मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देवआनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात.

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॉ रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२४ रोजी ते ८२ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. अकरावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॉक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्‌, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठीअसलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॉलिमर रिऍक्षन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार, म्हणजे फक्त भारतरत्न बाकी!

असा क्रषितुल्य भारतीय ८३ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल

या महान वैज्ञानिकाला शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

वंदे मातरम !!

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

नऊ-दहा वर्षाचं वय..  शाळेतली तिसरी चौथी असेल..

दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.

आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..

मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.

कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं  अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..

” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..

शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..

आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..

सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..

त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून  नाकाच्या आत गाठ मारलेली..

याचं  नाव सुंकलं..

परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या  नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…

मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..

दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला  न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…

” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ” 

आईची सूचना..

” अरे व्वा ..नाक टोचलं वाटतं ” भेटणा-या प्रत्येकाकडून कौतुक..

आनंदाच्या डोहात तरंगत असताना दुस-या दिवशी मात्रं  नाक ठणकत असल्याची जाणीव व्हायची.नाकपुडी लालेलाल झालेली असायची. 

तिसरे चौथे दिवशी लाल फोडाने त्या सुंकल्यावर आक्रमण केलेलं असायचं..

प्रचंड दुखणं ..पण  आईला सांगायला  कमीपणा वाटायचा..

दोन दिवस सहन करायची ती वेदना..

कदाचित स्त्री म्हणून वाट्याला येणा-या वेदनेची नि सहनशक्तीची इथूनच सुरूवात होत असावी!

आता त्या फोडात पू भरलेला असायचा..सुंकल्यातल्या मोत्याशी साधर्म्य जोडू पहाणारा तो फोड आता मात्रं आईच्या नजरेतून सुटायचा नाही..

रात्री गरम फुलवातीनं त्याला शेकण्याच्या नावानं नाकाला दिलेले चटके पार काळजापर्यंत पोहोचायचे..

सुंकल्याच्या तारेच्या गाठीचं नाकाच्या आतल्या बाजुला सतत टोचणं , ते सुंकलं पांघरुणात अडकून नाक दुखणं, कपडा काढताना सुंकल्यात अडकणं, खेळताना मैत्रीणीकडून सुंकलं ओढलं जाणं नि नाकातून जीवघेणी कळ उमटणं , चेहरा धुताना त्या सुंकल्यात हमाम साबणं अडकून  मैत्रिणींचा शेंबूड अडकल्याचा गैरसमज होऊन चेष्टा होणं…

यांमुळे ” घी देखा लेकीन बडगा नही देखा ”  …अशी त्या सुंकल्याची अवस्था व्हायची  नि चार -सहा  महिन्यांत त्या सुंकल्याशी  काडीमोड  व्हायचा!!

” नाक बुजू देऊ  नको गं..नाहीतर लग्नात नथ घालायला अडचण यायची ” ..असे सल्ले मिळायचे नि अधूनमधून खराट्याच्या छोट्याश्या काडीनं  नाकाच्या छिद्राचं अस्तित्त्व टिकवलं जायचं!

शाळेच्या स्नेहसंमेलनात   छोट्याशा खोट्या कोळीछाप  नथणींनं नाक सजायचं

नि ” टिमक्याची चोली बाई  ” गाण्यावर  मनमुराद नाचायचं..

” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ”  अशा गुजराती मारवाडी  नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची  नि  सुरेखशा साखळीनं  ही  नथनी  केसाशी नाहीतर कानातल्याशी  संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!

या नथन्या  त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत  निपचित पडून रहायच्या!

आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं  नि  महाविद्यालयाचं शहर लागलं..

या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…

कधी  रेखाची  नाहीतर राखीची नाकातली रिंग  तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी   मनातल्या मोरपिसाला साद घालायची..

अशी  चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..

भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की  जीव शांत शांत व्हायचा..

त्या चमकीचा  प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि  अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..

एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..

चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..

नंतरचे अनेक दिवस औषधाचे  नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू  डोस गपगुमान गिळावे लागले..

चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…

आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत  गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …

कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली  ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..

त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..

घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू  नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की  तिचं  अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य  स्वर्गीय भासायचं…!!

आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …

नि  आपण कधीही  नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..

लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी  एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..

उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..

” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा  मान  आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “

आता ही नथ दागिना राहिली नव्हती..

ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …

आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी  गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!

मी  अचानक मोठी झाले..

लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!

आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!

सुंदर दिसावं ही  प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…

फक्त महाराष्ट्रातच  नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…

केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..

मंगळसुत्राखालोखाल  सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा  मोठा मान…

तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..

या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..

नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..

महिलांच्या शरीराची डावी बाजू ही  प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..

म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..

यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..

खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…

मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…

पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..

इतरवेळी  जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.

नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी 

अगदी  उंची साडीवरही  दिसू  लागलीय…!!

असतो  एकेकाचा  काळ …

कालाय  तस्मै  नम: !!

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले

सोलापूर

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निरोप तुजला देता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

निरोप तुजला देता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

निरोप…  हा शब्द  उच्चारताच मन हेलावते. भावनांचा गहिवर आठवणींचा बांध फोडतो. सुखदुःखाचे सडा शिंपण सृजनाच्या पायघड्या घालते.  वाईटातून चांगले घडते. मन मनाला समजावते.  माणूस महत्वाचा. हे सूत्र लक्षात घेऊन काही  आठवणी विसरायचा प्रयत्न करतो आणि निरोपाची घटिका समिप येते.

आयुष्यात वेळ प्रसंगी, कलाटणी देणाऱ्या प्रत्येक वळणावरती आपण सुख दुःखाची, अनेक शतके लिलया पार करतो.यावेळी अनेक‌ व्यक्ती ,भावना, प्रसंग आपला निरोप घेतात आणि आपल्याच अंतरी आठवणी बनून विराजमान होतात.

निरोपाचे क्षण हा देखील आयुष्याच्या अविभाज्य भाग आहे त्यांचा उपभोग घेताना आपल्या इतर नात्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपले आणि पारीवारीक व्यक्तीशी जडलेले नाते हे.. भावनिक आणि शारीरिक असल्याने आपल्या कौटुंबिक जीवनाशी..स्वभावाशी अत्यंत निगडित असते.

आप्तेष्ट जिवलग व्यक्तीची साथ तुटावी,‌आणि पोरकेपणाची जाणिव ,दुर्देवी घेतलेला निरोप मन विषण्ण करते. मन विचलीत होते. निर्णय घेण्याची‌ क्षमता क्षीण होते..अशा वेळी‌ समाज मदतीला धावून येत़ो.

जाणारा केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेलेला असतो.‌ त्याने कधीच परलोकी चे हटके स्टेशन गाठलेले असते. कमावलेलं‌ सारं काही इथंच असतं..जे आहे त्यात‌ समाधान मानायचे ही शिकवण अशा‌ वेळी कामी‌ येते.

स्नैहमैत्रीचे, अनुभूतीचे नाते निरोप घेताना‌ माणसाची सर्वंकष परीक्षा घेतात. त्याचं दुःखात वहावत जाणं,शोक करणं, इतकंच काय‌ ,त्याचं‌ सावरणं देखील त्याला निरोपाची भिती घालत रहातं.

इह‌लोकीचे ,अतूट बंधन, हळव्या ओल्या, विरह‌ वेदना, समाचारात दिलेला दिलासा, जग रहाटीला सामोरं जाण्यासाठी रिती,रिवाज परंपरांचे बंधन घालतो. माणुस माणसाला निरोप‌ देताना आठवणींच्या निजरूपानं त्यांनी त्या‌ माणसाला काळजात बंदिस्त केलेलं असतं..त्याला मोकळं करणं अशावेळी अत्यंत गरजेचं असतं.‌त्या‌साठी उत्तर कार्य विधी माणसाला माणसात रहाण्यासाठी मार्ग दाखवतात.

येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाताना थोडे द्यायचे,  थोडे घ्यायचे.  देणा-याचे हात घ्यायचे  हा निश्चय केला की जगणे सोपे होते.  अनुभूती वेचताना प्रतिभा शक्ती जागृत होते. चारोळी,  कथा, कविता, लेख  कोणत्याही स्वरुपात ही अभिव्यक्ती व्यक्त होते.  कौतुक आणि प्रोत्साहन ही गरज माणसाला माणूस करते. छोट्या छोट्या गोष्टीत  आनंद, समाधान मानायला शिकलं की मोठ मोठी संकटं, आपली गती धीमी करतात. “जोरका झटका धीरेसे लगे”.. याप्रमाणे काही  आघात  आपण सहन करतो ते या मुळेच. भाव फुलांचे,मोहरते क्षण दिठी मिठीचे, हळवे स्पंदन  निरोपाचा क्षण संकलीत, संग्रहित करतात.

गतवर्षी  अनेक संकल्प, योजना,  उपक्रम यातून प्रेरणा मिळाली.   अनेक‌ साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिट संस्थांनी मला, माझ्यातल्या कवीला,  माणसाला घडवले.  अनेक नाती लाभली.  एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना रूसवा,राग, लोभ ,  आणि निर्व्याज प्रेम  करीत गेलो.नव्याचा स्विकार करताना कोणाला कधी..? कसा निरोप‌ द्यायचा ‌हे वेळ, काळ, प्रसंगांनी शिकवलं..

या प्रवासात काही‌ व्यक्तींच्या अतिशय जवळ गेलो. यश मिळवताना अनेकअपेक्षा ठेवल्या.  अपेक्षा भंगाचे दुःख पचवले. पण कर्म फलाची अपेक्षा न ठेवल्याने जबाबदारी वाढत गेली. नवीन जबाबदारी स्वीकारताना काही चुका झाल्या.  चुका निस्तरायला  आपल्या माणसांनी दिलेला वेळ , निभावून नेलेले नाते ,दिलेली‌ साथ.. यातून माझ्या सहित प्रत्येकाचे मुखवटे गळून पडले. माणूस माणसाच्या सोबत राहिला.  आणि हीच सोबत कार्य प्रवणता ,  कार्य‌क्षमता, कलाकौशल्य वृद्धीगंत करते.

अशा‌ वेळी कौतुकाची  अपेक्षा  आणि राग  आपल्या जवळच्या माणसावर व्यक्त होते. चुकातून माणूस शिकतो. ही शिकवण सृजनाच्या पायवाटा सुजलाम सुफलाम करते.  शब्द, स्वभाव  आणि विश्वास  आपल्यातला माणूस जिवंत ठेवतात. माणूस जपायला शिकलो तरच  आपण  आपली कला त्यातील बारकावे  अधिक सखोलपणे शिकू शकतो.  चारदोन कौतुकाच्या शब्दांनी किंवा  ऑनलाईन स्पर्धात्मक प्रमाणपत्रांनी साहित्यिक घडत नाही.  साहित्यिक तेव्हाच घडतो,  जेव्हा  “काय लिहायचं नाही ..?” हे त्याला  उमगलेले असते.  आणि काय लिहायचे नाही यासाठी स्पर्धा,  उपक्रम यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.  स्पर्धेत सहभागी होताना, यश मिळाले नाही तर परीक्षकांना दोष देण्यापेक्षा आपली चूक  आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर  आपण  आपला कला व्यासंग  अधिक  उत्तम प्रकारे जोपासू शकतो.

जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करीत नाही तोपर्यंत  आपली आकलन शक्ती प्रतिभा शक्तीला थोपवून धरते. हे थोपवून धरणे घातक ठरू शकते.  प्रसिद्धी हव्यास  आणि सदोष लेखन कमी करायचे असेल तर दैनंदिन लेखन व्यासंग  अत्यंत गरजेचा आहे.  माफ करा या शब्दांनी  इतरांना दिलेले मोठेपण  आपल्यातला कलाकार घडवीत जातो.

अनुभव‌ हा  एकमेव असा गुरू आहे कि जो आधी परिक्षा घेतो..आणि‌ नंतर धडा शिकवतो. आपल्या अहंकाराला निरोप द्यायला शिकलो कि जिवनाच्या‌परीक्षेत आपण उत्तम गुणांनी पास‌ होतो.

 दुसर्‍याला दिलेला आनंद,  समाधान  आपल्याला मोठे करतो हे मोठेपण माणसातला विवेक जागृत ठेवतं..  अशा विवेकी माणसांच्या ह्रदय कोंदणात निर्माण झालेले साहित्य… ही त्याची  ओळख बनते. ही ओळख  मी सातत्याने जपतो आहे.  माणसांचे स्वभाव दोष समजून घेताना कदाचित मी देखिल चुकलो असेल पण ती चूक माफ करताच मी मला सावरू शकलो.  मोठेपणा मिळवणे खूप सोपे आहे पण हा मोठेपणा टिकवून ठेवणे फार  अवघड आहे.  सतत नवनवीन साहित्य निर्मिती करायची  असेल तर चुकांना निरोप  आणि नव्या  आव्हानांचा स्वीकार यशोमंदिराची वाट दाखवीत रहातो.

सरत्या वर्षाला निरोप देताना इतकच म्हणावसं वाटत – 

☆ निरोप तुजला देता ☆

कुणीतरी येत, कुणीतरी जातं

स्वभाव तोच आठवण बदलते

आकडे तेच तिथी वार बदलेला

आठवणींचा ओला श्वास

पानापानावर थांबलेला.. !

 

शब्दाचं कुटुंब कागदावर सजलेलं

आठवणींच गोकुळ मनामध्ये नटलेलं

भूत, भविष्य, वर्तमान, पानामध्ये सामावलेलं

नवीन वर्ष,  नवीन कॅलेंडर,  प्रतिक्षेत थांबलेलं

निरोप आणि स्वागताला सदानकदा  आसुसलेलं.. !

 

निरोप घेतोय..तो नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा देऊन..चला‌ तर मग तयार होऊ यात..नववर्षाच्या स्वागतासाठी..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सकाळी साडेसहाची वेळ .

शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.

 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….

कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.

हळूहळू आवाज बंद झाला.

 

दुसरी दिवशी पण

 सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले

तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.

 

 एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.

 त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. 

आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.

 

“ ताई तुम्ही नवीन आलात का? “

“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “

 

“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “

 “ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”

 

“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी  भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे 

 विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”

“ भजनाला जाता का?”

“ कुठलं  हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी  म्हणायची..

 आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”

 

“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल  सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..

मला जनाबाईचा अभंग आठवला

 

झाड लोट करी जनी

केरभरी चक्रपाणी 

पाटी घेऊन या शिरी

नेऊन  टाकी दूरी 

ऐसा भक्तिसी  भुलला

नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला

काय उतराई होऊ तुला

 

विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.

पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या  तनामनात आहेसच…

नाम रूपानी…

 

तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. 

संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट  जाणवत नाहीत …

तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….

 

खरंच  ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..

 

असं होतच असेल…. 

फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…

मग तो येतोच मदतीला…  सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….

….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…

…. मग  तो विठुराया  दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…

…. आज  कशी मला जनी भेटली तसाच….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२३ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.

व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, ” आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही? एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.

नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पुर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण, घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण, पुन्हा व.पु. म्हणतात तसं, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..” मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच.

असो, सुर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच, तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या.. गुरू ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत,

“आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे

ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे…”

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

हृषीकेश मुखर्जी या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाने 70 च्या दशकात एक अप्रतिम चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव “बावर्ची”. एक प्रगल्भ प्राध्यापक ‘बावर्ची’ म्हणजे स्वयंपाकी बनून एका अशांतीने भरलेल्या कुटुंबात येतो आणि साध्या साध्या प्रसंगातून नातेसंबंधात प्रेम आणि कुटुंबात  शांती आणि आनंद कसा निर्माण करता येतं, हे कथाबीज  केंद्रस्थानी ठेवून बांधलेला तो अफलातून चित्रपट.  

त्या चित्रपटात त्या बावर्चीच्या पात्राच्या तोंडी रवींद्रनाथ टागोर यांचं एक वाक्य दिलं आहे ते असं;

“It’s very simple to be happy but its very difficult to be simple”

हा चित्रपट पाहिला होता तेव्हा ते वाक्य मनाला भिडून गेलं होतं आणि ते कायम स्मरणात राहिलं. त्यावर थोडं चिंतन झालं होतं पण त्या वाक्यातील खरं गूज मात्र लक्षात आलं नव्हतं. 

दोन तीन दिवसांपूर्वी गुगलवर काही शोधत असताना एक चित्र डोळ्यासमोर आलं. आईन्स्टाईनने बुद्धिमत्तेच्या पायऱ्या सांगितल्या आहेत त्यापासून तयार झालेला एक जिना त्या चित्रात दाखवलेला होता.

त्यातल्या पायऱ्या अश्या …. 

सर्वात खालच्या पातळीवर; 

Smart – हुशार

त्याच्या वरची पायरी:

Intelligent – बुद्धिमान

त्याच्या वरची पायरी;

Brilliant – तल्लख किंवा तरल

त्याच्या वरची पायरी; 

Genius – प्रतिभाशाली

आणि त्याच्याही वरची आईन्स्टाईनने सांगितलेली पायरी म्हणजे 

Simple –  सहज

आईन्स्टाईनच्या या बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांच्या जिन्याचं चित्र बघितलं आणि पू. रवींद्रनाथ टागोर यांच्या वाक्यामागचं गुह्य अचानक उमगलं.  त्या वाक्याचा मराठीतील भावानुवाद करायचा तर तो असा होईल; 

“आनंदी होणं खूप सोपं किंवा सहज असतं. पण सहज होणं अतिशय कठीण असतं.”

त्या वाक्याच्या गुह्यातील काही मुद्दे आइन्स्टाईनच्या जिन्याच्या संदर्भातून मला लक्षात आले. 

पहिली गोष्ट ही की कुठल्याही विषयात सहजता मिळवणं ही कठीण गोष्ट आहे कारण ती मिळवण्यापूर्वी हुशार ते प्रतिभासंपन्न हा बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांचा प्रवास खूप कठीण, कष्टसाध्य आहे जो अनेक तपं करत रहावा लागतो. त्यामुळे संगीत असो, साहित्य असो, इतर व्यवसाय असो, किंवा जीवनातील आनंदसाधना असो, या पायऱ्या साधण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या विषयात ‘सहज’ ही पातळी गाठणं कठीण आहे.

दुसरा मुद्दा असा लक्षात आला की हुशार ते प्रतिभाशाली या पायऱ्या कष्टसाध्य आहेत.  प्रयत्नांनी त्या साधल्या जाऊ शकतील पण सहजता मिळवायची असेल तर? 

यावर चिंतन करताना असं लक्षात  आलं की 

” प्रतिभा जेव्हा भगवंताशी शरणागत होते, तेव्हा ती सहज होते “. 

प्रतिभा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमागचा रजोगुणी अहंकार जेव्हा एका स्थितीला भागवंतापुढे शरणागत होऊन लयाला जाईल तेव्हा भगवंताच्या कृपेनेच सहजता येईल. 

याचाच दुसरा कंगोरा असा की केवळ प्रयत्नांनी सहजता मिळणार नाही आणि प्रयत्नांशिवाय केवळ शरणगातीनेही सहजता मिळणार नाही. म्हणून खूप प्रयत्न केल्यानंतरही भागवंतापायी शरणागती नसेल तरीही चालणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय नुसतंच शरणागत होऊनही चालायचं नाही. इतकंच नव्हे तर प्रयत्नांशिवाय जर मी शरणागत होण्याची भावना बाळगत असेन तर ती कोरडी शरणागती असेल, त्या शरणागतीतही सहजता नसेल.

यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठल्यावर, केवळ प्रयत्नांनी साधत नाही हे लक्षात आल्यावर, स्वाभाविकपणे घडणारी  संपूर्ण शरणागती, यानेच केवळ सहजता प्राप्त होईल हेही लक्षात आलं. 

या विचाराबरोबरच योगवासिष्ठ्य या अद्भुत ग्रंथात सांगितलेल्या प्रयत्नवादावरच्या काही सिद्धांतांचीही थोडीफार उकल झाली.

हा सगळा उहापोह मनात झाल्यावर एक मात्र झालं. आइन्स्टाईनच्या त्या जिन्यावर मी कुठे आहे हे जरी सांगता आलं नाही तरी कुठे जायचं आहे हे मला लक्षात आलं आहे यानेच अतीव  समाधान अनुभवत आहे. 

लेखक : राजेंद्र वैशंपायन 

मो – ९३२३२ २७२७७

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…”– लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं.

मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे.

त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात, ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचं राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायचं . की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेन !

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत.

त्यात कुणी लिहिलेलं असायचं की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन.

– तर कुणी लिहायचं …. माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे.

– कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार

– एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल, तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन.

– एकीने लिहिलं…. संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं , हसायचंच विसरून गेलेय… यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार

– निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही.

– एका सासूने लिहिलं होत…. लेक आणि सुनेत मी थोडं डावं-उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !

अशी अनेकांनी त्यांची- त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली.

*

आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटरमध्ये नेत आणि यशस्वीरीत्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो “उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म” त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर “टिकमार्क” करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?

*

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, “जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे.”

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायचं आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे.

*

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत, जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं?”

यावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे, माहीत नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे, ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा.

आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभवातून सांगतोय.

*

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय.  जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं, पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या, असं सांगितलं होतं,तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय.  योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk)  आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास! याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच !

*

आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.

कारण… असं म्हणतात की

जो प्राप्त है-पर्याप्त है

जिसका मन मस्त हैtt

उसके पास समस्त है!

लेखक :डॉ. धनंजय देशपांडे

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्त म्हणजे देणारा… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

दत्त म्हणजे देणारा… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

स्वत:च्याच ठायी असणारा आनंद चाखण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार झाला. आणि आपल्याला प्राप्त झाली. सर्व काही देणारा तोच म्हणून तो आहे दत्त.

विश्वरूपाने समोर, शरीर रूपाने जवळ व सच्चिदानंद रूपाने तो आपल्या अंत:करणात आहे.

शरिराच्या रुपाने साकार झाला, अवतिर्ण झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व चैतन्य (ईश्वर) रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.  

तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य  (ईश्वर).

सहा हात :- शरीराचे दोन हात – डावा व उजवा

मनाचे दोन हात – बहिर्मन व अंतर्मन

चैतन्याचे दोन हात – जाणिव व नेणीव.

गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.

श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.

हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात  राम अशी जगण्याची जीवन शैली.

काखेत झोळी म्हणजे अहंकार सोडून जिथून ज्ञान मिळते तिथून सतत ज्ञान मिळवत रहा.  

किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.

जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.

सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.

म्हणून खर्‍या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.

अशा दत्तजन्मौत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा….

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण -…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण …” ☆ श्री सुनील देशपांडे

आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !

आज त्यांची पुण्यतिथी 

त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये  गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.

आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या  कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात. 

पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर  रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा  ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.  

आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच. 

परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’  खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?

या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’

असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी  म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती  त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….

म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी

“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान

मातीला हे मिळणारच. 

झाड कधी कण्हतं का?

कधी काही म्हणतं का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान!

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप

बोरकर एकदा म्हणाले

सिगारेटचा सोडीत धूर 

“सत्तर संपली तरी माझ्या

गळ्यात तरुणताजा सूर!

तीन मजले चढून आलो

असा दम अजून श्वासात

– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”

कवितांतून

रंग रंग झरू लागले

प्रत्येक क्षण

आनंदाने भरू लागले!

घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,

धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!

पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस

पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत

उभा होता किती वेळ,

रंगून जाऊन बघत होता

बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!

रस्त्यावरच उभं राहून दोघांनी

मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!

मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,

जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!

खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! 

आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?

नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?

अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?

थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?

तुम्ही काय घ्यायचं

ते तुम्ही ठरवा,

तुम्ही काय प्यायचं

ते तुम्ही ठरवा!

त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:

वय तुमचं साठ असो, सत्तर असो,

तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;

मोरासारखा अंधार फुलून आल्यावर

मजा आणते थोडीशी काजूफेणी!

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

 

आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता  रसिकार्पण.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा

 

डोळे भरत त्यांची आठवण

आपण आज काढतोच ना?

दोन कविता आठवून आठवून

त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?

डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं

तुम्हीच ठरवा

 

सरत्या वर्षाच्या काळोखात 

अंधार गडद होत असतो

नव्या वर्षाच्या प्रकाशात

त्यांचं काव्य उजळत असतं

अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं

तुम्हीच ठरवा

 

पाडगांवकर हयात नाहीत

असंही म्हणता येतं

पाडगांवकर मनात आहेत

असं सुद्धा म्हणता येतं

हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं

तुम्हीच ठरवा.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा. 

 

———- श्रद्धापूर्वक  — सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

माझी दत्तोपासना

आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची  यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे. 

दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.

हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. 

आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.

विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं…..  पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो. 

कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.

त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते. 

निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…

या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!! 

तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल. 

||श्री गुरुदेव दत्त||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares