मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य

(त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.) – इथून पुढे —

या सोळा वर्षांच्या काळात शंकराचार्यांनी संपुर्ण भारतभर भ्रमण केले. सहा दर्शनांपैकी वेगवेगळ्या विचारधारांना मानणाऱ्या विद्वानांशी त्यांनी शास्त्रार्थ केला. हे शास्त्रार्थ म्हणजे वादविवाद नव्हते. त्या काळी शास्त्रार्थात कोण बरोबर हे अजिबात महत्वाचे नसे. काय बरोबर आहे हे महत्वाचे असे. असे शास्त्रार्थ ऐकायला विद्वानांची प्रचंड गर्दी होई. या शास्त्रार्थाच्या माध्यमातून लोक आपल्या ज्ञानात भर घालत. शंकराचार्यांनी शास्त्रार्थ केलेल्या सर्व विद्वानांनी अद्वैत दर्शन हे श्रेष्ठ असल्याचे मान्य केले. अशा प्रकारे त्यांनी अद्वैत वेदांताला भारतभर प्रतिष्ठा मिळवून दिली. या सर्व शास्त्रार्थापैकी बिहारमधील महाज्ञानी पंडित मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नीशी शंकराचार्यांचा झालेला शास्त्रार्थ अतिशय गाजला. मंडन मिश्रा मीमांसा आणि द्वैतवादाचे कट्टर समर्थक होते. मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नी शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताने अतिशय प्रभावित झाले. दोघांनी शेवटी शंकराचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले. यानंतर शंकराचार्यांचे नाव भारतभर झाले.

त्यांनी भारतभर केलेल्या प्रवासात धर्माचा दिग्विजय झाला. आपण सुरू केलेले धर्मकार्य पुढे असेच सतत चालू रहावे असे शंकराचार्यांची इच्छा झाली. म्हणून त्यांनी देशाच्या चार दिशांना चार पीठे निर्माण केली. दक्षिणेला कर्नाटकात शृंगेरीत शारदापीठ, पूर्वेला ओडिसात जगन्नाथपुरीला गोवर्धनपीठ, उत्तरेला बद्रीधामला जोतिर्मयपीठ आणि पश्चिमेला गुजरातमध्ये द्वारकेला द्वारकापीठ स्थापन केले. चार पीठांवर आपल्या चार प्रमुख शिष्यांना पिठाधिपती नेमले. या चार शिष्यांपैकी एक सुरेश्वर होते. हे सुरेश्वर दुसरे तिसरे कुणी नव्हते तर स्वतः मंडन मिश्रा होते. त्यांना शृंगेरीचे पीठाधिपती म्हणून नेमले गेले.

शंकराचार्यांची वयाची ३२ वर्षे पुर्ण होत आली होती. आपले जीवीतकार्य पूर्ण होत आल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. एव्हाना त्यांना टोकाचे वैराग्य प्राप्त झाले होते. आता ते केदारनाथला एका गुहेत सतत ध्यानस्थ असत. अशात एके दिवशी शंकराचार्य अचानक अंतर्धान पावले. त्यानंतर ते कुणालाही दिसले नाहीत.

शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय दर्शन शास्त्राविषयी थोडी माहिती घेऊ.

 

भारतीय दर्शनशास्राचे दोन प्रकार पडतात.

A) आस्तिक दर्शन

B) नास्तिक दर्शन

 

A) आस्तिक दर्शन हे वेदांना प्रमाण मानणारे दर्शनशास्र आहेत. त्यांचेही सहा प्रकार आहेत. दर्शनशास्रासमोर त्यांचे जनक लिहले आहेत.

१) सांख्य दर्शन – महर्षि कपिल

२) योग दर्शन – महर्षि पतांजली

३) मिमांसा / पुर्वमिमांसा दर्शन – महर्षि जैमिनी

४) न्याय दर्शन – महर्षि गौतम

५) वैशषिक दर्शन – महर्षि कणाद

६) वेदांत / उत्तर मिमांसा दर्शन – महर्षि व्यास

 

B) तीन नास्तिक दर्शन – वेदांना प्रमाण न मानणारे लोक दर्शनशास्त्रांना‘ नास्तिक दर्शन‘ म्हणतात. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

१) बुद्ध दर्शन – गौतम बुद्ध

२) जैन दर्शन – महावीर

३) चार्वाक दर्शन / लोकायत दर्शन – ब्रहस्पती

 

आस्तिक दर्शनातील वेदांत दर्शनाचे पाच उपप्रकार आहेत.

१) द्वैत – मध्वाचार्य

२) अद्वैत – शंकराचार्य

३) विशिष्ट अद्वैत – रामानुजाचार्य

४) द्वैत अद्वैत – निम्बार्काचार्य

५) शुद्ध अद्वैत – वल्लभाचार्य

 

वेदांत दर्शनात तीन तत्वांच्या संबंधाबद्दल चर्चा केली आहे.

जगत – निर्जीव गोष्टी (शरीर / निर्जीव ब्रम्हांड) – जड – चालवले जाणारे

जीव – आत्मा – चैतन्यमय – चालवणारा

ब्रम्ह – ईश्वर – सच्चिदानंद परमेश्वर

१) द्वैत वेदांत दर्शन –

मध्वाचार्य –जीव, जगत आणि ब्रम्ह हे सगळे वेगळे वेगळे आहेत.

 २) अद्वैत वेदांत दर्शन –

शंकराचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. अविद्येमुळे माया निर्माण होते आणि मायेमुळे या तिघांमध्ये भेद असल्यासारखे वाटते.

 ३) विशिष्ट अद्वैत वेदांत दर्शन –

रामानुजाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह हे एकच आहेत. पण मायेमुळे नव्हे तर ब्रह्मामध्ये स्वगत भेद (शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये भेद) असल्याने ते वेगळे वेगळे झाले आहेत. जीव आणि जगत ब्रह्मापासून जन्म घेतात.

४) द्वैताद्वैत / भेदाभेद वेदांत दर्शन –

निम्बार्काचार्य – जशी लाट आणि समुद्र वेगवेगळे आहेत आणि एक सुद्धा आहेत तसेच जीव, जगत आणि ब्रम्ह वेगवेगळेही आहेत आणि एक सुद्धा आहेत.

 ५) शुद्ध अद्वैत – वैष्णववाद –

वल्लभाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. जीव आणि जगत हे सुद्धा केवळ ब्रम्ह आहेत. मायेमुळे जगत वेगळे वाटत असले तरी माया सुद्धा ब्रम्हाचाच भाग असल्याने ती सुद्धा ब्रम्हच आहे.

शंकराचार्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

 – समाप्त – 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवनाचं सार… – लेखक : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ जीवनाचं सार… – लेखक : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

आयुष्य फार सुंदर आहे  

खिशातून ५०रुपयाची एक नोट जरी पडली तर कावराबावरा अन् बेचैन होणाऱ्या माणसात आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही. तो बिनधास्तच वागतो.काय दुर्दैव आहे !

स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका, साहेब! अहो, पैसातर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत ! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरी!

काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पितो.

माणूस मात्र समजतो: मी जगतोय!

माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत !

तर चला, ‘उरलेले’आयुष्य ‘अवशेष’ बनण्यापूर्वी त्याला ‘विशेष’बनवूया!

‘पासबुक’आणि ‘श्वास बुक’, दोन्ही भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.

म्हणून

एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.

 आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?

जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.

रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.

रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंही जायचं नाही.

ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.

बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.

ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.

मित्रांनो जीवन सुंदर आहेच.फक्त आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले वर्षभर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देणारी आमची प्राजक्ता गेली…हे जरी कधी तरी घडणार हे अटळ होते, तरी प्रत्यक्षात ती जाणे ही गोष्ट पचवणे खूपच अवघड जात आहे..

प्रकाशभावजी आणि दिप्ती यांच्या संसारात प्राजक्ता म्हणजे तसं उशिरानेच उमललेले हे सुकुमार फूल! सांगलीला आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्याने ती जन्मल्यापासूनच मी तिला पाहत होते. तिच्याविषयी काय बोलावे? खरोखरच गुणी मुलगी होती ती! लहान होती तेव्हा इतके शांत होती की घरात लहान मुल आहे हे सुद्धा कळू नये! लहानपणापासून अभ्यासात हुशार,देखणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, भरपूर मित्र-मैत्रिणी असणारी, स्वभावाने शांत पण तरी तितकीच स्वतःची मते ठामपणे मांडणारी अशी प्राजक्ता इंजिनियर झाली! अशी ही सुंदर गुणी मुलगी.

ओंकार आणि तिचा प्रेम विवाह झाला. लग्नानंतर दोघेही जर्मनीला गेले. तिच्या आयुष्यातील परमोच्च सुखाचा काळ असेल तो! दोघेही समरसून उपभोगत होते, पाच सहा वर्षाच्या नोकरीनंतर दोघांनीही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि इथे आल्यावर दोघांचेही जॉब चालू झाले..

सर्व काही चांगले चालू असताना अकस्मात तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला, हार्टचे आॅपरेशन झाले आणि त्यांचे महिनाभराचे आजारपण चालू असतानाच प्राजक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले. बाबांना हे कळू नये म्हणून तिने आटोकाट प्रयत्न केले. शेवटी बाबा गेल्यावरच तिचे खरे आजारपण सुरू झाले…

ओंकार आणि प्राजक्ताने  प्राजक्ताचे कॅन्सरचे निदान झाल्यापासून शर्थीचे प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या उपचारांना तिने धैर्याने तोंड दिले. ओंकारची साथ ही खरोखरच प्रचंड होती. त्याच्या आधारावरच तिचे आयुष्य चालू होते.. एलोपथी, होमिओपॅथी, टार्गेट थेरपी ट्रीटमेंट, आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार तिने

केले. गेले वर्ष  या सर्वांमध्ये तिची आई, बहीण, मेव्हणे सर्व साथ देत होते…. पण कॅन्सर हा असा काही रोग आहे की,  त्याचा शेवट मृत्यूकडेच जातो..काही सुदैवी उपचारानंतर त्यातून बरेही होतात .. किंवा काही काळापुरते आयुष्य ही वाढते. ….

भारतात आल्यावर वाकड येथे त्यांनी मोठा फ्लॅट घेतला होता. हौसेने घराची सजावट केली होती. उमेदीचे वय होते.. पण नशिबात वेगळेच वाढून ठेवले होते. कसेबसे पाच सहा महिने त्या फ्लॅटवर ते राहिले असतील आणि तिचे दुखणे वाढले. 20 नोव्हेंबरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अक्षरशः रोगाशी झगडणे चालले होते. शेवटी सात जानेवारीला तिला घरी आणले. स्वतः प्राजक्ताही आपल्या दुखण्याबरोबर खंबीरपणे लढत होती, पण प्रयत्न करणे आपल्या हाती, यश अपयश सगळं परमेश्वराकडे..

हॉस्पिटल मधून घरी आणल्यावरही प्रत्येक श्वासासाठी तिला झगडावे लागत होते. ऑक्सिजन सिलेंडर बिचारा आपले काम करत होता, पण तिचे शरीर साथ देत नव्हते. जगण्याची मनापासून जिद्द होती, उमेद होती, मेंदू कार्यरत होता.. स्वतः आपल्या औषध पाण्याविषयी शेवटपर्यंत जागरूक होती. मृत्यूला चुकवायची निकराची लढाई चालू होती. वय किती तर अवघे पस्तीस पूर्ण! ही काय जायची वेळ होती का? जगेन मी, जगेन मी असा एक एक दिवस जात होता… पण शेवट त्याच्या हातात..

मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. वाटत होतं, आजचा दिवस तरी जाऊ दे ,अलीकडे तिला बोलता येत नव्हते, पण खुणेने किंवा लिहून सांगू शकत होती, पण आज मात्र सकाळपासून सगळं हळूहळू शांत होत चाललं होतं..  हे आमचं प्राजक्ताचं फुल आता कोमेजायला लागले होते…,.. स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्राजक्त हळूहळू पुन्हा स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत होता! आपल्या छोट्याशा आयुष्यात मिळेल तेवढे सुख तिने घेतले आणि इतरांनाही आनंद दिला. जसं प्राजक्ताचे फुल जास्त काळ टिकत नाही, एकदा का झाडावरून खाली जमिनीवर पडले की फार कमी काळ राहते. लवकरच सुकते. त्याचे आयुष्यच तेवढे! ‘प्राजक्त’फुलाचा रंग, गंध हे सगळे अल्पकाळ असते. तशीच ही आमची प्राजक्ता! सुंदर, गुणी मुलगी अकाली गेली.. स्वर्गातील आपल्या स्थानी! ते प्राजक्ताचे फुल गळून पडले कायमचे! आम्हाला सुगंध देत राहील! प्राजक्त फुलासारखं नाजूक, निर्मळ, छोटसं आयुष्य संपलं तिचं!ती गेली, पण कायमच हा प्राजक्त आमच्या मनात राहील!

भावपूर्ण श्रद्धांजली !

  उज्वला काकू..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य

भारतात आजवर अनेक महान व्यक्तीमत्वे  होऊन गेली. त्यांचे कार्य इतके महान होते की शेकडो वर्षांनंतरही भारतीय समाज त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञ आहे. ती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय समाज या महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो.

आज अशाच एका अलौकिक व्यक्तिमत्वाची माहिती घेऊ या !

वैशाख शुक्ल पंचमी ! आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस !

… सहा भारतीय दर्षणांपैकी प्रसिद्ध अद्वैत वैदांत दर्शनाचे जनक आणि प्रणेते,…. ब्रम्हसुत्रावर भाष्य, १० प्रमुख उपनिषदांवर भाष्य, विवेकचुडामणी, उपदेशसहस्री यासारख्या ३०० पेक्षा जास्त ग्रंथांचे निर्माते,… शास्रार्थात प्रकांड पंडितांना नम्रपणे नमवत धर्म दिग्विजय करणारे पंडित , … 

जगतगुरू आदी शंकराचार्यांची आज जयंती.

सामान्य मनुष्याला शेकडो वर्षात जे कार्य साध्य होणार नाही ते केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात साध्य करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व !

केरळ मधील चेर राज्यात पेरीयार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कलदी हे गाव होते. हे गाव आजच्या कोची शहराजवळ आहे. या कलदी गावात शिवगुरू आणि सुभद्रा(आर्यांम्मा) भट्ट हे ब्राह्मण जोडपे राहत होते. लग्नाला बरेच वर्षे झाली तरी दोघांना मुलबाळ मात्र होत नव्हते. दोघे शंकराचे निस्सिम भक्त होते. एक दिवस शिवगुरूला स्वप्नात श्रीशंकराने दर्शन दिले. सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र किंवा साठ वर्षांचा कमीबुद्धी पुत्र … यापैकी एकाची निवड करायला श्रीशंकराने शिवगुरूला सांगितली. यावर शिवगुरूंनी सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.

पुढे यशावकाश माता सुभद्रा गर्भवती राहिली आणि वैशाख शुक्ल पंचमीला त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. श्रीशंकराच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून बालकाचे नाव शंकर ठेवले.

शंकराचार्यांच्या जन्मसालाबद्दल मात्र एकवाक्यता नाही. वेगवेगळे विद्वान लोक शंकराचार्यांचा काळ वेगवेगळा मानतात. अगदी इस पुर्व 491 पासून इ.स. नंतर 897 पर्यंत वेगवेगळ्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला होता असे वेगवेगळे लोक मानतात.

शृंगेरीपीठानुसार महाराज विक्रमादित्याच्या कार्यकाळाच्या चौदाव्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला. पण विक्रमादित्य ही पदवी अनेक राजांना दिली गेली, ज्यांनी प्रजेवरील सर्व कर माफ केले होते. अगदी शंकराचार्यांनी उभारलेल्या चार पीठांमध्येही शंकराचार्यांचे जन्मसालाबद्दल एकवाक्यता नाही.

शृंगेरी शारदापीठ – इ.स.पूर्व 483

जगन्नाथपुरी गोवर्धन पीठ – इ.स.पूर्व 484

बद्रिकाश्रम ज्योतिर्मय पीठ – इ.स.पूर्व 485

द्वारकापीठ – इ.स.पूर्व 491

वयाच्या तिसऱ्या वर्षीच बाल शंकरच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. शंकरचे पाचव्या वर्षी यज्ञपवीत संस्कार झाले आणि शंकर शिक्षणासाठी गुरुगृही गेला. पण केवळ दोन वर्ष गुरूगृही राहून बालक शंकरने तात्कालिक शिक्षण व्यवस्थेतील सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवले. शिकवायला नवीन काहीही बाकी न राहिल्याने गुरूने सातव्या वर्षीच शंकरला स्वगृही परत पाठवून दिले. बाल शंकरने वयाच्या सातव्या वर्षी प्रकांड पंडिताला लाजवेल इतके ज्ञान मिळवले होते.

या ज्ञानामुळे शंकरला बालवयातच वैराग्य प्राप्त झाले होते. त्याला संन्यास घ्यायचा होता. पण आई आपल्या एकुलत्या एक पुत्राला संन्यास घ्यायची अनुमती देईना. शंकर आठ वर्षाचा असताना एकदा नदीत स्नान करत होता. इतक्यात मगरीने बाल शंकरचा पाय पकडला आणि ती त्याला खोल पाण्यात ओढू लागली. त्या अवस्थेतही बाल शंकरने आईला संन्यास घेऊ देण्याची विनंती केली. शेवटी आईने त्याची विनंती मान्य केली. त्यावर मगरीने शंकरचा पाय सोडला. बाल शंकरच्या मनासारखे झाले. संन्यासदिक्षा घेऊन बाल शंकर गुरूच्या शोधात बाहेर पडला.

पण इतक्या प्रभावी बालकाला गुरूही तसाच हवा. महिष्मती राज्यात नर्मदा नदीच्या तीरावर ओंकारेश्वर येथे गोविंद भगवतपादांचा आश्रम होता. ते महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते. बाल शंकरने त्यांचे शिष्यत्व पत्करण्याचा निर्णय घेतला. दोघांची भेट झाल्यावर गोविंदपादांनी बालशंकरला त्याचा परिचय विचारला. त्यावर “मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहम्…” असे सहा कडव्यांचे निर्वाण षट्कम हे पद्य सांगितले. बालशंकरने भुजंगवृत्तात तयार केलेल्या या सुंदर निर्वाण शटकात बालशंकरने आपला परिचय केवळ “शिवो अहम्” असा करून दिला. असा बुद्धिमान शिष्य मिळाल्याने गोविंद भगवतपाद सुद्धा सुखावले. त्यांनी बाल शंकरला आपला शिष्य बनवले. त्यांनी बालशंकरला वेदांत, अष्टांगयोग आणि उपनिषदांचे ज्ञान भरभरून दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शंकर तेथेच आचार्य म्हणून काम करू लागले. शंकर आता शंकराचार्य झाले.

शंकराचार्यांना ब्रम्हसुत्रावर भाष्य करण्यासाठी इच्छा होती. त्यासाठी गुरूंच्या परवानगीने शंकराचार्य काशीला गेले. तेथे त्यांनी ब्रम्हसुत्र, प्रमुख दहा उपनिषदे आणि भगवत गीतेवर भाष्य लिहिली. काशीला गंगेच्या तटावर शंकराचार्यांनी अनेक विद्वानांसोबत शास्त्रार्थ केला. एकदा एका विद्वान ब्राम्हणाबरोबर सुरू झालेला शास्त्रार्थ तब्बल आठ दिवस चालला. शंकराचार्यांच्या ज्ञानावर समाधानी होऊन त्या ब्राम्हणाने शंकराचायांना भरभरून आशीर्वाद दिला….  शंकराचार्यांचे १६ वर्षांचे आयुष्य वाढून ३२ वर्षांचे होईल असा आशीर्वाद.  प्रत्यक्ष चिरंजीव वेदव्यास ब्राह्मणरूपात शंकराचार्यांशी शास्त्रार्थ करत होते असे मानले जाते. त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.

 –क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘दैव आणि कर्म…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘दैव आणि कर्म…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

आमच्या गल्लीत एक दुकानदार आहे.

मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले, “बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देऊ शकतोस का?”

तो म्हणाला, ” तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.”

मी विचारले, “माणूस मेहनत करतो. मग त्याला यश मिळाले,की तो म्हणतो, देवाने हे यश पदरात टाकले. मला सांग, दैव श्रेष्ठ की मेहनत?”

मला वाटले की, याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो.

बोलती  त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.

त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, “मला सांगा. तुमचा बँकेत सेफ डिपॉजीटचा लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मॅनेजरकडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडतो.अन्यथा नाही.बरोबर ना?” मी म्हणालो,  “बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी काय संबंध?”

तो म्हणाला,  “जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तशाच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या आहेत . एक मेहनतीची चावी, ती आपल्या पाशी असते. तर दुसरी नशीबाची (दैव) चावी. ही त्या परमेश्वरापाशी असते.

आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची. जेव्हा परमेश्वर त्याच्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल. अन्यथा नाही.

यशासाठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहेत . त्याशिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.

मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुनही उपयोग नाही.

यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ती दोन्ही आवश्यक आहे.

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆

हा हाय तुझ्या गोड गातची गाना

छळी विरहवेदना प्राणा॥ध्रु.॥

 

सुमकोमलशा प्रेमिं अनंती तुजशी

हे प्रीति, धरुनि हृदयाशी

हा कांहि असे काळ म्हणुनि या जगतीं

विस्मरुनि हीहि गे वृत्ती

जों दंग अम्ही संगसुखासव पीतां

अनुभवित पलीं शाश्वतता

हा हाय विरह तो आला

प्रेमाच्या आनंत्याला

आरोपुनि त्याच्या काला

जरि अंताला। अम्हि तया पलां

विसरलो तरी अंत अम्हां विसरेना

छळी विरहवेदना प्राणा॥१॥

 

ना लागेना गोड अतां मज कांही

मज कुठेंहि करमत नाहीं

ये विजना त्रासूनि जनीं मी आणी

त्रासूनि जनां मी विजनीं

मी केश पुन्हा विंचरीं, पुन्हा विखुरीं

विस्मरत गोष्ट जी स्मरली

फिरफिरुनि तनु लव बसते

बघबघुनि नेत्र लव मिटते

परि हाय अनुक्षण मन तें

झुरझुरूनिया। झुरतेंचि, तया

पल विरम नसे, करित सखी तुझ्या स्मरणा

छळी विरहवेदना प्राणा॥२॥

 

फुलताचि फुलें सहज खुडी मी मोदें

हा तोचि चुरगळूं खेदें?

कीं खोंवुं फुलां केशकलापीं तव ये

तुज बाहुं कुठें अजि सखये?

तव पूर्वीचे प्रेमदूत दिसतां तें

हसतचि झुरें मी खेदें

या इष्ट जनीं समजवितां ‘लव खाई’

लागली भूकही जाई

स्मरत कीं कसे म्यां रुसुनी

बसतांच तुवां मन धरुनी

तव कवल देत मग वदनीं

मृदु पालविलें । मधु कालविले

मधु अधरीं तें करित अमृत जे अन्ना

छळी विरहवेदना प्राणा॥३॥

 

हा हाय अतां भेट अम्हांसी कुठली

आशाहि अजि मज विटली

तरी काकुळती येत विनविलें होते

आधींच का न म्यां तैं तें

कीं भेटीसी हीच एकली राती

ये झणीं नको दवडूं ती

मी समयांच्या सारसारुनी वाती

पाहिली वाट त्या रातीं

पद पथें जरा वाजतांच दचकावे

दूरता शून्य बैसावें

तो दार अहा किलकिललें

हो तूंचि । मज झणीं स्वकरें

हृदिं हुंदहुंदुनी धरिलें!

विसरुनि राती। लवचि उरे ती। भोगुं संगतीं

ढकलिली तुला दूर, धरुनि अभिमाना

छळी विरहवेदना प्राणा॥४॥

 

विरहाग्नीनें पुष्ट अश्रू हे आणि

विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी

नांदोत असे करित परस्परपूर्ती

हा विरह, आंसवें आणि तीं

मज सुखही दे दुःख, दुःखची तैसे

हो जपी जपी फलद तुम्हां हो तुमची

मज आणि तपस्या माझी

ती शिला नको वा मूर्ति

भावने नसूनी दिसती

आलिंग्य, चुंब्य असती ती

प्रत्यक्ष अशी। तव मूर्ती मशी। समचेतनशी

तींतची दिसो देव माझिया भुवना

छळी विरहवेदना प्राणा॥५॥

  –  कवी – वि दा सावरकर

 

रसग्रहण

८         काव्यानंद  :

            विरहोच्छ्वास 

            कवी…..वि.दा.सावरकर 

            रसास्वाद: शोभना आगाशे

रसग्रहण

असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण  केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.

मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.

सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन,  हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित  शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.

अनेक ठिकाणी कवीने

शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली

दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.

याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,

“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा

“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.

श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ  होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित  करार) व हे तीनही अर्थ  इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.

रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

राम मला माहीत झाला तो जयश्री आजीमुळे… राम तिचा सखा होता. आजी होती तेव्हा मी लहान होते त्यामुळे-  “काहीही झालं, अडलं तरी ‘ राम‘ म्हणायचं आणि पुढे जायचं” म्हणजे काय हे तेव्हा मला समजायचं नाही. मोठी होत गेले तशी आजीचं हे वाक्य समजत गेलं की राम म्हणजे विश्वास ठेवण्याची कुवत,  अडलो थकलो तर विश्रांती घेण्याची पण प्रयत्न न थांबवण्याची नियत, राम नाम म्हणजे थेरपी… प्रॉब्लेम वरून लक्ष डायवर्ट करून सोल्युशन वर केंद्रित करण्यासाठीची!

खरंच आजीचा तरुणपणीचा काळ पहिला तर…

तिचे वडील शिक्षक असल्याने आजीला पुरेशी स्वप्न त्यांनी दिली… शिकण्याची, स्वाभिमानाची… पण मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करणं त्याकाळी प्रायोरिटी वर नसायचं…चार मुलीत मोठी असलेल्या तीचं काळानुरूप लग्न झालं. सगळी माणसं, मुलं,घर सांभाळण्यात कितीदा तिच्या इच्छा आकांक्षा ना दुय्यम राखलं गेलं असणार. त्याकाळी इंटरनेट द्वारा जग खुलं झालेलं नव्हतं मात्र लायब्ररीत जाऊन पुस्तक आणून ते सवडीनं वाचावं अशी तिची इच्छाही कितीदा पूर्ण करायची राहून जायची. अशा सगळ्या खटाटोपात तिला पोझिटिव ठेवणारा तिचा राम होता.  त्या काळी नवरा नवराच असे मित्र नसायचा! कौन्सेलिंग नव्हतं, मंडला आर्ट नव्हती, ऑनलाईन योगा झुंबा क्लास नव्हते, म्यानियाक शॉपर्स साठी मॉल्स नव्हते, किटि पार्टीज साठी खेळते पैसे नव्हते,  फेमिनिझम चे वारे नव्हते. अशा वेळी जीवनातलं मळभ हटवून प्रकाशाकडे नेणारा तिचा सखा “राम” होता.

आपल्याकडे लहान मुलांना आपण खंबीर होण्याऐवजी घाबरायलाच शिकवतो लहानपणापासून… अभ्यास केला नाहीस तर काहीच मिळणार नाही पुढे, मस्ती केलीस तर बुवा येईल! पण “जा ग सोने… तुला वाटतंय ना हे करावं? तू सातत्याने प्रयत्न करत रहा, राम आहेच बरोबर”असं सांगणारी माझी आजी होती. त्यामुळे घाबरायपेक्षा हिमतीनं पुढे जायला शिकले. तिनी माझ्यात राम बिंबवला. माझ्या मनात राम मंदिर बांधलं तिनं!

22 जानेवारीला राम मंदिर सोहळा आहे. सध्या राम खरंच सगळीकडे ट्रेण्डींग आहे! रामाच्या अक्षता, रामाचा शेला, राम मंदिराची घरी ठेवण्यासाठी प्रतिकृती!! पॉलिटिकल इंटरेस्ट आणि काहींच्या वेस्टेड इंटरेस्ट च्या दृष्टीनं हे बरोबर आहे. एखादी गोष्ट, काम सांघिक भावनेने पुढे नेणे आणि त्याचा सोहळा करणेही गैर काहीच नाही! पण राम साजरा करणे म्हणजे फक्त लाईटींग आणि दिवे लाऊन स्वतःच घर उजळणे नाही… तर स्वतः मधला प्रकाश जागृत ठेवून ज्याच्या कडे कमी उजेड आहे त्याच्यासाठी ज्योत होणे.

माझा राम, ट्रेण्ड बदलला की आउटडेटेड होणारा नाही… तर पुढच्या काळासाठी मला सतत अपडेट करणारा आहे! मला अशी आजी मिळाली की जिने मला खरा राम समजावला… तोच मला तुमच्याही लक्षात आणून द्यावा वाटतोय…

राम म्हणजे संकल्प, राम म्हणजे मनोनिग्रह. निगेटिव्ह वर पॅाझिटिवची मात म्हणजे राम. अगदी आळस झटकून साधं छोटं पाहिलं पाऊल उचलणं म्हणजे राम. तो मनी ठेवूया.. कायमसाठी! अन्यथा आल्या ट्रेण्ड नुसार एक दिवस स्टेटस वा रील लावणं ह्यात काही ‘ राम‘ नाही बरं!!

लेखिका : सुश्री सुखदा भावे- केळकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

? मनमंजुषेतून ?

☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

आमची आत्या जाऊन पंधरा दिवस होऊन गेले.  आत्या ही फक्त नावापुरतीच आत्या होती , ती आम्हा भावंडांसाठी माहेरात असणारी जणू दुसरी आईच. तिच्या लग्नानंतर एका वर्षातच नवर्‍याने मांडलेल्या छळामुळे आमचे चुलते (आबा )यांनी तिला परत आमच्या घरी आणले. पुन्हा तिला परत सासरी नांदायला पाठविलेच नाही. आणि आत्याने पण कधी नांदयला जायची इच्छा व्यक्त केली नाही. तेंव्हा पासून ती माहेरात राहिली.  आपल्या तीन भावांचे संसार आणि त्यांची मुले संभाळण्यात ती रमली. तिने पंचवीस माणसांचे कुटुंब घट्ट मायेच्या मिठीत बांधून ठेवले. नात्यांचे सर्व मोती प्रेमाने एकाच मजबूत धाग्यात गुंफून, त्याची गाठही तितक्याच ओढीने घट्ट आवळली. आज आम्हा भावंडांमध्ये  एकमेकांबद्दल  जिव्हाळा , प्रेम, आपुलकी आहे  ती सर्व माझ्या आत्यानी केलेल्या  संस्कारांमुळे आहेत. आत्या जितकी प्रेमळ होती तितकीच रागीट सुध्दा होती. शाळेत गणिताचे गुरूजी आणि घरात आत्या यांचा मार खाऊनच आम्ही घडलो. 

आत्याला तिच्या स्वतःच्या संसाराचा अनुभव नव्हता. तरीही तिने अनेकांचे संसार उभे केले  आणि चांगल्या रितीने संसार कसा करायचा याची  शिकवणसुध्दा दिली. आत्या जणू अनुभवांचे एक पुस्तक होती. चाली-रीती, संस्कार यांची ती वारसदार होती. ती अशिक्षित होती. संस्कृतीची जपणूक उत्तम करत होती. आमच्या कुटुंबातच नव्हे तर गावात तसेच पै-पाहुण्यांच्यात  कोणतेही मंगलकार्य असले की आत्या तिथे हजर. तिच्या हातूनच सर्व कार्यक्रम पार पडायचे. तिला स्वतःला सुध्दा अशा दगदगीत वाहून द्यायला आवडायचे. 

आत्याच्या स्वतःच्या संसाराची वाताहात झाली पण भावांच्या संसारात येणारे चढउतार याचा तिने कधीच त्रागा केला नाही. तिने कधी कोणतेच नाते तुटण्याइतपत ताणले नाही. पंचवीस माणसाच्या कुटुंबात कधीच तिने नात्या-नात्यात  दुरावा येऊ दिला नाही.  मग जावा-जावा असोत अथवा भाऊ-भाऊ असोत. कधी एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागलेच तर तिच्या काळजाचा थरकाप व्हायचा. तिची चिंता वाढायची. तिने प्रयत्न केले ते पडलेल्या फटींना सांधायचे. मायेचे मलम लावून तिने नात्यांना उभारी दिली. आत्याचे संपुर्ण आयुष्य हे फक्त रांदणे आणि सांधणे यातच गेले. 

आत्याने  आम्हां बहिणींना तिच्या सगळ्या चांगल्या सवयी लावल्या.  तिचेच संस्कार घेऊन आम्ही सासरी नांदायला गेलो. म्हणून मी आज अभिमानानी सांगते, “माझ्यात जे काही चांगले आहे ती आत्याची माझ्याकडे  ठेव आहे. “

आत्याच्या बाबतीत विशेष वाटते ते हे की, स्वतःचे अपत्य नसताना दुसऱ्याच्या लेकरांवर अतोनात प्रेम करणे ,त्यांचे भविष्य चांगले घडावे याकरता सतत  प्रयत्न करणे. दुसर्ऱ्याचे संसार सजविण्यात, सावरण्यात स्वतःचे आयुष्य झिजविणे.  आत्या, हे सारं तूच करू जाणे!  गावात येणारे ग्रामसेवक, तलाठी, शाळेतील शिक्षक, माल विकायला येणारे फिरस्ते यांना कधी आत्यानी उपाशीपोटी जाऊ दिले नाही. हे सगळेजण आत्याला त्यांची मोठी बहीण मानायचे. 

आपले सर्व आयुष्य तिने एकाकी घालविले पण धुतल्या तांदळाप्रमाणे तिचे चारित्र्य आणि मन  होते.

अशी आत्या आज आमच्यात नाही पण तिच्या आठवणी रोज मनास खोलवर हेलावून टाकतात. नकळत डोळे भरून येतात आणि डोळ्यांतून ओघळते ते एका थोर पुण्यवती आईचेच वात्सल्य. “आत्या तू आमच्यात होती म्हणून  पंचवीस माणसाचे कुटुंब चाळीस वर्ष एकत्र होते  “

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी – भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ. 

आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.

– दादाभाई नौरोजी

अन्य क्षेत्रातली नानांची कामगिरीही थक्क करणारी आहे. ‘ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग’ या मुंबई त सुरू झालेल्या पहिल्यावाहिल्या कापड गिरणीचे नाना प्रवर्तक डायरेक्टर होते. गुजरात व सिंधशी दळणवळणासाठी, सन १८४५ मध्ये त्यानी, ‘बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली. ‘याग्रो हार्टिकल्चरल सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया’, ‘जिअॉग्राफिकल सोसायटी’ आणि धान्य व्यापार्यांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी ‘जॉईंट स्टॉक ग्रेन कंपनी’ या महत्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेतही, त्यांचाच पुढाकार होता. तसेच १८४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँक अॉफ वेस्टर्न इंडिया’चे ते प्रवर्तक संचालक होते. तर १८५७ मध्ये मुंबईत पहिले नाट्यगृहही बांधले ते नानांनीच.

नानांच्या कार्याची यादी इथेच संपत नाही. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विहार लेकची निर्मिती तर त्यांनी केलीच, शिवाय पाणीटंचाईच्या काळात रेल्वेच्या डब्यांमधून पाणी आणून, ते विहीरी व तळ्यांमध्ये ओतण्याची व्यवस्थाही त्यांनी करविली.

मुंबईच्या रस्त्यांवर खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. पण त्यांच्या अपु-या प्रकाशामुळे लोकांची गैरसोय होई, नि चोरचिलट्यांचं फावत असे. इंग्लंडमध्ये रस्त्यांवर ग्यासचे दिवे लावले जातात, ही गोष्ट कानावर येताच नानांनी, तशा प्रकारच्या दिवाबत्तीच्या सोयीसाठी, चिंचपोकळीला ग्यास कंपनी सुरू केली.मॉरिशसहून ऊसाचं बेणं आणून त्यांनी आपल्या बागेत त्याची लागवड केली.

अशा सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं नानांनी मुंबईत विणलं. त्यामुळेच आज मुंबईला आर्थिक राजधानीचा व आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महात्म्यामुळेच मुंबई ही प्रत्येक मराठी माणसाची स्वप्ननगरी बनली. आयुष्यात एकदा तरी या स्वप्ननगरीला भेट दिल्याशिवाय, त्याला आपलं जीवन असार्थक वाटू लागलं. त्यातूनच ‘जीवाची मुंबई करणे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. मुंबईवर कवणं रचली गेली. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी लिहीली. तर हिंदी चित्रपटातही मुंबईवर अनेक गीतं लिहीली गेली. ती गाजली, लोकप्रिय झाली.

आज आम्ही ‘आमची मुंबई, आमची मुंबई’ असं अभिमानाने म्हणतो. पण त्यातून मंबईविषयीचं प्रेम कमी, आणि प्रांतिक अस्मिताच अधिक डोकावते. डोकवे का ना, पण मग मुंबईच्या विकासातही आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आमची मुंबई म्हणण्याला अर्थ आहे. ज्या निर्जन मुंबईत एकेकाळी लोकांना यायची भीती वाटायची, त्या मुंबईचं नानांनी आपल्या परिसस्पर्शाने सोनं केलं. त्या सोन्याच्या मुंबईची आम्ही बकाल मुंबई करुन टाकली आहे.

सतीप्रथाबंदीसाठी राजा राममोहन राय यांच्यासोबत पुढाकार घेऊन नानांनी, नऊ वर्षे लढा दिला व सतीप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. सतीबंदीसाठीच्या त्यांच्या कार्याची गव्हर्नर जॉन माल्कम यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. नानांच्या लोकप्रियतेने प्रभावित झालेल्या सर फ्रेडरिक लिओपोल्ड यांनी आपल्या मुलाचं नाव ‘लिओनार्ड रॉबर्ट शंकरशेठ’ असं ठेवलं होतं.

सरकार दरबारी नानांच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावामुळे, पोटशूळ उठलेल्या नानांच्या हितशत्रूंनी, नानांवर १८५७ च्या उठावकर्त्यांना अर्थसहाय्य केल्याचे व आपल्या धर्मशाळेत त्यांना आश्रय दिल्याची बालंटं आणून, नानांच्या नावे पकडवॉरंट जारी करायला सरकारला भाग पाडले होते. पण हितशत्रुंचे हे कट नानांनी उधळून लावले.

ज्या काळात भारताच्या राजकिय, सामाजिक व औद्योगिक क्षितिजावर समस्त राष्ट्रीय नेत्यांचा, संस्था-संघटनांचा, उद्योजकांचा उदयही झाला नव्हता, त्या घनतमी, नाना जगन्नाथ शंकरशेठ हा शुक्रतारा, आपल्या तेजाने तळपत होता. म्हणूनच त्यांचे एक चरित्रलेखक डॉ. माधव पोतदार हे नानांना, ‘आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रपुरुष’ संबोधतात, तर नानांच्या जीवनावर “प्रारंभ” ही कादंबरी लिहीणारे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, नानांचा ‘आधुनिक भारताचा आद्य शिल्पकार’ असा सार्थ गौरव करतात. व्यक्तिगत पातळीवर नानांच्या कार्याचं महत्त्व जाणणारे अनेक आहेत. परंतु शासकीय पातळीवर मात्र नानांचं ऋण जाणणारा नि त्यातून उतराई होणारा कोणी नाही.

ज्यांचा शासनाने ‘भारतरत्न’ किताबाने गौरव केला पाहिजे, असे नाना जगन्नाथ शंकरशेठ उपेक्षेचे धनी ठरले आहेत. कारण नानांच्यामागे ना मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारं ‘सामाजिक पाठबळ’ आहे, ना पुरस्कारासाठी आराडाओरडा करणारी ‘शाऊटिंग बटालियन’ आहे. परिणामी मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा हा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईतही उपेक्षित आहे. मुंबईच्या विकासासाठी जातीनिरपेक्ष भावनेने, सढळ हातांनी आर्थिक मदत व भूमीदान करणा-या नानांच्या स्मारकासाठी मात्र मुंबईत जागा नाही, एवढी मुंबई कृपण नि कृतघ्न झाली आहे. हे पाहून नानांच्या आत्म्याला काय वाटत असेल…..

 डूबे हुओं को हमने बिठाया था,अपनी कश्ती में यारों।

और फिर कश्ती का बोझ कहकर, हमें ही उतारा गया॥

 हल्लीचे नेते राजकीय लाभाच्या शक्यतेखेरीज, कुणाचीच तळी उचलत नाहीत. आणि त्यांच्या राजकीय लाभाच्या गणितात, नाना मात्र नापास आहेत. शासनाची ही उदासिनता आणि ज्या दैवज्ञ सोनार जातीत नाना जन्माला आले, त्या ज्ञातीबांधवांची आत्ममग्नता खरोखर वेदनादायी आहे.

 सध्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ही मंडळी मुलांसमोर देशीविदेशी उद्योजकांचे आदर्श उभे करते, पण त्यांच्या आदर्शांच्या दोनशे वर्षं आधी, नाना जगन्नाथ शंकरशेट नामक, ‘फर्स्ट इंडियन आयकॉन’ होऊन गेला, हे त्यांच्या गावीही नाही. तर शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही त्याचं विस्मरण झालं आहे. इतकी प्रचंड अनास्था या युगपुरुषाच्या वाट्याला आली आहे. याला काय म्हणायचं.! वैचारिक दिवाळखोरी की भावी महासत्तेची मस्ती..! अपूज्यांची पूजा नि पूज्यांची अवहेलना करुन, भारत महासत्ता बनेल असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांचा ‘बनेलपणा’आहे, माझं अस्वस्थ मन मात्र म्हणते आहे.

या दिल की सूनो दुनियावालो,

या मुझको अभी चूप रहने दो।

मैं ग़म को खुशी कैसे कह दूं,

जो कहते हैं उनको कहने दो॥

समाप्त

लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वान्त सुखाय…… लेखिका – सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्वान्त सुखाय…… लेखिका – सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

खाऊचे डबे सगळे रिकामे झाले.इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर  लोकांसाठी करतो, ही मनातली तीव्र भावना.पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत.वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत.

तरीही..ठरावीक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही.मनात दबलेलं हसू हळूच ओठांवर आलं.मुलानांच कशाला,आपल्यालाही लागतंच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला.फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं.आता उघड उघड मान्य करावं झालं. आपलेसुद्धा,डबे खाऊने भरुन ठेवण्यात  अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…

स्वान्त सुखाय…!

चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच.

सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या.मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली, “बाहेर ये.बघ मी काय केलंय.तुला दाखवायचंय.” हँड एब्राँडयरी केलेला कॉटन कुर्ता त्यांनी मला उलगडून दाखवला.”व्वा! किती सुंदर वर्क, काकू!”मी त्या एंब्रॉयडरीवरून हात फिरवत म्हणाले.”आवडलं ना?छान झालंय ना ग?”

अर्थातच काकू. “किती नाजूक काम आहे हे.फार सुरेख.कलर काँंबिनेशनही परफेक्ट!”माझ्या नकळत…पावती देऊनही झाली.

“मैत्रिणीसाठी करतेय.तिला सरप्राईज देणार आहे.आणि ती जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे.शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो गं आपण.पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो.हो ना?”

मी म्हटलं, ” हो.स्वांत सुखाय…!”

“काकू, मुलगा झाला मला.तुम्ही आठवणीने गरम गरम तूप-मोदक आणून खाऊ घातलेत  मला प्रेग्नसीत!आठवतंय काकू?”माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयू आनंदाने सांगत होती.गणपती बाप्पाच आलेत!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला.

माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करून खाऊ घालण्यातला आनंद  मीच अनुभवणं.म्हणजेच तर

 स्वान्त सुखाय!

नव्वदी पार केलेले आजोबा.मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात.क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती .मीच एकदा त्यांना म्हटलं, “कशाला, आजोबा, या वयात झाडता?” “मला आनंद मिळतो बाळा. उगाच का कोण करेल?

माणूस फार लबाड, स्वतःच्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो.

त्यापेक्षा सरळ मान्य करावं,

स्वान्त सुखाय..

मला आजकाल हा स्वान्त सुखाय चा मंत्र फार पटला,रुचला आणि पचनीदेखील पडला.

जिथे आपल्या क्षुल्लक अस्तित्वाने जगतकार्यात तसूभरदेखील फरक पडणार नाही,तिथे माझं कर्म कुणासाठी का असणार?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं.त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं.म्हणून आपण करत असतो.अहंकाराचे,    अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की,त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही.’मी केल्याचा’ काटा,ते सुख,तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणिवाच बोथट होऊन जातात.

परवा आईला आंघोळ घालताना मी तिच्याभोवती  पाणी ओवाळत तिला म्हटलं,”झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ.चला आता.पावडर गंध लावायचं ना तुला?” आजाराने शिणलेला तिचा चेहरा खुदुकन हसला. आणि ती म्हणाली, “तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग!”

मी म्हटलं, “आता तू लहान झालीस.होय ना?”

तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला.

तिचं हसणं, तिचा तो ओला स्पर्श!

सुखाची भाषा याहून काय वेगळी असणार!

स्वान्त सुखाय चा हा किती देखणा आविष्कार!

माऊली म्हणतात-सत् चित आनंद.म्हणजे आत्म्याचे मूळ स्वरूप चिरंतन सुख आहे.तो सदैव सुख असतो.विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासून सुखापर्यंत सारं सारं आपल्यातच तर आहे.बस्स्! आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला  हवाय.इतकंच तर!

लेखिका:सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares