मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आमचे काका ति स्वः दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मितल्या,ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या  शूरवीरांच्या कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता- ऐकतांना प्रसंग डोळ्या समोर  उभा राहयचा.लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली,  अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे; श्री कर्णिकांची.  पुण्यातल्या श्री तांबडी जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता,..थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडुशेट   गणपती   मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे नां ! तोचं तो रस्ता.  त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दिपस्तंभ अजूनही कित्येक वर्षाचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे. आणि त्यावर नांव कोरलय” –भास्कर दा.कर्णिक.–   कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठ बलिदान केलंआहे . पण=पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावांची ही निशाणी?      श्री कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श -त्यांचं बलिदान, त्यांच नांव आपण मनांत जागवूया. श्री.भास्कर दा.कर्णिक ऑडिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व . त्या काळचे १९४० -४२ सालचे उच्च पदवी विभूषित  असलेले हे धडाडीचे तरुण,देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनांत विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तिथलीच  सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब   तयार केले.    थोडे  थोडके नाहीं तर अर्धा ट्रॅक भरून बॉम्बची सज्जता  झाली. आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना  देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांव सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे श्री दिक्षित श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय देवीच्या मंदिरातही हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबतं होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले.  पण — पण हाय रे देवा ! कसा   कोण जाणे! दुर्देवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारासह श्री कर्णिक पकडले गेले.      फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं, आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे नां ?तीच ती जागा!.पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण.. पण श्री कर्णिक, मुख्य आरोपी म्हणून, डाव फसलयामूळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं .. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजुला गेले. क्षणार्धात… क्षणार्धात.. खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते,.. ते कोसळले…. आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग -केला.  तर मंडळी असा  आहे त्या पायरीचा इतिहास…..  मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी,हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय.   मध्यंतरी बराच काळ गेला  आहे .भास्कर दा.  कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत.त्यामुळे आतां – -हया हुताम्याचाही दुर्देवाने  पुणेकरांना विसर पडलाय.    संपली श्री भास्कर दा. कर्णिक  यांची  कहाणी . ज्यांना ही कथा माहित आहे. ते दगडूशेठ गणपती मंदिरातून बाहेर पडतात. डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात. क्षणभर विसावतात. आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. 

कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तू सध्या उपेक्षित ठरलीय.  कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.  स्तंभावरील अक्षरे पण  पुसट झाली आहेत. तरीपण आपण श्री कर्णिकांच्या शौर्याला स्मरून,ह्या हुतात्म्याची आठवण म्हणून, स्तंभापुढे नतमस्तक होऊयात का ?      

धन्यवाद ..       

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला ,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाई,पर्यंत काम आलं.मग ते घरचं असो नाहीतर दारचं.

बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात.

75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजीतरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….

ही सत्य परिस्थिती आहे…..

आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो,ती मरेपर्यंत करावी लागणार.

ज्या किराण्याचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार.

‘मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील. मग माझे कष्ट कमी होतील.’ ही खोटी स्वप्नं आहेत.

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी,”आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तूच बनव,”असं म्हटलं की,झालं पुन्हा सगळं चक्र चालू.

 

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यू .

 

पण..पण ..जर हे असंच राहणार असेल,जर परिस्थिती बदलू शकत नसेल, तर मग काय रडत बसायचं का?

तर नाही.

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं.

 

मी हे स्वीकारलंय. खूप अंतरंगातून आणि आनंदाने.

 

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते. खूप ऊर्जा आणि ऊर्मीने भरलेली.

 

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही.

आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत.दुसरा दिवस हा नवाच असतो.

काहीच नाही लागत हो,

हे सगळं करायला .

रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा.

छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या.आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा.

आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या.

इतकं भारी वाटतं ना!अहाहा!

सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा.

अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला,ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पित खिडकीबाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना,

की भारी वाटतंं!

 

रोज मस्त तयार व्हा.

आलटून पालटून स्वतःव र वेगवेगळे प्रयोग करत राहा.

कधी हे कानातले,कधी ते गळ्यातले.

कधी ड्रेस,कधी साडी.

कधी केस मोकळे.कधी बांधलेले.

कधी ही टिकली तर कधी ती.                                 

रोज नवनवीन साड्या. एक दिवस आड केस मोकळे सोडलेले.स्वतःला बदला. जगाला घेऊन काय करायचं आहे!दुनियासे हमें क्या लेना? तुम्ही कसेही रहा, जग बोंबलणारच.

सगळं ट्राय करत रहा.नवं नवं. नवं नवं.

रोज नवं.

रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे.

 

स्वतःला बदललं की, आजूबाजूला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल .तुमच्याही नकळत.

आणि तुम्हीच तुम्हाला हव्याहव्याशा वाटू लागाल.

 

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात.काय माहीत काय झालंय त्या कानांना!

 

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते.

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते.

 

जे जसं आहे,ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत रहाते.

कुणी आलाच समोर की “आलास का बाबा?बरं झालं,” म्हणायचं.पुढे चालायचं.

अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची.

माहीत आहे मला.सोपं नाहीये.

पण मी तर स्विकारलं आहे.

आणि एकदम खूश आहे.

आणि म्हणूनच रोज म्हणते,

 

” एकाच या जन्मी जणू

फिरुनी नवी जन्मेन मी

हरवेन मी हरपेन मी

तरीही मला लाभेन मी”

लेखक :अज्ञात

 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाची फुले वाटणारे झाड… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

आनंदाची फुले वाटणारे झाड… ☆ श्री विश्वास देशपांडे

आज मी सांगणार आहे महाराष्ट्राच्या त्या लाडक्या व्यक्तिमत्वाबद्दल . ओळखलंच असेल तुम्ही. आपले ते भाई हो. म्हणजेच सर्वांचे लाडके पुलं . तर आज त्यांचे एक दोन किस्से सांगून  मी तुमची सकाळ आनंदी करणार आहे. पुलं म्हणजे मोठे साहित्यिक, गायक, वादक, संगीतकार, वक्ता. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पण अशी माणसं माणूस म्हणून सुद्धा किती मोठी असतात, ते दर्शविणारी ही घटना. मधू गानू यांनी पुलंना ‘ माणसांनी मोहरलेलं झाड . असं त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. ते खरंच आहे. कारण पुलंच्या घरी सतत गायक, वादक, कलाकार, साहित्यिक, त्यांचे चाहते इ चा सतत राबता असायचा. पण पुलं आणि सुनीताबाई न कंटाळता त्या सर्वांची सरबराई करत असायचे. जसं रानातलं एखादं चवदार आणि थंड पाण्याचं तळं असावं, आणि त्या तळ्यावर येऊन प्रत्येकानं आपली तहान भागवावी, तसे पुलंकडे येऊन प्रत्येकजण समाधानी आणि आनंदी होऊन जायचा. पण कधी कधी हे तळच तृषार्तांकडे आपण होऊन जायचं. एक प्रसंग घडला तो असा.

पुलं इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात वारणानगरची काही मुले येऊन आपली कला सादर करणार होती. पण काही कारणाने ती मुले संमेलनात येऊ शकली नाहीत. पुलंना हे कळले तेव्हा त्यांनी संमेलन आटोपल्यानंतर त्या मुलांच्या भेटीसाठी जाण्याचे ठरवले. आणि ते वारणानगरला गेले. जणू पुंडलिका भेटी परब्रह्म आले. त्यांना पाहिल्यावर मुलांचा आनंद गगनात मावेना.

एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, ” आम्हाला साहित्य संमेलनात आमची कला सादर करायला मिळेल असे वाटले होते. पण आम्हाला आमंत्रणच आले नाही. पण आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वतः आम्हाला भेटायला आले आणि आम्हाला खूप आनंद झाला. आता त्यांच्यासमोर आम्ही आपली कला सादर करू. पण आमची एक अट आहे. आमचा कार्यक्रम आवडला तर पुलंनी आम्हाला पेटी वाजवून दाखवावी. पुलंनी अर्थातच त्यांची ही अट मान्य केली.

आणि नंतर घडले ते सगळे अद्भुत ! मुलांच्या कलागुणांवर पुलं अफाट भाळले. त्यांनी मुलांना मग पेटी तर वाजवून दाखवलीच, पण त्यांना जे जे हवे ते सगळे केले. एवढे करून पुलं  थांबले नाहीत. त्यांनी त्या मुलांच्या कलागुणांचे कौतुक वर्तमानपत्रात लेख लिहून केले. शिवाय आपल्या पुढाकाराने त्या मुलांचा कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. मुलं  आणि पुलं  यांची झकास गट्टी जमली. मुलांचे ते आवडते ‘ भाईकाका ‘ झाले. असे होते पुलं . जेवढे साहित्यिक म्हणून मोठे, तेवढेच माणूस म्हणूनही.

एकदा पुलंच्या वाढदिवसाच्या दिवशी एक पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेला. काही प्रश्न विचारल्यानंतर ‘ तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता’ असे त्याने पुलंना विचारले. काही क्षण पुलं शांत होते. पत्रकाराला वाटले की बहुधा त्यांना काय सांगावे हा प्रश्न पडला असेल. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा क्षण इ पैकी कोणता सांगावा असा त्यांना प्रश्न पडला असेल. तो काही बोलणार तेवढ्यात पुलं म्हणाले, ‘ एकदा माजी पंतप्रधान इंदिराजी आपल्या मंत्रिमंडळासमवेत चर्चा करीत होत्या. त्या म्हणाल्या की आपल्या देशातले जे महान लोक होऊन गेले , त्यांचा सन्मान तर आपण टपाल तिकीट काढून करतोच, पण एखाद्या परदेशातील व्यक्तीवर तिकीट काढून त्यांचा सन्मान करावा असे वाटते. त्यांचे सहकारी म्हणाले की छान कल्पना आहे. कोणाचे नाव आपल्या डोळ्यांसमोर आहे का ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या जगाला हसवणाऱ्या आणि काही काळ का होईना पण आपले दुःख विसरायला लावणाऱ्या चार्ली चॅप्लिनवर तिकीट काढावे असे वाटते. ‘ वा. फारच छान कल्पना ! ‘ सहकारी म्हणाले.

तेव्हा एका मंत्र्याने विचारले की कोणाच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे आपल्याला वाटते ? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘ तो महाराष्ट्रातला पी एल आहे ना, लोकांना आपल्या नर्मविनोदाने हसवणारा, त्याच्या हस्ते हे तिकीट प्रकाशित करावे असे वाटते. ‘

पुलं  त्या पत्रकाराला म्हणाले , ‘ तो माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण ! ‘

एकदा पुलंना कोणीतरी तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार असे विचारले होते. तेव्हा पुलं म्हणाले, ‘ मी आत्मचरित्र लिहीन की नाही हे माहिती नाही, पण लिहिलेच तर त्याचे नाव ‘ निघून नरजातीला रमविण्यात गेले वय ‘ असे असेल असे सांगून टाकले. आपल्या साठ वर्षांच्या जगण्याचे मर्म अशा रीतीने पुलंनी एका ओळीत सांगून टाकले होते. असे हे आनंदाची फुले वाटणारे झाड..!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.” 

मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.

गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला. 

वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली  “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.

मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली. 

आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री गुंजन गोळे

? इंद्रधनुष्य ?

☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी नोकरी, मानसन्मान, पैसाअडका असं सगळं स्वप्नवत असताना अचानक नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल?…

कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल. 

पण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ म्हणतो आहे, ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे. 

पोलीस निरीक्षक पदाची नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’!

२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्याच दिवशी या नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे. 

गुंजनने अमरावतीत गवळीगड येथे महिला ढोल पथक सुरु केले आणि राज्यातील पहिले महिला ढोल पथक सुरू करण्याचा मान तिला मिळाला. या पथकात आज १५० महिला आहेत. 

तत्त्वज्ञानामध्ये एम.ए. केल्यानंतर गुंजनने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. युपीएससीमधील Combined Defence Services ची परीक्षा तिने दिली आणि ती उत्तीर्ण देखील झाली. त्यानंतर तिने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि तिने त्यातही यश मिळवलं. 

लहानपणी गुंजनने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आईवडील आणि तिच्या स्वतःच्या कष्टाचं चीज झालं. 

गुंजन पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाली. 

दिवसरात्र मेहनत करून मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने एक दिवस राजीनामा दिला…! आश्चर्य वाटलं ना? 

पण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता. 

एके दिवशी रात्री ड्युटी आटोपून घरी परतत असताना गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!

ते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. ती गाडीतून उतरली. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!

तिचा विचार पक्का झाला आणि अतिशय कष्टाने मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने राजीनामा दिला. आधीची पोलीस निरीक्षक गुंजन आता रस्त्यांवरील मनोरुग्ण, वयस्क, अनाथ आजी-आजोबा, मुले यांचा आधार झाली. 

आता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. ती अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी,  तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.

संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का? याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते. 

आजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण, कृष्टरोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे! दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत १४ वेळा तिने हे शिखर सर केले आहे. 

गुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या 

मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही. 

ज्याप्रमाणे पाच मुली दत्तक घेतल्या तशाच ५०० मुली दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते. 

या सर्वाची दखल समाज कुठेतरी घेत होता. ८ जानेवारीला तिला ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

तिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला ‘हिरकणी’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. 

गुंजनने आतापर्यंत २ वेळा राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला  मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखिका : सुश्री सुश्री गुंजन गोळे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मध्यमवर्गीय!… – लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मध्यमवर्गीय!… – लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मी मध्यम वर्गीय!

“नेहा ,  मी  आज दुपारी दादरला जाऊन येणारे…..” माझं  वाक्य पूर्ण व्हायच्या  आत नेहा म्हणाली, “आई, ओला,  उबेर किंवा टॅक्सीने  जा हं .. “

सोफ्यावर पेपर  वाचत बसलेला नवरा हसून  लगेच  म्हणाला,

“नेहा, ती मध्यमवर्गीय  आहे . ती  ट्रेन किंवा बसनेच जाणार.”

“अरे!साठी  उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते,  याचं  खरं  तर कौतुक करायला हवं  तुम्ही. माझी काटकसर  कसली बघता!” मीपण हसण्यावर  नेलं  ते .

“काहीतरी खायला करून ठेवीन .म्हणजे अथर्व शाळेतून  आल्यावर  त्याची पंचाईत नको व्हायला. “

“आई, अहो  एक दिवस आणेल की काही तरी पार्सल. बाबाही  एन्जॉय करतील. बर्गर किंवा  वडापाव . “

“नेहा , अबब! एवढाले  पैसे  खर्च करायचे ते जंक फूड खायला!तुझ्या मध्यमवर्गीय सासूला पटणार  का ? “नवऱ्याने  मला बोलायची संधी  नाहीच सोडली.

“बरं  चालेल. “असं  म्हणून मी  विषय संपवला.

मुलगा  त्याच्या बेडरूममध्ये अजूनही लॅपटॉपवर  काम करत होता.

“सुजित, आज ऑफिसला नाही जायचं?”

“अगं, आज गाडी गॅरेजमध्ये दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत  बसा?’वर्क फ्रॉम होम ‘करतोय.

बाय द वे,तू आज दादर ला कशासाठी जातेयस?”

आता याला ‘का जातेय’ हे सांगितलं,  तर परत माझ्या  मध्यमवर्गाचा  उद्धार  होईल. म्हणून मी  “काम आहे,” एवढंच  मोघम उत्तर दिलं.

पूर्वीच्या  आमच्या  दादरच्या  शेजारी मालतीकाकू, घराला हातभार लावायला , त्यांच्या  भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ  विकतात . दुकानातून  घ्यायचं, तर मी  त्यांच्या कडे जाऊन आणते.  तेवढीच त्या भावंडाना मदत .

पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं  जरा कठीणच.

म्हणून मी  सुजितला काही बोलले नाही.

दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे  आरामात ट्रेनने दादर  ला गेले.

इकडतिकडची विचारपूस केली.  गप्पा टप्पा केल्या. आणि चहा पिऊन बस स्टॉप वर आले.

याच्यासाठी घे,  त्याच्यासाठी  घे (टिपिकल मध्यम वर्गीय!) असं करताना सामान अंमळ  जडच  झालं.

कष्ट  उपसायचे,  असा काही हव्यास नव्हता  माझा.

मी टॅक्सी करायचं ठरवलं .

नकळत स्टॉप वर उभ्या असलेल्या दोघी- तिघीना  विचारलं, “पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का? “

‘टिपिकल मध्यमवर्गीय!’ – हा मीच  मला टॉन्ट मारला बरं का.

अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच  करायचे तर एकटी साठी कशाला?नाही का?

माझं मलाच हसू आलं .

घरी जर  हे सांगितलं  तर सुजितचा तर स्फोटच  होईल. माझं  फुटकळ  समाज कार्य  कसं  अंगलट  येऊ शकतं,  याच्यावर  हिरीरीने चर्चा होईल .

‘काळ  बदललाय,   पण तरीही सतत अविश्वासाचे  चष्मे घालून का रे वावरता? चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला.’हे माझं  म्हणणं  मोडीत काढलं  जाईल  किंवा मध्यम वर्गीय विचारात  त्याची गणना  होईल .

हे मला माहीत होतं.

मी  घरी आले तर मस्त मॅकडॉनल्डच्या पार्सलवर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या  पसाऱ्याने  दिली.

सवयी नुसार  टेक अवेचे  कंटेनर  धुऊनपुसून   कपाटात ठेवले.

कामवाल्या  बाईंना , मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी  पडतात. ‘टिपिकल  मध्यमवर्गीय’ वागणं.

सोफ्यावर जराशी टेकले. आणि मनात विचार आला –

‘मध्यमवर्ग ‘ हा  स्तर जरी  पैशाची   आवक  यावरून  पडला असेल तरी मध्यमवर्गियांचे  विचार,  वागणूक,  संस्कार  यात खूप श्रीमंती आहे.

आज पैशाची थोडी उब मिळाली,  सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत  योग्य आहे?

चालत जातायेण्यासारखं  अंतर असेल ,  किंवा बस ट्रेननी  जाणं  सोयीचं  असेल तर परवडतंय  म्हणून टॅक्सीने जाणं  जर मला चैन वाटत  असेल तर त्यात  मध्यम वर्ग  कुठे आला? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ  नको, ह्या  संस्काराची  जपणूक आहे यात.

सहजपणे  कोणाला  मदत करणं,

वस्तू जपून वापरणं,

आपुलकीने  कोणाशी  वागणं,

गरजा मर्यादित ठेवणं,

उच्च  राहणीमान ठेवूनही दिखाऊपणा न करणं

या वागण्याचा संबंध  आजची पिढी पैशाशी  का जोडू पहाते? हे वागणं  टिपिकल  मध्यमवर्गीय  म्हणून त्याची खिल्ली का  उडवते?

हे आकलनाच्यापलीकडे  आहे आणि न पटणारे आहे.

आजकालच्या  आत्मकेंद्रित  पिढीला या कशातही रस  वाटत नाही . 

एकमेकांच्या  संपर्कात  राहणं, जुडलेलं  राहणं, ‘थेट’ भेटणं  हे  मध्यम वर्गीय  का वाटावं  या पिढीला? “आई, आजकाल असं  नाही आवडत  लोकांना. त्यांना त्यांची अशी स्पेस  हवी असते” असं  म्हणत आपसातलं  अंतर वाढवणं, हे   उच्चभ्रू ?माझ्या मध्यमवर्गीय विचारात न बसणारं  आहे हे.

आपल्याला हवं  तसं  वागायची  मोकळीक  आहे ना आपल्याला? मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची?  मी  मध्यमवर्गीय आहे  याचा मला  अभिमान आहे ना. मग झालं की!

असं  म्हणून सगळ्यांसाठी फक्कड  चहा करायला स्वयंपाक  घरात  घुसले.

लेखिका :श्रीमती नीलिमा जोशी

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… संध्याकाळच्या परतीच्या वाटेवर थव्यातून जात होतो…कळले नव्हते सकाळी तेव्हा घरट्यापासून किती लांबवर आलो होतो… पिल्लांच्यासाठी आणि तिच्या ओढीसाठी घरट्याकडे,  अंतरामागुन अंतर कापत जात होतो…कितीतरी वेळ पंख पसरून हवेत विहरत निघलो पण घरट्याच्या झाडाजवळ काही अजून  पोहचलो नव्हतो… सोबत घेतलेला होता चिमणचारा कच्चा बच्च्या पिलांना आणि आणि तिच्यासाठीही… त्याचं ओझं काहीच वाटत नव्हतं…आतुरतेने वाट  पाहत बसली असतील माझी घरट्याच्या तोंडाशी… चिवचिवाट किलबिलाटाचा करत असतील कलकलाट झाडावरती…रातकिड्यांना रागावून सांगत असतील तुमची किर्र किर्र नंतर करा रे संध्याकाळ उतरून गेल्यावर…येणारेत आमचे बाबा आता एवढ्यात या संधिप्रकाशात… फुलेल आनंदाचा गुलाल मग सारा घरट्यात… मग सांडून जाऊ दे काळोखाचे साम्राज्य.. पण पण त्या आधी आमचा बाबा घरी आलेला असूदे… “

“… का कुणास ठाऊक आता आताशा  मला दम लागुन राहिला…लांब पल्ल्याच्या झपाट्याला श्वास कमी पडू लागला..दिवसभर काही जाणवत नाही पण संध्याकाळी घरट्याकडे परताना थव्याबरोबर विहरणे जमत नाही… हळूहळू मग  मागे मागे पडत जातो… नि थवा मात्र ‘त्याचं कायं येईल तो मागाहून… कशास थांबावे त्याच्यासाठी.. ‘नि मला न घेताच तसाच पुढे निघून जातो… क्षणभराचे कसंनुसे होते मला.. धैर्य एकवटून पुन्हा पंख जोराने फडफडवत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो… पण पण तो  आटापिटा आता पूर्ण पणे निष्फळ ठरतो.. सगळे त्राण, अवसान कधीच संपलेले असते.. आता फक्त काही वेळ  विश्रांती घेणे गरजेचे ठरते… आंगातुक मला..वाटेवरील झाडे नि त्यावरील आमचेच जातभाई आसरा देण्यावरून कालवा कालवा करतात.. ‘तू  इथं थांबू नको बाबा तुझ्या ईथे असण्याने आमच्या शांतेत येतेय बाधा… ‘मग तसाच नदीच्या प्रवाहातला काळ्या कातळावर जरा विसावतो… चौफेर नजर फिरवतो… शांत एकसुरीचा जलप्रवाह कातळावर डचमळून जातो…नदीतील कातळाचा हुंकार ऐकू येतो.. ‘तू पूर्ण अंधार पडण्याआधी तूझ्या घरट्याकडे जाशील बरं… रात्र गडद होत जाईल तसं नदीचं पाणी शांत गहिरं होत जाईल.. काही जलचर आवाज न करता मग या कातळावर येतील  नि तुला पाहून त्यांना आयतीच मेजवानी होईल…’असा त्याचा मित्रत्त्वाचा सबुरीचा सल्ला.. भले मदतीला मर्यादा असल्या तरी त्याच्या… अस्ताचा सूर्य सांगत असतो… मंद मंद गतीने मी अस्ताचलाला जाई पर्यंत तू त्त्वरेने उडत उडत जा.. आपल्या घरट्यात पोहचून जाशील…माझ्याकडे  वेळ आहे फारच थोडा…तो संपला कि अंधाराचा उधळीत येईल काळाघोडा… आभाळाने घातले आपल्या डोळी काजळ गडद अंधाराचे.. ते पाहूनी भिउनी मान लवूनी बसले तृणपाती किनाऱ्यावरचे… आ वासूनी धावून येती अंगावर काळे काळे बागुलबुवांची तरूवर नि झाडेझुडे… थकल्या तनाला , बळ कुठले मिळण्याला,… भीतीच्या काट्याने थडथड  लागली मनाला… राहिले घरटे दूर माझे… त्राण नाही उरले या देहात… जरी उडून जावे करून जीवाचा तो निर्धार…  अर्ध्यावरती  हा डावच संपणार…समीप आलेला अंत ना चुकणार..आणि घरचे माझे नि मी घरच्यांना कायमचा मुकणार… वियोगाची आली अवचित अशी घडी… लागले नेत्र ते पैलथडी… मी जाता मागे घरच्यांना कशी मिळावी माझी कुडी…आठवणीचीं  राहावी एकतरी जुडी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सौंदर्याचा ‘नूतन ‘ आविष्कार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सौंदर्याचा ‘नूतन ‘ आविष्कार ☆ सौ कल्याणी केळकर बापट

रुप म्हणा वा सौंदर्य, हे आपल्या हातात नसतं.शिवाय कुठल्याही अमुक एखाद्या गोष्टीतच सौंदर्य दडलेलं असतं असं ही नव्हे. कधी ते कुणाच्या गुलाबी गोरेपणात असतं तर कधी कुणाच्या तजेलदार सावळेपणात.कधी कुणाच्या कुरळ्या डौलदार शोल्डरकट मध्ये तर कधी कुणाच्या लांबसडक शेपट्यात गुंडाळलेलं असतं.कधी कुणाच्या चाफेकळी नाकात तर कधी कुणाच्या नकट्या अप-या नाकातही. कधी कुणाच्या पाणीदार टपोऱ्या भावूक डोळ्यांत असतं तर कधीकधी ते मादक,गहि-या,खोल डोळ्यांत पण गावतं.कधीकधी ते खात्यापित्या सणसणीत बांध्यात दिसतं तर कधी ते लवलवत्या चवळीच्या शेंगेगत बांध्यात दिसतं. कधी कुणाच्या मोत्यासारख्या दातात असतं तर कधी ते मौसमीसारख्या खालीवर तिरप्या दातातही असतं. खरसांगू ? हे सौंदर्य नं बघणा-या च्या नजरेत असलं नं तर कधीही, कुठेही, कोणातही ते हमखास दिसतच दिसतं.

हे झालं रुपाचं सौंदर्य. सौंदर्य हे कर्तृत्वात, पराक्रमात,आदर्शवत व्यक्तीमत्वात असतं. ते निर्मळ, अल्लड,निरागसतेतं पण वसतं. अफाट कर्तृत्वाने संपूर्ण व्यक्तीमत्वच झळाळून निघतं, उजळून निघतं.आणि मग कदाचित रुपाच्या नाही तर अशा गुणी,कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्ती आपोआप आपल्या नजरेत भरते आणि अलगद, अलवार, आपसूकच तिच्याबद्दल चार कौतुकाचे शब्द आपल्या मनातून, वाचेतून निघतात. आपली पारखी नजर असली तर सौंदर्य काय आपल्याला ठायीठायी दिसतं.

अशाच काही व्यक्तीरेखा ह्या आपल्याला खूप आवडतात. कदाचित आपण त्यांना कधीच भेटलो नसतो,प्रत्यक्ष बघितलही नसतं. स्वभाव बघितला तर काही वेळा एखादी व्यक्ती तिच्या डँशिंग,सडेतोड,धडाडीच्या घणघणाती स्वभावाने भावते तर कधी कुणी तिच्या स्वतःच्या मृदू, शांत,सोशिक, मनमिळाऊ स्वभावाने मनाच्या कप्प्यात कायमची विराजमान होते. अशीच एक स्वभावाने अतिशय निर्मळ, शांत,समाधानी,हसतमुख, निरागस आणि रुपाच्या बाबतीत सुंदर ,सात्विक

व्यक्ती म्हणजे अभिनेत्री नूतन समर्थ बहल ही माझी अतिशय आवडती अभिनेत्री.

नुकत्याच झालेल्या नूतनच्या  स्मृतिदिनानिमित्त थोडसं तिच्याविषयी.

अभिनेत्री शोभना समर्थ ह्यांची ही लेक.त्यामुळे सौंदर्य आणि अभिनय दोन्हींचा संगम वारसाहक्कानेच घेऊन आलेली. पुढे त्या सौंदर्याला सात्विकतेची आणि उच्चप्रतिच्या अभिनयाची जोड मिळाली आणि तिच्या रुपाला अभिनयाला एक वेगळीच झळाळी आली.

नूतनची नात्याने ओळख द्यायची तर अभिनेत्री शोधना समर्थ ह्यांची मुलगी,अभिनेत्री तनुजा हिची बहीण, मोहनीश बहल हिचा लेक,अभिनेत्री काजोल हिची भाची आणि लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल हीचे “अहो”.

नूतनने आपल्या करीयरची सुरुवात 1950 पासून केली. नितळ,सात्विक,खानदानी आणि आरसपानी सौंदर्य घेऊन आलेली नूतन ही अभिनयाच्याही बाबतीत अग्रेसर होती. “मिस इंडिया” पुरस्कार प्राप्त करणारी नूतन ही बहुतेक पहिलीच महिला होती.सर्वाधिक फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे नूतन आणि दुसरी ह्यांचीच भाची काजोल. ह्यांना मानाचा “पद्मश्री”पुरस्कार देखील मिळाला होता.

“मै तुलसी तेरी आँगनकी”,”बंदिनी”,”सीमा”, “सुजाता”,”सरस्वतीचंद्र” हे त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांपैकी काही. बंदिनी चित्रपटातील अभिनयाबद्दल तर असं बोललं जातं की ह्या चित्रपटात फक्त नूतन ह्यांचा चेहराच बोलका अभिनय करीत होता असे नाही तर त्यांचे अक्षरशः हात,पाय,बोटं ही सुद्धा अप्रतिम अभिनय करीत होती.त्यांचा सौदागर हि अमिताभ बच्चन ह्यांच्या बरोबरचा एक वेगळाच चित्रपट. मेरी जंग मध्येही त्यांचा सहजसुंदर अभिनय बघायला मिळाला.

त्यांच्या साधेपणाबद्दल बोलायचं तर त्यांच घरं अतिशय साध्यापद्धतीचे होते.आणि घरी गाड्या घोड्या असतानांही बरेचदा नूतन स्वतः चौकात पायी जाऊन कित्येकदा भाजी आणणे,ईस्त्रीचे कपडे आणणे ही कामे करीत.

त्यांचा मला आवडलेला चित्रपट मःहणजे सरस्वतीचंद्र. त्यामधील अप्रतिम गीताने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

“चंदनसा बदन,चंचल चितवन,

धिरेसे तेरा ये मुसकाना,

मुझे दोष ना देना जगवालो,

हो जाऊँ अगर मै दिवाना…

आपण ह्या ओळींच्या जास्त प्रेमात पडतो की नूतन ह्यांच्या हे आपल्यालाच नक्की ठरवता येत नाही. तर अशा ह्या प्रेक्षकांच्या मनात अजूनही रुंजी घालणा-या, नूतनजींना भावपूर्ण श्रध्दांजली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नकार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “नकार…” ☆ सौ राधिका भांडारकर 

नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार  इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.

काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही.  विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.

नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.

सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार.  बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला  हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.

माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.

पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”

हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ  लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”

आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.

बँक गॅरंटी  हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे.  त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.

“ही व्यक्ती  कोण लागते तुमची?   तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”

माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली.  मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या  नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात  आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही. 

नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की.  वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.

“नाही कशी म्हणू तुला”  या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.

कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप  टळू शकतात.

दान देणं, देणाऱ्याचे हातच  घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास  सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.

मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते  याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.

मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला  दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”

ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते.  तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि  तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”

थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा  निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.

माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …

कैकयीने  मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता  तर…

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….

तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बेरीज… वजाबाकी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बेरीज… वजाबाकी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काय चुकल माझं?…. काय केलं मी?….

काय करायला हवं होतं?…. काय केलं नाही?…… कोणासाठी केलं?…… असे आणि यांसारखे कितीतरी प्रश्न कानावर आले असतील. नसतील तर या सारखी आनंदाची गोष्ट नाही.

वरच्या अनेक प्रश्नात कधी आपण असे प्रश्न विचारण्याऱ्यांमध्ये असतो. तर कधी ज्यांना प्रश्न विचारले जातात त्यांच्यामध्ये असतो. पण आपण असतोच.

अशा वेळी प्रश्न विचारणारा बऱ्याचदा रागातच असतो. किंवा राग आल्यावरच अशी प्रश्नावली सुरू होते.  ज्याला असे प्रश्न विचारले जातात तो देखील रागात असेल तर तिथे सगळं संपतं. आणि सुरू होते ती एक मन अस्वस्थ करणारी शांतता…….. यात कोण चूक कोण बरोबर हा आणखीन एक प्रश्न नंतर असतोच.

पण त्याचवेळी  सुरू होतो तो बेरीज वजाबाकीचा खेळ. या खेळात होते ती फक्त चुकांची बेरीज आणि  चांगल्या कामाची, वागण्याची  नकळत वजाबाकी.

यावेळी  उजाळा मिळतो तो फक्त झालेल्या चुकीच्या गोष्टींना. आणि अगदी मागच्या ते अलिकडच्या चुकीच्या गोष्टींचा पाढा वाचला जातो. आणि सगळ्या चुकांची फक्त बेरीज आणि बेरीजच मांडली जाते. हा चुकांच्या बेरजेचा आकडा थोडक्यात उत्तर वाढतच जातं.

आणि चांगल्या गोष्टींची वजाबाकी होते आहे किंवा आपण ती करतोय याची जाणीव रहात नाही‌.  शेवटी चांगल्या कामाचे शून्य फक्त शिल्लक रहात. अगदी काल परवा पर्यंत केलेली चांगली कामं यात मातीमोल ठरतात, किंवा ठरवली जातात.

किंवा त्या चांगल्या कामाची आठवण करून दिली तर……… त्यात काय?…… सगळेच करतात…….. करायलाच पाहिजे…. कर्तव्य आहे ते…… जमत नसेल तरीही जमवाव लागेल…… या प्रकारचीच उत्तर येतात.

असे प्रश्न जिथे जिथे संबंध आहेत, मग ते नात्यातले, मित्रांचे, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्यांचे, शेजारी अशा सगळ्या ठिकाणी होतात. काही वेळा ते योग्य असतील. पण प्रत्येकवेळी ते रास्तच असतील अस नाही. पण त्याचा विचार होत नाही.

या बेरीज वजाबाकीत बऱ्याचदा चुकीच्या कामांच्या बेरीज मध्ये, किंवा चांगल्या कामांच्या वजाबाकीत संबंध दुरावतात. आणि परत एका नात्याची वजाबाकी होते.

अशा प्रसंगी शांतपणे विचार केल्यास खरच लक्षात येइल की आपण चांगल्या कामांची बेरीज आणि चूकांची वजाबाकी केली तर सगळेच नाही पण काही प्रश्न हे प्रश्न न करता सुटतील.

बेरीज आणि वजाबाकी करायचं चिन्ह आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की बेरजेच्या चिन्हासाठी + दोन रेषा लागतात. ज्या परस्परांना मध्यभागी मिळतात. पण वजाबाकीच्या चिन्हात – ती एकटीच असते. त्यामुळे आपण आपसात भेटाव असं वाटलं तर बेरीज करा. आणि एकटच रहायच असेल तर वजाबाकी आहेच.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares