्याचं, बांध बंदिस्ती, नाला बंडिंगचं, पाणलोट, वृक्ष लागवड यांचं शास्रीय शिक्षण देण्यात आलं. इंजिनिअर्स आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने हाथीपावा पहाडावर १ लाख ११ हजार समतल रेषा (कंटूर ट्रेन्स) पाणी प्रकल्प राबविले. ३५० गावांमध्ये रिचार्जींग हॅंडपंप बसविण्यात आले. ४५०० मेड बंधान, चेक डॅम, तलाव इ. च्या माध्यमातून करोडो लिटर पाणी जमिनीत मुरले आणि जमिनीतील पाण्याचा साठा वाढला. झाबुआ जिल्हा दुष्काळ मुक्त झाला. जिथे वर्षात एकदा मक्याची शेती व्हायची तिथं वनवासी लोक गव्हाची शेती करायला लागले. वर्षातून दोन पिकं घेऊ लागले.

शेतीबरोबरच त्यांना हस्तकलेचे, बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे, कुंभारकामाचे शिक्षण देण्यात आले. बी-बियाणे, वनौषधी यांच्या पारंपारिक जतन करण्याच्या पध्दतीला चालना देण्यात आली.

हलमा… या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ‘या उक्तीनुसार संकटात असलेल्या भिल्ल कुटुंबाला, सर्व कुटूंबे एकत्र येऊन साह्य करतात. उदा. एखाद्याचे घर पडले तर गावातील सर्वजण एकत्र येऊन त्याचे घर उभे करून देतात.

पडजी… शेतीचे काम असेल तर ८/१० कुटुंबं एकत्र येतात आणि शेतातील कामं निपटतात.

मातानुवन… हा उत्सव वर्षातून ५/६ वेळा सर्व भिल्ल एकत्र येऊन साजरा करतात.

वृक्षारोपण… दुष्काळामध्ये झाडं लावणं बंद झालं होतं. पण आता पुन्हा वन उभारणीचे काम सुरू झाले आहे. ११० गावात ७०, ००० वर झाडे लाऊन झाली आहेत.

विशेष म्हणजे रूरकी, मुंबई, दिल्ली इ. ठिकाणच्या IIT चे विद्यार्थी इथे प्रशिक्षणास येतात.

शिवगंगा’ प्रकल्पाने फक्त जलसंवर्धनाचेच काम केले नाही तर आदिवासींचा सर्वांगीण विकास, ग्रामविकास, स्वयंरोजगार याबरोबरच जगाला पर्यावरण संरक्षणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय?” – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय? – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

जातिभेदाला पहिली थप्पड… (जुन्या आठवणी)

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगांवात एक-दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुच्चीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार-पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्त्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवीत, त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत. मात्र या बामणी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.

पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगांवाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या. बिन-हाडाची (म्हणजे चंबूगबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची ब्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर. शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या! पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पांना झुगारून खाणावळीचा धंदा सुरू केला. मुंबईच्या हिंदू खाणावळीच्या इतिहासात या सखूबाईचे नाव अग्रगण्य आहे. सखूबाईने खाणावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा. खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले- “माझी खाणावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार… अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल तर त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर दुरदुर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन. “

झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार-पाचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राम्हण, सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीला सखूबाई ‘विटाळशीची खोली’ असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच या सोवळ्या बामणांकडे वाढप्यांचे दुर्लक्ष व्हायचे. “अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा. ” असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, “अरे बंड्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. ” त्या सोवळ्या जेवणारांनी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, “हे पहा, मोठ्या पंगतीचे काम टाकून तुमच्याकडे ‘पेशल’ पाहणार कोण? तुम्हाला सगळे ‘पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकटांत सुतक्यासारखे ?” 

सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगांवात आणखी तीन-चार ब्राह्मण विधवांनी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्याना दूध-दही एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी “पेशल’ बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची, “कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?” असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुण फुकट. मग ते ‘पेशल’ बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एखादा इसम दोन-तीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिऱ्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीतही पाळत असत.

सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मध्येच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे, “चूप, मध्येच मला ‘ॲटरप्रॅट’ करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर्खर ! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जड्ज झाले, समजलास. ” एखादाचे दोन महिन्यांचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, “अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधाण तुझ्या बोडक्यावर. ” पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोठा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चार-पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखूबाईंचे टिंगलपुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.

तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज-सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.

लेखक : प्रबोधनकार ठाकरे

माहिती संकलन आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी

मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक

गीता हा अर्जुनाला पुढे करून सर्व मानव जातीला केलेला उपदेश आहे. ते आचरण शास्त्र आहे. त्यातील सर्वच श्लोक सारख्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यात सरस-निरस ठरवणे कठीण. तरीही ७०० श्लोकातून माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटलेले पाच लोक निवडण्याचा प्रयत्न मी केला. त्यातील पहिला श्लोक म्हणजे उन्नतीचा मंत्रच व स्वावलंबनाचा धडा

 १) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् l

 आत्मैव ह्यात्मनो बंन्धुरात्मैव रिपुरात्मन:ll(६/५)

माणसाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. स्वत:च स्वतःच्या नाशाला कारण होऊ नये. प्रत्येक जण आपणच आपला बंधू (हित करणारा) आणि आपणच आपला शत्रू (अधोगती करणारा )असतो.

यातून लक्षात येते की प्रत्येकाने आपल्यातील दोषांकडे दुर्लक्ष न करता ते घालवण्याचा व सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच बंधू व्हावे. ‘ जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हेच येथे लक्षात ठेवावे. उच्च स्थितीला पोहोचावे व यशस्वी व्हावे.

अशा प्रकारे स्वतःच्या उद्धारासाठी कर्म करत असताना कोणते पथ्य पाळावे हे सांगणारा दुसरा श्लोक

 २) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l

 मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गोsस्त्वकर्मणी ll(२/४७)

कर्म करत असताना कर्त्याची भूमिका कशी असावी याची चार सूत्रे येथे सांगितली आहेत. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. कर्मफलाच्या इच्छेने कर्म करणारा होऊ नको. तसेच ते न करण्याच्या आग्रहही नको.

कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म उत्तम प्रकारे आचरावे. पण त्याचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. फळ मिळणे हा भविष्यकाळ आहे. त्यात रमून वर्तमानातील कर्मावर दुर्लक्ष करू नये. कामातील आनंद घ्यावा. कर्मफल काहीही मिळो, त्याला कारण मी असे समजून कर्तुत्व अभिमान घेऊ नये. येथे अकर्म म्हणजे कर्म न करणे. मी कर्मच करत नाही म्हणजे फळाचा प्रश्न नाही असा विचार करून कर्म त्यागणे अयोग्य आहे.

अशा प्रकारे केलेले कर्म ईश्वरार्पण कसे करावे हे पुढील श्लोकात.

 ३) यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्l

 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्ll (९/२७)

भगवंत अर्जुनाला सांगतात तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस ते मलाच अर्पण कर. माणसाची कर्मे ही साधारणपणे चार प्रकारची असतात आहार, यज्ञ, दान आणि तप. कर्म अर्पण करणे म्हणजे त्यातील कर्तृत्व भाव अर्पण करणे व फळ प्रसाद रूपाने ग्रहण करणे. यज्ञ म्हणजे फळांचा काही भाग समाजासाठी अर्पण करणे. दान म्हणजे सत्पात्री व्यक्तीला योग्य काळी शक्य ती मदत करणे आणि तप म्हणजे शरीर, मन आणि वाणी यांनी केलेली साधना. या सर्व ज्यावेळी भगवंतासाठी होतात, निस्वार्थ बुद्धीने अपेक्षा रहित होतात, तेव्हा प्रत्येक कर्म म्हणजे त्याची पूजा होते. त्याची प्राप्ती करून देणारे होते. बंध निर्माण होत नाही. अशीही कर्मा मागची खूबी व भक्तीचे व्यापकपण.

अशाप्रकारे कर्म करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे भगवंत सांगतात

 ४) मां हि पार्थ व्यपाश्रित्य येsपि स्यु: पापयोनय: l

 स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यान्ति परां गतिम् ll(९/३२)

हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी कुणीही असो माझ्या आश्रयाला आले असता परमगतीला प्राप्त होतात. म्हणजे भगवंत प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. तेथे कोणताही भेदभाव नाही. म्हणून सर्व जातीत आणि स्त्रिया सुद्धा संत पदाला पोचल्या. त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. जो त्याच्या आश्रयाला जातो तो त्याचाच होतो. वेदाने जे अधिकार नाकारले ते गीतेने मिळवून दिले. म्हणून शबरी अनन्य भक्तीने मुक्त झाली व वाल्याचा वाल्मिकी झाला. आपणही जातीपातीवरून भेदभाव करू नये. सर्वाभूती परमेश्वर लक्षात घ्यावे.

गीता ग्राह्य व अग्राह्य दोन्ही गोष्टी सांगते. कोणत्या गुणाचा त्याग करावा म्हणजे सत मार्ग सापडतो त्याचे मार्गदर्शन गीता करते.

 ५) त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:l

काम: क्रोधस्तथा लोभस्तादेतत्त्रयं त्यजेत्ll(१६/२२)

काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आहेत. आपला नाश करणारी आहेत. म्हणून या तिघांचा त्याग करावा.

हे तीनही तामसी गुण आहेत. माणसाच्या अधोगतीला कारण होणारे आहेत. मोठे मोठे विद्वानही यांच्या अधीन होऊन आपल्याच अपयशाला कारण झाले. उदाहरणार्थ विश्वामित्र (काम), दुर्वास (क्रोध). अतृप्त इच्छा क्रोधाला जन्म देतात. त्या कामना पूर्ण करण्यासाठी द्रव्यासक्ती निर्माण होते हाच लोभ. त्यासाठी अवैध मार्गाचाही अवलंब केला जातो. परिणामतः नरकासारख्या हीन अवस्थेत राहण्याची वेळ माणसावर येते. म्हणून योग्य वेळीच विवेक व वैराग यांच्या बळावर या तीनही टाळाव्या व मिळेल त्यात सुखी समाधानी राहावे.

अशा प्रकारे स्वतः स्वतःचे हित साधणे. फलेच्छारहित कर्म करणे. ते ईश्वरा अर्पण करणे. असे कर्म कोणीही करू शकतात. मात्र तेथे लोभ नको. हा मार्ग सुख समाधान देणारा. म्हणून मला हे पाच श्लोक आवडले. नित्य आचरणात आणण्यासारखे आहेत.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares