मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी  जग… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

आनंदी मन, आनंदी तन, आनंदी  जग ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण ? अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी ? बघा, विचार करा ?

याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.

* आधुनिक जीवनपद्धती,

* विभक्त कुटुंब व्यवस्था,

* हातात खेळणारा पैसा,

* मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी  कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,

  • नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
  • मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
  • सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर…,
  • सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
  • वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
  • व्यायामाचा अभाव
  • आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.

* अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ

* अमली पदार्थांचे सेवन

* वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर

* स्टेटस जपण्याची स्पर्धा

यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…

मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका  येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल….

 मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी  अत्यावश्यक आहे.

 आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.

  1. स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का ?
  2. मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
  3. शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
  4. छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
  5. सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
  6. प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
  7. काळजीत वेळ घालवू नका.
  8. छंद जोपासा.
  9. मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
  10. पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
  11. सकाळी फिरायला जा.
  12. योग, प्राणायाम व ध्यान.
  13. हसतमुख रहा/ Be Cheerful
  14. मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
  15. मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
  16. आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
  17. शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
  18. आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement ? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
  19. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
  20. नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो. 21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
  21. कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
  22. दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
  23. मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
  24. श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
  25. रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
  26. चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
  27. मेंदूचा वापर सतत असावा.
  28. रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
  29. मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
  30. रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
  31. एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
  32. वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
  33. अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
  34. वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
  35. चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
  36. मी काही चूकीचे करतोय का ? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
  37. पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
  38. SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
  39. TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
  40. चांगली मुल्ये आनंदी करतात.
  41. श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
  42. रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
  43. खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
  44. संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
  45. नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
  46. ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
  47. आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
  48. भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
  49. नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
  50. परस्परावर विश्वास ठेवा.
  51. लोकांचे आवडते बना.
  52. सॉरी म्हणायला शिका.
  53. जबाबदाऱ्या जाणा.
  54. गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
  55. विवेकाने वागायला शिका.
  56. माणूस बनायला शिका प्राणी नको.
  57. बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
  58. मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
  59. चांगला दृष्टीकोन हवा.
  60. व्यक्त व्हा…. !
  61. मन आनंदी तर हृद्य आनंदी…. !
  62. सत्संगती

देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल… !

मन करा रे प्रसन्न ।

सर्व सिद्धीचें कारण ।

मोक्ष अथवा बंधन ।

सुख समाधान इच्छा ते ॥१॥

*

मनें प्रतिमा स्थापिली ।

मनें मना पूजा केली ।

मनें इच्छा पुरविली ।

मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥

*

मन गुरू आणि शिष्य ।

करी आपुलें चि दास्य ।

प्रसन्न आपआपणास ।

गति अथवा अधोगति ॥२॥

*

साधक वाचक पंडित ।

श्रोते वक्ते ऐका मात ।

नाहीं नाहीं आनुदैवत ।

तुका म्हणे दुसरें ॥३॥

 *

–  जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज

 सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.

आपला

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. नंतर कितीतरी वेळ पाऊस नुसता कोसळत होता. सगळीकडे १५ मिनिटात पाणीच पाणी झाले. घराच्या उंच गॅलरीतून दिसणा-या रस्त्याच्या तुकड्यावर क्षणाधार्त रंगीबेरंगी छत्र्या फिरताना दिसू लागल्या. पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरील पाण्यात पडल्यावर वेडीवाकडी प्रतिबिंबे लक्ष वेधून घेत होती. कॉलनीच्या कंपाउंडमधील उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाने अक्षरश: वेड्यासारखी हलत होती. गुंगीत घर सोडून चाललेल्या एखाद्याला कुणीतरी दंड धरून गदगदा हलवावे तसे! त्यावेळी शेंड्याजवळच्या पानामागे लपलेले एक कावळ्याचे घरटे दिसले. घरटे म्हणजे काय दोन फांद्या फुटत होत्या तिथे काड्याकाटक्यांचे तुकडे कसेबसे गोलगोल रचलेले. आता घरट्यात काहीच नसावे कारण पिल्ले असती तर कावळ्यांनी कोलाहल करून सगळा परिसर डोक्यावर घेतला असता. कावळेही कुठे दिसत नव्हते.

पावसाळ्यात हे ठरलेलेच असल्यासारखे चालू असते. अनेक पक्षांची पिले उडून गेलेली घरटी उध्वस्त होतात. पण त्याचे खुद्द त्या पक्षांनाही फारसे काही वाटत नाही. त्यांचे सगळे आयुष्य निसर्गाने कसे शिस्तीत बसविलेले असते. ठरलेल्या ऋतूतच जन्म, ठरलेल्या वेळीच प्रणयाराधन. ते झाल्यावर दिवसभर मनमुराद शृंगार. मग जेंव्हा दोनतीन नव्या पाहुण्याची चाहूल लागते तेंव्हा त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा तयार करायची दोघांची लगबग. त्यासाठी दिवसभर आळीपाळीने कुठून कुठून काड्या, कापूस, तारा, काहीही जमा करत राहणे. मग पक्षीण अंडी देवून त्यावर दिवसदिवस बसून राहते. एका दिवशी अंड्यातून एकही पीस अंगावर नसलेले चिमुकले जीव बाहेर आले की काही दिवस डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण. पिलांना मिळेल ते अन्न चोचीने भरवायची जबाबदारी मात्र आई-बाबा अशी दोघांचीही ! आणि पिले काही दिवसातच मोठी होऊन, उडून गेली की स्वत:ही त्या घराचा त्याग करून निघून जायचे. कसा अगदी संन्याशाचा संसार !

कालच्या त्या कावळ्यांच्या घरट्याचे अवशेष पाहताना सहज आठवले. लहानपणी कितीतरी गोष्टी अगदी वेगळ्या होत्या. मोठ्या शहरातील काही प्रशस्त बंगले, मोजकीच दुमजली घरे सोडली तर बहुतांश घरे बैठी आणि कौले किंवा पत्रे असलेली असायची. सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे लाकडी बल्ल्यांवर खिळ्यांनी ठोकून बसविलेले असत. सिमेंटचे पत्रे आणि पन्हाळीच्या उंचवटयाखालील एवढ्याश्या जागेत सायंकाळी एकेक चिमणी येऊन बसायची. रात्रभर तिचा मुक्काम घरात किंवा व्हरांड्यात असायचा. खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपल्यावर आम्ही आज किती चिमण्या मुक्कामाला आहेत ते मोजायचो. रात्रीपुरत्या आमच्या पाहुण्या होणाऱ्या चिमण्या पहाट होताच बसल्या जागीच थोडी थोडी चिवचिव करून भुर्रकन उडून जात. चिमण्याशिवाय कोणताही पक्षी कधी घरात येत नसे.

चिमण्या कधीकधी छताजवळ घरटीही करत. मग अचानक अगदी बारीक आवाजात अधीर असे ‘चिवचिव’ ऐकू येऊ लागले की समजायचे चिमणीला पिल्ले झालीत. मग चिमणा चिमणी त्या पिल्लांना दिवसभर काही ना काही भरवत. पिल्ले अन्नासाठी फार अधीर होत. उतावीळपणे ती कधीकधी चिवचिवाट करून हळूहळू पुढे सरकत आणि त्यातले एखादे उंचावरून खाली पडे. ‘टप्प’ असा पिलू पडल्याचा अभद्र आवाज आला की जीव कळवळत असे. एवढासा जीव इतक्या उंचावरून जमिनीवर पडला की अर्धमेला होऊन जाई. पिकट लाल-पांढुरके लिबलिबीत अंग, पारदर्शक त्वचेतून दिसणा-या त्याच्या लाल निळ्या रक्तवाहिन्या, अंगापेक्षा बोंगा अशी डोनाल्ड डकसारखी पिवळी मोठी पसरट चोच, धपापणारे हृदय असा तो अगदी दयनीय गोळा असे. फार वाईट वाटायचे. लगेच आम्ही मुले दिवाळीतील पणती कुठून तरी शोधून आणायचो. तिच्यात पाणी भरून त्याच्याजवळ ठेवायचो. शेवटच्या घटका मोजत असलेले ते पिल्लू स्वत:ची मानसुद्धा उचलू शकत नसायचे. मात्र आम्हाला भूतदया दाखवायची फार घाई झालेली असल्याने वाटायचे त्याने घटाघटा पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे आणि उडून परत आपल्या घरट्यात जावून बसावे. अर्थात असे काही व्हायचे नाही. लहान मुले देवाघरची फुले असतात, म्हणे ! पण देव त्याच्या घरच्या अशा किती निरागस फुलांच्या प्रार्थना नाकारतो ना ! फार राग यायचा तेंव्हा देवाचा ! पिलू मरून जायचे. त्याच्या मृत्यूचे दृश्य मोठे करुण असायचे. सगळेच अवयव अप्रमाणबद्ध असल्याने विचित्र दिसणारे, मान आडवी टाकून मरून पडलेले पिल्लू, त्याच्या अवतीभवती आम्ही टाकलेले काही धान्याचे दाणे आणि आमच्या त्याला पाणी पाजायच्या प्रयत्नात जमा झालेले बिचा-याला भिजवून टाकणारे पाण्याचे थारोळे ! आम्ही अगदी खिन्न होऊन जायचो. मग आईकडून त्याच्या मृत्यूची खात्री करून घेतल्यावर आम्ही बागेत त्याचा दफनविधी पार पडीत असू. माणसाच्या पिलाच्या मनात जिवंत असलेले सा-या सृष्टीबद्दलचे ते निरागस प्रेम नंतर कुठे जाते कोणास ठावूक !

चाळीसमोर अशीच एक कुत्री होती. तिचे नाव चंपी. गडद चॉकलेटी रंगाची चंपी दुपारी बाराच्या सुमारास चाळीतल्या प्रत्येक घरासमोर जाई. घरातील बाई तिला आधल्या रात्रीच्या उरलेल्या भाकरीचा तुकडा टाकीत असे. तो खावून चंपी पुढचे घर गाठी. कधीकधी बायका आतूनच ओरडत, “काही नाहीये ग चंपे, आज. ” चंपी तशीच पुढे सरकत असे. चंपीला कसे कुणास ठावूक मराठी समजायचे. चंपीलाच काय, ३०/४० वर्षापूर्वीच्या त्या साध्यासरळ काळात गाय, बैल, घोडा, कुत्रीमांजरी, पोपट असे सगळ्यांनाच मराठी छान समजायचे. हल्लीसारखे त्यांच्यासाठी मराठी माणसाला इंग्रजी शिकावे लागत नसे.

पावसाळ्यात चंपीला हमखास पिले होत. त्यावर चाळीतील सगळ्या मुलांचा हक्क असे. पहिले काही दिवस पिलांचे डोळे बंद असल्याने चंपी पिलांजवळून हलायचीच नाही. मग चाळीतील बायका चंपी ज्या कुणाच्या बागेत, आडोसा बघून, माहेरपणाला गेली असेल तिथे जावून तिला भाकरी वाढीत. आम्ही मुले लांबूनच पिलांचे निरीक्षण करायचो. त्यातील पिले आम्ही बुकही करून टाकलेली असत. पांढ-याकाळ्या ठिपक्याचे माझे, काळे सत्याचे, चॉकलेटी न-याचे अशी वाटणी होई. पिले मोठी झाल्यावर, आम्ही त्यांचा ताबा घेत असू. अर्थात त्या काळच्या आईवडिलांच्या गळी असल्या फॅन्सी कल्पना लवकर उतरत नसत. तरीही एकदोन मुले त्यात यशस्वी होत. मग त्या पिलाला खाऊ घालणे, त्याच्यासाठी घरासमोरच्या अंगणात सातआठ विटांचे घर तयार करणे. त्यात त्याला जबरदस्तीने घुसवायचा प्रयत्न करणे अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत. अनेकदा पिलू रात्रभर रडे मग घरच्या दबावाने आम्हाला त्याची कायमची मुक्तता करावी लागे. आम्ही एकदोन दिवस तरी हिरमुसले होऊन जात असू.

कॉलेजला असताना एक फर्नांडीस नावाचा मित्र शेजारच्या दुस-या गावाहून येत असे. त्याच्या खिशात त्याने पाळलेली एक खार असायची. असा विचित्र प्राणी पाळणारा म्हणून फर्नांडीस आमच्या कॉलेजसाठी एक हिरोच होता. खार त्याचे ऐकून कॉलेजचे सर्व पिरीयडस होईपर्यंत खिशात गपचूप कशी काय बसून राहायची देवच जाणे. एक दिवस ती मेली. पण सगळ्या वर्गाला उदास वाटले.

तान्ह्या मुलांना पाळणाघरात आणि आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा आधुनिक ‘करीयरिस्ट’ काळ हा ! आता या असल्या पक्षी आणि प्राण्यांच्या लळ्याच्या गोष्टी तशा कालबाह्यच म्हणा ! पण जुन्या आठवणी आल्या की महंमद रफीच्या आवाजातले आठवणींबद्दलचे गाणेही आठवत राहते –

“दिन जो पखेरू होते, पिंजरे मे, मैं रख लेता,

पालता उनको जतन से, मोती के दाने देता,

सीने से रहता लगाये,

याद ना जाये, बीते दिनो की |”

 *******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 ७२०८६ ३३००३

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

चैतराम पवार…       

आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २००० साली पहिल्यांदा बारीपाड्यात गेलो होतो. नंदुरबारच्या डॉ. गजानन डांग्यांनी साक्रीहून कोणाची तरी दुचाकी उधार घेतली आणि आम्ही दोघे बारीपाड्यात गेलो. गेलो म्हणजे ती दुचाकी अलिकडच्या एका गावात ठेवली आणि मग चिखल तुडवत पाऊस चुकवत बारीपाड्यात पोचलो. भाऊंच्या घरी चुलीजवळ बसून कोरडे झालो आणि घरच्या गुळाचा कोरा चहा प्यायलो. तिथपासून गेली २४ वर्षे मी चैत्रामभाऊंना ओळखतो-पाहतो आहे.

पहिल्या भेटीनंतर मी एका साप्ताहिकात त्यांच्या कामाबद्दल, बारीपाड्याबद्दल लेख लिहीला. तोच पहिला लेख होता, असं डॉ. फाटकांकडून नंतर मला कळलं. त्या वेळी ऑलरेडी बारीपाड्याच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने शे-दोनशे बांध घातले होते, जंगल राखून पाणी अडवून गाव टँकरमुक्त केला होता, पाच ऐवजी चाळीस विहीरी झाल्या होत्या, स्थलांतर करण्याऐवजी गावातच राहून वर्षाला दोन पिके काढायला सुरूवात झाली होती. पुरूषांनी दोन मुले झाल्यानंतर नसबंदी करून घेतली होती. एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली नव्हते. आणि वनव्यवस्थापनाच्या पुरस्काराच्या रकमेतून गूळ निर्मितीसाठी गुऱ्हाळ सुध्दा गावाने सुरू केले होते. हे सगळे होऊनही बारीपाड्याची कुठेही प्रसिद्धी नव्हती.

पुढच्या २४ वर्षात बारीपाड्याने विकासाचे अनेक पल्ले ओलांडले, नवे मापदंड निर्माण केले. भोवतालच्या ५०हून अधिक गावांना सामुदायिक वन हक्क मिळवून द्यायला मदत केली आणि तिथल्या वनसंवर्धनात मोठ्या भावाची भूमिका घेतली. अनेक पुरस्कार मिळाले. गावाची कीर्ती दुमदुमली. या सर्वांबद्दल आता गूगल वर शोधलंत तरी खूप काही वाचायला, पहायला मिळेल.

मला काही वेगळं या निमित्ताने सांगावंसं वाटतंय्…   बारीपाड्याबद्दल नाही, या चैत्राम नावाच्या माणसाबद्दल.

तुम्ही त्यांच्या तोंडून बारीपाड्याचा विकास प्रवास ऐकलात, तर असं वाटतं की हा माणूस या प्रवासात फक्त साक्षीभावानंच होता. ज्या ज्या लोकांनी थोडीशी का होईना बारीपाड्याला मदत केली असेल, त्या प्रत्येकाचं नाव घेऊन हे श्रेय त्यांचे – असेच चैत्रामभाऊ सांगतात. आणि यात काहीही चतुराई वगैरे नसते, हे अतिशय प्रांजळपणे आणि निर्व्याज मनाने ते सांगत असतात. डॉ. आनंद फाटक, डॉ. श्री. य. दफ्तरदार यांची प्रचंड गुंतवणूक आणि मार्गदर्शन बारीपाड्याच्या प्रयोगांत होते. त्यांचे नाव चैत्रामभाऊ घेतातच, पण त्यापुढेही अशी कित्येक माणसांची नावे येतात, की ज्यांच्या हे गावीही नसेल की आपल्या किरकोळ भूमिकेलाही या माणसाने मोलाचं मानलं आहे. ‘मी तो हमाल भारवाही’ ही भूमिका इतक्या सच्चेपणाने जगताना मी कोणाला पाहिलेलं नाही.

एक उपजिल्हाधिकारी मला म्हणाले होते, हा माणूस इतका निरहंकारी आहे, हा खरंच नेता आहे का? 

दुसरा गुण सांगावा तर असा की, गावातली इतर घरं आणि यांचं घर यात काहीही मोठा फरक नाही. मी अनेक आदर्श गावांचे नेते पाहिलेत, त्यांची घरं आणि त्यांच्याभोवतीचं वलय पाहिलं आहे. इथे असं काही वलय नाही. गावात वावरताना चैत्रामभाऊ आणि गावातले इतर कोणीही सारखेच वावरतात. वयाने वडील माणूस सहज चैत्या म्हणून हाक मारतो.

बारीपाड्यात आमच्या जव्हारच्या गावातल्या कार्यकर्त्यांची सहल घेऊन गेलो होतो. तेव्हाच्या गावात शिरल्यावर पहिल्या प्रतिक्रिया अशा होत्या – अरे यांची घरे तर आपल्यापेक्षा लहान आणि अगदीच साधी दिसतायत. इथे काय बघायला आलो आपण? आणि पुढच्या काही तासांत या प्रतिक्रिया बदलत गेल्या. अरे, यांच्याकडे वर्षभर शेतीला पाणी आहे, जंगलात वारेमाप साग आहे, इथून माणसं बाहेर कामाला जात नाहीत, पिकं तरी किती? 

बारीपाड्याला विकासाची वेगळी दृष्टी आहे. अस्सल भारतीय, स्वतःत समाधान मिळवणारी दृष्टी. स्वयंपूर्ण, स्थिर, शांत जीवनाची दृष्टी. हीच विशेषणं चैत्रामभाऊंची आहेत.

जे अस्तित्वात असतं, ते सत्य – म्हणजे उलटं करून सांगायचं तर – ‘सत्य असतंच!’ ते सांगावं, घडवावं लागत नाही. चैत्रामभाऊंच्या जगण्यात, बारीपाड्याच्या विकासात – ते सत्य आहे.

आताच्या जगातला झगमगाटाचा पडदा दूर सारला, की ते सत्य दिसतं. ईशावास्योपनिषदातली हीच प्रार्थना आहे.

तसं सत्य सहज जगण्यात सापडलेला माणूस ते सांगायला, प्रचारायला धडपडत नाही. चैत्रामभाऊंचं कुठे भाषण ठेवायचं म्हटलं की पंचाईत असायची. कारण यांचं भाषण २-३ मिनिटात संपायचं. त्यामुळे मुलाखत ठेवायची, म्हणजे जितके प्रश्न येतील तितकी उत्तरं यायची. बरं त्यात एकदाही, चुकूनही ‘मी’ येत नाही, ‘आम्ही’ सुद्धा येत नाही, सतत ‘आपण’ असतो. ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यात घेतलेलं असतं. तुम्ही काही केलं नसलंत, तरी तुमच्या सदिच्छा आम्हाला उपयोगी पडल्याच – अशी सच्ची भावना असते.

यापुढेही मला वाटतं की, एखाद्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्या नावापुढे पद्मश्री लावून लोक बोलू लागले, की चैत्रामभाऊ बसल्या खूर्चीतच अवघडतील. आणि कधी एकदा मी खाली उतरतो आणि मातीवर पाय टेकतो अशी भावना स्पष्ट दिसेल.

“आपल्याला सगळ्यांना पद्मश्री मिळाली आहे” असं वाटून घेण्याचाच हा क्षण आहे! अभिनंदनाचे लेख-पोस्ट काही लिहीले तरी तो माणूस काही अंगाला लावून घेणार नाही!

लेखक : श्री मिलिंद थत्ते

 Phones: +91. 9421564330 / Office: +91. 253. 2996176

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा☆ श्री जगदीश काबरे ☆

अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च हा आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हाच स्टिफन हॉकिंग यांचा मृत्यूदिन! 

हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरेतर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु या सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाचा फरक असा की, जनसामान्य आयुष्याच्या रेट्यात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात; तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो.

पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.

स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्याच्यावर अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे त्याला व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेला आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.

अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. ‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आदीवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की, परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,’’ असे हॉकिंग म्हणत. याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण आणि तर्क. धर्म आणि विज्ञानाच्या या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बदल हाच आहे स्थायीभाव…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “बदल हाच आहे स्थायीभाव…☆ श्री जगदीश काबरे ☆

मित्रांनो, आपले आयुष्य म्हणजे एका तळ्यातील साचलेल्या पाण्यासारखे आहे. त्यात जर कोणी एक दगड फेकून मारला की, ज्या प्रमाणे पाण्यावर तरंग निर्माण होतात, तसे काम विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात आज करत आहे. त्यामुळे आपल्या थांबलेल्या शांत आयुष्यात लगेच बदल घडायला सुरु होतो. असे रोज नवनवीन दगड पडत आहेत. ज्या ज्या वेळी नवीन दगड पडणार त्या त्या वेळी तुम्हाला मला बदलावेच लागणार आहे. आपल्याला नवीन अपडेट ज्ञान घ्यावेच लागणार आहे. तुम्हाला आणि मलाही कामाची नवीन पद्धत आणावीच लागणार आहे. तुम्हाला-मला नवनवीन कौशल्य आत्मसात करावेच लागणार आहे. तुम्हाला-मला आपली प्रवृत्ती बदलावीच लागणार आहे. यातून एक गोष्ट नक्कीच होणार आहे… ते म्हणजे आपल्याला सातत्याने बदलावेच लागणार आहे. कारण हा दगड पडण्याचा कार्यक्रम बंद होणार नाही. विज्ञान सतत नवनवीन दिशेने भरारी घेत रहाणार आहे.

यामुळे झालेय काय की, अनेक लोक आपल्या भविष्याबद्दल भयभीत होत आहेत. “माझे पुढे कसे होणार?, माझ्या मुलांचे कसे होणार? माझ्या आयुष्याचे काय होणार? काही थोडकेच जण असे आहेत की, जे त्यांच्या आयुष्यात शांत आहेत, आनंदी आहेत. बाकी मोठ्या प्रमाणात अशी लोकसंख्या आहे, जी आपल्या भविष्याबद्दल भयभीत आहे, प्रचंड तणावाखाली आहे. अनेक लोक तर या विचारात आहेत की, हे जे झपाट्याने बदल होत आहेत हे सर्व आम्हाला कसे झेपणार?

प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे.  विज्ञान-तंत्रज्ञानातील हे बदल रोज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम घडवून आणत आहेत. आजूबाजूला जे झपाट्याने बदल घडत आहेत त्यामुळे अनेक नवीन गोष्टी तुमच्या-माझ्यावर आदळत आहेत. यामुळे एक खूप मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास हरवत आहे. या अशा अशांत वातावरणाने आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. माणसे प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.

मागील २०० वर्षात जितके शोध नाही लागले तितके शोध मागील ५ वर्षात लागले आहेत आणि हा प्रत्येक शोध आपल्या आयुष्यात अशी घुसखोरी करत आहे की, आपल्याकडे थांबून पाहायला वेळच नाही. माझे पुढे काय होईल? या अशा विचारांचा गोंधळ, सातत्याने वाढत जाणारी भीती, या सर्वाचा परिणाम म्हणजे आपण आत्याधुनिक साधने तर वापरू लागलो आहोत; पण विचारांनी मात्र अजूनही 400 वर्षे मागेच आहोत. म्हणूनच आपल्या आयुष्यात गोंधळ उडालेला दिसतोय. यावर उपाय एकच… जेव्हा आपण विवेकाने वागायला शिकू, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायला शिकू, प्रत्येक घडणाऱ्या घटनेतील कार्यकारणभाव शोधायला शिकू, अंधश्रद्धेतून मुक्त होऊ, नवीन ज्ञान आत्मसात करायची जिगीविषा बाळगू, तेव्हाच या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या भारारीला कवेत निश्चितपणे घेऊ शकू.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

खजिना.

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना, समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल.

भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री. ’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss” या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“ भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..! ”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस. ”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने, काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला. ”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी, ’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

वसंत ऋतु सुरू झाला की निसर्गाचे रूप पालटायला लागते. सध्या रस्त्यावरून जाताना सहज दिसणाऱ्या झाडांकडे बघा. पानगळं झालेली आहे.

आता नवीन.. नाजूक.. अलवार.. अशी पानं झाडांना अक्षरशः लगडलेली आहेत. हे दृष्टीसुख जाता जाता तुम्हाला मिळेल….

वसंत उत्सव सुरू झालेला आहे.

काहीं पानांचा रंग अजून लालसर आहे. पानं तलम नाजूक आहेत. हळूहळू रंग हिरवा होत जाईल. या हिरव्या रंगाच्या निसर्गात इतक्या असंख्य छटा दिसतात…. त्या बघून आपण थक्क होतो.

फुलं तर बघण्यासारखी असतातच. पण कोवळी पानं पण डोळ्यांना सुखावतात.

त्यावरून हळूच हात फिरवून बघा. लहान लेकराच्या जावळातून हात फिरवल्यासारखं वाटतं.

चाफा आता चहुअंगाने फुलून येतो. त्याच्या शुभ्र फुलांची कधी पिवळ्या धमक रंगांची तर कधी लालसर रंगाची उधळण हिरव्या रंगातून चालू असते. एखाद्या भल्या मोठ्या पुष्पगुच्छा सारखे हे झाड दिसत असते.

बोगनवेल बिचारी दुर्लक्षित.. तिचं व्हावं तेवढं कौतुक होत नाही. पण ती बघाच…

केशरी, लाल, पिवळ्या.. पांढऱ्या रंगात ती रस्तोरस्ती नटलेली दिसते.

संपूर्ण झाडाला लगटून वर वर जाते.

डेरेदार गुलमोहर त्याच्या नाना रंगात सजलेला आहे. त्याच्याकडे पाहून आपल्याच मस्तीत दंग असलेले हे झाड आहे असे मला वाटते…

आंब्याला मोहर लागलेला आहे.

त्याचा एक धुंद मधुर असा वास वातावरणात पसरलेला आहे. त्याची मऊसर पानं लक्ष वेधून घेतात. गुढीपाडव्यापर्यंत ती तयार होतात.. मग दाराला तोरण करण्यासाठी ती काढली जातात.

खरंतर अनेक वृक्षांची, फुलांची नावे पण आपल्याला माहीत नसतात. त्यांच सौंदर्य बघावं आणि निसर्ग राजाला सलाम करावा.

बहाव्याच्या पिवळ्या धमक सोनसळी रंगाचं फार सुंदर आणि समर्पक वर्णन श्रीयुत मंदार दातार यांनी केलेले आहे.

” इतके सारे सोने मजला

 अजून पाहणे झाले नाही

 अमलताशच्या जर्द फुलांनी

 असे नाहणे झाले नाही “

विशेष म्हणजे ऋग्वेदातही त्याचे वर्णन आले आहे. त्याला राज वृक्ष असे संबोधले आहे.

जांभळी, निळी, गुलाबी अशी अनेक छोटी-मोठी फुलं आसपास दिसतात.

खरतर इतक्या छोट्या लेखात त्यांचं वर्णन करणच अशक्य आहे….

प्रत्यक्षच बघा…

घंटेची फुलं पिवळ्या रंगाची असतात. अगदी सकाळी गेलं तर एखादा गालिचा अंथरावा तशी झाडाखाली पसरलेली असतात. गच्च हिरव्या पानांनी झाडही मोहक दिसत असते.

लाल फुलं असलेलं नागलिंगाचं झाड उंच उंच वाढते. त्याच्या खोडावर ही फुलं उगवतात. त्याचा सुवास झाडाखाली उभं राहिलं तरी येतो. बाहेरचा पांढरा भाग बाजूला केला की आत पिंडीचा आकार असलेलं लिंग दिसते.

झाडाखाली या फुलांचा सडा पडलेला असतो. त्यातील दोन उचलून बघा. मादक असा गंध त्या फुलांना आहे. कमला नेहरू पार्कच्या दारातच हे झाड आहे.

अनेक फांद्या.. पारंब्या यांनी लगडलेलं मोठ्ठं वडाचे झाड मला तर एखाद्या प्रेमळ मायाळू आजोबांच्या आणि त्यांच्या समस्त परिवाराचे चित्र आहे असंच वाटतं. वसंत ऋतूत त्यांच्या पानांना तजेलदारपणा आलेला असतो. अनेक पारंब्यांना खंबीरपणे आधार देऊन ठामपणे उभं असलेले हे झाड शांतपणे एकदा न्याहाळून बघा…. त्याचे अनेक अर्थ मनात उलगडत जातात….

ही झाडे एकटी नसतात. अनेक पक्षी त्यांच्यावर घरं करतात. त्यांचा किलबिलाट चालूअसतो. झाडाखाली उभं राहिलं की तो आपल्याला ऐकू येतो. चैतन्याची विलक्षण अशी अनुभूती अशावेळी येते.

फुलांनी, फळांनी लगडलेलं झाड बघुन मला तर.. सर्व अलंकार घालुन, जरतारी वस्त्र लेऊन एखाद्या वैभवसंपन्न घरंदाज स्त्रीच रूपच त्याच्यात दिसतं…

खरंच आपल्या डोळ्यांना, मनाला रिझवायला, शांत करायला निसर्ग राजा नाना रुपात अनेक रंगात आसपास सजला आहे.

आपण त्याच्याकडे पाहतच नाही.

उद्या एकमेकांवर रंग टाकून त्याची मजा घ्या…

तसाच निसर्ग विविध रंग आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ते पण जरूर बघा

खूप लांब जाऊन हे पहा ते पहा असं करण्याच्या नादात जवळच असलेल्या या अलौकिक सौंदर्याकडे आपलं लक्षच जात नाही.

एक सांगु…. एकदा बघायला लागलं की ती नजर आपोआप तयार होते.

 बघायला सुरुवात तर करा…

 खरंच थांबावं थोडं झाडाजवळ..

बघाव त्यांच्याकडे.. निशब्द शांततेत…. ते बोलतात सांगतात ते ऐकू येत…

…. मायेनी स्पर्श करावा खडबडीत खोडाला.. वयस्कर माणसाच्या पायाला स्पर्श करतो तसा.

आशीर्वादच मिळेल…

आणि अखेर आपलं जीवनच त्यांच्यावर अवलंबून आहे हे कधी विसरायचं नाही.

फळा फुलांनी गच्च भरलेली झाडं बघून कृतज्ञता म्हणून तरी नमस्कार करायचा..

– – – निसर्ग रूपात अवतीर्ण झालेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेट टुगेदर…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गेट टुगेदर… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा, अचानक ओळखीचा आवाज आला खूप वर्षानंतर…

चेहऱ्यावर औदासीन्य पसरलेलं.. थरथर कापत काप-या आवाजात भयकंपीत झालेल्या एका मुलीने आवाज दिला, “ ए ओळखले का मला..? “ 

मी अंदाज घेऊन म्हणालो, “ अरे, तू तर ‘लोकशाही’ ना..! “

असे म्हणताच, तिच्या चेह-यावर मंद स्मित उगवले…. सूर्यासारखे….!

“ खूप वर्षे झाली ग, अंदाज चुकू शकतो… “

“ नाही रे, तू अगदी बरोबर ओळखले… “ ती म्हणाली…

मी.. “ पण तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था.. मग कोणी केली तुझी अशी ही अवस्था….

आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी.. मानवता, संवेदनशीलता अन् ती सहिष्णुता….? “

“ होय रे, ‘सहिष्णुता’ पुर्वी भेटायची, सर्वांची चौकशी करायची… पण हल्ली दिसत नाही रे.. सत्याची बाजू घेतली म्हणून तडीपार केले म्हणतात तिला.. ‘क्रांती’ सर वर्गशिक्षक होते…. तोपर्यंत सगळं ठिकठाक होते…

विद्रोह, प्रज्ञा व ‘संघर्ष’ हे सुद्धा होते.. बरं, ते जाऊ दे… “ – ‘लोकशाही’ म्हणाली.. “ माझी “मूल्ये” कशी आहेत रे….! . “न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता”… “

“ अगं, ते तरी कशी असणार..! पुर्वी “न्याय” भेटायचा कधीकधी, तो परमनंट नाही झाला अजूनही..

कॉन्ट्रॅक्चूअल वर काम करतो… “

“ बरं ‘समता’ आणि ‘बंधुता’ च काय..? “

“ ‘समता’ तर इतिहासात फेल झाली होती… पण मुळात ती विषमतेच्या मगरमिठीत आहे.. “

“ आणि बंधुता कशी आहे..? “

“ अॕज इट इज…! अगं, ‘संविधान’ अन् तुझी अॕडमिशन एकाचवेळी झाली न.. कसा आहे ग तो…..? “

“ काय सांगू तो तर जगातील सर्वात प्रज्ञावंत विद्यार्थी.. संविधानामुळेच तुझी माझी ‘अस्मिता’ आहे..

खरं आहे रे ‘संविधान’ सोबत असलेले ‘समंजस’, प्रगल्भता आणि ‘व्यापकता’ यांनीच तर आपल्या वर्गाला एका सूत्रात बांधून ठेवले.. म्हणून तर ‘मानवता’ निर्माण झाली होती… आपल्या वर्गात… पण ‘फॕसिझम’ ची अॕडमिशन झाली आणि त्याने वर्गात विभाजनाचा प्रयत्न केला.. पण तो ‘षडयंत्र’ त्याच्या आवडीचा विषय 

तुला ‘विद्वेष’ आठवतो का..? जो नेहमी अबसेंट असायचा.. तोच आज मेरीट आहे.. आज त्यालाच लौकिक प्राप्त झाला आहे.. अरे आणि तेव्हा ‘संवेदनशीलता’, ही होती… प्रत्येकाच्या मनात जिवंत… ‘विद्वेष’ ने केला तिचा एनकाऊंटर.. तीच तर आहे खरी खंत… “अभिव्यक्ती” कशी आहे रे…. आपण जिला “मिडिया” म्हणायचो…? “

“ तिचीही अवस्था खराब आहे अगं, तिच्या गळ्यातील स्वरयंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने ती ‘सत्या’ ची बाजू न मांडता, ‘सत्ते’ चे गाणे गात असते.. ती आता तटस्थ नाही राहिली.. “

“ अरे आणि तुला आठवते का… आपल्या वर्गात एक होती ‘निष्ठा’, “

“ हो ग… तिच्यावरच तर अवलंबून होती सर्वांची ‘प्रतिष्ठा’…. पण सध्या… ‘निष्ठा’ सुध्दा “अर्थ ” शास्त्राला सरेंडर झाली.. आणि ‘एथिक्स’ मध्ये फेल झाली.. असे ऐकले.. “ मी म्हणालो.

“ आणि हा ‘फॅसिझम’ कोण ग…? “

लोकशाही म्हणाली, “ तो बघ ‘प्रतिक्रांती’ च्या टीममध्ये होता.. नेहमी अवैज्ञानिक, तर्कविसंगत.. गोष्टी करायचा.. दंतकथांना इतिहास मानायचा.. अन् खरं म्हणजे ‘अंधश्रद्धा’ ही त्याची पक्की मैत्रीण होती.. “

“ हो ग..! , ती काही बदलली का येवढ्या वर्षात..? “

“ नाही रे.. अजून तरी नाही.. मला वाटते, ती बदलली असती पण तिने ‘विवेका’ शी असलेली मैत्री तोडली

त्यामुळे ती नेहमी अविवेकी, अतार्किक वागते… बरं… , ‘मनु’ कसा आहे..? “

“ होता तसाच आहे… अग, तुला आठवते का..? आपल्या वर्गात ‘आपुलकी’ ‘नितिमत्ता’ होती…

 फार प्रेमळ तिची “भावना” होती. परस्परांच्या भावनांची कदर करायची.. त्यामुळे “प्रज्ञा” सुध्दा त्यांचा आदर करायची.. संघर्ष’ आणि ‘विद्रोह’ ते सातत्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे… ते दोघेही नेहमी ‘क्रांती’ च्या सोबत असायचे… पण आजकाल सगळे कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत.. फोन लागत नाही त्यांना.. ”

“ “करुणा” लाही फोन करून बघशील बरं… ‘विद्या, शिल’ आणि ‘मैत्री’ सुध्दा भेटले तर सांग त्यांना. ” 

“ अगं, मला ‘विकास’ भेटला होता… मी कुतूहलाने त्याला म्हणालो.. ”अरे, किती बदलला तू… अग, तो ‘वाढ’ लाच विकास समजत होता… तो अंगात खूप फुगला…. पण ती फक्त ‘वाढ’ होती… विकास “अंतर्बाह्य” असतो… तो गुणात्मक असतो ना.. “

“अरे, समजेल त्याला कधी ना कधी… “

“ पण तोपर्यंत…. काय….? ”

“ बरं, आणि ‘अहंकार’ कसा आहे. रे…? ‘अहंकार’ आणि ‘स्वाभिमान’ दोघेही दिसायला सारखेच दिसत होते रे.. माझे नेहमी कन्फ्युजन व्हायचे.. “

“ नाही ग… त्याच्या सोबत नेहमी ‘नम्रता’ असायची व “स्वाभिमान” सोबत ती एकाच बेंचवर बसायची….

तो ‘स्वाभिमान’…! ‘स्वाभिमान’ ला ही बोलावू म्हणतो… “

“ अर्थातच, तो तर कणा आहे.. आपल्या टिमचा… त्याच्या शिवाय ‘चळवळ’ येणार नाही… “

“ बरं ‘चळवळ’ कशी आहे रे…? “ 

“ कोणती चळवळ..? शोषकांची…! की, शोषणमुक्तीची…! की मानवमुक्तीची..! तुला खरं सांगु का.. जेव्हा आपल्या गृपमधून ‘निष्ठा’ गेली.. अन् “तृष्णे”‘ ची अॕडमिशन झाली… तेव्हा पासून ‘चळवळ’ कणाहीन झाली… तिची परवड सुरू झाली… बघ ना ‘त्याग’ व ‘समर्पण’ ची जोपर्यंत ‘निष्ठे’ सोबत मैत्री होती 

तोपर्यंत ‘चळवळ’ गतिमान होती.. खरं तर तीच तर आपल्या अभिमानाची खाण होती.. “

“ हं.. आणि “करुणा” बद्दल काय…? ”

“ करुणा म्हणाली, ‘समता’ आली तरच मी येईल.. तिच्याशिवाय..

निर्हेतूक मैत्री होती…. तेव्हाच तर खरी खात्री होती…. “

“ अरे आपल्या वर्गात ‘विश्वास’ होता… “

“ होय.. तोच तर जगण्याचा खरा ‘श्वास’ होता.. “

“ आणि काय रे.. अरे, ती प्रतिक्रांती काही बदलली का..? बरं, तिची मूल्ये विषमता, भीती, अविद्या

बरी आहेत ना..! “

मी म्हणालो, “ लोकशाही, तु सगळ्यांची चिंता करतेस.. “

“ नाही रे…. आपली ‘संस्कृती’ मानवतावादी आहे ना… विचारांचा फरक जरी असला, मतभेद असले तरी आपले त्यांच्यावर प्रेम आहेच.. शेवटी ते सर्व आपले वर्ग मित्र आहेत.. “

लोकशाही म्हणाली, “ होईल रे… सगळं बदलेल.! . तुला आठवतो का…. आपल्या वर्गातला ‘परिवर्तन’ 

तो पूर्वी ‘प्रस्थापित’ सरांची बाजू मांडायचा.. माझ्याशी जोरजोरात भांडायचा.. एक दिवस तो स्वतः ‘विस्थापित’ झाला… अन् त्याच्या विचारात, आचारात.. अचानक.. बदल झाला. आज तो प्रतिगामीत्व नाकारतो, विस्थापितांच्या समस्यांवर बोलतो.. लिहितो.. प्रहार करतो.. आता तर त्याने ‘पुरोगामी’ विषयात ‘पीएचडी’ केली.. अन्यायाविरुद्ध पेनाला धारधार करतो. “

“परिवर्तन होत असते रे… फक्त आपल्या सोबत ‘प्रबोधन’ असला पाहिजे… तोच एकमेव मार्ग मला दिसतो…. हे सगळे आपले वर्गमित्र भेटले तर सांग त्यांना “

मी म्हणालो, “ काय सांगू.. “

‘लोकशाही’ म्हणाली, “ गेट टुगेदर करू म्हणते.. “

“ कुठे..? “

“सेक्युलर” ग्राऊंडवर… “

“पण नियोजन कोण करणार.. ”

“भारतीय नागरिक सर…! “

“ अग,… पण गेट टुगेदर कशासाठी…? “

“ सर्वांच्या मनाची पुनर्रचना करून हे जग पुन्हा सुंदर करण्यासाठी रे..! ! “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पूनम गुप्ता” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पूनम गुप्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

पूनम गुप्ता 

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत!

वर्ष होतं २०२३. दिवस होता भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन… २६ जानेवारी! राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर सेन्ट्रल रिझर्व पोलिस फोर्समधील महिलांची एक सुसज्ज तुकडी मोठ्या डौलात, दिमाखात आणि आत्मविश्वासाने मार्च करीत पुढे निघाली होती. ही जगातील पहिली सशस्त्र महिला पोलिस बटालियन…. CRPF…All Women Armed Police Battalion!

भारताच्या राष्ट्रपती महोदया आणि तीनही सेनादलांच्या सेनापती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू सलामी स्वीकारण्यासाठी उभ्या होत्या. पाहता पाहता ही तुकडी सलामी मंचासमोर आली. या तुकडीचे नेतृत्व करणा-या तरुण, रुबाबदार महिला प्रमुखाने उजव्या हातात समोर धरलेल्या तलवारीची मूठ आपल्या मुखासमोर नेली आणि आपल्या तुकडीला अत्यंत आवेशाने आदेश दिला…. दहिने देख! दुस-याच क्षणी आणि तिने आपल्या हातातल्या तलवारीचे टोक सेनापती महोदयांच्या सन्मानार्थ जमिनीच्या दिशेला केले. आपल्या सेनापतींना मानाची सलामी देत ही तुकडी पुढे मार्गस्थ झाली! या तुकडीचे नेतृत्व करीत होत्या असिस्टंट कोमांडंट पूनम गुप्ता. या तरुण, तडफदार अधिकारी मूळच्या ग्वाल्हेर (Gwalior) येथील शिवराम कॉलनी, शिवपुरी इतल्या निवासी आहेत. त्यांचे पिताश्री रघुवीर गुप्ता हे तिथल्या नवोदय विद्यालयात Office Superintendent पदावर कार्यरत आहेत. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून सोबतीला इंग्रजी साहित्यातही त्यांनी पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. शिवाय बी. एड. पदवी प्राप्त करून त्या शिक्षिका होण्याच्या बेतात होत्या. परंतु त्याच्या नशिबाने अचानक मार्ग बदलला… त्या २०१८ च्या UPSC CAPF परीक्षेस त्या प्रविष्ट झाल्या आणि त्यांनी ८१वा क्रमांक पटकावला… त्या आता Assistant Commandant झाल्या होत्या! त्यांना बिहार मधील नक्षल-प्रभावित भागात कर्तव्यावर पाठवण्यात आले. तेथे त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सैनिकी संचालनात त्यावर्षी सर्व महिला सदस्य असलेली तुकडी समाविष्ट करण्यात आली होती. आणि या तुकडीचे नेतृत्व करण्याचा बहुमान पूनम गुप्ता यांना प्राप्त झाला!

योगायोगाने काहीच दिवसांत पूनम गुप्ता यांना राष्ट्रपती भवनात नेमणूक मिळाली ती राष्ट्रपती महोदयांची Personal Security Officer या मोठ्या जबाबदारीच्या पदावर. आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष परंतु मितभाषी स्वभावाने, सुसंस्कृत वागणुकीने आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करू शकण्याच्या क्षमतेमुळे पूनम यांनी सर्वांची मने जिंकून घेतली… विशेषता: महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या नजरेत त्या भरल्या! आपले कर्तव्य सांभाळून पूनमजी महिला सबलीकरण करण्याच्या कामांत आपला वाटा उचलीत आहेत. महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्या प्रेरक संदेश त्यांच्या सोशल मिडीया वरून नियमित देत असतात. त्या अनेक मुलींच्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.

आनंदाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पूनम गुप्ता यांचा विवाह जुळला… त्यांचे नियोजित पती श्री. अवनीश कुमार हे सुद्धा सैनिक अधिकारी असून सध्या जम्मू-कश्मीरमध्ये CRPF Assistant Commandant पदावर नियुक्त आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला हे लग्नबंधनात बांधले जाणार आहेत… पण खरी गोष्ट तर पुढेच आहे!

हा विवाह सोहळा चक्क राष्ट्रपती भवनात साजरा होणार आहे. आणि प्रमुख आयोजक आहेत महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू! आजवरच्या इतिहासात राष्ट्रपती भवनात साजरा होणारा हा पहिलाच विवाह सोहळा ठरणार आहे! पूनम गुप्ता या खरोखरीच नशीबवान ठरल्या आहेत. आणि हा अलौकिक निर्णय घेणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांचे कौतुक करावे तेवढे अपुरेच ठरेल… जणू त्यांनी एका महिला सैनिक तरूणीला आपली कन्या मानले आहे… आणि त्यांच्याच प्रासादात त्या हा मंगल सोहळा घडवून आणणार आहेत. आपण केवळ राष्ट्रप्रमुखच नसून भारत देश नावाच्या एका विशाल कुटुंबाच्या प्रमुखच आहोत हेही त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे! जयहिंद, Madam President! अभिनंदन पूनम गुप्ताजी.. अभिनंदन अवनीशजी! नांदा सौख्यभरे!

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

अध्यात्मिक रंग होळीचा…

एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की “मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी…“

…. हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली… ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की ….

“मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… “ 

हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवूनही देत होता.

असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला “ माझेही एक वस्त्र रंगवून हवे आहे. ” 

भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, “ दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? “

तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… “ त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल.. पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल.. पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून ” जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा “… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तू नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….

उसी रंग में रहना रे बंदे,

उसी रंग में रंगना….

जिस रंग में परमेश्वर राखे,

उसी रंग में रंगना….! ! !

होळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! ! ! 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares