मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी एका मित्राला फोन केला.’ तुला नव वर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा !’ तो एकदम चक्रावून म्हणाला,’ तुला कसं कळलं माझ्याकडं वर्षा कामाला लागली म्हणून?’

त्यामुळं ‘वर्षा’बद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी मी ‘ईयर’ हा शब्द वापरण्याचं ठरवलं व दुसर्‍या मित्राला फोन केला.’एंजाॅय न्यू इयर!’ तो माझ्यावर चिडलाच. नंतर मला त्याच्या चिडण्याचं कारण समजलं.

त्याला ऐकायला जरा कमी येतं. त्यामुळं त्यानं नवीन कर्णयंत्रं विकत घेऊन ती आजपासून वापरायला सुरुवात केली होती. व मी त्याला हिणवण्यासाठी ‘ Enjoy new ear’ असा फोन केल्याचं त्याला वाटलं.

या प्रसंगामुळं  मी ईयरऐवजी  ‘साल’ चा प्रयोग करायचं ठरवलं.

मी तिसर्‍या मित्राला  शुभेच्छा दिल्या ,’ तुला  साल मुबारक !’

हा मित्रही भयंकर चिडला कारण तो आजच सालीवरुन घसरुन पडला होता!

चवथ्या मित्राचंही असंच झालं.आज तोही सालीवर भयंकर चिडलेला होता आणि तोही आज सालीवर घसरला होता. कारण त्याच्या सालीनं आज त्याच्या बायकोला घरी आणून सोडलं होतं!

मग ‘साल’ ला बाद करुन सालाबादप्रमाणं एका मैत्रिणीला मी ‘नव संवत्सरकी शुभकामनाएं’ असा संदेश पाठवला . ती माझ्यावर खूपच नाराज झाली. कारण तिला एक सवत होती.तिला मी नेहमी संवत्सर (सवत+मत्सर) म्हणून चिडवायचो.माझ्या संदेशावरुन तिला ‘आणखी एखादी सवत येवो,’ अशी मी इच्छा प्रकट केल्याचा संशय आला.

शेवटी मला रशियन भाषा येत असल्यानं माझ्या रशियन अवगत असणार्‍या मैत्रिणीला मी ‘नये गोद की शुभकामनाएं’ असा मेसेज पाठवला. ती विधवा असल्यानं नवीन गोदचा प्रश्नच नाही, अशी तिची धारणा होती.रशियनमधे ‘गोद’चा अर्थ वर्ष असा होतो, हे ती विसरली होती.तिनं खूप अकांडतांडव केलं व मी दिसलो, की ती मौनव्रत धारण करायला लागली.

मला हेच कळेना नवीन वर्षाला वर्ष म्हणावं की साल म्हणावं की इयर म्हणावं  मग संस्कृतमधलं ‘संवत्सर’ व रशियनमधलं ‘गोद’ तर दूरच राह्यलं !

मग मी ‘वर्षा’चा नाद सोडला व महिन्यांवर आलो. मी माझ्या  एका मैत्रिणीला संदेश पाठवला,’ तुला येणार्‍या महिन्यांमधे अजिबात त्रास न होवो.’ तिनं फणकार्‍यानं उत्तर पाठवलं,’ माझा महिन्याचा त्रास ही माझी खाजगी बाब आहे. त्यांत तू दखल न घेणं चांगलं !’                                               

मी सर्दच झालो. तरी मी शुभेच्छा पाठवण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळं मी महिन्यांच्या ऐवजी दिवसांवर यायचं ठरवलं व तिला परत लिहिलं,’ तुझा कांहीतरी गैरसमज होतोय. तुला चांगले दिवस जावोत असं मला म्हणायचं होतं.’  झालं!ती नवर्‍याला घेऊन माझ्याशी भांडायलाच आली.मी नवर्‍याला वर्ष, महिने व दिवसांचं स्पष्टीकरण दिलं तेव्हां तो म्हणतो कसा,’ आता  वर्ष, महिने वा दिवस अशी काळाची गणती सोडून द्या नाहीतर तुमची काळाशी गाठ पडेल व नंतर घटकाही मोजाव्या लागतील.’

माझ्या माय मराठीनं इथं हात टेकले. खूप विचारांती  मी  त्यातून पुढील तोडगा काढला, तो आपणा सर्वांच्याही उपयोगी पडेल .                          

‘माझ्या सर्व सुहृदांना नूतन वर्षाच्या (आपण घ्याल त्या अर्थानं) मनापासून शुभेच्छा !

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे  ☆ शकुनी,एक धगधगता सुडाग्नी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? क्षण सृजनाचे ?

शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

 

काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा

अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा

देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र

अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र

काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली

जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली

निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली

षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली

माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व

निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व

गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!

कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या  नितीनं!

बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!

भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं

 कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला

हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!

मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही

मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही

माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा

हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा

अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते

सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते

युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील

खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!

 

कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –

काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!

भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका  सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.

एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.

युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय  इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे  त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.

कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.

कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास  आले नव्हते.  तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!

गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘  यांच्यावर आधारित

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास  गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

अल्प-परिचय

जन्म – ६ जून १९६८

शिक्षण – बी कॉम, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी,

विशेष – वाचनाची व लेखनाची आवड, काही लेख प्रसिद्ध, -चांदोबा ते कैवल्याच्या चांदण्याला ह्या लेखाचे कोल्हापूर आकाशवाणी वर वाचन, सोशल मीडियावर अनेक लेख प्रसिद्ध.

? विविधा ?

☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

“अरे मुडद्या तिकडं उन्हात का मरालायस इकडे सावलीत येउन मरकी की काय मरायचं तेे.. आँ..ss!”

उन्हात खेळणाऱ्या चार वर्षाच्या बंड्यावर चंपा ओरडली… पोरगं धाकाने उठून जवळ आलं. तसा आईच्या काळजाचा धपाटा चंपानं त्याच्या पाठीत घातला.. बंड्याच्या पाठीला काय पण फरक पडला नाही.. अर्धा खाल्लेला उष्टा रव्याचा लाडू बंड्यानं निरागस हसून आईसमोर धरला.. अन हसून चंपानं त्याला जवळ धरले…चिमणीच्या दाताने लाडू चा तुकडा मोडून चंपानं प्रेमानं छोट्या बंड्याचा मुका घेतला.. एक मिनिट मिनिटापूर्वी आलेला राग कुणाचं काय पण बिघडू शकला नाही…

 सुन्या आणि अन्याच्यात काय तरी कारणानं जोरदार भांडण जुंपले बोलणारा सुनील अनिलवर सक्त नाराज होऊन ओरडला

 “आयुष्यात परत लक्षात ठेवा  अनिलराव परत तुमच्या नादाला लागणार नाही”

सुनील च्या त्या वाक्याने अनिल चा काळजाचा तुकडाच निघाला… नेहमीच्या आपुलकीचा एकेरी पणा आज आपण कुठेतरी हरवून बसलो याची मनापासून जाणीव होताच अनिल च्या आवाज बंद झाला… अन्यावरून डायरेक्ट “अनिलराव” हे सुनीलचे हाक मारणे अनिलच्या काळजावर वार करून गेलं. दोन मिनिटे शांततेत गेली अनिल चा स्वरच पालटला

“असं काय करतोस सुन्या मर्दा ऐक की माझं जरा!’  अशी समजूतची भाषा अनिलनं काढली  अन भांडणाचा नूरच पालटला… आणि पुढच्या पंधरा-वीस मिनिटात सगळा “मॅटर क्लिअर” झाला… भाषा बदलली… नूर बदलला… गैरसमज संपले… तासाभरानं चहाच्या टपरीवर एक पेशल “च्या” दोघात संपला..

“संजुबाळ ss धीरेssधीरेss” शाळेत उशीर होत असलेल्या संजीव ची आई संजुवर चिडली होती. आईचे हे “गोड” कुत्सित बोलणे ऐकले अन आता आपली काय खैर नाही याची जाणीव संजूला झाली.. आता गोड आवाजाचा अर्थ काय होणार हे त्याला अनुभवाने माहिती होते कसं बसं पटापटा आटोपून संजीव मात्र दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला पळत सुटला…

थंडीने काकडणारा राजू झोपेतुन उठून तसाच मोरीत पळाला. तोंड धुतले, आईने गरम पाणी बादली भरून दिले. गुडघ्यावर बसून राजू डोक्यावर तांब्याने पाणी ओतू लागला. निम्मी बादली संपली… बाबा आले राजूला उभे केले… त्यांच्या लक्षात आले की गुडघ्याची मागची बाजू कोरडीच आहे… आळशी राजू चा बाबांना राग आला दोन रट्टे पिंढरीवर मारुन रडणाऱ्या राजुला बाबांनी चांगली घासुन आंघोळ घातली… ‘काही न बोलता’..! बाबांची शिस्त मात्र राजूने आयुष्यभर लक्षात ठेवली…

आनंदरावांचा ड्रेस शिवायला घेतलेल्या शामभाऊ टेलरकडे आनंदरावांच्या एव्हाना दहा चकरा झाल्या होत्या. प्रत्येक वेळा आनंदराव गोड बोलून विचारायचे, श्यामभाऊ मात्र रोज वेगळे कारण सांगायचा… मुदत मागायचा. आज मात्र आनंदराव चिडले. श्याम भाऊ टेलरची चांगली खरडपट्टी काढली. मोठा आवाज काढून भांडणाऱ्या आनंदरावांच्या व शामभाऊ च्या भोवती चांगली दहा पंधरा माणसे गोळा झाली…  संध्याकाळ पर्यंत शर्ट शिवून दे नाही तर माझ्याशी गाठ आहे असे म्हणून आनंदराव परतले… श्यामभाऊ चांगलाच हादरला होता… सायंकाळी पूर्ण काम करूनच श्यामभाऊने आनंदरावांच्या शर्ट घरपोच केला होता…

तिळगुळ घ्या गोड बोला सांगणारा हा संक्रांत सण पण कधीकधी गोड बोलून कामे होत नाहीत तेव्हा मात्र असं आनंदरावांसारखे तिखट बोलता आलं पाहिजे.

गोड या शब्दाचा असा प्रत्येकासाठी वेगळा वेगळा अर्थ लागतो. आपण सगळेच जण विचार करू तर एका निष्कर्षापर्यंत जरूर पोहोचू की गोड ही कल्पना वेगवेगळ्या संदर्भाने येऊ शकते.. कोणी असे म्हणेल की आमच्या ‘हिच्या’ हातच्या स्वयंपाकाची गोडी जगात कशालाच नाही.

याचा अर्थ जे काही ‘ही’ करते ते उत्कृष्ट असते. मग लसूण मिरच्या घालून केलेला चमचमीत खर्डा पण गोड होऊन जातो.

आपल्या मनात प्रेम असेल तर एखाद्या व्यक्तीच्या शिव्या पण गोड वाटतात. कारण ते देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचा ‘बंध’ मनापासून असतो. मग कुणी आदरार्थी बोलले तरी दूर करणारे ठरते. आणि कोणी एकेरी बोलले तरी दूर ढकलल्यासारखे वाटते…

हे मनातले अंतर मोठे विचित्र आहे. मग हजारो किलोमीटर असलेला पण ऱ्हदया जवळ राहतो आणि रोज घरात राहणारा मात्र टप्प्यात येत नाही.

गोड बोलणे किती तिखटजाळ होते तेव्हा ते बोलण्यामागे असलेला ‘भाव’ कुत्सितपणाचा असतो.

मग आईने घातलेल्या शिव्या पण ‘लागत’ नाहीत पण गोड बोलणे ‘लागते’… त्यामुळे हा ‘भाव’ फार महत्त्वाचा … तो प्रेमाचा असेल तर मग वरकरणी कसेही बोला जीवनात ‘गोडीच’ राहील…

पुराणकथेत शनि विचारतो की तुझ्या शरीरात मला बसण्यासाठी जागा दे तेव्हा त्याला उत्तर दिले जाते की माझी जीभ सोडून कुठेही बस… शनी हताश होतो म्हणतो तू जर माझी गादीच काढून घेतलीस.. आता मी तुझ्या शरीरात कुठे बसू शकत नाही… शनि पार पळून जातो..

दिवस कसेही असो शनीला जिभेवर स्थान न देणे शहाणपणाचे.

गुरुचरित्रात एक कथा येते की कली देवाच्या दरबारात प्रवेश करतो तो एका हातात वासना आणि एका हातात जीभ घेऊनच… त्याला विचारले जाते की “असे का रे..?” तेव्हा कली उद्गारतो. माझ्या या युगात मी या दोनच गोष्टी मध्ये वाईट रूपाने असेन. जो कोणी आपल्या जीभेवर आणि वासनांवर ताबा मिळवेल त्यांचे मी काहीही बिघडवू शकणार नाही .

मनात उमटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी मानवाने भाषेचा आधार घेतला. अनेक भावभावनांना , पदार्थांना काही विशिष्ट उच्चार मिळाले आणि भाषा प्रगत झाली. भाषांनी मानवाचे जगणे सुलभ केले. संदेशवहन सोपे झाले. जन्मापासून आपल्याला या भाषेची मोहिनी घातली जाते. आपल्याला काय वाटते ती प्रत्येक गोष्ट एक बाळ आपल्या उच्चाराने आईला, समाजाला कळवते. त्याच्या गरजा पूर्ण होतात. भाषेची थोरवी खूप मोठी… निशब्द शांत बसलेले असताना पण आपण आपल्याशी असा मातृभाषेतून संवाद साधत असतो… आपल्या विचारांना सुव्यवस्थित मांडत असतो… म्हणजेच निशब्दातही आपले शब्द शांत राहात नाहीत… प्रकट होत राहतात… हे प्रकट होणे खरंतर चमत्कारापेक्षा कमी नाही… अचानक काही विचार मनात उमटतो… खरंतर तो कोठून येतो हे कळतच नाही… निसर्गच ते पुरवत असतो… हा पलीकडून बोलणारा कोण? याचा शोध अनेक संतांनी घेतला… कोsहम् कोsहम् विचारत राहिले… सोsहम सोsहम म्हणत राहिले… तोच ओंकार… आणि तोच आदी… तोच अंत…

 संक्रांतीचा गोड बोला संदेश इतक्या अमृतवाणी रूपाने आपण स्वीकारला तर जीवन धन्य होईल.

वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत

 वैखरी: जी आपण व्यवहारात बोलतो ती मुखात जन्मते,

मध्यमा: तिच्या मागे सामुदायिक कल्याण अपेक्षित असते अशी वाणी ऱ्हदयात उत्पन्न होते,

पश्चंती: ज्याच्या मध्ये आशीर्वाद किंवा सिद्धी असतात उत्पत्तिस्थान पोट असते आणि

 सर्वात उच्च वाणी – जिला परा म्हणतात… ती देववाणी मानली जातेे… तिथे ओंकार येतो… वेदवाणी येते…श्लोक, स्तोत्रे किंवा ईश्वरापर्यंत नेणारे शब्द हे या वाणीत येतात.. हि नाभित उमटते…

या अमृतवाणी साधनेची सुरुवात मात्र गोड बोलण्याने होते. प्रेमाने बोलण्याने होते…

म्हणून हे मकर संक्रमण महत्त्वाचे, आपणा सर्वांना या अमृतमय प्रवासास मनापासून शुभेच्छा…

बोला । अमृत बोला ।

शुभसमयाला, गोड गोड ॥

*

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।

ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य…

रचना : मो. ग. रांगणेकर

 प्रेम आहे ते वृद्धिंगत व्हावे!

©  श्री श्रीनिवास गोडसे

(गोड Say परीवार)

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर

“तिळगूळ घ्या….”

“नमस्कार” हऱ्यानं हात जोडले.

“हाय” उजव्या हाताचा पंजा हलवत नाऱ्यानं प्रतिसाद दिला.  

“आज एकदम इंग्लिश”

“आपलं असंच असतं”

“रात्रीची उतरली नाही वाटतं”

“काहीही समज.फरक पडत नाही.”

“तिळगूळ घ्या ..”हऱ्या

“पुढचं नको”

“का?”

“मी नेहमीच गोड बोलतो.”

“ते माहितीये.आधी काय म्हणतोय ते ऐकून तर घे”

“बरं,बोल” 

“तिळगूळ घ्या अन खरं बोला.”

“हे अवघड आहे. त्यापेक्षा तिळगूळ परत घे .”

“सपशेल माघार”

“तुझी अपेक्षाच चुकीची आहे”

“काहीही काय”हऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?

“बाकी काहीही सांग पण खरं बोलायचं म्हणजे.. नको रे बाबा” 

“एवढं अवघड आहे.”

“अवघड नव्हे अशक्य”

“का?”

“खरं बोला.तुला सांगायला काय जातं पण बोललेलं समोरच्याला खरं वाटेल याची खात्री नाही आणि इथंच सगळा घोळयं. प्रत्येकजण सोयीनं बोलतो ”

“म्हणजे नाटकी.दिखाव्याची दुनिया..”हऱ्या

“कटू असलं तरी हेच वास्तव आहे”

“मग गोड बोला..”

“खरं सांगू.गोड बोलणाऱ्यांची तर भीतीच वाटते.कामापुरतं गोड बोलणार आणि नंतर….हम आपके हैं कौन ”

“खरा कोण?खोटा कोण?समजत नाही.”हऱ्या

“मी राजकारण्यांविषयी बोलत नाही.त्यांच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही.आपण औट घटकेचे राजे.मत दिल्यावर आपली अवस्था टिश्यू पेपर सारखी.”

“पण याच लोकांच्या हातात आपलं भविष्य आहे ना.नक्की कोणावर विश्वास ठेवायचा.” हऱ्या

“कोणावरच नाही.नशिबावर सोडून द्यायचं.सब घोडे बारा टक्के.नेतेमंडळी म्हणजे एकापेक्षा एक नटसम्राट..त्यांच्या  खेळातली आपण प्यादी. त्यांच्याविषयी जास्त बोलायला नको. कधी,कोठे अन कोणाला राग येईल आणि भावना दुखावतील याचा नेम राहिलेला नाही.”

“विषय भरकटला ना राव.आपण खरं बोलण्याविषयी  चाललं होतं .” हऱ्या

“हो,सध्या अशी परिस्थिती आहे की,घरी दारी सगळीकडे मुखवटा लावलेला.सारखं मुखवट्याआड लपल्यानं खरा चेहरा लक्षात येत नाही.” 

“हंsssम ”

“एकूणच काय तर एकमेकांवरचा विश्वास कमी होतोय.”

“झपाट्यानं”

“आपल्या मनमोकळं बोलण्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना ही भीती सतत वाटते.”

“असं का पण..”हऱ्या 

“मी,मला,माझं याला आलेलं महत्व आणि जगण्यातली वाढती अनिश्चितता त्यामुळे ठायी ठायी आलेला तात्पुरतेपणा”

“हे काय नवीन..”

“नवीन नाही जुनंच आहे.जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्या गोष्टी उदा.आनंद,दु:ख,राग,संताप हे फार वरवर आणि उथळ झालंय तर ईगो स्ट्रॉंग आणि नाती भुसभुशीत झालीय.”

“त्यामुळचं माणसं सतत सैरभैर असतात.” हऱ्या

“कोणत्याच गोष्टीत जास्त वेळ रमत नाहीत.लगेच बोर होतात.कोणत्याही कारणानं रागवतात अन लगेच शांतही होतात.बऱ्याचदा विचार न करता रिऍक्ट होण्याचं प्रमाण फार वाढलंय.तासनतास चॅटिंग करतील पण समोरासमोर बोलणार नाहीत.”

“डिजिटल संवाद वाढला पण सुसंवाद हरवला” हऱ्या 

“आहाहाहा,काय तर बोलालास.एकदम पुस्तकी वाक्य ..”

“माणूस कितीही आधुनिक झाला तरी अजूनही भावना तशाच आहेत.परस्परांविषयी प्रेम,माया,ममत्व वाटतचं आणि त्यात कधीच बदल होणार नाही.वाईट एवढंच की व्यवहाराला महत्व दिल्यानं नात्याची घट्ट वीण उसवायला सुरवात झाली”

“हो याचा अनुभव घेतलाय.आईबापांना आपल्याच मुलांशी बोलायला भीती वाटते”

“नवीन जमान्याची नवीन दुखणी”

“असो…माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.”

 हऱ्या तिळाची वडी नाऱ्याच्या हातात ठेवत म्हणाला “आपण परंपरा मोडायची नाही. तिळगूळ घ्या…..”लगेच नाऱ्या ओरडला “अन  चांगलं बोला …. “

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! तिळगूळ घ्या .. छान छान वाचत रहा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आज ३१ डिसेंबर कलामहर्षी केकी मूस यांचा स्मृतीदिन. केकी मूस या अवलियाची ही दुनिया! कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या साधनेत घालवले. ‘केकी मूस’ हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ-कुतूहलाचे वाटते. या नावामागे मोठे विश्व दडल्याची भावना होते. या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, की मग या गूढ अंतरंगाची खोली किती खोल-रुंद आहे याचाही साक्षात्कार होतो. कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावले चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात.कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी हा कलायोगी जन्माला आला.

 केकी मूस यांना त्यांचे निकटवर्तीय बाबुजी म्हणत असत. केकी मूस  हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते. केकी मूस यांचे बालपण  मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी गेले. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे – नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली. त्याचे मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते.

केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली. केकींचे यांचे वडील, माणेकजी मूस हे १९३४ साली कालवश झाले. त्यांच्या आईचा आधार गेला. पण १९३३-१९३४ सालामध्ये केकींनी पाटणादेवी, तीर्थक्षेत्र बालझिरी, खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली, पेंटिंग्ज केली. केकींनाही वडिलांच्या निधनाने हादरा बसला. केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले. केकींनी लंडनला जाण्याचा विषय आईकडे कधीही काढला नाही.

कैकुश्रु माणेकजी मूस हे केकींचे नाव, परंतु पिरोजाबाई लाडाने त्यांना केकी म्हणू लागल्या. त्याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले. केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचे ते ‘देणे’ विसरू शकले नाहीत. आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागावायचे आणि म्हणायचे, ‘कसला देव बीव काय नाय! देव असता तर माज्या आईला त्याने नेला नसता.’ आईने परवानगी दिल्याने केकी जाम खूश झाले. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व तेथील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले. लंडनचे नागरिक केकींना ‘गोल्ड मेडलिस्ट, गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. केकींनी त्या त्या राष्ट्रातील कला जाणून घेतल्या. तेथील नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या.

केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले.  या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन..काय काय म्हणून नव्हते. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहे.

रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! या साऱ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगविख्यात केले.

कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!

केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’  ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.

मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रेही आहेत. त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी इथे एक मोठी शंृखलाच उभी राहते. यात काही ‘असामान्य’ असे सामान्य चेहरेही आहेत. एका फासेपारधी स्त्रीचा चेहरा असाच सतत लक्ष वेधत असतो. या वृद्ध, कृश महिलेच्या चेहऱ्यात त्यांना साऱ्या जगाचे दु:ख जसे दिसले, तसेच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.

मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत.  मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्यांनी हव्या त्या आकारात छाटले आणि त्यांच्यात साखळय़ा अडकवल्या; यातूनच तयार झाली ती ‘इटर्नल बाँडेज’ नावाची एक अफलातून कलाकृती! स्त्री-पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती, इथपासून ते ‘त्या’ हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले.  पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीने इथपर्यंत आले आणि सारे कार्यक्रम रद्द करत दिवसभर रमले. तर इथे सतत येणारे बाबा आमटे जाताना ‘इथे मी माझा आत्मा ठेवून जात आहे’ असे म्हणाले. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटीशकालीन घर 109 वर्षांचे वृध्द झालेले आहे. 31 डिसेंबर 1989 रोजी कलामहर्षि केकी मूस यांनी या जगाचा निरोप घेतला.केकी मूस यांनी आयुष्यभर कलानिर्मितीशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांची कला सातासमुद्रापार गेली. तिला अनेक मानसन्मानही मिळाले, पण या मान, सन्मान, पुरस्कार, नाव, प्रसिद्धी, पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या साऱ्यांपासून ते दूर राहिले. कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे. या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वानाच हवाहवासा वाटायचा. तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथपर्यंत येतात. आजही आपल्या कलादालनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती खान्देशातील या मातीला अधिक समृध्द करीत आहेत.

लेखक : श्री योगेश शुक्ला 

प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते.

गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते.

“फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.”  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला.

मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!

गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही!” गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले.

गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली.

बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती, तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला.

निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’

गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही.

प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले, तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले.

मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल !

आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग !

जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला.

सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली.

तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला.

बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली,

“पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं !

परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावेसे वाटले.

आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो?

आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो.

पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते.

असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे.

एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो.

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो.

परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.

जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.

मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.

काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.

हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.

पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी ” काळजी घे ” म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.

त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या ” काळजी घ्या ” ची सर कशाला नाही.

आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.

हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.

बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला

संवाद असू द्या स्नेह असू द्या !! ……

लेखक : अज्ञात

प्रस्तुती.. सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

वैद्यकीय

  1.   रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे उपचार देण्यात आले.
  2. ज्यांना अजिबातच ऐकायला येत नाही अशी अनेक वृद्ध मंडळी मला रस्त्यात भेटतात. रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना किंवा इतर अनेक वेळी ऐकूच न आल्यामुळे अपघात होतात त्यात बऱ्याच वेळा हात पाय मोडले जातात.

अशा सर्वांना एक एक करून मांडके हियरिंग सर्विसेस या प्रथितयश संस्थेतून कानाची तपासणी करून घेत आहोत आणि योग्य त्या व्यक्तींना कानाची मशीन देत आहोत. 

ऐकू यायला लागल्यानंतर ही माणसं छोटे छोटे आवाज सुद्धा कौतुकाने ऐकत राहतात. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा गोंगाट… हॉर्नचा कर्ण कर्कश्श आवाज… स्पीकरवर जोरजोरात लागलेली गाणी… एरव्ही कोणालाही या सर्वाचा त्रास होईल, परंतु त्यांना हे आवाज ऐकताना खूप आनंद होतो…! 

  1. ज्यांना दिसत नाही अशा अनेक वृद्धांना रासकर डोळ्यांचे हॉस्पिटल किंवा लेले हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करत आहोत, चष्मे देत आहोत आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करून घेत आहोत.

दिसायला लागल्यानंतर यांना काय पाहू आणि काय नको असं होतं…

भिंतींचे रंग, गाड्यांचे रंग, आकाशाचा रंग, घातलेल्या कपड्याचे रंग… एरव्ही या गोष्टी सुध्दा कोणी इतक्या बारकाईने पाहत नाही परंतु याच गोष्टींचं त्यांना किती अप्रूप…! 

बरोबर आहे, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याला त्याची किंमत नसते… 

उपाशी असलेल्यालाच चतकोर भाकरीची किंमत जास्त कळते… 

शेवटी काय, आनंद आणि सुख याची खरी अनुभूती त्यालाच येते ज्याने या अगोदर दुःख पचवली आहेत…! 

  1. कुंडीतीलं झाड अतिशय सुरक्षित वातावरणात जगत असतं, पण ते कुणीतरी पाणी घालण्याची वाट पाहत असतं, परंतु जमिनीवर उगवलेलं झाड मात्र जमिनीतला ओलावा शोषून जगतं…!

अशीच जमिनीतला ओलावा घेवुन जगणारी… रस्त्यावर राहणारी वृद्ध माणसं… माझे मित्र श्री नितीन पाटील यांच्या सहकार्याने, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अतिशय उत्तम क्वालिटीची ब्लॅंकेट या सर्वांना देऊन त्यांच्या अंगावर मायेचं पांघरुण घालता आलं…

अन्नपूर्णा प्रकल्प

आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

आयुष्याच्या वाटेवर भेटलेले, श्री अमोल शेरेकर, हे फक्त शरीरानेच दिव्यांग आहेत. बाकी आत्मविश्वास एखाद्या धडधाकट माणसाला सुद्धा लाजवेल. 

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण व्यवसाय सुरू करून दिला आहे.

अमोल यांची पत्नी घरात जेवण तयार करते आणि श्री अमोल शेरेकर पॅकिंग करून रुग्णालयातील भुकेल्या गरिबांच्या हातात हे डबे नेवुन देतात. 

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

खरंच जेवणाच्या एका घासाने किती जणांना जगवले…. !

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

या संपूर्ण वर्षात कधी भंगारवाला झालो आणि उकिरड्यात टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यांना जोडत गेलो… कधी पोस्टमन होऊन आपली मदत योग्य त्या पत्त्यावर पोहोचवली…. आणि वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत गेलो…! 

उजाले मे मिल जाते हैं लाखों यहाँ…

अहसान उनका मानो जिन्होने अंधेरे मे साथ दिया…

आमच्या या धडपडीला तुमची साथ मिळाली… विनाअट विना अपेक्षा आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आम्हाला मदत करत गेलात, ऋण कसं फेडावं तुमचं…??? 

काही वेळा मला असं वाटतं, की आपण एकाच घड्याळाचे काटे आहोत…. प्रत्येक काट्याची उंची वेगळी, गती वेगळी, रुप वेगळे, रंग वेगळा…. 

तरीही घड्याळाच्या मध्यबिंदूवर आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत…. हा मध्यबिंदू आहे माणुसकीचा…!!!

आणि उंची, गती, रूप, रंग वेगळा असेलही परंतु, घड्याळाच्या या एका परिघात आपण एकत्र राहून एकाच दिशेने चाललो आहोत…

वर्षभरात नकळतपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत… मोठ्या मनानं माफ करावं…. !

सरत्या वर्षाचे धन्यवाद, येणाऱ्या वर्षाला अभिवादन आणि आपणा सर्वांना प्रणाम. 

नवीन वर्षाच्या आपणास शुभेच्छा… !!! 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर  आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.

वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?

आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.

‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. माणसाचं व्यक्तिमत्त्व खुलवणारी वस्त्रं. आत्मविश्वास वाढवणारी. ऊब देणारी. सन्मान करणारी. आदर, माया, प्रेम दर्शवणारी वस्त्रं. 

गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली  जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत.  अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे‌ समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत. 

लेखिका : अश्विनी मुळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”

मी त्याला विनंती केली,  “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”

क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या  बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”

नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.

मी त्याला म्हणालो,

” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”

तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं  म्हणू शकता ?”

मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.

बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.

बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’

अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.

आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.

पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.

मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.

काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”

मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”

तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मध्ये कित्येक वर्षे गेली….

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…

“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “

“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares