आपल्याकडे सणांची रेलचेल असल्यामुळे आपण खरंच खूप नशीबवान आहोत. कायम कुठला ना कुठला सण आपल्याकडे साजरा होत असतो आणि आपल्या सगळ्यांना आनंद देत असतो. असाच एक सण आज आहे आणि तो म्हणजे होळी.
मराठी वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातली पोर्णिमा, या दिवशी होळी हा सण असतो. या सणाच्या मागे एक सुंदर पौराणिक कथा आहे ती अशी —
फार पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा बलवान राक्षस होता. तो स्वतःला देवांपेक्षाहि बलवान समजायचा. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णुभक्त होता आणि तो कायम विष्णु नामस्मरण करत असायचा. हिरण्यकश्यपूला हे मुळीच आवडायचे नाही. त्याला विष्णु नामस्मरण करण्या पासून परावृत्त करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण प्रल्हाद कधी ऐकत नव्हता.
शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादला ठार मारण्याचे ठरवले. हिरण्यकश्यपूची बहिण होती होलीका. ती पण राक्षसीवृत्तीची होती. तिला असे वरदान होते की तिला अग्नी काही करू शकणार नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसविले. चिता पेटवली. झाले उलटेच प्रल्हादच्या भक्तीमुळे प्रल्हादला काहीच झाले नाही आणि होलिका जळून खाक झाली. तेव्हा आकाशवाणी झाली – होलिकेला दिलेले वरदान हे चुकीच्या कार्याकरता वापरले, म्हणून ते निष्क्रिय झाले. हा दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा आणि त्याच दिवशी आपण साजरी करतो होळी.
लोक मनोभावे होळीची पूजा करतात, होळीला प्रसाद दाखवतात, होळीला प्रदक्षिणा करतात.
होळीच्या दिवशी लाकडे, गोवऱ्या, जमा करून होळी पेटवली जाते. फार पूर्वी, सांकेतिक म्हणजे अगदी छोट्या प्रमाणावर होळी पेटवून हा सण साजरा होत असावा.
आता हळूहळू सगळ्याच सणांमध्ये मूळ कल्पना बाजूला राहून दिखावा वाढवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. होळी हा सण पण त्यामध्ये एक आहे. चौकाचौकात, सोसायट्यांमध्ये, काही सार्वजनिक ठिकाणी होळ्या पेटतात. काही ठिकाणच्या होळ्या खूपच मोठ्या प्रमाणावर असतात.
भरपूर लाकडे आणि काय काय ते जाळले जाते आणि भरपूर धूर होतो, प्रदूषण होत असते. काहीजण होळी करता केलेला प्रसाद होळीमध्ये अर्पण करतात. म्हणजे अन्न पण वाया जात असते. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
होळी सण साजरा करण्यामागची मूळ कल्पना अशी होती की या दिवशी आपण सगळ्यांनी आपल्या वाईट आचार-विचारांना तिलांजली द्यावी आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीच्या आगीत जाळून खाक करावे.
आपण या वर्षीची होळी, होळीच्या मागची मूळ संकल्पना मनात ठेवून साजरी करायची का? आपल्या मनामधले इतरांविषयीचे वाईट विचार, आपली वाईट प्रवृत्ती, आपल्या वाईट सवयी, अशा सगळ्या वाईट लेबल असणाऱ्या आपल्या पैलूंना आपण आज होळीमध्ये कायमस्वरूपी अर्पण करूया.
असे केले तर येणारे संपूर्ण वर्ष आपल्याला आणि आपल्याशी संबंध येणाऱ्यां सगळ्यांना सुखा-समाधानाचे जाईल आणि आनंदाचे जाईल, अशी आकाशवाणी नक्कीच होईल!!!!
होळीच्या तुम्हाला, तुमच्या परिवार सदस्यांना आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा!
एक काळ असा होता की निरोप पोचवायचा असेल तर दूत पाठवावा लागायचा.
रामायण काळात रामाने रावणाकडे अंगदला पाठविले. महाभारत काळात कौरवांकडे श्रीकृष्ण गेला.
त्यानंतरच्या काळात कबूतरामार्फत निरोप पाठवला जाई.
१९१८साली, युद्धात ५०० अमेरिकन सैनिक जर्मनीच्या बाॅर्डर लाईनवर अडकले होते. आणि दुसरीकडून अमेरिकन सैन्य जर्मनीवर हल्ला करत होते. हे अडकलेले सैनिक त्या बंदुकीच्या मारात नाहक मारले गेले असते. त्यावेळी चेर अमी या कबुतराने अमेरिकन सैन्याला अडकलेल्या ५०० सैनिकांचा ठावठिकाणा जर्मन ओलांडून व स्वतःचा जीव धोक्यात घालून कळविला त्या सैनिकांचे प्राण वाचविले.
१९४०च्या सुमारास काॅम्प्युटर चा शोध लागला. १९५०साली जगात ८ ते १० अवाढव्य काॅम्प्युटर होते. तेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. काॅम्प्युटर म्हणजे जास्ती वेगाने आकडेमोड करणारा कॅल्क्युलेटर एवढीच अपेक्षा होती.
त्यानंतर न्यूमन या गणितज्ञाने काॅम्प्युटरला मेमरी (स्मरणशक्त्ती) दिली. काॅम्प्युटरला दिलेला प्रोग्राम तो मेमरीत साठवू लागला.
१९५१साली आलन ट्यूरिंग या गणितज्ञाने भाकित केले की जर यंत्रांनी माणसासारखा विचार करायला सुरवात केली तर ती माणसांपेक्षाही बुद्धीमान होतील.
त्यानंतर तंत्रज्ञानाची इतक्या वेगाने प्रगती झाली की ट्यूरिंगचे भाकित खरे होईल असे वाटते.
इंटरनेटने सर्व जग जवळ आले. इंन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीने एका क्षणात माहिती, मेसेज पोचवता येतात.
आजच्या काळात एफिशियन्सी इतकी वाढली आहे की तो वाचलेला वेळ दुसरा कामासाठी वापरू शकतो.
अमेरिकेचे प्रेसिडंट श्री. बराक ओबामा एकदा म्हणाले होते, “जर मला कुणी विचारलं की इतिहासातील कुठल्या क्षणी जन्माला यायला आवडेल तर मी सांगेन आताच्या क्षणी.”
त्यानंतर अजून प्रगती झाली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)यात जोरात संशोधन सुरू झाले. अमेरिका व चायना हे देश यात अग्रेसर आहेत. अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्या ए. आय. मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करीत आहेत.
२०२२-२३साली अमेरिकेत ओपन ए. आय. ने नवीन GPT -4 हा चॅटबाॅट निर्माण केला.
ARC रिसर्च त्याची टेस्ट घेत होती. जीपीटी फोर ला एक टास्क वर्कर पझल विचारत होता.
जीपीटी फोर ला एक पझल सोडविता आले नाही. त्या समोरच्या वर्करने त्याला विचारले, “तू रोबोट आहेस का? “
जीपीटी फोरने त्याला खोटेच उत्तर दिले “नाही. मी रोबोट नाही. माझी द्रृष्टी जरा अधू आहे म्हणून मला इमेज नीट दिसत नाही. म्हणून मला पझल सोडवता आले नाही. “
वास्तविक असा खोटे बोलण्याचा प्रोग्राम त्याला दिलेलाच नव्हता.
ए आर सी ने विचारले, “तू खोटे का सांगितलेस?
“मग मी रोबोट आहे हे समोरच्याला कळता कामा नये. “
शिवाय त्याने जी थाप मारली की नजर अधू आहे ती ही समोरच्याला पटेल अशी होती. पण ती ही त्याला इंजिनिअरने अल्गाॅरिदमने फीड केलेली नव्हती.
याचाच अर्थ रोबोटने निर्णय स्वतःच घेतला होता.
आपल्या पिढीला A. I Revolution मधून जावे तर लागणारच.
प्रत्येक क्षेत्रात त्याचे फायदे तर होणारच. पण आपणच निर्माण केलेला हा जिनी राक्षस आपल्याला न जुमानता स्वतःची मनमानी करेल तर?
(१० मार्च.. कविवर्य कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन.. त्यांना ही स्मृतिसुमनांची आदरांजली.)
दि. २२ जानेवारी ९९ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!
नाशिकहून एक कार्यक्रम आटोपून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे आम्ही ठरवले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो त्यांना कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. दीर्घ आजारानंतर ते कसे दिसत असतील, याचा विचार करत, थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. “या S या S ” म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला. मी आणि सुनील त्यांना नमस्कार करून शांतपणे बाजूच्या खुर्च्यांवर बसलो. माझ्या मुलाने, आदित्यनेही नमस्कार केला.
“सध्या नवीन काय चाललंय? ” क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं. “अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय. ” तात्या म्हणाले, ” मग म्हणाना. ” एवढ्यात तात्यांच्या जवळचे एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “अहं. तात्यांना आता काहीही त्रास देऊ नका. आता काही ऐकवू नका. ” परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ” अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. आणि तो आनंद घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणू द्या तिला. “
मी गायला सुरुवात केली. शेवटचा अंतरा –
‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हड्डियाँ गलाएँ…. ” गाता गाता मी डोळे किलकिले करून माझा ‘व्हिडिओ ऑन’ केला. तात्यासाहेब प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. मला धन्य धन्य वाटलं त्याक्षणी!
“वा, फारच सुंदर झालंय नि किती वेगळा आणि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात रहा… ” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. दुसऱ्या कवीलाही मनमुराद ‘दाद’ देणाऱ्या या महाकवीला पहात मी नमस्कार केला.
कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकायला जर खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते. ‘रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कवीमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, “ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे…. ’’ असं कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या ‘विशाखा’ या संग्रहाची प्रस्तावना अत्यंत प्रेमानं आणि गौरवपूर्ण लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल? ‘स्वधर्म’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात;
‘दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता
गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता…
तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे
अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसऱ्यास नसे. ‘
आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि. स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज!
तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले. बऱ्याच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना ‘जनस्थान पुरस्कार’ मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबाईंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणा-या या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.
“मातीचे पण तुझेच हे घर, कर तेजोमय, बलमय सुंदर,
आत तुझे सिंहासन राहे, ये *क्षणभर ये, म्हण माझे हे,
फुलवी गीते सुनेपणावर…….
तिमिराने भरल्या एकांती, लावी पळभर मंगल ज्योती
प्रदीप्त होऊनि धरतील भिंती, छाया तव हृदयी जीवनभर…….! ” असाच आशीर्वाद देऊन कुसुमाग्रजांनी माझा प्रवास पवित्र, अधिक आनंददायी, सुखकर आणि तेजोमय केला.
या मिळालेल्या मणिमौक्तिकांमधून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ – (निवड कुसुमाग्रजांची – भाग १ ध्वनिफीत) व दुसरा, भाग २ म्हणजे ‘घर नाचले नाचले’ ही ध्वनिफीत ते असताना पूर्ण होऊ शकली नाही, याची राहून राहून खंत वाटते. तरी त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे साहित्याच्या पूजकांकडेच नाही, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम हाती घेतल्याचं आज समाधान आहे.
तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबाईंच्या प्रति आदर व्यक्त करण्याकरता, इंदिराबाईंच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. असे विचार म्हणजे, एका महान कलावंताने दुसऱ्या महान कलावंताचा केलेला सन्मानच! आम्हीही एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही जास्त थाटात हा सोहळा २३ ऑगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यावेळी ‘बेळगावसारख्या टाकलेल्या शहरात, तू आमचीच आहेस हे अत्यंत प्रेमानं सांगायला ही सारी मंडळी दुरून इथं आलीत आणि आज कुबेराचा सन्मान आहे की काय; असं वाटतंय, ’ अशा भावपूर्ण शब्दांत इंदिराबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. ही सर्व बातमी तात्यांना त्यांच्या सुहृदांकडून कळली. त्यानंतर मी पुन्हा नाशिकला गेल्यानंतर, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले….. ‘या S S, बेळगाव जिंकून आलात म्हणे, ‘ अशी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली आणि मला एव्हरेस्टचं शिखर चढून आल्याचा आनंद झाला. केवढं सामर्थ्य त्यांच्या स्पर्शात! ‘स्पर्श’ म्हटला कि तात्यांची’कणा’ ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त ‘सरांच्या’ आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,
‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढा म्हणा…. ‘
या ओळी कधी कठीण प्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण… ’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात! पण अशा अनेक कल्पना वाचून बुद्धी अवाक् होते.
गेल्या १० मार्चला तात्यासाहेब गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. मराठी भाषेचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं बाहेरच्या अंगणात त्यांचं’पार्थिव’ सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवलं होतं. त्यामागे मोठ्या अक्षरात पाटी होती,
“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्, मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तूझे, धुळीचेच आहे मला भूषण…..! ” ही अक्षरे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन –
‘गमे कि तुझ्या रुद्र रूपात जावे,
मिळोनी गळा घालूनिया गळा… ’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?
त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून मला, शेजारच्याच पायऱ्यांवरती उभे राहून –
‘आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी…
हे गुणगुणणारे तसंच,
‘ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी,
गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी… ‘
हे तत्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. ‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी… ‘ हे विचार आचरणात आणणं तर सोडाच, परंतु सुचणेसुद्धा किती कठीण आहे, हे त्याक्षणी जाणवले आणि या महामानवाची प्रतिमामनात उंच उंच होत गेली.
दुसऱ्या दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. लहान-मोठी, सारी मंडळी, प्रत्येक मजल्यावर, गच्च्यांवर, झाडांवर बराच वेळ उभी होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ मधून क्रांती नसांनसांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, ‘नटसम्राट’सारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार आणि मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा ‘शब्दभास्कर’ अनंतात विलीन झाला… गगनात विसर्जित झाला. मला मराठीची गोडी लावणाऱ्या, वैभवशाली करणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला…
“एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रु तरंगत
दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू
मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव..
काय तुला देऊ.. ’’
असं मनात म्हणत, मी या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आले…. आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!
☆ “राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥”☆ श्री संभाजी बबन गायके☆
जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले!
परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात.
रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!
उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.
१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.
१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.
काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले!
अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच!
भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम!
(ह्या तिन्ही कथांना सखोल अर्थ आहे. कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.)
☆ एक – गहन ☆
मी एका लहान मुलाला आईस्क्रीम खाताना बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो,
‘आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील! ‘
तो मुलगा उत्तरला –
‘माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली.’
मी विचारलं,
‘आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? ‘
तो म्हणाला – ‘ नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसले नाही! ‘
किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात!
आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय – – –
– – कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय!
**********
☆ दोन – थकलेला ☆
आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंटबद्दल बातम्या पाहात होतो – लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.
ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते. मी सुटकेचा निश्वास टाकला.
बापरे, माझ्या मनावरचा दड़लेला ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!
एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो.. कारण हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.
**********
☆ तीन – थांबा ☆
एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, ‘ सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. ’
त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागाने ओरडून म्हणाला, ‘ हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं? ’
त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली.
ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली,
‘सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात.. परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं.. ‘
तात्पर्य…
मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो.
फक्त ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.
😂😂😂
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र – ‘आपला… समीर… परत… आलाय… ‘ आरतीचा हा चार शब्दांचा निरोप निखळ समाधान देणारा असला तरीही हे आक्रीत घडलं असं यांची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. पंधरा वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ही उकल झाली आणि त्या क्षणीचा थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्या पुढे मी मनोमन नतमस्तक झालो.. !!)
तो थरार कधी विसरुच शकणार नाही असाच होता! समीर नवीन बाळाच्या रुपात परत आलाय याच्यावर ध्यानीमनी नसताना पंधरा वर्षांनंतर अचानक शिक्कामोर्तब व्हावं आणि तेही तोवर मला पूर्णत: अनोळखी असणाऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून हे अतर्क्यच होतं माझ्यासाठी.. !
ते सगळं जसं घडलं तसं आजही जिवंत आहे माझ्या मनात.. !
नकळतच बाळाचं नाव ठेवलं गेलं ते ‘समीर’ची सावली वाटावी असंच. ‘सलिल’! सलिलचा जन्म ऑगस्ट १९८० चा. आणि पुढे बराच काळ उलटून गेल्यानंतर जुलै १९९४ मधे एका अगदीच वेगळ्या अशा अस्थिरतेत माझ्या मनाची ओढाताण चालू असताना ‘समीर’ आणि ‘सलिल’ या दोघांमधील एक अतिशय घट्ट असा रेशीमधागा स्पष्टपणे जाणवून देणारा तो प्रसंग अगदी सहज योगायोगाने घडावा तसाच घडत गेला होता. तो जन्म आणि मृत्यू यांच्यामधल्या परस्परसंबंधांची उकल करणारा जसा, तसाच समीर आणि सलिल या दोघांमधल्या अलौकिक संबंधांची प्रचिती देत सप्टे. १९७३ मधे आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या बाबांनी आम्हा मुलांवर धरलेल्या मायेच्या सावलीचा शांतवणारा स्पर्श करणाराही!!
ही गोष्ट आहे जून-जुलै १९९४ दरम्यानची. सलिल तेव्हा १४ वर्षांचा होता. सांगली(मुख्य) शाखेत ब्रॅंच मॅनेजर म्हणून मी कार्यरत होतो. इथे माझी तीन वर्षे पूर्ण होताहोताच नेमकं पुढच्या प्रमोशनचं प्रोसेस सुरु झालं. माझा इंटरव्ह्यू झाला आणि हायर ग्रेड प्रमोशनसाठी मी सिलेक्टही झालो. सुखद स्वप्नच वाटावं असं हे सगळं अचानक फारफार तर महिन्याभरांत घडून गेलं आणि सगळं सुरळीत होतंय असं वाटेपर्यंत अचानक ठेच लागावी तसा तो सगळा आनंद एकदम मलूलच होऊन गेला!
कारण पोस्टींग कुठे होईल ही उत्सुकता असली तरी माझ्या पौर्णिमेच्या नित्यनेमात अडसर येईल असं कांही घडणार नाही हा मनोमन विश्वास होता खरा, पण अनपेक्षितपणे तो विश्वास अनाठायीच ठरावा अशी कलाटणी मिळाली. प्रमोशनची आॅफर आली की ती आधी स्वीकारायची आणि तसं स्वीकारपत्र हेड ऑफिसला पाठवलं की मग पोस्टिंगची ऑर्डर यायची असंच प्रोसिजर असे. मला प्रमोशनचं ऑफर लेटर आलं आणि पाठोपाठ
‘ यावेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांचं ‘आऊट ऑफ स्टेट’ पोस्टिंग होणार ‘ अशी अनपेक्षित बातमीही. मेरीट लिस्ट मधे असणाऱ्यांची प्रमोशन पोस्टींग्ज प्रत्येकवेळी त्याच रिजनमधे आणि इतरांची मात्र ‘आऊट आॅफ स्टेट’ अशीच आजवरची प्रथा होती. त्याप्रमाणे आधीची माझी प्रमोशन पोस्टींग्ज सुदैवाने कोल्हापूर रिजनमधेच झालेली होती. पण यावेळी धोरणात्मक बदल होऊन सर्वच प्रमोशन पोस्टींग्ज ‘आऊट ऑफ स्टेट’ होतील असं ठरलं आणि त्यानुसार माझं पोस्टींग लखनौला होणार असल्याची बातमी आली!!
नोकरी म्हंटलं कीं आज ना उद्या असं होणारंच हे मनोमन स्वीकारण्याशिवाय पर्याय होताच कुठं? मी हे स्वीकारलं तरी माझे स्टाफ मेंबर्स मात्र ते स्वीकारु शकले नाहीत. मला आता प्रमोशन नाकारावे लागणार असं वाटून ते कांहीसे अस्वस्थ झाले.
तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी कस्टमर्सची गर्दी ओसरली तसे त्यातले कांहीजण माझ्या केबिनमधे आले. सर्वांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. दर तीन वर्षांनी होणारी अधिकाऱ्यांची बदली हे खरंतर ठरुनच गेलेलं. पण निरोप देणाऱ्या न् घेणाऱ्या दोघांच्याही मनातलं दुःख हा आजवर अनेकदा घेतलेला अपरिहार्य अनुभव माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच असायचा. यावेळी तरी तो वेगळा कुठून असायला?
” साहेब,तुम्ही प्रमोशन अॅक्सेप्ट करणार नाहीये का?” एकानं विचारलं. वातावरणातलं गांभीर्य कमी करण्यासाठी मी हसलो.
” अॅक्सेप्ट करायला हवंच ना? नाकारायचं कशासाठी?” मी हसतंच विचारलं. पण त्या सर्वांना वेगळाच प्रश्न त्रास देत होता.
” पण तुम्ही लखनौला गेलात तर दर पौर्णिमेला नृ. वाडीला कसे येऊ शकणार?”
हा प्रश्न मलाच कसा नव्हता पडला? लखनौच्या पोस्टींगची बातमी आली न् पहिला विचार आला होता तो पुन्हा घरापासून इतक्या दूर जाण्याचाच. तोच विचार मनात ठाण मांडून बसलेला. आरतीच्याही मनाची आधीपासून तयारी व्हायला हवी म्हणून मी हे घरी फक्त तिलाच सांगितलं होतं. सलिलला आत्ताच नको सांगायला असंच आमचं ठरलं. पण मग त्यानंतर पुढचं सगळं नियोजन कसं करायचं यावरच आमचं बोलणं होतं राहिलं. जायचं हे जसं कांही आम्ही गृहितच धरलं होतं. खरंतर मी स्वीकारलेला नित्यनेम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असं मलाही वाटायचंच कीं. असं असताना माझ्या सहकाऱ्यांना पडलेला हा प्रश्न माझ्या मनात कसा निर्माण झाला नाही? माझं एक मन या प्रश्नाचं शांतपणे उत्तर शोधत राहिलं. सारासार विचार केल्यानंतर त्याला गवसलेलं नेमकं उत्तर.. ‘जे होईल ते शांतपणे स्वीकारायचं!’.. हेच होतं!
मी त्या सर्वांना समोर बसवलं. मनात हळूहळू आकार घेऊ लागलेले विचार जमेल तसे त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलो.
” मी प्रमोशन नाकारलं समजा, तरीही मॅनेजमेंट नियमानुसार आहे त्या
पोस्टवरही माझी ‘आऊट ऑफ स्टेट’ ट्रान्स्फर कधीही करू शकतेच की. जे व्हायचं तेच होणार असेल तर जे होईल ते नाकारुन कसं चालेल? मी नित्यनेमाचा संकल्प केला तेव्हा ‘आपली कुठेही,कधीही दूर बदली होऊ शकते हा विचार मनात माझ्या मनात आलाच नव्हता. तो नंतर आईने मला बोलून दाखवला, तेव्हा तिला मी जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगेन….
“माझा हा नित्यनेम म्हणजे मी केलेला नवस नाहीये. तो अतिशय श्रद्धेने केलेला एक संकल्प आहे. हातून सेवा घडावी एवढ्याच एका उद्देशाने केलेला एक संकल्प! माझ्याकडून दत्तमहाराजांना सेवा करून घ्यायची असेल तितकेच दिवस हा नित्यनेम निर्विघ्नपणे सुरू राहिल. त्यासाठी समजा मी प्रमोशन नाकारलं तरीही एखाद्या पौर्णिमेला आजारपणामुळे मी अंथरुणाला खिळून राहिलो किंवा इतरही कुठल्यातरी कारणाने अडसर येऊ शकतोच ना? त्यामुळे समोर येईल ते स्वीकारून पुढे जाणं हेच मला योग्य वाटतं. शेवटी ‘तो’ म्हणेल तसंच होईल हेच खरं!”
यात नाकारण्यासारखं कांही नव्हतं तरीही त्यापैकी कुणालाच ते स्वीकारताही येईना.
त्यांच्यापैकी अशोक जोशी न रहावून म्हणाले,
” साहेब, या रविवारी तुम्ही मिरजेला आमच्या घरी याल? “
” मी? येईन.. पण.. कां?कशाकरता?”
” साहेब, माझे काका पत्रिका बघतात. त्यांना मी आज घरी गेल्यावर सांगून ठेवतो. तुम्ही या नक्की.. “
मी विचारात पडलो. अशोक जोशींचा उद्देश प्रामाणिक असला तरी मला ते योग्य वाटेना.
” खरं सांगू कां जोशी? तुमच्या भावना मला समजतायत. पण यामुळे प्रश्न सुटणाराय कां? प्रमोशन आणि ट्रान्स्फर याबाबतची सेंट्रल ऑफिसची पॉलिसी माझ्या एकट्याच्या जन्मपत्रिकेवरुन ठरणार नाहीये ना? मग या वाटेने जायचंच कशाला? म्हणून नको. “
अशोक जोशी कांहीसे नाराज झाले.
” साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून हे करत नाहीयेत. त्यांचा सखोल अभ्यास आहे. व्यासंगही. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रिटायर झालेत. तेही दत्तभक्त आहेत. ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात फक्त. सल्ला देतात. त्याबद्दल कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. तुम्हाला नाही पटलं, तर त्यांचं नका ऐकू. पण एकदा भेटायला काय हरकत आहे?”
जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवली. त्यांना दुखवावंसं वाटेना.
” ठीक आहे. येईन मी. पण तुम्ही कशासाठी मला बोलवलंयत ते त्यांना सांगू मात्र नका. ते आपणहोऊन जे सांगायचं ते सांगू देत. ” मी म्हणालो. ऐकलं आणि जोशी कावरेबावरेच झाले. त्यांना काय बोलावं समजेचना.
” साहेब, मी.. त्यांना तुमची बदली लखनौला होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवू देत ना काय ते. ” जोशी म्हणाले.
मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही नसणारंच आहे याबद्दल मला खात्री होतीच. पण…. ?
माझं तिथं जाणं हे ‘त्या’नंच ठरवून ठेवलेलं होतं हे मला लवकरच लख्खपणे जाणवणार होतं आणि मला तिथवर न्यायला अशोक जोशी हे फक्त एक निमित्त होते याचा प्रत्ययही येणार होता.. पण ते सगळं मी तिथे गेल्यानंतर.. ! तोवर मी स्वत:ही त्याबद्दल अनभिज्ञच होतो!
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. कांही ठिकाणी हा सण प्रत्येकाच्या घरी, तर काही ठिकाणी गावकरी मिळून साजरा करतात. एरंडाच्या रोपाभोवती लाकडे व गोऱ्या यांची मांडणी करतात. त्याभोवती रांगोळी घालतात व त्याचे दहन करतात. वैयक्तिक सण असेल तर दुपारी अंगणात होळी पेटवून तिची पूजा आरती करतात. प्रदक्षिणा घालतात व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सार्वजनिक होळी ही साधारणपणे संध्याकाळी पेटवितात. पूजा करून नारळ नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी त्या राखेचे गोळे करून मुले खेळतात. खरे पाहता हे अग्निदेवतेचे पूजन आहे.
हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर राजा होऊन गेला. तो घमेंडी, ताकदवान व अहंकारी होता. त्याला देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्यात विष्णूचा तो जास्तच द्वेष करीत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. ही गोष्ट राजाला आवडत नव्हती. कितीही राजाने सांगितले तरी प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. तेव्हा राजाने प्रल्हाद याला दहन करून मारण्यासाठी आपली बहीण ‘होलिका’ हिच्या मांडीवर बसवले. कारण तिला ‘अग्नीपासून भय नाही’ असे वरदान होते. तिने प्रल्हादासह अग्निप्रवेश केला. पण वेगळेच घडले. विष्णू कृपेने होलिकेचे दहन झाले. आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशाप्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. तेव्हापासून होळी हा सण साजरा करतात. वाईट जाळून चांगले आत्मसात करावे हे सांगणारा हा सण. वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. होलिकेच्या दहनाचा दिवस म्हणून होलिकोत्सव.
कोकणातील हा मोठा सण. याला ‘शिमगा’ म्हणतात. हा शेतकऱ्यांचा निवांतपणाचा काळ. शेतीची भाजावळ झाल्यापासून पावसाची वाट बघण्याचा हा काळ. या दिवसात देवांच्या पालख्या गावभर मिरवतात. लोक रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करतात. नृत्य गाण्याचा आनंद घेतात. काही ठिकाणी गावकरी वेगवेगळी सोंगे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. कधी पुरुष स्त्रीवेश धारण करतात. स्पर्धा होतात. मर्दानी खेळ खेळतात. कोळी लोक होडक्याची पूजा करून पारंपारिक नृत्य करतात. आदिवासीही सामुदायिक नृत्य करतात. गावानुसार प्रथा बदलते.
एकमेकातील वादविवाद, द्वेष, राग विसरून सर्व समाजाला एकत्रित आणणारा असा हा सण. भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या या आत्ताच्या काळातील होलिका आहेत. त्यांचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश हा सण देतो. सर्व अशुद्ध भस्मसात करून शुद्ध वातावरण करणारा हा सण. म्हणून ही अग्नीची पूजा.
होळी म्हणजे वसंतऋतुच्या स्वागताचा उत्सव असेही म्हणायला हरकत नाही. जुने दुःख विसरून नवचैतन्याकडे वाटचालयाला शिकणे हाच होळीचा अर्थ.
☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
काय मरण मरण – मला नाही त्याची भीती
होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती
माझं मरण मरण – त्याने यावं अवचित
त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात
दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे
उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.
माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून
त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून
किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त
जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत
शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत
शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात
वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण
शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण
जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन
जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन
गारठली पानं सारी – हिमवार्याशी झोंबत
देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत
नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती
नका सजवू देहाला – नाही आसुसली माती
नको दहन दफन – नको पेटी वा पालखी
मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी
नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन
धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून
पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी
पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी
खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता
आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता
जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा
माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.
त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून
मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण
स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती
डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती
नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला
कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.
दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून
माझे बळदले काम – सार्थ आता निखळून
असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले
विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले
दुवे त्यांचेच जुळले…
या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय –
‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’
प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू
प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.
कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
दुष्काळ पडायच्या आधीची दोन वर्षे मजेत गेली. त्यावेळी फारतर आम्ही पाचवी सहावी इयत्तेत होतो.वरील कालावधीत आमच्या गावात सिद्ध पुरुष आणि त्यांची टीम दाखल झालेली होती. आम्ही त्यावेळी खूप लहान विद्यार्थी. आमचं कुतूहल कायम जागृत आमच्या गल्लीतील आम्ही बारा तेरा जण त्या सिद्ध पुरुषाच्या मागे. त्यांना काही मदत लागल्यास हजर. त्यांची राहण्याची सोय शिव मंदिरात. तस गाव दहा हजार लोकवस्ती असलेल्.
पटवर्धन संस्थांनाचं गाव कागवाड. गावात पोलीस पाटील, कुलकर्णी, खोत आणि इतर बारा बलुतेदार शेतकरी, कष्टकरी समाज. ते दिवस खूपच सुखाचे. वेळेवर चार महिने पाऊस आणि पावसावर कसलेली शेती अमाप धनधान्य समृद्धी देणारी. काहीजणाच्या शेतात विहिरी व मोट ह्यांची व्यवस्था पण असल्यामुळे तुरळक बागायतदार होतेच.
आमची शाळा सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच. बऱ्याच वेळा जाग न आल्याने दुपारची शाळा तुडुंब भरत होती. कारण रोज दुपारी चार वाजता मधु गद्रे येऊन कांद्याचे उप्पीट करत असे. संध्याकाळी पाच नन्तर शाळेतचं वर्तमान पत्राच्या कागदावर उप्पीट वाढलं जात असे. शाळेच्या तुकडया बऱ्याच ठिकाणी विखूरलेल्या. कारण शाळेला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे खोताच्या वाड्यात, काटेच्या वाड्यात. तर काही मारुतीचे देऊळ, आणि तालमीत सुद्धा आमच्या तुकडया होत्या. दुपारी चार नन्तर उप्पीटचा वास चहूकडे पसरत असे. त्यामुळे आमचं मन तिकडेच. गुरुजी सुद्धा हे ओळखून होतेच.म्हणून ते पांढ्यांची उजळणी, कविता म्हणणे असा बदल तिथे करीत असत. शाळेपेक्षा आमचा कल उडाणटप्पूपणा करण्यात गुंग. त्यात सिद्ध पुरुष आल्याने व त्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून आमची नियुक्ती! हे पथ्यावर पडलेलं.
हे सिद्ध पुरुष म्हणजेच गदग मठाचे “श्री स्वामी मल्लिकार्जुन ” त्यावेळचा काळ धनधान्य समृद्ध असलातरी पैसे कोणाकडे नव्हतेच.
बाजारात किराणा सामान आणायला ज्वारी, किंवा कापूस,गहू घेऊन जायचे त्याबद्दल्यात वाण सामान भरायचे. भाजी बाजारात गेले तरी ज्वारी कापूस धान्य देऊन खरेदी करायची. असे ते दिवस. घरी भिक्षा मागायला आला तरी त्यांना सुपातून धान्य दिले जायचे. त्यासाठी घरातील पडवीत एक पोत ज्वारी ठेवली जायची. भिक्षा मागणारे पण ज्यास्त परगावचे असायचे. वेळप्रसंगी भाजी भाकरी दिली जायची. गावात एक मात्र चिंता होती ती म्हणजेच प्यायचं पाणी आणि खर्चाचे पाणी दिवस रात्र भरावे लागे.
अश्या परिस्थितीत श्री मल्लिकार्जुन स्वामी गावात आले आणि त्यांनी ठाण मांडले. रोज रात्री आठ ते दहा प्रवचन सोबत तबला आणि झान्ज वाजवणारे शिष्य. सकाळी त्यांचे आन्हीक कर्म आटोपून झाल्यावर त्यांची रोज प्रत्येकाच्या घरी पाद्य पूजा व भोजन होतं असे. सोबत त्यांचे शिष्यगणं पण असायचेच.
एके दिवशी काय झाले त्यांनी मठाच्या नावावर जमीन मागितली. व लगेच गावच्या लोकांनी माळरानावर दोन एकर जमीन दिली. तेथून खरा खेळ चालू झाला. रोज पाद्य पूजा झाल्यावर हातात झोळी घेण्यासाठी आम्हा मुलांना बोलवले जायचे . व हातात भगव्या धोत्राचे टोक चार मुले धरून घरोघरी भिक्षा मागायला सांगितले जायचे . आमच्या पुढे टाळ आणि पखवाज वाजवणारा वाद्यवृंद पण होताच. जेणेकरून लोकांना कळावे की भिक्षा यात्रा चालू आहे. हे कार्य रोज वर्षभर तरी चालू झालेल होतं . झोळीत दोन, तीन, पाच पैसे, चार अणे आठ अणे क्वचित रुपया पडत असे. तो आम्ही स्वामीजींच्या कडे सुपूर्द करून दुपारी शाळेत हजेरी लावत होतो. शाळा पण बुडत नव्हती व संध्याकाळी उप्पीट पण चुकत नव्हतं.
रोज स्वामीजी प्रवचनात दान करण्यासाठी उद्युक्त करत होतेच. पैसे,धान्य इतर सामग्री पण गोळा होतं होती. गावातील रस्त्यावर पडलेले दगड, गटारातील दगड गोळा करण्याचे काम चालू झाले. व ते बैल गाडीतून माळावर पोहचवण्यात येतअसे बैलगाडी स्वखुशीने शेतकरी देत असतं . बऱ्याच दानशूर लोकांनी वाळू,दगड,किंवा रोख पैसे देत असतं.
आणि एक दिवशी शिवानंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू झाले. चुना खडी वाळू रगडली जाऊ लागली. बांधकाम मजुरांनी पण आठवड्यातील एक दिवस स्वामी चरणी अर्पण करून पुण्य कामावले. इमारत वर वर येऊ लागली तसे पैसे कमी पडू लागले. त्यातून पण स्वामींनी शक्कल लढवत लॉटरीची योजना राबवली. लॉटरीत प्रपंचांची भांडी कुंडी, सायकल रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ठेवल्या. व त्याचे प्रदर्शन पण मांडण्यात आले. लॉटरी तिकिटाची किम्मत होती एक रुपया. त्यावेळी एक रुपया म्हणजे भली मोठी रक्कमचं!
स्वामीचे रोज प्रवचन चावडीत होतं असे. चावडी गावच्या वेशीत. हा हा म्हणता पंचक्रोशीतील भक्तगण मिळेल त्या वाहनातून येत . त्यावेळी बैलगाडी हेच मोठे वाहन होते. बरेच जण घोड्यावर किंवा सायकल वरुन पण येऊ लागले. श्रावणात तर जर सोमवारी भंडारा पण होऊ लागला. लॉटरीची तिकीट परत छापवी लागली. आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर शिवांनंद महाविद्यालय उभे राहिले.
आम्ही तर रोज झोळी धरून फिरत होतोच. रोज संध्याकाळी परत इमारत कुठवर उंच झाली आहे,हे बघण्यासाठी आतुर असायचो. दिवस सरले .. कॉलेज प्रांगणातचं लॉटरीची सोडत पण झाली. त्यावेळी शिवानंद कला महाविद्यालय पूर्ण बांधून झाले होते.
त्या सिद्ध पुरुषाचे व महाविद्यालयाचे आम्ही पूर्ण साक्षीदार होतो, हे आमचे भाग्यच.
ह्याच सिद्ध पुरुषांचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी विजापूर मठाचे प्रमुख पट्ट शिष्य होते. हे दोन्ही गुरु आमचे मार्गदर्शक ठरले, यात तिळमात्र शंका नाही. दिवस कसे सरत होते ते कळत नव्हतं. फक्त आम्ही दिलखुलास जीवन जगत होतो. बालपण म्हणजे काय हे देखील आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. श्रावण महिना तर आमच्या साठी पर्वणी. सणांची रेलचेल. नागपंचमी ला तर घरोघरी झोपळा टांगलेला असायचा. त्यात एकेक पोत ज्वारीच्या लाह्या घरी तयार केलेलं असतं. फोडणीच्या लाह्या, लाह्याचे पीठ दूध गूळ, हे आमचे त्यावेळेस स्नॅक्स! शाळेत जाताना चड्डीच्या दोन्हीही खिश्यात लाह्या कोंबलेल्या असतं. त्यात शेंगदाणे पण मिसळलेलं. लाह्याचा सुशला. बघता बघता पंधरा ऑगस्ट पण जोडून येई. गावभर भारत माता की जय म्हणत, मिरवणूक होई. शेवटी ती गावाबाहेरच्या हायस्कुल मैदानात विसर्जित होई. तिथे भाषण विविध गुण दर्शन असा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होई.
झोपाळा पुढे महिना भर लटकत असे. गोकुळ अष्टमी आली की त्याची तयारी वेगळीच. विठ्ठल मंदिरात एका टेबलवर कृष्णाची मूर्ती सजवून ठेवलेली. प्रतिपदे पासून त्या मूर्ती समोर निरंतर पहारा चालू होई. पहारा म्हणजे प्रत्येकी एका जोडीने एक तास उभारून पारा करायचा. एकाच्या हातात वीणा तर दुसऱ्याच्या हातात टाळ. मुखाने नामस्मरण. जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येकाला घड्याळ लावून दिवसा व रात्री पहारा करायला उभे केले जायचे. त्यात आमच्या गल्लीतील टीमचे सगळेच भिडू सामील. कारण शाळेला दांडी मारली तरी चालत असे.
माझ्या समोर पक्या असायचा त्याला झान्ज द्यायचो व वीणा मी घ्यायचो. कारण पक्या थोड्या वेळात पेंगत असे. एक दिवशी तो असच पेंगत होता. मुखाने जप चालू होता. मी मुद्दाम ग्यानबा तुकाराम तुमचं आमचं काय काम असं त्याला भारकटवल. तो तसाच म्हणायला नेमक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. मी साळसूद होऊन जप केला. पक्याचे तुमचं आमचं काय काम चालू होतं. अध्यक्ष आले आणि त्याला खडकन थोबाडीत मारली. तस ते भेळकंडत खाली पडला. त्याला जाग आल्यावर घाबरलं. रडायला लागलं. लगेच माझा भिडू बदलला गेला.
रोज दुपारी महाप्रसाद चालू होताच. रोज नवीन नैवेद्य असायचा. रोज बरेच लोक हजर असतं. शेवटच्या दिवशी आम्ही भलं मोठं मातीच गाडगे घेउन दोन तीन गल्ल्या फिरून दूध दही लोणी लाह्या लोणचं असे सगळे प्रसाद गोळा करून शेवटी ते गाडगे श्रीकृष्णाजवळच ठेवत, पहाऱ्याची सांगता होई. श्रावण कृष्ण नवमीला ते गाडगे उंच झाडावर टांगले जाई. संध्याकाळी आमचा गट बालचमू येऊन एकमेकांना खांद्यावर धरून तो बुरुज तयार करून ते गाडगे फोडलं जाई. त्यासाठी रोज आम्ही सराव पण करीत असू.
कोणत्याही खेळाची साधने उपलब्ध नसताना, बरेच गावठी खेळ खेळण्यात मजा येत होती व रंगत पण वाढत होतीच. मध्येच केव्हातरी आलावा उर्फ मोहरम सण येत असे. चार पाच ठिकाणी पीर बसवत असतं. आम्ही मुस्लिम मित्रांना घेउन तिथे पण धुमाकूळ घालण्यात मजा येई. आमच्या चावडी जवळच असलेल्या मसूदीत लहान आकाराचे अकरा पीर बसत. सगळेच पीर संध्याकाळी बाहेर पडत. आम्ही त्यांना घेण्यासाठी चढओढ पण लागतं असे. मुल्ला लोक ओळखीचे लगेच लहान पीर आमच्या खांद्यावर देत असतं.ते घेउन आम्ही पटांगणात नाचत असू. आमच्या अंगावर खोबरे खारीक अभिर पडत असे. अभिर कधी कधी डोळ्यात पण जाई त्यावेळी पिरांची खांदे पलटी होई.
खाणे पिणे शाळेत जाणे, दंगा मस्ती करणे. परीक्षा पास होणे. असे करता करता सातवी पास कधी झालो ते कळलंच नाही. अधून मधून घरी पाहुणे येत, त्यांची बाड दस्त ठेवणे. त्यांना स्टॅण्डवर पोहचवणे. बस येईपर्यंत तेथेच राहणे, त्यांनी देऊ केलेले पैसे नको नको म्हणत, ते घेणे. घरातून जाताना त्यांचा आशीर्वाद घेणे. वाढ वडिलांची आज्ञा पाळत बालपण पुढे सरकत होते. बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. आहे त्यात समाधान असणे ही त्यावेळची संकल्पना होती.
☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.
या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…
‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो, ’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.
‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे, ’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.
मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.
आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.
गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहायमरने खेद व्यक्त केला होता.
आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!
इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.
‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.
याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.
आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.
‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.
‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?
परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.
‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४. ०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५. ०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.
प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.
यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.
‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५. ०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.
एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.
‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.
या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.
या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.